मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया… भाग – ३ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ संध्याछाया… भाग – ३  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(सुधा म्हणाली,’तुमचं बरोबरच आहे,पण हे यांना नको का पटायला? मी सांगून थकून गेले.तुम्ही आणि ते बघा काय ते ! मी तुमच्या कोणत्याही भानगडीत पडणार नाही.” सविता जरा रागावलीच आणि निघून गेली )  इथून पुढे —

पुढच्या महिन्यात पुन्हा मंदार आणि फॅमिली विश्वासकडे रहायला आले. त्याचा छोटा,सात वर्षाचा मुलगा, विश्वासशी खेळताना म्हणाला, “माझे  खरे आजोबा देवाघरी गेलेत. तुम्ही नाही काही माझे खरे आजोबा ! तुम्ही तर काका आजोबा आहात.  बाबा म्हणत होते, वाडा विकला की तुम्ही दोघेहीआश्रमात राहाल. आश्रम म्हणजे काय हो आजोबा? ” …  त्या निरागस मुलाच्या तोंडून हे ऐकताना विश्वासच्या मनात चर्रर्र झाले. आपल्या मागे हे लोक काय बोलतात आणि  काय ठरवतात हे त्याला एक क्षणात समजले. सुधा कळवळून सांगत होती, ते त्याला आठवले. ती म्हणत होती, “अहो, आपलं ताट द्यावं पण आपला बसायचा पाट देऊ नये माणसाने ! हल्ली कोणाचा भरवसा देता येतो का ? आत्ताच नका देऊन टाकू मंदारला सगळं. आपण गेल्यावर मग करतील त्यांना हवं ते. असलं कसलं मृत्युपत्र करताय? म्हणे ‘ मी गेलो तर सुधाला मंदारने सांभाळावे. किंवा ती गेली तर मला मंदारने शेवटपर्यंत संभाळावे. म्हणजे मी सर्व माझे जे आहे ते त्यालाच आत्ताच देऊन टाकतो. नशीबच, मी जॉईंट विलवर सही केली नाहीये म्हणून ते अजून तरी तसंच राहिलंय.” …. 

…. विश्वासला हे सगळं आठवलं. वडील गेल्यावर या मुलावर आपण जिवापलीकडे प्रेम केलं, त्याला अडी अडचणीला पैसे दिले, आधार दिला. पण तो मात्र  लांब लांबच राहिला कायम. आत्ता तो लहान मुलगा बोलला म्हणून  निदान आपल्याला समजलं तरी की हे लोक आपल्याबद्दल काय विचार करत आहेत ते. कोणी  कुणाचं नाही हेच खरं.  विश्वासला अतिशय वाईट वाटलं. असा कसा आंधळा विश्वास टाकला 

आपण ?  पण देवानेच डोळे उघडले म्हणायचे, आणि नियतीच बोलली त्या लहान मुलाच्या तोंडून ! याही गोष्टीला  सात आठ वर्षं होऊन गेली. विश्वास सुधा.. दोघांची सत्तरी उलटली.  वाडा अजूनही विकला नव्हताच विश्वासने. मंदार येईनासाच झाला होता आताशा या वाडा प्रकरणामुळे. आता मात्र सत्याचा आरसा लखलखीत समोर आला विश्वासच्या ! सुधा सांगत होती ते बरोबर होते, हे लक्षात आले त्याच्या. दोघेही थकत चालले आता. साधं डॉक्टरकडं जायचं म्हटलं तरी त्यांना आता बळ उरलं नाही. सुधा जास्त थकत चालली. गेल्या वर्षभरात मंदार, त्याची आई कोणीच फिरकले नव्हते.

सुधाला हळूहळू पार्किन्सनने घेरले. तिचा तिच्या हालचालींवर  ताबा उरला नाही.जरा जरी कसलाही ताण आला की तिचे हातपाय अनैच्छिकरीत्या हलू लागत, हातातून भांडी पडत. चालताना तिचा तोल जाई, हातपाय थरथर कापत. मान लटलटा हलू लागे. तिला रोजचे व्यवहार करणे जड जाऊ लागले… आणि तिची देखभाल करणे विश्वासला झेपेनासे झाले. आता मात्र त्याने कोणालाही न विचारता एका सज्जन बिल्डरला आपला अर्धा भाग विकून टाकला.  बिल्डर म्हणाला, “ काका, तुम्ही आता त्या पुतण्याच्या अर्ध्या भागाचा विचार करू नका. तुमचे आयुष्य नीट सुखात जाईल हे बघायचं आता. तुमच्या मित्राचाच मुलगा आहे मी, कोणतीही अडचण आली तर मला हाक मारा. मी नक्की येईन. “ जगात माणुसकी आहे याचा विश्वासला पुन्हा एकदा प्रत्ययआला, आणि आपलीच  माणसं आपली नसतात, याचा अनुभवही ! त्या बिल्डरनेच विश्वासला ‘अथश्री ‘ मध्ये चांगला फ्लॅट घेऊन दिला, वर भरपूर पैसे दिले.या दोघांना स्वतःच्या गाडीतून बँकेत नेले आणि ती रक्कम गुंतवून टाकली. त्याचे  दरमहा व्याज यांच्या खात्यात जमा होईल, अशीही व्यवस्था केली. विश्वास आणि सुधा दोघेही अथश्रीत रहायला आले. सुधाची मैत्रीणही अथश्रीत आधीच आली होती. दोघींचा वेळ अगदी छान जायला लागला. रोज उठून  नाश्ता काय करू, स्वयंपाक काय करायचा  ही सगळीच कटकट संपली. विश्वासला समवयस्क नवीन मित्र मिळाले. गप्पा, टेनिस ,ब्रिज खेळणे, हे त्याला आता मनासारखे शक्य होऊ लागले.  सुधाची तब्येतही जरा सुधारू लागली. दर आठ दिवसांनी डॉक्टर येत, औषधं देत. 

दरम्यान एक दिवस, मंदार, त्याची आई, आणि बायको अचानक विश्वास-सुधाला भेटायला आले. सुधा विश्वासने  शांतपणे त्यांचे स्वागत केले. मंदार आणि सविता तणतणत म्हणाले, “छानच केलात हो भावजी व्यवहार ! आम्हाला पत्ता सुद्धा लागू दिला नाहीत. आता त्या बिल्डरने सगळा एफ एस आय वापरल्यावर आम्हाला कमीच येणार किंमत. विचारायचं तरी मंदारला.” विश्वास काहीही बोलला नाही. सुधाही गप्पच होती. सविता म्हणाली, ” इकडे येऊन रहाण्यापेक्षा, मंदारजवळ फ्लॅट घ्या म्हणत होतो ना आम्ही? नसते का मंदारने बघितले तुम्हाला म्हातारपणी? एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विचारावेसे नाही का वाटले हो? आम्ही काय टाकून देणार होतो का  तुम्हाला.. ” 

आता मात्र विश्वास उसळून म्हणाला , “ हे सगळं कशाला बोलतेस सविता? सगळं समजलंय आम्हाला.  सगळे पैसे स्वतः हयात असतानाच तुझ्या मुलाला देण्याचा मूर्खपणा करणार होतो मी…  आंधळ्या माये पोटी .. माझा भाऊ अकाली गेला म्हणून बापाची माया देऊ केली मी तुझ्या मुलाला, पण किंमत नाही तुम्हा कोणालाच ! देवानेच शहाणपण दिलं मला. तुम्ही माझेच पैसे घेऊन आम्हालाच वृद्धाश्रमाची वाट दाखवण्याआधीच आम्ही सन्मानाने इकडे आलो ते उत्तमच..  नाही का? आपोआप गोष्टी कानावर पडल्या, म्हणून निदान हा निर्णय तरी घेता आला आम्हाला. आता मला कशाचीच खंत खेद वाटत नाही. इथले लोक चांगले आहेत. कोणाच्या दयेवर,आभार उपकारावर आम्ही जगत नाही, हे किती छान आहे. राहता राहिला वाड्याचा प्रश्न ! तुम्ही त्याचे काहीही करा. मला योग्य वाटले ते मी केले.” विश्वास पाठ  फिरवून आत निघून गेला. आणखी बोलण्यासारखे काहीच राहिले नव्हते आता. 

आठ दिवसांनी सुधा विश्वासने वकिलांना बोलावले. सर्व कॅश पैसे ,त्यांनी विचारपूर्वक, ब्लाइंड स्कूल, अनाथाश्रम,  मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, अशा ठिकाणी  आपल्या मृत्यूपश्चात दान देऊन टाकावे असे लिहिले.  मायेपोटी, सुधाने  दागिने मात्र मंदारला द्यायचे लिहून ठेवले, तेवढेच.

वकिलांनाच त्यांनी कुलमुखत्यार नेमले आणि आपल्या पश्चात ते दिलेला शब्द पाळतील, आपल्या इच्छा पूर्ण करतील याची  खात्री होती विश्वासला. आपल्या आई वडिलांच्या नावे, विश्वासने वाचनालये, गरीब विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी ठेवी, अशीही तरतूद केली.

आता मात्र, त्याला कसलीही हळहळ,अपेक्षा, आणि कसल्याच इच्छा उरल्या नव्हत्या. शांतपणे उरलेले आयुष्य आनंदात जगायचे ठरवल्यावर मागचे पाश त्यांनी सोडवून टाकले. ‘ आता हे विसाव्याचे क्षण, आपण निवांत उपभोगूया ‘ असे म्हणत विश्वास सुधा उरलेले आयुष्य शांत आणि निवांतपणे घालवू लागले.

– समाप्त –

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ संध्याछाया… भाग – २  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(विश्वासला मात्र मंदारची अतिशय मनापासून ओढ आणि माया होतीच.त्यांना तो प्रेमाने आपल्या घरी रहायला बोलावी, बाहेरून चांगले पदार्थ मागवी, त्यांच्या लहान मुलांशी खेळण्यात रमून जाई.)  इथून पुढे —–

मंदार या काकाला जास्त attached होता त्यातल्या त्यात. त्याची आई सविताही बऱ्यापैकी संबंध ठेवून होती सुधाशी. सुधाचं त्यातल्या त्यात सविताशी पटायचं. माहेरची माणसं, बहिणी, अशा सगळ्यांशी सुधाचं नाहीच पटायचं. त्यामुळे घरी सतत ‘ तू तिथे मी ! ‘ तिला  नवऱ्याशिवाय दुसरं  विश्वच नव्हतं. तिने कधी आपला ग्रुप,  पुस्तक कट्टा असं काही कधी निर्माणच नाही केलं. विश्वासने कितीतरी  प्रयत्न केले, पण ही सतत दुर्मुखलेलीच राहिली. 

त्यादिवशी  मंदार आणि त्याचे कुटुंब सुधाकडे राहायला आले. त्यांच्या लहान मुलाने विश्वासला खूप दमवले, आजोबा मला स्कूटरवरून राईड मारून आणा,  बॉल  खेळा, आपण शिवाशिवी खेळूया, म्हणत, मुलगा पळत सुटे आणि त्याच्या मागे धावून,  विश्वास अगदी दमून गेला . कितीही उसने अवसान आणले तरी वय बोलतेच ना.  मंदारही मुलाला रागावला नाही की “ अरे, किती त्रास देतोस आजोबांना. किती चढ उतार करायला लावतोस जिन्यावरून रे !”

शेवटी सुधाच म्हणाली, “ अहो, शांत बसा बघू. आता अजिबात धावू नका त्या पोराबरोबर. काय चाललंय तुमचं?आजारी का पडायचंय?”  लाडावलेली ती मुलं बघून सुधाला अतिशय राग यायचा.पण विश्वाससमोर तिचं काही चालायचं नाही.  विश्वासचं आंधळं  प्रेम होतं या लोकांवर. आपल्याला काही झालं तर हे लोक नक्की धावून येतील याची खात्रीच होती त्याला. पण सुधा ओळखून होती यांना. विश्वासने मृत्युपत्र केले आणि त्यात आपली सर्व मालमत्ता मंदारच्या नावे केली.  पण अजून सुधाने सही नव्हती केली म्हणून ते तसेच रखडले होते..दुसरं होतंच कोण त्याला?  त्या दिवशी असंच झालं. सुधा पाय घसरून अंगणात पडली.  विश्वासने मंदारला फोन केला. मंदार लगेच आला, डॉक्टरला बोलावलं. नशिबाने सुधाला कुठे फ्रॅक्चर झाले नव्हते. 

 मंदारने जुजबीऔषधपाण्याची सोय केली आणि तो निघून गेला. पुन्हा घरी हे दोघेच  म्हातारे उरले. विश्वासला फार वाटले, मंदार आपल्याला घरी रहायला बोलावेल, चार दिवस या म्हणेल. पण तसे झाले नाही. सुधाच आडवी झाल्याने घरची उठबस करून विश्वास थकून गेला. ही तर नुसती झलक होती. पुढे काय?  यांच्या घरी असं कायम रहायला येणारं कोणीही शक्यच नव्हतं आणि मंदारचीच आई त्याच्या घरी असल्याने याना तो बोलावणेही अशक्य होतं. सुधा बरी झाली आणि हळूहळू घरातल्या घरात हिंडूफिरु लागली, कामं करू लागली. विश्वासच्या मानाने सुधा प्रॅक्टिकल होती. तिला कोण कसे आहे हे बरोबर समजत होते. पण लग्न झाल्या दिवसापासून तिला समजून चुकले होते, विश्वास अतिशय हेकट आहे. तो दुसऱ्याच्या मताला अजिबात किंमत देत नाही. मी म्हणेन तेच खरे. सुधाला याचा त्रास होई पण इलाजच नव्हता. रोज उठून वाद घालण्यापेक्षा ती गप्प बसणे पसंत करी. कितीही अवसान आणले, तरी आता संध्याछाया भेडसावू लागल्या होत्याच.  एकेक करत सगळी म्हातारी माणसे कालवश झाली आणि आपणसुद्धा उताराला लागलो, हे सत्य कटू तर होतेच, आणि पचवायला तर फार अवघड होतेच.

सुधाची  मैत्रीण एकदा सुधाकडे आली होती तेव्हा म्हणाली, ” सुधा, कशाला वाईट वाटून घेतेस मूल नाही म्हणून. मला आहेत दोन मुलं ! उपयोग आहे का काही? दोघेही गेलेत अमेरिकेला निघून. मीही एकटीच नाही का रहात घरात? होईल ते होईल. नशिबानं भरपूर पैसा आहे, म्हणून निदान त्यांच्यावर अवलंबून तरी नाही मी ! येते जाऊन वर्षातून एकदा तिकडे, पण मला तिकडे मुळीच आवडत नाही ग कायम रहायला. आपला भारत खरंच महान ! मला तरी कोण आहे ग इथं? मी तर ‘अथश्री’मध्ये फ्लॅट घेऊन ठेवलाय. सध्या दिलाय भाड्याने. मला होईनासं झालं की मी तिकडे जाऊन रहाणार. छान आहे सगळं तिथे.  कसलीही काळजी नाही. पैसे द्या, की सगळ्या सुखसोयी आहेतच. कोणाचे आभार उपकार नकोत.” सुधाच्या मनात हाही विचार घर करून राहिला. कोण कोणाचे नसते हल्ली. पुतण्यावर फार भरवसा आहे विश्वासचा, पण एवढी मी आजारी होते, तर म्हणाला का,या विश्रांतीला? आपल्यालाही ही सोय हळूहळू बघावी लागणार. अगदी घरी बायका ठेवल्या तरी आपल्याला दिवसेंदिवस घर सांभाळणे अवघडच जाणार हे कळून चुकले होते सुधाला ! आता फक्त विश्वासला हे कधी समजणार, याची वाट बघणे तिच्या हातात उरले होते.

त्या दिवशी मंदार असाच विश्वासकडे आला. इकडचं  तिकडचं बोलून झाल्यावर म्हणाला, ” काका, आपण वाडा विकून टाकूया. मला आता पैशाची गरज आहे फार. तुम्ही तरी अशा जुनाट वाड्यात का राहाताय? वाड्याचे दोन्ही भाग एकदम विकले तर किंमत चांगली येतेय ! आपल्याला फ्लॅट्स आणि वर पैसेही मिळतील. किती दिवस असे भावनिक गुंतवणूक करून, माझ्या आईवडिलांची वास्तू आहे ही, असं म्हणत रहाणार? मनावर घ्या आता. जुनी झाली ती वास्तू आणि त्या भावनाही !  मला  आत्ता खरंच गरज आहे पैशाची. बाबा अकाली अचानक गेले,आणि काहीच शिल्लक नव्हती त्यांची. मला आता खूप खर्च आहेत पुढे. मुलांच्या फियाच लाखाच्या घरात असतात हल्ली. तुम्हाला काय कल्पना येणार? बघा विचार करा.” मंदार निघून गेला. विश्वासला हा पहिला झटका होता. सुधा शांतपणे हे ऐकत होती.

नंतर पुढच्या आठवड्यात सविता आली. “वहिनी, काय ठरलं भावजींचं? विकायला आहेत का तयार? बस झालं आता इमोशनली  गुंतून पडणे हो ! किती दुरुस्त्या निघत आहेत वाड्याच्या. नका राहू भुतासारखे इथं दोघेच्या दोघे. मंदार म्हणतो तसं आपण वाडा विकून टाकू आणि तुम्ही आमच्याजवळच एखादा फ्लॅट घ्या. म्हणजे  मंदारलाही बरे पडेल तुमची देखभाल करायला. सारखा कसा येणार तो तरी इतक्या लांबून !”  सुधा म्हणाली, ‘तुमचं बरोबरच आहे, पण हे यांना नको का पटायला? मी सांगून थकून गेले. तुम्ही आणि ते बघा काय ते ! मी तुमच्या कोणत्याही भानगडीत पडणार नाही.” सविता जरा रागावलीच आणि निघून गेली.. 

– क्रमशः भाग दुसरा. 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ संध्याछाया… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

कोणता तरी अगदी फालतू सिनेमा  टीव्हीवर लागला होता. निरर्थकपणे चॅनल बदलताना  सुधाचं लक्ष कशातच नव्हतं. उगीचच चाळा म्हणून ती  रिमोटची बटणे दाबत होती. मनात दुसरेच विचार घोळत होते..आज चार वाजता तिचा पुतण्या, त्याची बायको मुलं सगळे रहायला  येणार होते चार दिवस. सुधाला हल्ली हे सगळे नकोसे वाटायचे. 

तो लहान मुलांचा दंगा, तो पसारा, ते लोक गेले की आवरताना जीव  दमून जायचा तिचा.  पुन्हा जास्त स्वयंपाक, काही गोष्टी बाहेरून आणा, गोडधोड करा ! त्यात मदत कोणाचीही नाही,आणि येणारी मंदारची बायको तर आळशी आणि काहीच कामाची नाही !

आताशा सुधाला  ही उठबस होतच नसे. पण विश्वासला हे लोक येणार म्हटले की अगदी उत्साह यायचा आणि न झेपणारी शंभर कामे तो करायला धावायचा.. सुधाला हे अजिबात  पसंत  पडायचे नाही. आधीच एक तर ती संथ,थंड, होती. तिला उरक म्हणून नव्हता आणि मूलच न झाल्याने संसारात त्यासाठी कुठलीच तडजोड तिला कधी करावीच नाही लागली. तिचा नवरा  विश्वास आणि दीर विकास, दोघेच भाऊ. विकास आणि विश्वास मध्ये वयाचे अंतर खूप होते. सासूबाईंना खूप उशिरा झाला विकास– त्यांची अगदी चाळीशी उलटून गेल्यावर.  त्यामुळे कदाचित, त्यांचे विकासवर जास्तच प्रेम. विकास आणि त्याची बायको सविता मात्र आईजवळ राहिले कायम, ती असेपर्यंत ! सुधाचं सासूबाईंशी कधी  पटलं नाही आणि ती वेगळी राहू लागली. सासूबाईंचा रागच होता जरा सुधावर !  सविता मात्र सासूबाईंशी पटवून घेई. ती लाडकी होतीच सासूबाईंची !लाडक्या लेकाची बायको म्हणून !  विकासचं आईवर अतिशय प्रेम होतं आणि तो कधीही वेगळा राहिला नसता, म्हणूनही असेल कदाचित !

सुधाने मूल होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कोणातच दोष नसूनही तिला कधी दिवस गेलेच नाहीत. त्यामुळे तिचा आधीच घुमा,आतल्या गाठीचा असलेला स्वभाव आणखीच कडवट झाला. सुरवातीची सगळी हौस अशीच विरून गेली. तरीही विश्वास चांगल्या पोस्टवर होता, म्हणून ते दोघे अनेक परदेश प्रवास करून, खूप जग हिंडून आले होते. तेही विश्वासचीच हौस म्हणून ! सुधाला ती तरी कुठे हौस होती? परत आल्यावर  कोणी विचारलं असतं ना, तर आपण काय बघितलं हेही तिला नसतं सांगता आलं ! केवळ विश्वासचा आग्रह म्हणूनच तिने ते परदेश प्रवासही केले, तेही निरुत्साहानं ! सुधाचा एकूणच निरुत्साही   चेहरा, कशातच नसलेला उत्साह, तिला माणसे  जमवायला मारक ठरे. तिला मैत्रिणीही फार नव्हत्या आणि हिने कधी बाहेर पडून, चार लोकांत मिसळून, नोकरीही केली नाही.  वडिलोपार्जित वाडा होता,

त्याचा अर्धा भाग विश्वासला, अर्धा भाग विकासला अशी वाटणी आईवडील असतानाच झाली होती. आपल्या वाट्याला आलेल्या भागात विश्वासने दोन मजले बांधले होते, त्यालाही झाली तीस पस्तीस वर्ष. कोणासाठी आता परत नवीन बांधायचे आणि ठेवायचे? बिल्डर यायचे,त्यांना विश्वास परतवून लावायचा !.त्या जुन्या गढी सारख्या एकाकी, उदास घरात आणखीच  खिन्न वाटायचे, संध्याकाळ झाली की.  

विकासची बायको सविता, मुलगा  वागायला ठीक ठीक  होते. मुलगा मंदार  इंजिनीअर झाला आणि त्याने लग्नही केले. अचानक एक दिवस, मुंबईहून कारने परत येत असताना विकासला ऍक्सिडेंट झाला आणि विकास जागच्याजागी गेलाच. तरुण, फक्त पन्नाशीच उलटलेला मुलगा असा अचानक गेलेला बघून, आईवडिलांनी हायच खाल्ली. विकासचा मुलगा मंदार नुकताच  नोकरीला लागला होता. त्याची बायको गृहिणी आणि आईही घरातच असायची . वडिलांनी  काही फार पैसे मागे ठेवले नव्हते . या जुन्या वाड्यात रहायला नको म्हणून विकास केव्हाच बाहेर फ्लॅट घेऊन रहात होता तेवढीच काय ती त्याची कमाई. सगळा भार मंदारच्या खांद्यावर येऊन पडला. मंदार फारसा कर्तबगार तर नव्हताच. त्याची नोकरीही बेताची, बायकोही अगदी सामान्य कुटुंबातली आणि साधी बीकॉम, आणि कसलीही जिद्द नसलेलीच ! आजपर्यंत आई वडिलांनी  मंदारला एकुलता एक म्हणूनच वाढवले, जमेल तितके कौतुक केले, माफक लाड पुरवले इतकेच. कसाबसा डिप्लोमा करून त्याला जॉब मिळाला इतकंच. सगळ्या बाजूने अशी संकटे आली असताना, त्याचा विश्वासकाका नेहमी त्याच्या पाठीशी उभा असायचा. पण मंदार कधीही मोकळेपणाने त्याच्याशी बोलला नाही, की कधी त्याला सल्ले विचारले नाहीत त्याने. त्याचा वाड्यातील भागही तसाच ठेवला त्याने. त्याला तो विकताही येईना. असा अर्धाच भाग बिल्डर कसे घेणार? ते म्हणत, सम्पूर्ण वाडा द्या म्हणजे आम्हाला नीट बांधता येईल, तुम्हालाही आम्ही फ्लॅट्स, वर पैसेही देऊ. पण विश्वास त्याला कधीही  तयार नव्हता. त्याला हे  मान्यच नसायचे. त्या जुन्या, कोणीही नसलेल्या वाड्यात दोघेच नवरा बायको रहाताना बघून लोकांना आश्चर्यच वाटे. आणखी आणखीच तो वाडा जुनाट होत चालला. विश्वासचं मात्र मंदारवर निरपेक्ष प्रेम होतं. तो त्यांच्या घरी राहायला जायचा, त्यांना बोलावायचा. विश्वासची नोकरी चांगली होती,आणि काटकसरीची  राहणी असल्याने विश्वास पैसे बाळगून होता.  पुन्हा मुलं बाळं नसल्याने खर्च तरी कुठे होते? निरनिराळे छंद, वाचन, यात विश्वास स्वतःला रमवत असे. सुधाला कधी तेही जमले नाही.   सतत  घरात बसून बसून एकलकोंडी झाली होती सुधा. शिवाय  मूल नसल्याचे शल्य कायम होतेच. लोक काय म्हणतील, या भीतीने ती कधी कोणाच्या डोहाळजेवण,  बारसं अशा साध्यासुध्या समारंभालाही जायची नाही. कधी गावी माहेरी गेली, तर भाऊ भावजय म्हणत , “ ताई, कशा राहता बाई त्या गढी सारख्या वाड्यात तुम्ही? रात्री भीति नाही का हो वाटत? किती एकाकी आणि जुनं घर झालंय ते. भावजीना म्हण की, टाका विकून आणि बिल्डर देत असेल तर छान फ्लॅट तरी घ्या ! काय ताई ! बरोबरच्या लोकांची घरं बघ आणि तुमचा किल्ला बघ.जुना पुराणा ! “

सुधा भावाला म्हणाली, “अरे मी सांगून थकले बाबा. माझ्या नशिबी हेच जुनाट घर दिसतंय कायम. जाऊ दे ना. मग आमच्यात भांडणे  होतात आणि पुन्हा त्यातून निष्पन्न काहीही होत नाही. इथेच होणार आमचा शेवट. मला तर त्यात काही नवीन आणावं, कधी हौसेने सजवावे असं सुद्धा वाटत नाही. किती केलं तरी जुनाट ते जुनाटच. आणि नंतर तरी कोणाला द्यायचंय ते? जाऊ दे ना ! आप मेला जग बुडाला.”  विश्वासला मात्र मंदारची अतिशय मनापासून ओढ आणि माया होतीच. त्यांना तो प्रेमाने आपल्या घरी रहायला बोलावी, बाहेरून चांगले पदार्थ मागवी, त्यांच्या लहान मुलांशी खेळण्यात रमून जाई.

–क्रमशः भाग पहिला

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सावित्री ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ सावित्री ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सकाळी दहा-साडेदहा वेळ होती माधवजी डोळे मिटून आरामखुर्चीत बसले होते.

पत्नीच्या वियोगाचं दुःख त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवत होतं.  माधवजींची मुलगी निशा आणि मुलगा मुकेश, बाजूलाच सोफ्यावर बसले होते.

नयनाबेनचं दहा दिवसांपूर्वीच निधन झालं होतं . ते कळल्यावर निशा आणि मुकेश दोघेही परदेशातून इकडे आले होते. पण आता त्यांना परतायचे वेध लागले होते. अचानक यावं लागल्याने ते एकेकटेच आले होते. त्यांचे कुटुंबीय तिकडेच होते.

नयनाबेन गेली चार वर्षे अंथरुणालाच खिळून होत्या. पॅरॅलिसिसमुळे त्यांच्या शरीराचा डावा भाग लुळा पडला होता. एका नातेवाईकाच्या लग्नाला जात असताना वऱ्हाडाच्या बसला अपघात झाला, नयनाबेनच्या मेंदूला मार बसला आणि हे अपंगत्व आलं. पण त्यावेळी दोन्ही मुलं काही येऊ शकली नव्हती अथवा नंतरही फिरकली नव्हती. फोनवरून कधीमधी बोलणं, चौकशी व्हायची फक्त.

माधवजींचं नयनाबेनवर मनापासून प्रेम होतं. तिच्या उपचारात त्यांनी कोणतीही हयगय केली नाही. तिच्या सेवेसाठी चोवीस तास बाई–वासंतीला ठेवलं होतं, तरी ते स्वतः देखील शक्य होईल ते तिच्यासाठी प्रेमानं करत होते. आपल्या ‘नयन ज्वेलर्स’ मध्ये जाण्याआधी, रोजचा चहा- नाश्ता, ते नयनाबेनच्या रूममध्येच घ्यायचे, तिच्याशी बोलत. सुदैवाने नयनाबेनच्या बोलण्यावर या आजाराचा फारसा परिणाम झाला नव्हता. बोलताना किंचित अडखळायला व्हायचं, एवढंच!

बहुतेक सगळे सगे-सोयरे येऊन भेटून गेले होते. त्यामुळे घरात आता वर्दळ नव्हती. दहा दिवस सुतक पाळण्याव्यतिरिक्त, कोणतंही कर्मकांड करण्याची रूढी माधवजींच्या समाजात नव्हतीच.

देशमुख वकिलांना  आलेलं  बघून मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. पण माधवजींना काही आश्चर्य वाटलं नाही, कारण ते त्यांचे जवळचे मित्र होते आणि दोन्ही कुटुंबांचा चांगला घरोबाही होता. ते मुकेशनं पुढे केलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले आणि त्यांनी आपल्या येण्याचं कारण सांगताच, मुलांइतकेच माधवजीही चकित झाले. नयनाबेननी मृत्युपत्र केलं होतं, आणि मुलांच्यासमोरच त्याचं वाचन व्हावं,यासाठी देशमुख वकील मुद्दाम आले होते. त्यांनी वासंतीलाही तिथे येऊन बसायला सांगितलं, तेव्हा वासंतीसकट सगळेच बुचकळ्यात पडले. पण देशमुख वकिलांचा मान राखून, ती तिथेच पण जरा दूर खुर्ची ओढून बसली.

देशमुख वकिलांनी बॅगेतून एक सीलबंद पाकीट बाहेर काढून सर्वांसमक्ष उघडले आणि वाचायला सुरुवात केली….

‘ मी गेल्या चार वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहे. माधवजींनी माझ्या उपचारात कोणतीच कसूर केली नाही. स्वतःही प्रेमाने माझी सेवा केली, म्हणूनच कदाचित मी इतके दिवस जिवंत राहिले. पण माझं आयुष्य संपत आलंय असं मला आतून जाणवतंय. माझ्या परिस्थितीत काहीच सुधारणा होत नाहीये. अश्या परावलंबी जिण्याचा खरं तर मला कंटाळाही आला आहे. पण माधवजींची प्रेम आणि वासंतीनं मनापासून केलेली सेवा मला जगायला लावते आहे.  या जगाचा निरोप घेण्याआधी मला माझ्या मनातलं काही सांगायचं आहे.

साधारण तीन वर्षांपूर्वी वासंती आमच्याकडे आली. आमच्या शेजाऱ्यांच्या कामवालीच्या दूरच्या नात्यातली. साताऱ्याजवळ तिचं गाव.

तिला जवळचं कोणी नातेवाईक नाही, म्हणून ती पोटापाण्याचा उद्योग शोधायला इकडे आली. तशी दहावीपर्यंत शिकलेली. आम्हाला चोवीस तास रहाणारी बाई हवीच होती. म्हणून हिला ठेवून घेतलं.

वासंती अगदी प्रेमानं माझं सगळं करायची. शिवाय घरातली इतर कामंही ती स्वतःहून करते. ती खरंतर अबोलच, पण सतत बरोबर राहिल्याने माझ्याशी बोलू लागली. तिची कहाणी ऐकून मी तर सर्दच झाले.

तिचे वडील ती सातवीत असतानाच गेले. साप चावल्याचं निमित्त झालं आणि खेड्यात उपचार वेळेवर मिळू शकले नाहीत. घरची थोडीफार शेती पोटापाण्यापुरती. एकच भाऊ पाचेक वर्षांनी मोठा. तो  शेती बघू लागला आणि आई घर सांभाळायची. हिची दहावीची परीक्षा झाली आणि एकाच मांडवात भाऊ आणि बहिणीचं लग्न उरकण्यात आलं.

वासंतीचा नवरा पण दहावीपर्यंत शिकलेला, घरची शेती आणि भाजीचा मळा होता. आई-वडील आणि ही दोघं असं छोटसं कुटुंब.. खाऊन-पिऊन सुखी. मोठी बहिण लग्न होऊन सासरी साताऱ्यात राहात होती. वासंतीचा नवरा मोटरसायकल घेऊन साताऱ्याला बाजारात जायचा. कधी भाजीचं बियाणं, खतं आणायला, कधी भाजीचे पैसे आणायला. मळ्यातली भाजी रोज साताऱ्याला टेंपोने पाठवली जायची.

आणि एक दिवस बाजारातून घरी येताना, त्याला ट्रकनी उडवलं. बाईकचाही चक्काचूर झाला आणि तो जागीच…

जेमतेम सहा महिने झाले होते लग्नाला. दिवसकार्य झाल्यावर रीत म्हणून भाऊ वासंतीला माहेरी घेऊन आला. आईसोबत, भावजयीनंही तिचं दुःख समजून महिनाभर सगळी खातिर केली. महिनाभरानंतर भाऊ तिला सासरी पोचवायला गेला, तर सासरच्यांनी तिला पांढऱ्या पायाची, अवलक्षणी म्हणून घरात घ्यायचंच नाकारलं.’ आमचा सोन्यासारखा मुलगा गेला आता आमचा हिचा काही संबंध नाही.’

ही भावासोबत परत आली. वर्ष होऊन गेलं तसं भावाने हिचं दुसरं लग्न करून देण्याचा प्रयत्न केला. पण आधीची हकीकत कळली की नकार यायचा. हिचा पायगुण वाईट म्हणून.

अश्या बाबतीत लोकं मागासलेलेच! नणंद कायमचीच इथं राहणार ,या विचारानं भावजयीचं वागणंही बदललं. घरातलं सगळं काम तर वासंती करतच होती. पण तरी भावजय काहीतरी खुसपट काढून वाद घालत होती. आई होती तोवर जरा तरी ठीक होतं. पण आई गेल्यावर तर घरात रोजच भांडणतंटा सुरू झाला. त्याला कंटाळून हिनं भावाचं घर सोडलं आणि इथे आली.

एवढ्या लहान वयात असं झाल्याने, बिचारीला काहीच हौसमौज करता आली नाही. विधवा म्हणून साधं फूल-गजरा माळायची पण चोरी.

माधवजी माझ्यासाठी न चुकता गजरा आणायचे मी आजारी होते तरीही. माझ्या केसात तो माळण्याआधी वास घेताना, वासंतीच्या चेहऱ्यावरचे भाव मी अनेकदा वाचले होते.
काल वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी, नेहमी प्रमाणे माधवजींनी माझ्या हातात नवीन साडी ठेवली. मी माधवजींनी म्हटलं, ‘ यावर्षी मला एक छानसं मंगळसूत्रही हवंय बरं का!’ त्यांना आश्चर्य वाटलं, कारण मी कधीच कोणत्या दागिन्याची मागणी आजवर केली नाही. पण संध्याकाळी येताना ते घेऊन आले. उद्या पूजा करताना घालेन, म्हणून मी त्यांना कपाटात ठेवायला दिलं.  सकाळी माझी तब्येत एवढी बिघडली की मी फक्त पडल्याजागी हात जोडूनच पूजा केली. दरवर्षी या दिवशी दानधर्म करण्याचा माझा नेम.  पण तोही चुकला.  मी मनाशी काहीतरी ठरवलं,आणि देशमुख काकांना बोलावून त्यांचा सल्ला घेतला आणि नंतर मृत्यूपत्र बनवलं. कारण  या जगातून जाण्याआधी  मला माझा विचार प्रत्यक्षात आणणं शक्य नव्हतं,कायद्याच्या आडकाठीमुळे. म्हणून तुम्ही ते  करावं अशी माझी शेवटची इच्छा आहे.

मी सौभाग्यदान करायचं ठरवलं आहे. माझी इच्छा आहे वासंती आणि माधवजी यांनी लग्न करून एकत्र रहावं. अर्थात त्या दोघांनी आनंदाने संमती दिली तरच. माधवजींचं वय बावन्न  आणि वासंतीचं अडतीस.  जरा वयात  अंतर आहे. पण माधवजींची काळजी ती नीट घेवू शकेल. त्यांच्या आवडीनिवडी तिला नीट माहिती झाल्या आहेत तीन वर्षांत! ती त्यांना नक्कीच सुखात ठेवेल. माधवजींनीदेखील पुढील आयुष्य आनंदात, समाधानात घालवावं , एकटं राहू नये असं मला वाटतं.

दोन्ही मुलं तशीही परदेशातच राहात असल्याने, हे समजून घेतील , अशी मी अपेक्षा करते. निशा-मुकेशच्या शिक्षणासाठी, परदेशी जाण्यासाठी आणि लग्नातही जे द्यायचं ते देऊन झालं आहे. त्यामुळे माझं स्त्रीधन – सर्व दागदागिने वासंतीला द्यावे. जर तिची माधवजींशी लग्न करण्याची इच्छा नसेलच तर दुसरा एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न करून द्यावं आणि त्यासाठी माझं स्त्रीधन वापरावं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडे मागून त्याला जिवंत केलं होतं. मीही माझ्या सत्यवानाला-माधवजींना नवजीवन लाभावं यासाठीच विनंती करते आहे. ‘

‘…… मृत्यूपत्रावर तारीख होती सहा महिन्यांपूर्वीची… वटपौर्णिमा होती त्या दिवशी.

देशमुख वकिलांनी वाचन संपवलं.

वासंतीला हुंदका आवरता आला नाही. या आगळ्यावेगळ्या मृत्यूपत्रानं सगळ्यांना निःशब्द केलं होतं.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘‘अंधार‘…’ ☆ सुश्री सोनाली लोहार ☆

सुश्री सोनाली लोहार

(आजची कथा अंधार सोनाली लोहार यांची आहे. त्या लेखिका, कवयित्री, ऑडिओलॉजिस्ट व स्पीच लॅंग्वेज पॅथॅलॉजिस्ट, उद्योजिका आहेत.)

? जीवनरंग ❤️

☆ ‘‘अंधार‘…’ ☆ सुश्री सोनाली लोहार

पुस्तक : गुंफियेला शेला – कथा : अंधार – सुश्री सोनाली लोहार

“मला एक आयफोन हवाय, नवीन मॉडेल..तुम्ही द्याल का आणून कुठून  जरा कमी किंमतीत..?”

त्यानं नवलानं वत्सलाकडे बघितलं.

कोपऱ्यात पडलेल्या तिच्या नोकियाच्या मळकट फोनकडे बघत तो म्हणाला, “एकदम आयफोन…कशाला?? पैसे वर आलेत का तुझे! “

तिनं मान खाली घातली.

“दिपूचा वाढदिवस येतोय पुढच्या महिन्यात, पंधरा पूर्ण होतील..गावाहून आईचा फोन होता, म्हणाली त्याला हवाय.”

त्यानं डोक्याला हात लावला,” पागल आहेस का गं तू!अगं स्वतःकडे बघ जरा काय अवस्था करून घेतलीयस !अंगावर नावाला तरी मांस शिल्लक आहे का?? आणि हे असले महागडे हट्ट पुरवत       बसशील तर पोरगा हातातून कधी गेला ते कळणार पण नाही हां!”

तिच्या डोळ्यात तरारून पाणी आलं , ” हातातून जायला आधी हातात तर असला पाहिजे नं!”

अंधारात तिचं अंग हुंदक्यांनी गदगदून गेलं..न राहवून त्यानं तिला जवळ ओढली. तिच्या पोलक्याची सुटलेली बटणं लावत तो पुटपुटला,” पोराच्या आयुष्यात रंग भरता भरता रिकामी होत    चाललीयस वच्छी, मरशील अशानं एकदिवस! आणतो मोबाईल, पण पैशाचं काय?”

“पैशाची हुईल व्यवस्था, तुम्ही तेव्हढं जरा स्वस्तात मिळतो का बघा देवा”, ती हुशारून म्हणाली.

दारावर बाहेरून थाप पडली. कपडे झटकत तो विटलेल्या गादीवरून उठला आणि पत्र्याची कडी काढून तिच्याकडे न बघता बाहेर पडला. दाराबाहेर थांबलेलं दुसरं किडमिडं गिर्‍हाईक आत शिरलं.

दरवाजा लावताना बाहेर बसलेल्या संभ्याला ती म्हणाली,” आंटी को बोल, जेव्हढी पाठवता येतील तेव्हढी पाठव, पंधरा मिनटाला एक पण चालेल…मैं लेगी.”

त्या सहा बाय चार फुटाच्या पत्र्याच्या खोक्यातला अंधार तिला गिळताना पाय पसरून दात विचकत हसत होता….

❤ ❤ ❤ ❤ ❤

टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री सोनाली लोहार यांच्याशी संपर्क साधावा.

चित्र साभार – फेसबुक पेज

©️ सुश्री सोनाली लोहार

मो. – 9892855678

ईमेल- [email protected]  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘‘धाग्या’वीण‘…’ ☆ सुश्री संपदा जोगळेकर कुळकर्णी ☆

सुश्री संपदा जोगळेकर कुळकर्णी

? जीवनरंग ❤️

☆ ‘‘धाग्या’वीण‘…’ ☆ सुश्री संपदा जोगळेकर कुळकर्णी

(आजची कथा ‘धाग्या’वीण‘ सुश्री संपदा जोगळेकर कुळकर्णी’ यांची आहे. त्या लेखिका, दिग्दर्शिका, नृत्यांगना आणि अभिनेत्री आहेत. खालील चित्र हे प्राप्त चित्रावरून प्रेरित होऊन आकाश पोतदार यांनी काढलेले आहे.)

तुझी पोर्टरेट मला का आवडतात माहित्येय?

उत्तर जर कलात्मक नसेल,प्रॅक्टिकल असेल तर नको सांगूस.

ए काय रे कुचकटासारखं बोलतोयस ! मी सांगणार…मला तुझे डोळे आवडतात आणि तुझ्या प्रत्येक पोर्टरेटमधे मला तेच,तसेच दिसतात.

छान ! अहो सायन्स स्टुडंट,डोळे बायोलॅजिकली सारखेच असतात,फक्त त्याच्या आत आणि भोवती काय घडलय यावर त्याचं वेगळेपण असतं.हं! आता तू म्हणतेस तर कदाचित मी माझेच डोळे शोधत असतो बहुधा त्या कॅरेक्टर मधे किंवा मी अशीच कॅरेक्टर शोधतो.हम् म् म्…म्हणजे ‘कला’ नाहीच म्हणा आवडत आमची.

ए ! ही थट्टा असेल तर बास कर हं,तुला माहितेय ना? तू कलाकार आहेस आणि मी न’कलाकार.

हं..विज्ञानाच्या चष्म्यातून सतत फॅक्ट शोधणे…….

आज १० वर्षानंतर आयुष्याचं ‘फॅक्टच’ माझ्या कागदपत्राच्या रूपानं माझ्या हातात होतं. आधी डोळे, मग दोन्ही किडण्या आणि आता… हृदय आणि मग माझ्या रवीचं संपूर्ण शरीर मेडीकलच्या स्टुडंट्सच्या अभ्यासासाठी मी दान करणार. पेंटीग करताकरताच सांडलेल्या रंगाच्या दाट पाण्यावरून पाय घसरण्याचं निमित्त, थेट डोक्याच्या पार्श्वभागावरच दाणकन आपटला. किती काळ गेला होता मधे, किमान चार तास. तळपायाला विविध रंगांचा लेप होता  तर डोक्याखाली मात्र लाल रंगाचा पाट वाहिला होता.मधल्या तासांमुळे बहुधा लालसर चॉकलेटी…डोंट नो….रंगांच्या बाबतीत सतत मला करेक्ट करणारा रवी आत्ता शुद्धीत होता कुठे ….नंतर तर तो शुद्धितच नाही आला. आता जो रवी  ’कोमा’त आहे त्याला, त्याएका चित्रकाराला किती वर्ष अंधाराच्या काळ्या गर्द रंगात जगवत ठेवायचं? असा विचार केला, डॉक्टरांचे सल्ले घेतले.

वेगवेगळ्या ठिकाणची गरज ओळखून त्याला वेगळ्याजिवांशी धागे जुळवून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय.

माझा रवी कित्येकांच्या आयुष्यात आता उगवलाय.दिवसाच्या सगळ्या प्रहरांचे रंग तो रंगवत असेलच की.

क्लिनीकमधे येणाऱ्या प्रत्येकाचे डोळे मी निरखून बघत असते, बहुधा फॅक्टच शोधत असते, शोधत असते की या डोळ्यांचा आणि माझा काही बंध असेल का ? असाच “धाग्याविण”!

❤ ❤ ❤ ❤ ❤

टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री संपदा जोगळेकर कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.

चित्र साभार – फेसबुक पेज

©️ संपदा जोगळेकर कुलकर्णी

ईमेल – [email protected]

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- “अश्विनी,मित्रांच्या आग्रहाने कधीतरी एक पेग घेतला म्हणून मी लगेच दारुड्या होत नाहीss”

अश्विनी संतापाने त्याच्याकडे पहात राहिली…

‘आता जे काही बोलायचे ते आत्ता न् याच क्षणी. नाहीतर नंतर बोलू म्हटलंस तर वेळ हातून निघून गेलेली असेल..’

तिने स्वत:ला बजावलं.)

” मला त्याबद्दल कांहीच बोलायचं नाहीये. वास काल रात्री आला होता पण आत्ता या क्षणापर्यंत मी गप्प बसले होतेच ना? अहो तुमचे आई-वडील आपल्या लग्नानंतर प्रथमच आपल्याकडे रहायला आलेत याचं तरी भान ठेवायचं. ‘तो आला की एकदम सगळे जेवायला बसू’ म्हणून रात्री कितीतरी वेळ ते दोघे ताटकळत वाट पाहत होते. आण्णांची रोजची झोपायची वेळ झाली तेव्हा मीच त्या दोघांना आग्रह करून जेवणं करुन घ्यायला लावलं. तुमच्या काळजीने ते धड जेवलेही नव्हते माहितीय.? मलाही ‘तू पण जेवून घे’ म्हणत राहिले पण मी थांबून राहिले ताटकळत. तुमची वाट पहात. तुमच्यासाठी. उपाशी. पण तुम्हाला त्याचं सोयरसुतक होतंच कुठं? तुम्ही आलात आणि वास लपवायचा म्हणून पाठ फिरून झोपून गेलात. मी जेवलेय की उपाशी आहे याची साधी चौकशी करायच्याही मनस्थितीत नव्हतात तुम्ही. आणि एकटंच बसून गारगोट्या झालेला भात खायच्या मन:स्थितीत मीसुद्धा. पण माझ्या जवळच्या तुमच्या ‘दुसऱ्या जीवाचं’ धन जपायचं होतं ना मला?मग उपाशी राहून कसं चाललं असतं? झकत दोन घास पोटात ढकलले आणि मगच झोपले.”

अश्विनीच्या तोंडून ‘दुसऱ्या जीवाचा’ उल्लेख ऐकून अविनाश त्याही मनस्थितीत आनंदला. त्याने अश्विनीला अलगद जवळ घेतलं. ही गोड बातमी डोळ्यांत असं पाणी आणून सांगायला लागली म्हणून अश्विनी मात्र हिरमुसलेलीच होती.

“अश्विनी, अशी चूक आता यापुढे माझ्याकडून पुन्हा कधीच….”

“तुमची चूक दाखवून द्यायला किंवा तुमच्याशी भांडायला हे सगळं मी बोलले नाहीय. पण आण्णा बोलतात, चुका दाखवतात म्हणत त्यांनाच तुम्ही मोडीत काढायला निघालात तेव्हा बोलावं लागलं. त्यांना असं डावलून तुमचा मार्ग कधीच सुखाचा होणार नाहीय. स्वतः काबाडकष्ट करून, जास्तीतजास्त चांगले संस्कार देत त्यांनी तुम्हाला वाढवलंय. जपलंय. ‘स्वतःचा फ्लॅट घेतल्याशिवाय मी लग्न करणार नाही’ म्हणून तुम्ही हटून बसला होतात, तेव्हा बँकेचं कर्ज गृहीत धरून कमी पडणारे सगळे पैसे हा फ्लॅट घ्यायच्या वेळी आण्णानीच एक रकमेने तुमच्या स्वाधीन केले होते हे तुम्हीच सांगितलं होतंत मला. आयुष्यभर कष्ट करून मिळवलेलं सगळं धन तुम्हाला देऊनही आजपर्यंत त्याचा साधा ओझरता उल्लेखही त्यांनी माझ्याजवळ कधी केला नाही.त्यांनी नाही आणि आईंनीही नाही. आपल्या दोन अडगळीच्या खोल्यातल्या संसारात दोघं तिकडे काटकसरीने  रहातायत. आपण काय देतोय त्यांना या सगळ्याच्या बदल्यात? त्यांना प्रेम आणि आपुलकी या खेरीज दुसऱ्या कशाचीच आपल्याकडून अपेक्षा नाहीये आणि त्यांना देण्यासारखं यापेक्षा अधिक मौल्यवान आपल्याजवळही काही नाहीय.निदान ते तेवढं जरी मनापासून देऊ केलंत तरच आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान त्यांना मिळेल ना?”

अश्विनीचं बोलणं ऐकून अविनाश भारावून गेला. आण्णांचा हा आणि असा विचार त्याने कधी केलाच नव्हता. बालपणापासूनचे त्याच्या आयुष्यातले सगळेच प्रसंग या क्षणी त्याच्या नजरेसमोर तरळून गेले. प्रत्येक प्रसंगात प्रत्येक क्षणी आण्णांनी कौल दिला होता तो याच्याच मनासारखा! तो म्हणेल तसंच प्रत्येक वेळी ते करीत आलेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल अश्विनीशीच नव्हे तर आई आण्णांशीही आपण किती खोटं वागलो होतो याची जाणीव होताच अपराधीपणाची भावना त्याला सतावू लागली.

या अपराधीपणाची उघडपणे कबुली देण्याचं धाडस मात्र त्याच्याजवळ नव्हतं. पण त्याचं प्रायश्चित्त म्हणून तो आज्ञाधारक मुलासारखा उठला. आण्णांच्या खोलीकडे वळला.

”हे बघ. मी अडचणी,वाईट वेळा दबा धरून अचानक आधी न सांगता झडप घालतात म्हणतो ना ते असं. बघ ही बातमी.”

पेपर वाचता वाचता आण्णा आईंना सांगत होते. आईही उत्सुकतेने त्यांच्याजवळ सरकल्या. आण्णा ती बातमी आईंना मोठ्याने वाचून दाखवू लागले.

‘काल बॅंकेत लाॅकर-ऑपरेशनसाठी गेलेल्या नितीन पटेल आणि त्याच्या गर्भवती पत्नीला दागिन्यांच्या मोहापायी कुणीतरी किडनॅप केल्याचा संशय असल्याची तक्रार नितीन पटेलचे वडील बन्सीलाल पटेल यांनी पोलीस स्टेशनवर केली आहे’

ऐकून अविनाश हादरलाच. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा आत झेपावला. सकाळच्या गढूळ वातावरणात अविनाशने नेहमीसारखा पेपर वाचलाच नव्हता.

“आण्णा, बघू कोणती बातमी म्हणालात..”

बातमी वाचून तो सून्न झाला. हे असं,इतकं अघटित घडू शकतं? त्या दिवशी संध्याकाळी धावतपळत लॉकर ऑपरेशनसाठी  बँकेत आलेले नितीन आणि त्याची बायको त्याला आठवत राहिले.आज ही बातमी वाचली आणि नुकताच भेटलेला कुणीतरी जवळचा, धडधाकट, चालता बोलता माणूस अचानक गेल्याचंच समजावं तसा अविनाश अस्वस्थ झाला.

रविवारची सगळी सकाळच नासून गेली. दुपार त्याच अवस्थेत. अखेर स्कूटर काढून तो एक-दोन स्टाफ मेंबर्सच्या घरी जाऊन आला पण जोडून सुट्ट्या म्हणून ते सर्वजण इथे तिथे बाहेरगावी गेलेले. मग दिलासा देण्यासाठी आपण नितीनच्या आई-वडिलांना भेटून येणे आवश्यक आहे असं त्याला वाटलं आणि त्याने स्कूटर पटेल यांच्या बंगल्याकडे वळवली.

नितीन पटेलच्या आईवडलांना भेटून तर तो अधिकच अस्वस्थ झाला. उतार वयात झालेल्या आणि म्हणूनच लाडाकोडात वाढवलेल्या आपल्या एकुलत्या एका मुलाच्या आणि सुनेच्या काळीज पोखरणाऱ्या काळजीने ते दोघेही वृद्ध व्याकुळ झालेले होते..! ‘आमचे सगळे ऐश्वर्य घ्या पण आमच्या मुलासूनेला सुखरुप परत करा’ म्हणत ते आकांत करीत होते..!!

त्यांना भेटून आल्यापासून तर अविनाश पार खचूनच गेला.

त्या रात्री अश्विनीच्या कुशीत शिरुन तो एखाद्या लहान मुलासारखा पडून राहिला. आईलाच घट्ट बिलगल्यासारखा. त्याच्या केसातून आपली बोटं फिरवत अश्विनी मनोमन जणू आपल्या गर्भातल्या बाळाचं जावळच कुरवाळत राहिली होती!

“अश्विनी…”

“अं?”

“मला सारखं वाटतंय गं अश्विनी, त्यादिवशी मी नितीन पटेलना वेळ संपल्याचं किंवा दुसरंच काहीतरी कारण सांगून त्यांना अटेंड करायलाच नको होतं. मग त्याला व्हाॅल्ट ऑपरेट करून दागिने काढून नेताच आले नसते आणि दागिन्यांच्या लोभाने  त्यांना कोणी किडनॅपही केले नसते..”

अश्विनीला त्याच्या या लहान मुलासारख्या निष्पाप निरागस मनाचं हसूच आलं. एखाद्या लहान मुलाला समजवावं तसं ती म्हणाली,

“आता सगळं घडून गेल्यानंतर या सगळ्या जर-तरच्याच तर गोष्टी.खरं सांगू?  आपल्या हातात खरंतर कांहीच नसतं. दान असं टाकायचं की तसं एवढंच आपण ठरवायचं. पण ते कसं पाडायचं ते फक्त ‘त्या’च्याच हातात तर असतं!

अश्विनी सहज म्हणून बोलली खरं, पण पुढे ते अनेक अर्थांनी खरं ठरणार होतं.कारण..? कारण नेमकं घडलं होतं ते वेगळंच..!!

त्यादिवशी नितीन आणि त्याची बायको व्हाॅल्ट ऑपरेट करायला गेल्यावर थोडं राहिलेलं काम हातावेगळं करून अविनाशने ड्रॉवर लाॅक करून घेतले होते आणि तो टॉयलेटला गेला होता. टॉयलेटला जाऊन आल्यावर व्हाॅल्टरूमची कॉल बेल त्याने दाबून पाहिली होती पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही, तेव्हा आपण टॉयलेटला जाऊन येईपर्यंत ते दोघे गेले असावेत त्या कल्पनेने पार्टीला जायच्या गडबडीत व्हाॅल्टरुम आणि नंतर बँक तशीच बंद करून तो निघून गेला होता..आणि…ते दोघे मात्र आत व्हाॅल्टमधेच अडकून पडलेले होते…!!

‘दागिन्यांच्या लोभाने त्यांना कुणीतरी किडनॅप केलेलं असावं’ या संशयाच्या आधारे पोलीस तपास त्या एकाच चुकीच्या दिशेने सुरू होता!

या घटनेला या क्षणी तीस तास उलटून गेलेत. सुटकेचे सारे निरर्थक प्रयत्न संपल्यानंतर थकलेले,गलितगात्र झालेले, भेदरलेले ते दोघे अन्नपाणी आणि मोकळ्या श्वासाविना आत घुसमटत पडून आहेत..!

अद्याप बँक पुन्हा उघडण्यासाठी पूर्ण ३४ तास सरायला हवेत.

या सगळ्या  अघटितापासून अविनाश,अश्विनी, आई आणि आण्णा सगळेच निदान या क्षणी तरी लाखो योजने दूर आहेत..!

अविनाश अर्धवट झोपेत आणि अस्वस्थतेत याच अघटिताचा विचार करतोय. याच विचारांच्या भाऊगर्दीतून वाट काढत अचानक एक प्रश्न पुढे झेपावतो आणि एखाद्या तीक्ष्ण बाणासारखा त्याच्या अस्वस्थ मनात घुसतो.रुतून बसतो….!!

‘त्या दोघांना आपण व्हाॅल्टरुम मधून बाहेर पडताना अखेरचं पाहिलंच कुठं होतं?’ हाच तो प्रश्न!

त्या तीक्ष्ण बाणाच्या जखमेने विव्हळल्यासारखा  अविनाश दचकून उठतो. पहातो तर अश्विनी शांत झोपलेली आणि मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली!

या अशा पूर्णतः निराधार भेदरलेल्या मनोवस्थेत त्याला तीव्रतेने आण्णांची आठवण होते. आधारासाठी,..मदतीसाठी तो त्यांच्या खोलीकडे झेपावतो.

… तिकडे नितीन आणि त्याची बायको श्वास कोंडल्या अवस्थेत पडून राहिलेत. तिच्या गर्भातली हालचाल हळूहळू मंदावत चाललीय. तिला आधार द्यायची नितीनची उमेद संपून गेलीय. एखाद्या क्रूर श्वापदासारखा दबा धरून बसलेला मृत्यू त्यांच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकू लागलाय. येणारा प्रत्येक क्षण या साऱ्यांचे भविष्य घडवत सरत चाललाय. या भविष्याच्या पोटात काय दडलेय ते फक्त ‘त्या’लाच माहीत आहे!

‘तो’ म्हणेल तसंच आता घडणार आहे!!

हे एखादं स्वप्न नव्हे की एखादा चित्रपट. वास्तव जग आहे हे. इथे या वास्तव जगात स्वप्न किंवा चित्रपटातल्यासारखा हमखास सुखान्त कुठून होणार?

वास्तव जगात सुखान्त होत नाहीथ असं नाही.ते होतात पण.. क्वचित कधीतरीच!!

 – पूर्णविराम –

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – “हे बघ अश्विनी, अविनाश हुशार आहे.समंजस आहे.पणअतिशय घुमा आणि एककल्ली आहे. तूच आता त्याला वेळोवेळी समजून घ्यायचंस. तो चुकतोय असं वाटेल तेव्हा आधार देऊन त्याला सावरायचंस” बोलता बोलता आण्णांचा आवाज त्यांच्याही नकळत भरून आला…”)

“आण्णा, इतक्या गंभीरपणे तुम्ही विचार करावा असं खरंच काही नाहीये. काल बँकेत कामं आवरायला उशीर झाला आणि सगळेच बाहेर जेवायला गेले. दोन दिवस आपला फोन बंद आहे, एरवी त्यांनी निरोप दिला असता.”

अश्विनीला खरंतर स्वतःलाही हे जाणवत होतं की आपण आण्णांना बरं वाटावं म्हणून हे बोलतोय. तिने स्वतःला कसंबसं सावरलं आणि ती अविनाशला उठवायला गेली.

“बघितलंत? प्रत्येक गोष्टीत  सूतावरुन स्वर्ग गाठता आणि उगीचच काळजी करता.तो एवढ्या लहान वयात बॅंकेत आॅफिसर म्हणून नोकरीला लागला,नवा संसार थाटला.कांही  म्हणून तोशीश ठेवली नाहीय,ना कधी कसला घोर लावलायन् तुमच्या जीवाला. चार दिवस आलो आहोत त्याचं सुख पहायला तर कधी जवळ बसवून प्रेमानं कौतुकाची थाप दिलीयत कां त्याच्या पाठीवर? आजारपण असो नसो सतत आपले कडू औषधाचे डोस देत रहायचं. हे कर,ते करु नको.रांगतं बाळ आहे कां हो तो अजून ?अशाने तो कशाला तुमच्यासमोर येतोय न्  तुमच्याशी मोकळेपणाने बोलतोय..?”

आण्णांना एकदम गहिवरून आलं. त्यांना खूप बोलायचं होतं, सांगायचं होतं. पण नेमके शब्द चाचपडत ते गप्प बसले….

‘आजवरचं आपलं आयुष्य म्हणजे सगळा खाचखळग्यातला प्रवास! पायपीट करता करता धडपडत,पडत, ठेचकाळत इथवर आलो.या नवसासायासाने जगल्या-वाचलेल्या एकुलत्या एका मुलाला तळहाताच्या फोडासारखं जपलं. वाढवलं. खंबीर आधार देणारे आई-वडील, समंजस बायको, भक्कम पगाराची नोकरी,या सगळ्यामुळे तो गाफील असल्यासारखा वागला तर त्याला मी सावध नाही का करायचं? माझ्या अनुभवांच्या शिदोरीतला एखादा घास तरी त्याच्यापर्यंत नाही का पोचवायचा? त्याला नाही भरवायचा?…’ ते स्वतःतच हरवले.

“अहो,..कसला विचार करताय?”

“तुला सांगू? आयुष्यात सुखाचे,आनंदाचे क्षण नेहमी नाचत-बागडत,हुंदडत येतात. गाजावाजा करत येतात. पण अडचणी आणि वाईट वेळा मात्र लपतछपत येतात. दबा धरून अचानक घाला घालतात. अशा वेळी नेमका हा जर गाफील राहिला तर…?”

“किती काळजी कराल त्याची?तो लहान आहे का हो आता?त्याचं त्याला सगळं छान समजतंय.मोठ्ठा साहेब झालाय तो.त्याला पांघरुणात लपवून ठेऊन त्याच्या जागी रोज तुम्ही जाऊन बसणार आहात का?आणि बसलात तसे,तरी ते व्याप तुम्हाला झेपणारायत का?मग त्याचं स्वत:चं आयुष्य,त्याचं म्हणून जसं येईल तसं जगू दे ना त्याचं त्याला.तुमचं सांगणं, विचार करणं मी समजू शकते हो. पण हे सगळं गोड गोळीसारखं दिलंत तर त्याला घ्यावंसं वाटेल ना? कडू औषध दिलंत तर तो झिडकारतच राहील. आणि याही पलीकडचं एक सांगू? या वयात कुणी आपणहोऊन मागितला तरच सल्ला द्यावा माणसानं. नाहीतर हरी हरी करीत स्वस्थ बसावं.”

————-

“अहोs,उठा बरं आता. आणि पटकन् तोंड धुऊन घ्या.मी तुमचा आणि आण्णांचा चहा ठेवतेय”

ऐकलं आणि आळसावलेली झोप झटकून अविनाश ताडकन् उठलाच.

“आण्णा मघाशीच फिरून आलेत ना गं?” तो त्रासिकपणे म्हणाला.

“हो”

“मग? त्यांचा अजून चहा झाला नाहीये?”

“पुन्हा घेतील अर्धा कप. त्या निमित्ताने तरी दोघं एकमेकांशी बोलत बसाल”

अविनाश छद्मीपणाने हसला.

“का हो?”

“त्यांच्याशी बोलायचं कधी असतं का गं कांही?.फक्त ते बोलतील ऐकायचंच तर असतं. ते किती चांगले, किती व्यवस्थित, किती काटेकोर, किती हुशार… आणि मी ?आळशी,धांदरट, गचाळ, मूर्ख… “

“किती लहान मुलासारखा विचार करता हो तुम्ही?”     अश्विनीला त्याचं हसूच आलं.

“तुला हसायला काय जातंय? तू त्यांची मुलगी असतेस ना म्हणजे समजलं असतं.”

“समजायचंय काय त्यात? आवडलं असतं मला ते. चुकीचं किंवा काही वाईट कुठं सांगत असतात ते? काही सांगायचा, शिकवायचा एरवीही त्यांना हक्क आहेच ना?. तुम्ही उठा बरं आता. मी जातेय. या लगेच.

अविनाशला अश्विनीच्या या सरळपणाचा हेवा वाटत होता आणि कौतुकसुद्धा !

“हं.काय म्हणतेय बॅंक?”

“कांही नाही.ठीक आहे.”

“कशी चाललीय नोकरी?”

“छान.मजेत.”

“छान चालू दे.पण मजेत नको.हरघडी साक्षात् लक्ष्मीशी संबंध येतोय तुझा.ती अनेक मायावी रुपात तुझ्यासमोर येईल.त्या प्रत्येक वेळी तू कणखर आणि जागरुक असायला हवंस.”

त्याने होकारार्थी मान हलवली पण त्याची अस्वस्थता वाढत होतीच.

“अहो त्याला सकाळचा चहा तरी शांतपणे घेऊन देणार आहात का?”

“तो त्याच्या कानाने चहा पीत नाहीये ना? ऐकू येतंय ना त्याला चहा घेता घेता?”

“होय हो.पण आता त्याचं त्याला आवरु दे ना. त्याला आधीच उठायला उशीर झालाय ‌”

“मी तेच म्हणतोय. रात्रीची एवढी जागरणं करायचीच कशाला? वेळच्यावेळी घरी यावं. नियमित जेवण आणि ठराविक झोप घ्यावी. तरच शरीराचं यंत्र ठणठणीत राहील न् दामदुप्पट काम देईल. त्याच्या या अनियमित वागण्यामुळे निम्मी तब्येत खलास झालीय त्याची.”

“आण्णा, पण मी कामासाठीच तर…”

“योजनाबध्द रीतीने कामं केलीस, तर रात्री बारा बारा वाजेपर्यंत ताटकळायची आवश्यकता रहाणार नाही. एकत्र येऊन बाहेर जेवायला आणि चकाट्या फिटत बसायला बँकेच्या कामाचं निमित्त कशाला हवं?”

मनात साठत चाललेल्या संतापाचा आता स्फोट होणार हे जाणवताच चहा तसाच अर्धवट टाकून अविनाश उठलाच. तडक बेडरूममधे निघून गेला. कावरी बावरी झालेली अश्विनी त्याला समजवायला त्याच्यामागे धावली.. पण..

“थांब अश्विनी. जाऊ दे त्याला. अगं, तुला हे नवीन असेल पण त्याला कळायला लागल्यापासून आमचा हा लपंडावाचा खेळ असाच सुरू आहे आणि तेव्हापासून कितीही दम लागला, तरी डाव नेहमी असा माझ्यावरच येत रहाणाराय.”

तिची समजूत घालायला हे बोलताना ते वरकरणी हसत होते पण मनातून ते दुखावलेत हे त्या हसण्यातूनही अश्विनीला कळून चुकलं होतं!

—————-

“असं मधेच उठून कशाला आलात हो?”

“नसतो आलो तर अजून तासभर तरी त्यांचं प्रवचन संपलं नसतं.”

“हे फार होतंय हं”

“आता तूही मला..”

“आपलं लग्न झाल्यापासून गेले सहा महिने मी प्रत्येक पत्रातून त्या दोघांना आग्रहाने इकडे बोलवत होते तेव्हा कुठे यावेळी ते पहिल्यांदाच आलेत. ते इथे रहातील तितके दिवस त्यांना आनंदाने राहू द्या ना. तुम्ही शांत रहा आणि कृपा करून घरचं वातावरण बिघडवू नका. ते दुखावून किंवा कंटाळून निघून गेले ना तर मला चैन पडणार नाही सांगून ठेवते.” तिच्या डोळ्यांत टचकन् पाणीच आलं.

“मी भांडलोय का त्यांच्याशी? त्यांना कांही बोललोय तरी कां? “

“तुमचं हे काही न बोलणंच त्यांच्या जिव्हारी लागतं.”

“काहीही बोललो, काहीही सांगितलं तर ऐकून तरी घेतात का ते? वर त्यांचं म्हणून काहीतरी असतंच.तरीही तू त्यांचीच री ओढतेयस.”

“ते रागावून,चिडून, संतापून का़ही बोलले असते तर ते मलाच आवडलं नसतं. पण ते आपला प्रत्येक शब्द अतिशय शांतपणे मांडत असतील तर तुम्ही एक तर तो व्यवस्थितपणे खोडून तरी काढायला हवा किंवा तो मान्य करून स्वीकारायला तरी हवा “

“स्वीकारतेस काय? बँकेत तिथं किती कामं असतात हे यांना घरी बसून काय माहित?” त्याचा आवाज चढलाच.

“तुम्ही स्वतःचं समर्थन ठामपणे करू शकत नाही ना त्याचाच राग येतोय तुम्हाला.”

“म्हणजे मी..मी बँकेत झोपा काढतोय असं म्हणायचंय का तुला? “तो तारस्वरात ओरडला.

“हे बघा, हळू बोला. आण्णांना हे ऐकू जावं म्हणून ओरडून बोलत असाल तर सरळ त्यांच्या खोलीत जाऊनच बोला ना आणि अगदी खरं, प्रामाणिकपणानं सांगा त्यांना काल रात्री तुम्हाला यायला कां उशीर झाला होता ते आणि आलात तेव्हा तुमच्या तोंडाला कां आणि कसला वास येत होता तेसुध्दा… “

“अश्विनी?”

“येत होता ना? ” अश्विनीच्या घशाशी हुंदका दाटून आला.

“…… “

“मग एकत्र येऊन जेवायला आणि चकाट्या पिटायला बँकेचं काम तुम्ही निमित्त म्हणून वापरता असं आण्णा म्हणाले तेव्हा त्यांचा राग कां आला तुम्हाला? ते बोलले त्यात चुकीचं कांही नव्हतं याचाच ना? “

“अश्विनी, मित्रांच्या आग्रहाने कधीतरी एखाद्या पेग घेतला म्हणून मी लगेच दारुड्या होत नाहीss  “

अश्विनी संतापाने त्याच्याकडे पहात राहिली.’  … ‘…आता जे कांहीं बोलायचं ते आत्ता न् या क्षणीच.नाहीतर नंतर बोलू म्हंटलंस तर वेळ हातातून निघून गेलेली असेल..’ तिने स्वत:ला बजावलं.

क्रमश:

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘क्वचित कधीतरी…’ – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

क्वचित कधीतरी घडतं असं. सहज चालता चालता अचानक ठेच लागावी ना तसं. आणि अशा क्वचित घडणाऱ्या घटनेच्या पोटात दबून राहिलेला असतो उध्वस्त करु पाहणारा भविष्यकाळ. ठेच लागलेल्याचाच नव्हे तर त्याच्याशी संबंधित सर्वांचाच! त्याचीच ही कथा!!

यावेळी रविवारला जोडून सलग दोन दिवस सुट्ट्या आल्या. त्यामुळे तीन पूर्ण रिकामे दिवस म्हणजे सर्व नोकरदारांसाठी मोठी पर्वणीच होती.या तीन दिवसात ब्रॅंच मधील सर्वांनी मिळून कुठेतरी बाहेरगावी ट्रीपला जायचं ठरत होतं. ब्रॅंच-मॅनेजर रजेवर असल्याने बँकेत कामाचं दडपण अविनाशवरच होतं. पण तरीही कामं झटपट आवरुन जायची त्याची तयारी होती. मात्र घरी अश्विनीनेच त्याचा हा प्रस्ताव धुडकावूनच लावला.

“आई-अण्णांना असं घरी ठेवून आपण दोघांनीच उठून जाणं बरं दिसेल का हो? जोडून सुट्ट्या काय पुन्हा कधीतरी येतील. या तीन दिवसात हवं तर आपण घरीच काहीतरी प्रोग्राम ठरवूया” तिने बजावून सांगितलं होतं.

आई-अण्णा कांही दिवस आराम करायला म्हणून आले होते. ते खरंतर त्याचे आई-वडील. त्याच्या लहानपणापासून तो म्हणेल तसं ते वागत आलेले असल्यामुळे हा त्यांना नेहमीच गृहीत धरूनच चालायचा. पण त्यामुळेच कदाचित आई आणि आण्णांच्या बाबतीत अश्विनी अशी विचारपूर्वक वागायची. अश्विनीचं रास्त म्हणणं झिडकारून स्वतःचा हट्ट हवा तसा रेटण्याइतका  अविनाश निगरगट्ट नव्हता.

अविनाश पिकनिकला येणार नाही म्हणून मग सगळ्यांच्याच तो बेत बारगळला. मग शनिवारी रात्री ड्रिंक पार्टी तरी करायचीच अशी ब्रॅंचमधे टूम निघाली. याला ‘नाही’ म्हणता येईना. घरी कांही सांगायचं म्हटलं तर अश्विनी विरोध करणार हे उघडच होतं. शिवाय पार्टी कां आणि कसली याबद्दल आण्णांनी शंभर प्रश्न विचारले असते ते वेगळेच. यातून सरळ सोपा मार्ग म्हणून बँकेतल्या जास्तीच्या कामांचं खोटं कारण सांगून त्यामागे लपणं अविनाशला जास्त सोयीस्कर वाटलं.

त्या दिवशी शनिवारी बाकीचे सगळे स्टाफ मेंबर्स संध्याकाळी पार्टीसाठी एकत्र यायची गडबड म्हणून आपापलं काम आवरून निघून गेले. पण मॅनेजर रजेवर असल्याने अविनाशला  जबाबदारीची सगळी कामं आवरल्याशिवाय निघणं शक्यच नव्हतं. म्हणूनच शनिवारचं कामकाज अर्ध्या दिवसाचं असूनही संध्याकाळ कलत आली तरी हा अजून कामातच. घरी जायची तशी गडबड नव्हती कारण घरी काही सांगायचं नसल्याने परस्परच पार्टीला जायचं होतं.पण तरीही कामं आवरायला अपेक्षेपेक्षा तसा उशीरच झाला होता.आणि.. तेवढ्यात…अगदी अचानक..ते दोघे धावत,धापा टाकत आत घुसले. नितीन पटेल आणि त्याची बायको. या दोघांना अशावेळी कांही काम घेऊन बॅंकेत आलेलं पाहून अविनाश मनातून उखडलाच. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने धुडकावूनच लावलं असतं. पण नितीनसारख्या महत्त्वपूर्ण ग्राहकाला ‘नाही’ म्हणणं शक्यच नव्हतं आणि रास्तही.ते दोघे मोठ्या आशेने आले होते.

नितीनची बायको अवघडलेली होती. त्या धावपळीने ती घामेजलेली दिसली.त्याने अगत्याने दोघांना बसायला सांगितलं आणि थंड पाण्याचे दोन ग्लास त्यांच्यापुढे केले. तेवढ्यानेही ते सुखावले. थोडे विसावले.आणि मग त्यांनी असं घाईगडबडीने येण्याचं प्रयोजन सांगितलं. सोमवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि हा जोडून सुट्ट्यांच्या घोळ त्यांच्या उशिरा लक्षात आला होता. त्यांना लॉकरमधले त्यांचे सोन्याचे दागिने आज घरी न्यायचे होते.त्यासाठीच घाईघाईने ते बँकेत आले होते. बँक उघडी असायची शक्यता नव्हतीच त्यामुळेच अविनाशला इथे पाहून  ते दोघे निश्चिंत झाले होते.

राष्ट्रीयकृत बॅंकेसारख्या सेवाक्षेत्रात नेमक्या गडबडीच्या नको त्यावेळी नको असताना असे क्षण परीक्षा बघायला आल्यासारखे येतातच. ते नेमकेपणाने झेलणं हा अविनाशच्या स्कीलचा भाग होताच.काम करायचंच तर ते कपाळाला आठ्या घालून करण्यापेक्षा हसतमुखाने करावं याच विचाराने याने त्यांचं वरकरणी कां होईना पण हसतमुखाने स्वागत केलं होतं.. आणि ते पाहून त्यांचे श्रांत चेहरे समाधानाने फुलून गेले होते.

—————

थंडीच्या दिवसातला आजचा हा पाऊस तसा अनैसर्गिकच म्हणायचा. त्यामुळे रविवारची आजची सकाळ अंधारलेलीच आणि मलूल होती. अविनाश काल रात्री उशिरा घरी आला होता. कांहीच निरोप नसल्याने अश्विनी थोडी काळजीतच होती. आणि आई- आण्णाही रात्री उशीरापर्यंत कितीतरी वेळ वाट पहात बसून होते!

आपण उठलो की त्या दोघांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार या कल्पनेने जाग येऊनही अश्विनी पडून राहिली होती. गेल्या चार-सहा दिवसांपासून तिला खरंतर बरं वाटत नव्हतं. अस्वस्थपणाही होताच. आईंनी आडून आडून विचारून पाहिलं होतं पण अश्विनीने हसण्यावारी नेलं होतं. ‘अविनाश आज घरी आला की हे गोड गुपित आधी एकांतात त्याला सांगायचं आणि मगच आई आण्णांना’ असं तिने ठरवूनच ठेवलं होतं. आणि नेमकं कधी नव्हे ते तो न सांगतासवरता काल रात्री खूप उशिरा घरी आला होता. त्यामुळे ‘ते’ सांगणं राहूनच गेलं होतं.तो आला तेही परस्पर बाहेर जेवूनच. त्यामुळे काल वरवर थोडी शांत राहिली तरी अश्विनी मनातून त्याच्यावर नाराजच होती.

आण्णा दार उघडून फिरायला बाहेर पडल्याचं जाणवलं तशी अश्विनी उठली. तिची चाहूल लागताच तिचीच वाट पहात पडून असलेल्या आईंनीही मग अंथरूण सोडलं. उतारवयामुळे त्यांना तशी झोप कमीच. त्यात काल रात्री अवीची वाट पाहण्यात नको ते विचार मनात गर्दी करू लागलेले. त्यामुळे शांत झोप अशी नव्हतीच.

“अश्विनी, तू तोंड धुऊन घे. मी बघते चहाचं”

अश्विनीला खूप बरं वाटलं. आईंचे दिलासा देणारे हे चार शब्द तिचा उत्साह वाढवून गेले.

“अहो, चहाची तयारी करून ठेवलीय मी. आण्णा फिरून आले की लगेच टाकतेच चहा”

“काल रात्री किती वाजता आला गं अवी?”

“बारा वाजून गेले होते”

“सांगतेस काय? आता हे येतील तेव्हा हा विषय नको बाई. फट् म्हणता ब्रह्महत्या व्हायची”

“अहो,काहीतरीच काय?”

“हे बघ,आम्ही चार दिवस आलोय तसं सुखाने राहू दे बाई. एकदा का यांचं भांड्याला भांडं लागायला लागलं की मला चंबूगबाळं आवरायलाच लावतील हे.तुला माहित आहे ना त्या दोघांचं विळ्याभोपळ्याचं सख्य?”

“असू दे.तुम्ही विळा सांभाळा,मी भोपळा सांभाळते. काहीही भांडणं वगैरे होत नाहीत. तुम्ही भरपूर दिवस रहा हो मजेत. उगीच जायची कसली घाई?”

अश्विनीचे हे शब्द ऐकले आणि आईना अगदी भरून आलं.चार भावंडातला वाचलेला हा अविनाश एकटाच.म्हणून एकुलता एक.बाकी सगळी तोंड दाखवायला आल्यासारखी आली आणि गेली.नाही म्हणायला अविनाशच्या पाठीवरची मुलगी मात्र बोबडं बोलायला लागेपर्यंत छान होती. पुढे साध्या तापाचं निमित्त झालं आणि सगळ्यांच्या जीवाला चटका लावून तीही अचानक निघून गेली. अश्विनीचं आजचं बोलणं ऐकलं आणि अगदी अचानक,उत्कटतेने त्यांना तिचीच आठवण झाली. आज ती असती तर अशीच असती. हिच्याच वयाची. अशीच लाघवी आणि प्रेमळ!

आई विचारात गुंतून पडल्या आणि तेवढ्यात आण्णांची चाहूल लागली.

“झाला कां चहा?” त्यांनी खड्या आवाजात विचारलं.

चहाचा पहिला घोट घेताच आण्णा समाधानाने हसले.

“अश्विनी,चहा एकदम फर्मास झालाय गं. अगदी या तुझ्या सासूच्या हातच्या चहासारखा..’

“पुरे हं..”आई मनातून सुखावल्या होत्या पण वरकरणी म्हणाल्या.” पाहिलंस ना यांचं एका दगडात दोन पक्षी मारणं?”

“अगं चहा चांगला जमून आला तर त्याचं कौतुक नको कां करायला?”

“कौतुक का करताय ते मला ठाऊक आहे मला चांगलं. आणखी अर्धा कप चहा हवा असेल”

ऐकलं आणि अश्विनी चपापली. नेहमीसारखा त्यांच्यासाठी जास्तीचा चहा टाकायला ती आजच्या अस्वस्थ मनस्थितीत विसरूनच गेली होती. तिने तत्परतेने स्वतःसाठी ठेवलेल्या चहाचा कप आण्णांच्या पुढे सरकवला.

“आणि तुला..?”

“हा घ्या तुम्ही. हे उठले की मी त्यांच्याबरोबर करीन माझा.”

अविनाशचा विषय तिला खरं तर टाळायचा होता. पण अनवधानाने तिनेच तो असा काढला होता. ती थोडी धास्तावली.

“हे उठले की म्हणजे? अविनाश उठला नाहीय अजून?” अण्णांचा आवाज तिला चढल्यासारखा वाटला.

“अहो उठतील एवढ्यात. आज रविवार आहे ना हक्काचा?” वातावरणातला ताण कमी करण्यासाठी अश्विनी हसत म्हणाली.

“रविवार असला म्हणून काय झालं ? अगं साडेसात वाजून गेलेsत..” यावर तिला पटकन् काही बोलता येईना. ती कावरी बावरी होऊन गप्प बसली. मग आईच तिच्या मदतीला धावल्या.

“अहो उठू दे ना सावकाश. त्याच्यावरून तुमचं काही काम अडलंय कां?”

“तू त्याला लहानपणापासून लाडावून ठेवलायस आणि आता..”आण्णा संतापाने म्हणाले.

वातावरण गढूळ होत चाललेलं पाहून अश्विनी जागची उठलीच. ते पाहून अण्णा थोडे शांत झाले.

” थांब अश्विनी.आधी हा चहा घे आणि मग उठव त्याला.त्याचा करशील तेव्हा माझा अर्धा कप टाक हवंतर.”

मग तिला थांबावंच लागलं. तिने आढेवेढे न घेता मुकाट्याने तो चहा घेतला.

“हे बघ अश्विनी,अविनाश हुशार आहे. समंजस आहे. पण अतिशय घुमा आणि  एककल्ली आहे. त्याला बोलतं करणं प्रयत्न करूनही मला कधी जमलेलं नाही. तूच त्याला आता वेळोवेळी समजून घ्यायचंस. तो चुकतोय असं वाटेल तेव्हा आधार देऊन त्याला सावरायचंस..”  बोलता बोलता अण्णांचा आवाज त्यांच्याही नकळत भरून आला आणि ते बोलायचे थांबले.

क्रमश:

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अठरा अतिलघु कथा… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ अठरा अतिलघु कथा☆  सौ. प्रभा हर्षे 

. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ; 

“मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!”

 

. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, “एवढ्यात शेफरलास ?

जी मोजता येत नाही ती खरी उंची.”

 

. कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं, ” या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील? ” तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल. 

 

. मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार ? 

एक हिरा लुकलुकला.  म्हणाला, “वेडा रे वेडा !!” 

 

. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं.  त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले मी ! ते म्हणत होतं, ‘ करून बघायचं कि बघून करायचं, ठरवू दे की मला मी कसं जगायचं !’

 

७. एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं 

“जगलास किती दिवस?”

 

. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं –

“माझ्याबरोबर तुम्ही का जळताय?”

लाकडं म्हणाली, ” मैत्री म्हणजे काय ते कळलं नाही का अजूनही तुला? “

 

. पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून रस्त्याच्या कडेला एका फाटक्या पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी पोळी त्याला भरवताना म्हणाली ,” बाळा दमला असशील ना? खा पोटभर !!”

 

o. माणसानी देवाला विचारलं “ संकटं का पाठवतोस ? “

देव म्हणाला “ माणसाला होणाऱ्या माझ्या विस्मरणावरचं हमखास औषध आहे ते. “

 

११. ‘विश्वास’ या शब्दात “श्वास” का आहे?

दोन्हीही एकदा जरी तुटले तरी संपतं सगळं !

 

१२. दरवेश्याचं माकडाशी वागणं बघून मला माकडाची दया आली

माझ्या मनाचा मला लगेच प्रश्न, ” माकडाची येते पण माझी नाही येत दया तुला? “

त्यावर माझा मनाला प्रतिप्रश्न. ” माकडानं दरवेश्याला खेळवताना पाहिलं आहेस कधी? “

 

१३. नाती का जपायची ?

रेशमाच्या धाग्याचा गुंता सोडवून पहा एकदा… 

 

१४. आठवणींची एक गम्मत आहे.

त्याच्यात गुंतून राहिलात तर नवीन निर्माण नाही होत !! 

 

१५. माणूस देवाला म्हणाला ” माझा तुझ्यावर विश्वासच नाही.”

देव म्हणाला ” वा !!  श्रद्धेच्या खूप जवळ पोहोचला आहेस तू. प्रयत्न सुरु ठेव.”

 

१६. गवई एकदा तानपुऱ्याला म्हणाला,” तू नसलास तर कसं होईल माझं? “

तानपुरा म्हणाला ,” अरे वेड्या ! माझी गरज लागू नये हेच तर ध्येय आहे.”

 

१७. विठु माऊली एकदा एकादशीला दमून खाली बसली. मी विचारलं,”काय झालं ?”

विठुराय म्हणाले, ” पुंडलिकाचा गजर करतात लेकाचे, पण मायपित्यांना एकटं सोडून अजून माझ्याच पायाशी येऊन झोंबतात..  वेडे कुठले. !”

 

१८. एकटं वाटलं म्हणून समुद्रावर गेलो एकदा. त्याला विचारलं “कसा  एकटा राहतोस वर्षानुवर्ष ?”

तो म्हणाला “एकटा कुठला, मीच माझ्यात रमावं म्हणून ईश्वराने लाटा दिल्या आहेत ना मला.” 

मी विचारलं “माझं काय?”

तो हसून म्हणाला —  ” नामस्मरण आणि माझ्या लाटांमध्ये काहीच साम्य दिसत नाही का तुला ? “

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print