मराठी साहित्य – विविधा ☆ १५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन  ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

१५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

माझ्या प्रिय देशबंधूंनो आणि भगिनींनो,

आपणा सर्वांना ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा! 🙏🇮🇳💐

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२३ ला ७६ वर्षे पूर्ण झालीत, म्हणून आपला देश ७६ वर्षांचा तरुण झाला असे म्हणावे लागेल. पारतंत्र्याच्या बेड्या, जाच आणि अत्याचार अनुभवणारे आणि स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने प्राणपणाला लावून लढणारे तरुण स्वातंत्र्यसैनिक आता नव्वदी आणि शतकाच्या मध्ये असतील.  हे मोजके प्रत्यक्षदर्शी सोडले तर बहुसंख्य लोकांना हेच माहिती नाही की आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, त्याकरता अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त सांडलेले आहे. त्यातील मोजकी नावे अर्थातच नेत्यांची, बहुतेक तर अनामिकच राहिले, त्यांच्याकरता मला महान कवी कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात:

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!

या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातील ‘सोहळा’ अन्य कुठल्याही सोहळ्यापेक्षा वेगळा का आणि कसा आहे? आपल्या तेव्हाच्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ च्या शून्य प्रहरी  तिरंगा फडकावला. त्यांचे जगप्रसिद्ध भाषण सगळीकडे उपलब्ध आहेच, पण त्यातील एक वाक्य मला नेहमीच भावते, नेहरूजी म्हणाले होते, “आज रात्री १२ वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपले आहे, त्यावेळी भारत स्वतंत्र जीवनाची नवी सुरुवात करेल.” सुरुवातीची कांही वर्षे या नवोन्मेषात प्रगतीचा आलेख उंच उंच चढत गेला. मात्र ही चढती भाजणी लवकरच स्थिरावली. स्वातंत्र्याने सर्व समस्यांचे निराकरण होईल, या आशावादावर अवलंबून राहणे कठीणच होते. नवीन सुनेला घरची जबाबदारी मिळेपर्यंत खूपच उत्सुकता असते. ‘मला राज्य मिळू दे, मग मी काय करते ते बघाच’ हे कधी मनात तर कधी ओठावर आणून सांगणारी सून जबाबदारीचे भान आल्यावर लवकरच सासूसारखी केव्हा वागायला लागते, ते तिचे तिलाच कळत नाही! नंतर हे राजकर्त्यांना देखील कळायला लागले.

मंडळी, आपण जेव्हा आपल्या स्वातंत्र्याविषयी इतके जागरूक असतो तेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्याची पायमल्ली करतो आहे का? हे भान असणे महत्वाचे नाही का? एक रोजचेच उदाहरण! रस्त्याच्या कडेला ‘फुटपाथ’ नामक छोटीशी मार्गिका असते, तिला चांगले रंगवून वगैरे ठेवल्याने ती पायदळ चालणाऱ्यांना चांगलीच ठसठशीत दिसत असते. मात्र गर्दीच्या वेळी याच फुटपाथवरून शिताफीने स्कूटर, मोटारसायकल इत्यादी वाहनांनी ती व्यापलेली असते. बिच्चाऱ्या कारवाल्यांसाठी ती अंमळ अरुंद असते! आता पायिकांनी कुठे अन कसे चालायचे याचे धडे कोणी द्यावे? थोडक्यात काय, ‘माझे स्वातंत्र्य तर माझे आहेच अन तुझे बी माझेच’ असा कारभार आहे! मला संविधानाने अधिकार दिलाय, तसा तो इतरांना देखील दिलाय, हे समाजभान अन राष्ट्र्भान कसे येईल याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा!

आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतांना त्याची ‘इव्हेंट’ का होते? ध्वनिक्षेपक ठराविक राष्ट्र्भक्तीने भारलेली गाणी प्रसारित करीत असतो. कधी लहान मुले ‘पाठ करून “आजादी”  विषयी त्यांच्या वयाला डोईजड होतील अशी शाळा शाळांमधून भाषणे देत असतात. त्यांच्या स्मरणशक्तीचे आणि शिक्षक व पालकांच्या मेहनतीचे खूप कौतिक करावे हे अगदी स्वाभाविक! पण या निष्पाप मुलांना त्या टाळ्याखाऊ भाषणाचा संपूर्ण अर्थ समजावून सांगणे हे संबंधित वडिलधाऱ्यांचे कर्तव्य असावे! म्हणजे ही पोपटपंची न राहता खरीखुरी देशभक्ती होईल. कोण जाणो अशातूनच एखादा मुलगा व मुलगी देशसेवेचे व्रत घेऊन सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बघेल!     

शेवटी असे वाटते की, ‘या देशाने मला काय दिले?’ असा प्रश्न ज्यांना वारंवार सतावतो त्यांनी ‘मी देशाला काय देतोय?’ या एकाच प्रश्नाचे अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःलाच उत्तर द्यावे! आपल्या मुलाला शिक्षण देताना पालक त्यावर केवळ ५ ते १० टक्के खर्च करतात, उर्वरित खर्चाचा भार समाज उचलतो. हे आपल्या देशाचे अनामिक नागरिक आपल्या या प्रगतीचा किती वाटा उचलत आहेत, हे ध्यानात आले तर या स्वातंत्र्याचे मोल आपल्याला कांही अंशी कळेल!   

या शुभ प्रसंगी सर्वांचे पुन्हा एकदा खूप अभिनंदन,

धन्यवाद! 🙏🇮🇳💐

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सृजनानंद… ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

🌳 विविधा 🌳

सृजनानंद… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

प्रत्येक मनुष्य प्राण्यांमध्ये एक चित्रकार दडला आहे. परमेश्वराने बहाल केलेल्या आयुष्य रुपी कॅनव्हास वर तो आपले कर्तुत्व रेखाटतो. परिस्थितीनुसार त्याला जी शिकवण संस्कार शक्ती बुद्धी मिळते त्याचा तो ब्रश प्रमाणे वापर करतो. निसर्गतः त्याच्याकडे विविध रंग उपलब्ध आहेत. ते म्हणजे त्याचे सकारात्मक विचार,’ आचार आणि उच्चार. त्याने, फक्त सुंदर रंगांची योग्य निवड करून ते कल्पकतेने चित्रात भरायचे असतात. म्हणजे सृजनानंद निर्मिती तयार होते. पण स्वकर्तुत्वाने अशी कलाकृती निर्माण करताना त्याला प्रथम दुःख विरह संकटे यातना यातून पार पडावेच लागते. म्हणूनच  सर्व रंग मिसळून तयार होणारी काळी चौकट चित्राला शोभून दिसते. चित्राला सुरक्षित ठेवते आणि चित्राचे सौंदर्य वाढवते.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘शब्दभेट… कृतज्ञतेची’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

??

☆ ‘शब्दभेट… कृतज्ञतेची‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

तसं बघायला गेलं तर मी कोणी फार महान व्यक्ती वगैरे नाही की मी स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहावं आणि लोकांनी ते कौतुकानं वाचावं. पण शहापूरसारख्या आदिवासी भागात जगण्यासाठी रोजची तारेवरची कसरत करत, मी LIC सारख्या नामांकित वित्तीय संस्थेतून मॅनेजर पदावरून निवृत्त होणं, हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठं यश आहे. 

माझ्या या यशात वाटेकरी असलेल्या माझ्या कुटुंबियांइतकाच अनेक जणांचा हातभार, सहकार्य या प्रवासात लाभलं. कोणतेही नातेसंबंध नसताना, निःस्वार्थ वृत्तीने मदत करणारी अनेक माणसं भेटली, या साऱ्यांविषयी मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना आहे आणि आजीवन राहील. आणि ती व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच ! 

तर अशाच एका व्यक्तीबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती व्यक्ती म्हणजे शीलामामी ! शीला शिवराम लेले. ही वर्षाची, म्हणजे माझ्या मैत्रिणीची मामी बरं का ! राजामामा, मामी त्यांची दोन मुलं-स्वाती – सचिन आणि वर्षाचे आजी-आजोबा अशी सहा माणसं या कुटुंबात होती. आधी हे भिवंडीला राहायचे, नंतर ठाण्यात, नौपाड्यात आले. बहुतेक मामाचं मुंबईत ऑफिस आणि मुलांच्या शिक्षणाची सोय म्हणून आले असावेत. मामीचं घर तसं लहानच, म्हणजे स्वैपाकघर आणि बाहेर एक खोली. तिथेच लागून जिना होता. 

रानडे म्हणजे शीलामामीचं माहेर ! या रानड्यांच्या घरातच वरच्या मजल्यावर लेले कुटुंब राहात होतं. स्वैपाकघराला लागून आणखी एक खोली होती ती रानड्यांच्या वापरात होती. त्यांच्या बाहेरच्या बंदिस्त व्हरांड्यातून वरती यायला दुसरा जिना होता. स्वैपाकघरातच एका सेटीवर वर्षाचे आजोबा झोपलेले असायचे. त्यांचं वय नव्वदच्या आसपास असेल. त्यांचं सगळं बिछान्यावरच करावं लागायचं. शीलामामीच करायची सगळं, तेही विनातक्रार ! बाहेरच्या खोलीत सेटीवर वर्षाची आजी, त्याही पंच्याऐंशीच्या आसपास ! जेमतेम स्वतःचं स्वतः आवरायच्या. त्यांची तब्येतही नरम-गरम असायची. 

सकाळी मामाचा डबा, मुलांची शाळा आणि बाकी सगळं घरकाम, मामी हसतमुखाने करायची. शिवाय इतर कलाकुसरीची कामंही हौसेने चालू असायची. रूखवताच्या वस्तू, मोत्यांची महिरप इत्यादि… 

तर या घराशी माझा संबंध आला तो १९८१ पासून. शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालयातून एस. एस. सी. झाल्यावर आम्ही दोघींनी अकरावीला मुलुंड काॅलेज ऑफ काॅमर्सला प्रवेश घेतला. अकरावी – बारावी आमची काॅलेजची वेळ दुपारी १.४५ ते ५.४५. शहापूरहून बसने आसनगाव ला यायचं आणि मग ११ वाजताची गाडी पकडून काॅलेजला जायचं. गाडी १२.३५ ला मुलुंडला आणि १२.४० ला आम्ही काॅलेजमध्ये पोचायचे. मग  एक तास बहुतेक लेडीजरूममध्ये डबा खाऊन आणि नंतर बसून काढायचो.  म्हणून मग अधून-मधून आम्ही दोघी मामीकडे जायला लागलो. 

मुलुंडच्या अलीकडचे स्टेशन ठाणे आणि स्टेशनपासून शाॅर्टकटनी दहा मिनिटात मामीच्या घरी ! अर्धा तास तिथे बसून परत ठाणे स्टेशन आणि काॅलेजला ! मामी नेहमीच हसतमुखाने स्वागत करायची. वडी, लाडू, शंकरपाळे, बिस्किट काहीतरी खाऊ नेहमीच हातावर ठेवायची. घरून आणलेली डब्यातली पोळीभाजी खायला बसलो तर नंतर गरम-गरम वरण-भात खायला लावायची. चाचणी परीक्षा असो की वार्षिक, आम्ही दोघी कायम मामीकडे राहायला जायचो. 

शहापूर – आसनगावहून मुंबईकडे जायला, त्यावेळी अगदी मोजक्या गाड्या होत्या. एक गाडी गेली की तीन तासांचा विराम. एकदा बस लेट झाल्याने आमची सकाळची गाडी चुकली आणि त्यामुळे प्रिलिमचा पेपर देता आला नाही. त्यावेळी इतर वाहनांनी रस्त्यामार्गे जाणं अवघडच होतं आणि शिवाय खिशालाही परवडलं नसतं. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी आम्ही दोघी ठाण्यात दाखल व्हायचो. स्वैपाकघराला लागून असलेली वैद्यांची खोली मग परीक्षा संपेपर्यंत आम्हाला दिलेली असायची. आणि त्याबद्दल रानडे कुटुंबियांनीही कधी नापसंती व्यक्त केल्याचं मी ऐकलं/अनुभवलं नाही.

रात्री जागून अभ्यास असो, पहाटे लवकर उठून करायचा असो, मामी सेवेला तत्पर असायची. चहा-खाणं, जेवण आपुलकीनं हातात आणून द्यायची. आणि याबाबतीत वर्षात आणि माझ्यात कधीच कोणताच भेदभाव नसायचा हं ! वर्षा तिच्या सख्ख्या नणंदेची मुलगी, तिची भाची, तिचं कोडकौतुक केलं तर एकवेळ समजण्यासारखं आहे. पण मी त्या भाचीची मैत्रीण, तरीही माझेही अगदी तस्सेच लाड केले जायचे. कुठले ऋणानुबंध असतात हो हे ! खालच्या रानडेआजी देखील काहीतरी गोडधोड मुद्दाम आणून द्यायच्या आम्हाला. वर्षाची आई आणि मामी, या नणंद-भावजयीचं नातं हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा ! इतकं समजूतदारपणाचं, आपुलकीचं नातं खरंच दुर्मिळ आहे. 

आम्ही एस. वाय. बी. काॅमला असतानाच वर्षाचं लग्न झालं. वर्षाच्या लग्नाच्या आधीच तिची आई अंथरुणाला खिळली. कित्येक महिने हाॅस्पिटलमध्येच होती. लग्नालाही उपस्थित राहू शकली नाही. पण मामा-मामींनी खंबीरपणे उभं राहून सगळं व्यवस्थित पार पाडलं. लग्नानंतर थोड्याच दिवसात वर्षाचे बाबा अचानक गेले. पुढे काही दिवसांनी आईही गेली. वर्षाचं माहेरपण, बाळंतपण हे देखील मामींनीच केलं, आणि तेही अगदी पोटच्या लेकीप्रमाणे, हे मी स्वतः बघितलं आहे. 

काॅलेज संपलं. नोकरी, लग्न, संसार या व्यापात मीही गुरफटले. मामीही मुलांचे संसार, नातवंडं यात रमलेली. त्यामुळे वारंवार भेट काही होत नाही. वर्षाकडेच तिची विचारपूस करते. पण मागच्या वर्षी आमची वर्षाकडे भेट झाली. माझा कवितासंग्रह अलवार तिला भेट दिला. तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि गळामिठी, न बोलता खूप खूप देऊन गेली.

आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण मातृवत निःस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करणारी मामी मला कायमच वंदनीय आहे. 

अधिक मासानिमित्त या आगळ्यावेगळ्या प्रेममूर्तीला साक्षात दंडवत. आणि ही शब्दभेट- —- कृतज्ञतेची ! 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आपला तिरंगा 🇮🇳 आपला अभिमान” … ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “आपला तिरंगा 🇮🇳 आपला अभिमान” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

आपल्या देशात दोन प्रमुख राष्ट्रीय दिन साजरे केले जातात. 

१) भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट. 

२) भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी.

या दोन्ही दिवशी आपण झेंडावंदन करतो. उंच आकाशात झेंडा फडकवून त्याकडे पाहत असताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो. परंतु या दोन दिवशी झेंडा फडकविण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे हे किती जणांना माहिती आहे ?

१५ ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या पद्धतीला ध्वजारोहण असे म्हणतात.

इंग्लिशमध्ये फ्लॅग हॉईस्टिंग (Flag Hoisting) असे म्हणतात, परंतु अनेक जण त्याचा उच्चार फ्लॅग होस्टिंग असा करतात. त्या दोन्हीही शब्दांच्या उच्चारामुळे अर्थात जमीन अस्मानाचा फरक पडतो. फ्लॅग हॉईस्टिंग म्हणजे ध्वजारोहण.

आता याला ‘ध्वजारोहण‘ का म्हणतात हे पाहू. १५ ऑगस्ट रोजी आपला देश स्वतंत्र झाला. म्हणजे आधी तो पारतंत्र्यात होता. त्यामुळे त्या दिवशी झेंडा हा ध्वजस्तंभाच्या मध्यभागी अथवा मध्याच्या खाली फोल्ड करून ठेवलेला असतो. १५ ऑगस्टच्या सकाळी तो झेंडा खालून वरच्या टोकापर्यंत चढविला जातो आणि त्यानंतर तो फडकविला जातो. याचा अर्थ असा आहे की आधी हा झेंडा आकाशात नव्हताच आपण पारतंत्र्यात होतो. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे प्रत्यक्ष आकाशामध्ये असलेला ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरवून आपला झेंडा वरती चढविला गेला आणि आपल्या झेंड्याचा मान सर्वोच्च झाला. 

२६ जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन, म्हणजे आपला देश स्वतंत्र होताच. फक्त तो प्रजासत्ताक झाला. त्यामुळे या दिवशी झेंडा आधीच ध्वजस्तंभाच्या वरच्या टोकाला घडीबंद करून चढवलेला असतो. फक्त खालून दोरी ओढून तो आकाशात फडकविला जातो. आपला तिरंगा हा आपल्या देशात सर्वोच्च मानाचा झेंडा असून प्रजेमधील प्रत्येकाला त्याकडे अभिमानाने मान उंच करून पाहता यावे म्हणून तो वरती टोकावर असलेला झेंडा फक्त फडकावला जातो. त्याला इंग्लिश मध्ये फ्लॅग अनफरलिंग (Flag Unfurling) असे म्हणतात.

आणखी एक फरक म्हणजे, १५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर २६ जानेवारीला फक्त दोरी ओढून राष्ट्रपती तो फडकवतात. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच नव्हते हे याचे कारण असावे. 

१५ ऑगस्टला ‘ लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते, तर २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर … राजपथावर झेंडा फडकावला जातो, हा आणखी एक फरक. 

दोन्ही दिवशी ध्वजस्तंभावर झेंडा फडकवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीतला फरक प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. जय हिंद ! 

स्वातंत्र्य दिनाचा विजय असो !!

भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो !!!

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मैत्री…” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मैत्री…” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

पण महत्वाचा, अनुभवल्याशिवाय न समजणारा

 ‘मी’ आणि’ तू’ यांचा मिळून बनतो शब्द ‘मैत्र’

हे मैत्र ज्यांच्यात असतं, ती भावना म्हणजे ‘मैत्री’

 सर्व भेदांना छेदून जाते ती ‘मैत्री’

एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास म्हणजे ‘मैत्री’ कोणतीही गोष्ट करताना झालेली आठवण म्हणजे ‘मैत्री’

दोन आत्म्यांना जोडणारे, तरीही मुक्त असणारे बंधन म्हणजे ‘मैत्री’

असे बंधन जे स्थळ, काळ, वेळ, स्त्री, पुरूष सर्वांच्या पलिकडचे..

बंध असूनही बंधनात न ठेवणारे…

सर्व नाती जपूनही नात्यांच्या पलिकडचे…. कोणतेच नाते नसूनही सर्व नाती जपणारे-

कोणतीही गोष्ट हक्काने केव्हाही शेअर करावीशी वाटणे म्हणजे ‘मैत्री’

एकमेकांना समजून घेते, समजावते ती ‘मैत्री’ कोणतीही गोष्ट लपवावीशी वाटत नाही ती ‘मैत्री’

षडरिपुंच्या पलीकडे जाऊन आदर करते ती ‘मैत्री’

एकमेकांच्या उणिवांसहित केलेला स्वीकार म्हणजे ‘मैत्री’

मनातले न सांगताच समजून घेते ती ‘मैत्री’

एकमेकांचा आदर करते आणि हक्कही गाजवते ती ‘मैत्री’

नशीबवान माणसांनाच लाभते अशी ‘मैत्री’

खरंच किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

लेखिका – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

© सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – ६ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ६ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

समृद्ध प्राचीन वारसा – ग्रामीण उद्योग

सोपानराव मुलांना आपल्या गावात फेरफटका मारून आणत होते. श्यामराव आणि श्यामलाताई सोबत होत्याच. रामू लोहाराचे काम पाहून ते खाली उतरत असताना श्यामराव गमतीने पिंकी आणि राजेशला म्हणाले, ‘ हे लोहाराचे काम पाहताना मला लहानपणी शिकलेल्या दोन म्हणी आठवल्या बरं का ? ‘

‘श्यामराव, आम्हाला पण जरा कळू द्या की तुम्हाला काय आठवलं ते ? हसत हसत सोपानराव म्हणाले.

‘अरे श्याम, आपल्या वर्गाला त्या भागवत बाई मराठी शिकवायच्या, त्या आठवतात का ? ‘

‘व्हय की. चांगल्या लक्षात हायेत त्या. मला शुद्धलेखन चुकले म्हणून त्यांनी दररोज दहा ओळी शुद्धलेखन लिहून आणायला सांगितलं होतं. आणि नाही लिहून आणलं तर त्या शिक्षा करायच्या. ‘

‘पण सोपान अजूनही भागवत बाई भेटल्या तर तुला शुद्धलेखनावरून शिक्षा करतील बरं ! ‘ श्यामरावांनी असं म्हणताच हास्याचा स्फोट झाला. सगळेच त्यात सामील झाले.

‘हां, तर मला आठवल्या त्या म्हणी त्यांनी सांगितलेल्या. भागवत बाई म्हणायच्या, ‘ संस्कार आणि परिस्थिती माणसाला घडवते. मुशीत जसे सोने उजळून निघते, तसाच परिस्थितीमुळे माणूस. रामू लोहाराच्या भट्टीत लोखंड जसं तावून सुलाखून निघालं. ‘ श्यामराव म्हणाले.

अरे वा, एकदम बरोबर. ‘ सोपानराव म्हणाले. आणि दुसरी म्हण कोणती आठवली बाबा तुला ? ‘

‘अरे सोपान, आपण कधी सोनाराकडे गेलो तर तो आपल्या छोट्याशा हातोडीचे फटके दागिने घडवताना मारताना आपल्याला दिसतो. पण आता पाहिले ना रामू लोहाराकडे. त्याच्याकडे मोठा घण आहे. सोनाराच्या हातोडीचे शंभर फटके आणि याचा एकच दणका बरोबर नाही का ? म्हणून सौ सुनार की और एक लोहार की ही म्हण आठवली. ‘

‘बरोबर आहे मित्रा ‘ सोपानराव म्हणाले.

‘बाबा, आम्हीही या म्हणी ऐकल्या होत्या पण त्याचा अर्थ आम्हाला आता स्पष्ट झाला. ‘ पिंकी म्हणाली.

सगळे रामूच्या ओट्यावरून खाली उतरले आणि पुढे निघाले. काही अंतरावर एक मुलगा आणि एक मुलगी हातात एक फिरकी आणि आकडा घेऊन एक लांबच लांब दोरी फिरवत होते. ती मुलं साधारणपणे राजेश आणि पिंकीच्याच वयाची होती.

राजेश म्हणाला, ‘ बाबा, ही मुलं काही खेळ खेळताहेत का ? ‘

सोपानरावांना हसू आले, ‘ अरे पोरांनो, हा खेळ नाही. त्यांना बिचाऱ्यांना आपलं पोट भरण्यासाठी हा उद्योग करावा लागतो. ही मुलं दोर तयार करत आहेत. दोरी, दोरखंड असं ते तयार करतात. मग त्यांचे आईवडील शेजारच्या गावांमध्ये ज्या दिवशी आठवडे बाजार असेल त्या दिवशी विक्रीसाठी घेऊन जातात. फार मेहनत आणि चिकाटी आहे त्यामागे. ‘

‘अच्छा काका. म्हणजे अशा प्रकारे दोर तयार करतात तर ! आम्ही कधी पाहिले नव्हते. कशापासून बनवतात ते दोर ? ‘ पिंकीनं विचारलं.

‘तसं तर अनेक वस्तूंपासून दोर तयार करतात. म्हणजे गवत, ताग, कपाशी, लव्हाळे, काथ्या यासारख्या वस्तू वापरल्या जातात. पण आमच्या इथे जवळच मोठं जंगल आहे शिवाय शेती आहे. शेतीच्या बांधावर आणि जंगलात घायपात नावाची वनस्पती उगवते. तिच्यापासून दोर करतात. घायपातला घायाळ, केकती अशी पण नावं आहेत. पण आता या बिचाऱ्यांचा व्यवसाय कमी झाला आहे. लोक त्यांच्याजवळून दोर विकत घेण्यापेक्षा शहरातील दुकानांमध्ये जाऊन माल विकत घेणे पसंत करतात. त्यामुळे असे दोरखंड तयार करणारे कारागीर आता ग्रामीण भागात फार कमी आहेत. ‘

‘काका, किती छान आणि नवीन माहिती मिळाली आम्हाला !’ राजेश म्हणाला.

‘चला, आता आपण जरा दुसरीकडे जाऊ. मी येथील कुंभार आळीत तुम्हाला नेतो. ‘ सोपानकाका म्हणाले. जवळच्या एका बोळातून ते सगळे मग कुंभार आळीत शिरले. त्या आळीत तीनचार कुंभारांची घरे होती. काही घरांच्या बाहेर माठ रचून ठेवले होते. काही ठिकाणी पाणी भरण्याचे मोठे रांजण होते. कुठे कुठे मातीच्या चुली दिसत होत्या. विविध प्रकारची मातीची भांडी होती. पोळ्यासाठी लागतील म्हणून मातीचे बैल तयार करून त्यांना रंग देणे काही ठिकाणी सुरु होते. एका ठिकाणी एक कुंभार बाबा एका चाकावर झाडांसाठी लागणाऱ्या मातीच्या कुंड्या तयार करताना दिसत होते. ‘

‘रामराम हरिभाऊ. पाहुण्यांना घेऊन आलो तुमच्याकडे. ‘ सोपानराव कुंभार बाबाना म्हणाले.

‘या की मग. पाव्हणं कुठलं म्हणायचं ? हरिभाऊ म्हणाले.

‘हरिभाऊ, हा माझा बालमित्र श्याम. या वहिनी आणि ही त्यांची मुलं पिंकी आणि राजेश. शहरातून आलेत आपला गाव पाहायला. ‘ सोपानराव म्हणाले. ‘ या मुलांना जरा तुमच्या कामाची माहिती सांगा. ‘

आपल्याला कोणीतरी काही विचारते आहे याचा आनंद होऊन हरिभाऊंची कळी खुलली. ते मोठ्या उत्साहाने सांगू लागले.

‘ बाळांनो, या कामासाठी आम्ही लई पारखून माती आणतो बरं का ! नदीकाठची किंवा तलावाकाठची माती लागते. त्या मातीला गाळून, वाळवून मग तिच्यात लीद, गवत, शेण, राख, धान्याची फोलपटे यासारख्या गोष्टी मिसळतो. मग ती चांगल्या प्रकारे मुरू देतो. त्यानंतर तिचे गोळे बनवून मग त्याच्या वस्तू घडवतो. हे चाक, यावर आम्ही वस्तुंना आकार देतो. आता तुम्ही ते पाहताच आहात. त्याशिवाय हा एक दगड आहे. त्याला आम्ही गंडा किंवा गुंडा म्हणतो. त्यामुळे वस्तूला गुळगुळीत आकार येतो. ही एक लाकडी थोपटणी, तिला आम्ही चोपणी म्हणतो. वस्तू तयार करताना तिला बाहेरून आम्ही याच्याने थोपटतो. तयार झालेल्या वस्तू आम्ही ज्या भट्टीत भाजतो, तिला आवा म्हणतात. ‘

‘ पोरांनो, आता आमचा धंदा पूर्वीसारखा राहिला नाही. मातीच्या वस्तू लोक कमी विकत घेतात. पण तुम्हाला म्हणून सांगतो. पूर्वी स्वयंपाकासाठी मातीचीच भांडी वापरली जायची. गोरगरिबांच्या घरात स्वयंपाक त्यांच्यावर व्हायचा. पण आता स्टील, अल्युमिनियम यांची भांडी आली. लोकं तीच घेत्यात पण आरोग्यासाठी मातीचीच भांडी चांगली. त्यात पोषक घटक बी असत्यात आन स्वयंपाकाला लई ब्येस चव येते बघा. आणि चुलीवरच्या जेवणाची टेस्ट बी लई न्यारी असतीया. ‘ हरिभाऊ उत्साहाने बोलत होते. बोलता बोलता एकीकडे त्यांचे कामही सुरु होते.

त्यांच्या हातातील ती कला पाहून राजेश आणि पिंकीला आश्चर्य वाटले. ती दोघेही बराच वेळ त्याचं निरीक्षण करत उभी राहिली. ‘ एकाच प्रकारच्या मातीतून माठ, रांजण, कुंड्या, पणत्या, चुली आदी वस्तू घडत होत्या. ओल्या मातीला हवा तसा आकार देता येतो. त्यातून काय निर्माण करायचे ते आपण ठरवायचे असते. मग भट्टीत भाजली की ती पक्की होतात. मानवी जीवनाला सुद्धा या गोष्टी किती चपखल लागू पडतात, नाही ? ‘ असे विचार श्यामरावांच्या मनात येऊन गेले. श्यामलाताई मनातल्या मनात ‘ फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार ‘ हे गाणं गुणगुणत होत्या. या विश्वाची निर्मिती करणारा परमेश्वरही जणू एक कुंभारच ! तो तर किती वेगवेगळ्या प्रकारे या जगाला आकार देतो, किती वेगवेगळ्या प्रकारचा निसर्ग, माणसे, प्राणी निर्माण करतो. असे विचार त्यांच्या मनात तरळून गेले.

पुढे गेल्यानंतर एका गल्लीत सुतार लोकांनी लाकडापासून केलेल्या काही वस्तू मुलांना बघायला मिळाल्या. अशा प्रकारे खेडेगावातील लोकांचे उद्योग प्रत्यक्ष कसे चालतात ते मुलांना बघायला मिळाले. मुले या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्याने बेहद्द खुश होती. आता संध्याकाळ झाली होती. सूर्यनारायण निरोप घेण्याच्या तयारीत होते. श्यामराव सोपानला म्हणाले, ‘ सोपानराव, आता आम्हाला निघण्याची परवानगी द्या. मुले पण थकली आहेत. घरी जाऊन विश्रांती घेऊ. ‘

परवानगी नाही अजिबात. आपण आता घरी जाऊ. निर्मलानं तुमच्यासाठी मस्तपैकी जेवण तयार केलं असणार. तुमी आता मस्त जेवण करायचं. खूप दिवसांनी आलायसा. रातभर ऱ्हावा. रातीला मस्तपैकी गप्पा मारू. आराम करायचा अन मंग सकाळी न्याहारी करून निघायचं. त्याबिगर मी सोडणार नाही तुम्हाला. ‘ सोपानराव म्हणाले.

श्यामराव हसले. ‘ तू असा सोडणार थोडाच आहेस बाबा आम्हाला. चला रे बाळांनो, आज सोपानकाकांकडे जेवण अन मुक्काम. ‘ राजेश आणि पिंकीनं आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि सगळे सोपानरावांच्या घरी गेले.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मी देशाला बांधिल आहे का? कसे?…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “मी देशाला बांधिल आहे का? कसे?…” ☆ सौ राधिका भांडारकर 

मी देशाला बांधिल आहे का? हा प्रश्न अंतर्मुख करणाराच आहे.  जेव्हां  मी माझं स्वतःचं जगणं तपासून पाहते तेव्हां या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मीच मला प्रश्न विचारते की देशासाठी मी नक्की काय करते?  काय करू शकते आणि आतापर्यंत काय केलं?

सीमेवर जाऊन हातात बंदूक घेऊन आपण देशाचे रक्षण तर करू शकत नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून जगताना निदान एक चांगली नागरिक म्हणून तरी जगले का? नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या मी काटेकोरपणे पाळल्या का?  अशा विविध प्रश्नांचं एक काहीसं अस्पष्ट पण सकारात्मक उत्तर मला नक्कीच मिळतं की आपल्या वैविध्यपूर्ण समाजातील सलोख्याचे वातावरण निदान आपल्यामुळे बिघडणार नाही याची मी काळजी घेतली. घेत असते. 

देशाने माझ्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकते/ शकतो हा प्रश्न अधिक संयुक्तिक वाटतो आणि मग एका प्रातिनिधीक  स्वरूपामध्ये देश माझा मी देशाचा या संकल्पनेतून प्रत्येक भारतीयाची देशाप्रतीची बांधिलकी काय असायला हवी आणि कशी याचं एक व्यापक चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं.

सर्वात प्रथम म्हणजे हा देश माझा आहे,  मी या देशात जन्मलो आहे आणि या देशाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी विश्वाच्या नकाशावर एक परिपूर्ण, स्वावलंबी, लोकशाहीची खरी तत्त्वं बाळगणारा  समृद्ध देश, म्हणून स्थान मिळावे ही भावना रुजली पाहिजे.  

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत. का?  याची अनेक कारणे आहेत.  अगदी वैज्ञानिक, तांत्रिक,  डिजिटल क्षेत्रात अविश्वसनीय प्रगती जरी केली असली तरी देशाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांचं निवारण किती परसेंट झालं आहे हा एक भेडसावणारा प्रश्न आहे. भूकबळी, दारिद्र्य, निरक्षरता, अंधश्रद्धा, अज्ञान, गैरसमजुती, जातीयवाद, धर्मभेद,  स्त्रियांचा अनादर,  त्यांची असुरक्षितता,  त्यातूनच होणारे बलात्कारासारखे गुन्हे, हुंडाबळी, केवळ मतांचे, सत्तेसाठीचे राजकारण,  बेकारी, महागाई,कायदेपालनाच्या बाबतीतली उदासीनता, अशा अनेक भयानक भुजंग विळख्यात आजही आपला देश आवळलेला आहे.  उंच आकाशातली  एखादी भरारी आपण नवलाईने पाहतो त्याचवेळी आपल्या जमिनीवरच्या पायांना चावे घेणार्‍या विंचवांचे काय करायचे?  हा विचार मनात नको का यायला?

ज्यावेळी आपण आपल्या देशाच्या बांधिलकीबद्दल भाष्य करतो तेव्हा जमिनीवरच्या समस्यांचे निराकरण प्रथम झाले पाहिजे असे मला वाटते.  इतर विकसित देशांशी तुलना करताना त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही.  शासनाचे नियम ते पाळतात.  नियम मोडणाऱ्याला— मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी असो त्याला शिक्षा ही होतेच.  स्थानिक प्रशासनाने नियमांची जी चौकट घातली आहे, ते बंधन न मानता कर्तव्य मानून त्याचे पालन केले जाते. आपल्याकडे मात्र येथे शांतता राखा असे लिहिले असेल तेथे हमखास कलकलाट असतो.  येथे थुंकू नका—नेमके तिथेच पिचकार्‍यांची विचकट रांगोळी दिसते.  नो पार्किंग पाटीच्या ठिकाणीच वेड्यावाकड्या गाड्या लावलेल्या दिसतात.  कृपया रांगेची शिस्त पाळा या ठिकाणीच माणसांची झुंबड उडालेली दिसते.  स्वच्छता राखा तिथेच कचऱ्याचा डोंगर असतो.  यातून एकच मानसिकता झिरपते की नियम हे मोडण्यासाठीच असतात जणूं . तेव्हा भारतीय घटनेने  दिलेले अधिकार, स्वातंत्र्य आणि सुजाण नागरिक म्हणून जगतानाची कर्तव्ये या सगळ्यांचे संतुलन, एक जबाबदार नागरिक म्हणून ठेवणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.

राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.  गरज फक्त कडक कायद्यांची नव्हे तर गरज सदसद्विवेक बुद्धीची आहे.  कायदा व सुव्यवस्था राखणे ही जरी पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिक म्हणून जगताना आपणही पोलिसांचे कान आणि डोळे बनले पाहिजे. 

पर्यावरणाचा विचार करणे, सार्वजनिक स्वच्छतेची काळजी करणे, अन्नाची नासाडी न करणे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे, ग्रामीण भागातील जनता, कष्टकरी बळीराजा, त्यांच्या समस्या जाणून, तळागाळातील लोकांशी संवाद साधून, एकसंध समाजाची वज्रमूठ— साखळी बांधणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि हीच देशभक्ती आहे.  देशा प्रतीची आपली बांधिलकी आहे.

निसर्गाचं वावर कसं मुक्त मोकळं असतं !  त्यात पेरलेलं, उगवलेलं यावर जसा किडे, मुंग्या, कीटक, पक्षी यांचाही अधिकार असतो तसंच आपण कमावलेलं फक्त आपलंच नसतं.  त्यातलं काही समाजाचं देणं म्हणून बाजूला ठेवावं लागतं, ही भावना वृद्धिंगत झाली पाहिजे.  मी, माझे कुटुंब, माझा समाज आणि माझा देश या स्तरांवर आपलं शांततापूर्ण जीवन अवलंबून असतं.

रस्त्यांवरचे अपघात, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, भूकंप, वादळे,  अवकाळी पाऊस, पिकांची नासाडी,  शेतकऱ्यांची आत्महत्या, दहशतवाद, राजकीय आयाराम गयारामांच्या बातम्या आपण मीडियावर ऐकतो, पाहतो. आणि हळूहळू अलिप्त होतो कारण आपली वैयक्तिक गुंतवणूक त्यात नसते.  कधी रंजकता, कधी  बेचैनी अस्वस्थता जाणवते पण ते अल्पकालीन असते.  सजगपणा, डोळसपणा आणि त्या विरुद्ध आवाज उठवण्याची मानसिकता असणे म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी ठरते.  कोणीतरी करेल पेक्षा मी का नाही? ही मानसिकता तयार झाली पाहिजे. मी माझ्या देश बांधवांसाठी, उपेक्षित, वंचित घटकांसाठी काय करू शकतो /शकते हे माणुसकीचं भान जपणं म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी जपणे आहे. 

देशासाठी जगतानाच्या अनेक व्याख्या आता बदलत चालल्या आहेत.  पूर्वी शाळेत तास सुरू होण्यापूर्वी प्रार्थना होत असे. शाळा सुटताना वंदे मातरम म्हटले जायचे. यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्या लोकांचा आदर याची शिकवण असायची.  या गोष्टी आता लुप्त होत चालल्यात असं जरी नसलं तरी त्यातली भावनिक, राष्ट्रीय गुंतवणूक जाणवत नाही.  १५ ऑगस्ट २६ जानेवारी हे राष्ट्रीय दिन असण्यापेक्षा सुट्टी साजरी करण्याचे, आनंदाचे, मजेचे दिवस ठरत आहेत याचं वाईट वाटतं.  देशाचा इतिहास समजून घेणे,  हुतात्म्यांचे बलिदान स्मरणं आणि त्यांचे बलिदान व्यर्थ होऊ नये म्हणून शपथ पूर्वक आपला देश प्रगतीपथावर कसा जाईल याचं धोरण  मनाशी आखणं ही देशाशी आपली बांधिलकी आहे.

या देशात आपण राहतो तिथे फक्त स्वतःपुरता विचार करून जगण्यापेक्षा मी केलेलं कोणतही काम या देशाचं अखंडत्व भंग करणारं नसेल याचं भान जपणं म्हणजेच देशाशी बांधील राहणं  ठरेल.

एक आठ नऊ वर्षाची भारतीय मुलगी दहा-बारा राष्ट्राच्या पंतप्रधानांना आमच्या पिढीसाठी पाणी आणि प्राणवायू ठेवा अशा मजकुराची पत्र पाठवते तेव्हा जाणवतं की  उगवत्या पिढीवर सामाजिक संस्कार करण्याची जबाबदारी मागच्या पिढीने पेलणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.

मला हा लेख का लिहावासा वाटला?” याचे उत्तर हे असू शकतं की देशाशी बांधिल राहताना मी देशासाठी काय करू शकते याची पुनश्च उजळणी व्हावी म्हणूनच …

🇮🇳 ।। वंदे मातरम् ।। 🇮🇳

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न केलेल्या पापाचे धनी? – भाग-2 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

न केलेल्या पापाचे धनी? – भाग – 2 ☆ श्री संदीप काळे ☆

(आई, वडील, बहीण या सगळ्यांना मी मुकलो होतो. आता असे वाटते, ही शिक्षा संपूच नाही. आपण इथेच संपून जावे. एवढे सारे कमावले होते, ते एका क्षणात संपवले.’’) – इथून पुढे. 

आपल्या कुटुंबाच्या आठवणी सांगत लक्ष्मण यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बाजूला बसलेली त्यांची दोन्ही मुले ही वाघासारख्या बापाला रडताना पाहून भावुक झाले होते. स्वतःला सावरत लक्ष्मण म्हणाले, ‘‘आम्हाला शिक्षा झाली, आम्ही जेलमध्ये आलो. तेव्हा आम्ही बदला घेण्याची भाषा करत होतो. जसजसे दिवस जायला लागले, तसतसे कळायला लागले की कुणाचा बदला घ्यायचा, कशासाठी, ही आपलीच माणसे. आपण लहान होऊ, मोठ्या मनाने पुढे जाऊ. 

हे सारे बळ इथल्या वातावरणाने दिले. आम्ही इथे नामस्मरणाला लागलो. ध्यान करतो, योगा करतो, ग्रंथ वाचतो, यातूनच माणसाकडे पाहण्याची नजर मिळाली.’’ गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर अष्टगंध, अबीर-बुक्का, डोक्यावर टोपी आणि सतत चांगले बोलणे अशी लक्ष्मण यांची भावमुद्रा होती. बाप तशी मुलेही.

आमच्या बाजूला असलेले संतोष शेळके, अजय गव्हाणे, प्रमोद कांबळे हे तिघेजण विनयभंगाच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये होते. काय तर त्यांनी एका महिलेकडे पाहिले म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली. 

सोबत जे दोन पोलिस होते त्यामधले एकजण सांगत होते, विनयभंग आणि पोक्सो या दोन प्रकरणांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. 

आम्ही जेलमध्ये फेरफटका मारत कैद्यांशी बोलत होतो. एक जण ज्ञानेश्वरी वाचत बसले होते. आम्ही जाताच त्यांनी त्यांचे वाचन थांबवले. मला दोन्ही हात जोडत नमस्कार केला आणि म्हणाले, ‘‘बोला माऊली, काय म्हणताय.’’ आम्ही बसलो आणि एकमेकांशी बोलत होतो.   

माझ्यासोबतचे पोलिस सहकारी जांभया देत होते. ते ज्ञानेश्वरी वाचणारे म्हणाले, ‘‘काय माऊली, भूक लागली की काय?’’ 

ते पोलिस म्हणाले, ‘‘होय, आता जेवणाची वेळ झाली आहे ना?’’ 

जे ज्ञानेश्वरी वाचत होते. त्यांचे नाव सचिन सावंत. सचिन बीडचे, त्यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी, तिन्ही मुलींना, पत्नीला खल्लास केले. स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात ते वाचले. मुलीच्या रूपाने असलेला वंशाचा दिवा तर विझलाच होता, पण आता सचिन यांना म्हातारपणात कोणी पाणी पाजायलाही शिल्लक उरले नव्हते. बीडमधले ते सोन्यासारखे वातावरण ते जेलपर्यंतचा सचिनचा सगळा प्रवास ऐकून माझ्या अंगावर काटे येत होते.

बोलता बोलता सचिन म्हणाले, ‘‘मी तुकाराम महाराज तेव्हाच वाचले असते, तर असा राग केला नसता.’’ सचिन आपल्या तिन्ही मुलींनी लावलेली माया, त्यांची आठवण करून हुंदके देत रडत होते.

अहंकाराला घेऊन तुकाराम महाराज काय सांगून गेले हे सचिन आम्हाला अभंगांच्या माध्यमातून सांगत होते. आता रडायचे कुणासाठी, कुणाला माया लावायची. जेलमधून बाहेर जायचे तर कुणासाठी जायचे हा प्रश्न सचिन यांच्यासमोर होता.

कोणालाही भेटा, कोणाशीही बोला, प्रत्येकाची एक वेगळी कहाणी होती. त्या कहाणीला दोन कंगोरे होते. एक म्हणजे, मला विनाकारण आतमध्ये टाकले. माझा दोष नसताना, माझे नाव केसमध्ये घेतले. दुसरे, होय मी गुन्हा केला, पण त्यावेळी तो गुन्हा रागातून आणि द्वेषातून झाला, आता मी सुधारलोय, असे सांगणारे अनेक कैदी होते. 

आम्ही बोलत होतो, तितक्यात ‘नमस्कार साहेब, नमस्कार साहेब’ असा आवाज आला. मी मागे वळून पाहतो तर काय, जाधव आमच्या दिशेने येत होते. अनेक जेलमध्ये जाधव यांनी अधिकारी म्हणून आपल्या सामाजिक कामाची छाप पाडलीय. 

आम्ही जाधव यांच्या कार्यालयाकडे निघालो. जाताना मी जाधव यांना म्हणालो, ‘‘किती गंभीर आहे हे सर्व.’’ 

जाधव म्हणाले, ‘‘तुम्हाला सर्वांनी तसे फार वरवरचे सांगितले असेल, पण परिस्थिती त्याहूनही वाईट आहे. रागाच्या भरात आणि द्वेषातून ही माणसे इथे आलेली आहेत. आपल्या राज्यामध्ये ५४ पेक्षा अधिक कारागृह आहेत. या कारागृहामध्ये ३२ हजारांहून अधिक कैदी आहेत. त्या प्रत्येकाची कहाणी अशीच आहे, इतकीच बिकट आहे.’’

आम्हाला सोडायला आलेले सचिन आकाशाकडे पाहत हात जोडून म्हणाले, ‘‘ही माणसे एक निमित्त आहेत. करणारा करता धरता तो वर बसला आहे.’’

कुणी आईला घेऊन भावनिक होते, तर कुणी बहिणी, मुलांना घेऊन. अनेकांनी आपल्या झालेल्या बाळाचे तोंडही पाहिले नव्हते. जाधव यांच्यासाठी हे नवीन नव्हते. माझ्यासाठी नक्कीच हे नवीन होते. 

मी जाधव यांच्यासमवेत अगदी जड पावलांनी त्यांच्या कार्यालयाकडे निघालो. मी जाधव यांना म्हणालो, ‘‘भाई, हे सर्व थांबणार कधी?’’

जाधव म्हणाले, ‘‘जोपर्यंत चंद्र, तारे, सूर्य आहे तोपर्यंत हे असेच राहणार आहे. फक्त यामध्ये प्रमाण कमी होऊ शकते. जर संस्कार चांगले असतील तर.”

मी जाधव यांना म्हणालो, “ज्यांचा दोष नाहीये, ते या जेलमध्ये आहेत, अनेक जणांनी पैसे भरले नाहीत, कागदपत्रे पूर्ण नाहीत म्हणून जेलमध्ये आहेत, त्यांना कोणी वाली नाही का?”

जाधव अगदी शांतपणे म्हणाले, ‘‘शासन, सामाजिक संस्था या लोकांना पाहिजे तशी मदत करतात, पण सगळ्यांपर्यंत ही मदत जाऊ शकत नाही. त्याला बराच अवधी लागेल.’’ 

मीही त्यांना प्रतिसादाची मान हलवली. मी तिथून निघालो, जेलमधल्या त्या सगळ्या घडलेल्या कहाण्या, त्या सर्व कैद्यांचे सुकलेले डोळे पाहून मीही अगदी उदास झालो होतो. काय बोलावे, कोणासमोर बोलावे आणि कशासाठी बोलावे हे प्रश्न माझे मलाच पडले होते. 

छोट्या छोट्या वादामध्ये माणसांच्या आयुष्याचा सत्यानाश कसा होतो याची अनेक उदाहरणे मी अनुभवून आलो होतो. जेव्हा एखाद्याच्या हातून चूक घडते, तेव्हा आपले कोणीही नसते. जेव्हा कुणाला मदतीची गरज लागते तेव्हा त्याला कोणीही मदत करत नाही. चूक झाल्यावर मोठ्या मनाने माफ करायलाही कोणी पुढे पुढाकार घेत नाही. अशा परिस्थितीत जगणारी माणसे जिवंत आहेत का मेलेली हेच कळत नाही. मागच्या जन्मीचे पाप, नशिबाचे भोग, आई-वडिलांनी केलेले पाप, अशा कितीतरी वेगवेगळ्या शब्दांनी या कैद्यांनी आपल्या मनाचे समाधान करून घेतले. काय माहित या कैद्यांच्या अंधाऱ्या आयुष्यामध्ये कधी प्रकाशाचे किरण दिसणार आहे की नाही?

– समाप्त – 

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्वातंत्र्य दिनाचे चिंतन… प्रतिज्ञा व सत्य” 🇮🇳 ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “स्वातंत्र्य दिनाचे चिंतन… प्रतिज्ञा व सत्य… 🇮🇳” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

भारत माझा देश आहे

.. पण माझ्या देशात भारत आहे का ?

 

सारे भारतीय माझे बांधव आहेत

.. माझे सारे बांधव भारतीय आहेत का ?

 

माझ्या देशावर माझे प्रेम आहे।

.. माझ्या प्रेमाच्या यादीत देश कुठे आहे ?

 

माझ्या देशातल्या समृद्ध आणि .. विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।

,, देशाची समृद्धी कोणत्या चॅनलवर दाखवतात ?

.. परंपरांचा अपमान पदोपदी दिसतोच परंतू

.. अभिमानास्पद परंपरांची माहिती कुणाला आहे?

 

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।

.. पाईक होणे सोडा पण परंपरा झुगारण्यातच धन्यता मानणारी माणसेच हार घालून मिरवतात

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन

.. पालक, गुरुजन व वडिलधा-यांचा अपमान होणार नाही येवढेतरी घडते असे दिसते का ?

 

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।

.. सामान्य माणसाशी सौजन्याने कोण वागते हो ?

 

माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे।

.. निष्ठा या शब्दाच्या ख-या अर्थाशी किती जणांचा संबंध येतो ?

 

 त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।

.. स्वत: व्यतिरिक्त कुणाचे कल्याण अथवा समृद्धी वा सौख्य यांचा विचार करणारे किती हो ?

बोले तैसा न चाले त्याची

सध्या वंदितो आम्ही पाऊले.

कराल विचार निदान आज ?

बनवायचा भारत महान ?

…. “१५ ऑगस्ट” – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🇮🇳

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना

करि अंतःकरण तुज, अभि – नंदना

तव चरणिं भक्तिच्या चर्ची। चंदना

गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

हा भग्न तट असे गडागडाचा आजी

हा भग्न आज जयदुर्ग आसवांमाजी

ही भवानीची ह्या पुन्हा गंजली धारा

ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले

जाहली राजधान्यांची । जंगले

परदास्य – पराभवि सारी । मंगले

या जगती जगू, ही आज गमतसे लज्जा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी

जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे

ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 –  कवी – वि. दा. सावरकर

☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

प्रस्तुत कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना १९२६ मधे लिहिली आहे. (ते शाळकरी असताना लिहिली असा कांही लोकांचा गैरसमज आहे.)

या कवितेत प्रखर बुद्धिमंत सावरकरांनी फारशा प्रचलित नसलेल्या पण चपखल अशा मराठी व संस्कृत शब्दांचा वापर केला आहे. उदा. संभूत, दिप्तितम, चर्ची, गूढाशा, शोणित इ. या कवितेची रचना भूपतिवैभव या मात्रावृत्तात केलेली आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज हे भारतीयांचे स्फूर्तिस्थान आहेतच पण त्यांच्याविषयी सावरकरांसारखा प्रखर देशभक्त जेंव्हा स्फुर्तीगीत लिहितो तेंव्हा ते महाराजांच्या भवानी तलवारीसारखं तेजःपुंज व धारदार होतं. पं. हृदयनाथ मंगेशकर व गानकोकिळा लता मंगेशकर या द्वयीने हे गीत स्फूर्तिदायक व रोमांचक बनवण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचे सूर व संगीत इतकं अर्थवाही आहे की गीत ऐकल्यानंतर कुणीही भारतीय रोमांचित झाल्याशिवाय रहात नाही. या तीन कडव्यांच्या गीताच्या पहिल्या कडव्यात महाराजांचं स्तुतीपर वर्णन करून त्यांना वंदन केलेलं आहे. दुसर्‍या कडव्यात हिंदुस्थानातील सद्यस्थितीचं (त्या काळातलं -१९२६ मधलं) वर्णन केलं आहे आणि तिसऱ्या कडव्यात महाराजांकडं मागणं मागितलेलं आहे. जेणेकरून आपला स्वातंत्र्य लढा यशस्वी होईल.

पहिल्या कडव्यात ते महाराजांचं वर्णन ” हिंदूंच्या शक्तीतून प्रकट झालेलं तेज, हिंदूंच्या वर्षानुवर्षांच्या तपस्येचं फलित म्हणून जन्मलेला तेजःपुंज ईश्वरी अवतार, हिंदुदेवतेचा सौभाग्यालंकार, नरसिंहाप्रमाणे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी अवतरलेला प्रभूचा अवतार” असं केलं आहे. आणि ते म्हणतात हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करीत आहे, चंदनाचा लेप लावून तुझं पूजन करीत आहे, अंतःकरणपूर्वक अभिनंदन करीत आहे. सावरकर म्हणतात, ” माझ्या मनात ज्या गूढ आशा आहेत त्या मी तुला कथन करू शकत नाही. तरी त्या ओळखून, हे नृसिंहाचा अवतार असणाऱ्या शिवाजीराजा माझ्या या इच्छा तू पूर्ण कर. ” ही कविता लिहिली तेंव्हा सावरकर स्थानबद्धतेत असल्यामुळे स्वातंत्रप्राप्तीची इच्छा प्रकट करू शकत नव्हते म्हणून ‘गूढाशा’ हा शब्द वापरला आहे.

दुसर्‍या कडव्यात परकीय आक्रमणामुळे देशाच्या झालेल्या दुरावस्थेचं वर्णन केलं आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या, जतन केल्या गड किल्ल्यांची अवस्था सांगितली आहे. कुठे तट भंगले आहेत, गड, कोट, किल्ले, जंजिरे भग्न पावले आहेत, राजधान्यांची जंगले झाली आहेत, साऱ्या मंगलगोष्टी परदास्यामुळे पराभूत झाल्या आहेत. महाराजांसारखे वीरपुरूष नसल्यामुळे भवानी तलवारीची धार गंजली आहे. अशातच आई भवानीही आधार देत नाही. अशा या जगात जगणं अत्यंत लज्जास्पद झालं आहे.

तिसऱ्या कडव्यात सावरकर म्हणतात, ” ज्या शुद्ध हृदयाच्या राजाला रामदास स्वामींनी आपलंसं केलं होतं, ज्या बुद्धिमान राजाने विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही व वऱ्हाडची इमादशाही अशा पाच शाह्यांना ‘त्राहि भगवान’ करून सोडलं होतं, जो राजा कूटनीतीचा युक्तीने उपयोग करून, वेळप्रसंगी तह करून, बलवान शत्रुला गाफील ठेऊन पराभूत करीत असे ; त्या राजाची अंतःकरणाची शुद्धी आमच्या कृतीत उतरू दे. ती बुद्धी माझ्या भाबड्या देशबांधवांना लाभूदे. ती शक्ती आमच्या नसानसातून (रक्तातून) वाहू दे. हे राजा, जो स्वराज्याचा मूलमंत्र तुला समर्थ रामदास स्वामींनी दिला, तो मंत्र तू आम्हाला दे. म्हणजे त्या मंत्रसामर्थ्याने, ती शक्ती व युक्ती वापरून, त्या शुद्धी व बुद्धीच्या योगाने आम्ही हिंदुस्थानचे बांधव परकियांना येथून हुसकावून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेऊ. “

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares