श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ ठिपका… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

युद्ध लादले जर नियतीने

नियतीशीही झुंजत राहू

अखेरच्या अन् चिंधीलाही

निशाण बनवत फडकत ठेऊ !

 

     आपण ओंजळ.. ते तर सागर

     न्यून कधी हे उरी न जपणे

     झुळझुळ मंजुळ..रौद्र गाज ती

     आपण गावे अपुले गाणे !

 

स्वप्नपंथ हा अग्निपंथही

दाह तरीही साहत राहू

जरी गगन ना कवेत आले

उरि नक्षत्रे तेवत ठेवू !

    

     जीवन ही तर गळकी घागर

     किती भरावी तरी रिती रे

     शापालाही उ:शापाची

     दैव देतसे कधी हमी रे

 

स्वत: पारचे विश्व विलक्षण 

दृश्य विहंगम त्याचे पाहू

रणे  नंदने  तीर्थस्थाने

सारे सारे ह्रदयी घेऊ !

 

     अपुल्यास्तव जे तमात जळले

     त्या दीपांना तारण जीवन

     ज्या ताऱ्याचा वसा घेतला

     अवघे जीवन त्यास समर्पण !

      

चिरंतनाचा गंध मृण्मया

देता देता विरून जाऊ

नक्षत्रांच्या रांगोळीचा

जाता जाता ठिपका होऊ !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments