श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ “नाच…” ☆ श्री आशिष मुळे ☆
झालं नाचून?… झालं ..
झालं वाजवून?… झालं ..
त्याने काय झालं?…
काहीच नाही झालं…..
कालच्या पाढ्याचं उत्तर
आजही पंचावन्नच आलं ..
आज इकडं दिवं लागलं
तिकडं गाव जळत राहिलं …..
इकडं तिरंगी साडी ल्यालं
तिकडं रस्त्यात लुगडं फेडलं ..
बोलणाऱ्याचं तोंड दाबलं
मुक्याचं मात्र भलतंच फावलं …..
येड्यांनी शाण्यांचं सोंग घेतलं
भ्रष्टचाऱ्याचं वजन भलतचं वाढलं ..
फकिराला मात्र देवच पावलं
गरीबाचं पोर गरीबच राहिलं……
© श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈