सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण…आई.. – भाग – ४४/१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आई..

मला आईची महानता तेव्हाच खऱ्या अर्थाने जाणवली जेव्हा मी स्वतः आई झाले. मातृत्व या शब्दाची, या व्याख्येची, भावनेची खरी व्याप्ती आणि जाणीव तेव्हाच झाली जेव्हा मी स्वतः आई झाले. तेव्हा कळलं “माता अनंताची” म्हणजे नक्की काय? मुलांना जन्म दिला की आई ही पदवी जरूर मिळते पण आईपण म्हणजे केवळ मुलाला जन्म देण्यापुरतंच नसून ते त्याच्या शारीरिक आणि मानसिक संगोपनात, जडणघडणीत, त्यास सुविचारी, संस्कारी करण्यात सामावलेलं असतं आणि ही आयुष्यभराची अखंड विस्तृत प्रणाली आहे. असं आईपण निभावताना जेव्हा जेव्हा माझी दमछाक झाली तेव्हा तेव्हा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात हेच उद्गार घुमले, ” आई! तू कसं केलंस गं? मला तर दोनच मुली आहेत. तू आम्हा पाचही बहिणींचं काटेकोरपणे संगोपन कसं केलस? आमची आजारपणं, रात्रीची जागरणं, आमच्या आवडीनिवडी, खाणंपिणं, वेण्याफण्या सतत आमच्यासाठी.. अगदी अंतर्वस्त्रांपासून ते सुंदर डिझायनर्स पोशाख शिवणे प्राथमिक वर्गातला अभ्यास घेणे, शाळेत जाताना आमचं दप्तर भरणं, मधल्या सुट्टीतला डबा देणं, त्यानंतरही आमच्या उमलत्या वयातले मूडस, शैक्षणिक टप्पे, प्रेमप्रकरणं, लग्नं, बाळंतपणं एक ना अनेक. तुझ्या या अफाट कार्याची यादी सुद्धा करणे मला जमणार नाही. प्रत्येक वयाचे टप्पे ओलांडताना तू आमच्याबरोबर खंबीरपणे असायचीस, डोळसपणे, जाणीवपूर्वक असायचीस म्हणूनच आमच्या जीवनातील अनेक वेगवेगळी वळणं आम्ही सहजपणे पार करू शकलो. तेव्हा मी तुला केवळ गृहीत धरले. आईपणा व्यतिरिक्त तुझ्यात असलेलं एक निराळं व्यक्तिमत्व आम्हाला तेव्हा ना कळलं ना कळून घेण्याची आम्हाला गरज वाटली. एक व्यक्ती म्हणून आयुष्याबद्दल तुझी काही निराळी कल्पना, विचार होते का हा कधी विचारही आम्ही केला नाही.”

आता उपकृत भावनेने जेव्हा मी आईचा विचार करते तेव्हा ती वेगवेगळ्या अनेक रूपात उलगडत जाते.

खरं म्हणजे विसाव्या शतकातला पूर्वार्ध म्हणजे १९२०/२१ चा काळ एकंदरच खूप वेगळा होता. विशेषतः स्त्रियांसाठी. त्या काळात आई ग्रँटरोडच्या “सेंट कोलंबस” या कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी होती. तिला मराठी सोबत इंग्रजीचेही उत्तम ज्ञान होते. शिवाय मुंबईसारख्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण नगरीत तिचे बालपण गेले. आजोबांची शिस्त, टापटीप आणि काहीसं पाश्चात्त्य पद्धतीचं वळण तिच्या नसानसात भिनलेलं होतं त्या तुलनेत, आईचं पप्पांशी लग्न झाल्यानंतरचं वातावरण खूप वेगळं होतं. ठाण्याच्या धोबी गल्लीतल्या, फारशा सुविधा नसलेल्या एकमजली घरात आणि ज्या घरात माझ्या आजीचा प्रभाव होता तिथे तिने स्वतःला कसे सामावून घेतले असेल? सुरुवातीला तर त्या घरात इलेक्ट्रिसिटी नव्हती, स्वयंपाकासाठी चूल होती, शेगडी होती. माझ्या आठवणीत चुलीवर गरमागरम भाकऱ्या करणारी आई अजूनही आहे. ज्या बोटांनी आईने अनेक सुंदर पेंटिंग्स केली होती, कित्येक विणकामं, भरतकामं केली होती त्याच हाताने चुलीतली लाकडं पेटवून अथवा सांजवेळी रात्र होण्याच्या आत कंदीलाच्या काचा पुसून घासलेट भरून वाती पेटवताना तिला कधी वैषम्य वाटले असेल का? की त्यावेळी आजूबाजूच्या बहुतांश स्त्रियांचे आयुष्य असेच होते…? “रांधा वाढा उष्टी काढा” याच समूहातले मग आपल्या आईने वेगळा सूर का लावला नाही हा विचार बालपणीतरी आमच्या मनात येण्याचा संभवच नव्हता आणि तिने जर वेगळा सूर लावला असता तर आमच्या आयुष्याचं काय झालं असतं या विचाराने आता माझ्या अंगावर काटा सरसरतो तेव्हा मातृत्वाची खरी व्याख्याही कळते.

वास्तविक त्या काळातही ती रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी करत होती. जात्याच ती खूप हुशार आणि मेहनती होतीच. मनात आणलं असतं तर तिने तिथे विशेष कामगिरी करून उच्चपदी पोहोचून स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य, ओळख आणि अस्तित्व मिळवलं असतं पण आमच्या जडणघडणीचं एक महत्त्वाचं “जूं” जणू तिच्या मानेवर तिनं पेललं आणि या सर्व स्वकेंद्रित जाणिवांतून ती सहजपणे बाहेर पडली.

“आई! खूप वेळा आणि या क्षणी मला एक अपराधी भावना स्पर्शून जाते. आमच्या संपूर्ण जडणघडणीवर पप्पांच्या विद्वत्तेचा, शिकवणीचा, त्यांच्या नाना प्रकारच्या आवडी आणि रसिकतेचा पगडा निश्चितच आहे. तसेच जिजी म्हणजे आमची आजी.. जिच्या मायेच्या अखंड प्रवाहाची शीतलता आम्ही आयुष्यभर अनुभवली आणि नकळत का होईना आमच्या मनी सतत जिजी आणि पप्पांच्याच आठवणी सहजपणे येत असतात पण खरं म्हणजे जिजी आणि पप्पा आमच्यासाठी संरक्षक भिंती होत्या तर तू आमचं छत होतीस.”

आईला जेव्हा मी निराळेपणाने पाहते तेव्हा जाणवते ती आईची मुळातली सौंदर्यदृष्टी. जिजी आणि पप्पांच्या मधली आई एक व्यक्ती म्हणून फार वेगळी होती. त्याचं कारण तिच्या जडणघडणीची पार्श्वभूमीच निराळी होती. तरीही तिने कधीही कसलाही अहंकार बाळगला नाही. सासू म्हणून तिने जिजीला आणि पती म्हणून पप्पांचा तिने सतत मान राखला आणि समांतरपणे तिने तिची शिस्त, टापटीप, स्वच्छता, घर अडचणीचं असलं तरी कसं सुंदर राखावं याचे धडे नकळत आम्हाला गिरवायला लावले.

“आई रागवेल, आई ओरडेल आईला हे आवडणार नाही” हे भय आम्हाला अनेकदा जिजीच्या कुशीत शिरायला लावायचं पण आईच्या धाकदपटशाने आमच्या आत, कुठेतरी सैरावैरा मोकाट वाढलेलं गवत माळ्याने कात्रून छान आकार द्यावा तसा आकार आम्हाला नक्कीच मिळवून दिला. आईच्या प्रेमाची आणि जिजीच्या मायेची जातच वेगळी होती आणि आज मी या दोघांचं महत्त्व जाणते कारण मी एक आई आणि एक आजी याचा भिन्नपणे या दोन्ही भूमिका जगताना विचार करू शकते. आई आईच असते आणि आजी आजीच असते. दोघीही फक्त प्रेमच करतात पण दोघींच्या प्रेमाचे रंग वेगळे असतात.

सुट्टीच्या दिवसात आई आम्हाला विणकाम, भरतकाम, पेंटिंग्स करायला शिकवायची. एकदा मी विणलेली एक कलाकृती पाहून ती मला म्हणाली, ” हे काय असं विणून ठेवलेस? किती सैल आहे ते? सुईवरचे टाके घट्ट टाकले की वीणही घट्ट होते. मग टाके असे सुटत नाहीत. सारं उसवून पुन्हा विणायला घे. ” आईचं हे सहजपणे उच्चारलेलं वाक्य माझ्यासाठी कायम ब्रह्मवाक्य ठरलं. आयुष्यातली अनेक नाती जपताना माझी जेव्हा जेव्हा होरपळ झाली तेव्हा आईचे हे शब्द नेहमीच कानी राहिले. नात्यांची वीण कशी घट्ट ठेवावी याची महान शिकवण आईने आम्हाला वेळोवेळी दिली ती तिच्या वागण्यातूनही. तिने सासरची माहेरची सगळी नाती प्रेमपूर्वक आणि कर्तव्य बुद्धीने सुद्धा जपली.

आईच्या आणि जिजीच्या नात्यातला घट्टपणा आणि ठिसूळपणा दोन्हीही गंमतीदार होता. जिजीने आईवर आणि आईने जिजीवर मनापासून प्रेमच केलं. दोघींच्यात मतभेद होत, खटके उडत पण आईला कधी कुठून घरी परतायला उशीर झाला तर जिजी लगेच देव पाण्यात ठेवायची. ” का गं? मालू रस्ता तर चुकली नसेल ना? ” असं सतत आम्हाला विचारत राहायची. आईच्या बाबतीत ते खरंही होतं. आईला कधी कधी पटकन रस्ते समजायचे नाहीत. एकदा तर ती “ढग्यांचं घर कुठे आहे? ”… तेव्हा आम्ही नुकतेच नवीन घरात राहायला गेलो होतो.. असं विचारत घरी पोहचली होती. हा विनोदाचा भाग वगळला तरी जिजीला आई विषयी वाटणारी काळजी विलक्षण होती. आईला ही जिजीचं कितीही पटलं नाही तरी तिने जिजीच्या मनाविरुद्ध किंवा तिला विचारल्याशिवाय कधीही काहीही केले नाही. या पाठीमागे आईच्या मनात जिजीविषयी एक कृतज्ञतेचा भाव नक्कीच होता. वयाच्या सोळाव्या वर्षी वैधव्य आलेल्या या स्त्रीने एक तपस्विनीची भूमिका अंगीकारून चार महिन्याच्या तिच्या मुलाला एक परिपूर्ण जीवन बहाल केले होते आणि आज जे काही आम्ही सारे आहोत ते केवळ तिच्यामुळेच ही भावना आईच्या मनातून कधीही पुसली गेली नाही. नकळत आईने एक प्रकारचा सगळ्यांना जोडून राहण्याचा, समजून घेण्याचा संस्कार आम्हाला दिला. पप्पांची सगळी जीवाभावाची नाती तिने त्याच आंतरिक भावनेने जपली. आई जेव्हा गेली तेव्हा पप्पांचा धाकटा मावस भाऊ ज्याला आम्ही “पपी” म्हणायचो तो डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला, “आज आम्ही खरे पोरके झालो! आई जाण्याचं दुःख काय असतं हे आज कळतंय. ”

– क्रमशः भाग ४४ / १ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

राधिका ताई आजचं आईवरचं फारच सुंदर!खरं! खूप सुंदर भावना व्यक्त केल्या आहेत.