एकदा ब्रह्मदेव रथातून जात असताना सारथी अचानक रथ थांबवतो. ब्रह्मदेवाने कारण विचारले असता, तो सांगतो की एक छोटा प्राणी बसला आहे. तो रस्त्यातून बाजूला होत नाही.. म्हणून रथ थांबवावा लागला. “ त्याला बाजूला होण्याची विनंती कर.” …. थोड्या वेळाने ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर सारथ्याने सांगितले की, तो प्राणी पूर्वी होता त्यापेक्षा मोठा झाला आहे.
ब्रह्मदेवाने सांगितले की, “ त्याला चाबूक दाखव म्हणजे तो बाजूला जाईल.”
ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर कळले की, तो प्राणी अधिकच मोठा झाला आहे. आता तो प्राणी तर एका डोंगराएवढा मोठा झाला आहे. आणि रथावर चाल करून येत आहे.
हे ऐकताच ब्रह्मदेव म्हणाले, “ रथ मागे घे आणि त्याला सांग की, ‘तूच श्रेष्ठ आहेस, आम्ही रथ वळवतो आणि दुसऱ्या मार्गाने जातो. “
सारथ्याने हे सांगितल्यावर तो प्राणी एकदम मुंगी इतका छोटा झाला आणि रस्त्यातून बाजूला झाला.
आश्चर्यचकित झालेल्या सारथ्याने ब्रह्मदेवास याचे कारण विचारता देवाने सांगितले की, “ त्या प्राण्याचे नाव “ईर्षा” असे होते. आपण जेवढे महत्त्व त्याला देऊ तेवढा तो मोठा होत जाईल. मात्र आपण स्पर्धेतून दूर झाल्यावर “ईर्षा” राहिली नाही आणि तो सामान्य स्वरूपात आला.”
—सर्वच स्पर्धा जिंकण्यासाठी खेळायच्या नसतात. काही वेळा फालतू स्पर्धेत भाग घेतल्यामुळे उगाच ऊर्जा व्यर्थ खर्च होते. काही वेळा नमते घेतल्यामुळे फायदाच होतो.
याचप्रमाणे जग लोकांच्या नजरेने बघण्यापेक्षा आपल्या नजरेने बघावे. आपण सुखी आहोत, याची पावती लोकांकडून घेण्यापेक्षा आपले सुख आपणच अनुभवावे.
आपला निर्णय आपण घ्यावा आणि त्यास जबाबदार राहावे.
लोक काय म्हणतील, याचा फार विचार करू नये. कारण एक दिवस प्रमाणापेक्षा कोणीही आपल्याला जवळ करणार नाही, तेव्हा आपले सुख-दुःख आपणच अनुभवावे, आयुष्य तणावमुक्त होते.
संग्रहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज दादा वहिनीला श्री.श्रीधर कुलकर्णी यांचेकडे लग्नाचे आमंत्रण आहे. कुलकर्णी काका म्हणजे आमचे चुलत घराणे. खूप श्रीमंत.पैशाचा धबधबा पडतो की काय त्यांच्या घरी ?? असं वाटतं.त्यातच मुलांचीही बिझनेस मधे मदत झाली.••• म्हणतात ना,•••• “पैसा पैशाला ओढतो.”••••
ते काकांकडे बघून पटत. ••••
म्हंटल तर मुलं खूप शिकलेली नाही.पण पिढी दर पिढी चालत आलेला बिझनेस मात्र उत्तम सांभाळतात. सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन जन्माला आलेली ही मुलं, आपल्या बिझनेस मधे चोख आहेत.सरस्वती खूप प्रसन्न नसली तरी लक्ष्मीने मात्र आपला वरदहस्त त्यांच्यावर छान ठेवलेला आहे.•••••
श्रीमंतीची सर्व लक्षणे दिसतात. मोठा बंगला, दारासमोर चार गाड्या,घरात नोकर माणसे,म्हणजे घरच्या बायकांना साधारण बायकांसारखे काम करायची गरज पडत नाही. उठणे बसणे पण अशाच लोकांबरोबर. ••••••
पैशाचा माज चढला आहे, असं म्हणता येणार नाही. कदाचित ते सहज बोलत असावेत, वागत असावेत. पण ते आपल्या सारख्या सामान्य माणसांना कुठे तरी खटकत.,मनाला लागत. असे आमच्या दादाचे नेहमी म्हणणे असते. वहिनीला काही ते पटत नाही व आवडत तर त्याहुनही नाही. ••••
मागे दादाच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला दादा वहिनी त्यांच्या घरी गेले असताना, त्यांना मिळालेली वागणूक वहिनी अजूनही विसरलेली नाही. प्रत्त्येक भेटीची वहीनीची काही तरी खास आठवण आहेच. नातं असलं तरी सांपत्तिक परिस्थिती मधे तफावत आहे. तरीही काही महत्वाच्या कार्यक्रमात दादा वहिनी जातातच.आपलं नातं टिकवण्यासाठी, कसलाही विचार न करता हजेरी लावतात.•••••
तेंव्हा अनघा लहान होती,ती पण आई बाबांबरोबर जायची. काही प्रसंग तिच्या बालमनावर चांगले कोरले गेले होते. घरी अलमारी भरून क्रोकरी असताना,आम्हा तिघांना वेगवेगळ्या आकाराच्या स्टील प्लेट, वाटी मधे चिवडा दिल्याचा प्रसंग तिला आठवतो. दुर्लक्ष केलेले ही आठवते. त्यानंतरची आईची कुरकुर,वाईट वाटणे,कधी कधी आईचे रडणे,तिच्या चांगले लक्षात होते. एकदा पूजेला गेले असताना, पूजेचे महत्व कमी व श्रीमंत लोकांचा कौतुक समारंभच जास्त वाटत होता.वहीनी खूप खुशीने तेथे कधीच गेली नाही. •••
दादा ची परिस्थिती सामान्य होती. येथे लक्ष्मी नाही,पण सरस्वती मात्र खूप प्रसन्न होती.दादाची मुल शिक्षणात हुशार होती,म्हणून त्यांच्या शिक्षणाकरिता दादा वहिनीने कधी काही कमी पडू दिले नाही.•••
अनघा ने ग्रॅज्युएशन नंतर स्टेट लेवल, नॅशनल लेवल च्या परीक्षा दिल्या.’ UPSC ‘ पास केली.आज ती पोलीस खात्यात उच्च अधिकारी आहे.••••
आज कुलकर्णी काकांकडे लग्नाला जायचे आहे.अनघा म्हणाली मी पण येईन. ती अशा एका दिवसाची वाट बघतच होती.••••
अचानक तिच्या समोर फ्लॅश बॅक सुरू झाला. आईच्या डोळ्यातील अश्रु आठवले.
“आपण नेहमी चांगले वागायचे”. असा बाबांचा नियम आहे. त्यामुळे नाइलाजाने आई,बाबांबरोबर जात असे.•••
अनघा रंगाने सावळी व जेमतेम उंची, म्हणून तिच्या वर तेथे कटाक्ष व्हायचे.कसं होईल हिचे ??? ही काळजी तिच्या आई बाबांपेक्षा त्यांनाच जास्त होती. त्यांच्या घरी आई बाबांकडे दुर्लक्ष करतात. ही गोष्ट तिच्या मनात घर करून बसली होती. काही दुःख सारख आपलं डोकं वर काढतात.व तुम्हाला त्याची सतत आठवण करून देत राहतात. व प्रत्त्येक आठवणीबरोबर ती सल वाढतच जाते.••••
आई बाबा लग्नाला जायला निघाले.अनघा आॅफिस मधून सरळ हॉलवर येणार होती.•••
तसं अनघाला सहज सुट्टी घेता आली असती, व छान तयार होऊन लग्नाला जाता आले असते. पण तिला काळया सावळ्या अनघाचा ‘रूबाब ‘ दाखवायचा होता. खरं तर हे असे वागणे तिच्या स्वभावात बसत नव्हते. पण जुन्या प्रसंगाची आठवण व आई बाबांना मिळालेली वागणूकही ती विसरली नव्हती. आज आई बाबांना खासकरून आईला तिची प्रतिष्ठा मिळवून द्यायची होती. त्यांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. ••••
पोलिस अधिकारी च्या युनिफॉर्म मधे अनघा हॉलवर पोचली. मस्त कडक युनिफॉर्म त्यावर ACP rank चे लागलेले स्टार्स, डोक्यावर लावलेली cap,हातात स्टीक, चकचकीत बूट, कमरेवर बेल्ट.डोळयांवर काळा चष्मा. तिला आॅफिसकडून मिळालेल्या गाडीतून अनघा आली.लगेच ड्रायव्हर ने कारचा दरवाजा उघडला. अदबीने बाजूला उभे राहून, एक कडक सॅलूट मारला.•••
” व्वा !!!काय शान होती अनघाची.”
तेथील सर्व लोक बघतच राहिले. लहान मुले तर जवळ येऊन बघू लागली.अनघाचा मोबाईल कारमधेच राहिला होता, तेंव्हा ड्रायव्हर ने तो तिला आणून दिला व पुन्हा एकदा तसाच कडक सॅलूट मारला.•••
हाॅलमधील सुंदर महागड्या पैठणी निसून, दागिन्यांनी लदलेल्या, ब्युटी पार्लर मधून सरळ हॉलवर आलेल्या so called smart, श्रीमंत बायका बघतच राहिल्या. आता आकर्षणाचा केंद्रबिंदू पोलिस अधिकारी ‘अनघा ‘ होती.••••
श्रीधर काकां काकू,व त्यांच्या घरचे इतरही सर्व, अनघाच्या स्वागतासाठी लगेच आले. ••••
अनघाने वेळ कमी असल्यामुळे मी सरळ आॅफिसमधूनच आले व लगेच मला जावे लागेल. असे सांगितले.••••आज सर्वांशी भेट होईल, म्हणून मी आले.••••पुर्वी लहान असताना मी आई बाबांबरोबर येत असे. •••पण या मधल्या काळात मला येणे जमलेच नाही.•••तिने सर्वांची विचारपूस केली.••• सर्वांना आनंदाने भेटली. वर वधू ला भेटली. फोटोग्राफर ने तिचे आवर्जून बरेच फोटो काढले. आपल्यामुळे वर वधू कडे दुर्लक्ष व्हायला नको, म्हणून तिने लगेच निघायचे ठरविले •••••
लगेच अनघाच्या जेवणाची सोय झाली. तिच्या ड्रायव्हरला ही आदराने जेवण दिल्या गेले..आई बाबा हे सर्व डोळे भरून बघत होते.आजही आईच्या डोळ्यात अश्रू आलेच. पण ते मुलीचे कौतुक बघून, तिचा होणारा मानसन्मान बघून.••••
अनघाच्या आई-बाबांना लग्न घरात सर्वांसमोर मान मिळाला. आईच्या मनातील सल दूर झाली होती.अनघाचा उद्देश्य पूर्ण झाला होता,तो ही बाबांचा नियम सांभाळून,”आपण नेहमी चांगले वागावे”. ••••
निघताना अनघा आई बाबांना म्हणाली,••••आई-बाबा जास्त उशीर करू नका. अंधाराच्या आत घरी पोहचा. ••••
श्रीधर काकांची पंधरा वर्षांची नात ‘ राधा’ अनघा जवळ येऊन म्हणाली,ताई मला पण तुझ्या सारखे पोलिस अधिकारी बनायचे आहे. बाबा,माझा ताई बरोबर फोटो काढा ना.तो मी माझ्या स्टडी टेबल वर ठेवेन.••••
अनघा म्हणाली,••• हो का ??
मग छान अभ्यास कर.मी तुला वेळोवेळी guidance देईन. ••••
एकंदरीत अनघाचा प्रभाव जबरदस्त होता.•••
“वक्त वक्त की बात हैं।
वो भी एक वक्त था ।
आज भी एक वक्त हैं।”••••
आज कुलकर्णी काकांच्या ड्रायव्हर ने आई-बाबांना घरी पोहचविले.••••
म्हणतात ना,•••
“Your greatest test is how you handle people who have mishandled you.” ••••
☆ ‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले… भाग – 2 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆
(मी म्हटले मला तू ऑपरेशन करताना एकदा बघावे लागेल.”) इथून पुढे …
“त्याने मला एकदा ऑपरेशन करताना बोलावले. जवळ जवळ ४ तास ऑपरेशन चालले. मी शांतपणे तो काय करतो ते बघत होतो. तेव्हा काही आत्ता सारखी मोबाईलवर व्हिडीओ घेण्याची सोय नव्हती. मोजमाप देखील घेता येणार नव्हते. मी फक्त निरीक्षण केले आणि २ महिन्यांच्या प्रयत्नाने एक साधे मेदूची कवटी पकडणारे उपकरण बनवले, ते भावास दिले. त्याने ते पुढच्या ऑपरेशनसाठी वापरले आणि त्याला खूप आवडले आणि उपयुक्त देखील वाटले. त्याचे ऑपरेशन निम्म्या वेळात झाले. मुख्य म्हणजे परदेशी उपकरणाच्या तुलनेत फक्त १०% किमतीत हे उपकरण तयार केले ह्यात आमचा प्रॉफिट देखील आला.”
“ही बातमी हा हा म्हणता अनेक शल्यकर्मीपर्यंत पोहचली. हळूहळू अनेक डॉक्टर्स मला भेटून विविध प्रकारची उपकरणे बनवून घेऊ लागली. यात orthopedic आले, पोटाचे, किडनीचे अशा सर्व प्रकारच्या स्पेशालीस्टना मी वेगवेगळी उपकरणे करून देऊ लागलो. मला तो नादच लागला कोणतेही ऑपरेशन करताना निरीक्षण करायचे आणि वर्कशॉप मध्ये उपकरण बनवायचे. अशा शेकडो शस्त्रक्रिया मी ऑपरेशन थियेटर मध्ये जाऊन बघत असे. यातून मी अशा प्रकारची शेकडो उपकरणे बनवली. देशात असे कोणतेही मोठे हॉस्पिटल आणि सर्जन नसेल ज्याला माझे नाव माहीत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो हल्ली मेंदूतल्या ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यास सर्व कवटी उघडावी लागत नाही. जिथे ट्युमर अथवा दोष असेल त्याच्या वर कवटीला एक भोक पाडतात आणि शस्त्रक्रिया करून ती जागा पुन्हा बंद करतात. ह्या मेंदूच्या कवटीस ड्रील करण्याचे मशीन आम्ही बनवतो. आता एक विचार करा कुलकर्णी, हे ड्रील मेंदूत एक मायक्रॉन देखील घुसलेही नाही पाहिजे आणि अर्धवट ड्रील करून देखील चालणार नाही. असे अवघड उपकरण मी डिझाईन केले आहे आणि अनेक शस्त्रक्रियेत ते वापरले जाते.” माझ्या अंगावर सणकून शहारा आला. गोखलेसाहेब हे अगदी सहज सांगत होते.
गोखलेसाहेब या व्यवसायात पडले, ते देखील वयाच्या पन्नाशीत. पुण्याच्या कुस्रो वाडिया इंस्टीटयूटमधून draftsman चा कोर्स करून ते भोपाळच्या BHEL मध्ये नोकरी केली. ती नोकरी सोडून पुढे पुण्याच्या टाटा मोटर्समध्ये (तेव्हाची टेल्को) आले. तिथे ते ट्रेनिंग विभाग बघू लागले. जेआरडी जेव्हा जेव्हा पुण्याला भेट देत तेव्हा ते प्रथम या विभागास भेट देऊन मगच पुढच्या कामास जात. जेआडींच्या या सवयीमुळे हा विभाग कायम व्यवस्थित ठेवण्याची सवय लागली. गोखल्यांच्या क्रिएटिव्ह स्वभावामुळे जेआरडी त्यांना नेहमी विचारत गोखले यावेळी नवीन काय? गोखले एखादी नवीन केलेली गोष्ट त्यांना दाखवत. नवीन काहीतरी शोधण्याचा त्यांना ध्यासच लागला. त्यातून अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या. त्यांच्या बंधुंमुळे यातूनच पुढे विविध शल्यसामग्री डिझाईन करून बनवू लागले. आता व्याप वाढू लागला आणि टेल्कोची आरामाची नोकरी सोडून पूर्णपणे व्यवसायात झोकून दिले. सदाशिवपेठेतली जागा कमी पडू लागली तर अरण्येश्वर रोड वर उपकरणे बनवण्यासाठी एक वर्कशॉप सुरु केले. मुलगा समीर ते वर्कशॉप बघत असे. नावही मोठे गमतीचे ठेवले “समीरचे वर्कशॉप” घरचे इतर देखील सर्व त्यांना उद्योगात मदत करू लागले. पण मध्येच एका अपघातात समीरचे तरुण उमद्या वयात निधन झाले. ज्या बंधुंमुळे ते या व्यवसायात आले तो डॉक्टर भाऊ देखील अकाली गेला. पण गोखले साहेब त्या आघातातून सावरले.
“गोखले हे “मन्मन” ही काय भानगड आहे ? नुसतं मन का नाही?” मला सतावणारा प्रश्न मी शेवटी विचारलाच. त्याच काय आहे कुलकर्णी, मी असे समजतो आपल्याला दोन मने असतात. एक बाहेरचे मन जे चंचल असते. सारखं सुख, दुखः, बरे, वाईट याचा विचार करते. ते स्वार्थी असते, दुसऱ्याला पीडा देण्याचा विचार करते, हे हवंय, ते हवंय असा हव्यासी विचार करते. पण त्या मनाच्या आत एक आणखीन मन असते ते निरागस असते, क्रिएटिव्ह असते. ते मनाचे मन असते. तिथे चांगले विचार निर्माण होतात. तिथे वेगवेगळी डिझाईन घडतात. त्या बाहेरच्या चंचल मनाचे जे अंतर्मन ते “मन्मन.” हे अंतर्मन जागे असले, तर उत्तम कल्पना सुचतात. मी एखाद्या डॉक्टरचे ऑपरेशन बघतो तेव्हा माझे हे मन्मन मला ते उपकरण कसे बनवायचे ते सुचवते आणि मी ते फक्त प्रत्यक्षात आणतो. मला drawing काढावे लागत नाही. ते आतूनच येते. कसे येते ते माहित नाही पण सुचत जाते. परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मी निमित्तमात्र करता करविता तोच, विधाता.” गोखल्यांमधला निगर्वी उद्योजक बोलत होता. मीपणाचा स्पर्शही नाही. पेशाने इंजिनीअर असलेले गोखले किती कविमनाचे तत्वचिंतक कलाकार आहेत ह्याचे मी प्रत्यंतर घेत होतो.
त्यावर्षीचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध संपला होता. इथे सगळेच अनुकरणीय होते. गोखलेसाहेब इंजिनिअर आहेतच, पण कलाकार, गुरु, तत्वचिंतक, सेवाभावी शिवाय एथिकल आणखीन काय काय होते. त्यांना सगळ्यात शेवटी माझा येण्यातला स्वार्थ सांगितला आणि तळवलकरसरांच्या नावाने अनुकरणीय उद्योजक हा पुरस्कार त्यांना देणार असे सांगितले. त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. काही क्षण ते बोलू शकले नाही. अहो मी फार छोटा माणूस
मला कसले पारितोषिक? माझ्यापेक्षा कितीतरी महान लोक या जगात आहेत? त्यांच्या मृदू स्वभावाला साजेल अशी शंका त्यांनी उपस्थित केली. त्यांना तळवलकरसरांविषयी सांगितले. ते म्हणाले मी त्यांना ओळखायचो कारण, मी देखील कुस्रो वाडीयाचाच ना. मला ते शिकवायला नव्हते पण त्यांची शिस्त माहीत होती. पुरस्कार स्वीकारणार असे त्यांनी कबूल केले. प्रत्यक्ष कार्यक्रमाची तारीख जवळ आली तर त्यांनी मला फोन केला कुलकर्णी मी पुरस्कार स्वीकारणार आहे, पण ते भाषण वगैरे मला जमणार नाही. मी कधी असे लोकांसमोर बोललो नाही. तर ते जरा टाळता आले तर बघा. मी त्यांना समजावले गोखले आमच्याशी जे बोललात तेच सांगा लोकांना आवडेल. भाषण करावेच लागेल. होय नाही करता तयार झाले. परत एकदा माझ्या ऑफिसमध्ये आले म्हणाले भाषण लिहून आणलंय तुम्ही ऐका. मी ऐकले. छान लिहिले होते. त्यावर्षी जी चार भाषणे झाली त्यात गोखल्यांनी बाजी मारली. प्रत्यक्ष भाषण करताना लिहून आणलेले भाषण तसेच राहिले आणि फार उत्कट आणि उत्स्फूर्त बोलले. जेष्ठ विचारवंत विद्याताई बाळ अध्यक्षा होत्या त्या भान हरपून ऐकत होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणात गोखल्यांचे मनापासून कौतुक तर केलेच, पण पुढे त्यांच्या ऑफिसमध्ये देखील जाऊन आल्या.
खरे म्हणजे गोखल्यांचे भाषण एव्हडे नितांत सुंदर झाले कारण, ते त्यांच्या मन्मनातून आले होते. आतून आले होते आणि ते सर्व श्रोत्यांच्या मन्मनात खोलवर भिडले. मनोहर गोखल्यांचा जीवनपट निरागस कर्मयोगी जीवन जगण्याचा एक वस्तुपाठ आहे.
☆ भविष्यातील ऊर्जा स्त्रोत : अणु संमीलन ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
अनादी काळापासून मनुष्याला त्याच्या विविध कार्यांसाठी ऊर्जेची गरज भासत आली आहे. आपण जे अन्न सेवन करतो त्याचे रासायनिक प्रक्रियेद्वारे कायिक ऊर्जेत रूपांतर होते. वादळाच्या वेळी झाडाच्या दोन फांद्या एकमेकांवर घासून पेट घेतलेले मानवाने बघितले, त्यावरून दोन गारगोट्या एकमेकांवर घासून मानवाने अग्नि निर्माण केला. त्याचा उपयोग मनुष्य अन्न शिजविण्यासाठी करू लागला. बाष्प शक्तीचा शोध लागल्यावर औद्योगिक क्रांती झाली, दळणवळण वेगाने सुरू झाले. त्यानंतर जीवाश्म इंधन वापरून मानवाने प्रगतीचा पुढचा टप्पा गाठला. धरणाद्वारा पाणी अडवून त्या पाण्याचा वापर करून मानवाने वीज निर्माण केली. जीवाश्म इंधनांचा साठा संपत आला आहे तसेच जीवाश्म इंधनामुळे पर्यावरणाची हानी होते हे लक्षात आल्यावर मानवाने ऊर्जा निर्मितीसाठी इतर पर्यायांचा विचार करायला सुरुवात केली. त्यात सौरऊर्जा, पवन ऊर्जा, अणुभंजनाद्वारे निर्मिलेली ऊर्जा, आदींचा समावेश होतो. सौर ऊर्जा व पवन ऊर्जा मिळवणे जरी पर्यावरणास अनूकूल असले तरी त्यांची कार्यक्षमता हवामानावर अवलंबून असते; तर अणुभंजनामुळे ऊर्जा निर्माण होताना सयंत्रात काही अडचण आली तर किरणोत्सर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. दुसरे म्हणजे अणूभंजन झाल्यावर जे अवांतर पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वच्छ व मुबलक ऊर्जा मिळवण्यासाठी अणुसंमीलनाचा वापर कसा करता येईल याविषयी जगभरातील शास्त्रज्ञ गेली अनेक दशके विविध प्रयोग व चाचण्या करत होते. या प्रयोगांच्या फलस्वरूप पाच डिसेंबर २०२२ रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील द लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरी (LLNL) ला अणू संमीलन करण्यास प्रायोगिक पातळीवर यश मिळाले. हा प्रयोग एल.एल.एन.एल.च्या नॅशनल इग्निशन फॅसिलिटीमध्ये करण्यात आला. प्रयोगादरम्यान एका सेकंदाच्या शंभर ट्रिलीलनव्या भागापेक्षा कमी काळ टिकणाऱ्या एका क्षणात २.०५ मेगाज्यूल ऊर्जा म्हणजे अंदाजे एक पौंड टीएनटीच्या समतुल्य ऊर्जेचा हायड्रोजनवर भडीमार करण्यात आला. त्यामुळे न्यूट्रॉन कणांचा पूर आल्यासारखी स्थिती झाली. हा फ्युजनचा परिणाम होता. त्यातून सुमारे ३.१५ मेगाज्यूल ऊर्जा बाहेर पडली. म्हणजे १.१ मेगाज्यूल उर्जा वाढली. मानवाने आतापर्यंत सामना केलेल्या अत्यंत अवघड वैज्ञानिक आव्हानांपैकी हे एक आव्हान होते अशी प्रतिक्रिया या प्रयोगशाळेचे संचालक किम बुदिल यांनी दिली आहे. हे अत्यंत उल्लेखनीय यश असून राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि स्वच्छ उर्जेसाठी याचा निश्चितपणे फायदा होईल असे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने म्हटले आहे.
या प्रयोगामध्ये केंद्रस्थानी एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन असणारे हायड्रोजनचे समस्थानिक ( isotopes ) ड्यूटेरियम, हे केंद्रस्थानी एक प्रोटॉन व दोन न्यूट्रॉन असणाऱ्या ट्रिटीयम या हायड्रोजनच्या दुसऱ्या समस्थानिकाशी सांधण्यात (fusion) आले. या क्रियेमुळे केंद्रस्थानी दोन प्रोटॉन्स व दोन न्यूट्रॉन्स असणारे हेलियम हे दुसरे मूलद्रव्य तयार झाले. तयार झालेल्या हेलियमचे वस्तुमान हे ड्यूटेरियम व ट्रीटीयम यांच्या संयुक्त वस्तुमानापेक्षा कमी भरले. उर्वरित वस्तुमान ऊर्जेच्या स्वरूपात परिवर्तित झाले. ही मुक्त झालेली ऊर्जा अणू संमिलन घडवून आणण्यासाठी वापरण्यात आलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त होती. LLNL प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी १९२ अति शक्तिशाली लेसर्सचा रोख हायड्रोजन समस्थानिकांनी भरलेल्या अंगठ्याएवढ्या आकाराच्या कुपीच्या दिशेने करत त्यांचा मारा केला व प्रयोग सिद्ध केला. सूर्य व इतर तार्यांमध्ये न्युक्लिअर फ्युजन द्वाराच ऊर्जेची निर्मिती केली जाते. हलके हायड्रोजन अणू एकत्र येऊन हेलियम हे मूलद्रव्य तयार होते. या प्रक्रियेत प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपात अफाट ऊर्जा बाहेर पडते.
अमर्यादित ऊर्जा निर्मितीसाठीच्या प्रयोगातले हे पहिले यश आहे. या ऊर्जेची औद्योगिक पातळीवर निर्मिती करून त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्यासाठी अद्याप बराच पल्ला गाठावा लागणार आहे, असे एल.एल.एन.एल.या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे.
☆ एक अनुकरणीय विचार… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
संबंध जोडणं ही एक कला आहे… परंतु संबंध टिकवणं मात्र एक साधना आहे.
आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोघांनाच माहीत असते… एक “परमात्मा” आणि दुसरा आपला “अंतरआत्मा”
विहिरीचे पाणी सर्व पिकांसाठी सारखेच असते तरी पण कारलं कडू, ऊस गोड तर, चिंच आंबट होते.
लक्षात ठेवा हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे. फक्त दोष आपल्या कर्माचा असतो…
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूसच पैसे कमावतो, तरी पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही. आणि आश्चर्यकारक गोष्ट अशी की माणूस पैसे कमवूनही त्याचे पोट मात्र कधीच भरत नाही..?
चांगल्या माणसांची कधीही परीक्षा घेऊ नका… कारण ते पाऱ्यासारखे असतात.. म्हणूनच जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात तर नाहीच. पण निसटून मात्र शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात..
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नवीन घरं लावतांना अनेक जुन्या गोष्टी बाद करुन त्याची जागा नवीन वस्तू घेतात. काही वेळी खरोखरच जुन्या वस्तू ह्या बाद झाल्याच्या सिमारेषेवरच असतात फक्त आपल्या भावना त्यात अडकल्याने त्या अजून हद्दपार झालेल्या नसतात.
परंतु आपल्या वस्तुंबाबत त्याच भावना नेक्स्ट जनरेशन वा दुसऱ्या व्यक्तीच्या नसल्याने त्या वस्तू बदलायला आपण सोडून बाकी सगळे जणू सरसावून तयारच असतात.
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये “शू रँक” बदलायची ठरली. आजकाल संपूर्णपणे झाकल्या जातील अशा ” शू रँक ” आँनलाईन पण भरपूर मिळतात. पूर्वी अगदी छोटासा चप्पलस्टँड सहज पुरून जायचा. कारण सहसा घरी जितकी मंडळी तितके चपलांचे जोड असं साधं सोप्प समीकरण होतं.
आता मात्र सगऴ गणित, समीकरण जणू पालटूनच गेलयं. एकाच व्यक्तीचे किमान चार पाच जोडं हे पादत्राणांचे असतातच असतात. अर्थातच हे सरासरी गणित हं. बाहेर घालायच्या चप्पल,वाँकसाठी सँडल्स वा शूज, घरात घालायच्या स्लीपर्स, आणि एखादा नवाकोरा एक्स्ट्रा जोड.असो. काळ खूप बदललायं हे खरं. आपल्या दोन पिढ्या आधी सरसकट सर्वांना कायम चप्पल मिळायच्याच असं नाही. बराच काळ ते अनवाणी काढायचे.आता अनवाणी हा शब्द कुणाच्याही डिक्शनरीतच नाही. आपल्या आधीच्या पिढीला एक जोड मिळायचा तो वर्षभर म्हणा वा अगदी झिजून झिजून तुटेपर्यंत वापरावा लागायचा.आपल्या पिढीला एक नेहमीचा आणि एक एक्स्ट्रा जोड मिळायचा शिवाय हरवल्या तर मार न बसता नुसती शाब्दिक बोलणी खावी लागायची. आताच्या पिढीला तर काही बोलूच नये.त्यांच्या पादत्राणांचा स्टाँक बघितला तर आपले फक्त डोळे विस्फारल्या जातात, शब्द मात्र फुटत नाही. असो.
ह्या चप्पल वरुन आठवलं, “चप्पल”नावाची एक मस्त मराठी शाँर्टफिल्म मी नुकतीच बघितली. फिल्म बघतांना आपोआपच डोळे पाणवतात हेच त्या फिल्मचे यश. सोबत लिंक देतेयं.वेळ मिळाल्यास बघून घ्या. ह्या फिल्ममध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. शेवटी माणसं,नाती हीच आपली खरी इस्टेट. त्यांना जपलं,त्यांच मनं ओळखलं, त्यांच्यासाठी जे काही आपण करु त्याच्या दुप्पट कधी ना कधी आपल्याकडे रिबाँड येईलच.
☆ ‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆
आमचा सुहृद मित्र कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा “श्रीकांत, तळवलकर ट्रस्टच्या “अनुकरणीय उद्योजक” पारितोषिकासाठी तू ‘ मन्मन ‘च्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा त्यांना भेट. मन्मन उद्योग सदाशिव पेठेत मुलांच्या भावेस्कूल समोर आहे. तुला फार लांब नाही. फार वेगळे गृहस्थ आहेत. बघ एकदा त्यांच्याशी बोल आणि तुला योग्य वाटले तरच पारितोषिकासाठी विचार कर.” माझ्या डोक्यात अनेक नावे असत, त्यामुळे गोखल्यांचे नाव मागे पडत गेले. यंदा परत दिलीपने आठवण करून दिली आणि आग्रह देखील केला. तु गोखल्यांना एकदा भेटच तुमचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध नक्की संपेल. फार अफलातून गृहस्थ आहेत. मी ठरवले, जाऊयात एकदा हा एव्हडा म्हणतोय तर. खरं म्हणजे सदाशिव पेठेत असा काही उद्योग असेल असे मनाला पटत नव्हते आणि असलाच तर असून असून किती मोठा असेल? असा प्रश्न मला उगीचच पडत होता. कदाचित म्हणूनच माझे पाय तिकडे वळत नव्हते. पण शेवटी मी ठरवले गोखल्यांना भेटायचे. दिलीपला विचारले तुझी ओळख देऊ का? तर दिलीप म्हणाला छे छे मी त्यांना १०-१२ वर्षांपूर्वी भेटलोय ते मला आता ओळखणार देखील नाहीत. शेवटी मी, अरुण नित्सुरे आणि अजय मोघे मन्मनच्या ऑफिसमध्ये धडकलो. स्वागतिकेला गोखल्यांना भेटायचे आहे म्हणून सांगितले. माझे कार्ड दिले. तिने कार्ड आत नेऊन दिले आणि १० मिनिटात बोलावतील असे सांगितले. आम्ही रिसेप्शनमध्ये वाट पहात बसलो. तेव्हड्यात एक कुरियरवाला आला. त्याने पार्सल स्वागतिकेकडे दिले. बिल दिले आणि निघाला. तोच तिने त्याला परत बोलावले आणि Octroi रिसीट विचारली. तो म्हणाला, “ Octroi भरला नाही, मटेरियल तसंच आणलंय. पण मॅडम octroi भरला नाही म्हणून पैसे पण घेतले नाहीत.” आणि तो वळून जाऊ लागला. रिसेप्शनिस्टने त्याला जरबेने बोलवून घेतले आणि सुनावले, “ हे बघा, octroi भरला नसेल तर ते पार्सल परत घेऊन जा. मी पाठवणाऱ्या कंपनीला कळवते की ह्या कुरियरने परत पार्सल पाठवू नका. हे घेऊन जा आणि octroi भरून आणा.” कुरियरवाल्याला हे नवीन होते. तो बाईंना पटवू लागला, “ बाई, तुमचं काहीतरी वेगळंच. आता मी कुठे भरू octroi? घ्या ना यावेळी. पुढे बघू.”
“ हे बघा हे चालायचं नाही. मी आत्ताच फोन करते त्यांना ” आणि फोन लावला देखील.
शेवटी होय नाही म्हणता कुरियर ते पार्सल परत घेऊन गेला. बाईंनी पार्सल पाठवणाऱ्या सप्लायारला याची खबर दिली व असे परत होणार नाही याची तंबी दिली. पार्सल परत देताना ‘ मन्मन ‘मधल्या कोणी ते मागवले होते? वेळेत न मिळाल्याने व्यवसायावर काय परिणाम होईल? याचा विचार न करता ते परत पाठवले.
मी हे सर्व बघत होतो. गोखल्यांच्या कंपनीचे एथिकल वेगळेपण इथेच बघायला मिळाले. मला गोखल्यांचे आत बोलावणे आले आणि स्वागतिकेने स्वत: मला त्यांच्या केबिनपर्यंत सोडले. आत मनोहर गोखल्यांचे दर्शन झाले. वय साधारण सत्तरच्या आसपास, कोकणस्थी गोरेपण आणि चेहऱ्यावर सात्विक शांत भाव असलेले गोखले प्रथम दर्शनीच आवडले. रिसेप्शनिस्टने octroi न भरल्याने पार्सल परत पाठवल्याचे गोखल्यांच्या कानावर घातले. ‘उत्तम केलेस’, असे बाईंचे कौतुक केले आणि माझ्याकडे बघून स्माईल केले व मला बसण्याची खूण केली. मी माझा येण्याचा उद्देश सांगितला की, “आम्ही तुमच्याविषयी खूप ऐकले आहे. एक उत्सुकता म्हणून आपण काय करता हे जाणून घेण्यास आलोय.” त्यांना माझी ओळख सांगितली. असे काही कुणी उत्सुकतेपोटी येईल अशी त्यांना कल्पना नसल्याने आश्चर्य मिश्रित कौतुकाने मला म्हणाले, “ बोला काय माहिती हवी.”
“ हेच की आपण काय करता? प्रॉडक्ट काय? ”
“आम्ही मेडिकल सर्जरीसाठी लागणारी सामग्री बनवतो.” असे म्हणून त्यांनी त्यांचा एक प्रॉडक्ट कॅटलॉग समोर ठेवला. मी इंजिनीअर असल्याने मला फारसे आकलन झाले नाही. पण त्यांनीच हा प्रश्न सोडवला आणि त्यांनी सुरुवात केली.
“आम्ही orthopedic सर्जरीपासून मेंदूच्या सर्जरीपर्यंत लागणारी सर्व प्रकारची शल्य उपकरणे बनवतो, ज्यामुळे डॉक्टरला शल्यक्रिया करणे सुकर जाते. आम्ही १००-१२५ प्रकारची शल्य उपकरणे बनवतो. देशात तसेच परदेशात देखील वितरीत करतो.” एकंदर मला जे कळले त्यावरून जशी कारखान्यात आपण वेगवेगळ्या प्रकारची टूल्स वापरतो तशीच टूल्स एखाद्या सर्जनला ऑपरेशनकरता वापरावी लागतात. एखादे मशीन दुरुस्त करताना ठराविक वेळेत दुरुस्त व्हावे असे इंजिनीअरला बंधन नसते. आज काम अपुरे राहिले तर उद्या करू, आहे काय अन नाही काय. पण माणसाचे हृदय, किडनी अथवा मेंदूची दुरुस्ती करताना, वेळ अतिशय काटेकोरपणे वापरावा लागतो. आज दुरुस्ती झाली नाही – रुग्णाला तसेच ठेऊन उद्या उरलेली करू, असे चालत नाही. हा महत्वाचा फरक माणूस आणि मशीन दुरुस्त करण्यातला आहे. तसाच इंजिनियर आणि सर्जन यामधला आहे. त्यामुळे शल्यक्रियेची अशी उपकरणे बनवताना अजून एक महत्वाची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे, त्या आयुधामुळे रुग्णास कोणतीही इजा होता कामा नये. एकंदर लक्षात आले की, गोखलेसाहेब आपल्या आकलना आणि आवाक्याच्या पलीकडचे काम करतायत.
“ तुम्ही इकडे कसे वळलात? ” असे मी विचारले
“ अहो त्याची मोठी गम्मतच झाली.” श्रोते मिळाल्यामुळे गोखलेसाहेब रंगात आले होते.
“२० वर्षांपूर्वी माझा भाऊ ससूनमध्ये न्युरो सर्जन होता. तो एकदा म्हणाला ‘ अरे मला मेंदूचे ऑपरेशन करताना कवटीतून मेंदू मोकळा करून, कवटी डाव्या हाताने धरून शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे शस्त्रक्रियेस वेळ लागतो आणि आपले काहीतरी चुकले तर? ही मोठी भीती वाटत रहाते. तर तू अशी काही वस्तू कर की ती कवटी अलगद पकडून ठेवेल आणि माझे दोन्ही हात शल्यक्रियेस मोकळे राहतील, जेणेकरून मला नीट काम करता येईल आणि वेळ कमी लागेल. परदेशात अशी उपकरणे मिळतात पण ती फार महाग असतात आणि त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्चही वाढतो आणि तो रुग्णास परवडत नाही.’ मी म्हटले मला तू ऑपरेशन करताना एकदा बघावे लागेल.”
☆ दगडांना बोलतं करणारा माणूस ! – लेखक : श्री अभिजित घोरपडे ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆
वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सासवडजवळ काहीतरी वेगळं पाहण्यासाठी चाललो होतो. आम्ही दोघेच होतो. मी आणिडॉ. शरद राजगुरू. पुण्यावरून मोटारसायकलवरून निघालो. दिवे घाट चढून माथ्यावर पोहोचलो. तसेच पुढे सासवड गाठले. या ऐतिहासिक गावाला वळसा घातला आणि पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याच्या दिशेने निघालो. तिथले प्रसिद्ध संगमेश्वर आणि त्यानंतर वटेश्वर ही मंदिरे ओलांडली. पुरंदरच्या रस्त्याने जात असताना डाव्या बाजूला कोरडं पात्र असलेला एक ओढा समांतर जात होता. काही अंतर गेल्यावर सरांनी थांबायला सांगितले आणि ते ओढ्यात उतरण्यासाठी वाट शोधू लागले.
त्या वाटेने काही अंतर गेल्यावर त्यांनी एक दगड उचलला. तो पाहून त्यांचा चेहरा उजळला आणि मलासुद्धा ते काहीतरी वेगळे असल्याचे जाणवले. ‘हा जांभा आहे…’ राजगुरू सरांचे शब्द. ते पाहून मी अतिशय रोमांचित झालो. कारण आतापर्यंत जांभा खडकाचा संबंध किनारपट्टीवरील कोकण आणि धो धो पाऊस पडणाऱ्या घाटमाथ्यांशीच लावला जात होता. त्यामुळे माझ्या मनात स्वाभाविक प्रश्न होता- जांभा इथं कसा?
तो दगड जाता-येता कदाचित कोणी टाकून दिलेला होता का?… तसेही नव्हते. कारण त्या ओढ्याच्या पात्रात आतमध्ये घट्ट रोवून बसलेले काही गोटे सापडले. ते सुद्धा गोल गरगरीत आणि गुळगुळीत. याचा अर्थ ते त्या ओढ्याच्या पात्राचा भाग होते. वरच्या बाजूला कुठेतरी त्यांचा मूळ स्रोत होता आणि ते तिथून निघून पाण्यासोबत वाहत वाहत इथवर पोहोचले होते. पण या ओढ्याचा उगम फार दूरवर नव्हतो, तर तो पुरंदर किल्ल्याच्या जवळपासच होता. म्हणजे त्या परिसरातच जांभा खडक तयार झाला होता. या खडकाची निर्मिती होण्यासाठी भरपूर काळ धो धो पाऊस पडावा लागतो. पण ज्या परिसरात आता हा जांभा सापडला, तो तर कोरड्या हवामानाचा भाग आहे. याचाच अर्थ पूर्वी त्या भागात भरपूर पावसाचे आर्द्र हवामान होते… राजगुरू सरांकडून हे समजून घेणं हे अतिशय आनंददायी असे. कारण त्यांच्या बोलण्यात, समजावण्यात, वावरण्यात कमालीचा साधेपणा असे. म्हणूनच मोठ्या अभ्यासकापासून ते विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणूससुद्धा त्यांच्याशी सहजपणे जोडला जाईल.
त्यांच्यासोबत जांभा पाहिला, तशी वीस-पंचवीसच वर्षांपूर्वी कऱ्हेच्या पात्रातील ज्वालामुखीची राख पाहिली. दिवे घाटाच्या माथ्यावर सापडणारी आदिमानवाने तयार केलेली छोटी-छोटी दगडी हत्यारं (सूक्ष्मास्त्र / Microliths) पाहिली. त्यांचा अर्थ समजून घेतला… असा हा खडकांना बोलायला लावणारा, त्यांचा अर्थ शोधणारा आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणारा माणूस!
त्यांचे वेगळेपण म्हणजे, त्यांनी भूविज्ञान (Geology) आणि पुरातत्त्वविज्ञान (Archaeology) या दोन विषयांची उत्तम सांगड घातली. त्यामुळेच भूविज्ञानातील काही गोष्टी वापरून पुरातत्त्वविज्ञानातील काही घटनांचा अर्थ लावला किंवा उलटे सुद्धा! याचे उदाहरण म्हणजे आपल्याकडे मोरगाव आणि बोरी या ठिकाणी नद्यांच्या पात्रात सापडणारी इंडोनेशियामधील ज्वालामुखीची राख (Tephra). ही राख इथे कधी येऊन पडली याची कालनिश्चिती करण्यासाठी या थराच्या खाली सापडलेल्या दगडी हत्यारांचा उपयोग झाला. हे करणाऱ्या टीमध्ये राजगुरू सरांचा प्रमुख वाटा होता. अशी अनेक उदाहरणे आहेत.
सरांनी वयाची ऐंशी ओलांडली तरी त्यांचा उत्साह प्रचंड होता. कोणतीही नवी गोष्ट पाहिली, त्याबाबत ऐकले किंवा काही वाचले तरी ते समजून घेण्याचे कुतूहल एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे असे. कोविडच्या काळात बाहेर पडणे कमी झाले, अन्यथा ते फिल्डवर जाण्यासाठी सदैव तत्पर असत. गेल्याच महिन्यात त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. त्या वेळी शंभरी गाठणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ती पूर्ण झाली नाही. काल सायंकाळी त्यांचे निधन झाले.
योगायोग असा की दगडांची भाषा ऐकवणारी आणि त्यांचा अर्थ लावणारी #Wonders_of_Geology# ही तीन दिवसांची इको-टूर ‘भवताल’च्या वतीने उद्यापासून सुरू होत आहे. ज्यांच्यामुळे खूप पूर्वी कधीतरी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे बीज मनात पेरले गेले, त्यापैकी एक म्हणजे डॉ. शरद राजगुरू. त्यामुळे त्यांचे आता जाणे ही अतिशय दु:खद बाब.
त्यांना व्यक्तिश: तसेच, “#भवताल” तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
लेखक : श्री अभिजित घोरपडे
संग्रहिका : सुश्री हेमा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
९२ वर्षांचे गुरुवर्य पंडित वसंतराव घोटकर हे वृद्धापकाळातील आजारामुळे कोमामध्ये होते. दहा एक दिवस वाट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे पुत्र विवेक घोटकर यास सांगितले की गुरुजी आता काही तासांचेच पाहुणे आहेत, तेव्हा सर्व कुटुंबाला एकदा बघून जायला सांगा. हे कळताच दुसऱ्याच दिवशी गुरुजींचा पट्टशिष्य प्रकाश वाडेकर त्यांना भेटायला आला आणि त्यांच्या पायाजवळ बसून त्यांना “गुरुजी गुरुजी” अशी हाक मारु लागला. पण गुरुजी काही केल्या ओ देईनात. सुमारे अर्धा तास असाच गेला शेवटी प्रकाश म्हणाला की “ दादा मला तबला दे. मी गुरुजींच्या पायाजवळ बसून शेवटचा तबला वाजवतो, तेव्हडाच मला आशीर्वाद मिळेल. “ प्रकाशने असे म्हणताच विवेकदादाचा मुलगा शुभम हा तबला घेऊन आला, आणि प्रकाश गुरूजींच्या पायाजवळ बसून तबला वाजवू लागला. त्यांनी दिलेल्या वेगवेगळया चीज़ा एकानंतर एक वाजवू लागला आणि पाहतो काय?— गेल्या दहा दिवसांपासून बेशुद्धावस्थेत मौन असलेले गुरुजी हळुवारपणे पुटपुटले— ” कोण? प्रकाश? ” हे ऐकताच घरातील सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. सगळे जण आश्चर्यचकित होऊन तो चमत्कार पाहू लागले आणि आता गुरुजी फक्त उठलेच नव्हते, तर मृत्युशय्येवर असून सुद्धा चक्क तबला शिकवू लागले होते. सांगत होते, चुका दुरुस्त करत होते, आणि वाजवून सुद्धा दाखवत होते. आणि असेच जवळपास दहा – पंधरा मिनिटे शिकवून ते पुन्हा झोपी गेले ते सरळ पंचतत्वात विलीन होण्यासाठी – ईश्वराच्या चरणी जाण्यासाठी.
ही माहिती, सरस्वतीची उपासना काय असते? गुरु कसे असावे? भारताची गुरु-शिष्य परंपरा काय आहे? गुरु शिष्यांची श्रद्धा आणि प्रेम काय असते? याबद्दल बरंच काही सांगून जाते .
संग्रहिका : शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
हुश्श! स्वामी विवेकानंद यांना स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरो शी केलेला व्याख्यानांचा करार आता संपला होता. तरीही त्यांची व्याख्याने सतत होत होती आणि अनेकजण त्यांच्या विचारांकडे आकृष्ट होत होते. ही संख्या वाढतच होती. त्यामुळे यातून आपले खरे अंतरंगशिष्य त्यांना शोधायचे होते. तिथल्या सामाजिक कामाची पाहणी केल्यावर त्यांना आपल्या कामासाठी संघटना किंवा संस्था उभी करावी हे मनोमन पटले होतेच. असे त्यांनी एकदा मिसेस लायन यांना बोलून दाखवले होते. म्हणजेच त्यांच्या मनात अशी संघटना कोणाची करायची? त्याचे उद्दिष्ट्य काय असेल? कार्यपद्धती कशी असेल याचे विचारमंथन सुरू होते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, शब्दात आणि मनात देशभक्तीच होती.त्यांचे ध्येय फार मोठे होते. त्यांना भारताचे पुनरुत्थान घडवायचे होते. हे घडवून आणण्यासाठी आत्म्याला जाग आणणे महत्वाचे होते,ती जाग आणण्यासाठी चे अध्यात्म ज्ञान आवश्यक आणि त्यांच्या दृष्टीने हे अध्यात्म ज्ञान फक्त भारतच सार्या जगाला देऊ शकत होता.म्हणून ही जाग सर्वांमध्ये निर्माण करणे हेच स्वामीजींचे ध्येय होते.
तिथे अमेरिकेत त्यांच्या व्याख्यानांशिवाय असे काही प्रसंगही घडत होते घटना घडत होत्या.
एकदा घडलेली घटना आहे. अमेरिकेत श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्या तुलनेत स्वामीजी कृष्णवर्णीय वाटत असत. एका गावात ते स्थानकावर उतरले आणि त्यावेळी काही समिति सदस्य त्यांना घ्यायला आले होते. हे तिथल्या एका निग्रोने पाहिले. त्याच्या दृष्टीने हा माणूस आपल्यापैकी एक कृष्णवर्णीयच होता.मग आपल्या पैकी एका बांधवाचा गौरवर्णीय लोक एव्हढा आदर करताहेत हे पाहून तो मोहरून गेला. तो खर तर एक हमाल होता. तो स्वामीजींजवळ येऊन म्हणाला, “मला तुमच्याशी हस्तांदोलन करण्याची ईच्छा आहे. मी भारतीय आहे असे काहीही न सांगता स्वामीजींनी त्याचा हात प्रेमभराने हातात घेतला आणि त्याला म्हणाले, “ धन्यवाद माझे बंधो, धन्यवाद! तो निग्रो खूप भारावून गेला होता. स्वत:चे देशबांधव प्रेम आणि अखिल मानवजातीचे वाटणारे प्रेम एकाच ठिकाणी ? तर या उलट काही ठिकाणी स्वामीजींना निग्रो समजून केशकर्तनालयात बाहेर काढून अपमान केल्याचाही प्रसंग घडला.
अमेरिकेत आता स्वामीजींना न्यूयॉर्क मध्ये जाण्याचे आमंत्रण मिळाले होते. तत्वज्ञानाच्या अभ्यासात गोडी असणार्या काही जणांचा हा गट होता, त्यांनी बोलवले होते.त्यात डॉ.एगबर्ट ग्युएर्न्सि,मिसेस स्मिथ,मिस हेलन गौल्ड हे लोक होते, ग्युएर्न्सि यांच्या कडे स्वामीजी राहायला होते. हेल आणि बॅगले यांच्या प्रमाणेच ग्युएर्न्सि पतिपत्नी यांचे स्वामीजींशी घरगुती संबंध तयार झाले.ग्युएर्न्सि व्यवसायाने डॉक्टर होते. लेखक, नियतकालिकाचे संपादक होते. ब्रुकलीन डेली टाईम्स आणि न्यू यॉर्क मेडिकल न्यूज टाईम्स याचे संस्थापक पण होते. वय एक्काहत्तर ,विवेकानंदां च्याच वयाचा त्यांचा तरुण मुलगा नुकताच स्वर्गवासी झालेला. त्या धक्क्यातून ते अद्याप सावरले नव्हतेच,मिस गौल्ड सुद्धा अफाट श्रीमंत होत्या त्यांच्याकडेही स्वामीजी राहण्यास गेले. अशा या न्यूयॉर्कच्या मुक्कामात त्यांचा अनेक मोठमोठ्या लोकांशी सबंध येत होता. बोलवले की जात व्याख्याने देत, भेटत, चर्चा करत. शिवाय तिथल्या महत्वाच्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. सहा-सात दिवस भुररर्कन निघून गेले, आता ते बोस्टनला आले होते. तिथे अठवडाभरात महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समोर विचार व्यक्त केले, त्यावेळी मार्था ब्राऊन फिंके महाविद्यालयात शिकत होती. तिथे पहिल्यांदा विवेकानंद यांना तिने पहिले. विचार समजण्याचे वय नव्हते पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव आपल्यावर पडला असे तिने आठवणीत लिहून ठेवले आहे. एव्हढे श्रेष्ठ असूनही ते आम्हा विद्यार्थ्यात मिळून मिसळून वागले हे तिला विशेष वाटले होते. पुन्हा न्यूयॉर्क, परत बोस्टन व जवळपास फिरणे चालू होते.
प्रा राइट यांच्या निमंत्रणावरून स्वामीजी बोस्टनला पुन्हा आले होते. हार्वर्ड आणि बोस्टन इथे त्यांची व्याख्याने झाली होती. इथे बोस्टनला मिसेस ओली बुल यांची पहिली भेट झाली होती. ज्या पुढील कार्यात सहभागी झाल्या आहेत.तसेच इथे त्यांना कर्नल थॉमस वेंटवर्थ हिगिनसन्स जे सर्वधर्म परिषदेत पण भेटले होते ते भेटले. विमेन्स क्लब मध्ये मिसेस ज्युलिया वॉर्ड होवे यांनी स्वामीजींचे व्याख्यान ठेवले होते. त्याही भेटल्या. असे दौरे चालू होते स्वामीजी फार थकून गेले. नंतर हेल यांच्या कडे ते विश्रांतीसाठी थांबले.
इझाबेला मॅककिंडले हिने स्वामीजींना भारतातून आलेला सर्व पत्रव्यवहार पाठवला. यात होती भारतात झालेली वृत्तपत्रीय प्रसिद्धीची कात्रणे .काहींमध्ये अमेरिकेतला गौरव होता. ते ठीक होते , पण भारतात आपल्याबद्दल जो विरोधी प्रचार चालला होता त्याचीही कात्रणे त्यात होती.ती वाचून स्वामी विवेकानंद यांना फार फार वाईट वाटले. त्यांनी इझाबेलाला कळवले की, “माझ्याविषयी माझ्याच देशातील लोक काय म्हणतील याची मी फार फिकीर करीत नाही. पण एक गोष्ट मात्र आहे की, माझी आई वृद्ध आहे, सार्या आयुष्यभर तिने कष्ट उपसले आहेत.असे सारे असूनही जिच्या सार्या अशा ज्याच्यावर केन्द्रित झाल्या होत्या असा आपला मुलगा ईश्वराच्या आणि मानवाच्या सेवेसाठी देऊन टाकण्याचा भार तिने सहन केला. पण मजूमदार कलकत्त्यात सर्वत्र सांगत आहेत, त्याप्रमाणे दूर परदेशात कोठेतरी गेलेला हा आपला मुलगा तेथे पशुसारखे जीवन घालवत आहे ,अनीतिमान झाला आहे, हे जर का तिच्या कानावर गेलं,तर त्या धक्क्याने ती प्राण सोडेल, पण परमेश्वर दयाघन आहे. त्याच्या मुलांना कोणीही अपाय करू शकत नाही”. हे प्रतापचंद्र मजूमदार यांचे कलकत्त्यातले प्रताप वाचून स्वामीजी, आईच्या आठवणीने बेचैन झाले. खरे तर ते स्वत: शांतपणे या सर्वांना अजूनही तोंड देत होते.
प्रतापचंद्र मजुमदार कलकत्त्यात आपल्याबद्दल एव्हढे भयानक सांगत आहेत . या वृत्तपत्राचे संपादक मजुमदारांचा चुलत भाऊ आहे.ज्याने याआधी आपले एव्हढे कौतुक केले ते आता?
याचा पहिला धक्का स्वामीजींना परिषदेच्या वेळी बसला होताच . ज्या प्रतापचंद्र मजुमदारांनी ब्राहमो समाजात उपासना संगीत गाणारा नरेंद्र पाहिला होता ,एव्हढ्या लांबच्या देशात त्यांना नरेंद्र पुन्हा भेटल्यानंतर आपल्याला जणू घरातले वडीलधारी भेटल्याचा आनंद नरेंदला झाला होता पण घडलं होतं उलटच . पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते नरेंद्रशी अगत्याने बोलले होते.पण जेंव्हा सर्व माणसे प्रचंड संख्येने नरेंद्र भोवती गोळा होऊ लागली तसतसे मजुमदार यांना मत्सर वाटू लागला ,परिषदेतल्या मिशनर्यांजवळ त्यांनी स्वामीजींची निंदा करणं सुरू केलं. नरेंद्र हा तसा कोणीच नाही तो एक लुच्चा आणि ठक आहे येथे येऊन संन्यासी असल्याचे ढोंग करीत आहे. असे सांगून त्यांची माने कलुषित केली.त्यात ते यशस्वी झाले. या सगळ्यावर मात करून स्वामीजी पुढे निघून गेले होते.
विवेकानंद यांचे विचार, त्यांचे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व यामुळे तिथले सगळेजण भारले गेले होते तसे , मत्सराची दुसरी वाईट बाजुही त्याला होती. विरुद्ध प्रचार. आता मात्र विवेकानंद यांनी या वृत्तपत्रांकडे लक्षच द्यायचे नाही असे ठरवले होते.काहीही छापून आल तर ते मनावर घेत नसत. त्यातून आता भारतात सुद्धा हा अपप्रचार चालू आहे आणि हे सर्व प्रतापचंद्र करीत आहेत हे कळल्यापासून तर त्यांना खरे विश्वासच बसत नव्हता. प्रतापचंद्र या पातळीला जातील हे स्वप्नातही वाटले नाही. खेटरीचे राजेसाहेब आपल्या पाठीशी उभे आहेत म्हणून आपण निश्चिंत पाने इथे आलो. पण आता? आपण दूर्वर्तनी आहोत शिलभ्रष्ट आहोत असे प्रतापचंद्र सर्वत्र सांगत आहेत. हे ऐकून आपल्या आईला काय वाटेल? ही वेदना त्यांना सतावत होती.
मत्सर भावनेतून चक्क चारित्र्य हनन सुरू होते. सुरूवातीला फक्त विरोध मग विरोधाचे तीव्र स्वरूप, मग प्रचार आणि किर्ति जशीजशी वाढली तशी विरोधासाठी पद्धतशीर मोहिमच सुरू झाली होती.मग सुरू झाला छुपा खोटा प्रचार. विवेकानंद यांचे चारित्र्य शुद्ध नाही. ते तरुण सुंदर मुलींना फूस लावून आपल्या जाळ्यात ओढतात वगैरे सांगू लागले. यात मिशनरी, ब्राह्मसमाजी आणि थिओसोफिस्ट आघाडीवर होते. हे अमेरिकेत सुरू होते पण प्रतापचंद्र भारतात काही दिवसांनी परत आल्यावर भारतात सुद्धा ही मोहीम त्यांनी सुरू ठेवली होती. ब्राह्म समजाच्या मुखपत्रात विवेकानंद यांच्या विरोधात लेख येत असत. इतर नियतकालिकात सुद्धा असे लेख येत होते आणि हे सर्व लेख अमेरिकेत पाठवले जात, तिथेही ते प्रसिद्ध करत.अशा प्रकारे मत्सराचा अग्नि पेटला होता.