☆ विठ्ठल माऊली — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
– – विठ्ठल हा असा एकमेव देव ज्याच्या हातात शस्त्र नाही
– – असा देव ज्याचा अवतार नाही अवतार नाही म्हणून जन्मस्थळ नाही
– – जन्मस्थळ नाही म्हणून पुढल्या कटकटी नाहीत, वाद तंटे नाहीत.
– – असा देव ज्याला अमुक पद्धतीने पुजलं पाहिजे असं बंधन नाही.
– – असा देव ज्याला माऊली म्हटलं जातं….. देव आई असण्याचं हे उदाहरण दुर्मिळ.
– – असा देव जो शाप देत नाही, कोपत नाही, हाणामारी करत नाही.
– – कोणतीही विशिष्ट व्रतवैकल्य नाहीत.
– – कोणताही विशिष्ट नैवेद्य नाही.
– – कोणतीही आवडती फुले नाहीत.
– – कोणताही आवडता पोशाख नाही.
– – – जशी आई आपल्या मुलाचा राग, रुसवा, नाराजी, दुःख.. सगळं सहन करते तसा हा विठुराया आपल्या भक्तांचे राग, रुसवा, नाराजी, आणि दुःख सगळं सहन करतो. आणि म्हणूनच कदाचित – – – त्याला पुरुष असूनही माऊली म्हणत असावेत.
राम कृष्ण हरी.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “संविधान निर्मितीचा इतिहास – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆
(संविधान दिनाच्या निमित्ताने )
A) भारतीय राज्यघटना तयार करताना असलेल्या समित्या एकंदर २२ समित्या होत्या. त्यापैकी प्रमुख समित्या खालीलप्रमाणे
१)संचलन, कार्यपद्धती, वित्त, स्टाफ आणि राष्टरध्वज या पाच समित्यांचे अध्यक्ष होते राजेंद्रप्रसाद.
२)संघराज्य, संविधान या समित्यांचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू.
३) प्रांतिक संविधान, अल्पसंख्याक व अनुसूचित जातीजमाती या समित्यांचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल.
४)मूलभूत अधिकार या समितीचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी.
५) मसुदा समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर.
B) राज्यघटना तयार करताना खालील देशातील राज्यघटनेचा अभ्यास करून काही गोष्टी घेण्यात आल्या.
इंग्लंडमधील घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
१)पार्लमेंटरी पद्धत
२)एकल नागरिकत्व
३)कायद्याचे राज्य
४)कायदे तयार करण्याची प्रक्रिया
अमेरिकेतील घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
१) फेडरल स्ट्रक्चर
२) न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य
३)पार्लमेंट, न्यायसंस्था व सरकार यांचे स्वतंत्र अधिकार
४)तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुख राष्ट्रपती
ऑस्ट्रेलियातील घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
राज्यात व देशात व्यापाराचे स्वातंत्र्य
फ्रेंच घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
स्वतंत्र्य समता व बंधुत्व
कॅनडाच्या घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
१) मजबूत केंद्र सरकार
२) केंद्र व राज्य यांच्या आधिकाराची विभागणी
रशियाच्या घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
१) नियोजन मंडळ व पंचवार्षिक योजना
C) संविधान निर्मितीकरिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या. प्रत्येक समितीस काही कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता.
“मसुदा समिती” ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते. मसुदा समितीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते. मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते. त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली. अशी शासकीय दस्तऐवजी नोंद आहे.
मसुदा समितीचे एक सभासद टी. टी. कृष्णम्माचारी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, “मसुदा समितीवर ज्या सात सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला म्हणून त्यांच्या जागी दुसऱ्यांना नियुक्त करण्यात आले नाही. एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली. एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले त्यांचीही जागा भरली गेलीच नाही दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होते, गुंतलेले होते आणि त्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली होती. एक किंवा दोन सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही. याचा अंतिम परिणाम असा झाला की, संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य नि:संशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले यात तिळमात्र शंका नाही. याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. “
समितीतील प्रत्येक सदस्याचे कार्य महत्वाचे आहेच. ते नाकारता येणार नाही. परंतु सर्व सदस्यांनीच आंबेडकराना घटनेचे सर्वात जास्त श्रेय दिले आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकराना घटनेचे शिल्पकार म्हणण्यात काहीही वावगे नाही.
घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले, “या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. ”
(संदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ, पृष्ठ क्र. १०, प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन)
नका गडे पुन्हा पुन्हा असे डोळे मोठे मोठे करून माझ्याकडे पाहू… तुमचं तर रोजच ऐकतं असते बिनबोभाट पण माझं ऐकताना किती करता हो बाऊ… नाकी डोळी नीटस, घाऱ्या डोळ्यांची, गोऱ्या रंगाची.. शिडशिडीत बांध्याची पाहून तुम्ही भाळून गेला मजवरती… क्षणाचा विलंब न लावता मुलगी पसंत आहे आपल्या होकाराची दिली तुम्हीच संमती… पण लग्नाच्या बाजारात आम्हा बायकांना आयुष्याचा जोडीदार निवडायचा इतकं का सोपं असते ते… घरदार, शेतीभाती, शिक्षण नोकरी, घरातली नात्यांची किती असेल खोगीर भरती… आणि आणि काय काय प्रश्नांची जंत्री… वेळीच सगळ्या गोष्टींचा करून घ्यावा लागतोय खुलासा वाजण्यापूर्वी सनई नि वाजंत्री… तशी कुठलीच गोष्ट आम्हाला मनासारखी समाधान कारक मिळत नसतेच हाच असतो आम्हा बायकांचा विधीलेख.. साधी साडी घ्यायचं तरी दहा दुकानं पालथी करते.. रंग आहे तर काठात मार खाते… पोत बरा पण डिझाईन डल वाटते… किंमती भारी पण रिचनेस कमी वाटतो… समारंभासाठी मिरवायला छान एकच वेळा मग त्यानंतर तिचं पोतेरंच होणार असतं… आणि शेवटी मग साडी पसंत होते मनाला मुरड घालून… चारचौघी भेटल्यावर साडीचं करतात त्या कौतुक तोंडावर पण मनात होते माझी जळफळ गेला गं बाई हिला आता दृष्टीचा टिळा लागून… जी बाई आपल्या एका साडी खरेदीसाठी इतका आटापिटा करते आणि शेवटी जी खरेदी करते तिला नाईलाजाने का होईना पण पसंत आहे आवडली बरं अशी आपल्याला मनाची समजूत घालावी लागते… अहो तेच नवरा निवडताना, अगदी तसंच होतं.. त्यांच्या पसंतीला उतरले हिथचं आम्ही अर्धी लढाई जिंकलेली असते… मग पसंत आहे आवडला बरं अशी आपल्याला मनाची समजूत घालावी लागते. काय करणार पदरी पडलं पवित्र झालं हेच करतो मग मनाचं समाधान… त्याच गोष्टीचा करतो मगं हुकमाचा एक्का. आणि रोजच्या धबडग्यात देतो टक्का… मी महणून तुमच्या शी लग्न केलं आणि कोणी असती तर तुमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नसतं… तेव्हा बऱ्या बोलानं गोडी गुलाबीनं माझ्याशी वागावं नाही तर चिडले रागावले तर रुसून कायमची निघून जाईन माहेराला कितीही काढल्या नाकदुऱ्या तुम्ही तर मी काही परत यायची नाही… कळेल तेव्हा बायकोची खरी किंमत…. दुसऱ्या लाख शोधालात तरीही माझ्यासारखी मिळायची नाही तुम्हाला. हथेलीपर हाथ रखे ढुंढते रह जाओगे मैके के चोखटपर…
☆ ये रे पत्रा … ये रे पत्रा… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
परवा एकदा कपाट आवरायला घेतलं. कपाट आवरणं हे अतिशय महत्वाचं आणि गरजेचं काम असलं, तरी ते वेळखाऊ आणि जिकीरीचं काम असल्याने नेहमी पुढे पुढेच ढकललं जातं. त्या दिवशी मात्र मी नेटाने बसलेच. कपाट आवरून झालं आणि मी माझी आवडती गोष्ट पुढ्यात घेऊन बसले. ती म्हणजे माझा पत्रांचा बॉक्स. माझी शाळेपासूनची पत्रे मी त्यात जपून ठेवली आहेत आणि जेव्हा जेव्हा म्हणून मी कपाट आवरते, तेव्हा तेव्हा मी ती काढून, वेळ असेल तशी वाचत बसते. त्या दिवशी बॉक्स पुढे घेऊन मी फतकल मारून बसलेच.
सर्वात वरचं पत्र होतं सखा कलालांचं. या पत्राचं मला विशेष अप्रूप होतं, ते अशासाठी की अलिकडे अशी पत्रेच येईनाशी झालीत. सध्या टपाल येतं, ते फक्त वर्गणी संपली, किंवा मिळाली, किंवा मग कार्यक्रमाचं निमंत्रण, मिटींगची सूचना यासारखी. हे पत्र तसं नव्हतं. खूप दिवसांनी माझी कथा आवडल्याचं खुषीपत्र होतं ते. ‘समकालीन भारतीय साहित्यामध्ये माझ्या आलेल्या कथेचा हिन्दी अनुवाद वाचून त्यांनी लिहीलं होतं, युनिफॉर्म कथा वाचली. आवडली. मराठी लेखिकेची कथा हिन्दी भाषेत वाचण्याचा आनंद काही औरच असतो.’ पुढे त्यांनी आवर्जून लिहीलं होतं, ‘तुमच्या नावलौकिकाची कथा अशीच सर्वदूर विस्तारत जावो.’ असं पत्र कुणाचंही असतं, तरी आनंदच झाला असता, पण सखा कलाल म्हणजे नावाजलेले ग्रामीण कथाकार. त्यामुळे त्यांच्यासारख्या दर्दी माणसाकडून मिळालेली दाद मोलाची वाटली.
हे कौतुक – पत्र घरच्यांना दाखवलं. त्यांच्याबरोबर पुन्हा वाचलं. मैत्रिणींना दाखवलं. तितक्या तितक्या वेळा त्या पत्रवाचनातून आनंद होत गेला. या पत्रामुळे मला झालेल्या आनंदात घरच्यांना, मैत्रिणींना सहभागी करून घेता आलं. फोनचं तसं नाही. बोलणार्याशी प्रत्यक्ष संवाद होतो, हे खरे. पण तो आपल्यापुरता असतो. त्यात इतरांना सहभागी करून घेता येत नाही आणि पत्रवाचनासारखा पुन:प्रत्ययाचा आनंदही घेता येत नाही.
अलीकडच्या गतिमान युगात पत्रलेखनाला खूप ओहोटी लागली आहे. घराघरातून दूरध्वनीची यंत्रे बसली. आणि दूरवरून विनाविलंब संबंधितांशी संपर्क साधता येऊ लागला. ते माध्यम सोयीचं वाटलं. त्यामुळे अल्पावधीतच त्याचा प्रसारही झाला. आज-काल कथा, कविता, लेख आवडल्याची खुशी पत्रे नाही. खुशी फोन येतात.
मला अगदी लहानपणापासून पत्रलेखनची आवड आहे. त्याला आलेली उत्तरे मी जपून ठेवली आहेत. अगदी शाळेत असल्यापासूनची…. ती पत्रे पुन्हा पुन्हा काढून वाचण्याचा मला छंदच आहे.
माझे कथा-लेख ८०-८२पासून छापून येऊ लागले. त्या काळात दूरदर्शन आणि दूरध्वनी घराघरात फारसा बोकाळला नव्हता. अर्थात मनोरंजन आणि माहितीसाठी वाचनावरच भिस्त असायची. त्यावेळी लोक, कथा-लेख वाचत आणि जे आवडेल, ते लेखकाला खुशीपत्र पाठवून कळवत. मला माझ्या लेखनाबद्दल अनेक खुशीपत्रे आलेली आहेत आणि अजूनही ती माझ्याजवळ आहेत. त्यात सर्वात देखणं पत्र आहे व. पु. काळे यांचं. दोनच ओळींचं पत्र. पण मांडणी इतकी सुरेख की पत्र म्हणजे एक रेखाचित्र वाटावं.
औपचारिक खुषीपत्रे सोडली, तर इतर जी नातेवाईक, स्नेहीमंडळींची पत्रे असतात, ती वाचताना, त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण आठवतात. त्यामुळेच अलीकडे पत्रलेखन कमी होत चाललय, नव्हे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, यामुळे मन विषण्ण होतं. त्या दिवशी सखा कलालांचं असं अचानक आलेलं पत्र वाचलं आणि वळवाच्या पावसासारखं मन शांतवून, सुगंधित करून गेलं. मनात पुन्हा पुन्हा येत राहीलं,
माझ्या मैत्रिणीच्या रेखाच्या घराचे इंटिरियर डेकोरेशनचे काम खूप दिवस चालु होते. ते पूर्ण झाल्यावर “बघायला ये “.. असा तिचा फोन आला. तरी बरेच दिवस मला जायला जमले नव्हते.
तिचे घर पाहून आलेल्या मैत्रिणी तिच्या घराची खूप स्तुती करत होत्या. त्यामुळे मलाही उत्सुकता लागली होती. एके दिवशी सवड काढून मी मुद्दाम तिच्या घरी गेले. तिने दार उघडल्यावर अक्षरशः बघत उभी राहिले. तिचे घर अनेक वस्तूंनी सजवलेले होते. फारच सुरेख दिसत होते. प्रत्येक गोष्ट अप्रतिम होती.
पण माझे लक्ष मात्र हॉलच्या कोपऱ्यात गेलं. तिथं तिने काय ठेवलं असेल ?…. मी कधी कल्पनाही केली नव्हती अशी गोष्ट तिथे होती.
तिथे तिने पूर्वी पाणी तापवायला वापरायचा तो तांब्याचा मोठा बंब ठेवला होता. पॉलिश केलेला असल्याने त्याचा लाल तांबूस रंग चांगला चमकत होता. त्याला गोमुखाची तोटी होती. विस्तवाच्या जागी ठेवायचा झारा सुद्धा होता. कितीतरी वेळ बंबासमोर ऊभ राहुन मी बघत होते.
खूप जुनी मैत्रीण अचानक रस्त्यात भेटली की आपल्याला जसा आनंद होतो तसा मला आनंद झाला होता. असा बंब मी कितीतरी वर्षांनी पाहत होते.
रेखा म्हणाली ” काय बघतेस एवढं?”
” हा तुझा बंब… अग किती छान दिसतोय “
यावर ती म्हणाली, ” ही माझ्या नवऱ्याची आवड.. हॉलमध्ये बंब ऑड दिसेल असं मला वाटत होतं. पण तुला सांगते घरी येणारा प्रत्येक जण बंब बघून खुश होतोय “
नंतर रेखाशी गप्पा झाल्या. खाणं झालं. मी घरी आले. घरी आल्यावरही तिचा बंबच माझ्या डोक्यात होता.
मनात विचार आला…. या जुन्या वस्तू निरुपयोगी झाल्या तरी आपल्याला हव्याशा का वाटतात.. ? मग विचार केल्यावर लक्षात आलं की ह्या वस्तूंकडे नुसतं पाहिलं तरी आपल्याला आनंद होतो.
गेलेले दिवस त्याच्या सोबतीने आपण पकडून ठेवायला बघतो..
तसंच असेल.. कारण तो बंब बघितल्या क्षणी मला माझे लहानपणीचे दिवस आठवले..
त्याच्या अनुषंगाने कितीतरी गोष्टी नजरेसमोर तरळल्या. मनात त्या आठवणींची एक सुरेख साखळीच तयार झाली. माझा तो दिवस त्या आनंदातच गेला..
आजोळ आठवलं. आजोळी बंबासमोर तांब्याच घंगाळ, पितळेचा तांब्या आणि “वज्री ” ठेवलेली असे. वज्री हा शब्द तर माझ्या स्मरणातून निघून गेला असेल असे मला वाटले होते. पण तो अचूक आठवला..
वज्री म्हणजे अंग घासायचा दगड… अजोळच
“न्हाणीघर ” डोळ्यासमोर आलं त्याला न्हाणीघरच म्हटलं जायचं… भांडी घासायला दुसरी जागा होती. तिला मोरी म्हटलं जायचं.
साध्या बंबावरून माझं मन कुठल्या कुठे भटकून येत होतं. काही दिवसां नंतरची गोष्ट..
यांचे मित्र मनोहर घरी आले. बोलताना मी त्यांना रेखानी बंब हॉलमध्ये ठेवला हे सांगितलं. तर ते म्हणाले… ” पूर्वी आमच्याही घरी तसा पितळेचा बंब होता. अंगणात तो ठेवलेला असे. आई गरम पाण्याची बादली भरून देई.. म्हणत असे
” विसण “घालून घे. विसण हा शब्द आता मुलांना कळणारही नाही.
आई बंबात लाकडं घालायची, पाण्याची भर घालायची, बंब चिंचेनी घासून लख्ख ठेवायची. आणि प्रत्येकाची बादली बाथरूम मध्ये ठेवून द्यायची… किती कष्ट करायची रे…”
असे म्हणेपर्यंत त्यांचे डोळे भरून आले होते. आम्ही दोघे त्यांच्याकडे बघत होतो.
ते आपल्याच तंद्रीत होते. पुढे म्हणाले ” तेव्हा आईच्या कष्टाची काही किंमत वाटायची नाही. जाणवायचे सुद्धा नाहीत. दिवसभर ती राबायची आणि तिची सेवा आम्ही करायची तेव्हा आई देवा घरी गेली. राहूनच गेलं बघ….. “
बंबाच्या विषयावरून मनोहरना त्यांची आई आठवली.. ते हळवे झाले होते..
आपल्याला कशावरून काय आठवेल… हे सांगताच येत नाही. कुणाची कुठे अशी नाजूक दुःख लपून बसलेली असतात.. नकळत त्यांना धक्का लागला की उफाळून वर येतात… तसंच त्यांचं झालं होतं…
रेखाच्या घरातल्या बंबाबद्दल मी पेंडसे आजीं जवळ बोलले.
त्या क्षणभर गंभीर झाल्या… नंतर हसल्या आणि म्हणाल्या,
” तुला एक गंमत सांगू का ?
“सांगा ना ” मी म्हटलं
” अगं लग्न होऊन सासरी आले तेव्हा माझं वय एकोणीस होत. अंगात अल्लडपणा, धसमुसळेपणा होता. वागण्यात कुठलाच पाचपोच नव्हता….. बंबात भर घालण्यासाठी बादलीनी पाणी ओतायला लागले की माझ्या हातून हमखास पाणी नळकांडण्यात पडायचं.. विस्तव विझायचा.. बंब परत पेटवायला लागायचा. मग सगळ्यांच्या आंघोळीला ऊशीर व्हायचा. सासुबाई सांगायच्या हळू बेताने ओतावं. तरी तीन-चार दिवसांनी माझ्या हातून तसंच व्हायचं. नंतर मात्र एकदा त्या चांगल्याच रागावल्या. त्यांनी तिथलेच एक लाकूड घेतलं आणि माझ्या हातावर मारलं “
” आणि मग काय झालं?” मी उत्सुकतानी विचारलं.
” मग काय.. हात चांगला सुजला. दोन दिवस काही कामं करता येत नव्हती. पण नंतर मात्र सासुबाई स्वतः रक्तचंदनाचा लेप उगाळून लावत होत्या. शिस्तीच्या होत्या पण प्रेमळही होत्या गं.. “
मी आजींकडे बघत होते.
त्यापुढे म्हणाल्या ” आता बटन दाबलं की गरम पाणी.. पण ती मजा नाही बघ.. तसं गरम पाणी सुद्धा नाही.
त्या पाण्याला वास होता जीव होता. ”
आजी जुन्या आठवणीत रंगून गेल्या होत्या.
त्या वेळी बंब इतका डोक्यात होता की जो भेटेल त्याला मी त्याबद्दल सांगायची. गंमत अशी की प्रत्येकाच्या मनात काही तरी निराळचं असायचं…
त्यावर तो अगदी भरभरून माझ्याशी बोलायचा.
मुलाचा मित्र प्रमोद गाव सोडून आला आहे. आता इथे पुण्यात नोकरी करतोय. तो घरी आला होता. तेव्हा बंबाचा विषय निघाला… तो म्हणाला..
” काकू तुम्ही सांगितल्यापासून मलाही गावाकडे आहे तसा बंब इथे आणावा असं वाटायला लागलंय.. पण ठेवू कुठे ?आम्हीच लहानशा दोन
खोल्यात राहतोय.. आमच्या बाथरूम मध्ये सुद्धा बंबाला जागा नाही. “
” गावाला बंब कुठे ठेवलाय रे ?”
मी विचारलं
” गावाकडे प्रशस्त घर आहे, परसू आहे, विहीर, रहाट आहे. तिथे बंब आहे. विहिरीचं पाणी काढायचं बंबात भर घालायची.. दिवसभर पाणी.. शहरातल्या सारखं नाही तिथे. हे एवढं मोठं अंगण आहे आणि आम्ही इथे आलोय… पोटासाठी पैशासाठी”
” परत जाताल रे गावाकडे “मी म्हणाले
” परत कुठले जातोय ?आता ईथेच राहणार.. गाव, जमीन, शेतीवाडी सगळं सुख मागे गेलय आणि आम्ही झालोय आता इथले चाकरमाने.. बंबातल्या गरम पाण्याच्या अंघोळीची मजा आमच्या नशिबात नाही. तिथे अंघोळ केल्यानंतर कस प्रसन्न वाटतं.. इथे आपलं घाईघाईत काहीतरी उरकायचं म्हणून अंघोळ होते.. ” उदासपणे प्रमोद बोलत होता.
माझ्या लक्षात आलं घरात नसली तरी प्रमोदच्या मनात बंबाला जागा होती. मनातलं बोलायला बंबाच निमित्त झालं होतं. गावाकडची पाळमुळं उखडून ही रोपटी इथे आली होती.. पण अजून इथे म्हणावी तशी रुजली नव्हती. शरीरानं इथ आलेली मुलं मनाने अजून गावाकडेच होती.
रेखाचा नवरा निखिल रस्त्यात भेटला. मी त्याच्या घराचे कौतुक केले विशेषत: बंबाचे… यावर तो म्हणाला
” तुम्हाला एक मनातली गोष्ट सांगू का? त्या बंबाकडे पाहिलं की मला आमचे पूर्वीचे दिवस आठवतात. घरची गरीबी होती. खाणारी तोंडे खूप. कमावणारे एकटे वडील.. त्यात आजोबांच्या आजारपणात एकदा पैशाची गरज होती. घरात सोनं-चांदी नव्हतीच.. वडिलांनी मारवाड्याकडे बंब गहाण ठेवायचे ठरवले. बंब घराबाहेर काढताना आई-दाराआड उभी राहून रडत होती. नेमकं त्या क्षणी मी तिच्याकडे पाहिलं. तिची ती आर्त व्याकुळ नजर अजून माझ्या डोळ्यापुढे आहे. “
माझ्याशी बोलताना तो हळवा झाला होता. पुढे म्हणाला,
” ते दिवस गेले.. दिवस जातातच पण चांगले दिवस आले तरी आपण ते दिवस विसरायचे नसतात. तरच आपले पाय जमिनीवर राहतात. म्हणूनच माझ्या दृष्टीने तो नुसता बंब नाही. त्याच्यामागे खूप काही आहे. म्हणून त्यासाठीच तो हॉलमध्ये आहे. घरातल्या महत्त्वाच्या जागी…. “
मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागले. रेखाचा नवरा इतक्या गरीबीतून वर आला आहे हे मला नव्यानेच कळले. तो इतका नम्र आणि साधा का याचेही कोडे उलगडले.
केवळ रम्य भूतकाळच आपल्या आठवणीत राहतो असे नाही तर अशा गोष्टींनीही मनात घर केलेले असते. त्या आयुष्यभर साथ देतात. त्याच्या बरोबर जगताना ऊपयोगी पडणारं शिक्षण पण देतात…
केवळ एक साधा बंब हा विषय पण त्यावर किती जणांकडून काय काय ऐकायला मिळाले…
तुमच्या घरी होता का बंब? तुम्हाला आली का कुठली आठवण?असेल तर मला जरूर कळवा..
50, 60 वर्षांपूर्वी पुण्याच्या चार लाखाच्या वस्तीत एक लाखाच्या वर नुसत्या सायकलीचं होत्या. प्रत्येक घरात दोन तरी सायकली असायच्या. मुला मुलींचा कॉलेज प्रवास सुरू झाला तो सायकली वरूनच नव्या सायकलीला 110 ते 140 रुपये किंमत असायची पण अहो!सर्वसामान्यांसाठी ही पण किंमत खूप होती. कशीतरी जोडाजोडी करून, काही वडिलांच्या पगारातून, थोडे आईच्या सांठवलेल्या हिंगाच्या डबीतून तर थोडे स्वकष्टाचे दूध, पेपर टाकून मिळवलेल्या पैशाची जोडणी करून रु50, 60 उभे करायचे आणि सेकंड हॅन्ड सायकल दारात यायची. त्याच्यातही समाधान मानणारी ती पिढी होती. लेखक डॉ एच वाय कुलकर्णी त्यांच्या लेखात गमतीदार किस्सा लिहितात 1955 साली श्रीअंतरकरांकडून मी सायकल घेतली, ती तब्बल 30 वर्ष वापरलेली होती त्यानंतर मी ती 1960 सालापर्यंत वापरली त्यावेळी कॉर्पोरेशनला वार्षिक टॅक्स अडीच रुपये असायचा मग पत्र्याच्या बिल्ला मिळायचा तो सायकलला लावला नाही तर कॉर्पोरेशनच्या लोकांच्या तावडीत सायकल स्वार सहज पकडला जायचा. भर दिवसाची ही कथा तर रात्रीची वेगळीच कहाणी, रात्री रॉकेलचा दिवा हवाच. तो दिवा सायकल खड्ड्यात गेली की डोळे मिटत असे. मग काय सगळाच अंधकार. आणि मग पोलिसांनी अडवल्यावर कष्टाने सांठवलेले अडीचशे रुपये रडकुंडीला येऊन पोलिसांच्या स्वाधीन करावे लागायचे..
मोहिमेवर जाणारी पेशवाई कारकीर्द संपून पुण्याच्या परिसरातील त्यांची घोडदौड संपुष्टात आली आणि पुण्याच्या रस्त्यावर टांग्याच्या घोड्याच्या टापा सुरू झाल्या. प्रमुख साधन म्हणून हजारभर टांगे पुण्यात फिरू लागले विश्रामबाग वाडा आणि सदाशिव पेठ हौद चौकात दत्त उपहारगृहाजवळ टांगा स्टॅन्ड असायचा, बाजीराव रोड वरून नू. म. वि. पर्यन्त आल्यावर आनंदाश्रम ते आप्पा बळवंत चौक हा रस्ता इतका अरुंद आणि गर्दीचा होता की समोरून बस आली तर येणाऱ्या सायकल स्वाराला उडी मारून बाजूलाच व्हावं लागायचं.
1953 पासून टांग्याचा आकडा घसरला आणि रिक्षाचा भाव वधारला.
1960 नंतर आली बजाजची व्हेस्पा स्कूटर, मग स्कूटरची संख्या वाढून सायकलचा दिमाख आटोपला. त्यात पीएमटी बसने भर टाकली. बस भाडं कमी, पुन्हा सुरक्षित, आरामात प्रवास.. मग टांगेवाल्यांना टांग मिळून सायकल स्वारही तुरळक झाले.
पण काही म्हणा हं ! इतर नावाच्या बिरुदाबरोबर पुण्याला सायकलीचं शहर हे नांव पडलं होतं त्या काळी. आत्ताच्या काळात मात्र गाड्यांच्या गर्दीतून सुळकांडी मारून पुढे जाणारा विजयी वीर क्वचितच दिसतो. आणि हो ! एखादा ज्येष्ठ नागरिक तरुणाला लाजवेल अशा चपळाईने सायकल स्वार झालेला आजही दिसतो. पण असं काही असलं तरी तेंव्हांची मजा काही औरच होती.
तर मंडळी आपण ही आठवणींची ही शिदोरी घेऊन सायकलवरून फेरा मारूया का?
☆ सहज संस्कार… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
नवविवाहित दांपत्य यथावकाश एका बाळाला जन्म देवून आई बाबांच्या भूमिकेत येतं. मूल हसतं, खेळतं, रडतं, आजुबाजूला पाहतं, वेगवेगळे आवाज ऐकतं, ओळखीचे चेहरे पाहून त्याची कळी खुलते, अनोळखी चेहरे त्याला गोंधळात टाकतात, ते अखंडपणे हातपाय हालवत असतं. घरातले, शेजारी, नातेवाईक बाळ बघून त्याच्याशी बोलत असतात. ते बाळ कुतूहलाने सगळ्यांकडे पहात हळूहळू मोठं होत असतं.
बाळाच्या निरागसतेने सगळ्या घरात नवचैतन्य संचारतं.
हे निरागस बाळ तुमच्या माध्यमातून या जगात आलं, तरी ते सर्वस्वी तुमचं नसतं. त्याचा सांभाळ करताना त्याला संस्कारित करण्याची तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. या नकळत्या वयात तुम्ही त्याच्यावर जे जे संस्कार करता, ते सर्व ते चटकन ग्रहण करते.
तुमचं खरं खोटं बोलणं, तुम्ही इतरांची जी स्तुती किंवा निंदानालस्ती करता, कुणाला मदत करता, कोणाचं हिसकावून घेता, कुणाबद्दल तुमची करुणा, कोणाचा तुम्ही केलेला छळ, तुमचा स्वार्थ, परमार्थ, तुमचा धर्म आणि अधर्म, तुम्ही एकमेकांशी कसे वागता, बोलता, आदराने वागता की अनादर करता, मृदूमधूर स्वरात बोलता की कर्कश्शपणे, असे सारे काही त्या बाळावर परिणाम करत असते. यातूनच पुढे ते सुसंस्कृत होईल की असंस्कृत, हे ठरतं.
थोडक्यात तुमचं बाळ तुमच्या गुण किंवा अवगुणांचा विस्तार असतं. म्हणून खूप विवेकाने वागा.
स्वामी विवेकानंद म्हणतात : या विश्वात प्रत्येक गती चक्राकार आहे. त्याचा जिथून आरंभ होतो, तिथेच फिरून शेवट होतो, तोपर्यंत वर्तुळ पूर्ण होत नाही. आणि वर्तुळ पूर्ण होते, तेव्हा तुम्ही जे दिले, तेच तुम्हाला परत येऊन मिळते. तुमची इच्छा असो वा नसो.
तुम्ही एकदा चुकलात की त्या चुकीचा जणू वज्रलेप झाला. तुम्ही चूक कबूल करून क्षमा मागितली तरी निरागस अपत्याला तुमचे स्पष्टीकरण, समर्थन समजत नाही. तुम्ही केलेली कृती समजते.
तुम्ही बाळ अगदी गर्भात असल्यापासूनच त्याच्याशी संवाद सुरू करा. तुम्ही त्याच्या आगमनाची उत्कटतेने प्रतिक्षा करत आहात, हे त्याला सांगा.
तुम्ही जे जे बोलता, त्याचा अर्थ त्याला कळला नाही, तरी त्यामागील भावना त्याला कळतात. ते निश्चिंत होतं किंवा भयभीत होतं.
ज्यांचं बालपण असुरक्षित असतं, ते आक्रमक, हिंसक होतात. ज्यांची प्रेमाने काळजी घेतली जाते, ते इतरांची काळजी घ्यायला शिकतात.
तुमच्या वर्तनातून तुमचं अपत्य स्वत:च्या स्वभावाची जडणघडण करीत असतं.
थोडक्यात, हिंदू तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाच्या कर्माच्या सिद्धांताच्या सत्यतेचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत असता.
तुम्ही जे पेराल तेच उगवतं हे नीट समजून घ्या. जे उगवावं असं वाटतं, तेच पेरा.
महाभारतात पितामह भीष्मांचं एक अत्यंत महत्त्वाचं वचन आहे, ज्याची सत्यता कालातीत आहे.
ते म्हणतात ” पेरलेले बीज, केलेले कर्म आणि उच्चारलेले वचन कधीच निष्फळ ठरत नाही. ” ते फळाला जन्म देतंच देतं. हा शाश्वत सिद्धांत आहे, आणि नियती याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे, प्रसंगी निर्दयतेने करते.
मोठमोठी साम्राज्ये लयाला जातात, राजघराणी अन्नाला महाग होतात, श्रीमंती पाहता पाहता लुप्त होते, कुटुंबांचा निर्वंश होतो, जिथे कधीकाळी ऐश्वर्य नांदत होते, तिथे घुशी बिळं करतात, वटवाघळं वस्ती करतात.
हे ऐकायला भयंकर वाटेल पण याची सत्यता कोणत्याही समाजाला अनुभवास येते.
यासाठीच हिंदू संस्कृतीत सकारात्मक, पवित्र, भावात्मक, प्रेम संक्रमित करणारे, ईश्वरी अधिष्ठानावर दृढ विश्वास ठेवून सुसंस्कार केले जातात. आपल्याला अपत्यांवर असेच संस्कार करायचे आहेत.
मूल संस्कारित करताना, त्याला उगवता सूर्य दाखवा, पक्षांची किलबिल ऐकू दे, सुस्वर संगीत ऐकवा, काऊचिऊच्या गोष्टी ऐकवा, गायीचा स्पर्श अनुभवू द्या, स्पर्शातील प्रेमाने थरथरणारी गायीची त्वचा त्याला प्रेम स्पर्शाने संक्रमित होतं, हे न सांगता कळायला लागेल.
कुत्र्याच्या पाठीवर हात फिरवला की तो किती प्रेमाने प्रतिसाद देतो, हे कळेल, यातून आपल्यावर नि:सीम प्रेम करणा-यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे शिकता येईल.
निसर्ग, वृक्ष, पशू, पक्षी, पाण्यावरचे तरंग, हवेचा हळूवार स्पर्श, फुलांचे सुगंध, सूर्याचे तेज, चंद्राची शीतलता, अंधाराचं अज्ञातपण, काजव्यांचं आणि चांदण्यांचं चमकणं, पहिल्या पावसाच्या थेंबात भिजणं, भूमीचा मृद्गंध, पानाफुलांचं टवटवीत असणं, तक्रार न करता कोमेजून जाणं त्याला पाहू दे.
त्याला हे समजेल की आजची टवटवीत फुलं उद्याचे निर्माल्य होतात. जीवनातील नश्वरता अशी सहज समजावी.
निसर्गासारखा नि:शब्द शिक्षक नाही.
सकाळी उठल्यावर प्रार्थना त्याच्या कानावर पडू देत.
जमिनीवर पाऊल ठेवण्यापूर्वी आपला भार सहनशीलतेने वाहणाऱ्या भूमीला कृतज्ञतेने वंदन करायला त्याला शिकवा. तोही तुमच्या सुरात सूर मिसळून म्हणेल, ” पादस्पर्शं क्षमस्व मे ! “
त्याला जलपान करण्याची सवय लावा, त्याचे आरोग्य ठणठणीत राहील.
सकाळी आई, आजीसोबत त्याला तुळशीला एखादी प्रदक्षिणा घालू दे. पिंपळपानांची सळसळ शांतपणे ऐकू देत.
त्याच्या कानावर आजोबा पूजा करतात, त्यावेळचा मधुर घंटानाद पडू देत. देवासमोर लावलेल्या समईचा सात्त्विक प्रकाश त्याच्या निरागस डोळ्यांनी पाहू दे.
देवपूजा करताना देवाला प्रेमाने स्नान घालणं, स्तोत्र म्हणत केलेली त्याची उत्कट आळवणी त्याला पाहू दे.
दारी येणारा वासुदेव त्याला भिक्षा दिल्यावर भरभरून आशीर्वाद कसे देतो, ही निर्धनांच्या मनाची श्रीमंती त्याला अनुभवू द्या.
मंदिरात गेल्यावर काही अर्पण करण्याची सवय त्याच्या हाताना लागू द्या.
आणि हे सगळं सहजपणे त्याला पहात पहात स्वत:च शिकू द्या. तो त्याच्या क्षमतेप्रमाणे शिकेल. धाकदपटशाने हे त्याच्या गळी उतरवू नका.
त्याला मुक्तपणे वाढू द्या. आणि तुम्ही त्याला काय काय शिकवले हे सारखं लोकांसमोर म्हणून दाखवायला सांगू नका. त्याच्या वागण्यातून त्याचे व्यक्तिमत्व इतरांना आपोआपच उलगडेल.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(पूर्वसूत्र- “माय गॉड वुईल रिइम्बर्स माय लॉस इन वन वे आॅर अदर” हे सहजपणे बोलले गेलेले माझे शब्द असे शब्दशः खरे ठरलेले होते. याच्याइतकेच ते तसे ठरणार असल्याची पूर्वकल्पना अकल्पितपणे माझ्या मनात त्या पहाटेच्या सूचक स्वप्नाद्वारे मला ध्वनित होणे हेही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे, आश्चर्यकारक आणि अलौकिकही होते!!”)
हे असे अनुभव जीवनप्रवासातील माझी वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याच्या मनोमन पटणाऱ्या अंतर्ज्ञानाच्या खूणाच असत माझ्यासाठी!अशा अनुभवांच्या आठवणी नंतरच्या वाटचालीत अचानक निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत किंवा अगदी अकल्पित अशा संकटांच्या वेळीही ‘तो’ आपल्यासोबत असल्याचा दिलासाही देत असत.
जन्म-मृत्यू, पुनर्जन्म या संकल्पना आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींसाठीतरी अनाकलनीय, गूढच राहिल्या आहेत. त्यासंबंधीच्या परंपरेने चालत आलेल्या समजुतींच्या योग्य आकलनाअभावी या संकल्पनांवर नकळत गैरसमजुतींची पुटं चढत जातात आणि परिणामत: या संकल्पनांमधलं गूढ मात्र अधिकच गहिरं होत रहातं.
नवे नातेबंध निर्माण करणारे जन्म जितके आनंददायी तितकेच आपल्या प्रिय व्यक्तींचे मृत्यू आपलं भावविश्व उध्वस्त करणारे. या दोन्हींच्या संदर्भातले मी अनुभवलेले सुखदु:खांचे क्षण त्या त्या वेळी मला खूप कांही शिकवून गेलेले आहेत. त्या सगळ्याच अनुभवांच्या एकमेकात गुंतलेल्या धाग्यांचं आकलन जेव्हा अनेक वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतर मला अकल्पितपणे झालं त्या क्षणांच्या मोहरा आजही मी माझ्या मनाच्या तिजोरीत आठवणींच्या रूपात जपून ठेवलेल्या आहेत!!
संपूर्ण जगाच्या चलनवलनामागे अदृश्य रुपात कार्यरत असलेल्या सुविहित व्यवस्थेच्या अस्तित्त्वाची जाणीव मला करुन दिलेले ते सगळेच अनुभव आणि त्यातल्या परस्परांमधील ऋणानुबंधांची मला झालेली उकल ही माझ्या मनातील त्या त्या क्षणांमधल्या अतीव दु:ख न् वेदनांवर ‘त्या’ने घातलेली हळूवार फुंकरच ठरलीय माझ्यासाठी! या संदर्भात माझ्या आठवणीत घर करून राहिल्यात त्या माझ्या अगदी जवळच्या अतिशय प्रिय अशा व्यक्तींच्या त्या त्या क्षणी मला उध्वस्त करणाऱ्या मृत्यूंच्या काळसावल्या!आणि तरीही पुढे कालांतराने या सावल्यांनीही जन्म आणि मृत्यू या दोन्हीमधील अतर्क्य अशा संलग्नतेची उकल करुन माझ्या मनात प्रदीर्घकाळ रुतून बसलेल्या दु:खाचं हळूवार सांत्वनही केलेलं आहे.
२६ सप्टेंबर १९७३ची ती काळरात्र मी अजूनही विसरलेलो नाहीय. मला मुंबईत युनियन बॅंकेत जॉईन होऊन जेमतेम दीड वर्ष झालेलं होतं. माझं वास्तव्य दादरला इस्माईल बिल्डिंगमधे माझ्या मोठ्या बहिणीच्या बि-हाडीच होतं. त्या रात्री जेवणं आवरुन साधारण दहाच्या सुमारास माझी ताई तिच्या छोट्या बाळाला थोपटून निजवत होती. माझे मेव्हणे आणि मी सर्वांची अंथरुणं घालून झोपायची तयारी करत होतो. तेवढ्यात शेजारच्या गोगटे आजोबांचा त्यांच्या लॅंडलाईनवर फोन आला असल्याचा निरोप आला. त्या काळी घरोघरी लँडलाईन फोनही दुर्मिळच असायचे. इस्माईल बिल्डिंगमधल्या पाच-सहा मजल्यांवरील चाळकऱ्यांपैकी फक्त दोन घरांमधे फोन होते. त्यातील एक असं हे गोगटे कुटुंबीयांचं घर बहिणीच्या शेजारीच होतं आणि ते माझ्या मेव्हण्यांचे लांबचे नातेवाईकही होते. मेव्हणे फोन घ्यायला धावले. इतक्या रात्री कुणाचा फोन असावा हाच विचार इकडे आमच्या डोक्यात. फोनवर बोलून मेव्हणे लगोलग परत आले ते तो अनपेक्षित धक्कादायक निरोप घेऊनच. फोन माझ्या मोठ्या भावाचा होता. माझ्या बाबांना डॉक्टरांच्या सांगण्यावरून इस्लामपूरहून हलवून पुण्याला सिव्हिल हॉस्पिटलमधे ऍडमिट केलेलं होतं. आणि आम्ही सर्वांनी तातडीने पुण्याला हाॅस्पिटलमधे लगोलग पोचावं असा तो निरोप होता! बाबांच्या काळजीने आम्ही सगळेच अस्वस्थ झालो होतो. बाबा आजारी होते, झोपून होते हे आम्हाला माहीत होतं पण तोवर येणाऱ्या खुशालीच्या पत्रांतून असं अचानक गंभीर कांही घडेल याची पुसटशी शक्यताही कधी जाणवली नव्हती. आता कां, कसं यात अडकून न पडता तातडीने निघणं आवश्यक होतं. इतक्या रात्री तातडीने निघून पुण्याला सिव्हिल हाॅस्पिटलला लवकरात लवकर पोचणं गरजेचं होतं. त्याकाळी प्रायव्हेट बसेस नव्हत्याच. इतक्या रात्रीचं एस्टीचं वेळापत्रकही माहित नव्हतं. रिझर्व्हेशन वगैरे असं शेवटच्या क्षणी शक्यही नव्हतं. त्यात बाळाला सोबत घेऊन जायचं दडपण होतं ते वेगळंच.
“तुम्ही तुमचे मोजके कपडे आणि बाळासाठी आवश्यक ते सगळं सामान घेऊन निघायची तयारी करा लगेच. ” मेव्हणे म्हणाले. “मी तुम्हाला रात्री १२ वाजता मु़ंबई-पुणे पॅसेंजर आहे त्यात दादरला बसवून देतो. आपल्या तिघांच्याही आॅफिसमधे रजेचे अर्ज देणं आवश्यक आहे. मी उद्या ते काम करुन मिळेल त्या ट्रेन किंवा बसने पुण्याला हाॅस्पिटलमधे पोचतो. ” मेव्हणे म्हणाले. त्या मन:स्थितीत मला हे सगळं सुचलंच नव्हतं. ताईच्या डोळ्यांना तर खळ नव्हता. ते पाहून कसंबसं स्वतःला सावरत मी माझी घुसमट लपवायचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.
“हे बघ, बाळ सोबत आहे आणि प्रवास रात्रीचा आहे. तरीही आता तूच धीर धरायला हवा. कारण माझ्यापेक्षा तुम्ही दोघांनी तिथं आधी पोचणं आवश्यक आहे. म्हणून तू लहान असूनही ही जबाबदारी तुझ्यावर सोपवावी लागतीय. “
“हो. बरोबर आहे तुमचं. आम्ही जाऊ. “
“सिव्हिल हॉस्पिटल स्टेशनच्या जवळच आहे. पहाटे पोचाल तेव्हा अंधार असेल. जपून जावा. “
“हो” मी म्हणालो.
‘बाबांना अचानक काय झालं असेल, त्यांना तातडीनं तिथं इस्लामपूरला दवाखान्यात न्यायचं, डॉक्टरांशी सल्ला मसलत, पुण्याला आणायचं, त्यासाठी वाहनाची सोय, पैशांची जुळवाजुळव सगळं माझ्या मोठ्या भावानं कसं निभावलं असेल? माझ्यापेक्षा फक्त दोनच वर्षांनी तर तो मोठा. त्या तुलनेत मला या क्षणी स्वीकारावी लागणारी ही जबाबदारी म्हणजे काहीच नाही’ या विचारानेच तोवर स्वतःला खूप लहान समजत असणारा मी त्या एका क्षणात खरंच खूप मोठा होऊन गेलो !!
बाबा माझ्यासाठी फक्त वडिलच नव्हते तर ते माझ्या मनात ‘तो’ रुजवायला, त्याची प्रतिष्ठापना करायला नकळत का असेना पण निमित्त ठरलेला कधीच विसरता न येणारा एक अतिशय मोलाचा असा दुवा होते! त्यांना काही होणं हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं! बाबांइतक्याच आईच्या आठवणीने तर मी अधिकच व्याकूळ होऊन गेलो. या सगळ्या दु:खापेक्षा आपलं अशा अवस्थेत तिच्याजवळ नसणंच मला त्रास देत राहिलं.
गाडीत बऱ्यापैकी गर्दी होती. तरीही दोघांना कशीबशी बसायला जागा मिळाली. बाळाला आलटून पालटून मांडीवर घेत ताई न् मी अगदी आमच्या लहानपणापासूनच्या बाबांच्या असंख्य आठवणींबद्दलच रात्रभर बोलत राहिलो होतो.
रात्र सरली ती याच अस्वस्थतेत. भल्या पहाटे पुणे स्टेशनला गाडी थांबताच कसेबसे उतरलो तेव्हा भोवताली अजूनही मिट्ट काळोख होता. तेवढ्यात रात्रभर शांत झोप न झालेलं बाळ किरकिरु लागलं. त्याला सावरत, चुचकारत अंधारातून वाट शोधत कसेबसे सिव्हील हाॅस्पिटलच्या कॅम्पसमधे आलो तेव्हाच नेमके भुकेने व्याकूळ झालेल्या बाळाने भोकाड पसरुन रडायला सुरुवात केली. हॉस्पिटलचा मेन एंट्रन्स समोर बऱ्याच अंतरावर होता. नाईलाजाने मी त्या दोघांना घेऊन वाटेतच जवळच्या वडाच्या पारावर बसलो. ताईला इथं एकटीला सोडून उठण्याशिवाय पर्यायच नव्हता.
“ताई, तू याला दूध दे तोवर मी बाबांची रूम कुठे आहे ते पाहून येतो लगेच. चालेल?”
ती ‘बरं’ म्हणाली तसा मी उठलोच. तेवढ्यात मेन एंट्रन्स मधून एक नर्स लगबगीने बाहेर पडताना दिसली. मी तिच्याच दिशेने धावत जाऊन तिला थांबवलं.
“सिस्टर, एक काम होतं. प्लीज. “
मी पेशंटचं नाव, गाव, वर्णन सगळं सांगून त्यांना कालच इथं ऍडमिट केल्याचं सांगितलं. त्यांच्या रूमची कुठे चौकशी करायची ते विचारलं. आश्चर्य म्हणजे ती बाबांच्याच रूममधून नाईट ड्युटी संपवून दुसऱ्या नर्सला चार्ज देऊन आत्ताच बाहेर पडली होती.
“पेशंट खूप सिरीयस आहे. तुम्ही वेळ घालवू नका.. जा लगेच” ती म्हणाली. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी मी पुढे धाव घेतली आणि… आणि
ताईची आठवण होताच थबकलो. तीही बाबांच्या ओढीने इथे आलेली होती. तिला तिथं तशी एकटीला सोडून स्वतः एकट्यानेच निघून जाणं योग्य नव्हतंच. मी तसाच मागे फिरलो. धावत तिच्याजवळ आलो. बाळाला उचलून घेतलं.
“ताई, चल लवकर. बाबांची रूम मिळालीय. आपल्याला लगेच जायला हवं.. चल.. ऊठ लवकर” म्हणत बाळाला घेऊन झपाझप चालूही लागलो.
आम्ही घाईघाईने रूम पर्यंत पोहोचणार एवढ्यांत माझा मोठा भाऊ दाराबाहेर डोकावून आमच्याच दिशेने पहात असल्याचं जाणवलं…
“तुमचीच वाट पहातोय, या लवकर… ” म्हणत तो धावत आत गेला पण…. पण… आम्ही बाबांजवळ पोचण्यापूर्वीच बाबांनी अखेरचा श्वास घेतला होता… !! आम्ही त्यांच्यापासून एका श्वासाच्या अंतरावरच उभे… तरीही त्यांच्यापासून लाखो योजने दूरसुध्दा…. !!
ही एका क्षणाची चुकामूक पुढे कितीतरी दिवस मला कासावीस करीत राहिली होती. दुःख बाबा गेल्याचं तर होतंच, पण ते साधी नजरभेटही न होता गेल्याचं दुःख जास्त होतं!
बाबांचं असं अनपेक्षित जाणं पुढे येणाऱ्या अतर्क्य अनुभवांना निमित्त ठरणार होतं. पण त्याबद्दल त्या दु:खात बुडून गेलेले आम्ही सर्वचजण त्याक्षणी तरी पूर्णत: अनभिज्ञच होतो एवढं खरं!!
डॉक्टर केळकर खूप आजारी होते. एकेकाळचे जळगावचे नामांकित, रुग्णांशी स्नेहसंबंध ठेवणारे आणि अतिशय सचोटीने, कर्तव्यबुद्धीने वैद्यकीय पेशा सांभाळणारे कुशल, शल्यचिकित्सक ते होते. मी त्यांना कलियुगातले कर्मयोगी असेच म्हणायचे. ते असे मरणासन्न अवस्थेत असताना मी त्यांना भेटायला गेले तेव्हा मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. म्हणाले, ” ये. बैस. कशी आहेस? “
खरं म्हणजे हा प्रश्न मी त्यांना विचारणार होते ना?
त्यावेळी मनात आलं ९० व्या वर्षी महाप्रयाणाला निघालेली व्यक्ती, वेदनांच्या पलिकडे जाऊन इतकी शांत कशी असू शकते? भयमुक्त, अलिप्त, स्वीकृत. मी त्यांचा हात धरून विचारले, “कसे आहात सर ?”
“अगं! मी छान आहे, काही तक्रार नाही. ”
आम्ही छान गप्पाही मारल्या. त्यांच्या वेदना मला जाणवत होत्या पण ते मात्र त्या सर्वांना पार करून छान बोलत होते
दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाची बातमी आली आणि सहजपणे मला महाभारतातला तो अत्यंत सुंदर, अर्थपूर्ण श्लोक आठवला.
अनित्यं यौवनं रूपं
जीवितं द्रव्यसंचय:।
आरोग्यं प्रियसंवासो
गृध्येत्तत्र न पंडित:॥
तारुण्य, सौंदर्य, आयुष्य, आरोग्य, प्रियजनांचा सहवास हे सारं परिवर्तनीय आहे. चिरंतन नाही, अशाश्वत आहे. पण जे सुजाण असतात ते या सर्व गोष्टींमध्ये गुंतून पडत नाहीत. ते फक्त शाश्वताचाच पाठपुरावा करतात.
जेव्हापासून माणसाचं जगणं सुरू होतं तेव्हापासून पळणं, धावणं सुरू होतं. शिक्षण, नोकरी, पैसा, पद, अधिकार, कीर्ती, चांगलं, अधिक चांगलं, त्याहून उत्तम मिळवण्यासाठी त्याची पुरी दमछाक होते. जास्तीत जास्त जमीन पादाक्रांत करण्यासाठी तो धाव धाव धावतो आणि सूर्यास्त समयी त्याला जाणवते ती फक्त एक घोट पाण्याची गरज. त्यावेळी त्याच्यासाठी शाश्वत फक्त एकच असते का? एक घोट पाणी. ? अंततः त्याला काहीच मिळत नाही. ना जमीन ना पाणी ना शांती. त्यातच त्याचा अंत होतो.
या पार्श्वभूमीवर मला डॉक्टर केळकर यांचे मृत्यूश्येवरचे “मी छान आहे” हे शब्द खूप महत्त्वाचे वाटतात. त्यात एक स्वीकृती होती. जो जन्माला येतो तो मरणाला घेऊनच. मृत्यू हेच सत्य आहे. जगणं ते मरणं हा सत्याकडून सत्याकडे जाणारा प्रवास आहे. त्या प्रवासातलं जे अपरिवर्तनीय, चिरंतन, निरंतर, कायमस्वरूपी असणारं जे काही आहे तेच शाश्वत आणि या शाश्वताची कास धरून कर्म करणारा आणि कर्मातून अलिप्त होणारा तो खरा ज्ञानी. असा माणूस मरतानाही आनंदी असतो कारण मुळातच तो देहाभिमानी नसतो. कालचक्राची स्थित्यंतरे त्यांनी मानलेली असतात, जाणलेली असतात. बाल्य, शैशव, यौवन आणि वार्धक्य या परिवर्तनीय अवस्थांचं त्याला ज्ञान असतं. त्यामुळे तो कधीही विचलित नसतो. भंगुरतेच्या पाठी तो धावत नाही. त्याची कर्मेही एका अज्ञात शक्तीला समर्पित असतात म्हणून तो मुक्त आणि आनंदी असतो आणि अशा मुक्ततेत, आनंदात शाश्वतता असते.
मी एक अत्यंत पढतमूर्ख, सामान्य व्यक्ती आहे. भल्याभल्या ग्रंथवाचनातूनही मला आत्मा— परमात्म्याचं ज्ञान झालेलंच नाही. पण डॉक्टर केळकर यांचे तीनच शब्द.. “ मी छान आहे “ मला शाश्वत काय असते याचा अर्थ सांगून गेले हे मात्र निश्चित.