सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

🌸 जीवनरंग 🌸

☆ नशिबा आधी कर्म धावते… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सुलभा घरातील पसाऱ्यात शांत बसली होती. अवतीभवती कोणी नव्हते. आईला जाऊन आज पंधरा दिवस झाले होते. दिवस कार्य झाले  आणि नातेवाईक मंडळी आपापल्या गावी परत गेली .तशीही फारशी ये- जा त्यांच्या घरी नव्हतीच, पण आई गेली आणि होते तेही बंध संपले. वडील आधीच गेले होते. आई तेव्हापासूनच हबकली होती.तशी तीही फार कर्तृत्ववान होती असं नव्हतं, पण घरात सर्वांना चार घास जेवायला तरी मिळत होतं!

सुलभा विचारांच्या शृंखलेत गुरफटली होती. तेवढ्यात “ताई,ए ताई, एकटीच काय करतेयस? संध्याकाळ झाली ना! देवाला दिवा पण नाही लावलास?” बाहेरून हाकारा करीतच संगीता आली आणि सुलभाची विचार श्रृंखला तुटली! 

आई गेल्यानंतर आज पहिल्यांदाच संगीता कामावर गेली होती. आनंदही कामावरून तितक्याच आलाच.. दोघेही भुकेजून आले होते .सुलभाने मनाची मरगळ झटकली आणि जेवणाची तयारी केली. संगीता आणि आनंद दोघेही तिला दिवसभरातील कामावरच्या गोष्टी सांगत होते. संगीता म्हणाली,” ताई ,आज डॉक्टर काकांनी सगळी चौकशी केली. पैशाची काही गरज असेल तर सांग म्हणाले. आनंदनेही त्या गोष्टीला दुजोरा दिला. दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते आणि त्या डॉक्टरांचा आधारही होता घराला! सुलभाच्या मनात आले किती चांगली माणसं भेटली आहेत नशिबाने! जेवण  झाल्यावर संगीता आणि आनंद आपापल्या कामाला लागले. संगीताने भांडी घासली, आनंद आवरायला मदत करत होता.सुलभा आवराआवर झाल्यावर निवांत काही वेळ बसली.संगिता, आनंद झोपायला गेले,पण सुलभाला काही झोप लागेना! सगळ्या जीवनाचा चलत् चित्रपट तिच्या डोळ्यासमोर दिसत होता!

आपली आई स्वभावाने प्रेमळ,गरीब स्वभावाची होती खरी,पण जगातील व्यवहार तिला कळला नाही.तिचे नशिबंच असे कसे की तिला कुठूनच सुख मिळाले नाही.

माहेरी परिस्थिती बरी होती,भावंडे सहा…सगळी शिकलीसवरली,पण ही एकटीच चौथी पास!

सुलभा ला सुरुवातीचे बालपणी चे दिवस आठवले , जेव्हा त्यांचे एकत्र कुटुंब होते .आई वडील, आजी -आजोबा, दोन काका-दोन काकू,मुले अशी सर्व एकत्र राहत होती. पण आजी – आजोबा गेल्यानंतर घरात वाटणीच्या गोष्टी सुरू झाल्या. सुलभा समजत्या वयाची होती. वाटणीत यांच्या वाट्याला फक्त दोन खोल्या आल्या. सुलभा आईला विचारत असे, ‘आपल्यालाच का फक्त दोन खोल्या? बाकीच्यांना तीन तीन खोल्या आहेत.’ ‘अगं , आपल्या ला कर्ज होते, ते भागवण्यासाठी काकांनी पैसे दिले. त्यामुळे आपल्याला एक खोली कमी मिळाली.’

सुलभाच्या वडिलांचे दुकान होते. दुकानात कामाला एक दोन माणसे होती. तशीच काउंटरवर  एक मुलगी होती. ती हुशार होती. कामात चलाख होती. सुलभाच्या वडिलांना तिची कामात मदत होत असे. कसे कोण जाणे, सुलभाच्या वडिलांचे तिच्याशी सूत जुळले आणि घराकडे दुर्लक्ष होऊ लागले! हळूहळू दुकानचा कारभार त्या मुलीच्या हातात गेला. बाकीच्या दुकानांच्या स्पर्धेत दुकानचा खूप कमी झाला.

शेवटी दुकानावर कर्ज झाले आणि ते विकून टाकावे लागले. १/२ वर्षातच वडीलही गेले आणि सुलभा आता पूर्णपणे घराला बांधली गेली!नशीबा आधी  कर्म धावते याचा प्रत्यय सुलभाला येऊ लागला.

त्या दरम्यान सुलभा एका वाचनालयात कामाला जाऊ लागली होती. आता ती कॉलेजला होती . आर्ट्स साईडला असल्यामुळे सकाळी कॉलेज करून संध्याकाळी ती लायब्ररीत काम करू शकत असे. तिथे पुस्तक बदलायला येणाऱ्या स्वप्नीलच्या प्रेमात ती कशी पडली तिचा तिलाच कळलं नाही. स्वप्निल देखणा होता. आर्थिक परिस्थिती बरी असावी बहुतेक! सुलभा त्याच्या प्रेमात पडली. सुलभा ला ते दिवस आठवत होते. स्वप्निल तिच्याशी गोड गोड बोलत असे.एक दिवस त्याने सुलभाला सांगितले,’ माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तू आवडतेस आणि मला वाटतं ,तुलाही मी आवडतो. तुझी संमती असेल तर आपण लग्न करूया का?’सुलभा मनातून खूप आनंदली. तिलाही स्वप्नील आवडत होता.तिला परी कथेतील राजकुमार मिळाल्यासारखा आनंद वाटला होता.मागचा पुढचा विचार न करता

सुलभा ने त्याच्या प्रेमाला होकार दिला. घरी आईला हे सांगितले. मुलगा आपल्या जातीतील असल्याने घरच्यांनी फारसा विरोध केला नाही.

दोघांचे लग्न थाटात पार पडले.अगदी द्रुष्टं लागण्यासारखी जोडी दिसत होती.

… सुलभाने नवीन आयुष्याला सुरुवात झाली.नव्या नवलाईचे  दिवस होते ते!आनंदात दिवस चालले होते. स्वप्निलच्या घरची मंडळी चांगली होती पण स्वप्निल काहीच करत नव्हता. छोटे मोठे उद्योग करत असे, पण फारसे शिक्षण नसल्यामुळे मिळकत बेताचीच होती. आपल्या अडाणी वयातल्या प्रेम विवाह मुळे आपलं तर नुकसान झाले याचा तिला पश्चाताप होत असे. लवकरच तिच्या संसारात नवीन पाहुणा येण्याची चिन्ह दिसली. आता तरी स्वप्निल काहीतरी करेल या आशेवर सुलभा दिवस घालवत होती.

सुलभाचे मन भूतकाळातील आठवणींवर तरंगत होते .तिला पहिली मुलगी झाली. खूप छान छोटीशी भावली सारखी! दिसायला छान गोरी पान मुलगी पाहून सर्वांनाच आनंद झाला. हळूहळू स्वप्निल संसारात रुळला होता. काही दिवस चांगले गेले. अचानक तिच्या सासूबाईंना पॅरॅलेसिस चा अटॅक आला. दवाखान्याच्या खर्चा पायी पुन्हा एकदा आर्थिक परिस्थिती खालावली. सुलभाने आता पदार्थ करून विकण्याचे काम सुरू केले. स्वप्निल ची फारशी मदत नसे. पण आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहत होती. सुलभा- स्वप्नील ची जुई आता तीन वर्षाची झाली होती. खूप गोड मुलगी होती ती! सुलभाला पुन्हा एकदा आई होण्याची चाहूल लागली.

या वेळेला मुलगा होऊ दे ,मग मात्र थांबू या.. असा त्यांनी विचार केला.

आयुष्याला कलाटणी मिळण्याचा तो दिवस उजाडला.. मुलगा झाला पण त्याचा आजार वेगळाच होता. त्याच्या पाठीचा कणा नीट नव्हता. त्यामुळे थोड्याच दिवसात लक्षात आले की तो आपल्या पायावर उभा राहू शकणार नाही.. सुलभा हादरली. ऑपरेशन साठी खूप खर्च येणार होता. सर्वांच्या मदतीने त्याचे ऑपरेशनही केले आणि तो कुबड्या घेऊन का होईना पुढे चालू शकेल इतपत त्याच्यामध्ये सुधारणा होईल, असे डाॅक्टरांनी सांगितले. एकंदर परिस्थिती आता कठीण झाली होती आणि स्वप्निल चा तर तिला काहीच आधार नव्हता! शेवटी नाईलाजाने मुलांना घेऊन सुलभा माहेरी परत आली.

माहेरी येऊनही सुलभाच्या परिस्थितीत फारसा फरक पडत पडला नव्हता. इकडे आल्यावर स्वतःची दोन मुले, पाठची बहीण भाऊ  आणि आई असं सर्व कुटुंब सुलभाला पाहावे लागत होते. तिने आता डबे करायला सुरुवात केली.

तसेच काही घरची पोळ्यांची कामे सुरू केली.

धाकटी बहीण,संगिता  18 वर्षाची झाली आणि तिच्या मामांनी तिच्या लग्नाचे पाहायला सुरुवात केली पण जेमतेम दहावी शिकलेल्या मुलीला चांगले स्थळ कुठून मिळणार? शहरात तर नाहीच, मग जवळपासच्या गावातील स्थळे पाहता पाहता एका साखर कारखान्याच्या गावाचे स्थळ कळले. मुलगा कारखान्यात क्लार्क म्हणून काम करत होता. एक आत्या त्याच्याजवळच राहत होती. ती अशीच नवरा गेल्याने माघारी आली होती. राहायला दोन खोल्या होत्या. अधून मधून आत्या तिथे येते एवढेच कळलं .. एरवी मुलगा एकटाच राहत होता असं कळलं होतं. मामा-मामी घर बघून आले. संगिताने मुलगा पसंत केला. त्या दिवशी आत्त्या तिथे आलेली होती, पण एकटीच आहे तेव्हा येत असेल म्हणून मोठ्या लोकांनी फारसे लक्ष घातले नाही. नातेवाईकांनी कुठे फारसे जायला नको, म्हणून लग्न ठरवून टाकले एक जबाबदारी संपली म्हणून! चार सहा महिने ठीक गेले .संगिताकडून बरेच दिवसात काही खुशाली कळली  नव्हती ,पण हळूहळू तिची घुसमट कुठेतरी बाहेर पडणारच होती. एकावेळी ती माहेरी निघून आली आणि तिने मामीला सांगितले की, ‘आत्त्या तिच्या नवऱ्याच्या घरी येऊन राहते आणि संगिताला फक्त घरकाम, भांडी धुणे करणारी मोलकरीण केले होते’. हे कळताच मामा, मामी प्रत्यक्ष तिच्या गावी गेले. चौकशी करता ते सर्व खरेच निघाले! बिचारी संगिता! मागच्या जन्मी आपण काय केले होते म्हणून असे आपल्या वाट्याला आले! संगिता माहेरी आली आणि सुलभावर आणखीन एक जबाबदारी येऊन पडली!

माहेरी येऊनही सुलभाच्या परिस्थितीत फारसा फरक पडत पडला नव्हता. इकडे आल्यावर स्वतःची दोन मुले, पाठची बहीण, भाऊ  आणि आई असं सर्व कुटुंब सुलभाला पाहावे लागत होते. तिने आता डबे करायला सुरुवात केली.

तसेच काही घरची पोळ्यांची कामे सुरू केली.त्यातच स्वतः च्या अपंग मुलाला सांभाळायचे! असं कुठलं नशीब घेऊन आली होती सुलभा की कुठूनच तिला सुख मिळत नव्हते!

धाकटा आनंदही फारसा हुशार नव्हता.. संगीता आणि आनंद दोघेही डाॅक्टर काकांकडे कामाला जात होते आणि पोटापुरते मिळवत होते.डाॅक्टरही सहृदयी होते, मुलांना आपणहून मदत करत होते.आई अशिक्षित आणि तिन्ही मुलांच्या अशा तीन तऱ्हा!त्यातच आईचे आजारपण सुरू झाले.तब्येतीने स्थूल आणि संधिवात यामुळे तिला काम तर होत नव्हते.शेवटी आजार वाढत गेला आणि आई गेली…

आई जाऊन आता पंधरा दिवस झाले.तिला  आई गेल्याचे दुःखही वाटत नव्हतं इतकं मन बधिर झाले होते. पोरकेपणाची जाणीव होत होती. आई काही करत नव्हती पण निदान घरात तिचे अस्तित्व तरी होते. आताही दोन भावंडे आणि दोन मुले यांना सांभाळत आपले पुढे कसे होणार हेच तिला कळत नव्हते! शेवटी काळाच्या हातचे भावले आहे आपण! जसं घडेल तसं घडेल! आपलीच कर्माची कहाणी! नशिबापुढे काही चालत नाही, खचून न जाता उभं राहायला पाहिजे या विचाराने सुलभा उठली.आणि घरातील पसारा आवरू  लागली.उद्यापासून कामे सुरू करू या! या सर्वांच्या तोंडात चार घास घालण्यासाठी तिच्यातील मोठी बहीण आणि मुलांची आई जागी झाली होती या एका मनोबळावर सुलभा उठली आणि घराला आवरू लागली!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments