मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंद म्हणजे… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंद म्हणजे… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

उदासी म्हणजे भूतकाळ… ! 

तणाव म्हणजे भविष्यकाळ…!!

आणि आनंद म्हणजे वर्तमानकाळ…!!! 

पण भूतकाळात काय घडलं ? ते पुन्हा घडायला नको, याचा विचार करून भविष्य काळाची तजवीज करता करता …आपण वर्तमान काळात जगायचं विसरूनच जातो, खरं तर…!

गंमत अशी आहे, की “आनंद” मिळवायला खूप काही घ्यावं लागतं …. असं आपण आयुष्यभर समजतो, पण  पुढे खूप चालून गेल्यानंतर कळतं, आपण घेताना नाही…. पण ज्यावेळी दुसऱ्याला काही देत होतो, त्याचवेळी खरे “आनंदी” होतो… ! 

हरकत नाही, हे उशिरा का होईना, ज्याला समजलं तो खरा सुखी ! 

माझ्या या कामात, मला नेहमी असं वाटतं, की मी गुलाबाच्या बागेतून फिरून गुलाब गोळा करत आहे… सुखाचे आणि आनंदाचे क्षण झोळीत टाकत आहे… ! 

आपल्याच माध्यमातून जमा केलेले आनंदाचे हे क्षण आणि गुलाबाची काही फुलं, लेखाजोखाच्या निमित्ताने आपल्या पायाशी सविनय सादर ! 

वैद्यकीय

१ .  या महिन्यात एकूण १५ लोक, जे रस्त्यावर असहायपणे पडून होते, वेळेवर ट्रीटमेंट मिळाली नसती तर ते हे जग सोडून गेले असते अशांना, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून पूर्णपणे ते खडखडीत बरे झाले आहेत.

जगण्याचंच भय वाटू लागतं… त्यावेळी मरणाची भीती संपून जाते…! आत्मसन्मान… स्वाभिमान… आत्मप्रतिष्ठा…असे मोठाले शब्द मग पुस्तकांच्या पानातच दबून राहतात…. यानंतर सुरू होते जगण्याची लढाई….! अशावेळी पाया पडून तरी किंवा कोणाचे तरी पाय ओढून तरी, जगण्याची स्पर्धा चालू होते… ! 

पाया पडून /  याचना करून जे जगतात, ते भिक्षेकरी…! 

पाय ओढून हिसकावून घेतात, ती गुन्हेगारी… !! 

— दोघेही मला एकाच तराजूत भेटतात… 

तराजू मग हाताने तोलत, ” हाताची किंमत कळली की कोणाचे पाय धरायची किंवा ओढायची वेळ येत नाही…” या शब्दांचे वजन मी थोडं या तागडीत, थोडं त्या तागडीत टाकत  राहतो…

— ज्याला हे समजलं….त्याचं मोल माझ्या मनात वाढतं… आणि मग त्याला / तिला उभं करण्यासाठी तुमच्या मदतीने प्रयत्न करतो आहे… ! 

२. या महिन्यात भीक मागणारे ९०० लोक…. त्यांच्या सर्व टेस्ट आपण रस्त्यावर करून घेतल्या आहेत,   एक्स-रे, सोनोग्राफी, कलर डॉपलर अशा ज्या तपासण्या रस्त्यावर होत नाहीत, अशा सर्व तपासण्या रेड क्रॉस सोसायटी, पुणे यांच्याकडे करून घेत आहोत. 

— सायन्स कितीही पुढं गेलं, तरी मनातले घाव मात्र कोणत्याही मशीनमध्ये दिसत नाहीत… 

तुम्हा सर्वांच्या साथीने, हे घाव शोधून, त्यावर फुंकर मारण्याचा एक प्रयत्न करत आहे…! 

  1. नेत्र तपासणी

२७ मार्च २०२३ – या दिवशी रस्त्यावर बेवारस राहणाऱ्या अनेकांची डोळे तपासणी केली आणि  डॉ समीर रासकर, माझे मित्र यांनी मोतीबिंदूचे ऑपरेशन कमीत कमी खर्चात करून दिले.

— “दृष्टी” आल्यानंतर आता व्यवसाय करण्याचा “दृष्टिकोन” ठेवावा, असं या सर्वांना बजावून सांगितलं आहे.  

आता, दिसायला लागल्यानंतर रस्ता ओलांडताना होणारे अपघात टळतील…. पर्यायाने मृत्यू वाचतील. 

… श्वास बंद पडल्यानंतरच मृत्यू होतो असं नाही, तर जगत असताना, चार चौघांनी खांद्यावरून उतरवून, त्यांच्या आयुष्यातून आपल्याला बाद करणे,  म्हणजे खऱ्या अर्थाने मृत्यू !!! 

भिक्षेकर्‍यांनी, “कष्टकरी” व्हावे…. स्वयंपूर्ण व्हावे आणि त्यानंतर सन्मानाने “गावकरी” म्हणून स्वाभिमानाने जगावे, समाजाने आईच्या मायेने त्यांनाही उचलून कडेवर घ्यावे, यासाठी मी काम करत आहे….आणि हा विचार हाच माझा श्वास आहे… ! 

अन्नपूर्णा प्रकल्प

रस्त्यावर असहायपणे पडून असणारे आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे….  असे दयनीय अवस्थेत जगणाऱ्या लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रोज अन्नदान केले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या घरी काहीतरी गोड असतं….. याच धर्तीवर, सणावाराला त्यांना गोडाचे जेवण दिले आहे. 

जी मंडळी भीक मागणे सोडून काम करायला लागली आहेत, त्यांना वेळोवेळी कोरडा शिधा / किराणा दिला आहे. 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकशे दहा वर्षे चाललेली पावलं!… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एकशे दहा वर्षे चाललेली पावलं!… ☆ श्री संभाजी बबन गायके 

अर्थात वाळवंटातील वाटाड्या शूर वीर रणछोडदास राबरी !

“साब ! म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टरमध्ये बिनधास्तपणे बसलेल्या त्या वृद्धाने म्हणल्याबरोबर त्यांच्यासोबतच्या लष्करी अधिका-यांनी हेलिकॉप्टर ताबडतोब माघारी फिरवलं आणि विमानतळावर उतरवलं ! सुरकतलेलं पण अजूनही काटक शरीर, पीळदार आणि अगदी दाट मिशा, आणि मुख्य म्हणजे दगडासारखे मजबूत पाय असलेल्या त्या आजोबांचे वय होतं १०७ वर्षे फक्त….होय….  अवघे एकशे सात वर्षे !

हे आजोबा हेलिकॉप्टरमध्ये लष्करी अधिका-यांसमवेत कसे?—  

आजोबांना महान सेनापती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांनी खास आणि तेही तातडीनं बोलावणं धाडलं होतं. तामिळनाडूमधील वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले माणेकशासाहेब कधी शुद्धीत तर कधी अर्धवट बेशुद्धीमध्ये सतत ‘पगी…पगी’ असा काहीतरी उच्चार करताना तेथील डॉक्टरांनी ऐकलं होते! “कोण पगी?” असं विचारलं गेल्यावर साहेबांनी ‘पगी’ ची कहाणी अगदी इत्यंभूत सांगितली….आणि त्या ‘पगी’ची भेट व्हावी,अशी इच्छा व्यक्त केली…नव्हे तसा आदेशच दिला ! 

लष्कराने ‘पगी’चा शोध घेतला आणि राजस्थानमधील पाकिस्तानी सीमेवर असलेल्या बनासकांथा येथील ‘निंबाला गावातून या आजोबांना सोबत घेतलं..त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्थाही करण्यात आली होती. माणेकशा साहेबांचं नाव घेताच आजोबांच्या डोळ्यांत निराळीच चमक आली. त्यांनी घरातील महिलांना काहीतरी सांगितलं. त्या महिलांनीही लगबग करून पंधरा-वीस मिनिटांत एक कापडी थैली आजोबांच्या हाती दिली. जवळच्या लष्करी तळावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं आणि तेवढ्यात आजोबा म्हणाले,”साब  म्हारो थैलो तो नीच्चे रहि गयो!” हेलिकॉप्टर उतरवलं गेलं, थैली शोधली गेली. सुरक्षिततेच्या कारणांसाठी त्या थैलीत काय आहे? याची तपासणी केली…थैलीत दोन कांदे, दोन बाजरीच्या भाकरी आणि पिठलं एवढंच होतं ! “ सॅम साब को बहोत पसंद है! कभी कभी हमरा खाना चखा करते थे बॉर्डर पर ” –आजोबांनी सांगितलं…हेलिकॉप्टरने पुन्हा भरारी घेतली !

रूग्णशय्येवर असलेले सेनापती माणेकशासाहेब या ‘पगी’ला पाहून उठून बसले.

“आओ, पगी…रणछोडदास…..!” साहेब आपल्या खणखणीत आवाजात उदगारले!  ‘पगी’ने त्यांना ताठ उभे राहून आणि थरथरत्या हातांनी सल्यूट बजावला. साहेबांनी त्यांना जवळ बसवून घेतलं….त्यांच्या हातातील पिशवी घेतली ! त्या दिवशी एक सैनिक आणि एक सेनापती एकत्र बसून जेवले ! कृष्ण-सुदामाची भेट आणि पोहे हीच कथा जणू पुन्हा घडत होती…सुदाम्याच्या शिदोरीत पोहे होते…  या सुदाम्याच्या शिदोरीत कांदा-भाकरी आणि पिठलं !

पग म्हणजे पाय हे समजण्यासारखं आहेच. परंतू ‘ पगी म्हणजे पायांच्या ठशांचा माग काढणारा किंवा वाळवंटातून वाट दाखवणारा !’  क्षितिजापर्यंत वाळूच वाळू, त्यात अंधार….नक्की कोणत्या दिशेला जायचं याबद्द्ल नवख्यांचा गोंधळ होणारच. पण राजस्थानातल्या याच वाळूत जन्मलेली, वाढलेली,गुरे-उंट हाकलेली आणि शेवटी याच वाळूत मिसळून गेलेली राजस्थानी माणसं वाळूचा कण न कण ओळखू शकतात…अंधार असला तरी !

१९०१ मध्ये या वाळूत, पशुपालक कुटुंबात आपल्या या कथानायकाचा जन्म झाला. नाव ठेवले गेले ‘रणछोडदास’! भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या जरासंधाशी झालेल्या युद्धात हे नाव जरासंधाकडूनच प्राप्त झाले…असे म्हणतात. युद्धात जनतेची हानी होऊ नये म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी, युद्ध योजनेचा एक भाग म्हणून, रणांगणातून तात्पुरते पलायन केले म्हणून ते रण सोडून जाणारे….रणछोड ! पुढे जरासंधाचा नि:पात झाला !

पण हे कलियुगातील आणि मानवी अवतारातील रणछोडदास १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात भारतीय सेनेच्या अग्रभागी राहिले होते ! आयुष्यभर वाळवंट तुडवलेले रणछोडदास उंटांच्या वाळूत उमटलेल्या पावलांच्या ठशांवरून, माणसांच्या पायांच्या खुणांवरून, एक ना अनेक गोष्टींचा अचूक अंदाज बांधायचे. किती उंट असतील? त्यावर किती माणसे बसलेली असतील? त्यांच्यासोबत चालणारे प्रवासी किती असतील? त्यात स्त्रिया किती आणि पुरूष किती असतील? त्यांची वजने आणि उंची किती असेल?….रणछोडदास यांचा अंदाज चुकायचा नाही..दिवस असो वा रात्र !

१९६५ मध्ये प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधी पाकिस्तान्यांनी कितीतरी वेळा भारतीय हद्दीमध्ये, कच्छच्या रणात घुसखोरी केलेली होतीच. युद्धाच्या आरंभी त्यांनी कच्छ भागातील विधकोट ठाणे काबीज केले होते. त्यात जवळजवळ १०० भारतीय सैनिक धारातीर्थी पडले होते. भारतीय सैन्याचे एक मोठे दल त्या भागाकडे पाठवले गेले. अंतर जास्त होते आणि रस्ते अनोळखी. तिथून जवळच असलेल्या छारकोटपर्यंत आपले सैन्य वेगाने पोहोचणे गरजेचे होते. पाकिस्तान्याचे १२०० सैनिक सीमेवरील एका गावाजवळच्या जंगलात लपून बसले होते. रणछोडदास यांनी त्यांचा अचूक माग काढला. आपल्या सेनेला अवघड वाटेवरून अचूकपणे आणि अत्यंत त्वरेने म्हणजे अपेक्षित वेळेपेक्षा बारा तास आधीच शत्रूपर्यंत पोहोचवले. इतक्या लवकर भारतीय सैन्य आपल्याला शोधून काढेल याची पाकिस्तान्यांना शक्यताच वाटली नव्हती. भारतीय जवानांनी पाकिस्तान्यांना धूळ चारली ! रणछोडदास या सामान्य ‘पगी’चा, वाटाड्याचा या विजयात मोठाच हातभार लागला ! बी.एस.एफ.अर्थात बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (अर्थात सीमा सुरक्षा दल आणि अर्थातच सीमा सुरक्षा बल) यांनी बनासकांथा येथील एका सैन्यचौकीला ‘रणछोडदास’ यांचे नाव देऊन त्यांच्या कर्तबगारीचा अनोखा गौरव केला आहे.

फिल्ड मार्शल माणेकशासाहेबांनी रणछोडदास यांची अनोखी क्षमता ओळखून त्यांच्यासाठी लष्करात ‘पगी’ (गाईड,वाटाड्या,पथ-मार्गदर्शक) हे विशेष पद निर्माण केले. या दूरदृष्टीच्या निर्णयाचा १९७१ च्या लढाईतही खूप फायदा झाला. पालीनगर ही पोस्ट जिंकून घेण्याच्या यशस्वी मोहिमेत पथ-मार्गदर्शन करणा-या रणछोडदास यांचाही मोठा वाटा होता. हे काम करताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. याबद्द्ल माणेकशासाहेबांनी त्यांना स्वत:च्या खिशातून तीनशे रुपयांचे रोख पारितोषिकही दिले होते आणि त्यांना भोजनासाठीही आमंत्रित केले होते ! संग्राम मेडल, पोलिस मेडल आणि समर सेवा स्टार असे पुरस्कारही भारतीय लष्कराने रणछोडदास यांना प्रदान केले ! शौर्याची कदर करावी ती फिल्ड मार्शल सॅम माणेकशा साहेबांसारख्या जिंदादिल सेनानींनीच आणि भारतीय लष्करानेच !

माणेकशासाहेबांना आपल्या या गुणी, देशप्रेमी, धाडसी सैनिकाची आठवण न आली तरच नवल ! आपल्या अंतिम दिवसांत तर ही आठवण अधिकच तीव्र होत गेली….आणि त्यांनी ‘पगी’ रणछोडदास राबरी (राबडी) यांना अत्यंत सन्मानाने बोलावून घेतले.

२७ जून, २००८ रोजी  माणेकशासाहेब निवर्तले. ‘पगी’ रणछोडदास यांनी लगेचच म्हणजे २००९ मध्ये, त्यांच्या वयाच्या तब्बल १०८ व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली….मानवी आयुष्याची १०० वर्षांची मर्यादा ओलांडलेले शरीर काम तरी किती दिवस करणार? वयाच्या ११२ व्या वर्षी अर्थात २०१३ मध्ये हा पगी स्वर्गाची वाट चालण्यासाठी कायमचा निघून गेला ! त्यांच्या पावलांचे ठसे राजस्थानातल्या वाळवंटाच्या मनात अजूनही ताजे असतील. जय हिंद !

आपल्यापैकी अनेकांनी ही माहिती पहिल्यांदाच वाचली असेल….मी ही नुकतीच वाचली. काही सैनिकी ज्येष्ठ अधिका-यांनी ही माहिती इंग्लिशमध्ये लिहिलेली आहे. ब-याच वृत्तपत्रांनीही रणछोडदास साहेबांविषयी भरभरून लिहिले आहे. मराठीत असे काही (माझ्यातरी) वाचनात आले नाही. मी जे वाचले त्याचाच हा स्वैर अनुवाद आहे. तपशीलात अर्थातच काही कमीजास्त असेल..दिलगीर आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या एका हिंदी युद्धपटात रणछोडदास यांची व्यक्तिरेखा दाखवली गेली, असे म्हणतात. संजय दत्तने ‘पगी’ कसा रंगवला असेल,देव जाणे ! हिंदी सिनेमावाले काय काय आणि कसे कसे दाखवतील याचा नेम नाही. असो. गुजराती लोकगीतांमध्ये रणछोडदास यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख होतो…यापेक्षा अधिक काय नाव मिळवावे एका सामान्य माणसाने? मन:पूर्वक सल्युट …. 

लेखक : संभाजी बबन गायके.

9881298260.

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जोडीदार… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ जोडीदार… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

देवाला पण मानलं पाहिजे.

तो माणसांच्या जोड्या पण विलक्षण बनवतो.

 

एकसुरी आयुष्य खूप कंटाळवाणं होईल हे त्याला माहीत असतं म्हणून तो

मित्रांच्या, प्रेमाच्या

अगदी

नवरा बायकोच्याही जोड्या बनवताना

दोन अशा व्यक्तिमत्त्वांना एकत्रित आणतो की जे एकमेकांशी छान जुळवून घेतील.

 

अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती देतो,

गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती देतो,

भांडखोर व्यक्तीला शांत व्यक्ती देतो

आणि खडूस लोकांना थोडीशी मोकळी आणि जास्त समजूतदार व्यक्ती मिळते,

ज्या योगे त्यांचं  कुठे अडणार नाही…

 

खरं तर

दोन व्यक्तींमध्ये फरक हा असणारच.

 

परंतु हा जो फरक आहे, तो ओळखून, तुम्ही कसे निभावता, हे जास्त महत्त्वाचं असतं.

 

कधी कधी आपण हतबल होतो..

कारण समोरच्या व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं हे आपल्याला कळत नाही..

पण कोण चुकतं, त्यापेक्षा काय चुकतं

हे एकदा कळलं, की उत्तरं सोपी होतात.

 

अनेकदा आपला दूषित दृष्टिकोन हाच एक मोठा अडथळा असतो.

 

आपण जसे आहोत तशी समोरची व्यक्ती नसेल,

तर आपला अपेक्षाभंग ठरलेला असतो.

 

पण आपणही समोरच्याच्या * *अपेक्षांमध्ये उतरतो का, हा एक विचार करण्यासारखा विषय आहे.

वेगळेपण आहे म्हणून नात्यांमध्ये सौंदर्य आहे..

 

सगळेच सारखे असतील तर आयुष्य किती कंटाळवाणे,

नीरस होईल ?

 

उदास व्यक्तीच्या

सोबत उदास माणूस

कसं वाटतं ?

 

प्रत्येकाने आयुष्याचा आनंद पुरेपूर घ्यावा,

एकटं राहू नये ह्यासाठी

मैत्री, जोडीदार, सहचर

अशा गोष्टी उदयास आल्या,

 

पण आपण मात्र आपल्या व्यक्तीवर टीका करण्यात इतके मशगूल होतो की त्यांच्या वेगळेपणातील सौंदर्य बघण्याची तसदी कधी घेत नाही.

 

आपलं माणूस थोडसं वेडगळ आहे,

वेगळं आहे पण

गोड आणि प्रिय आहे, असा विचार करायला सुरुवात केली,

की त्याचं वेगळेपण सहज आपल्यामध्ये सामावून जातं .

 

‘अनुरूप’ शब्दाचा अर्थ हा कधीच एकसारखे असा होत नाही नं ?

 

एकमेकांना अनुरूप म्हणजेच

जिथे एक कमी, तिथे त्याची कमतरता दुसरा भरुन काढतो.

कधी गुणांनी,

कधी स्वभावाने,

कधी विचारांनी….

 

म्हणूनच विविधतेत एकता असते.

 

ह्या वेगळेपणातूनच एक सुंदर , संवेदनशील आणि मोहक नातं निर्माण होतं. जे आपल्याला जपते

आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपण धडपडतो ……

 

जीवन सुंदर आहे।

सदा आनंदी रहा

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रूचिरा आणि खवय्ये…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “रूचिरा आणि खवय्ये…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कुणाच्यही ह्रदयात शिरायचा मार्ग हा त्याच्या पोटातूनच जातो अशी आपल्याकडे एक म्हण आहे. खरचं, आपल्याकडील खवैय्येगिरी बघितली की ही म्हण पटते सुद्धा. खाद्यसंस्कृती म्हंटली की त्यात दोन बाजू असतात. एक बाजू खाण्याची आवड असणाऱ्यांची आणि दुसरी बाजू सुगरणगिरी करीत मनापासून आग्रहाआग्रहाने खिलवणा-यांची.

खाण्याची आवड असणाऱ्यांमध्येही प्रकार असतात काही सरसकट सगळेच पदार्थ आवडीने,खाण्याचा मनमुराद  आनंद लुटणारे तर काही चोखंदळपणे नेमकेच विशिष्ट पदार्थ आवडून त्याचा मनापासून स्वाद घेणारे. मी माझ्याच बाबतीत अभ्यास केल्यावर लक्षात आलं,आधी शिक्षण,मग नोकरी ह्यामुळे स्वयंपाकघरात घुसघुस करणा-यातली मी नक्कीच नव्हे. त्यामुळे मला स्वतः ला शक्यतोवर घरचं,ताजं अन्न इतकीच माझी डिमांड मग बाकी नो आवडनिवड. फक्त एक गोष्ट जे काही पदार्थ करते ते होतात मात्र चवदार, सगळ्यांना आवडतील असे.आता ही कदाचित अन्नपूर्णेची कृपा असावी वा आपल्या जवळच्या माणसांच माझ्यावरील प्रेम, मला बरं वाटावं म्हणून गोड पण मानून घेत असतील बिचारे.

खिलविणा-यांमध्येही प्रकार असतात. काही अगदी ओ येईपर्यंत मनापासून आग्रह करून करून खाऊ घालणार तर काही मला आग्रह अजिबात करता येत नाही तेव्हा हवं तेवढं मनसोक्त पोटभर खा असा सज्जड दम देणारे.              

ह्या सगळ्यांमुळे आज अगदी हटकून घराघरात पोहोचलेल्या अन्नपूर्णेची आठवण प्रकर्षाने झाली. 20  एप्रिल ही तारीख खास सुगरण व्यक्तींच्या आणि त्या सुगरपणाला दाद देणा-या खवैय्ये लोकांच्या तोंडची चवच घालवणारी तारीख. 20 एप्रिल 1999 रोजी साक्षात अन्नपूर्णेची छाप असणा-या प्रतिअन्नपुर्णा म्हणजेच कमलाबाई ओगले ह्यांचा स्मृतिदिन.

कमलाबाईंना “सव्वालाख सुनांची सासू”असं म्हंटल्या जायचं.खरोखरच 1970 साली अगदी अल्पावधीतच मेहता पब्लीकेशन्सने प्रकाशित केलेल्या कमलाबाई ओगले ह्यांनी लिहीलेल्या “रुचिरा”ह्या पुस्तकाच्या सव्वालाख प्रती हातोहात विकल्या जाऊन त्यापासून ब-याच जणींना बरचं काही शिकता आलं ही गोष्टच खूप अलौकिक खरी. नवीनच संसाराला सुरवात करणाऱ्यांसाठी रुचिरा पुस्तक म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेले नवनीत ,बालविद्या डायजेस्टच जणू.

खरतरं कमलाबाई फक्त चार इयत्ता शिकलेल्या. पण दांडेकर घराण्यातून एका लहानशा खेडेगावातून लग्न करून त्या सांगलीच्या ओगले कुटूंबात आल्या आणि त्यांच्या सासूबाईंच्या हाताखाली पाकशास्त्रात एकदम पारंगत झाल्यात.पुढे त्यांचे वास्तव्य काही काळ आँस्ट्रेलियात पण होते.

त्यांच्या “रुचिरा” ह्या पुस्तकात मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे पदार्थांसाठी लागणा-या जिन्नसांची मापं ही चमचा वाटीने मापलेली आहेत.ते ग्रँम,मिलीग्रँम असं आखीवरेखीव मोजमाप माझ्यासारख्या वैदर्भीय खाक्याला झेपणारचं नव्हतं मुळी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकात असलेली साधी,सरळ,सोपी,चटकन डोक्यात शिरणारी भाषा.आणि तिसरी ह्या पुस्तकातील आवडणारी बाब म्हणजे ह्या पुस्तकातील पदार्थ हे आपल्याला नित्य लागणा-या जेवणातील वा आहारातील आहेत.जे पदार्थ आपण वर्षानुवर्षे, सठीसहामाशी कधीतरीच करतो अशा पदार्थांचा भरणा कमी व नित्य स्वयंपाकात लागणा-या अगदी चटण्यांपासून चा समावेश ह्या पुस्तकातं आहे.

मला स्वतःला हे “रुचिरा” पुस्तक बरचं पटल्याने,भावल्याने बहुतेक लग्न ठरल्यावर वा नुकतेच नवविवाहित मुलींना मी हे पुस्तक आवर्जून भेट द्यायचे.आतातर शिक्षणाच्या, नोकरीच्या निमीत्त्याने घरापासून दूर राहणाऱ्या तसेच लग्नाळू मुलांना पण हे पुस्तक भेट म्हणून द्यायला अगदी योग्य आहे.किमान स्वतःच्या उदरभरणाइतके तरी पदार्थ स्वतःचे स्वतः करता यायलाच हवे मग तो मुलगा असो वा मुलगी. कुठल्याही व्यक्तीने स्वतः हाताने आपल्या आवडीनुसार घरच्या घरी रांधणं ह्यासारखी तर उत्तम आणि फायदेशीर गोष्ट नाही. आपल्या घरात आपण जे शिजवू ते आपल्या चवीनुसार असेल,त्यात उत्तम जिन्नस वापरलेले असतील,स्वच्छता सांभाळलेली असेल आणि नक्कीच विकतच्यापेक्षा निम्म्या किमतीत हे पदार्थ घरच्याघरी बनतात.

ज्यांची ह्या रुचिरा वर श्रद्धा वा विश्वास होता त्या आमच्या शेजारच्या काकू कितीही खिळखीळं झालं असलं तरीही त्यांचं जुनं रुचिरा हे पुस्तक वापरायच्या.मला ते बघून कायम भिती वाटायची की खिळंखीळी झालेली ती पुस्तकाची पानं इकडची तिकडं का सरकली तर त्या पदार्थांची काय वाट लागेल कोण जाणे. म्हणून मी त्यांच्या वाढदिवसाला मुद्दाम नवीन रुचीराची प्रत भेट म्हणून दिली. तरीही त्या ग्रेट काकू नवीन पुस्तक छान कव्हर घालून शेल्फ मध्ये ठेवायच्या आणि ते जूनंचं पुस्तक बरोबर असल्यासारख्या वापरायच्या.

काहीही असो आज ह्याच रुचिराकार कमलाबाईंच्या पुस्तकातून वाचून, शिकून कित्येक नवीन सुनांच्या घरची मंडळी “अन्नदाता सुखी भव,अन्नदात्याचे कल्याण होवो”हे आपोआप म्हणायला लागले.

ह्या रुचिरावाल्या आजींच दिनांक 20 एप्रिल 1999 साली निधन झालं. पण आजही त्यांच्या रुचीराच्या रुपांत घरोघरी त्यांच अस्तीत्व जाणवतयं हे खरं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्फूर्ती देवता – भाग – 2 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

??

☆ स्फूर्ती देवता – भाग – 2 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त निबंध।

निबंधाचा विषयमाझे प्रेरणास्थान “स्फूर्ती देवता)

(वडिलांनी व्यवहारज्ञान दिले, अभ्यासातली कौशल्य शिकवली. तर आईने संसार सुखाचा होण्याची गुपितं शिकवली.) इथून पुढे —

त्यांनी आम्हा भावंडांना अतिशय डोळसपणे खूप चांगले घडवले. वडील कधी पुण्या मुंबईला गेले की तिथून उपयोगी अशा नव्या वस्तू, पुस्तके, गावात जे  मिळायचे नाही ते आवर्जून आणायचे. आपण खेड्यात राहतो म्हणून मुले नवीन गोष्टींपासून वंचित राहू नयेत हा दृष्टिकोनच खूप मोठा होता.

आईवडील अतिशय धोरणी होते. आम्ही कॉलेजला जायच्या वेळेस त्यांनी पुण्यात घर घेतले होते .आम्ही चार भावंडे तिथेच राहू शिकलो. आम्ही दोघी बहिणी घरी स्वयंपाक करायचो. त्यासाठी आई माळशिरसहून सतत मसाले, चटण्या, पीठे, फराळाचे  पाठवायची. या प्रात्यक्षिकामुळे लग्नापूर्वीच आम्ही बहिणी तयार झालो होतो.

आई-वडिलांचे सहजीवन अतिशय आदर्श होते. दोघांनीही एकमेकांना मान देत कायम योग्य आदर केला. त्यांच्यातही मतभेद असतीलच पण ते कधी उघडपणे सर्वांसमोर आले नाहीत. अगदी आमच्या सुद्धा. कधीच टोकाची भूमिका नसायची. जे करायचं ते एकमेकांच्या साथीनंच. तो काळ एकमेकाबद्दलच्या भावनाज बोलून दाखवण्याचा नव्हताच. पण न बोलताच दोघेही एकमेकांच्या आवडीनिवडी जपत, कौतुक करीत. आईला जेवायला थोडा जास्त वेळ लागायचा तर स्वतःचं जेवण झाल्यावरही वडील तिच्यासोबत गप्पा मारत बसायचे. ती भाजी निवडत असेल तर ते पण निवडू लागत. ह्या गोष्टी जरी लहान असल्या तरी त्यांचं प्रेम यातून दिसून येतं. त्यामुळंच त्यांचं नातं घट्ट होत गेलं. त्या काळात  घरातल्या बायकांना नुसतं गृहित धरलं जायचं. त्यांचं मत कुणी विचारायचं नाही तर निर्णय सांगितले जायचे. पण वडील प्रत्येक गोष्ट आईला सांगत असत आणि ती पण त्यांना योग्य साथ देई. ते कुठे गेले तरी तिला बरोबर नेत आणि ती पण त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी टापटिपीत असायची. दोघेही आनंदाचे, सुखाचे सहजीवन  जगले. सुखी संसारासाठी हा आमच्यासाठी वस्तूपाठच आहे.

जिथे जाऊ तिथे आनंद द्यायचा हे धोरण असल्याने आई कधी कुणाकडे मोकळ्या हाताने गेली नाहीच पण तिथे गेल्यावर कामाला हातभार लावायची. हेही अंगीकारण्या सारखेच आहे. आईवडील दोघेही गावातील सार्वजनिक जीवनात एकत्र हिरीरीने भाग घेत असत. गावातल्या असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले. त्यामुळे दोघेही लोकांमध्ये तितकेच लाडके, हवेहवेसे होते. यानिमित्ताने अनेक नामवंत साहित्यिक, वक्ते, नेते आमच्या घरी आलेले होते.

दुर्दैवाने वडील अचानकपणे ६६ व्या वर्षी गेले त्यांच्या माघारी २३ वर्षे आईने दोघांचीही भूमिका उत्तम निभावली. सगळी कर्तव्यं पार पाडली. आई एवढी कर्तबगार हिंडती फिरती, आनंदी पण शेवटी तिचे हाल झाले. पडल्यामुळे ऑपरेशन झाले. त्यावेळी एक गुडघा आखडल्याने पुढे ती चालू शकली नाही. बरीच वर्षे एका जागेवरच आली. हे परावलंबित्व स्वीकारणे सुरवातीला खूप जड गेले.पण शेवटी या वास्तवाशी तिने जुळवून घेतलं. कोणते भोग वाट्याला यावेत हे आपल्या हातात नसतं हेच खरं.

आपले आईवडील तर प्रत्येकालाच प्रिय असतात. शिवाय त्याकाळी बऱ्याच अशा कर्तबगार बायका होत्या. मग आईत विशेष काय ? तर तिच्यात अनेक चांगले गुण एकवटलेले होते. तिने ते जाणीवपूर्वक जोपासले होते. ती आदर्श गृहिणी, चांगली कलाकार, हाडाची शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती होती. त्यामुळे तिची शिकवणच होती जे काम करायचे ते चांगलंच, सुबक, आखीवरेखीव, परिपूर्ण करायचं. 

आजकाल व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक मार्ग, अनेक साधने उपलब्ध आहेत .पण आई-वडिलांच्या काळाचा विचार करता ही गोष्ट सोपी नव्हती. त्यामुळेच त्यांनी जीवनात अनेक गोष्टींमध्ये एक विशिष्ट आदर्श पातळी गाठली होती  ही कौतुकाची गोष्ट आहे. एकेका क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणारे असंख्य असतात. पण सर्वच क्षेत्रात अशी आदर्श पातळी गाठणारे फार कमी असतात. अशाच लोकांपैकी माझे आई वडील होते हे विशेष आहे.

हिऱ्याला जितके जास्त पैलू तितके त्याचे मोल जास्ती. त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्वाला शक्य तितके विकसित करावे. त्यासाठी अनेक कला आत्मसात करणे, अनेक गोष्टींचे ज्ञान मिळवणे, सतत नवनवीन गोष्टींचा ध्यास घेऊन त्यांचा अभ्यास करणे, जीवनाच्या सर्व अंगांचा आस्वाद घेणे अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी स्वतः ती अंमलात आणलीच पण आम्हालाही ते बाळकडू दिले. आज कोणतीही नवीन गोष्ट करताना त्यांच्या विचारांनी नवीन उभारी मिळते. त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते आणि काही अंशी त्यात यशस्वी झाले आहे ही समाधानाची बाब आहे.       

आईवडीलां पैकी फक्त एकाचेच स्वतंत्र कर्तृत्व सांगता येणार नाही. त्यात दुसरा  सहभागी असायचाच इतके त्यांचे जीवन एकमेकांत मिसळून  गेलेले होते. याचा नुकताच आम्ही अनुभव घेतला. २०२२ साली वडिलांची जन्मशताब्दी होती. त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या स्मृतींचे पुस्तक काढले. तर नातेवाईक, स्नेही यांच्या लेखांचा वर्षाव झाला. वडिलांना जाऊन ३४ वर्षे तर आईला जाऊन ११ वर्षे झालीत. पण अजूनही लोक त्यांना विसरलेले नाहीत. त्यांच्या आठवणींचे, सहवासाचे वर्णन वाचून मन भरून आले. सर्वांनीच दोघांबद्दल अगदी भरभरून लिहिले आहे. संत कबीरजींचा एक दोहा आहे,

           कबीरा जब हम पैदा हुए 

           जग हॅंसे हम रोये 

           ऐसी करनी कर चलो 

           हम हॅंसे जग रोये |

या उक्तीप्रमाणे आईवडील जगले आणि आमच्यासाठी मोठा आदर्श घालून दिला आहे.

आज समाजात कुटुंब व्यवस्थेला हादरे बसत आहेत. अशावेळी आई-वडिलांच्या शिकवणीची गरज अधोरेखित होते. म्हणूनच हे स्मरण.

प्रत्येक व्यक्तीमधे अधिक-उणे असतेच. पण ज्यांच्या व्यक्तिमत्वात अधिकांची बेरीज जास्ती तेच आदर्श होतात. म्हणूनच माझी आई माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी प्रेरणादायी व्यक्ती आहे.

              माहेरच्या पायरीला

                 टेकविला माथा 

              जिने जीवनविद्येची

                 शिकविली गाथा ||

— समाप्त —

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘संगमनेरमध्ये सुरु आहे आगळी वेगळी परंपरा …’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘संगमनेरमध्ये सुरु आहे आगळी वेगळी परंपरा …’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

इंग्रजांना झुकवणारी स्त्रीशक्ती . 

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे साजऱ्या होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळं महत्त्व आहे. 

या दिवशी या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना मिळतो.

महिलांना या ठिकाणी मिळणाऱ्या या मानाला ब्रिटीशकालीन इतिहास आहे. ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. २३ एप्रिल १९२९ रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक २०० ते २५० महिलांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला. ब्रिटीशांनी बंदी घातलेल्या रथाला,  बंदी झुगारून शेकडो महिलांनी रथ यात्रा काढली होती. पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली. सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला.  पण या आदिशक्ती स्वरूप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला.

या गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा रथावर ठेऊन ” बलभीम हनुमान की जय ” चा जयघोष केला, आणि रथयात्रा व्यवस्थितपणे पार पाडली.  तेव्हापासून ही परंपरा आजही सुरु आहे.

आता या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो.

माहिती संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्नी कशी असावी ?… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ पत्नी कशी असावी ?… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

तो म्हणाला – दिसायला देखणी, गोरीपान, मनमिळाऊ , मला व माझ्या घरच्यांना सांभाळून घेणारी, उत्तम स्वयंपाक बनवणारी, घर स्वच्छ ठेवणारी, मुलांचा सर्व अभ्यास घेणारी, कटकट न करणारी किंवा एखाद्या गोष्टीचा तगादा पाठी न लावणारी, ऐकून घेणारी, नेहेमी आनंदी आणि समाधानी असावी एवढंच !

 

त्याला समजावले. . .

पोरा, एकाच झाडाला गुलाब, मोगरा, जाई, जुई, कमळ, रातराणी, निशिगंध, चाफा लागत नसतात रे !

 

संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रॅपीड फायर गेम…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “रॅपीड फायर गेम…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा स्वतःच स्वतःशी रँपीड फायर.गेम खेळत बसले होते. खूप मजा येते ह्या खेळात. स्वतःच्या मनाच्या आतल्या कप्प्यात दडलेल्या गोष्टी अलगद बाहेर येतात, एकदम मोकळं वाटतं आणि मुख्य म्हणजे काही वेळी खूप विचार करुनही न मिळणारी उत्तरं अचानक गवसतात.कधीकधी पटकन उत्तरं बाहेर पडण्याच्या नादात सगळ्यात जास्त महत्वाचं उत्तर राहूनच गेलं ह्याची जाणीव पण अनुभवांतून येते.

ह्या गेम मध्ये मी पहिला प्रश्न केला, सुखं म्हणजे नेमकं काय ? त्यावर चटकन उत्तरं आलं आनंदाची परिसीमा. मग दुसरा प्रश्न, हे नेमके कशामुळे मिळतं ? त्यावर माझं उत्स्फूर्तपणे आलेलं उत्तर आर्थिक स्थैर्य,मनासारख्या घडणाऱ्या घटना.

नंतर लगेच आलेल्या अनुभवाने आपल्या उत्तराचा क्रम चुकलायं हे दाखवून दिलं आणि अनुभवांमुळे लक्षात आलं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले आरोग्य. सगळ्या सुखकारक गोष्टींची उपलब्धी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे त्या गोष्टींचा उपभोग आणि हा उपभोग आपण आरोग्यात स्थैर्य असेल तरच घेऊ शकतो. खरंच सगळ्या म्हणी ह्या कमी शब्दांत संपूर्ण आशय देणा-या असतात हे “सर सलामत तो पगडी पचास ” ह्या म्हणीवरुन लक्षात येतच. सहसा कुठलाही आजार हा अकस्मात येत नाही. आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला तसे संकेत देत असतं ,आपण मात्र त्याकडे विशेष गंभीरपणे न बघता तसंच दामटायला वा रेटायला बघतो. सध्या सगळीकडे व्हायरल इंफेक्शनचा सामना जनताजनार्दनाला करावा लागतोयं. सध्याच्या असमतोल हवामानामुळे हे चढउतार आपल्याला अनुभवावे लागतात. खरतरं एकादिवसाच्या मुलाचं देखील कोणावाचून काहीही अडत नाही. जो जन्माला घालतो तोच सोय करतो ही म्हण खरी असली तरी अशा संकटाच्या काळात मानसिक, शारीरिक भक्कम राहतांना  शेवटी माणसाला माणसाचीच गरज लागते.मग ती कोठल्याही रूपात का असेना,कधी ती गरज आपली जवळची घरची माणसं भागवतात तर कधी आपली जोडून ठेवलेली मित्रमंडळी वा स्नेही भागवतात.आता दोन दिवस सक्तीची विश्रांती घेतल्या शिवाय पर्यायच नाही.

सोमवारी तसं सकाळपासूनच फ्रेश वाटत नव्हतं परंतु कामाला लागलं की आजारपण विसरायला होतं हा नित्य अनुभव त्यामुळे सगळं आवरून बँकेला पळाले मात्र दुपारी सणसणून बँकेतच ताप भरला.तशीच सुट्टी मागून साक्षात आम्हा बडनेरवासियांसाठी व आजुबाजूच्या गावांसाठी धन्वंतरीचे रुप असलेल्या डॉ. राठी ह्यांच्या दवाखान्यात गेले त्यांनी औषधे देऊन कमीतकमी दोन तीन दिवस सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली.न ऐकल्यास अँडमिट करुन घेण्याचा सज्जड दम दिल्यावर  आता दोन दिवस सक्तिची विश्रांती घेणे ओघानेच आले.

औषधांबरोबरच सर्वांगीण आराम,शांत स्वस्थ झोप,डोळ्यांना डोक्याला त्रास होणाऱ्या मोबाईल चा अत्यंत कमी वापर ह्याने लौकर बरं वाटायला लागेलचं. असो शेवटी काय तर “जान है तो जहाँ है”.,”सर सलामत तो पगडी पचास” ही मोलाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवी.

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्फूर्ती देवता – भाग – 1 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

??

☆ स्फूर्ती देवता – भाग – 1 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त निबंध।

निबंधाचा विषयमाझे प्रेरणास्थान “स्फूर्ती देवता)

“माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वा”चा विचार करीत असताना “घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे”  या प्रसिद्ध भावगीताप्रमाणे माझी अवस्था  झाली. माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व घरातच असताना का शोधाशोध करायची ? या व्यक्तिमत्त्वाने माझ्या जन्मापासून माझे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलेले आहे.  “जिच्यामुळे माझे अस्तित्व ते प्रभावी व्यक्तित्व” म्हणजे माझी आई माझी. माझी आई ती. मालतीबाई बाळकृष्ण देव ही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील सुप्रसिद्ध वकील श्री. आप्पासाहेब देव यांची पत्नी. आई म्हणजे एक अतिशय कणखर, प्रभावी, हुशार, आदर्श व्यक्तिमत्व होतं. गोरी, उंचीपूरी, लांबसडक केसांचा अंबाडा, त्यावर गजरा किंवा वेणी, चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि मोजके ठसठशीत दागिने घातलेली आई एकदम भारदस्त, रूबाबदार दिसायची‌.

आईचं माहेर दहिवडी. सातारा जिल्ह्यातील नामवंत वकील श्री. बापूराव कुबेर यांची ती सर्वात धाकटी कन्या मुक्ताबाई. ती खूप लहान असतानाच मातृसुखाला वंचित झाली. पण आजोबांनी अतिशय डोळसपणे तिला वाढवले. ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्थे’त आईचे शिक्षण झाले. गाण्याच्या तीन परिक्षा झाल्या. उत्तम हार्मोनियम वाजवायला शिकली. वस्तीगृहातील कामांमुळे अनेक कौशल्यं शिकत स्वावलंबी बनली.

लग्नानंतर आई  वाईला आली. तिथून दीड-दोन वर्षात १९४८ साली माळशिरसला  बिऱ्हाड केले. आई माहेरी अगदी लाडाकोडात वाढलेली. तिथे खूप सुबत्ता पण होती. तरीही माहेरचं ऐश्वर्य सोडून ती आपल्या संसारात मनापासून रमली. सुरुवातीच्या काळातली दगदग, त्रास, कष्ट तिने आनंदाने सोसले. आनंदी सहजीवनाची ही पायाभरणी होती. हळूहळू संसाराची घडी बसत गेली. गावाजवळच्या  शेतात घरही झाले. पण तिथे लाईट यायला मात्र १९७० साल उजाडावे लागले. तोपर्यंत कंदीलाची सोबत होती. सर्व कामे घरातच करावी लागत. आजच्यासारखे तयार काहीच मिळायचे नाही. जात्यावर दळायचे, चुलीवर स्वयंपाक. दिवसा कामाच्या व्यापातून सवड नाही मिळाली तर रात्री जागून फराळाचे करायचे. आई अतिशय सुगरण. सर्व फराळाचे पदार्थ, रोजचा स्वयंपाक अतिशय उत्तम करायची.

खरंतर आई अतिशय कलासक्त होती. अनेक गोष्टींमध्ये ती पारंगत होती. प्रत्येक गोष्ट  ती अगदी मनापासून करायची. तिला फुलांची खूप आवड होती. गजरा, वेण्या करून सर्वांना देण्याची भारी हौस. स्वतः अंबाड्यावर वेणी घातल्याशिवाय ती कधी बाहेर जायची नाही. आई आणि फुलाचा गजरा हे समीकरण अजूनही सर्वांना आठवते. घरी रवा पिठी काढून  उत्तम शेवया करायची. चिरोटे तर अगदी अलवार व्हायचे. क्रोशाचे विणकाम, मण्याची तोरणं, वायरच्या पिशव्या बनवायची. त्या त्या काळातल्या प्रचलित गोष्टी ती शिकत, करत गेली. पण कोणतीही गोष्ट आखीव रेखीव करण्यात तिचा हातखंडा होता. स्वयंपाक करताना अगदी कोशिंबीर असो, भाजी असो, पोळ्या भाकरी असो नाहीतर पक्वान्न ते अगदी पद्धतशीर निगुतीनेच झाले पाहिजे असा तिचा कटाक्ष असायचा. घाई गडबडीने गोष्टी ‘उरकणे ‘हे तिला मान्यच नव्हते. त्यामुळे स्वयंपाकाची नेहमी पूर्वतयारी सज्ज असायची.  

कोणतीही नवीन गोष्ट  शिकण्याची भारी हौस. वयाच्या ७०व्या वर्षी क्राॅसस्टिचचे विणकाम तर ७५ व्या वर्षी पोतीच्या मण्यांचे दागिने करायला शिकली. अनेक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवली. शेवटपर्यंत तिच्या मनातलं हे उस्फुर्तपण जागं होतं.

शिस्त हा तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. कसलाही कंटाळा न करता वेळच्यावेळी कामे करी. कोणतीही लहान मोठी गोष्ट गरजेला ऐनवेळी हातात हजर असे. आई कधीच दुर्मुखलेली किंवा अव्यवस्थित नसायची. नेहमी नीटनेटके आवरून उत्साही, आनंदी असायची. सर्व कामे चटाचट उरकून पोथी वाचे, आवडीचे काम करत असे. वर्तमान पत्र वाचून राजकीय, सामाजिक गोष्टींबाबत सजग असायची.

आपल्या बोलक्या स्वभावामुळे तिने खूप माणसे जोडली होती. स्मरणशक्ती चांगली त्यामुळे नावे, इतर संदर्भ लक्षात राही. त्यामुळेच ती वैयक्तिक संवाद छान साधू शके. त्यातूनच जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले होते. कुणाच्याही आनंदात ती चटकन सामील व्हायची आणि दुःखात मदतीला जायची. त्यामुळे लोकंही तिला खूप मानत असत. माणसं जोडण्याची आईची ही कला शिकण्यासारखी आहे.

संसारात तिलाही अडचणी, संकटं आली‌.पण ती कधी  खचली नाही. कायम वडिलांच्या साथीला खंबीरपणे उभी राहिली. वडील सोलापूर जिल्ह्यातले निष्णात वकील होते. पण सुरुवातीचे दिवस खूप दगदगीचे होते. वकिली व्यवसाय वाढवण्यासाठी आईने खूप मदत केली. एसटीची सोय नसल्याने खेडेगावातून आलेले पक्षकार रात्री मुक्कामाला रहात. त्यांना स्वतः बनवून जेवण देई. दिवसाही कुणी ना कुणी पंगतीला असेच. यातूनच अनेकांशी कायमचे ऋणानुबंध जुळले. 

आई वडील श्रद्धाळू, भाविक होते. खूप गोष्टींवरची त्यांची श्रद्धा डोळस होती. गावातल्या मारुतीरायाला अनेकदा तिने दिवे लावण्याचा नेम केला होता. याचे नक्की फळ तिला काय मिळाले हे सांगता येणार नाही. पण तिला मानसिक बळ नक्की मिळायचे. त्यासाठी गावात चालत जाणे, वेळ पाळणे आवश्यक होते. चालण्याने व्यायाम व्हायचा. यामागे काहीतरी नेम केला की हातून देवाची सेवा नियमितपणे होते हे विचार सूत्र होते. यातून मन प्रसन्न राहायचे हे मात्र खरे. 

आई वडीलांची पांडुरंगावर खूप श्रद्धा होती. दोघांनाही वारीची आवड होती. आईने ३०-३२ वर्षे तर वडिलांनी १७ – १८ वर्षे वारी केली. वारीला जाऊन आल्यावर आपला दृष्टिकोन बदलतो. गरजा कमी होतात हे आई वडिलांच्या वागण्यातून जाणवायचे. आईने सुरवातीला ओढगस्त सोसली तशीच अगदी भरभराट पण उपभोगली. पण कसला हव्यास नव्हता. आहे त्यात आनंद मानायची समाधानी वृत्ती होती.

मला गाण्याची आवड लागली ती आई वडीलांमुळेच. दोघांचेही आवाज छान होते. आईच्या तर परीक्षा झालेल्या होत्या. घरी पेटी, तबला, मृदुंग होता. दर गुरुवारी भजन होत असे. दारापुढच्या ओट्यावर रात्री जेवणानंतर आमच्या सगळ्यांच्या गाण्यांनी रंगलेल्या खूप चांदरात्री आठवतात.

यातूनच माझी शब्दांशी, सुरांशी मैत्री झाली. वडीलांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत सर्व भाषा उत्तम अवगत होत्या. प्रचंड पाठांतर होते. त्यांचे वक्तृत्व ओघवते आणि लिखाणात शारदेचा वरदहस्त लाभलेला होता. हीच शब्दांची ओढ, लिखाणाचे थोडे कसब मला त्यांच्याकडून लाभले हे माझे मोठे भाग्य आहे. वडिलांनी व्यवहारज्ञान दिले, अभ्यासातली कौशल्य शिकवली. तर आईने संसार सुखाचा होण्याची गुपितं शिकवली. 

क्रमशः भाग पहिला 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

एकदा मारूतीराय आकाशातून जात असता , त्यांचं खाली लक्ष गेलं. त्यांना दिसलं की एका देवळात कीर्तन चालू होतं आणि रामराया मात्र देवळाबाहेर लोकांच्या चपलांचा ढीग होता, त्यावर बसले होते. मारूतीराय लगबगीने खाली उतरले. रामरायांना विचारलं , “असे का चपलांवर बसलात ?”

तेव्हा रामराया म्हणाले, “जाता जाता देवळातून मला ऐकू आलं , ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ,

त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.

सगळ्यांचं मन बाहेर काढलेल्या चपलांवर होतं , म्हणून मी इथे बसलोय !”

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares