कविवर्य गोविंदाग्रज, विनोदी लेखन करणारे बाळकराम आणि लोकप्रिय नाट्यलेखक राम गणेश गडकरी यांना तुम्ही ओळखता का असे कुणी विचारले तर बिनधास्तपणे तिघांनाही ओळखतो म्हणून सांगावे.कारण हे तिघेही एकच आहेत.
रा.ग.गडकरी यांनी गोविंदाग्रज या टोपणनावाने काव्यलेखन केले तर बाळकराम या नावाने विनोद लेखन केले.गडकरी या नावाने नाट्यलेखन केले असले तरी नाट्यसृष्टीत ते गडकरीमास्तर या नावाने ओळखले जात होते.
गडकरी यांच्या लहानपणीच त्यांचे वडील स्वर्गवासी झाले.त्यांचा गोविंद हा लहान भाऊही गेला.त्यानंतर ते पुण्याला आले.न्यू इंग्लिश स्कूल व नंतर फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले.त्याच वेळेला त्यांचा किर्लोस्कर नाटक मंडळीशी संबंध आला.ते त्यांच्या’ रंगभूमी ‘ या मासिकात लेखन करू लागले.तसेच शि.म.परांजपे यांचा ‘काळ’ व ह.ना.आपटे यांच्या ‘करमणूक’या मासिकातून लेख,कविता लिहू लागले.त्याच वेळी त्यांचे नाट्यलेखनही चालू होते.
एकच प्याला,गर्वहरण,पुण्यप्रभाव,प्रेमसंन्यास, भावबंधन,राजसंन्यास,वेड्याचा बाजार या गडक-यांच्या नाट्यकृती. एकच प्याला व भावबंधन ही नाटके अत्यंत लोकप्रिय ठरली.या नाटकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक सर्व नावे पाच अक्षरी आहेत.
केवळ नाटकेच नव्हे तर एकच प्याला मधील सुधाकर,तळीराम,सिंधु आणि भावबंधन मधील घनश्याम आणि लतिका ही पात्रे आजही लोकप्रिय आहेत.उत्कृष्ट संवाद हे या नाटकांचे आणखी एक वैशिष्ट्य . गडकरी हे मराठीचे शेक्सपियर होते असे म्हणतात ते योग्यच आहे.
वाग्वैजयंती हा गोविंदाग्रजांचा एकमेव कविता संग्रह.मात्र यात छंदोबद्ध कवितांपासून मुक्तछंदातील कवितेपर्यंत सर्व प्रकार वाचावयास मिळतात.तसेच अगदी लहान म्हणजे चार ओळींच्या कविताही आहेत आणि प्रदीर्घ कविताही आहेत.
बाळकराम यांनी नाट्यछटा,संवाद,विडंबन यातून विनोदी लेखन केले आहे .हे सर्व लेखन उच्च अभिरुची संपन्न आहे.संपूर्ण बाळकराम हे पुस्तक याचे द्योतक आहे.
याशिवाय गडकरींनी स्फुट लेखन केले आहे.तसेच चिमुकली इसापनीती हे जोडाक्षर विरहीत छोटेसे पुस्तकही लिहीले आहे.
आचार्य अत्रे,वि.स.खांडेकर,ना.सि.फडके,रा.शं.वाळिंबे, भवानीशंकर पंडित,प्रवीण दवणे अशा अनेक नामवंत साहित्यिकांनी गडकरी यांचे जीवन व साहित्य यावर विपुल लेखन केले आहे.त्यांच्या नावे नाट्य स्पर्धाही घेतल्या जातात. महाराष्ट्र शासनातर्फे दिवंगत नाट्य कलाकाराच्या पत्नीला पुरस्कार दिला जातो.तो गडकरी यांच्या पत्नी रमाबाई गडकरी यांच्या नावे दिला जातो.
साहित्य क्षेत्रात स्वतःचा ठसा निर्माण करणारा हा महान साहित्यिक वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी स्वर्गवासी झाला.
आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम.!!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
नुकतेच ८जानेवारी २०२२ रोजी आघाडीचे गायक,संगीत शिक्षक आणि नाट्य अभिनेते माननीय रामदास कामत यांच्या निधनाची दुःखद वार्ता आपल्याला मिळाली.एक बुलंद दमदार आवाज अस्तंगत पावला. रामदास कामत म्हटले की आठवते ते त्यांचे देवाघरचे ज्ञात कुणाला हे मत्स्यगंधा नाटकातले पद! अभिषेकी बुवांचे संगीत आणि रामदास कामतांचा स्वर.अगदी मणी कांचन योग…! मत्स्यगंधातील नको विसरू संकेत मीलनाचा हे पदही त्यांनी अजरामर करून ठेवले आहे. ह्याच बरोबर चिरंजीव राहो जगी नाम, नाटक ~ धन्य ते गायनी कळा, तम निशेचा सरला आणि प्रेम वरदानही ययाती आणि देवयानी या नाटकांतील ही गाणी खास त्यांचीच आहेत.
नाट्यसंगीताखेरीज त्यांनी अनेक भक्तीगीते,भावगीते,स्तोत्रे गायिली आहेत.
१८ फेब्रुअरी १९३१ रोजी गोव्यातील साखळी या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड.त्यांचे वडील बंधूही गायक होते.तेच त्यांचे सुरवातीचे संगीत गुरू.पुढे यशवंतबुवा जोशी यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही.
मुंबईत अर्थशास्राची पदवी घेतल्यानंतर नोकरी सांभाळून त्यांनी आकाशवाणीवर गाणे,जमेल तसे नाटकात काम करणे चालू ठेवले होते.
वयाच्या सातव्या वर्षी,१९३८ साली त्यांनी बेबंदशाही नाटकात बाल संभाजीचे काम केले होते,वास्तविक हे गद्य नाटक,परंतु त्यातही त्यांनी दोन पदे सादर केली होती.पुढे तर जवळ जवळ सगळ्याच संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत.
एकच प्याला~रामलाल
मानापमान~धैर्यधर
मृच्छकटिक~चारूदत्त
सौभद्र~अर्जून,कृष्ण,नारद.
मात्र मत्स्यगंधापराशर,धन्य तू गायनी कळातानसेन,मदनाची मंजिरीसारंगधर, व ययाती आणि देवयानीकच या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
२००९ मध्ये बीड येथे झालेल्या ८९व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.तसेच २००८च्या विष्णुदास भावे पुरस्काराचे ते मानकरी ठरले.
एका थोर कलावंताला आज आपण पारखे झालो आहोत.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच माझी त्यांना भावंजली!
बायजा म्हातारी एकीकडे पोराच्या मायेने भिजत होती, दुसरीकडे भाजी विकायचा खोळंबा झाल्याने मनातल्या मनात चरफडत होती. मधूनच तिला रखमाचा, सदाचा राग येत होता तर कधी मनात त्यांच्याबद्दल नाना शंका-कुशंका येऊन काळीज कुरतडून निघत होते. ती पोराजवळ बसून त्याला थोपटत असली तरी तिची नजर दारातून बाहेर दूरपर्यंत रेंगाळत होती .. दूरवर कुणी दिसले की तो सदाच असणार किंवा रखमाच असणार असे वाटून मनात आशा पल्लवित होत होत्या.. दुसऱ्याच क्षणी ते दुसरेच कुणीतरी आहे याची जाणीव झाली की मन कोंबडीवानी खुडूक होत होते. तिची नजर रस्त्यावरून वळून पोराकडे जात होती अन तिथेच थबकत होती.
पोराकडे पाहिले की मनातले सारे विचार क्षणकाळासाठी का होईना गळून पडत होते आणि मुलावरची माया मन भरून टाकत होती.. मायेने पोराला थोपटत असतानाच अचानक तिची नजर दरवाज्यातून बाहेर गेली.. दूरवर सदासारखाच कुणीतरी येताना दिसला.. तिची नजर त्याच व्यक्तीवर खिळून राहिली होती.. ती व्यक्ती काही अंतर पुढे आल्यावर तिला तो सदाच असल्याची खात्रीं पटताच बायजाची नजर त्याच्या अवतीभवती रखमाला शोधू लागली.. रखमा काही दिसेना..
‘ संगं रखमा न्हाई.. सदा एकलाच हाय..काय झालंय पोरीला कुणाला ठावं.. ? आजारली आसंल म्हणून दवाखान्यात तर ठेवली नसंल..? पर तसं आसतं तर पोराला एकल्याला घरात सोडून नसती गेली दवाखान्यात.. संगती नेलं असतं.. दवाखान्यात न्हाय तर मग रखमा हाय कुठं ?.. ‘ मनात नाना विचार येऊन गेले..
सदा दारात आला. हातात जेवणाच्या डब्याची पिशवी पाहून बायजा काहीशी चक्रावलीच.. ‘ म्हंजी.. सदा रातपाळी करून आलाय कामावनं.. मग रखमा कुठं हाय ? ‘
” बायजाज्जी तू ? येरवाळचा बाजार सोडून तू कशी इथं ? पोराला बरं न्हाय काय ? आन रखमा कुठं गेलीया .. औशिद आणाय गेलीया व्हय ? काय झालंय पोराला.. सांच्यापारी तर ब्येस खेळत हुता.”
बायजाला बाजार सोडून पोराजवळ थांबलेलं बघून काळजी वाटून सदाने विचारले.. पटकन हातातली डब्याची पिशवी तिथंच खिळ्याला अडकवून तो पोराजवळ बसला. बायजाला काय उत्तर द्यायचं आणि कसे उत्तर द्यायचं ते क्षणभर समजेचना..
” उगा नगं काळजी करू.. पोरगं बरं हाय . थांब वाईच पाणी आणून देते. हातपाय तोंड धू… “
तिने आतून पाण्याची कासांडी आणून दिली.
” पर रखमा हाय कुठं ?”
त्याच्या प्रश्नाला उत्तर न देताच ती झटकन आत गेली आणि तिने चहाचे आदण ठेवले. सदाला पिण्यासाठी तांब्याभर पाणी आणून बाहेर ठेवले. आणि चांगला कप कपभर चहा घेऊन बाहेर आली.
” आज्जे , पर रखमा …?
” च्या पे आदी.. गार हुईल ?”
चहा पिऊन झाल्यावर तिने विचारले,
” सदा, काल तुझं न तिचं भांडान झालंवंतं काय रं ? “
” न्हाय.. पर अशी का ईचारतीयास ? “
“आरं, येरवाळच्यानं रखमा घरात न्हाई.. मी बाजारला जाया निघालेवते, पोराचं रडणं ऐकाय आलं.. रखमाला दोनचार हाळ्या मारल्या.. एक न्हाय न दोन न्हाय.. इवून बघतीया तर दार निस्तं फुड केलेलं…”
बायजाने सदाला सुरवातीपासूनचे सगळे सांगितले तसे त्याला रखमाची जास्त काळजी वाटू लागली. विचार करकरून डोके फुटायची वेळ आली. मनात येणारा एकेक विचार मनच रद्द करीत होते.. एवढ्याशा पोराला घरात एकटे टाकून कोणतीही माऊली कुठे जाईलच कशी ? मग रखमा कुठे गेली ? कशी गेली ?कधी गेली ? आणि सर्वात महत्वाचे का गेली ? सारे निरुत्तर करणारे प्रश्न.. मनात खदखदत असताना, कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नसताना बायजाच्या मनात प्रश्न आला.. ‘ रखमाला कुणी पळवून तर न्हेलं नसंल न्हवं ? ‘
मनात प्रश्न आला आणि बायजा अस्वस्थ झाली. मनातली शंका सदाजवळ व्यक्त करावी की नको अशी तिची द्विधा मनस्थिती झाली. तिचे मन स्वतःशीच मनातील कुशंका पडताळून पाहू लागले. रखमा तरुण होती, देखणी होती.. पण एका तान्हुल्याची आई होती.. पण एखादा नजर ठेवून पळवून न्हेणारा असेल तर.. त्याला तान्हुल्याशी काय देणं घेणं असणार म्हणा.. पण कुणी पळवून नेत असताना रखमाने आरडा-ओरडा केला असता .. सगळी गल्ली गोळा केली असती.. मग ती स्वतःहूनच गेली असेल काय ? बायजाच्या मनात आलेली, ‘ ती स्वतःहून पळून जाण्याची शंका’ तिने स्वतःच धुडकावून लावली. ती रखमाला चांगलेच ओळखत होती… मनात नाना शंका – कुशंका येत होत्या आणि त्या चुकीच्या वाटून रद्दही होत होत्या.. पण एक अनुत्तरित प्रश्न मात्र मन पोखरत होता, मग नेमके तिचे झालंय काय ?
बायजा स्वतःच्या विचारांच्या नादात असतानाच अचानक तिचे सदाकडे लक्ष गेले.. तो काहीच न सुचून, गुडघ्यात तोंड खुपसून हताश होऊन रडत होता. बायजा उठली . त्याच्या पाठीवर हात ठेवून धीर देत म्हणाली,
” आरं , असे बसून कसे चालंल.. रखमाचा तपास कराय नगं..? ती कायतरी कारणाने म्हायेराला गेली हाय का ते बगाय पायजेल.. उठ.. असा बसून नगं ऱ्हाऊस.. मी हाय पोरापाशी “
माहेरी जाण्याचा मुद्दा बायजाला स्वतःलाच पटला नव्हता तरी तिने त्याला हताशपणातून बाहेर काढण्यासाठी उगाचच त्याला सांगितला होता…
त्याच्या मनात आशेचा काजवा टिमटीमला असावा.. तो झटक्यात उठला आणि बाहेर पडला.
आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर घरमालक येऊन उभा राहिला. “आज कसं येणं झालं..?” उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की, समोर त्यांचा घरमालक उभा आहे. घरमालक विनम्रपणे म्हणाला,” मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं.”
उद्योगपती वरमले आणि म्हणाले, ” हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा.” एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले. घरमालक उद्योगपतींना म्हणाला,” तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता, याचे मला आश्चर्य वाटते.” यावर उद्योगपती हसले व म्हणाले, ” मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.” घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.
हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एखाद्या सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.. तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,” सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.”
उद्योगपती म्हणाले, ” आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. ‘ उद्योगपती ‘ हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे. ” एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला.
तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या आलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.
एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते. त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार.. उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, ” तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?” हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.” उद्योगपती हसले व म्हणाले, ” पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड “. उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.
असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते. त्याची उत्सुकता चाळवली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, ” साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता ??”
उद्योगपती म्हणाले, ” अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, ” तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. ‘ तू कसा आहेस ‘ हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा .”—–
—” तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की, ‘ खरोखरच आपण कोण आहोत ‘ हे महत्त्वाचे नसतेच. ‘आपण कसे आहोत ‘ यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते.”
या उत्तुंग उद्योगपतीचे नाव—–‘ रतन टाटा…‘
खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी—कुठलीही गुंतागुंत नसलेली— अशीच होती. .
खरेतर—-साधे राहणे हेच कठीण असते. अशा व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे…
म्हणूनच, ” तुम्ही कोण आहात . ” हे महत्वाचे नाही—- ” तुम्ही कसे आहात ” हे महत्वाचे आहे—-
विचार जरूर करा—
संग्राहक : – श्री सुनीत मुळे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ 23 जानेवारी – ‘जीवनरंग’ – सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ एक आस्वादन – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
23 जानेवारी – जीवनरंग (एक आस्वादन)
आज सौ. पुष्पा प्रभुदेसाई यांच्या जीवनरंग या ललित, वैचारिक लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. यातील काही लेख वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमित्ताने लिहिले गेले आहेत. त्या त्या लेखांखाली तसा तपशील लेखिकेने नोंदविलेला आहे. यापैकी बरेच लेख यापूर्वी ई-अभिव्यक्तीवरही प्रसारीत झाले आहेत. आता हे सगळे लेखन एकत्रितपणे बघताना लेखिकेइतकाच वाचकालाही आनंद होत आहे.
कोणत्याही ‘शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी’ गणेशाचे स्मरण, स्तवन, पूजन करण्याची आपली परंपरा आहे. इथेही लेखिकेने पहिला लेख श्री गणेशावरच लिहिला आहे, ‘मला भावलेला गणेश.
गणेशाच्या सूक्ष्म रूपाविषयी त्या लिहितात, ‘निसर्गाची नियमबद्धता टिकवणारा नियंता, तोच गणेश. पंचमहाभूतांची शक्ती म्हणजे गणेश. गणनेच्या मुळाशी असलेली अधिष्ठात्री देवता, ती शक्ती म्हणजे गणेश. ‘त्वं मूलाधारो स्थितोसी नित्यम’ असं संस्कृत अवतरणही त्या देतात. उत्पत्ती, स्थिती, लय या सगळ्यासाठी लागणारी शक्ती म्हणजे गणेश.
हे झालं, गणेशाचं सूक्ष्म रूप. गणेशोत्सवाचे वेळी आपण गणपती आणून पूजा-अर्चा करतो, ते याचं स्थूल रूप आहे. या पार्थीव गणपतीची पूजा करताना, निसर्गाचा र्हास होऊ नये, म्हणून काळाजी घ्यायला हवी असं त्या सांगतात आपल्याला गणेशाचं सूक्ष्म रूपच भावतं असंही सांगत त्या लेख संपवतात.
पुष्पाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं की त्या त्या विषयाची अद्ययावत माहिती त्या लेखात देतात. पर्यावरणआणि मी असा शब्द उच्चारताना पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही पंचमहाभूते त्यांच्या मनापुढे आहेत. यात सातत्याने प्रदूषण होत चाललाय, याची त्यांना खंत आहे. या प्रदूषणापुढे जाऊन त्या म्हणतात, अंतराळात, याने, रॉकेटस यांच्या स्फोटातून येणारी धूळ, धूर, वाफ, आवाज सगळं भयावह होत चाललय.. प्रदूषणावर उपाय योजना सांगताना, त्या म्हणतात, ‘वनौषधींची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. यासंबंधी त्या आणखी लिहितात, सोमवल्लीसारखी प्रचंड ऊर्जा देणारी वनस्पती आज केरळ आणि हिमालयातच फक्त 50 किलो . उरली आहे. प्रदूषणाचा विचार करताना, त्या पुढे लिहितात, या पंच महाशक्तींबरोबर माणसाचा मन ,बुद्धी, अहंकार हेही प्रदूषित होत चालले आहेत.
‘वटवृक्षाची सावली’ या पुढच्या लेखात त्या लिहितात, कीटक, पक्षी, प्राणी, माणसं यांना आधार देणार्या, शांत, गार सावली देणार्या वटवृक्षाचं जतन करायला हवं. मग ती आज या वृक्षाचं जतन केलेली ठिकाणे सांगते. ‘शिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली इथे अडीच एकरात वटवृक्ष पसरला आहे. कोलकत्याला ‘शिवफूट बोटनिकल गार्डन’ मधल्या वटवृक्षाचा पसारा एवढा आहे की त्याच्या छायेत चार ते पाच हजार लोक बसू शकतात.त्याचे वय 350 वर्षे आहे. असे वृक्ष जपायला हवे. ज्यांनी ते जपले, त्यांना त्याचे श्रेय द्यायला हवे.
अखंड सावधपण हे लेखाचे नाव वाचल्यावर वाटतं, माणसाने अखंड सावध का असाव? कसं असावं याबद्दल लेखिकेला काही सांगायचं असावं, पण तसं आजिबात नाही, अगदी लहान लहान कीटकांपासून मोठ-मोठे पशू जगताना सावधगिरी कशी बाळगतात, याचे वर्णन आहे. सहवासातुनी जीवन घडते, या लेखातही, त्यांच्या घरातल्या कोंबड्या, बोके, कुत्री , पोपट इत्यादींच्या सहवासाविषयी लिहिले आहे. त्यांच्या आठवणींविषयी लिहिले आहे, ‘’माणुसकीचे व्रत’ या लेखात त्यांनी म्हंटले आहे, ‘जीवसेवा हीच ईश्वर सेवा’ हे तत्व लक्षात घेऊन अनेक संस्था सेवा करीत आहेत. त्या संस्थांना तीर्थक्षेत्र, स्वयंसेवकाला तीर्थरूप आणि त्यांच्या हातून घडणारी सेवा हे तीर्थकर्म असं म्हणायला काय हरकत आहे? असं म्हणत, बेवारशी प्राणी, पक्षी यांची काळजी घेणार्या ’ब्लू क्रॉस’, मुंबईची S. P. C.M. (सोसायटी फॉर प्रिव्हेंशान ऑफ कृएल्टी टू अॅनिमल), इंडियन हरपेटोलॉजिकल सोसायटी, राहत या संस्थांची महिती दिलीय. व काही काही प्राण्यांची माहिती देऊन, त्यांना तिथे कसा आसरा मिळाला, ते संगीतलय. ’प्रारब्ध’मधे मिल्ट्रीमध्ये सामान वाहणार्या पेडोंगी खेचराची माहिती येते. पाकिस्तानने या खेचरासहित काही खेचरांना पळवून नेलं. संधी मिळताच ते खेचर पाठीवरच्या सामनासहित, ज्यात बॉंबगोळे, माशिनगन इ. साहित्य होतं, त्याच्यासकट भारतीय हद्दीत आलं. त्याचा सत्कार होऊन त्याचं नाव गिनीज बुकामध्ये नोंदलं गेलं. ही सगळी माहिती दिल्यावर आपणही एका जखमी, लंगडणार्या गाढवावर कसे उपचार केले. हे सांगते. दत्तक विधान या लेखातही बंड्या आणि गुंडी या कुत्र्याच्या पिलांचे दत्तक विधान कसे झाले, ही माहिती येते ‘ लेखिकेला कुत्रा, मंजर, घोडा, गाढव इ. प्राण्यांबद्दल ,लळा, आपुलकी असल्याने, त्यांच्यावरचे अनेक लेख पुस्तकात आहेत.
सामाजिक समरसता’या लेखात टेलिफोन बुथ असल्यामुळे फोन करायला येणार्यांशी थोडं-फार बोलून त्यांची सुखदु:ख समजून घेऊन, त्यांना सहानुभूती दाखवल्यामुळे, तसंच त्यांच्या. आनंदात सहभागी झाल्यामुळे सामाजिक समरसतेचा सुंदर अनुभव कसा आला, त्याचे वर्णन केले आहे.
वनौषधी संरक्षण: एक आव्हान आणि उपाय’ या लेखात एक पुराणकथा येते. एक ऋषी आपल्या विद्यार्थ्यांना निरुपयोगी वनस्पती आणायाला सांगतात. एक जण कुठलीच वनस्पती आणत नाही. ऋषी त्यालाच शाबासकी देतात आणि सांगतात, जगात निरुपयोगी अशी एकही वनस्पती नाही. आहेत त्या वनौषधींचं जतन केलं पाहिजे व वेगवेगळ्या वनौषधींची लागवड करायला प्रोत्साहनही दिलं पाहिजे.
याशिवाय नदीजोड प्रकल्प, भारतीय रेल्वे , विवेकानंद स्थापित रामकृष्ण मिशनचे ऐतिहासिक कार्य, मराठीच बोलू कौतुके इ. लेखही अगदी वाचनीय झाले आहेत.
सर्वांनी एकदा तरी वाचून बघावे, असे हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्याने लेखिकेबद्दलेच्या अपेक्षा अधीक उंचावल्या आहेत.