सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “चैतन्याचा जागर” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

काल श्री घावटे सर यांचा षष्ट्यब्दीपूर्तिसमारंभ  उत्कृष्ट रितीने पार पडला देखणे सरांच्या आशिर्वादानेच कदाचित देखणा सोहळा झाला असावा. 

असो. 

त्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांनी लिहिलेच आहे. पण मला मात्र काल ज्या पुस्तकाचे प्रकाशन केले त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबाबत आवर्जून लिहावेसे वाटले.

मनात विचार आला कविता पुस्तक किंवा लेखनकृती या बद्दल रसग्रहण बरेच करतात. पण ज्या मुखपृष्ठामुळे पुस्तकाची ओळख बनते ते मुखपृष्ठही खूप विचारपूर्वक अतिशय परिश्रमाने बनलेले असते.

त्यामुळे त्या मुखपृष्ठाचा अर्थही लोकांनी ग्रहण करावा म्हणजे मग त्या पुस्तकाला खरा न्याय मिळेल असे मला वाटते .

म्हणूनच कालच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ  मला  अतिशय भावले. पुस्तकातील लेखनाशी तादात्म्य साधणारे अतिशय कमी गोष्टींमधून खूप मोठा विचार देणारे आणि बरेच काही सांगून जाणारे आहे. 

कदाचित मी जे पाहिले मला जे दिसले त्यापेक्षा जास्त अर्थही असू शकेल या चित्राचा. पण मला भावलेले माझ्या नजरेने सांगितलेले अर्थ मी उलगडून सांगणार आहे.

प्रथमत: इतके चांगले मुखपृष्ठ करणार्‍या श्री संतोष घोंगडे यांचे आभार.

०१) प्रथमत: मुखपृष्ठावर मध्यभागी असलेल्या चित्रावर नजर केंद्रित होते आणि दिसते डमरूच्या आकाराचे हे चित्र.

***  यामधे हा डमरू म्हटला तर श्री शंकराचे हे वाद्य तिन्ही लोकात याचा आवाज जाईल हे सांगते. 

*** जर डमरू म्हणून नाही पाहिले तर मोठमोठ्या देवालयात वाजणारा चौघडा किंवा नगारा किंवा डंका आहे. हा नगारा  त्रेलोक्यात याचा त्याचा डंका पिटणार आहे.

*** जर हे दोन्ही नसेल तर देवीचा संबळ याचे दोन भाग एकावर एक ठेऊन हा संबळ आता जागरण गोंधळ मांडणार आहे आणि जागर करणार आहे.

०२) नंतर लक्ष जाते त्यावरील दोन भगव्या पताकांकडे

*** या पताका म्हणजे समईतील दोन फडकणार्‍या वाती वाटतात

*** ज्योत से ज्योत जलाते चलो हा पण अर्थ त्यातून निघू शकतो. मोठ्या ज्योतीने म्हणजे मोठ्या पिढीने आपले ज्ञान पुढच्या लहान पिढीला सांगितले पाहिजे. ही ज्ञानज्योत ही ज्ञान पताका सदा फडकत राहिली पाहिजे.

*** ही पताका म्हणजे वारकरी संत वैष्णवांची द्योतक आहे अशी ही पताका संस्कृती परंपरा यांचे प्रतिक आहे. जणू संस्कृती जागर करत आहे

*** हीच पताका राजे शिवछत्रपती यांच्या यशोगाथा प्रत्येक मराठा मावळा शिवभक्तच नाही तर अटकेपारही झेंडा फडकावते. 

***घावटे सर स्वत:ही शिवाजीराजे भक्त आहेत हे कार्यारंभी केलेल्या शिवाजी प्रतिमापूजनाने लक्षात आलेच असेल. म्हणून त्यांच्याप्रतीची ही कृतज्ञताही यातून व्यक्त होते.

शिवाजी शिवाय राष्ट्र पूर्ण होऊच शकत नाही म्हणून राष्ट्र जागर ही चालला आहे

*** या पताकाच्या काड्या उद्बत्ती सारख्या दिसतात. या उद्बत्तीचा दरवळ आसमंतापर्यंत जावा.

०३) नंतर लक्ष जाते या चित्राच्या सावलीकडे•••

*** ही सावली देवघरातील निरांजनाप्रमाणे दिसते.  पुन्हा संस्कृती जागर. 

*** हा जागर करताना त्यातील ज्योत मोरपिसाचा आकार घेऊन येते. म्हणजेच हा जागर मनात कल्लोळ निर्माण न करता मनाला एक मोरपिशी स्पर्श देऊन जातो. 

*** मोरपिसामधला डोळा म्हणजे सगळ्या वाचकांनी मनाच्या डोळ्यांनी हे वाचन करावे असे सुचवते 

*** हाच डोळा स्त्री गर्भासारखा वाटतो 

डोक्यावर पदर घेतलेल्या स्त्री सारखा वाटतो 

स्वत: एका कोषात गुंतलेल्या स्त्री प्रतीमेचा वाटतो .

•• हेच नारी सन्मानाचे द्योतक वाटते

हेच नारींना सबला करण्यासाठी मांडलेल्या विचाराचे प्रतिक वाटते 

*** अर्थातच समाजातील स्त्री प्रतीमा उज्वल करण्यासाठी केलेला समाज जागर वाटतो .

०४) नंतर लक्ष जाते या संपूर्ण चित्राच्या बाजूला असलेल्या दोन कोयर्‍यांकडे

*** पुन्हा संस्कृती प्रतीक

*** या कोयर्‍या म्हणजे पताकांची फडफडणारी ज्योत मालवू नये म्हणून केलेले हातांचे कोंदण वाटते . आपली श्रेष्ठ परंपरा सांगणारी ही छोटीशीच प्रतिमा.

*** नीट पाहिले तर लक्षात येते या कोयर्‍या म्हणजे अवतरण चिन्ह आहे. जे घावटे सरांचे म्हणणे या पुस्तकातील अवतरणात घेऊन आले आहे. हा प्रबोधन जागर चालला आहे.

०५) त्यानंतर बाजूला स्पष्टपणे दिसणार्‍या अस्पष्ट रेषांकडे लक्ष जाते

*** त्यामधे दिसतात असंख्य चेहरे ते समाजाचे प्रतिक आहे आणि हा समाज जागर चालला आहे सांगते.

*** हेच चेहरे आपल्या राष्ट्राचे द्योतक आहे म्हणून या राष्ट्रासाठी मांडलेला राष्टीय जागर ही वाटतो .

०६) नंतर लक्ष जाते रेषांच्या सरस्वतीकडे

*** हे ज्ञानाचे प्रतिक आहे ज्ञान जागर चालला आहे.

*** ज्या सरस्वतीने ही बुद्धी दिली त्या ज्ञानदे प्रती कृतज्ञता व्यक्त होत आहे

*** अज्ञान तिमीरांधस्य ज्ञानांजन शलाकया प्रमाणे जेथे जेथे अज्ञान आहे तेथे तेथे यातील ज्ञान शलाकेने जीवन उजागर होवो म्हणून दिसणारा हा तेजोमय प्रकाश अर्थातच सफेद रंगात लिहिलेली अक्षरे•••      “चैतन्याचा जागर”  

खरोखर इतके बोलके मुखपृष्ठ नक्कीच पुस्तक वाचायला प्रेरणा देणारे आहे.

सरांनी समाज जागर , संस्कृती जागर, राष्ट्रीय जागर, विकास जागर, प्रबोधन जागर या पाच विभागात जरी विभागणी केलेली असली तरी ज्ञान जागर, देवी जागर, शारदा / सरस्वती जागर इ अनेक जागरांच्या नद्या मिळून निर्माण होणार्‍या चैतन्य सागराचा हा चैतन्य जागर आहे. पुस्तकात काय आहे हे चटकन सांगणारे हे चित्र आहे.

एखादी सुंदर तरूणी पाहिल्यावर तिच्या मनात काय चालले आहे हे तिच्या चेहर्‍याकडे पाहिले डोळ्यात बघितले तरी लगेच समजते.तसेच या मुखड्यावरून अंतरंग लगेच समजते.

 हे मुखपृष्ठ या जागराची शक्ती दाखवणारे आहे. 

मला तर वाटते  नुसते चित्र एक सुरेख पेंटींग होऊन घरातील भिंतीवर यायलाही काही हरकत नाही. सतत नजरेसमोर जागर राहील. 

या उत्कृष्ट मुखपृष्ठ चित्रासाठी श्री संतोषजी घोंगडे यांचे पुन्हा आभार. 

एक चित्र परिक्षण करण्याची संधी मिळाली म्हणून हे चित्र निवडणार्‍या घावटे सरांचे आणि संवेदना प्रकाशनच्या नितीनदादा हिरवे यांचेही आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments