कलिंगदेशात कोणी एक राजा होऊन गेला. त्याला एक धोबी वस्त्रे उत्तम प्रकारे धुवून देत असे. एक दिवस त्याने धुतलेली, ती निर्मळ सुंदर वस्त्रे पाहून राजा खूष झाला. तो राजा मनस्वी होता. त्याने धोब्याला बोलावून म्हटले, “तुझ्या या वस्त्र स्वच्छतेमुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर माग. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.” राजाने वचन दिल्यावर धोब्याचा आनंद गगनात मावेना. तो उत्तरला, “ महाराज, मला आपला मंत्री होण्याची इच्छा आहे. तेव्हा आपण माझी मंत्रीपदी नियुक्ती करावी.”
राजाला ही मागणी अनपेक्षित होती. पण वचनपूर्ती करणे भाग होते. तेव्हा राजाने दीर्घकाळापासून मंत्रीपदी आरूढ असलेल्या मंत्र्याच्या जागी धोब्याला नियुक्त केले. काही काळानंतर या राजाचा नवा मंत्री मूर्ख व असमर्थ आहे हे जाणून राजाच्या शत्रूंनी सेनेसह राज्यावर आक्रमण केले. हे वृत्त कळताच राजाने मंत्र्याला बोलावून युद्धासाठी सेना सज्ज करण्याची आज्ञा दिली. त्यावर मंत्री बोलला, “भविष्यकाळाचा विचार करून मी पूर्वीच सगळी व्यवस्था केली आहे. म्हणून शत्रूपासून आपण भयभीत होऊ नये.” राजाने त्याच्या वचनावर विश्वास ठेवला.
मंत्र्यावरचा विश्वास राजाला भोवला. शत्रूच्या सेनेने नगराला पूर्ण वेढा घातला. परत राजाने मंत्र्याला पाचारण करून विचारले, “शत्रूच्या ह्या कृतीला उत्तर देण्यासाठी काय योजना आखली आहे ?” मंत्री राजाला म्हणाला, “महाराज, शत्रूंनी नगर बंदिस्त केले तरी आम्हाला काहीही भय नाही. या राज्याचे रक्षण व पालन करणे हे अत्यंत कष्टदायक कार्य आहे. या कष्टदायक कार्याचे कसे निवारण करता येईल याची मी चिंता करत असतानाच दैवयोगाने शत्रूने हे नगर बंदिस्त केले. राज्य रक्षणाचा आपल्यालाही खूप त्रास होतोय. मी ह्या नगरात चिरकाळपासून वस्त्रे धुण्याचा उद्योग करतोय. मंत्रीपद प्राप्त झाल्यावर मी तो उद्योग सोडला. आता पुनश्च तो उद्योग सुरू करून त्या प्राप्तीतील अर्धा वाटा आपल्याला देईन व उरलेला मी घेईन आणि सुखाने जगेन. ह्या उद्योगाचे मला काहीच कष्ट वाटत नाहीत. हा सर्व विचार करून युद्धासाठी मी काहीही सज्जता केली नाही.”
मंत्र्याचे हे वक्तव्य ऐकल्यावर अपात्र, अविवेकी व्यक्तीची अयोग्य जागी नियुक्ती केल्यामुळेच हे संकट ओढवले ह्या विचाराने राजाला खूप दुःख झाले.
तात्पर्य –अपात्र,अविवेकी व्यक्तीला उच्चपदी नियुक्त करू नये.
संध्याकाळचा चहा करायच्या निमित्ताने मी ओट्याकडे गेले. बकूमावशींचा कप खिडकीत ठेवला. हळूच हात जोडून विनवणी केली,’घरचे वेड्यात काढतील हो मला. फार काही गोंधळ घालू नका. झाडावरच बसा गुपचूप .” त्या थोड्याशा हसल्या की काय कोणजाणे?
काही वेळाने ‘अग्गोबाई सासूबाई बघत गवार निवडत बसले होते . “अगं काय फास्टात काम चाललयं. बाकी सिरिअल्सच come back झाल्याची खुशी वाटतं?” मी दचकून खाली बघीतलं. गवार almost निवडून झाली होती .मी कावरीबावरी होऊन इकडंतिकडं बघायला लागले . हाहाहा s वासू जोरजोरात हसू लागला . त्यात एक बायकी हसणंही ऐकू येत होत.???
रात्रीची आवराआवर झाल्यावर मावशींची चाहूल घेत होते. चांगलं ठणकवायचं यांना.गुपचूप रहा .मदतबिदत काही नक्कोच! देवघरातून रामरक्षा म्हंटल्याचा आवाज आला . बकूबाई? देवा!देवा!!
बैस,बैस इथं हातानंच खूण करून जवळच्या पाटावर त्यांनी मला बसायला सांगितलं .” मी चालले बर का सुधा आता.वेटिंग लिस्ट संपली बरं. कोरोना आवाक्यात येतोय हो. आज कोरोनामुळे झालेले डेथ्स् कमी होते.उद्या सकाळी आठ वाजता माझ्या नंबर हो. त्या मेल्या यम्यानं मेसेज केलाय बघ WhatsApp वर.”
मला कसंतरीच वाटलं एकाएकी. गळा भरून आला.बकूमावशींच्या मांडीवर डोकं ठेवलं. त्या हलकेच थोपटत राहिल्या. झोप कधी लागली कळलेच नाही . सकाळी उठले तर मावशी दिसल्या नाहीत. चटचट आवरून कपाटातून घडी न मोडलेली छानशी लेमन यलो साडी काढली. चाफ्याची वेणी केली. हो, एक मास्क सुध्दा आठवणीने ठेवला. चाफ्याच्या झाडापाशी जाऊन बकूमावशींची ओटी भरली. वाकून नमस्कार केला. त्या प्रसन्न हसल्या. पिवळी साडी लपेटलेल्या,आंबाड्याभोवती चाफ्याची वेणी घातलेल्या बकूमावशी हात हलवत आकाशाकडं मार्गस्थ होताना दिसत होत्या.
त्या दिसेनाशा होईपर्यंत मी ही हात हलवत होते .. . . . . कोण बरं ? . . वासू , आबा . . . दोघंही हाका मारतायत? काय झालं बाई?
“अगं अशी देवघरातच का झोपलीस ? काय झालं सुधा ?” दोघंही माझ्या कडं वाकून बघत होती. मी दचकून उठले खरी परंतु माझा हसरा, प्रफुल्लित चेहरा बघून दोघही अचंबित झाले .गालात हसत हलकेच मानेला झटका देऊन मी दैनंदिन कामाला लागले.
मागील भागांत देस रागाचे विवेचन केल्यानंतर, त्याच रागाचे सख्खे भावंड म्हणता येईल अशा तिलककामोद रागाविषयी विवरण करणे क्रमप्राप्तच आहे. एकाच खमाज नामक जनकाची ही दोन अपत्ये! दोन भावंडांच्या जीन्स एकच असल्या तरी हा सुरेश आणि हा रमेश हे दोघे स्वतंत्र अस्तित्व असलेले भाऊ आपण सहज ओळखू शकतो नाही का? त्यांच्या स्वरूपांत साम्य असूनही वेगळेपण असते. स्वभावही वेगळे असतात. देस व तिलककामोद यांच्यांतही असेच वेगळेपण आहे.
दोघांचे स्वर एकच! सा रे ग म प ध नी, अरोहांत नी कोमल! तिलककामोद मात्र जरा अवखळ,खेळकर स्वभावाचा! त्याची चाल सरळ नसून जरा वक्र वळणावळणाची आहे असे म्हणावे लागेल.
सा रे ग सा, रे म प ध म प सां—आरोह
सां—प ध म ग, सा रे ग सा नी(कोमल,मंद्र)~ अवरोह. या आरोह~अवरोहावरून हे लक्षांत येते. टप्प्याटप्प्यावर रांगणारे जणू हे बालकच आहे. तिलककामोदची ही वक्र चाल फारच कर्णमधूर वाटते. त्यामुळे हा राग अतिशय लोकप्रिय आहे. कुशल कलावंत अवरोही रचनेत गंधारावरून षडजावर येतांना रिषभाला हलकेच स्पर्ष करून तो कणस्वरूपाने दाखवितात व गायन/वादनांत रंजकता आणतात. अंतर्याचा उठाव ‘ प ध म प सां ‘ या स्वरांनी घेऊन तिलककामोद आपले स्वतंत्र अस्तित्व श्रोत्यांच्या निदर्शनास आणतो.” प(मंद्र)नी(मंद्र) सा रे ग सा, रे म ग, सा रे ग सा नी(कोमल,मंद्र)” हे राग निदर्शक स्वर आहेत. मंद्र सप्तकाचा उत्तरार्ध व मध्य सप्तकाचा पुर्वार्ध हे या रागाचे विस्तारक्षेत्र आहे. या रागाचे वादी व संवादी स्वर अनुक्रमे रिषभ व पंचम आहेत. जरी अवरोहांत देसप्रमाणेच याही रागांत निषाद कोमल असला तरी उत्तरभारतीय कलावंत कोमल निषाद न वापरतां शुद्ध निषाद घेऊनच हा राग पेश करतात.शास्रानुसार हा राग रात्रीच्या दुसर्या प्रहरी प्रस्तूत करावयाचा असतो.
तिलककामोद म्हटला की सर्वांच्या पटकन् लक्षांत येणारे गीत म्हणजे उंबरठा या चित्रपटांतील ” गगन सदन तेजोमय ” ही प्रार्थना!
लता दिदींचे सूर, र्हुदयनाथ मंगेशकरांची स्वररचना आणि कविवर्य वसंत बापट यांचे शब्द! ह्या तिघांचे रसायन असे काही जमून आलेले आहे की हे गाणे ऐकतांना मन मोहरून येते. स्व.श्री सुधीर फडके यांचेही तिलककामोद रागावर फार प्रेम! रूपास भाळलो मी,विठ्ठला तू वेडा कुंभार,दिसलीस तू फुलले ऋतू, आकाशी झेप घेरे पांखरा, ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर ही बाबूजींनी स्वरबद्ध केलेली आणि गायिलेली गाणी
तिलककामोद रागावरच आधारित आहेत.
ठुमरी, दादरा, कजरी हे उपशास्रीय गायनाचे प्रकार या रागांत आहेतच! अबके सावन घर आजा ही पारंपारिक ठुमरी अनेकांनी गायली नि आजही गायली जाते. सावनकी रितु आयी री सजनिया प्रीतम घर नही आये ही शोभा गुर्टू यांनी गायिलेली ठुमरी ऐकतांना ब्रम्हानंदी टाळी लागते.
उपशास्रीय व सुगम गायनांत या रागाचा दिलखुलास विहार असला तरी हे विसरून चालणार नाही की ख्याल गायनांतही हा राग प्रचलित आहे.चौताल,धमार या विलंबित तालांत
अनेक बंदिशी आढळतात. ” हर हर हर करत फिरत ना डरत गोपियनके साथ “ही चौतालातील बंदीश, ” चलोरी होरी खेलन सजनी दे तारी “हा धमार प्रचलित आहे.
वर नमूद केलेल्या रचनांवरून असे म्हणतां येईल की भक्ति,शृंगार, प्रीति सर्वच भावनाविष्कार करण्यास ह्या रागाचे चलन सक्षम आहे. ह्यांत एकप्रकारचा मांगल्यभाव आहे. इथे उल्हासाची उधळण नाही परंतु निराशाही नाही.चांगल्या गोष्टी तशाच टिकून राहिल्या आहेत असा तिलककामोदाचा भाव आहे.
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “दत्तसंप्रदायातील त्रिमूर्ती” – मनोगत ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
दत्तगुरू ही ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असून ती युगायुगात आहे.प्राचीन परंपरा असलेल्या या संप्रदायातील श्रेष्ठ विभूती म्हणजे श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ अक्कलकोट ! यांची ओळख वाचकांना व्हावी या हेतूने माझ्या अल्प बुध्दिप्रमाणे मी हे लेखन केले आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ हे संप्रदायातील एक महापुरुष ! दत्तात्रेयांचा इतिहासकालीन पहिला व नरसिंह सरस्वतींचा पूर्वावतार ! त्यांच्या लीलातून मिळालेला जीवनबोध या संप्रदायाने महत्त्वाचा मानला.
नरसिंह सरस्वती यांनी व्रते,वैकल्ये,कर्मकांड यांची पुर्नस्थापना करून सर्व सामान्य लोकांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला. पडत्या काळात विस्कळीत झालेली धर्माची वर्णाश्रम व्यवस्था टिकवून धरली.तत्त्वज्ञान व आचारधर्म यांचे नवे आदर्श स्वतःच्या आचरणाने सिद्ध केले.
श्री स्वामी समर्थांचे जीवन सदैव तृप्त असणाऱ्या महासागरासारखे होते. स्वामी सोवळे ओवळे मानणारे नव्हते. शुद्ध आचरण म्हणजे सोवळे आणि ओवळे म्हणजे अशुद्ध आचरण ही त्यांची भावना होती.
यांचे विचार समाजापर्यंत पोचविण्यासाठी केलेली ही शब्द साधना! वाचकांनी याचा अनुभव घ्यावा.
“तो भुतांच्या राज्यातला नियम आहे .आम्ही आमच्या खर्या घरात राहू शकत नाही .तुझ्या बागेतील चाफ्याच्या झाडावर राहतेय मी. बकेट लिस्ट नं. एक”
बकूमावशींना जगण्याचा केव्हढा सोस! हं—–
“हे बघ, जा झोप आता. उद्या जोशांच्या कडं डबा द्यायचाय़ ना? पोळी भाजी चा? मला हे आवडलं हं तुझं. सगळ्यांना मदत करतेस. जोशी काकू होम क्वारंटाईन आहेत म्हणे”.
मी पुन्हा अचंबित !
“गं हे वरदानच आहे . मनकवड्या असतो आम्ही . . . . . . ‘भूतबायका हं!’ (भुताटकिणी नव्हे)
. . . . . सकाळी सहाचा गजर वाजला. मी धडपडतच ऊठले.केसांना बो बांधून पदर खोचतच ओट्याकडे धावले आणी . . . . . थिजून ऊभीच राहिले.माझा डोळ्यावर विश्वासच बसेना !! पोळी भाजी तैयार!! डब्बेही भरून ठेवलेले. गॅसवर चहाचं आधण ठेवताना मी हळूच चाफ्याच्या झाडाकडं बघीतलं. बकूमावशी हसत होत्या फांदीवर बसून, केसात चाफ्याची फुलं घालून. मी वासूला चाफ्याची फुलं काढायला पाठवलं.तो काही मिनिटातच हाका मारत आला टोपली s s s भर s s फुलं घेऊन !
“सुधा~ अगं सुधा ~~ आज जादू झाल्या सारखी फुलं टोपलीत पडली बघ ! आकड्याची काठी फुलाकडे नेण्याचीच खोटी फूल खालीच!.”
मी झाडाकडं पाहिलं. मावशी पाय हलवत फांदीवर. गालातल्या गालात हसत.हातात कप.
त्यांनी मला डोळा मारला. (कसंतरीच झालंहो. .
वासूनं सुध्दा कधी डोळा नाही मारला हो.~~)
हु~श्श~ वासूला त्या दिसल्या नाहीत तर!
आज सगळी कामे पटापट होत होती मुळ्ळीसुध्दा दमणूक झाली नाही .धावपळ तर नाहीच नाही. मावशी होत्या ना मदतीला. मनात एक विचार येऊन गेला. . नकोच त्यांचा नंबर लागायला. राहूदेत माझ्याकडंच. पण बाई मी मनातल्यामनात जीभ चावली. एकदा तर बाई फजिती होता होता वाचले. तर काय झाले . . .
मी हॉलची सफाई करत होते .मावशींनी माझ्या कडून झाडू काढून घेतला. त्या पटापट हॉल मध्ये झाडू मारू लागल्या. आबा आले की तेव्हढ्यात काठी टेकत टेकत. “अगं सुधा, जरा तो टी. व्ही. लाव बरं . मला कोरोनाच्या बातम्या ऐकायच्यात.मुंबईत unlock आणी पुण्यात lockdown असं काहीतरी वासू सांगत होता .”
मी T.V. कडे वळणार तोच आबांची काठी पडल्याचा आवाज आला. मावशींनी त्यांना मागच्या मागे अलगद पकडलं म्हणून बरं बाई!
‘रामा! शिवा!गोविंदा!!’ मी कपाळाला हात लावला.आबा बोलत बोलत हॉलमध्ये आले. त्यांना फक्त हलणारा झाडू दिसला बहुधा.मावशी कशा दिसणार ?त्यांना घाम फुटला होता. मावशींच्या मदतीनंच मी त्यांना खुर्चीत बसवलं.मावशी पाण्याचा ग्लास घेऊन येतच होत्या . . . . तेव्हढ्यात ‘सुधा , कसला आवा. . ‘ वासूची एंट्री झालीच. पटकन ग्लास हिसकावून घेतला. बापरे ! वासूला तरंगत येणारा ग्लास दिसला तर नसेल? तर्रि बर्र . र्र. . . आबांना सावरण्याच्या गडबडीत दुसरं काही बोलणं शक्यच नव्हतं. घामानं डबडबलेल्या मला बघून त्याला वाटले आबांच्या तब्बेतीचं दडपण
आलेय ! मावशी केंव्हाच पसार झाल्या होत्या.
आबा सावध झालेले बघून मी मागच्या पावलीच आत खोलीत पळाले आणी धपकन् बेडवर बसले. बसले कसली आदळलेच!! परिस्थिती ओळखून वासूनं छानसा चहा करून आणला.
“घाबरतेस काय अशी? B.P. ची गोळी घेतली नाहिये ,त्यामुळे चक्कर आली असेल.घे चहा घे, विश्रांती घे थोडी बरं वाटेल.”
“आबांना देतो मी चहा बिस्किटं.गोळी ही देतो. तू आराम कर.”असं म्हणत तो खोलीतून बाहेर पडला.या सगळ्या गोंधळात मावशींचे दुपारच्या जेवणाचं ताट करायलाच विसरले. पण भांड्यात ताटं मात्र चार पडली होती ? मलाच नाही कळलं तिथं त्या दोघांना काय कळणार म्हणा?
एकवीस दिवसाच्या युरोप ट्रीप वरून आम्ही परतलो. अजूनही ट्रीपच्या मूडमध्येच होतो.
इतकं प्रगत राष्ट्र, इतकी मोहमयी दुनिया नजरेत साठवून घ्यावं असं सौंदर्य इतकी आधुनिकता भव्य रस्ते भव्य इमारती इतका सुरेख निसर्ग हे सर्व पाहून डोळ्याच्या बाहुल्या विस्फारल्या होत्या.
आल्या आल्या मला स्वयंपाकाच्या कट्ट्याचे दर्शन घ्यावं लागलं. चहा करण्यासाठी सरसावले तर डोळे आणखीनच विस्फारले ओट्याच्या एका कोपऱ्यात एक छोटासा हिरवा देठ आणि त्याच्यावरच पिवळे फूल मला खुणावत होतं.
जाताना मीच बीजारोपण केलं होतं जणू! मोहरीचा एक दाणा रुजला होता आणि आपलं अस्तित्व दाखवत होता. मी जणू त्याला पंधरा-वीस दिवसाचा ‘ब्रीदिंग टाईम ‘दिला होता एरवी रोजच्या साफसफाईत तो अंकुरला नसता.
खूपच गोंडस निरागस हिरवट इवलसं पिवळ्याधमक फुलांन नटलेलं असं ते हळुवार डोलत होतं.
माझ्या मनातील सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली त्याने
एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले…..
या गाण्यांच्या ओळी मला सहाजिकच आठवल्या. त्या क्षणी कवीच्या भावनाही समजल्या.
….मी युरोप मध्ये पाहिलेलं ट्यूलिप फूल सुंदर की हे मोहरीचं फुल याचा विचार करत बसले आणि दूध उतू गेलं.
अस्तित्वा साठीची ही त्याची धडपड मला जाणवली . माझ्या डोळ्याला ते दिसणं हे त्याचं असणं! आणि माझ्या हदयात त्याचं बसणं हे त्याचं अस्तित्व!!