मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “बोध दिवाळीचा – – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “बोध दिवाळीचा – – –☆ श्री जगदीश काबरे ☆

विवेकी विचार मनी धरा 

हाच दिवाळीचा बोध खरा–

विवेकी :  फटाके-मुक्त दिवाळी साजरी करा. फटाक्यामुळे प्रदूषण होते.

धर्मांध :  का? 😡 आम्ही फटाके फोडणारच. 💥 कारखाने, गाड्या, यंत्रे या मुळे होणारे प्रदूषण तुम्हाला दिसत नाही. आम्ही हिंदुनी ४ दिवस फटाके फोडले की तुम्ही बोंबा मारता. हिंदुद्वेषी कुठले!

विवेकी :  कारखाने, गाड्या, यंत्रे या मुळे प्रदूषण होते हे खरे आहे; पण ते चालू असल्यामुळे आपल्याला कित्येक सुख-सुविधा मिळतात, त्यामुळे ते अपरिहार्य असले तरी तेही प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि फटाके फक्त दिवाळीतच नाहीतर पूर्ण वर्षभर क्रिकेट, निवडणूक, लग्न, वाढदिवसाला फोडले जातात. फटाका फोडल्यामुळे काय फायदा होतो याचे एकतरी उदाहरण तू देवू शकतोस का?

धर्मांध : (थोड्या वेळ गप्प) उदाहरण द्यायची आम्हाला गरज नाही. आम्हाला फटाके फोडताना आनंद होतो. फटाके फोडणे ही जुनी हिंदू संस्कृती आहे… आमची परंपरा आहेे. हिंदूंचा आनंद हिरावला तर याद राखा 💪कानाखाली “शिवसूर्यजाळ” काढू. 😡

विवेकी :  हा अहंकारच माणसाला रसातळाला नेतोय. खरंच या प्रदूषणामुळे सूर्यच एक दिवस असा सूर्यजाळ काढेल की, तुम्ही-आम्ही “मेलो” म्हणायलाही शिल्लक राहणार नाही. फटाका फोडल्याने स्वतःचे तसेच आपल्या अवतीभोवतीच्या अनेक लोकांचे नुकसान होते. तरीही तुला आनंद होणार असेल तर तो आनंद विकृत आनंद आहे. आणि मला सांग, हिंदूंच्या कोणत्या धर्म ग्रंथात दिवाळीत फटाके फोडावेत असे लिहिले आहे? खरे तर फटाके फोडणे ही आपली हिंदू संस्कृती नाही. ही विकृती चीन देशातून आपल्याकडे आली. जुनी वैगरे काही नाही. 150 वर्षापूर्वी भारतीयांना आजचे रासायनिक फटाके माहीतच नव्हते, हे तुला माहित आहे काय? मग परकीय चुकीची परंपरा आपण का स्वीकारायची? महत्वाचे म्हणजे फटाक्याचा उगम चीन मधला आहे. चीन मध्ये अतृप्त आत्मा ड्रॅगनसारखे प्राणी, भूते यांना पळवून लावण्यासाठी फटाक्यांचा वापर करीत. या मागील अंधश्रध्देला आपण पुरस्कृत करायचे का? याचाही विचार केला पाहिजे.

धर्मांध :  खरंच की, मला हे माहितच नव्हतं! 😳 असा मी विचारच केला नव्हता!! 🙀

विवेकी : फटाके फोडल्यामुळे ध्वनी-वायू प्रदूषण होते. फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये मालमजूर वापरले जातात त्या बेकायदेशीर बाल-मजुरीला आपण नकळत प्रोत्साहन देतो. त्यांचे अनेक अपघात होतात, दरवर्षी सुमारे ५०० कोटी रुपयांची चक्क राखरांगोळी होते. 🔥पर्यावरणाची हानी होते ती वेगळीच. हे आहेत फटाक्याचे १००% दुष्परीणाम! हवा, पाणी, जमीन ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. ती संपत्ती फटाक्याने प्रदूषित होते. त्याला विरोध करणे हे आपले कर्तव्यच नाही काय? म्हणूनच हिंदुत्ववादी सरकारातील फडणवीस-शिंदेसुद्धा आता फटाके मुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहन करत आहेत. आपणच आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करायला हवे की नको? तसेच फटाका जाळणे म्हणजे पैशाचा दुरुपयोग करणे… कचरा करणे होय. सगळ्यात महत्त्वाचे आपल्या क्षणिक आनंदासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? परदेशात फटाके वाजविण्यावर बरेच निर्बंध आहेत. कारण त्यांना त्याचे दुष्परिणाम माहित झाले आहेत. त्याएवजी ते लेसर लाईट वापरुन फटाक्यांची आतषबाजी करतात.

धर्मांध : 😯😷

विवेकी : सर्वात महत्त्वाचे दिवाळी हा दिवा+रांगोळी याचा सण आहे. अरे दिवाळी तर आपण जोमाने साजरी करायचीच आहे, विरोध आहे तो अशास्त्रीय, अवैज्ञानिक परंपरांना… विनाकारण काही विचार न करता उठसूट जाळ काढत बसू नका… जरा थंड डोक्याने विचार करायला आपण केव्हा शिकणार?

☘️☘️

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दिन दिन दिवाळी !! भाऊबीज !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “दिन दिन दिवाळी !! भाऊबीज !!” 🪔 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

शुभ दीपावली ! दिवाळीच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या सणांच्या संमेलनात विविध भावनांचा उत्सव आपण साजरा केला. निसर्गाची पूजा केली. प्राणीमात्रांचे कौतुक केले. लक्ष्मीदेवी, श्रीविष्णू, श्रीकृष्ण यांचे पूजनअर्चन झाले. आरोग्यरक्षक धन्वंतरीचे पूजन झाले. शिवशक्तीचा म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचा सन्मान केला. तसाच आता शेवटच्या दिवशी बहीण भावंडांच्या प्रेमाचा उत्सव साजरा होतो आहे. हीच आपली भाऊबीज. दिवाळी उत्सवातल्या शेवटचा दिवस म्हणजे ‘भाऊबीज’.

बहिण भावांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या या दिवसाला ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. याची एक कथा अशी सांगतात. या दिवशी यमराज आपली बहीण यमुनेकडे गेले. तिने अतिशय आनंदाने आपल्या घरी त्यांची पूजा केली, त्यांना ओवाळले. गोडधोड करून प्रेमाने जेऊ घातले. यमराजाने तिला वरदान मागायला सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ” दरवर्षी या दिवशी तू माझ्याकडे जेवायला यायचेस. तसेच या दिवशी जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचे जेवील त्याला तू सुख द्यायचेस. ” यमराजाने यमुनेला तसा वर दिला म्हणून तेव्हापासून दरवर्षी भाऊबीज साजरी होते.

एका घरात हसत खेळत भाऊ बहीण मोठे होतात. त्यांच्यात जिव्हाळ्याचे, मायेचे, विश्वासाचे नाते निर्माण होते. पुढे लग्न झाल्यावर बहिण सासरी जाते. सतत भेटत नाही. म्हणून मग भाऊबीजेच्या निमित्ताने तिला भेटून तिची खुशाली विचारायची, तिच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे हा यामागचा उद्देश असतो. हे नाते असतेच अगदी हळुवार. कितीही अडचणी आल्या तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे याचा बहिणीच्या मनात दृढ विश्वास असतो आणि सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी भावाला नेहमी बहिणीची आठवण येते. म्हणूनच या दिवशी भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाने जेऊ घालायचे. त्याला आरोग्यपूर्ण दीर्घायू लाभावे म्हणून यमराजाची पूजा, प्रार्थना करायची.

या पवित्र, मधुर नात्याचा आज उत्सव असतो. आजकाल घरात एकच अपत्य असते. त्यामुळे सख्खी भावंडे कमी झालीत. पण चुलत, आत्ये, मामे, मावस भावंडं यानिमित्ताने जवळ येऊ लागली आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. शेवटी भावंडं कोणतीही असोत हे नाते असतेच मायेचे, प्रेमाचे. म्हणूनच ते मनापासून जपायला हवे हेच हा दिवस आपल्याला सांगतो. मानलेले बहीण भाऊ पण अगदी असोशीने हे नाते जपतात. बहिणीने औक्षण करून आणि भावाने स्नेहाची ओवाळणी घालत एकमेकांच्या सुखाची, स्वास्थ्याची, आनंदाची कामना करायची. यासाठी सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

शुभ दीपावली.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाऊबीज… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ भाऊबीज ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

लहानपणी भाऊबीजेचे खूप अप्रूप असे! भावाकडून काय भाऊबीज मिळवायची याचे प्लॅनिंग आधीपासूनच चालू असे. पैसे खूप नव्हते, पण उत्साह खूप होता. दिवाळीला एकच ड्रेस घेतलेला असे. तोच भाऊबिजेला पुढे केला जाई. एक वर्षी माझ्या भावाने गंमत म्हणून नाणी गोळा करून त्याचे छान पॅकिंग करून दिले होते. तेव्हा १९६२ सालच्या एक पैशाच्या नाण्यात सोनं आहे अशी बातमी होती! त्यामुळे ती नाणी पॅक करून मला भाऊबिजेला दिली !त्यात काय आहे ह्या उत्सुकतेने ते गडबडीने उघडले, तो आनंद आगळाच होता. पुढे मोठे झाल्यावर दोन्ही भाऊ नोकरीला लागले. . दोन दोन साड्या मिळू लागल्या!

लग्न होऊन सासरी गेल्यावर भाऊबिजेला भावाचे येणे अपुर्वाईचे असे. कधीतरी त्या निमित्ताने माझेही माहेरी जाणे होई ! मग मुले बाळे झाल्यावर आपल्या पेक्षा मुलांची भाऊबीज महत्वाची होऊ लागली! एक मुलगा, एक मुलगी असा भाऊबिजेचा कोटा पूर्ण झाला! दरवर्षी त्यांत काही ना काही नाविन्य असे. पाहुणे मंडळी येत, मग हसत खेळत दिवाळी साजरी होई. आमच्याकडे माझ्या पुतण्या उत्साहाने मोठा कार्यक्रम

आखत असत. जवळपास ३५/४० जण एकत्र येऊन भाऊबीज साजरी करत ! वरची पिढी, मधली पिढी आणि छोटी मुले. . . सर्वांची ओवाळण्याची गडबड, मिळालेल्या भाऊबिजेच्या वस्तू गोळा करणे, आणि शेवटी खाण्यापिण्याचा कार्यक्रम ! गेली दोन वर्षे हे सगळं बंद होतं ! पण यंदा भाऊबीज साजरी झाली!

भाऊबीज म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक ! आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्ट सणाच्या निमित्ताने गुंफली आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व जास्त आहे. अशा सणांमुळे नाती दृढ होण्यास मदत होते. बहिण-भावातील बंध रेशमाचे भाऊबीजेसारख्या सणामुळे अधिक मुलायम बनतात हे नक्कीच ! कधी चुकून झालेले समज गैरसमज अशा सणांच्या निमित्ताने दूर केले जातात. आपले सण ही आपली समाज मन एकत्र जोडतात !

…  दिवाळीचा हा शेवटचा दिवस असा गोड आनंदात साजरा होतो !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आज यमद्वितीया… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ आज यमद्वितीया…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

यमही आपल्या बहिणीकडे जातो आणि यमीकडून औक्षण करतो. बदल्यामधे आजच्या दिवशी कुणा भावाला मरण नाहीच पण भावासाठी दीर्घायूचे वरदान. ही धारणा.

पण आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे समजून सगळ्यांसाठीच चांगले वरदान मागता येईल ना? हेच ज्ञानेश्वरांसारखे पसायदान होऊ शकेल ना?

मग ज्यांना भाऊ नाही त्यांनीच फक्त चंद्राला ओवाळायचे या पेक्षा सगळ्या बांधवांपर्यंत जाता येत नाही म्हणून या एका वैश्विक बंधूला औक्षण केले तर सगळ्या बांधवांपर्यंत हे औक्षण जाईल ना? अगदी मनापासून केलेली प्रार्थना सगळ्यांपर्यंत पोहोचेल ना?

मनापासूनची केलेली प्रार्थना सकल बांधवांपर्यंत पोहोचल्यावर त्यांचेही बंधुत्व जागृत होईल ना? मग स्त्री दाक्षिण्य, नारी आदर हे आपोआपच आल्यावर आपली संस्कृती जी महानच आहे ती अढळपदावरच धृवतार्‍याप्रमाणे राहील ना?. . . . . दिवाळीचा शेवटचा दिवस गोड होईल ना? आपले सर्व बांधव, जे सीमेवर असतात, जे पोलीस रुपात वावरत असतात जे दुसर्‍यांचा रोग बरा करणंयासाठी रात्रंदिवस झटत असतात आणि जे कोणत्याही पेशात असून कायम आपल्यासाठी समाजासाठी जागृत असतात अशा सगळ्या भावांसाठी माझे आजचे औक्षण आहे. सगळ्याचे केलेले हे स्मरण आहे.

चला नवा जमान्यात नवा विचार करू आणि आजचा भाऊबिजेचा दिवस परिवारापुरता मर्यादित न ठेवता वैश्विक रूप देऊ. … आपल्या महान भारताला समृद्ध आणि प्रेमाच्या ताकदीने सशक्त करू.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाड्यातली दिवाळी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

वाड्यातली दिवाळी… ☆ सुश्री शीला पतकी 

७६२ दक्षिण कसबा भाग, काळी मशीद, या ठिकाणी आम्ही राहत होतो एकाला एक असलेले दोन वाडे जोडून होते मालक राहत असलेल्या वाड्यातून आमच्या वाड्यात येण्यासाठी एक चोरवाट होती. एका घराच्या खोलीमध्ये ती वाट उघडत असे तिथे एक कपाट होतं अगदी हिंदी सिनेमा प्रमाणे ते कपाट पुढे सरकवलं की मालकाच्या घरात जायचं जिना असे. अशा दुहेरी वाड्याचा उपयोग रझाकार जेव्हा सोलापूरला होते तेव्हा त्या दंगलीच्या वेळी लोकांना खूप झाला त्याच्या ऐकलेल्या गोष्टी कधीतरी पुन्हा सांगेन

तर वाड्यामध्ये दिवाळी साजरी व्हायची ती आमची पहिली सत्र परीक्षा म्हणजे सहामाही परीक्षा सत्र हा शब्द अलीकडे आलाय तर ती झाली की वाड्यातली सगळी पिलावळ एकत्र जमायची. मग तिकडे सो कॉल मीटिंग लावायच्या साधारण 25 ते 30 लहान मुले आम्ही होतोच 15 वयोगटापासून ते अगदी तीन-चार वर्षापर्यंत. मग सुरुवात व्हायची वर्गणी जमा करण्यापासून साधारण दोन आणि चार आणे अशी ऐपतीप्रमाणे वर्गणी गोळा होत असे. त्यातून वाड्याचे मालक जरा जास्त द्यायचे त्या पैशातून पिवडी नावाचा एक रंग मिळत असे त्या रंगाने वाडा रंगवायचा तत्पूर्वी आधी जाळ्या काढून तो स्वच्छ झाडून घ्यायचा 12 बिराडकरूंचा तो वाडा दोन मजली सगळ्या भिंती वगैरे सगळं झाडून घ्यायचं मग वाड्यात एक पेंटर राहत होते खरंतर ते खूप महान होते बुगाजी पेंटर ते बालगंधर्वांचे पडदे रंगवण्याचे काम करीत त्यांची नातवंड तीही त्याच उद्योगात हातात प्रचंड कला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काथ्याच्या ब्रशने वाडा रंगवला जायचा भंग्याकडून संडास स्वच्छ करून घेतले जायचे कारण पूर्वी वाड्याचा तोंडाशीच संडास असायचे त्यानंतर वाड्यासमोरचा नगरपालिकेचा रस्ता नगरपालिकेत जाऊन पत्र देऊन स्वच्छ केला जायचा मुरूम टाकण्याविषयी त्यांना बजावण्यात यायचे मग त्यांनी मुरूम टाकला की आम्ही ती चालून चालून जमीन धुमस करून घेत असू. त्यामुळे तिथे आम्हाला रांगोळी काढायला येत असे या बुगाची पेंटरच्या घरची मुलं रांगोळी काढण्यात वाकबगार पाडवा भाऊबीज लक्ष्मीपूजन या दिवशी आमच्याकडे वाड्यासमोर ती दृश्य साकारणारी रांगोळी असायची. हे सगळं आता अलीकडे नंतर आले भाऊबीजेची रांगोळी बघायला तर आमच्या वाड्यासमोर गर्दी व्हायची.

अशी सुंदर सगळी व्यवस्था झाली की मग घराघरातून फराळाचे वास यायचे भाजणी मसाले कुटणे इत्यादी कामे सुरू व्हायची जात्यावर दळणे उखळात कांडणे. काही गोष्टी धुवून वाळवन करणे घरात सावलीत अनारश्याच्या पिठासाठी तांदूळ पसरून एका चांगल्या पांढऱ्या शुभ्र फडक्यावर घालणे आणि मग ते उखळात गुळ घालून कुटणे असे बरेच प्रोसेस सुरू होत असत.

आम्ही मुले पणत्या करणे, त्याच्यावरती पणत्या भिजत घालणे आकाश कंदील बनवणे. . . आमच्या वाड्यात प्रभाकर आणि बंडू नावाची दोन मुले होती ती आकाशकंदील बनवत असत. ते बनवत असताना अत्यंत भक्तिभावाने आणि आदराने आम्ही त्यांच्याकडे पाहत असू. एक मोठा आकाशकंदील वाड्यात बांधला जायचा. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे छोटे-मोठे कंदील असायचे. दारासमोर रांगोळी काढायला कोणाला दार नव्हतं. समोरची गॅलरीचे दोन फूट जागा त्यामुळे खाली काढलेली सामुदायिक रांगोळी किंवा उंबऱ्यात काढलेली छोटीशी रांगोळी एवढाच रांगोळीचा संबंध ! 

एका बाथरूममध्ये तीन बिऱ्हाडं आंघोळ करायची. त्यासाठी रात्री पाण्याची पिप भरून ठेवले जायचे. त्या तीन दिवसात मात्र अजिबात कोणी भांडत नसे, सोयी गोयीने प्रत्येकाच्या बंबातले कोणाचेही पाणी घेतले तरी चालत होते आणि सकाळी सहापूर्वी सगळ्यांच्या आंघोळी व्हायच्या. मग फटाके उडवण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग फराळ…. फराळाची ताटे पहिल्याच दिवशी शेल्याने झाकून (विणलेल्या) एकमेकांच्या घरी जायचे. आता ते एवढे एवढे पाकीट मध्ये बांधून देतात तसं नव्हतं. मोठ्या ताटात सगळे पदार्थ असायचे …. चकली चिवडा करंजी अनारसे शंकरपाळ्या कडबोळी चिवड्याचे दोन-तीन प्रकार शेव. . . ताट कसे गच्च भरलेलं असायचं. वर्तमानपत्रात इतर जे कोणी सेवक असत त्यांच्यासाठी म्हणजे रामोशी, त्यानंतर वाडा साफ करणारा माणूस, कचरा उचलणारा माणूस, यांच्यासाठी पुड्या बांधल्या जायच्या. हे काम प्रत्येक घरी चालत असे. चार दिवस कुणी कुणाच्याही घरी फराळ करत असे. . . . दिवाळी संपली की मग प्रत्येकाच्या घरी फराळाचे निमंत्रण चकली चिवडा लाडू. आमच्या घरी मात्र आई सगळ्यांना उपीट करत असे … चकली चिवडा लाडवाबरोबर गरम गरम उपीट आणि मुख्य म्हणजे आमच्याकडे बसायला थोडीशी गच्ची होती, त्यामुळे तिकडे मस्त मैफिल जमत होती. वडिलांचे मित्र त्यांचा फराळ, आईच्या मैत्रिणी, आमचे मित्र मैत्रिणी, आमच्यापेक्षा तरुण मुली असलेल्या आमच्या घरातल्या बहिणी भाऊ त्यांचे मित्र मैत्रिणी, असे चार-पाच फराळाच्या पार्ट्या व्हायच्या. जेवायला रोज टोमॅटो घातलेली आमटी संध्याकाळी असायची. आमटी आणि भात हे संध्याकाळचे साधे जेवण असे.

दिवाळी अंकाची रेलचेल … मामाची लायब्ररी होती त्यामुळे दोन-तीन दिवाळी अंक सहज आमच्या हाती लागत असत. पालथे पडून दिवाळी अंक दुपारभर वाचणे हा कार्यक्रम. त्यानंतर दिवाळी संपली की मग उरलेल्या सर्व फराळांचा विचार करून बाहुला बाहुलीचे लग्न, आमच्या वाड्याचे मालक हुंडेकरी यांची एक मोठी गच्ची होती त्या गच्चीवर लावायचे. दोन गच्ची होत्या एक वरची आणि एक खालची. एकीकडे वधू पक्ष – एकीकडे वर पक्ष. आमच्या घरात एक तीन चाकी सायकल होती त्यावरून वरातीची व्यवस्था केली जायची. पताका लावल्या जायच्या. सगळे वाड्यातली मोठी माणसं सुद्धा लग्नाला झाडून हजर असायचे. लग्न झाल्यानंतर सगळे विधी मात्र व्यवस्थित केले जायचे आणि मग वरात काढली जायची. वाड्यातील ही सर्व मंडळी काडेपेटी टिकलीच्या डब्या याच्यामधून पैसा 2 पैशाचा आहेर पॅकिंगसह आम्हाला करत असत त्यामुळे आपण खरोखरच लग्न लावले असे वाटत असे. बाहुला बाहुली सजवण्याचे काम हे फार नेटाने केले जाई. मग गच्चीवरती आमच्या मालकीण बाई सर्वांसाठी पोहे उपीट चिवडा यासारखे पदार्थ करून पत्रावळीचे अर्धे अर्धे तुकडे करून सर्वांना फराळ दिला जात असे. . तेच लग्नाचे जेवण होय.

इथे पावे तो निम्मी सुट्टी संपलेली असायची. मग आमच्या वाड्यामध्ये राहणाऱ्या राणूअक्का या नावाच्या एक बाई होत्या, एकट्याच राहत असत त्या. अतिशय देखण्या होत्या. . स्मिता तळवळकरसारख्या त्या दिसायच्या. मी नेहमी त्याना म्हणायची. . ‘ यांना ना छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढला तर त्यात कामाला घ्यायला पाहिजे. ‘ इतक्या सुंदर होत्या. त्यांच्या घरी चूल असायची आणि शेगडी. आम्ही सगळी मंडळी म्हणजे लहान मुलं घरून गुळ डाळ मसाले वगैरे आणून अगदी कणीकसुद्धा त्यांच्या घरी जमा करीत असू आणि म्हणायचो की राणूअक्का तुमची पुरणाची पोळी झाली पाहिजे आणि कटाची आमटी. त्यांची कटाची आमटी खाल्ली की अर्धा तास हात झिनझिनला पाहिजे अशी मस्त तिखट असायची. मग कटाची आमटी आणि पुरणाची पोळी, बटाट्याची भाजी असा बेत. त्यांच्याकडे एक गोठा होता त्या गोठ्यात पत्रावळ्यावरती होत असे ती 40 माणसाची म्हणजे मुलांची पंगत उठायची. फार प्रेमाने करायच्या. त्या जातीने धनगर होत्या. वाड्यात कधी कुणी कुणाची जात विचारली नाही आणि कधी ती जाणवली सुद्धा नाही. माळी धनगर सोनार वाणी लिंगायत सारस्वत ब्राह्मण मराठा गुरव अशा अठरा पगड जातीने वाडा राष्ट्रीय एकात्मतेची साक्ष देत होता. वाड्याच्या मालकीणबाई साक्षात लक्ष्मी होत्या सुकन्या मोने इतक्या देखण्या होत्या. त्यांचे डोळे आणि भुवया अतिशय कोरीव, काळेभोर डोळे, छान कुरळे केस – साक्षात लक्ष्मी वावरते आहे असं वाटायचं आणि तितकीच पोटात माया. पाच रुपये भाडं सुद्धा न परवडणारी माणसं वाड्यात सुखाने नांदायचे. मालकाने कधी तगादा केला नाही. उलट एखाद्याच्या घरी कमी असेल तर मालक ते आणून देत असत. इतका माया करणारा मालक जगात कुठे नसतील. . कोणाला जागा सोडण्याचा तगादा नाही, कुणाला भाड्यासाठी किरकिर नाही, ते तरी खूप श्रीमंत होते असं नाही, पण मन मात्र खूप मोठं होतं. सगळ्या पोरी बाळी बघायचे कार्यक्रम त्यांच्याच घरी व्हायचे. सगळा वाडा त्यांना भाऊ आणि वहिनी असेच म्हणत होता, आणि ती नाती त्यांनी शेवटपर्यंत निभावली. करोडोंची स्टेटस असलेली ती मंडळी पण आजही त्यांची पुढची पिढी सुद्धा अतिशय विनम्र आहे. राणूअक्काची पुरणपोळी संपली की मग आमचे उरलेल्या फराळांची भेळ असायची. कार्यकर्ते बाईंची छोट्या मुलांची लायब्ररी असायची, कॅरम बोर्ड खेळायचा, भोवरे फोडायचे, काचा पाणी खेळायचे, नाटक बसवायचे असे सगळे करण्यामध्ये आमची सुट्टी मजेत जाई…

… अशी दिवाळी पुन्हा कधीच झाली नाही. लाईफबॉय साबणाच्या वडीच्या डब्यात मोती साबण आणि दुसऱ्या डब्यात मैसूर सॅंडल दिसला की खूप आनंद व्हायचा. हळूहळू पंधरा दिवसात त्या वड्या झिजायच्या, मग सुट्टी संपताना पुन्हा त्यामध्ये लाईफबॉय ठाण मांडून बसायचा वर्षभर. . . पण त्या लाईफ बॉय ने उर्वरित वर्षभर आमच्या शरीरावरील घाण स्वच्छ केली, तजेला दिला, आम्ही प्रसन्न झालो. त्यालाही आमच्या आयुष्यात खूप मोठे स्थान आहे.

 अशी ही सुंदर दिवाळी साडेतीन हजार स्क्वेअर फूटच्या बंगल्यात, दारासमोरच्या प्रशस्त गाडीत ढीगभर खरेदी एकावेळी करून आणावी अशी पैशाची श्रीमंती असतानाही आज आम्ही बघू शकत नाही. त्या दिवाळीची चव अंगावर जिभेवर मनामध्ये रेंगाळतेच आहे नव्या कपड्याना तो वास येत नाही. टाटाच्या तेलाच्या बाटलीचा वास भारी तेलाने नाही… नाही म्हणायला फक्त एक गोष्ट टिकून राहिली ती म्हणजे मोती साबण … मैत्रिणींनो आज मी जो हा लिहिलेला आहे तो बुद्धीने नाही.. अंतःकरणांनी लिहिलेला आहे कदाचित त्याच्यामध्ये समन्वय असेल नसेल, पण त्या सगळ्या भावना मात्र व्यक्त झाल्या. त्या आठवणी डोळ्यासमोर येऊन पुन्हा एकदा शब्दात चितारल्या गेल्यात ! 

मला वाटतं आपल्या पिढीची सर्वांची दिवाळी थोडीफार अशीच होती जिने अनेक मनं आजतागायत उजळून ठेवली आहेत. आताच्या पिढीला फुसके फटाके शोधून दुपारी सगळी घरातली मंडळी झोपली की ते उडवण्याचा कार्यक्रम माहित नाही… किंबहुना त्यांना काटकसरीने काही वापरणेच माहीत नाही… समृद्धी आली ना की सुख संपतं… हे मात्र खरे की मला वाटते सुख असले तरी समाधान नसतं… हे तर अधिक खरे नाही का?

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आषाढ तळावा, श्रावण भाजावा, भाद्रपद उकडावा… पण का ?? – लेखक : डॉ. शिवानंद बासरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

आषाढ तळावा, श्रावण भाजावा, भाद्रपद उकडावा… पण का ?? – लेखक : डॉ. शिवानंद बासरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

पावसाळा एकच असला तरी, एकाच पावसाचे तीन रंग आणि त्यानुसार आहारातला नेमकेपणा, ही भारतीय परंपरेची परिपक्व देणगी. आषाढ महिन्यात तळलेलं, श्रावण महिन्यात भाजलेलं आणि भाद्रपद महिन्यात उकडलेलं खाणं म्हणजे तब्येतीबरोबरच पावसाळ्याचा यथेच्छ आनंद लुटणं ! पण असे खाणे कितपत सुरक्षित आहे ? असे खाणे म्हणजे नेमकं काय खाणे ?

आषाढ महिना म्हणजे पावसाळ्यातला सुरुवातीचा काळ. शरीराच्या आतून कोरडेपणा आणि बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधेदुखी, गुडघेदुखी, सर्दी, फडसे, थंडीताप अशा वाताच्या समस्या तीव्रतेने वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी शरीरात पित्त वाढते आणि वात अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर “तळलेलं खाणं” हा अफलातून उपाय आहे. विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ आषाढाच्या वातावरणात शरीराला गरम ठेवण्याचे काम अचूक करतात, शरीरात वंगन निर्माण करून मेडिकल इमर्जन्सी टाळायला मदत करतात. (हे केवळ आषाढ महिन्यातच घडते!). म्हणूनच, मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, लोणची इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील. शिवाय; ओल्याचिंब पावसातली गरमागरम कांदा-भजी, चहा यासारखा इन्स्टंट रोमँटिक ‘आषाढ डायट’ जगात शोधूनही सापडणार नाही. !

श्रावण महिना म्हणजे पावसाळ्यातला दुसरा टप्पा. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. परिणामी वात हळूहळू कमी होऊन शरीरावयावांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्ताला बॅलन्स करणे महत्त्वाचे, म्हणून “भाजलेलं खाणं” सर्वोत्तम आहे. उदा: तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेली भाकरी, भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, भाजलेला मका / वाटाणा, भाजलेले लाडू (शेंगदाणा / राजगिरा / रवा इ. ), भाजलेल्या वांग्याचे भरीत, भाजलेले पापड इत्यादी. असं खाल्ल्याने पित्त तर सुरळीत राहतेच, शिवाय अम्लपित्त, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारी डोकेच वर काढत नाहीत. आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे “श्रावणमासी हर्ष मानसी. . . ” असे म्हंटले आहे !

भाद्रपद महिना म्हणजे पावसाळ्यातला शेवटचा आणि पावसाचा परतीचा टप्पा. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. अधून-मधून पाऊस असूनही उकाडा मात्र प्रचंड असतो. यामुळे आधीच श्रावणात वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे लगेचच अडकून बसते. परिणामी अचानक हार्ट अटॅक येणे, पॅरॅलिसिस झटका येणे, कोणताही आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी भाद्रपद महिन्यातच घडू लागतात. म्हणूनच मृत्यू होण्याचे प्रमाण या महिन्यात अधिक असते. अनुचित घटना टळाव्यात म्हणून, भाद्रपद महिन्याच्या आसपास बहुतांश उपवास आलेले आहेत. जेणेकरून, कमी अन्न खाल्ले जाईल आणि पित्त अडकायला वावच भेटणार नाही. पित्त अडकून कुठलीही इमर्जन्सी येऊच नये, यासाठी “उकडलेलं खाणं” हा सर्वोत्तम उपाय आहे. जसे की; उकडलेला भात, उकडलेल्या शेंगा, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेले मोदक, उकडलेली कंदमुळं इ. असं प्रयत्नपूर्वक केल्याने October Heat चे रूपांतर आपण October Hit नक्कीच करू शकू. कदाचित म्हणूनच, आपल्याला भेटण्यासाठी गणपती, गौरी, दुर्गा या सर्वांनी भाद्रपदाचा आसमंत मुद्दामच निवडला असेल… हो ना ?

लेखक : डॉ. शिवानंद बासरे

दीर्घायु हॉस्पिटल, नांदेड

 ९४२३२६७४९२

लेखक : श्री मंदार जोग 

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र – भाग- २ – लेखक : माहिती संग्राहक :  श्री आनंद महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

? वाचताना वेचलेले ?

दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र – भाग- २ – लेखक : माहिती संग्राहक :  श्री आनंद महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी

(या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.) – इथून पुढे — 

लाडू…

उदाहरणार्थ आपण लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ यात. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू.

लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू जास्त आवडतो. तसेच स्त्रियांनी या दिवाळीत हटकून ठरवून स्वत:साठीसुद्धा एक आयुर्वेदिक केश्य लाडू बनवावा. अहळीव, खोबरे, तीळ, बडिशेप, बाळंतशेप, डिंक, गोडांबी, बदाम, तूप, गूळ यांपासून बनविलेला हा लाडू उत्तम केश्यवर्धक, हाडांना बळकटी देणारा, केसांची वाढ करणारा व केसांना प्राकृत कृष्ण वर्ण प्रदान करणारा आहे.

करंजी

आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ यात. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.

चकली

वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.

चिवडा

तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाहय़ांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाहय़ांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाहय़ांपासून बनविलेल्या पोहय़ांचा चिवडा केला जातो. लाहय़ांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोहय़ांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाहय़ा असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोहय़ांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोहय़ांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोहय़ांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोहय़ांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोहय़ांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोहय़ांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.

अनारसे

अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले कीत्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.

… अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचन शक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पांच भौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

– समाप्त–  

लेखक : माहिती संग्राहक : श्री आनंद महाजन

योग प्रशिक्षक, अमरावती.

प्रस्तुती : सुश्री सुलु साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दिन दिन दिवाळी !! बलिप्रतिपदा !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “दिन दिन दिवाळी !! बलिप्रतिपदा !!” 🪔 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

शुभ दीपावली ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष कसे ? तर महापराक्रमी राजा विक्रमादित्याच्या नावाने होणारी कालगणना आजपासून सुरू होते. आजपासून हे विक्रम संवत्सर सुरू होते. शालिवाहन शकानुसार चैत्री पाडवा हा वर्षारंभ मानला जातो. तर बलिप्रतिपदेपासून नवे व्यापारी वर्ष सुरू होते. दिवाळी पाडव्याला व्यापारी वही पूजनाची प्रथा महत्त्वाची असते.

या दिवशी सर्व वर्षातील व्यापाराचा आढावा घ्यायचा असतो. याच पद्धतीने आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाचा ही आढावा घेतला पाहिजे. जुन्या वर्षातल्या राहिलेल्या गोष्टी, नवीन वर्षात करायच्या गोष्टी यासाठीचे नियोजन, जुने राग-द्वेष, भांडणं विसरून पुन्हा नव्याने स्नेहबंध जुळवणे, श्रद्धा उत्साह वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.

बलिराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात. विरोचन पुत्र बली धर्मप्रिय, लोकप्रिय राजा होता. श्री विष्णूंनी त्याच्यासाठी वामन अवतार घेतल्याची कथा आपल्याला माहीत आहेच. हा बलिराजा उदार होता. त्याच्या गुणांचे स्मरण आपल्याला वाईट माणसातही असणारे चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते.

कनक आणि कांता यामुळे माणूस असूर बनतो. म्हणूनच श्रीविष्णूंनी या दोघांकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आगेमागे जोडून तीन दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार लक्ष्मीपूजनाला कनक म्हणजे लक्ष्मीला पूजण्याची पूज्य दृष्टी; तर भाऊबीजेला समस्त स्त्री वर्गाकडे आई किंवा बहिणीच्या मायेने पाहण्याची दृष्टी देणारे दोन दिवस येतात. थोडक्यात म्हणजे अज्ञान, मोह, लालसा, सत्ता यांच्या अंधारातून ज्ञान, श्रद्धा, सद्भावना यांच्या प्रकाशात जाण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.

आजचा दिवस हा संकल्पासाठी एकदम शुभ आहे. हा पाडवा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दिवस आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आजपासून करावी असे संकेत आहेत. त्यामुळे त्या कामाला आपोआप पावित्र्य, नैतिकता प्राप्त होते. ते काम उत्तम रीतीने, चांगलेच करण्याचा आपला प्रयत्न होतो. चांगल्याचे फळ शेवटी चांगले मिळते असा विश्वास मनात दृढ असला की फलश्रुती चांगलीच होते.

काही ठिकाणी या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा भोग अर्पण केला जातो. त्याची डोंगराच्या स्वरूपात मांडणी केली जाते म्हणून याला ‘अन्नकूट ‘ असेही म्हणतात.

हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य जपणारा आहे. पत्नी आपल्या स्नेहज्योतींनी पतीला ओवाळते तर पती तिला प्रेमाची भेट देतो अशी संकल्पना आहे‌. आयुष्यातील रोजची धावपळ, रूक्ष व्यवहार, वैचारिक मतभेद यामुळे या नाजुक नात्याला अपरिहार्यपणे धक्के बसतात. नात्यात नाराजी, दुरावा येतो. या सणाच्या निमित्ताने तो दूर करून पुन्हा मनोमिलनाची जवळीक साधत आनंदाची वाटचाल सुरू करायला हा सण उत्तम पर्वणी असतो.

आनंदाची, उत्साहाची हसतखेळत बरसात करणारा हा दीपोत्सव. या सणाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्याला चैतन्याने उजळून टाकावे, नात्यांना नवीन झळाळी देत ती आणखी घट्ट करावीत, उद्योग व्यवसायात उत्तम यश मिळावे आणि सर्वांची आनंदाची, समृद्धीची, उत्तम आरोग्याची वाटचाल व्हावी अशा भरभरून हार्दिक शुभेच्छा.

शुभ दीपावली.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आज दिवाळी पाडवा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ आज दिवाळी पाडवा…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

साडेतीन मुहूर्तातील अर्धा मुहूर्त•••

बलिप्रतिपदा•••

मुख्यत: पती-पत्नी नाते अधिक दृढ करण्याचा दिवस•••

व्यापारी नव वर्ष सुरुवात•••

आपल्या चांगल्या कृतीचा चांगल्या भावनांचा देवालाही हेवा वाटो ईतके चांगले वागण्याचा प्रयत्न तरी करायला हवा ना? पाताळात जाऊनही एक दिवस का होईना पण भूलोकातील आपल्या प्रजेला भेटण्याचे भाग्य ज्याला मिळाले असे बळीराजाचे भाग्य सकल पुरुषांना मिळो म्हणून सर्व स्त्रियांनी केलेली प्रार्थना पतीची उदंड आयुष्याची कामना आणि यमानेही परत जावे म्हणून केलेले औक्षण•••

व्यापारी लोकांनी नव्या वहीत सरस्वती गणपती काढून केलेली पूजा आणि त्या दिवसापासून नव्याने हिशेब मांडण्याला सुरूवात•••

आपल्या आयुष्याचे सगळेच हिशेब आपल्यालाच मांडायचे असतात. जुने हिशेब पुसून जुने हेवेदावे विसरून नात्यांचे नवे हिशेब सुरू केले ना की सुखी जीवनाचे गणित बरोबर सुटते. म्हणूनच आज पासून प्रामुख्याने पती पत्नी नात्यातील रुसवे फुगवे दूर करून नवीन प्रेमाने सुरूवात केली की बाकीची सगळी नाती फुलाप्रमाणे आपोआप बहरातात.

पूर्वी फक्त बायकोने नवर्‍यालाच तेल लावून औक्षण करावे असे नव्हते तर••• आईने मुलाला, भावजयने दिराला, काकूने पुतण्याला, मामीने भाच्याला अशा अनेक नात्यांनाही दृढ केले जायचे. खर्‍या अर्थाने सण नात्यांचा साजरा करून संस्कृती जपली जायची. त्यामुळे स्त्रीचा मान सन्मान आपोआप व्हायचा

आज समाजातील प्रत्येक स्त्रीकडे बघण्याची दृष्टी बदलणे गरजेचे असल्याने सगळ्या स्त्रियांना आदराचे स्थान मिळून त्यांच्याशी असलेल्या सामाजिक नात्याचे स्मरण आज करून दिवाळीचा पाडवा/ बलीप्रतिपदा/ व्यापारी नव वर्षाची सुरुवात करताना या दिवसाच्या सगळ्यांनाच मंगलमय शुभेच्छा !!

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ खरे भिकारी… आणि आमचे दरिद्री नारायण !!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ खरे भिकारी… आणि आमचे दरिद्री नारायण !!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे

श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट पुणे चे ट्रस्टी आदरणीय श्री प्रताप भोसले सर, यांचा एके दिवशी मला फोन आला आणि म्हणाले, ‘तुमच्या याचक मंडळींना प्रत्येकी दहा किलो साखर; दिवाळीच्या मुहूर्तावर द्यायची आम्हाला इच्छा आहे. ‘

मी हरखून गेलो…  

तरीही भोसले सरांना मी म्हणालो, ‘सर आपण हे दान त्यांना मोफत नको देऊयात… त्यांच्याकडून काहीतरी छोटं मोठं काम करून घेऊया आणि मग त्यांना हि साखर देऊया…  

ते म्हणाले, ‘तळजाई टेकडी साफ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, आम्ही ते रोज करतो, यात तुमच्या खराटा पलटणचे लोक येतील का ? 

आणि मग आमच्या खराटा पलटण मधील वीस लोकांना आम्ही घेऊन गेलो… तळजाई टेकडी आम्हाला जमेल तशी आम्ही स्वच्छ केली…

यानंतर ट्रस्टच्या मार्फत, श्री प्रताप भोसले सर यांच्या हस्ते आम्हाला एक किलो ? दोन किलो ? नाही…. तर तब्बल 500 किलो साखर मिळाली…  

यापैकी ज्यांनी स्वच्छतेचं काम केलं होतं, अशा वृद्ध याचकांमध्ये 26 ऑक्टोबर रोजी 350 किलो साखर आम्ही श्री शंकर महाराज मठामध्येच वाटून टाकली…! 

सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या समक्ष….!!! 

यानंतर श्री प्रताप भोसले साहेब आणि त्यांच्या सेवेकर्‍यांनी आम्हाला आदराने बसवून जेवू घातले…. महाप्रसाद दिला…! 

VIP कोट्या मधून आम्हाला सन्मानाने श्रीं चे दर्शन घडवले…! 

तुम्ही भिकारी किंवा भिक्षेकरी किंवा याचक नसून माणसं आहात…. याची आम्हाला त्यांनी याप्रसंगी जाणीव करून दिली…! यावेळी माझ्या डोळ्यात पाणी होतं…! 

भिक्षेकरी वर्गाचा कुटुंब प्रमुख म्हणून मी आदरणीय सद्गुरु श्री शंकर महाराज याच्या पायाशी नतमस्तक होत आहे….! 

ज्या भोसले सर आणि त्यांच्या सेवेकर्‍यांनी आम्हा सर्वांना मानाची वागणूक देऊन, माणुसकीचे दर्शन घडवले, अशा सर्वांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना प्रणाम करतो…!!! 

भिकारी / भिक्षेकरी म्हणजे गलिच्छ लोक… घाण आणि कचरा करतात…. असा एक समज आहे ! 

आज माझ्या या याचक मंडळींनी; माझ्या एका शब्दावर, “तथाकथित उच्च वर्गीय (??) लोकांनी” तळजाई टेकडीवर पिलेल्या दारूच्या बाटल्या उचलल्या… सोबत लेज, कुरकुरे आणि इतरही काही प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या उचलल्या आहेत…! 

मी लहान असताना, आमच्या घरात कचरा उचलायला एक मावशी आली होती… तिने घराची बेल वाजवली आणि मी आईला म्हणालो, ‘कचरा दे… कचरेवाली मावशी आली आहे…. ‘ 

माझ्या आईने घरातला कचरा देत, त्या मावशीच्या हातात काही खायच्या वस्तू ठेवल्या आणि मला म्हणाली, ‘कचरेवाली ती मावशी नाही… कचरेवाले आपण आहोत बाळा..!’ 

या शब्दांचा अर्थ तेव्हा मला कळला नाही; परंतु आता कळतो आहे…! 

पवित्र स्थानांवर दारू पिऊन बाटल्या टाकणाऱ्या श्रीमंत लोकांना मला सांगायचं आहे… “खऱ्या अर्थाने तुम्ही भिकारी आहात…!”

मी भिकारी हा शब्द वापरत नाही, भिक्षेकरी किंवा याचक हा शब्द वापरतो…

परंतु त्यांच्यासाठी भिकारी हाच शब्द योग्य आहे…!!! 

पवित्र स्थानांवर दारू पिऊन बाटल्या फेकणे, प्लास्टिकच्या पिशव्या फेकणे, प्लास्टिक बाटल्या फेकणे आणि त्या न उचलणे… …. हे सर्व करणारे लोक, कदाचित सुशिक्षित असतील, परंतु सुसंस्कारित नाहीत…! 

आणि म्हणून बुद्धी, मन, अंत:करण पैशाला विकणारे… हे लोक खरे भिकारी आहेत…!!! 

इथे या लोकांसाठी मला भिकारी हाच शब्द वापरायचा आहे…!

असो … या भिकाऱ्यांनी” केलेली घाण… माझ्या दरिद्रीनारायणाने आज साफ केली आहे…! 

या बदल्यात सद्गुरु श्री शंकर महाराज यांनी मात्र प्रत्यक्ष आम्हाला आशीर्वाद देऊन, आज खऱ्या अर्थाने आम्हा दरिद्रीनारायणांना श्रीमंत केलं आहे….!!! 

नतमस्तक !!! 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares