मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “प्राण घेतलं हाती !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

प्राण घेतलं हाती ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कॅप्टन अरुण ‘सिंह’

तीन हजार फूट उंचीवरील डोंगरावरील गुहेत एक – दोन नव्हेत, तब्बल वीस अतिरेकी लपून बसलेले आहेत… ते कधीही खाली उतरून आपल्या भारताच्या सीमेत घुसून रक्तपात घडवून आणतील अशी खात्रीच आहे. आपल्या हद्दीत एक पाकिस्तान प्रशिक्षित अतिरेकी घुसणे म्हणजे एकावेळी शेकडो नागरीकांच्या आणि सैनिकांच्याही जीवाला मोठा धोका.. हे तर वीस होते! ही पिसाळलेली श्वापदे माणसांत घुसण्यापुर्वीच त्यांना गाठून मारलं पाहिजे! ठरलं…

कॅप्टन अरुण ‘सिंह’ साहेब या श्र्वापदांचा समाचार घ्यायला निघाले.. सोबत निवडक सहकारी होतेच. पण त्या पहाडावर पोहोचायला तब्बल दहा तासांची उभी चढण चढावी लागली… खांद्यांवर, पाठींवर शस्त्रे घेऊन. निघताना थोडंफार काही खाल्लं असेल तेवढेच. सोबतीला अंधार आणि पाऊस होताच… पण थांबता येणार नव्हतं.

अतिरेकी शोधायचे आणि त्यांना खलास करायचे काम अतिशय धोकादायक. कारण ते अगदी आरामात नेम धरून बसलेले असतात. खालून वर येणारे लोक त्यांच्या शस्त्रांच्या टप्प्यात अलगद येतात. याला एकच उपाय जीवाची पर्वा न करता त्यांच्यावर चालून जायचे… सिंह जसा हत्तीवर धावून जातो तसे!

आपण कोणत्या कामगिरीवर निघालो आहोत, कुठे निघालो आहोत हे घरच्यांना सांगण्याची सोय, परवानगी आणि इच्छाही नव्हती.

ही काही पहिलीच मोहीम नव्हती अरुणसिंग यांची. काश्मीर खोऱ्यात केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल एक सेना मेडल आधीच त्यांच्या नावावर आहे. घरी सेवानिवृत्त सैन्य अधिकारी असलेले वडील आहेत, आई आहे. आजोबा सुद्धा फौजेत अधिकारी होते. त्यांच्या सारखाच गणवेश अरुण सिंग यांनी अंगावर चढवला होता.. स्वकर्तृत्वाच्या जोरावर.

अरुण सिंग यांनी केवळ सहा वर्षांच्या कारकीर्दीत अनेक कठीण अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. यात पर्वतारोहण, अतिउंचीवरील युद्धाभ्यास, खोल समुद्रात सूर मारून कामगिरी फत्ते करणे, पाण्याखालून केले जाणारे युद्ध, कमांडो अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश होता. पुढे ते स्वयंस्फूर्तीने 9, PARA SPECIAL FORCES मध्ये दाखल झाले.

त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल शंकर रॉय चौधरी साहेबांचा साहाय्यक (ए. डी. सी. ) म्हणून काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली होती, पण अरुण साहेबांना प्रत्यक्ष युद्धभूमीत लढण्यातच जास्त रस असल्याने त्यांनी ही मोठी संधी नाकारली.

कठोर शारीरिक मेहनत करण्याची त्यांची नेहमीच तयारी असे. एका प्रशिक्षणात पाठीवर चाळीस किलोग्राम वजन घेऊन साठ किलोमीटर्सचे अंतर चालून जायचे होते. त्यांच्या पाठीवरच्या पिशवीचा बंद तुटला. हे प्रशिक्षण नंतर पूर्ण करण्याची सवलत प्रशिक्षकांनी त्यांना देऊ केली होती. पण सवलत घेण्यास स्पष्ट आणि नम्रपणे नकार देऊन अरुण साहेबांनी एका हातात रायफल आणि एका हातात ती वजनदार पिशवी घेऊन निर्धारित वेळेत साठ किलोमीटर्स अंतर पार केले होते!

आज त्यांच्या नेतृत्वात निवडक सैनिकांची तुकडी अतिरेकी लपले होते त्या गुहेच्या अगदी समीप पोहोचण्यात यशस्वी झाली होती. पण अतिरेक्यांना चाहूल लागली आणि त्यांनी वरून बेफाम गोळीबार सुरु केला, हातगोळे फेकायला सुरुवात केली. आता सर्वांनाच धोका होता… आता काही नाही केले तर सर्वांनाच मरणाला सामोरे जावे लागणार….

अरुण सिंग त्वरेने गुहेकडे झेपावले… समोर आलेल्या एका अतिरेक्याच्या दिशेला ग्रेनेड फेकून त्याला उडवले…. तेवढ्यात दुसरा अतिरेकी अंगावर धाऊन आला… अरुण सिंग यांनी हातातल्या धारदार सुऱ्याने भोसकून त्याला यमसदनी धाडले.

तोवर इतर अतिरेक्यांच्या रायफलीतून सुटलेल्या काही गोळ्या अरुण सिंग यांच्या पायांत घुसल्या होत्या.. पण सहकाऱ्यांचा जीव धोक्यात होता म्हणून स्वत: पुढे होऊन स्वतः च्या जीवाची तमा न बाळगता अरुण सिंग यांनी प्रखर हल्ला चढवल्याने मागील सैनिकांना आडोसा घेऊन गोळीबार करण्यास सज्ज होण्याची संधी मिळू शकली.

अरुण सिंग जखमी अवस्थेतच गुहेत शिरले…. आत लपलेले अतिरेकी अंदाधुंद गोळीबार करीत होतेच… अरुण सिंग यांच्या छातीत गोळ्या घुसल्या… पण तरीही न थांबता पुढे सरसावत आपल्या जवळ होते ते सर्व हातबॉम्ब त्यांनी गुहेत भिरकावून द्यायला सुरुवात केली… अजून तीन अतिरेक्यांच्या चिंधड्या उडाल्या! तोवर आपले बाकीचे सैनिक गुहेत शिरले आणि त्यांनी उर्वरीत अतिरेक्यांना थेट वरचा रस्ता दाखवला.

त्या दिवशी त्या गुहेत वीस मृतदेह पडले होते…. वीस जिवंत बॉम्बच जणू आपल्या बहादूर सैनिकांनी डीफ्यूज केले होते! पण या धुमश्चक्रीत कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया गंभीर जखमी झाले होते. तब्बल नऊ दिवस हा सिंह सैनिकी रुग्णालयात मृत्यूशी झुंजत राहिला… प्रचंड वेदना होत असतांनाही या अवघ्या सत्तावीस वर्षे वयाच्या शूर सैन्याधिकाऱ्याच्या मुखावर हास्य विलसत होते….. स्वतः ला होत असलेल्या त्रासापेक्षा आपल्या हातून घडलेल्या पराक्रमाचा आनंद त्यांना जास्त होता… यासाठीच तर अट्टाहास केला होता सैन्यात येण्याचा.

त्यांना आपल्या तिसऱ्या पिढीत शौर्याची परंपरा कायम राखायची होती. पण यावेळी मृत्यू वरचढ ठरला… आणि कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया यांच्या नावाआधी ‘हुतात्मा’ शब्द लागला!

दिवस होता २६ सप्टेंबर, १९९५. आपले वडील ले. कर्नल प्रभात सिंग आणि मातु:श्री सत्यदेवी यांना मागे ठेवून ‘अरुण’ नावाचा शौर्य-सूर्य मृत्यूच्या क्षिताजापल्याड मावळून गेला!

सैन्यात अधिकारी झाल्यानंतर अरुण सिंग पहिल्यांदा लष्करी गणवेशात घरी आईसमोर आले होते, तेंव्हा त्यांनी आईला छान साडी भेट म्हणून आणली होती आणि आग्रह करून लगेचच ती साडी तिला परिधान करून यायला सांगितले आणि दोघा मायालेकांनी छान फोटो काढून घेतला…. हा फोटो आता एक स्मरणचिन्ह बनून राहिला आहे आई-वडीलांसाठी.

‘अशोक चक्र’ हा आपल्या देशाचा शांतता काळातील सर्वोच्च सैन्य पुरस्कार कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया यांना मरणोत्तर देण्यात आला. ले. कर्नल प्रभात सिंग (सेवानिवृत्त) आणि मातु:श्री सत्यदेवी यांनी कै. अरुण सिंग यांच्या वतीने हे ‘अशोक चक्र’ मोठ्या अभिमानाने स्वीकारले.

पंजाबातील पठाणकोट जिल्ह्यात सुजनपूर येथे जन्मलेला हा ‘सिंह’ जम्मू-कश्मीर मधल्या लोलाब खोऱ्यातील जंगलाचा ‘वाघ’ (Lion of Lolab Valley, Jammu-Kashmir) म्हणून सैन्य इतिहासात अमर आहे! 

२२ सप्टेंबर…. कॅप्टन अरुणसिंग जसरोटीया साहेबांच्या पराक्रमाचे स्मरण करण्याचा दिवस ! 

जय हिंद! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जगायचं राहून जाता कामा नये… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ जगायचं राहून जाता कामा नये… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल, याची काहीच खबर नाही कोणालाच. आयुष्य जातं रुसण्या फुगण्यात, अबोला पकडण्यात, बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्षं निघून जातात. जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच पर्मनंट नाही, मित्रांनो. आज आहे तर उद्या नाही. शेवटी फक्त फोटोरुपी आठवणीच राहतात. जगून घ्या, बोलून घ्या, मनमुराद हसून घ्या, आलंच रडायला तर रडूनही घ्या. रुसलं असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा. प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. वय, नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा, जात पात, धर्म यापलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे. नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या. लहानपणी वाटतं, मोठं व्हावं. मोठेपणी वाटतं, श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं, परत लहान व्हावं. या सगळ्या चक्रव्युहात जगायचं मात्र राहून जातं. ज्याला जे आवडतं, त्यासाठी स्वतः वेळ काढावा. खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे? आणि समजा कमवलं, तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे, यावरही आपला अभ्यास हवा. आज मन मारून जगालही पण तुमच्या मनाचं काय ? पैसे नक्कीच कमवा, पण स्वतःसाठी ही थोडं जगा, मित्रांनो. खूप काही कमवालही. पण स्वतःचे छंद, स्वतःची आवड, स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावूनही आपण कफल्लक आहोत. म्हणून मित्रांनो, जगायचं राहून जाता कामा नये असं जगा.

कवी :अज्ञात

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “कशी करू स्वागता…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “कशी करू स्वागता…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“हे रे काय शशांक !आज तू पुन्हा विसरलोस म्हणतोस!तूझ्या घरच्यांना तू सांगणार सांगणार म्हणालास आपल्या दोघांच्या प्रेमाबद्दल आणि आपल्या लग्नाबद्दल… आठवडा उलटून गेला तरी अजूनही तुला घरी तुझ्या आईबाबांना सांगता आलं नाही… का त्यांचा आपल्या प्रेमाला, लग्नाला विरोध होईल याची भीती वाटतेय का?… पण त्यांनी नकार देण्याचं एक तरी ठोस कारण त्यांच्या कडे असेल असं तुला तरी वाटतयं का?.. नाकीडोळी नीट, गौर वर्ण, तुझ्या इतकीच उच्च विद्याविभूषित, सुखवस्तू कुटुंबातील, बॅंकेत अधिकारी पदावर नोकरीत… आणि मुख्य म्हणजे दोघेही कोब्रा.. मग त्यांना अडचण कसली येतेय!.. का तुला घरी सांगायला धीर होत नाही!… अजूनही या वयात त्यांना घाबरतोस. !. तु घेतलेला निर्णय त्यांना मान्य होणार नाही असं वाटतयं!.. मग हा विचार आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा नाही तुझ्या डोक्यात आला?… आता माझे घरचे तर कधीचे वाट पाहत खोळबंलेत तुझ्याकडचा हिरवा कंदील दिसल्यावर रितसर तुझ्या घरी येऊन आईबाबांशी बोलयला ठरवायला येण्यासाठी… आणि आणि तू अजून साधं घरी बोलला देखील नाहीस!… काय म्हणावं तुझ्या या डरपोक स्वभावाला!… कधी ? कशी ? तड गाठणार आपण!… तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहेना? का ते देखील वरवरचं आहे… तसं काही असेल तर आताच सांग बरं.. मग आपल्याला आपले मार्ग बदलायचे म्हटले तर तसा विचार करता येईल… गेली दोन तीन वर्षे आपण याच ठिकाणी रोजचं भेटत आलो आहोत आणि इथेच व्हायची असेल कायमस्वरूपी ताटातूट तर ती देखील इथेच होउन जाऊ दे… काय होईल मनाला फार लागेल… हिरमोड होईल काही दिवस… पण हळूहळू नंतर मन स्थिर होत जाईल… प्रेमभंगाचं दुख तसं विसरू म्हणता कधीच विसरता येत नाही हेही तितकंच खरं.. पण असं एकट्यानं पुढचं आयुष्य कसं काढणार नाही का?.. तेव्हा मीच आता पुढाकार घेते आणि सांगते आतापासूनच आपण दूर होणं चांगलं होईल… जे झालं ते कधी घडलचं नव्हतं असं समजूया आणि पुढे आपण वेगवेगळ्या वाटेने जाऊया. !.. तुला माझ्या कडून प्रेमपूर्वकशुभेच्छा. !.. चल मी आता इथं फार वेळ थांबत नाही निघतेय… “

. “.. अरे हे काय ?ते कोण बरं आपल्या कडे येतायेत? माझ्यातर ओळखीचे कोणी दिसत नाहीत… शशांक तू ओळखतोस काय त्यांना?.. ते आता आपल्या दोघांना इथं बघूनच आणखी जवळ येऊ लागलेत!…. आपल्या दोघांना ते ओळखत तर नसावेत ना?.. मग तर टांगा गावभर फिरलाच म्हणायला हवा!… “

. “.. तेजश्री अगं ते माझे आई बाबाच आलेले दिसतायेत!… बापरे म्हणजे ज्याला मी घाबरत होतो तेच मी आता रंगे हाथ पकडला गेलो. !.. तेजू आता माझी काही धडगत दिसत नाही गं. !.. ते काय बोलतील कसं वागतील याचा काही अंदाज येत नाही!… पण तु काही घाबरून जाऊ नकोस ते तुला काही बोलणार नाहीत.. बोलतील ते मलाच… हं आता काय आलीया भोगासी असावे सादर… जे जे काय होईल ते ते पाहत राहावे… आणि जो निर्णय देतात तो स्विकारणे हेच बरे!… काहीही न बोलता उभे राहणे हेच इष्ट… “

… ‘अरे शशांक तू इथे काय करतो आहेस? आणि हि कोण आहे तुझ्या बरोबर? ऑफिस सुटल्यावर तू रोज गाण्याच्या क्लासला जातो असं सांगून घरी उशीरापर्यंत येत असतोस तर हाच आहे वाटतं तुझा गाण्याचा क्लास… अगदी हिंदी सिनेमातील गाण्यातून दिसणारा हिरो हिराॅईन झाडाझुडपातून लपून छपून गाणी म्हणत असतात तसाच चालत असतो काय इथं रोजचा क्लास?. आणि काय रे काय नाव आहे तुझ्या या गाणं शिकविणाऱ्या देवीचं?… रोजचा रियाज इथचं होतो कि आणखी कुठं बैठक होते… आम्ही दोघं आज जरा आमच्या पूर्वीच्या जुन्या आठवणींच्या ठिकाणी जाऊन त्यावेळेच्या… म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीच्या आठवणीना उजाळा द्यावा म्हणून इकडे आलो होतो.. ते झाडं आम्ही शोधत असताना नेमके दोघं त्याच झाडाखाली दिसले… क्षणभर आम्हीच आम्हाला त्यावेळेचे दिसून आले… कोण आहेत ते आणि कसे दिसतात… त्यांना आपला अनुभव सांगावा कि या झाडाखाली प्रेम करणाऱ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतात असं हे शुभ शकुनाचं झाडं आहे… तुमचं देखील प्रेम सफल होवो असं शुभ चिंतन पर बोलावं महणून झाडाजवळ जाऊ लागलो तर तो तू दिसलास या देवी बरोबर… तुमचे सुर तर चांगलेच जुळलेले दिसतात शिवाय तालही छान धरलेला दिसतोय… मग देवींनी आपल्या बंद्याला गंडा कधी बांधायचं ठरवलयं?… का अजूनही आरोह अवरोहात गाणं गुंतून पडणार आहे… आम्हाला बोलवा बरं गंडाबंधनाच्या मुहूर्ताला… ‘

‘ आई बाबा तुम्हाला सांगणार होतोच!… पण सागंयाचचं कसं?… असो आता तुम्ही दोघही इथं अचानक येऊन मला पकडलतं तर सांगूनच टाकतो… हि तेजश्री… आम्ही दोघं दोन तीन वर्षापासून एकमेकांना भेटत आलो आहोत.. आणि आता आम्ही लग्न करण्याचं निर्णय घेतला आहे… तेव्हा तुमची संमती… “. ती तर आम्ही तेजश्रीच्या आईबाबांना मघाशीच कळवली आहे… तेव्हा तुला काय वेगळी द्यायला नको… आणि काय रे शशांक या गोष्टी आपल्या घरी वेळीच सांगायच्या असतात!… प्रेमात माणसानं निर्भीड असावं लागतं… डरपोक, बुळ्या असून चालत नाही.. वेळेवर निर्णय घेणं जास्त महत्त्वाचं नाहीतर चौदहवी का चाॅंद झालाच म्हणून समजा… “

“पण आई बाबा आज अचानक इथचं येण्यामागचं प्रयोजन कसं ठरलं.. ?”.

“अरे शशांक तेजश्रीचे आई बाबा आज आपल्या घरी आले होते आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा सुखद धक्का तुम्हाला देण्याचा ठरवला… आणि तुमचं येत्या आठवड्यात गंडाबंधनाचा मुहूर्त आम्ही काढलाय बरं.. तेव्हा लागा आता तुमच्या नव्या मैफिलीच्या तयारीला…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३० ☆ श्री अरविंद लिमये ☆

थोड्याच दिवसात येऊ घातलेलं तिचं बाळंतपण, आर्थिक ओढग्रस्तता.. सगळंच माझ्या मनातल्या संशयाला पुष्टी देणारंच होतं. पण तो संशयाचा कांटा मनात रुतण्यापूर्वीच मी क्षणार्धात उपटून तो दूर भिरकावून दिला. नाही… सुजाता असं कांही करणं शक्य नाही… ! मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन कुरतडत राहिला.

“सुहास, इतर कुठल्यातरी रिसीटमधे चूक असेल.. काहीतरी गफलत असेल. त्या कॅशमधे चूक असणं शक्यच नाही… “

“सगळ्या रिसिटस् दोन दोनदा चेक करून खात्री करून घेतलीय सर. सगळं बरोबर होतं. त्यादिवशी सगळेजण खूप उशीरपर्यंत याच व्यापात होतो. पण आता काळजीचं कांही कारण नाहीय सर. त्या संध्याकाळी आम्ही प्राॅब्लेम साॅल्व्ह करुन मगच घरी गेलो सर. आता प्रॉब्लेम मिटलाय. पैसेही वसूल झालेत. “

मी दचकून बघतच राहिलो क्षणभर.

“प्रॉब्लेम मिटलाय? पैसे वसूल झालेत?म्हणजे?कसे?कुणी भरले?”

“मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. तुम्ही मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलायत हेही सांगितलं. त्यांनी लगेच पैसे पाठवले सर. “

ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसिव्हर ठेवून दिला.

माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देने बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं, पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असंच वाटू लागलं. मी शांतपणे डोळे मिटून खुर्चीला डोकं टेकवून बसून राहिलो. पण स्वस्थता नव्हती.

माझ्या मिटल्या नजरेसमोर मला सगळं स्वच्छ दिसू लागलं होतं… ! हो. हे असंच घडणाराय.. !माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयग्रस्त नजरेने माझ्याकडे पहातायत असा मला भास झाला… न्.. मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो.

काहीतरी करायलाच हवं… पण काय? मन सून्न झालं होतं. काय करावं तेच सुचत नव्हतं. आणि.. आणि अचानक.. अस्वस्थ मनात अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक धूसर विचार सळसळत वर झेपावला… आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो…!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

माझ्या घराजवळ पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात म्हणून की काय कोण जाणे पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं.

काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकुर बघुन माझे पाय थबकले. “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली.

मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?”

ती म्हणाली, “ नाही. “बडी बेंच” नवा नाही. मागच्या बाजुला होता तो फक्त पुढे आणलाय. “

“बडी बेंच??”माझी उत्सुकता वाढली. buddy म्हणजे मित्र पण buddy bench म्हणजे नक्की काय असावं?

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, “आम्हाला जर कधी एकटं वाटत असेल, वाईट वाटत असेल, कुणी खेळायला घेत नसेल ना तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं. मग इतर मुलांना समजतं आणि कुणीतरी येतं बोलायला, खेळात घ्यायला, मैत्री करायला आणि मग एकदम बरं वाटतं” तिनं उलगडा केला.

“अगबाई ! हो का?” मी चकित होऊन म्हणाले.

… किती सुरेख कल्पना आहे ! केवढाली ओझी असतात या लहान जीवांच्या पाठीवर. अभ्यास, परीक्षा, रुसवे, फुगवे, एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताण-तणाव!

“पण कुणी आलच नाही बोलायला तर?” आयुष्यातल्या अनुभवाने मला विचारण्यास भाग पाडले.

तिनं आश्चर्याने माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हाताने मागे केल्या व ती म्हणाली, “ का नाही येणार? एकजण तरी येतच कारण त्यासाठीच तर आहे ना हा बेंच. ” या बाईला इतके साधे कसे कळत नाही असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.

एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं या नैसर्गिक भावना आहेत. त्या भोळभाबड्या जगात सुद्धा काळज्या असतात. अपेक्षांचं ओझं असतं. एखाद्याला खेळात न घेणं असतं. एखादीला नावं ठेवणं असतं. आई-बाबांकडून रागवून घेणं असतं. आणि त्यावर Buddy Bench हा एक सोपा पर्याय आहे. मला कौतुक वाटलं.

“किती छान माहिती सांगितलीस ग ! तू कधी बसली आहेस बडी बेंच वर?” माझ्या तोंडून गेलंच.

“होऽऽऽ. नवी होते तेव्हा खुप वेळा. त्यानंतर कित्तीऽऽ मैत्रिणी मिळाल्या. ” तिच्या मोकळेपणाने मोहित होऊन मी पुढे चालु लागले.

मनात येत राहिलं…फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का? मोठ्यांसाठी का नाही? ऑफिसमधे, डॉक्टरकडे, वकिलाकडे, कॉलेजमधे, परीक्षा गृहात, लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर? त्यामुळे अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधारेल का? जगातील एकटेपणा कमी होईल का? काहीवेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं. नाहीतरी थेरपिस्टशी बोलणे आणि काय असते?

… कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी, समदुःखी असणाऱ्याशी, चार पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल. त्यामुळे जड झालेले ओझे थोडेसे हलके होईल. नाही का?

त्या बेंचवर खाली दोन ओळी लिहल्या होत्या..

…. चल.. बसू, बोलू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न,

 उदात्त हेतू मनी ठेवुनी होऊ buddy, यार, सखा, मित्र ! … “ 

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संपलं ग नवरात्र… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ संपलं ग नवरात्र… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

देवीच नवरात्र आलं आलं म्हणता म्हणता आता संपलं सुध्दा…. दिवस कसे भुर्रकन उडून गेले..

किती तयारी आणि गडबड चालली होती…. माती आणायची, सप्त धान्य पेरायचं आणि मग….. ती वर उगवून आलेली हिरवीगार लुसलुशीत पात… त्याचा अलवार स्पर्श… तो सुंदर असा सृजनाचा सोहळा डोळे भरून पाहायचा.. घट बसवायचे, कडकण्या करायच्या, रोज एक माळ अर्पण करायची..

श्री सूक्ताची एकवीस आर्वतन… सप्तशतीचा पाठ..

धागरा घालून केलेला गरबा…. भोंडल्याची गाणी म्हणत धरलेला फेर.. नंतर खिरापतीची मजा…

भजनाचे कार्यक्रम.. त्यात गोंधळ, जागरण हवाच…. कुंकूम् आर्चन, सवाष्णीच्या ओट्या नि कुमारीपुजन…

रोज रंगीबेरंगी जरीच्या साड्या.. दागिने… बाहेर जाणं… सर्वांना भेटणं मग गप्पा……

टाळ घेऊन आरत्या म्हणायच्या… घरी गोंधळी बोलवायचा. डफ तुंतुण्यावर म्हटलेली देवीची गाणी ऐकायची..

निरनिराळे उपवासाचे पदार्थ.. आरास, रांगोळ्या.. नऊ दिवस रोज देवीदर्शनाला जायची गडबड..

नवरात्रीची सांगता देवीला पुरणावरणाचा नैवेध दाखवून…..

कसं भारावल्यासारखंच वातावरण असतं नाही का ?

दसरा झाला आणि आज बघ….. सगळं कसं शांत शांत झालं

अगं लक्षात घे….

नवरात्री पुरतीच देवी आई आली होती का?….. ती जगतजननी आहे …. ती इथेच असते.. तिच्या देवळात…. आपली वाट बघत उभीच असते … आपण मात्र फक्त त्या त्या दिवसापुरतं जातो तिच्याकडे…

गर्दीत, गोंधळात हारा फुलांच्या राशीत एक मिनिट तिला बघतो…

आता एक कर.. शांतपणे उद्या परवा जा तिच्याकडे… देऊळ रिकामं असेल.. सजावट काढली असेल…

कुठलाही भपका नसेल…. बसावं तिच्या समोर..

… इतर वेळेस पण भेटावं ग देवी आईला…. नवरात्र नसताना सुद्धा … सहज आठवण आली म्हणून……

अचानक पण जावं ग…. किती बरं वाटेल तिला…. आणि आपल्यालाही…

— वाचता वाचता तिचे डोळे भरून आले……. मध्यंतरी फोनवर आई पण हेच म्हणत होती……

सवड काढून येत जा ग… बघावसं वाटतं तुला…

वाट बघणारी आई आहे तोपर्यंत भेटत जा ग तिला …. आईला तर कुठल्याच भारी साड्या, साज शृंगार, दागिने काही नको…… तुमचे दोन हात गळ्यात पडले आणि तुमच्या मिठीत सामावलं की ती तृप्त असते … स्पर्शाचं सुख वेगळंच असतं… आईला ते मनातून फार सुखावतं… आता तिला लेकीकडून फक्त एवढंच तर हव असतं…

तेवढचं तीच मागणं आहे ग….. आठवणीनं तुमच्या आईला आणि वडिलांनाही भेटायला जाऊन या….

… नाहीतरी देव अजून वेगळा कुठे असतो गं.. !!!!

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक वरदहस्त जन्मतो तेव्हा !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

एक वरदहस्त जन्मतो तेव्हा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

आपल्या देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब बंगळुरू मध्ये त्यांच्या प्रयोगशाळेत काही कामात मग्न होते. त्या शहरात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून सेवा करीत असलेले डॉक्टर प्रसाद काही निमित्ताने साहेबांच्या प्रयोगशाळेत आले. त्यांनी सहज उत्सुकता म्हणून तेथील एका उपकरणास हात लावला. ते धातूचे उपकरण एका महत्वाच्या संरक्षण प्रणालीमध्ये वापरले जायचे होते. आणि तो विशिष्ट धातू पदार्थ खास प्रयोगांती तयार केला गेला होता.

डॉक्टर प्रसाद यांनी ते उपकरण दोन्ही हातांनी उचलून ते किती जड आहे, हे पाहण्यासाठी उचलले… तर ते अगदी सहज उचलले गेले ! एखादा प्याला पाण्याने भरलेला आहे असा आपला समज असतो आणि आपण तो त्याच्या वजनाच्या अंदाजाने उचलायला जातो आणि तो प्याला उचलला की तो अनपेक्षितपणे हलका आहे, हे आपल्या ध्यानात येते तेंव्हा जशी आपल्या मनाची अवस्था होते, तशी अवस्था डॉक्टर प्रसाद यांची झाली !

एवढे मजबूत आणि मोठे उपकरण आणि वजन अगदी नाममात्र ! डॉक्टर प्रसाद यांच्यातील मेडिकल डॉक्टर आता जागा झाला ! त्यांनी डॉक्टर कलाम साहेबांना विचारले… “ माझ्या पोलिओ रुग्णांना तीन चार किलो वजनाचे calipers (आधार देणाऱ्या धातूच्या पट्ट्या) शरीरावर वागवत वावरावे लागते. त्या पट्ट्या या धातूंच्या बनवल्या तर? “

कलाम साहेबांनी स्वतः रुग्णालयात जाऊन ते बालरुग्ण पाहिले… त्या धातूच्या पट्ट्यांचे वजन पेलत पेलत केविलवाण्या हालचाली करणारे… वीस – तीस रुग्ण होते !…. कलाम साहेब तात्काळ त्यांनी प्रयोगासाठी वापरायला म्हणून तयार केलेल्या धातूपासून पोलिओग्रस्त रुग्णांसाठी calipers तयार करण्याच्या कार्याला लागले…. देशाच्या संरक्षण विषयक प्रकल्पात अतिशय व्यग्र असतानाही साहेबांनी मुलांसाठी वेळ काढला… आणि तीन चार किलो वजनाचे caliper अगदी काही शे ग्राम वर आणून ठेवले… मुलांच्या शरीरावरचा आणि त्यांच्या पालकांच्या मनावरील भार या महान शास्त्रज्ञाच्या सहकार्यामुळे, संशोधनामुळे अगदी हलका झाला होता ! सुमारे पन्नास हजार रुग्णांना या नव्या पद्धतीच्या उपकरणाचा त्यावेळी लाभ झाला!

१५ ऑक्टोबर…. डॉक्टर कलाम साहेबांचा जन्मदिवस…. ! एवढा प्रचंड माणूस भारताला दिल्याबद्दल देवा… तुझे किती आभार मानावेत?

(१५ ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे जगाने मान्य केले. पण जगात हा दिवस तसा फारसा साजरा केला जात नाही, असे दिसते… पण आपण केला पाहिजे!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सगळीकडे फक्त आणि फक्त ‘टाटा‘ ? – श्री चारुचंद्र उपासनी ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ सगळीकडे फक्त आणि फक्त ‘टाटा‘ ? – श्री चारुचंद्र उपासनी ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

काही वर्षांपूर्वीची गोष्ट, कुणी एक अमेरिकन इंजिनिअर, त्याच्या तेथील उद्योगाशी निगडित असलेल्या मुंबईतील उद्योगाच्या कामासाठी जेमतेम एका दिवसासाठी मुंबईत येणार होता. त्या निमित्तानं त्याचं भारतात प्रथम‌च येणं होणार होतं. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला आशियातील गरीब देश आहे, या व्यतिरिक्त त्याला भारताची फारशी माहिती नव्हती.

या एकदिवसीय वास्तव्यात भारताविषयी प्रत्यक्ष जी माहिती मिळेल ती घ्यावी या उद्देशानं त्यानं, भारतीय विमान कंपनीनं, Air India नं भारतात येण्याचं ठरवलं. एका गरीब देशाची ही विमान सेवा त्याला अपेक्षेपेक्षा उत्तम वाटली. Air India विषयी थोडी चौकशी केली असता त्याला कळलं की कुणी ‘ टाटा ‘ नावाच्या उद्योजकानं – ही कंपनी स्थापन करून ती नावारूपाला आणली. त्याला मोठं कौतुक वाटलं, त्यानं ठरवलं की त्याला आता पुढे भारतात ज्या ज्या उत्तम गोष्टी आढळतील त्या त्या गोष्टींसंबंधी असलेल्या श्रेष्ठ भारतीयांची नावं लक्षात ठेवायची. ‘ टाटा ‘ हे नाव प्रथमच समोर आल्यामुळे ते त्याच्या मनात पक्क ठसलं होतं.

ऐन रात्री तो जेव्हा मुंबई विमानतळावर उतरला तेव्हा त्याच्या नावाचा फलक मोठ्या तत्परतेनं हातात घेऊन एक सेवक गणवेशात बाहेर उभा होता, त्या सेवकानं मोठ्या नम्रतेनं त्या इंजिनिरचं स्वागत केलं. हॉटेल मध्ये नेण्यासाठी आणलेल्या कारकडे पहाताच गाडीवरील ‘ टाटा मोटर्स ‘ ह्या नावानं तो अचंबित झाला. तो मनात म्हणाला,

‘अच्छा, अच्छा हा टाटा गाड्या पण बनवतो वाटतं ‘ एकच माणूस विमान आणि गाड्या अश्या दोन्ही उद्योगांत आहे ह्या योगायोगाचं त्याला आश्चर्य वाटलं. आता त्याला भारतातील इतर उद्योग आणि उद्योगपति यांच्या विषयी उत्सुकता वाटत होती. बोलता बोलता त्याचं नियोजित हॉटेल आलं. ते भव्यसुंदर हॉटेल समोर असलेल्या समुद्राच्या सान्निध्यात अधिकच सुंदर दिसत होतं, त्यावर केलेली मोजकी रोषणाई रात्री डोळ्यांना सुखवीत होती, वास्तुशिल्पाच्या सौंदर्यानं विनटलेल्या त्या हॉटेलनं त्याचं चित्त चांगलच आकर्षून घेतलं. आत शिरल्यावर तेथील टोकाची स्वच्छता टापटीप शिस्त अन् अगत्य पाहून तो भारावून गेला. त्यानं कुतूहलमिश्रित आश्वर्यानं विचारलं, ‘ कुणाचं हॉटेल आहे हे? ‘

‘टाटांचं, टाटा समूहाचं ताज हॉटेल आहे हे ‘ या उत्तरानं त्याला वाटणारं आश्चर्य आणखीनच वाढलं.

ताजातवाना होण्यासाठी तो तेथील न्हाणीघरात गेला, तिथल्या अत्यंत स्वच्छ वातावरणात त्याचं लक्ष समोरच्या पांढऱ्या शुभ्र गुबगुबीत टॉवेलनं वेधून घेतलं. अंग पुसण्यासाठी त्यानं तो सुंदर टॉवेल हातात घेतला अन् आश्चर्याचा आणखी एक सुखद आघात त्याच्यावर झाला, त्या टॉवेलवर मुद्रा होती ‘ टाटा टेक्स्टाईल ‘ ची. मनातल्या मनात तो म्हणाला ‘आश्चर्यच आहे या टाटाचं ! या एवढ्याश्या वेळात अप्रत्यक्षपणे किती वेळा सामोरा येतो आहे हा ‘ टाटा ‘.

तेवढ्यात एका चिनी भांडयांच्या संचात चहा आला, त्या चहाच्या घमघ‌माटानं तो प्रसन्न झाला, त्या चिनी मातीच्या छानश्या कपबश्या, किटली त्यानं निरखल्या, त्यावर लिहिलेलं ‘ टाटा सिरॅमिक्स ‘ हे उत्पाद‌काचं नाव वाचल्यावर मात्र त्यानं आश्चर्य वाटून घ्यायचं नाही असं ठरवलं. आता एखादं दुसरं नाव वाचायला ऐकायला मिळालं तर त्याला आश्चर्य वाटणार होतं. चहाचा स्वाद त्याला इतका आवडला की, तसा चहा बरोबर घेऊन जावा म्हणून त्यानं त्या चहाची चौकशी केली आणि त्याला आता अपेक्षितच उत्तर मिळालं कारण तो होता ‘ टाटा टी ‘

रात्रीची उशिराची वेळ होती, तो आता लगेच झोपणार होता. तेथील सर्व सेवक आणि सेविका यांची हसत‌मुख आणि नम्र वागणूक त्याला आवडली होती. त्यांच्यापैकी संबंधित व्यक्तींचे आभार मानून तो झोपायला निघाला. स्वागतकक्षात ओळख झालेली मुलगी समोर होती. तिनं त्याला शुभेच्छा दिल्या पण तिच्याकडे पहाताच त्याच्या लक्षात आलं की त्या सर्व हसतमुख सेवकांमध्ये ती एकटीच काहीशी उदास दिसत होती. झोपण्यापूर्वी क्षणभ‌रा‌साठी त्यानं टी व्ही लावला, तिथे त्याला एक जाहिरात पहायला मिळाली, ती होती टाटा सॉल्ट्ची.

सकाळी वेळेवर तो मुंबईतील त्याच्या अमेरिकेतील सह‌योगी कंपनीत पोहोचला. तिथे त्यांना अडचणीत आणणाऱ्या काही यांत्रिक अन् अभियांत्रिक समस्यांवर चर्चा होणार होती. त्यासाठी एका तरुण शास्त्रज्ञालाही बोलवण्यात आलं होतं. चर्चा खूप उत्साहजनक आणि प्रश्न मार्गी लागतील अशा दिशेनं झाली, आणि अपेक्षेपेक्षा ते बरेच लवकर निष्कर्षापर्यन्त पोहोचले. त्या शास्त्रज्ञाशी त्याची तेवढ्या वेळातच छान गट्टी जमली आणि त्याच्या विनंतीवरून तो अमेरिकन इंजिनिअर त्याच्या बरोबर एक फेरफटका मारायला निघाला. तो म्हणाला, ‘ मी ज्या जागतिक कीर्तिच्या संस्थेत उपयोजित भौतिक शास्त्र आणि उपयोजित गणितशास्त्र यांचा अभ्यास केला तिला आपण प्रथम धावती भेट देऊ. ‘.. तिथे पोहोचताच त्याला संस्थेचं नाव दिसलं, ‘ टाटा इन्स्टिट्यूट् ऑफ् फंडामेंटल् रीसर्च् ‘ बाहेर पडताच त्या शास्त्रज्ञानं त्याला सांगितलं की इथे मानवशास्त्रांच्या अभ्यासाला वाहिलेली ‘ टाटा इन्स्टिट्यूट् ऑफ् सोशल् सायन्सेस् ‘ ही पण एक संस्था आहे. त्या फोर्ट् भागातून फिरतांना मध्येच एका भव्य वास्तुकडे बोट दाखवीत तो शास्त्रज्ञ म्हणाला, ‘ ह्या भागातील जागांचे भाव तुमच्या न्यूयॉर्कपेक्षाही अधिक आहेत तरी एका दानशूर घराण्याच्या उदारतेमुळे नाट्य, संगीत आदि क्षेत्रातल्या नवोदित व्यक्तींना आपली कला विनासायास सादर करता यावी म्हणून हे ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् ‘ इथे उघडलं आहे.

‘हे दानशूर घराणं टाटांचं ना? ‘ त्या अमेरिकेन इंजिनिअरनं विचारलं,

‘तुम्हाला कसं माहिती? ‘ त्या शास्त्रज्ञानं चकित होऊन विचारलं. ‘ हा माझा तर्क आहे ‘ अमेरिकेन म्हणाला.

‘तुमचा तर्क अगदी बरोबर आहे ‘ शास्त्रज्ञानं उत्तर दिलं. याच टाटा समूहानं TCS या त्यांच्या कंपनीद्वारे लाख्खो तरुणांना रोजगार दिला आहे.

फेरफटका झाला आणि तो हॉटेलमध्ये पोहोचला. जेवण करून रात्रीच्या विमानानं जाण्यासाठी तो आता हॉटेल सोडत होता. आदल्या दिवशी रात्री त्याला भेटलेल्या स्वागतकक्षातील मुलीनं त्याचा अगदी हसत निरोप घेत त्याला प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. तिचे आभार मानतांना तो म्हणाला, ‘ तुम्हाला असं प्रसन्न पाहून मला बरं वाटलं, काल फारच तणावग्रस्त दिसत होता तुम्ही ! ‘

ती म्हणाली, “ माझ्या आईच्या मानेत एक छोटी गाठ होती ती शस्त्रक्रिया करून काढली, ती कॅन्सरची आहे की नाही हे तपासण्यासाठी इथल्या ‘ टाटा कॅन्सर हॉस्पिटल ‘ मध्ये पाठवली होती. काल मी त्या चिंतेत होते, आज सकाळी तो रिपोर्ट आला, गाठ साधीच निघाली त्यामुळे मी चिंतामुक्त झाले “. यावर तिचं अभिनंदन करून तो निघाला.

मुंबईच्या आकाशात विमान झेपावलं आणि त्या लखलखत्या महानगरीकडे पहात असतांना त्याच्या मनात विचार आला, ‘ एवढा प्रचंड लोकसंख्येचा देश पण इथे एकच माणूस खरं काम करतो आहे ! ‘

ज्या टाटा समूहानं हा देश अशा उंचीवर आणून ठेवला त्या टाटा समूहाचे शेवटचे कुलतंतु रतन टाटा यांना कृतज्ञतापूर्ण आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

लेखक : चारुचंद्र उपासनी

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्री – तारुण्यातील आणि पन्नाशीनंतरची… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मैत्री – तारुण्यातील आणि पन्नाशीनंतरची… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

तारुण्यातील मैत्री व पन्नाशी पार नंतर ची मैत्री यात बराच फरक असतो.

तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण तेव्हां मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो…. मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हां पन्नाशीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळत सुध्दा नाही…

जेव्हा पन्नाशीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हां सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते कि, ती मैत्री खूपखूप हवी हवीशी वाटत असते.

नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्या आड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा – गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादु:खात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे ‘नवरत्ना’ तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटंल तर वावगे ठरणार नाही.

आपण कोणाचे कोणीच नसतो पण आपलं मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रुपात ही नक्कीच होते.

आत्ता आयुष्याची पन्नाशी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हां या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया….

कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठे पर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे…

ते आले की उतरावेच लागते…

म्हणून जो पर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे मनातल्या तक्रारींना काढून टाकूया. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू ? म्हणून मैत्रिची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!!

पण अशी मैत्री समजुन घेणारे फार कमी असतात. ज्याला खरे निस्वार्थी मित्र लाभले ते भाग्यवान…

Friends Forever…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धर्मो रक्षति रक्षितः ।। ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ धर्मो रक्षति रक्षितः ।। ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज विजयादशमी. नऊ रात्र ( दिवस) साधना केली, शक्तीची आराधना केली तर विजयाची दशमी येणे अगदीच स्वाभाविक….. !!!

आपल्या पूर्वसुरींनी याचि अनुभूती घेऊन आपल्याला हे करायला सांगितले. भारतात जशी टाटांनी बनवलेली प्रत्येक गोष्ट चांगली असणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात खात्री /विश्वास आहे, अगदीच तीच खात्री/विश्वास आपल्या धर्माने सांगितलेल्या प्रत्येक कर्मकांडावर ठेवून, आपण त्याप्रमाणे आचरण केले तर भारतात पुन्हा सोन्याचा धूर निघेल यात शंका नसावी.

संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,

“धर्माचे पालन । करणे पाखंडखंडण ।। 

हेचि आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम।।”

(अभंग क्रमांक २०७६ : सार्थ तुकाराम गाथा)

सध्या बाजारात SAP, oracle, ERP अशी विविध प्रकारची softwares उपलब्ध आहेत. अनेक कंपन्या त्या विकत घेतात आणि त्याचा उपयोग आपल्या व्यवसायासाठी करतात. सनातन धर्माचे एक software आणि एक हार्डवेअर आहे. ते आपण नीट आचरणात आणून पाहिले तर ते चांगले की वाईट हे ठरविणे सोपे जाईल. पण आजची तथाकथित विद्वान मंडळी, अमलात, आचरणात न आणता हिंदू धर्माला नावे ठेवतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

मनुष्य श्रद्धेवर जगत असतो. पुढचा क्षण नक्की आनंदाचा असेल अशी श्रद्धा मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. ही श्रद्धा टिकून रहावी म्हणून धर्माने काही कर्मकांड सांगितली आहेत. एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये अमुक बटण दाबले की अमुक होते आणि दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये तेच बटण दाबून काहीतरी वेगळे होते, याचा अर्थ पाहिले software निकामी झाले आहे असे म्हणणे हे जितके हास्यास्पद तितकेच सनातन धर्माचे पूर्ण श्रध्देने आचरण न करता त्याला नाव ठेवणे हास्यास्पद नव्हे काय ? कितीही महाग सॉफ्टवेअर घेतले, महागडा मोबाईल घेतला तरी त्यात एक anti virus software घ्यावं लागते. आपल्या धर्माने अशी काही antivirus software तयार केली आणि अमुक करू नका, अमुक करा असे सांगितले तर ते उचित नव्हे काय ?

आपल्या मागील अनेक पिढ्या सनातन धर्माचे प्रॉडक्ट आहेत. ते आपल्यापेक्षा जास्त कर्तृत्वावान होते, आनंदात होते, समाधानी होते असे म्हणता येईल कारण त्यांनी उभारलेल्या इमारती, किल्ले, निर्माण केलेल्या अनेक वास्तू, कलाकुसर आणि अनेक गोष्टीयाचि साक्ष देत आहे…..

जुने अवघे खराब हा मंत्र दुराग्रहाने आचरणात न आणता, त्यातील दोष (असल्यास) कमी करून नवीन पद्धतीने मांडणी करून, त्याचे आचरण आपण करू. हे एक प्रकारचे सिम्मोलंघन ठरावे.

शक्तीची उपासना करून प्राप्त केलेली शक्ति देव, देश आणि धर्माच्या कार्यासाठी खर्च करता आली तर ती शक्ती दुप्पट होऊन आपल्याकडे परत येईल, असा मला विश्वास आहे.

भारतासारख्या महान देशात आपण जन्माला आलो हेच आपल्या आयुष्याचे सोने म्हंटले तर अतिशयोक्ति होणार नाही. आज आपण सर्वांना शिलांगणाचे सोने वाटतो, लुटतो. हा उपक्रम याचि साक्ष देतो की भारतात रस्त्यावर मेथीच्या भाजी सारखे सोने विकले जात होते…….

जो दुसऱ्याला सोने द्यायला शिकवितो, तिळगुळ द्यायला शिकवितो, राखी बांधायला शिकवितो, तो धर्म किती महान असेल……

“ धर्मो रक्षति रक्षितः ।। “ 

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय!!!! भारत माता की जय!!!!

सर्वांना विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares