सौ. स्वाती रामचंद्र कोरे
कवितेचा उत्सव
☆ विठ्ठल रुक्मिणी संवाद…. ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
(काव्य प्रकार – अभंग वाणी)
विठ्ठल उदास | एकादशी दिनी
विचारे रुक्मिणी |का हो नाथा? ||१||
मुख झाले म्लान | उदास ही वाणी
काय आले मनी | सांगावे जी ||२||
बोले विठुराया | कसे सांगू तुला
जीव आसुसला | भक्तांसाठी ||३||
आली महामारी | शांत झाली वारी
माझा वारकरी |घरी राहे ||४||
चंद्रभागा तिरी | नाद मृदंगाचा
भास हा मनाचा | सतावतो ||५||
ऐकुनिया बोल | रुक्मिणी वदली
चिंता ही कसली | नका करू ||६||
महामारी वेळी | वेश पालटून
रूप बदलून | लढलात ||७||
आरोग्य ,शिक्षण | साऱ्याच क्षेत्रात
तुम्हीच होतात | सर्वां ज्ञात ||८||
माझा विठुराया |पाठी उभा राहे
काळजी तो वाहे | विश्वास हा ||९||
भरवसा ठेवा | वेळ ही जाईल
पंढरी सजेल | पुनः पुन्हा ||१०||
रुक्मिणीचे बोल| मनास पटले
विठ्ठल हसले | गालातच ||११||
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈