नाकी डोळी छान, साडेपाच फूट उंच, वर्ण गोरा, स्वयंपाकात निपुण, अत्यंत सोज्वळ, डबल ग्रॅज्युएट, सासू-सासरे घरात चालणार आहेत, नवऱ्याला सरकारी नोकरी नसली तरी चालेल, फक्त निर्व्यसनी हवा… इतके गुण असलेली मुलगी, लग्न होत नाही म्हणून दहा वर्षे घरात बसलेली…
काही कारणाने तिला कोणी पसंत करत नाही किंवा तिला तो पसंत पडत नाही….
असं न सांगता येणारं दुखणं…
अशा या मुलीच्या बापाला जो काही त्रास असेल, तोच मला त्रास!
भीक मागणारे आमचे वृद्ध आणि दिव्यांग आई-वडील, आजी-आजोबा यांना काम करण्याची इच्छा आहे परंतु कोणी काम देत नाही, यांच्या पुनर्वसनासाठी रोजगार केंद्र निर्माण करावे यासाठी जागा (स्थळ) शोधतो आहे, परंतु गेली दहा वर्षे कोणी “स्थळ” देत नाही.
काहींनी आम्हाला रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी “स्थळे” पाठवली, पण ती स्थळे आम्हाला पसंत नव्हती.
जी “स्थळे” आम्हाला पसंत होती… त्यांनी काही ना काही स्वरूपात माझ्याकडे बराच “हुंडा” मागितला…!
नोकरी सोडून वर संशोधन करणारा मी बाप… इतका हुंडा या “स्थळांसाठी” देणं मला कसं परवडेल?
याच परिस्थितीत श्री दानिश भाई धावून आले आणि मध्यरात्रीचे सूर्य या नावाचे रोजगार केंद्र नव्हे, आमची मुलगी त्यांनी आपल्या पदरात घेतली…
बिबवेवाडी येथील स्थळ दिले, नववधूचा विवाहापूर्वी करतात तो मेकअप करून दिला, इथे टीव्ही, फ्रिज, कार्पेट अशा सर्व बाबींचा इंतजाम केला. तोरणे लावली, हार फुले माळा लागल्या, “संसाराला” लागतील त्या सर्व गोष्टी दिल्या…!
खऱ्या अर्थाने त्यांनीच कन्यादान केले…!
मी माझ्या डोक्यावरची पगडी त्यांच्या पायाशी ठेवली… त्यांनी ती उचलून परत माझ्या डोक्यावर घातली…
नावातच “दान” आणि “इश” असलेल्या माणसा पुढे पगडीच काय, संपूर्ण आयुष्य बहाल केले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत…!
तर 30 एप्रिल 2025 रोजी, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, हा सोहळा संपन्न झाला.
दहा वर्षांपूर्वी भीक मागणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण व रोजगार केंद्र सुरू करायचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले. आमच्या वृद्ध आणि दिव्यांग आई-वडील आणि आजी आजोबा यांच्यामार्फत या रोजगार केंद्रात अक्षय तृतीयेच्या दिवसापासून प्रोडक्शन सुरू झाले.
या सोहळ्याविषयी पुढे लिहिलेच आहे, परंतु मला एवढीच एक “मुलगी” नाही… इतरही अनेक मुलींची अर्थ प्रकल्पांची… जबाबदारी बाप म्हणून माझ्या डोक्यावर आहे.
त्या विषयी अगदी थोडक्यात सांगतो, :
– अत्यंत गंभीर अवस्थेतील 5 रस्त्यावर पडलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, त्यांचे जीव वाचले आणि त्यांना आपापल्या गावी स्वखर्चाने पाठवले.
– एक धडधाकट (भीक मागणारा) मुलगा, याला श्री भाटे यांच्या वृद्धाश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. तिथल्या आजी आजोबांची तो सेवा करेल. मी श्री आणि सौ भाटे यांचा ऋणी आहे.
– रस्त्यावर पडलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अनेक लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पातून रोज जेवण दिले आहे.
– अनेक आजा मावश्या यांच्याकडून (खराटा पलटण) सार्वजनिक स्वच्छता करून घेऊन त्यांना किराणा (Grocery) दिला आहे.
– या महिन्यात जवळपास 900 लोकांना वैद्यकीय सेवा, लॅब टेस्ट तसेच वैद्यकीय उपकरणे दिली आहेत.
आणखी सुद्धा बरंच काही आहे…
पण सध्या आमच्या मुलीचा नवीन संसार सुरू झाला आहे… त्याचं कौतुक यावेळी जास्त आहे, म्हणून त्याविषयी जास्त सांगतो…
तर, आपणा सर्वांच्या मदतीने शुभाशीर्वादाने, भिक्षेकर्यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र” अक्षय्य तृतीयेला सुरू झाले
आता नेमका काय आहे हा प्रकल्प ते सांगतो…
याचना करत; भिक मागत जगणाऱ्या लोकांना कोणताही रोजगार उपलब्ध होत नाही, या कारणामुळे त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून काही प्रॉडक्ट तयार करून घेऊन, त्यांच्या “हाताला काम” आणि “पोटाला अन्न” सन्मानाने देण्यासाठी हा प्रकल्प निर्माण केलेला आहे.
या प्रशिक्षणा दरम्यान कोणालाही इजा होऊ नये, प्रदूषण कमीत कमी व्हावे किंबहुना प्रदूषणाला आळा बसावा आणि कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे
या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू असतील*
रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण)
डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम, त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक फार्मा कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर (Natural/ Organic)हवी असते.
धार्मिक स्थळांमध्ये किंवा रस्त्यावर पडलेल्या अशा फुलांचे निर्माल्य / कचरा आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून आम्हास देतील, किलोच्या भावाने आपण त्या विकत घेऊन त्यांना पैसे देऊ.
वृद्ध आणि दिव्यांग लोक बैठ्या स्वरूपात रंगानुसार या फुलांचे वर्गीकरण करतील.
* यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून, विशिष्ट तापमानात सुकवून फुलांची पावडर (चूर्ण / फाईन पावडर) केले जाईल. *
* स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल, त्यावर स्टिकर लावले जाईल. *
आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना, तयार झालेली फुलांची ही नैसर्गिक पावडर आपण देणार आहोत.
आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत….
रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल… (जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात)
कचरा आणि निर्माल्या मधून तयार होणारी लक्ष्मी… कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल… भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल!
शोभेचा बुके
तुळशी बागेत खोटे परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात, सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. आपण कोणालाही तो भेट दिला तरी ती व्यक्ती, पुन्हा कचऱ्यात फेकून देते.
माझी आई, जो बुके बनवते, तो दिसतो इतका सुंदर, की कुणीही प्रेमात पडावं…!
आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते.
आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना घेण्याची विनंती करू, देणगी म्हणून ते जे काही मूल्य देतील ते आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पगार म्हणून दिला जाईल.
खरंतर माझी स्थिती त्या चांगदेवांसारखीच झाली आहे…! मायना काय लिहावा, याबद्दल मी थोडा गोंधळलो आहे…!
… कारण, तू फक्त वयाने लहान, आणि ज्ञानाने मात्र मोठी… आणि मी फक्त वयाने मोठा…!
तू म्हणशील लोकं तुला ‘माउली’ म्हणतात…!
पण खरं सांगू यात माझे असे काय आहे……?
गीता भगवंताने सांगितली म्हणजे यात माझे काही नाही….!
माझ्या सद्गुरूंनी, आपल्या निवृत्तीदादांनी माझ्याकडून ती लिहून घेतली…!
दादाचे आपण आजपर्यंत ऐकतोच, मग यात माझे ‘कर्तृत्व’ ते काय..?
आईबाबा गेल्यावर लहान असूनही तूच आम्हाला आधार दिलास….!
‘…… ……… …… ‘
हा असे का बोलत आहे? असा तुला प्रश्न पडला असेल ना?
अग आज तुझी पुण्यतिथी!! म्हणून तुझ्याबद्दल चार शब्द सांगावे, असे निवृत्तीदादाने मला सांगितले…! .
अग, मला मांडे भाजून दिलेस ना? … तेव्हा तू माझी ‘आई’ झालीस…..!
मला ‘ताटी ‘उघडायला लावलीस तेव्हा तू माझी समजूत काढणारी ‘ताई’ झालीस…..!
…. हे दोन प्रसंग सर्वांना माहीत आहेतच…..! पण असे अनेक प्रसंग…!
मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही मुली, प्रसंग आला की लगेच मोठ्या कशा होता….?
मला तुझा खूप आदर वाटतो, मोठा आधार वाटतो आणि कौतुकही वाटतं….!
आपण चार भावंडे! सर्वात शेवटी तुझं नाव घेतलं जातं… पण तूच सर्वश्रेष्ठ आहेस असे मला नेहमी वाटतं आले आहे…! कारण आजही या जगात ‘मातृत्व’भावच सर्वश्रेष्ठ आहे..
सदगुरुकृपेने लोकं मला ‘माउली’ म्हणतात पण आईनंतर तूच माझी ‘माउली’ झालेली आहेस, त्यामुळे तूच सर्वश्रेष्ठ आहेस…! मला तुझा अभिमान वाटतो….! माझी मुक्तेश्वरी!!
तुझं कौतुक केले तर तुला कदाचित आवडणार नाही, पण आज तरी मला माझ्या लाडक्या मुक्तेचं मन भरस्तोवर कौतुक करू दे….!
मुक्ते!! आज सामान्य जनांना नुसतं ‘मुक्त’ करून चालणार नाही तर आपला ‘नरेंद्र’ (स्वामी विवेकानंद) म्हणतो तसे लोकांनी गोरगरिबांची सेवा करायला हवी….! आपल्या ‘भारतमाते’ला आज त्याचीच गरज आहे असे मला वाटते.
तू आदिमायेचा अवतार आहेस, मुक्त होण्यासाठी सर्वजण तुझ्याच चरणी येतील, तेव्हा तू हे सर्वांना सांग, सांगशील न….?
चल मुक्ते, थांबतो…!
तुझ्याशी बोलून आज मला खूप आनंद झाला…!
तुझा,
ज्ञानादादा.
(वैशाख वद्य दशमी, शके १९४७…. संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी…. त्यानिमित्त त्यांचे पुण्यस्मरण….! )
☆ “’मन:’ सामर्थ्य म्हणजे काय?” ☆ श्री जगदीश काबरे ☆
‘मन’ या शब्दाचा किती विविध प्रकारे अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करता येतो त्याची ही झलक…
‘मन’ हे भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती आणि भावविश्वाचा एक अतिशय गहन आणि महत्त्वाचा भाग आहे. मानवी जीवनाचे सर्व निर्णय, भावना, वर्तन, आणि भविष्य ‘मना’ च्या प्रभावाखाली असतात. ‘मन’ हा शब्द फक्त एक मानसिक अंग नाही, तर तो एका व्यक्तीच्या सर्व क्रियाकलापांचे केंद्र असतो. म्हणजे असे की, ‘मना’ ची शांती हा जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा ठेवा आहे. जो माणूस आपल्या ‘मना’ ला शांत ठेवतो, तो बाह्य वादळांचा प्रभाव झेलण्यास सक्षम होतो. आजच्या तणावपूर्ण जीवनात, ‘मना’ ची शांती राखणे अत्यंत आवश्यक आहे. ‘मना’ ची उर्जा अपार असते, ती आपल्या इच्छाशक्तीला दिशा देते. जर ‘मन’ जिंकले, तर कोणतीही कठीण कामे सहज पार केली जाऊ शकतात. वाचन, कला, विज्ञान आणि जीवनातील अन्य क्षेत्रात ‘मना’ चे उद्दीपन विविध कार्यांच्या उन्नतीसाठी प्रेरक ठरते. ‘मना’ च्या सीमांमध्ये खूप मोठ्या गोष्टी दडलेल्या असतात. अनेक वेळा, आपल्या ‘मना’ च्या सीमांमध्ये आपल्या अव्यक्त इच्छा, भावना आणि अमीट स्वप्ने दडलेली असतात. ‘मना’ चा गोंधळ होणे हा सर्वसामान्य अनुभव आहे. संकट, चिंता आणि अनिश्चितता यामुळे ‘मना’ चा गोंधळ उडतो. या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी योग्य विचार सुचावे म्हणून आपल्याला शांत ‘मना’ ची आवश्यकता असते. गोंधळलेल्या ‘मना’ मुळे आपल्याला योग्य मार्ग सापडत नाही आणि त्यामुळे कधी कधी निर्णय घेताना अडचणी येतात. ‘मना’ तील विचार हे व्यक्तीच्या आंतरिक जगाचा आरसा असतात. विचार हे आपल्या ‘मना’ ची मानसिक स्थिती, भावना आणि वृत्तीचे प्रतिबिंब असतात. आपल्या ‘मना’ तील विचार आपल्या क्रियांचे कारण ठरतात, आणि त्याचप्रमाणे आपले भविष्य घडवतात. सकारात्मक विचार ‘मना’ ला प्रोत्साहित करतात, तर नकारात्मक विचार ‘मना’ त अस्वस्थता निर्माण करतात. ‘मना’ तील संघर्ष हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आतापर्यंत जीवनात ज्या काही अडचणी आलेल्या असतात, त्या सर्वांचा सामना ‘मना’ च्या आंतरिक संघर्षातूनच केला जातो. कधी कधी ‘मना’ ने निर्णय घेणे किंवा स्वीकार करणे कठीण होते, कारण ‘मन’ एकाचवेळी अनेक गोष्टींच्या व्यवधानात अडकलेले असते. पण एकदा का आपण त्या समस्येतून मुक्त झालो तर ‘मना’ ला प्रचंड समाधान मिळते. ‘मना’ चे समाधान हे जीवनाच्या शाश्वत सुखाची किल्ली आहे. कोणत्याही बाह्य वस्तू वा परिस्थितीमुळे समाधान मिळाल्यानंतरही ‘मना’ चे समाधान होणे महत्वाचे असते. जेव्हा आपले ‘मन’ आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने भरलेले असते, तेव्हा जीवन देखील समृद्ध आणि पूर्णत: समाधानकारक वाटते. ‘मना’ च्या दृष्टीने समृद्ध जगणं म्हणजे जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत जगणं होय. ज्या प्रमाणे दृष्टी आपल्याला बाह्य जग दाखवते, त्याचप्रमाणे ‘मन’ आपल्याला आपल्या अंतर्गत जगाचे ज्ञान देते. ‘मना’ च्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीमागे एक गहिरा अर्थ आणि अनुभव लपलेला असतो. म्हणून ‘मना’ च्या शक्तीवर विश्वास ठेवा. कारण ‘मना’ च्या शक्तीला कोणतीही सीमा नाही. जेव्हा आपला विश्वास असतो की, आपले ‘मन’ सक्षम आहे, तेव्हा आपली ‘मन:’ शक्ती वर्धित होते. आपल्या ‘मना’ च्या या कार्यक्षमतेमुळे आपण अशक्यप्राय कामेही पूर्ण करू शकतो. त्यासाठी ‘मना’ चे परिष्करण करणे ही जीवनात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा आपण आपल्या ‘मना’ चे परिष्करण करतो, म्हणजे आपल्या ‘मना’ ला शुद्ध करतो आणि परखड परीक्षण करतो, तेव्हा आपल्यामध्ये अधिक विचारशीलता, अधिक स्पष्टता आणि अधिक समज येते. असे परिष्कृत ‘मन’ जीवनाच्या प्रत्येक पैलूला सुसंगतपणे सामोरे जाऊ शकते. एवंच ‘मन’ एका संपूर्ण मानसिक आणि भावनात्मक प्रक्रियेचा भाग आहे, हे कधीही विसरू नये. ‘मना’ वर नियंत्रण ठेवणे म्हणजे जीवनाला एक नवा आयाम देणे, आकार देणे आहे, आणि या प्रक्रियेतच आपल्या प्रगतीची वाट दडलेली आहे. म्हणूनच म्हणतात, ‘मन’ चांगा तो कठौती में गंगा! थोडक्यात काय तर, ज्याने ‘मन:’ सामर्थ्य ओळखले त्याने जग जिंकले.
☆ माझी जडणघडण… अंजु.. – भाग – ४३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
अखेर तुझी झुंज संपली. आज तू अनंतात विलीन झालीस.
या चिरनिद्रेत तुझ्या सार्या यातना, वेदना मिटून गेल्या. तुला अखेरचा अश्रुपूर्ण निरोप देताना म्हणेन, ‘ जिथे असशील तिथे सुखात रहा. ’
आठवणी खूप आहेत. साठ पासष्ट वर्षांची आपली निखळ मैत्री. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण एकत्र होतो. त्यात निरागस बालपण होतं, तारुण्यातलं उमलणं होतं. दोघींच्याही वैवाहिक जीवनातले असंख्य क्षण, अनुभव, भलं-बुरं-आनंदाचं-दु:ख्खाचं सारं सारं सतत अगदी या संध्यापर्वातही कालपर्यंत शेअर केलं.
मैत्रीतली पारदर्शकता आपण सतत जपली.
तू अमेरिकेला गेलीस पण हे साता समुद्राचे अंतर सुद्धा आपल्यात मात्र अंतर पाडू शकले नाही.
अगदी परवा परवाच तू म्हणालीस, “तुझी आणि माझी मैत्री” हाच माझा खरा आनंदाचा ठेवा..!! “
अंजु, मी सुद्धा हेच म्हणेन. आपल्या या मैत्रीनेच आपल्याला घडवलं.
तुझी जीवनाबद्दलची सकारात्मकता, सदैव आनंदातच राहण्याची वृत्ती, एखाद्या गुलाबदाणीसारखा, गुलाबपाणी शिंपडणारा तुझा सहवास मला लाभला. मी किती भाग्यवान!!
झुंजार वृत्तीने तू या असाध्य व्याधीशी हसतमुखाने, स्वीकृत भावनेने लढत होतीस. कायम प्रसन्न राहिलीस. तुझा खिलाडुपणा, सारं काही सहज आणि आनंदाने विनातक्रार स्वीकारण्याचा तुझा स्वभाव शेवटच्या क्षणापर्यंत टिकून होता.
आजकाल तुझा, खूप दिवस फोन आला नाही, मेसेज आला नाही की काळीज धडधडायचं. तुला फोन करण्याचं धाडसही व्हायचं नाही. “नो न्यूज ईज अ गुड न्यूज” असं समजून शांत रहायचा मी प्रयत्न करायची. आणि मग एक दिवस तुझा फोन यायचा,
“मी अगदी बरी आहे. मस्त आहे. चिंता नको करुस. इतक्यात नाही जाणार. अगं! उरलेले दिवस फक्त आनंदच वेचणार. “
मग खूप गप्पा. काॅलेजचे दिवस. त्या टिंगल टवाळ्या, काही गंमतीदार लोकांच्या आठवणी आणि खूप काही. तेव्हां माझेही जडावलेले श्वास स्थिर व्हायचे. तू खूप चांगल्या मूडमध्ये होतीस.
म्हणालीस, “ऐक हं! तुला एक छान गाणं म्हणून दाखवते.. ” किती सुंदर, भावपूर्ण, मधुर आवाजात गायचीस!
ते सूर मी माझ्या मनात ठेवलेत.
अंजु, आता तुझे नसणे सोसणं कठीण असलं तरी मी ठरवलंय्, रडायचं नाही. तुझ्या आठवणीतच रमायचं मी ठरवलंय्. तुझ्या मैत्रीचं दान तू मला दिलंच आहेस. तू नसलीस तरी माझी झोळी रिकामी नाही.
प्रत्येक चार चाकी वाहनात सामान ठेवण्यासाठी छोटीशी जागा असते. त्या डिकीत आपण आपले सामान ठेवत असतो. चोखंदळ लोकं त्या डिकीची धारण क्षमता पाहून गाडीची निवड करीत असतात….!
समजा गाडीला डिकी नसती, तर मनुष्याला सामान मांडीवर ठेवून प्रवास करावा लागला असता, आणि तो सुखावह झाला असता…?
पहा कल्पना करून….
जीवनप्रवास आनंदाने करायचा असेल तर आपल्या मनावरील, मनातील, मनाच्या आजूबाजूचे ओझे ठेवायला एखादी डिकी शोधून ठेवायला हवी, नाही का?
☆ ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – ३ ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆
(२) समाधानाचे यशप्राप्ती मधील महत्व – (मिळालेल्या गोष्टी पूर्णपणे स्वीकारल्याने समाधान शोधणे सध्या लहानपणापासून होणाऱ्या संस्काराच्या एकदम विरुद्ध आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार सर्वांनाच जरा अवघड जातो.)—- इथून पुढे
आपण अतिशय चतुरपणे यश आणि यशाचा आनंद मिळवण्याचे समर्थन करत राहतो. पण यशाच्या मागे धावल्याने कर्म मार्गात भय, चिंता, ताणाचे काटे आणि शेवटी अपयश पदरी पडणार असेल तर अशा समर्थनात कसलीही चतुराई नाही. मिळणाऱ्या यशापयशाचे प्रामाणिक आत्मपरीक्षण केल्यास मनुष्यास हळूहळू त्याची उपरती होऊ लागते. मग यशप्राप्तीसाठी तुकाराम महाराजांच्या बोलांची महती पटू लागते. परमेश्वराकडून मिळालेल्या गोष्टीतून आयुष्यात समाधानाचा संतोष इतका यावा की त्यानंतर यशाच्या आनंदाची गरज पडू नये. यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, “ठेविले अनंती तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान.”
३) समाधानाचा शोध –
घडून गेलेल्या गोष्टीत समाधान दडलेले असतेच. फक्त ते आपल्याला दिसत नाही. असे समाधान आपल्याला शोधावे लागते. मनुष्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश आदींमध्ये चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात. मनुष्याने त्या पैकी वाईट बाजू पाहिल्या तर आपल्याला मिळालेल्या या सर्व गोष्टी खराब आहेत असे त्यास वाटू लागते. अशा खराब गोष्टी स्वीकारायला मनुष्याचे मन तयार होत नाही. त्यातून असमाधानाची भावना निर्माण होते. याउलट मनुष्याने आपल्या वाट्याला आलेल्या या सर्व गोष्टीमधील केवळ चांगली बाजू पाहिली तर आपल्याला मिळालेल्या या सर्व गोष्टी उत्तम आहेत असे त्यास वाटू लागते. अशा चांगल्या गोष्टी स्वीकारायला मनुष्याचे मन सहज तयार होत नाही. त्यातून समाधानाची भावना निर्माण होते. मनुष्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश आदींमध्ये चांगल्या आणि वाईट पैकी कुठली बाजू पाहायची याचे संपूर्ण स्वातंत्र्य मनुष्यास असते. गरज असते ती जागरुकतेची. आयुष्यातील नकारात्मकता पाहणे हा अपयशाकडे घेऊन जाणारा निर्बुद्धपणा आहे. या बाबत जागरूकता निर्माण झाल्यावर मनुष्य यशाकडे घेऊन जाणाऱ्या सकारात्मकतेचा कास धरतो.
परिणामांमध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता शोधता येते. त्यामुळे घडून गेलेल्या गोष्टीमध्ये खात्रीपूर्वक चांगले आणि वाईट परिणाम शोधता येतात. जी गोष्ट अजून घडलेलीच नाही त्यात चांगले वाईट परिणाम शोधणे अवघड असते. कुणी तसा प्रयत्न केला तरी सर्व गणिते जर तर मध्ये असल्याने त्याचा सुख दुःखावर फारसा परिणाम होत नाही. भविष्यात घडू शकणाऱ्या चांगली गोष्टींचा कुणी विचार करत बसले तरी अशा शेख चिल्ली विचारामधील फोलपणा बुद्धीला लगेच जाणवतो.
त्यामुळे सत्ता, संपत्ती, संपत्ती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध या बाबतीत जे यश आधीच मिळालेले आहे त्यामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता शोधता येते. पण जी सत्ता, संपत्ती, संपत्ती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध याबाबतीतील जे यश अजून मिळालेच नाही त्यात सकारात्मकता आणि नकारात्मकता शोधणे कठीण आहे.
सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचा मनावर होणारा परिणाम –
मनुष्याच्या मनाची आनंदी किंवा दुःखी अवस्था हा केवळ त्याच्या विचारांचा खेळ आहे. प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला काही व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था आणि यश येते. यापैकी काहीही परिपूर्ण नसते. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. शोधले तर अगदी रामाच्या चरित्रात सुद्धा नकारात्मक गोष्टी सापडतात. शोधले तर रावणाच्या चरित्रात सुद्धा काही सकारात्मक गोष्टी सापडतात. सामान्य मनुष्याचे चरित्र तर सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीचे मिश्रण असते. विचार मनुष्याला आनंदी किंवा दुःखी कसे करतात हे एका नवरा बायकोच्या उदाहरणातून समजून घेऊ. जर एका बायकोने आपल्या नवऱ्यातील सर्व सद् गुण पाहायचे ठरवले तर थोड्या वेळातच तिला असे जाणवेल की तिला अगदी देवासारखा नवरा मिळालेला आहे. ज्या स्त्रीला असे मनापासून वाटेल की आपल्याला खूप चांगला नवरा मिळालेला आहे ती श्री आनंदी होईल. देवासारखा चांगला नवरा मिळाला. आता याच्यापेक्षा आणखी चांगले काय मिळणार? या विचाराने ती स्त्री समाधानी होईल. नवऱ्यातील सकारात्मक गोष्टी पाहिल्याने म्हणजे सकारात्मक विचार केल्याने तिचे मन आनंदी आणि समाधानी झाले. अशाच प्रकारे आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मधील केवळ सकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मनुष्याचे मन आनंदी आणि समाधानी होते. आता त्या स्त्रीने त्याच नवऱ्यातले सगळे दुर्गुण पाहायला सुरुवात केली. नवऱ्याचे सगळे दुर्गुण समोर आल्यावर काही काळातच तिला जाणवले की आपल्याला अतिशय खराब नवरा मिळालेला आहे. अशी स्त्री दुःखी आणि असमाधानी होणार. अशा प्रकारे आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मधील केवळ नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मनुष्याचे मन दुखी आणि असमाधानी होते.
प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात. यातले काय पाहायचे आहे याचा पर्यायही मनुष्यासमोर उपलब्ध असतो. तुकाराम महाराज म्हणतात की परमेश्वराने आपल्याला दिलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, इत्यादी मधील केवळ सकारात्मक गोष्टी पाहून स्वतःला आतून इतके आनंदी आणि समाधानी करा की बाहेरच्या जगातून भय, चिंता, ताण आणि एकाग्रतेचा नाश करणाऱ्या अपेक्षा निर्माणच होणार नाहीत. मग अशा समाधानातून उत्पन्न होणाऱ्या तीव्र एकाग्रतेतून उच्च दर्जाचे काम वेगाने आणि सातत्याने होऊ लागेल. अशा कामाच्या संचयातून असाधारण यश मिळते.
यश संकलनाच्या अपेक्षा नष्ट झाल्या तर मनुष्याची कर्म प्रेरणा संपून तो आळशी आणि निष्क्रिय होईल अशी भीती काही लोकांना वाटते. पण याच्या अगदी उलटे घडते. संकलनाच्या अपेक्षेच्या नशासोबत भय-चिंतेचा नाश होतो. भय-चिंतेच्या नाशासोबत मनुष्याला तीव्र एकाग्रता प्राप्त होते. तीव्र एकाग्रतेतून उत्तम दर्जाचे काम वेगात घडू लागले की सर्व वेळापत्रक वेळेआधी पूर्ण होऊ लागतात. त्यातून येते, जमतंय, होते अशी भावना वाढीला लागते. ही भावना अतिशय उत्साहवर्धक असते. अशा उत्साहामुळे कामात सहज सातत्य निर्माण होते. याउलट यशाच्या अपेक्षा ठेऊन काम करत असताना अपयश मिळण्याच्या शक्यता समोर दिसू लागल्यास मनुष्य हातोत्साही होतो. त्यातून कामातील सातत्य आपोआप नष्ट होते. अशा प्रकारे यश संकलनाच्या अपेक्षा ठेवल्यास कामात सातत्य निर्माण होण्याऐवजी कामातील सातत्य नष्ट होते. या उलट यश संकलनाच्या अपेक्षा नष्ट झाल्यास कामातील सातत्य नष्ट होण्याऐवजी कामात सातत्य निर्माण होते.
आयुष्यातील सकारात्मक गोष्टी पाहून मनुष्याने मन प्रसन्न केले की त्याला बाहेरच्या जगातून यशाचा आनंद शोधायची आवश्यकता भासत नाही. तोच मनुष्य त्याच्या यशाच्या आनंदाच्या अपेक्षेवर नियंत्रण ठेऊ शकतो. त्याचीच भीती चिंता कमी राहते. तोच तीव्र एकाग्रतेने सातत्याने काम करू शकतो. त्यालाच असाधारण यशाची प्राप्ती होते. एखाद्या मनुष्याला असाधारण यश वारंवार मिळू लागल्यास सामान्य लोक अशा मनुष्यास असाधारण सिद्ध व्यक्ती समजू लागतात.
म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या आणखी एका अभंगात म्हणतात “मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.”
काही उथळ विचार करणाऱ्या लोकांना हा अभंग अतिशय नकारात्मक आणि प्रगतीच्या आड येणारा आहे असे वाटते. पण तुकाराम महाराजांनी या अभंगातून असाधारण यश मिळवण्याचा साधा सोपा मार्ग सांगितला आहे.
मनुष्य योनीत भानावर नसलेल्या मनुष्याची विकसित बुद्धीच त्याची सर्वात मोठी शत्रू ठरू शकते. मनुष्य सोडून इतर जीवांमध्ये बुद्धीचा फारसा विकास झालेला नसल्याने त्यांच्यात फारसे यश संकलन पण होत नाही आणि यश संकलनातून निर्माण होणारे अहंकारशुद्ध निर्माण होत नाहीत. ते केवळ शरीर हा एकमेव अहंकार घेऊन जगत असतात. जीवात्मा मनुष्येतर प्राण्याच्या रुपाने जन्माला येतो, शरीरात आत्मभाव ठेवून आयुष्यभर शरीर संगोपन आणि प्रजननाच्या कामात स्वतःला जुंपून घेतो आणि अशा अज्ञानी अवस्तेतच एक दिवस शरीर सोडून पुढील प्रवासाला निघून जातो. पण अशा योनीत बुद्धीच्या अभावामुळे त्यांना शरीराच्या पलीकडे असलेल्या आपल्या खऱ्या अस्तित्वाचे म्हणजे अनादी अनंत आत्म्याचे भान निर्माण होणे केवळ अशक्य असते. उत्क्रांतीच्या काळात संकलनाच्या गरजेपोटी विकसित झालेल्या मनुष्य बुद्धीमुळेच जीवात्म्याला स्वतःच्या अस्तित्वाची खरी ओळख करून घेणे शक्य असते. मनुष्याला आपल्या अस्तित्वाचे यथार्थ स्वरूप समजले आणि त्याच्या बुद्धीने ते स्वीकारून त्याप्रमाणे आचरण सुरू केले की जीवात्म्याच्या मुक्तीचा मार्ग खुला होतो. असा मनुष्य तीव्र एकाग्रतेच्या जोरावर भौतिक जीवनात सुद्धा असाधारण यश मिळवतो. म्हणून मनुष्य जन्म श्रेष्ठ समजला जातो.
वहिल्या उद्वेग दुःखची केवळ।
भोगणे ते फळ संचिताचे।।
मनुष्य प्रयत्नपूर्वक प्रकृती दत्त शरीर संगोपन आणि बुद्धी दत्त यश संकलन कर्म करतो. त्याची चांगले वाईट फळे जमा होत जाते. ज्याप्रमाणे एखाद्या गुन्ह्याची शिक्षा भोगल्याशिवाय त्या गुन्ह्याचा दोष नष्ट होत नाही त्याप्रमाणे संचितकर्माची चांगले वाईट फळे भोगल्याशिवाय ते संचित कर्म नष्ट होत नाही. अशा प्रकारे आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती ही आपल्याच कर्माचे फळ असते. मनुष्य तितक्या लवकर तिचा स्वीकार करेल तितक्या लवकर ते कर्मफळ भोगून कर्म नष्ट करता येते.
मनुष्याच्या वाट्याला येणाऱ्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, आदी गोष्टी या त्याच्या पूर्व आयुष्यातील संचित कर्माचे फळ असतात. मनुष्याला ही संचित कर्मांची फळे भोगूनच ती करणे नष्ट करावी लागतात. आपल्याच कर्माचे फळ आहे याचा विचार करून मनुष्याला आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, यश, आदी सोबत निभावून न्यावे लागते. अशा वेळी प्राप्त परिस्थितीतील फक्त नकारात्मक गोष्टीबद्दल विचार करून उद्वेग निर्माण करून घेतल्यास केवळ दुःख पदरी पडते. त्यापेक्षा प्रकृती आणि बुद्धीच्या प्रभावामुळे घडलेल्या आपल्याच संचित कर्माचे प्राप्त परिस्थिती रुपी फळ भोगून नष्ट करणे अपरिहार्यता आहे हा विचार सुज्ञपणाचा ठरतो. तुकाराम महाराज सांगतात की अशा विचारामुळे प्राप्त परिस्थिती स्वीकारणे सोपे जाते. मनातील उद्वेग आणि दुःख कमी होतात.
तुका म्हणे घालू तयावर भार।
वाहू हा संसार देवापायी।।
कुठलीही प्रजाती ही परमेश्वराच्या शक्तीचे सृजन आहे. परमेश्वरी शक्ती आपल्या सृजनाचे काही काळ तरी संवर्धन करू इच्छिते. ही परमेश्वरी शक्ती कुठल्याही प्रजातीच्या संवर्धनाचे कार्य त्या प्रजातीतील जीवां कडूनच करून घेते. परमेश्वरी शक्तीच्या प्रेरणेतून प्रत्येक जीवामध्ये शरीर संगोपन आणि प्रजनन करणारी प्रकृती स्थापित केली गेलेली असते. प्रजातीच्या संवर्धनासाठी ही प्रत्येक जीवाची प्रकृती त्या जिवा मार्फत शरीरसंगोपण आणि प्रजननाचे काम करून घेते. इतर प्राण्यांच्या विपरीत मनुष्यामध्ये निर्माण झालेली बुद्धी ही याच प्रकृतीचे काम सोपे व्हावे म्हणून सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंध रुपी यशा संकलनाचे कार्य करत असते. म्हणजे मनुष्य बुद्धीच्या आदेशाने काम करतो, बुद्धी प्रकृतीसाठी काम करते आणि प्रकृती परमेश्वराच्या शक्तीसाठी काम करते. याचा अर्थ असा होतो की मनुष्य ईश्वरी शक्तीच्या प्रेरणेने काम करतो. मनुष्याच्या प्रकृतीदत्त वा बुद्धीदत्त संसार कार्यामागे तो स्वतः नाहीच. सृजन संवर्धनाच्या एका मोठ्या योजनेचा तो एक छोटासा भाग आहे. परमेश्वरी शक्तीने तिचे सृजन संवर्धित करण्यासाठी केलेला खटाटोप आहे. मग यश किंवा अपयश याचा भार कुणी मनुष्यावर कसा असू शकेल? मनुष्याने स्वतः तरी या यशापयशाला जबाबदार का धरावे? सुज्ञ मनुष्याने देवासाठी चाललेल्या आपल्या संसारकार्याच्या यशापयशाचा पूर्ण भार देवावर टाकून निर्भय आणि निश्चिंत व्हावे. या निर्भय आणि निश्चिंत अवस्थेतून निर्माण होणाऱ्या एकाग्रतेचा उपयोग करून आपले दैनंदिन काम समर्थपणे पूर्ण करावे. उगाच स्वतःकडे मोठेपणा घेत कामाच्या यशा अपयशाची जबाबदारी स्वीकारू नये. यशाची जबाबदारी स्वीकारली तर त्यातून निर्माण होणारी भय-चिंता ही एकाग्रतेचा नाश करून मनुष्याचे प्रकृतीदत्त व बुद्धिदत्त काम खराबच करणार आहे. हा एक प्रकारे दैवी योजनेच्या विरुद्ध अपयशाकडे घेऊन जाणारा आत्मघातच ठरेल.
☆ “पुणे स्पेशल दवाखाना!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
— जराशी गंमत हं 🤪
:: डॉ…., सदाशिव पेठ यांची नियमावली ::
उधारी अजिबात नको! आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील!
लिहून दिलेली पूर्ण ट्रिटमेंट घ्यावी! अपूर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरांचेच नाव बदनाम करतात!
प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होईल असा काही नियम/नवस नाही! मी डॅाक्टर आहे, तुमचे कुलदैवत नाही!
पेशंटने लुंगी/बनियन/बरमुडा घालून दवाखान्यात येऊ नये! आपण चेन्नई मध्ये राहत नाही!
सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्यात!
(तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल)
एका पेशंटसोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे!
इष्टमित्र सहपरिवार यायला इथे आम्ही लग्नाची पंगत बसविलेली नाही! तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेटस् सांगू नयेत! आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल! एका पेशंटवर त्याच्या अख्ख्या घरादाराची तपासणी फ्री, ही योजना आमच्या दवाखान्यात तरी नाही,
इंजेक्शन घ्यायचे असल्यास मनाची तयारी घरूनच करुन यावी, ऐनवेळी लहान मुलांसारखा आकांडतांडव करण्यासाठी हा बालवाडीचा वर्ग नाही!
कोठल्यातरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी, दवाखान्यात दाखवायला आणून त्या घेऊ का असे विचारुन डॅाक्टरांचा वेळ घेऊ नये!
(घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे)
कन्सलटंट कडून तपासून आल्यावर ती फाईल फॅमिली डॅाक्टरकडे परत दाखवायला आणायची नाही! (तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डॅाक्टर कधीही गॅासीपींग करत नाहीत)
कुठल्यातरी डॅाक्टरकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर डॅाक्टरांवर काढू नये! (इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डॅाक्टर्संनी पण आपल्यावर काढला, तर आपल्याला अनंतात विलीन व्हावे लागेल)
तुम्ही ग्राहक बनला, तर डॅाक्टर दुकानदार बनेल!
तुम्ही आधी ‘माणूस’ बना, मग डॅाक्टर अवश्य ‘देवमाणूस’ बनतील…!
-ट्रिटमेंट पुरता आपला डॉक्टर!
धन्य ते पुणेकर!!
लेखक : अज्ञात
संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈