मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 65 – याची देही याची डोळा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 65 – याची देही याची डोळा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

भारतभूमीवर पाऊल ठेवले आणि स्वामीजींचे स्वागत सोहोळे व स्वामीजींना भेटायला ,पाहायला येणार्‍यांची ही गर्दी या वातावरणाने सारा प्रदेश भारून गेला होता. २७ जानेवारीला स्वामीजी जाफन्याहून पांबन येथे आले. ते रामनाद संस्थानमध्ये उतरले. संस्थांनचे राजे भास्कर सेतुपती स्वत: स्वामीजींना सन्मानपूर्वक घेऊन आले.आल्या आल्याच स्वामीजींना त्यांनी व सर्व अधिकार्‍यानी साष्टांग नमस्कार केला. खास शामियान्यात औपचारिक स्वागत झालं.विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेला शिकागोला जावे म्हणून प्रयत्न करणार्‍यात राजे भास्कर सेतुपती होते. स्वागत समारंभा ठिकाणी घोडा गाडीने नेण्यात येत असताना लगेचच गाडीचे घोडे काढून लोकांनी स्वता ती गाडी ओढली आणि एव्हढेच काय स्वता राजे सुधा गाडी ओढण्यात सहभागी झाले होते स्वामीजीं बद्दल एव्हढा आदर सर्वांनी दाखवला. एका संस्थांनाचा अधिपति एका संन्याश्याची गाडी ओढत होता हे दृश्य प्राचीन परंपरेची आठवण करून देत होते.

पांबन नंतर ते रामेश्वरला गेले. स्वामीजी स्वागताला उत्तर देण्यासाठी भाषणकर्ते झाले. त्यांच्या इंग्रजी भाषणाचे तमिळ भाषेत रूपांतर करून सांगण्यात येत होते. सर्वश्रेष्ठ धर्मपुरुषाचा सन्मान मंदिरातील पुजारी व व्यवस्थापक यांनी केला. सजवलेले ऊंट, हत्ती, घोडे असलेली मिरवणूक काढून रामेश्वर मंदिरापर्यन्त नेण्यात आली. इथल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “केवळ मूर्तिपूजा करण्यापेक्षा दरिद्री माणसाला दोन घास अन्न आणि अंग झाकण्यासाठी वस्त्र देणे हाच खरा धर्म आहे”.

रामेश्वर नंतर रामनाद च्या सीमेवर जोरदार स्वागत करण्यात आले. स्वामीजींच्या आगमनार्थ तोफांची सलामीदिली, भुईनळे आतषबाजी केली, हर हर महादेव च्या प्रचंड घोषणा देण्यात आल्या. रामनाद चे राजे स्वता स्वामीजींच्या गाडी समोर पायी चालत होते, पुढे पुढे तर स्वामीजींना घोडागाडीतून ऊतरवून, सजवलेल्या पालखीत बसविण्यात आले, भाषणे झाली, नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या करंडकातून स्वामिजिना मानपत्र अर्पण केले गेले. सत्कारादाखल उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, “प्रदीर्घ कालावधीची रात्र संपत आहे, अत्यंत क्लेशकारक दु:ख मावळू लागले आहे, मृतप्राय वाटणार्‍या शरीरात नवी चेतना जागी होत आहे, जाग्या होणार्‍या या भारताला आता कोणी रोखू शकणार नाही, तो पुन्हा निद्रित होणार नाही, बाहेरची कोणतीही शक्ति त्याला मागे खेचू शकणार नाही. अमर्याद सामर्थ्य असणारी ही भारतभूमी आपल्या पायांवर ताठ उभी राहत आहे”. केवळ या सुरुवातीच्या स्वागतासाठी उत्साहाने जमलेल्या स्वदेशातील बांधवांकडे बघून स्वामीजींना एव्हढा विश्वास वाटला होता. आणि आपला देश आता पुढे स्वत:च्या बळावर ताठपणे उभा राहील अशी खात्री त्यांना वाटली होती. एका निष्कांचन संन्याशाचा उत्स्फूर्तपणे होणारा गौरव ही स्वामीजींच्या जगातील कामाची पावती होती.

रामनाद सोडल्यानंतर स्वामी विवेकानंद मद्रासच्या दिशेने रवाना झाले. आतापर्यंत छोट्या छोट्या शहरात व गावातील उत्साह आणि आनंद एव्हढा होता, आता तर मद्रास सारख्या मोठ्या शहरात मोठ्या लोकवस्तीच्या ठिकाणी भव्य सोहळे होणार होते. रामनाद, परमपुडी, मानमदुराई,मीनाक्षी मंदिरचे मदुराई,तंजावर असे करत स्वामीजी कुंभकोणमला आले.कुम्भकोणम नंतरच्या एका रेल्वे स्थानकावर गाडी थांबणार नव्हती तिथेही लोक स्वामीजींना बघायला आणि एकदा तरी त्यांचे दर्शन घ्यायला प्रचंड प्रमाणात जमले होते. गाडी थांबणार नाही असे दिसताचा लोक रेल्वे रुळांवर आडवे झाले आणि गाडी थांबवावी लागली तेंव्हा स्वामीजी डब्यातून बाहेर येऊन शेकडो लोकांनी  केलेले स्वागत स्वीकारले, छोटेसे भाषण केले. त्यांच्याप्रती आदर दाखवला.

कुंभकोणमहून स्वामीजी मद्रासला आले. हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामीजींनी अमेरिकेला जावे यासाठी मद्रास मध्ये खूप प्रयत्न केले गेले होते. त्यामुळे पाश्चात्य देशात उदंड किर्ति मिळवून वेदांतचा प्रचार करून आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्वागताची तयारी खूप आधीपासून केली होती, एक स्वागत समिति स्थापन करण्यात आली होती, पद्धतशीरपणे  नियोजन केले गेले होते. वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध केले गेले. स्वामीजींच्या धडक स्वागत समारंभाची  वृत्ते प्रसिद्ध होत होती. त्यांनी पाश्चात्य देशात केलेल्या कामांवर अग्रलेख लिहिले गेले. विविध शाळा, संस्था, महाविद्यालये बाजारपेठा सार्वजनिक ठिकाणे येथे स्वामीजींना बोलावण्याचा धडाका सुरू होता. मद्रास मध्ये रस्ते, विविध १७ ठिकाणी कमानी, फलक,पताका, असे उत्सवी वातावरण होते. एगमोर स्थानकावर उतरल्यावर (६ फेब्रुवारी १८९७) स्वागत समितीने स्वागत केले. घोष पथकाने स्वागतपर धून वाजविली. मिरवणूक काढण्यात आली दुतर्फा लोक जमले होते, मोठ्या संख्येने स्त्रिया, मुले, प्रौढ, सर्व सामान्य नागरिक ते सर्व क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित होती.

मद्रासमध्ये ९ दिवस मुक्काम होता. अनेक कार्यक्रम झाले, वेगवेगळ्या भाषेतील २४ मानपत्रे त्यांना देण्यात आली. खेतडीचे राजा अजितसिंग यांनी मुन्शी जगमोहनलाल यांच्याबरोबर स्वागत पत्र पाठवले होते. कोणी स्वागतपर संस्कृत मध्ये कविता लिहून सादर केली.

७ फेब्रुवारीला मद्रास मध्ये विक्टोरिया हॉल मध्ये मद्रास शहराच्या वतीने स्वामीजींचा मोठा सत्कार समारंभ झाला. जवळ जवळ दहा हजार लोक उपस्थित होते. असे सत्कार स्वामीजींनी याची देही याची डोळा अनुभवले, लोकांचे प्रेम आणि असलेला आदर अनुभवला. पण मनात, शिकागो ल जाण्यापूर्वी आणि शिकागो मध्ये गेल्यावर सुद्धा ब्राम्हो समाज आणि थिओसोफिकल सोसायटीने जो विरोध केला होता, असत्य प्रचार केला होता, वृत्तपत्रातून लेख, अग्रलेख यातून स्वामीजींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे शल्य होतेच, त्याचे तरंग आता मनात उमटणे साहजिकच होते. यातील काही अपप्रचाराला उत्तर देण्याची खर तर संधी आता मिळाली होती आणि ती थोडी स्वामीजींनी घेतली सुद्धा. त्यांनी भाषण करताना अनेक खुलासे केले. धर्म नाकारणार्‍या समाज सुधारकांचा परखड परामर्श घेतला. भारताचे पुनरुत्थान घडवायचे असेल तर त्याचा मूळ आधार धर्म असायला हवा असे विवेकानंद यांना वाटत होते. भारतातील सुधारणावाद्यांचा भर सतत धर्मावर आणि भारतीय संस्कृतीवर केवळ टीका करण्यावर होता ते स्वामीजींना अजिबात मान्य नव्हते. मद्रासला त्यांची या वेळी चार  महत्वपूर्ण प्रकट व्याख्याने झाली. एका व्याख्यानात त्यांनी म्हटले की, “आम्हाला असा धर्म हवा आहे की, जो माणूस तयार करील, आम्हाला असे विचार हवे आहेत की, जो माणूस उभा करतील”.

स्वामीजींचे मद्रासला आल्यावर जसे जोरदार स्वागत झाले तसे ते नऊ दिवसांनी परत जाताना त्यांचा निरोप समारंभसुद्धा जोरदार झाला. इथून ते कलकत्त्याला गेले. स्वामीजींचे मन केव्हढे आनंदी झाले असणार आपल्या जन्मगावी परतताना, याची कल्पना आपण करू शकतो. बंगालचा हा सुपुत्र त्रिखंडात किर्ति संपादन करून येत होता.                  

कलकत्त्याला स्वागता साठी एक समिति नेमली होती, अनेक जण ही धावपळ करत होते. कलकत्त्यातील सियालदाह रेल्वे स्थानकावर स्वागतासाठी वीस हजार लोक जमा झाले होते.फलाट माणसांनी फुलून गेला होता. त्यांच्या बरोबर काही गुरु बंधु, संन्यासी, गुडविन, सेव्हियर पती पत्नी, अलासिंगा पेरूमल, नरसिंहाचार्य या सगळ्यांचे स्वागत केले गेले. सनई चौघड्याच्या निनादात आणि जयजयकारांच्या घोषणेत स्वामीजींचे पुष्प हार घालून स्वागत केले गेले. यावेळी परदेशातून सुद्धा अनेक मान्यवरांनी गौरवपर पत्रे पाठवली, त्याचे ही वाचन झाले व सर्वांना ती वाटण्यात आली.केवळ चौतीस वर्षाच्या युवकाने आपल्या कर्तृत्वाचीअसामान्य छाप उमटवली होती, त्याने बंगाली माणसाची मान अभिमानाने उंचावली होती. रिपण महाविद्यालय, बागबझार,काशीपूरचे उद्यान गृह, आलम बझार मठ, जिथे गुरूंचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प सारदा देवींसमोर सहा वर्षापूर्वी नरेंद्रने सोडला होता तिथे पाय ठेवताच आपण दिलेले वचन पुरे केले याचे समाधान स्वामीजींना वाटले, येथे रामकृष्णांनंद आणि अखंडांनंद यांनी दाराताच आपल्या नरेन चे स्वागत केले. पुजाघरात जाऊन श्रीरामकृष्णांना नरेन ने कृतार्थ होऊन अत्यंत नम्रतेने नमस्कार केला. नरेन ने ठाकूरांना नमस्कार केला तो क्षण गुरुबंधुना पण धन्य करून गेला.आता पुढच्या कार्याची आखणी व दिशा ठरणार होती.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मला भेटलेली माणसे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

??

☆ मला भेटलेली माणसे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपल्याला आयुष्यात खूप माणसे भेटतात. आणि कायमच्या आठवणी देऊन जातात. आज सहज एक कार्यक्रम बघताना एक जुनी आठवण जागी झाली. कारण म्हणजे तो कार्यक्रम सादर करणारा आपल्या सर्वांचा लाडका उत्साहाने भरलेला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव.

२७/११/२०१५ रोजी आमच्या शाळेतील रखवालदाराचे लग्न मुंबईत होते. बोलावले की जाणे या तत्वानुसार आम्ही काही मंडळी कारने जाण्यास निघालो. लग्न संध्याकाळी ७ वाजता होते. पण चाललोच आहोत तर थोडी मुंबई बघू या म्हणून लवकर निघालो. मुंबईतले मला तर काहीच समजत नाही. एका पुलावर गेल्या नंतर मैत्रिणीने एक फोन लावला. व आलोच असे सांगितले. एका पॉश इमारती जवळ थांबलो. गाडी पार्क करून वर गेलो तर स्वागताला साक्षात सिद्धार्थ जाधव! डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनीच आगत्याने घरात नेले. त्या धक्क्यातून बाहेर त्यांनीच काढले. आणि मग काय मन मिळणारा आनंद स्वीकारायला तयार झाले. माणसाने किती साधे, प्रेमळ व अगत्यशील असावे याचे प्रत्यंतर येत होते. आमच्या सोबत एकच टेबलवर आमच्या शेजारी बसून आम्ही बरोबर नेलेला खाऊ साधी शंकरपाळी त्यांनी आवडीने चहात बुडवून चमच्याने खाल्ली. आमच्या चकलीचा आस्वाद घेतला. तेही मुक्त कंठाने आमचे कौतुक करत. नंतर मैैत्रिणीने सांगितले ते तिचे भाचे जावई आहेत. तो पर्यंत किती वेळा त्यांचे आम्हाला आत्या म्हणून हाक मारणे झाले होते. नंतर लहान मुलाला लाजवेल अशा उत्साहात सगळे घर दाखवले. घराच्या आठवणी सांगितल्या. त्यातून एक जाणवले की त्यांच्या दृष्टीने घर, फॅमिली किती महत्वाची आहे. मुलीच्या अगदी छोट्या छोट्या बाललिला मोठ्या कौतुकाने व आत्ताच घडल्या प्रमाणे भरभरून सांगत होते. मधे मधे महत्वाचे फोन चालू होतेच. पण घरी गेस्ट आहेत, लांबून आले आहेत. आज सगळे कार्यक्रम रद्द आहेत असे सांगितले जात होते. आम्हाला उगीचच व्ही. आय. पी असल्या सारखे वाटत होते. दरम्यान त्यांच्या मिसेस ने जेवायला बोलावले. काय जेवलो आठवत नाही. कारण सगळे लक्ष त्यांच्याच बोलण्याकडे होते. मला फक्त एवढेच आठवते, ते मला म्हणाले होते आत्या तू नॉनव्हेज खात नाहीस ना म्हणून कोबीची भाजी खायची वेळ आली आहे. जेवणा नंतर परत गप्पा, घरातील वस्तू ( प्रात्यक्षिका सह ) दाखवणे चालूच होते. आम्हाला पण ट्रायल मिळत होती. त्या वेळी एखादे लहान मूल असल्या प्रमाणे ते भासत होते. आत्ता पर्यंत त्यांना फक्त छोट्या, मोठ्या पडद्यावर बघत होतो. तिच व्यक्ती साध्या रूपात अगदी घरगुती गप्पात रंगून गेली होती. त्यांनाही त्या वेळी कलाकार आहोत याचा विसर पडला असावा. एकच व्यक्ती किती वेगळी असू शकते याचे प्रत्यंतर घेत होतो. आमच्या प्रश्नांना खरी व मनमोकळी उत्तरे मिळत होती. मधेच लग्ना नंतर परत या. आज इथेच रहा असा आग्रह पण चालू होता. मधेच तुमच्या शाळेत ( म. न. पा. च्या शाळेत माझी नोकरी झाली आहे. ) बोलवा. असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. त्यांचे शिक्षण महानगर पालिकेच्या शाळेत झाले आहे ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. व माझ्या येण्याने तुमच्या शाळेतून एक तरी सिद्धार्थ तयार होईल असे म्हणतात. संध्याकाळी ते जेव्हा जिम मध्ये जायला निघाले तेव्हा त्यांनीच आठवण करून दिली. माझ्या बरोबर सेल्फी घ्यायचा नाही का? असे त्यांनी गमतीने विचारल्यावर आम्ही फोटो काढले. त्या नंतर आम्हाला पण लग्नाच्या कार्यक्रमासाठी निघायचे होते. व परत कधी भेट होईल माहित नव्हते. निघताना आम्हाला वाकून नमस्कार ( पाया पडणे ) केला.

इतक्या प्रसिद्ध पण डोक्यात हवा न गेलेल्या एका सच्च्या कलाकाराने आमचा दिवस भारून टाकला होता.

एक कलाकार किती साधा, सच्चा असू शकतो. पण जीवनातील मोठी तत्वे अंगीकारतो याचा अनुभव खूप जवळून घेतला होता. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमिअर चे पास येतात त्या वेळी आवर्जून माझ्या नावाचा पास त्यात असतो. त्या नंतर आम्ही त्यांना आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास बोलावले होते. ते पण आवर्जून आले होते. मग काय शाळेत गर्दीच गर्दी पोलीस संरक्षण मागवावे लागले होते. एवढ्या गर्दीत पण त्यांनी माझ्या घरी आलेली आत्या कुठे आहे? म्हणून माझी विचारणा केली होती. माझ्या सारख्या व्यक्तीला लक्षात ठेवणे हे माझ्या साठी मोठे आश्चर्यच होते.

साधी रहाणी, खरेपणा, सर्वांना मदत करणे, उत्साह, बाल्य जपणे, माणसे धरून असणे असे अनेक पैलू समोर आले. आणि हा दिवस सिद्धार्थ दिवस ठरला तो कायम स्वरूपी आठवण ठेवून आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसळ-चपाती… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ उसळ-चपाती…  ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एकदा भीमसेन जोशी (अण्णा) गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.

तेवढ्यात अण्णा म्हणाले, “आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या. . !”

रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली. . मंडळी गाडीतून उतरली.

अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा. . !

अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं. . अण्णा म्हणाले, ‘काय, कसं काय? ओळखलंत का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही. . ‘ अण्णा कानडीतनं बोलत होते.

रामण्णाही ओळखीचं हसले. . थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं. . आणि त्यांचा निरोप घेतला. .

साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला –

“इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.

स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा. . आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली”.

“उसळ-चपाती पाहिजे काय?”, असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार. . !”

“घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा. . !”

“जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची ?”

रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती. . साथीदार मंडळी गप्प होती. . गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहेर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते. .

रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.

तात्पर्य – हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असावेत.🙏🏻

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जरतारी हे वस्त्र मानवा… — लेखक – श्रीनिवास बेलसरे ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? विविधा ?

☆ जरतारी हे वस्त्र मानवा… — लेखक – श्रीनिवास बेलसरे ☆ डॉ. ज्योती गोडबोले

‘जगाच्या पाठीवर’ हा आजही अनेकांच्या स्मरणात असलेला सिनेमा आला होता १९६०ला. म्हणजे तब्बल ६२वर्षापूर्वी! त्यातली जवळजवळ सर्वच गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. गीतकार होते ग.दि.मा.! या सिनेमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जसे मनोजकुमारच्या सिनेमात ‘सबकुछ मनोजकुमार’ असे असते तसेच इथे राजा परांजपे यांचे होते. दिग्दर्शक राजा परांजपे, लेखक राजा परांजपे आणि निर्मातेही राजाभाऊच!

तशी त्याकाळी राजाभाऊ परांजपे ही मोठी हस्ती होती. त्यांच्या कोणत्याच सिनेमात सिनेमाचे संवादलेखन कुणीतरी मुद्दाम केले आहे, पटकथा कुणीतरी ‘रचली’ आहे, चटकदार संवाद जाणीवपूर्वक ‘पेरले आहेत’ असे वाटतच नसे. एखाद्या ठिकाणी, एखाद्याच्या घरात किंवा एखाद्या कार्यालयात अगदी नैसर्गिकपणे जे घडू शकते तेच राजाभाऊंच्या सिनेमात दिसायचे. जणू राजाभाऊ कोणतीही तयारी न करता अशा एखाद्या ठिकाणी नुसते हळूच कॅमेरा घेऊन गेलेत आणि त्यांनी तिथे जे घडले ते सगळे शूट करून आणले, असेच वाटायचे! इतका त्यांचा सिनेमा खरा वाटे!

या सिद्धहस्त मराठी कलाकाराने एकूण २९ सिनेमांचे दिग्दर्शन केले आणि २० सिनेमात तर स्वत: कामही केले. आज किती मराठी प्रेक्षकांना हे माहित असेल की ‘मेरा साया’ (१९६६) हा हिंदी सिनेमा राजाभाऊंच्या ‘पाठलाग’ (१९६४)चा रिमेक होता! येत्या २४ एप्रिलला राजा परांजपेंचा ११३वा वाढदिवस येतो आहे. ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पाठलाग’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘आधी कळस मग पाया’, ‘सुवासिनी’, ‘पडछाया’, ‘आधार’, ‘ऊन पाउस’, ‘पुढच पाउल’ असे एकापेक्षा एक सिनेमे देण्या-या या मराठी कलाकाराची आठवण निदान मराठी चित्रपट सृष्टीत तरी कितीजण ठेवतात बघू या!

‘जगाच्या पाठीवर’ची सगळी गाणी गदीमांनी अर्थात मराठीच्या वाल्मिकी मुनींनी लिहिली होती. एकेक गाणे ऐकले की गदीमांना त्रिवार वंदन करावेसे वाटते. केवढी प्रतिभा, केवढी अचाट कल्पनाशक्ती, कसल्या चपखल उपमा आणि केवढे महान तत्वज्ञान गाण्यातल्या चार शब्दांच्या पेन ड्राईव्हमध्ये कोंबून बसवायची त्यांची जादू! गदिमांना शब्दप्रभू नाही म्हणायचे तर कुणाला? या सिनेमात गदिमांनी चक्क एक छोटीशी भूमिकाही केली होती. सिनेमात सुधीर फडके यांनी गायलेले एक अत्यंत सुंदर गाणे होते-

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…’

हे त्या वेळच्या समाजाचे सर्वसाधारण वास्तव गदिमांनी नेमक्या शब्दात पकडले होते. त्या गाण्याशी सर्वांना आपली परिस्थिती जुळवून घेता यायची आणि कदाचित म्हणूनच ते अतिशय लोकप्रियही झाले होते. हल्ली जसे गगनचुंबी इमारत बांधताना मोठमोठ्या यंत्राचा वापर होतो, प्रचंड लोखंडी फाळ जमिनीत घुसवून मोठमोठ्या यंत्रानीच माती उपसली जाते, खोल पाया खणला जातो, तसे औद्योगिक जगाने त्याकाळी आपली राक्षसी नखे भूमातेच्या पोटात खुपसून तिची आतडी बाहेर काढून भौतिक सुबत्ता वाढवलेली नव्हती!! त्यामुळे माणसाच्या जीवनात ‘एकच धागा’ सुखाचा असे. दुखाचे धागे मात्र शंभर असायचे! कारण सगळ्याच गोष्टींची कमतरता होती. वस्तू कमी, नोक-या कमी, पगार कमी, दळणवळ कमी, सुखाची सगळीच साधने कमी. त्यामुळे ‘चित्ती कितीही समाधान’ असले तरी भौतिक सुखाची वानवाच होती. म्हणून कवी गदिमांनी म्हटले होते-

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे… जरतारी हे वस्‍त्र माणसा तुझिया आयुष्याचे..’

इथे गदिमा समग्र जीवनाचे तत्वज्ञान एका अगदी वरच्या पतळीवर जाऊन सांगत आहेत. ते म्हणतात, ‘मानवा, तुझ्या आयुष्याचे वस्त्र हे दोन धाग्यांनी विणलेले आहे. त्यात एक धागा सुखाचा आहे आणि शंभर धागे दु:खाचे आहेत. तू जरी या जगात असे हे जरतारी वस्त्र पांघरत असला तरीही येताना तू उघडाच येतोस आणि हे जग सोडून जातानाही तू उघडाच असतोस.’ खरे तर श्रीकृष्णाने गीतेत ज्याला ‘आत्म्याचे वस्त्र’ म्हटले आहे ते शरीरही आपण इथेच सोडून जात असतो. मग ‘या जगातल्या व्यर्थ बडेजावासाठी कशाला खोट्या स्वप्नात रंगतोस रे?’ असा त्यांचा प्रश्न आहे. 

‘पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा.     कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे.’

आपली उपमा अधिक स्पष्ट करताना गदिमा किती चित्रमय शैली वापरून सगळे समजायला सोपे करून टाकतात ते पहाणे मोठे रंजक आहे. त्यांनी अलगद शेक्सपियरने आयुष्याला दिलेली तीन अंकी नाटकाची उपमा सूचित केली आहे.

गदिमा म्हणतात लहानपणी बाळाला कौतुकाने जी अंगडी-टोपडी घालतात ती जणू शरीराचीच प्रतीके आहेत. त्या बाळाला काही कळत नसते. आईवडील आजी आजोबा कौतुकाने जे काही घालतील त्यात ते खुश असते. मात्र तरुणपणी एकंदरच शारीरभावना सर्वार्थाने तीव्र होते. आपले शरीर हा आपला प्रेमविषय झालेला असतो. मग यौवनातील व्यक्ती हौशीने रंगीबेरंगी कपडे परिधान करते. पण कपडे म्हणजे केवळ वस्त्रे का? कविता गदिमांची आहे, त्यांना एवढा मर्यादित अर्थ कसा अपेक्षित असेल? त्यांचा अंगुलीनिर्देश आहे तारुण्यातील आसक्तीकडे, विषयात रममाण होण्याच्या वृत्तीकडे! त्याचे वर्णन ते फक्त तीन शब्दात करतात ‘रंगीत वसने तारुण्याची’.

‘मुकी अंगडी बालपणाची.. रंगीत वसने तारुण्याची..जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे’

गदिमांची प्रत्येक उपमा किती यथार्थ आहे ते पहा! म्हातारपणी शरीर थकलेले असते, ते झिजलेले, आकसलेले, छोट्याशाही आघाताला बाध्य झालेले असते. म्हणून ते वृद्धपणातील शरीराला जीर्ण शालीची उपमा देतात.  

शेवटी कवी स्वत:च अंतर्मुख होतो कारण त्याला श्रोत्यालाही अंतर्मुख करायचे आहे. शेवटच्या कडव्यात काहीशा स्वगतासारख्या ओळीत तो स्वत:लाच विचारतो? ‘हे माणसाच्या जीवनाचे असे सुखदुखाचा असमतोल निर्माण करणारे वस्त्र निर्माण करतो तरी कोण?’ तरीही किती विविधता असते या वस्त्रांत! कोणत्याच दोन माणसांचे आयुष्य सारखे असत नाही. अगदी जुळ्या भावंडातही काही ना काही वेगळेपणा असतोच.

इथे गदिमा थांबतात आणि स्वत:च पुन्हा स्वत:च्या प्रश्नाचे उत्तर देतात. तेच म्हणतात, युगानुयुगे माणसांच्या कोट्यावधी पिढ्यांच्या आयुष्याची वेगवेगळी वस्त्र विणणारा तो ‘वरचा’ विणकर तर अदृश्यच आहे. अखंड चालणारे त्याचे हातही अदृश्यच आहेत-

‘या वस्‍त्रांते विणतो कोण? एकसारखी नसती दोन. कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे.’

असे अगदी साधेसाधे विषय घेऊन जुने कवी त्यातून जीवनाचा केवढातरी गूढ अर्थ सहज सांगून जात असत. म्हणून तर ही अनमोल गाणी आठवायची. त्यासाठीच तर आपला हा ‘नॉस्टॅल्जिया’!

♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक – श्रीनिवास बेलसरे.

संग्रहिका – डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विठ्ठल गोरा की सावळा? ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

??

☆ विठ्ठल गोरा की सावळा? ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

भारतीय सनातन परंपरेतील विविध देवतांची नावे ही गुणदर्शक आहेत. शं म्हणजे शुभ;  शुभ करणारा तो शंकर, तर वर्णाने काळा असणारा तो कृष्ण , सुंदर व मोहक गर्दन असणारा तो सुग्रीव आणि रमविणारा तो राम. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.   शंकरांचे वर्णन कर्पूरगौरा म्हणजे कापरासारखा गोरा असे असून देखील काही चित्रकारांनी महादेवाला काळे दाखवून त्याचा कृष्ण वर्ण प्रचलित केला आहे. 

तसेच पांडु म्हणजे पांढरा किंवा गोरा; पांडुरंग या संज्ञेचाच अर्थ जो रंगाने गोरा आहे असा होतो.  असे असतांना  आजकालच्या बहुतेक साहित्यिकांनी विट्ठलाचे सावळा किंवा काळा असे वर्णन  का केले आहे हेच समजत नाही ! पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणातून बनविलेली असल्याने कदाचित हा अपप्रचार झाला असावा. तथापि तशा अनेक देवतांच्या मूर्ती काळ्या पाषाणाच्याच असतात की !

माझे स्पष्ट मत आहे की विट्ठल ऊर्फ पांडुरंग ही देवता गोऱ्या रंगाचीच आहे.  

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – ‘गदिमांची आई !’— प्रत्यक्षातली व गाण्यातली… — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ – ‘गदिमांची आई !’— प्रत्यक्षातली व गाण्यातली… — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  

आईवर गदिमांचं अपार प्रेम ! त्यांची आई बनूताई ही विलक्षण करारी स्त्री. ‘माडगूळ्यात’ तिचा अतिशय दरारा. अख्ख्या गावात तिच्या शब्दाला वजन. नंतर ‘कुंडल’मधे रहाताना तर ती संपूर्ण कुटुंबाचं ‘कवचकुंडल’च बनली. एकदा, गदिमांच्या वडिलांना, गावच्या मामलेदारीण बाईनं घरचं पाणी भरायला सांगितलं म्हणून बनूताईनं चारचौघात तिला थप्पड मारली व ‘पुन्हा घरची कामं सांगायची नाहीत’ असा सज्जड दम भरला. आत्यंतिक गरिबीतही मुलांमधला स्वाभिमान तिनं जोपासला. पण एके दिवशी घरात खायला काहीच नव्हतं तेव्हा मठातल्या गोसाव्यासमोर पोरांसाठी पदर पसरण्यातही संकोच मानला नाही. ती स्वतः ओव्या रचत असे. गदिमा आपल्या गीतांना, ‘आईच्या ओव्यांच्या लेकी’ म्हणत असत. ‘वाटेवरल्या सावल्या’मधे त्यांनी आईच्या अनेक हृद्य आठवणी सांगितल्या आहेत. आईचं व्यक्तित्व असं प्रभावी असल्यानं, गदिमा मातृभक्त झाले नसते तरच नवल. 

सिनेगीतं ही कथानुसारी असतात हे खरंच. पण गदिमांचं ‘मातृप्रेम’ त्यांच्या गीतातून अगदी ठळकपणे जाणवतं.

वैशाख वणवा’ मधे ‘आईसारखे दैवत सा-या जगतावर नाही’ हे गीत त्यांनी लिहिलं आहे. त्यात, 

‘नकोस विसरु ऋण आईचे

स्वरुप माऊली पुण्याईचे

थोर पुरुष तू ठरुन तियेचा 

होई उतराई’ 

अशा ओळी त्यांनी लिहिल्या. स्वतः ‘थोर पुरुष’ ठरुन मातृऋणातून ते उतराई झाले. 

‘खेड्यामधले घर कौलारु’ मधे ‘माजघरातील उजेड मिणमिण.. वृध्द कांकणे करिती किणकिण’ असे भावोत्कट शब्द लिहून ‘दूरदेशीच्या प्रौढ लेकराच्या’ वाटेकडे डोळे लावून बसलेली आई त्यांनी रंगवली.  ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे गीत तर ‘मातृत्वाचं सायंकालीन स्तोत्र’च आहे. ‘लिंबलोण उतरु कशी असशी दूर लांब तू’  हे गाणंही आईच्या सनातन वात्सल्याचं हृदयस्पर्शी शब्दरुप आहे.

आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला‘ या बालगीतात, 

‘कुशीत घेता रात्री आई

थंडी वारा लागत नाही

मऊ सायीचे हात आईचे

सुगंध तिचिया पाप्याला’ 

हे शब्द लिहिताना त्यांना आपलं लहानपण आठवलं असेल का? 

‘वैभव’मधल्या ‘चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा’ या गाण्यात गीताची नायिका, ‘खिडकीतून हळूच डोकावून माझ्या माऊलीची मूर्त न्याहळा’ असं चंद्रकिरणांना विनवते. ‘पाडसाची चिंता माथी, करी विरक्तीची पोथी’ अशा ओळी यात गदिमांनी लिहिल्या आहेत. 

‘त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे’ हे संपूर्ण गीत रुपकात्मक आहे असं प्रतिपादन नरहर कुरुंदकरांनी केलं होतं. यात ‘वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे’ म्हणजे ‘वृध्द वडील’ आणि ‘कौलावर गारवेल वा-यावर हळू डुलेल’ मधली ‘गारवेल’ म्हणजे ‘आई’ असा अर्थ त्यांनी लावला होता. उन्हापावसापासून घराला आडोसा देणारी ही ‘गारवेल’ रंगवताना गदिमांच्या नजरेसमोर कदाचित ‘कुंडल’मधली ‘बनूताई’ही असेल. 

गदिमांच्या सिनेगीतात मातृमहात्म्याच्या अशा अनेक पाऊलखुणा आढळतील. त्यांची भावगीतं, कविता यातून तर असे भरपूर संदर्भ वेचता येतील. 

‘तुझ्या वंदितो माउली पाऊलांस’ ही ‘मातृवंदना’  तर त्यांनी खास स्वतःच्या मातेसाठीच लिहिली होती. 

‘धुंद येथ मी स्वैर झोकितो’ या गाण्यात ‘एकीकडे बाळाला अमृत पाजणारी आई आणि दुसरीकडे मद्यरुपी विष रिचवणारा तिचा पती’ असा पराकोटीचा विरोधाभास त्यांनी रेखाटला होता. आपल्या जीवनातदेखील असा दाहक विरोधाभास घडेल याची त्यांना कल्पनाही  नसेल. बनूताईना ‘आदर्श माता पुरस्कारानं’ गौरवलं जात असतानाच घरी त्यांच्या लाडक्या ‘गजाननानं’ … गदिमांनी या जगाचा निरोप घेतला. (14 डिसेंबर 77) केवढा हा दैवदुर्विलास !

गदिमांच्या अंत्यसंस्कारावेळी सुधीर मोघेंनी ‘मातृवंदना’ मधे चार पंक्तींची भर घातली…

‘क्षमा मागतो जन्मदात्री तुझी मी

निघालो तुझ्या आधी वैकुंठधामी’

सुखाने घडो अंतीचा हा प्रवास

तुझ्या वंदितो माऊली पाऊलांस !’

लेखक : धनंजय कुरणे

9325290079

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आईची लेक…” ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “आईची लेक…” ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

मुलीची आई असणं किती भाग्याचं!

 

आई ग्ग.. चटका लागून जीव कळवळला..

इवलीशी पावलं स्टूल वर चढून बर्नोल घेऊन आली..

आई भाजलं ना तुला..

फुंकर घालत क्रीम लावलं ..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

आई ,आई, थांब ती पिशवी दे माझ्याकडे..

तू पिल्लूला घेतलंय ना..

ओझं होईल तुला..

छोटासा का होईना पण भार हलका करून पळाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

पिल्लू रडू नको ना..

आई येते आत्ता… अले अले..

गप बश..गप बश..

माझ्या माघारी ती आई झाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

चप्पल नाही घातलीस आई तू?

राहू दे.. मी जाईन स्कूल बस पर्यंत..

वजनदार दप्तर इवल्या खांद्यांवर चढवून तुरुतुरु गेली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

‘बाबा, आई चा बर्थडे आहे उद्या..

तिला मायक्रोव्हेव हवा आहे..

बुक करून ठेवा हां..

आणि साडी .. पिकॉक ग्रीन कलरची.. तिला हवी होती कधीची..’

आईची आवड तिला कळाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

आई ग, लग्नाला जायचंय ना तुला, साड्या प्रेस करून ठेवते आणि उद्या बॅग भरून देते..

शाळेच्या अभ्यासातही आई ची लगबग तिच्या लक्षात आली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

मामी, आईला ना सतरंजी नाही चालणार, गादी लागते, नाहीतर पाठ धरते तिची..

लेक्चर्स प्रॅक्टिकल, सबमिशनच्या धामधुमीत

आईची गरज तिने ओळखली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

दादा, तू फराळाचं समान न्यायला हवं होतं.. किती आनंदाने केलं होतं तिने..

तेवढ्याचं ओझं झालं तुला. पण आई किती हिरमुसली!

आईची माया तिला उमजली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

दुपारच्या निवांत क्षणी टीव्ही पाहताना अलगद डोळा लागला,

 ऑफिसच्या लंच ब्रेक मध्ये आलेली ती, मला पाहून पाय न वाजवता अंगावर पांघरूण घालून गेली,

शाल नव्हे, लेकीने मायची मायाच पांघरली,

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

लग्न, संसार, मूलबाळ, जबाबदाऱ्या, करिअर, सारं सारं सांभाळून  गोळ्या घेतल्यास का, बरी आहेस का, डॉक्टरांकडे जाऊन आलीस का, दगदग करू नकोस, मी किराणा ऑर्डर केलाय..घरी येऊन जाईल, प्रवासाची दमलीयेस स्वयंपाक करू नको.. डबा पाठवतेय दोघांचाही, अजुन काय काय अन् काय काय..

लेक होती ती माझी फक्त काही दिवस..त्यानंतर तिच्यात उमटली आईच माझी..

मीच नाही, आम्हा दोघांचीही आईच ती..

लोक म्हणतात, देव सोबत राहू शकत नाही म्हणून आई देतो,

आई तर देतोच हो, पण आईला जन्मभर माय मिळावी म्हणून आईची माया लावणारी लेक देतो..

मुलगा हा दिवा असतो वंशाचा; पण मुलगी दिवा तर असतेच, सोबतच उन्हातली सावली, पावसातली छत्री, आणि थंडीत शाल असते आईची.. किंबहुना साऱ्या घराची…

हे शब्द तर नेहमीच वाचतो आपण, पण जाणीव तेव्हा होते जेव्हा आपलंच पिल्लू कोषातून बाहेर पडून पंख पसरू बघतं आपल्याला ऊब देण्यासाठी,

परी माझी इवलीशी खरंच कधी मोठी झाली कळलंच नाही…

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शतदा प्रेम करावे…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

? विविधा ?

☆ “शतदा प्रेम करावे…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रौढत्वी निज शैशवास जपणे; बाणा कविचा असे!

 वरील काव्यपंक्ती अगदी शालेय जीवनापासून ऐकत आणि वाचत आले आहे.निबंधात आणि भाषणात या ओळींचा वापर मी अगदी माझ्याच लिहिलेल्या असल्याच्या दिमाखात वापरून मोकळी होत असे. अगदी..

कवी चा बाणा असल्याच्या ताठ्यात!!

पण तुम्हाला सांगते..तेव्हा कधीच हा प्रश्न पडला नाही की…हा बाणा फक्त कविचाच कां ?

पण आज प्रौढत्वी या प्रश्नाचं उत्तर शोधावंसं वाटलं.

 आतापर्यंत जगलेलं…भोगलेलं…घालवलेलं..

वाट्याला आलेलं..आणि उपभोगलेलं

असे सगळेच कंगोरे दृष्टीस पडले आयुष्याचे!! बालदिनाच्या निमित्ताने..व्हॉट्स ॲपवर फिरणार्या पोस्ट्स मधून डोकावणारं…डोळे मिचकावून हसणारं..खोड्याळ आणि खट्याळ..

गोडुलं बालपण दिसलं…आणि आलेलं प्रौढत्व शैशव जपण्यास सिद्ध झालं की!!

 बालपण आणि कविचा बाणा यांचा काही अन्योन्य संबंध आहे कां बरं?

आणि मग माझी स्वारी निघाली की कविच्याच मदतीने…कवी यशवंत देव यांच्या मदतीने..कवितेच्या गर्भात शिरूनी भावार्थाला भिडायला!*

शब्दांच्या पलीकडले स्पंदन..

शब्दांतूनच ओवायला!!*

 बालपण…..निर्व्याज, निरागस, निरामय, नितळ अशा वृत्तींचा देखणा आविष्कार!! बालकाचं मन सतत कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात..विक्रमराजाच्या मानगुटीवर च्या वेताळा सारखं!

सतत कुतुहल, औत्सुक्य, जिज्ञासा,

त्यामुळेच सतत खळखळ वाहणार्या

पाण्याच्या प्रवाहा सारखं…निर्मळ, नितळ…अगदी तळ दिसावा इतकं!!!

कविचं मन ही असंचं….सतत अंतस्थ मनाची साद ऐकणारं, मनात उत्स्फूर्त विचारांचा धबधबा पेलून धरलेलं,

निसर्गा च्या हाका ऐकणारं, गूज, गूढ उकलण्या साठी धडपडणारं…निर्व्याज मन!! नव्या युगातील नव्या मनूचा शूर शिपाई बनून उभं ठाकणारं मन!!

(आई मला छोटीशी बंदूक दे ना! आठवलं ना बालगीत?)

तीच जिज्ञासू वृत्ती…अगदी..

को ऽहम् ते सोऽहम् चा शोध लागेपर्यंत चा शोध लागेपर्यंतची ओढ जपणारं मन!!

बघा…निराश, हताश, हतोत्साहित झाला असाल तर…लहान बालकांत बालक होऊन रमून पहा…एखादी कविता वाचून पहा….मग बघा…

ते बालपण…ती कविता तुमच्या रोमा-रोमांत संचरित होत झिरपत जातं…आणि थकलेल्या मनाला म्हणजेच पर्यायाने शरीरालाही कशी उभारी येते ती!!

नव्याने प्रेमात पडाल या जगण्याच्या..

आणि म्हणाल…” या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!!”👍🏻

आणि मग या प्रौढत्वी ही तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतला…अगदी तुमच्याच आसपास असलेला आनंद सापडेल.एक आगळंच समाधान मिळेल. संतोष पावेल मन!!तृप्त मन,

आनंदी मन..मग आपोआपच निरोगी शरीर…तृप्त आत्मा!!

मग हा आत्मा आत्मरंगी रंगून…रामरंगी रंगायला मोठ्या समाधानाने तयार न झाला तरच नवल!!!!

म्हणूनच…कविमनाने…जिगिविषु वृत्तीने…प्रौढत्वी निज शैशवास जपण्याची खिलाडू वृत्ती अंगी बाणण्यास..सज्ज होऊ या कां??

चला तर मग…” ले शपथ..ले शपथ!

 भले ही हो…अग्निपथ! अग्निपथ!

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

जेवणात जर मीठ बरोबर असलं तर मिठाची आठवण कोणालाच येत नाही. परंतू हेच मीठ मात्र कमी पडलं की च्च…च्च…म्हणत सगळ्यांची मीठ शोधायची धांदल सुरू होते….! 

आपलं आयुष्यही या मिठासारखंच असावं…! 

…. आपल्या असण्याची जाणीव कोणाला असो किंवा नसो, परंतु आपल्या नसण्याची उणीव कोणाला तरी भासणे हे खरं सुख !…… मात्र, ज्यांच्या असण्या आणि नसण्याचं सोयर सुतक कोणालाच नाही….असे अनेक जण मला या महिन्यात भेटले…! 

त्यापैकीच या चौघी….

१. एक अंध ताई, डोळ्यातील ज्योत पूर्णपणे विझली आहे, परंतु मनातला अंगार मात्र विझलेला नाही…. 

—शिवाजीनगर परिसरात भीक मागायची. जिथे ती भीक मागायची, तिथेच तिला खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे.

२. दुसरी एक दिव्यांग ताई… तिचे पती सुद्धा दिव्यांग आहेत. एकमेकांच्या साथीने आयुष्याचं ओझं डोक्यावर पेलण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतू दरवेळी ते शक्य होत नाही, म्हणून ही ताई भीक मागायची…..

— हिला एक wheel chair दिली आहे. Artificial Jewellery त्याचप्रमाणे स्त्रियांची इतर प्रसाधन साधने तिला विक्रीसाठी घेऊन दिली आहेत. नानावाडा परिसर, तसेच शनिवार वाडा परिसर येथे ती आता हा व्यवसाय करू लागली आहे. 

३.  भवानी मातेसमोर जोगवा मागणारी ही तिसरी मावशी… कोणाच्याही आधाराशिवाय जगते आहे. तिला आपण भाजी, तसेच फळं विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे–= त्यासाठी तराजू, वजन काटे, इत्यादी सर्व साहित्य घेवून दिले आहे. कॅम्प, भवानी पेठ, तसेच पुण्यातील राजेवाडी परिसर येथे तिने फिरून विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

४. एक तरुण महिला शनिपार मंदिर, बाजीराव रस्ता येथे भीक मागत होती, त्याच परिसरात तिला खेळणी विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे. 

…… या महिन्यात “महिला दिन” होता हा फक्त योगायोग ! 

“दीन” असणाऱ्या महिलांना, तुम्ही सुद्धा “माणसं” आहात याची जाणीव करून देत, आम्ही रोजच महिला दिन साजरा करत आहोत. 

कोणताही समारंभ नाही… “हार – तुरे” नाहीत…! 

…. आयुष्यात जगताना, कायम ज्यांची “हार” झाली, अशा दुर्दैवी आयुष्य जगणाऱ्यांना… पुन्हा गळ्यात “हार” घालण्याचं प्रयोजन काय…? 

…. खाली झुकलेली मान, जेव्हा सन्मानाने ताठ होते, त्यावेळी आमच्यासाठी तोच सण असतो… समारंभ असतो… महिला दिन तोच असतो….! आठ मार्चला आम्ही महिला दिन साजरा करत नाही…. तर तो रोज रोज जगतो…!!! 

५. याच महिन्यात रंगपंचमी येवून गेली…! आयुष्य रंगपंचमी सारखंच आहे…. कितीकदा चेहऱ्यावर रंग चढतो आणि कितिकदा परिस्थिती तो उतरवून टाकते…

…… असेच रंग उडालेले… पाय मोडून रस्त्यात खितपत पडलेले ते दोघे….! 

यांच्यावर आधी उपचार केले, दोघांनाही व्हीलचेअर दिल्या. त्यातील एकाच्या अंगी दाढी कटिंग करण्याचे कसब होते, त्याला लागणारे सर्व साहित्य घेऊन दिले. दुर्गंधीत असणाऱ्या आमच्या भिक्षेकर्‍यांचीही दाढी कटिंग करायला कोणी पुढे येत नाही…. मग यालाच आम्ही आमच्या भिक्षेकर्‍यांची दाढी कटिंग करायला लावून पगार द्यायला सुरुवात केली… ! 

…. इकडे “याला” रोजगार मिळाला तिकडे “ते” स्वच्छ झाले…

It’s our Win – Win situation….!!! 

६. दुसऱ्या एका व्यक्तीचा पूर्वी पायपुसणी विकायचा व्यवसाय होता… एक्सीडेंट होऊन, रस्त्यावर आल्यानंतर तो स्वतःच “पायपुसणं” होऊन बसला…

…. आता, पायपुसणी विकायचा व्यवसाय याला पूर्ववत टाकून दिला आहे…. ! पर्वती पायथा परिसरात तो फिरून हा व्यवसाय करत आहे…. 

…. या रंगपंचमीत आम्ही त्या अर्थाने जरी रंग खेळलो नाही… तरी, ज्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले आहेत, अशांच्या चेहऱ्यावर स्वाभिमानाचा एक तेजस्वी रंग मात्र नक्की लावला आहे…. ! 

“भिकारी” या शब्दांची लक्तरं आम्ही होळीच्या आगीत अर्पण केली आहेत…. ! 

७. एक अपंग आजी... जंगली महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भीक मागते…! 

….. या महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर… तिला एक व्हीलचेअर आणून दिली…. त्यावर तिला व्यवस्थित बसवलं, आणि तिच्या पायाशी वजन काटा ठेवला… तिला सांगितलं, ‘ लोक येतील, यावर आपलं वजन करतील आणि तुला पैसे देतील ‘…… अर्थातच बोहनी (भवानी) करण्याचा मान मला मिळाला…. ! 

८. पूर्वी पती असतांना सुस्थितीत असणारी एक मावशी…. पती अचानक गेल्यानंतर, सर्व काही बिघडले…. शनिपार येथे मग गळ्यात माळा घालून भीक मागायला सुरुवात केली… तिला स्वतःला भीक मागायची लाज वाटत असे… परंतु उपाशी पोटाला कुठं लाज असते ? अनेकांनी तिला अनेक सल्ले दिले…. परंतू भरल्या पोटानं दिलेला सल्ला, उपाशी पोटाला कधीही पचत नाही…! गुढीपाडवा हा सण साजरा करण्यासाठी, पूजा करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात या सर्व वस्तू, सणाअगोदरच या मावशीला घेऊन दिल्या आहेत… जेणेकरून ती या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करू शकेल…. ! 

या विक्रीतून जमा झालेल्या भांडवलातून आम्ही आता दुसरा कायमस्वरूपी व्यवसाय सुरू करणार आहोत. 

९. नवऱ्याने सोडून दिलेली बाळासह रस्त्यावर राहणारी एक ताई…. ! 

…. आमचा अन्नपूर्णा प्रकल्प चालवणारे, श्री अमोल शेरेकर यांचा मला एके दिवशी फोन आला, ‘ सर, या ताईचं काय करू ? ‘ 

.. मी विचार करून उत्तर देईपर्यंत ते म्हणाले, ‘ मी जिथे राहतो त्याशेजारी एक रूम खाली आहे. आपल्याला फक्त डिपॉझिट आणि या महिन्याचे भाडे आणि किराणा भरून द्यावे लागेल. माझ्या नजरेत एक काम आहे, मी या ताईला तिथे कामाला लावतो…. मार्च नंतर एकदा का हिला पगार मिळायला लागला, की मग आपल्यावर आर्थिक जबाबदारी राहणार नाही.’ 

…. मी काहीही बोलण्याअगोदर माझा होकार गृहीत धरून श्री अमोल शेरेकर कामाला लागले….

त्या रूमचे डिपॉझिट, मार्च महिन्याचे भाडे आणि किराणामाल भरून दिला आहे…. ! 

…. ही ताई स्वाभिमानाने एका कंपनीत आता छोटा जॉब करते, आज ३१ मार्चला तिचा पगार होईल…. ! 

कोणाच्याही आधाराशिवाय ती ताई तिच्या बाळासह स्वयंपूर्ण होईल….! 

.. या ताईला मी सांगून ठेवलं आहे, बाळ जेव्हा शाळेत जायच्या वयाचं होईल, तेव्हा मला सांग. संपूर्ण शाळेची जबाबदारी आमची…. ! 

… कृतज्ञतापूर्वक ती म्हणाली, ‘ उद्या एक तारीख आहे. आज माझा पगार होईल, आता माझा बोजा कोणावर पडणार नाही. मी खूप खूष आहे…’ असं म्हणून ती ओक्साबोक्षी रडायला लागली… ! 

…. आज प्रथमच कोणीतरी रडत होतं आणि तरी मी मनापासून हसत होतो…. ! अर्थात हे सर्व श्रेय श्री. अमोल शेरेकर यांचं, मी फक्त माध्यम होतो…. श्री अमोल शेरेकर यांचा मला अभिमान आणि कौतुक आहे ! 

…. या तिघींच्याही मनात “आत्मविश्वासाचा ध्वज” उभारून दिला आहे…. 

…. “प्रतिष्ठेच्या पताका” दारात नाही… पण मनात लावल्या आहेत…

…. नवीन जोमानं आयुष्य जगण्याची “गुढी” आम्ही उभारून दिली आहे…. 

…. नुसतं “नवीन वर्ष” नाही तर त्यांना “नवीन आयुष्य” सुरू करून दिलं आहे…

…. त्यांच्या आयुष्यातल्या “कडू आठवणी”…. कडुनिंबाचं पान चावता चावता, कधी गोड होऊन गेलं कळलंच नाही…. ! 

अशात भर दुपारी आईचा फोन आला, ‘अरे, येतो आहेस ना ? किती उशीर ? आज गुढीपाडवा आहे… घरची पूजा तुझ्या वाचून खोळंबली आहे…! ‘

…. पूजा माझ्या वाचून खोळंबली आहे…??? मला गंमत वाटली….

‘अजून कुठली पूजा राहिली आहे ?’ मी आईला हसत म्हणालो. 

‘ म्हणजे ?’ तिने भाबडेपणाने विचारले….

पूजा…पूजा…. म्हणजे काय असतं…. ? 

पूजा ज्यावेळी भुकेत शिरते त्यावेळी ती “उपवास” होते….

पूजा ज्यावेळी अन्नात शिरते, त्यावेळी ती “प्रसाद” होते…. 

पूजा ज्यावेळी पाण्यात शिरते, त्यावेळी ती “तीर्थ” होते…

पूजा प्रवास करते, तेव्हा ती “वारी” होते….

पूजा घरात येते, तेव्हा ते घर “मंदिर” होतं….

पूजा जेव्हा डोक्यात शिरते तेव्हा ती “नामस्मरण” होते…

पूजा जेव्हा हृदयात शिरते तेव्हा ती “अध्यात्म” होते…

आणि पूजा जेव्हा हातात शिरते, तेव्हा ती “सेवा” होते… !!! 

— आता अजून कुठली पूजा मांडू… ???

माझ्या या पुजेमध्ये आपण दिलेल्या समिधाच अर्पण केल्या आहेत…. आणि म्हणून भिकेच्या आणि लाचारीच्या दलदलीमधून बाहेर निघालेल्या, “त्या” जीवांनी दिलेल्या आशीर्वादाचा प्रसाद, लेखाजोखाच्या रुपाने आपल्या पायाशी अर्पण करतो…. गोड मानून घ्यावा ! 

प्रणाम 

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “श्री कलमपुडी राव…” ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ “श्री कलमपुडी राव…”  ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

कलमपुडी राव, वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त होऊन अमेरिकेत नातवंडांना सोबत मुलीकडे रहायला गेले. तिथे वयाच्या ६२ व्या वर्षी पिटसबर्ग विद्यापीठात संख्याशास्र विषयाचे प्राध्यापक तर वयाच्या ७० व्या वर्षी पेनसुलव्हाणीया विद्यापीठात विभाग प्रमुख. वयाच्या ७५ व्या वर्षी अमेरिकेचे नागरिकत्व. वयाच्या ८२ व्या वर्षी National Medal For Science हा व्हाईट हाऊस चा सन्मान.

आज वयाच्या १०२ व्या वर्षी संख्या शास्र (Statistics) विषयातील नोबेल पारितोषिक मिळालंय त्यांना.

भारतात सरकारने त्यांना पदम भूषण (१९६८) आणि पदम विभूषण (२००१) देऊन अगोदरच गौरविले आहे.

राव म्हणतात: “ भारतात सेवानिवृत्त झाल्यावर कोणी विचारीत नाही. अगदी शिपाई सुध्दा पदावर असेल तर नमस्कार करील. सहकारी देखील सत्तेचा आदर करतात, प्रज्ञेचा (scholarship) नाही.” 

वयाच्या १०२ व्या वर्षी, उत्तम शरीर प्रकृती असताना नोबेल मिळणं हे बहुदा पहिलं उदाहरण असावे.

मानवी प्रज्ञेची दखल घ्यावी अशी घटना !

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares