मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अज्ञात ग्रहाचे रहस्य – भाग 1… (भावानुवाद) – श्री सुशांत सुप्रिय ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ अज्ञात ग्रहाचे रहस्य – भाग 1… (भावानुवाद) – श्री सुशांत सुप्रिय ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(अज्ञात  ग्रहाचे रहस्य  ( हिन्दी कथेचा अनुवाद))

अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ची  मुख्य चालक कमांडर अल्पना चावला होती. या अंतरिक्ष-यानात आणखी  चार  पुरुष अंतरिक्ष-यात्री  होते.  श्री हरिकोटा अंतरिक्ष-केंद्रातून  काही वर्ष आधी २५१० मध्ये उड्डाण केल्यानंतर हे यान आमच्या सौर-मंडळाच्या बाहेर पडलं होतं. पण अजूनही श्री हरिकोटाशी याचा सम्पर्क होत होता. आता ‘ इंडियाना ‘ अंतरिक्ष-यान, एंड्रोमीडा गैलेक्सीत, तिथला एक तारा ‘अल्फ़ा-सेंटौरी ‘ च्या सौरमंडळात उड्डाण भरत होतं. 

अचानक त्यांना आपल्या  अंतरिक्ष  – यानाच्या स्क्रीन वर एक मोठा -सा ग्रह दिसला.  दुरून तो पृथ्वीसारखाच नीळा, हिरवा आणि भूरा वाटत होता. अंतरिक्ष-यानातील सगळे प्रवासी अतिशय उत्साहित झाले. या ग्रहावर जीवन असण्याची संभावना होती.  काही दिवसांच्या प्रवासानंतर, अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ त्या ग्रहाच्या कक्षेत पोचलं.  खगोलीय प्रवासाच्या इतिहासात, हे प्रथमच घडत होतं की दुसर्या  एखाद्या आकाशगंगेच्या तार्यााच्या, एखाद्या ग्रहावर मनुष्य पाऊल ठेवणार होता. श्री हरिकोटाशी सातत्याने सम्पर्क होत होता. परंतु जेव्हा अंतरिक्ष-यान त्या  ग्रहाच्या जमिनीवर उतरणार होतं, तेव्हा अचानक त्याचा श्री हरिकोटाशी  सम्पर्क तुटला. दोन्हीकडच्या  वैज्ञानिकांनी आपापसात सम्पर्क प्रस्थापित करण्याचा  खूप प्रयत्न केला. परंतु त्यांना यश लाभलं नाही. शेवटी श्री हरिकोटा केंद्रा ने अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘  अंतरिक्षात हरवल्याचं जाहीर केलं. 

या घटनेनंतर काही वर्षांनी श्री हरिकोटा अंतरिक्ष-केंद्रातून आणखी एका अंतरिक्ष-यानाने ‘ इंडियाना-2 ‘ ने उड्डाण केलं. त्याचा उद्देश हरवलेलं पहिलं अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ बद्दलची माहिती मिळवणे हा होता.  

अंतरिक्षामधे काही वर्षे उड्डाण केल्यानंतर आता ‘ इंडियाना-2 ‘सुद्धा  एंड्रोमीडा गैलेक्सी चा तारा  अल्फ़ा सेंटौरी च्या सौरमंडळात उड्डाण करत होतं. अखेर हे यांनही पृथ्वीसारख्या दिसणार्यां निळ्या, हिरव्या, भुर्या् ग्रहाच्या कक्षेत पोचले.  

या अंतरिक्ष-यानाचं ‘ इंडियाना-2 ‘ चं नेतृत्व कुशल आणि अनुभवी अंतरिक्ष-यात्री कमांडर भरत सिंह करत होते.  त्यांच्या दलात पाच अन्य पुरुष अंतरिक्ष-यात्री होते. आत्तापर्यंत या  अंतरिक्ष-यानाचा सम्पर्क श्री हरिकोटाशी होत होता. कमांडर भरत सिंह यांनी एक  छोटं अंतरिक्ष-यान या ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा निर्णय घेतला.  मूळ यान  आणि  अन्य अंतरिक्ष-यात्री या ग्रहाच्या कक्षेतच फिरणार होते.  कमांडर भरत आणि एक अंतरिक्ष-यात्री फ़्लाइट लेफ्टनंट सुरेंद्र कुमार  यांचा गट एक छोटं अंतरिक्ष-यान घेऊन त्या ग्रहावर उतरण्यासाठा निघाले. ढगांना चिरत जेव्हा ते या ग्रहाच्या जमिनीवर उतरले, तेव्हा पृथ्वीसारखीच इथली संस्कृती बघून हैराण झाले॰ 

अंतरिक्ष-यान एका मोठयाशा मैदानात सहजपणे उतरलं॰ नाशिबाची गोष्ट अशी होती की या ग्रहाच्या वायुमंडळातदेखील ऑक्सीजन होता. कमांडर भरत अंतरिक्ष-यानातून खाली जमिनीवर उतरले. त्यांना स्पेस-सूट आणि ऑक्सीजन-सिलिंडरची  आवश्यकता भासली नाही. इथलं सगळं वातावरण प्रदूषण-रहित पृथ्वीसारखंच होतं. फ़्लाइट लेफ्टनंट सुरेंद्र कुमार छोट्या अंतरिक्ष-यानातच बसून राहिले. कुठलीही आपत्कालीन स्थिती उद्भवली तर आपलं यान उडवून, या ग्रहाच्या कक्षेत फिरणारं यान  इंडियाना -2 च्या जवळ पोचता येईल, असा त्यांचा विचार.  कमांडर भरत  अंतरिक्ष-यानातून बाहेर पडताच त्यांना सात फूट ऊंची असलेल्या धट्टया-कट्ट्या डझनभर महिलांनी घेरलं. त्यांच्या हातात लेसर गनसारखी धोकादायक हत्यारं होती. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिला सैनिक हिन्दी भाषा जाणत होत्या. त्यांनी  कमांडर भरतला बंदी बनवून आपल्या राणीकडे नेलं. अमेज़ोनियन  विमेन , “ कमांडर भरतच्या तोंडून बाहेर पडलं. 

कमांडर भरतने त्या महिलांची राणी पहिली, तेव्हा त्यांच्या आश्चर्याला सीमा उरली नाही. कारण ती राणी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून  काही वर्षापूर्वी हरवलेल्या  अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ ची  मुख्य चालक कमांडर अल्पना चावला होती. 

अल्पना चावला म्हणाली की त्यांचं अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ या ग्रहावर उतरातांना हवा आणि खराब वातावरणामुळे क्रॅश झालं. तिचे सगळे सहयात्री त्या दुर्घटनेत मारले गेले. 

या ग्रहावर उंच निंच, तगड्या स्त्रियांचं तेव्हा शासन होतं. या ग्रहाच्या अमेज़ोनियन  महिलांनी अल्पना चावलाचा आपल्यामध्ये सहर्ष स्वीकार केला. हळू हळू ती इथे लोकप्रिय झाली. अल्पना ने या ग्रहावरील महिलांना हिंदी भाषा शिकवली.  आणखीही किती तरी गोष्टी तिने त्यांना शिकवल्या. त्या सगळ्या तिचा सन्मान करू लागल्या. काही महिन्यापूर्वीच या महिलांनी अल्पनाला आपली राणी बनवले.

इथल्या महिलांनी यापूर्वी कधी कुणी पुरुष पहिला नव्हता. इथे प्रयोगशाळेत काही तांत्रिक गोष्टींचा आधार घेऊन मुलांचा जन्म होत असे. सगळ्या महिला लेस्बियन होत्या. त्या आपापसात यौवन संबंध प्रस्थापित करत. त्यामुळेच कमांडर भरत इथल्या बायकांसाठी एक वेगळेच कुणी तरी प्राणी होते. त्या पुन्हा पुन्हा त्यांना स्पर्श करून बघायच्या. कमांडर भरत त्यांच्यासाठी कुणी अद्भूत जीव होते.  त्या अतिशय कुतुहलाने त्यांच्याकडे पहात होत्या.

क्रमश:…

मूळ कथा – अज्ञात ग्रह का रहस्य  मूळ लेखक – श्री सुशांत सुप्रिय 

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सदमा.. . भाग 4 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ सदमा.. . भाग  4 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

सार बरं चालल होत. हे ही नियतीला बघवले नाही. ऐके दिवशी भानुदास डोके धरून घरी आला. फार अस्वस्थ होता. दवाखान्यात नेहले औषधपाणी केले. पण गुण येईना. वेगवेगळ्या चाचण्या केल्या शंभर उपचार झाले. शेवटी निदान कॅन्सरचे आले. बघता बघता माणुस अंथरूणावर खिळला. त्यांची सेवा केली. अखेर तो गेला. दु:खाचा डोंगर कोसळला ,खेळ मांडण्या आधी विस्कटला,त्यांचे आजार पण सासरच्या लोकांनी लपवले वर हिलाच पांढऱ्या पायाची ठरवले. आता पोरगी हाच एक धागा उरला. यावर उभे आयुष्य काढावे लागणार. ही बातमी समजल्यावर आई-वडील आले यांनी सासरच्या मंडळींना जाब विचारला. पैश्या कमी नव्हते पण आता बाबांना विश्वास नव्हता. त्यानी भांडण काढून पोरीला आणले. परीत रमली सावरली,पुढच्या शिक्षणासाठी अॅडमिशन घेतली. नवऱ्याच्या फंडाची,विम्याची रक्कम मिळाली. तिने ते पैसे बाबांना दिले त्यातून नवीन घर बांधायला लावले. परी आता शाळेला जायला लागली. ही मन रमवण्यासाठी जाॅब करत होती. हे ही सुख नियतीला बघवले नाही. हसती खेळती परी अल्पशा आजाराने गेली तेव्हा खरी ती तुटली. अशी तुटली की पुन्हा जोडण्याची, उभारण्याची तिची इच्छा नाही. मनाच्या पार चिंध्या झाल्या. त्या शिवता येणार नाहीत. मी खुप आशेने आले आहे. माझ्या मैत्रीणीच दान माझ्या पदरात घालाल.”

“या जगात अशक्य काही नाही. प्रयत्न करण्यांची तयारी हवी. येवढे आघात लहान वयात सहनकरणं सोपे नाही. यासाठीच लग्न करताना घाई करू नये. इथं मुलीची परिपक्वता महत्त्वाची. आता कोण बरोबर कोण चूक हे बघण्यात अर्थ नाही. यातून मार्ग काय काढता येईल हे पाहणे महत्त्वाचे. तुझे पहिले अभिनंदन करते. ही केस योग्य ठिकाणी आणलीस या बद्दल. आज होत काय, लोक शरीराच्या आजारांवर औषधपाणी करतात,तो आजार मानतात पण मनाचं काय ?हा आजार आहे हे मान्य करत नाहीत. मग कुठे देवदेव करत बसतात,कुठे हलक्या डोक्याची ठरवतात,उतारे धुपारे करतात. एक जीव बरबाद करून सोडतात. स्वत: बदलत नाहीत दुसऱ्याला बदलू देत नाहीत. योग्य औषधाने हे आजार बरे होतात. प्रथम तिच्या आई-वडिलांना घेऊन ये. मी बोलते त्यांच्याशी त्यांची साथ महत्त्वाची आहे. नंतर दोन दिवसांनी मैत्रीणीला भेटते. “

दिपाने विजूच्या आई-वडिलांना  मानसोपचारतज्ज्ञाकडे नेहले. तिचे समुपदेशन केले. मैत्रीणी ट्रिटमेंट सुरू झाली. तिला औषध दिले.

दिपाने आईला सांगितले मी जाते आता हिची खुशाली कळवा

वर्षे झाले असेल,आईचे पत्र आले होते. शेवटच्या दोन ओळी ती पुन्हा पुन्हा वाचत होती” विजूने परवा भिंतीवर चित्रे काढीली ती रंगवली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती नाटक बघायला  पण ग

– समाप्त – 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सदमा.. . भाग 3 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ सदमा.. . भाग  3 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

विजूचा केवीलवाणा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. बालपणीचे सुंदर दिवस पुन्हा पुन्हा फेर धरून नाचत होते. दिपाच्या मैत्रीणीची मोठी बहिण मानसोपचारतज्ज्ञ होती. तिची भेट घेतली. केस समजावताना म्हणाली” मी एक गोष्ट सांगणार आहे. ती अदम जमाण्याची नाही. ऐकवीसाव्या शतकातील आहे. आताची.. . अगदी आत्ताची.. . आहे. विश्वास बसणार नाही. पण सत्य आहे. माझ्या सखीची आहे . विजयाची गोष्ट. सगळे तिला विजूच म्हणतात. एका अल्लड पोरीची. ती अतिशय हुशार, कुशाग्र बुद्धीची,सगळ्या क्षेत्रात आघाडी. सर्वाना हवीहवीशी वाटणारी,देखणी. तिची पॅशन नाटक. नाटकासाठी ठार वेडी.

बारवीत ही तिने राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला. यश मिळवलं. बारावी नंतर मी पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेले. तिने इथं महाविद्यालयात प्रवेश घेतला. तरी तिचे नाटक सुरू. तिच्या नाटकाचा हिरो अतुल. एका नाटकात ते दोघे काम करत. स्पर्धेच्या निमित्ताने ते वेगवेगळ्या ठिकाणी जात, सतत प्राक्टीस, सतत सहवास, बरोबर हिंडणे फिरणे,अतुल तिला आवडू लागला. त्यांचे प्रेम फुलले. ऐके दिवशी तिने घरी जाहीर केले मी अतुलशी लग्न करणार. तिच्या बाबांचा नाटकात काम करण्यास विरोध नव्हता. पण आपल्या मर्जीने  विजूने आपले लग्न ठरवावे?ते ही परक्या जातीतील मुलाशी?हे काही पटले नाही. घरात मोठे वादळ उठले. तिला विरोध झाला,तिने बंड केले. ते मोडून काढले. तिची आई मध्ये पडली तर तिला बाबा  म्हणाले माझं ऐकायचे नसेल तर तू तुझ्या माहेरी जावू शकतेस. तिची अवस्था’ इकडे आड तिकडे विहीर ‘झाली. मी म्हणेन तसेच या घरात झाले पाहिजे. हा हेका धरला. विजूचे पंख कापले गेले. शिक्षण बंद झाले, बाहेर फिरणे बंद,मी सांगेन त्या मुलाशी लग्न करावे लागणार. असा वटहुकूम जाहीर झाला . वर संशोधन सुरू झाले. चार पाच मुले बघून गेली. सर्वांना तिने पसंती दर्शवली. माझ्या मना विरुद्ध लग्न आहे, मग तो काळा काय अन् गोरा काय? शिकलेला काय अन् न शिकलेला का ? फरक काय पडतो? आयुष्य उधळुणच द्यायचे तर पसंती हवी कशाला? ही तिची भावना. खरं तर अतुल सुसंस्कृत, शिकलेला, नोकरी करणारा. उमदा गडी होता. दोघांची जोडी जेव्हा रंगमंचावर येई तेव्हा प्रेक्षकांना  ही त्यांचा क्षणभर हेवा वाटे. अशा अतुलला केवळ दुसऱ्या जातीचा म्हणून बाबा डावले. त्यांचे विजूवर प्रेम होते. विजू म्हणाली तसती तर एका मिनिटात तो पळून जावून लग्न करायला तयार होता. पण लग्न केले तर बाबांच्या आशीर्वादाने करावे असे तिला वाटे कारण विजूचे बाबांवर विलक्षण प्रेम होते. त्यांच्यासाठी  तिने प्रेमाचा त्याग केला. बाबांचा अपमान होईल, त्यांची मान शरमेनं खाली जाईल असे मी करणार  नाही. ते म्हणतील त्या मुलाशी मी डोळे झाकून लग्न करेन असे सांगून टाकले. अतुल लग्नात खोडा घालेल म्हणून एक सुरतचे श्रीमंत स्थळ आले होते. त्याला होकार कळवला. त्यांच्याशी बोलणी झाली. अगदी जवळचे आठ दहा नातेवाईक घेऊन ते  सुरतला  गेले आणि लग्न करुन आले. स्पष्ट शब्दात सांगायचे तर मुलीला जिवंत गाडून आले.

स्वप्न उध्दवस्त झालेले. विजू हसत तर होती, पण त्या हसण्यात प्राण नव्हता. तिच्या स्वागतासाठी सगळी हवेली सजवली होती. भानुदासच लग्न ठरता ठरत नव्हतं तीशी उलटलेली. घोड नवरा तो आणि त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर मुलगी सुन म्हणुन मिळाली होती. जास्त खोलवर कोणीच कुणाची चौकशी केली नव्हती. नवऱ्याकडील मंडळी खुष होती. गुलाबाच्या पायघड्या घातल्या होत्या. जखमी मनाला त्या कुठे शांत करणार होत्या?सर्व भिंतींना सुवासिक फुलांच्या माळा सोडवल्या होत्या,हातात मिठाईचे तबक घेऊन माणसांची लगबग सुरू होती. सगळीकडे  चैतन्य. हीचे मन मात्र उदास होते चेहऱ्यावर उसने हसु आणत होती. मनाला बजावत होती. आता माघार नाही. मी इथं  मेले तरी सांगलीला जाणार नाही सजवलेल्या फुलदाणी प्रमाणे स्वत:ला त्या घरात फुलवत होती. सजवत होती. सजवलेल्या पलंगाकडे जाताना पायांना कंप सुटला. तरी सामोरी गेली. मनात कोणता ही आनंदाचा उमाळा नसताना मनाविरूद्ध नवऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. करत  राहिली. घरच्यांनी ही ती लहान आहे म्हणून सांभाळून घेतले. ती हळूहळू घरात मिसळली. निसर्गाने तिला मातृत्व बहाल केले. ते तिने स्विकारले. ज्या विसाव्या वर्षी    बहरायचे,फुलायचे,जीवनाला नवीन वळण द्यायचे, त्याच विसाव्यावर्षी ही मातृत्वाच्या ओझ्याने वाकून गली. बाळतंपणासाठी ही माहेरी जाणे टाळले तिने. तिला जुन्या आठवणी पुसायच्या होत्या. या दोन वर्षात कधी तर एकदाच बाबा घरी येऊन गेले.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सदमा.. . भाग 2 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ सदमा.. . भाग  2 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

 “शू.. ना. आता झोपली . हळू.. . आई. हळू बोल. परी उठेलती. उठायला नको. “या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. समोरच्या  बाळाला अंगाई म्हणत झोपवत होती. पुन्हा पुन्हा पांघरूण घालत होती. तोंडावरून हात फिरवत होती. तिच्या लेखी त्या खोलीत अजून कोणी नव्हतेच. फक्त ती आणि तिचे बाळ.. .

” दादा आला का?त्याला म्हणाव फाईल काढून ठेव. आज रिपोर्ट दाखवायला जायचं आहे. परीला औषध बदलून देणार आहेत. तो आला की पाठव माझ्याकडे. जा आता. आवाज करू नको. परी उठल्यावर मऊ वरणभात घालते. मला जायला पाहिजे मी आवरते. जा.. . तू.. “

“तुझी सखी.. . दिपा आली आहे. बघ तर खरं. “आई सांगत होती तिचे लक्ष नव्हते. हे रुप पाहून आईचे डोळे पाणावले. वेगळी वेदना दिसली डोळ्यात. काहीच उलगडत नव्हते. न कळत माझ्या ही डोळ्यात पाणी आले. दोघीनी ते लपवले. दरवाजा पुढे करून आम्ही दोघी खाली आलो. नि:शब्द. काय बोलावे सुचत नव्हते. मला हे सहन होत नव्हते. ” हे सगळे असे कसे झाले?”हा माझा मुक प्रश्न काकूनी  ओळखला त्या म्हणाल्या”हे.. असं  दोन महीन्यापासून सुरू आहे बघ. तिची परी तिचे विश्व होते. परी झाली तेव्हा गोरीपान,   गुटगुटीत होती,काळेभोर जावळ,इवलीशी जिवणी, गोड हसायची ,ती गोड परी सारखी दिसायची. तिला ती परी म्हणू लागली. तिच परी सोडून गेली,हे दुःख सहन झाले नाही. मोठा सदमा बसला तिच्या मनावर . फुलपाखरा सारखी घरभर फिरभिरणारी परी एकदम अबोल झाली. तिच्याखुप पोटात दुखे. गडबडा लोळायची. सहा सात वर्षांची लहान पोरं ती. तिचे दुःख बघवायाचे नाही. खुप दवाखाने झाले, खुप उपाय केले पण यश आले नाही. तिचा शेर संपला. ती गेली. विजूचे विश्व हरवले. जगण्याची उमेद संपली. हा धक्का ती पचवू शकली नाही. ती रडलीच नाही. त्या दिवसांपासुन आज पर्यंत परी आहे, हे समजून जगत आहे. पोरीची ही घालमेल बघवत नाही. “

” तुम्ही डाॅक्टरांचा सल्ला घेतला नाही? औषधपाणी केले नाही?”

“फाॅमिली डॉक्टराचे औषध सुरू आहे. खर तर काळ हेच औषध मोठे आहे. होईल बरी. वाट बघायची. “

“माफ करा ‘लहान तोंडी मोठा घास घेते’ मला वाटते तिची ट्रीमेंट चूकीची आहे. तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे दाखवले पाहिजे. ती निश्चित बरी होईल. “

” ती वेडी नाही. तिला वेड लागले नाही. जरा भ्रमात आहे. हळूहळू येईल मार्गावर. लोक काय म्हणतील?”

” तुम्ही कसे ही वागा. लोक काय नेहमी बोलत असतात. त्यांना फक्त निमित्त हवं असतं. काकी तुम्ही झाडे लावता, ती निरोगी रहावीत, चांगली फुलावीत म्हणून त्यांची काळजी घेता,त्यावर जंतूनाशक फवाराता. माणसाच्या मनाचे ही तसेच आहे ते निरोगी रहावे म्हणून हे मानसोपचारतज्ज्ञ उपचार करतात. आपल्या मुलीचे भविष्य महत्त्वाचे. ‘

” मला तर काही सुचत नाही. विजूचे बाबा तर स्वत:ला दोष देत आहेत. एकसारखे ढसाढसा रडतात. माझ्यामूळे वाटोळे झाले पोरींचे म्हणतात. मी तर काय काय बघू? नवऱ्याची समजूत घालू, की लेकीला धीर देवू,का लेकाचे भविष्य सांभाळू?माझे दुःख मला व्यक्त ही करता येत नाही. काय करू मी?”हुंदका फुटला त्यांना. मी  सावरले.

” तिचे मिस्टर.. . त्यांची मदत.. झाली नाही. “

” ते मोठे रामायण आहे. “ती काहाणी सांगते ऐक. सविस्तर कथा सांगितली. ती ऐकूण मी हदरले. आता त्या माऊलीची दया येऊ लागली.

” मी आहे ना? काळजी करु नका. चार दिवसात भेटते. बघू काय करता येते. तुम्ही खंबीर व्हा. येते मी. “

क्रमशः…

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सदमा.. . भाग  1 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ सदमा.. . भाग  1 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

नवीन घराच्या अंगणात मोठ्या हौसेने बाग फुलवली होती. वेगवेगळी फुलझाडे, फळझाडे लावली होती. वेळोवेळी झाडांच्या मूळा जवळची माती सारखी करावी लागे. खत घालावे लागे,एखादं जंतूनाशक फवारावे लागे, ही सारी देखभाल अनुजा करीत असे. आपल मन बागकामात गुंतवून ठेवत असे. आता ही ती अंगणातील झाडांची पिकली पानं काढून टाकण्यात मग्न होती. तेवढ्यात ” काकू.. .. . काय करता ? येवू.. .

का.. . मी?”आवाज ऐकू आला. मागे वळून बघते तर दिपा समोर उभी होती. निळी जिन्स्,त्यावर पिवळा टाॅप,मानेवर रूळणारे मोकळे केस,हसरा चेहरा किती स्मार्ट दिसत होती. अनुजा तिला बघतच राहिली तिच्याकडे आपण बघतोय हे लक्ष्यात येता ती काहीशी ओशाळली. भानावर येत म्हणाली ” ये.. .. ना.. . दिपू.. . ये. फार वर्षांनी आलीस,कुठे आहे पत्ता ? आम्हाला विसरलीस वाटतं?”

” मी कशी विसरेन ? लहानाची मोठी तुमच्याच घरात झाले. मागे एकदा सांगलीत आले होते तेव्हा समजले तुम्ही कुठे दुसरीकडे शिफ्ट झाला आहात. आता मी बेंगळुरूला जाॅब करते. आजच आले,दोन दिवसांत माझी ऐंगेजमेंट आहे. ही बातमी आधी माझ्या सखीला द्यावी,म्हणून धावत इकडे आले. कुठे आहे विजू ? मला भेटायच आहे तिला,आधी तिच्याशी खूप भांडणार आहे. मला सोडून तिने लग्न केले. मी मावशी झाले. हे.. . ही .. .. मला  काही.. . कळवले नाही. मी मात्र तिला सोडून लग्न करणार नाही. “दिपा बोलत होती. अनुजाला दिपाच्या जागी विजू दिसू लागली. किती आत्मविश्वास आहे हिच्या बोलण्यात. क्षणभर तिचा हेवा वाटला. आज माझ्या विजूने ही अशीच उंच भरारी घेतली असती. पण प्रालब्धा पुढे कुणाचे चालते. एक मोठा उसासा सोडत अनुजा म्हणाली ” चल पोरी.. .. चल. भेट तुझ्या सखीला”

सावकाश पावले टाकत त्या घरातील हाॅल मध्ये आल्या, उजव्या बाजू जिन्याने वर गेल्या. दिपा नवीन घर न्याहाळत काकू मागून चालत होती. एका खोली जवळ त्या थांबल्या,त्यांनी हलक्या हातानी  खोलीचे दार उघडले तर दारात काही खेळणी पडली होती. ती बाजूला करून आत गेल्या ” विजू.. . विजू.. . बघ

कोण आलं आहे?बघ .. . बघ. “हु नाही की चू नाही. शांत. शून्यात नजर हरवलेली विजू. स्वत:शी बडबडत होती,काही तरी विचित्र हातवारे करत होती,अंगात एक गाऊन अडकवला होता,त्याची ही तिला शुध्द नव्हती ,ती पुढ्यातील बाळाला झोपवत होती.

ही.. विजू.. . आहे? यावर कसा विश्वास बसणार माझा?माझ्या नजरेसमोर शाळा,काॅलेज मधील चुलबुली विजू उभी राहिली. नेहमी हसतमुख असणारी आणि प्रचंड उत्साही विजू. विजू म्हणजे आनंदाचे गाणं,विजू म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत,विजू म्हणजे साक्षात चैतन्य,विजू म्हणजे एक लोभस रेखीव व्यक्तीमत्व. जे रंगमंचावर उभं राहिलं की आख्खा रंगमंच व्यापून टाकणार. सर्वाच्या गळ्यातील ताईत होती. बारावी पर्यंत आम्ही एकत्रच शिकलो. या पाच सहा वर्षांत असे काय झाले? की होत्याचे नव्हते झाले. मी नाही बघू शकत अशी मी हिला 

क्रमशः…

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन अलक, एक लघुतम कथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ दोन अलक, एक लघुतम कथा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

अलक-1: विवाह 

वधू व्हिडीओ शूटिंग एन्जॉय करत होती. चेहऱ्यावर छान स्माईल आणून वेगवेगळ्या पोजेस देत होती.

पण भटजी मध्येमध्ये डिस्टर्ब करत होते. मग ती तोंड वाकडं करत कसेबसे निधी निभावत होती आणि नंतर पुन्हा हसतमुखाने कॅमेराला सामोरी जात होती.

अलक -2 : मोठी

“आsssजीs”, नातवाच्या हाकेला आपण ‘ओ’ देऊ शकत नाही, त्याला कडेवर घेऊन गोष्टी सांगू शकत नाही, म्हणून बिछान्याला खिळलेल्या वसुमतीच्या डोळयांतून अश्रू ओघळले.

“आजी, आम्ही गेलो होतो ना, तर तिथे छोटा बाबू  होता. त्याला बोलायलाच येत नव्हतं.चालायलापण येत नव्हतं. मावशी म्हणाली -बाळ मोठा झाला, की त्याला बोलायला आणि चालायला येणार. आजी, तूपण मोठी झालीस, की तुला बोलायला आणि चालायला येणार.”

लघुतम कथा : अप्रूप

तशी रोज कमल आल्याआल्या भांडी घासायला सुरुवात करते.

आज मात्र ती शांत उभी राहून मला सांगायला लागली, “अहो ताई, त्या पलीकडच्या रस्त्यावर रात्री खून झाला. पोलीस आलेत तिथे. रस्त्यावर खडूने रेषा मारल्यायत. मला म्हणाले,’मॅडम, रस्ता क्रॉस करा आणि त्या बाजूने जा.’ मग मी रस्ता क्रॉस केला आणि असा वळसा घालून आले.”

ती बोलत असतानाच बचू किचनमध्ये आली होती.मग कमलने पुन्हा पहिल्यापासून सुरुवात केली,”अगं, त्या पलीकडच्या रस्त्यावर खून झाला. पोलिसांनी रस्त्यावर खडूने रेघा काढल्यायत. मला म्हणाले,’मॅडम, रस्ता क्रॉस करा आणि तिकडून जा……’ “

तेवढ्यात ‘हे’ आले. पुन्हा ‘सायेबां’ना सगळा वृत्तांत. मग अनुप आला. त्यालाही तीच स्टोरी.

ती गेल्यावर बचू म्हणाली, “काय रे बाबा तरी!आम्हाला ऐकून ऐकून कंटाळा आला. पण तिचा सांगायचा उत्साह कमी नाही झाला.”

“मुख्य मुद्दा लक्षात आला का तुझ्या?” मी विचारलं.

“इतक्यांदा ऐकल्यावर लक्षात न यायला काय झालं?तिकडे खून झाला. पोलिसांनी हिला रस्ता क्रॉस करून जायला सांगितलं.”

“बघ बचू. नाहीच आलं तुझ्या लक्षात. पोलीस म्हणाला, ‘मॅडम,…..’ आजपर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला कोणीतरी ‘मॅडम’ म्हटलं. मग तिला अप्रूप वाटणारच ना!”

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नावात काय आहे ?….अ.ल.क. – सुश्री कल्याणी पाठक ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

?जीवनरंग ?

☆ नावात काय आहे ?….अ.ल.क. – सुश्री कल्याणी पाठक ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

१ —

“आजकालच्या मुलींचं कसलं बाई फॅड? लग्नानंतरही माहेरचं नाव लावतात ! एकदा लग्न झालं की सासरचीच ओळख हवी मुलीला ! आपली पूर्वापार रीत आहे ती!” आजेसासूबाई सूनेजवळ सांगत होत्या.

“कसली पूर्वापार रीत आजी? ” नातसून बोलली.. “ अगदी जुन्या काळातील स्त्रियादेखील त्यांच्या माहेरच्या नावानं ओळखल्या जायच्या..! महापतिव्रता म्हणून पुजली जाणारी सीता देखील जनकाची जानकी, विदेह राजाची वैदेही अन् मिथिलेची राजकन्या मैथिली म्हणून ओळखली जाते.. कौशल देशाची कौसल्या, कैकेय देशाची कैकेयी, द्रुपद राजाची द्रौपदी, गांधार देशाची गांधारी….. ” 

“हे खरंय हो तुझं..” आजेसासूबाईंनी चूक मान्य केली….. ” पर्वतराजाची कन्या ती पार्वती अन् गिरीकन्या गिरिजा..!” त्या हसत म्हणाल्या.. ” सगळ्याच पतिव्रता.. पण माहेरची ओळख जपली त्यांनी.. आपणही जपायला हवीच !” आजेसासूबाई विचारमग्न झाल्या..

*****

२—

” नाव सांगा !” दवाखान्यात नाव लिहून घेणाऱ्या कर्मचाऱ्यानं घोगऱ्या आवाजात विचारलं.

” नंदिनी जोगळेकर “

विचारणाऱ्याची नजर सांगणारीच्या गळ्याकडे.. भुवया उंचावलेल्या.. चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव अन् पुन्हा तोच खर्जातला आवाज ..” कुमारी लिहू का सौभाग्यवती? “

” काहीच लिहू नकोस.. नुसतं नंदिनी जोगळेकर पुरेसं आहे !”

विचारणारा खांदे उडवत पुन्हा कामाला लागला..

*****

३ —

“आपलं नाव? ” कुठल्याशा गाण्याच्या कार्यक्रमाकरिता गायकांच्या नोंदणीवेळी विचारलं गेलं.

” राधिका आपटे मिरासदार..” 

“आता ह्यातलं सासरचं आडनाव कोणतं अन् माहेरचं कोणतं एवढं सांगून टाका बुवा !” समोरून बेधडक प्रश्न.

” स्पष्टीकरण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ‘राधिका आपटे मिरासदार’ ही माझी ओळख आहे.. दॅट्स इट !”

” काय पण आजकालच्या बायका..!” समोरून बेदरकार  प्रतिक्रिया.

*****

४  —

” नमस्कार, मी मिस्टर सानवी जोगळेकर.. मला जोगळेकर मॅडमला भेटायचंय..” समिहननं रिसेप्शनला विचारलं अन् त्याच्या आजूबाजूला खसखस पिकली.

” अगं हा समिहन मुजुमदार.. जोगळेकर मॅडमचा नवरा.. हादेखील मोठ्या पदावर आहे.. मॅडमइतकाच !” कुणीतरी माहिती पुरवली.

” पण ही काय ओळख सांगायची पद्धत झाली ? बायकोने नवऱ्याच्या नावाने ओळख दिली तर ठीक आहे.. पण हे नवऱ्यानं बायकोच्या नावानं ओळख देणं जरा विचित्र नाही वाटत ?” कुणीतरी कुजबुजलं..

” नाही वाटत..” समिहननंच उत्तर दिलं.. आणि बायको कर्तबगार असेल तर मुळीच नाही वाटत.. उलट अभिमानच वाटतो.. प्राचीन ग्रंथांतूनही दाखले आहेत.. प्रत्यक्ष महादेवांनी स्वतःला उमाकांत म्हणवून घेतलंय.. अन् विष्णूंनी रमाकांत.. रामालाही सीताकांत म्हणून ओळख आहेच की, शिवाय विठोबाला रखुमाईवल्लभ!

सारेच निशब्द !——

लेखिका : सुश्री कल्याणी पाठक

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अतिथी देवो भव…भाग -2 ☆ मेघःशाम सोनवणे ☆

?जीवनरंग ?

☆  अतिथी देवो भव…भाग -2 ☆ मेघःशाम सोनवणे ☆ 

(आज ते बरे झाले तर उद्या सकाळी जाऊन दूध घेऊन येतील‌.” )  इथून पुढे —-

तिचे बोलणे ऐकून वसुभाई स्तब्ध झाले. ` या बाईने हे हॉटेल नसतांनाही आपल्या मुलासाठी राखून ठेवलेल्या दुधाचा चहा बनवला, आणि तोही मी म्हणालो म्हणून,  पाहुण्यासारखे आलो म्हणून. संस्कार आणि 

सभ्यतेमध्ये ही स्त्री माझ्यापेक्षा खूपच पुढे आहे .` 

ते म्हणाले, “आम्ही दोघे डॉक्टर आहोत. तुमचे पती कुठे आहेत?” 

त्या स्त्रीने त्यांना आत नेले; आत नुसते दारिद्र्य पसरले होते. एक गृहस्थ खाटेवर झोपलेले होते, आणि  ते खूप बारीक व अशक्त दिसत होते.

वसुभाईंनी जाऊन त्यांच्या कपाळावर हात ठेवला. कपाळ आणि हात गरम होते आणि थरथर कापत होते. 

वसुभाई परत गाडीकडे गेले; आपली औषधांची पिशवी घेऊन आले; दोन-तीन गोळ्या काढल्या आणि खाऊ घातल्या आणि म्हणाले, ” या गोळ्यांनी त्यांचा आजार बरा होणार नाही. मी परत शहरात जाऊन इंजेक्शन आणि सलाईनची बाटली घेऊन येतो.”

त्यांनी वीणाबेन यांना रुग्णाच्या शेजारी बसण्यास सांगितले. गाडी घेतली, अर्ध्या तासात शहरातून सलाईन, इंजेक्शन आणले आणि सोबत दुधाच्या पिशव्याही आणल्या. रुग्णाला इंजेक्शन दिले, सलाईन लावली आणि सलाईन संपेपर्यंत दोघेही तिथेच बसले. 

पुन्हा एकदा तुळशी, आल्याचा चहा बनला. दोघांनी चहा पिऊन त्याचे कौतुक केले. दोन तासात रुग्णाला थोडं बरं वाटल्यावर दोघेही तिथून पुढे निघाले.

इंदूर-उज्जैनमध्ये तीन दिवस मुक्काम करून ते परत आले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलासाठी अनेक खेळणी आणि दुधाच्या पिशव्या आणल्या होत्या. ते पुन्हा त्या दुकानासमोर थांबले . बाईंना हाक मारल्यावर दोघेही बाहेर आले आणि यांना पाहून त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, ” तुमच्या औषधांमुळे मी दुसऱ्या दिवशीच पूर्ण बरा झालो.”

वसुभाईंनी मुलाला खेळणी दिली.  दुधाची पाकिटे दिली. पुन्हा चहा झाला, संवाद झाला, मैत्री झाली. वसुभाईंनी त्यांचा पत्ता दिला आणि म्हणाले, ” जेव्हा तुम्ही तिकडे याल तेव्हा नक्की भेटा.” आणि तेथून दोघेही आपल्या शहरात परतले. 

शहरात पोहोचल्यावर वसुभाईंना त्या बाईंचे शब्द आठवले. आणि मग त्यांनी निर्णय घेतला.

आपल्या दवाखान्यात स्वागतकक्षात (रिसेप्शनवर) बसलेल्या व्यक्तीला म्हणाले, “आता इथून पुढे जे काही रुग्ण येतील, त्यांची फक्त नावे लिहा, फी घेऊ नका, फी मी स्वतः घेईन.” आणि रुग्ण आले की गरीब रुग्ण असतील तर, त्यांच्याकडून फी घेणे बंद केले. फक्त श्रीमंत रुग्ण पाहून त्यांच्याकडून फी घेतली जायची.

हळूहळू त्यांची ख्याती शहरात पसरली. इतर डॉक्टरांनी ऐकले तेव्हा त्यांना वाटले की यामुळे आमचे दवाखाने ओस पडतील आणि लोक आमचा निषेध करतील. 

त्यांनी संघटनेच्या अध्यक्षांना तसे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. वसुभाईंना भेटायला आले आणि म्हणाले,

“तुम्ही असे का करताय? ” तेव्हा वसुभाईंनी दिलेले उत्तर ऐकून त्यांचेही मन भारावून गेले.

वसुभाई म्हणाले, “माझ्या आयुष्यात प्रत्येक परीक्षेत मी गुणवत्तेत पहिला आलो आहे, MBBS मध्ये सुद्धा सुवर्णपदक मिळवले आहे, MD मध्ये सुद्धा सुवर्णपदक मिळवले आहे . पण सभ्यता, संस्कार आणि पाहुणचारात त्या गावातील अतिशय गरीब असलेल्या त्या बाईने मला मागे टाकले आहे. मग आता मी मागे कसे राहणार? म्हणूनच पाहुण्यांच्या सेवेत आणि मानवसेवेतही मी सुवर्णपदक विजेता ठरावं म्हणूनच मी ही सेवा सुरू केली आहे. आणि मी हे सांगतो की आपला व्यवसाय मानवसेवेचाच आहे. मी सर्व डॉक्टरांना सेवेच्या भावनेने काम करण्याचे आवाहन करतो. गरिबांची मोफत सेवा करा, उपचार करा. हा व्यवसाय पैसे कमावण्यासाठी नाही. देवाने आपल्याला मानवतेची सेवा करण्याची संधी दिली आहे.”

संघटनेच्या अध्यक्षांनी वसुभाईंना नतमस्तक होऊन आभार मानले, व म्हणाले की, ” भविष्यात मीही याच भावनेने वैद्यकीय सेवा करेन.”

– समाप्त – 

(मूळ हिंदी कथा माजी वायुसैनिक श्री. विकास राऊत, पुणे, यांच्या सौजन्याने.) 

मूळ हिंदी लेखक – अनामिक.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अतिथी देवो भव…भाग -1 ☆ मेघःशाम सोनवणे ☆

?जीवनरंग ?

☆  अतिथी देवो भव…भाग -1 ☆ मेघःशाम सोनवणे ☆ 

वसुभाई आणि वीणाबेन गुजरातमधील एका शहरात राहतात. आज दोघेही प्रवासाला निघण्याची तयारी करत होते. तीन दिवसांची सुट्टी होती. ते व्यवसायाने डॉक्टर असल्याने त्यांना जास्त सुट्टी घेता येत नव्हती. पण जेव्हा जेव्हा त्यांना दोन-तीन दिवसांचा अवधी मिळतो तेव्हा ते कुठेतरी छोट्या प्रवासाला जाऊन येतात. आज त्यांचा इंदूर-उज्जैनला जाण्याचा विचार होता. 

दोघेही मेडिकल कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते तेव्हा त्यांच्या प्रेमाला अंकुर फुटला आणि त्याचे रुपांतर वृक्षात झाले. दोघांनीही घरच्यांच्या संमतीने विवाह केला. दोन वर्षे झाली, अजून त्यांना मूलबाळ नाही, त्यामुळे प्रवासाचा आनंद लुटत राहतात.

लग्नानंतर दोघांनी स्वतःचे खाजगी रुग्णालय उघडण्याचा निर्णय घेतला, बँकेकडून कर्ज घेतले. वीणाबेन ‘स्त्रीरोगतज्ज्ञ’ आहेत आणि वसुभाई ‘डॉक्टर ऑफ मेडिसिन’ आहेत. त्यामुळे दोघांच्याही कौशल्यामुळे हॉस्पिटल चांगलेच चालले होते.

ते प्रवासाला निघाले. आकाशात ढग दाटून आले होते. मध्य प्रदेशची सीमा अजून जवळपास २०० किलोमीटर दूर होती; पाऊस पडायला सुरुवात झाली होती.

मध्य प्रदेशच्या सीमेपासून ४० कि. मी. आधी एक छोटं शहर ओलांडायला वेळ लागला. चिखल आणि खूप वाहतूक असल्याने मोठ्या मुश्किलीने रस्ता पार पडला. मध्य प्रदेशात गेल्यानंतर जेवण करण्याचा त्यांचा विचार होता, पण चहाची वेळ झाली होती.

त्या छोट्या शहरापासून ४-५ कि.मी. पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक छोटेसे घर दिसले, ज्याच्या समोर वेफर्सची पाकिटे टांगलेली होती. त्यांना वाटले ते एखादे हॉटेल असावे.

वसुभाईंनी गाडी तिथेच थांबवली, दुकानात गेले. तिथे कोणीच नव्हते. आवाज दिला. आतून एक स्त्री बाहेर आली. तिने विचारले, ” काय पाहिजे भाऊ? “

वसुभाईंनी वेफर्सची दोन पाकिटे घेतली आणि म्हणाले, ” ताई ! दोन कप चहा करा; जरा लवकर करा, आम्हाला दूर जायचं आहे.”   

वेफरची पाकिटं घेऊन ते गाडीकडे आले; दोघांनी पाकिटातील वेफर्सचा नाश्ता केला. अजून चहा आला नव्हता. दोघेही गाडीतून उतरले आणि दुकानात ठेवलेल्या खुर्च्यांवर येऊन बसले. वसुभाईंनी पुन्हा आवाज दिला. 

थोड्या वेळाने आतून ती बाई आली आणि म्हणाली, ” भाऊ ! अंगणातून तुळशीची पाने आणायला थोडा उशीर झाला; आता चहा उकळतोय.”

थोड्या वेळाने तिने ताटात दोन मळक्या कपात गरमागरम चहा आणला. मळकट कप पाहून वसुभाई लगेच अस्वस्थ झाले आणि काहीतरी बोलणार इतक्यात वीणाबेनने त्यांचा हात धरून इशाऱ्याने त्यांना थांबवले. त्यांनी चहाचे कप उचलले; त्यामधून आले आणि तुळस यांचा सुगंध येत होता. 

दोघांनी चहाचा घोट घेतला. इतका स्वादिष्ट आणि सुवासिक चहा त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच प्यायला होता. आता त्यांचा संकोच दूर झाला होता. 

चहा पिऊन झाल्यावर त्यांनी महिलेला विचारले, ” किती पैसे? “

बाई म्हणाल्या, ” वीस रुपये.”

वसुभाईंनी शंभर रुपयांची नोट दिली. ती बाई म्हणाली की ” भाऊ सुट्टे नाहीत , वीस रुपये सुट्टे द्या.”

वसुभाईंनी वीस रुपयांची नोट दिली. महिलेने शंभर रुपयांची नोट परत केली. वसुभाई म्हणाले, ” आम्ही तर वेफर्सची पाकिटेही घेतली आहेत  !”

बाई म्हणाल्या, ” हे पैसे त्याचे आहेत, चहाचे नाही.”

“अहो ! चहाचे पैसे का घेतले नाहीत? “

उत्तर आले, ” आम्ही चहा विकत नाही. हे हॉटेल नाही आहे.”

” मग तुम्ही चहा का केलात? “

” पाहुणे म्हणून घरी आलात ! तूम्ही चहा मागितला. आमच्याकडे दूधही नव्हते. मुलासाठी थोडं दूध ठेवलं होतं, पण तुम्हाला नाही कसं म्हणावं, म्हणून त्या दुधाचा चहा केला.”

“आता मुलाला काय देणार?

“एखाद्या दिवशी जर त्याने दूध प्यायले नाही तर काही बिघडणार नाही. त्याचे वडील आजारी आहेत. ते शहरात जाऊन दूध घेऊन आले असते, पण त्यांना कालपासून खूप ताप आहे. आज ते बरे झाले तर उद्या सकाळी जाऊन दूध घेऊन येतील‌.”

क्रमशः—

(मूळ हिंदी कथा माजी वायुसैनिक श्री. विकास राऊत, पुणे, यांच्या सौजन्याने.) 

मूळ हिंदी लेखक – अनामिक.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाठवणी… (भावानुवाद) – श्री मोहनलाल पटेल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ पाठवणी… (भावानुवाद) – श्री मोहनलाल पटेल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘ऐकलत? ही मूर्ख, पुन्हा परत आली.’  घराच्या परसातून सरला आपल्या पतीला म्हणाली.

एक उंची पुरी धिप्पाड म्हैस आवाराच्या छोट्याशा फाटकापुढे उभी होती. फाटक बंद होतं.

सोहनालालने ती मोतीरामला सहा हजाराला विकली होती. पण ती म्हैस या घराशी इतकी एकरूप झाली होती की आता दुसर्यां दा पळून आली होती. 

रागारागाने सरला म्हणाली, ‘मी तिला आवारात घुसू देईन, तर ना! मी आत्ता तिला मोतीरामच्या घरी घेऊन जाते’ आणि सोहनालाल आवारात येताच ती म्हणाली,   

‘यावेळी तिला असं पळवून लावा की ती आपल्या घराचा रस्ताच विसरली पाहिजे.’

‘असं कसं पळवून लावता येईल?’

‘मग… मग तर ती इथून जाणारच नाही.’

‘तू तिच्या डोळ्यात बघ. किती दयनीय दृष्टीने पाहते आहे. तिच्यासाठी तर हेच तिचं घर आहे. जन्मली, तेव्हापासून इथेच आहे. हे आवार , हे लिंबाचं झाड…’

काय बोलावं, हे सरलाला उमगत नव्हतं. ती काही वेळ म्हशीकडे बघत बसली आणि मग आवाराचं फाटक उघडलं.

म्हैस पळत आपल्या खुंटीपाशी जाऊन उभी राहिली. सोहनालालने तिच्या पाठीवर हात  ठेवला मग म्हणाला, ‘बिचारी भुकेजलेली असेल.’

मोतीराम पुन्हा म्हशीला न्यायला आला, तेव्हा सरला आणि सोहनालाल यांनी एकमेकांकडे पाहिलं. सोहनालाल खोलीतून पैसे घेऊन आला आणि मोतीरामला म्हणाला, ‘हे तुझे पैसे. नीट मोजून घे.’

मोतीरामने पैसे घ्यायला प्रथम नकार दिला, तेव्हा सोहनालाल म्हणाला, ‘ती नाही राहणार तुझ्याकडे. जे झालं, ते झालं. म्हैस घरी आली, आमच्याही जिवाला शांती  मिळतेय.’

थोडी बोलाचाली झाल्यानंतर मोतीराम पैसे घेऊन गेला. तो गेला आणि घरात एकदम शांतता पसरली.

सरला म्हशीच्या पाठीवरून हात फिरवू लागली. नंतर तिला पदराला डोळे पुसताना सोहनालालने पाहिले. त्याच्या मनात आलं, ‘केवळ म्हशीसाठीती असं करणार नाही. तिच्या  मानात आणखी काही तरी आहे. हे सगळं मुलीसाठी तर नाही? ’

तो सरलाजवळ आला, आणि म्हणाला, ‘वेडी, जुन्या गोष्टी आठवून काय उपयोग? आपलंच नशीब फुटकं..’ आणि सरला मोठमोठ्याने रडू लागली. ‘एका जनावराचा विचार करतोय. तितका मुलीसाठी नाही केला. तीन वेळा ती घर सोडून आश्रयासाठी आली होती. पण आपण तिला भीती दाखवून, धमक्या देऊन परत पाठवलं.’   

’ सासरचे लोक मारेकारी झाले. … तिच्या आत्म्याला काय वाटलं असेल?’

मारेकरी आपण आहोत सरला… ‘ सासर घर हेच तिचं घर म्हणत पुन्हा पन्हा तिची पाठवणी केली. तिला घरात घेतलं नाही….’

मग गप्प बसून दोघेही बराच वेळ म्हशीची पाठ कुरवाळत राहिले.

मूळ गुजराती कथा – ‘विदाई’  मूळ लेखक – श्री मोहनलाल पटेल   

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares