मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित कथा – उन्नत क्षण… लेखक – केंट नेर्बर्न – अनुवादक – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री सुनीत मुळे ☆

? जीवनरंग ?

☆ अनुवादित कथा – उन्नत क्षण… लेखक – केंट नेर्बर्न – अनुवादक – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री सुनीत मुळे ☆ 

(The Last Cab Ride by Kent Nerburn A deeply moving story about a magical night encounter between a taxi driver and an elderly woman.)

त्या घरापाशी टॅक्सी नेऊन थांबवली, हॉर्न वाजवला

आणि बरीच मिनिटं थांबलो

 

शेवटी उतरून दारापाशी जाऊन कडी वाजवली

 

“आले, आले..”

एक कापरा, वृद्ध आवाज आणि फरशीवरून काहीतरी ओढल्याची जाणीव

 

बर्‍याच वेळाने दार उघडलं

नक्षीकामाच्या झग्यात आणि फुला-फुलाच्या हॅट मधली

चाळीस सालच्या चित्रपटातून उतरून आलेली

एक नव्वदीची वृद्धा

 

हातातल्या दोरीमागे नायलॉनची बॅग

आणि त्यामागे एक आवरलेलं, स्तब्ध शांततेतलं निर्मनुष्य घर

बिनभांड्यांचं स्वयंपाक घर, आणि बिन घड्याळाची भिंत

 

“माझी बॅग नेणार का उचलून गाडीत?”

 

मी एका हातात बॅग घेऊन दुसर्‍याने त्या वृद्धेला हात दिला

“थॅंक यू!”

“त्यात काय मोठंसं, मी नेहेमीच करतो अशी मदत

माझ्या आईलाही इतरांनी असंच वागवावं म्हणून.”

 

“किती छान बोललास रे बाबा! थॅंक यू!”

 

तिने पत्ता दिला मला, आणि म्हणाली

“आपण शहरातून जाऊयात का?”

“ते लांबून पडेल..”

“पडू देत रे, मला कुठे घाईये..

वृद्धाश्रमात जातेय मी, आता तोच स्टॉप शेवटचा !”

 

मी आरश्यातून मागे पाहिलं

तिचे ओले डोळे चकाकले

“माझं कुणी राहिलं नाहीये…

आणि डॉक्टर म्हणतात

आयुष्यही फार राहिलं नाही”

 

मी हात लांबवून मीटर बंद केलं

 

“कुठून जावूयात?”

 

पुढचे दोन तास आम्ही शहरभर फिरलो

गल्ल्या-बोळातून, हमरस्त्यांवरून

ती कुठे काम करायची ते तिनं दाखवलं

ती आणि तिचा नवरा लग्न करून रहायला आले

ते घर दाखवलं

एका जुन्या गोदामापुढे गाडी थांबवून म्हणाली

“पूर्वी इथे नृत्यशाळा होती, मी नाचले आहे इथे”

काही ठिकाणी नुसतीच कोपर्‍यावर टॅक्सी थांबे

ती टक लावून इमारतीकडे पाही, अबोलपणे

मग खुणेने “चल” म्हणे

 

सूर्य मंदावला

“थकले मी आता, चल जाऊयात”

 

आम्ही अबोल्यात वृद्धाश्रमात पोहोचलो

टॅक्सी थांबताच दोन परिचारक पुढे आले

तिला व्हीलचेअर मध्ये बसवून तिची बॅग घेते झाले

तिने पर्स उघडली, “किती द्यायचे रे बाळा?”

“काही नाही आई, आशीर्वाद द्या.”

 

“अरे तुला कुटुंब असेल. आणि पोटा-पाण्याची…”

“हो, पण इतर प्रवासीही आहेत, होईल सोय त्याची”

खाली वाकून म्हातारीला जवळ घेतलं

आणि चटकन् टॅक्सीत बसलो, डोळे चुकवत..

“मला म्हातारीला आनंद दिलास रे, सुखी रहा!”

 

व्हीलचेअर फिरली, गाडी फिरली

माझ्या मागे दार बंद झालं

तो आवाज एका आयुष्याच्या बंद होण्याचा होता

 

उरल्या दिवसभर मी एकही प्रवासी शोधला नाही

शहरभर फिरत राहिलो

असाच विचारांत हरवून

 

माझ्या ऐवजी, पाळी संपत असलेला एखादा

चिडका ड्रायव्हर भेटला असता तर..

मीही स्वतःच, एकदा हॉर्न वाजवून, निघून गेलो असतो तर..

 

मला जाणवलं, मी काही खास केलं नव्हतं,

 

उन्नत क्षण आपण शोधून मिळत नसतात

ते क्षण आपल्याला शोधत येतात

 

आपण फक्त जागं असलं पाहिजे!

 

मूळ अंग्रेजी कथा – The Last Cab Ride by Kent Nerburn

अनुवादक – अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी… लेखिका – सुश्री प्राची पेंडसे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी… लेखिका – सुश्री प्राची पेंडसे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

सरला स्मशानातील एका कोपर्‍यात असलेल्या बाकावर बसून हे सर्व पाहात होती. खरंतर खानापूर सारख्या छोट्याशा खेड्यात हे प्रथमच घडत होते. ती मोठ्या हट्टाने कोणाचे न ऐकता इकडे आली होती. तिला शेवटपर्यंत “श्री” ला सोबत करायची होती.

सरणावर लाकडे रचली. त्यावर फुलांनी सजवलेला श्री चा निष्प्राण देह ठेवला. भटजींनी मंत्रघोष म्हटल्यावर राघवने चितेला अग्नी दिला. चितेच्या ज्वाळा जशा आकाशाला भिडू पाहात होत्या, तसतसे सरला आणि श्री मधील ऋणानुबंधाचे धागे तटातटा तुटत होते. आतून पार मोडून गेलेली ती तशीच निश्चल बसून होती. एका नव्हे तर दोन जन्मांचे ऋणानुबंध होते ते..

सगळे सोपस्कार पूर्ण करून राघव आणि सुदीप तिच्यापाशी आले. सुदीप म्हणाला, “चल काकू, तू सगळे निभावलेस. आता आपण मुंबईला परत जाऊ.” त्यावर राघव म्हणाला, “असं कसं काकू, आधी तुम्ही घरी चला.”

क्षणभर विचार करून सरला सुदीपला म्हणाली, “मी काय म्हणते, ईथवर साथ दिलीच तर दिवसवार करूनच परत फिरेन. तू घरी परत जा. पण दिवसांना मात्र ये हो.”

मोठ्या जड अंतःकरणाने माझा निरोप घेऊन सुदीप ‘दिवसांना येतो’ म्हणून सांगून परत फिरला..

धूळ ऊडवित त्याची गाडी गेली त्याच दिशेने बघत सरलाचे मनही पार भूतकाळात गेले.

त्या काळानुसार अगदी बघून सवरून सरला आणि श्री चे लग्न ठरले. सरला पेठेची सौ. सरला श्रीधर सहस्रबुद्धे झाली. सरला फिजिक्स ची प्रोफेसर तर श्री चार्टर्ड अकाऊंटंट. कोणालाही हेवा वाटावा अशी जोडी.

तसे म्हणायला गेले तर एकत्र पण सगळे शेजारी शेजारीच राहात. त्यांची शिवाजीपार्क ला स्वतःची पिढीजात बिल्डिंग होती.. सगळं चांगलंच होतं. पण काहीतरी कमी असल्याशिवाय माणसाला वरच्याची कशी आठवण राहाणार? लग्नाला खूप वर्ष झाली तरी त्यांची संसारवेल फुलली नव्हती. पण तरीही खाली वर भाचे पुतणे जीवाला जीव देणारे होते. ‘सुदीप’ हा तर सगळ्यात आवडता पुतण्या..

चाके लावल्यागत दिवस पळत होते. दोघांचीही रिटायरमेंट जवळ येत होती आणि अचानक करकचून ब्रेक लागावा तसेच झाले. एका छोट्याच अपघाताचे निमित्त झाले आणि श्री ची शुद्धच हरपली. सेमी कोमाची स्टेज.. सर्व डाॅक्टरी तपासण्या झाल्या. सर्व व्यवहार थांबले होते पण ब्रेन डेड नव्हता. एक क्लाॅट होता..

सरलाने कंबर कसली.. मदतीला आणि श्री चे करायला एक अर्धा दिवस माणूस ठेवला. तिची रोजची सगुणा होतीच, शिवाय जाऊन येऊन मुलं असायचीच. सुदीपचा खूप मोठा आधार वाटायचा तिला.

श्री चे सगळे ती करायची. त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून नळीद्वारे खाऊ घालायची. सगळे घडलेले त्याच्याशी बोलायची. स्वतःचे आयुष्य त्याच्याशीच बांधून घेतले. दुसरे विश्व नाही. त्याला यातून बाहेर काढणार हाच आत्मविश्वास आणि आत्मनिर्धार..

सहा महिने झाले.. आणि एक दिवस रस्त्यावर काहीतरी झाले. कानठळ्या बसतील असा मोठा आवाज झाला.. आणि त्या आवाजाने की आणखी कशाने कोण जाणे, श्री झोपेतून जागे व्हावे तसा जागा झाला. सरलाचा आनंद गगनात मावत नव्हता. पण तो क्षणिकच ठरला.

श्री डोळे ऊघडून सगळेच अनोळखी असल्यागत पाहात होता. ओरडत होता.. पण त्यातले अक्षरही सरलाला कळत नव्हते.

“ना यल्ले इद्रत्ती ? ना यल्ले ईद्रत्ती ?”

आवाज ऐकून आमची सगुणा धावत आली.. आणि एकदम म्हणाली, “अय्यो, साहेब कानडीतून विचारत आहेत, ‘मी कुठे आहे?मी कुठे आहे?”

सरलाने तर तिला वेड्यातच काढले. त्याचा आणि कानडीचा काडीमात्र संबंध नव्हता.. पण गडबड खासच होती.

सरलाला, सुदीपला किंवा कोणालाच श्री ओळखत नव्हता. जसा काही तो इथला कधी नव्हताच. सगुणा कानडी होती म्हणून तिला समजले तरी..

मी एक प्रयोग म्हणून तिला त्याच्याशी बोलायला सांगितले.. तर तो खूष होऊन आपणहून बोलू लागला.. नन्ने होसरू रामभट्ट (माझे नाव रामभटजी आहे.) अर्धांगिनी हेसरू जानकी (बायकोचे नाव जानकी) इवनु नम्म् मगा राघव (मुलाचे नाव राघव) नावु खानापूर दाग भटगल्ली (खानापूरच्या भटगल्लीत घर). सगुणा आमची दुभाषी बनली.

माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती.. त्याच्याशी आमचा ओळखदेख असा काही संबंधच नव्हता.. त्याची काळजी आम्ही घेत होतोच, नाईलाजास्तव तो ही बिनबोलता करून घेत होता. सगुणा आली की एकच धोशा तिच्याकडे करायचा की ‘मला घरी नेऊन सोड’. ती ही बिचारी त्याची कशीबशी समजून काढायची..

प्युअर सायन्स ची प्रोफेसर मी हतबल होऊन जो कोणी काही सांगेल ते ऊपाय करायला लागले होते. बाहेरची बाधा काय, भूत पिशाच्च काय आणि काय काय.

शेवटी एकदा सगुणा च्या आणि सुदीपच्या डोक्यात आले की तो जो पत्ता सांगतोय तिकडे तरी एकदा जाऊन पाहावे.

मी आणि सुदीप शोध घेत थेट कर्नाटकातील धारवाड जवळील खानापूरला भटगल्लीत जाऊन थडकलो.. राघवची चौकशी केली. त्याच्या घरी पोचलो तर धरणी या क्षणी मला पोटात घेईल तर बरे असे मला झाले.

त्यांचा मोठा वाडा होता. बाहेरच्या ओटीवरच पंचेचाळीशीच्या श्री चा फोटो टांगलेला होता. शेजारचा फोटो जानकी वहिनींचा होता.. राघवकडे अधिक चौकशी करता कळले की तो पंधराच्या आसपास असताना त्याचे वडील रामभटजी, जे दशग्रंथी ब्राह्मण होते, ते गेले आणि वर्षभरातच आई गेली.

आम्ही त्याला आत्ताचा श्री चा फोटो दाखवला. तेव्हा त्याने तो चट्कन ओळखला.. बापरे कधी कुठे घडलेले ऐकले नव्हते ते आम्ही याची देही याची डोळा अनुभवत होतो. हा श्री अपघातानंतर थेट आपल्या पहिल्या जन्मात जाऊन पोचला होता..

पुढे काय, मोठ्ठे प्रश्नचिन्ह ऊभे होते. राघव आणि त्याची बायको राधा खूपच सालस होते.. त्यानेच एक ऊपाय सुचवला. “जे झाले ते अजबच आहे. केमिकल लोच्या म्हणूया हवंतर. आमच्या वाड्यात एक घर (खोली) आहे. त्यांना अशा अवस्थेत अधिक त्रास न देता काही दिवस तुम्ही येऊन राहा. पुढचं पुढे पाहू”.

या विचित्र परिस्थितीत अन्य काही मार्गच नव्हता. राघव आणि सुदीपच्या मदतीने आमचे बस्तान आम्ही थेट खानापूरला हलवले.. दैवगती ने आम्हाला कुठून कुठे आणून सोडले होते.. सुरवातीला काही दिवस सगुणाही आमच्यासोबत राहिली. तिच्याकडून मी कितीतरी कानडी शब्द शिकले..

हाच का तो श्री हेच कळत नव्हते. जेमतेम रामरक्षा येणारा श्री स्त्रीसुक्त, पुरुषसूक्त आणि कित्येक संस्कृत श्लोक मुखोद्गत म्हणायचा. एक मात्र होते, सर्वांनाच सांगायचा “ई अम्मा बहळ ओल्ले. यवरू नन्न बहळ छंद सेवा माडतारे.. (म्हणजेच ‘या बाई (मी) माझी चांगलीच काळजी घेतात..) चला एवढी त्या जन्मातली पोचपावती या जन्मातही मिळाली होती.. जन्मोजन्मीचा ऋणानुबंध ….

राघवला आपले वडील आणि राधाला आपले सासरे मिळाल्याचा आनंद होता.. गावातले जुने जाणतेही लोक श्री ला की त्यांच्या रामभटजीःना येऊन गप्पा मारून जात. विशेष म्हणजे हे या जन्माचे गेल्या जन्मातले आक्रित सर्वांनीच स्वीकारले होते. कारण संशयाला कुठे जागाच नव्हती. अगदी बारीक सारीक तपशिलासह सर्व संदर्भ जसेच्या तसेच होते..

साधारण सहा महिन्यात आम्ही पूर्ण खानापूरवासी झालो. अगदी क्षुल्लक आजाराचे निमित्त होऊन राघवाच्या मांडीवर त्याने शेवटचा

श्वास घेतला. योगायोगाची गोष्ट ही की नेमका सुदीपही जवळ हजर होता. जबरदस्त ऋणानुबंध. …

“काकू, गरम चहा केलाय. थोडा घ्या. बरं वाटेल.” सरला भानावर आली. वर्तमानात आली.. समोर राघव होता. “आता तुम्ही ईथेच राहायचे..”

याला काय म्हणायचे???जन्मोजन्मीचे ऋणानुबंध…….. या ऋणानुबंधाची साधी नव्हे तर बसलेली घट्ट निरगाठ अशी सुटली होती.. देवाची आणि दैवाची लीला अगाध होती…

लेखिका –  सुश्री प्राची पेंडसे

मो 9820330014

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला आवडलेली बोधकथा… भाग -2 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

मला आवडलेली बोधकथा… भाग -2 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

(आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव टाकले, आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे. माझ्या हातात ते सुपूर्द करून औषधी घेण्याची विधी आपण समजावलीत.” )

इथून पुढे —

“मी ताबडतोब ती औषधी घेतली. कारण त्याच्यामागे फक्त आपल्याला काही पैसे देणे हा उद्देश होता. परंतु आपण पैसे घेण्याला नकार दिला. ‘बस, ठीक आहे’ म्हणालात. जेव्हा मी आग्रह केला तेव्हा आपण म्हणालात की ‘ आजचे खाते बंद झाले आहे.’  मला काहीच समजले नाही. परंतू  या दरम्यान आपल्याकडे एक व्यक्ती आला. त्याने आपली चर्चा ऐकून मला सांगितले की, “ आजचे खाते बंद झाले म्हणजे वैद्य महाराजांना आजच्या दिवसाची घरेलू खर्चासाठी लागणारी राशी, जी त्यांनी भगवंताला मागितली होती, तेवढी भगवंताने त्यांना रोग्यांमार्फत दिली आहे. त्याशिवाय ते अधिक पैसे कुणाकडूनही घेत नाही. “ 

मी काहीसा परेशान झालो कारण मी माझ्या मनानेच लज्जित झालो. माझे विचार किती निम्न होते आणि हा सरलचित्त वैद्य किती महान आहे. मी जेव्हा घरी जाऊन पत्नीला औषधि दाखवली आणि सारा प्रसंग तिच्यासमोर उभा केला तेव्हा तिला भगवतदर्शनाचा आनंद झाला, तिच्या डोळ्यातून पाणी आले, मन भरून आले, आणि ती म्हणाली “ ते वैद्य म्हणजे कुणी व्यक्ती-माणूस नसून माझ्यासाठी तो देवतारूप माध्यम बनून आला आहे. आजवर एवढी सारी औषधी घेतली, एवढे वैद्य, हकीम, डॉक्टर झाले, आज मला माझ्या मनीची इच्छा पूर्ण करणारा भगवंत या वैद्याच्या रूपाने, या औषधी स्वरूपाने भेटला आहे. हे औषध माझ्या संततीसुखाचे कारण आहे, आपण दोघेही श्रद्धेने हे औषध घेऊ यात. “

कृष्णलाल वैद्याला पुढे सांगू लागला, “ आज माझ्या घरी दोन फूले उमलली आहेत. आम्ही दोघे पति-पत्नी हरघडीला आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. इतक्या वर्षात व्यवसायामुळे मला वेळच मिळत नव्हता की  स्वतः येऊन आपल्याला धन्यवादाचे  दोन शब्द बोलावे म्हणून. इतक्या वर्षांनी आज भारतात आलो आहे आणि कार केवळ आणि मुद्दाम इथेच थांबवली आहे.” 

“ वैद्यजी आमचा सारा परिवार इंग्लंडमध्ये सेटल झाला आहे. केवळ माझी एक विधवा बहीण आणि तिची मुलगी इथे भारतात असते. आमच्या त्या भाच्चीचे लग्न या महिन्याच्या २१ तारखेला होणार आहे. का कोण जाणे जेव्हा-जेव्हा मी आपल्या भाच्चीसाठी काही सामान खरेदी केले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपली ती छोटीशी मुलगी यायची, आणि मग प्रत्येक सामान मी डबल खरेदी करायचो. मी आपल्या विचारांना, तत्वाला, मूल्यांना जाणत होतो, की संभवतः आपण हे सामान न घेवोत, परंतू असे वाटत होते की माझ्या सख्ख्या भाच्चीच्याबरोबर मला नेहमी जो चेहरा दिसत आहे, ती पण माझी भाच्चीच तर आहे. माझे तिच्याशी एक नाते त्या भगवंताने असे जोडले आहे, आणि म्हणून आपण त्या नात्याला नकार देणार नाही, कारण माझ्या भाच्चीबरोबर या भाच्चीचा ‘भात भरण्याची’ माझी ज़िम्मेदारी त्याने मला दिली आहे.”

वैद्याचे डोळे आश्चर्याने उघडेच्या उघडेच राहिले आणि सौम्य आवाजात म्हणाले, ” कृष्णलालजी, आपण जे काही म्हणत आहात ते मला काहीच समजेनासे झाले आहे, ईश्वराची काय माया आहे हे त्याचे तोच जाणे. आपण माझ्या ‘श्रीमती’च्या हाताने लिहिलेली ही चिठ्ठीबघा ” असे म्हणून वैद्यांनी ती चिठ्ठी कृष्णलालजींना दिली. —– तिथे उपस्थित सारे ती चिठ्ठी बघून हैराण झाले, कारण ” लग्नाचे सामान” याच्यासमोर लिहिले होते ”हे काम परमेश्वराचे आहे, त्याचे तोच जाणे “

कंपित आवाजात वैद्य म्हणतात, ” कृष्णलालजी, विश्वास करा की, आजपावेतो कधीही असे झाले नाही की  पत्नीने चिठ्ठीवर आवश्यकता लिहिली आहे आणि भगवंताने त्याची व्यवस्था केली नाही. आपण सांगितलेली  संपूर्ण हकीकत ऐकून असे वाटते की भगवंताला माहित होते की, कोणत्या दिवशी माझी श्रीमती काय लिहिणार आहे. अन्यथा आपल्याकडून इतक्या दिवस आधीपासून या सामान खरेदीचा आरंभ परमात्म्याने कसा करवून घेतला असता?–वाह रे भगवंता, तू महान आहेस, तू दयावान आहेस. मी खरंच हैराण आहे की, तो कसे आपले रंग दाखवतो आहे.”

चातकाची तहान किती | तृप्ति करूनि निववी क्षिती ||१||

धेनु वत्सातें वोरसे | घरीं दुभतें पुरवी जैसें ||२||

पक्कान्न सेवुं नेणती बाळें | माता मुखीं घालीं बळें ||३||

एका जनार्दनीं बोले | एकपण माझें नेलें ||४||

वैद्यजी पुढे म्हणतात, ” जेव्हापासून मला समजू लागले, केवळ एकच पाठ मी वाचला आहे. सकाळी उठून तुझी भक्ती करण्यासाठी मी अजून जिवंत आहे, म्हणून त्या परमात्म्याचे आभार मानायचे, संध्याकाळी आजचा दिवस चांगला गेला म्हणून त्याचे आभार मानायचे, खाताना, झोपताना, श्वास घेताना, असा हरघडीला त्याचे स्मरण करायचे, त्याचे आभार मानायचे. 

दळिता कांडिता | तुज गाईन अनंता ||१||

न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी ||२||

नित्य हाचि कारभार | मुखी हरि निरंतर ||३|| 

मायबाप बंधुबहिणी | तू बा सखा चक्रपाणि ||४|| 

*लक्ष लागले चरणासी | म्हणे नामयाची दासी |५||

— समाप्त —

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोहोर फाल्गुनीचा ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ मोहोर फाल्गुनीचा ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

संपत न्याहरी करून उठतच होता आणि त्याचा मोबाईल वाजला. सुनंदाचा त्याच्या मोठी बहीणीचा फोन होता मिरजेहून. ‘संपत, अरं उद्या होळीला येतंय मी घरला, सांगलीला. तुझ्या दाजींचं जरा तिकडं काम हाय आणि लेकरांना पण दोन दिवस सुट्टी! म्हणलं चला मामाकडे जाऊ होळीला.’

‘ बरं बरं या की! आमी वाट बघतो मंग!’ असं म्हणून संपतनं फोन ठेवला. एवढ्या सकाळी कोणाचा फोन म्हणून आईनं विचारलंच.’ ताई आणि दाजी येतात इथं उद्या होळीला, लेकरांसंगट! दाजींचं काय काम हाय म्हणं इकडं ‘, सांगताना नाराजीची एक आठी

संपतच्या कपाळावर नकळत उमटलीच.’ पोरांना बी सुट्ट्या हायेत दोन दिस. ‘

‘ अग, शालू, सारजा, सुनंदा येतेय ग उद्या होळीला! हौसाबाईंनी आपल्या दोन्ही सुनांना आवाज दिला.

‘येऊ द्या की ‘, असं सासूला म्हणताना,

‘पुरणा-वरणाचा बेत कराय लागणार ‘, दोघी जावांची नेत्रपल्लवी झाली. ‘

खरंतर सुनंदा एकुलती एक लाडकी बहिण! दोन्ही वहिन्यादेखील, माहेरवाशिणीचं कोण कौतुक करायच्या. पण आता परिस्थितीच अशी झाली होती.

हौसाबाईंना तीन मुलं! थोरला शंकर, मग सुनंदा आणि धाकटा संपत. सुनंदाचं सासर मिरजेला. तिच्या घरी भरपूर शेतीवाडी होती. हळदीचा व्यापार जोरात होता. त्यांच्या मसाला कांडायच्या दोन गिरण्यापण होत्या. जावई सुभाष, एकुलता एक मुलगा, त्यामुळे पैशाला तोटा नव्हता. मंगेश आणि मीना, बारा आणि दहा वर्षांची दोन लेकरं आणि सासू-सासरे अशी मोजकी माणसं घरात!

हौसाबाईंच्या नवऱ्याचं बबनरावांचं चार वर्षांपूर्वी  निधन झालं. कोणाच्यातरी पिसाळलेल्या खोंडानं धडक दिली. त्याचं शिंग छातीत खुपसलं. घाव वर्मी लागला. औषधोपचारात खूप पैसा खर्च झाला. मुंबईच्या मोठ्या इस्पितळात नेऊन शस्त्रक्रिया केली. पण कश्याचा उपयोगच झाला नाही.

शंकर आणि संपत घरची शेती बघायचे. सलग दोन वर्षे अवकाळी पाऊस आणि गारपीट… कापसाच्या शेतीची पार वाट लागली. हातातोंडाशी गाठ पडणं मुश्किल झालं. हे कमीच होतं म्हणून की काय कोरोनाच्या पहिल्या लाटेत शंकर सापडला. होता नव्हता तो सर्व पैसा पणाला लागला. शंकर काही वाचला नाही.

संपतच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला.

नवरा आणि मुलगा, दोघांच्या पाठोपाठ झालेल्या मृत्यूने हौसाबाई अगदी खचून गेली होती. जमेल तसं थोडंफार काम रेटत होती.

कोरोनामुळे सगळीच दाणादाण उडाली होती. मजूर नाही, त्यात हवामानही लहरी. उत्पन्न जवळजवळ शून्य आणि घरात सात माणसं! हौसाबाई, शंकरची बायको सारजा, पंधरा वर्षांची मुलगी सुनिता, संपत,त्याची बायको शालू आणि मुलगा श्रीपती! २ एकर जमीन पतपेढीकडे गहाण पडली, कर्जाचे हप्ते भरणंही कठीण झालेलं.

दहावी पास झालेली सुनिता पैश्याअभावी पुढचं शिक्षण घेऊ शकत नव्हती. आईसोबत परसदारी भाजीपाला पिकवून ती घरखर्चाला थोडा हातभार लावत होती. श्रीपती सातवीत शिकत होता. शालू घरकाम सांभाळून, आजकाल साडीच्या फाॅलबिडिंगचं काम करून चार पैसे जोडत होती.

या परिस्थितीत सणवार कसे साजरे करणार? म्हणून सुनंदाताईंच्या येण्याचा म्हणावा तसा आनंद कोणालाच झाला नव्हता. शिवाय माहेरवाशीण  म्हटलं की तिला साडीचोळी, जावयाला कपडा, मुलांना काही-बाही घेणं आलंच.सुनंदाताईचा स्वभावही थोडा चिकित्सक! त्यामुळे त्यांना आवडेल अशी साडीही भारीतलीच घ्यायला हवी. सणासुदीला पाहुणे म्हणजे जेवायला चार पदार्थ करायला हवेत. हा जास्तीचा  खर्च आत्ता या कुटुंबाला झेपणारा नव्हताच. तरी बरं जावई बुवांनी कोणत्या महाराजांची दिक्षा घेतल्यामुळे,  शाकाहारी होते.

हौसाबाईंनाही या परिस्थितीची जाणीव होतीच. मग शालू आणि सारजाबरोबर बातचीत करून, शालूच्या माहेरहून भाऊबीजेला आलेला संपतसाठीचा सदरा जावयाला द्यायचं ठरलं. बाजारातल्या चोरडिया मारवाड्याकडून साडी उधारीवर आणायचं ठरलं. शालू त्यांच्याकडूनच फाॅलबिडिंगचं काम आणायची. पुरणपोळीच्या सामानासाठी किराणा उधारीवर आणावा लागणार होता. कसंतरी जुगाड करायचं झालं!

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी शालू-सारजा पुरणपोळ्या करत असतानाच सुनंदाताई आणि कुटुंबीय अवतरले. होळीची पूजा, नैवेद्य होऊन जेवणंही

हसत-खेळत पार पडली. रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्टी रंगल्या.पोरं एकमेकांत गुरफटली. सकाळी नाश्ता करून जावई कामासाठी रवाना झाले.

मग दोन्ही सुना आपल्या रोजच्या कामात गुंतल्या. माय-लेकीचं हितगुज सुरू झालं.  दिराच्या उपचारासाठी शालूने आपलं स्त्रीधन सुद्धा गहाण ठेवलं होतं, घेलाशेठ सावकाराकडे. सारजाने आपले मोजके दोन -चार डाग होते, ते पण विकले होते. आडवळणाने हौसाबाईनी लेकीला परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या कानात  ते शिरलं की नाही कोण जाणे!

दुपारची जेवणं झाली. जावई आले की निघायची गडबड होईल म्हणून शालूनं लगेच नणंदेची ओटी भरली.साडी दिली. मुलांना मिठाईचा पुडा दिला. इतक्यात जावई पण आले. तशी सुनंदाने आपली साडी हातात घेऊन निरखली आणि ती आईला म्हणाली, ‘ मला काही हा रंग आवडला नाही बाई!चल  शालू, आपण ही साडी बदलून आणूया का? ह्यांच्याबरोबर गाडीतून जाऊन येऊ पटकन!’ बिचारी शालू काय बोलणार?  संपतही गेला बरोबर.

चोरडियांच्या दुकान खूप मोठं होतं. सुनंदाने ती साडी परत केली. आणि त्याऐवजी आणखी चार साड्या खरेदी केल्या. शालू आणि संपतचं धाबं दणाणलं होतं. पण सुनंदाताईंचं तिकडे लक्षच नव्हतं. त्यांनी आपल्या यजमानांना खुणेनंच विचारलं, ‘का हो ह्या घेऊ ना? .’ तुला पाहिजे तेवढ्या  घे की! तुम्ही बघा निवांत साड्या , आम्ही दोघं जरा एका ठिकाणी जाऊन येतो. ‘असं म्हणून संपतला घेऊन सुभाषराव बाहेर पडले सुद्धा! मग ते येईपर्यंत सुनंदाताईंनी मुलांच्या विभागातही थोडी खरेदी केली. चोरडिया ओळखीचे असल्याने,’ हिशोबाचं नंतर पाहू’, असं शालूला  म्हणाले. मग या दोघी दुकानाबाहेर आल्या आणि ते दोघंही गाडी घेऊन पोचलेच. मंडळी घरी परतली. हौसाबाई आणि सारजा माजघरात लवंडल्या होत्या, त्या उठून बसल्या. मुलंही माजघरात आली. शालू चहा ठेवायला आत जाणार तोच सुनंदाने तिला थांबवलं आणि जवळ बसवलं. पहिले आईला आणि दोन्ही वहिन्यांना एक एक साडी तिनं हातात ठेवली. मुलांना कपडे दिले. तेवढ्यात सुभाषराव आपली बॅग घेऊन तिथे आले. त्यातून एक मिठाईच्या खोक्यासारखा दिसणारा खोका काढून, त्यांनी शालूच्या हातात दिला. ‘अग, उघडून बघ तरी’, असं त्यांनी म्हटलं तसं तिनं संपतकडे तो उघडायला दिला. त्या खोक्यामध्ये शालूचे, घेलाशेठकडे गहाण ठेवलेले दागिने होते. सगळेजण चकित होऊन बघू लागले. सुभाषराव म्हणाले, ‘ सासूबाई , मुली आता कायद्यानं बापाच्या संपत्तीत वाटा मागतात. भावाकडून हक्काने माहेरपण वसूल करतात. मंग माहेरच्या मोठ्या खर्चाची , कर्जाची जिम्मेवारी पण त्यांनी घ्यायाला नको का?’ ‘मला यांनी हे समजावलं आणि  पटलंबी! माझे भाऊ-वहिनी चिंतेत, हलाखीत जगत असताना, मला  माझी ही वाटणीदेखील घेयाला पाहिजेच की!आईकडून  समदं समजल्यावर मी फोन केला होता यांना! म्हणून घरी  येतानाच हे घेलाशेठचे पैशे देऊन आले आणि चोरडियांचं बिल ऑन लाईन दिलंय यांनी!

 हौसाबाईनी लेकीला मिठी मारली. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. संपत, सुभाषरावांच्या पायाशी वाकला होता. शालू आणि सारजाचे डोळेही तुडुंब भरले होते.

मंगेशने बाबांचा मोबाईल पळवून, होळीचे हे मनोहारी रंग पटापट फोटोत कैद केले होते आणि तो आता आपल्या भावंडांसोबत सेल्फी घेण्यात दंग होता.

(ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता सामाईक करू शकता.)

© सुश्री प्रणिता खंडकर

दिनांक.. ०६/०३/२०२३.

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

वाॅटसप संपर्क.. 98334 79845 ईमेल [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चोरीचा मामला…… लेखक – सु. ल. खुटवड ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ चोरीचा मामला…… (सु. ल. खुटवड) ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

मध्यरात्री दोनच्या सुमारास घराची बेल वाजली…

तायडे, आम्ही आलोय गं! बाहेरून आवाज आल्याने संगीता जागी झाली. तायडे असा आवाज आल्याने आपल्या माहेरचंच कोणीतरी आलं असावं याची खात्री संगीताला पटली. तिने आयव्होलमधून पाहिले. तिघेजण पावसात भिजल्याने कुडकुडत उभे होते. तिने पटकन दार उघडून तिघांनाही आत घेतले.

एवढ्या रात्री कोठं गेला होतात? तिने विचारले. आमच्या कामधंद्याची हीच वेळ असते त्यातील टोपीवाला बोलला. मी तुम्हाला ओळखलं नाही पण तुम्ही माहेरच्या नावाने हाक मारली म्हणून दरवाजा उघडला संगीताने खुलासा केला. तुमचा धाकटा भाऊ मन्या, जलसंपदा खात्यात नोकरीला असणारा. आमचा लई जिगरी दोस्त आहे. तसेच तुमचा थोरला भाऊ सुधीर. जातेगावला शिक्षक असणारा, आम्ही लहानपणी एकत्रित खेळलोय. बागडलोय.. शिवाय तुमची धाकटी बहीण सुषमा… एका दाढीवाल्याने एवढी माहिती दिल्यावर संगीताचा त्यांच्यावर विश्वास बसला.

ती त्यांना चहा करायला किचनमध्ये गेली. चहाचे कप त्यांच्या हातात दिल्यावर ती म्हणाली, तुम्ही माझ्या माहेरची सगळी माहिती बरोबर सांगितली पण गावात तुम्हाला मी कधी पाहिलं नाही! संगीताने आश्चयनि म्हटले. आम्ही एका जागेवर कशाला राहतोय? आमचा येरवड्याला इंग्रजाच्या काळातला मोठा वाडा आहे. आम्ही वर्षातील सात-आठ महिने तिथं काढतो. तिथं आमचं गणगोत बी लई मोठं हाये, तेथून बाहेर पडल्यावर राज्यभर बिझनेससाठी फिरतीवर असतो. टोपीवाल्याने माहिती दिली.

माझे पती नेमके आज सकाळीच परगावी गेले आहेत संगीताने सांगितले. आम्हाला माहिती आहे. कंपनीच्या कामासाठी ते कोल्हापूरला स्विफ्ट या मोटारीने गेले आहेत. त्याच्या गाडीचा नंबरही आम्हाला पाठ आहे. परवा रात्री नऊ वाजेपर्यंत ते घरी येणार आहेत टोपीवाल्याने माहिती पुरवली.

माझ्या सासूबाईंनी तुम्हाला ओळखलं असतं. त्यांचं पण माहेर आमचंच गाव आहे. पण नेमक्या त्याही आज घरी नाहीत संगीताने माहिती पुरवली. शिरूरला तुमच्या नणंदेकडे त्या गेल्या आहेत. नणंदेचं दुसरं बाळंतपण गेल्याच आठवड्यात झालंय. त्यांची चिमुकली परी फार गोंडस आहे  दाढीवाल्याने म्हटले.

तुम्हाला एवढी अपडेट माहिती कशी काय? संगीताने आश्चर्यानं विचारले. अशा माहितीच्या जोरावरच तर आमच्या बिझनेसची बिल्डिंग उभी आहे… दाढीवाल्याने हसत उत्तर दिले. असं म्हणून त्याने सुषमाच्या गळ्याला चाकू लावला.

घरात जेवढी रोकड आणि दागिने असतील, तेवढे मुकाट्याने आणून दे! दाढीवाल्याने असं म्हटल्यावर तिला घाम फुटला. तिने पैसे आणि दागिने त्यांच्या हातात दिले. तुझ्या वाढदिवसाला नवऱ्याने दिलेला हिऱ्याचा हार कोठंय? तो दे! टोपीवाल्याने दरडावून म्हटले. त्यानंतर तिने तोही दिला. तुझ्या धाकट्या भावाने रक्षाबंधनाला दिलेला ‘आयफोन- १३’ दे! दाढीवाल्याने म्हटले. संगीताने तो फोनही देऊन टाकला.

या दागिन्यांमध्ये राणीहार दिसत नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी तो घातला होता. तो कोठाय? तिसऱ्याने आवाज चढवत विचारले. संगीताने कपाटातून काढून तोही दिला. जेजुरीला जाताना पंचवीस हजारांची पैठणी नेसली होतीस. ती पण दे! टोपीवाल्याने दरडावले. ती दिल्यानंतर संगीताला रडू यायला लागलं. सासूबाई आणि नणंदेला अंधारात ठेवून, एवढ्या वर्षात आपण दागदागिने व मौल्यवान वस्तू करून ठेवल्या होत्या. एका क्षणात त्याचं होत्याचं नव्हतं झालं होतं.

माझ्याकडचा सगळा पैसा अडका, सोनं नाणं तुम्ही लुटलंत पण माझ्या घरातील एवढी सविस्तर माहिती तुम्ही कशी मिळवलीत?  संगीताने विचारलं. तायडे, आम्ही सगळे तुझे फेसबुक फ्रेंड आहोत… तिघांनीही एका सुरात उत्तर दिले.

👆🏻

जरुर बोध घ्यावा.

लेखक – सु. ल. खुटवड

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “केवळ तुम्ही आहात म्हणून…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “केवळ तुम्ही आहात म्हणून…” ☆ सौ राधिका भांडारकर

“Thank God! मी हा निर्णय घेतला-‘

‘बापरे! थोडा जरी उशीर झाला असता तर..?’

“देवा! या वेळेस साथ दे —’

‘कसे अगदी वेळेवर आलात!’

‘तरी मला वाटलंच होतं!—’

‘काय करावे समजत नाही, नक्की कुठे जावं कळत नाही. कोणती दिशा पकडू? हा दिवा मालवू की तो?’

“खरं सांगू? केवळ तुम्ही आहात म्हणूनच मी हे करू शकले.’

हे आणि असे सहज उमटलेले,  अंतरंगाच्या क्षितिजावर आलेले सहजोद्गार असतात.  कधी ते ओठावर येतात तर कधी पोटातच वास करतात.  पण भावनांची ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे.  ती ओढून ताणून येत नाही.  ठरवूनही येत नाही.  भावनांच्या वादळात, व्यक्ती जेव्हा द्विधा मनस्थितीत असते तेव्हां त्यातून बाहेर पडताना, एखाद्या जलभाराने फुटलेल्या ढगासारखे, हे शब्दतरंग झरतात.

“तुम्ही आहात म्हणून”  या तीन शब्दात खूप काही दडलेलं आहे.  हे तीन शब्द जितके आधारभूत आहेत तितकेच ते कृतज्ञता दर्शक ही आहेत.  तसेच ते स्थितीदर्शक आहेत.  अंधारातून प्रकाशाची वाट सापडलेल्या, भेलकांडलेल्या, तावून सुलाखून बाहेर पडलेल्या,  श्वास कोंडला असता  प्राणवायू मिळालेल्या, भरकटलेल्या, गोंधळलेल्या, जीवात्म्याला दिशा सापडल्यानंतर, त्याच्या अंतरंगातून उलगडलेली ही शब्दांची लड आहे.  आता प्रश्न येतो तो हा की “तुम्ही आहात म्हणून..” या वाक्यातले “तुम्ही” नक्की कोण?  ज्यांचा त्याक्षणी आधार वाटला, ज्यांनी खरा हात दिला, ऐनवेळी सकारात्मक मदत केली म्हणून हे घोडं गंगेत नहालं!

हे “तुम्ही”  खरोखरच विविध आहेत.  वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेले सहस्त्र हातांचे हे “तुम्ही”  आहेत.  ते एकरंगी नसून विविध रंगी आहेत.  कधी ते सगुण  तर कधी ते निर्गुण आहेत.  कधी ते ज्ञात आहेत तर कधी ते अज्ञात आहेत.  दूर आहेत, निकटही आहेत.  सावली देणारे आहेत उन्हाचा तडका ही जाणवणारे आहेत.  रानातल्या चकव्यासारखे आहेत तर “भिऊ नको! मी तुझ्या पाठीशी आहे.” म्हणणारेही आहेत.  कणा  मोडलेल्या पाठीवर हात ठेवून, “लढ.” म्हणणारेही आहेत. सॉक्रेटिसच्या विषाच्या पेल्यात हे “तुम्ही” आहेत. कृष्णाच्या बासरीत  ते आहेत.  आकाशातल्या ग्रहताऱ्यात , झऱ्यात , नदीत , पर्वतातही आहेत,  अर्जुनाच्या बाणात , भीमाच्या बाहुबलात,  युधिष्ठिराच्या सत्यप्रियतेत, युगंधराच्या गीतेत,  संतांच्या वचनात,   गांधारीच्या डोळ्यावरच्या पट्टीत,  कुंतीच्या  वेदनेतही आहेत.

“राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये”  या काव्यपंक्तीत आहेत. सुरात, लयीत,  प्रेमात,  रागात,  रंगात आहेत.  दृश्य आणि अदृश्य स्वरूपातले हे “तुम्ही”  अनंत अथांग आहेत.  आणि कधीतरी अवचित ते आपल्यासमोर असल्याचे जाणवते आणि मग आपण म्हणतो,

“केवळ तुम्ही आहात म्हणून…”

आपण साधे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासास निघतो तेव्हा आपली केवढी धांदल उडालेली असते ! प्रवासात  लागणाऱ्या अनेक संभाव्य साहित्याची आपण विचारपूर्वक जमवाजमव  करतो.  शेवटच्या क्षणापर्यंत, आपण आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रवासी बॅकपॅक मध्ये काही ना काही कोंबतच असतो. आणि सुरक्षित, सुखद वाटचालीची खात्री बाळगतो. 

मग जीवन ही तर लांबलचक सहलच आहे. कुठले विराम, कुठली  स्थानकं, कुठला मार्ग याविषयी आपण तसे अनभिज्ञच असतो नाही का?  मग या प्रवासासाठी लागणारे साहित्य नेमकं कुठलं  आणि कसं घ्यायला हवं? 

या प्रवासी पेटीत अनेक कप्पे आहेत, खण आहेत. काही गुप्त जागाही आहेत. काही उघडे आहेत, काही बंद आहेत.  आतही आहेत, बाहेरही आहेत. ज्या ब्रम्हांडापासून जीवनाच्या प्रवासाची सुरुवात होते,  तेव्हा काही कप्पे भरलेले असतातच. त्यात काही नातीगोती असतात काही गुणदोष असतात.स्थल, कालदर्शक असं बरंच काही असतं. पण बाकीच्या अनेक रिकाम्या जागा या सहलीच्या दरम्यान, कधी कळत नकळत तर कधी जाणीवपूर्वक भराव्या  लागतात.  वाटेत   खूप सिग्नल्स असणार आहेतच. कधी लाल, हिरवे,  तर पिवळे ही. 

मला इथे सहज एक आठवलं म्हणून उदाहरणादाखल सांगते—

एखादी, पदार्थ बनवण्याची स्पर्धा असते. स्पर्धेपूर्वी कुणी कुठला पदार्थ बनवायचा, हे ठरलेले असते.  बाजूच्या टेबलवर अनेकविध पाकक्रियेचे साहित्य ठेवलेले असते.  आणि त्यातून आपल्याला जे हवे ते नेमके उचलायचे असते.  वाटते तितके हे सोप्पे नसते बरं का?  स्पर्धक काहीतरी विसरतोच.  आणि मग ठरलेला पदार्थ बनवताना त्याची प्रचंड धावपळ होते. 

जगण्याच्या स्पर्धेतही नेमके हेच घडते.  ब्रह्मदेवाने आपल्यासमोर अफाट पसरून ठेवलेले आहे.  आणि नेमके त्यातलेच आपल्यासाठी योग्य असलेले ” वेचायचे आहे.  या प्रवासात “तुम्ही” ही  एक संज्ञा आहे.  त्याची अनंत रूपे आहेत. रंग,रस आहेत. तुम्हाला कुठली रूपं हवी आहेत ते तुम्हीच ठरवा.  पंचमहाभूते आहेत, षड्रिपू आहेत.  ध्येय, चिकाटी, जिद्द, स्वाभिमान ,स्वावलंबन, परिश्रम, सत्य, नीती, चातुर्य, बुद्धी असे सहस्त्र गुणही आहेत.  हे सारेच तुमच्या मार्गातले “तुम्ही” आहेत.  एकदा त्यांची निवड तुम्ही केलीत की ती योग्य आहे की अयोग्य, हे तुमच्या मुखातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे उमटणाऱ्या,

” तुम्ही आहात म्हणून”  या कृतज्ञतापूर्वक उद्गारातूनच ठरेल.  म्हणूनच हे “तुम्ही” तुमचे तुम्हीच निवडा. आणि जीवनाची सफर, सफल  संपूर्ण करा.

धन्यवाद !

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा एका पत्राची – भाग २ ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ कथा एका पत्राची – भाग २ ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(मागील भागात आपण पहिले –    बापरे. मी दादाकडे धावले. “दादा, रनर गेला?”
  “अगो , केव्हाच. अजून राहिला जायचा? तुला कशाला हवा तो? खारेपाटणातून काय आणायला सांगायचेय काय? उद्या सांग हो बाबी.” आता इथून पुढे)

“जेवायला ये आता. भुकेजली असशील”. आत्तेला माझी दया आलेली. मी तिला म्हटलं ,    ” थांब .” नि पुन्हा आल्या वाटेने पत्र शोधायला धावतच निघाले. हातातलं पत्र वाटेत पडलं असलं तर…. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघत बघत मी  चालले होते. माकडांचा खेळ चालला होता तिथेपर्यंत आले. गोलगोल फिरून बघितलं.  वाऱ्याने उडालं असेल का? म्हणून आणखी लांब फिरले. देसाई भाऊंकडून जिन्नस नेणाऱ्या दोघा-तिघानी विचारलं “काय  गो हुडकतंस? पैसे पडले काय साळंत येता जाता? नाय गावूचे.कोणाक सापडले असतील तर तो उचलल्या बिगर कसो -हाव्हतलो? जा घराक. उनातानाची फिरो नको”. त्यांना काय माहिती? पैशापेक्षाही महत्वाची वस्तू हरवली होती.

मी घरी आले. आईने दहीभात कालवून ठेवला होता. तो गपागपा जेवला. पंगतीला हजर नसलं की आई नेहमी असा भात कालवून ठेवायची.

दुपारची शाळा भरण्याची वेळ जवळ आली होती. मी अगदी रडायच्या बेतात होते. पत्राचं काय होणार काही सुचत नव्हतं.

नानू – माझा सातवीतला भाऊ, तो म्हणाला, “काय झालं”?

-त्याला सगळी हकिगत सांगितली.”आता मला गुरुजी मारतील कायरे खूप? खूप भीती वाटतेय.” मी म्हटलं.

“पत्र हरवलेले सांगूच नको. टाकले म्हणून सांग. त्यांना कुठे कळणारे?”

नानूने सांगितलं . त्याच्या  सांगण्यामुळे मी अगदी फुशारूनच गेले. भीती पळून गेली. मुलगे मुलींपेक्षा शूर असतात. खात्रीच झाली माझी.

अडीच वाजता दुपारची शाळा भरली. गुरुजीनी विचारलंच.  .”टाकलंस का पत्र?”माझ्या गळ्यात आवंढा आला. तरी मी जोरात म्हटलं ” हो.” .आपण खोटं बोलत आहोत हे मनाला सारखं डाचत  राहिलं होतं. वरवर मी चेहरा हसरा ठेवला होता. जुगाबाईच्या आणि तिच्या  बहिणींच्या डोळ्यांकडे मी मधून मधून बघत होते. मनातल्या मनात त्यांना सांगत होते,     ” देव्यानो, मला क्षमा करा. मी खोटं बोलले आहे.” 

मराठीचा नवा शिवाजी महारांजाचा धडा गुरुजीनी शिकवला, मोठ्याने कविता म्हणून झाल्या .पाढे म्हटले.  पाच गणितं सोडवून झाली. उद्याचा  अभ्यास  गुरुजीनी फळ्यावर लिहून दिला. मी तो पाटीवर अक्षरं कोरून लिहून घेतला. आता शेवटचा खेळाचा तास.

पहिली ते सातवीची सर्व मुलं मुली  मैदानावर जमली. कोणाचा खोखो, कोणाची लंगडी, कोणाचा ‘आईचं पत्र हरवलं, हा खेळ चालू होता. तो बघून  मला गुरुजींच्या पत्राची आठवण होत होती. सगळी मुलं  आनंदात होती. सगळे गुरुजी खुर्च्यांवर बसून गप्पा मारीत  होते. मला मात्र  केव्हा एकदा शाळा सुटण्याचा गजर होतो असं  वाटत होतं. मी जाताना रस्त्यावर पत्र सापडतं का हे बघणार होते. सोमेश्वर, भरडाई, ह्या देवांचीही मी प्रार्थना करीत होते.  पत्र सापडू दे म्हणून.

–आता घरी जायचं होतं. पत्राच्या भानगडीतून  सुटले होते.  नि एक  टोपी घातलेला , पट्ट्याची चड्डी, नि जुनापाना सदरा घातलेला गडी-माणूस मैदानात अवतरला. तो देसाई भाऊंच्या दुकानातला जिन्नस देणारा नोकर होता. आम्हाला वाटलं, देवळात जायला आला असेल. पण तो तर  गुरुजींच्या खुर्च्यांपर्यंत पोचला. आमची लंगडी संपली होती. आम्ही बघत राहिलो. नोकराने खिशातून एक पत्र काढलं नि रामगुरुजींच्या हातात दिलं. गुरुजी म्हणाले, “हे काय? पत्र कोणाचं?”  

-“त्याचा काय झाला, माकडांचो खेळ इलोलो, दोन गिरायंका बरोबर मी बी ग्येलय बगुक. थयसर ह्या पत्र गावला. माका वाचुक येता पर मी आपला भाऊंकडे दिला. त्येनी बारीक डोळं करून वाचलानी, म्हणाले, अरे ह्ये आजच्या तारकेचा पत्र हा. रामक्रिष्न रामदास गोरे. ही सई हा ह्यावर.. अरे , हये राममास्तरांचा पत्र. ह्ये टाकलानी कसा नाय? त्यां न्हेऊन दे बगुया. असा कसा पडला?कोणी पाडलान?”

गड्याचं सगळं बोलणं मला ऐकू येत होतं , कारण मी जवळच्याच रांगेत उभी होते. माझे पाय थरथरायला लागले होते. मला सीतामाई सारखं धरणीने दुभंगून पोटात घ्यावं असं वाटत  होतं. राम गुरुजींचा चेहरा हळूहळू रागाने लालभडक झाला होता. तो माझ्याकडे वळला होता. त्यांनी पत्र हातात घेतलं. बघून खिशात ठेवलं. गड्याच्या पाठीवर थोपटलं नि ते त्याला म्हणाले, ” शाब्बास.  देसाई भाऊना म्हणावे, मी तुमचा आभारी आहे. माझे मालवणात पाठवायचे पत्. महत्वाचे आहे. आज स्वत: मीच टाकीन. जा तू.”.

“रानडेबाई , इकडे या.”  मी रडायला लागलेच होते . नाक पुसत मी पुढे गेले. गुरुजींच्या हातात छडी होती. मी हात पुढे केले. त्यांनी सटासट चारपाच सणसणीत छड्या हातांवर मारल्या. पायांवर, पाठीवर, डोक्यावरसुद्धा मारल्या. कुठलेच गुरुजी मुलींना  हाताने मारीत नसत. पण छड्या काय कमी लागतात? मला इतकं लागलं, इतकं लागलं की श्वास गुदमरल्यासारखं वाटलं. मैदानावरची सगळी मुलं गुरुजींच्या रुद्रावताराकडे घाबरून बघत होती. माझ्या भावानी खाली माना खाली घातल्या होत्या. आता गुरुजी मारायचे थांबले नि त्यांनी छद्मीपणाने  बोलणं सुरू केलं.

“-मुलांनो,  ही आपल्या शाळेतली  एक हुशार मुलगी. पण दीड शहाणी. हिचं नांव सुमन रानडे. पण  हिचं मन सुमन नाही. दुर्मन आहे.  हिला मी पत्र टाकायचं काम सांगितलं. हिने पत्र पेटीत  नाही टाकलं. रस्त्यावर टाकलं. आणि पत्र टाकलं म्हणून खोटं सांगितलं. दोन अपराध. म्हणून उद्या  प्रार्थनेच्या वेळी हिचा सत्कार करूया. चला आता घरी. हिच्यासाठी  एकदा टाळ्या.” मोठ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. पहिली दुसरीच्या मुलांनी  न कळल्यामुळे वाजवल्या.

मी हमसाहमशी रडत घरी निघाले. माझ्या नली आणि माली या मैत्रिणी माझं दप्तर घेऊन माझ्याबरोबर आल्या. त्या माझ्या पाठीवरून हात फिरवित होत्या. धीर देत होत्या. त्यांनी मला पायंडीतच सोडलं. खोटं बोलणाऱ्या मुलीबरोबर यायची त्यांना लाज वाटत होती वाटतं.

भावांनी सगळी बातमी आई, आजी, आत्ते  यांच्यापर्यंत  पोचवली होती. आईने मला जवळ घेतलं. “अगो, ताप भरलाय तुला. ” असं म्हणून  तिने मला माजघरात माच्यावर निजवलं नि  घोंगडी पांघरली.  –“बाबा, दादा घरी आले की त्यांना काय सांगायचे नाय हो. नायतर ते आणि पोरीला राघे भरतील. “आजीने मुलांना बजावलं. “रमे, तू आता सैपाकाकडे येऊ नको. तिला काढा करत्ये तो घाल नि निजव “आत्ये आईला म्हणाली. आमच्याकडे सगळ्या एकमेकीशी प्रेमाने वागत.

आई माझी समजूत घालायला लागली. “एवढे मनाला लावून घेऊ नको हो. अगो, सगळी मोठी माणसे लहानपणी खोटे बोललेलीच असतात. क्रिष्ण नाय का म्हणला, ” मै नही माखन खायो.”

माझी आई शिकली नव्हती पण तिने वाचन  खूप केलेलं होतं तिने आणखी सांगितलं. “अगो, तुला एक गंम्मत सागत्ये, महात्मा गांधी–ते सुद्धा लहानपणी खोटे बोललेले. त्यांच्या आत्मकथनात त्यानी स्वतःच लिहिले आहे. महाभारतातला धर्म  एव्हढा धर्मनिष्ठ पण द्रोणाचार्यांना काय म्हणाला “अश्वत्थामा गेला खरा, पण माणूस किं हत्ती  गेला हे मला माहीत नाही. नरो वा कुंजरोवा”. म्हणजे खरे नाहीच ना बोलला? काही वेळा खोटे बोलावे लागते. तसे तू बोललीस.”  माझ्या अंगावरून प्रेमाने हात  फिरवित आई मला धीर देत होती. तेव्हढ्यात  आजी पण माझ्या मदतीला धावली. “अगो, तुझा हा रामगुरुजी, नांव असेल राम, पण सत्यवचनी असेल कशावरून?  लहानपणी का होईना खोटे बोलला असेलच. त्याच्या आईलाच विचारत्ये मी.”  आत्तेने पण तिला दुजोरा दिला. ” मला  ठाऊक आहे. डब्यातला लाडू खाल्लान नि आईला म्हणाला, मी लाडू नाय खाल्ला.” मला कळत होतं ,मला बरं वाटावं म्हणून आत्ते खोटंच बोलत होती.  तापाच्या ग्लानीत नि सगळ्यांच्या प्रेमामुळे माझे डोळे गपागप मिटत होते.

 – समाप्त – 

© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा एका पत्राची – भाग १ ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ कथा एका पत्राची – भाग १ ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

—–पूर्ण प्राथमिक मराठी शाळा , कोर्ले, तालुका- देवगड, जिल्हा -रत्नागिरी. ही माझी लाडकी शाळा.तिथे माझं पहिली ते सातवी (म्हणजे त्यावेळच्या भाषेत- “फायनल”.) पर्यंत शिक्षण झालं. विंदा करंदीकरनी पण इथेच श्री गणेशा गिरवला बरंका. आईशप्पथ. आमच्या त्या गावाची त्यावेळची लोकसंख्या फक्त पाच हजार. आणि सातवीपर्यंत शाळा! गावातल्या काही हुशार मंडळींचं ते कर्तृत्व. खाडीकिनारीच्या  सगळ्या म्हणजे अगदी पोंभुर्ल्यापासूनची मुलं आमच्या शाळेत यायची. आमची काही नात्यातली मुलं शाळेसाठी आमच्याकडे रहायलाच  आलेली. त्यामुळे आम्ही भावंडं नि ती मुलं मिळून चांगली दहाची क्रिकेटची  टीम होती. माझा भावंडात खालून दुसरा नंबर. पुस्तकं माझ्यापर्यंत  गलितगात्र , म्हातारी होऊनच यायची.

—–शाळा सात वर्गांची, पण इमारतीत चारच खोल्या .मग काय,  चौथी सोमेश्वराच्या देवळात, पाचवी जुगाबाईच्या देवळात नि  सहावी भरडाईच्या देवळात.  प्रत्येक वर्गाला सर्व विषयांना एकच गुरुजी. हायस्कूल सारखे तासा तासाला  गुरुजी बदलत नसत. म्हणजे त्यांना फेऱ्या घालाव्या लागत नव्हत्या.  हे त्यातल्या त्यात  चांगलं.  मुलांना पांच गणितं घालायची .नि होई पर्यंत एखादी डुलकी काढायची संधी त्याना मिळे. असं सगळं बेजवार चाललेलं.

—–मी पाचवीत होते. त्यामुळे वर्ग जुगाबाईच्या देवळांत. देऊळ अगदी ऐसपैस. एका बाजूला पाच काळ्या कुळकुळीत  देव्या उभ्या. मधली जरा मोठी, ऊंच. नि डाव्या, उजव्या बाजूला तिच्या दोनदोन मैत्रिणी किंवा बहिणी. सगळ्यांचे कमरेवर हात. डोक्यावर मुकुट, गळ्यात भरपूर दागिने. सगळं दगडात कोरलेलं. डोळे मोठमोठे. धाक, भीती  दाखवणारे. वर्गात आल्याबरोबर आधी पाची देव्यांना नमस्कार करायचा.

एका खिडकी खाली खुर्ची आणि टेबल. टेबलावर मोजून चार  खडू नि डस्टर. वेताची छडी सुध्दा. खडूपेक्षा छडीचा वापर गुरुजी जास्त करायचे.

—–पुजारी पूजा करायला यायचा तेव्हढी पंधरावीस मिनिटं आमचा अभ्यास बंद असायचा. एरव्ही आमचे पाढे नि कविता इतक्या जोरजोरात घुमायच्या की दगडाच्या देव्यानी सुद्धा म्हटल्या असत्या.

—–आमच्या गुरुजींचं नांव होतं ‘रामकृष्ण रामदास गोरे.’  नांवात दोन राम असूनही गुरुजी शांत स्वभावाचे नव्हते. अगदी जमदग्नीचा अवतार. गोरे या आडनांवाला तर त्यांनी काळिमाच फासला होता. पण ते आमच्या वर्गाचे गुरुजी होते त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान होता आणि  मुलांचं मानसशास्त्र असं असतं की  कडक गुरुजीच मुलांना आवडतात. सगळे त्यांना रामगुरुजी म्हणायचे.. आम्हीही तसंच म्हणायचो. 

—–तर माझं सुदैव की दुर्दैव , आमच्या आगबोटीसारख्या  चिरेबंदी घराचे तीन भाग पडलेले. शेवटच्या भागांत माझ्या चुलत भावाचं कुटुंब रहायचं. गावातलं पोस्ट त्याच्या पडवीत होतं. म्हणजे तो पोस्टमास्तर होता. तिथे पोस्टाची लालभडक पेटी. खाडीकाठच्या दहा गावांना जशी एक पूर्ण प्राथमिक शाळा. तसंच सर्वांना एक पोस्ट. पस्तीस रुपये पगारात आमचा दादा पेटीतल्या पन्नासभर  पत्रांवर शिक्के मारायचा. कधीतरी ते काम आम्हालाही सांगायचा.  आम्हाला मजाच. एका सरकारी पोत्यात सर्व पत्र भरून, पोत्याला सील  करून दादा रनरकडे द्यायचा.  रनर खारेपाटणला पोतं पोचवायचा नि तिकडचं पोतं  संध्याकाळी घेऊन यायचा. तो चालतच जायचा, तरी त्याला रनर का म्हणत कोणाला ठाऊक?

—–आमची शाळा सकाळी नि दुपारी दुबार भरायची. त्यादिवशी सकाळची शाळा सुटली . आम्ही दप्तरं खांद्याला लावून घाईने निघालो. रामगुरुजी म्हणाले, “रानडे, इकडे ये.”

—–बापरे!मी घाबरले.  छाती धडधड करू लागली. काय झालं? आपलं काय चुकलं? कालची गणितं तर सगळी बरोबर आली होती. शुध्दलेखन दहा पूर्ण ओळी लिहिलेल्या. घंटेच्या आधी वर्गात येऊन पोहोचले होते. का बोलावलं असेल गुरुजीनी? छडी मारणार की काय?

पाय लटपटत होते. रडक्या चेहऱ्याने मी गुरुजींसमोर उभी राहिले. गुरुजींच्या हातात एक पोस्टकार्ड होतं.

“हेबघ, हे कार्ड–पोस्टाच्या पेटीत नीट टाकायचे, दादा शिक्के मारत असला तर  त्याच्या हातात द्यायचे,  टपाल पोत्यात भरले असेल तर ते शिक्का मारून रनरच्या हातात द्यायला दादाला सांगायचे, पत्र महत्वाचे आहे. आज गेले तर चार दिवसांनी मालवणात पोचेल. काय?”

गुरुजी इतकं भराभरा  बोलत होते की मला काही समजतच नव्हतं. तरी मी मान  डोलावली. ”  धावत जा. काय?”

—–मी खरंच धावत निघाले. हातात घट्ट धरललं पत्र. कडक रामगुरुजींचं काम म्हणजे रामायणातल्या त्या रामाचंच काम. देसाई भाऊंच्या दुकानापर्यंत आले. मला धाप लागली होती. ऊन्ह गुरुजींसारखंच कडक होतं. पण रस्त्यावर गर्दी जमली होती. माणसं गोल करून काही तरी बघत होती. मी त्या गोलात शिरले. माकडांचा खेळ चालला होता. आमच्या त्या ठार खेड्यात असले खेळ क्वचितच यायचे. डोंबारी, गारुडी, अस्वलवाले आले की सगळा गाव तिथे जमायचा. करमणुकीचे हे खेळ बघताना आम्ही मुलं तर तहानभूक विसरायचो. मी तशीच विसरले. नि खेळ संपेपर्यंत बघतच राहिले. विसरलेली भूक आता जागी झाली. नाही, खवळलीच. धावतच घरी़ आले. मोठ्यांची नि सगळ्या भावंडांची पंगत बसलेली. आई     म्हणालीच,”अगो,कुठे होतीस इतका वेळ? नानू शोधायला येणार होता”.

” माकडांचा खेळ बघत होती.” सहावीतल्या बापूने चहाडी  केली आणि एकदमच पत्राचं लक्षात आलं. हातात पत्र नव्हतं.

बापरे. मी दादाकडे धावले. “दादा, रनर गेला?”

“अगो , केव्हाच. अजून राहिला जायचा? तुला कशाला हवा तो? खारेपाटणातून काय आणायला सांगायचेय काय? उद्या सांग हो बाबी.”

क्रमश: – भाग १

©  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अति लघु कथा (अ. ल.क.)… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ अति लघु कथा (अ. ल.क.)… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

 

१. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. 

    तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला; 

    मी स्थिर आहे म्हणूनच

    लोकांना त्यांची गती मोजता येते रे….

 

२. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं. 

    कानात कुजबुजत म्हणालं, “ एवढ्यात शेफारलास??

    अरे जी मोजता येत नाही ती खरी उंची….”

 

३. कुठली ही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. 

    तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला. आणि त्याने मला विचारलं,

    या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील??

    तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल….

 

४. मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार?? 

   एक हिरा लुकलुकला….. म्हणाला,… “ वेडा रे वेडा….”

 

. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं.  

    त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले…  ते म्हणत होतं,

    “ करून बघायचं की बघून करायचं … ठरवू दे की मला, मी कसं जगायचं…”

 

७. एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं …  “ जगलास किती दिवस???? “

 

८. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं, “ माझ्याबरोबर तुम्ही का जळताय?? “ 

    लाकडं म्हणाली, “ मैत्री म्हणजे काय ते कळलं नाही का अजूनही तुला???? “ 

 

९. पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून, रस्त्याच्या कडेला एका फाटक्या  पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी 

    पोळी त्याला भरवताना म्हणाली,… “ बाळा दमला असशील ना?? खा पोटभर….”

 

o. माणसाने देवाला विचारलं … “ संकटं का पाठवतोस??”

     देव म्हणाला …. “ माणसाला होणाऱ्या माझ्या विस्मरणावरचं हमखास औषध आहे ते….”

 

११. विश्वास या शब्दात श्वास का आहे??

     — दोन्ही ही एकदा जरी तुटले तरी संपतं सगळं….

 

१२. दरवेशाचं माकडाशी वागणं बघून मला माकडाची दया आली.

      माझ्या मनाचा मला लगेच प्रश्न…. “ माकडाची येते पण माझी नाही येत दया तुला??”

      त्यावर माझा मनाला प्रतिप्रश्न…. “ माकडानं दरवेशाला खेळवताना पाहिलं आहेस कधी?? “

 

१३. ‘ नाती का जपायची ? ‘ …. रेशमाच्या धाग्याचा गुंता सोडवून पहा एकदा….

 

१४. आठवणींची एक गंमत आहे….. त्याच्यात गुंतून राहिलात तर, नवीन निर्माण नाही होत….

 

१५. माणूस देवाला म्हणाला, “ माझा तुझ्यावर विश्वासच नाही.”

      देव म्हणाला, ‘ वा !! श्रद्धेच्या खूप जवळ पोहोचला आहेस तू. प्रयत्न सुरू ठेव….”

 

१६. गवई एकदा तानपुऱ्याला म्हणाला, “ तू नसलास तर कसं होईल माझं?? “

      तानपुरा म्हणाला, “ अरे वेड्या ! माझी गरज लागू नये हेच तर ध्येय आहे….”

 

१७. विठुमाऊली एकदा एकादशीला दमून खाली बसली. 

      मी विचारलं, “ काय झालं?? “

      विठुराय म्हणाले, “ पुंडलिकाचा गजर करतात लेकाचे, पण मायपित्यांना एकटं सोडून 

      अजून माझ्याच पायाशी येऊन झोंबतात…  वेडे कुठले….” 

 

१८. एकटं वाटलं म्हणून समुद्रावर गेलो एकदा. 

      त्याला विचारलं, “ कसा एकटा राहतोस वर्षानुवर्ष?? “ 

      तो म्हणाला, “ एकटा कुठला, मीच माझ्यात रमावं म्हणून ईश्वराने लाटा दिल्या आहेत ना मला.” 

      मी विचारलं, “ माझं काय?? “

      तो हसून म्हणाला, “ नामस्मरण आणि माझ्या लाटांमध्ये काहीच साम्य दिसत नाही का तुला???? “ 

 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षमा…  सुश्री भारती ठाकुर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? जीवनरंग ?

☆ क्षमा…  सुश्री भारती ठाकुर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या. 

रस्त्याने जाणारा-येणारा थोडावेळ थबकून त्यांच्या कडे न बघता गेला असं कधी होत नव्हतं. श्रावण महिना होता. माझ्या दारा समोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर –(गर्द गुलाबी) रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली होती. साधारण दहा बारा फुट उंचीचे झाले होते ते झाड. रोज किमान 56-60 हून अधिक फुले झाडावर असायची. फार लाडकी जास्वंद होती ती माझी. तिने शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरवात केली, समजलंच नाही. तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडून त्याचा खूप कचरा व्हायचा. कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची. ती मग दिवसभर घरात देखील फिरायची. कोमेजल्यावर फुले चिकट होत. त्यावर चुकून पाय पडलाच तर पाय सटकून माणूस खाली पडायची पण शक्यता असायची. 

शेजारचे सोनार काका मला रोज सांगत, “अगं भारती, आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या फांद्या कापून टाक बरं. मला त्रास होतो त्याचा.” मला त्यांचा त्रागा समजत असे. पण त्या फांद्यांवरच्या असंख्य कळ्या पाहिल्या की मी त्यांना प्रॉमिस करायची, “ काका, एवढ्या कळ्यांची फुले होऊन जाऊ देत ना. काही दिवसांनी असाही त्याचा बहर कमी होईल. मग कापतेच मी त्याच्या फांद्या. चालेल ना ?”

“ठीक आहे. पण लवकर काप. मी पडलो पाय घसरून तर ?” इति काका.

“हो, हो, लवकरच कापीन मी फांद्या. प्रॉमिस काका !” माझे ठरलेलं उत्तर .

एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परतले तर काका बाहेरच उभे. “त्या फांद्या आत्ताच्या आत्ता काप . फार दिवसापासून ऐकतोय तुझं. आज कापते- उद्या कापते. आज आत्ता माझ्या समोर काप फांद्या.” एरवी अत्यंत प्रेमळ असे सोनारकाका त्यादिवशी इतके का संतापले होते मलाही समजलं नाही. माझाही राग जरा अनावर झाला. घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त  त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या  जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या. दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं . कंपाऊंड वॉलच्या पलीकडून सुद्धा ते आता काकांना दिसणार नव्हतं.

ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की  माणूस किती विकृतपणे वागतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं.

पश्चाताप तर लगेचच झाला. पण आता पश्चाताप करून काही उपयोग पण नव्हता. त्या फांद्या पुन्हा थोडीच जोडता येणार होत्या ? त्या रात्री जेवलेही नाही आणि झोपलेही नाही.

पावसाचे दिवस होते. झाड पुन्हा भराभर वाढलं. आश्चर्य म्हणजे एकही फांदी  सोनार काकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही. पुन्हा दहा -बारा फुट झाड वाढलं. पाने हिरवीकंच आणि टवटवीत. पण फूल मात्र एकही नाही. त्याच्या आसपासच्या झाडांवर असंख्य फुले पण याला मात्र एकही नाही. खतं-औषधे सर्व काही प्रयोग झाले. सहा महिने उलटले आणि माझी अस्वस्थता वाढली. काय करू मी ? सोनार काकांना पण ही घटना सांगितली. त्यांनाही खूप वाईट वाटलं. 

एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती दीदी यांचा फोन आला. त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली होती. झाडा झुडपांची आणि बागेची सरस्वती दिदीना खूप आवड होती. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर -अगदी समुद्राच्या रेतीत सुंदर असे Beach Garden त्यांनी बनवलेले मी पाहिले होते. झाडांवरचे त्यांचे प्रेमही मला ठाऊक होते . त्यांचा फोन येताच मी जास्वंदीच्या झाडाची कथा अगदी अथपासून त्यांना सांगितली. ‘दीदी, त्या झाडाला आता कुठलं खत घालू म्हणजे त्याला पुन्हा छान फुले येतील?” मी अक्षरश: रडवेली झाले होते.

“There is no need for any fertilizer. Did you say sorry to that plant Bharati ? And say it honestly till it responds to you.”  

“काय ? झाडाला सॉरी म्हणू ?” खरं तर डॉ जगदीश चंद्र बोस यांनी लावलेले वनस्पतींच्या बाबतीतले सर्व शोध माहीत होते. वनस्पतींना भावना असतात, ते प्रतिक्रिया व्यक्त करतात वगैरे. Secret of plants सारखी अनेक पुस्तकेही वाचली होती. पण प्रत्यक्षात आपल्याला स्वत:ला असा काही अनुभव येईल असा कधी विचारही मनात आला नव्हता. सरस्वती दिदी पुढे म्हणाल्या की अगदी रोज ठराविक वेळेला क्षमा मागायची. झाडाला कुरवाळायचं, इतरही गप्पा मारायच्या.

झाडाची क्षमा मागण्याचा माझा दैनिक कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी थोडं कृत्रिम वाटलं पण जसजसे दिवस वाढत गेले, एक व्याकुळता माझ्या बोलण्यात – स्पर्शात आपोआपच यायला लागली.  

 जास्वंदीशी बोलणं, तिला कुरवाळणं मलाही आवडायला लागलं.  तिला फुले कधी येतील या उत्सुकतेपेक्षा आमच्या  दोघींमध्ये एक वेगळं नातं तयार झालं ते मला अधिक महत्त्वाचं वाटलं.. दहा-बारा दिवस होऊन गेले.  एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागे एक कळी लपून बसलेली दिसली.  जणू म्हणत होती, “शोध मला. बघ मी आलेय”.  आनंद गगनात मावेना म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं.  पण थोडा वेळच.  शेवटी मन शंकेखोर.  हा निव्वळ योगायोग  तर नाही ?  पण चार दिवसातच जास्वंदी कळ्यांनी  पानोपान बहरली. फुलेही उमलू लागली.  मग मात्र खात्री पटली की जास्वंदीने मला खरोखर क्षमा केली  आहे.

 पहिला फोन सरस्वती दीदींना  केला.  माझ्या या आनंदात त्यांच्या इतकं दुसरं कोण सामील होऊ शकलं असतं?  

त्या दिवशी जास्वंदीशी हितगुज करताना मी म्हणाले,  “आता जन्मात कधी मी असे वागणार नाही.  पण तू सुद्धा माझ्याशी पुन्हा कधी कट्टी घ्यायची नाही बरं का !”

(नर्मदालयाच्या मा. भारती ठाकूर यांनी लिहिलेली अप्रतिम कथा.

संग्रहिका – सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print