मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘शास्त्रीजी…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘शास्त्रीजी…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

 … फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी 

…  परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी

… गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी

… वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी

… पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी

… एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे  स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी

… गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी 

… पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी

… पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी 

… पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्त्रीजी.

मृत्यू नंतर त्यांच्या नावावर घर जमीन मालमत्ता काहीच नव्हते, होते फक्त फियाट घेण्यासाठी घेतलेले कर्ज. आणि बँकेने ते कर्ज शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या पत्नीकडून वसूल केले.

साध्या पण निग्रही, मृदु स्वभावाचे पण कर्तव्यकठोर वृत्तीचे, सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे आपले दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीजी, ….  त्यांना अनंत दंडवत….

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मी मज हरवून बसले गं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ मी मज हरवून बसले गं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

कालिंदीची तटी  एकांती असता…

जळी पाहता पाहता मी मजला विसरून गेले गं..

प्रतिबिंबात माझ्या दिसे मज निळा सावळा कान्हा..

जलही झाले निश्चल तन मनात रुतले रूपही सुंदर..

मी तू पणाचे भान हरपले अद्वैताचे निधान गवसले…

कुठली राधा कुठला कृष्ण प्रेमभावनेचे उदीत उष्ण…

धुन मंजुळ बासरीची धुंद झाल्या लहरी लहरी..

श्यामल वर्णाचा शेला नभी पांघरला..

अन आज राधा नाही गेली घराला..

हुंबरती वासरे गोठयाला डोळे लावूनी वाटेला..

सासवेचा राग तो तांबडालाल झाला..

अनयाचे कुंकुमतिलकाचे नाव संसाराला

हद्द झाली  राधेची कान्हाने संसार तो नासला ..

  असे फुकाचे बोल कितीही लाव लाविला… परी

राधेच्या जिवनी तो कृष्ण एकची ठसावला…

राधा दामोदर आले नावरुपाला . .

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक मानसिक आरोग्य दिन (दहा ऑक्टोबर)… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌸 विविधा 🌸

जागतिक मानसिक आरोग्य दिन (दहा ऑक्टोबर)… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

१० ऑक्टोबर १९९२ रोजी प्रथम हा दिवस साजरा करण्यात आला. माणसाला जसे शरीरिक आजार होतात तसे मानसिक व्याधी सुद्धा होत असतात.पण या वैयक्तिक पातळीवर असल्याने लवकर दिसून येत नाहीत.

आपण मुलांच्या विषयी विचार करु. व काही छोट्या छोट्या गोष्टीं मधून मुलांचे आरोग्य लहानपणी पासूनच योग्य राखू या.

मुलांचे मानसिक आरोग्य मुलांना सुद्धा मानसिक ताण असतात.कोणत्या प्रकारचे ताण असतात बघू या.

लहान बाळाला काहीतरी करून दाखवायला लावणे .

बोलायला लावणे.

पाहुण्यांच्या समोर वस्तू दाखवायला लावणे.

वेगवेगळ्या कृती करायला लावणे.

बडबड गीते म्हणायला लावणे.

 लहान वयातच शाळा,पालक,समाज त्यांच्या कडून मोठ्या अपेक्षा ठेवतात.

बरेचदा पालक दुसऱ्या मुलांच्या बरोबर तुलना करतात.

काही पालक सतत मुलांची काळजी करतात.

या मुळे मुलांवर ताण येतो.आपल्या साठी या सगळ्या सोप्या गोष्टी असल्या तरी मुलांच्या साठी मनावर ताण आणणाऱ्या परीक्षा असतात.काही मुले तर आईला काळजी वाटेल हा विचार सतत करतात आणि त्यातून स्वकेंद्री होतात.आपण एखादी गोष्ट केली तर आईला काय वाटेल या मानसिक दबावाखाली असतात.कधी घरात मतभेद असतील आणि मुलांच्या समोर भांडणे होत असतील तर मुले कोमेजून जातात.

मग अशी मुले अबोल होतात.सगळे येत असून व्यक्त होत नाहीत.आणि या गोष्टीची आई वडील जास्त काळजी करतात.असे एक वर्तुळ तयार होते.आपल्याला हेच वर्तुळ मोडायचे आहे.त्या साठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.त्या बघू या.

मुलांना रिलॅक्स व्हायला मदत करायची त्या साठी पुढील गोष्टी करु शकतो

१) चित्रे काढणे

२) चित्रे रंगवणे

३) डान्स करणे

४) व्यायाम करणे

५) मॉर्निग/इव्हिनिंग वॉक

६) त्यांच्याशी गप्पा मारणे

घरातील वातावरण

१) मुलांच्या समोर वाद करु नयेत

२) घरात एकमेकांशी सुसंवाद असावा.

३) सर्वांनी एक वेळेस तरी एकत्र जेवावे

४) जेवताना आनंदी विषय बोलावेत

५) घरात हास्य विनोद असावेत.

६) एकमेकांशी सुसंवाद असावा

मुलांना ताणा मधून बाहेर कसे यायचे ते शिकवणे

१) हे शिकवणे न कळत व्हायला हवे.

२) त्या साठी कोणतीही गोष्ट मुलांनी प्रथम घरात सांगण्यासाठी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा.

३) मुलांशी मोकळे पणाने संवाद साधावा.

४) कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास त्यांना द्यायला हवा.

अभ्यास विषयक मानसिकता बदलणे

१) मोठ्या माणसांनी टीव्ही,मोबाईल किंवा अन्य गोष्टी बघत “तू अभ्यास कर” असे मुलांना सांगणे टाळावे.

२) आपण अभ्यास करु असे म्हणावे.

३) अभ्यासातून मधे ब्रेक द्यावा.थोडा वेळ खेळू द्यावे किंवा आवडीची गोष्ट करु द्यावी.

मुलांना मोकळे पणाने बोलण्याची संधी द्यावी.

म्हणजे ते त्यांच्या भावना विचार व्यक्त करु शकतील.व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.

मुलांप्रती प्रेम व्यक्त करणे

प्रेम तुमच्या मुलांना कधीच बिघडवत नसते तर त्यांना चांगल माणूस होण्यास मदत करते. जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल तर ते मुलाला दाखवा. त्याच्यासमोर ते व्यक्त करा. जेणेकरून तुमच्या मुलांना हे समजेल आणि पुढे जाऊन याची त्याला जाणीव होईल. आपल्या मुलावर प्रेम करणे, त्याला मिठी मारणे, त्याच्यासोबत वेळ घालवणे आणि दररोज त्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकणे इतके सोपे असू शकते. यामुळे मुलांच्या शरीरात ऑक्सिटोसिनसारखे फील-गुड हार्मोन्स वाढतात आणि यामुळे त्यांना आनंदी आणि सकारात्मक माणूस बनण्यास मदत होते.

मुलांना समाजिक राहण्यास मदत करणे

मुलांच्या मानसिक विकासासाठी तुम्ही त्यांना सामाजिक राहण्यास सांगणे आवश्यक आहे. यासाठी त्यांची लोकांशी ओळख करून द्या आणि त्यांच्याशी बोलायला शिकवा. त्यांना त्यांच्या मित्रांसमोर आणि नातेवाईकांसमोर मोकळेपणाने वागायला शिकवा. तसेच त्यांना बाहेरची कामे करू द्या. यामुळे ते बाहेरील लोकांशी मोकळेपणाने वागायला शिकतील आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. अशा प्रकारे ते सामाजिकदृष्ट्या मजबूत बनतील.

त्यांच्या समस्या त्यांना सोडवू द्या

मुलांना त्यांच्या समस्या स्वतः सोडवू द्या.

यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात. मुलांना त्यांना त्यांच्या परिस्थितीला स्वतःहून सामोरे जाण्यास शिकवा. याचा सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळेल.

यानंतर त्यांच्यासमोर कोणतीही समस्या आली तर ते मानसिक आजारी होणार नाहीत, तर समस्या समजून घेऊन त्याशी लढा देतील.

मुलांना शॉपिंगला न्यावे

हे सध्या बऱ्याच घरात होते.पण जे करत नसतील त्यांनी जरुर सुरुवात करावी.मोठ्यांच्या किंवा घरातील वस्तू घेताना सुद्धा त्यांचे मत विचारावे.

अशा काही गोष्टी करुन मुलांमधील आत्मविश्वास वाढवू.व त्यांना मानसिक सशक्त होण्यास मदत करु.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पितृपक्ष… नवा विचार…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “पितृपक्ष… नवा विचार…” ☆ सौ राधिका भांडारकर 

गणपती बाप्पाचे विसर्जन होते आणि त्यानंतरचा पुढचा पंधरवडा पितृपक्ष म्हणून मानला जातो. 

भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातले हे पंधरा दिवस पितरांच्या स्मरणार्थ व्यतीत केले जातात. 

आत्मा अमर आहे हे आपण मानतो.  तसेच मृतात्म्यांचे ऋणानुबंध,  मृत्यूनंतरचे अस्तित्व, या संकल्पनांनाही आपण नाकारत नाही.  आयुष्य जगत असताना कधी कधी असे अनुभव येतात की अशा अतिंद्रिय घटनांचाही विचार करावा लागतो.  कित्येक वेळा, ही सारी पूर्वजांची पुण्याई असे उद्गारही मुखातून निघतात.  याचाच अर्थ कुठल्याशा अदृश्य अस्तित्वाला आपण मनाशी बाळगतो.  त्याच्याशी आपण जोडले जातो. 

आपले पूर्वज  हे आपलं मूळ असतं. (ओरिजिन).  शास्त्रीय दृष्टीने सुद्धा त्यांचे जीन्स,  क्रोमोझोम्स,  पेशी या आपल्या शरीरात जन्मत:च स्थित  असतात.  आणि याच बरोबर आपल्यातले गुण, स्वभाव ,आवडीनिवडी, आपलं कर्तृत्व,  आपल्या जगण्याच्या,  विचार करण्याच्या दिशा या याच धाग्यांची निश्चितपणे निगडित असतात.  ज्याला आपण जन्मजात गुण असेही म्हणतो. 

आपले सण, आपले उत्सव  हे ऋतूचक्र आणि शास्त्रीय विचारांवरच आधारलेले आहेत.  आणि बहुतांशी ते साजरे करत असताना निसर्गाच्या पंचतत्वांशी कृतज्ञता व्यक्त करणे हेच केंद्रस्थानी असते.  पितृपक्ष हा असा पंधरवडा आहे की,तो पाळण्यामागे  आज या जगात आपण ज्यांच्यामुळे जन्म घेतला आहे त्यांचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणे हेच अपेक्षित आहे.  पितृपक्ष मानण्याचा हा एक मुख्य हेतू आहे.

आपण वरचेवर एकमेकांना थँक्यू सॉरी म्हणतच असतो ना?  मग जे आपल्या जीवनात होते आणि आज नाहीत, शिवाय ज्यांना आपण बघितलेही नाही, पण त्यांच्या कथा मौखिक पद्धतीने आपण ऐकत आलो आहोत,  त्या सर्व पितरांसाठीही अंतःकरणापासून आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे.  त्याच वेळी सॉरीही म्हणायचं आहे. कारण अनेक वेळा आपण त्यांना नकळतपणे दुखावलं आहे.  त्यांचा अवमान केलेला आहे.  त्यांची आबाळहीआपल्या हातून झालेली आहे,  म्हणून या अदृश्य आत्म्यांना मनापासून सॉरी म्हणून पुढच्या  पिढीलाही संदेश द्यायचा आहे की, बुजुर्गांचा, वाडवडिलांचा ते असतानाच मान ठेवायला हवा.  त्यांनी जे कष्ट आपल्यासाठी उपसले आहेत त्याची जाणीव ठेवायला हवी.  आमच्या हातून ज्या  चुका झाल्या त्या तुमच्या हातून होऊ नये.. असे रचनात्मक संस्कार पुढच्या पिढीवर या पितृपक्षाच्या निमित्ताने करावेत.

दर्भाहुती,  तर्पण, अग्नि कुंडातला घास, यामागे विकारांचे दहन आणि झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना  हाच उद्देश जाणावा. 

भाद्रपद महिना हा पशु पक्षांचा जनन काळ असतो.  (ब्रीडिंग सीजन ), कावळ्याच्या विष्ठेतून वड, पिंपळ वृक्षांचे पुन्हा पुन्हा नैसर्गिकरित्या बीजारोपण होत असते. म्हणूनच वृक्षासम सावली देणाऱ्या पूर्वजांना कावळ्याच्या मुखातून घास भरवून  निसर्गवर्धनाची  भूमिका जाणून घ्यावी.

ही  अंधश्रद्धा नसून मनातल्या अबोल भावनांना व्यक्त करण्याचं हे एक साधन आहे.  आणि आपलं जीवन सार्थ, सुखी आणि सुरक्षित करणारे एक माध्यम आहे असा सकारात्मक विचार करून पितृपक्षाची ही परंपरा यथाशक्ती राखावी असे मला वाटते. 

या काळात शुभकार्य करू नयेत, वाहन खरेदी, वस्त्र खरेदी, गृह खरेदी करू नये, प्रवास करू नयेत या संकल्पनांचा मात्र नक्की पुनर्विचार व्हायला हवा. पितृपक्ष या काळाला अशुभ  कशासाठी मानायचे यावर चर्चा व्हावी. या संकेतांना कितपत महत्व द्यावं हे व्यक्तीगत असावं.

आणखी एक विचार मांडावासा वाटतो की, ग्लोबलायझेशन झाले आणि जीवनपद्धतींची देवाणघेवाण झाली. त्यात मदर्स डे, फादर्स डे साजरे होऊ लागले.  मग आपली ही पितृपक्ष परंपरा,  मातृ-पितृ दिन, फादर्स डे, फोर फादर्स डे म्हणून मानायला काय हरकत आहे? घरातल्या वृद्ध बुजुर्ग मंडळींचा सन्मान त्यांच्या हयातीतच या दिवसात का करू नये? स्वर्गस्थांचे स्मरण आणि हयातांचा सन्मान पितृपक्षात जाणीवपूर्वक व्हावा  यात न पटण्यासारखे काय आहे?

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘भाषांतर दिन’… लेखक – अज्ञात ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘भाषांतरदिन…’ – अज्ञात ☆ सौ. गौरी गाडेकर

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून भारतातून फारसी भाषेचं महत्त्व कमी होत गेलं. पण त्यापूर्वीच भारतातील असंख्य ग्रंथांची भाषांतरं फारसीत झालेली होती. हीच भाषा होती जिच्यामुळे भारतीय भाषेतल्या साहित्याची मौलिकता पाश्चिमात्त्यांना कळली. ‘सिरीं-ए-अकबर’ या नावानं दारा शिकोहनं पासष्ट उपनिषदांचं फारसीत भाषांतर केलं होतं. त्याच्या प्रस्तावनेत तो म्हणतो, ” ही उपनिषदं म्हणजे अद्वैताची भांडारं होत. मी त्यात काहीही फेरबदल न करता शब्दशः भाषांतर केलं आहे.” 

‘सिरीं ए अकबर’ एका फ्रेंच प्रवाश्याच्या हातात पडलं. त्याचं नाव होतं आंकतिल द्युपेरां. त्यानं ते फ्रेंचमध्ये आणि लॅटिनमध्ये केलं. ते आर्थर शॉपेनहॉअरसारख्या लेखकाच्या हातात पडल्यावर तो आनंदानं वेडा झाला. 

दारा शिकोहनं बरीच पुस्तकं लिहिली. सूफी आणि हिंदू तत्त्वज्ञानातील सामायिकतेचा तो शोध होता. त्यानंच योगवसिष्ठ आणि प्रबोधचंद्रिकेचं भाषांतर केलं. तसेच भगवतगीतेचं भाषांतर ‘मज्मुअल बहरैन’ या नावानं केलं होतं. 

अकबरानं तर भाषांतरासाठी खातंच सुरु केलं होतं. त्याच्या काळात रामायणाची बरीच भाषांतरं झाली. अब्दुल कादर बदायुनी आणि नकीबखाननं केलेल्या भाषांतरांत चक्क मध्यपूर्वेतल्या दंतकथा आणि संदर्भही आले होते. ही भाषांतरं म्हणजे मूळ संहितेची पुनर्कथनं होती. याच काळात मुल्ला मसीह कैरानवीनं स्वतंत्रपणे रामायणाचं भाषांतर केलं. मुल्ला शेरी आणि नकीबखाननं महाभारताचं ‘रज्मनामा’ या शीर्षकानं भाषांतर केलं. ते जयपूरच्या संग्रहालयात पाहता येतं. बदायुनीनंनं सिंहासनबत्तिशी ‘नामां-ए-खिरद अफ़जा’ या नावानं फारसीत नेलं (१५७५). मुल्ला शेरीनं हरिवंशाचंही भाषांतर केलं होतं. बदायुनी, हाजी इब्राहिम आणि फैजी या तिघांनी मिळून अथर्ववेदाचं भाषांतर १५७६ साली केलं होतं. सगळ्यात रोचक म्हणजे यातला फैजी हा सर्जक कवी होता. त्याला नलदमयंती आख्यान अतिशय आवडलं होतं. सोळाव्या शतकाच्या अखेरीला (१५९५) त्यानं ते ‘नलदमयंती’ या नावानं भाषांतरित केलं. 

दक्षिणेत गोवळकोंड्याचा अकबरशहा (१६७२-८७) हा साहित्यप्रेमी होता. (तो गुलबर्ग्याचे संत बंदेनवाज गेसूदराज यांचा वंशज). त्याला तेलुगू, हिंदी, संस्कृत, पर्शिअन, दखनी या भाषा येत. त्यानं ‘शृंगारमंजिरी’ हा ग्रंथ लिहिला. त्यासाठी त्यानं रसमंजिरी, आमोद, परिमल, शृंगारतिलक, रसिकप्रिय, रसार्णव, प्रतापरुदीय, सुंदरशृंगार, दशरूपक या हिंदी-संस्कृत ग्रंथांचा आधार घेतला होता. मूळ ग्रंथ तेलुगूत लिहून त्यानं तो संस्कृतमध्ये नेला. त्याची प्रत तंजावरच्या म्युझियममध्ये पाहता येते. 

भारतात सोळाव्या-सतराव्या शतकांत हजारो फारसी ग्रंथ लिहिले गेले. त्यातल्या काही बखरी आहेत, राज्यकारभाराचे वृत्तांत आहेत. बादशहांची चरित्रं आहेत. प्रवासवर्णनं आहेत. पर्यावरण, औषधीविज्ञान, इतिहास, दास्तां असा त्यांचा विस्तार आहे. 

त्या सगळ्या भाषांतरकर्त्यांचंही आजच्या दिवशी स्मरण….. 

.

शहाजहान आणि दाराशिकोहचं रेम्ब्रांनं केलेलं ड्रॉईंग खाली दिलेले आहे. 

 सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘ळ‘ चा लळा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘ळ‘ चा लळा…☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

ल आणि ळ ही दोन स्वतंत्र अक्षरे. या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते.

त्यामुळे अनेकदा ळ चा उच्चार काही लोक सहजपणे ल सारखा पण ल नाही, * ल * व  *ळ * च्या मधला करतात. तर काही वेळेस  ल  करतात. ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे.

पण ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त  नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही.

भारतातदेखील ळ हा उच्चार सर्वत्र नाही.

संस्कृतमधे सध्या ळ नाही. हिंदी, बंगाली, आसामी मधे ळ नाही. सिंधी, गुजराती मधे ळ आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही. मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात ळ आहे व वापर भरपूर आहे.

ल व ळ च्या उच्चारातील सारखेपणामुळे ळ च्या ऐवजी ल बोलले लिहिले तर कुठे बिघडते ? असे अनेकांना वाटत असेल कदाचित. हिंदीत कमल व मराठीत कमळ … ल काय , ळ काय..काय फरक पडला?

पण तसे मराठीत होत नाही. ल की ळ यावरून अर्थामध्ये  फरक पडतो.

काही शब्द पाहू…. 

अंमल – राजवट // अंमळ – थोडा वेळ

वेळ  time //  वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे

खल- गुप्त चर्चा किंवा खलबत्ता मधील खल //  खळ- गोंद

पाळ – कानाची पाळ //  पाल -. सरडा, पाल वगैरे

नाल.- घोड्याच्या बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी // 

नाळ – बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव

कल – निवडणूकीचा कल, झुकाव //  कळ – वेदना,पोटातील कळ किंवा यंत्राचे बटण

लाल – लाल रंग // लाळ – थुंकी

ओल – पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा // ओळ – रेघ

मल – शौच //  मळ – कानातला, त्वचेचा मळ ..  यापासून गणपती झाला.

माल – सामान //  माळ – मण्यांची माळ, हार

चाल – चालण्याची ढब .. त्याची चाल ऐटदार आहे वगैरे // चाळ –  नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना

दल.- राजकीय पक्ष, संघटना .. जनता दल, पुरोगामी लोकशाही दल // 

दळ – भाजी अथवा फळाचा गर , वांग्याचे दळ वगैरे

छल.- कपट //  छळ – त्रास

काल – yesterday //  काळ – कालखंड वगैरे, मृत्यु

गलका – ओरडा आरडा //  गळका – पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे

 

…. तरी आपली भाषा जपा… इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा.

इंग्रजी, हिंदीच्या नादी लागून थाळीला थाली म्हणू नका.

खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down,

हिंदीत.खाली म्हणजे रिकामे

मराठीत गाडी रिकामी होते.. खाली होत नाही.

 

ळ अक्षर नसेल तर पळ वळ मळ जळ तळ .. ह्या क्रिया कशा करणार ?

तिळगुळ कसा खाणार ?.. टाळे कसे लावणार ?.. बाळाला वाळे कसे घालणार  ?

चाळे कसे करणार ? .. घ डया ळ नाही तर सकाळी डोळे कसे  उघडणार  ?

वेळ पाळण।र कशी ?

मने जु ळ ण।र कशी ?.. कोणाला गळ कशी घालणार ?

तळे भरणार कसे ?.. नदी सागराला मिळणार कशी ?

हिवाळा उन्हाळा पावसाळा .. नाही उन्हाच्या झळा.. नाही पागोळ्या

 

कळी कशी खुलणार  ?.. गालाला खळी कशी पडणार ?.. फळा शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा

सगळे सारखे.. कोण  निराळा ?

दिवाळी होळी सणाला  काय ?.. कड़बोळी पुरणपोळी ओवाळणी पण नाही ?

भोळा सांब सावळा श्याम.. जपमाळ नसेल तर कुठून रामनाम ?

मातीची ढेकळे नांगरणार कोण.. ढवळे पवळे बैल जोततील कोण ?

निळे आकाश , पिवळा  चाफा.. फळा फुलानी बहरलेला .. नारळ केळी जांभूळ  आवळा 

 

काळा  कावळा पांढरा बगळा

ओवळी बकुळी वासाची फुले.. गजरा  माळणे होईल पारखे

अळी मिळी गुपचिळी .. बसेल कशी दांतखिळी

नाही भेळ नाही मिसळ.. नाही जळजळ नाही मळमळ

पोळ्या लाटल्या जाणार नाहीत .. टाळ्या आता वाजणार  नाहीत

जुळी तिळी होणार नाहीत.. बाळंतविडे बनणार नाहीत

तळमळ कळकळ वाटणार  नाही.. का ळ जी कसलीच  उरणार नाही.. 

.. पाठबळ कुणाचे  मिळणार  नाही

 

* ळ * जपा .. !

मराठीचे सौंदर्य जपा…!  

“ ळ “ शिवाय सगळेच  * बळ * निघून जाईल आणि काहीच कळेनासे होईल..!! 

” कळलं ” ?? 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक पोस्ट दिन निमित्त: (09ऑक्टोबर)…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “जागतिक पोस्ट दिन निमित्त: (09ऑक्टोबर)…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

जन्मच मुळी नोकरदार कुटुंबात झाल्याने नोकरी ह्या क्षेत्रातील विवीध खात्यांची ओळख ही लहानपणा पासूनच होती. आई मुख्याध्यापिका त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र आणि बाबा सहकार खात्यात असल्याने ह्या दोन्हीं खात्यांना जवळून अभ्यासता आल. बरेचं वेळा आपल्याला कागदावरील अगदी छोटासा काळा ठिपका चटकन दिसतो पण अख्खा पांढरा कागद मात्र आपल मन, डोळे, बुध्दी विचारतच घेत नाहीत. तसच ह्या नोकरदार खात्यांमधील बारीक त्रुटी आपण उगाळत बसतो पण ह्या क्षेत्रांत होणाऱ्या मोलाच्या मदतीच्या गोष्टी आठवत नाहीत.शिक्षणं खात आणि सहकार खात हयाचबरोबर आईची पोष्टाची एजंसी असल्याने पोस्ट खात पण खुप जवळून अभ्यासता आल.   

पूर्वी नं घरोघरी विशिष्ट कामं करायला काही नेमलेली मंडळी असत, सहवासाने वा नित्यभेटीने ह्या मंडळींशी आपलं तसं बघितलं तर कुठलही नातं नसायचं पण ह्या मंडळींशी आपले भावनिक बंध जुळल्या जाऊन त्यांच्या बद्दल आत्मियता, घरोबा हा आपसूकच निर्माण व्हायचा. त्या मंडळींमध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल असे आपले पोस्टमनकाका असायचे. आज जागतिक टपाल दिन.टपाल खात्याप्रती आणि पोस्टमनकाकांप्रती असलेल्या आदरामुळे आजचा हा लेख त्यांना अर्पण.

पोस्टमनकाका म्हंटले की आठवते ती त्यांची कायम खाकीवर्दीतील हसरी,बोलकी आणि तडतडी मुर्ती. ऋतु कुठलाही असो ह्या पोस्टमनकाकांची आणि टपालखात्याची सेवा निरंतरच. अजूनही आठवतात पावसाळ्यात ओलेगच्च होऊन पण टपाल भिजू नये म्हणून प्लँस्टीकच्या पिशवीत जिवापलीकडे टपाल सांभाळणारे सायकलवर येणारे पोस्टमनकाका, अजूनही आठवतात कडकडीत रणरणत्या उन्हात आम्ही सगळे दुपारी पत्ते खेळत असतांना घामाघूम होऊन येणारे पोस्टमनकाका

गार पाणी सुद्धा बाहेर उभे राहून पिणारे कारण आत आलो तर पंख्याचं वारं बाधून ताप येईल म्हणणारे पोस्टमनकाका. खरचं ह्या खात्याच्या सेवेला मनापासून सँल्युट. कदाचित नवीन तंत्रज्ञानामुळे आजच्या पिढीला ही सेवा,हे जुळलेले भावनिक बंध उमगणार पण नाहीत.

नवीन नोकरीचे नेमणूकपत्र आणणारे, कुणाच्या नात्यात बाळं जन्माला आलं की खबरबात घेउन येणारे काका घरच्यासारखे आपल्या आनंदात सहभागी व्हायचे आणि नात्यातील कुणी गेल्याची तार घेऊन येणारे पोस्टमनकाका घरचीच व्यक्ती असल्यागत धीर वा सांत्वन करायचे.

लहानपणी खरतरं पोस्ट खातं म्हणजे फक्त तार,मनीआँर्डर, पत्र पोहोचवणारं खातं एवढचं समजायचं.पण जसाजसा काळ गेला, समज आली तेव्हा ह्या खात्याचा प्रचंड मोठा आवाका,काम बघून ह्यांच्याप्रती आदर अजूनच दुणावला. पुढे माझ्या आईने पोस्टाची एजन्सी घेतली.आर.डी,एन.एस.सी,के.व्ही.पी,पी.पी. एफ ह्या योजना डोक्यात शिरल्या. ह्या खात्यानेच जणू आम्हा भावंडांना आई करीत असलेलं काम बघून भविष्यात करायची तरतूद, काटकसर,नियोजन आणि सगळ्यात महत्वाची थेंबे थेंबे तळे साठे ही म्हण समजवणारी बचत ह्या गोष्टींचं अपरंपार महत्त्व अगदी लहानपणीच समजावीलं आणि त्याचा फायदा अजूनही आम्हाला होतोय.

भारतात कारभाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर पसरेलेल्या जाळ्यांमध्ये प्रामुख्याने रेल्वे सेवा,टपाल सेवा ह्याचा उल्लेख करावाच लागेल. भारतीय टपाल सेवा ही भारतातील सरकारच्या टपाल खात्यामार्फत इंडिया पोस्ट या नावाने चालवली जाते. देशाच्या दूरवरच्या आणि पोहोचायला अत्यंत अवघड भागात सुद्धा ही टपालसेवा पोहोचली आहे. भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटांची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये1852 मध्ये झाली तर 1854 पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले.भारतामध्ये पहिले टपाल तिकीट 1931 साली छापले गेले. त्यानंतर पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट 1947 मध्ये निघाले आणि त्यावर भारतीय झेंडा छापण्यात आला.

बचतीच्या बरोबरीने विकास साधण्यासाठी कर्जाचे महत्त्व जाणून भविष्यातील काळाची पावलं ओळखून ह्या टपाल खात्याने “बँकींग सेवा”पण सुरू केलीयं.

ह्या खात्याचे मला स्वतः ला खूप चांगले अनुभव आलेत. यवतमाळ ला सुदधा ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांनी व्यवहारीक बाजू समजावून सांगून खूप सहकार्य केलं. माझे सासरे पोस्ट खात्याचे कर्मचारी होते. त्यामुळे ति.आईंना पोस्ट खात्याची पेन्शन मिळते. आधी यवतमाळ चे पोस्ट आँफीस,ह्या खात्यातील आँडीट सेक्शन आणि आता बडनेरा पोस्ट खात्यातील कर्मचारी ह्यांची मोलाची मदत आणि तत्पर सेवा आम्हाला वेळोवेळी मिळाली आणि अजूनही मिळते आहेच.त्यामुळे ह्या खात्याच्या समस्त कर्मचाऱ्यांना जागतिक टपाल दिना निमीत्ताने धन्यवाद देऊन ह्या खात्याची सेवा आपल्यासाठी खरोखरच गौरवास्पद आहे हे जाणून आजच्या पोस्टची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अहेवाचा हेवा !…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “अहेवाचा हेवा…” ☆ श्री संभाजी बबन गायके 

दरवर्षी न चुकता हे घडत जातं…डोळ्यांपुढे उभी राहतात ती सारी माणसं जी आपल्याआधी निघून गेली या जगातून. काही माझ्या आधी कैक वर्षे जन्माला आलेली होती म्हणून..  तर काहींना अवेळी बोलावणं आलं म्हणून….गुरुजी सुधांशुला एक एक नाव उच्चारायला लावून पाठोपाठ एका मंत्राचा पुनरुच्चार करीत त्याला त्याच्यापुढे ठेवलेल्या परातीत, हातावर घेतलेलं पाणी सोडायला सांगत होते तेव्हा ती ती माणसं नजरेसमोर दिसू लागली.

आज सासुबाईंचं नवमी श्राद्ध ! मामंजी आहेत अजून. खूप थकलेत म्हणून नातवाच्या हातून करून घेतात तर्पण….दरवर्षी अगदी आग्रहाने. सुधांशु आणि त्याची नोकरीवाली बायको कधी काचकूच करीत नाहीत. सुधांशु कितीही काम असले तरी किमान सकाळची अर्धा दिवसाची सुट्टी घेऊन येतोच घरी आणि सूनबाई रजा टाकतात. सुधांशु दुपारी बारा वाजता काकग्रास ठेवतो बंगल्याच्या भिंतीवर आणि दोन घास खाऊन माघारी जातो त्याच्या कामाला. द्वितीयेला ह्यांचं श्राद्ध असतं, त्यादिवशी तर तो सबंध दिवस सुट्टीच टाकतो….माझ्यासोबत रहाता यावं दिवसभर म्हणून. माझ्या आधी गेले हे. म्हणजे मी ह्यांच्या माघारी श्वास घेत राहिले…एकाच सरणावर जाण्याचं भाग्य माझ्यासारखीच्या कपाळी कुठून असायला?

चुलत जाऊबाई मात्र माझ्यापुढे गेल्या….सर्वच बाबतीत…. 

‘ अहेव मरण पिवळं सरण, भ्रताराआधी डाव जितला गोरीनं 

भ्रताराआधी मरण दे रे देवा, दीर खांदेकरी नणंदा करतील सेवा ।।’

ह्या ओळी जणू त्यांच्यासाठीच लिहिल्या होत्या कुणीतरी. सुधाकर भावोजी मोठ्या लढाईतून जगून वाचून परतले होते. पेन्शन बरीच होती पण ती खायला घरात तिसरं कोणी नाही. ह्यांची बहिण,वसुधा, तिला दिलेली होती दूर तिकडे खानदेशात. तिचं माहेरपण मात्र आमच्या दोन्ही घरांत होत असे निगुतीनं. सुधाकर भावोजी तिचे ह्यांच्यापेक्षा अंमळ जास्तच लाड करायचे. तसा आमच्यातही भावजय-नणंद असा भाव नव्हताच कधी. दिवस पाखरागत उडून गेले आणि जाऊबाईंनी अनाकलनीय दुखण्याने अंथरूण धरले ते कायमचेच. वसुधाताई जाऊबाईंच्या शेवटच्या दिवसात नेमक्या माहेरपणाला आल्या होत्या. त्यांची सेवा घडली त्यांच्या हातून. आणि ह्यांनी खांदा दिला शेवटी. 

अजूनही लख्ख़ स्मरतो तो दिवस. जाऊबाईंच्या पार्थिवाला नव्या नवरीचा शृंगार केला होता जमलेल्या आयाबायांनी. एवढा आजारी देह तो..  पण त्यादिवशी चेहरा इतका गोड दिसत होता…पण डोळे मिटलेले ! काठी टेकीत टेकीत तिला शेवटचं पहायला गावातल्या चार दोन वृद्धाही आल्या होत्या. नव्या पोरीही होत्या आसपासच्या. त्या भेदरलेल्या…काही म्हणत नव्हत्या फारसं काही. पण एक वृद्धा म्हणून गेली…’ पोरी हो…कपाळी हळदी-कुंकू लावा….अहेव मरण आलं काकींना…नशीब काढलं !’ असं म्हणत त्या म्हातारीने तिच्या सुरकत्या पडलेल्या हातांनी पार्थिवाला नमस्कार केला….तेव्हा माझा हात आपसूक माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर पडला. माझं सौभाग्य…मी आणि आमचा सुधांशु ! किती दिवसांची असेल सोबत ही अशी? जीवनात सारेच क्षणभंगुरच  की. पण याचा विसर मात्र सहजी पडतो जीवाला…नाही?

काळ झपाझप पुढे निघाला..त्याला जणू कुठंतरी खूप दूर जायचं होतं स्वत:लाच ! तिस-याच वर्षी सासुबाईंनी इहलोकीची यात्रा समाप्त केली आणि आमचं घर तसं ओकंओकं झालं. आणि मामंजी अबोल. त्यांचा अगदी बालवयापासूनचा संसार होता. पण कितीही वय झालं तरी साथसंगत संपून जावी असं कुणाला वाटतं? सासुबाई काहीवेळा गंमतीनं म्हणायच्या…..तुमच्यानंतर जन्माली आलेली असले तरी जाताना तुमच्याआधीच जाईन ! यावर मामंजी त्यांना मनापासून रागवायचे आणि मग त्यांच्याकडे पहात रहायचे..चष्म्याच्या भिंगांतून. त्यांची ती नजर, सासुबाईंच्या नजरेतील ते ओलेपण मनात रुतून बसले ! आणि दोनेक वर्षांत सासूबाईंनी डाव जितला ! त्यानंतरच्या पितृपक्षापासून नवमी माझ्या घरीआली. ’अहेवनवमी.’  ‘अविधवा नवमी’ही म्हणतात असं ऐकलं होतं कधीतरी. पहिल्या वर्षी तर कित्येक पानं उठली होती वाड्यात. इतका मान असतो भ्रताराआधी जाणा-या बाईला?

माझ्या चेह-यावरील पूर्णाकृती प्रश्नचिन्ह बघून हे म्हणायचे, “ अगं,वेडे ! जुना काळ तो. चूल आणि मूल नव्हे मुलं हेच विश्व असायचं तुम्हां बायकांचं. पुरुषावर अवलंबून रहायचं स्त्रियांनी सर्वच बाबतीत. माहेर कितीही लाखाचं असलं तरी ते घर फक्त साडी-चोळीपुरतं. कारण तिथं नव्या कारभारणी आरूढ झालेल्या असतच. त्यामुळे नव-याची सुख-दु:खं तीच त्यांचीही होऊन जायची. आणि हा आधार निखळून पडल्यावर बाई गतभ्रर्तृक होई. तिचं भरण-पोषण करणारा, तिची बाजू घेणारा तिचा भ्रतार जगातून नाहीसा झाल्यावर तिचं ओझं कोण वागवणार?.. असा कोता विचार करायची माणसं त्यावेळी. घराबाहेर पडून स्वत:चं आणि पोरंबाळं असल्यास त्यांचं पोट भरण्याचं धारिष्ट्य आणि सोय सुद्धा नव्हती आतासारखी. या सर्वांतून सुटकेचा जवळचा मार्ग म्हणजे पालनकर्त्याच्या आधी जगाला राम राम ठोकणे. पुरुषांचं राहू दे….तिच्यासारख्या इतर बायकांना तिचा हेवा वाटणं किती साहजिक?”

ह्यांनी कितीही समजावून सांगितलं तरी माझ्या मनातल्या एका कोप-यात अहेवपणाचं वेड हळव्या बाईपणाचं लुगडं नेसून घुसून बसलं ते बसलंच. हे आजारी पडले तेव्हा तर मन अगदी धास्तावून गेलं होतं. डोळ्यांत तेल घालून उशाशी बसून रहायचे मी कित्येक रात्री. रामरायाच्या कृपेने यांना आराम पडला आणि मी निर्धास्त झाले. सुधांशु मोठा झाला, शिकला, पोटापाण्याला लागला. शिकली-सवरलेली सून आली. आता माझे दोन दोन पालनकर्ते होते घरात…एक हे आणि दुसरा सुधांशु. आम्हा दोघांच्याही वयांनी उंबरठे ओलांडले आणि इस्पितळांचे चढले. माझी तब्येत तशी तोळामासाच म्हणा प्रथमपासून. हे मात्र स्वत:ची योग्य ती काळजी घेत. लहानपणी गरीबीमुळे खाण्या-पिण्याची आबाळ झालेली होती. पण जरा बरे दिवस पाहिल्यावर शरीरानं उभारी धरली होती यांच्या. जाण्यासारखे नव्हते हो इतक्यात…पण गेले … .. … माझ्याआधी..मला हरवून. सुधांशु म्हणाला होता…..”आई, बाबांच्यानंतर मला तुझ्याच तर प्रेमाचा आधार आहे…तू अशी खचून जाऊ नकोस !”  मग मात्र मी स्वत:ला फार त्या विचारांत गुंतवू दिलं नाही. पण दरवर्षी द्वितीया आणि नवमी यायची आणि माझ्या थकत चाललेल्या चेह-याच्या नकाशात निराशेचं बेट अगदी ठळक दिसू लागायचं…समुद्रातून अचानक वरती आलेल्या बेटासारखं…!

आज सासुबाईंची ‘अविधवानवमी’ . कालपासून तयारी सुरू होती. गुरुजी तर दरवर्षी नेमानं येणारे. त्यांना आठवण करून द्यावी लागत नाही…उलट तेच निरोप देतात…येतो म्हणून. पण मला बरंच वाटत नव्हतं गेल्या काही दिवसांपासून…खूप थकवा जाणवत होता. गुरूजी आले….घर त्या मंत्रांनी भरून आणि भारावून गेलं. माहेरकडची, सासरकडची सारी माणसं..  त्यांच्या प्रत्येकाच्या नावांच्या उल्लेखानं जणू जिवंत होऊन एका रांगेत येऊन बसली पंगतीला….सासुबाई, जाऊबाईही होत्या…कपाळी कुंकू लेवून. पण मला त्यांना कुंकू लावायची परवानगी नव्हती…मी कुठं अहेव होते?

टळटळीत दुपार झाली. सूर्य डोक्यावर आला. नैवेद्य..ज्याचे त्याला ठेवले गेले. सुधांशुने,सूनबाईने सासूबाईंच्या तसबीरीपुढे डोके टेकवले…मामंजी त्यांच्या खोलीतल्या बिछान्यावर जरासे उठून बसले…थरथरत्या हातांनी नमस्कार करीत.

सुधांशुने माझ्या हाताला धरून मला उठवलं…आई….वहा हळदीकुंकू आजीच्या तसबीरीवर ! मी चमकून त्याच्याकडे पाहिलं….तो म्हणाला…”अगं पालन-पोषण करणारा फक्त नवराच असतो का…मुलगा नसतो का आईचा पालनकर्ता…आधारस्तंभ? बाबा नसले म्हणून काय झालं? तू मागे राहिली नसतीस तर मला कोण असलं असतं. आता मी आहे की….तुला शेवटपर्यंत.”

माझ्या डोळ्यांना धारा लागलेल्या…भिंतीवरच्या ह्यांच्या तसबिरीकडे पहात राहिले. सूनबाईंनी माझा एक हात हाती घेतला. मी ह्यांच्या तसबीरीच्या काचेत पाहिलं…सुधांशु मागे उभा होता…..आणि तसबीरीतील ह्यांच्या डोळ्यांतही आज चमक दिसत होती ! सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडून, नव-यामागे त्याच्या आईवडिलांची सासु-सासऱ्यांची मुलाप्रमाणेच सेवा करण्याचं भाग्य लाभलेल्या माझा.. हो ..  माझा मलाच हेवा वाटू लागला होता ! अहेवनवमीही मंद स्मित करीत पुढे सरकत होती…आणि आज मला तिचा हेवा वाटत नव्हता !

(अशीच एक आई आणि तिचा मुलगा आठवला…ह्या पितृपक्षात. या घटनेला बराच कालावधी उलटून गेला आहे तरी स्पष्ट आठवली दोघं. कालानुसार बदललं पाहिजे सर्वांनी. आठवलं तसं लिहिलं…काही कालक्रम इकडचा तिकडे झाला असेलही. पण असे सुधांशु आहेत म्हणून ही नवमी ‘अहेव’ आहे, असे म्हटल्याशिवाय राहावत नाही.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकमेव ‘वामन‘ मंदिर… लेखक : साकेत नितीन देव ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

एकमेव वामन मंदिर !!!… लेखक : साकेत नितीन देव ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

श्री विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार हा ‘वामन’ अवतार मानला जातो. हातात कमंडलू , डोक्यावर छत्र अणि एक पाय बळीराजाच्या माथ्यावर ठेवलेल्या वामनांचे चित्र अनेकदा बघितलेलं, मात्र वामनांची मूर्ती कुठेच दिसली नाही. ती इच्छा आपल्याच पुण्यात पूर्ण झाली.

पुराणांतील एका कथेनुसार, असुरांचे गुरू ‘शुक्राचार्य’ यांनी संजीवनी विद्या अवगत केली. त्याच्यामुळे मेलेले असुर पुन्हा जिवंत होऊ लागले. शुक्राचार्य हे असुरांचा राजा ‘बळीराजा’ साठी एक मोठा यज्ञ करतात. असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते अणि ते इंद्रावर हल्ला करण्याची तयारी करतात. जर बळीराजाचे शंभर यज्ञ पूर्ण झाले, तर त्याला इंद्रपद मिळेल या भीतीने इंद्रदेव श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.

महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रुपात जन्म घेतात. त्या बाळाचे नामकरण ‘वामन’ असे करण्यात येते. ऋषिमुनींकडून मृगचर्म, पलाश दंड, वस्त्र, छत्र, खडावा, कमंडळु वस्तू मिळाल्यावर वामन यज्ञास्थळी पोहोचतात. बटू रूपातील श्री वामन बळीराजाकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात अणि भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात, बळीराजा वचन देतात.

वामन विशाल रूप घेतात अणि एक पाय पृथ्वीवर आणि दुसरा पाय स्वर्गात ठेवुन दोन पावले घेतात. आणि मग बळीराजाला विचारतात “आता तिसरे पाऊल कुठे ठेवु?” आपला पराभव मान्य करत, पण दिलेले वचन पाळत शेवटी बळीराजा वामनासमोर नतमस्तक होतात व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतात. वामन तसेच करतात अणि बळीराजाला पाताळात ढकलतात. (ज्या दिवशी हे घडले तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा !). पुढे वामन पृथ्वी मानवांना अणि स्वर्ग देवांना देऊन टाकतो.

तर, अशा या वामनांचे एक मंदिर आपल्या पुण्यात आहे. डावा हात हृदयाशी, उजवा हात मोकळा सोडलेला, गळ्यात माळ, अंगात जानवे अणि चेहर्‍यावर प्रसन्न भाव अशी वामनांची मूर्ती आहे. विशेष म्हणजे शेजारी वामनांची आई ‘अदिती ‘ उभी आहे. माता अदितीच्या डाव्या हातात कमलपुष्प तर उजवा हात वामनांच्या खांद्यावर अभय मुद्रेत आहे. या दोन्ही मूर्तींना प्रभावळ असून, हे संपूर्ण शिल्प संगमरवरी दगडात घडवलेले आहे. 

अशा प्रकारचे हे कदाचित भारतातील एकमेव मंदिर असावे. सदर मंदिर शुक्रवार पेठेत, राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या शेजारी आहे. पूर्वी मंदिराला सभामंडप व गाभारा होता. तिथे असलेल्या ‘धर्म चैतन्य’ संस्थेत वासुदेवशास्त्री कोल्हटकर यांचे कीर्तन होत असे. एक शाळा ही भारत असत. आज ‘आल्हाद’ नवाच्या इमारतीच्या तळघरात हे मंदिर आहे. मंदिर खाजगी असून श्री कोल्हटकर त्याची व्यवस्था बघतात. 

लेखक : साकेत नितीन देव

(वामन जयंती, शके १९४५)

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उमज पडेल तर…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

उमज पडेल तर…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘तुमची सतत सोबत करणारा तुमचा खरा साथीदार कोण?’ असा प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर  आपण कांही क्षण गोंधळून जाऊ. प्रश्न ऐकताच मनात निर्माण झालेल्या संभाव्य उत्तरांपैकी आई, बाबा, भाऊ, बहीण, पत्नी, मुलं, मित्र यापैकी कुणाचे नाव घ्यावे हा संभ्रम आपल्याला गोंधळात टाकेल.पण ‘खऱ्या अर्थाने आपला साथीदार म्हणावं असं यापैकी कुणीच असू शकत नाही’ हा विचार मात्र या वैचारिक गोंधळात  आपल्या मनातही येणार नाही. कारण खऱ्या अर्थाने साथीदाराची भूमिका निभावणाऱ्यांचं योगदान आपल्या खिजगणतीतही नसतं!

आपल्या पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देणारं, आपली सोबत करणारं, एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात असं कुणी असेल तर ते म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन !!

जन्मतः हातीपायी धड शरीर आणि आपलं जगणं सजग करणारं मन दोन्हीही सक्षम,निरोगी,स्वयंपूर्ण राखण्याची जबाबदारी अर्थातच आपलीच असते. मात्र ही जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडणारे अपवादात्मकच असतात एवढं खरं. पूर्णतः स्वावलंबी असण्यासाठी निरोगी शरीर आणि खंबीर मन या अत्यावश्यक गोष्टी,पण स्वावलंबी असण्यातलं सुख परावलंबित्व येतं तेव्हाच समजतं याचं काय करायचं?

खरंतर माणसाला विनामूल्य, अगदी सहज जे उपलब्ध होतं त्याची किंमतच नसते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपलं शरीर आणि मनच! या दोन्हींची सक्षमता जगणं आनंदी करण्यासाठीची आपली मूलभूत गरज आहे याची आपल्याला जाणीवच नसते आणि ती होते तेव्हा बराच उशीर झालेला असतो.असं होऊ नये म्हणून आपल्या शरीरमनाला संजीवनी देणारा एक परवलीचा जादुई शब्द आहे. त्याचा अर्थ न् आवाका आपण समजून घ्यायलाच हवा.

सहजासहजी न मिळणारं पण सातत्यपूर्ण प्रयत्नांती ‘ देता घेशील किती दोन कराने’ असा चमत्कार घडवू शकणारा संजीवक मंत्रच भासावा असा हा सामर्थ्यवान शब्द म्हणजे ‘ बल’!

हा शब्द ऐकताच तो मुख्यत: शरीराशी संबंधित असावा असंच वाटतं याचं कारण या शब्दाचे ‘शक्ती’ आणि ‘सामर्थ्य’ हे सर्रास रुढ असणारे अर्थ.तरीही या दोन्ही अर्थांनाही इतका मर्यादित संदर्भ मात्र अपेक्षित नाहीय.शक्ती आणि सामर्थ्य हे शब्द केवळ बळकट, सशक्त, भक्कम शरीराचेच नव्हेत फक्त तर धैर्यशील,खंबीर,कणखर मनाचेही निदर्शक आहेत.

प्रतिकारशक्ती, अंगबळ, बाहुबळ, वकूब, बलाढ्य,बलवान,बलवंत, बलशाली,बलदंड,या शरीरबलाशी संबंधित अर्थसावल्या जशा तशाच मनोबल, सहनशक्ती, मन:शक्ती, इच्छाशक्ती, विचारशक्ती या आहेत मनाशी संबंधित!

शरीर आणि मनाच्या सक्षमतेला बुद्धिबलाची जोड नक्कीच पूरक ठरते.

आध्यात्मिक उन्नतीव्दारे प्राप्त होणाऱ्या बलाची प्राणशक्ती,तपोबल, तपसामर्थ्य, आत्मशक्ती ही कांही शब्दरुपे.

खरंतर शरीरबल असो वा मनोबल ते संकटाशी दोन हात करायचं सामर्थ्य देतात.ती संकटाचं निवारण करायला समर्थही असतात.पण हेच सामर्थ्य समोरचा प्रतिस्पर्धी जर कमकुवत असेल तर त्याला मात्र अस्मानी संकटच वाटतात.बलातूनच निर्माण होणारा ‘बला’ हा शब्द अशा भयप्रद संकटासाठीच वापरला जातो.

स्त्रीचा उल्लेख अनेकदा बल नसलेली, कमकुवत याअर्थी अनेकदा ‘अबला’ असा केला जातो. तरीही स्त्री खऱ्या अर्थाने अबला नसून सबला असल्याची असंख्य उदाहरणे आहेत जी ‘नारीशक्ती’चीच द्योतक ठरतात!

सामर्थ्याचा नकारात्मक,विध्वंसक वापर अधोरेखित करणारे पाशवी शक्ती,बलात्कार यासारखे शब्द स्वतःच त्यातली नकारात्मकता,कुरुपता ठळक करणारे आहेत.

शारीरिक बळ आणि मनोबल ही खरंतर निसर्गदत्त वरदानंच‌.माणसाने ती ओळखणं,जपणं,वृध्दिंगत करणं आणि त्याचा सकारात्मक वापर करणं हेच निसर्गाला अपेक्षित आहे. मात्र याचा विसर पडल्याचे सर्रास वास्तव मात्र कणाकणाने  माणसालाच हळूहळू नि:शक्त करीत ‘हतबल’ करणारे ठरते आहे याचे भान हरवून चालणार नाही. पण..? उमज पडेल तर..!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares