मराठी साहित्य – विविधा ☆ कोरे पत्र… ☆ सौ शालिनी जोशी☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ कोरे पत्र… ☆ सौ शालिनी जोशी

चांगदेव पासष्टी वाचली. चांगदेवानी संत ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठवले. त्याचे उत्तर म्हणून संत ज्ञानेश्वरानी त्याच कागदावर ६५ ओव्या लिहून चांगदेवाना पाठविल्या. ६५ ओव्यात केलेला आत्मबोध म्हणून चांगदेव पासष्टी. यावरून पत्र या प्रकाराविषयी मनात कुतुहून निर्माण झाले. पत्र म्हटलं की एक ठराविक साचा डोळ्यासमोर येतो. सुरुवातीला मायना, मध्ये मजकूर व शेवट समारोपाचे शब्द व लिहिणाऱ्याचे नाव किंवा सही. पण येथे तर कोरे पत्र. मला वाटते भारताच्या इतिहासातले हे एकमेव कोरे पत्र असावे. आणि त्याच कागदावर त्याला संत ज्ञानेश्वर उत्तरही पाठवतात. ये हृदयीचे ते हृदय घातले असा हा उपदेश. ‘तत् त्वं असि’. जगातले अक्षर वाङ्मय ठरला. येथे चांगदेवानी कोरे पत्र पाठवून आपली योग्यता सिद्ध केली आहे. कोरेपण म्हणजे रितेपण, स्वच्छपणा, निरहंकारता आणि ज्ञानग्रहण क्षमता. हा पत्रातील नि:शब्द भाव संत ज्ञानेश्वरानी ओळखला आणि म्हणून त्यावर ज्ञानाची अक्षरे उठली.

दुसरे पत्र डोळ्यासमोर येते ते रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाठवलेले पत्र. श्रीकृष्णाच्या रूपागुणाचे, सामर्थ्याचे, कर्तुत्वाचे वर्णन करणारे आणि श्रीकृष्णांबरोबर विवाहाची तीव्र इच्छा व्यक्त करणारे प्रेमपत्रच हे. रुक्मिणीने सात श्लोकात लिहून एका ब्राह्मण सेवकाबरोबर पाठवूण दिले आणि त्वरीत उत्तराची अपेक्षा ही व्यक्त केली. कारण घरातल्यांनी शिशुपाला बरोबर लग्न ठरवले होते. गडबड सुरू होती. ‘कुठून व कसे माझे हरण करा’ हे कळवणारे मोठ्या चातुर्यांना दिलेले उत्कट श्रीकृष्ण प्रेम व्यक्त करणारे हे पत्र. इतके की श्रीकृष्ण उत्तराच्या फंदात न पडता लगेच सैन्य घेऊन कौडिण्यपूरला निघाले. मोठे युद्ध करून रुक्मिणीचे हरण केले. पुढे विवाह झाला. असे हे कौंडिंण्यपूरहून द्वारकेपर्यंत आलेले पत्र.

आणखी आठवतो तो समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्यामधील पत्रव्यवहार. गुरुशिष्यांमधील हा पत्र व्यवहार. ‘ निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू’ अशी सुरुवात असलेल्या पंधरा ओव्यातील हे पत्र. हे मराठी पत्र साहित्याचे भूषण असेच आहे. शिवाजी महाराजांचा यथार्थ गौरव त्यात समर्थ करतात. राजकर्तव्य, परमार्थ उपदेश आणि हे राज्य ‘श्रीं’ चे आहे ही जाणीवही दिली आहे. स्वराज्याची प्रेरणा दिली.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १६८१ मध्ये संभाजी राजांना हृदय पिळवटून टाकणारे ओवीबद्ध पत्र समर्थांनी लिहिले. ‘उग्र स्थिती सांडावी, सौम्य स्थिती धरावी’, अशा शब्दात शिवरायांकडून प्राप्त झालेल्या श्रेष्ठ वारशाची त्यांना आठवण करून दिली. संभाजी महाराजांच्या वर्तनाने स्वराज्याला हादरा बसणार की काय या घोर चिंतेने व्याकुळ झालेल्या विरागी संताचे ते पत्र. त्यावरून त्यावेळच्या खरा इतिहास कळतो.

अशाप्रकारे पत्र हा एक वाङ्मय प्रकार आहे. त्यात वैविध्य आहे मुख्यत: याचे दोन प्रकार दिसतात, औपचारिक व अनौपचारिक. औपचारिक म्हणजे संस्थात्मक, कार्यालयीन कामकाजाविषयी, ठराविक पद्धतीने लिहिलेली आणि अनौपचारिक ही घरगुती, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, जवळच्या संबंधितांना लिहिलेली. अनौपचारिक पत्रे प्रेम आणि भावना व्यक्त करतात. पत्र हे संदेश कळविण्याचं एकमेव साधन त्यांकाळी होते.

इंग्रजांच्या काळात भारतात पत्र वाटण्याची पोस्टाची सुनियोजित पद्धत सुरू झाली. तीच सध्या ही प्रचलित आहे. यापूर्वी माणसांबरोबर तर कधी घोडेस्वारांबरोबर लखोट्यात घालून पत्रे पाठविली जात. पक्षांबरोबर पत्रे पाठवल्याचे उल्लेखही आढळतात. हे सर्व त्रासाचे होते. पण आता वाहनांच्या सोयीमुळे पोस्टाचे पत्र वाटण्याचे काम सुलभ झाले आहे. खेडोपाड्यापर्यंत पत्राद्वारे संपर्क साधता येतो.

अनौपचारिक पत्राला विषयाचे बंधन नाही. लिहिणारा आणि वाचणारा दोघांचे हृदय त्यात ओतलेले असते. त्यामुळे कधी आनंद तर कधी दुःख. हळूहळू या पत्राना साहित्याचे रूप आले. साने गुरुजींची श्यामची पत्रे, सुधेस पत्रे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. कवी अनिल व कुसुमावती देशपांडे यांच्यामधील पत्र व्यवहारांचे संकलन झाले. नेहरूंचे इंदिरेस पत्रे प्रसिद्ध आहेत. विनोबांची पत्रे पुस्तक आहे. तसेच रवींद्रनाथ टागोर, चिपळूणकर, कर्वे, आंबेडकर, लक्ष्मीबाई टिळक इत्यादी मोठ मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या पत्रांचे खंड प्रसिद्ध झाले आहेत. वर्तमानपत्रातही वाचकांची पत्रे’ असे एक सदर असते. एकंदरीत पत्र लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पत्रात उमटते. पु. ल. देशपांडे यांची बोलकी पत्रे अपूर्वाई व पुर्वरंग मध्ये आहेत.

आता e mail, whatsapp यामुळे पारंपरिक पत्र पद्धत लोप पावल्यात जमा झाली आहे. पत्रांना दोन-चार ओळीचे स्वरूप आले. भावभावनांचे काम emojis करतात. मुले ‘आईचे पत्र हरवले. ते मला सापडले’ असा खेळ खेळत तोही काळाच्या पडद्याआड गेला. पत्र ज्या वर लिहितात ती पोस्टाची कार्डे, आंतर्देशीय, पाकिटे ही ही पुराण वस्तू म्हणून म्युझियममध्ये बघावी लागतील. ‘हाय पत्रा तुझी कहाणी! ‘

 ©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण…आई.. – भाग – ४४/१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण…आई.. – भाग – ४४/१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आई..

मला आईची महानता तेव्हाच खऱ्या अर्थाने जाणवली जेव्हा मी स्वतः आई झाले. मातृत्व या शब्दाची, या व्याख्येची, भावनेची खरी व्याप्ती आणि जाणीव तेव्हाच झाली जेव्हा मी स्वतः आई झाले. तेव्हा कळलं “माता अनंताची” म्हणजे नक्की काय? मुलांना जन्म दिला की आई ही पदवी जरूर मिळते पण आईपण म्हणजे केवळ मुलाला जन्म देण्यापुरतंच नसून ते त्याच्या शारीरिक आणि मानसिक संगोपनात, जडणघडणीत, त्यास सुविचारी, संस्कारी करण्यात सामावलेलं असतं आणि ही आयुष्यभराची अखंड विस्तृत प्रणाली आहे. असं आईपण निभावताना जेव्हा जेव्हा माझी दमछाक झाली तेव्हा तेव्हा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात हेच उद्गार घुमले, ” आई! तू कसं केलंस गं? मला तर दोनच मुली आहेत. तू आम्हा पाचही बहिणींचं काटेकोरपणे संगोपन कसं केलस? आमची आजारपणं, रात्रीची जागरणं, आमच्या आवडीनिवडी, खाणंपिणं, वेण्याफण्या सतत आमच्यासाठी.. अगदी अंतर्वस्त्रांपासून ते सुंदर डिझायनर्स पोशाख शिवणे प्राथमिक वर्गातला अभ्यास घेणे, शाळेत जाताना आमचं दप्तर भरणं, मधल्या सुट्टीतला डबा देणं, त्यानंतरही आमच्या उमलत्या वयातले मूडस, शैक्षणिक टप्पे, प्रेमप्रकरणं, लग्नं, बाळंतपणं एक ना अनेक. तुझ्या या अफाट कार्याची यादी सुद्धा करणे मला जमणार नाही. प्रत्येक वयाचे टप्पे ओलांडताना तू आमच्याबरोबर खंबीरपणे असायचीस, डोळसपणे, जाणीवपूर्वक असायचीस म्हणूनच आमच्या जीवनातील अनेक वेगवेगळी वळणं आम्ही सहजपणे पार करू शकलो. तेव्हा मी तुला केवळ गृहीत धरले. आईपणा व्यतिरिक्त तुझ्यात असलेलं एक निराळं व्यक्तिमत्व आम्हाला तेव्हा ना कळलं ना कळून घेण्याची आम्हाला गरज वाटली. एक व्यक्ती म्हणून आयुष्याबद्दल तुझी काही निराळी कल्पना, विचार होते का हा कधी विचारही आम्ही केला नाही.”

आता उपकृत भावनेने जेव्हा मी आईचा विचार करते तेव्हा ती वेगवेगळ्या अनेक रूपात उलगडत जाते.

खरं म्हणजे विसाव्या शतकातला पूर्वार्ध म्हणजे १९२०/२१ चा काळ एकंदरच खूप वेगळा होता. विशेषतः स्त्रियांसाठी. त्या काळात आई ग्रँटरोडच्या “सेंट कोलंबस” या कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी होती. तिला मराठी सोबत इंग्रजीचेही उत्तम ज्ञान होते. शिवाय मुंबईसारख्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण नगरीत तिचे बालपण गेले. आजोबांची शिस्त, टापटीप आणि काहीसं पाश्चात्त्य पद्धतीचं वळण तिच्या नसानसात भिनलेलं होतं त्या तुलनेत, आईचं पप्पांशी लग्न झाल्यानंतरचं वातावरण खूप वेगळं होतं. ठाण्याच्या धोबी गल्लीतल्या, फारशा सुविधा नसलेल्या एकमजली घरात आणि ज्या घरात माझ्या आजीचा प्रभाव होता तिथे तिने स्वतःला कसे सामावून घेतले असेल? सुरुवातीला तर त्या घरात इलेक्ट्रिसिटी नव्हती, स्वयंपाकासाठी चूल होती, शेगडी होती. माझ्या आठवणीत चुलीवर गरमागरम भाकऱ्या करणारी आई अजूनही आहे. ज्या बोटांनी आईने अनेक सुंदर पेंटिंग्स केली होती, कित्येक विणकामं, भरतकामं केली होती त्याच हाताने चुलीतली लाकडं पेटवून अथवा सांजवेळी रात्र होण्याच्या आत कंदीलाच्या काचा पुसून घासलेट भरून वाती पेटवताना तिला कधी वैषम्य वाटले असेल का? की त्यावेळी आजूबाजूच्या बहुतांश स्त्रियांचे आयुष्य असेच होते…? “रांधा वाढा उष्टी काढा” याच समूहातले मग आपल्या आईने वेगळा सूर का लावला नाही हा विचार बालपणीतरी आमच्या मनात येण्याचा संभवच नव्हता आणि तिने जर वेगळा सूर लावला असता तर आमच्या आयुष्याचं काय झालं असतं या विचाराने आता माझ्या अंगावर काटा सरसरतो तेव्हा मातृत्वाची खरी व्याख्याही कळते.

वास्तविक त्या काळातही ती रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी करत होती. जात्याच ती खूप हुशार आणि मेहनती होतीच. मनात आणलं असतं तर तिने तिथे विशेष कामगिरी करून उच्चपदी पोहोचून स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य, ओळख आणि अस्तित्व मिळवलं असतं पण आमच्या जडणघडणीचं एक महत्त्वाचं “जूं” जणू तिच्या मानेवर तिनं पेललं आणि या सर्व स्वकेंद्रित जाणिवांतून ती सहजपणे बाहेर पडली.

“आई! खूप वेळा आणि या क्षणी मला एक अपराधी भावना स्पर्शून जाते. आमच्या संपूर्ण जडणघडणीवर पप्पांच्या विद्वत्तेचा, शिकवणीचा, त्यांच्या नाना प्रकारच्या आवडी आणि रसिकतेचा पगडा निश्चितच आहे. तसेच जिजी म्हणजे आमची आजी.. जिच्या मायेच्या अखंड प्रवाहाची शीतलता आम्ही आयुष्यभर अनुभवली आणि नकळत का होईना आमच्या मनी सतत जिजी आणि पप्पांच्याच आठवणी सहजपणे येत असतात पण खरं म्हणजे जिजी आणि पप्पा आमच्यासाठी संरक्षक भिंती होत्या तर तू आमचं छत होतीस.”

आईला जेव्हा मी निराळेपणाने पाहते तेव्हा जाणवते ती आईची मुळातली सौंदर्यदृष्टी. जिजी आणि पप्पांच्या मधली आई एक व्यक्ती म्हणून फार वेगळी होती. त्याचं कारण तिच्या जडणघडणीची पार्श्वभूमीच निराळी होती. तरीही तिने कधीही कसलाही अहंकार बाळगला नाही. सासू म्हणून तिने जिजीला आणि पती म्हणून पप्पांचा तिने सतत मान राखला आणि समांतरपणे तिने तिची शिस्त, टापटीप, स्वच्छता, घर अडचणीचं असलं तरी कसं सुंदर राखावं याचे धडे नकळत आम्हाला गिरवायला लावले.

“आई रागवेल, आई ओरडेल आईला हे आवडणार नाही” हे भय आम्हाला अनेकदा जिजीच्या कुशीत शिरायला लावायचं पण आईच्या धाकदपटशाने आमच्या आत, कुठेतरी सैरावैरा मोकाट वाढलेलं गवत माळ्याने कात्रून छान आकार द्यावा तसा आकार आम्हाला नक्कीच मिळवून दिला. आईच्या प्रेमाची आणि जिजीच्या मायेची जातच वेगळी होती आणि आज मी या दोघांचं महत्त्व जाणते कारण मी एक आई आणि एक आजी याचा भिन्नपणे या दोन्ही भूमिका जगताना विचार करू शकते. आई आईच असते आणि आजी आजीच असते. दोघीही फक्त प्रेमच करतात पण दोघींच्या प्रेमाचे रंग वेगळे असतात.

सुट्टीच्या दिवसात आई आम्हाला विणकाम, भरतकाम, पेंटिंग्स करायला शिकवायची. एकदा मी विणलेली एक कलाकृती पाहून ती मला म्हणाली, ” हे काय असं विणून ठेवलेस? किती सैल आहे ते? सुईवरचे टाके घट्ट टाकले की वीणही घट्ट होते. मग टाके असे सुटत नाहीत. सारं उसवून पुन्हा विणायला घे. ” आईचं हे सहजपणे उच्चारलेलं वाक्य माझ्यासाठी कायम ब्रह्मवाक्य ठरलं. आयुष्यातली अनेक नाती जपताना माझी जेव्हा जेव्हा होरपळ झाली तेव्हा आईचे हे शब्द नेहमीच कानी राहिले. नात्यांची वीण कशी घट्ट ठेवावी याची महान शिकवण आईने आम्हाला वेळोवेळी दिली ती तिच्या वागण्यातूनही. तिने सासरची माहेरची सगळी नाती प्रेमपूर्वक आणि कर्तव्य बुद्धीने सुद्धा जपली.

आईच्या आणि जिजीच्या नात्यातला घट्टपणा आणि ठिसूळपणा दोन्हीही गंमतीदार होता. जिजीने आईवर आणि आईने जिजीवर मनापासून प्रेमच केलं. दोघींच्यात मतभेद होत, खटके उडत पण आईला कधी कुठून घरी परतायला उशीर झाला तर जिजी लगेच देव पाण्यात ठेवायची. ” का गं? मालू रस्ता तर चुकली नसेल ना? ” असं सतत आम्हाला विचारत राहायची. आईच्या बाबतीत ते खरंही होतं. आईला कधी कधी पटकन रस्ते समजायचे नाहीत. एकदा तर ती “ढग्यांचं घर कुठे आहे? ”… तेव्हा आम्ही नुकतेच नवीन घरात राहायला गेलो होतो.. असं विचारत घरी पोहचली होती. हा विनोदाचा भाग वगळला तरी जिजीला आई विषयी वाटणारी काळजी विलक्षण होती. आईला ही जिजीचं कितीही पटलं नाही तरी तिने जिजीच्या मनाविरुद्ध किंवा तिला विचारल्याशिवाय कधीही काहीही केले नाही. या पाठीमागे आईच्या मनात जिजीविषयी एक कृतज्ञतेचा भाव नक्कीच होता. वयाच्या सोळाव्या वर्षी वैधव्य आलेल्या या स्त्रीने एक तपस्विनीची भूमिका अंगीकारून चार महिन्याच्या तिच्या मुलाला एक परिपूर्ण जीवन बहाल केले होते आणि आज जे काही आम्ही सारे आहोत ते केवळ तिच्यामुळेच ही भावना आईच्या मनातून कधीही पुसली गेली नाही. नकळत आईने एक प्रकारचा सगळ्यांना जोडून राहण्याचा, समजून घेण्याचा संस्कार आम्हाला दिला. पप्पांची सगळी जीवाभावाची नाती तिने त्याच आंतरिक भावनेने जपली. आई जेव्हा गेली तेव्हा पप्पांचा धाकटा मावस भाऊ ज्याला आम्ही “पपी” म्हणायचो तो डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला, “आज आम्ही खरे पोरके झालो! आई जाण्याचं दुःख काय असतं हे आज कळतंय. ”

– क्रमशः भाग ४४ / १ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-३ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-३ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

आपल्याला वाटते की फक्त पुरुषांमध्ये व्यसनाचा प्रॉब्लेम असतो. पण आता असं राहिलेलं नाहीये. आता महिलांमध्येसुद्धा हा प्रश्न खूप वाढायला लागलेला आहे. मी जेव्हा मुक्तांगण मध्ये काम करायला लागले… 1994 साली छोट्या छोट्या कामाची माझ्या आईने माझ्यावर जबाबदारी दिली होती. त्यात एक जबाबदारी अशी दिली होती की, जे विद्यार्थी येतात त्यांना दारू आणि ड्रग्समुळे होणाऱ्या दुष्परिणामांची सगळी माहिती द्यायची. त्यांच्याशी बोलायचं, त्यांना कम्फर्टेबल करायचं, वगैरे. आमच्याकडे तेव्हा स्वीडनहून काही विद्यार्थी प्रशिक्षणासाठी आलेले होते. मी त्यांना सगळं दाखवलं. त्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न असा विचारला की, ‘आत्ता जे तू सगळं दाखवलं तर ह्याच्यात आम्हाला सगळे पुरुष पेशंट दिसले. बायका कुठे आहेत? बायकांना तुम्ही कुठे ठेवता? ‘ तर 94 साली मला या प्रश्नाचं एकदमच आश्चर्य वाटलं. मी म्हटलं की, ‘नाही आमच्या देशात बायका व्यसन करत नाहीत. म्हणून फक्त पुरुषच आमच्याकडे असतात. तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं; पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. आमच्याकडे महिलासुद्धा रुग्ण म्हणून हळूहळू यायला लागल्या. मग 2009 साली आम्हाला एक वेगळं काम महिलांसाठी सुरू करायला लागलं. तेव्हा असं झालं की, जेव्हा पेपरमध्ये आलं की मुक्तांगणमध्ये असं महिलांसाठीच केंद्र सुरू होतंय तर खूप लोकांनी लगेच अभिनंदनाचे फोन केले. आम्ही तेव्हा सांगितलं की, ‘प्लीज, आमचा अभिनंदन करू नका. आम्हाला खूप वाईट वाटतंय की आपल्याला महिलांसाठी असं काहीतरी काम… व्यसनमुक्तीचं काम सुरू करायची वेळ येतेय. ‘ एकंदरीत काय तर महिलांमध्येसुद्धा हा प्रॉब्लेम वाढतोय. महिलांमध्ये झोपेच्या औषधांचं खूप प्रमाण आहे. पेन किलरच्या गोळ्या खाणं तर सगळ्या वयोगटांमध्ये दिसतेय. लहान मुलींमध्ये जर का बघितलं तर दारूचं व्यसन आहे. झोपेची औषधं हे जे दुसरं कारण आहे ते महिलांच्या बदलत्या मानसिकतेमध्ये आहे. पूर्वी एखाद्या महिलेला समजा काहीतरी खूप निराश वाटतंय, दुःख होतंय, तर ती काय करायची की रडून मन मोकळं करायची. कोणाकडे तरी जाऊन बोलायची. बोललं की बरं वाटायचं. रडलं की बरं वाटायचं. पण आम्ही आमच्या रुग्णमैत्रिणींशी जेव्हा बोलतो तेव्हा असं दिसतं की, आता रडता कामा नये. मी आता स्ट्रॉंग आहे, तर मी रडता कामा नये किंवा माझे दुःख मी दोन लोकांशी बोलले तर लोकांना काय वाटेल आणि म्हणून ते बोललं जात नाही. आपले प्रॉब्लेम्स हे मनातच साठवून ठेवले जातात. मग जेव्हा ते मोठ्या प्रमाणात मनात साठवले जातात तेव्हा त्याचा खूप कोंडमारा होतो. परिणामी व्यसन करणे वगैरे अशा चुकीच्या गोष्टी सुरू होतात. म्हणून जेव्हा महिलांसाठी खास करून आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेतो, त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा मी त्यांना आवर्जून सांगते की जेव्हा काही प्रॉब्लेम येईल तेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलून मोकळ्या व्हा. इथेही मला सगळ्यांना सांगायचे आहे की, जेव्हा आपल्याला काही टेन्शन येतं तेव्हा पहिली गोष्ट आपण काय केली पाहिजे तर कोणाला तरी विश्वासात घेऊन ते सांगितलं पाहिजे, रडलं पाहिजे. आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अधून मधून रडणं खूप चांगली गोष्ट आहे.

आधुनिक व्यसनामध्ये आणखी एक वाईट गोष्ट वाढीस लागली आहे ती म्हणजे ऑनलाईन जुगार. त्याचबरोबर पॉर्नोग्राफीचं व्यसनही आजकाल खूप वाढतंय. व्हिडीओ गेम्स खेळले जातात. सोशल मीडियामधील वर्तनात्मक व्यसनाचं प्रमाण आता लोकांमध्ये खूप वाढते. सुरुवातीला आम्ही बघायचो की हे प्रमाण तरुण मुलामुलींमध्ये जास्ती असायचं. पण अलीकडे सगळं सर्व वयोगटांमध्ये हे व्यसन वाढायला लागले आहे. याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. एकदा असं झालं… 2009-10 च्या आसपासची गोष्ट असेल. एक वडील आमच्याकडे आले आणि ते म्हणाले, ‘माझ्या मुलाला ऍडमिट करा. त्याला व्यसन लागले आहे. ‘ मग आम्ही विचारले की कसलं? तर ते म्हणाले की, त्याला कम्प्युटरचे व्यसन लागलेय. त्यावर आम्ही म्हटलं की, ‘तो काही दारू पीत नाहीये, सिगरेट ओढत नाही की तंबाखूही खात नाही. यापैकी तो काहीच करत नाहीये. कॉम्प्युटर वगैरे असं काही व्यसन नसतं. म्हणून त्यावर आम्ही उपचार वगैरे करत नाही. ‘ पण त्या वडिलांनी आम्हाला जेव्हा तपशीलात जाऊन तो काय करतो याची हकीकत सांगितली तेव्हा आमच्या लक्षात आलं की, होss, याला पण व्यसनच म्हणायला हवे. पुढे ते असं म्हणाले की, ‘त्याला टेक्नॉलॉजीची खूप आवड होती. म्हणून कॉलेजमध्ये गेल्यावर कम्प्युटर घेऊन दिला. मग त्याला तेच वेड लागलं. सारखं तो तेच करत बसायचा. रात्रंदिवस त्याचं ते चालायचं. ज्युनिअर कॉलेजमध्ये असतांना त्यांना कॉलेजमध्ये बोलावण्यात आलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, तो परीक्षेला जात नाही. कारण अभ्यासच करत नाहीये. लेक्चर्स अटेंड करत नाहीये. सारखं त्याचं तेच कॉम्प्युटर कॉम्प्युटर चाललेलं आहे. मग आमच्याही लक्षात आलं की, जसं दारू किंवा ड्रगचं व्यसन असतं तसंच कॉम्प्युटरचंही. व्यसनी व्यक्तीला दारू किंवा ड्रग्ज मिळाले नाही तर त्या व्यक्तीला त्रास होतो. तसेच या मुलाच्या बाबतीत पण होत होतं. आई-वडिलांनी ते त्याच्याकडून काढून घेऊन सगळं बंद केलं. पण असं जेव्हा केलं तेव्हा त्याने प्रचंड थयथयाट केला. तो अगदी अस्वस्थ झाला. झोप न येण्याचा त्याला प्रचंड त्रास सुरू झाला. याला मानसिक आजार म्हणायचं. कारण जसं व्यसन मिळालं नाही तर सतत त्याची तल्लफ येते, क्रेविंग येत राहते, तसंच या मुलाला कॉम्प्युटरचं तीव्र आकर्षण निर्माण झालं होतं.

एवढं सगळं आमच्या लक्षात आल्यावर आम्ही त्या मुलाला ऍडमिट केलं. ती आमची पहिली केस होती… म्हणजे ‘इंटरनेट एडिक्शन डिसऑर्डर’ची… IAD ची. मी जेव्हा याचा अभ्यास केला. आम्ही इंटरनेटवर त्याची माहिती घेऊ लागलो. तेव्हा आम्ही सगळे सहकारी एकमेकांना चिडवायचो की, एका इंटरनेट एडिक्शनच्या व्यसनावर उपचार करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच इंटरनेटवरनं त्याची माहिती घ्यावी लागतेय. आमच्या लक्षात आलं की अमेरिका, चीन, कोरियामध्ये हे व्यसन खूप पसरलेलं आहे. आम्ही त्याच्यासंबंधी अशा अनेक केसेस वाचल्या. खरं तर तेव्हा मला असं वाटलं होतं की आपल्या देशात एवढ्या टोकाला नाही जाणार. पण बऱ्यापैकी टोकाला जाणाऱ्या केसेस आम्ही बघत असतो. दरम्यान एक आई-वडील आमच्याकडे आले. ते प्रचंड घाबरलेले होते. ‘आमच्या मुलाला लगेच तुम्ही ऍडमिट करून घ्या. ‘ त्यांनी असं सांगितलं की त्यांचा मुलगा आई-बाबा रात्री झोपायला गेले की, तो मुलगा कम्प्युटरवर टक लावून बघत गेम खेळत बसायचा. आपण सगळेच झोपताना मुलांना सांगतो ना की झोपा आता, जास्ती वेळ कॉम्प्युटरवर गेम खेळत बसू नका, तसं त्यांनी त्याला सूचना दिल्या आणि झोपायला गेले. सकाळी जेव्हा आईबाबा उठले आणि मुलाच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी बघितलं की, अजूनही तो मुलगा असच कॉम्प्युटरकडे टक लावून लावून बघतोय आणि गेम खेळतोय. त्या मुलाने युरीन पास केलीये, हे त्या मुलाला कळलं पण नाहीये, इतका तो त्याच्यामध्ये गुंतला गेला होता. ते पाहून त्याचे आई-वडील इतके घाबरले की ते लगेच आमच्या मागे लागले…. आमच्या मुलाला लगेच तुम्ही ऍडमिट करून घ्या.

तसंच ऑनलाईन जुगारबद्दल. आयपीएलच्या वेळेला वाचत असाल तुम्ही ते ड्रीम इलेव्हन आणि काय काय! ऑनलाइन रमी आणि काय काय वेगवेगळे प्रकार असतात. एक उदाहरण सांगते, गरीब घरातला 21 वर्षांचा एक मुलगा आमच्याकडे आला होता. अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला हा मुलगा होता. त्याने ऑनलाईन जुगारात 67 लाख रुपये घालवले होते. मी नेहमी सगळ्यांना सांगते की, आपणच आपल्याला तपासून बघायचं की आपण व्यसनाधीन बनण्याच्या मार्गावरती आहोत का नाही ते… तुम्ही सगळ्यांनी घरी गेल्यानंतर गुगलवर एक टेस्ट शोधा. तिचे नाव आहे… IAT (इंटरनेट एडिक्शन टेस्ट) 20 प्रश्न आहेत फक्त. ते प्रश्न सोडवा आणि उत्तरावरून तुम्हालाच कळेल की तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आहारी किती गेला आहात ते.

इंटरनेट आहे म्हणून आपल्याला भरपूर माहिती मिळते. शॉपिंगपासून सगळ्या गोष्टी मॅनेज करणे आपल्याला शक्य झालं. त्याचा वापर आपण किती करायचा हे जर कळलं नाही तर त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होऊ शकतं. आम्ही पालक सभेमध्ये वगैरे बोलतो किंवा पालक आणि मुलं एकत्र येतात तेव्हा याचं व्यसन लागू नये म्हणून आम्ही सगळ्यांनाच सुचवतो की, प्रत्येक घराने इंटरनेट वापराचे किंवा फोन वापरण्याचे नियम करायचे आणि ते नियम सगळ्यांनी पाळायचे. जे नियम मुलांना तेचं पालकांनासुद्धा आहेत. कारण काही पालकांच्या बाबतीत दिसून येते की ते मुलांना जे सांगतात तसे ते मात्र वागत नाहीत. त्याचं एक उदाहरण सांगते, एका आठ-नऊ वर्षाच्या मुलीला तिची आई घेऊन आली होती. ती मुलगी खूप फोन वगैरे वापरत होती. तर मी तिच्याशी जेव्हा बोलत होते तेव्हा मुलगी मला म्हणाली की, ‘तुम्ही आधी माझ्या आईला सांगा की ती रोज ऑफिसमधून आल्यानंतर टीव्ही बघत बसणार नाही. माझ्याशी बोलेल, खेळेल. संध्याकाळी मला सांगते की खाली खेळायला जा, पण ती मात्र मोबाईल घेऊन बघत बसलेली असते. तिला पण तुम्ही सांगा की, मी जर मोबाईल बघायचा नसेल तर तिने पण मोबाईल बघायला नको. ‘ म्हणून आम्ही आवर्जून सगळ्या पालकांना पण सांगतो की, तुम्ही पण हे नियम पाळायचे.

– भाग तिसरा.

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हक्काचं ठिकाण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ हक्काचं ठिकाण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

“एक दोन तरी असायलाच हवीत हक्काची ठिकाणं.

“अरे तुझा चेहरा आज असा का दिसतोय? “

” काही नाही रे… “

” नाही कसं? काय झालंय? बोल ना.. “

आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ त्याच्याजवळ रिकामं होतं. एखादी गच्च कोंबून भरलेली बॅग रिकामी करावी तसं आणि मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं.

हेच.. हेच ते “हक्काचं_ठिकाण”.. My Happy Place!!

फक्त आठवून बघा अशी कोणती हक्काची ठिकाणं आपल्या जवळ आहेत? मनाला उभारी, खराखुरा विसावा देणारी.. एक एक आठवत चला. एकदम फ्रेश वाटेल! त्या व्यक्तीसोबतचे संवाद किंवा गमतीजमती एखाद्या सिनेमासारख्या तुमच्या डोळ्यांपुढून तरळून जातील. कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं तर एखाद्या मित्रासोबत खळखळून हसलं जातं, भावासोबत बालपणीच्या आठवणी, चिडवाचिडवी.. तर एखाद्या नातेवाईकांसोबत साहित्यिक चर्चा… sooo coool असं feeling देणारी ही ठिकाणं!

अशी मोजकीच पण हक्काची ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असतात. आई वडील तर खास हक्काचेच. त्याशिवाय मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण,

भावजय, दीर, नणंद, cousins, नातेवाईक.. कुणीही असू शकतं तुमचं हक्काचं ठिकाण, Your true Happy Place!

जिथे आपुलकी, जिव्हाळा तर असतोच, पण सोबत असते संजीवनी.. मनाला जिवंत करणारी! किंवा अगदी एखादा व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा.. जिथे नुसतं डोकावलं, नुसता एक virtual फेरफटका मारला तरी मन एकदम relax होतं!

निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी.. त्यांच्या सहवासात एकदम relax, fresh वाटतं. मन हलकं हलकं होऊन जातं. अगदी मोरपिसासारखं! तिथे कुठलाच आडपडदा नसतो किंवा show-off ही नसतो. अगदी मनातलं हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर घेतलं जातंच, पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केलं जात नाही. आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत, मन मोकळं वाटतं.

“तुमको देखा, तो ये खयाल आया

जिंदगी धूप, तुम घना साया! “

ही हक्काची ठिकाणंही अगदी अशीच.. सावली देणारी, विश्रांती देणारी.. थकल्याभागल्या जिवाला आणि मनाला! आणि गंमत म्हणजे अशी माणसं आरशासारखी असतात. गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी. म्हणून जास्त विश्वास!

अशी हक्काची ठिकाणं अगदी जिवापाड जपूssssन ठेवायला हवीत.. हिऱ्या माणकां पेक्षा जास्त! ती हरवायला नकोत, आयुष्याच्या गडबडीत. कारण यांची फक्त साथही लाख-मोलाची! Loneliness किंवा एकटेपणा दूर करणारी.. म्हणूनच “तुझ्याशी बोलून खूssssप बरं वाटतं, ” हे त्यांना नक्की सांगायालाच हवं.

कुणाचीही आत्महत्या कानावर आली की वाटून जातं, की मन मोकळं करायला त्यांच्या जवळ असं एकही हक्काचं ठिकाण नसेल, जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल? कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज! त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार?

आपण आपल्या आयुष्यातली सगळी हक्काची ठिकाणं तर जपावीच पण आपणही कुणाचं तरी हक्काचं ठिकाण नक्कीच असायला हवं! नाही का?

“खूsssssप बरं वाटलं ना वाचून? मग friends आणि सर्व हक्काच्या ठिकाणांना जरूर शेअर करा आणि सांगा ‘खूsssप बरं वाटतं तुझ्यासोबत’! “

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पहाट – भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ निसर्ग पहाट – भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

… (काहीवेळा नागराजाचं दर्शन मिळत असे. पण कोणत्याही प्राणीमात्राचं भय नव्हतं.

जिओ और जीने दो

चं साम्राज्य मुक्तपणे

नांदत होत. येथे ना त्यांना भय ना माणसाला!) …

आजूबाजूला साखर कारखाने असले तरी, बरीच गुऱ्हाळ गूळ करण्यात पटाईत.

गुऱ्हाळाच्या बाजूने जाताना त्याचं एक प्रकाराचा विशिष्ट वास येत होता. त्यांचं काम सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत चालत होत. येणारा जाणारा उसाचा रस पिऊन तृप्त पणे ढेकर देत जातं होता. जाताना गरम गूळ व काकवी पण घेउन जातं असे. त्याला कोणताही मज्जाव नव्हताच.

तस दिस कासराभर वर सरकलेला. सुरव्या डोक्यावर आलेला. राबणारे हात पाय, मर्गळलेल्या अवस्थेत. अंगावर घामाच्या धारा, अंग काळ मेचकूट झालेलं. अंगावर अर्धी चड्डी आणि मांजरपाटाचे खोळ उर्फ बदामशर्ट कपडे पण रापलेले. कळकट झालेले.

सगळे राबणारे कष्टकरी, शेतकरीआपापल्या पाणवठ्यावर आली यथेच्छ मनसोक्त गार पाण्यात अंघोळ केली. अंग घासणीला चपटा दगड होताच. कोणी विहिरीत कोणी ओढ्यावर, कोणी शेतातील पंपावर. असं सगळे चांलेले.

अंघोळ होताच त्यांची पावलं तरतर आपापल्या पालाकडे वळली. त्यांच्या अंगात तर तरी आलेली. पोटात भूख लागलेली. केव्हा एकदा भाकर खाईन असं झालेलं.

कष्टकऱ्यांनी घरून आणलेली शिदोरी सोडलेली. काही जणांच्या बायका डोईवरून बुट्टीत जेवण बांधून आणलेलं. त्या पण आपल्या धन्यासोबत जेवण करत असतं. राबणारी गडी जेवण करून सुस्त होत. वाम कुक्षी साठी तिथंच झाडाखाली आडवे होत असतं.

काहीजण चंची सोडून सुपारीचे खांड तोंडात टाकीत, पानाचं देठ खुडून त्याला अंगठ्यानं चुना लावून तोंडाखाली दाबत असतं. त्यावर तंबाकूची चिमठ पण अलगद ओठा आड करत असतं. घटकाभर विश्रांती झाली की, परत ताजेतवाने होत अन कामाला लागतं असतं.

कोण भांगलण, कोण कोळपणी, कोण पाणी पाजण, अशी सगळी काम करत. इकडे त्यांच्या बायका पण जनावरांना चारायला सोडून घरात हातभार लावत असतं. काही बायका मळ्यातील माळवं तोडून आपली टोपली भरून घेत असतं. घरात थोडी ठेवून उरलेले माळवं बाजारात विकत असतं.

दिवस मावळत होता, तश्या सावल्या ही जरा लांबलचक पडत होत्या. दिवस मावळायला आला.

मावळतीला सप्तरंगाची उधळण चालू होतीच. हवेत गारठा जाणवू लागतं होताच.. पिवळा, नारंगी, निळा, केशरी, सूर्य एकदम मोठा लाल भडक दिसतं होता.

कातरवेळ, सांज वेळ जवळ येत होती. सूर्य मावळला. पक्ष्यांची गडबड चालू झाली. आपापल्या घराकडे परतण्यांची घाई सुरु होतीच. चित्र विचित्र आवाज असमंतात निघत होते. मध्येच पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची माळ शिस्तबद्ध पण जरा वेगाने मावळतीकडे जातं होती. जणू शुभ्र फुलांचा हार घेउन रान देवतेला घालण्यासाठी निघाले होते. मध्येच खंड्या उच्च स्वरात निनादत होता. सुतार पक्ष्याची टकटक थांबलेली. एव्हाना सायंकाळ होऊन थंडी वाढलेली. तश्यातच कातरवेळ साधत काही तरुणाई अंधाराचा फायदा घेत, अडोश्याला गप्पा मारत दिल जमाई चालली होती. गुपचूप कारभार चालू होता.

तारांगण सजल होत. वट वाघूळ परत आडव्या तिडव्या रेषा काढत झाडात गप्प होत होती. घुबडाचा विशिष्ट आवाज भय कम्पित करत होता.

टिट्वीच्या केकटण्याने शांतता भन्ग करीत होत्या.

बरीच मंडळी आपल्या पांदीच्या रस्त्याने घर जवळ करीत होती. दोन्हीही कडच्या उंच झाडीत रातकीड्यांची सनई चालू होती. रस्त्याने जाणारी जनावरे त्यांच्या गळ्यातील वाजणारे घुंगुराचे आवाज लायबद्ध ध्वनीने रस्ता मोकळा करून देत होता. थंडीने आता धुक्याची चादर घातली होती. मोरांच्या केका परत साद देत होत्याच. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज गावची वेस आल्याचे साक्ष्य देत होता. गावात सगळीकडे दिवाबत्ती केल्याने धुसर लाल प्रकाश धुक्यात दिसतं होता. घरातील छपरातून धुराचे लोट चुली पेटल्याची खात्री होती. धूर आणि धुके यामुळे हवेत कुंद पणा जाणवत होताच.

जनावर आपापल्या जागी दावणीत गेली. मालकांनी त्यांना दोरखंडनी बांधलं.

पुढ्यात कडवळ ची वैरण टाकून दिली. काहीजण चरवीत पाणी घेउन धारा काढत बसलं. समोर पेंड ठेवली. आणि म्हसराच्या पाठीवर थाप मारून काचळ पाण्यानी धुवून घेतलं. दुधाची कासंडी भरताना चूळ चुळ आवाज घुमत होता. धारा काढून, घरी दूध ठेऊन, उरलेले दूध डेअरीत घालण्यासाठी मोर्चा वळवला. दूध घालून झाल्यावर चौकातल्या वडाच्या पारावर जोतो येऊन बसकण मारत होताच. गावातील अबाल वृद्ध आधीच येऊन बसलेली.

तस वडाचे झाड हे जणू त्यांना आधारवडच होता. वडाच झाड हे कित्येक वर्षांपासून त्यांचा आणि त्यांच्या सुख दुःखाचा सोबती होता. कित्येक गावच्या डोई ह्या वडानी पाहिल्या होत्या.

बरीच मंडळी जमली होती. त्यांच्या शिळोप्याच्या गप्पा टप्पा चालू होत्या. लहान मुले पण इकडून तिकडे हुंदडत होती. वडाच्या परंब्या धरून मूलं त्याला लोम्बकाळत होती.

कष्ट करून कामानी दमलेले हात चिलीम पेटवून आस्वाद घेत होती. चिलीम एका हातातून दुसऱ्या हातात फिरत होती.

कोण चंची सोडून पान तंबाकुची देवाण घेवाण करीत होती. कोण तंबाकूंचा बार भरून अंतराळी बोलत होता. वडाच्या झाडाला ही गम्मत नवी नव्हती. त्यालापण हा विरंगुळा वाटतं होता. त्यांच्या गप्पा तो कित्येक वर्षे ऐकत होताच.

एव्हाना थंडीची लाट वाढली होती. प्रत्येकजण आपल्या मनातील दुःख ओकत होता. हे सार पुराण पुरुष वड ऐकत होता. त्यालाही त्या गोष्टीची सवय झाली होती. वेळ होईल तस प्रत्येकाने आपापली घर जवळ केली. घरात आल्यावर दरवाजे पण बंद केले.

वड एकटाच थंडीत स्तब्ध राहिला होता. धुक्याची शालं त्यांनी पण पांघरली होती. त्यालाही एकटा राहायची सवय झालेली. उन्ह पाऊस, थंडी वारा, धुके, दिवस रात्री आणि चांदणं ह्याची त्यानं कधीच तक्रार केली नव्हती. गावच्या कित्येक पिढ्या त्यांनी बघितल्या पण पुराण पुरुषाने सगळ्यांना आश्रय दिला. आश्रय देण्यात तो धन्यता मानत होता. कित्येक पक्ष्यांची घरटी त्यानं अंगा खांद्यावर खेळवली. साप माकडासारखे प्राणी अंतकरणाने जवळ केले. तो पुराण पुरुष एकमेव सर्व घटनाचा साक्षीदार होता! आहे!!  आणि राहील!!! 

 – समाप्त –

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फुटपाथ फ्रेंडली बाईक” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “फुटपाथ फ्रेंडली बाईक” ☆ श्री सुधीर करंदीकर

सध्या ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच भेडसावत असतो. टू व्हीलर वाले / फोर व्हीलर वाले जॅममधून सुटका करून घेण्याकरता नवनवीन पर्याय शोधत असतात. आणि बरोबरच आहे – म्हणतातच ‘necessity is the mother of invention’. सिग्नल तोडणे, उलटीकडून जाणे, स्पीड लिमिट न पाळणे, लेन तोडणे, या पर्यायांची संध्या चांगलीच चलती आहे. सगळ्यांच्या समोर एकच ध्येय असतं – मी कसा पुढे जाईन? इतरांशी या “मी” ला काहीही देणे घेणे नसते.

मध्यंतरी एक पर्याय पुढे आला आणि तो म्हणजे, फुटपाथवरून टू व्हीलर नेणे. थोडासा जरी ट्रॅफिक अडला, की, लगेच बाईकवाले भराभर बाजूच्या फुटपाथवर गाड्या चढवतात आणि वाटेल तेव्हा पुन्हा रोडवर येतात. फुटपाथवर ‘keep left’ किंवा ‘speed limit’ ही बंधने नसतात, त्यामुळे सगळेच आबादी – आबाद असते.

शहरांमध्ये आता बहुतेक रस्त्यांवर छान फुटपाथ केलेले आहेत. पण त्यावर चालणाऱ्यांपेक्षा, इतर लोकांचेच राज्य असते. त्यामुळे चालणारे फुटपाथवरून मार्ग शोधत शोधत पुढे जात असतात. चालणाऱ्यांना रस्ता क्रॉस करणे अशक्य झाले आहे, रस्त्यावर चालणे अशक्य आहेच, आणि फुटपाथवर पण चालायला जागा नाही, म्हणून म्हणतात, रस्त्यावरचा सगळ्यात बिचारा प्राणी म्हणजे चालणारी मंडळी.

आणि आता बाईकवाले फुटपाथवर आल्यामुळे, पायी चालणाऱ्यांची बिचारेपणाची लेव्हल अजूनच खालावली आहे. बिचारी मंडळी नेहेमीच वर बघतात आणि देवाकडे मदतीची अपेक्षा करतात. आणि झालं असचं – चालणाऱ्यांची याचना वर पोहोचली – देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान, अब फुटपाथ पर चलना भी नसीब नही! देवाला अडचण समजली आणि सगळ्या फुटपाथवर दोन्ही बाजूला, अधे – मधे, स्टीलचे चकचकीत खांब बसले. चालणारे खुश झाले. खांबामधून गाडी घालता येत नाही, म्हणून टू व्हीलर वाले नाराज झाले आणि पुन्हा रस्त्यावर आले.

कॉम्प्युटर वर व्हायरस – अँटी व्हायरस जसे सुरूच असते, तसेच देवाकडे ऋषी- मुनी पण साकडे घालत असतात आणि दानव पण. आता टू व्हीलर वाल्यांनी वर बघून याचना केली – ‘देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान, अब फुटपाथपर बाईक चलाना भी नसीब नही’. वरच्याला सगळ्यांचीच काळजी असते, कारण सगळी त्याचीच लेकरे. देवांनी तथास्तु म्हटले आणि टू व्हीलरकरता पर्याय पुढे आला —

आम्ही मेन रोडनी मार्केट कडे चालत निघालो होतो. फुटपाथ वर खांबांमुळे टू व्हीलरची वर्दळ नव्हती, त्यामुळे बिन्धास चालत होतो. पुढच्या चौकात, डावीकडच्या रस्त्यावर बरीच गर्दी दिसली. काय आहे? हे, बघायला म्हणून आम्ही डावीकडे वळलो. थोडं पुढे छोटं ग्राउंड आहे. तिथे एका परदेशी कंपनीने तयार केलेल्या फूटपाथ – फ्रेंडली बाईकचा डेमो दाखवणार होते. नावावरून काहीच अर्थ बोध होत नव्हता. बघितल्याशिवाय उत्सुकता संपणार नव्हती. मी आणि काही पर्याय नसल्यामुळे बायको, गर्दीतून वाट काढत पुढे गेलो. कुणिही प्रेमात पडेल, अशी एक नवी कोरी दणकट बाईक समोरच दिमाखात उभी होती.

तिथले मार्केटिंग मॅनेजर (महेश) जाहिरातपर भाषण करत होते. टू व्हीलरवाल्यांकरता खुशखबर – खुशखबर. फुटपाथवर बाईक चालवा. एका भाग्यवान व्यक्तीला पहिली फ्री ट्रायल मिळणार! नंतर काही जणांना मिळणार, पेड ट्रायल. कोण आहे तो भाग्यवान? हीच वाक्ये पुन्हा पुन्हा ऐकवणे सुरु होते. प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर, ‘मीच तो भाग्यवान’ असे भाव दिसत होते. बायको म्हणाली, तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्हाला ती गाडी पेलवणार नाही. ‘कौन है वो भाग्यशाली’, ‘कौन है वो भाग्यशाली’, अशा गर्जना सुरु होत्या. मी गाडीकडे बघितलं आणि माझ्याकडे बघितलं. गाडीचे वजन माझ्या वजनाच्या तिप्पट तरी नक्कीच असणार. नेहेमी म्हणजे इतरवेळेला, मी कितीही भाग्यशाली असलो, तरी, आज, ‘तो मी नव्हेच’ हे पक्के होते.

“वो कौन है”… “वो कौन है”…., किसको ट्रायल दी जाय, असं म्हणत म्हणत, महेश चौफेर नजर टाकत होते. माझ्यावर त्याची नजर स्थिर झाली, आणि, “यही तो है वो” अशी जाणीव महेशला आतून झाली असावी. लगेचच त्यांनी हात माझ्याकडे करून, “सर, आप आगे आईये” अशी घोषणा केली. महेश नक्की कुणाला सर म्हणतोय हे समजण्याकरता मी आजूबाजूला बघायला लागलो. बाजूचा मुलगा म्हणाला, “काका यु आर लकी”, तुम्हालाच बोलावलं आहे. हे काम आपलं नव्हे, हे मला चांगलं समजतं होतं, पण आलेली संधी वाया का घालवायची! हा पण विचार मनात आला. द्विधा मनस्थिती असली, की, मी नेहेमी अंतर मनाचा सल्ला घेतो.

मी (मनात डोकावून) : काय करू?

आतून : जा बिन्धास, मी आहे.

मी : ती बाईक पेलणं मुश्किल आहे.

आतून : भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आज तर तुझ्या मागे बसणार आहे.

माझं आतल्या मनाशी बोलणं बायकोच्या लक्षात आलं असावं. तिनी मला बेस्ट लक दिलं आणि मी लगीच पुढे गेलो. महेशनी टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं. सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवल्या.

ग्राउंडमध्ये फुटपाथसारखा लांबपर्यंत भाग आखून तयार केला होता. त्यावर, फुटपाथवर लावले आहेत, तसे स्टीलचे खांब लावलेले होते. महेशनी त्या फुटपाथवर बाईक आणली. मला डेमो समजावून सांगितला आणि बाईकवर बसायला सांगितले. गाडी स्टॅन्ड वरुन काढून, पलीकडे पाय टाकतांना, माझा थोडा तोल गेल्यासारखे जाणवले, पण तेवढ्यापुरतेच, कारण लगेच जाणवलं, की, मागे कुणीतरी बसले आहे. मागे आहे, याची खात्री करायला, मी दोन्ही पाय थोडे वर उचलले, पण गाडी स्थिर होती. मी बिन्धास झालो.

मी बाईक सुरु केली आणि २०-२५ फुटावर असलेल्या स्टीलच्या खांबांपर्यंत नेली आणि थांबवली. तिथे महेशचा सहकारी उभा होता. सीटच्या खाली असलेलं एक बटन त्यांनी दाबलं. बटन दाबताच हँडलचे दोन्ही भाग आतल्या बाजूला फोल्ड झाले. मी हळूहळू बाईक खांबातून थोडी पुढे नेली, आणि सीट खालचे बटन दाबले. हॅण्डल पुन्हा अनफोल्ड झाले. गाडी सुरु करून मी पुढे निघालो. एन्ड पॉइंटला पोहोचलो आणि गाडी मागे वळवली. खांबांपर्यंत आलो, गाडी थांबवली, बटन दाबून हॅण्डल फोल्ड केले, गाडी पुढे घेऊन हॅन्डल अनफोल्ड करून गाडी पुढे सुरु केली आणि महेशपर्यंत पोहोचलो. सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवून गाडीचं आणि माझं कौतुक केलं. मी खाली वाकून टाळ्या आणि कौतुक माझ्या मागे बसलेल्या मनातल्या व्यक्तीकडे पास केल्या.

महेशच्या टीममधल्या एका सुंदरीनी मला मोठा बुके दिला आणि बाईकवर माझ्या मागे बसून सेल्फी काढला. महेशनी मला एक गिफ्ट बॉक्स दिला. मी सगळ्या टीमचे आभार मानले.

महेश : सर, ही गाडी लवकरच मार्केटला येईल. तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल या फॉर्ममध्ये भरून द्या. तुम्हाला स्पेशल डिस्काउंट दिल्या जाईल. तुम्ही स्वतः गाडी घ्या किंवा ऑफर कुणाला पास करा.

मी फॉर्म भरून दिला, मला बुके देणाऱ्या मॅडमला थँक्स म्हणालो. आणि महेशला आणि सगळ्या उपस्थितांना हात घालून बाय-बाय केले, आणि आम्ही निघालो.

परत जात असताना डोक्यामध्ये सहज विचार आला – अशा सुधारणांमुळे टू व्हीलरवाल्यांची जरी सोय होणार असेल, तरी अशा पळवाटा कुणाच्याही अंतर-मनाला नक्कीच पटणार नाहीत. स्वतःच्या सोयीकरता नियमातून पळवाट कशी काढता येईल, हीच आपण काळाची गरज तयार केली आहे आणि आम जनतेच्या काय गरजा आहेत, हे लक्षात घेऊनच शोध लावणारे त्यावर काम करत असतात. आणि म्हणूनच फुटपाथ फ्रेंडली बाईक तयार होतात. पळवाटांमुळे माझा थोडा वेळ वाचतही असेल, पण अपघात वाढतात हे नक्की. या अपघातात, आज कदाचित मी नसेन, पण उद्याच्या अपघाताचे काय? परवाचे काय? तेव्हाच्या अपघातात आपण असू शकतो, आपली बायको / मुले / आईवडील / जिवलग असू शकतात, हा विचार जर मनात रुजला, तर सगळेच चित्र बदलू शकते. जर प्रत्येकानेच ठरवले, की, मी वाहतुकीचे सर्व नियम पाळणार, तर बदल्यात मिळणार काय आहे? मिळणार आहे, अपघात शून्य वाहतूक.

आणि त्याकरता आपण प्रत्येकानी म्हणजे प्र – त्ये – का – नी काय करायचे आहे, तर अगदी सोपे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत. काय आहेत ते नियम? तर, सिग्नल पाळणे / नो एंट्रीत न जाणे / स्पीड लिमिट पाळणे / आणि अर्थात फुटपाथवर गाडी न घालणे.

या सगळ्यामुळे आपला जाण्याचा वेळ थोडा वाढेल, थोडे लवकर निघावे लागेल. हा बदल स्वीकारून जर आपण वर बघून जर प्रार्थना केली : देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान – ट्रॅफिक के सभी नियम फॉलो तो कर रहे है, लेकिन ट्रॅव्हल का टाईम बहुत बढ गया है.

आपली प्रार्थना ऐकून देव नक्कीच तथास्तु म्हणेल. आणि योग्य असा छान पर्याय बाहेर येईल. आपल्या सगळ्यांच्या या अशा मानसिक बदलाकरता सगळ्यांना शुभेच्छा आणि..

फुटपाथ फ्रेंडली बाईकला – बाय बाय.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-२ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-२ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

आता मी थोडं आजच्या विषयाकडे वळते. नव्या नवीन काळाची काय आवाहन आहेत? मगाशी म्हटलं तसं की प्रश्नांमध्ये सतत काही ना काही तरी बदल होत असतो कारण समाजही सतत बदलत असतो. तर सध्या एकूणच नव्या बदलत्या या प्रवाहाबद्दलच्या व्यसनाधीनतेच्या प्रश्नाच्या बाबतीत मला थोडं तुम्हाला आता सांगायचंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसनाधीनतेचा जो वयोगट आहे तो आता थोडा कमी व्हायला लागलाय. लहान वयातच आता मुलांना व्यसन लागायला लागले आहे. पूर्वी साधारण प्रौढ लोक म्हणजे 25-30 च्या पुढचे असे रुग्ण आमच्याकडे यायचे. त्यांचीच संख्या जास्ती असायची. पण अलीकडे आम्ही बघतो आहोत की, 14-15 वर्षापासूनच्या सुद्धा मुलांमध्ये हा प्रॉब्लेम वाढायला लागलाय. त्यात सर्व प्रकारची व्यसनं आहेत. ड्रग्स आहे, दारू पण आहे आणि ज्याला आपण वर्तनात्मक व्यसन म्हणतो तेसुद्धा या वयोगटांमध्ये वाढायला लागले आहे. म्हणजे फोन, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स वगैरे, या गोष्टींमध्ये.

बरोबर एक वर्षांपूर्वी मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये एक पुण्यामध्ये घडलेली घटना सगळ्यांनी नक्की पेपरमध्ये वाचली असेल… पोर्षे कारचं जे प्रकरण झालं त्यात एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन जोरात गाडी चालवली आणि एक्सीडेंट झाला. त्यात दोनजणांचा मृत्यू पण झाला. अगदी परवाच त्याला या घटनेला एक वर्ष झालं. नंतर त्या मुलाशी बोलणं करण्याची आमच्यावर ती जबाबदारी आली. त्या घटनेबद्दल थोड्या लोकांना थोडासा धक्का बसल्यासारखं झालं. एवढ्या लहान वयात सुद्धा मुलांमध्ये व्यसनाधीनता कशी वाढते? आमच्याकडे खूप अशा घटना आम्ही बघतोय. लोकांच्या मनात असा प्रश्न नेहमी येतो की, असं काय होतंय की लहान वयामध्ये मुलं व्यसनाकडे वळताहेत? याचे कारण असं सांगता येईल की, *कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं याला आता एक समाजामध्ये प्रतिष्ठा यायला लागलेली आहे. * 

माझे बाबा एका खूप छोट्या गावात गावातले. त्यांच्या गावांमध्ये एकच असा माणूस होता की जो बाबा लहान असताना दारू प्यायचा आणि त्याला एकदम असं तोंड लपवून गावात फिरायला लागायचं. कारण त्याला खूप लाज वाटायची की तो दारू पितो. आता मात्र उलट झाले आहे. हल्ली लहान गावांमध्ये सुद्धा बार असतात. पार्ट्या करणं याला एक प्रकारची खूप प्रतिष्ठा आलेली आहे. पूर्वी कोणी नवीन घर बांधलं तर ‘आम्ही कसं देवघर केलं’ हे लोकांना अभिमानाने दाखवलं जायचं. आता ‘आम्ही हॉलमध्ये कसा बार केलाय’ हे दाखवलं जातं. दुसरं म्हणजे हिंदी पिक्चरचा खूप प्रभाव असतो. हे जे टीनेजर असतात त्यांच्या दृष्टीने असे काही आदर्श असतात ते जास्ती करून फिल्मस्टार वगैरे. ते जे करतात त्यांचा अनुकरण करायची प्रवृत्ती या मुलांमध्ये खूप दिसते. एक असाच मुलगा आमच्याकडे आला होता. त्याला लहान वयातच व्यसन लागलं आणि त्याने असं आम्हाला सांगितलं की, ‘शाहरुख खान हा माझा आदर्श आहे. त्याची फॅशन, बोलण्याची स्टाईल, या सगळ्याचे तो अनुकरण करत होता. त्याने असं बघितलं होतं की पिक्चरमध्ये तो कसा पितो, त्याने वाचलं होतं की शाहरुख खान चेन स्मोकर आहे आणि मग तो त्याचं तस्संच अनुकरण करायला लागलेला होता. तर हा एक खूप प्रभाव दिसतो हल्ली मुलांवर. तुम्ही अलीकडचे कुठलेही पिक्चर बघा त्याच्यामध्ये हिरोच नाहीतर हिरोईनसुद्धा त्यांना जर का काही प्रॉब्लेम वगैरे आला तर त्या दारू पिताना दाखवतात. पूर्वी फक्त हिरोलाचं दारू पिताना दाखवायचे, पण अलीकडच्या काळात हिरोईनना सुद्धा काही प्रॉब्लेम आला तरी दारू पिताना दाखवतात. इव्हन त्यांना काही एन्जॉय करायचंय तर पार्टीत दारू पिताना दाखवतात. हे सगळं बघून मुलांना संदेश काय मिळतो की, तुम्हाला दुःख झालंय, टेन्शन आलंय ना तर तुम्ही दारू प्या, म्हणजे तुमचं टेन्शन जाईल किंवा तुम्हाला सेलिब्रेट करायचंय ना, तुम्हाला एन्जॉय करायचाय ना, तर तुम्ही दारू प्या. हे दोन अतिशय चुकीचे संदेश मुलांपर्यंत अशा गोष्टीतनं मिळत असतात. ते लहानपणापासूनच मुलं बघत असतात.

… तर हे खूप मोठं सामाजिक कारण आहे की लहान वयात आता एकूणच व्यसनाधीनतेचे प्रमाण का वाढतय त्याचं. याला समाजिक प्रतिष्ठा मिळाल्यामुळे त्याला एक प्रकारचं ग्लॅमर यायला लागलेलं आहे. मुलं हे जसं पिक्चर्स मध्ये बघतायेत तसं घरीसुद्धा बघतात. याबाबतीतलं एक मी तुम्हाला उदाहरण सांगते आमच्याकडच्याच एका मुलाचं. एकदा असं झालं की एक वडील त्यांच्या तेरा वर्षाच्या मुलाला घेऊन आमच्याकडे आले होते. मुलगा आणि ते बरोबरच बसले होते. ते सांगायला लागले की, “माझा मुलगा तेरा वर्षाचा आहे आणि तो सिगरेट ओढायला लागलाय. मला त्याच्या तोंडात सिगरेटचा वास आला म्हणून मी त्याला तुमच्याकडे घेऊन आलो आहे. ” 

मी मुलाला म्हटलं की, “तू थोडं बाहेर बस. मी आधी तुझ्या वडिलांशी बोलते. ” तो बाहेर गेल्यानंतर मी वडिलांना पहिलाच प्रश्न विचारला, “तुम्ही सिगरेट ओढता का? ” तर वडील म्हणाले, “हो, मी ओढतो. ” मुलगा ते लहानपणापासून बघतच होता की, वडील पण सिगरेट ओढतात. म्हणून मी त्यांना म्हटलं की, “तुम्ही आधी सिगरेट सोडा. म्हणजे मुलगाही सिगरेट पिणार नाही. ” तर त्यांचं यावर म्हणणं होतं की, ‘एवढ्या लहान वयात त्याने सिगरेट पिऊ नये. मी मोठा झाल्यावर सिगरेट प्यायला लागलो. ” आता बोला!!! 

आपण जे सांगतो ना ते मुलं ऐकत असतात. आपण जसे वागतो तसे मुलं वागण्याचा प्रयत्न करत असतात. पण आजकाल ना या सगळ्या मुलांच्या कामांमध्ये मला एक गोष्ट मुलांच्या बाबतीत खूप दिसून येते की, मुलांमध्ये ना एक वेगळीच दैवी देणगी असते. आपण जसे डोळे बंद करतो ना तसे मुलांना कानपण बंद करता येतात! आपण पालक त्यांना लेक्चर द्यायला लागतो तेव्हा त्यांचे कान एकदम बंद होतात. त्यांचं लक्षच नसतं, आपण काय सांगतोय याच्याकडे. पालक म्हणून खूप काही गोष्टी त्यांना सांगतात, लेक्चर देतात, पण मुलांचं लक्ष आपण काय सांगतोय त्याच्याकडे अजिबातच नसतं. आपल्या वागण्याकडे मात्र मुलांचं लक्ष असतं. त्यामुळे पेरेंटिंगच्या बाबतीत मी पालकांना एक वाक्य नेहमी सांगते… माझं ते अतिशय आवडतं वाक्य आहे. *पालक म्हणून आपल्याला जे वाटतं की आपल्या मुलांनी करावं ते आधी आपण करायला पाहिजे तरच ती मुलं करतील. आपल्याला वाटतं ना मुलांनी रोज व्यायाम करावा, मग आपण आधी करायचा. आपल्याला वाटतं की, मुलांनी कुठलंच व्यसन करू नये, मग आपणही करू नये. मगच मुलं आपलं अनुकरण करतील.* 

आत्ताही जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की स्वतः वडील सिगरेट ओढत होते आणि त्यांच्या मुलाला ते घेऊन आले होते. मग अर्थातच आम्हाला बरीच सेशन्स वडील आणि मुलाची घ्यायला लागली. असंसुद्धा कित्येक वेळा होतं की मुलं सांगतात, ‘लहानपणापासून मी बघतोय की माझे वडील रोज संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आल्यावर दारू पितात. मी लहान असताना एकदा विचारलं की, ‘बाबा तुम्ही हे रोज काय पिता? ‘ तर बाबा म्हणाले की, ‘मी ना औषध पितोय. मला ऑफिसच्या कामाचा खूप स्ट्रेस असतो, टेन्शन असतं आणि म्हणून हे माझं औषध आहे. ते घेतलं की मी रिलॅक्स होतो. ‘ मुलाने हे लक्षात ठेवलं की टेन्शन आलं की त्यातून मुक्त व्हायला हे चांगलं औषध आहे. मुलगा बारावीत गेला. त्याला पण अभ्यासाचं, करिअरचं, पुढं काय करायचं याचं, एक्झामचं अशी अनेक टेन्शन्स सुरू झाली. मग काय! वडिलांचा घरात बार होताच. त्याच्यातनं त्याने दारू प्यायला सुरुवात केली. पौगंडावस्थेतल्या मुलांना व्यसनं खूप पटकन लागतात. हा मुलगा अल्कोहोलिक झाला आणि एवढंच नाही तर पुढे त्याला कॉलेजमध्ये इतरही व्यसनं लागली. यावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, पालक मुलांना काय सांगतात हे खूप खूप महत्त्वाचे आहे. चुकीचे संदेश दिले तर त्याचा मुलांवरती दुष्परिणाम होऊ शकतो. हे खूप मोठं आव्हान आहे. आताशा लहान वयामध्ये मुलांना व्यसन का लागायला लागले आहे त्यामागे पालकांचं वागणं हे एक कारण आहे. लहान वयात जेव्हा व्यसन लागतं तेव्हा त्यांचं करिअर, त्यांचं आरोग्य… शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या आरोग्यावर खूप दुष्परिणाम होतात.

या वयातल्या मुलांमध्ये आता गांजाचे पण व्यसन खूप वाढते आहे. गांजाच्या बाबतीत मुलांच्या मनात खूप गैरसमज असतात. कुठे कुठे वाचलेलं असतं सगळ्यांनी. त्यांच्याशी आम्ही काहीही बोलायला लागलो की, आमच्यापेक्षा भरपूर जास्त माहिती त्यांनी गुगलवरती वगैरे गोळा केलेली असते. त्यामुळे आम्हाला सतत आमचं ज्ञान अपडेट करत राहायला लागतं. कारण त्यांच्यासमोर आम्हाला असं निरुत्तर होऊन वगैरे चालत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की, मुलांनी गांजाच्या बाबतीमध्ये माहिती गोळा केलेली असते… अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये किंवा युरोपमधल्या काही देशांमध्ये गांजा लीगल आहे, तिथे त्याला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे मग काय होतं ते घेतलं तर? तेव्हा आम्हाला त्यांना समजावून सांगावं लागतं की, आपल्या देशात हे कायदेशीर नाही… गांजा बेकायदेशीर आहे. त्यांची जी काही वेगळी कारणं आहेत ती त्यांना समजावून सांगायला लागतात. आपल्या देशाला ते परवडणार नाही त्याला कायदेशीर मान्यता देणं. दुसरं एक मुलांनी वाचलेलं असतं की, गांजा सेवन हे कधीतरी आपण करू शकतो. जसं सोशल ड्रिंकिंग म्हणतात ना, कधीतरी पार्टीत पिता येते दारू वगैरे तसं गांजापण कधीतरी घेता येतो. त्याचं व्यसन लागत नाही. यावर कुठेतरी त्यांनी रिसर्च वाचलेला असतो की गांजात औषधी गुणधर्म आहेत म्हणून. मग आम्हाला त्यांना दुसरे रिसर्च दाखवायला लागतात की, नाही त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत तर हेही सांगायला लागतं की, प्रत्येक औषधी गोष्ट स्वतः घ्यायलाच पाहिजे असं नाही. त्यातले काही घटक काढून औषधांमध्ये वापरले जातात. पण एकूणच गांजाचा व्यसन आता मुलांमध्ये वाढताना दिसतंय. त्याचे खूप दुष्परिणाम आहेत. शारीरिक तर आहेत, पण गांजाच्या बाबतीत आम्ही बघतो की, मेंदूवरती त्याचा खूप परिणाम होतो. अतिशय जास्ती चिडचिड वाढते, त्याच्यामुळे मेमरी लॉस होतो, असे अनेक दुष्परिणाम गांजाच्या व्यसनामुळे होत असतात. हा एक ज्वलंत प्रश्न आता बनत चाललेला आहे.

– क्रमशः भाग दुसरा

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पहाट – भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ निसर्ग पहाट – भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

नीरव शांतता! होय, पहाटेची नीरव शांतता! ज्यात रव नाही, आवाज नाही, सगळे कसे स्तब्ध. आकाशात धूसर चंद्रबिंब, अंधुक चांदणे, हवेत बोचरी थंडी. गर्द सर्द धुके. शुभ्र दुलई लपेटून घेतलेली अवनी. रात किड्यांची किरकिर. अधून मधून, दवबिंदूंचा सडा चोहीकडे पसरलेला. हिरवीगार गवत पाती, त्यावर दवबिंदू चिकटलेले.

चंद्रकिरणात मोत्यांचे दाणे होऊन चमकतं होते. ते जसं काही आपल्या तोऱ्यात ऐटीत मिरवत होते. अगदी अमूल्य दागिन्यांच्या कोंदणात बसलेला वाटतं होता.

अजुनी रातकिड्याचे साम्राज्य होतच. सोबत रात पक्ष्यांची फडफड चालूच होती. थंडगार वाऱ्याची झुळूक, अंगावर काटा आणणारी होती. ओढ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज, एखाद्या सौभाग्यवतीच्या चूड्यागत किणकिणत होता. झाडावर, वेलीवर चमकणारे काजवे. कुठे कुठे फुलू पाहणाऱ्या कुंद कळ्या उमलत होत्या. पश्चिमेला लककणारा शुभ्र शुक्रतारा, त्याचं लोभस व्यक्तिमत्व, हिऱ्याच्या खड्यागत पाजळणारे शुभ्र दुधाळ रेषा! टप्पोऱ्या मोगऱ्या सारखा शुक्रतारा, समवेत गगनातील असंख्य तारका,

चमचमणाऱ्या चंद्रकळा साडीगत आकाशाच रुपड सजलेलं होत. नखशिकांत शांत श्रान्त अवनीचे रूप, मुके पण बोलके होते.

गर्द झाडी पलीकडे डोंगर रांगा. आकाशात दिसणारी नक्षत्रे जणू स्वर्गच पृथेवर अवंतरला आहे की काय, असं वाटणारे विहंगम दृश्य, जें डोळ्यातपण सामावत नव्हते.

उगवतीचे साक्ष देणारे, काही बदलणारे, आकाशी, किंचित जांभळा, केशरी, किंचित तांबूस छटानी उघडत असताना, किरमिजी रंग मध्येच पारवा रंगानी उजळीत होता. तर पाण्यात बर्फ वितळल्यासारखा शुक्रतारा अस्पष्ट होत लुप्त पावत होता. मध्येच पक्ष्यांचा थोडा आवाज, हालचाल. चिमण्यांचा चिवचिवाट, इतर पक्ष्यांची वर्दळ वाढत होतीच.

कडेला प्राजक्ताचा सडा लक्ष वेधून घेत होता. त्याचा चोहीकडे सुगंध पसरला होता. बाजुलाच शुभ्र तगर उमलू पहात होती. त्याच्या अर्धोन्मिलीत पाकळ्यांवर फुलंपाखरांचे गुंजारावं चालू होते. जास्वंद लाल भडक रंगात उमलला होता. मध्येच वटवाघूळ आपले अस्तित्व दाखवत आडवी तिडवी गवसणी घालत बाजूच्या झाडावर लुप्त होत होता. रानफूलं टवटवीत बहरली होतीच. वेलीवर विविध रंगाची फुलं चित्त वेधून घेत होती.

ओढ्याच्या कडेला मोरांच्या केका साद घालत होत्या. त्याचे ऐटीत मान वर करून चालायचे पदललित्यपूर्ण होत.

निळसर मान, डोके, डोक्यावर तुरा, मोरपीसांचा रंग तर अप्रतिम! कोणत्याही कारखान्यात तयार नं होणारा रंग!!  मध्येच भारद्वज पक्षी हा विचारमग्न वाटतं होता. त्याची शोधक नजर काहीतरी शोधत होती. उगवतीला झुंजू मुंजू झालं असेल नसेल, तसे चिमण्यांचा चिवचिवाट जास्त वाढला होता. शुभ्र बगळे एका रांगेत मिरवणूक काढीत, शिस्तीत एकाच वेगात मार्गक्रमण करीत होते.

तांबड फुटलं तसं घराचे आळसावलेले दरवाजे उघडू लागले. घराघरात दिवे लागले आणि छपरातून धूर बाहेर पडू लागला. काही ललना सडा समार्जन साठी बाहेर आल्या. पलीकडे मंदिरातून घंटेचा किणकिणाट ऐकू येऊ लागला. छपरातून येणारा धूर आणि दाट धुके एकत्र मिसळून हवा कुंद करीत होत्या.

नमाजाची बांग आणि कोंबड्याची बांग एकत्र ऐकू येत होती. त्यातच परव्याची घुटर घूम, चिमण्याचा चिवचिवाट, घंटानाद ह्याचा सरगम. पृथेला जाग आल्याची नांदी होती. त्यात शुभ्र धुक्याची चादर आणि बोचरी थंडी जाणवत होतीच.

सोनेरी किरणांची वरात, सहस्त्रकर रश्मीनें बाहेर पडत होती. काही कवडसे धारण करीत, अवनीला अलिंगन देत. तिच्या मस्तकाचे चुंबन घेत. लालिमा पसरली होती. त्यातच गाई, म्हशीचे हंबरणे, त्यांच्या गळ्यातील घुंगरूचे आवाज येत होते.

पांणंदीकडे जाणारी वाट, त्या वाटेवर वर्दळ वाढली होती. काही धुसर आकृत्या, शेतीकडे जाणारे काही शेतकरी पण त्यात दिसतं होते. धुक्यात भिजलेल्या पाऊल वाटा, बैल गाडीचे चाकूर पडलेली वाट. परत तोच तो भारद्वाज परत पांणंदीच्या कडेला तांबडे डोळे लाल् सर पंख घेउन उभा होता. कदाचित शुभ दर्शन देण्यासाठी अवतरला होता. पांदीच्या दोहो बाजूनी शेंड एकमेकांना गच्च मिठीत घेउन बसलेली. गुंतलेली. ते कमी म्हणून काय, त्यातच अनेक लता वेलींनीआपला संसार उभा केलेला होता शेंडच्या आधाराने. त्या वेलीवर पांढरी आणि लाल चुटुकदार पाने पाहुन डोळ्यास समाधान देत होते.

शिवाय अनेक रंगीं बेरंगी फुलं पाखराची गर्दी झालेली. रंग लुब्ध पाखरे रुंजी घालण्यात गुंग होती. त्यांना मधुरसाची चटक जाणवत होतीच. मध्येच कुठं तरी फडया निवडुंग आपल्या ताठ मानेने काट्यासह अस्तित्व दाखवत होता. बाभळीची झाडे त्यात भरीस भर म्हणून शोभून दिसतं होती. आपला कणखर मजबूत बांधा त्यांना प्रिय असावा. पिवळ्या जर्द फुलांची आरास आणि लोंबणाऱ्या लांब शेंगा असंख्य काटेरी जाळ विणलेला हा प्राणी अगदी तटस्थपणे दिमाखात उभा होता, अगदी पुराण पुरुषा सारखा! त्याच्या अंगावर असलेल्या अनेक गाठी मुळे प्रांजळं वाटतं होता. त्याच्या गाठीतून झिरपणारा चिकट स्त्राव, त्यावर फिरणाऱ्या शिस्तबद्ध काळ्या मुंग्या!

तशी ही पायावाट तुडवून तुडवून मळवाट झालेली. धुरळा आणि दहिवर ह्यांनी चिकट झालेली होती.

मध्येच आम्र वृक्षावर कुहू कुहू अशी साद येत होती. आंब्याला आलेला मोहर त्यातून निघणारा सुगंध जाणवत होता. लहान लहान कैऱ्या लांब देठावर बसून हेलकावे घेत होत्या. नजर पण खेचून घेत होत्या. सोबत राघू मैनेची जोडी त्यांच्याच दिमाखात! हिरव्या कैऱ्यावर चोच मारत मिठू मिठूची भाषा आळवीत होता. लाल लांब बाकदार चोच पोपटी अंगरखा घातलेली जोडी सालसपणे आपल काम चोखपणे करत होती.

जवळच्या विहिरीवर येणारा मोटेचा आवाज, पाटात पडणारे पाणी सळसळत जातं होत. बैलाच्या घुंगरांचा आवाज आणि मोटकऱ्याची गाणी शांतता भग्न करीत होती.

विहिरीच्या कडेला भिंतीतून फुटलेला पिंपळ विहिरीवर छत्र धरण्यासाठी अवतरला असावा. त्याच्या फांद्यावर लोंबकळणारी असंख्य सुगरणीची घरटी, अधोमुखी होती. घरट्यात असणारे चिमुकले जीव खाली वर करत आपल्या आईची वाट बघत होते. काहीतरी खायला मिळेल अशा आशेने धडपड करीत होते.

पाटातील पाण्यात बगळे चोच मारून खाद्य आराधना करण्यात त्यांचा थवा मशगुल. अवचित मोरांची फडफड आणि केका घुमत होत्या.

सकाळ होऊन एक कासरा भर सुरव्या वर आलेला.

तसं थंडीच्या हवेत ऊबदारपणा जाणवू लागला. पांदीच्या वाटेवरील वर्दळ वाढू लागली. मळ्यात चाललेली काम झोपडीतून येणारा धूर त्याची साक्ष देत होता.

वाड्या वस्तीवर जाग आली. तशी गावात अन गावकुसा बाहेर वर्दळ वाढली. एव्हाना सुरव्या देवाने धरतीवर लाल मळवट भरला होता. धुक्याची चादर कमी होऊन, हवेत ऊबदारपणा जाणवत होताच. लोक उन्हात येऊन बसू लागले. थंडीत उब हवी होती. पांणंदी कडे वर्दळ वाढत होती. थंडी आणि धुक्याने मातीत ओलावा धरला होता. धुके ओसरले होते. पाणंदीत बैलगाडी, जनावरे ओढ्या कडे चरायला जातं होती. मध्येच शेळ्या, मेंढरं आणि सोबत कुत्रा असं तांडा धनगर हाकीत होता. मेंढया मध्येच तांडा सोडून हिरव्या चार्यावर लुब्ध होत होत्या. त्यांना परत हाकून धनगर वाट तुडवत होता. त्याच्या हातात लांब काठी, आणि खांद्यावर घोंगड त्यावर पुढ माग अडकवलेली शिदोरी होती.

वरच्या अंगाला शेतमळा फुलला होता. गव्हाच रान हिरवगार होत. त्याला लागून मका, कणसं टरारून फुगली होती. कोबीचे गड्डे वर येऊ बघत होते.

 त्याला लागून पिवळा धमक झेंडू उठून दिसतं होता. एकूण नजारा मन पवित्र करीत होता. बाजूला अखंड वाहणारा गोड्या पाण्याचा ओढा वहात होता. त्याच पाणी झुळझूळ वाहत होतच. पाण्यात काही पक्षी विहार करत, आपले खाद्य शोधत होते. ओढ्याच्या दोन्ही बाजूला गच्च हिरवी गार झाडी, त्यात ह्यो लपलेला ओढा. दाट हिरव्या गार झाडीत पक्ष्यांची अनेक घरटी नांदत होतीच.

मनमोहक मोर लांडोर सुखनैव बांगडतं होते. अवचित उतरणारे त्यांचा समूह लक्ष वेधत होता. खंड्या ओढ्या कडेला बसून एखादी मासोळी अबदार चोचित पकडून खाद्य संस्कृती जोपसत होता. अधून मधून लाव्हा व तित्तर उडत जातं होते अन गप्प होत होते.

ओढ्याच्या दोन्हीही कडेला असणारी हिरवीगार शेती. त्यातील घरे सुद्धा टूमदार वाटतं होती. मका, गहू, हळद, मिरची, आणि ऊस त्यात सर्व प्रकारच्या भाज्या व काही ठिकाणी फुलांचे ताटवे इत्यादीनी डोळ्यात स्वर्गीय सुख आनंद भोगणारा बळीराजा, त्यात त्यांना मिळालेले निसर्गाचे वरदान.

अधून मधून कुठतरी झाडाखाली चालेलल मोराचे नृत्य. हे निसर्ग वैभव सुख त्यांना कायमच मिळत होत. एवढंच नव्हे तर सर्प आणि सर्पिण ह्यांचं गळ्यात गळा घातलेलं शृंगार नृत्य पण त्यांच्या नशिबी होत. विविध पक्ष्यांचे आवाज ओढ्यातील पाण्याचा आवाज यांची जुगुलबंद ध्वनी नेहमीचीच. त्यात त्यांना अप्रूप असं काही वाटतं नव्हतं! दोन्हीही बाजूला ओढ्यात धुनी भांडी घासली जातं होती. तेथील बायकांचा राबता पण नेहमीचा. मध्येच कोणी बाल चमू येऊन पाण्यात मनसोक्तपणे जल क्रीडा करीत होता.

त्यांचं बालपण असं जपलं जातं होत. घरातील झाडून सारी जनावरे येथेच येऊन पाणी पीत होती. चरत होती. दुभतं देत होती. दही दुधाचा महापूर ओसंडून वाहत होता. मूळबाल खाऊन राबून धष्ट पुष्ट होत होती.

ओढ्याचा उतरणीला शेळ्या मेंढया यांचा मुक्त संचार. मुबलक खाद्य मीळत होत. 

चुकून एखाद सलिंद्र बाहेर पडत होत. काहीवेळा नागराजच दर्शन मिळत असे. पण कोणत्याही प्राणी मात्राचं भय नव्हतं.

जिओ और जीने दो ‘ चं साम्राज्य मुक्तपणे नांदत होत. येथे ना त्यांना भय ना माणसाला!

क्रमशः… 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ना खाऊंगा ना खाने दूंगा! ☆ डॉ. स्वाती बापट ☆

डॉ. स्वाती बापट

अल्प परिचय 

डॉ. स्वाती बापट

एमबीबीएस, एमडी (बालरोग)

  • मूळ गाव सोलापूर येथेच प्राथमिक, माध्यमिक व वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण.
  • पतीच्या सैनिकी सेवेनिमित्त भारतात ठिकठिकाणी तात्पुरते वास्तव्य.
  • गेल्या तीस वर्षांपासून आजतागायत पुण्यात बालरोगतज्ज्ञ म्हणून व्यवसाय.
  • एकंदर जीवनातील, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांवर आधारलेले विपुल स्फुटलेखन स्वतःच्या ५ ब्लॉग्सवर प्रकाशित.

??

☆ ना खाऊंगा ना खाने दूंगा! ☆ डॉ. स्वाती बापट

आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, श्री. नरेंद्र मोदीजींनी काही काळापूर्वी ही घोषणा केली आणि त्याचे देशभरामध्ये बरेच पडसाद उमटले. राजकारणामध्ये कोणता नेता काय घोषणाबाजी करतो आणि त्या घोषणा प्रत्यक्षात किती पाळल्या जातात, याबाबत आपण कोणीच न बोललेले बरे. पण “ना खाऊंगा ना खाने दूंगा! ” ही घोषणा मात्र माझ्या मनाला भावली होती.

माझ्या मते, वरकमाई करणे ही एक वृत्ती किंवा स्थायीभाव असतो. ज्याच्यामध्ये तो असतो, तो कुठे ना कुठेतरी उफाळून येतोच. यावरून लहानपणी ऐकलेली एक गंमतशीर गोष्ट आठवली. एका राजाच्या दरबारामध्ये एक खाबूनंदन, लाचखोर कर्मचारी होता. त्याला कुठल्याही खात्यात नेमले तरी तो वरकमाई करत असल्याच्या तक्रारी राजाकडे यायच्याच. पण त्या चतुर माणसाला कधीही रंगेहाथ पकडता आलेले नसल्याने राजाला त्याला कामावरून काढूनही टाकता येत नव्हते. शेवटी राजाने त्याला समुद्रकिनारी बसायला सांगितले आणि प्रत्येक दिवसभरामध्ये समुद्रात उठणाऱ्या लाटा मोजण्याचे काम दिले. थोड्याच दिवसांत पुन्हा या महाशयाविरुद्ध राजाकडे तक्रारी यायला सुरुवात झाली. समुद्राच्या काठी बसून हा कुणाकडून आणि कशी लाच खात असेल? या बद्दल राजाला भलतेच कुतूहल वाटले. “राजाने मला समुद्राच्या लाटा मोजण्याचे काम दिलेले आहे. तुमच्या जहाजाच्या हालचालीमुळे, या सरकारी कामात व्यत्यय येत आहे’ अशी सबब सांगून हा महाभाग किनाऱ्यावर आलेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाकडून पैसे खात होता! त्यामुळे पैसे खाण्याची वृत्ती असलेला मनुष्य कुठल्या तरी मार्गाने पैसे खाणार हे निश्चित.

आनंदने, म्हणजे माझ्या नवऱ्याने, २६ वर्षे सेनाधिकारी म्हणून नोकरी केली, आणि कर्नल पदावर असताना, त्याने ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. सैन्याच्या नोकरीमधे वरकमाई करण्याचे प्रसंग तसे कमीच येतात. त्यातून सैन्याच्या शिस्तीमधे असे काही करताना पकडले गेल्यास कडक कारवाई होण्याची जबरदस्त भीती असतेच. तरीदेखील, ‘लाचखोरी’ हा स्थायीभाव असलेल्या, सैन्यातल्याही काही लोकांबाबत, लाच खाणे, लाच देणे किंवा इतरही गैरप्रकार क्वचितप्रसंगी कानावर येतातच. आनंदने चार वर्षे, अलाहाबाद येथील सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (SSB), म्हणजेच सेनाधिकारी निवड समितीवर काम केले. तीन अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीमधील तो एक सदस्य असे. त्याकाळी अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर काही भुरट्या एजंट लोकांचा सुळसुळाट होता. सेनाधिकारी होण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अलाहाबाद स्टेशनवर उतरल्या-उतरल्या हे एजंट लोक गाठत असत. “आम्ही तुमची निवड करून देण्यासाठी मदत करू. परंतु, त्यासाठी निवड समितीतील अधिकाऱ्यांना काही पैसे द्यावे लागतात. सेनाधिकारी म्हणून तुमची निवड न झाल्यास, तुमच्याकडून घेतलेली अर्धी रक्कम तुम्हाला परत मिळेल” असे आमिष दाखवून अनेक उमेदवाराकडून ते एजंट पैसे घेत असत. प्रत्यक्षात, सेनाधिकारी निवडण्याची प्रक्रिया अत्यंत निष्पक्षपणे होईल याची दक्षता घेतलेली असते. त्यासाठी निवडसमितीवरील अधिकाऱ्यांवर, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बरीच बंधनेही घातलेली असत. परंतु, सेनाधिकारी निवड प्रक्रियेमध्ये सरसकट लाचखोरी चालत असल्याचा गैरसमज उमेदवारांमधे पसरवून, मधल्यामधे ते लबाड एजंटस भरपूर कमाई करत असत. कधी-कधी निवडसमितीच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्नही व्हायचा. त्या काळात आनंदलाही एक-दोन वेळा लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. लाच घेण्याच्या किंवा देण्याच्या सक्त विरोधात असल्यामुळे, आनंद त्या प्रलोभनाला कधीच बळी पडला नाही.

वैयक्तिक पातळीवर ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा! ‘ हे तत्व काटेकोरपणे पाळणे आपल्या देशामधे तसे अवघडच आहे. या घोषणेचा पहिला भाग, म्हणजे लाच न खाणे, एकवेळ शक्य आहे. कारण त्या गोष्टीवर बऱ्याच अंशी स्वतःचे नियंत्रण असू शकते. पण काही ‘मलईदार’ सरकारी खात्यांमधे, लाच न खाणारा कर्मचारी इतरांना नकोसा असतो. कधी-कधी अशा कर्मचाऱ्याला वरचेवर बदली, सहकाऱ्यांकडून होणारी कुचेष्टा, वरिष्ठाकडून अपमानास्पद वागणूक, अशा अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. आजही कित्येक सरकारी कामांमधे, लाच दिल्याशिवाय योग्यप्रकारे आणि वेळच्यावेळी काम होत नाही हे आपण ऐकतो. म्हणूनच, सामान्य माणूस, ‘ना खाने दूंगा’ हे तत्व सहजी पाळू शकत नाही. किंबहुना, सर्वसामान्य भारतीय नागरिकाला लायसेन्स काढण्यापासून ते पासपोर्ट मिळवण्यापर्यंत, सर्व कामे, थोडीफार लाच देऊन करून घेण्यामध्ये फारसे काही गैर वाटत नाही. परंतु दुर्दैवाने, लाच देऊनसुध्दा एखादे काम व्यवस्थित होईलच याची खात्री नसते. १५ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रामधे वास्तव्यास असलेल्या एका अमराठी सेनाधिकाऱ्याला येथील रहिवासी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट) हवे होते. अनेक वेळा विहित नमुन्याचा अर्ज आणि योग्य शुल्क भरूनही महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला त्याला काही केल्या मिळत नव्हता. शेवटी नाईलाजाने त्याने एका एजंटला गाठले व ६००० रुपये देऊन आपले काम करून घेतले. पण प्रत्यक्षांत जेंव्हा त्याच्या हातात दाखला आला तेंव्हा त्यावर ‘भारत देशाचा रहिवासी’ इतकेच लिहून आले होते! झालेल्या चुकीबाबत चौकशी केली असता त्या एजंटने हात वर केले. त्यानंतर त्या एजंटने पुन्हा ६००० रुपये उकळले आणि मगच त्या अधिकाऱ्याला दाखला मिळाला!

आमच्यापुरते बोलायचे तर, ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा ‘ या तत्वाचे पालन करण्यासाठी मी आणि आनंद, कसोशीने प्रयत्न करतो. लाचखोरीच्या संदर्भातील ही घोषणा आठवण्यासाठी एक कारण नुकतेच घडले. काही दिवसांपूर्वी एका रिसॉर्टमधे, सुमारे ऐंशी वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत आमच्या मुलाचे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ झाले. लग्नाचे मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर शेवटच्या रात्री, आम्ही एक कॉकटेल पार्टी ठेवलेली होती. त्या रिसॉर्टकडे मद्यविक्रीचा कायमस्वरूपी परवाना नसल्यामुळे आमच्या पार्टीसाठी एका दिवसाचा परवाना काढणे आवश्यक होते. एक्साईज खात्याच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून आणि ३८०० रुपये शुल्क भरून तो परवाना मिळवता येतो, ही खात्रीशीर माहिती आनंदला मिळालेली होती. परंतु, रिसॉर्टवाल्यानी तो परवाना काढून देण्यासाठी १५००० रुपये मागितले. अर्जासोबत लागणाऱ्या विहित शुल्काव्यतिरिक्त वरचे पैसे ‘एक्साईज’ खात्याच्या अधिकाऱ्यांना द्यावेच लागतात, त्याशिवाय परवाना मंजूर होतच नाही’ अशी माहिती रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने पुरवली. अर्थात लाच घेणे-लाच देणे, हे आमच्या तत्वाच्या विरुद्ध असल्याने आम्ही योग्य मार्गानेच परवाना काढायचे ठरवले.

कार्यक्रमाच्या बरेच दिवस आधी आनंदने त्या परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली. ते करतानाही बऱ्याच बारीक-सारीक अडचणी आल्या. त्या साईटवर अपलोड करावी लागणारी कागदपत्रे व फोटो अमुक इतक्या आकाराचेच आणि तमुक फॉरमॅटमधेच असणे अनिवार्य होते. ती कागदपत्रे योग्य आकार व फॉरमॅटमधे बसवून साईटवर अपलोड करेपर्यंत, तो सर्व्हर डाऊन होई. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागे. अशा अनंत अडचणी पार करत-करत शेवटी एकदाचा तो अर्ज त्या वेबसाईटवर अपलोड झाला. त्यानंतर परवाना शुल्क भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्याच दुसऱ्या एका वेबसाईटवर जाणे आले. त्यामध्येही अनेक अडचणी पार केल्यानंतर अखेर ते शुल्क भरले गेले. एक-दोन दिवसातच रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला फोन आला, “साहेब, तुम्ही परवान्यासाठी आमच्या रिसॉर्टच्या नावे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर इथल्या एक्साईज ऑफिसातून मला असे सांगण्यात आले आहे की गावातल्या काही संघटना ओल्या पार्ट्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे परवाना मिळायला अडचण येऊ शकते. त्यासाठी आपण कार्यालयात येऊन भेटावे असे तिथल्या कर्मचाऱ्याने मला सांगितले आहे. ” मात्र आनंदने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसानंतर ऑनलाईन परवाना मंजूर झाला व आनंदने घरीच त्याचा प्रिंटाऊटही काढून घेतला. दुसऱ्या दिवशी रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला पुन्हा फोन आला, “साहेब, एक्साईज डिपार्टमेंटच्या क्लार्क बाईंनी सांगितले आहे की ऑफिसात पैसे भरून परवान्याची प्रत घेऊन जा. त्यासाठी मला पाच-दहा हजार रुपये सोबत घेऊन जावे लागेल. तर कसे करायचे? ” आनंदने त्या व्यवस्थापकाला सांगितले, “त्या ऑफिसमधील क्लार्क बाईंना ठणकावून सांगा की योग्य शुल्क भरून मंजूर झालेल्या परवान्याची प्रत माझ्याकडे आहे. तरीही वर काही पैसे हवे असल्यास त्या बाईंनी तसे लेखी द्यावे किंवा मला मेसेज करावा. ” त्यानंतर मात्र आनंदला कुणाचाही फोन आला नाही, आणि सर्व नियमांचे पालन करून आम्ही आयोजित केलेली कॉकटेल पार्टीही निर्विघ्नपणे पार पडली.

लग्नाच्या निमित्ताने ठरवलेले सर्व कार्यक्रम आनंदात पार पडावे, अशी आमची इच्छा होती. “देऊन टाका ना वरचे पाच-दहा हजार रुपये. परवाना मिळवण्याची कटकट तरी वाचेल. ” असा सल्ला देणारे लोकही आम्हाला भेटले. पण “ना खाऊंगा ना खाने दूंगा! ” या तत्वाला मुरड घालायला आम्ही तयार नव्हतो. आमचा बराच वेळ आणि श्रम खर्ची पडले असले तरी ती इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद त्याहून खूप मोठा होता.

लाच देणे-घेणे हे अनेक देशवासीयांच्या रक्तात भिनले आहे हे पदोपदी जाणवते. आपल्यापैकी प्रत्येकाने थोडी अधिक धडपड करून, जर “ना खाऊंगा ना खाने दूंगा’ हा मंत्र जपला तरच काहीतरी फरक पडेल असे वाटते.

© डॉ. स्वाती बापट

एमबीबीएस, एमडी (बालरोग)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-१ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-१  (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

सगळ्यांना नमस्कार, आज मला या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी आधी सर्व संयोजकांचे आभार मानते. मला हा खूप मोठा माझा एक सन्मान वाटतोय. हा एक खूप छान योग माझ्यासाठी आहे. एकतर माझे बाबा डॉक्टर अनिल अवचट यांचं अनेक वर्षांपूर्वी याच व्याख्यानमालेमध्ये भाषण झालं होतं. त्यामुळे ती पण एक माझ्यावरती जबाबदारी आहे. दुसरं म्हणजे या मुक्तांगणच्या खालीच मी मुक्ता इथे बोलतीये. या मुक्तांगणलासुद्धा पु ल देशपांडे यांनी देणगी दिली होती आणि माझं जे पुण्यातील मुक्तांगण आहे ते सुद्धा पु ल देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून सुरू झालं. त्यामुळे मला आजच्या या कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद वाटतोय.

आज मला बोलायचं की, आजच्या काळात व्यसनमुक्तीची आव्हाने कशी वाढली आहेत त्याबद्दल. त्याविषयीच्या बातम्या टीव्हीमध्ये आपण ऐकत असतो. कोणाला तरी कसं व्यसन लागलं, त्यामुळे त्यांचं जीवन कसं बहकलं, आपल्या ओळखीत कुणी असतं. पेपरमध्ये आपण वाचत असतो की, दारू पिऊन एखाद्या माणसाच्या हातून काय कृत्य झालं. व्यसनामुळे किती प्रकारचे दुष्परिणाम होत असतात, त्याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना असते. अलीकडे असं दिसून येत की, वेगवेगळे जे सामाजिक प्रश्न आहेत, त्याच्या प्रत्येकाच्या मुळाशी कुठेतरी व्यसनाधीनता हा प्रश्नसुद्धा कारणीभूत असतो. असे खूप मनातील सामाजिक बोलायचे ठरवले आहे. बेरोजगारी असेल, गरिबी असेल, डोमेस्टिक व्हायलन्स, असे कितीतरी सामाजिक प्रश्न आता आपल्या सगळ्यांच्या मनात येतील आणि त्या प्रत्येकाच्या मुळाशी कुठेतरी कारणीभूत अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे हा व्यसनाधीनतेचा खूप मोठा एक सामाजिक प्रश्न आहे. याच्या बाबतीत आपण काही करू, असे माझी आई म्हणजे डॉ. अनिता अवचट हीला वाटत होते. ती एक मानसोपचार तज्ञ होती. तेव्हा ती पुण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करत होती. सुरुवातीला अगदी असं व्हायचं… म्हणजे अगदी 80 सालाच्याही आधी ती 70 च्या दशकामध्ये काम करायला तिने सुरुवात केली, तेव्हा ज्यांना दारूच्या व्यसनाची समस्या आहे ते पेशंट तिच्याकडे हॉस्पिटलमध्येच उपचारासाठी यायचे. कारण मानसोपचारासाठी त्याकाळी वेगळी अशी महाराष्ट्रामध्ये कुठली सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे मग मनोरुग्णालयामध्येच अशा व्यसनाधीन रुग्णांवरती तेव्हा उपचार केले जायचे. तेव्हा साधारण 1983-84 मध्ये ब्राऊन शुगरच्या व्यसनाची लाट पूर्ण जगामध्ये खूप मोठी लाट तेव्हा आली. ब्राऊन शुगर हा शब्द खरंतर तेव्हा आपण ऐकलेला होता आणि तेव्हासुद्धा सुरुवातीला असं वाटायचं की श्रीमंतांच्या अति लाडावलेल्या मुलांचा हा प्रॉब्लेम आहे. आपल्या याच्याशी काय संबंध? अशीच साधारण लोकांची प्रतिक्रिया असायची.

तर असं झालं की, माझ्या आई-बाबांच्या एका खूप जवळच्या मैत्रिणीचा मुलगा इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. होस्टेलला तो राहायचा आणि त्याला हे ब्राऊन शुगरचं व्यसन लागलं. या मुलाला त्याचे आई-बाबा आमच्याच घरी घेऊन आले. त्याला माझ्या आई-बाबांनी घरीच उपचार दिले आणि या मुलाशी बोलत असताना बाबांना म्हणजे डॉ. अनिल अवचट यांच्या असं लक्षात आलं की, हा प्रश्न आता खूप वाढत चाललेला आहे. मग बाबांनी असं ठरवलं की ह्याच्यावरती काहीतरी माहिती घ्यायची आधी. तेव्हा डॉक्टर आनंद नाडकर्णी मुंबईला काम करत होते याच्या बाबतीत. तिथे माझे बाबा गेले, तिथे राहिले. अनेक व्यसनाधीन लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या कुटुंबीयांना भेटले आणि ‘गर्दच्या जाळ्यात’ नावाची एक लेखमाला तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये लिहिली. मग पुढे त्याचं ‘गर्द’ नावाचे पुस्तक प्रकाशित झालं. पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी जेव्हा हे सगळं वाचलं तेव्हा ते खूप अस्वस्थ झाले. त्यांनी माझ्या आई-बाबांना बोलवून घेतलं आणि ते असं म्हणाले की, “आम्ही जर का काही आर्थिक मदत देऊ केली तर तुम्ही काही याच्यावरती काम कराल का? ”

हे काम करायला पाहिजे याची गरज आई-बाबांच्या लक्षात आलीच होती. कारण ते सगळं लेख वगैरे वाचल्यानंतर खूप लोक आमच्याकडे विचारायला लागले होते की, आमच्या मुलाला व्यसन आहे, आमच्या ओळखीत कोणाला तरी व्यसनी झाला आहे, त्यांच्यावर तुम्ही उपचार करा. एकदा तर असं झालं होतं की, एक वडील एकदा आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाची कुठली तरी एंट्रन्स एक्झाम आहे. म्हणून ते मुलांना पुण्यात घेऊन आले आणि त्या मुलाने त्यांना आत्ताच सांगितलं की, ‘मला अमुकअमुक ड्रगचं व्यसन आहे आणि आत्ता मला विड्रॉवल सिम्प्टमचा त्रास होतोय. आता मला हे ड्रग मिळाले नाही तर मी ती एंट्रन्स एक्झाम कशी देऊ? ‘ तर ते वडील आमच्या घरी आई-बाबांना असं विचारायला आले होते की, त्यांना हे ड्रग कुठे मिळेल? म्हणजे ते विकत घेतील आणि या मुलाला देतील. मग तो त्या परीक्षेला ते जाईल. हे सगळं ऐकून माझ्या आई-बाबांना धक्के बसत होते. या प्रसंगावरून त्यांनी पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी जी मदत देऊ केली त्यांच्या देणगीतूनच तेव्हा 29 ऑगस्ट 1986 या दिवशी हॉस्पिटलमधल्याच एका बिल्डिंगमध्ये मुक्तांगणाची स्थापना झाली.

उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये पु ल तेव्हा असं म्हणाले होते की, ‘आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करतोय. तर या केंद्राची भरभराट होवो, अशा शुभेच्छा देणं योग्य होणार नाही? कारण व्यसनमुक्ती केंद्राची भरभराट होणे ही काही चांगली गोष्ट नाहीये. तर मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की, इतकं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे. मग या ठीकाणी आपण एक संस्कृतीक केंद्र निर्माण करूया. ‘ खरंच, किती मोठ्या शुभेच्छा होत्या त्या! तेव्हा खरं तर मी कॉलेजमध्ये शिकत होते. मी हा कार्यक्रम एक विद्यार्थिनी म्हणूनच अटेंड करत होते. जी नवीन टीम तयार होत होती त्या सर्वांनाच एक प्रेरणा देण्याचं काम या पू लं च्या शुभेच्छांनी तेव्हा घडत होतं. अशा तऱ्हेने मुक्तांगणची सुरुवात झाली.

मी म्हटलं तसं की तेव्हा महाराष्ट्रामध्ये असं कुठलाच व्यसनमुक्ती केंद्र नव्हतं. त्यामुळे माझ्या आई-बाबांनी तेव्हा असं ठरवलं की इथे उपचार घेण्यासाठी जे लोक येतील आपण त्यांच्याकडूनच शिकून इथली जी उपचार पद्धती आहे ती तयार करूया आणि मग तेव्हा जे रुग्ण यायला लागले त्यांच्याशी माझे आई-बाबा चर्चा करायचे की तुम्हाला कुठल्या प्रकारचे उपचार इथे मिळाले तर तुम्हाला बरं वाटेल, तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत? अशा पद्धतीने काम करत गेल्यामुळे या सगळ्याचाच एक वेगळाच फायदा झाला. त्यामुळे मुक्तांगणमध्ये आम्ही कुठल्याही बाहेरच्या देशातल्या उपचार पद्धतीचं अनुकरण केलेलं नाहीये, तर मुक्तांगण मधले जे उपचार आहेत ते पूर्णपणे आपल्या भारतीय संस्कृतीवर आधारित आहेत. इथे येणाऱ्या पेशंटना आम्ही रुग्णमित्र म्हणतो. त्यामुळे इथे जे रुग्णमित्र येतात त्यांना खूप आपलेपणा वाटतो. मुक्तांगणमध्ये खूप बरं वाटतं सगळ्यांना. इथे जे उपचार केले जातात ते आम्ही कुठल्यानाकुठल्या पद्धतीने आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडित ठेवतो. सर्व धर्मांचे सण साजरे करतो, पण कुठल्याही धर्माचा बडेजाव वगैरे किंवा मूर्तिपूजा या गोष्टी मुक्तांगणामध्ये केल्या जात नाही. पण सण मात्र सर्व धर्मांचे साजरे केले जातात. त्यांची आम्ही संस्कृतीशी अशी काहीतरी सांगड घालतो की व्यसनमुक्तीचा संदेश त्यातून देता येईल. समजा दसरा असेल तर आम्ही व्यसनाच्या रावणाचे दहन करतो, वगैरे. असं काही ना काही तरी संस्कृतीशी रिलेटेड केलं जातं. अशा पद्धतीने मुक्तांगण हे जवळजवळ 38-39 वर्षांपासून कार्यरत आहे.

मुक्तांगणमध्ये साधारणपणे चार पातळ्यांवरती काम केलं जातं. सर्वात महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे ज्यांना व्यसनाची समस्या आहे अशा लोकांना उपचार देण्यासाठी आम्ही 30 दिवस म्हणजे एक महिनाभर ऍडमिट करून घेतो. पूर्णपणे स्ट्रक्चरर्ड अशी एक उपचार पद्धती त्यांच्यासाठी तयार केली आहे. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक… हो, कुटुंबालाही सहभागी करून घेतलं जातं. अशा प्रकारे ज्याला आपण होलिसस्टिक म्हणतो तसे परिपूर्ण असे उपचार त्यांच्यामध्ये दिले जातात. तीस दिवसात खरंच त्याला बरं वाटतं का? काहींना वाटतं काहींना वाटत नाही त्यांच्यासाठी तीस दिवसानंतरसुद्धा पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात. काही लोकांच्या बाबतीत असं असतं की, ते कुटुंबातनं बाहेर पडलेले असतात किंवा नोकरी गेलेली असते. कोणीच त्यांना विचारत नसतं. तर असे जे आमचे रुग्णमित्र आहेत ते दीर्घकाळसुद्धा राहू शकतात. मुक्तांगणमध्ये राहून तिथे काम करतात किंवा बाहेर नोकरी बघतात आणि परत रहायला येतात. अशाप्रकारे उपचारानंतरसुद्धा ते आमच्या संपर्कात असतात. त्यासाठी महाराष्ट्रात 24 ठिकाणी मुक्तांगणांची संपर्क केंद्र आहेत, पाठपुरावा केंद्र आहेत. म्हणजे डिस्चार्ज नंतरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या पुनर्वसनाला मदत केली जाते. पुनर्वसनानंतरचं आमचं तिसरं अतिशय महत्वाचं काम म्हणजे समाजामध्ये जनजागृती करणे. सगळ्यांनाच एक वाक्य माहिती आहे की, ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ एखादा आजार झाल्यानंतर तो बरा करण्यापेक्षा सोपं आहे की तो आजार होऊ नये म्हणून प्रयत्न करणे. म्हणून मग वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, कारखाने अशा ठीकठिकाणी आमची एक टीमच आहे की ती तिथे जाऊन व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृतीचं काम करते. व्यसन लागू नये म्हणून काय करायचं याबाबतीत मुलांशी संवाद साधला जातो, पालकांशी संवाद साधला जातो. चौथं महत्त्वाचं काम म्हणजे ज्यांना या विषयात काम करायचे आहे अशा लोकांना प्रशिक्षण देणं. त्याच्यासाठी आमच्याकडे ट्रेनिंग सेंटर पण आहे. तर *उपचार, पुनर्वसन, जनजागृती आणि प्रशिक्षण या चार पातळ्यांवरती मुक्तांगणमध्ये काम केलं जातं. *

– क्रमशः भाग पहिला 

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares