श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ ध्यास… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
(व्योमगंगा)
☆
जोडलेले प्रेमधागे तोडता येणार का हो ?
वेदना मग काळजाला बांधता येणार का हो?
काळ वेडा धावणारा घेवुनी गेला सुखाला
सुखवणा-या परत वेळा मागता येणार का हो?
आतताई या मनाला वेगळी चिंता सतावे
संकटांच्या डोंगराना झेलता येणार का हो?
वचन होते जे दिले ते आजही आहेच ओझे
फार मोठा भार आहे पेलता येणार का हो?
कैदखाने तोडुनीया जाहल्या आहेत भेटी
वास्तवाच्या या कथांना सांगता येणार का हो?
श्वास झाला मोकळा पण ध्यास आहे कैद झाला
हा दुरावा तोडलेला जोडता येणार का हो?
चिखलकेला वेदनांचा अंतरंगी काळजाने
भावना जर उसळल्या तर मारता येणार का हो?
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈