श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ पा य री ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“स्वतःची पायरी ओळखून वागायला शिका !”

असा उपदेश देणारे आणि तो ज्या व्यक्तीला योग्य प्रकारे कळेल असे घेणारे, असे दोघेही सांप्रतकाळी लोप पावलेले आहेत ! त्याला कारणं काहीही असतील, पण हे वाक्य ऐकून घेणाऱ्याला त्या काळी या एका वाक्या मागील शब्दांचा मार इतका जिव्हारी लागायचा, की ती व्यक्ती एखाद्या फिनिक्स पक्षा प्रमाणे चांगल्या अर्थाने बंड करून उठे !

हल्ली असा शेलका उपदेश कोणी कोणाला द्यायच्या भानगडीत पडत नाही, कारण आजकाल सगळ्याच लोकांची मानसिकता वेगळ्याच पायरीवर गेल्यामुळे असं होत असावं ! मुळात वर म्हटल्या प्रमाणे असं कोणी कोणाला बोलायच्या भानगडीत हल्ली पडतच नाही, लोकं लगेच त्याच्या पुढची पायरी गाठून हात घाईवरच येतात आणि ताबडतोब मुद्द्यावरून गुद्यावर ! भांडण तंटा मिटवायची मधली कुठली तरी पायरी असते हे रागाच्या भरात विसरूनच जातात ! मग अशा वेळी त्या तंट्याचे पर्यवसान कशा प्रकारे होतं, हे आपण रोज पेपरात वाचत असतोच ! जसं की, बापाने तरण्या ताठ्या मुलावर हात उचलला, म्हणून रागाच्या भरात त्याने आत्महत्या करण्या पर्यंतची पायरी गाठली किंवा एखाद्या मुलाने, आपल्या वडिलांनी नवीन मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्या जन्मदात्यावरच चाकूने हल्ला करून, नको इतकी टोकाची पायरी गाठलेली असते ! असो !

“अहो काय सांगू तुम्हांला, या वयात सुद्धा मी त्या अमुक तमुक देवळाच्या आठ हजार पायऱ्या चढलो ! अजिबात कसला त्रास म्हणून झाला नाही बघा, सगळी त्याचीच कृपा !”

आपण कुठंतरी घाई घाईत महत्वाच्या कामाला, चाळीच्या जिन्याच्या पायऱ्या उतरून जात असतो आणि आपल्याला एखाद्या पायरीवर उभं करून, चाळीतले अप्पासाहेब आपल्याला हे ऐकवत असतात ! चाळीच्या दोन जिन्याच्या फक्त चाळीस पायऱ्या चढून वर आलेल्या अप्पाना, वरील वाक्य बोलतांना खरं तर धाप लागलेली असते, पण आपण सुद्धा, “हॊ का, खरंच कमाल आहे तुमची अप्पासाहेब, या वयात सुद्धा तुम्ही बाजी मारलीत बुवा !” असं बोलून आपली सुटका करून घेतो !  देव दर्शनाला कोणी किती पायऱ्या कुठे चढाव्या अथवा कुठे उतराव्या, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न ! मी बापडा उगाच त्यांच्या श्रद्धेच्या पायऱ्यांच्या आड कशाला येऊ ? मग याच अप्पाकडून कधीतरी ऐकलेले “ईश्वर सर्वव्यापी आहे, फक्त तो बघायचा भाव मनी हवा, की त्याचे दर्शन झालेच म्हणून समजा !” हे त्यांचे वाक्य आठवते ! पण मी स्वतःची पायरी ओळखून असल्यामुळे, अप्पासाहेबांना त्यांच्या या वाक्याची आठवण करून देत नाही इतकंच ! उगाच कशाला आपण आपली पायरी सोडून बोला !

“शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये” असा उपदेश पूर्वीचे बुजुर्ग लोकं त्या काळच्या तरुण पिढीला करत ! हे सांगतांना त्यांनी स्वतः किती वेळा, किती कारणांनी कोर्टाची ती पायरी चढल्ये हे सांगण्याचे मात्र शिताफिने टाळत ! एकंदरीतच कोर्टाची पायरी चढण्या मागे कुठलाच शहाणपणा नाही, उलट वेळ आणि पैशाचा नको इतका अपव्यय ती एक पायरी चढल्या मुळे होतो, हे खरं तर त्यांना यातून सांगायचं असावं ! या  सिद्धांता मागची कारणं काहीही असली तरी, काही वेळा काही भांडण तंट्यानी इतकी टोकाची पायरी गाठलेली असते, की ती सोडवण्यासाठी शेवटी दोन्ही वादी आणि प्रतिवादींना ती नको असलेली कोर्टाची पायरी चढल्या शिवाय गत्यंतरच उरत नाही ! मग स्वतःच्या सांपत्तीक पायरी प्रमाणे, ते वादी आणि प्रतिवादी दोन नामांकित वकील करून आपापली केस, कोर्टाच्या कंटाळवण्या पायरीवर सोडवायचा चंग बांधतात ! त्यांना त्यांची कोर्टाची पायरी लखलाभ ! असो !

काही थोर लोकांनी समाजाबद्दलची बांधिलकी जपतांना, स्वतः वेगळ्या अर्थाने पायरीचा दगड बनून, अनेक जणांना यशाच्या शिखरावर बसवलेल आपण पाहिलं असेलच ! अशा प्रकारचा पायरीचा दगड बनणे सर्वांनाच जमतं असं नाही ! त्यासाठी मुळात अशा दगडाची जडण घडणच वेगळ्या प्रकारची झालेली असावी लागते ! अनेक न दिसणारे, छिन्नी हातोड्याचे घाव, अशा दगडांनी आपल्या आत झेलून लपवलेले असतात, याची आपल्या सारख्या सामान्य लोकांना कल्पनाच नसते ! याच घावांना लक्षात ठेवून हे दगड, आपल्या पुढच्या पिढीला असे घाव सोसावे लागू नयेत म्हणून, अनेकांसाठी पायरीचे दगड बनून समाजऋण फेडायच कामं इमाने इतबारे, स्वतः अलिप्त राहून करत असतात ! समाजातील अशा महान व्यक्तींचा हा आदर्श, थोडया फार प्रमाणात जरी आपण डोळयांपुढे ठेवून, आपल्या कुवती प्रमाणे, समाजाच्या कल्याणासाठी छोटीशी का होई ना, पायरी बनायला कोणाला कुठलीच अडचण नसावी असं मला वाटतं ! मंडळी, मला स्वतःला असं वाटून काय उपयोग आहे म्हणा ? शेवटी, हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक, वैचारिक पातळीवरील पायरीचा प्रश्न आहे ! पण आपण सर्वांनीच, अगदी माझ्यासकट, अशी छोटीशी पायरी होण्याचा प्रयत्न करायला कोणाची हरकत नसावी, असं मला मनापासून वाटतं ! बघा विचार करून !

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

१६-०३-२०२२

मोबाईल – 9892561086

ताजा कलम – आता थोडयाच दिवसात आपल्याला “पायरी हा ss पू ss स ss” अशा आरोळ्या कानावर यायला लागतील, तर त्यातील त्या “पायरीवर” पुन्हा कधीतरी !

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments