(3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त)
अपवाद वगळता आजच्या अनेक शिक्षित-अशिक्षित स्रियांना स्वत:ची अशी ओळख आहे का? स्वत:ची अस्मिता, स्वत:चा स्वाभिमान आहे का? मी नेहमी स्रियांना एक प्रश्न विचारत असतो की, तुम्ही शिकून नवीन काय केलं? सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्ही उपयोग काय केला? तुम्हाला सावित्रीबाईनी शिक्षण दिलं त्यासाठी अंगावर दगड माती झेलून, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवऱ्याची सेवा करायला, संत्संगला जायला, पोथीपुराणे वाचता यावीत, उपासतापास करता यावेत, वैभवलक्ष्मीची पारायणे करता यावीत याच्यासाठी सावित्रीबाईनी तुम्हाला शिक्षणासाठी उद्युक्त केलं का? याच्यासाठी सावित्रीबाईंनी का दगड-माती खाल्ले? याच्यासाठीचं का सावित्रीबाईंनी वाटेल तसा मान-अपमान सहन केला? कशासाठी केला त्यांनी हा उपद्व्याप? तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून? तुम्हाला पार्लरला जाऊन स्वत:ला नटता यावे म्हणून? ह्या शिक्षित स्रियांनी नवीन काय केलं? दोनशे वर्षापुर्वीही स्री हे सर्व न शिकता, आपल्या, मुलाबाळांना, पतीला, सासू-सासऱ्याला न्याय देत होती की. न शिकताच सर्व करीत होती तर मग तुम्ही नवीन काय केलं?
सावित्रीबाई फुले यांच्यामुळे गेल्या काही वर्षात स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन असे टप्पे घेत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारे कसे तिच्या मनासारखे झाले. पण तिचे जळणे, सोसणे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार थंबला का? वर्तमानपत्रातील बलात्काराच्या बातम्या, हुंडाबळी आणि मारहाणीच्या बातम्या ओरडून, किंचाळून सांगताहेत की, स्त्रीचे जळणे अद्याप सुरू आहे. विद्याविभूषित आणि भरमसाठ पगार घेणारी स्त्रीसुध्दा कधीकधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचे पाऊल उचलते. स्वत:ला आधुनिक समजणाऱ्या प्रथितयश अभिनेत्रीनासुध्दा स्त्रीदेहाचे प्रदर्शन आणि कधीकधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही. हे सारे पाहिले की वाटते, आजही स्त्रीचे सती जाणे सुरूच आहे. फक्त त्याचे स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलली आहे. स्त्री खरेच मुक्त झाली आहे का?🤔
(दोन महीन्यानंतर मी लंडनहून आलो.मधल्या काळात जयंताने अनघाशी लग्न केले होते आणि त्यांनी खेतवाडीत बिर्हाड केले होते.हा मला मोठा धक्का होता.) – इथून पुढे —
अनघा जयंताशी लग्न करेल असे मला अजिबात वाटत नव्हते किंबहुना अनघा आणि मी एकमेकांसाठी अनुरूप आहोत असाच माझा कयास होता. माझे आई-बाबा सुद्धा अनघाने असा का निर्णय घेतला आणि माझे तिच्याशी वादभांडण झाले होते की काय अशी विचारणा केली.
खरतर या दोघांनी मला कसलीच कल्पना दिली नव्हती .
मी मुंबईत आलो पण या दोघांना भेटायला गेलो नाही.
मला या दोघांचा खूप राग आला होता.मनस्ताप झाला होता.कशातही लक्ष लागत नव्हते .याच काळात माझ्या मनात कली शिरला.
या दोघांचा संसार कसा मोडेल याची मी वाट पाहू लागलो.
अनघाला सांस्कृतिक जगाची भूक होती. त्यामुळे तिला त्या जगात अडकवावे असा विचार मनात आला.
त्याच सुमारास मुंबई दूरदर्शन सुरू होत होते. त्या करीता विविध विभागात निर्माते, सहनिर्माते शोधणे सुरू होते. मी माझ्या कविमित्राकडे अनघाची निर्मात्याच्या पदासाठी शिफारस केली.
अनघा मुळातच हुशार त्यामुळे तिला निर्मात्याच्या पदाची नोकरी मिळाली.
या मायावी दुनियेत तिचा प्रवेश झाला आणि वेगवेगळे कलावंत तिच्या आयुष्यात येऊ लागले.
तिला मुलाखतीसाठी प्रसिद्ध साहित्यीक, नाटककार, संगीतकार हवे असायचे. त्यामुळे ती मला भेटू लागली.
त्यामुळे दोघा नवरा बायकोत खटके उडायला लागले.मला हे लांबून कळत होते आणि मनातून आनंद होत होता.
शेवटी अनघाने जयंताबरोबर काडीमोड घेतला आणि एका मराठी नटाची ती पत्नी झाली.
या सर्व प्रकाराने जयंता सैरभैर झाला आणि वारंवार माझ्याकडे येऊ लागला,त्याची नाटके छापूया आणि प्रकाशीत करूया असे सांगू लागला.पण मी काहीन काही कारणे सांगून ते टाळू लागलो.
मला जयंताचा सूड घ्यायचा होता.त्याचे कवितासंग्रह आणि कथासंग्रह पूर्वी आम्ही छापले होते.त्याचे अधिकार आमच्याकडे होते.
त्याच्या आवृत्या काढूया असे तो सांगत होता. मी त्याच्या कडे दुर्लक्ष केले.
आमच्या प्रकाशनाकडून नाटकांची छपाई होत नाही म्हणून तो मुंबईतील इतर प्रकाशकांकडे खेपा घालू लागला.पण सर्व प्रकाशकांना जयंता हा माझा मित्र असल्याचे माहीत होते,
त्यामुळे मुंबईतील एकही प्रकाशक त्याचे पुस्तक छापण्याचे धाडस करू इच्छीत नव्हता .म्हणून नाईलाजाने त्याने पुण्याचा नवीन प्रकाशक गाठला,पण पुस्तक छपाईची क्वालिटी अगदी खराब होती आणि त्या प्रकाशकाला मार्केटिंग ची माहीती नव्हती,त्यामुळे ती पुस्तके दुकानात उपलब्ध झाली नाहीत.
त्यानंतर च्या काळात मी अत्यंत व्यस्त होत गेलो.आमच्या शाखा दिल्ली,बंगलोर,अहमदाबाद या शहरात निघाल्या आणि आम्ही इंग्रजी पुस्तके प्रकाशीत करू लागलो.
त्यामुळे मी मुंबईत फार कमी असायचो.पण जयंता माझ्या मोठ्या भावाला येऊन भेटत होता हे मला कळत होते.
या नंतरच्या काळात जयंताने कविता लिहील्या. कथा लिहील्या पण त्याच्यातला स्पार्क कमी होत गेला कारण अनघा त्याची स्फुर्ती होती.त्याने त्याच्या कविता,कथा माझ्या मोठ्या भावाला दाखविल्या पण त्याला त्या आवडल्या नाहीत.
जयंताचे त्याच्या नोकरीवर कधीच लक्ष नव्हते. जो पर्यंत त्याचे फडके साहेब होते तो पर्यंत सहन केले,पण फडके साहेब निवृत्त होताच नवीन साहेबा बरोबर याचे पटेना, शेवटी जयंताने नोकरीचा राजिनामा दिला.
एकंदरीत यामुळे त्याची सर्वबाजूने कोंडी झाली असावी.
या काळात जयंताने मला काही पत्रे लिहीली.मुंबईतल्या मुंबईत त्याची पत्रे मला मिळत.त्याचे म्हणणे असे विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्याची पुस्तके लागावित म्हणून मी प्रयत्न करावेत,त्यामुळे त्याला अर्थप्राप्ती झाली असती.अर्थातच मी त्याकडे दुर्लक्ष केले.
माझ्या मुलाच्या अॅडमिशन च्या संबधात मी आणि पत्नी अमेरीकेत गेलो असताना जयंताला मृत्यू आला,शेवटची काही वर्षे तो मधुमेहाने त्रस्त झाला होता. मी अंत्ययात्रेत नव्हतो म्हणून साहित्यीक वर्गात खळबळ उडाली,पण माझा मोठा भाऊ अंत्ययात्रेत होता.
त्याच्या मृत्यू नंतर आमच्या प्रकाशनाने त्याची पुस्तके छापली आणि ती हातोहात खपली.
दोन महिन्यांनी मी अमेरीकेतून आलो आणि पुण्याच्या प्रकाशकाकडे जाऊन त्याच्या नाटकाच्या पुस्तकांचे हक्क विकत घेतले आणि जयंताची सर्व नाटके प्रकाशीत केली.आमच्या प्रकाशनाने त्याच्या नाटकाची पुस्तके सर्वत्र उपलब्ध केली. त्यामुळे ती चांगलीच खपली. एवढेच नव्हे तर मुंबईतील प्रतिष्ठीत नाट्य संस्थानी त्याची नाटके रंगभूमीवर आणली.जयंताच्या एका नाटकात अनघाने मुख्य भूमिका केली.
या नाटकाचा प्रयोग पहायला मी पत्नीसह शिवाजी मंदिरात गेलो तेव्हा त्या नाटकात अनघाला पाहताना जयंताची खूप खूप आठवण आली.
त्याच्या नाटकाचे प्रयोग त्याने पहायला हवे होते असे मला वाटले आणि भर नाट्यगृहात मी रडू लागलो.
या नंतर माझ्या आयुष्यात सतत बेचैंनी आली.माझ्या पत्नीला कॅन्सर झाला,मुलीने माझ्या मना विरूद्ध लग्न केले,माझा मुलगा अमेरीकेत स्थायीक झाला.
आमची पुढची पिढी आमच्या व्यवसायत येईना. माझा मोठा भाऊ सतत आजारी पडु लागला.
थोडक्यात आमचे वाईट दिवस आले.माझी फिरती बंद झाली.नवीन पुस्तके प्रकाशीत करण्याची ईच्छा नाहीशी झाली,मी दुकानात बसु लागलो.आता हळू हळू ही प्रकाशन संस्था बंद करण्याचा किंवा विकण्याचा विचार करत आहे.
या आयुष्यातील कातर वेळी जयंता,मला तुझी आठवण येते .तुझ्या सारख्या प्रतिभावान लेखकावर अन्याय झाला. लोकांना वाटते ही साहित्यीक मंडळी म्हणजे हुशार मंडळी, सुसंस्कृत मंडळी यांच्यात कसली राजकारणे असणार .
पण पुण्यातील श्रोते हो! तुम्हाला सांगतो,राजकारण्यांची राजकारणे , वाद,भांडणे तुम्हाला कळतात दिसतात. पण ही पुस्तके लिहीणारे आणि छापणारे ,प्रकाशित करणारे यांच्यातील घाणेरडी राजकारणे तुम्हाला कळत नाहीत.
आणि अशा हेव्यादाव्यामुळे जयंतासारख्या साहित्यकावर अन्याय होतो.त्याला आयुष्यातून उठवले जाते. निरनिराळे पुरस्कार ठराविक लोकांनाच मिळतात आणि साहित्यकातील कंपू इतरांना वर चढू देत नाहीत.
साहित्यिक जीवन या पुण्यातील कार्यकर्ते हो,आम्हा साहित्यीक लोकांचे हात असे बरबटलेेले असतात.
माझा प्रिय मित्र जयंता त्याच्या लेखनाला मी न्याय देऊ शकलो नाही. उलट मी त्याचा व्देश केला .याचे मला वाईट वाटते.खेद वाटतो
कॉलेज मधील आम्ही तीन मित्र जयंता मी आणि अनघा. अनघाने त्याला मधेच सोडले.मी त्याचा तिरस्कार केला.त्याचे लिखाण कुजवलं.मित्रा, जयंता कुठे असशील तेथून या तुझा मित्रास माफ कर , असं म्हणून एवढ्या श्रोत्यांसमोर मी ओक्साबोक्सी रडू लागलो.
(”तुझे काय मत आहे? तुझी पुस्तके खराब केली असे तुला म्हणायचे आहे काय”?
”होय’ !
त्याच क्षणी मी रागाने जयंताच्या घराबाहेर पडलो ) — इथून पुढे —
अशी घटना घडली त्यामुळे ती पुस्तके दुसर्याने प्रकाशीत केली.
प्रश्न – अलेक्झांडर सारखे सुंदर नाटकाचे पुस्तक असूनही त्या पुस्तकाची विक्री फारशी झाली नाही असे म्हणतात, कां?
मी – नुसते पुस्तक छापून चालत नाही, त्याचे मार्केटिंग करावे लागते, त्या पुण्याच्या प्रकाशकाला मार्केटिंगचा काहीच अनुभव नव्हता.
प्रश्न – मुंबईत मराठी पुस्तकांसाठी तुमची दोन दुकाने असताना आणि त्या काळी वाचक मराठी पुस्तकांसाठी तुमच्याच दुकानात येत असताना जयंतरावांची नाटके तुमच्या दुकानात मिळत नव्हती, हे खरे काय?
मी- हे खरे आहे, याचे कारण पुण्याच्या त्यांच्या प्रकाशकाने आमच्या दुकानात पुस्तके ठेवली नाहीत, आमची पुस्तकांची ऑर्डर त्यांनी पुरी केली नाही.
प्रश्न – कॉलेजमधील तुमची मैत्रिण अनघाताई यांनी जयंतरावांशी लग्न केलं, त्यांच्या प्रेम विवाहा बद्दल तुम्हाला कल्पना होती?
मी – मला कल्पना नव्हती.
प्रश्न – अनघाताई मग दूरदर्शनवर निर्मात्या झाल्या त्यांनी ही नोकरी स्विकारताना तुमचा सल्ला घेतला होता काय?
मी- नाही.
प्रश्न – मग अनघाताई दूरदर्शवर गेल्यानंतर तुमचे त्यांच्याबरोबर अनेक फोटो कसे काय दिसतात?
मी – अनघा ही साहित्यीकांच्या आणि कलावंताच्या मुलाखती घ्यायची, तिला साहित्यीकांच्या भेटी घाटी होण्यास माझी मदत व्हायची कारण माझा प्रकाशन व्यवसाय असल्याने या मंडळीत माझी उठबस असायची.
प्रश्न – अनघाताई जयंतरावांना वर्षभरात सोडून गेल्या, त्या सोडून जाणार हे तुम्हाला माहीत होतं का?
मी- नाही.
प्रश्न – अनघाताईनी जयंतरावांशी स्वत:हून लग्न केलं होतं, मग असं काय झालं, की त्या वर्षाच्या आत त्यांना सोडून गेल्या?
मी – याची मला कल्पना नाही, ते तुम्ही अनघाला विचारा.
एवढ्यात त्या मुलाखत घेणार्या दोन मुली पैकी दुसर्या मुलीने सोबतच्या बॅग मधून एक जूना पेपर बाहेर काढला, ती मुलगी बोलू लागली.
“वसंत सर, जयंतरावानी १९९५ साली कोल्हापूरच्या पुढारीस मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत जयंतराव म्हणतात
– वसंताने म्हणजे तुम्ही माझी म्हणजे जयंतरावांची नाटके प्रकाशीत करायला नकार दिला, खरं तर वसंताचे पब्लीकेशन हे त्या काळी मराठीतील सर्वोत्तम प्रकाशन होते. शिवाय त्यांची मुंबईत स्वत: ची दोन दुकाने होती, म्हणून मला ती पुस्तके पुण्याच्या नवीन प्रकाशकाकडे द्यावी लागली
आणि येवढ्या चांगल्या पुस्तकांची त्यांनी वाट लावली, ती खपली नाहीत, लोकांपर्यंत पोहचली नाहीत.
मी ओरडलो- हे खोटं आहे. जयंता खोटे बोलत आहे.
पुन्हा तीच मुलगी बोलू लागली.
वसंत सर, जयंतरावांच्या निधनानंतर दुरदर्शच्या प्रतिनिधीने तुमच्या मोठ्या भावाची म्हणजेच जे तुमची दोन्ही दुकाने सांभाळतात, त्या प्रभाकर रावांची मुलाखत घेतली होती, त्याची कॅसेट माझ्या कडे आहे.
त्या मुलाखतीत तुमचे मोठे भाऊ प्रभाकरराव म्हणतात
जयंतराव हे उच्च दर्जाचे कवी होते, कथा लेखक होते, आम्ही त्यांची पुस्तके सुरवातीस छापली, पण काय झाले कोण जाणे, माझा धाकटा भाऊ वसंत हाच त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्या काढायला विरोध करू लागला.
मला दरदरून घाम सुटला. एवढ्या मोठ्या श्रोत्यांसमोर या दोन मुली मला उघडं पाडत होत्या,
मी ओरडलो – कोण आहात तुम्ही ? मला पाहुणा म्हणून बोलावलत आणि मलाच खोटारडा ठरवता ? माझा अपमान करता?
“तुमचा अपमान नाही करत सर, आम्ही दोघीनी जयंतरावांच्या साहित्यावर पी. एच. डी केली आहे. त्यांच्या साहित्यात जसजसं खोल जाऊ लागलो, तसें लक्षात आले, एवढ्या ताकदीचा लेखक त्याची तुम्ही काढलेली कविता संग्रह किंवा कथासंग्रह कुठेच उपलब्ध नाही, अगदी वाचनालयात सुद्धा, ज्यांची कुवत नाही. अशा लेखकांच्या तुम्ही तीन चार आवृत्या काढता
आणि जयंतरावांसारख्या असामान्य लेखकांची पुस्तके मिळत नाहीत. त्यांची पुस्तके खपत नव्हती. मग जयंतराव गेल्यानंतर त्यांच्या साहित्याच्या दरवर्षी आवृत्या कां काढता?आणि त्यांची पुस्तके आता खपतात कशी?
माझा आरोप आहे जयंतरावांच्या पुस्तकांचे अधिकार स्वत:कडे ठेऊन तुम्ही जयंतरावांची फसगत केलीत. असं नाही वाटत?
त्या दोन मुलींच्या एका पाठोपाठ एक प्रश्नांच्या फैरी झडत होत्या. मी केविलवाणा होऊन ऐकत होतो.
मी खजील होऊन व्यासपीठ सोडले आणि बाहेर येऊन माझ्या गाडीत बसलो. मी गाडी स्टार्ट केली, एव्हढ्यात माझ्या मनात आले ज्या चुका माझ्या हातून झाल्या त्याची कबूली देण्याची हीच वेळ आहे.
मी गाडी बंद केली आणि पुन्हा हॉल मध्ये आलो. हॉलमध्ये येऊन माझ्या खुर्चीवर बसलो. मी बाहेर पडताच हॉलमधील लोक खुर्च्या सोडत होते, त्या दोन मुली पण आपले कागद, लॅपटॉप आवरून निघायच्या बेतात होत्या.
मी स्टेजवर येऊन खुर्चीवर बसताच आयोजकाने माझ्या हातात माईक दिला आणि मी बोलू लागलो.
साहित्य जीवन या ग्रुपने माझ्या मित्राच्या स्मृतिदीनानिमीत्त येथे मला आमंत्रित केले त्या बद्दल आभार.
मंडळी, आयुष्यात काही चुका होतात. मी माझ्या मित्राशी जे वागलो त्याबद्दल माझ्या मनात खंत आहे. जे मनात आहे त्याची कबुली देण्याची या व्यासपीठा सारखे उत्तम व्यासपीठ कदाचीत मला मिळणार नाही.
माझी मुलाखत घेणार्या या दोन हुशार मुलींना जयंताच्या साहित्यावर डॉक्टरेट करावीशी वाटली. यातच त्याचे साहित्य काय उंचीचे आहे ते लक्षात येईल.
मंडळी, आता तुम्हाला माझ्याकडून जयंताच्या साहित्याकडे कानाडोळा का झाला किंवा मी जयंताचा द्वेष का केला हे सांगावे लागेल.
यासाठी सुमारे चाळीस वर्षापूर्वीचा काळ आणि त्यानंतर ची दहा वर्षे डोळ्यासमोर आणावी लागतील
मी, जयंता आणि अनघा एका कॉलेज मध्ये होतो. तिघांनाही लेखन, नाटक, संगीत यांची आवड, जयंता उत्तम कविता करायचा तसेच उत्तम लिहायचा.
अनघा गायिका, उत्तम वाचक, नाटकामध्ये काम करणारी अभिनेत्री, दिग्दर्शिका. मला सर्वच कलांमध्ये उत्तम गती होती.
अनघा वरच्या आर्थिक परिस्थितीत, मी मधल्या आणि जयंता कनिष्ठ. आम्ही तीघे एकत्र संगीत मैफली ऐकायचो, नाटके पहायचो, प्रायोगिक नाटके करायचो.
मला अनघा आवडायची. ती कधी कधी आमच्या घरी यायची. आमच्या दुकानात यायची, माझ्या आई-बाबा बरोबर गप्पा मारायची. माझ्या घरच्यांना वाटत होते की बहुतेक माझं अनघा बरोबर लग्न होईल.
माझ्या व्यवसाया निमित्त मला दोन महीन्यासाठी लंडन ला जावं लागलं. जाण्याआधी जयंताला त्याची नाटके मी आल्यावर छापूया असे सांगून मी लंडन ला गेलो.
दोन महीन्यानंतर मी लंडनहून आलो. मधल्या काळात जयंताने अनघाशी लग्न केले होते आणि त्यांनी खेतवाडीत बिर्हाड केले होते. हा मला मोठा धक्का होता.
जयंतरावांचा पाचवा स्मृतीदिन जवळ आला तसा साहित्यिक विश्वात त्यांच्याविषयी लिहून यायला लागलं. जयंतरावांचे फॅन्स सर्वत्र, मुंबई, पुण्यात जास्त. पुण्याच्या साहित्य जीवन या गृपने मला प्रमुख म्हणून आमंत्रित केलं. तसे दरवर्षी मला कुठे ना कुठे बोलावलं जातंच. पण यंदा पुण्याच्या गृपने एक महिना आधी माझा होकार मिळविला. मी जयंताचा प्रकाशक.. त्यापेक्षा जवळचा मित्र म्हणून मला जास्त मागणी.
गेले महीनाभर जयंताच्या आठवणी पिंगा घालत अवतीभवती फिरत होत्या. नेहमी प्रमाणे त्याच्या कवितासंग्रहाच्या आणि कथा पुस्तकांच्या आवृत्या माझ्या प्रकाशन संस्थेमार्फत काढल्या. या सुमारास त्याची पुस्तके खपतात हा अनुभव. प्रत्येक आवृत्तीची छपाई झाली की त्यातील एक पुस्तक माझ्याकडे येत होते.
प्रत्येक पुस्तक म्हणजे जयंताच्या आठवणींची एक लाट. लाट अंगावर येवून मला चिंब भिजवत होती.
पुण्याच्या कार्यक्रमासाठी मी आधल्या दिवशी पुण्यात पोहचलो. सकाळी नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला.
व्यासपीठावर जयंताचा मोठा फोटो लावला होता. टेबल, चार खुर्च्या आणि समोर जयंताच्या साहित्याचे चाहते. त्यामुळे हॉल त्याच्या चाहत्यांनी भरला होता. सुरूवातीस स्वागत झाले. माझ्या हस्ते जयंताच्या फोटोस हार घातला गेला आणि माझ्या भाषणाऐवजी जयंताच्या आठवणीसाठी माझी मुलाखत घेण्यासाठी दोन मुली समोर येवून बसल्या. आणि प्रश्नोत्तरे सुरू झाली….
प्रश्न- “सर, जयंतराव हे तुमचे मित्र आणि लेखक सुद्धा. तुम्ही त्यांचे चार कविता संग्रह आणि तीन कथा संग्रह प्रकाशित केलेत, मग तुमचे जास्त जवळचे नाते काय? मित्र की लेखक ? “
मी – मैत्री पहिली. आम्ही दोघे मुंबईच्या एलफिस्टन कॉलेजमध्ये शिकत होतो. लेखन, वाचन, नाटक, संगीत या आवडीने जवळ आलो.
प्रश्न – मग तुम्ही प्रकाशन व्यवसायात कसे आलात ?
मी – प्रकाशन हा माझ्या कुटुंबाचा व्यवसाय. त्या वेळी आमची मुंबईत दोन पुस्तकांची दुकाने होती, आता सहा आहेत.
प्रश्न – जयंतराव केव्हापासून लिहू लागले? कॉलेजमध्ये असताना की नंतर ?
मी – तो कॉलेजमध्ये असताना कविता करायचा. आम्हाला कॉलेजमध्ये शिकवायला प्रसिद्ध लेखक, कवी होते. त्यांचे पण संस्कार त्याच्यावर झाले. कॉलेजनंतर तो म्युनिसिपालटीमधे नोकरीला लागला. लेखन सुरूच होते.
प्रश्न- जयंतरावांना संगीताची पण समज होती असं म्हणतात.
मी- समज होती नाही.. तो उत्तम गायचा, आमची खरी मैत्री गाण्यामुळे झाली.
प्रश्न – सर, जयंतरावांची पत्नी ही तुमची वर्गमैत्रीण ना? त्यांना अनेक कलांची देणगी होती असे म्हणतात.
मी – ती उत्तम अभिनेत्री, लेखिका, गायिका होती
प्रश्न – सर, कॉलेज मध्ये असताना तुम्हा तिघांचा गृप होता असे म्हणतात हे खरे आहे काय?
मी – हे खरे आहे, मी, जयंता आणि अनघा नेहमी एकत्र असायचो. तिघांच्या आवडीनिवडी सारख्या, त्यामुळे आमचं मस्त जमायचं.
प्रश्न – त्या काळात तुम्ही नाटके पण फार बघायचात ?
मी – होय. आम्ही विजया मेहतांच्या रंगायन गृपमध्ये होतो. विजया मेहता अल्काझींच्या विद्यार्थीनी. त्यांनी मराठी नाटकात नाविन्य आणले. लहान हॉलमध्ये नाटके व्हायची, आम्ही लहान-लहान भूमिका करायचो, तसं नाटकाचं सारच करायचो, नेपथ्य लावायचो, लाईट जोडायचो, मेकअप करायचो, सतत बाईंच्या बरोबर असायचो.
प्रश्न – आणि तुमचा व्यवसाय?
मी – व्यवसाय सांभाळायचोच, कॉलेजमध्ये असतानाच मी पुस्तक प्रकाशन व्यवसायात आलो.
माझ्यापेक्षा तिप्पट, चौपट वयांच्या लेखकांची पुस्तके मी प्रकाशित करत होतो.
प्रश्न – तुम्ही जयंतरावांची पण पुस्तके प्रकाशित केलीत?
मी – त्याचे कवितासंग्रह, कथासंग्रह मीच प्रकाशित केले.
प्रश्न – आणि त्यांची नाटके? विशेषत: त्यांचे प्रसिद्ध नाटक अलेक्झांडर?
मी – त्याची नाटके दुसर्या प्रकाशकाने प्रसिध्द केली
प्रश्न – तुम्ही एवढे जवळचे मित्र असताना ती पुस्तके दुसर्यांकडे का गेली ?
मी- ते आता मला तुम्हाला सविस्तर सांगावे लागेल. कॉलेज काळात मी, जयंता आणि अनघा कायम बरोबर असायचो. जयंता मध्यमवर्गीय गिरगावातला मुलगा, दहा बाय दहाच्या जागेत आठ जण राहायचे, अनघा ही फायझरच्या ऑफिसरची मुलगी. त्या काळी वडीलांची गाडी वगैरे असलेली. मी ग्रॅन्टरोड भागातील उच्च मध्यम वर्गीय. आमचे कुटुंब पुस्तक व्यवसायात. अनघा मला आवडत होती. विजयाबाईंच्या रंगायनमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करायचो, नाटकाच्या तालमीला जाताना अनघा आपली गाडी घेऊन यायची, माझ्या घराजवळ येवून मला गाडीत घ्यायची, पुढे जयंताला ठाकूरव्दारच्या कोपर्यावर घ्यायची. तालमी संपवून येताना आम्ही तिघे गिरगाव चौपाटीवर बसायचो. जयंता त्याच्या कविता म्हणायचा, अनघा त्याला चाल लावायची आणि गाणं म्हणायची. अनघा जयंताला म्हणायची – “चांगल्या इंग्लीश नाटकांची भाषांतरे कर, तू कवि मनाचा आहेस, आपण बाईंना सांगू नाटक बसवायला. ” अनघाने ब्रिटीश लायब्ररीमधून सात -आठ इंग्लीश नाटके आणून दिली. जयंताने मनापासून त्यांची रूपांतरे केली. अलेक्झांडर त्यातील एक, बाईंनी अनघाला हे नाटक बसवायला सांगितले. नव्या जुन्या कलाकारांना घेवून अनघाने हे नाटक बसविले. त्याचा प्रयोग मी पाहीला. आणि जयंताला म्हटले- ” हे नाटक मी छापणार”. , त्यावर जयंता म्हणाला – ” तूच छाप, तूझ्याशिवाय दुसरं कुणाला देणार ?” त्या नाटकाचा बराच बोलबाला झाला, जयंताचे खूप कौतुक झाले. अनघाने नाटक बसवले म्हणून तीचे कौतुक झाले. पुस्तक मी प्रकाशित करणार या आनंदात होतो. सहा महीने झाले तरी जयंताने त्या पुस्तकांची हस्तलिखीते दिली नाहीत, अचानक मला समजले की ही पुस्तके पुण्याचा एक प्रकाशक छापत आहे. मी आश्चर्यचकित झालो. आणि जयंताच्या घरी गेलो.
“जयंता, तुझी नाटकाची पुस्तके पुण्याचा प्रकाशक छापतो आहे हे खरे काय”?
”होय, हे खरे आहे”
”पण मी तुला तुझी सर्व नाटके छापणार हे सांगितलं होतं. आणि मी हस्तलिखीते मागत होतो ”.
“अनघाने या प्रकाशकाला माझ्याकडे आणले. ”
“अनघाने? मग तिने मला कां नाही सांगितले”?
“अनघाचे म्हणणे तू जे माझे कवितासंग्रह छापलेस, त्याचे मानधन फारच कमी दिलेस, त्याच्या डबल पैसे मिळायला हवे होते. ”
“अरे, पैशांचा व्यवहार माझा मोठा भाऊ पाहतो, मी नाही आणि मला जर हे अनघा बोलली असती तर मी भावाकडे बोललो असतो”.
“अनघा म्हणते, तू जी पुस्तके छापलीस त्याची क्वॉलीटी चांगली नव्हती. इतर प्रकाशक पुस्तके छापतात त्या मानाने काहीच नाही. “
“हा आरोप मला मान्य नाही. मी तुझी पुस्तके मुंबईतील सर्वोत्तम प्रेसमधून छापून घेतलीत आणि अनघा म्हणते….. हे काय आहे.. तुझे काय मत आहे? तुझी पुस्तके खराब केली असे तुला म्हणायचे आहे काय”?
☆ “गोष्ट तशी जुनीच…” – भाग – २ – लेखिका : डॉ. तारा भवाळकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(ही बहिणही रडत भेकत माहेरी आली. तर सगळे तिला म्हणाले, ” हे बघ, एकदा नीट पाहून तुझे आम्ही लग्न लावून दिलं होतं. आता तू आणि तुझं नशीब. ” ) – इथून पुढे —
” असं कसं, असं कसं ? आता तिच एकटीचच नशीब कस?
त्या नव-याचही नशीब नाही का ?आणि तिची सासू आमच्या
मरून गेलेल्या आईचा काय म्हणून उद्धार करते ? मोठ्या ताईला आणि दुस-या माईला दोन दोन मुलगे कसे झाले मग आधी ? त्या नाहीत का याच आईच्या लेकी. “
” पुरे ग, तुझी अक्कल नको पाजळू. प्रसंग काय, ही बोलतीय काय ? “
” काय चुकीचं बोलले ? अं, खरं तर हे तुम्ही तिच्या सासरच्या माणसांना ठणकावून सांगायला हवं होतं. आणि तिचा नवरा एवढा शिकला सवरलेला हिला काडीमोड न देताच असं कसं दुसरं लग्न करतो ? बेकायदेशीर नाही का ते ? ही आपली रडत भेकत इथं आली. तिथं नव-याला आणि सासूला नाही का जाब विचारायचा. लग्नाच्या आधी माहित होतं ना त्यांना आम्ही चौघी बहिणीच आहोत म्हणून. “
“अग पण तुला विचारलय का कुणी ? अं? आम्ही मोठी माणसं आहोत ना ? तिला त्यांनी घटस्फोट दिला आणि उद्या ही पोरींच्या सकट माहेरी पाठवून दिली तर सांभाळणार कोण त्यांना ? “
” मग काय त्याच घरात राहणार काय ही सवती बरोबर ? “
” काय करणार मग? त्याच्याशी बोलणं झालंय आमचं. तो हिलाही नांदवायला तयार आहे. हा मोठेपणाच की त्याचा. “
” डोंबलाचा मोठेपणा. मुलगा किंवा मुलगी होण्यात बाईचा काहीच दोष नसतो, असला तर पुरुषाचाच असतो हे शास्त्रानं सिद्ध झालय. तुम्हालाही हे माहित आहे आणि त्यालाही हे माहीत आहे. “
” अग पण त्यांच्या वंशाला मुलगा हवा असला तर त्यांना ? “
” कशाला पण ? मुलगी नाही का वंशाचं नाव मोठं करीत ? आणि मुलगा व्यसनी, मठ्ठ, गुन्हेगार झाला आणि एकुलता एक म्हटलं की हमखास अती लाडानी तो तसाच होतो, तर मग त्या वंशाचं नाव काय कोळश्यानं लिहीणार आहेत का हे लोक ? “
” अग बाई, काय तोंडाला हाड आहे का नाही तुझ्या ? जरा शुभ बोलायला काय होतं तुला ? “
” तुम्ही सगळी करणी अशुभ करा. “
” जाऊ दे, मरु दे. आता हिचचं एकदा लग्न करून द्या. मग हिची चुरुचुरू बोलणारी जीभ काय करते ते दिसेल “
अखेर वडीलच म्हणाले
” हिने आजवर माझं काहीच ऐकलं नाही. ” ते ही थकले होते आता.
” काॅलेजला जाऊ नको म्हटलं, गेली. मैदानावर मुलांच्या बरोबर खेळू नको म्हटलं तर अर्धी चड्डी घालून उंडारतीय. तोंड सुटल्यासारखी कुठे कुठे भाषण करतीय. कोण हिच्याशी लग्न करणार? सज्जन घरात तर हिचा निभाव लागणं कठीण! “
” कुणी सांगितलं तुम्हाला माझं लग्न करा म्हणून. आणि यांना सगळ्यांना जी सज्जन घरं पाहून दिली होती त्यांनी काय दिवे लावलेत ? “
खरंतर तिचं म्हणणं सगळ्यांना मनातून पटत होतं. पण कबूल करवत नव्हत. घरातला विरोधही दिवसेंदिवस बोथट होत गेला होता.
तिला जे जे करावसं वाटत होतं ते ते ती करतच होती. पण वडिलांच्या कडून पैसे घेणे तिने कधीच बंद केलं होतं. हायस्कूल मध्ये ती सतत वरच्या वर्गात होती. त्यामुळे तिला फी पडत नव्हती. शिवाय किरकोळ खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळत होती. सतत कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत तिला बक्षीस मिळत होती. इतकं करून कॉलेजला इतर मुलींच्या सारखे तिचे नखरे नव्हते. नटण्या मुरडण्याची, दाग दागिन्यांची तिला आवड नव्हती. मोजके पण व्यवस्थित कपडे आणि नीटनेटकी स्वच्छ रहाणी. तरी अशी काय भणंगासारखी राहते ? मुलीच्या जातीला शोभेसं राहू नये का? बांगड्या नाहीत, गळ्यात नाही. काही नाही. घराण्याची अब्रू काढते नुसती. अशा कुरबुरींच्याकडे तिने कधीच लक्ष दिल नाही. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापासूनच तिने एका कारखान्यात अर्धवेळ नोकरी धरली होती. एक श्रीमंत सेवाभावी गृहस्थानी केवळ बायकांना स्वावलंबी होता यावं म्हणून हा कारखाना सुरू केला. तिचं कामातलं कौशल्य, लोकसंपर्क साधण्याची कला, कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा याची नोंद वरिष्ठांनी कधीच घेतली होती. तिचं काॅलेजच पदवीचं वर्ष संपलं आणि मालकांनी तिला मुद्दाम बोलावून घेतल.
“आता काय करणार आहेस ?”
“तसं काही ठरवलं नाही. पण काहीतरी कायमची नोकरी, कामधंदा करायचा आहे हे निश्चित. “
” आहे हेच काम वाढवायला आवडेल तुला?”
” म्हणजे ?”
“एक नवीन युनिट सुरू करायचय. खास ग्रामीण महिलांसाठी. इथं कोणती
उत्पादन करायची, महिलांना प्रशिक्षण कसं द्यायचं, दर्जा कसा वाढवायचा, बाजारातला खप कसा वाढवायचा अशा सर्वांगीण जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीच्या शोधात मी आहे. तुझी इच्छा असेल तर ही जबाबदारी घेण्यासाठी मी तुला निमंत्रण देतोय असं समज. “
क्षणभर ती गोंधळली. पण दुस-याच क्षणी तिच्या नजरेत आणि अविर्भावात असा भाव होता की हे असच व्हायला हवं होतं. मला प्रथम विचारलं याच्यात काहीच आश्चर्य नाही. तरी मृदूपणाने ती म्हणाली
” तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. “
आणि आता ? आता ती कारखानामय झाली. घरात राहणं जवळजवळ संपलं. आवश्यक कामासाठीही घरी जायला वेळ मिळेना. अखेर मालकांनीच कारखान्याजवळ तिच्या निवासाची चांगली व्यवस्था केली. एक दिवस शिपाई काम करणारी तिची सहकारी बाई सांगत आली, “बाहेर दोघीजणी तुम्हाला भेटण्यासाठी केव्हाच्या थांबल्या आहेत. तुम्ही मिटींग मधे होतात म्हणून सांगितल, “थांबा”. पण तरीही त्या थांबूनच राहिल्या. आता यातही तिला नवीन काहीच नव्हतं. तिची आणि तिच्या कारखान्याची कीर्ती, व्याप वाढतच होता. कोणी कोणी माणसं अखंड तिच्या भेटीसाठी खोळंबून असत. कधी व्यापारी, छोटे उद्योजक, कधी कुठल्या संस्थेच्या
कार्यक्रमासाठी तिला पाहुणे म्हणून निमंत्रण करणारे आणि कधी कधी काम मागणारे. आता केवळ स्त्रियांसाठी यापेक्षा गरजू आणि पात्र कामगारांसाठी मग त्या स्त्रिया असोत की पुरुष. तिचा कारखाना चालू होता. त्यातून तरुण तरुणी नवनवीन कल्पना घेऊन ताज्या उत्साहाने तिच्या कारखान्यात काम करत होते. माणसातल्या कष्टाळूपणाला आणि प्रामाणिकपणाला तिथे जास्त किंमत होती. दिखाऊ दिमाख त्यांना वर्ज्य होता.
“बाईसाहेब, पाठवू का त्या दोघींना आत ? “
खरंतर आता तिला थोडी शांतता हवी होती. खूप वेळ कामात राहिल्याने शीण आला होता. तरी ती म्हणाली “हो पाठव ”
दोन ओढलेल्या प्रौढा समोर खालमानेने उभ्या होत्या. फाईल मध्ये पाहतच, अंदाज घेत तिने विचारलं “हं, काय काम होतं ?”
त्रयस्थ स्वर ऐकून त्या आणखीनच काव-या बाव-या झाल्या. तिची मान अजून फाईलमध्येच होती.
” काम हवं होतं. “
हे ही नेहमीचचं.
कसलं काम? काय करायची तयारी आहे ? “
” काहीही “
” कधीपासून येणार? “
” अगदी आजपासूनही. फार गरज आहे हो. “
सलग दोन वाक्य कानावर पडली तेव्हा ती काहीशी चमकली. हळूच नजरेच्या कोपऱ्यातून दोघींच्याकडे तिने पाहिलं. अंदाज खरा होता. क्षणभर ती विमनस्क झाली. आपल्याला वाईट वाटतंय की संताप येतोय हे तिचं तिलाच कळेना. पण आपल्या भावनांच्या वर नियंत्रण ठेवणं आता तिचा स्वभाव झाला होता. त्याखेरीज हा एवढा मोठा व्याप जबाबदारीने सांभाळणं शक्य नव्हतं.
पुन्हा त्यांच्याकडे पाहिलं न पाहिलंस करुन तिनं शिपाई बाईला तिच्या हाताखालच्या व्यवस्थापकांच्याकडे न्यायला सांगितलं आणि त्या बाहेर पडताच व्यवस्थापकांना फोनवरून आवश्यक त्या सूचना दिल्या. दोन महिने गेले. दोन-तीन दिवस कारखान्याला दिवाळीची सुट्टी होती. रितीप्रमाणे सर्वांना दिवाळी भेट दिली गेली.
कारखाना आता शांत वाटत होता.
त्या दोघींच्याकडं तिचं नकळत लक्ष होतं. आता त्या रुळल्या होत्या. बुजरेपणा कमी झाला होता. सुरुवातीला संध्याकाळी थकल्यासारख्या दिसायच्या. आता उत्साही दिसत. दिवाळीची भेटवस्तू घेऊन जाताना आज त्या ताठ मानेने ब
बाहेर गेल्या. दिवाळीची सकाळ. तिने निरोप दिल्याप्रमाणे ठरल्यावेळी त्या दोघी तिच्या घरी गेल्या. आज तीच काहीशी कावरी बावरी झाली होती. आपण केलं ते बरं की वाईट तिचं तिलाच ठरवता येत नव्हतं. तरी समाधान होतच. दारातून प्रसन्नपणे तिने दोघींना हात धरुन आत आणलं. कोचावर बसवत म्हणाली, ” या, ताई, माई. खूप बरं वाटलं. “
” तुम्ही ओळखलतं? “
“तूच म्हणा. मी प्रथमच तुम्हाला ओळखलं होतं. तुमची परिस्थिती माझ्या कानावर येत होती. पण मी जाणीवपूर्वक घराकडे पाठ फिरवली होती. आपली विश्वं एकमेकांच्या पासून फार दूर होती. रोज खाणाखाणी करत एकमेकांना घायाळ करत जगण्यातनं काय निष्पन्न होणार होत? तुमची पिढ्यान पिढ्यांची चाकोरी, विशेषतः मनांची, माझ्या बोलण्या वागण्याने बदलणार नाव्हती. उलट कटूता वाढणार होती. म्हणून मी शांतपणे घर सोडलं. पण तेव्हाही मला माहीत होतं, एक दिवस नक्की तुम्ही माझ्याकडे येणार आहात. “
” मग आम्ही आलो त्यावेळी ओळख का नाही दिलीसं?”
” फार अवघड गेल मला तेव्हा दुरावा दाखवणं. पण तुमची तुम्हाला नीट ओळख व्हावी म्हणून दूर राहणं मला गरजेचं वाटलं. “
“नाही, खरं आहे. त्यावेळी तू ओळख दाखवली असतीस तर आम्ही परत ऐदीपणानं तुझ्याकडूनच मदतीची अपेक्षा करत राहिलो असतो. त्याचा सर्वांनाच त्रास झाला असता. “
“मुख्य म्हणजे तू म्हणतेस तशी आमची आम्हाला ओळखच पटली नसती. खऱ्या अर्थाने तुझी ही ओळख झाली नव्हती. कामातला आणि स्वावलंबनातला आनंद या दोन महिन्यांनी दिला. महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ कळला. बळ कळलं. हो, नाहीतर पूर्वीसारखच म्हणत राहिलो असतो, स्वातंत्र्याच्या नावावर ही भरकटतीय. खरंतर केवढी मोठी जबाबदारी तू पेलतीयेस. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. त्यात बळही आहे. आनंदही आहे. वेगळ्या नशिबाची गरजच काय. “
कितीतरी वर्षांनी सगळ्या बहिणी खऱ्या अर्थाने मायेने जवळ आल्या होत्या. सगळे तपशील त्यात वाहून गेले होते.
— समाप्त —
लेखिका : डाॅ. तारा भवाळकर
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “गोष्ट तशी जुनीच…” – भाग – १ – लेखिका : डॉ. तारा भवाळकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. खरं तर राजा होता की डाॅक्टर होता की पुढारी होता की शेतमजूर होता याला महत्व नाही. पण आटपाट नगर म्हटलं की ‘तिथं एक राजा होता’ असं म्हणायची तोंडाला आणि ऐकायची कानाला इतकी सवय झालीय की म्हणून टाकलं आपलं रितीप्रमाणं. , “तिथं एक राजा होता “. या गोष्टीपुरतं नेमकं सांगायच झालं तर तो चार पोरींचा बाप होता हे महत्वाचं. उद्योग त्याचा काही का असेना, मुलींचा बाप हे महत्वाच ! शिवाय प्रत्येक घरातला बाप हा कुटुंब प्रमुख म्हणून आपल्यापुरता राजाच असतो की आपल्या कुटुंबाचा.
सर्वसत्ताधारी ! तसाच हा ही. तर त्याला चार मुली होत्या. एखादी मुलगी असली तर मागच्या जन्मीचं पाप, उरावरची धोंड अस काय काय काय असतं. इथं तर चार मुली ! संस्कृत मध्ये एक वचन आहे ना, ” एकैकमपि अनर्थाय किमुयत्र चतुष्ठयम् ” एक अनर्थकारक असतं तर चार एकत्र आल्यावर किती मोठा अनर्थ होईल!सुभाषित आहे वेगळ्या संदर्भातलं. पण मुलींच्या बापाच्या दृष्टीने ते इथं अगदी फिट्ट बसत. एक मुलगी झाली तेव्हा मनाची समजूत घातली ‘पहिली बेटी मुलगा होईल तिच्या पाठी’, म्हणून तिचे थोडेफार लाडही झाले. पण दुसरीही मुलगी ! तिसरीही मुलगी ! बापाच्या उत्साहाचा पारा खाली खाली आणि रागाचा पारा वरती
वरती. मुलींची अनुभवी आज्जी म्हणाली, ” वाट पहा, आता चौथ्यांदा नक्की बेटा होणार. अनेकदा तिघींच्या पाठीवर मुलगा होतोच. कसलं काय!, चौथीही मुलगीच. मग थकल्या भागल्या मुलींच्या आईनी लवकरच राम म्हटला, कायमचा!. मुली म्हटलं
की कधी ना कधी लग्न ही होणारच. दुपट्यातनं बाहेर पडून आपल्या दोन पायावर मुली चालायला लागल्या की त्यांना सगळं जग उठल्या बसल्या लग्नाचीच आठवण करून देत असतं. तसच या मुलींच्याही मनात लहानपणापासून घट्ट धरुन ठेवलेलं, लग्नाशिवाय आपलं काही खरं नाही. लग्न तर करायलाच हवं. मुलीच्या जातीनं दुसर करायचचं काय म्हणा ? एकदा आज्जीनं सांगितलं.
सगळ्यांनी माना डोलावल्या. सगळ्यांनी म्हणजे थोरल्या तिघींनी. धाकटी जरा अवखळच.
” म्हणजे काय ? मुलींनी लग्नाशिवाय दुसरं काहीच कसं करायचं नाही ? मुलगी लग्न करते तेव्हा एक मुलगाही लग्न करतोच ना ? “
” अगं मग त्याशिवाय का मुलीचं लग्न होतं ?”
सगळ्या तिच्या अडाणी प्रश्नावर फिसफिसल्या.
” तसं नाही, तसं नाही, तसं नाही, मला म्हणायचं होतं की मुलगा लग्न करुन स्वस्थ बसतो का घरात ? त्याचे आधीपासूनचे सगळे उद्योग चालुच असतात की नाही नंतर पण?”
कोण असल्या तिरपांगड्या मुलीबरोबर बोलणार?
तरीही तिचं आपलं चालायचंच.
” काय ग ताई, अभ्यास करायला काय होतय तुला ? यंदाही नापासच झालीस ना ? “
” होऊ दे झाली तर. तिला थोडीच नोकरी चाकरी करायची आहे? कशी गोरीगोमटी नक्षत्रासारखी मुलगी कुणीही हासत उचलून नेईल. “
” शी, कुणी उचलून नेलं तर चालेल तुला ताई ? लाजतेस काय अशी ? तू म्हणजे काय बाजारातली भाजी आहेस ? तुला तुझं काही मतबीत आहे की नाही ?”
भारीच बाई ढालगज ही धाकटी. हा एकूण घरादाराचा अभिप्राय!
दिवस काही बसून रहात नाहीत. आज्जी आता थकली आणि तिची भुणभुण सुरु झाली.
वेळेवारीच आपल्या समया उजवलेल्या ब-या. बापालाही ते एकदम पटलं. आधी आपल्या पोरींची पारख आपणच करावी म्हणून त्यांनी आपल्या चारी पोरींना समोर बसवलं. पहिल्या तिघी, साज-या, गोज-या, लाजाळू, खालमानी, सालसपणानी येऊन ओठंगून उभ्या राहिल्या. धाकटी जरा अवखळ, आईवेगळी. म्हणून जरा आज्जीची लाडावलेली. बापानं दुर्लक्षलेली. शिवाय वय थोडं लहान.
बापाने बापाला शोभेल अशा गंभीरपणाने मुलींना बोलावण्याचा उद्देश सांगितला. ” “आता तुमची लग्न करायचा इरादा आहे. इतके दिवस तुमची जबाबदारी माझी होती. मीच तुमचा कर्ता धर्ता. माझ्या जीवावर तुम्ही लाडाकोडात वाढलात. सगळ्यांनी माना डोलावल्या.
” म्हणजे काय ? बाबा कसले लाड केलेत हो तुम्ही ? दोन वेळेला जेवाय खायला घालून अंगभर कपडे दिले एवढेच ना? ” धिटुकलेपणाने धाकटी बोलली. बाबा सकट चमकून सगळ्यांनी माना वर केल्या.
” काय तरी हा अबूचरपणा ? असं बोलतात का कोणी बापाला?”
थोरलीने तिला चिमटा काढला. तर किंचाळत ती म्हणाली ” काय चुकीचं बोलले ग मी ताई ? तुम्ही सुद्धा? “
दुसरीनं तिला डोळ्यानी दटावलं.
तिसरी घाई गर्दीन म्हणाली, ” नाही, नाही. खरं आहे बाबा. तुम्ही ना तिच्याकडे लक्ष नका देऊ. तुमच्या मुळेच तर आम्ही जगलो. तुमचं नशीब ते आमचं नशीब. “
“असं कसं, असं कसं, असं कसं होईल पण ? ज्याचं त्याचं नशीब वेगळंच असतं. स्वतंत्र असतं. ज्याचं
शरीर जसं स्वतंत्र असत ना, तसं ज्याचं त्याचं नशीब पण स्वतंत्र असतं. ” पुन्हा धाकटी बोलली.
” गप गं, कळतं का काही तुला ? “
” पण परवाचं तर सगळे म्हणतं होते ना धाकट्या आत्याला सासुरवास होतो तर तिचं नशीबच तसलं.
मग आजोबांचं श्रीमंत नशीब का नाही बरं तिचं झालं ?का वाईट झालं तर तिचं नशीब आणि चांगलं झालं की तिच्या बाबांचं नशीब. “
” गप गं बाई. तुझं तुला तरी कळतं का तू काय बोलती आहेस ते ? “
“कळतं. तुम्हालाच कळत नाही तुम्ही काय म्हणताय ते. आंधळ्या आहात तुम्ही सगळ्या. “
‘हे बघ तू सध्या गप्प बस. तुझं मत मी विचारलेलं नाही. विचारेन तेव्हा सांग. ” बाबाच असं म्हणाले तेव्हा ती गप्प बसली. पण आपल्याला विचारलं की अगदी मनात असेल ते स्पष्ट सांगायचं असं तिने ठरवून टाकलं. मग अगदी गोष्टीतल्या सारखच घडलं. बाबांनी प्रत्येकीला विचारल, ” तू कोणाच्या नशिबाची बाई ? ”
“तुमच्याच की बाबा. ”
प्रत्येकीन खालमानेनं उत्तर दिलं. बाबांना स्वर्ग दोन बोटे उरला. किती मान देतात पोरी. आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत. “छान, आता तुमच्यासाठी मी नवरे शोधतो.
सगळ्यांनी माना डोलावल्या. मग गोष्टीत सांगितल्याप्रमाणेच त्यांच्या बापाच्या मते चांगली असलेली स्थळे पाहून थाटामाटात लग्ने लावून दिली. मग रितीप्रमाणे सगळ्याजणी एकमेकींच्या गळ्यात पडून रडल्या आणि नवऱ्या शेजारी गाडीत बसल्यावर नवऱ्याकडे पाहून खुदकन हसल्या. धाकटीला मनातल्या मनात सगळाच खुळचटपणा वाटत होता. तसं ती चुलतीला म्हणाली सुद्धा. तर हीच खुळचट असल्यास्रख चुलतीनं तिच्याकडं बघितलं.
थोरली पहिल्या बाळंतपणासाठी आली आणि महिनाभरात परत जायची घाई करायला लागली. नवऱ्याला एकटं ठेवणं तिला धोक्याचं वाटत होतं. चुलती म्हणाली, ” अगं पण घरात आक्काताई आहेत ना त्यांना रांधून घालायला ?”
अक्काताई म्हणजे तिची विधवा चुलत जाऊ. तर ती पटकन म्हणाली, ” म्हणून तर काळजी वाटते ना ! ” आणि तिने जीभ चावली. धाकटीला थोरलीची फार फार दया आली. ही थोरली दिसायला सगळ्यात उजवी.
म्हणून म्हणे नवऱ्याची लाडकी. आणि तिची ती अक्काताई? ती म्हणजे तो नुसता पठाण. फदक फदक चालायची आणि तिच्या मागच्या पुढचे गोलवे हिंदकळायचे. सगळ्या पुरुषांच्या नजरा आपल्या तिथेच. थोरलीला आपल्या नवऱ्याचा म्हणून तर भरोसा वाटत नव्हता आणि धाकटीला ती कायम काळी ढुस्सं आणि नकटी चिपटी म्हणून चिडवायची. धाकटीला वाटलं या गोऱ्या गोमटीला तरी कुठे सुरक्षित वाटतय ? आता हिचा नवरा बहकला तर दोष कुणाच्या नशिबाचा ? बाबांच्या की हिच्या ?
दुसरीच्याही संसाराची रडकथा वर्षभरातच कानावर आली. आधीपासूनच म्हणे त्याला दारूचं व्यसन.
लग्न झाल्यावर पैसा पुरेना. म्हणून जोडधंद्यासारखा तो जुगार खेळायला लागला होता. आता घरचे म्हणायला लागले
” नशीब तिचं “
“मग तेव्हा कशा सगळ्यांनी माना डोलावल्या होत्या आम्ही बाबांच्या नशिबाच्या म्हणून? अं?” धाकटी बोलली.
आता या चोंबडीनी आत्ता बोलायलाच हवं होतं का ? असं प्रत्येकीच्या मनात येऊन गेलं.
तिस-या बहिणीची तिसरीच त-हा. तिला तर लागोपाठ तिन्ही मुलीच झाल्या. सासरच्यांनी तिला सळो की पळो करुन सोडलं. सासू तर उठबस म्हणायची, ” आई तशी लेक आणि दोहीची खोड एक. ” नवरा तसा शिकला सवरलेला. तो आपला मुखस्तंभ. सासूनं सरळ आपल्या माहेरची एक मुलगी पाहिली आणि आपल्या मुलाचं दुसरं लग्न लावून दिलं. ही बहिणही रडत भेकत माहेरी आली. तर सगळे तिला म्हणाले, ” हे बघ, एकदा नीट पाहून तुझे आम्ही लग्न लावून दिलं होतं. आता तू आणि तुझं नशीब. “
— क्रमशः भाग पहिला
लेखिका : डाॅ. तारा भवाळकर
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “क्युआर कोड आणि लग्न” – लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆
आज बऱ्याच दिवसांनी केके उर्फ कमलाकर कदम याला भेटायचा योग आला .
योग कसला केकेनेच फोन करून बोलावले होते.तसाही तो दिवसभर लॅपटॉप घेऊन ऑफिसमध्ये बसूनच असतो.पण फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे आम्हाला आवडते.
गप्पा मारताना त्याच्यासमोर पडलेल्या पाकिटाकडे लक्ष गेले. सहज म्हणून मी ते उघडले तर ती लग्नपत्रिका वाटत होती.पण त्यावर कोणाचेच नाव छापले नव्हते फक्त मोठा क्यूआर कोड होता.
मी ते केके दाखविले.तसा तो हसला.
“भाऊ डिजिटल लग्नपत्रिका आहे ही “
“अरे वा “असे म्हणून मी माझा फोन काढून तो कोड स्कॅन करायचा प्रयत्न केला पण ते ओपन होत नव्हते.
“भाऊ ज्यांना पत्रिका दिलीय त्यांच्याच नंबरवरून ओपन होईल ते” असे म्हणून त्याने स्वतःचा फोन घेऊन स्कॅन केला .ताबडतोब त्याच्या मोबाईलवर लग्न पत्रिका आणि एक गूगल फॉर्म आला .
” हा फॉर्म भरून द्यावा लागेल .तू येणार आहेस का ? ” त्याने विचारले.
मलाही उत्सुकता वाटली.
मी होय म्हणालो.
“हे बघ, त्यानी कधी येणार विचारले आहे . म्हणजे सकाळी की संध्याकाळी ?”केकेने विचारले.
मी गमतीने म्हटले” दोन्ही वेळेस”.
त्याने माणसेच्या कॉलममध्ये दोन आकडा टाकला.
“भाऊ, त्याने मला फक्त संध्याकाळी स्वागत समारंभाला बोलावले आहे .म्हणजे संध्याकाळीच जाऊ.सकाळचे दोन स्लॉट आपल्यासाठी बंद आहेत.”
“दोन स्लॉट ?” मी प्रश्नार्थक चेहरा केला.
“सकाळी अक्षता टाकायला एक स्लॉट .जेवायला दुसरा आणि संध्याकाळी स्वागत समारंभाला तिसरा स्लॉट .”त्याने उत्तर दिले.
मग संध्याकाळी किती वाजता जायचे त्याचे टायमिंग लिहिले .
“भाऊ एक तास पुरे का ? आठ ते नऊ लिहितो “त्याने माझा होकार समजून लिहिले .
“जेवण काय हवेय ?” त्याने पुन्हा प्रश्न केला.
“अरे जे आहे ते खाऊ ? “मी चिडून म्हटले.
“तसे नाही भाऊ .हल्ली लग्नात काऊंटरवर दिसतील ते पदार्थ घेतात आणि नंतर टाकून देतात .त्यांनी लिस्ट दिलीय त्यातून पदार्थ निवड” माझ्या हाती फोन देत तो म्हणाला.
जेवणाचे बरेच पदार्थ लिस्टमध्ये होते.अगदी लोणचे सॅलेड पासून पान सुपारी पर्यंत.वरती माझे नाव होते.
जवळजवळ वीस पदार्थ होते .मी त्यातून भात,पुरी वरण, बासुंदी ,पनीर भाजी, सॅलेड ,आईस्क्रीम सिलेक्ट केले .
“वा भाऊ, मोजकेच जेवतोस ? छान सवय आहे .लग्नाच्या दिवशी संध्याकाळी बरोबर आठ वाजता ये नऊ ला हॉलमधून बाहेर पडू .” केकेने त्याचा मेनू सिलेक्ट करीत फॉर्म सबमिट केला.
लग्नाच्या दिवशी बरोबर आठ वाजता हॉलमध्ये पोचलो .
अरे, हॉलचा दरवाजा बंद होता. लग्न कॅन्सल झाले की काय ?माझ्या मनात शंका .
पण केके बेफिकीर दिसला .त्याने दरवाजावरील क्यू आर कोड स्कॅन केला. ताबडतोब त्याला ओटीपी आला त्याने दरवाजावरील कीपॅडवर ओटीपी दाबला आणि दरवाजा उघडला .
आतमध्ये नेहमीसारखे लग्नाचे वातावरण होते.पण कुठेही गडबड गोंधळ दिसत नव्हता .आम्ही स्टेजवर पाहिले तर वधुवर उभे होते पण त्यांच्या आजूबाजूला फारशी गर्दी दिसत नव्हती.
पण स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे क्यूआर कोड दिसत होते .
“भाऊ आहेर किती देणार ?” केकेने विचारले.
“पत्रिका तुला आहे मला नाही ?” माझ्यातील मराठी माणूस जागा झाला .
त्याने हसून मान डोलावली आणि नवऱ्याच्या बाजूच्या क्यूआर कोडवर हजार रु स्कॅन केले .पैसे पोचल्याची रिसीट मिळाली .मग त्याने ओळखीच्या लोकांना भेटायला सुरवात केली .
अचानक नवरा नवरीच्या डोक्यावर ठेवलेल्या डिस्प्ले मध्ये केकेचे नाव आले.तसा केके मला घेऊन स्टेजवर गेला .नवऱ्याची आणि माझी माझी ओळख करून दिली .नवरा अर्थात केके ला ओळखत होता . बहुतेक त्याचाच विद्यार्थी असावा.आमचा एक फोटो काढला .
“चल जेवू या ?”
केके मला घेऊन खाली गेला .तिथेही मोजकीच माणसे जेवत होती . केकेने काऊंटरवर त्याचा नंबर सांगितला आणि आम्ही बाजूच्या टेबलवर बसलो .पाच मिनिटात आमची दोन ताटे घेऊन एक वेटर टेबलवर आला .
आयला ! मी जे पदार्थ सांगितले होते तेच पदार्थ ताटात होते .
“केके ,दुसरा एखादा पदार्थ पाहिजे असेल तर ? “मी केकेच्या ताटातील गुलाबजामकडे पाहून कुतूहलाने विचारले .
“मिळणार नाही ? त्या दिवशी चान्स होता सिलेक्ट करण्याचा तो सोडलास .याला चंचल मन म्हणतात.”
केके शांतपणे जेवू लागला .अतिशय मोजकेच पदार्थ असल्यामुळे आमचे जेवण पटकन संपले अर्थात त्यातील पदार्थ पाहिजे तितके घेण्याची सोय होती पण आमचे पोट भरले होते.सवयीनुसार मी बासुंदी वाटी अजून एक मागून घेतली .
“भाऊ नऊ वाजत आले” त्याने मोबाईल दाखविला .
च्यायला ! मोबाईलमध्ये अलार्म वाजत होता .
“अरे कोण ओळखीचा भेटला तर वेळ होणारच ना ?”मी चिडून केकेला म्हटले.
“त्यासाठी दहा मिनिटे वाढवून दिलीत.पण नंतर बाहेर नाही पडलो तर दरवाजा आपल्यासाठी लॉक होईल आणि नवरा नवरी सोबतच बाहेर पडू .मंजूर आहे का ?” त्याने शांतपणे मला विचारले.
मी नाईलाजाने मान डोलावली .
तिथे पाच सहा ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉईंट ठेवले होते . त्यावर एक व्हाट्स अप नंबर दिला होता. बहुतेकजण वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी काढत होते .ग्रुपफोटो ही बरेचजण काढत होते .फोटो काढले की त्या व्हाट्स अप नंबरवर सेंड करत होते.
“केके हा काय प्रकार ?”माझा पुन्हा एक प्रश्न.
“भाऊ इथे फोटो काढून व्हाट्सअप वर पाठवले की त्यात नवरा नवरीचे फोटो एडिट करून टाकण्यात येतील .म्हणजे एकाच लोकेशनवर सारख्याच पोजमध्ये फोटो रिपीट होणार नाहीत आणि स्टेजवरची गर्दी टाळता येईल. ” केके सहज स्वरात म्हणाला आणि माझा हात धरून दुसऱ्या दरवाजाने ओटीपी नंबर दाबून बाहेर पडला.
बाहेर येताच मी केके ला विचारले “यामागे डोके तुझेच ना ?”
केके हसला .
“भाऊ लग्न मनासारखे एन्जॉय केलेस ना ? थोडी शिस्त आणि कठोरपणा आहे .पण सर्वाना मनाप्रमाणे एन्जॉय करता आले ना .आता बघ ना तुझा वेळ वाचला .तुला पाहिजे ते मनासारखे खाता आले .अन्न फुकट गेले नाही.लोकांची धक्काबुक्की नाही .वधूवराना घाई नाही .स्टेजवर पाकीट द्यायला रांग नाही .तू जितका वेळ दिलास तितका वेळ तुला लग्न एन्जॉय करता आले . तू एक तास दिलास आम्ही तुला एका तासात मोकळे केले .तू जितका जास्त वेळ दिला असतास तितकाच वेळ आम्हीही घेतला असता “.केके हसून म्हणाला .
“पण ही आयडिया कशी आली तुझ्या डोक्यात ?” मी विचारले.
“त्या दिवशी तुकाराम कदमाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो .लग्न दुपारचे जेवणाची आणि लग्नाची वेळ सारखीच त्यामुळे खूप गडबड उडाली होती.अरे ,लग्नाचे विधीही करू देत नव्हते.वधूवर उभे राहिले की लोक आहेर द्यायला धावायचे.पुन्हा फोटोही काढायचे. जेवायला ही गर्दी .त्यात हॉल छोटा .अन्नाची प्रचंड नासाडी .बिचाऱ्या कदमांनी खूप खर्च करून लग्नाचा घाट घातला होता.त्यांच्याकडून काहीच कसर बाकी ठेवली नाही तरीही लोक बडबड करीत होती .नावे ठेवत होती. पैसे खूपच खर्च केले होते पण नियोजन नव्हते .मग मीच ठरविले यावर काहीतरी मार्ग काढायचा . आपल्या पोरांना क्यू आर कोड तयार करायला लावले म्हटले हेच वापरून नियोजन करायचे.त्यात हे लग्न ठरले .मग मी वधू वर त्यांचे आईवडील आणि खास नातेवाईक याची मिटिंग घेतली आणि ही प्रोसिजर सेट केली. दोन्हीकडून किती माणसे येतील ? त्यात दिवसभर कोण असणार ? पटकन येऊन कोण जाणार ? याची वर्गवारी केली .जेवण फुकट घालवायचे नाही हा दोन्ही पार्ट्याचा प्रमुख आग्रह होता.विधी पूर्ण झाले पाहिजे यावर दोघांचे एकमत होते.थोडा वाईटपणा घ्यायला ते तयार होते .मग काय लावले आपल्या पोरांना कामाला .आपल्या पोरांनाही काम मिळाले माझे ही थोडे सुटले तुलाही मनासारखे जेवण मिळाले ” केके माझ्या हातावर टाळी देत म्हणाला .
“धन्य आहेस बाबा तू ” मीही त्याला हात जोडीत म्हणालो .
(त्याने व्हील चेअरच्या चारी बाजुंनी टीनचे दरवाजे बनवून घेतले, त्यामुळे ती कितीही हलली, डुलली तरी संतुलन बिघडून ती खाली पडणार नाही. कोणत्याही तर्हेची दुर्घटना घडू नये, म्हणून सुरक्षिततेसाठी तिथे कुलूपही लावले ) — इथून पुढे —
‘तू माझ्यासाठी एक पिंजराच बनवलास हेनरी’ कैमी म्हणाली. हे ऐकल्यानंतर तो हसला. तेव्हापासून उन्हाळातल्या प्रत्येक संध्याकाळी तो पिंजराच तिचा साथीदार असतो.
आज कुलूप लावल्यानंतर कैमीच्या खांद्यावर हात ठेवत, हेनरी म्हणाला, ‘केवळ आजचाच दियास फक्त… उद्या या वेळेला तुझी सर्जरी होईल. मग रिकव्हरीचे काही दिवस. मग तू स्वतंत्र होशील. नंतर, ना पिंजरा राहील, न चाकाची खुर्ची. ’
कैमिलाच्या डोळ्यातही चमक आली. कोविदमुळे, इतर आजार आणि गैरजरूरी सर्जरी इस्पितळातले लोक पुढे पुढेच ढकलत होते. करोनाची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, तारखा पुढे पुढेच जात चालल्या. शेवटी आता कुठे सर्जरीचा दिवस उगवला. इस्पितळात जाण्यासाठी बॅग तयार केली. हेनरी अतिशत खुश होता. कैमिलाला बाहेर सोडून कुलूपाची चावी खिशात ठेवून फिरत होता. कधी आत यायचा. कधी बाहेर जायचा.
कैमिलाला बाहेर बसून खूप वेळ झाला. नवी पाझलवाली गेम खेळता खेळता ती थकून गेली. तिने हाक मारली, ‘हेनरी, मला तहान लागलीय. ‘
सामान्यत: हेनरी एकदा हाक मारली की लगेच ऐकायचा. आज जरा वेळ लागला. कैमिला वाटलं, कदाचित बाथरूममध्ये गेला असेल. सध्या त्याला जरा जास्तच वेळ लागतो. आजा-काल त्याला ऐकायलाही कमी येऊ लागलय. हियरिंग एड्सही बदलायला हवीय. कसं बोलवायचं त्याला? कितिदा म्हंटलं त्याला, एक मोबाईल तरी घेऊयात. पण त्याचं म्हणणंही खरं होतं. तो म्हायचा, ‘उगाच खर्च कशाला वाढवायचा?’
आपल्या जवळ असलेली काठी ठोकून ठोकून कैमिने आवाज केला. जवळ असलेलं वर्तमानपत्र खुर्चीवर वाजवण्याचा प्रयत्न केला. हॅलो, हाय सारखे तर्हे-तर्हेचे आवाज तोडाने काढले, पण हेनरी आला नाही.
समोरच्या रस्त्यावरून एक दंपत्य फिरत फिरत चाललं होतं. कैमिने त्यांना जवळ यायची खूण केली. प्रथम ते घाबरले, पण नंतर समस्या समजताच ते आनंदाने दरवाजाजवळ उभे राहिले. बेल वाजवली. कडी खटखटवली. कैमि उत्सुक नजरेने हेनरीची प्रतीक्षा करत राहिली. पण, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग तिने मदत करणार्या दांपत्याला सांगितले, ‘प्लीज, आपण मागच्या दरवाज्याने आत जा. आत कम्प्यूटरजवळ चावी ठेवलेली असेल. ती घेऊन या. ’
ते आत जाऊ शकले नाहीत. दरवाजा आतून बंद होता. ते दार खटखटू लागले, पण दार उघडलं नाही. येता-जाता आणखी काही लोक जमा झाले. अर्ध्या आसाच्या अथक प्रयत्नांनंतर कैमिलाला विचारून त्यांनी पोलिसांना कळवलं॰
कैमि हैराण झाली. तिला कळतच नव्हतं की अखेर हेनरीला झालय तरी काय? तिला वाटलं, रात्री नीट झोप लागली नसेल. त्यामुळे कदाचित डुलकी लागली असेल. अनेकदा त्याला रात्री नीट झोप लागत नसे. पण आता तर खूप वेळ झाला. इतका गाढ झोपला असेल, तर पोलीस तरी त्याला कसे उठवणार?
पोलीस आले. थोड्याशा प्रयत्नांनंतर त्यांनी कुलुप तोडले. समोर खुर्चीवर हेनरी बसला होता.
‘मिस्टर हेनरी.. ’ काहीच उत्तर मिळालं नाही.
ऑफिसरने हेनरीच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला, तशी तो खाली पडला. जसा काही कुठल्या तरी स्पर्शाची वाट बघतोय. काही क्षण त्याच्या श्वासोच्छवासाची चाहूल घेतल्यावर ऑफिसरने मान हलवली आणि अॅम्ब्युलंस बोलावली. या गोष्टी इतक्या झटकन झाल्या, की समोरचं दांपत्य आवाक झालं. सगळ्यांची हलणारी डोकी काही सांगत होती. बाहेर जाऊन कैमिलाला कसं सांगायचं?
पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. ‘मिसेस कैमिला आपल्याला काही सांगायचं आहे.
कैमिलाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ती समोर रस्त्याकडे बघत होती.
‘सॉरी, आपले पती हेनरी… ’
तरीही ती काही बोलली नाही. लोकांना वाटलं, ती आक्रोश करेल. पण, तिथे केवळ शांतता होती. कदाचित एका विशिष्ट वयानंतर मन आशा गोष्टींसाठी तयार होत असेल. या धावपळीनंतरही आणि अॅम्ब्युलन्सची पींपीं ऐकूनही ती गप्पच होती, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. तिला तिच्या पिंजर्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीसांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा तीही त्याच्यासारखीच लुढकली. दैवयोगाने तिचा श्वास मात्र चालू होता. तिला ताबडतोब हॉस्पिटलमधे नेण्यात आलं. घरातून दोन अॅम्ब्युलन्स निघाल्या. एकात हेनरीचे शव होते. दुसरी कैमिलाला इमरजन्सी विभागात पोचवत होती.
थोड्या वेळातच कैमिला धोक्याच्या बाहेर आली. अजूनही ती बेशुद्धच होती. सात दिवस ती शुद्धीवर आलीच नाही. तेव्हा सगळ्या कायद्याचं, नियमांचं पालन करत हेनरीचे अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या शेजार्यांना सांगितलं गेलं. फोनच्या डायरीतून नंबर घेऊन, मिळालेल्या एक-दोन नातेवाईकांनाही कळवलं गेलं. काही आले. काहींनी शोकसंदेश पाठवून श्रद्धांजली वाहीली.
पूर्णपणे शुद्धीवर येऊन सर्जरीयोग्य बनण्यासाठी कैमिलाला एक महिना लागला. त्यानंतर जिथे तिचं ऑपरेशन होणार होतं, त्या हॉस्पिटल मधे तिला पोचवलं गेलं. ऑपरेशन कुठे आहे, हेनरी का नाही आला, याबद्दल तिने काहीच विचारलं नाही. कदाचित तिला कळलं असावं.
डॉक्टरांच्या दृष्टीने यावेळी सर्जरी करणं महत्वाचं होतं. त्याप्रमाणे सर्जरी झाली. पाच दिवसांनंतर जेव्हा तिला घरी पाठवायचं ठरलं, जेव्हा तिला हेनरीबद्दल सांगण्यात आलं. तेव्हा, ती तटस्थपणे म्हणाली, ‘मला माहीत आहे. ’ आणि पुहा गप्प झाली.
हॉस्पिटलमधून एक नर्स तिच्याबरोबर आली होती. कैमि काही सेकंदांसाठी उभी राहयाची आणि पुन्हा खाली बसायची. काही दिवसांच्या, नर्सच्या आणि फिजिओथेरपीस्टच्या अनवरत प्रयत्नांनंतर, तिच्या पायांनी तिच्या शरिराचा भार सहन करणं मान्य केलं.
हळू हळू आपल्या पायांनी घराच्या प्रत्येक खोलीत, ती चांगल्या तर्हेने फिरू लागली. एके दिवशी एका कोपर्यात उभ्या केलेल्या व्हील चेअरकडे तिचं लक्ष गेलं, तिकडे लक्ष जाताच, तिला व्हील चेअरच्या मागे हेनरी उभा असलेला दिसला. ती त्यावर बसली. तिला वाटलं, त्यामुळे ती हेनरीच्या हातांचा स्पर्श अनुभवू शकेल.
अनेकदा, जेव्हा उशीर व्हायचा, तेव्हा ती रागावायची. तो सॉरी म्हणत घाई करू लागे, तर त्यात आणखीनच उशीर व्हायचा. तो सॉरी सॉरी म्हणत, मान हलवायचा आणि हसायचा. ती तीच व्हील चेअर होती. हेनरी तिला ढकलायचा आणि तिला मागे असलल्या त्याच्या उपस्थितीची जाणीव व्हायची. व्हील चेअरवर बसलेली ती कधी आपल्या पायांकडे बघायची, तर कधी हेनरीच्या हाताच्या स्पर्शाचा अनुभव घ्यायची.
एकदा तिचे लक्ष टेबलावर ठेवलेल्या ब्राऊन लिफाफ्याकडे गेलं. ते हेनरीचं पत्र होतं. पत्र कसलं, मृत्यूपत्रच होतं जसं काही. एक वाक्य मोठ्या मोठ्या अक्षरात पुन्हा पुन्हा लिहिलं होतं, ‘जर देणं शक्य असेल, तर माझे पाय माझ्या पत्नीला द्या. ’ एक एक अक्षर तिच्या डोळ्यांवर समुद्राच्या लाटांप्रमाणे थपडा मारत होतं.
‘हेनरी, तू जर मला विचारलं असतंस, विकल्प दिला असतास, तर मी व्हील चेअरचीच निवड केली असती. ’
ती कधी स्वत:च्या पायाकडे बघायची, कधी व्हील चेअरकडे, ज्या पिंजर्यात ती आत्तापर्यंत कैद होऊन राहिली होती. आज घराचा काना-कोपरा बघत होती. तिथे चालण्यासाठी इतके दिवस तिचे पाय बेचैन झाले होते. आता ती गतिमान झाली होती आणि हेनरी स्थिर. हेनरीचे पाय माझे होते, आता मी त्याचे पाय बनेन. तिने लगेचच हेनरीचा फोटो उचलून व्हील चेअरवर ठेवला आणि त्याच्या स्थिरतेला गती देऊ लागली. अनेक वर्षांचं कर्ज होतं. मरेपर्यंत चुकवलं, तरी उऋण नाही होऊ शकणार. आत्ता आत्तापर्यंत हेनरी तिची सेवा करत होता. आता कैमिलाला संधी मिळाली, तर तो गप्प झाला.
व्हील चेअरवर ठेवलेल्या फोटोतील हेनरीचा चेहरा बघणंही तिला असह्य झालं. जर खरोखरच हेनरी व्हील चेअरवर असता, तर कसं वाटलं असतं? कदाचित ते सत्य कैमिला किती वेदनादायी झालं असतं. हा विचार मनात येताच तिला वाटलं, इतकी वर्षे तिचा भार चाकं उचलत होती. पण हेनरीचं मन, रोज किती भार उचलत होतं, त्याला गणतीच नाही. कैमिलाजवळ चाकं होती. हेनरीजवळ तर ना पाय होते, ना चाकं. आपले पाय तर त्याने पहिल्या दिवसापासून कैमिला देऊन टाकले होते.
“ओ हेनरी!”
हाहाकारी मौनामधे तिचे ओठ अस्पष्टसे पुटपुटले. तिने त्वरेने हेनरीचा फोटो व्हील चेअरवरून उचलला.
कैमिच्या पायांना जशी चाकं लागली होती. इतके दिवस स्थिर असलेल्या पायांनी आता पुन्हा गती घेतली होती.
– समाप्त –
मूळ हिन्दी कथा – “पहिए“
हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
☆ चाकं – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
डॉ. हंसा दीप
एकाच घरात दोन विश्व. एक गतिमान आणि दुसरं स्थिर.
व्हील चेअरवर धसून बसलेल्या कैमिलाच्या जगात चाकं चालायची, पण ती स्थीर असायची. हेनरी स्वत: चालायचा आणि पत्नीलाही ढकलायचा. कित्येक वर्षापूर्वी व्हील चेअर प्रथम घरात आली, तेव्हा जराही कल्पना नव्हती, की एक दिवस कैमिला यातच सामावून जाईल.
एक दिवस गडद काळोखात कैमिला कशाला तरी धडकली आणि पडली. त्यावेळी डॉक्टरांनी कमीत कमी दहा दिवस तरी चालू नका, म्हणून सांगितले होते. हेनरीने तिच्या सोयीसाठी लगेचच व्हील चेअर आणली होती आणि तिच्यावर तिला बसवून तो अगदी मनापासून ती ढकालायचा. म्हणायचा, ‘तुझ्यासाठी इतकं तरी मी करू शकतोच ना कैमी! उद्या चालू लागलीस की माझी गरज नाही पडणार. आता निदान मी तुझ्या अवती-भवती तरी राहू शकतो. ’ त्यावेळी प्रत्येक क्षणी हेनरीच्या प्रेमाचा अनुभव घेत, आस-पास बघत मस्करी करत ती म्हणायची, ‘वाटतय, याच चेअरवर कायमचं राहावं. तुझं प्रेम मिळतं ना! माझ्या खांद्यावरचे तुझे हात मला असहाय्य वाटू देत नाहीत.
‘भांडण नाही. वाद म्हण. एखाद्या गोष्टीवर वाद घालणं म्हणजे भांडण नाही.’
‘या आधी तू असं कधी म्हणाला नाहीस. तुझे डोळे भांडणासारखेच गरगरायचे’
हेनरीने हे बोलणं अगदी सहज थट्टेवारीत घेतलं आणि म्हणाला, तुला पाहून डोळे चक्रावले जात असतील, एवढंच! पण कैमी, पाय चांगले असले तरी तू बसून राहू शकतेस. व्हील चेअरवर नाही, या शानदार सिंहासनासारख्या खुर्चीवर. तेव्हाही मी तुझ्या मागेच राहीन. ’
कैमिला हे गमतीत बोलली खरी, पण काही वर्षात ते तिचं जीवनच झालं. बर्फावरून ती घसरली होती. केवळ पायच घसरले नव्हते. सगळं शरीरच आखडलं होतं.
महिनाभर बिछान्यावर पडून राहिल्यानंतर, फिजियोच्या अथक प्रयासाने शरीराची बाकी अंगे सक्रिय झाली, पण पायाची स्थिती सुधारली नाही. त्यानंतर ती पुन्हा आपल्या पायावर उभी राहू शकली नाही. विशेषज्ञ चिकित्सकांच्या टीमचं म्हणण की काही वर्षांनंतर पायांची क्षमता आपोआप वाढेल. त्यावेळी सर्जरीनंतर तिला चालता येईल.
पुढच्या पाच वर्षांच्या दरम्यान अनेकदा, एकामागून एक अनेक चेकप झाले. अनेक वर्षं या व्हील चेअरमध्ये कैदेत राहिल्यानंतर अखेर सर्जंरीसाठी हिरवा झेंडा दाखवला गेला. उद्या सर्जरी आहे. त्यानंतर तिला नेहमीसाठी या चेअरमधून मुक्ती मिळेल.
हेनरी खूप आशावादी होता. तो खुश होता. आता कैमि लवकरच चालायला लागेल. तिला असं असहाय्य बघणं, त्याला खूप त्रासदायक वाटायचं. त्याला ते जुने दिवस आठवायचे. त्यावेळी कैमिचे पाय एखाद्या जागी कधीच टिकायचे नाहीत. तिची जबर इच्छाशक्ती हेनरीला हैराण करायची. घरकाम, नोकरी आणि मित्रमंडळी. कधी मॉल, कधी पार्क, प्रत्येक ठिकाणी सगळी कामं निपटत ती धावत राह्यची. एकाच वेळी, धावत-पळत अनेक कामे करायची तिची सवय होती. तिची धाव-पळ आशा तर्हेची असे, की जणू एखादं मिनिट उशीर झाला, तर जशी काही दुनियाच थांबेल. तिच्या हाता-पायात असं सामंजस्य होतं, की मेंदूकडून सूचना येताच ते आपापली ड्यूटी करू लागत. तिचा उत्साह पाहून हेनरी चकित व्हायचा. स्वत: काही करायच्या ऐवजी कैमिवरच अवलंबून राह्यचा. अनेक कामे कैमिसाठी जशी काही रांग लावून उभी असायची. अजून हे करायचय, ते करायचय, या दरम्यान सूर्य आपला प्रकाश घेऊन विश्रांतीसाठी निघून जायचा, तेव्हा कैमिला वाटायचं, आजचा दिवस संपला आणि आता उद्यापर्यंत तिलाही आपले शरीर बिछान्यापर्यंत घेऊन जायचय. तिच्या या गतीचा हेनरीला वैताग यायचा. हेनरीला प्रत्येक काम आरामात, सावकाश करण्याची सवय होती. स्टोअरमधे भाजी, दूध, फळे घ्यायला जायचा तेव्हा काळजीपूर्वक एकेक केळं निवडत बसायचा. जोपर्यंत तो दुसरे फळ निवडू लागायचा, तोपर्यंत कैमि इतर सगळी खरेदी आटपून तिथे हजर व्हायची.
हेनरीला वाटायचं, तो नालायक आहे. कोणत्याच कामाचा नाही. इतका वेग तो कुठून आणणार? तो म्हणायचादेखील, ‘कैमि, देवाने तुझ्या पायाला चाकं लावून पाठवलय आणि माझ्या पायाला हळू हळू चालण्यासाठी साखळदंड. त्याच्या अशा हलक्या-फुलक्या बोलण्याची कैमिला खूप मजा वाटे. ‘हेनरी, आपल्या प्रेमाच्या बेड्यात तू मला चांगलच अडकवलयस. तू जसा आहेस, तसाच मला आवडतोस!’
‘मग आता मला कमी ओरडा खायला लागेल नं? ‘
एक चुंबन घ्यायची कैमिला, कारण हेनरीच्या या धिम्या गतीमुळे ती अनेकदा चिडचिडायचीसुद्धा. यावरून दोघांची अनेकदा भांडणंसुद्धा व्हायची. त्याच्या धिम्या गतीमुळे कैमिलाच्या ख्ंद्यावरील कामाचा बोजा वाढायचा. मग ती अधून-मधून त्याला टोमणेही मारायची. हेनरीच्या हातात गप्प बसून सहन करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. यामुळे कधी कधी घरात इतकी शांतता, स्तब्धता असायची की ती दोघांनाही टोचायची. एक-दोन दिवसात मग सगळं सामान्य होऊन जात असे.
प्रकृती चांगली असल्याने कैमिला अनेकदा पडून उठायची. पण, त्या दिवशी, बर्फात ती जी पडली, ती स्थिती भयावह होती. ती तिला व्हील चेअरमधे कैद करून गेली. हेनरी रिटायर्ड झाला होता आणि कैमिलाला कंपलसरी रिटायरमेंट घ्यावी लागली. तेव्हापासून हेनरी तिचा केवळ पतीच नाही, तर कैमिचा पायही बनला होता. तिला जेव्हा कशाची गरज असेल तेव्हा, हेनरीच असायचा. अनेक वेळा, अनेक गरजेच्या गोष्टी ती आपल्या जवळच्या टेबलावर ठेवून घ्यायची. हेनरीला वारंवार त्रास द्यावा लागू नये, असं तिला वाटायचं. तरीही काही ना काही राहायचच. कदाचित बर्याच वर्षांच्या शीघ्र गतीचा आणि मंद गतीचा हिशेब बरोबर होत चाललाय. आता हेनरीच तिचे पाय होते, जे मंद गतीने का चालोत, निदान चालत तरी होते. कैमिचे जलद धावणारे पाय दुर्भाग्याने आता थांबलेच होते. जेव्हापासून ती खुर्चीशी बांधली गेलीय, तिला अनेक वेळा वाटलं, जसे काही तिचे पाय कधी चाललेच नाहीत. चालणारे लोक तिला जादुगार वाटतात. ती कधी त्यांच्या पायाकडे तर कधी आपल्या पायांकडे बघायची. तिला जाणवायचं आपल्या पायांनी चालणार्या माणसाला कधी वाटतच नाही, की तो गतिमान आहे. गती आहे, तर जीवन आहे.
एका खुर्चीत कैद असलेलं जीवन काय जीवन आहे? खुर्चीत सामावलेलं तिचं जीवन, पायाचं मौन, ती असहाय्यशी झेलत होती. विविध अवयवांचं सामंजस्य निभावताना पायांनी जसा काही असहकार पुकारला होता. या धावत्या जगात पायांची जंगली जिद्द तिला दिवसेंदिवस जशी काही खात होती. हेनरीला दाखवण्यासाठी ती वर-वर हसायची, पण आतल्या आत खूप रडायची. हे रडू तीळ तीळ करत तिच्या जीवनेच्छेला गिळत होतं.
तिच्या या थांबलेपणाची पूर्ण कल्पना हेनरीला होती. कैमिला आशा स्थितीत बघणं, हे त्याच्यासाठी शिक्षेपेक्षा काही कमी नव्हतं. तिला जास्तीत जास्त मदत करून तो, ती शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करायचा. तिच्या अन्य गराजांबरोबरच, तिच्या मनोरंजनाचाही तो विचार करायचा. पण, लाख इच्छा असूनही तो कैमिची विवशता, लाचारी कमी करू शकत नसे. घरात दोनच माणसे, पण दोघेही आपआपल्या परिघात बंदिस्त होती. आता दोघांच्यात कधीही वाद होत नव्हते. भांडणे होत नव्हती. नेहमी नाकावर राग असणारा हेनरी आता अगदी शांत होऊ लागला होता.
दोघेही निवृत्त. दोघांची पेन्शन बेताची. गरजाही बेताच्याच. हलकं-फुलकं खाणं आणि एक ठरीव दिनचर्या. मनाला वाटेल तेव्हा निजावं, मनाला वाटेल तेव्हा उठावं. साठ-बासष्ठचं वय म्हणजे फार काही नाही. पायांनी साथ दिली असती, तर यापुढचा प्रवास हा खुशीचा प्रवास झाला असता. कैमिची एकच इच्छा आता बाकी राहिली होती. ती म्हणजे, जीवनात एकदा तरी चालण्याचा आनंद घेणं. आपल्या पायांवर उभं राहून मनमुराद चालण्याची तिची इच्छा होती. या वेळेची वाट बघता बघता तिचे डोळे दगड होऊन गेले होते.
थंडीमधे वेळ निघून जात असे. पण उन्हाळ्यात जेव्हा सगळं शहर घराबाहेर लोटलेलं दिसे, तेव्हा ती उदासपणे येणार्या – जाणार्या लोकांकडे असासून पाह्यची. रोज संध्याकाळी हेनरी तिची व्हील चेअर व्हरांड्यात आणून त्याच्या टोकाशी नेऊन ठेवत असे, म्हणजे येणार्या – जाणार्या लोकांकडे बघून तिला आपला वेळ घालवता येईल.
कैमी कधी पुस्तक वाचायची. कधी थंड हवेत एखादी डुलकी काढायची. पण वैताग आणणारी गोष्ट ही होती, की अनेकदा संतुलन बिघडल्याने व्हील चेअरचे लॉक उघडायचे. अनेकदा ती पडता पडता वाचली होती. हेनरीने यावर उपाय शोधून काढला होता. त्याने व्हील चेअरच्या चारी बाजुंनी टीनचे दरवाजे बनवून घेतले, त्यामुळे ती कितीही हलली, डुलली तरी संतुलन बिघडून ती खाली पडणार नाही. कोणत्याही तर्हेची दुर्घटना घडू नये, म्हणून सुरक्षिततेसाठी तिथे कुलूपही लावले.
— क्रमशः भाग पहिला
मूळ हिन्दी कथा – “पहिए“
हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
☆ ताशा, वेश्या, आणि कविता… एक सत्यकथा…भाग – २ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे☆
(त्यानंतर बक्षिस वितरण सुरू झालं. उत्तेजनार्थ दोन बक्षिसं जाहीर जाहीर झाली. हॉल टाळ्यांच्या गजराने घुमत होता.) – इथून पुढे —
तृतीय क्रमांक पुकारला. द्वितीय क्रमांक पुकारला माझं नाव कुठेच नव्हतं. मी खूप नाराज झालो होतो. आत्ता इथून कसं निघायचं याचा विचार करत होतो. बोलणारा निवेदक मुरलेला होता त्याने प्रथम क्रमांक पुकारताना वातावरण लय टाईट केलं. माझी धडधड केव्हाच बंद झाली होती. निश्चितच आपण तरी प्रथम क्रमांक नसणारच याची खात्री होती. मी निघायचं कसं याचा विचार करत होतो.
तेवढ्यात प्रथम क्रमांक स्पर्धकाचं नाव आहे नितीन चंदनशिवे. अशी घोषणा झाली. मी उभा राहिलो आणि परत खाली बसलो. टाळ्या वाढल्या होत्या. मी कसातरी उभा राहिलो. स्टेजवर गेलो आणि पाडगावकरांच्या हस्ते ते बक्षीस घेतलं. टाळ्या जोरात वाजायला सुरवात झाली तशी टाळ्याऐवजी मला बच्चनचा ताशाचा आवाज येत राहिला.
ती ट्रॉफी आणि तीन हजाराचे पाकीट घेऊन मी बाहेर आलो.
मी कधी एकदा स्टेशनवर जाऊन मंगल आणि बच्चनला भेटीन असे झाले होते. फार आनंद झाला होता. मी अगोदर खडकी बाजारात आलो सागर स्वीटसमधून पावशेर गुलाबजाम घेतले आणि कॉर्नर हॉटेलमधून तीन बिर्याणी पार्सल घेतल्या. मी आयुष्यात पहिल्यांदा स्पेशल रिक्षा केली, आणि स्टेशनजवळ आलो. मला माहित होतं यावेळी मंगल कुठे असणार ते. जय हिंद थिएटर जवळ गेलो तर एका रिक्षात गिऱ्हायकाबरोबर मंगल बसलेली दिसली. तिथेच थांबलो कारण तिथे जाणं म्हणजे तिच्या शिव्या खाणं होतं. रात्रीचे सव्वा नऊ झाले होते. कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्सप्रेस फ्लॅटफार्मला थांबली होती. गाडी जाईपर्यंत बाहेरच थांबलो. गाडी निघून गेली थोड्या वेळाने फ्लॅटफार्म रिकामे झाले.
मी आमच्या बाकड्यावर जाऊन बसलो. वारंवार मी केशवसुत यांचे छायाचित्र असलेली ती केशवसुत करंडकची ट्रॉफी पाहत होतो. आणि आपण कसे सादरीकरण केले असेल याचा विचार करू लागलो. फ्लॅटफार्मवरच्या घड्याळाकडे नजर गेली रात्रीचे बारा वाजत आले होते. पुन्हा एकदा विडा मळला आणि तोंडात बार भरला. पहिली पिचकारी मारली तशी नजर पलीकडच्या बाजूला गेली. बच्चन आणि मंगल दोघेही हातात हात घालून चालत जिन्याच्या दिशेने जाताना दिसले. मी मोठ्याने ओरडलो “बच्चन भाय…”… त्या दोघांनी फक्त हात उंचावला आणि माझ्या बाजूला येणारा जिना चढू लागले. बच्चनच्या हातात काळी पिशवी दिसली. म्हणजे याने पण बिर्याणी आणली वाटतं. रोज त्याच्या हातातलं पार्सल बघून होणाऱ्या आनंदाने आज रागाची जागा घेतली. कारण मी पण बिर्याणी आणली होती. ते दोघे अगदी जवळ आले तसे मी विडा थुकला आणि पिशवीतली ट्रॉफी काढून सरळ मंगलच्या हातात देत बच्चनला म्हणालो बच्चन “जंग जिती हमने।”….
पहिल्यांदा मंगलने माझ्या गालाचा चिमटा घेतला. डोक्यावर हात फिरवत तिने मला छातीशी कवटाळून धरलं. आणि पाठीवर खूप जोरात थाप मारत म्हणाली बघ “मी म्हणलं होतं की नाही तू जिंकणार म्हणून… ” लगेच बच्चनने खांद्यावरचा ताशा कमरेत घातला आणि अंग वाकडं करून नाचून त्याने वाजवायलाच सुरवात केली. मी पण थोडा नाचलोच. त्याला मंगलने थांबवलं आणि म्हणाली “चला जेवण करून घेऊ. मला निघायचं आहे. ” आत्ता तिला कुठे जायचे आहे आम्हाला चांगलं माहीत होतं. मी म्हणालो मी आपल्यासाठी बिर्याणी आणि गुलाबजाम आणलंय. बच्चनपण म्हणाला पण बिर्याणी आणली आहे. मंगल म्हणाली, “असुद्या खाऊ सगळं त्यात काय एवढं. ” आम्ही तिघांनी मिळून तेवढी सगळी बिर्याणी खाल्ली. मला पहिल्यांदा जाणीव झाली की, आपली भूक मोठी आहे आणि जेवनपण भरपूर लागतं आपल्याला. तिघेही पाणी पिऊन आलो. बाकड्यावर बसलो. एवढे सुंदर सेलिब्रेशन आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही. मी डबल विडा मळायला घेतला अर्धा मंगलला दिला. दोघांनी तोंडात बार भरला. बच्चनने बिडी पेटवली आणि म्हणाला वाटलं नव्हतं तुला बक्षिस मिळेल म्हणून.
“नितीन ऐकव ना परत तिच कविता आणि तशीच. ” मी ऐकवली पण खरं सांगू स्पर्धेच्या सादरीकरणापेक्षा खूप उत्तम बोललो. दोघांनीही टाळ्या वाजवल्या.
मंगल निघून गेली तिचं गिऱ्हाईक तिची वाट पाहत होतं याची जाणीव बच्चनला आणि मला होतीच. ती गेल्यानंतर बच्चन आणि मी दोघेच बोलत बसलो. मी म्हणालो “बच्चन ही ट्रॉफी कुठे ठेवायची?” तेव्हा बच्चन म्हणाला, “त्यावर तुझं शाईने नाव लिही आणि मी सांगतो तसं कर. ” मी पेनातील शिस काढून त्यातली शाई बाहेर काढून माझं फक्त नाव लिहिलं. तेवढ्यात महालक्ष्मी एक्सप्रेस फलाटावर दाखल झाली. प्रवासी उतरले काही चढले. गाडी निघाली तशी बच्चनने माझ्या हातातली ट्रॉफी हिसकावून घेतली आणि धावत्या रेल्वेच्या एका डब्यात खिडकीतून मोकळ्या शीटवर टाकली आणि हसत हसत माघारी आला. मी खूप प्रयत्न केला त्याला अडवण्याचा पण त्याने बाजी मारली. मला बच्चनचा खूप राग आला. कमरेखालची भाषा ओठांवर आलेली होती तोच बच्चन म्हणाला “आ बैठ इधर” मी त्याच्या शेजारी बाकड्यावर बसलो तसा बच्चन म्हणाला, “हे बघ ही गाडी गेली. त्यात तुझी ट्रॉफीपण गेली. आता एक दिवस इतका मोठा हो इतका मोठा हो सगळ्या जगात तुझं नाव झालं पाहिजे. मग तुझी ट्रॉफी कुणीतरी स्वतःहून तुला आणून देईल त्यावेळी त्या माणसाचे पाय धर. ” माझ्यासाठी हे सगळं अजब होतं. बच्चन बोलत होता मी ऐकत होतो. ताशा वाजवणारा माणूस मला जगण्याचं कसलं सुंदर तत्वज्ञान सांगून गेला. आणि कशासाठी जगायचं हे शिकवून गेला.
तेवढ्यात मंगल आली. तिचं गिऱ्हाईक वाट पाहून चिडून दुसरीला घेऊन गेलं होतं. ती ही बसली मग आमच्याबरोबर. मला आठवतंय आम्ही रात्रभर झोपलो नाही. गप्पा मारत राहिलो. पहाटे थोडा डोळा लागला. सूर्य उगवायच्या आत फलाट सोडावं लागायचं. आम्ही उठलो बाहेर टपरीवर चहा घेतला. का कुणास ठाऊक पण मी खिशातील पाकीट बाहेर काढलं आणि एक हजार मंगलला आणि एक हजार बच्चनच्या हातात देत म्हणालो, “मंगल तुला एक साडी घे आणि मेकअपचं सामान घे जरा नटून थटून धंद्यावर थांबत जा… आणि रेट वाढवून सांगत जा. ” मी गमतीने हसत बोलत होतो. तिने नकार दिला पण मी जबरीने तिच्या हातात पैसे दिलेच. तिचे पाणावलेले डोळे स्पष्ट दिसत होते. बच्चनला म्हणालो, “तुला एक ड्रेस घे, आणि असा ताशा वाजव असा ताशा वाजव सगळं जग नाचत इथं आलं पाहिजे. ” त्याने नकार बिकार न देता हजार रुपये खिशात ठेवत मंगलला नेहमीप्रमाणे गमतीने बोलला “क्या मंगलाबाय शादी करेगी मेरेसे?” त्यावर कायम शिव्या घालणारी मंगल खूप लाजून लाजून हसली… त्याच धुंदीत पुन्हा विडा मळला. बच्चनने बिडी पेटवली. आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला तो पुन्हा संध्याकाळी तिथेच भेटण्यासाठी..
आज दिवस बदलले आहेत. मी माझ्या संसारात माझ्या नव्या जगात आहे. सहा वर्षांपूर्वी मंगल वारली. दोन महिने ससूनला पडून होती. बच्चन शेवटपर्यंत तिच्याजवळ होता. मी दोनदा भेटून आलो. मला पाहून खूप रडली होती ती. माझाही हुंदका आवरला नव्हता. बच्चनचा हात हातात गच्च दाबून धरला होता तिने. त्यांच्यात एक प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं. मंगल गेली तेव्हा बच्चन खूप रडला होता. तिचं अंत्यविधीचं सगळं मीच केलेलं होतं.
त्यानंतर बच्चनला दोन दिवसात दोनदा जाऊन भेटलो. म्हणलं “काय हवं असेल तर सांग नाहीतर चल घरी माझ्याजवळ राहा. ”तर तो नाही म्हणाला. अंगावर आलेले चांगले कपडे पाहून लांबूनच बोलत होता. मलाच त्याचा राग आला आणि मग “अबे हरामके, मंगलके दिवाने म्हणत त्याला गच्च मिठी मारली. त्याचा निरोप घेतला. नंतर त्याला भेटायला बऱ्याचवेळा गेलो दिसला नाही. जिवंत आहे की नाही माहीत नाही. पण जेव्हा पाऊस पत्र्यावर पडायला सुरुवात होते तेव्हा, आणि माझ्या कवितेवर समोर जमलेले पब्लिक टाळ्या वाजवत राहतं तेव्हा, माझ्या डोळ्यात बच्चन आणि बच्चनचा ताशा नाचत असतो. आणि मंगल मला छातीशी गच्च कवटाळून भिजवत राहते. ही दोन माणसं माझ्या आयुष्यात आलीच नसती तर… माझ्यातला कवी आणि लेखक जन्माला आलाच नसता.