ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सवत्सधेनू पुजनाने
दिवाळी सुरू जाहली आज
ज्योत ज्योतीने चला लाऊया
आसमंत उजळे प्रकाशात

 – नीलांबरी शिर्के

? || शुभ दीपावली || ?

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? १ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज १ नोव्हेंबर — बुद्धिवादी, विज्ञानवादी समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. नरेंद्र दाभोळकर यांचा जन्मदिन. ( ०१/११/१९४५ – २०/०८/२०१३ ) 

अघोरी सामाजिक प्रथांच्या आणि अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी श्री. श्याम मानव यांनी १९८२ साली स्थापन केलेल्या “ अखिल भारतीय अंधश्रद्धा-निर्मूलन समिती “ या संघटनेसोबत शेवटपर्यंत काम केलेल्या श्री. नरेंद्र दाभोळकर यांनी, १९८९ साली “ महाराष्ट्र अंधश्रद्धा-निर्मूलन समिती “ची स्थापना केली, आणि ‘ संस्थापक-अध्यक्ष ‘ म्हणून अखेरपर्यंत या समितीची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली. याच संदर्भातल्या त्यांच्या विचारांना आणि त्याला अनुसरून केलेल्या कार्याला अधोरेखित करणारी बरीच पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत, जी नावाजलेल्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेली आहेत.—- ‘ अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम ‘, अंधश्रद्धा विनाशाय  ‘, ‘ ऐसे कैसे झाले भोंदू ‘, ‘ ठरलं– डोळस व्हायचंय ‘, ‘ तिमिरातुनी तेजाकडे ‘, ‘ विचार तर कराल ?’, ‘ भ्रम आणि निरास ‘, ‘ मती-भानामती ‘, अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. “ प्रश्न तुमचे -उत्तर दाभोळकरांचे “ या शीर्षकाने त्यांच्या सविस्तर मुलाखतीची, म्याग्नम ओपस कं. ने काढलेली डी. व्ही .डी. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच आविष्कार म्हणावा लागेल. ऑगस्ट २०१३ मध्ये झालेल्या त्यांच्या निर्घृण हत्येचा निषेध, महाराष्ट्र अं.नि.स. च्या लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी ‘ रिंगणनाट्य ‘ या माध्यमातून सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने केला, जो अतिशय प्रभावी ठरला. 

श्री. दाभोळकर यांना रोटरी क्लबचा “ समाज गौरव “ पुरस्कार, दादासाहेब साखवळकर पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा  “ साधना जीवनगौरव पुरस्कार “( मरणोत्तर ) अशासारख्या पुरस्कारांच्या जोडीने, भारत सरकारतर्फे “ पद्मश्री “ ( मरणोत्तर ) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच, अमेरिकेतल्या ‘ महाराष्ट्र फौंडेशन ‘ने, त्यांच्यातर्फे सुरु करण्यात आलेला समाज गौरव पुरस्कार सर्वप्रथम ‘ अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘ला दिला होता. याबरोबरच विशेषत्वाने सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे, न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फौंडेशनने २०१३ सालापासून, एखाद्या समाजहितार्थ कार्याला वाहून घेणाऱ्या व्यक्तीला “ डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार “ देण्यास सुरुवात केली आहे.

एका वेगळ्याच पण महत्वाच्या वाटेवर आयुष्यभर निकराने चालत राहिलेल्या श्री. दाभोळकर यांना कृतज्ञतापूर्वक सलाम… ?

☆☆☆☆☆

आज कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचाही जन्मदिन. ( १०/११/१९३२ – २५/०९/२००४ ) 

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये कविता करण्याची हातोटी असणारे कवी अशी श्री. कोलटकर यांची ख्याती होती. १९६० च्या दशकात त्यांनी केलेल्या कविता, खास मुंबईतल्या विशिष्ट  अशा मराठी बोलीभाषेतल्या होत्या, ज्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या आणि गुन्हेगारीच्या विश्वात अडकलेल्या गुन्हेगारांच्या आयुष्याचे प्रकर्षाने दर्शन घडते— मै भाभीको बोला / क्या भाईसाहबके  ड्युटीपे मै आ जाऊ ?/ रेहमान बोला गोली चलाऊंगा /– अशासारख्या त्यांच्या कविता इथे उदाहरणादाखल सांगता येतील. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतल्या त्यांच्या कवितांचे संग्रह प्रकाशित झालेले आहेत, ते असे — मराठी कवितासंग्रह — अरुण कोलटकरच्या कविता, चिरीमिरी, द्रोण, भिजकी वही, अरुण कोलटकरच्या चार कविता. —इंग्रजी कवितासंग्रह –जेजुरी, काळा घोडा पोएम्स, सर्पसत्र, द बोटराइड अँड अदर पोएम्स, कलेक्टेड पोएम्स इन इंग्लिश.— यापैकी “ जेजुरी “ ही त्यांची अतिशय प्रसिद्ध साहित्यकृती ठरली होती.

श्री. कोलटकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार, १९७६ सालचा राष्ट्रकुल काव्य पुरस्कार असे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. “ शब्द “ या लघुनियतकालिकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता. 

या जोडीनेच श्री. कोलटकर हे एक उत्तम ग्राफिक डिझायनर आणि जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कला-दिग्दर्शक  म्हणूनही प्रसिद्ध होते हे आवर्जून सांगायला हवे. 

श्री. अरुण कोलटकर यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी मनापासून आदरांजली.  ?

☆☆☆☆☆

आज श्रीमती योगिनी जोगळेकर यांचा स्मृतिदिन.  ( ६/८/१९२५ — १/११/२००५ ) 

या एक नावाजलेल्या मराठी लेखिका, कवयित्री आणि शास्त्रीय गायिका होत्या. त्यांनी काही वर्षे शिक्षिका म्हणूनही काम केले होते. याव्यतिरिक्त, राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय असे पुष्कळ समाजकार्यही केले होते. 

त्यांची एकूण ११६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, ज्यामध्ये ५० कादंबऱ्या, ४० कथासंग्रह, कवितासंग्रह, बालकवितासंग्रह, अशा विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्याचा समावेश आहे. “ या सम हा “ ही गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्यावर लिहिलेली कादंबरी, आणि, “ रामप्रहर “ ही प्रसिद्ध गायक श्री. राम मराठे यांच्यावर लिहिलेली कादंबरी, अशा त्यांच्या दोन कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय ठरल्या, आणि प्रचंड प्रसिद्ध झाल्या. त्यांची – असंग, उमाळा, मौन, घरोघरी, ऋणानुबंध, कुणासाठी कुणीतरी, नादब्रह्म, अश्वत्थ,अशी किती प्रसिद्ध पुस्तके सांगावीत ? ‘ मधुर स्वरलहरी या ‘, सखे बाई सांगते मी ‘, ‘ हरीची ऐकताच मुरली’, हे सागरा नीलांबरा ‘, अशी त्यांनी लिहिलेली गीतेही खूप गाजली. 

“पहिली मंगळागौर “ या त्या काळी गाजलेल्या मराठी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. 

‘शास्त्रीय गायिका ‘ म्हणूनही नावाजलेल्या योगिनीताईंनी वयाच्या आठव्या वर्षांपासून शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली होती. शंकरबुवा अष्टेकर, राम मराठे, संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर असे  मातब्बर गुरू त्यांना लाभले होते. डॉ. भालेराव स्मृती पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या होत्या. त्यांच्याबद्दल विशेषत्वाने सांगायला हव्यात अशा दोन गोष्टी म्हणजे— रायगडाच्या पायथ्याशी त्यांच्या कवितेच्या ओळी संगमरवरात कोरून लिहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी “ अक्षरयोगिनी “ हा देवनागरी युनिकोड फॉन्ट उपलब्ध करून दिलेला आहे. 

अशाप्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवून गेलेल्या श्रीमती योगिनी जोगळेकर यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.  ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग.

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

|| शुभ दीपावली ||

?  || शुभ दीपावली || ?

 

आजपासून दीपावलीला सुरुवात होत आहे. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….  !!!!!

 

१ नोव्हेंबर २०२१- वसुबारस !

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

२ नोव्हेंबर २०२१- धनत्रयोदशी !

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! 

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

४ नोव्हेंबर २०२१- नरकचतुर्दशी !

सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा !

अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला लाभो !! 

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !

आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!

४ नोव्हेंबर २०२१- लक्ष्मीपूजन !

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य रहावा !

नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !

लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !

घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

५ नोव्हेंबर २०२१- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा !

सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो !

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला कायमच मिळत राहोत  !

६ नोव्हेंबर २०२१- भाऊबीज !

सर्वांचे एकमेकांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे !

भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

? ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आनंदाची आणि भरभराटीची जावो .. ?

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हरीची ऐकताच मुरली.. ☆ स्व. योगिनी विश्वनाथ जोगळेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हरीची ऐकताच मुरली.. ☆ स्व. योगिनी विश्वनाथ जोगळेकर ☆

हरीची ऐकताच मुरली

राधिका राधिका न उरली 

 

आसावरीचे सूर कोवळे

पहाटवारा पिउनी आले

घुसळण करिता हात थांबले

डे-यामधूनी दह्यादुधातूनी यमुना अवतरली

 

वेड असे कैसे विसरावे ?

फुलातुनी गंधा तोडावे

नभातुनी रंगा वगळावे

वेडी राधा,वेडा माधव वेडी ती मुरली.

 

राधिका राधिका न उरली.

 

स्व. योगिनी विश्वनाथ जोगळेकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपोत्सव करीत जा.. ☆ श्री आनंदहरी

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपोत्सव करीत जा.. ☆ श्री आनंदहरी ☆

 

शोध तू तुझीच आता, प्रकाशाची वाट रे

चाल तूच पुढे पुढेच, ध्येय तुझेच गाठ रे

 

उजळीत जा भवताला स्वयंदीप चेतवुनी

तिमिर जरी दाटला, पथावरी घनदाट रे

 

मातीचे मान ऋण, घे भरारी नभांगणी

अहंकार स्पर्शू नये, भेटले जरी भाट रे,

 

संकटांचा सागर ये, वाट तुझी रोखण्यास

नको थकू, नको खचू, तू गाठ पैलकाठ रे

 

दीप दीप चेतवीत, दीपोत्सव करीत जा

येती पथिक मागुती, देई तू मळवाट रे  

 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 54 ☆ आनंदाचा दीपोत्सव ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 54 ? 

☆ आनंदाचा दीपोत्सव ☆

आनंदाचा दिपोत्सव, तनमन हर्षोल्लीत होते

मनातील मरगळ, अनायसे दूर पळते…१

 

संपूर्ण आयुष्य, संघर्ष तो असतो

कधीतरी एखादा, विरंगुळा मिळतो…२

 

तो विरंगुळा, आनंदात जावा

त्यातूनच मग, प्रेमरस पाझरावा…३

 

दिव्यास दिवा लावता, दीपमाळ तयार होते

त्या दीप-साखळीतून, एकात्मतेचे दर्शन घडते…४

 

असा हा दिवा पहा, दुसऱ्या दिव्यास पेटवतो

त्या दिव्यास पेटवतांना, अंधाराला पळवतो…५

 

उजेडाचा हा दीपोत्सव, साजरा प्रेमात करावा

साजरा करतांना सवे, मनातील एकोपा साधावा…६

 

परमेश्वराचे करुनि पूजन, लावावी निरांजन

पाजळून दीप-ज्योति, करावे ईश स्मरण…७

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी कालची व आजची ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? विविधा ?

 ☆ दिवाळी कालची व आजची ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

प्रकाश कुलकर्णी सरांनी यंदाच्या ‘नवरत्न’दिवाळी अंकाचा ‘दिवाळी कालची व आजची’हा विषय कळल्यानंतर मला माझं बालपण आठवल.

आम्ही लहान होतो तेव्हाची दिवाळी मला अजूनही आठवते. सहामाही परीक्षा संपली की आम्हाला दिवाळीची सुट्टी लागायची. त्याअगोदरच आम्ही आईबाबांच्या मागे लागायचो.चुलत भावडांना,मामाला भेटण्याची ओढ लागलेली असायची. माझ्या बाबांना तीनही भाऊच.अत्त्या नाही. चौघे चार ठिकाणी असल्याने चारही भाऊ मुलांच्या शाळेच्या सुट्टीत एकत्र जमून कुठेही एकिकडे आम्ही दिवाळी साजरी करायचो.आम्ही सर्व सख्खी चुलत भावंडे एकत्र जमायचो.मोठी धमाल असायची. आम्ही खूप गमतीजमती करायचो.रोज दुपारी पत्ते  खेळायचो. कुठलेच। काकाकाकू आम्हा भावंडामधे भेदभाव करत नव्हते. सर्वांना समान न्याय होता.

दिवाळी म्हटली की अजूनही आठवतं ते गारगार कडक थंडीत दात कडकड वाजत असतानाचं कुडकुडत पहाटे उठणं.घड्याळात रात्री झोपताना पहाटे साडेतीन/चारचा गजर लावलेला असायचा. तो झाला हळूच उठायचं आणि बाबांच्या किंवा मोठ्या बहीणभावाच्या सोबतीने अंधारात अंगणात लावलेल्या व पणत्यांच्या उजेडात घाबरत घाबरत जाऊन पहीला फटका लावायचा. तेव्हा आतासारखे गँसचे किंवा लाईट वरचे गिझर नव्हते. कोकणात तर सगळीकडेच नारळीपोफळीची झाडे खूप असतात. त्यामुळे त्यांच्या वाळलेल्या झावळी पडल्यावर त्या गोळा करून त्याच्याच तटक्या विणून त्यांनी शाकारलेल्या खोपीत उन्हाळ्यात लाकडे व झावळी तोडून लहान लहान तुकडे गोळा करून ठेवलेले असायचे. घराच्या मागच्या अंगणात एका कोपऱ्यात चुल बाराही महीने कायमच असायची. त्याजवळच पाण्याचा हौद व त्यालगतच मोठी न्हाणी असायची. चुलीवरच्या हंड्यात पाणी तापत असायच. प्रत्येक वेळी हंड्यात भर घालायची. चुलीत नीट विस्तव करायचा. तेल उटणं लावयचं आणि कुडकुडत पटापटा अंघोळी करायच्या एकमेकांच्या अंघोळीच्या वेळी प्रत्येकाने फटाके उडवायचे.आम्ही बहीणी पुढच्या अंगणात केलेल्या किल्ल्यावर मावळे मांडायचो. त्यापुढे शेणाने सारवलेल्या अंगणात ठिपक्यांच्या कागदाच्या मदतीने ठिपके काढून रांगोळी काढायचो.त्यात रंग भरायचे. तोपर्यंत उजाडायला लागायचे. मग फराळ करायचा. त्याबरोबरच दहीपोहेही असायचे.

हळूहळू काळ बदलला. मानवाच्या प्रगतीबरोबर जंगले,थंडी कमी झाली. आता पुर्वीसारखी थंडी पडत नाही. पहाटे उठणंही कमी झालं.ठिपक्यांची रांगोळी जाऊन संस्कारभारतीच्या रांगोळ्या आल्या. नोकरीच्या बदलेल्या स्वरुपामुळे रजा मिळणे कठीण झाले. त्यामुळे एकत्र येऊन सण साजरे केले जात नाहीत. पुर्वी एकमेकांना दिवाळीची भेटकार्ड पाठवली जायची. ती.बंद झाली. बायका दिवाळीचा फराळ करायला एकमेकांच्या घरी जमायच्या.एकमेकांना फराळाचे डबे ,ताटं द्यायच्या.फराळ ,भाऊबीजेची एकत्र जेवणं सगळंच कमी झालं माणसातलं प्रेम कमी झालं. बाजारात साचेबद्ध किल्ले मिळतात. अपार्टमेंट झाल्याने प्रत्येकाचा वेगळा आकाशकंदील आणि लाईटच्या माळा त्यामुळे इमारती झगमगतात.सर्व अपार्टमेंटची अंगणं गाड्यांच्या पार्किंगने भरून गेलेली असतात रांगोळीला जागाच नसते. फ्ल्याटच्या दाराशी काळ्या फर्शीवर  छोटीशी रांगोळी काढली जाते. त्यातही तयार रांगोळ्याहि अनेक प्रकारच्या बाजारात मिळतात.

एकुण काय पुर्वीच्या दिवाळीची मजा कमी झाली हेच खरं. आणि या दोन-तीन वर्षात पावसाळी पुर त्याबरोबरच आताचा हा कोरोना या नैसर्गिक संकटांमळे सगळं बदलून गेलं.या कोरोनामुळे तर सगळीकडेच वाहतूक व दुकाने बंद आहेत.घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.

      आठवणी जागतात

       मन मोहून जातात

       बदलत्या जगासवे

       लागते बदलावे

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ डायरीतली कोरी पाने – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

पूर्वसूत्र- “मीच त्याला म्हंटलं होतं, लग्नानंतरचा सत्यनारायण एकदा होऊ दे मगच जा प्रवासाला “

” बोललाय तो मला”

” मी आपलं मला योग्य वाटलं ते सांगितलं. तरीही तुला वाईट वाटलं असेल तर…”

“नाही आई.ठीक आहे.”

” तोवर मग माहेरी जाऊन येतेस का चार दिवस?”

” नाही. नको. माहेरीही नंतरच जाईन सावकाशीने”

  हे ऐकून आईंना बरं वाटलं,..पण प्रभावहिनी…?)

               —————–

प्रभावहिनींनी मात्र चमकून नंदनाकडे पाहिलं.  ‘ही अशी कशी..?..’ अशा कांहीशा नजरेने..तिची किंव केल्यासारखं. त्यांचं हे असं बघणं नन्दनाच्या नजरेतून सुटलं नाही. प्रभावहिनी एखाद्या कोड्यासारख्या तिच्यासमोर उभ्या होत्या. हाताने पोळ्या लाटत  होत्या पण नजर मात्र नन्दनाकडे. नंदना मोकळेपणाने हसली.

 ” वहिनी तुम्ही लाटून द्या, मी भाजते.”

 ” नको..नको.. करते मी”

 “अहो, पटकन् होतील. खरंच” नन्दनाचा सहजपणा प्रभावहिनींना सहजासहजी झिडकारता येईना. खरं तर त्यांना तिला दुखवावसं वाटत नव्हतं. दोन्ही सूनांची ही जवळीक आईंच्या नजरेतून मात्र सुटली नव्हतीच. त्यांना आणखी वेगळीच काळजी. नन्दना आपली शांत, सरळ स्वभावाची आहे. पण या प्रभाने तिचे कान फुंकले आणि ती बिथरली तर..?

 “तिच्यापासून चार पावलं लांबच रहा गं बाई.” एक दिवस न रहावून आईंनी नन्दनाला सांगितलंच.

“एक नंबरची आक्रस्ताळी आहे ती.’सुसरबाई तुझी पाठ मऊ’ म्हणत मी आपली गप्प बसते.पण शेजार्‍यांना तमाशा नको म्हणून जीव टांगणीला लागलेला असतो बघ माझा. दोन गोड नातवंडांकडं पाहून जीव तुटतो माझा. यांचं आणि राहुलचं त्यांना वेगळं काढायचं चाललंय. मीच आपली यांना म्हणते, जरा सबुरीने घ्या.घाई कशाला? जे काही व्हायचंय ते आपले डोळे मिटल्यावर होऊं दे. नंतरचं कुणी बघितलंय? दृष्टीआड सृष्टी.”

सगळं ऐकून नन्दनाच्या तोंडाची चवच निघून गेल्यासारखं झालं. तिला आपलं उगीचंच वाटत होतं ….’ आता या राहुलला कसं समजवायचं? त्यांना वेगळं करायचं तर ते नंतर बघू.आत्ता लगेच तर मुळीच नको. मी लग्न होऊन या घरात आले न् घर मोडून बसले असंच व्हायचं. नकोच ते.राहुलला एक वेळ समजावता येईल पण या  प्रभावहिनी? सगळं चांगलं असून अशा कां वागतायत या?..’ ती स्वतःलाच विचारत राहिली. पण या प्रश्नाचे नेमके उत्तर फक्त प्रभावहिनींच्या जवळच होते. ते उत्तर शोधत एक दिवस नन्दना प्रभावहिनींच्या मनाच्या तळापर्यंत जाऊन पोचली. पण तो प्रवास आणि मिळालेले उत्तर दोन्ही सुखकर नव्हतेच…!

“मीही आधी तुझ्यासारखीच होते.शांत.समंजस.कधी ‘असं कां?’ म्हणून न विचारणारी. दोन मुलं होईपर्यंत गाफिलच राहिले मी. ‘तुम्ही म्हणाल तसं’ म्हणत दिवस ढकलले. पण माझा पदरच फाटका. पदरात पडणार तरी काय, किती आणि कसं..?” प्रभावहिनी अगदी मनाच्या आतलं मोकळेपणाने बोलत राहिल्या. स्वतःशीच बोलावं तसं.

“सासूबाईंचा बाकी कांही म्हणून त्रास नव्हता. पण त्यांचा कुणावरच वचक कसा तो नव्हताच. त्यामुळे घरचे हे तिन्ही पुरुष शेफारलेले होते. सतत आपली त्यांची नांगी डंख मारायला टपलेलीच. सासुबाईंचं त्यांच्यापुढे काही चालायचं नाही.म्हणून  मग सासूबाईंच्या तावडीत मी आपसूक सापडले. रागावणं,टाकून बोलणं हे फारसं काही नव्हतं, पण देव देव फार करायच्या. घरात सारखं पूजाअर्चा,सवाष्ण-ब्राह्मण, सोवळं ओवळं सारखं सुरुच असायचं. माझी पाळी असली की गोळ्या घेऊन पुढे ढकलायला लावायच्या. खूप त्रास व्हायचा त्या गोळ्यांचा. नको वाटायचं. पण सांगणार कुणाला? यांना काही बोलायची सोय नव्हती. लगेच आकांत-तांडव सुरू करायचे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत दिवस ढकलले. राबराब राबत राहिले. परवा सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळीही ‘गोळी घे’ म्हणाल्या. ‘मला त्रास होतो’ म्हटलं तरी ऐकेचनात. मग त्यांना ठणकावण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता. तुला वाटलं असेल ना,ही बाई अशी कशी असं?”

“हो.वाटलं होतं. तुमचं आईना तोडून बोलणं मला आवडलं नव्हतंच.”

“पूर्वी बोलणं सोड वर मान करून बघायचीही नाही.आता नाही सहन होत. ताडताड बोलून मोकळी होते.त्याशिवाय बरंच वाटत नाही. राहुलभाऊजीनी आईंचं रूप घेतलंय आणि हे मामंजींवर गेलेत. सतत त्रागा.. आदळआपट..भसाभसा सिगरेटी ओढणं असं सगळं त्यांचं नको तेवढं उचललंय.

मध्यंतरी धंद्यात जबरदस्त खोट आली होती. आत्ता आत्ता कुठं डोकं वर काढतायत. तेव्हा शांतपणे एकत्र बसून चर्चा करून काही मार्ग काढतील असं वाटलं होतं. पण तिघेही ढेपाळून गेले. दोघींच्या अंगावरचे दागिने त्यांनी आधी उतरवून घेतले. आम्ही बिनबोभाट काढून दिले. पण तेवढ्याने भागणार नव्हतं.मग आदळाआपट..चिडचिड सुरु. माझं माहेर पोटापुरतं मिळवून खाणारं पण स्वाभिमानाने जगणारं.पैशांची सोंगं ती माणसं कुठून घेणार? तरीही माझ्या माहेरच्या गरिबीचा मामंजीनी उद्धार केला आणि मी बिथरले. यांनी त्यांचीच री ओढली. सासुबाई घुम्यासारख्या गप्प. आणि राहूलभाऊजी त्या गावचेच नसल्यासारखे. त्या दिवशी सणकच गेली डोक्यात माझ्या.राग दाबून ठेवून घुसमट सुरु झाली न् मी फणाच काढला. मनात साचलेलं भडभडून बोलून टाकलं. ऐकून सगळेच चपापले… त्यांच तिरीमिरीत हे पुढे झेपावत माझ्या अंगावर धावून आले.. मुलं कावरीबावरी झाली होती… मुलांकडे पाहून मी गप्प बसेन असं त्यांना वाटलं होतं.. पण मी गप्प बसूच शकले नाही…यांनी संतापाने माझ्यावर हात उगारला  तेव्हा मात्र माझा तोल गेला..तो हात तसाच वरच्यावर घट्ट धरुन ठेवत यांना निक्षून बजावलं,’आज अंगावर हात उगारलात तो पहिला न् शेवटचा. पुन्हा हे धाडस करू नका. पस्तवाल. डोक्यात राख घालून घर सोडणार नाही मी.  जीवही देणार नाही. पण लक्षात ठेवा,..पुन्हा हात उगारलात तर मात्र तो मूळापासून उखडून टाकीन….!’

सगळं ऐकून नन्दनाच्या  अंगावर सरसरून काटाच आला.

त्या दिवसापासून नन्दना पूर्णपणे मिटूनच गेली. हे घर,ही माणसं, सगळं तिला परकंच वाटू लागलं. तिच्या माहेरी तरी उतू जाणारी श्रीमंती कुठं होती? पण.. आई-आण्णांच्या मनाची श्रीमंती या रखरखाटाच्या पार्श्वभूमीवर तिला अगदी असोशीने हवीशी वाटू लागली…माहेरच्या ओढीने तिचा जीव तळमळू लागला. पण तिने स्वतःचीच समजूत घातली.

आई-आण्णा किती दिवस पुरणार आहेत? आणि या वयात  त्यांच्या जीवाला माझा घोर कशाला..? घोर लावायचाच तर तो राहुलच्या जीवाला का नको? सगळंच दान उलटं पडूनसुद्धा प्रभावहिनी पदर खोचून एवढ्या ताठ उभ्या राहू शकल्या,त्यांना निदान आपली साथ तरी द्यायला हवीच. फक्त आपलीच नव्हे राहुलचीसुद्धा..! पण..तो ऐकेल?

नन्दनाचं असं मिटून जाणं राहुलच्या नजरेतून सुटलं नव्हतंच.

“प्रभावहिनीनी तुला काहीतरी सांगितलेलं दिसतंय”

“त्यांनी मला सांगू नये असं आहे कां काही?”

“त्यांनी काय सांगितलय तुला?”

“त्या या घरात समाधानी नाहीत हे सांगितलंय आणि त्या कां समाधानी नाहीत हेसुद्धा.”

” समाधानी नसायला काय झालंय? सुख दुखतंय त्यांचं. दुसरं काय?”

“असा एकदम टोकाचा निष्कर्ष काढायची घाई करू नकोस राहुल.”

“तुला नेमकं काय म्हणायचंय?” त्याचा आवाज नकळत चढलाच.

“राहुल प्लीज.आपण चर्चा करतोय का भांडतोय? प्लीज,आवाज चढवू नकोस”

“पण तू त्यांची तरफदारी का करतेयस? राग येणारच ना?”

“त्यांची नको तर मग कुणाची तरफदारी करू? मामंजीची, भाऊजींची, आईंची की तुझी..?”

“त्यांनी नेमकं काय सांगितलंय तुला तेवढं बोल”

“त्यांनी काय सांगितलंय हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाहीच आहे राहुल.त्या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.तू नीट आठवून अगदी प्रामाणिकपणानं सांग. त्या लग्न होऊन या घरी आल्या तेव्हापासून तू त्याला पहातोयस. पहिल्यापासून त्या अशाच त्रासिक,आक्रस्ताळी, आदळआपट करणाऱ्या होत्या का रे?”

राहुल निरुत्तर झाला. थोडा विचारात पडला.

“राहुल, तुला सांगू?आपलं लग्न ठरत होतं तेव्हा माझ्या आईचा या लग्नाला पूर्ण विरोध होता. इथे एकत्र-कुटुंबात रहावं लागेल आणि ते मला जमणार नाही असं तिला वाटत होतं. पण मी ठाम राहिले.’मला नक्की जमेल’ असं निक्षून सांगितलं. राहुल,पण तेव्हाचा माझा तो आत्मविश्वास आज थोडासा डळमळीत झालाय..”

“नंदना…?”

“होय राहुल. तू ऐकण्याच्या मनस्थितीत आहेस तोवर मला बोलू दे सगळं. तुला सांगू? खूप लहानपणापासून मी अगदी नियमितपणे डायरी लिहायचे. अगदी रोज. लग्नानंतरही त्यात खंड पडणार नाही हे मी गृहितच धरलं होतं. पण….”

“पण काय..?”

“पण लग्नानंतर फक्त पहिल्या दिवशी एकच दिवस मी डायरी लिहू शकलेय. पुढची पानं कोरीच राहिलीत. रोज मनात यायचं, लिहावं.मन मोकळं करावं असं.खूप लिहायचं होतं.पण नाही लिहिलं.. का कुणास ठाऊक..पण भिती वाटायची.. तू कधी चुकून ती डायरी वाचलीस..वाचून बिथरलास…मला समजून घेऊ शकला नाहीस.. तर?.. या..या एका भितीपोटीच मनातलं सगळं मनातच दाबून टाकलंय मी. डायरीची पानं कोरीच राहिली…!पण मनातलं सगळं मनातच दाबून ठेवून आपल्या माणसाशीही वरवर चांगलं वागणं ही सुध्दा प्रतारणाच नव्हे का रे?निदान मला तरी ती तशी वाटते. त्यामुळेच डायरीतल्या त्या कोर्‍या पानांवर लिहायचं राहून गेलंलं सगळं मला मोकळेपणानं बोलायचंय.

राहुल,तुमचं हे ‘एकत्र कुटुंब’ खऱ्या अर्थाने एकत्र आहे असं मला कधीच वाटलं नाहीये. ते तसं असायला हवं ना सांग बघू.

लग्न ठरलं, तेव्हा आण्णांनी मला खूप छान समजावून सांगितलं होतं. ते म्हणाले होते,

‘नंदना, एका लग्नामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी दुसऱ्या व्यक्तिशी बांधल्या जातात. त्यांना आपण ‘बांधिलकी’ मानतो की ‘बंधन’ समजतो यावर आपलं सहजीवन फुलणार कि विझणार हे अवलंबून असतं.’बांधिलकी’ मानली की आनंदाची फळं देणारं फुलणं अधिक सुगंधी असेल. ‘बंधन’ समजलं तर कालांतराने कां होईना ते जाचायलाच लागेल. आणि तसंही ‘बांधिलकी’ तरी फार अवघड कुठे असते?फक्त एक व्यक्ति म्हणून दुसऱ्याचं स्वतंत्र आस्तित्व मनापासून स्वीकारणं हेच फक्त लक्षात ठेवायचं की सगळं सोपं होऊन जातं.आणि ते सहजपणे स्वीकारलं की जीवनातली वाटचाल अधिकाधिक माणूसपणाकडे होऊ लागते…’ खूप छान वाटलं होतं ऐकताना! छान आणि सोपंसुध्दा. पण बांधिलकी मानणाऱ्यांनासुद्धा ती बांधिलकी एकतर्फीच असेल तर त्याची बंधनंही कशी जाचायला लागतात ते प्रभावहिनींकडे पाहून मला  समजलं. राहुल, तुला सांगू? पूर्वी बालविवाह व्हायचे तशा लग्नात लहान नसतो रे आम्ही मुली आता. पूर्वीचं वेगळं होतं. कच्ची माती सासरच्यांच्या हाती यायची. ते तिला दामटून हवा तसा आकार द्यायचे..ते आकार मग त्यांना जगवतील तसे जगायचे. ‘बाईच्या वागण्यावर सासरचा आनंद अवलंबून असतो’ असं म्हणणं किती सोपं आहे..! प्रभावहिनी त्रागा करतात म्हणून मग त्यांच्यावर वाईटपणाचा शिक्का मारून मोडीत काढणंही तितकंच सोपं आहे. त्यांना या घरात आल्यावर आनंद कसा मिळेल हे कुणी आवर्जून पाहिलंच नाही ही तू नाकारलीस तरी वस्तुस्थिती आहेच. उशिरा कां होईना ती स्विकारावीस एवढंच मला मनापासून सांगायचंय. पूर्ण वाढ झालेलं एक झाड माहेरच्या मातीतून मुळासकट उपटून सासरच्या मातीत लावण्यासारखं असतं रे आजकाल आमचं सासरी येणं. त्याची मूळं या नव्या मातीत रुजायला जाणीवपूर्वक मदत करणं, स्वच्छ हवा आणि मोकळा प्रकाश,पाणी त्या मूळांना द्यायची जबाबदारी स्वीकारणं हे काम सासरच्या माणसांनी करायला नको का रे? त्या चौघांना घरातून वेगळं काढणं म्हणजे नेमकं निदान न करता दुखरा अवयव कापून काढण्यासारखं होईल राहुल. या निर्णयाला तुझा आणि माझा विरोध असायला हवा,त्यात सहभाग नको.. तरच या घरी प्रभावहिनींवर झालेल्या अन्यायाचं थोडं तरी परिमार्जन होईल असं मला वाटतं…”

नन्दना कधी बोलायची थांबली  ते राहुलला समजलंच नाही.तिनं असंच बोलत रहावं म्हणून तो अधिरतेने तिच्याकडे पहात राहिला..!

नन्दना दिसायला चांगली होती. कुणालाही आवडावी अशीच‌.नंदनाचं रुप त्यालाही मनापासून आवडलं होतंच की.पण आजची नंदना त्याला नेहमीच्या नंदनापेक्षाही अधिक सुंदर वाटू लागली..! सुंदर आणि हवीहवीशी! …आणि..नंदना? ..डायरीतील कोरी पाने मनासारखी लिहून झाल्याच्या समाधानाने मनावरचं ओझं कुणीतरी अलगद उतरवून घ्यावं तशी ती सुखावली होती…!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष.. भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष..  – भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

(बुजणारी तीच मी आता धीट झाले होते.) इथून पुढे —-

वेगवेगळ्या खेळांसाठी नावे घेणे निवड करून टीम तयार करणे सामान्यांच्या वेळी हजर राहून खेळाडूंच्या गरजा  अशी अनेक कामे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊनही आवडीने व चोखपणे केली. गोरे सरही जिमखान्यातील गरजा अडचणी याबद्दल सतत चौकशी करायचे. प्रत्येक  टीम खेळायला जाण्यापूर्वी मीटिंग घेऊन स दिच्छा देत व सल्लेही देत त्याचप्रमाणे  विद्यार्थिनी सल्लागार पिटके बाई मार्गदर्शन करीत असत आमच्या खो-खो कबड्डी अथलटिक्सच्या टीम बरोबर परगावी जाताना कधी पिटके बाई कधी  पोंक्षे बाई कधी उत्तरा जोशी बाई कोणी ना कोणी अगदी मोकळ्या मैत्रिणी सारख्या असायचा खेळाडूंचे खाणेपिणे लागले खुपले अगदी जातीने पहायच्या. शिपाई मारुती तात्या सदा यांनीही उत्तम सहकार्य केलं मी एल आर झाल्यानंतर मुलींची कबड्डी आणि ग्राउंड टेनिसची टीम प्रथमच सुरू झाली या संबंध वर्षात मी स्वतःही अनेक खेळात घेऊन कॉलेज पातळीवर बरीच बक्षिसे मिळविली आत्मप्रौढीचा दोष पत्करून सुद्धा सांगायला अभिमान वाटतो की उंच उडी मध्ये सांगली झोनला पहिला नंबर आला आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या  पोर्च मधील बोर्डवर जेव्हा आपलंच नाव रंगीत अक्षरात पाहिलं आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला तेव्हा झालेला आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता जिमखाना डे म्हणजे आमचा मिरवण्याचा उत्साहाचा पर्वणी चा दिवस. बक्षीस समारंभाला कोणाला बोलवायचे याबाबत  प्रो. गोरे सर सर्वांची मते घ्यायचे व मिळून प्लॅनिंग करायचे.

कॉलेजचे गॅदरिंगही  धुमधडाक्यात  असायचे. त्यातील एक भाग सरप्राईज गिफ्ट असा असायचा एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे सवयी कडे पाहून किरकोळ बक्षीस देत असत मी देहयष्टीने  खूप बारीक होते तरीही स्टॅमिना चांगला होता बऱ्याच खेळात खेळत होते मला नाव पुकारून स्टेजवर बोलावले गेले आणि डोंगरे बालामृत ची बाटली दिली हसत-हसत स्वीकारली सर्वजण खूप खूप हसले संपूर्ण वर्ष असच धामधुमीत गेलं अभ्यासाकडे लक्ष नव्हतं शेवटचे दोन महिने जोरदार अभ्यास केला लॉजिक आणि सायकॉलॉजी विषय खूप आवडायचे इंग्रजीच्या नातू सरांनी शिकविलेली ॲनिमल फार्म कादंबरी अजूनही विसरलेली नाही मी प्राणीप्रेमी असल्याने त्यातील सर्व प्राणी अजूनही डोळ्यासमोर येतात याच वर्षात हौशी मुलींनी बसविलेली बायकात पुरुष लांबोडा या एकांकिकेत गणू या शिपायाची विनोदी भूमिका करण्याची संधी मिळाली खूप खूप मजा आली त्या वेळी. एस वायच वर्ष अविस्मरणीय कसं गेलं

टी वाय च्या वर्षाची सुरुवात झाली. आणि आता हे कॉलेज सोडून जाणार या विचारांनी एक प्रकारची रुखरुख लागून गेली आता आपल्याला मैदानी खेळ पुढील आयुष्यात कधीच खेळायला मिळणार नाहीत  म्हणून भरपूर खेळून घेतल आणि बक्षीसही मिळविली माझा स्पेशल विषय अर्थशास्त्र असल्याने तीनही वर्ष आंबर्डेकर सरांच्या शिकवण्याचा लाभ घेता आला विनोद करत टोमणे मारत हास्याचे फवारे उडवत अशी त्यांची शिकवण्याची हातोटी अजूनही स्मरणात आहे सरांच्या तासाला पुन्हा बसण्याची संधी मिळावी असं अजूनही वाटतं सरांचा तास कधी संपला कळायचे ही नाही त्यांचा तास मात्र कधीच चुकवला नाही इंग्रजीचे बर्ट्रांड रसेलचे निबंध खूप कठीण होते समजायला. माझी मैत्रीण जुल्फिकार नाईकवडीने मला खूपच छान समजाविले आणि म्हणून मी पेपर लिहू शकले.

कॉलेजच्या आठवणी किती सांगू तितक्या कमीच एकदा आम्ही मैत्रिणी लेडीजरुमच्या पूर्वीचे मागील पायऱ्यांवर खात बसलो होतो गप्पा चालू होत्या आपण कॉलेजच्या जुबिलीला जमू तेव्हा कशा दिसत असू ग केस पिकले असतील मुलं असतील संसार असतील नवरे बरोबर असतील एक एक मत ऐकता-ऐकता हसून हसून पुरेवाट झाली एकदा रेल्वेचा संप होता बस लवकर मिळेना एकदमच ठरलं चालत जायचं का आणि खरंच सात आठ जणी चालत चालत आलो दुसरे दिवशी पाय उचलवेनात अशी स्थिती झाली पण त्यातही एक  थ्रिल होत मजा आली पुढे गॅदरिंग ला आम्हाला वाऱ्यावरची वरात असा फिश्पोंड मिळाला मिरज सांगली पॅसेंजर गाडी म्हणजे उत्साहाचा खजिना तीन महिन्याचा पासला चार रुपये आणि बसला एक महिन्याला अकरा रुपये दहा रुपयांमध्ये वर्षाचा कॉलेजचा प्रवास खर्च व्हायचा त्यामुळे रेल्वेला खूपच गर्दी असायची थर्ड क्लास लेडीज डबा म्हणजे गाणी बजावणी विनोद चेष्टा मस्करी वर्गात शिकविलेल्या विषयांवर चर्चा वाद-विवाद ठेवलेली टोपण नावे मजा मजा असायची पावसाळ्यात कित्येकदा वह्या पुस्तके साडीच्या निऱ्या पद सांभाळत धूम ठोकून गाडी पकडावी लागायची कधीकधी इंजिन ड्रायव्हर शिट्टी वाजवून मुद्दाम गाडी सुरू करत आणि थोडी पुढे नेऊन पुन्हा थांबवत असत. तेही विद्यार्थ्यांबरोबर एंजॉय करत असायचे.

विलिंग्डन मधील चार वर्षांचा काळ (१९६५–६६. ते १९६८–६९) हा झुळुझुळु वाहणाऱ्या निर्मळ कारंज्याचे तुषार झेलत कसा गेला कळलंही नाही कन्या शाळेतून बाहेर पडलेल्या लाजऱ्या बुजऱ्या मला कॉलेजनी बनवलं भरभरून शिकायला मिळालं अनेक अनुभव मिळाले यशाच्या आनंदा प्रमाणे कशालाही कसं तोंड द्यायचं हेही शिकविलं. अजूनही कधीतरी तीव्रतेने वाटत की कॉलेजमध्ये जाव त्या त्या वर्गात जाऊन बसावं ठराविक विषय त्या-त्या सरांनी शिकवावेत गप्पा माराव्यात खेळाव  स्टडीडीमध्ये बसून अभ्यास करावा रेल्वेची   न्यारी गंमत अनुभवावी निदान पुढील जन्मी तरी ते सत्यात उतरावं या चार वर्षांच्या छोट्याशा प्रवासात कोण कुठून आलं कसं आलं माहित नाही पण या प्रवासाच्या सूत्रातून आम्हा मैत्रिणींना  सख्यांना  शिक्षकांना एकत्र आणून सच्चिदानंद देण्याचच सृष्टीकर्त्याच  प्रयोजन असावं. या मुशाफिरीतील काही सहप्रवासी. काळाच्या पडद्याआड गेले काही अधूनमधून भेटतात कॉलेजच्या आठवणी गप्पा होतात अत्यानंद होतो काहीवेळ कॉलेजच्या वातावरणात गेल्याचा भास होतो. आणि मन प्रसन्न होत. आजही आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो,” आमचं शिक्षण  विलिंग्डन मध्ये झालंय”

समाप्त 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

( पूर्वाश्रमीची पुष्पा व्यंकटेश रिसबूड )

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी मस्त आहे—- ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆ इंद्रधनुष्य ☆ मी मस्त आहे—-  ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

(For all senior citizens)

वय झाले अजून मस्ती गेली नाही 

विचार धावतात पण शरीर साथ देत नाही

कळते आहे पण वळत नाही 

कोणावर विश्वास ठेवायचा तेच समजत नाही 

तरी पण मी मस्त आहे—–

 

काय होतय सांगता येत नाही 

दुखतात गुढगे सांगायचे नाही

कुणाकडे जाताही येत नाही 

सावकाश चालायचे हेच आता उरले 

तरी पण मी मस्त आहे—–

 

थकले शरीर जरी 

नजर अजून शाबूत आहे

थकल्या जीवाला 

थोडी उभारी देत आहे

तरी पण मी मस्त आहे—–

 

 आताशा  मोजकेच दात तासून  त्यावर टोप्या ( cap) घातल्यात

तेव्हा कुठे दुःख थांबले 

कुस्करून खाल्ले 

तेव्हां पचायला लागले 

तरी पण मी मस्त आहे—–

 

वाचायला घेतले धुरकट दिसते 

चष्मा लावला तर पाणी सुटते 

डोळे पुसत वाचण्यापेक्षा 

न वाचलेले परवडते 

तरी पण मी मस्त आहे——-

 

लिहायला घेतले तर हात कापतात

शब्दांवरच्या रेषा सरळ कुठे येतात 

साधी स्वाक्षरी पण धड येत नाही 

चेक परत का येतात तेच समजत नाही 

तरी पण मी मस्त आहे——

 

उलटा बनियन तर नेहमीच असतो 

तरी बरे तो आत झाकला जातो .

घरातले हसतातच

तरी पण मी मस्त आहे——

 

कानात हुंकार वाजत असतात 

शब्द अस्पष्ट ऐकू येतात 

अनुभवाने समजून  घेतो 

आणि मगच उत्तर देतो 

 तरी पण मी मस्त आहे——

 

वाचायला घेतले तरी लक्ष लागत नाही 

वाचलेले सुद्धा काही लक्षात रहात नाही 

मित्रांशिवाय कुणाला काही सांगत नाही 

समदुःखाची कथा बाकीच्यांना पटणार नाही 

तरी पण मी मस्त आहे—–

 

बरेच आयुष्य जगून घेतले 

अजून थोडे बाकी आहे 

उरलेले मात्र सुखात जावे 

येवढीच इच्छा बाकी आहे 

तरी पण मी मस्त आहे—–

 

संसाराचे सारे पाश 

आता पूर्ण सोडायचे आहेत

उरलेली पुंजी संपे पर्यंत

आनंदी जगायचे आहे

तरी पण मी मस्त आहे—–

 

आपल्याच धुंदीत जगलो आहे 

पाहिजे ते मिळवले आहे

उपभोगून आयुष्य सारे

गात्रे शिथिल होत आहेत

तरी पण मी मस्त आहे—–

 

आयुष्यात ज्यांनी साथ दिली 

काहींनी मधेच साथ सोडली 

कोणाचेच काही अडलं नाही

तरी सर्वांचा मी आभारी आहे

आणि मी मस्त आहे——

 

भार कोणावर टाकायचा नाही 

झटपट मात्र बोलावणे यावे 

इतरांना हवेहवे वाटतांना 

आपण निसर्गात विलीन व्हावे 

तरी पण मी मस्त आहे—–

—आणि  हे देवा  ,

तिथे पण मी मस्त रहावे——

 

संग्राहक : अस्मिता इनामदार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 19 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 19 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[९३]

हळूच फुलं फुलवते रात्र

आणि

खुशाल घेऊ देते

श्रेयांचे नजराणे

दिवसाला.

 

[९४]

ओसरून…. सरून गेलेलं यौवन

त्याचीच स्वप्नं

सळसळत रहावीत

तशी ही पावसाची सरसर

गडद अंधारातून

 

[९५]  

माझ्या मनातली

गहन नीरवता

झांजर… झांजर… झाली

आणि

ध्वनींचा संधीप्रकाश

हलकेच हेलावत जावा

तसे गुणगुणत राहिले

रातकिडे   

 

[९६]

जुईच्या थरथर पाकळीशी

पावसाचा थेंब

हलकेच रिमझिमला,

‘रहायचं आहे ग मला

तुझ्याच जवळ

अगदी सदैव…’

सुस्कारली जुई

आणि

गळून पडली भूईवर

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares