सौ. गीता वासुदेव नलावडे
मनमंजुषेतून
☆ मुलांची आई… लेख क्र. ३ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
“मला माझ्या आईचा अभिमान वाटतो” हा इयत्ता चौथीतला शाळेतला वर्गाचा धडा शिकवण्याअगोदर, मी मुलांना त्यांच्या आईविषयी माहिती लिहून आणायला सांगितलं होतं. आज प्रत्येकाची माहिती वाचत होते. ऋजुता मोरेचा (नाव बदललेले) निबंध वाचायला घेतला. फक्त दहा ओळी माहिती लिहिली होती, परंतु ती सर्व माझ्यावर आधारित लिहिली होती.
सुरुवातच मुळी “नलावडे बाई माझी आई आहेत” अशी केली होती. मी कोणकोणते विषय शिकवते, कसे शिकवते, मुलांशी कसे वागते, शिक्षकांशी कसे वागते याचं वर्णन तिनं आपल्या मोडक्यातोडक्या भाषेत, पण व्यवस्थित केलं होतं.
तिला विचारले असता ती म्हणाली, “बाई, माझी आई नुकतीच वारली. मग मी कोणावर निबंध लिहिणार? तुम्ही नेहमी म्हणता – घरी जशी तुमची आई, तशी मी तुमची शाळेतली आई आहे. तुम्ही आमच्याशी आईसारखाच वागता म्हणून मी तुमच्यावर माहिती दिली. चालेल ना? ”
तिचं स्पष्टीकरण ऐकून मन भरून आलं. मुलं किती छोट्या छोट्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवतात आणि त्याचा छान अर्थही काढतात.
ऋजुता दुसरीत माझ्या वर्गात आली कारण ती त्या वर्षी नापास झाली होती. तिच्या वर्गशिक्षिकेचं म्हणणं असं की “तिच्या घरी कोणी अभ्यासाकडे लक्ष देत नाही आणि तीही अभ्यास करत नाही म्हणून ते नापास झाली”. कारण खरं होतं. तिची आई स्टेशनजवळ फुलं विकायला बसायची, या मुली तिच्यासोबत बसायच्या. रात्री दहा वाजेपर्यंत ती फुलं विकायची. आई स्वतः शिकलेली नाही, मग ती अभ्यास कसा करून घेणार?
ऋजूता मात्र दिसायला छान होती. सावळी, उंच, तरतरीत, मोठे मोठे डोळे. मला तिच्या दोन लांब सडक वेण्या छान विंचरून वर बांधलेल्या फार आवडत. वर्ग आवरायला, कचरा काढायला तिला खूप उत्साह असे.
नेहमी हसरी आणि प्रसन्न, पण मग अभ्यासात घोडं कुठे पेंड खातंय याचा शोध घ्यायचा, असं मी ठरवलं आणि त्याप्रमाणे प्रयोग सुरू केले.
दुसरीत ती प्रमोट पास झाली आणि पुढच्या वर्षी तिसरीत तिला खूप छान गुण मिळाले. माझा प्रयोग यशस्वी होत होता. आता तिचा ती स्वतः अभ्यास करत होती, छान गुण मिळवत होती. वेळोवेळी, न चुकता, तिच्या स्वच्छ व सुंदर उत्तरपत्रिका मी सर्व वर्गाला दाखवत होते.
आपलं कौतुक होताना पाहून ऋजुताच्या चेहऱ्यावर आनंदाचा चांदणं पसरलेलं पाहताना मी धन्य होत होते.
“मुलांना काहीच येत नाही” हे शिक्षकांनी म्हणणं याच्यासारखे लाजिरवाणी गोष्ट नाही. एका फ्रेंच तत्त्ववेत्याने म्हटलं आहे, “मुलांना खूप काही येत असतं परंतु मुलं शाळेत यायला लागली की त्यांची विचारशक्ती आम्ही खुंटवतो, आम्ही त्यांचे बोन्साय करतो”. प्रत्येक शिक्षकांनी याचा आवर्जून विचार करावा.
चार प्रेमाचे शब्द मुलांचा आत्मविश्वास जागृत करतात, त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण देतात, ऋजूताच्या निबंधाने मला एक वेगळा पण सुखद अनुभव आला.
मी तिला आई वाटले यातच माझ्या शिक्षकी पेशाचं सार्थक झालं.
क्रमशः दर गुरुवारी…
© सौ गीता वासुदेव नलावडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈