स्त्री असो वा पुरुष, बोलताना शब्द जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या या उदाहरणावरून लक्षात येईल.
महाभारताचे युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती, वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती. एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापूरच्या महालात निजली होती..
तेव्हा श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले…. त्याला पाहून तिला रहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली..
ती म्हणाली, ” सख्या असा तर मी विचारच नव्हता केला.असं कसं झालं? ”
कृष्ण म्हणाले, “ पांचाली नियती खूप निष्ठूर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना? तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही, तर सर्वच कौरव संपले…. द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता..?”
द्रौपदी म्हणाली, “ कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ?”
यावर योगेश्वर म्हणतात— “ नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही.”
मग द्रौपदी विचारते, “ कृष्णा मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं तुला म्हणायचं आहे का?”
कृष्ण म्हणतात, “ नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्व देऊ नकोस. तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता !”
द्रौपदी विचारते, “ कृष्णा, मी काय करू शकत होते?”
कृष्ण म्हणतो, “ तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास…. त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश दिला त्याचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काही वेगळे झाले असते……
आणि त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोलली नसतीसकी …”अंधे का पुत्र अंधा ” व खिदळून हसत त्याचा ” सार्वजनिक अपमान ” केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसतं….. कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती…… “
— आपले शब्दच आपले कर्म बनवतात. आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा. नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही, तर आपल्या पूर्ण परिवाराला भोगावे लागतात.
जगात फक्त मानव हाच एक असा प्राणी आहे की त्याच्या दातात नाही, तर जिभेत विष आहे…..
… म्हणून बोलतांना भान ठेवणं महत्वाचं असतं… बेलगाम बोलण्याने, आणि लिहिण्यानेच नाती तुटतात व प्रपंचात महाभारत घडतं..!
संग्रहिका – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
☆ रंग माझा वेगळा — सुश्री सुलभा गुप्ते ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
रंगात रंग तो गुलाबी रंग ।
मला बाई आवडतो श्रीरंग ॥
…. छेः छेः ! गैर समज करून घेऊ नका . माझे नाव गुलाबी नाही आणि मी हा नवऱ्याच्या नावाचा उखाणाही घेतलेला नाही, त्याचे नाव पण श्रीरंग नाही. कोणी म्हणेल लेखिकेच्या मनात आधीच होळीचे रंग भरलेत , तसे पण नाही.
इंद्रधनुष्याचे सात रंग सर्वज्ञात आहेत … ” ता ना पि हि अ नि जा “.. असे इंद्रधनूचे रंग लक्षात ठेवण्याचे सोपे सूत्र शाळेत आम्हाला शिकवले होते . तसेच हे सात रंग एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते , जे फक्त आकाशात दिसते ही निसर्गाची किमया . आणि ते बघायला आबालवृद्ध सगळेच धावतात, कारण हे अद्भुत बघून खूप आनंद होतो.
माणसाच्या आयुष्यात देखील हे सात रंग कधी ना कधी डोकावून जातात.
केशरी रंग त्यागाचा….
पांढरा रंग शांतीचा….
हिरवा भरभराटीचा….
गुलाबी रंग प्रेमाचा….
लाल रंग रक्ताचा….
काळा म्हणजे निषेध !….
अशा सर्व संमत कल्पना आहेत.
…. माझ्या मनात मात्र प्रत्येक रंगाच्या वेगळ्या कल्पना आहेत. रंगांशी निगडित आपल्या भावना, अनुभव असतात. तो तो रंग बघून त्या भावना जागृत होतात…..
केशरी म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो, डौलाने डुलणारा , शिवाजी महाराजांचा ” भगवा “… मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक, महाराष्ट्र धर्माची, हिंदू धर्माची शान, देवळांच्या शिखरांवर शोभणारे केशरी ध्वज !
विजय पताका !
पांढरा रंग म्हणताच मला आठवतात हिमालयाची उंच उंच बर्फाच्छादित शिखरे . त्यागाचे प्रतीक . उन्हातान्हाची पर्वा न करता वर्षानुवर्षे उभे राहून सीमेचे रक्षण करणारा, आपल्या उंचीने भारताची शान उंचावणारा नगाधिराज हिमालय . मनात अभिमान उत्पन्न करणारा ! पांढरा रंग आणखी एक आठवण करून देतो — – सर्वसंग परित्याग करून पांढरी वस्त्रे परिधान करणारे श्वेतांबर जैन साधू ! आपोआप आदराने आपण नतमस्तक होतो.
हिरवा रंग तर सृष्टीचा …. ” हिरवे हिरवेगार गालिचे । हरित तृणांच्या मखमालीचे ” ….
बारकाईने विचार केला तर निसर्गात हिरव्या रंगाची लयलूट आहे . गवत हिरवे , इवल्या रोपट्यांची पाने हिरवी, वृक्षलतांची पाने हिरवी . झाड – लहान असो की मोठे पाने मात्र हिरवीच ! मातृत्वाची चाहूल लागलेल्या तरुणीसारखी, हिरव्या रंगाने नटलेली सृष्टी ! काय विलोभनीय रूप तिचे !
लाल रंग आणि रक्ताचे जवळचे नाते . माझ्या डोळ्यांसमोर येथे युद्धभूमीवर सांडलेले सैनिकांचे रक्त आणि जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान . रक्तच ! पण एक मातृभूमीसाठी सांडलेले आणि दुसरे कुणा अनोळखीचा जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान.
काळा रंग निषेधाचा ! मोर्चामध्ये वापरतात काळे झेंडे, पण माझ्या मनात चित्र उभे रहाते – पावसाळ्यातले ते काळे ढग – पावसाच्या आगमनाची शुभवार्ता घेऊन येणारे दूतच ते ! बळीराजाला आनंद देणारे, ग्रीष्माच्या उन्हाने तापलेल्या तृषार्त भूमीला शांतीचा संदेश घेऊन येणारे !
आता मुख्य माझा आवडता रंग – – अहो कोणता काय ? ??
अर्थात गुलाबी…..
नवजात बालकाच्या ओठांचा गुलाबी….
प्रेयसीच्या ओठांचा गुलाबी….
लज्जेने प्रियेच्या गालांवर फुलणारा गुलाबी….
मधुर, औषधी गुलकंद बनवावा असा गुलाबांचा गुलाबी….
आपल्या उमलण्याने आसमंत दरवळून टाकणारा सुंदर गुलाब , रंग गुलाबी …..
…. हे सर्व तर अर्थात मोह पाडतातच. पण मुख्य म्हणजे – लहानपणापासून ऐकलेले, वाचलेले, फोटोत पाहिलेले – सावळ्या घननीळाचे गुलाबी पदकमल…..
कमलपुष्प अधिक गुलाबी,…. की भगवान श्रीकृष्णाची सुकुमार पावले अधिक गुलाबी ? मनात नेहमीच संभ्रम निर्माण होतो . पण म्हणूनच माझा आवडता रंग…..
श्रीरंग ! भक्ति प्रेमाचा रंग श्री रंग….
आठवा रंग…. श्री रंग….
लेखिका : सुलभा गुप्ते, सिडनी .
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काल “स्थळ” ह्या संकल्पनेबद्दल तसे लिहीले होतेच. तेव्हा “स्थळं बघणे”हा कार्यक्रम अरेंज्ड मँरेज करणा-या उपवर मुलामुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अपरिहार्य मार्ग बनला आहे. पूर्वी नातेवाईक भरपूर असायचे, लोकं एकमेकांशी जुळलेली असायची परंतु हल्ली लोकसंपर्क कमी कमी होत जाण्याच्या प्रक्रीयेमुळे “लग्न जमविणे” हे मुलं व पालक ह्यांच्या साठी एक अवघड परीक्षाच होऊन बसलीयं.
विशेषतः उपवर मुलींचे प्रमाण हे उपवर मुलांच्या तुलनेत कमी असल्याकारणाने उपवर मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक जटील समस्याच होऊन बसलीयं. अरेंज्ड मँरेजमध्ये एकतर परिचीत वा नातलग ,नाही तर विवाहमंडळं मध्यस्थांची भूमिका पार पाडतात. आणि ब-याच लोकांच्या अनुभवातून असं निदर्शनास आलं की चांगलं स्थळं पदरी पाडण्याच्या नादात हे उपवर,त्यांचे पाल्य किंवा मध्यस्थी वा विवाहनुरुप मंडळं ही बोहल्यावर चढणा-याची बरेचसे गुणं चढत्या भाजणीतील माहिती सारखी जाहीर करतातं. मुलगा असो वा मुलगी, संसाराची सुरवातच मुळी खोटी, वाढीव माहिती, देऊन केल्या गेली तर तो संसारातील विश्वासाचा पायाच मुळी डळमळीत राहील. उलट मी तर म्हणेन आपले विचार, आपली मतं ही जशीच्या तशी जाहीर करावीत. त्या देवाला काळजी असते, आपल्या विचारांचा, मतांचा आदर करणारा पार्टनर आपल्याला कुठूनही मिळेल. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे असं अजिबातच नसतं, त्यामुळे आपलं शिक्षणं, आपली कमाई ,आपले विचारं,मतं,आपल्या अपेक्षा ,आपल्या लेखी प्राधान्य ह्या गोष्टींचे अतिशय स्पष्टपणे तसेच मनमोकळ्या पद्धतीने आदानप्रदान व्हायला हे हवचं.
उदाहरण द्यायचंच झालं तर मुलीला फारशी घरकामाची आवड वगैरे नसली तर अजिबात बायोडाटा मध्ये गृहकर्तव्यदक्ष असले जडजूड शब्द वापरून भुलावण करु नये, तसचं मुलामुलीला माणस़ांची ,गोतावळ्याची फारशी आवड नसतांना प्रेमळ,मनमिळाऊ असली बिरुदं चिकटवू नयेत. तसचं मुलामुलीची कमाई सांगतांना कृत्रिम चलन फुगवट्यासारखी वाढवून सांगू नये, हे जर पाळले नाही तर अपेक्षांचा चक्काचूर केल्याचा ठपका अंगाला चिकटलाच म्हणून समजा. ह्या उलट एकदम खरीखुरी माहिती सगळ्यांनीच पुरवायचे ठरविले तर पुढील आयुष्य हे ब-याच प्रमाणात सुकर,सुरळीत होईल हे नक्की.
सध्या लग्न झाल्याबरोबर बेबनाव,घटस्फोट हे सर्रास काॅमन झालायं. पूर्वी मागील पिढी पर्यंत सहनशीलतेच प्रमाण ह्या पिढीपेक्षा जास्त होतं. त्यामुळे पटो वा न पटो जगासाठी तरी लग्न टिकविण्याकडे कल होता. परंतु आता काळ बदलललाय,कोणीही झुकायला, माघार घ्यायला तयार नसतं.ह्या परिस्थीतीत जर सांगितलेल्या गोष्टी खोट्या वा चूक निघाल्या तर ह्या पिढीतील तरुणाई सहन निश्चितच करतं नाही. आणि लग्न हे फक्त दोघांच नसतचं मुळी. ह्यामध्ये दोन्हीही कुटुंब इनव्हाॅल्व झालेली असतात. ह्या परिस्थितीचा विपरीत परिणाम दोन्ही कुटुंबां वर होऊ नये ही ईच्छा असल्यास आरोग्य, कमाई, आवडी,अपेक्षा,सवयी ह्या पंचसूत्री ची खरीखुरी माहिती ही एकमेकांना द्यावी तर आणि तरच ही कुटूंबसंस्था डळमळीत न होता सुखी आनंदी संसार बहरेल.शेवटी काय हो सगळ्यांना” नांदा सौख्य भरे” हेच हवं असतं.
नात्यांचही पण वृक्षासारखचं असतं. ते नातं रुजू द्यावं लागतं, फुलू,बहरू द्यावं लागतं,ते जपावं लागतं आणि मुख्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परस्परांना समजून घ्यावं लागतं,काही मिळवितांना काही सोडावं सुद्धा लागतं, तेव्हा कुठे ते नातं चांगलं टिकलं, मुरलं अस आपण म्हणू शकतो.
दुर्दैवाने आजच्या नवीन पिढीजवळ वाट बघण्यासाठी वेळ नसतो,संयम नसतो,त्याग हा शब्द डिक्शनरी मधून खोडून टाकलेला असतो आणि त्यामुळे हे नवीन रुजण्याच्या उद्देशाने निर्माण झालेलं नातं बहरण्याऐवजी कोमेजत जातं.आणि वेळीच सावरलं नाही तर पार निर्माल्य होतं. अर्थात हे आजकाल वाढत्या घटस्फोटाच्या प्रमाणावरूनच लक्षात येतं.
नवीन नात्यांना आकार देतांना एक गोष्ट पक्की. कुठल्याही दोन व्यक्तींचे शंभर टक्के सूर जुळणं शक्यच नसतं.कारण प्रत्येक जीव हा वेगवेगळी अनुवंशिकता, परिस्थिती,दृष्टिकोन व मानसिकता ह्यातून घडला असतो. वैवाहिक सूर जुळवितांना दोघांनाही स्वतःचे सूर जुळविण्या सोबतच बाकी इतर नाती सद्धा सांभाळावीच लागतात. नवीन पिढी खरोखरच खूप हुशार, जिद्दी आणि ठाममतांची आहे. त्यामुळे त्यांनी थोडी तडजोड केली,थोडासा स्वार्थ बाजूला सारला तर हे संकट संपूर्ण नेस्तनाबूत होऊन नवीन मुलं आपल्या बौद्धिक प्रगतीच्या जोरावर जास्त उत्तमप्रकारे संसार करु शकतील. त्या मुळे लग्न करतांना प्रत्येकाने हे वैवाहिक शिवधनुष्य योग्य रितीने कसे पेलता येईल ह्याचा आधी जरूर विचार करून, आपली स्वतःची मानसिकता बदलवून एक निराळा दृष्टिकोन समोर ठेऊन ह्या संसारात पडण्याची तयारी करावी. प्रत्येकाने दुसऱ्याकडे टक लावून बघण्याआधी वा परीक्षा बघण्याआधी स्वतःकडे पारखून बघून पहिल्यांदा स्वपरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या ची क्षमता जाणण्याआधी स्वतःची कुवत प्रामाणिकपणे अभ्यासावी. एक नक्की खरोखरच सहजीवन जगून त्याचा आनंद लुटायचा असेल तर मग प्रत्येकाने दोन पावलं स्वतः आधी मागे यायला शिकावचं लागेल.
एक सगळ्यातं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सूर नीट जुळण्याआधीच नवीन जीव जन्माला घालण्याची घाई अथवा धाडस करुच नये.नाही तर येणाऱ्या जीवावर तो एक मोठा अन्याय ठरेल हे नक्की. नवीन जीवाची परवड करण्याचा प्रमाद तरी आपल्या हातून घडणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
कदाचित ब-याच जणांच्या मते तडजोड हा मूर्खपणा असेल तरीही एक नक्की तडजोडी ने कदाचित आपल्याला सुख नाही लाभंत पण आपण न केलेल्या तडजोडी मुळे कित्येक आपल्याशी जोडलेल्या व्यक्ती ह्या दुःखी होऊ शकतात. म्हणून सुखी जरी नाही म्हणता आलं तरी साध्यासरळ संसारासाठी “तडजोड”हा एक उत्तम मार्ग ठरु शकतो.आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या तडजोडी नंतर एक दिवस हा तुमचाच असतो आणि त्या दिवसानंतर हसतमुखाने घरच्यांनी मान्य केलेले बाकीचे उर्वरित पण दिवस तुमचेच येतात हे नक्की. असो हा विषयच न संपणारा विषय आहे.तेव्हा तुर्तास आजच्यासाठी येथेच थांबते.
सावित्री ज्योतिबाने स्त्रियांच्या उद्धारासाठी स्त्री शिक्षणाचा पाया घातला अन स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली .जिथं माणूस म्हणून जगण्यास देखील ती लायक नव्हती, ती आता शिक्षण घेऊन साक्षर झाली ,अक्षर ओळख पाप नसून अक्षरे जीवनाची दशा आणि दिशा बदलतात हेच जणू ज्योतिबाना सिद्ध करायचे होते ! अन फल निश्चिती स्वरूपात अनेक स्त्रिया शिकल्या ,सुशिक्षित झाल्या ,कुणी उंबऱ्याबाहेर पडल्या ,कुणी हक्कासाठी ,न्यायासाठी लढू झगडू लागल्या ,उच्च पदावर गेल्या ,जग भ्रमंती करू लागल्या ,मनातल्या भावना कागदावर उतरू लागल्या ,आज विविध क्षेत्रातली त्यांची कामगिरी पहाता त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व सिद्ध होते ,घर नोकरी या जबाबदाऱ्या पार पाडत दमछाक झाली पण त्यांनी त्यांची स्वप्ने सत्यात उतरवली .हा झाला एक भाग.
शिक्षण सर्वदूर पसरले ,स्त्रिया जागरूक झाल्या समान संधी ,समान अधिकार मिळाले,आर्थिक स्वावलंबी झाली आर्थिक परावलंबित्व सम्पले, स्वतःची प्रगती झाली आणि आज ही गोष्ट सर्व सामान्य झालीय पण अपवाद वगळता असे दिसते की स्त्रियांची आत्मिक, वैचारिक प्रगती झालीय का ? त्याचे उत्तर ‘नाही’ असेच दिसून येते. आमचे शिक्षण फक्त साक्षरता अन करिअर नोकरी याभोवती फिरतेय,अजूनही आम्ही जुन्या ,बुरसटलेल्या रुढींचे, परंपरांचे,अन वैचारिक गुलामगिरीचे प्रतिनिधित्व करतो. आमच्याकडे सारासार विवेक बुद्धीचा अभावच दिसून येतो. अजूनही आमच्याकडे निर्णयक्षमता नाहीये ,आमची तेजस्विता ,तपस्विता संपून आम्हाला चमकण्यात धन्यता वाटू लागलीय. मनावर ,आत्म्यावर उत्कृष्ट संस्काराचा अभाव दिसून येतोय. भौतिक सुखांचा हव्यास अन अट्टाहास धरत आम्ही आत्मोन्नतीस हद्दपार केलेय. अन म्हणूनच कर्तृत्वाच्या पायऱ्या चढताना आम्ही त्याग ,संयम ,आत्मिक सुख ,समाधान ,शालीनता ,नात्यातले समर्पण ही अदृश्य पण सदृश्य चिरंतर परिणामकारक मूल्य विसरतोय. कुणी तरी सुंदर म्हणावे , कुणाला तरी खूश करण्यासाठी धडपडत असतो , बाह्य सौंदर्यावर मग मिळवलेले पैसे खर्च करतो .अजूनही आम्हाला शोभेची बाहुलीच होणे मान्य आहे. क्षणिक सुखासाठी आम्ही रात्रदिन झटतो पण आत्मिक सुखासाठी कमी झटताना दिसतो . अपवाद आढळतात पण अपवाद नियम होत नाही . आम्ही मग शिक्षणाच्या मूळ उद्देशापासून दूर चाललो आहोत भरकटतोय असे वाटते कारण वैचारिक प्रगतीचा अभावच दिसतोय ही झाली दुसरी बाजू !
आता तिसरी बाजू… स्त्री कितीही शिकली तरी तिच्या आत्मसन्मानाला कुटुंबात किंवा समाजात खरेच प्रतिष्ठा आहे ? तर ‘नाहीच !’ असेच म्हणावे लागेल , अजूनही कुटुंबातील तिचे स्थान दागिने ,साडी एवढेच मर्यादित आहे आणि आम्हालाही अजून यातच धन्यता वाटते ,आम्ही आमच्यासारख्या प्रगतीपासून दूर असलेल्या स्त्रियांसाठी काही करू इच्छित नाही , समाजात अजूनही आम्हाला एकटे रहाता येत नाही , एकट्याने जीवनाची मौज अनुभवता येत नाही कारण जिथे तिथे उरी भयच बाळगावे लागते एकविसाव्या शतकात आमच्या प्रति पुरुषांची ,समाजाची दृष्टी निकोप ,स्वच्छ नाही अन आम्हा स्त्रियांची देखील नाही आम्ही अजूनही पूर्ण भयमुक्त नाहीत ही खरेच शोकांतिका आहे !
कधी कधी वाटते की स्त्रियांचे मूळ प्रश्न थोड्याफार फरकाने तसेच आहेत. जेव्हा माणूस म्हणून ती स्वतःचा विचार करेल व समाजही तिचा विचार करेल, तेव्हाच आमचा खऱ्या अर्थाने उद्धार झाला असे म्हणता येईल अन उद्याची स्त्री आनंदाने आकाशात स्वैर भरारी घेईल आकाश स्पर्शून माणूस म्हणून स्वतःकडे पाहील…..
तरुणपणात कुणाची तरी येते ती आठवण…. म्हातारपणात होतं ते स्मरण…. यानंतरही जिवाभावात उरतात त्या मात्र स्मृती…. ! ऑक्टोबर महिन्यामध्ये घडलेल्या प्रत्येक घटना, स्मृती म्हणून माझ्या मनामध्ये कागदावर शिक्का मारावा त्याप्रमाणे उमटल्या आहेत…!
… काल घडलेल्या सुखद घटना, शिक्का मारलेल्या या स्मृती, आज घरी येऊन घरातल्या आपल्या लोकांना चौखूर बसवून पुन्हा रंगवून सांगण्यात मजा असते… मी त्यालाच लेखा जोखा म्हणतो !!!
आमच्या खेडेगावात पूर्वी बुधवारी बाजार भरत असे (आताही तो बुधवारीच भरतो)…. लहानपणी आजीच्या बोटाला धरून मी तिच्या मागेमागे फिरून बाजार करत असे….. सगळ्यात शेवटी ती माझ्यासाठी चार आण्याची भजी विकत घेत असे…. कळकट्ट पेपराच्या पुरचुंडीत बांधलेली ही सहा भजी मी जपून घरी आणत असे … बाजारातून घरी चालत जायला किमान एक तास लागे… तोवर मी साठ वेळा आजीच्या पिशवीतून भज्यांचा पुडा नीट आहे की नाही हे तपासात असे…. त्याचा वास घेत असे…. ! भजी खाण्यात जो आनंद आहे…. त्यापेक्षा त्याचा सुगंध नाकात भरून घेण्यात जास्त मजा असते…. !
… एखादं ध्येय प्राप्त करण्यापेक्षा त्या ध्येयप्राप्तीपर्यंतचा प्रवास कधीकधी आनंददायी असतो….!!!
तर…. घरी जाईपर्यंत त्या कळकट पेपरला भज्यांचं तेल लागलेलं असे…. खून दरोडे बलात्कार आणि राजकारण याच बातम्या त्याही वेळी होत्या… आजही त्याच आहेत….
या बातम्यांची शाई माझ्या भजाला आपसूक चिटकत असे…. पण मला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं !
आज वयाने मोठा झाल्यानंतर “भजी” म्हणतो…. लहानपणी “भजं” म्हणत होतो…!
वर्तमानपत्राचा कागद आज जरी बदलला असला तरी बातम्या मात्र त्याच आहेत…. वयाने कितीही मोठा झालो असलो, तरीसुद्धा सामाजिक परिस्थिती विशेष बदललेली नाही…
असो…..
फरक फक्त इतकाच पडला आहे….. भजी विकणारे, पटका बांधणारे आजोबा जाऊन, त्यांच्या जागी त्यांचा मुलगा आला आहे…
आजोबा भजी विक्री करून “व्यवसाय” करायचे, घराचा उदरनिर्वाह भागवयाचे, मुलगा आता ” धंदा ” करतो….!
मातीची घरं जाऊन सिमेंट ची पक्की घरं झाली आहेत….
घरं पक्की झाली पण नाती भुसभूशीत झाली….!
घरासमोरचं अंगण जाऊन, तिथे पार्किंग ची जागा झाली आहे….
पूर्वी पाऊस पडल्यानंतर अंगणातल्या मातीला “सुगंध” यायचा… हल्ली नुसताच चिखल होतो…. या चिखलात घरापासून दूर गेलेल्या कारच्या खुणा फक्त ठळक दिसतात…
गेलेली मुलं, नातवंडे परत घरी येतील या आशेवर दोन म्हातारे डोळे लुकलुकत असतात…. विझत चाललेल्या दिव्यासारखे ! ….
माझी आजी गेली त्याला कित्येक वर्ष झाली… परंतु पडक्या त्या वाड्याला तिच्या स्मृतीचा सुगंध आहे…!…
…. चार आण्याला हल्ली भजी मिळत नाहीत…. ते चार आणे भूतकाळात मी हरवून आलो आहे… तेलाचा डाग पडलेला तो वितभर पेपर…. पटका घालणारे ते बाबा… आन् वर दोन भजी जास्त घाल म्हणून वाद घालणारी ती माझी आजी…!
आज जरी मी हे सगळं हरवलं आहे, तरीसुद्धा….तेलाचा डाग पडलेल्या, त्या कळकट पेपरमधल्या भज्यांच्या सुगंधासारख्या…. या सर्व स्मृती अजूनही मनात दरवळत आहेत… खमंग… खमंग !!!
या महिन्यात दिवाळी होती….!
मोठ्या हौसेने आम्ही सुद्धा पणत्या घेतल्या पण आमच्या घरात त्या लावल्या नाहीत…. आम्ही त्या चार जणांना विकायला लावल्या…. !
… विकलेल्या पणत्यांनी एका बाजूचं घर उजळेल…. तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या घराची भूक शमेल…!
आम्ही घरीच उटणं केलं …. रस्त्यावरील याचकाकडून त्याचं पॅकिंग करून घेतलं…. त्या बदल्यात त्यांना पगार दिला… या उटण्यात आम्ही चंदनाचे चूर्ण घातले होते… या उटण्याला चंदनाचा सुगंध येतोय की नाही माहित नाही, पण कष्टाचा सुगंध नक्कीच आहे !
आमच्या खेडेगावात पूर्वी प्रथा होती… घरामध्ये फराळ तयार झाला की, ताटंच्या ताटं भरून ती गल्लीतल्या शेजार पाजारच्या लोकांना द्यायची….. जणू शेजारच्यासाठीच घरी फराळ तयार करत आहोत… आम्ही पोरं सोरं ही ताटं लोकांच्या घरी पोहोचते करत असू…. त्यावर एक फडकं झाकलेलं असे…. वाटेत जाताना हे फडकं हळूच बाजूला करून चिवड्यातल्या खमंग तळलेल्या खोबऱ्याच्या चकत्या आणि शेंगदाणे खायला मिळत, म्हणून हे ताट पोहोचवण्याचं काम अंगावर घ्यायला आम्ही प्रत्येक जण उत्सुक असत असू … घरातून भरलेलं ताट दुसरीकडे घेऊन जाईपर्यंत निम्मं व्हायचं… यात खूप “मज्जा” यायची….!
सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की खेड्यातली ही प्रथा आताच्या आपल्या समाजातल्या अनेकांनी आजही जपली आहे….
ताटंच्या ताटं भरून यावेळी समाजातल्या अनेक दानशूरांनी आमच्याकडे फराळ पाठवला… किमान 30 हजार लोकांना पुरेल इतका हा फराळ होता…
… गावाकडल्या स्मृतीचा गंध पुन्हा मनात दरवळला….… लहानपणीप्रमाणेच याहीवेळी आम्ही फडकं झाकून फराळाचं ताट घेऊन रस्त्यावर गेलो…. पण यावेळी तळलेल्या खोबऱ्याच्या खमंग चकत्या आणि शेंगदाणे आम्ही खाण्याऐवजी पोराबाळांची वाट बघणाऱ्या…. लुकलूकणारे डोळे आणि थरथरते हात घेऊन जगणाऱ्या जीवांना भरवल्या … .. आपण घेण्यापेक्षा, दुसऱ्याला देण्यामध्ये जास्त “मज्जा” येते हे आता कळलं…. !
वैद्यकीय उपक्रमांतर्गत या महिन्यात जवळपास ९०० रुग्णांवर रस्त्यावरच उपचार केले. आणि १६ गंभीर रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपचार करून घेतले आहेत. गरजूंना वैद्यकीय साधने (व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या, मास्क, sanitizer, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे,) दिले आहेत.
वृद्ध लोक, ज्यांना कानाने बिलकुल ऐकायला येत नाही, वृद्धापकाळाने डोळ्यांना दिसत नाही आणि त्यामुळे रस्ता ओलांडताना एक्सीडेंट होऊन मृत्यू होतात, अशा सर्वांना कानाची मशीन दिली आहेत, डोळ्यांची ऑपरेशन्स केली आहेत. या सर्व वृद्धांच्या, आवश्यक त्या सर्व तपासण्या आपण रस्त्यावरच केल्या आहेत.
शैक्षणिक उपक्रमांतर्गत ज्या मुलांनी शिक्षणाची वाट धरली आहे अशा सर्वांना काय हवं नको ते पाहून गरजेच्या शैक्षणिक बाबी पुरवल्या आहेत.
या महिन्यात अनेक गोरगरिबांना शिधाही दिला…
आमच्या परीनं आम्ही दिवाळी साजरी केली….
या अल्लाह…. दर्गाहमे हमने कोई चादर नही चढाई…. मगर रस्तेपे जो बुजुर्ग थंडमे मुरझाये पडे थे…. उनके शरीर पे चादर चढाई है ….
Dear Jejus, we have not offered a single candle to you in this Diwali …. But we have enlightened the houses of many poor people…!
वाहे गुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतह…
इस बार हम ने गुरुद्वारेपे नही….रस्तेपेही लंगर आयोजित किया था…
पंजाबी या गुरुमुखी भाषा तो आती नही मुझे… लेकिन बिना शब्दोंकी बोली जो हमने बोली ….क्या वो आपकी भाषा से अलग है ? …
देवी माते … नवरात्रात तुला साडी चोळी अर्पण करण्यापेक्षा, फुटपाथवरच्या मातेला आम्ही साडी चोळी अर्पण केली गं … ! त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले…. ते तुझेच तर होते…..
हे शंकर भगवान…. भोलेनाथा…. लोक तुम्हाला दुधाचा अभिषेक करतात…. तुम्हाला अभिषेक करण्याऐवजी उपाशी आणि नागड्या पोरांना मांडीवर घेऊन, आम्ही त्यांना दूध पाजले आहे… यानंतर तुमच्या मुद्रेवर जे प्रसन्न हास्य उमटलं…. ते मी दिवाळीचा दिवा म्हणून मनात साठवून ठेवलंय…..
हे गजानना…. चतुर्थीला तुला मोदकाचा “नैवेद्य” दाखवण्याऐवजी रस्त्यावर भुकेचा महोत्सव मांडून…. भुकेल्यांना मोदक भरवून त्यांचा आनंद “प्रसाद” म्हणून आम्ही मिळवला आहे… !
आणि हो… हे सारं करण्याबद्दल मी तुमची मुळीच माफी मागणार नाही…. !
मध्यरात्री उठून आलेल्या वासुदेवाने वाकून स्पर्शली ती क्षताक्षत वृद्ध पावले.
युगंधराचा युगस्वर काळोखात घुमला……
” गांगेया, सूर्याच्या उत्तरायणासोबतच तुझीही पावले मोक्षाच्या दिशेने पडतील. मला अंतिम समयी बोलून घेऊ दे !
मला स्मरते आहे तुझे लखलखीत चरित्र …… पिता शंतनुचा लंपट हट्ट, तुझी उग्र प्रतिज्ञा, सावत्र बंधू चित्रांगद- विचित्रवीर्याचा निर्ममपणे केलेला प्रतिपाळ, अंबा-अंबालिकेवर तू लादलेला अनन्वित नियोग प्रयोग, आणि तुझे शतवीर्यवान पौरुष, तुझ्या उग्र मंगल व्यक्तिमत्त्वाचे प्राखर्य ! परंतु, असे असूनही देवव्रता, ऐनवेळी तू सत्याची कास सोडलीस !…. हे युद्ध तुला टाळता आले असते, शांतनवा !”
युगंधराचे बोल ऐकून भीष्म हसले……
” विधीलिखित कोणाला टळत नाही, हे तूच सांगितलेस ना रे पार्थाला? देवकीनंदना, तुझा चातुर्यचंपक फुलू दे तुझ्या द्वारकेत किंवा आता बदललेल्या हस्तिनापुरात. मरणाच्या दारातल्या म्हाताऱ्याला निदान बोलण्यात तरी गुंडाळू नकोस ! जे युद्ध टाळणे तुला जमले नाही, ते मला कसे जमावे, विश्वंभरा? “
निरुत्तर होऊन वासुदेव कृष्ण निरोप घेऊन निघाला, तेव्हा पूर्वेकडे आरक्त नभामध्ये कोवळे सूर्यबिंब प्रकट झाले होते…. उत्तरायण सुरू झालेले पाहून पितामह भीष्मांनी दोन्ही हात जोडले……
…. भारतीय युद्ध अठरा दिवसात संपले नाही, ते अजूनही सुरूच आहे, असे म्हणतात.
रचना: प्रीतीश नंदी
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपली आवड,आपला कल हे आपले कुटुंबीय,आपली जवळची माणसं आणि आपल्याला पुरेपुर जाणून असणारी आपली मित्रमंडळी हे अगदी नस पकडल्या सारखं जाणतात. ही सगळी आपली माणसं अगदी मनकवडीच असतात असं म्हंटलं तरी चालेल. त्यामुळेच माझी एक आवड म्हणजे भिन्न भिन्न भाषेतील,निरनिराळ्या कलाकारांनी कामं केलेल्या दर्जेदार शाँर्टफिल्म्स बघणे हे जाणून माझी मैत्रीण मधुर कुळकर्णी हीने मला एका शाँर्टफिल्म चे नाव सुचविले. त्या मराठी शाँर्टफिल्म चे नाव “शंभरावं स्थळ”.
त्या नावामधील “स्थळ” हा शब्द आमच्या पिढीपर्यंत तरी अगदी परिचीत आणि नवीन पिढीमध्ये “ठरवून लग्नं” यानेकी “अरेंज्ड मँरेज” करणाऱ्या लग्नाळू उपवर मुलामुलींना थोडाफार फँमिलीअर म्हणजे ओळखीचा.
आमच्या पिढीपर्यंत सरसकट अरेंज्ड मँरेज आणि स्पेशल केस म्हणून तुरळक लव्हमँरेज असा रेशो होता. आता रेशो तोच कायम आहे फक्त बाजूंची अदलाबदल झालीयं. आता लव्हमँरेज सरसकट आणि ठरवून लग्न तुरळक असं बघायला मिळतं, कालाय तस्मै नमः, असो.
आमच्या वेळी होत असलेले ते टिपीकल दाखवण्याचे कार्यक्रम, संपूर्ण माहिती असतांना पण त्याबद्दलच ती अगदी ठराविक प्रकारची प्रश्नोत्तरे हे सगळं बघून, अनुभवून प्रकर्षाने जाणवायचं, खरचं इतक्या जुजबी ओळखीवर दोघही हा भलामोठा संसाराचा डाव मांडतोयं खरा,पण खरचं होतील का हे संसार यशस्वी ?
मग मनात यायचं खरंच ओळखीतून किंवा परिचयातून, एकमेकांना जाणून घेऊन तसेच आचारविचार ह्यांची देवाणघेवाण करुन मग मात्र नक्कीच संसार यशस्वी होत असतील. पण ज्यांना अरेंज्ड मँरेज करायचेयं त्यांच्या साठी ह्या “कांदेपोहे”कार्यक्रमाशिवाय पर्यायही नव्हता,वा नाही.
जसाजसा काळ बदलला,पिढी खूप जागरुक, स्वतंत्र विचारांची घडायला लागली,तेव्हा मग ठरवून लग्न करतांना काही जास्तीच्या पाय-या जोडल्या गेल्या. त्यात मग मुलामुलींना एकमेकांशी बोलतांना स्पेस,प्रायव्हसी देणं हे प्रकार सुरू झालेत. हे बघितल्यावर असं वाटलं आता नक्कीच असे विचारविनमयांची चर्चा, देवाणघेवाण झाल्यावर परस्परांना नक्कीच एकमेकांचा पूरेपूर अंदाज येऊन मग हा संसाराचा पाया भक्कम उभा राहून सगळीकडे “आनंदी आनंद घडे” हे वातावरण राहील. पण हा अंदाज ही सपशेल चुकला असे काहीसे अनुभव आलेत कारण कितीही स्पेस, प्रायव्हसी मिळाल्यानंतरही चर्चा, विचारविनिमय ह्यांत फक्त स्वतःकडील व्हाईट साईड वा उजवी बाजू ही फक्त प्रत्यक्षात समोरच्याला दाखविली जाते. नंतर प्रत्यक्ष संसार सुरू झाल्यावर मात्र ह्या दोघांमधील डार्क साईड सामोरी येते,जी त्यांना आता नव्याने कळते. आणि मग संसार हा बहरु लागण्याऐवजी ईगोपाँईंटजवळ येऊन हळूहळू कोमेजायला लागतो.
शेवटी मग एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली लग्न हे ठरवून करा की लव्हमँरेज ,हे यशस्वी करण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे तडजोड. कदाचित तडजोडीचे दुसरे नावं संसार असं म्हंटले तरी चालेल. आता फक्त ही जुजबी तडजोड करतांना फक्त दोघांनीही मनात आणायचं, हे आपणं आपल्या जीवाभावाच्या, प्रेमाच्या माणसासाठी करतोय, बस मग पुढे सगळं सुरळीत होतंच. फक्त ह्या तडजोडी जुजबी बाबतीत हव्यात, कारण एकदम पराकोटीच्या तडजोडी दोघांपैकी कुणी करु शकत नाही, आणि खरतरं स्वत्व गमावून तडजोड करुन जगण्यात मजाही नसते.
आता पुढे ह्या शाँर्टफिल्म विषयी पण नक्की लिहेनच. पण नुसतं शाँर्टफिल्म चे नाव वाचले आणि हे विचार भराभर डोक्यातून, मनातून उतरले आणि शब्द बनून बसले.
रखमा कामाला आली की, तिच्याशी थोडावेळ बोलावं लागतं. सुखदुःख विचारपूस करावी लागते. मी तिला आज सहजच विचारलं, ” कसा चाललाय ग मुलांचा अभ्यास? बरी आहेत का?” रखमाला, दोन मुलं. एक मुलगा पाचवीत तर एक मुलगा तिसरीत. जखमेवरची खपली काढावी, तशी ती बोलू लागली. ” काय सांगायचं ताई, मुलांचा अभ्यास फोनवर झाला आहे म्हणे, शिकवणी बंद आहेत. आम्हाला शिकवाया येत नाही. त्यात फोनसमोर टाईमात बसायला लागतं म्हणे, आणि सारखं ते फोन रिचार्ज करायचं कसं जमणार आम्हाला? बंद झालाय त्यांचा अभ्यास. नुसतीच फिरत्यात. शाळा कधी सुरू होणार हो ताई?” काकुळतीला येऊन विचारत होती. तिच्या या प्रश्नाला माझ्याकडे तरी कुठे उत्तर होतं. .पण तरी जीव एकवटून मी तिला धीर देऊ लागले, ” सर्वांना लस मिळाली की, होईल कमी हा आजार “. ” कसलं काय. ताई, खरं सांगते, माझा मोठा मुलगा शाळेत लय हुशार होता. बाईंनी सांगितलेलं नीट करायचा. म्हणलं, असाच पुढे पुढे शिकला म्हणजे चांगलं होईल. त्याला उद्या मोठा झाला की, कुठं तरी हापिसात नोकरी लागेल. तर हयो काय संकट आलं. पोरं नुसती इथं बस तिथं बस. रिकामं फिरत्यात. कामात लक्ष लागेना माझं ताई ” आणि ती रडायला लागली. मलाही खूप पोटात कालवाकालव झाली..एका आईची सर्व स्वप्नं काचेसारखी ताडताड तुटत होती.आता मी तिला आणखी धीर देऊ लागले. ” हे सगळं लवकर संपेल गं. तूर्त मोबाईलवर अभ्यास परीक्षा चालूच राहतील.” त्यावर ती म्हणाली, “अहो ताई, मुलांना फोनवर अभ्यास करायला जमेना. अभ्यासावरचं लक्ष उडालं. समोर बाई नाहीत, फोटोत दिसतात. त्यामुळे भीती राहिली नाही. आणि आदरबी वाटे ना. त्यांना फोन घेता येत नाही. काही कळत नाही. जून महिन्यात दरवर्षी शाळेची फी, शिकवणीच्या बाईंची फी, दप्तर, डबा देऊन मुलांना शाळेला धाडीत होते. आता सगळं संपलंच ना.” तिच्या डोळ्यात भीती व बोलण्यात निराशेचा सूर होता. मी पुन्हा धीर देत म्हणाले,. ” शाळा बंद आहेत गं,पण अभ्यास चालू ठेवायचा आहे. आता असं कर, तू त्यांना मोबाईल घेऊन माझ्याकडे पाठव. मी सांगेन कसं पाहायचं ते. सगळी पुस्तकं असतात मोबाईलमध्ये. मी घेईन त्यांचा
अभ्यास “. झाले… हे ऐकून मात्र तिचे डोळे हसू लागले. मनातली निराशा आता निघून गेली. तिच्या मनाने उभारी घेतली, व मला म्हणाली, ” खूप उपकार होतील ताई, आत्ता घरी जाते. आणि लावून देतो त्यास्नी तुमच्या घरी. चालंल का?” मी म्हणाले, ” पाठव की “. आणि मग खूप उत्साहाने झपाझप पाऊले टाकीत ती निघून गेली. तिची स्वप्नं पूर्ण करण्याचा तिला मार्ग सापडला होता. तिची पाठमोरी आकृती पाहून मला भरून आले. किती वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत समाजात. लोकांचा आत्मविश्वास ढळतो आहे. कधीकधी आपण अशांसाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे.मनामनांतील अशांतता मिटवू या. धीर देऊ या. मदत करू या. कधी शब्दाने तर कधी कृतीतून. त्या़च्या इवल्या इवल्याशा स्वप्नांना खतपाणी घालू या. मग त्यातूनच येणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखराची वाट पाहूया. असाच निश्चय करूया…… भावकोश जपू या.
☆ नासाची ‘सॅम्पल रिटर्न’ मोहीम ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
मंगळावरील खडक आणि तुटलेले खडक /धूळ यांचे नमुने तपशीलवार अभ्यासासाठी पृथ्वीवर परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळसंस्था NASA व युरोपची अंतराळ संस्था ESA संयुक्तपणे काम करीत आहेत. मार्स पर्सव्हरन्स रोव्हर हा या आंतरराष्ट्रीय व अंतर्ग्रहीय योजनेचा पहिला चरण आहे. त्याचे काम मंगळावरील खडकांचे नमुने गोळा करणे व संग्रहित करणे हे असून हे काम तो व्यवस्थितपणे करत आहे. आज अखेर त्याने शास्त्रोक्त पद्धतीने अकरा नमुने गोळा करून ते संग्रहित करून ठेवले आहेत. त्याने कमीतकमी तीस नमुने गोळा करणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये हे नमुने पृथ्वीवर परत आणले जातील व अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने त्याचे परीक्षण केले जाईल. जेथे पर्सव्हरन्स कार्यरत आहे त्या जेझेरो क्रेटरच्या आसपासच्या परिसरात पर्सव्हरन्सच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी ‘मंगळ नमुना परत’ योजना आखण्यात आली आहे. यात दोन मोहिमा अंतर्भूत आहेत. पहिल्या मोहिमेअंतर्गत एक यान जेझेरो घळीत किंवा त्याच्या आसपास उतरेल, पर्सेव्हरन्सने मंगळ भूमीवर निर्धारित जागी ठेवलेले नमुने हस्तगत करेल व हस्तगत केलेले नमुने घेऊन मंगळावरून उड्डाण करून मंगळाच्या कक्षेत येईल. दुसऱ्या मोहिमेअंतर्गत दुसरे यान मंगळाच्या कक्षेत जाऊन हे नमुने ताब्यात घेईल व २०३३ साली हे नमुने सुरक्षितपणे पृथ्वीवर आणेल. अंतराळविज्ञानाच्या इतिहासात प्रथमच दुसऱ्या ग्रहावरून गोळा करून आणलेले हे नमुने एका कळीच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील आणि तो प्रश्न म्हणजे : कधीकाळी मंगळावर जीवन अस्तित्वात होते का? पृथ्वीवरील अत्याधुनिक व उच्च दर्जाच्या प्रयोगशाळांमध्ये हे नमुने तपासल्यानंतरच आपणास वरील प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.
NASA व ESA हे कसे साध्य करणार आहेत हे आपण पाहू :
अ) सन २०२८ च्या मध्यावर नमुना पुनर्प्राप्ती लँडर (sample retrieval lander) मंगळावर उतरवला जाईल. त्याच्यावर नासाने तयार केलेला मार्स एसेन्ट व्हेईकल हा अग्निबाण आणि इसा (ESA) ने तयार केलेला नमुना हस्तांतरण बाहू (sample transfer arm)असतील. या लँडर बरोबर दोन हेलिकॉप्टर्ससुद्धा पाठवली जातील.
ब ) मंगळावरील नमुनेअसलेली पेटी घेऊन पर्सेव्हरन्स रोव्हर लँडर जवळ येईल. लँडर वरील नमुना हस्तांतरण बाहुच्या सहाय्याने ही पेटी मार्स एसेन्ट व्हेईकल या अग्निबाणाच्या टोकावरील एका कप्प्यात ठेवण्यात येईल.
ब-१) अलीकडेच नासाने केलेल्या अभ्यासावरून पर्सेव्हरन्स रोव्हरची कार्यक्षमता २०३० पर्यंत अबाधित राहील असा निष्कर्ष निघाला आहे. पण काही अनपेक्षित कारणांमुळे जर २०३० पर्यंत पर्सेव्हरन्स रोव्हर कार्यक्षम राहू शकला नाही तर लँडरवरील हेलिकॉप्टर पर्सेव्हरन्सने नमुन्याची पेटी ज्या जागेवर ठेवली असेल त्या जागेवर जाऊन ती पेटी उचलेल व अग्निबाणाच्या वरच्या कप्प्यात आणून ठेवेल. या हेलिकॉप्टर्सची रचना मंगळावर सध्या कार्यरत असलेल्या इंजेन्यूटी हेलिकॉप्टर सारखीच असेल पण त्यास चाके असतील जेणेकरून नमुन्यांची पेटी घेण्यासाठी ते पेटीच्या अगदी नजीक जाऊ शकेल; तसेच पेटी उचलण्यासाठी त्याला एक लहानसा हात (arm) असेल.
क ) इसाने तयार केलेला पृथ्वी परत ऑर्बिटर (earth return orbiter) २०२७ सालच्या मध्यावर प्रक्षेपीत करण्यात येणार आहे. त्याच्यावर नमुने हस्तगत, प्रतिबंध आणि परतीची प्रणाली (capture, containment and return system) तसेच पृथ्वी प्रवेश वाहन असेल. हा ऑर्बिटर मंगळाच्या ठरलेल्या कक्षेत प्रवेश करून मंगळाभोवती भ्रमण करेल.
ड ) मंगळावरील खडकांच्या नमुन्यांची पेटी घेऊन मार्स एसेन्ट व्हेईकल हा अग्निबाण मंगळभूमीवरून उड्डाण करून earth return orbitar ज्या कक्षेत भ्रमण करत असेल त्या कक्षेत येईल. ऑर्बीटरमध्ये असलेली परतीची प्रणाली हे नमुने हस्तगत करून पृथ्वी प्रवेश वाहनात ठेवेल. त्यानंतर हा ऑर्बिटर मंगळाची कक्षा सोडून पृथ्वीकडे मार्गक्रमण करेल. पृथ्वीच्या जवळ आल्यावर ऑर्बीटरपासून प्रवेश वाहन वेगळे होईल व पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून २०३३ साली सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरेल.
इ ) वैज्ञानिकांद्वारा या नमुन्यांचे अत्याधुनिक उपकारणांद्वारे परीक्षण केले जाईल. त्यानंतरच ‘ मंगळावर कधीकाळी जीवन होते का? ‘ या बहुप्रतिक्षित प्रश्नाचे उत्तर मिळेल.