मराठी साहित्य – विविधा ☆ ८ मार्च महिलादिन… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

८ मार्च महिलादिन☆ सौ शालिनी जोशी

संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत महदंबा, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत वेणाबाई हे स्त्री संत सप्तक१३ व्या शतकापासून १७ शतकापर्यंतच्या चारशे वर्षाच्या काळात होऊन गेले. सर्वांची लौकिक जीवनातील पार्श्वभूमी खडतर होती. संत वेणाबाई व संत महादंबा या बाल विधवा होत्या. संत मुक्ताबाई व संत जनाबाई अविवाहित होत्या. संत बहिणाबाईंचा विषम विवाह होता. संत सोयराबाई शुद्र, अशिक्षित, तर संत कान्होपात्रा या गणिकेची मुलगी. पण या सर्वांचे नाम स्वातंत्र्य कोणालाही हिरावून घेता आले नाही. सर्वांनी पुरुष गुरु केले व परमार्थाची वाटचाल केली. परमार्थात जात, धर्म, स्त्री, पुरुष भेद नाही म्हणून मुक्ताबाईंना पुरुष शिष्यही करता आले (चांगदेव). संत कान्होपात्रेला कुणी गुरुपदेश केला नाही. असे प्रत्येकीचे जीवन वेगळे वेगळे.

या सर्वांच्या साहित्य निर्मितीला त्या काळातील समाजातील अनिष्ठ चाली कारणीभूत आहेत. संत मुक्ताबाई कुट रचनेकडे, संत जनाबाई विठ्ठलभक्ती कडे, संत महदंबा कृष्णभक्ती कडे, संत सोयराबाई विटाळाकडे, संत बहिणाबाई जीवनातील अनुभवाकडे व कान्होपात्रा तारणहार विठ्ठलाकडे, संत वेणाबाई रामलीलेकडे वळल्या. प्रत्येकीचे आयुष्य वेगळे पण भक्ती व विरक्ती एकच. ईश्वरी सामर्थ्याचा प्रत्यय हाच आधार. संसारिक घटकांना त्यांनी अध्यात्मिक अर्थ दिला. समाजाशी संघर्ष करत उच्च पातळीवरचे पारंपरिक जीवन जगल्या. देवाशी विठ्ठलाशी त्यांचा मनमोकळा संवाद. तोच सखा, सांगाती, माऊली. कुणीही पतीचे नाते विठ्ठलाची जोडले नाही हेच महाराष्ट्रातील या संत स्त्रियांचे वैशिष्ट्य. समाजाला सदाचाराचा सद्वविचाराचा मार्ग दाखवण्याचे त्यांचे कार्य मोलाचे आहे. पतनाकडे वाटचाल होत असलेल्या समाजाला नाम भक्तीचा सोपा मार्ग दाखविला. अभंग व ओव्या रूपाने आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यामुळे स्त्रियांच्या स्वतंत्र विचाराला चालना मिळाली. समाजात स्त्रियांना स्थान मिळाले. धीटपणा मिळाला.

आजच्या सर्व क्षेत्रात उच्च स्थान मिळवणाऱ्या स्त्रियांच्या मागे या सर्वांचे पाठबळ नक्कीच आहे. कोणीतरी बीज पेरावे तेव्हा काही काळाने त्याचा वृक्ष होतो. आणि तो बहरतो. हेच खरे! सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ आणि असेच कार्य करणाऱ्या स्त्रिया या अलीकडच्या काळातील संतच. पूर्वीच्या स्त्रियांची परंपरा त्यानी चालवली आणि पुढेही चालू आहे. फक्त प्रत्येकीचे क्षेत्र वेगळे. महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीला सलाम!

 (काही स्त्री संतांविषयी सविस्तर माहिती देणारे लेख लवकरच प्रकाशित करत आहोत… संपादक)

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कर्तृत्वाचे डोही अभिमान तरंग” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

“कर्तृत्वाचे डोही अभिमान तरंग” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“काका, तुझ्याकडे मदर टेरेसांचं पुस्तक आहे का?” 

“का गं ?”

“मला गोष्ट सांगायची आहे. वुमन्स डे आहे ना. ”

“मदर टेरेसांची गोष्ट ?”

“हो.”

“कुणी सांगितलं हे नाव?”

“मिस् ने सांगितलं.”

“पण त्यांचीच गोष्ट का बरं ? दुसऱ्या कुणाची गोष्ट सांगितली तर चालणार नाही का ?”

“नाही.”

“का पण ?”

“त्यांनी सांगितलं, हीच गोष्ट सांगायची म्हणून.”

“हे बघ. आपण एक काम करू. मी तुला दोन गोष्टी सांगतो. मग त्यातली जी गोष्ट आवडेल ती तू सांग. चालेल का ?”

“चालेल. ”

मग मी तिला मदर टेरेसांविषयी माहिती सांगितली आणि पद्मश्री बछेंद्री पाल यांच्याविषयी माहिती सांगितली.

एव्हरेस्ट चा ट्रेक, बर्फातून चालत जाणं, जगात पाचव्या क्रमांकाची एव्हरेस्ट वीरांगना असणं, त्या ट्रेकिंग शिकवतात, जगभरातले लोक त्यांच्याकडे शिकण्यासाठी येतात, हे सगळं तिला फार आवडलं. थ्रिलिंग वाटलं. महिला दिनाच्या कार्यक्रमाला आणखी पाच दिवस होते. हीनं दुसऱ्या दिवशी तिच्या मिस् ना बछेंद्री पाल यांची गोष्ट सांगितली आणि हीच गोष्ट सांगणार आहे असं लोकमान्यांच्या बाण्यानं सांगितलं.

तिच्या मिस् नं गोष्ट ऐकून घेतली खरी, पण त्यांना त्यातून मोटिव्हेशनल असं काही दिसलं नाही म्हणे. त्यांनी सांगितलं, मदर टेरेसांचीच गोष्ट हवी.

ही पुन्हा माझ्याकडे हजर. काय काय घडलं ते तिनं मला सांगितलं. ‘मदर टेरेसांची गोष्ट सांगणार नसशील तर कुठलीच गोष्ट सांगू नकोस’ असं मिस् म्हणाल्या, हेही सांगितलं.

मी तिला विचारलं, “आईबाबा काय म्हणाले ?” 

ती म्हणाली, “तू मदर टेरेसांची गोष्ट सांग. काकाला यातलं काहीही सांगू नकोस. असं आई म्हणाली. ” 

“आणि बाबा ?”

“ह्या ट्रेकर आहेत ना त्या फक्त पद्मश्री आहेत. मदर टेरेसा तर भारतरत्न आहेत. म्हणजे त्या जास्त मोठ्या आहेत, त्यांचीच गोष्ट सांग. असं बाबा म्हणाले. ”

“बरं. चल. तुला अजून एक गोष्ट सांगतो. ती एकदम मोटिव्हेशनल स्टोरी आहे. ” 

“सांग. ”

मग मी तिला लता मंगेशकरांची गोष्ट सांगितली. त्यांचं लहानपण, त्यांनी केलेले कष्ट, सुरूवातीचे दिवस, अंगात खूप ताप असतानाही गाणं कसं गायलं हे सगळं तिला सांगितलं. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे तीनही पुरस्कार मिळाले आहेत, हेही आवर्जून सांगितलं.

कार्यक्रम तीन दिवसांवर आला होता. हीनं ठरवलं की, मी लता मंगेशकरांचीच गोष्ट सांगणार. दुसऱ्या दिवशी ऑनलाईन शाळेत तिनं तिचा निर्णय मिस् ना सांगितला. पुन्हा तोच प्रकार. मिस् म्हणाल्या, “स्टोरी साधीच तर आहे. यात मोटिव्हेशनल काय आहे?” ही पुन्हा हिरमुसली.

तिच्या मिस् म्हणजे “इतकी चुकीची माहिती इतक्या आत्मविश्वासानं दुसरं कोण देणार ?” या प्रकारच्या शिक्षिका आहेत, हे माझ्या लक्षात यायला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मी तिला सांगितलं, “जाऊ देत. तू उद्या मिस् ना सांग, मी कुठलीच गोष्ट सांगणार नाही. ”

तिनं दुसऱ्या दिवशी जसं च्या तसं मिस् ना सांगितलं. त्यांचं (जेवढं होतं तेवढं) धाबं दणाणलं असणार. त्यांनी दोन मिनिटांत तिला सांगितलं की, “तू लता मंगेशकरांची गोष्ट सांगितलीस तरी चालेल. ”

ठरल्याप्रमाणे ८ मार्च रोजी तिनं लता मंगेशकरांची गोष्ट सांगितली. सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलं. काल ती सगळा वृत्तांत सांगायला घरी आली होती. मग मी तिला विचारलं की, “इंटरनॅशनल वुमन्स डे का सेलिब्रेट करतात, हे तुला माहिती आहे का?” 

ती म्हणाली, “नाही. ”

मग मी तिला १९०८ साली महिलांनी आंदोलन का केलं, १९०९ मध्ये अमेरिकन सोशलिस्ट पार्टीनं आंदोलन कसं केलं, क्लारा जेटकिन यांनी त्याला इंटरनॅशनल कसं केलं, का केलं, १९११ पासून हा दिवस इंटरनॅशन वुमन्स डे म्हणून साजरा कसा होतो, १९७५ पासून युनायटेड नेशन्सने हा दिवस सेलिब्रेट करायला सुरूवात केली, वगैरे सगळा इतिहास सांगितला.

अमेरिका, जर्मनी, रशिया, ब्रिटन, या देशांना महिला दिवस साजरा करण्याची गरज का पडली, हेही सांगितलं. १९१९ साली (म्हणजे महिला दिवस साजरा व्हायला लागून नऊ वर्षं उलटल्यानंतर) आपल्या देशात जालियनवाला बाग हत्याकांडात कितीतरी महिलांना जीव गमवावा लागला, ब्रिटीशांनी कितीतरी महिलांवर अत्याचार केले, हे ही सांगितलं. आपल्या देशात महिलांवर बेछूट अत्याचार करणारे हे लोक त्यांच्या देशात मात्र महिला दिवस साजरा करत होते, हेही सांगितलं.

१९१७ साली रशियामध्ये महिलांनी अन्न आणि शांततेसाठी चार दिवसांचं आंदोलन केलं. त्या चार दिवसांच्या आंदोलनामुळं त्यावेळच्या रशियन झार ला पायउतार व्हावं लागलं आणि रशियन सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकारही दिला, याचीही माहिती सांगितली. तिला ही सगळी माहिती ऐकून आश्चर्य वाटलं.

ज्यांनी झाशीच्या राणीवर तलवार उगारली, तेच देश महिला दिवस साजरा करण्याची सुरूवात करतात आणि त्याला इंटरनॅशनल रूप कसं देतात, हा विरोधाभास तिच्या लक्षात आणून दिला. ज्यांनी आपल्या देशातली आंदोलनं माणसांना गोळ्या घालून, फाशी देऊन चिरडली, त्यांनी त्यांच्या देशातल्या महिलांच्या आंदोलनाचा सन्मान केला आणि वरून त्याला इंटरनॅशनल केलं, ह्या प्रकाराला काय म्हणावं? 

महिलांना जगभर प्रचलित असणारा सोशल मीडीया वापरू न देणारा ‘चीन’ महिला दिवस किती आनंदानं साजरा करतो, हे तिला सांगितल्यानंतरचा तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

देवीनं महिषासुराला मारलं तो महिला दिवस नाही का ? 

श्रीकृष्णानं द्रौपदीचं रक्षण केलं तो दिवस महिला दिवस नाही का?

प्रितीलता वडेद्दार, कल्पना दत्त, लक्ष्मी सहगल, भोगेश्वरी फुकनानी, बेगम हजरत अली, मातंगिनी हाजरा, कनकलता बरूआ यांनी देशासाठी आपले प्राण दिले, तो महिला दिवस नाही का ? 

भिकाजी कामा यांच्या कार्याकरिता आपण महिला दिवस साजरा करू शकत नाही का? 

आपण यांची केवळ आठवण ठेवून उपयोग नाही, यांचे उपकार न फिटण्यासारखे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई, बाबाराव सावरकरांच्या पत्नी यशोदाबाई आणि नारायण सावरकर यांच्या पत्नी शांताबाई यांना किती यातना भोगाव्या लागल्या, महिला दिवस साजरा करण्यात पुढाकार घेणाऱ्या ब्रिटीशांनीच त्यांचा किती छळ केला, त्यांची दयनीय अवस्था कशी झाली, हे सगळं विसरणं म्हणजे कृतघ्नपणाच आहे.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी भारत छोडो आंदोलनात गोळी लागून कनकलता बरूआ यांचा मृत्यू झाला. ब्रिटीशांनी गोळी मारली त्यांना. पण त्यांना आपण सगळेच विसरून गेलो. २१ व्या शतकात वयाच्या १७ व्या वर्षीच अंगावर गोळी झेलणाऱ्या मुलीला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला.. ! आपणच आपल्या देशासाठी लढलेल्या सुकन्येला सन्मान देऊ शकलो नाही. त्यांचा फोटोच काय, पण नावही कुठल्या शाळेतून घेतलं जात नाही, पुरस्कार तर लांबच राहिला.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीला १५ हजार महिलांनी आंदोलन केलं, तर ती एक कृती आज आंतरराष्ट्रीय रूप घेऊन जगभर साजरी केली जाते. पण आपल्या देशातल्या माणसांची, त्यांच्या अशा कर्तृत्वाची देशाच्या संसदेत राष्ट्रीय नेत्यांकडून चेष्टा होते, निंदानालस्ती होते आणि सगळं जग ते पाहतं. आपल्याला आपल्या गौरवगाथेविषयी अभिमान का नाही ? कारण, आपल्याला हे काही माहितीच नाही, कुणी सांगत नाही, कुणी बोलत नाही. ज्यांनी मुलामुलींना या कथा सांगितल्या पाहिजेत, त्यांनाच त्या माहिती नाहीत आणि माहित करून घेण्याची इच्छाही नाही. हेच तर मोठं दुर्दैव आहे.

“जगाला ह्यांचा परिचय करून देण्यात आपण कमी पडलो आहोत, हे नक्की. पण आता सुधारलं पाहिजे. चूक दुरूस्त केली पाहिजे. कर्तृत्वाचा सन्मान करायचा तर प्रत्येकाचाच झाला पाहिजे. कर्तृत्वाची प्रेरणा प्रत्येकातच आहे. तिचं कौतुक करता आलं नाही तरी चालेल, पण त्या कर्तृत्वाविषयी आदर मात्र बाळगलाच पाहिजे. समजलं का ?” मी तिला विचारलं.

“काका, तू मला ह्या सगळ्यांविषयीची आणखी माहिती देशील का? मी पुढच्या वर्षी यावरच प्रोजेक्ट करीन. ” ती.

“नक्की देईन. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत… ! आता पळा.. परीक्षा आहे ना ? ती संपली की करूया प्रोजेक्ट.. !” मी.

ती आनंदानं गेली. अगदी अनाहूतपणे उघडलेला मनाचा कप्पा बंद करून मी पुन्हा माझ्या कामामध्ये गुंतून गेलो….. ! 

 

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तंत्राधिष्ठित शिवनीती” – लेखक – श्री पंकज कणसे ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “तंत्राधिष्ठित शिवनीती” – लेखक – श्री पंकज कणसे ☆ श्री जगदीश काबरे ☆

छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहासात उमटलेला सुवर्णठसा ठरतो. या सोनेरी इतिहासाचे विश्लेषण करताना असे लक्षात येईल की तंत्रज्ञानात्मक दृष्टिकोन हा महाराजांच्या राजकारणाचा कायमच पाया राहिला. भौतिक स्वरूपात प्रकट होणारे किल्ले उभारणी, आरमार निर्मितीसारखे तंत्रज्ञानात्मक आविष्कार हे केवळ हिमनगाच्या दृश्य स्वरूपासारखे आहेत, तर त्यामागील तांत्रिक विचार आणि तात्त्विक चौकट डोळ्याला न दिसणाऱ्या हिमनगासारखी गूढ आणि अदृश्य आहे जिने हा दृश्य डोलारा सांभाळला आहे. अस्तित्वात असणारी धार्मिक-सामाजिक परिस्थिती, भूगोलाचे प्रारूप, प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज आणि उपलब्ध मनुष्यबळाचा कुशलतेने वापर या सगळ्यांचा मेळ घालून उपलब्ध स्राोतांचा कल्पक वापर करण्यासाठी भावनांशी सलगी सोडून तांत्रिक दृष्टिकोनाचा अंगीकार महाराजांनी आपल्या कार्यसिद्धीसाठी केला.

छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या युद्धतंत्र, किल्लेबांधणी आणि राज्यविस्तार या सर्वांचे मूळ आपणास भूगोलाच्या वैज्ञानिक विश्लेषणामध्ये दिसून येईल. जेव्हा समाज धार्मिक अंधश्रद्धांमुळे समुद्रगमन निषिद्ध मानत होता तेव्हा मुघल आणि इतर साम्राज्यांनी समकालीन समुद्रमार्गांना दुय्यम मानले होते. मात्र महाराजांनी बारकाईने विचार करून नाविक ताकदीचे महत्त्व ओळखले. भारतीय सत्ताधारी १०० वर्षांनंतरही आपापसांत भांडत असताना युरोपियन लोकांचे भारतात येण्याचे उद्दिष्ट केवळ व्यापार नाही हे त्यांनी ओळखले. त्यांनी स्वत:चे आरमार केवळ उभेच केले नाही तर समुद्री मार्गांवर वचक बसविला. हे करताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. देशी कारागिरांकडे जहाजबांधणीचे कौशल्य उपलब्ध नव्हते तेव्हा त्यांनी स्वत:च्या कमतरता ओळखून युरोपिअन लोकांना चाकरीस ठेवले. पोर्तुगीज आणि ब्रिटिश एक होऊन आव्हान देऊ लागले तेव्हा महाराजांनी फ्रेंचांकडून जहाजावरील प्रगत उपकरणे आणि शस्त्रास्त्रे विकत घेऊन आपली तांत्रिक बाजू वरचढ ठेवली.

शिवाजी महाराजांची तांत्रिक दूरदृष्टी त्यांच्या काळातील भू-राजनीतिक परिस्थितीवर मोठा प्रभाव टाकणारी होती, ज्यात तंत्रज्ञानाचा धोरणात्मक उपयोग दिसून येतो. दुर्गांची उभारणी करताना त्यांनी प्रत्येक किल्ल्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण केली. त्यामध्ये सिंधुदुर्गचा अनियमित आकार, रायगडाची भव्यता, राजगडाची अभेद्याता, प्रतापगडाची दुर्गमता या सर्वांचा समावेश होईल. प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची मुबलक सोय करून कमी स्राोतांमध्ये किल्ल्यांची संघर्षशक्ती वाढवली. आलिशान सजावट, कलादालने वगैरे टाळून प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत असलेल्या कमतरतेची कायम जाणीव ठेवली. बिनीचे मार्ग, सागरी टापू, टेहळणीच्या जागा या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी किल्ल्यांची उभारणी अथवा डागडुजी केली. सिंधुदुर्गच्या उभारणीमध्ये समुद्रामध्ये पाण्याखाली अंदाजे १२२ मीटर लांब, तीन मीटर उंच आणि सात मीटर रुंद भिंत बांधल्याचे दाखले आहेत. त्यामुळे किल्ल्याकडे येणारी शत्रूची गलबते फुटून निकामी होत असत.

गनिमी कावा ही शिवाजी महाराजांनी विकसित केलेली एक युद्धनीती होती, ज्यात स्थानिक भूभागाचे ज्ञान आणि मोजक्या घोडदळाच्या जलद हालचालींचा वापर यातून शत्रूच्या रसद पुरवठ्याचे मार्ग कापून टाकले जायचे. गरजेनुसार कल्पकता अवलंबणे हेदेखील महाराजांचे एक वैशिष्ट्य! वाघनखांचा वापर ही त्याच कुशाग्र बुद्धिमतेची चुणूक. पुढे जाऊन त्यांनी ठिकठिकाणी दारूगोळ्याचे कारखाने काढण्यासाठी पुढाकार घेऊन तोफशास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न केला.

शिवराय राज्यकर्ते म्हणून एकमेवाद्वितीय असले तरी त्यांचे वारसदार म्हणून आपण कुठे आहोत? भावना आणि अस्मितांच्या कोंडाळ्यात अडकून महाराजांचे दैवीकरण करून आपण चिकित्सेची दारे बंद करायला सुरुवात केली. वसंत कानेटकरांच्या शब्दात, महाराजांनी इथल्या सामान्य गवताच्या पात्याचे भाल्यात रूपांतर केले. आपण आपल्याच हातांनी त्या पात्याचे निर्माल्य करून घेण्याचे पातक करीत आहोत. ते भाले होण्याची प्रेरणा महाराजांनी युद्धशास्त्रपारंगता, वैज्ञानिक-तांत्रिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती आणि करारी व्यवहारवाद यांच्या मिलाफातून प्रसवलेली संजीवनी होती. ती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी पुन्हा त्याच विज्ञान-तंत्रज्ञान केंद्रित वाटा धुंडाळण्याची वेळ आलेली आहे.

*

लेखक : श्री पंकज कणसे 

माहिती संग्राहक व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाई म्हणून जगताना… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ बाई म्हणून जगताना… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

मार्च महिना आला की वेध लागतात ते आठ मार्च “जागतिक महिला दिनाचे “. ” पहाटे अंथरुणावरून उठल्यापासून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होतो. जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा….. शुभेच्छा… शुभेच्छा. “

महिलांच्या यशाचा, कर्तृत्वाचा गौरव दिवस. या दिवशी आमच्या बाई म्हणून जगण्याला एक वेगळाच रूबाब येतो. बाई म्हणून जगण्याचा एक अभिमान मनाला स्पर्शून जातो. आणि मनात येते एक विचारधारा ” बाई म्हणून जगताना “

मुलगी लग्न होऊन सासरी येते आणि कु. ची सौ. होते. तिच्या नावातील हा सौ. चा बदल म्हणजे तिच्या आयुष्यातील एक नविन टप्पा असतो. स्वतःवर पडलेल्या अनेक नवीन जबाबदारीतून ती मुलगीची बाई कधी होते ते स्वतःला सुध्दा उमगत नाही. लग्नानंतर जुन्या नात्यांची आठवण आणि नवीन नात्यांचे आगमन याचा मेळ घालत ती आपले बाईपण जपू लागते. परक्या घरून आलेली एक मुलगी बाई म्हणून जगणं स्विकारताना

अंगणातील तुळशीपासून ते स्वयंपाकघरापर्यंत सासरकडील घराला केंव्हाच नव्याच्या नवलाईने आपले मानू लागते. हे बाईपण एकदा स्वीकारले की, सुरू होतो तिचा नवीन जीवनप्रवास. कधी आपल्या कष्टातून, कधी जबाबदारीतून, कधी संघर्षमय वाटचाल करत तर कधी कर्तृत्वातून ती स्वतःला सिद्ध करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटते. घराची, कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता कालांतराने तिच्या जगण्याला अनेक फाटे फुटतात. अनेक नवनवीन नात्यांची भर पडते. म्हणजे बाई म्हणून जगता जगता काळानुसार तिच्या डोक्यावरचा भार वाढतच जातो. संसाररूपी भवसागरात अनेक व्यापांनी बाई वेढली जाते. आर्थिक जबाबदारी पार पाडताना बाईला घरातून बाहेर पडून बाहेरच्या अनेक वाटा गवसतात. खेड्यातील बाई असेल तर घरातून बाहेर पडून तिची पावले शेताकडे वळू लागतात. शहरात राहणारी बाई कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास घरातून बाहेर पडून नोकरी करू लागते. आजच्या धावपळीत घर आणि रान किंवा घर आणि ऑफिस, नोकरी अशी दुय्यम जबाबदारी पार पाडत असताना बाईच्या वाट्याला येणारे कष्ट, यातना, मान-सन्मान, अपमान, अस्मितेचा प्रश्न, तिच्या अस्तित्वाची लढाई या सर्व गोष्टी तिच्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग झाला आहे. इतका सगळा संघर्ष झेलण्यास आज ती स्वतः सज्ज आहे. आपल्या कर्तृत्वाचा ठळक ठसा तिने समाजमनावर उमटला आहेच. तिने गवसलेल्या या नव्या क्षितिजावर ती रममाण होते. संघर्षातून स्वनिर्मित केलेले अस्तित्व हा तिचा अधिकार आहे. आणि बाई म्हणून जगतानाचा स्वाभिमान सुध्दा आहे ” हा स्वाभिमान टिकवून ठेवण्यास ती सदैव तत्पर असते.

पुरुष माणसाचे काम हे एकमार्गी असते. कुटुंबासाठी पैसा निर्माण करणे. त्यासाठीची धडपड अशी एकच मुलभूत जबाबदारी त्यांनी स्विकारलेली असते. आपल्या एकमार्गी नेतृत्वातून पुरुष कुटुंबाप्रती आपली जबाबदारी पार पाडतात. पण बाईचे तसे नसते. तिचे हात अनेक कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांनी बांधलेले असतात. अनेक रूढी परंपरांचे साखळदंड तिच्या पायी जखडलेले असतात. काही तिने स्वतः बांधून घेतलेले तर काही समाजाने अडकवलेले. यात ती कितीही थकलीभागलेली असली तरी कर्तव्य आणि जबाबदारीतून ती मागे हाटत नाही. अगदी अंथरुणावर पडे पर्यंत. रात्री अंथरुणावर पडली तरी पुन्हा ऊठून दरवाजा नीट बंद केला आहे का हे पाहूनच ती पुन्हा निवांत झोपते. आपल्या कुटुंबावर ती नितांत प्रेम करत असते. आपले बाईपण जपताना खऱ्या कसोटीत उतरते तेंव्हा ती स्वतःचे भान हरपून जगते. अगदीच आजारी असताना अंथरुणावर पडून असेल तरी सुध्दा ती आपल्या आजारपणापेक्षा ती कुटुंबाचा जास्त विचार करते. थकल्या-भागल्या, खचल्या मनाला बाई नव्याने उभारी देवून कंबर कसून भक्कम उभी रहाते. आपले घर सावरताना अथवा निटनेटके ठेवताना बाई अंतर्मनातून कितीही विस्कटलेली असेल तरीही ती मोठ्या जुजबी हातोळीने ती आपला घरसंसार सावरते. पुरुष जेंव्हा बाहेरून कामावरून किंवा ऑफिसमधून घरी येतात तेंव्हा ते घरी येऊन आरामशीर बसू शकतात. घरातले बाईमाणूस त्यांची चहापान वगैरे विचारपूस करते. पण बाईच्या बाबतीत असे नसते ती बाहेरून कितीही थकूनभागून आलेली असेल तरीपण ती घरात येताच घरपण जपू लागते. म्हणूनच बाई म्हणून जगणं हे रूढी, परंपरा, कर्तव्य आणि जबाबदारीची जणू पेटती मशालच आहे. “आतून विस्कटलेल्या मनाला सावरणं आणि कुटुंबासाठी प्रसन्नतेचा मुखवटा चढवून चेहरा फुलवणं हे बाई म्हणून जगतानाचं ब्रीद आहे. “

प्राचीन इतिहासातून स्त्रीविषयक अनेक दंतकथा, कल्पक कथा चालत आल्या आहेत. आजही त्यांचा प्रभाव समाजमनावर आहेच. त्यामुळे आजही स्त्री ही पुरूषामागे दुय्यम स्थानी उभी असताना दिसते. पण कालानुरूप स्त्री ही या नवयुगाची रागिणी आहेती वीरांगना आहे. आकाशाला गवसणी घालणारी ती प्रगतीची उडान आहे. आजच्या स्त्रीस्वातंत्र्याला विस्तृत स्वरूप आले आहे. प्रत्येक बाई आपली व्यक्तिगत अस्मिता जपू लागली आहे. त्यासाठी तिची सदैव धडपड सुरू असते. आजची स्त्री आपल्यातील लुप्त शक्तीचा उद्रेक करून अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवताना दिसत आहे. आपल्या संकुचित स्वातंत्राचे एक विस्तृत अवकाश बाईने स्वतःच निर्माण केले आहे. बोचट रूढी परंपरा, दुःखाची शृंखला ढासळून ती आधुनिकतेची स्वीकृती झाली आहे. पण बाईचे असे पलटते रूप काही ठिकाणी पुरुषी अहंकाराला ठेच लागणारे ठरत आहे. म्हणूनच आज काळाची गरज म्हणून आदिमतेतून चालत आलेल्या या दंतकथा, कल्पक कथांना वेगळे वळण, वेगळे स्वरूप देणे. जरूरी आहे. स्त्री-पुरुष समानतेचा वारसा हक्क सांगणारे साहित्य निर्माण होऊन समाजात आणने गरजेचे आहे.

शेवटी बाई म्हणून तुम्ही काय आणि मी काय आपण सगळ्याचजणी या समाजव्यवस्थेच्या ढाच्यात चेपून, स्वतःला वरवरचे पाॅलिश चढवून, रूढी आणि परंपरेच्या धाग्यात विणून घेतलेले एकाच माळेचे मणी आहोत. प्रत्येकीच्या वाटा जीवनशैली, गाव-शहरीवस्ती हे काहीही वेगळेपण असो पण बाई म्हणून जगतानाचा एकंदरीत संघर्ष आहे तो प्रत्येकीच्या वाट्याला थोडाफार सारखाच आहेच हे सत्य नाकारता येणारे नाही. असो.

जीवन तिथे संघर्ष हा आलाच. पण पुरुषांच्या तुलनेत बाईच्या वाट्याला थोडाफार जास्तीचा भोग असतो. पहाटे उठल्यापासून ते रात्री अंथरुणावर पडेपर्यंत आपल्या कुटुंबाप्रती निगडीत दैनंदिनीत बाई व्यस्त असते. यामधून अधिक विचार केला तर शहरातील बाई पेक्षा खेड्यातील बाईची, बाई म्हणून जगण्याची धडपड आणि संघर्ष जास्त असतो. कारण खेड्यातील बाईवर फक्त कुटुंबाची जबाबदारी नसते तर तिची नाळ शेतबांधाशी सुध्दा जोडलेली असते. त्यामुळे गाववाड्यांवर रहाणार्‍या बाईवर जास्त कष्टाचा भार पडतो. पण आपली हुशारी आणि कौशल्यातून आपली जबाबदारी ती उत्तम पार पाडते. मोठ्या चातुर्याने ती पैला-पै जोडून ठेवते. कुटुंबाची आर्थिक घडी सुरळीत बसविण्यात यशस्वी होते. कष्ट, जबाबदारी, आर्थिक नियोजन यात खेड्यातील बाई सदैव सक्षम आहे. त्यामुळे कुटुंब ढासळण्याचे, विस्कळीत होण्याचे अथवा आर्थिक घडी विस्कटण्याचे शहराच्या तुलनेत खेड्यातून प्रमाण कमी आहे.

बाई म्हणून जगणे म्हणजे ना कुणी ज्योतिषाला अथवा ना कुणी शास्त्रज्ञाला थांग न लागणारे ‘जणू एक विराट भावविश्व आहे.’ मी स्वतः बाई असले तरी बाई मनाचे गुढ उकलण्यास मी असमर्थ आहे. त्यामुळे हा लेख म्हणजे बाई म्हणून जगतानाचा …… एक अनुभव समजावा.

एकंदरीत विचार केला तर बाईचे जगणं म्हणजे सुख-दुख, आनंद, समाधान, कष्ट, यातना, संघर्ष, त्रागा, ओढ, जिव्हाळा……. इत्यादी अनेक छोटे मोठे प्रवाह एकत्रीत येऊन संपुर्ण मानवजातीमधील विशिष्ट आणि महत्वपूर्ण धारा आहे. या धारेच्या किनाऱ्यावर ती थोडी का होईना विसावत असतेच ….

© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक- 9327282419

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मोलाचा संदेश देणारी छोटी घटना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मोलाचा संदेश देणारी छोटी घटना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

माझी मलाच लाज वाटली. खजिल झालो.

आजूबाजूच्या छोट्या छोट्या घटना आपल्याला काही सुचवत असतात.

आज दक्षिण मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या जेवणासाठी गेलो असताना व सोबत कोणी नसल्यामुळे एक भाजी आणि दोन तंदूर रोटी ऑर्डर केल्या. मला पहिलेच कल्पना होती की भाजी खूप जास्त देण्यात येणार आहे त्यामुळे मी पहिलेच मन बनवलं होतं की आपण भाजी आणि एक जास्तीची तंदूर रोटी पार्सल म्हणून बांधून सोबत घेऊन गरजूला द्यायची.

माझं जेवण अर्ध्यात असतानाच एक उद्योजक अथवा व्यावसायिक असलेला तरुण माझ्या टेबलवर येऊन बसला. त्याने पण काही ऑर्डर केले. माझं जेवण संपण्याच्या आधी त्याची ऑर्डर आली त्यांनी आधी वेटरला बोलावून जेवण सुरू करण्याआधी त्यानी मागितलेल्या भाजीचा अर्धा भाग आधीच सोबत नेण्यासाठी पार्सल करण्यास सांगितले. सोबत माझ्यासारखेच त्यानी काही तंदुरी रोटी ऑर्डर करून त्यात भाजी सोबत द्यायला सांगितले. त्याने ऑर्डर केलेल्या भाजीचा अर्धा भाग पार्सल म्हणून पॅक झाल्यानंतरच त्याने जेवायला सुरुवात केली.

त्याच्या या कृतीमुळे व त्यामागच्या भावपूर्ण व्यवहारामुळे मला माझीच लाज वाटली. मी त्याला विचारले की हे पार्सल घरच्यांसाठी आहे का ? तो म्हणाला नाही कोणीतरी गरजूला मी जेवण झाल्यावर देइन. मी त्याला विचारले की पार्सल जेवण झाल्यानंतरही घेता आली असते. तो तरुण मला म्हणाला जेवण झाल्यानंतर पार्सल करून कुणाला दिल्याने आपण कोणावर तरी उपकार केल्याचा आणि अहंकाराचा भाव येतो आणि जेव्हा आपण जेवण सुरू करण्याआधीच शिल्लक राहणारे अन्न कोणासाठी पॅक करून घेतो त्यात मदत, समाधान, स्वाभिमानाचा भाव येतो. समोरचा माणूस पण स्वाभिमानी आहेच हा विचार करून आपण त्यालाही मदत केली पाहिजे आणि मी कुणालाही देताना हे आवर्जून सांगतो की हे मी जेवणापूर्वीच पॅक करून घेतले आहे असं जर मी सांगितलं नाही समोरच्यालाही संकोचल्यासारखे अपराध्यासारखे वाटते.

घटना छोटी आहे पण संदेश खूप मोलाचा आणि जीवनाकडे आपली पाहण्याची दृष्टी अधिक विकसित व संवेदनशील करण्याचा होता.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भूतां परस्परे जडो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ भूतां परस्परे जडो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

माझ्या घरी काम करणारी प्रीति सांगत आली, “ काकू, आपल्या बागेत ते छोटे झाड आहे ना, त्यावर एक कबूतर मरून पडलंय आणि दुसरं अर्धवट जिवंत आहे. मला हात बी लावायची भीति वाटतीय.”

मी काहीतरी वाचत होते. म्हटलं “ थांब. बघून येते काय झालंय ते.”

घाई घाईने बागेत गेले. खरंच की. एक कबुतर मरून लोंबकळत होतं आणि बिचारं दुसरं फडफड करत पंख उडवून उडायचा प्रयत्न करत होतं. जवळ जाऊन बघितलं तर त्या दोघांचे पाय एका प्लास्टिकच्या पातळ दोरीत गुंतले होते आणि त्या दोरीचा गळ्याला फास लागून बिचारं एक गतप्राण झालं होतं. मला इतकं वाईट वाटलं सांगू… दुसरं जिवाच्या आकांताने फडफड करत होतं पण बिचाऱ्याच्या पायात गुंतलेली ती दोरी काही सुटत नव्हती.

मुलीला म्हटलं, ” जरा छोटी कात्री आण ग ”.. तिने कात्री आणून दिली. बिचाऱ्याच्या त्या नाजूक काडीसारख्या पायातून रक्त आलं होतं. मी हळूच कात्रीने ती निळी वायर अगदी अलगद हाताने थोडी कापली. इतक्या करकचून गाठीवर गाठी बसल्या होत्या की समजेचना नक्की कुठे कापावे. आपले पाय सोडवण्याच्या प्रयत्नात आणखी आणखीच निरगाठी बसल्या होत्या. करुण डोळ्यांनी ते माझ्याकडे बघत होतं.

माझ्याही नकळत मी त्याच्याशी बोलत होते, “ कसा रे बाळा अडकलास ?अशी कशी दोघांना एकदमच गाठ बसली रे? थांब हं. आपण मोकळं करू तुला हं.”

आमच्या झाडाला आधारासाठी दिलेली काठी मी हळूच बाजूला केली. ती फांदी वाकवली. जिथे ती निळी वायर दिसली तिथे अगदी नाजूक हातानी अगदी छोट्या कात्रीने कापत गेले. मला भीति वाटत होती, याच्या नाजूक पायाला कापताना दुखापत होणार नाही ना? शिवाय ते मेलेले कबूतर आणि हे, दोन्ही विचित्र तऱ्हेने असे गुंतले होते की मला दिसतच नव्हते नक्की कसे ते अडकले. मी हळूच निळी वायर कापत होते.

माझी मुलगी हळहळ करत मागे उभी होती. “आई, किती ग दुखत असेल त्याला. कोणी मुद्दाम बांधलंय का ग असं?खेळ म्हणून?” तिच्या डोळ्यात पाणी होतं.

मी अलगद हातांनी दिसेल तिथली गाठ मोकळी करत होते. आता त्याचा एक पाय मोकळा झाला. त्याची फडफड वाढली. मला दिसत होतं, याचा पाय चांगलाच दुखावलाय.

शेवटची गाठ सोडवली आणि त्या मृत कबुतरासकट हे जिवंत कबूतर धपदिशी फरशीवर पडलं. पटकन मी ते मेलेलं कबूतर हातात धरून त्याच्यात अडकलेले जिवंत कबूतर मोकळं केलं. त्याने पंखांची फडफड केली आणि पटकन खुरडत का होईना, बागेच्या वाफ्यात जाऊन बसलं… घाबरून त्याची छाती धपापत होती. पण जिवंत राहिलं ते.

लेकीने छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. आम्हाला ते जगल्याचा अतिशय आनंद झाला. पण भिऊन ते आपल्या मेलेल्या जोडीदाराकडे बघत होतं. त्याला वाटत होतं का की आता हा आपला जोडीदार पण उठेल आणि आपण उडून जाऊ असं….

मग आला आमच्या बागेत काम करणारा मुलगा. चंदन. त्याला लेकीने सगळी हकीकत सांगितली.

तो म्हणाला, ” ताई, हे इथेच रात्रभर राहिलं तर मांजर खाऊन टाकील हो त्याला. ” 

ते बिचारं खुरडत बसलं होतं वाफ्यात. चंदनने थोडा विचार केला आणि म्हणाला, “ मी याला उचलतो आणि सुरक्षित जागी ठेवतो. ” 

दरम्यान मी कबुतराला थोडे शेंगदाणे जवळ टाकले. इकडेतिकडे बघत ते हळूच खाऊ लागलं. पुन्हा आम्हाला आनंद झाला.

मग चंदन म्हणाला, “ ताई, थांबा हं. मी हातावर घेतो त्याला. ”.. त्याने जवळ जाऊन त्याला उचलण्यासाठी हात लावताच कबूतर पंख फडफडवत शेजारच्या टाकीजवळ उडून बसलं. इतका आनंद झाला आम्हा सगळ्याना. मी कामासाठी बाहेर जाऊन आले तरी ते तिथेच बसून होतं.

चंदन म्हणाला, ” अहो, त्याला उडता येत असेल पण आपल्या जोडीदाराच्या उठण्याची वाट बघत ते बसलं होतं बिचारं. ”…. फार वाईट वाटलं आम्हाला.

पण हे प्रीतीने सांगितलं नसतं तर आमच्या लक्षात आलं नसतं आणि याचाही जीव नक्की गेला असता. आम्हाला फार आनंद झाला जेव्हा ते उडून गेलं आणि समोर जाऊन बसलं. , आता त्याचा दुखवलेला पाय हळूहळू बरा होईल. बिचारं खूप वेळ एकटं बसलं होतं टाकीवर. असंही मनात आलं की..

‘समजलं असेल का त्या मुक्या जिवाला, आपला जोडीदार आता आपल्याबरोबर कधीच उडणार नाही ते?’ 

असो. एक तरी मुका जीव वाचवल्याचा आम्हाला मनापासून आनंद झाला…

…. आणि अचानक आठवले वंदनीय ज्ञानेश्वर महाराज – – “ भूतां परस्परे जडो.. मैत्र जीवाचे “ – अगदी आत्मीयतेने सगळ्यांसाठी ही प्रार्थना करणारे….

…. आणि “ मैत्र “ शब्दातली भावना नेमकी उमगली.

©  डॉ. ज्योती गोडबोले 

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्टोईसीजम —प्रतिक्रिया नाही प्रतिसाद ! ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्टोईसीजम — प्रतिक्रिया नाही प्रतिसाद ! ☆ प्रा. भरत खैरकर 

जरा विचार करा की आधी किती वेळा आणि कधीकधी तुम्ही तुमचा आत्मविश्वास हरवला होता. आणि तुम्ही त्याला कसे सामोरे गेले होते. आपण स्वतःच आपल्या कृतीचे कारण असतो. जी काही आपली प्रतिक्रिया वा प्रतिसाद असतो. तो आपल्यातील मूल्य आणि आपली जडणघडण, विचारसरणी यावर अवलंबून असतो. ह्यातूनच ग्रीक तत्वज्ञान ‘स्टोईसीजम’ आले आहे जे आपल्याला जीवनामध्ये येणाऱ्या विविध समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याची शिकवण देते.

आपल्या मेंदूला, मनाला प्रशिक्षित करण्याची एक कला आहे. यामध्ये फक्त आपण स्वतःला नियंत्रित ठेवणे, रिऍक्ट न होणे, स्वतःला रागात झोकून न देणे, शांत ठेवणे. स्वतःला सतत वर्तमानात ठेवणे.. जमिनीवर ठेवणे. आजूबाजूच्या गोष्टीचा परिणाम न होऊ देणे. जीवनाकडे प्रायोगिक पद्धतीने बघणे हे तत्वज्ञान सांगतं. आपणाशी घडणाऱ्या निगडित असणाऱ्या कितीतरी घटनांबाबत आपलं नियंत्रण नसतं. त्या घटनेला.. प्रसंगाला आपण कसे सामोरे जातो? हे मात्र आपल्या हातात असतं. हा मूळ गाभा ह्या तत्त्वज्ञानाचा आहे.

आपल्या आवाक्यात आणि नियंत्रणात नसलेल्या गोष्टींवर.. परिस्थितीवर प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणे ह्या कलेला ग्रीक आणि रोमन लोकांनी एक जीवन प्रणाली म्हणून अंगीकारली स्वीकारली तीच कालांतराने ‘स्टोईसीजम’ नावाने तत्त्वज्ञान रुपात आली. ह्या तत्त्वज्ञानाचा नेल्सन मंडेला, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस 

जेफरसन, इत्यादींनी आपल्या आयुष्यात वापर केल्याचं आपण बघतो. जीवनामध्ये मूल्याची जपणूक करणे.

ह्याच गोष्टीला महत्त्व आहे. चांगले जीवन जगण्यासाठी भौतिकवस्तूंची गरज.. आवश्यकता नाही. असे म्हणणाऱ्यापैकी हा वर्ग आहे! जोवर आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंपैकी नेमक्या वस्तू स्वीकारत नाही. तोवर बिनकामाच्या बऱ्याचशा वस्तू उपलब्ध आहे म्हणून आपण त्या वापरत असतो. बाळगत असतो‌ हे सत्य आहे.

जन्मापासून सारखं आपण स्वतःला व मुलांना एका ‘शर्यती’त उतरवले आहे. आपला समाजही ह्याच गोष्टीला म्हणजे जगण्याला शर्यत म्हणूनच खतपाणी घालत आहे. त्यामुळे आपण आनंदी असे कधीच नसतो सतत

‘स्पर्धामोड’मध्ये असतो. पैसा, प्रसिद्धी, फीडबॅक, लाईक्स, आदींच्या मागे लागून न संपणारी भूक आपण जागृत केली आहे आणि असमाधानी बनलो आहे. आपण मेंढरं बनलो आहे कळपात चालणारे! कोणीतरी आपल्याला लीड करतो आहे आणि आपण त्याला फॉलो करतोय.. शर्यतीत कितीतरी अंतर कापल्यानंतर मागे वळून बघितल्यावर जाणवतं की, ‘धावलं नसतं तरी चाललं असतं!’ म्हणून आपण जीवनाकडे कसे पाहतो. त्यावरच आनंद अवलंबून आहे.

आपण कुठले मूल्य, भावभावना जपतो हे अधिक महत्त्वाचा आहे. आजूबाजूच सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवल्यावर समस्या राहत नाही. मूल्य जपणे हाच आनंदाचा ठेवा आहे. असं म्हणणारी स्टोईसीजम ही जीवन पद्धती आहे. चांगलं जीवन जगण्यासाठी मनुष्याने नैसर्गिक नियमाचे पालन केले पाहिजे. प्रत्येक गोष्टी मागे मुळात निसर्गच आहे. असे ही विचारप्रणाली सांगते.

जगाला आहे तसेच स्विकारा. त्यासाठी कठीणात कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला टिकून ठेवण्यासाठी क्षमता वाढवा. स्वतःमध्ये तार्कीक, माहितीपूर्ण आणि शांतीयुक्त अशा स्वभाव गुणांची वाढ करा, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही.. स्वतःची मजबुती वाढवीत राहणे. जरी एखाद्याने चुकीचे केले, तरीही निर्णय घेताना न्याय बुद्धीने समसमान निर्णय घेणे. स्वतःमधील धैर्य वाढविणे. ते केवळ विपरीत परिस्थितीतच न दाखवता जीवनामध्ये रोजच्या रोज बाहेर वाढून ठेवलेल्या.. आलेल्या समस्यांना खुल्या आणि स्वतंत्र विचाराने सामोरे जाणे. स्टोईसीजमचा सेनेका नावाचा तत्वज्ञ सांगतो की, कधी कधी केवळ जिवंत राहणे.. टिकून राहणे सुद्धा धैर्यच असते!

स्टोईसीजम हे स्वतःभोवती किंवा स्वतःलाच महत्त्व देणारे तत्वज्ञान नसून इतरांचाही मानवतेने स्वीकार करायला सांगते. जो व्यक्ती स्वतःमध्ये नियंत्रण आणि मूल्याची जपणूक करणारा असतो तोच इतरांमध्ये पॉझिटिव्ह बद्दल आणू शकतो. मार्कोस इलेरिअस ह्या राजाने १९ वर्षे राज्य केले. खूप लढाया केल्या. त्यामध्ये त्याची मुले मारल्या गेली. सर्वच्या सर्व नाहीसं झालं.. त्यानंतर त्याने लिहिलेलं तत्वज्ञान म्हणजे स्टोईसीजम होय.

हेच तत्त्वज्ञान वापरून नेल्सन मंडेलांनी २७ वर्षे जेलमध्ये आपण कसे टिकून राहिलो आणि वर्णभेदाचा लढा कसा दिला हे सांगितले आहे.. भूतकाळात आपण बदल करू शकत नाही पण भविष्याकडे आपण बघू शकतो. हे सांगून त्यांनी आफ्रिकन जनतेला स्टोईसीजम चा मार्ग अवलंबाचा सल्ला दिला आहे. आपण आपल्या जीवनातील घटनांमधून दुःखी होत नाही तर आपण त्या घटनेला दिलेल्या जजमेंटल प्रतिसादामुळे दुःखी होतो.

कुठलीही परिस्थिती उद्भवल्या नंतर थांबा, पहा, आणि काय करायचं ते निवडा! ती निवड प्रतिक्रियात्मक नसावी ती प्रतिसादात्मक असावी. हे स्टोईसीजम शिकवते. त्यासाठी आपलं अंतर्मन, आत्मशांती ढळू देऊ नका. आतून तुम्ही शांत रहा. आपली विचारसरणी, मूल्य, आत्मसन्मान, कशात आहे? याचा विचार करून प्रतिसाद द्या. त्यासाठी कुठलीही परिस्थिती उद्भवल्या नंतर लगेच प्रतिक्रिया न देता थोडा पॉज घ्या म्हणजे विचार करा.. क्षणभर खोल श्वास घ्या, क्षणिक मेडिटेशन करा आणि त्यानंतरच रिस्पॉन्स द्या प्रतिसाद द्या.. हे करताना स्वतःला तुमच्यासाठी कुठले मूल्य महत्त्वाचे आहेत. हे विचारा म्हणजे म्हणजे तुमचा प्रतिसाद सकारात्मक असेल. कधी कधी दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही समस्याकडे बघायला लागा म्हणजे त्या समस्येला संकटाला समस्या न समजता संधी समजायला लागा. त्यामुळे आपण आपली ऊर्जा व्यवस्थित वापरू शकतो.. स्टोईसीजम त्यासाठी स्वतःचे परीक्षण, रोजचा अभ्यास, मूल्यजपणूक, स्वयंसुधारणा, इत्यादी गोष्टींना महत्त्व देते. चला तर मग आपणही कुठल्याही समस्येला सरळ सरळ प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देऊया.. आणि आयुष्यात मूल्यांची जपणूक करून सुखी, समृद्ध नि शांत जीवन जगूया !

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “८ मार्च : स्त्री संघर्षाचा इतिहास !” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “८ मार्च : स्त्री संघर्षाचा इतिहास !☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतात शेतीप्रधान व्यवस्थेमुळे शेकडो वर्षे स्त्रिया शेतात काम करत होत्या. पण ते काम घरचेच काम असल्यामुळे वेठबिगारीसारखे २४ तास चालणारे होते. तसेच अजूनही घरकाम करणाऱ्या गृहिणी असोत की कामकरी स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण होतेच आहे. त्यातही एक सूक्ष्म फरक आहेच. गृहिणीला धर्म आणि सामाजिक व्यवस्थेतून हे काम म्हणजे तिच्यावरती असलेली सांस्कृतिक जबाबदारी आहे, असे तिच्या मनात ठसवण्यात आले आहे आणि कष्टकरी स्त्रियांच्या बाबतीत धार्मिक आणि जातीय उतरंड त्यांचे शोषण करण्यास कारणीभूत ठरत आहे. आणखी एक व्यवहारिक फरक आहे… तो म्हणजे, गृहिणीला तिच्या कामाचा मोबदला मिळत नाही. पण नवऱ्याच्या पंखाखाली २४ तास सुरक्षितता मिळते. तर कष्टकरी, कामकरी महिलेला मात्र तिचे शोषण होत असले तरी तिच्या कामाचा कमी-जास्त मोबदला मिळतो. पण दोन्ही प्रकारच्या स्त्रियांवर बऱ्याच ठिकाणी अजूनही काळ बदलला तरी पुरुषांची अरेरावी चाललेली असते.

१९व्या शतकात युरोप आणि अमेरिकेत औद्योगिक क्रांतीमुळे स्त्रिया कामगार म्हणून मोठ्या प्रमाणावर कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी घराच्या बाहेर पडू लागल्या होत्या. पण त्या कामाच्या वेळेला धरबंध नव्हता. काम करण्याच्या ठिकाणी प्रचंड गैरसोयी होत्या. कामाचे तास नक्की नव्हते, वेतन अत्यंत कमी होते. त्या विरोधात त्यांनी हळूहळू आवाज उठवायला सुरुवात केली. कामाच्या ठिकाणी स्त्रिया एकत्र असल्यामुळे त्यांना एकत्रितपणे एकजुटीने संघटित उठाव करणे त्यामुळे शक्य झाले होते.

या उठावाची पहिली ठिणगी पडली ती १८२० मध्ये इंग्लंड-अमेरिकेतील कापड उद्योगात. येथील कामकरी स्त्रियांनी ‘द वुमन्स ट्रेड युनियन’ लीगची स्थापना केली आणि त्या युनियन तर्फे त्यांनी आठ तासाचा कामाचा दिवस, पाळणाघर, कामगारांसाठी घर, प्रजनानावरील स्त्रियांच्या नियंत्रणाचा हक्क, तसेच मतदानाचा हक्क अशा विधायक मागण्या केल्या होत्या. अर्थात सुरुवातीला पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे या सगळ्यांना केराची टोपली दाखवली गेली, हे वेगळे सांगायला नकोच. पण स्त्रियांना आपण एकजुटीने आपल्या मागण्या रेटू शकू याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला.

त्यानंतर ८ मार्च १८५७ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कापड कारखान्यातील स्त्री कामगारांनी कामाच्या तासांमध्ये कपात, वेतनवाढ आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीसाठी आंदोलन केलं. पण पोलिसांनी हे आंदोलन चिरडून टाकलं. तरी स्त्रियांचा संघर्ष सुरूच होता.

त्यामुळे पुढच्या काळात ८ मार्च हा दिवस स्त्रियांच्या एकजुटीमुळे विशेषत्वाने गाजू लागला. कसा ते आपण पाहूया…

१) ८ मार्च १९०८ ला न्यूयॉर्क येथील रुदगर्स चौकात हजारो कामगार स्त्रिया एकत्र जमल्या आणि स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आंदोलन केले.

२) ८ मार्च १९१० मध्ये जर्मनीतील समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन यांनी महिलांच्या हक्कांसाठी जागतिक स्तरावर हा दिवस पाळावा असा प्रस्ताव दिला.

३)८ मार्च १९११ मध्ये ऑस्ट्रिया, डेनमार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिला महिला दिन साजरा झाला.

४) ८ मार्च १९१७ रोजी रशियात स्त्री कामगारांनी “भाकरी आणि शांतता” या साठी संप पुकारला.

५) ८ मार्च १९३६ या दिवशी हजारो स्पॅनिश स्त्रियांनी फ्रॅंकोच्या हुकूमशाही विरोधात निदर्शने केली.

६) ८ मार्च १९४३ रोजी इटालीतील हजारो स्त्रिया मुसोलिनीच्या हुकूमशाही विरोधात रस्त्यावर आल्या. त्याच वेळेस भारतात स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात पहिला महिला दिन साजरा झाला.

७) ८ मार्च १९७२ रोजी मथुरा नावाच्या आदिवासी मुलीवर पोलीस ठाण्यात झालेल्या बलात्काराविरुद्ध देशभर संतप्त मोर्चे निघाले.

८) ८ मार्च १९७४ ला अमेरिकेने व्हिएतनामवर केलेल्या आक्रमणाविरुद्ध व्हिएतनामी स्त्रियांनी बुलंद आवाज उठवला.

९) ८ मार्च १९७५ ला संयुक्त राष्ट्रसंघाने ‘जागतिक महिला दिन’ म्हणून मान्यता दिली.

१०) ८ मार्च १९७७ रोजी स्त्रियांना ‘समानतेचा अधिकार मिळावा’ असा ठराव संयुक्त राष्ट्रसंघाने पारीत केला.

११) ८ मार्च १९८० मध्ये कॅनडा आणि युरोप मधील स्त्रियांनी सुरक्षित गर्भपातासाठी कायदेशीर हक्क मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढला. तर भारतात न्याय यंत्रणेला जाब विचारण्यासाठी देशभर मोर्चाचे आयोजन केले गेले.

१२) ८ मार्च १९८१ ला इराणच्या फॅसिस्ट आणि मुलतत्ववादी राजवटीविरोधात तेहरान शहरात सुमारे पन्नास हजार स्त्रियांनी एकत्र येऊन आवाज उठवला.

१३) ८ मार्च १९८३ पासून ‘स्त्रीमुक्ती आंदोलन समिती’तर्फे दरवर्षी ८ मार्चच्या दिवशी त्या त्या वर्षाच्या मागण्या निश्चित करण्याचा कार्यक्रम ठरवले जावू लागले.

१४) ८ मार्च १९९६ पासून संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी त्या दिवसाची विशिष्ट संकल्पना राबवायला सुरुवात केली.

१५) ८ मार्च २०२५ साठी सर्व स्त्रिया आणि मुलींसाठी ‘हक्क, समानता आणि सक्षमीकरण’ अशी संकल्पना योजली आहे.

थोडक्यात काय तर ८ मार्च दिवस स्त्रियांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक हक्कांसाठी लढा देण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी समान वेतन, कामाचे चांगले वातावरण, मतदानाचा अधिकार, सन्मानाचे आयुष्य यासाठी स्त्रियांचा हा संघर्ष अजूनही सुरूच आहे. म्हणून स्त्रियांसाठी हा दिवस फक्त आनंदाचाच नव्हे, तर अजूनही सुरू असलेल्या लढ्यांची आठवण करून देणारा आहे. कारण अजूनही स्त्रियांना अनेक ठिकाणी पुरुषाच्या तुलनेने कमी वेतन, विषमता, अत्याचार, भेदभाव, शिक्षणाचा अभाव, राजकीय प्रतिनिधित्व कमी असणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अर्थात शिक्षणामुळे काही पुरुषांच्या वागणुकीत हळूहळू बदल होतो आहे. त्यामुळे काही घरांमध्ये ‘ही पुरुषी कामे, ही बायकी कामे’, असा भेदभाव नष्ट होतो आहे. तरीही समाजाला स्त्री-पुरुष समानता गाठणे अजून बराच दूरचा पल्ला आहे. तोपर्यंत ८ मार्च म्हणजे स्त्रियांसाठी “लढा, हक्क आणि समानता” या मागण्यांचा पाठपुरावा करणारा दिवस राहील. म्हणून यावर्षी आपण खालील घोषवाक्यांचा उद्घोष करून जागतिक महिला दिन साजरा करूया…

१) स्त्री शक्ती जागी झाली, बदलाची मशाल पेटली!

२) समान हक्कांची लढाई, स्त्रीमध्ये निर्माण होई धीटाई!

३) जग बदलायचंय? तर आधी स्त्रीचा सन्मान करायला शिका.

४) मुलगी शिकली, प्रगतीची वाट झाली मोकळी!

५) मुलगा-मुलगी भेद नसावा, समानतेने संवाद असावा!

६) स्त्री आत्मविश्वासाने उभी राहिली, समाजात क्रांती घडली!

७) न्याय, स्वातंत्र्य आणि समानता, स्त्री जीवनाची हीच खरी इतीकर्तव्यता!

८) स्त्री अंधश्रद्धेतून मुक्त झाली, समाजाची प्रगती झाली.

९) पुरुषी वृत्तीचा करा लोप, स्त्रियांना येईल शांत झोप! 

१०) स्त्रीविना पुरुष अधुरा, पुरुषाविना स्त्री; दोघांनी मिळून सुजलाम सुफला करा धरित्री!

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिला दिन आत्ताच का? ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ महिला दिन आत्ताच का? ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

अनादी अनंत चार युगे उलटली महिला आहे, म्हणूनच जग आहे. हे खरं आहे, जगाला आजच का सजगता आली, स्त्री केव्हापासून पूजनीय वाटू लागली? पूर्वी ती पूजनीय नव्हती का? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती. विसरलात का! मग आजच नारीचा, नारीशक्तीचा डांगोरा पिटण्यात कुठला पुरुषार्थ (स्रीअर्थ) आला बुवा?

पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण का? पूर्वी इतकी स्त्री पूज्यनीय आता आहे असं वाटत नाही का? बिलकुल नाही. पूर्वी जेवढी स्त्री पुजनीय होती, तेवढी आता नाही! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः—– ह्या विधानात सर्व काही आले व ते खरे केले. पुरुष प्रधान संस्कृतीच आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्षात ठेवा. बस म्हटले की बसणारी, उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे हातातील खेळणं आहे असं वाटत काय?

हल्ली काळानुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्टच, कारण ती गरज आहे. गरज शोधाची जननी! काळ बदलला, नारी घरा बाहेर पडली. कारण परिस्थितीच तशी चालून आली. एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणून, प्रत्येक क्षेत्रात ती उतरली. व ते साध्य साधन करून दाखवत, ती सामोर गेली व उभी राहिली. ती साक्षर झाली, मिळवती झाली, अर्थ कारण हा पुरुषार्थ तिने सहज साध्य केला. अस जरी असलं तरी तिच्या मागचा चुल, मुलं, बाळंतपण, पाळणा ह्या गोष्टी परत आल्याच व त्या पण साध्य केल्या, हे त्रिवार सत्य!

पूर्वीच्या काळातही परिस्थिती ला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला! आठवा त्या गोष्टी गिरणी नव्हती हाताने दळण कांडणच काय? घरातील जनावरांचा पालन पोषण, गाय म्हैस बकरी इत्यादीचे धारा, चारा पाणी, इत्यादी करून दुध दुभते त्या विकून घरार्थ चालवीत. अजूनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच. जोडीला शेती काण्यात पण स्त्रिया मागे नव्हत्याच!

मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होतेच की. नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा, रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते, तिथं अस्तित्वात होतच ना? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या. स्त्रीया पुरुषां बरोबरीने अंग मेहनत करत. त्या अर्थार्जन करत होत्या! ! !

लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन, तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे, जोडीने केलेली पुजा असो वा कुलदैवत दर्शन असो तिचे मंगळागौर असो किंवा डोहाळ जेवण इत्यादि गोष्टी ह्या, स्त्री जन्माला आलेला मान पानच, किंवा गौरव च होतो ना! प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिनच होता ना!

सावित्री, रमा, जिजाऊ, कित्तूर राणी चन्नांमा, झाशीची राणी ह्या सर्व लढाऊ बाण्याची प्रतीकच होती ना?

काळ बदलला, आस्थापना, कार्यशैली बदलली. युग नवं प्रवर्तन घेऊन नवं कार्याचा भाग पण बदलला.

तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे. कामाचा व्याप क्षेत्र बदलले. पूर्वीपेक्षा अत्याचार, बलात्कार, गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे! पूर्वी पेक्षा नारी सुरक्षित नाहीं कारण स्पष्टच. चित्रपट टेलीव्हिजनवर येणाऱ्या मालिका, चंगळवाद यांनी मनोवृत्ती बिघडली आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे. पूर्वीही संघटीत होत्या. नाही असे नाही. तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे!

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्रीची आत्मनिर्भरता जोपासणारे समर्थ रामदास!! ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ स्त्रीची आत्मनिर्भरता जोपासणारे समर्थ रामदास!! ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

स्त्रियांनी शिकावे, स्वत:च्या पायावर उभे रहावे या ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी आयुष्य वेचणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, तसेच विशेषत: निराधार महिलांसाठी याच दृष्टीने सतत प्रयत्नशील असणारे महर्षी कर्वे हे समस्त स्त्री जातीसाठी कायमच अतिशय वंदनीय आहेत यात दुमत असण्याची शक्यताच नाही.

स्त्रीने शिकायला हवे, आत्मनिर्भर व्हायला हवे, या विचाराचे बीज मुळात कुठे रोवले गेले असावे, असा विचार करतांना मात्र मन नकळत १७ व्या शतकात पोहोचले… सज्जनगडावर घिरट्या घालू लागले, शिवथर घळीत रेंगाळले, ते या संदर्भात श्री समर्थ रामदास स्वामींची प्रकर्षाने आठवण झाली म्हणून. याबाबतीत समर्थांनी इतक्या वर्षांपूर्वी उचललेली पावले, आणि एकूणच त्यांच्या प्रागतिक विचारांचा आजच्या महिला दिनाच्या निमित्त जरासा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…..

समाजाला बरोबर घेऊन जाणारा संप्रदाय अशी समर्थ संप्रदायाची सार्थ ओळख सांगता येईल. त्या काळच्या परिस्थितीत अनेक नको त्या अहितकारी आणि अवाजवी विचारांमुळे आणि अस्मानी तसेच सुलतानी संकटांमुळे अती दीन झालेल्या आणि रूढी-परंपरांना अनेक प्रकारे जखडल्या गेलेल्या समाजाचा कायापालट करण्याचा निर्धार समर्थांनी केला होता हे त्यांच्या चरित्रावरून आणि दासबोध, मनाचे श्लोक यासारख्या त्यांच्या ग्रंथनिर्मितीवरून स्पष्टपणे लक्षात येते. संपूर्ण समाज संघटित करायचा, समाजाचा कायापालट करायचा तर स्त्री-पुरुष समानता आवश्यक आहे, या विचाराची ठाम जाणीव समर्थांना होती, असेच खात्रीने म्हणायला हवे. त्यावेळच्या सामाजिक विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात जाऊन, समाजाने स्त्रीच्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवायला हवी हे त्यांनी स्वत:च्या आचरणातून दाखवून दिले होते. ‘परमार्थ’ हा प्रांत फक्त पुरुषांसाठी राखीव नसून, स्त्रियांनाही तो हक्क आहे असे फक्त आवर्जून सांगून ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्त्रियांनाही आपल्या संप्रदायाचे शिक्षण दिले…आपले लोकहिताचे… लोककल्याणाचे विचार त्यांनाही शिकवले. (‘लोकहित’.. ‘लोककल्याण’ म्हणजे काय या विचारात किंवा व्याखेत त्या काळाच्या तुलनेत आता आमूलाग्र बदल झालेला आहे हे तर यासंदर्भात गृहीतच धरायला हवे. ) समाजाला त्यावेळी आवश्यक असणारी योग्य दिशा दाखवण्याच्या आपल्या सततच्या कार्यात स्त्रियांनाही, अगदी अल्प प्रमाणात का होईना, पण सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी अविचल प्रयत्न केले. त्या काळात त्यांनी एकूण ४० स्त्रियांना सती जाण्यापासून रोखले होते हे वास्तव अनेकांना बहुदा ज्ञात नसावे… हे अंधश्रद्धेविरुद्ध उचललेले पाऊल नक्कीच होते.

आपले उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी भ्रमंती करत असतांना मिरज येथे त्यांना वेण्णाबाई भेटली… केवळ लग्न झाले होते म्हणून ती ‘बाई’… प्रत्यक्षात ती जेमतेम ११-१२ वर्षांची बालविधवा होती. आणि त्यावेळी ‘मान्यता प्राप्त’ असलेले विधवेचे जीवन जगत होती… घरकाम, देवाचे नाव घेत रहाणे आणि चुकून अक्षर ओळख झालेली असली तर जमेल तसे धार्मिक ग्रंथ वाचणे… एवढंच काय ते ‘जीवन’.

एकदा समर्थ तिच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेलेले असतांना, वेण्णाबाई एकनाथी भागवत वाचत असल्याचं त्यांनी पाहिलं आणि ‘‘ मुली तुला यातले काही समजते का? ” असं विचारलं. आणखीही काही प्रश्न विचारले… समर्थांना तिचं…तिच्या बुध्दीचं वेगळेपण जाणवलं. आणि वेण्णाबाईलाही ‘हेच आपले गुरू’ असं मनापासून जाणवलं…आणि त्यांनी समर्थांचं शिष्यत्व पत्करलं… त्याही काळात त्यांचं वाचन प्रचंड होतं, नकळत अध्यात्माची आवडही निर्माण झाली होती…पण हे सगळं उंबऱ्याच्या आत… चार भिंतीत. पण त्यांच्या वडलांना त्यांची तगमग समजत होती… ज्ञानाची ओढ समजत होती… त्यांनी तिला समर्थांबरोबर जाण्याची परवानगी दिली. आणि हेही त्या काळानुरुप अपवादात्मक आणि म्हणून कौतुकास्पदच होते.

‘‘उत्कट भव्य तेचि घ्यावे। मळमळीत अवघेंचि टाकावे।

निस्पृहपणे विख्यात व्हावे। भूमंडळी॥”

– – हा समर्थांनी त्यांना शिकवलेला पहिला धडा असावा. यातला ‘मळमळीत’ हा शब्द तेव्हाच्या स्त्री जीवनावर लख्ख प्रकाश टाकणारा आहे.

‘उत्कट निस्पृहता धरिली। त्याची कीर्ती दिगंती फाकली। उत्कट भक्तीने निवाली। जनमंडळी॥’

– या विचाराचे बीजही समर्थांनी त्यांच्या मनात पेरलं. त्यांची तैलबुद्धी आणि गोड गळा लक्षात घेऊन समर्थांनी त्यांना सातत्याने ग्रंथवाचन, पाठांतर तर करायला लावलंच, पण एक गायन गुरू नेमून गायनदेखील शिकवलं.. आणि एक दिवस त्यांना चक्क कीर्तनाला उभं केलं. विधवा स्त्रीने लोकांसमोर उभं राहून कीर्तन करणं ही स्त्रीच्या आत्मनिर्भरतेची अनासायाने सुरुवातच समर्थांनी करून दिली होती असं नक्कीच म्हणायला हवं… पण त्या काळात विधवा स्त्रीने असं जाहीर कीर्तन करणं ही खरोखरच एक ‘क्रांती’ होती. समाजाच्या उध्दारासाठी अशी क्रांतीकारक पावलं उचलणा-या सर्वांनाच आधी जननिंदेला, समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं हे वास्तव आपल्याला ज्ञात आहेच, आणि समर्थ त्याला अपवाद नव्हते.

मानवी जीवनाचा अटळ नियम असा आहे की कालांतराने जीवन मूल्यांमध्ये, जीवनपद्धतीमध्ये परिवर्तन घडावेच लागते… घडवावे लागते. त्यामुळे समाजातील जिवंतपणा टिकून रहातो. त्यासाठी ‘क्षणाक्षणा परीक्षिले पाहिजे लोक’ असं समर्थांना ठामपणे वाटत असे. पण म्हणून त्यांनी स्त्रियांना हे क्षेत्र उपलब्ध करून देतांना उतावळेपणा केला नव्हता.

‘अभ्यासे प्रगट व्हावे। नाहीं तरी झाकोन असावे।’ असाच त्यांचा उपदेश होता. स्त्रीने आत्मनिर्भरता अंगी बाणवावी, पण ते करत असतांना मनातली मातेची ममता त्यागू नये हेही त्यांनी स्त्रियांना बजावल्यासारखे सांगितले होते हे आज आवर्जून लक्षात घ्यायला हवे. … ज्ञान मिळवतांना आणि स्वावलंबी होतांना स्त्रीने हेही लक्षात ठेवले पाहिजे की … वीट नाही कंटाळा नाही। आलस्य नाही त्रास नाही। इतुकी माया कोठेचि नाही। मातेवेगळी॥ असेही त्यांनी आवर्जून बजावले होते. पण आत्ताच्या काळातल्या आत्मनिर्भर होऊ इच्छिणा-या स्त्रिया नेमके हेच विसरतात की काय, अशी शंका येते, कारण अशीच परिस्थिती आता दिसते आहे.

समाज परिवर्तन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सुधारायला हवे यावर समर्थांचा भर होता, आणि हे साध्य करण्यासाठी स्त्री-पुरुष असा भेद अजिबातच असायला नको असंच त्यांचं प्रतिपादन होतं, म्हणून त्यांनी स्वत:ही असा भेद केला नाही. स्त्रियांनीही आत्मोन्नतीची संधी सोडू नये यासाठी ते आग्रही होते. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा हक्क स्त्री-पुरुष सर्वांनाच आहे हा विचार त्यांनी आपल्या वागण्यातून ठळकपणे अधोरेखित केला होता. त्या काळानुसार समर्थांनी यासाठी भक्तिमार्ग सांगितला खरा, पण तो मार्ग विलक्षण बुध्दीप्रधान आणि विवेकाचा पुरस्कार करणाराच होता. परमार्थ हा सगळ्यांसाठी आहे…सगळ्यांना…म्हणजे स्त्रियांनाही तेथे अधिकार आहे हे सांगतांना… ‘‘भवाच्या भये काय भीतोसी लंडी। धरी रे मना धीर, धाकासीं सांडी॥” हा त्यांचा सल्ला स्त्री-पुरुष दोघांनाही दिलेला होता, हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे.

वेण्णाबाईंप्रमाणेच त्यांनी आक्काबाई, अंबिकाबाई या स्त्रियांनाही अभ्यासासाठी प्रवृत्त केले. कीर्तने करण्यास अनुमती दिली. वेण्णाबाईसारखी एक बालविधवा स्त्री धर्मग्रंथांचा अभ्यास करते, कीर्तने करते, जनतेचे प्रबोधन करते, याचा निषेध म्हणून कोल्हापुरात त्यांच्यावर अनेक आरोप होत होते. विषप्रयोगही झाला पण त्यांनी ते विष पचवून दाखवले… निंदकांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी त्यांची व समर्थांची क्षमा मागितली… त्यांनीही मोठ्या मनाने क्षमा केली…मग त्यांचा आणि त्यांच्याबरोबरच्या इतर स्त्रीशिष्यांचा अभ्यास आणि कीर्तन करणे चालूच राहिले. ‘ स्त्री कीर्तनकार इथूनच उदयाला आल्या ‘ असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही.

याखेरीज वेण्णाबाईंमधील व्यवस्थापन-क्षमताही समर्थांनी जाणली होती. आणि अनेकदा रामनवमी उत्सवाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती अर्थात् वेण्णाबाईंनी ती उत्तम प्रकारे पार पाडली होती. त्यांनी त्याकाळात ‘सीता-स्वयंवर’, मंचीकरण (वेदान्तावरील गद्य टिप्पण्ण्या), रामायणाची कांडे, आणि यासारखे ७-८ ग्रंथही लिहिले होते. काही अभंग, पदे असे स्फुट लेखनही केलेले होतं. आणि यासाठीही समर्थांनी त्यांना उत्तेजन दिलेलं होतं.

दुस-या शिष्या संत अक्काबाई यांनी समर्थ हयात असतांना ३५ वर्षे चाफळचा कारभार सांभाळला होता…त्यांच्या पश्चात ३८ वर्षे सज्जनगडाचा कारभार सांभाळला. १२व्या वर्षापासून त्या समर्थांबरोबर होत्या आणि त्यांच्यातले गुण ओळखून समर्थांनी त्यांना त्यानुसार शिक्षण देऊन तयार केले होते. (यासाठी ‘व्यवस्थापन’ हा वेगळा विषय तेव्हा नक्कीच नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. ) विशेष म्हणजे औरंगजेबाने आक्रमण केल्यावर अक्काबाईंनी स्वत: हिम्मत करून गडावरचे पंचायतन वाघापूरला नेऊन रामनवमी साजरी केली होती.. आणि हे नियोजन आणि त्यामागचे त्यांचे धाडस याचे श्रेय समर्थांच्या द्रष्टेपणाला द्यायलाच हवे. आपल्या चाफळच्या मठात अशा अनेक विधवा, परित्यक्ता, अनाथ स्त्रियांना समर्थांनी बापाच्या मायेने आश्रय दिला होता. समर्थ इतक्या पुरोगामी विचारांचे होते की त्यांनी अशा प्रत्येक स्त्रीचे उपजत गुण, आवड, आणि कुवत लक्षात घेऊन प्रत्येकीला वेगवेगळी कामे शिकायला प्रवृत्त केले होते. कुटुंबाला नकोशा झालेल्या कित्येक स्त्रियांना आपल्या विविध मठांमध्ये त्यांनी फक्त मानाने आसराच दिला नाही, तर योग्यतेनुसार प्रत्येकीला आवश्यक तेवढे शिक्षण देऊन वेगवेगळ्या कामांची स्वतंत्र जबाबदारी पेलण्याइतके सक्षमही केले.

आत्ताच्या तुलनेत अशा स्त्रियांची संख्या अतिशय कमी होती हे जरी खरे असले, तरी “ स्त्री आत्मनिर्भर असायलाच हवी “ या समर्थांच्या ठाम विचाराचे इवलेसे बीज नक्कीच त्यामुळे रोवले गेले आणि आता त्या बीजाचा अवाढव्य वृक्ष झाला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. या विचारामागची समर्थांची कळकळ, अतिशय दूरगामी विचाराने त्यादृष्टीने त्यांनी टाकलेली अत्यंत महत्वाची पावले, म्हणजे “ स्त्री शिक्षण.. तिचा आत्मसन्मान.. आणि तिचे आत्मनिर्भर असणे “.. या समाज-सुधारणेसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या एक प्रकारच्या ‘ क्रांती ‘ साठी पायाच्या दगडासारखी होती हे सत्य त्रिवार मान्य करायलाच हवे …. काळ कितीही पुढे गेला तरीही.

श्री समर्थ रामदास हे खऱ्या अर्थाने काळाच्या पुढे असलेले द्रष्टे गुरू होते, स्त्री-उन्नतीचे खंदे समर्थक आणि आद्य पुरस्कर्ते होते, आणि त्यासाठी सर्व काही करण्यास तत्पर असणारे हाडाचे कार्यकर्ते होते … खऱ्या अर्थाने ‘ समाजसेवक ‘ होते, असं नक्कीच म्हणायला हवं … नव्हे मान्य करायला हवं. त्यांना मनःपूर्वक वंदन.

©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares