जन्मच मुळी नोकरदार कुटुंबात झाल्याने नोकरी ह्या क्षेत्रातील विवीध खात्यांची ओळख ही लहानपणा पासूनच होती. आई मुख्याध्यापिका त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र आणि बाबा सहकार खात्यात असल्याने ह्या दोन्हीं खात्यांना जवळून अभ्यासता आल. बरेचं वेळा आपल्याला कागदावरील अगदी छोटासा काळा ठिपका चटकन दिसतो पण अख्खा पांढरा कागद मात्र आपल मन, डोळे, बुध्दी विचारतच घेत नाहीत. तसच ह्या नोकरदार खात्यांमधील बारीक त्रुटी आपण उगाळत बसतो पण ह्या क्षेत्रांत होणाऱ्या मोलाच्या मदतीच्या गोष्टी आठवत नाहीत.शिक्षणं खात आणि सहकार खात हयाचबरोबर आईची पोष्टाची एजंसी असल्याने पोस्ट खात पण खुप जवळून अभ्यासता आल.
पूर्वी नं घरोघरी विशिष्ट कामं करायला काही नेमलेली मंडळी असत, सहवासाने वा नित्यभेटीने ह्या मंडळींशी आपलं तसं बघितलं तर कुठलही नातं नसायचं पण ह्या मंडळींशी आपले भावनिक बंध जुळल्या जाऊन त्यांच्या बद्दल आत्मियता, घरोबा हा आपसूकच निर्माण व्हायचा. त्या मंडळींमध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल असे आपले पोस्टमनकाका असायचे. आज जागतिक टपाल दिन.टपाल खात्याप्रती आणि पोस्टमनकाकांप्रती असलेल्या आदरामुळे आजचा हा लेख त्यांना अर्पण.
पोस्टमनकाका म्हंटले की आठवते ती त्यांची कायम खाकीवर्दीतील हसरी,बोलकी आणि तडतडी मुर्ती. ऋतु कुठलाही असो ह्या पोस्टमनकाकांची आणि टपालखात्याची सेवा निरंतरच. अजूनही आठवतात पावसाळ्यात ओलेगच्च होऊन पण टपाल भिजू नये म्हणून प्लँस्टीकच्या पिशवीत जिवापलीकडे टपाल सांभाळणारे सायकलवर येणारे पोस्टमनकाका, अजूनही आठवतात कडकडीत रणरणत्या उन्हात आम्ही सगळे दुपारी पत्ते खेळत असतांना घामाघूम होऊन येणारे पोस्टमनकाका
गार पाणी सुद्धा बाहेर उभे राहून पिणारे कारण आत आलो तर पंख्याचं वारं बाधून ताप येईल म्हणणारे पोस्टमनकाका. खरचं ह्या खात्याच्या सेवेला मनापासून सँल्युट. कदाचित नवीन तंत्रज्ञानामुळे आजच्या पिढीला ही सेवा,हे जुळलेले भावनिक बंध उमगणार पण नाहीत.
नवीन नोकरीचे नेमणूकपत्र आणणारे, कुणाच्या नात्यात बाळं जन्माला आलं की खबरबात घेउन येणारे काका घरच्यासारखे आपल्या आनंदात सहभागी व्हायचे आणि नात्यातील कुणी गेल्याची तार घेऊन येणारे पोस्टमनकाका घरचीच व्यक्ती असल्यागत धीर वा सांत्वन करायचे.
लहानपणी खरतरं पोस्ट खातं म्हणजे फक्त तार,मनीआँर्डर, पत्र पोहोचवणारं खातं एवढचं समजायचं.पण जसाजसा काळ गेला, समज आली तेव्हा ह्या खात्याचा प्रचंड मोठा आवाका,काम बघून ह्यांच्याप्रती आदर अजूनच दुणावला. पुढे माझ्या आईने पोस्टाची एजन्सी घेतली.आर.डी,एन.एस.सी,के.व्ही.पी,पी.पी. एफ ह्या योजना डोक्यात शिरल्या. ह्या खात्यानेच जणू आम्हा भावंडांना आई करीत असलेलं काम बघून भविष्यात करायची तरतूद, काटकसर,नियोजन आणि सगळ्यात महत्वाची थेंबे थेंबे तळे साठे ही म्हण समजवणारी बचत ह्या गोष्टींचं अपरंपार महत्त्व अगदी लहानपणीच समजावीलं आणि त्याचा फायदा अजूनही आम्हाला होतोय.
भारतात कारभाराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर पसरेलेल्या जाळ्यांमध्ये प्रामुख्याने रेल्वे सेवा,टपाल सेवा ह्याचा उल्लेख करावाच लागेल. भारतीय टपाल सेवा ही भारतातील सरकारच्या टपाल खात्यामार्फत इंडिया पोस्ट या नावाने चालवली जाते. देशाच्या दूरवरच्या आणि पोहोचायला अत्यंत अवघड भागात सुद्धा ही टपालसेवा पोहोचली आहे. भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटांची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये1852 मध्ये झाली तर 1854 पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले.भारतामध्ये पहिले टपाल तिकीट 1931 साली छापले गेले. त्यानंतर पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट 1947 मध्ये निघाले आणि त्यावर भारतीय झेंडा छापण्यात आला.
बचतीच्या बरोबरीने विकास साधण्यासाठी कर्जाचे महत्त्व जाणून भविष्यातील काळाची पावलं ओळखून ह्या टपाल खात्याने “बँकींग सेवा”पण सुरू केलीयं.
ह्या खात्याचे मला स्वतः ला खूप चांगले अनुभव आलेत. यवतमाळ ला सुदधा ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांनी व्यवहारीक बाजू समजावून सांगून खूप सहकार्य केलं. माझे सासरे पोस्ट खात्याचे कर्मचारी होते. त्यामुळे ति.आईंना पोस्ट खात्याची पेन्शन मिळते. आधी यवतमाळ चे पोस्ट आँफीस,ह्या खात्यातील आँडीट सेक्शन आणि आता बडनेरा पोस्ट खात्यातील कर्मचारी ह्यांची मोलाची मदत आणि तत्पर सेवा आम्हाला वेळोवेळी मिळाली आणि अजूनही मिळते आहेच.त्यामुळे ह्या खात्याच्या समस्त कर्मचाऱ्यांना जागतिक टपाल दिना निमीत्ताने धन्यवाद देऊन ह्या खात्याची सेवा आपल्यासाठी खरोखरच गौरवास्पद आहे हे जाणून आजच्या पोस्टची सांगता करते.
दरवर्षी न चुकता हे घडत जातं…डोळ्यांपुढे उभी राहतात ती सारी माणसं जी आपल्याआधी निघून गेली या जगातून. काही माझ्या आधी कैक वर्षे जन्माला आलेली होती म्हणून.. तर काहींना अवेळी बोलावणं आलं म्हणून….गुरुजी सुधांशुला एक एक नाव उच्चारायला लावून पाठोपाठ एका मंत्राचा पुनरुच्चार करीत त्याला त्याच्यापुढे ठेवलेल्या परातीत, हातावर घेतलेलं पाणी सोडायला सांगत होते तेव्हा ती ती माणसं नजरेसमोर दिसू लागली.
आज सासुबाईंचं नवमी श्राद्ध ! मामंजी आहेत अजून. खूप थकलेत म्हणून नातवाच्या हातून करून घेतात तर्पण….दरवर्षी अगदी आग्रहाने. सुधांशु आणि त्याची नोकरीवाली बायको कधी काचकूच करीत नाहीत. सुधांशु कितीही काम असले तरी किमान सकाळची अर्धा दिवसाची सुट्टी घेऊन येतोच घरी आणि सूनबाई रजा टाकतात. सुधांशु दुपारी बारा वाजता काकग्रास ठेवतो बंगल्याच्या भिंतीवर आणि दोन घास खाऊन माघारी जातो त्याच्या कामाला. द्वितीयेला ह्यांचं श्राद्ध असतं, त्यादिवशी तर तो सबंध दिवस सुट्टीच टाकतो….माझ्यासोबत रहाता यावं दिवसभर म्हणून. माझ्या आधी गेले हे. म्हणजे मी ह्यांच्या माघारी श्वास घेत राहिले…एकाच सरणावर जाण्याचं भाग्य माझ्यासारखीच्या कपाळी कुठून असायला?
चुलत जाऊबाई मात्र माझ्यापुढे गेल्या….सर्वच बाबतीत….
‘ अहेव मरण पिवळं सरण, भ्रताराआधी डाव जितला गोरीनं
भ्रताराआधी मरण दे रे देवा, दीर खांदेकरी नणंदा करतील सेवा ।।’
ह्या ओळी जणू त्यांच्यासाठीच लिहिल्या होत्या कुणीतरी. सुधाकर भावोजी मोठ्या लढाईतून जगून वाचून परतले होते. पेन्शन बरीच होती पण ती खायला घरात तिसरं कोणी नाही. ह्यांची बहिण,वसुधा, तिला दिलेली होती दूर तिकडे खानदेशात. तिचं माहेरपण मात्र आमच्या दोन्ही घरांत होत असे निगुतीनं. सुधाकर भावोजी तिचे ह्यांच्यापेक्षा अंमळ जास्तच लाड करायचे. तसा आमच्यातही भावजय-नणंद असा भाव नव्हताच कधी. दिवस पाखरागत उडून गेले आणि जाऊबाईंनी अनाकलनीय दुखण्याने अंथरूण धरले ते कायमचेच. वसुधाताई जाऊबाईंच्या शेवटच्या दिवसात नेमक्या माहेरपणाला आल्या होत्या. त्यांची सेवा घडली त्यांच्या हातून. आणि ह्यांनी खांदा दिला शेवटी.
अजूनही लख्ख़ स्मरतो तो दिवस. जाऊबाईंच्या पार्थिवाला नव्या नवरीचा शृंगार केला होता जमलेल्या आयाबायांनी. एवढा आजारी देह तो.. पण त्यादिवशी चेहरा इतका गोड दिसत होता…पण डोळे मिटलेले ! काठी टेकीत टेकीत तिला शेवटचं पहायला गावातल्या चार दोन वृद्धाही आल्या होत्या. नव्या पोरीही होत्या आसपासच्या. त्या भेदरलेल्या…काही म्हणत नव्हत्या फारसं काही. पण एक वृद्धा म्हणून गेली…’ पोरी हो…कपाळी हळदी-कुंकू लावा….अहेव मरण आलं काकींना…नशीब काढलं !’ असं म्हणत त्या म्हातारीने तिच्या सुरकत्या पडलेल्या हातांनी पार्थिवाला नमस्कार केला….तेव्हा माझा हात आपसूक माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर पडला. माझं सौभाग्य…मी आणि आमचा सुधांशु ! किती दिवसांची असेल सोबत ही अशी? जीवनात सारेच क्षणभंगुरच की. पण याचा विसर मात्र सहजी पडतो जीवाला…नाही?
काळ झपाझप पुढे निघाला..त्याला जणू कुठंतरी खूप दूर जायचं होतं स्वत:लाच ! तिस-याच वर्षी सासुबाईंनी इहलोकीची यात्रा समाप्त केली आणि आमचं घर तसं ओकंओकं झालं. आणि मामंजी अबोल. त्यांचा अगदी बालवयापासूनचा संसार होता. पण कितीही वय झालं तरी साथसंगत संपून जावी असं कुणाला वाटतं? सासुबाई काहीवेळा गंमतीनं म्हणायच्या…..तुमच्यानंतर जन्माली आलेली असले तरी जाताना तुमच्याआधीच जाईन ! यावर मामंजी त्यांना मनापासून रागवायचे आणि मग त्यांच्याकडे पहात रहायचे..चष्म्याच्या भिंगांतून. त्यांची ती नजर, सासुबाईंच्या नजरेतील ते ओलेपण मनात रुतून बसले ! आणि दोनेक वर्षांत सासूबाईंनी डाव जितला ! त्यानंतरच्या पितृपक्षापासून नवमी माझ्या घरीआली. ’अहेवनवमी.’ ‘अविधवा नवमी’ही म्हणतात असं ऐकलं होतं कधीतरी. पहिल्या वर्षी तर कित्येक पानं उठली होती वाड्यात. इतका मान असतो भ्रताराआधी जाणा-या बाईला?
माझ्या चेह-यावरील पूर्णाकृती प्रश्नचिन्ह बघून हे म्हणायचे, “ अगं,वेडे ! जुना काळ तो. चूल आणि मूल नव्हे मुलं हेच विश्व असायचं तुम्हां बायकांचं. पुरुषावर अवलंबून रहायचं स्त्रियांनी सर्वच बाबतीत. माहेर कितीही लाखाचं असलं तरी ते घर फक्त साडी-चोळीपुरतं. कारण तिथं नव्या कारभारणी आरूढ झालेल्या असतच. त्यामुळे नव-याची सुख-दु:खं तीच त्यांचीही होऊन जायची. आणि हा आधार निखळून पडल्यावर बाई गतभ्रर्तृक होई. तिचं भरण-पोषण करणारा, तिची बाजू घेणारा तिचा भ्रतार जगातून नाहीसा झाल्यावर तिचं ओझं कोण वागवणार?.. असा कोता विचार करायची माणसं त्यावेळी. घराबाहेर पडून स्वत:चं आणि पोरंबाळं असल्यास त्यांचं पोट भरण्याचं धारिष्ट्य आणि सोय सुद्धा नव्हती आतासारखी. या सर्वांतून सुटकेचा जवळचा मार्ग म्हणजे पालनकर्त्याच्या आधी जगाला राम राम ठोकणे. पुरुषांचं राहू दे….तिच्यासारख्या इतर बायकांना तिचा हेवा वाटणं किती साहजिक?”
ह्यांनी कितीही समजावून सांगितलं तरी माझ्या मनातल्या एका कोप-यात अहेवपणाचं वेड हळव्या बाईपणाचं लुगडं नेसून घुसून बसलं ते बसलंच. हे आजारी पडले तेव्हा तर मन अगदी धास्तावून गेलं होतं. डोळ्यांत तेल घालून उशाशी बसून रहायचे मी कित्येक रात्री. रामरायाच्या कृपेने यांना आराम पडला आणि मी निर्धास्त झाले. सुधांशु मोठा झाला, शिकला, पोटापाण्याला लागला. शिकली-सवरलेली सून आली. आता माझे दोन दोन पालनकर्ते होते घरात…एक हे आणि दुसरा सुधांशु. आम्हा दोघांच्याही वयांनी उंबरठे ओलांडले आणि इस्पितळांचे चढले. माझी तब्येत तशी तोळामासाच म्हणा प्रथमपासून. हे मात्र स्वत:ची योग्य ती काळजी घेत. लहानपणी गरीबीमुळे खाण्या-पिण्याची आबाळ झालेली होती. पण जरा बरे दिवस पाहिल्यावर शरीरानं उभारी धरली होती यांच्या. जाण्यासारखे नव्हते हो इतक्यात…पण गेले … .. … माझ्याआधी..मला हरवून. सुधांशु म्हणाला होता…..”आई, बाबांच्यानंतर मला तुझ्याच तर प्रेमाचा आधार आहे…तू अशी खचून जाऊ नकोस !” मग मात्र मी स्वत:ला फार त्या विचारांत गुंतवू दिलं नाही. पण दरवर्षी द्वितीया आणि नवमी यायची आणि माझ्या थकत चाललेल्या चेह-याच्या नकाशात निराशेचं बेट अगदी ठळक दिसू लागायचं…समुद्रातून अचानक वरती आलेल्या बेटासारखं…!
आज सासुबाईंची ‘अविधवानवमी’ . कालपासून तयारी सुरू होती. गुरुजी तर दरवर्षी नेमानं येणारे. त्यांना आठवण करून द्यावी लागत नाही…उलट तेच निरोप देतात…येतो म्हणून. पण मला बरंच वाटत नव्हतं गेल्या काही दिवसांपासून…खूप थकवा जाणवत होता. गुरूजी आले….घर त्या मंत्रांनी भरून आणि भारावून गेलं. माहेरकडची, सासरकडची सारी माणसं.. त्यांच्या प्रत्येकाच्या नावांच्या उल्लेखानं जणू जिवंत होऊन एका रांगेत येऊन बसली पंगतीला….सासुबाई, जाऊबाईही होत्या…कपाळी कुंकू लेवून. पण मला त्यांना कुंकू लावायची परवानगी नव्हती…मी कुठं अहेव होते?
टळटळीत दुपार झाली. सूर्य डोक्यावर आला. नैवेद्य..ज्याचे त्याला ठेवले गेले. सुधांशुने,सूनबाईने सासूबाईंच्या तसबीरीपुढे डोके टेकवले…मामंजी त्यांच्या खोलीतल्या बिछान्यावर जरासे उठून बसले…थरथरत्या हातांनी नमस्कार करीत.
सुधांशुने माझ्या हाताला धरून मला उठवलं…आई….वहा हळदीकुंकू आजीच्या तसबीरीवर ! मी चमकून त्याच्याकडे पाहिलं….तो म्हणाला…”अगं पालन-पोषण करणारा फक्त नवराच असतो का…मुलगा नसतो का आईचा पालनकर्ता…आधारस्तंभ? बाबा नसले म्हणून काय झालं? तू मागे राहिली नसतीस तर मला कोण असलं असतं. आता मी आहे की….तुला शेवटपर्यंत.”
माझ्या डोळ्यांना धारा लागलेल्या…भिंतीवरच्या ह्यांच्या तसबिरीकडे पहात राहिले. सूनबाईंनी माझा एक हात हाती घेतला. मी ह्यांच्या तसबीरीच्या काचेत पाहिलं…सुधांशु मागे उभा होता…..आणि तसबीरीतील ह्यांच्या डोळ्यांतही आज चमक दिसत होती ! सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडून, नव-यामागे त्याच्या आईवडिलांची सासु-सासऱ्यांची मुलाप्रमाणेच सेवा करण्याचं भाग्य लाभलेल्या माझा.. हो .. माझा मलाच हेवा वाटू लागला होता ! अहेवनवमीही मंद स्मित करीत पुढे सरकत होती…आणि आज मला तिचा हेवा वाटत नव्हता !
(अशीच एक आई आणि तिचा मुलगा आठवला…ह्या पितृपक्षात. या घटनेला बराच कालावधी उलटून गेला आहे तरी स्पष्ट आठवली दोघं. कालानुसार बदललं पाहिजे सर्वांनी. आठवलं तसं लिहिलं…काही कालक्रम इकडचा तिकडे झाला असेलही. पण असे सुधांशु आहेत म्हणून ही नवमी ‘अहेव’ आहे, असे म्हटल्याशिवाय राहावत नाही.)
☆एकमेव वामन मंदिर !!!… लेखक : साकेत नितीन देव ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
श्री विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार हा ‘वामन’ अवतार मानला जातो. हातात कमंडलू , डोक्यावर छत्र अणि एक पाय बळीराजाच्या माथ्यावर ठेवलेल्या वामनांचे चित्र अनेकदा बघितलेलं, मात्र वामनांची मूर्ती कुठेच दिसली नाही. ती इच्छा आपल्याच पुण्यात पूर्ण झाली.
पुराणांतील एका कथेनुसार, असुरांचे गुरू ‘शुक्राचार्य’ यांनी संजीवनी विद्या अवगत केली. त्याच्यामुळे मेलेले असुर पुन्हा जिवंत होऊ लागले. शुक्राचार्य हे असुरांचा राजा ‘बळीराजा’ साठी एक मोठा यज्ञ करतात. असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते अणि ते इंद्रावर हल्ला करण्याची तयारी करतात. जर बळीराजाचे शंभर यज्ञ पूर्ण झाले, तर त्याला इंद्रपद मिळेल या भीतीने इंद्रदेव श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.
महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रुपात जन्म घेतात. त्या बाळाचे नामकरण ‘वामन’ असे करण्यात येते. ऋषिमुनींकडून मृगचर्म, पलाश दंड, वस्त्र, छत्र, खडावा, कमंडळु वस्तू मिळाल्यावर वामन यज्ञास्थळी पोहोचतात. बटू रूपातील श्री वामन बळीराजाकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात अणि भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात, बळीराजा वचन देतात.
वामन विशाल रूप घेतात अणि एक पाय पृथ्वीवर आणि दुसरा पाय स्वर्गात ठेवुन दोन पावले घेतात. आणि मग बळीराजाला विचारतात “आता तिसरे पाऊल कुठे ठेवु?” आपला पराभव मान्य करत, पण दिलेले वचन पाळत शेवटी बळीराजा वामनासमोर नतमस्तक होतात व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतात. वामन तसेच करतात अणि बळीराजाला पाताळात ढकलतात. (ज्या दिवशी हे घडले तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा !). पुढे वामन पृथ्वी मानवांना अणि स्वर्ग देवांना देऊन टाकतो.
तर, अशा या वामनांचे एक मंदिर आपल्या पुण्यात आहे. डावा हात हृदयाशी, उजवा हात मोकळा सोडलेला, गळ्यात माळ, अंगात जानवे अणि चेहर्यावर प्रसन्न भाव अशी वामनांची मूर्ती आहे. विशेष म्हणजे शेजारी वामनांची आई ‘अदिती ‘ उभी आहे. माता अदितीच्या डाव्या हातात कमलपुष्प तर उजवा हात वामनांच्या खांद्यावर अभय मुद्रेत आहे. या दोन्ही मूर्तींना प्रभावळ असून, हे संपूर्ण शिल्प संगमरवरी दगडात घडवलेले आहे.
अशा प्रकारचे हे कदाचित भारतातील एकमेव मंदिर असावे. सदर मंदिर शुक्रवार पेठेत, राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या शेजारी आहे. पूर्वी मंदिराला सभामंडप व गाभारा होता. तिथे असलेल्या ‘धर्म चैतन्य’ संस्थेत वासुदेवशास्त्री कोल्हटकर यांचे कीर्तन होत असे. एक शाळा ही भारत असत. आज ‘आल्हाद’ नवाच्या इमारतीच्या तळघरात हे मंदिर आहे. मंदिर खाजगी असून श्री कोल्हटकर त्याची व्यवस्था बघतात.
लेखक : साकेत नितीन देव
(वामन जयंती, शके १९४५)
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘तुमची सतत सोबत करणारा तुमचा खरा साथीदार कोण?’ असा प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर आपण कांही क्षण गोंधळून जाऊ. प्रश्न ऐकताच मनात निर्माण झालेल्या संभाव्य उत्तरांपैकी आई, बाबा, भाऊ, बहीण, पत्नी, मुलं, मित्र यापैकी कुणाचे नाव घ्यावे हा संभ्रम आपल्याला गोंधळात टाकेल.पण ‘खऱ्या अर्थाने आपला साथीदार म्हणावं असं यापैकी कुणीच असू शकत नाही’ हा विचार मात्र या वैचारिक गोंधळात आपल्या मनातही येणार नाही. कारण खऱ्या अर्थाने साथीदाराची भूमिका निभावणाऱ्यांचं योगदान आपल्या खिजगणतीतही नसतं!
आपल्या पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देणारं, आपली सोबत करणारं, एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात असं कुणी असेल तर ते म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन !!
जन्मतः हातीपायी धड शरीर आणि आपलं जगणं सजग करणारं मन दोन्हीही सक्षम,निरोगी,स्वयंपूर्ण राखण्याची जबाबदारी अर्थातच आपलीच असते. मात्र ही जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडणारे अपवादात्मकच असतात एवढं खरं. पूर्णतः स्वावलंबी असण्यासाठी निरोगी शरीर आणि खंबीर मन या अत्यावश्यक गोष्टी,पण स्वावलंबी असण्यातलं सुख परावलंबित्व येतं तेव्हाच समजतं याचं काय करायचं?
खरंतर माणसाला विनामूल्य, अगदी सहज जे उपलब्ध होतं त्याची किंमतच नसते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपलं शरीर आणि मनच! या दोन्हींची सक्षमता जगणं आनंदी करण्यासाठीची आपली मूलभूत गरज आहे याची आपल्याला जाणीवच नसते आणि ती होते तेव्हा बराच उशीर झालेला असतो.असं होऊ नये म्हणून आपल्या शरीरमनाला संजीवनी देणारा एक परवलीचा जादुई शब्द आहे. त्याचा अर्थ न् आवाका आपण समजून घ्यायलाच हवा.
सहजासहजी न मिळणारं पण सातत्यपूर्ण प्रयत्नांती ‘ देता घेशील किती दोन कराने’ असा चमत्कार घडवू शकणारा संजीवक मंत्रच भासावा असा हा सामर्थ्यवान शब्द म्हणजे ‘ बल’!
हा शब्द ऐकताच तो मुख्यत: शरीराशी संबंधित असावा असंच वाटतं याचं कारण या शब्दाचे ‘शक्ती’ आणि ‘सामर्थ्य’ हे सर्रास रुढ असणारे अर्थ.तरीही या दोन्ही अर्थांनाही इतका मर्यादित संदर्भ मात्र अपेक्षित नाहीय.शक्ती आणि सामर्थ्य हे शब्द केवळ बळकट, सशक्त, भक्कम शरीराचेच नव्हेत फक्त तर धैर्यशील,खंबीर,कणखर मनाचेही निदर्शक आहेत.
प्रतिकारशक्ती, अंगबळ, बाहुबळ, वकूब, बलाढ्य,बलवान,बलवंत, बलशाली,बलदंड,या शरीरबलाशी संबंधित अर्थसावल्या जशा तशाच मनोबल, सहनशक्ती, मन:शक्ती, इच्छाशक्ती, विचारशक्ती या आहेत मनाशी संबंधित!
शरीर आणि मनाच्या सक्षमतेला बुद्धिबलाची जोड नक्कीच पूरक ठरते.
आध्यात्मिक उन्नतीव्दारे प्राप्त होणाऱ्या बलाची प्राणशक्ती,तपोबल, तपसामर्थ्य, आत्मशक्ती ही कांही शब्दरुपे.
खरंतर शरीरबल असो वा मनोबल ते संकटाशी दोन हात करायचं सामर्थ्य देतात.ती संकटाचं निवारण करायला समर्थही असतात.पण हेच सामर्थ्य समोरचा प्रतिस्पर्धी जर कमकुवत असेल तर त्याला मात्र अस्मानी संकटच वाटतात.बलातूनच निर्माण होणारा ‘बला’ हा शब्द अशा भयप्रद संकटासाठीच वापरला जातो.
स्त्रीचा उल्लेख अनेकदा बल नसलेली, कमकुवत याअर्थी अनेकदा ‘अबला’ असा केला जातो. तरीही स्त्री खऱ्या अर्थाने अबला नसून सबला असल्याची असंख्य उदाहरणे आहेत जी ‘नारीशक्ती’चीच द्योतक ठरतात!
सामर्थ्याचा नकारात्मक,विध्वंसक वापर अधोरेखित करणारे पाशवी शक्ती,बलात्कार यासारखे शब्द स्वतःच त्यातली नकारात्मकता,कुरुपता ठळक करणारे आहेत.
शारीरिक बळ आणि मनोबल ही खरंतर निसर्गदत्त वरदानंच.माणसाने ती ओळखणं,जपणं,वृध्दिंगत करणं आणि त्याचा सकारात्मक वापर करणं हेच निसर्गाला अपेक्षित आहे. मात्र याचा विसर पडल्याचे सर्रास वास्तव मात्र कणाकणाने माणसालाच हळूहळू नि:शक्त करीत ‘हतबल’ करणारे ठरते आहे याचे भान हरवून चालणार नाही. पण..? उमज पडेल तर..!!
शारदा दारातून आत आली. आणि म्हणाली, “ वहिनी या बघा नवीन बांगड्या काल घेतल्या. दोनशे रुपयांना…” चकचकीत बांगड्यांनी तिचा हात खुलून दिसत होता…..आणि हातापेक्षाही चेहऱ्यावरचा आनंद लोभसवाणा होता…
“ अगं किती छान आहेत.. थांब शारदा फोटो काढते.”
“ नको नको “ ती लाजून म्हणाली
“ अगं तुझा नाही.. बांगड्यांचा काढते. मग तर झालं….” मी फोटो काढला…
बांगड्यांवरून प्रेमानी हात फिरवून शारदा कामाला लागली…
दिवसभर काम करूनही ती नेहमी आनंदातच असते…
देवाची पूजा करताना बाप्पाला गुलाब वाहिला आणि सरूची आठवण आली…
काळी सावळी तरतरीत सरू मी गेले की ‘ या काकू ‘ म्हणते. मी नेहमी तिच्याकडूनच फुलं घेते. काल फुलं घेतली तर एक टपोरा गुलाब देऊन म्हणाली “ काकू हा घ्या तुमच्या देवाला.. “ मनात आलं किती गोड निरागस मन आहे पोरीचं….देवाला हात जोडले त्याला मनोमन प्रार्थना केली .. ‘ दिवसभर कष्ट करणाऱ्या सरूला सुखी ठेव…’
साहिलच्या म्हणजे नातवाच्या शाळेत फनफेअर होतं. तिथे त्यांचा पाणीपुरीचा स्टॉल होता. तो बघायला निघाले होते. रिक्षा बघत होते… काल साहिलने सांगितले होते आजी आम्ही चीज रगडापुरी करणार
आहोत “
“अरे पण असं कसं? रगडापुरी वर चीज….”
“ हो आमचं तसच ठरल आहे..आणि पाणीपुरीवर नेहमीचं चिंचेचं पाणी नाही तर आम्ही त्यात थम्सअप फॅन्टा आणि स्प्राईट घालणार आहोत…त्याला आम्ही पाणीपुरी शॉटस् असं नाव दिले आहे. “
“ अरे हे कसलं कॉम्बिनेशन? कुणी खाईल का? “
“ अगं टीचर पण म्हणाल्या.. तुम्हाला करावसं वाटतंय ना करून बघा….
काय झालं असेल की…मी विचार करत होते तेवढ्यात ‘ नीता…’ अशी हाक आली
मैत्रीण दुकानात आईस्क्रीम घेत होती. बाई साहेबांनी स्वेटर घातला होता आणि घेत होती आईस्क्रीम…
विचारलं तर म्हणाली “ थंडीतच मजा येते..ही घे तुला एक कॅंडी जाताना खा. “ वर डोळा मारून म्हणाली
“ वन फाॅर द रोड एन्जॉय इट.. घे ग कोणी बघत नाही….”
आयुष्यात प्रथमच रिक्षात बसून आईस कँडी खाताना गंमत वाटत होती….
फन फेअरला पोचले, तर तिथे खूपच मजा चालली होती.
नातवाच्या स्टॉलवर गर्दी उसळली होती लोक धमाल करत होते.
पाणीपुरी शॉटस् हिट झाली होती…
आई बाबा आजी आजोबा पोरं… सगळे हसत होते .. ट्राय करून बघत होते…
मुलं मुली चीज रगडा पुरी बनवत होते, ते पण लोक आवडीने खात होते…
‘ कसली भारी आयडिया आहे ना…वाॅव…..’ वगैरे चाललं होतं
इतकी गर्दी होती की नातवाला आमच्याकडे बघायलाही वेळ नव्हता
हे आणि सुनबाईचे आई-वडील पण आले. आम्ही चौघेही गप्पा मारत बसलो.
खूप वेळानंतर साहिल सांगायला आला, “ आजी आमचं सगळं संपलं तुला शॉट्स नाही मिळाले ना .. आता उद्या घरी करू तेव्हा तू ट्राय कर…चालेल ? “….
मनात म्हणाले, “ नाही रे राजा…. उलट आज मला सुखाचे शॉट्स मिळाले.. ते कसे घ्यायचे हे समजले..
त्याची चव ही दुय्यम होती.. मुलांचा आनंद महत्त्वाचा होता “
खरंच अशा छोट्या छोट्या शॉट्सनीच जीवनाची मजा घ्यायला शिकू…
ते असतातच आसपास…बघायचे ठरवले तर दिसतात..
बघायचे…. हळूहळू येईल ती दृष्टी….मग दिसतील आपले आपले सुखाचे शॉटस्
मग ठरलं तर…’ अशा शॉटस्ची मजा घेत आयुष्य जगायचं .. अगदी आनंदानी…’
☆ स्वाधार प्रकल्प – पर्यावरण उत्सव – इको मेला… ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
दिनांक ३० सप्टेंबर २०२३ यादिवशी पर्यावरण उत्सव स. ८:०० ते दु. ३:०० या वेळेत झाला. या उत्सवात एकुण ३२ गावातून १८२ जण सहभागी झाले. वेल्हे तालुक्यातील जैवविविधता समजून घेत असताना ही विविधता सर्वांपर्यंत पोहचावी असा उद्देश ठेवून पहिल्या पर्यावरण उत्सवाचे नियोजन करण्यात आले. हा उत्सव पासली येथे सुरू होऊन वेगवेगळ्या ५ गावांमध्ये जाऊन संपला.
सकाळी ८:३० वाजता पासली येथे शुल्क देऊन आलेले साधारण १०८ पाहुणे व आपल्या ५० कार्यकर्त्या + स्थानिक १५-२० असे १८० जण पोहचल्यावर सर्वांसाठी नाचणी उपमा, घावन चटणी, पोहे असा ज्यांना जो हवा त्याप्रमाणे नाष्टा झाला.
एकीकडे २१ रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. ते बघण्याचा आणि माहिती घेण्याचा आनंद सर्वजण घेत होते. त्याचबरोबर बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. तिथे ही कोणी बांबूच्या वस्तू खरेदी केल्या तर कोणी गावरान तूप, नाचणी लाडू, मिश्र धान्य लाडू, नाचणी रवा, हळद, थेपला, पर्स, शेवई… अशी एकुण साधारण १५०००/- रुपयांची विक्री झाली. त्यानंतर सर्वांना एकत्र करुन प्रबोधिनी व प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर सगळा गट केळदची देवराई बघण्यासाठी गेला. तिथे अमृता जोगळेकर व मेधावी राजवाडे या दोघींनी सर्वांना देवराईची माहिती दिली. दु. १:०० या सर्वांचे गट करून ५ गावांमध्ये व्हेज व स्थानिक नॉनव्हेज जेवणासाठी गेले.
कोफोर्ज मधून ६ जणांचा गट आला होता त्यांनी पुढे निगड्यात जाऊन गटाने वृक्षारोपण केले व जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्या त्या गावात समारोप झाला. *या उत्सवात एकुण ९०,०००/- रुपयांची उलाढाल झाली.
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एका उदास संध्याकाळी आकाशाला फार रितं रितं वाटत होतं. सारखं कुणीतरी यावं, कुणीतरी यावं असं वाटायला लागलं. म्हणून त्यानं स्वागताची भव्य तयारी केली सुरू केली. इंद्रधनूची सप्तरंगी कमान उभी केली, पायवाटेवर लाल मखमल अंथरली पण कुणी आलंच नाही. त्याला वाटलं आपण या सजावटीसाठी एवढे कष्ट केले, इतकी सुंदर रांगोळी पण घातली तरी कोणी का आले नाही? तो सूर्य किंवा चंद्र कोणाला तरी जबरदस्तीने घेऊन यावं का? पण जर जबरदस्तीनं आणलं तर हे उदास वातावरण तसंच राहील. त्याच्या लक्षात आलं कि कुणीतरी यावं असं वाटणं हे अर्थशून्य आहे. कुणाला तरी यावं असं वाटणं हेच जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या तयारीचा काही उपयोग नाही. अखेर सगळी स्वागताची तयारी त्यानं गुंडाळून ठेवली आणि खिन्नपणे बसून राहीला. थोडया वेळाने एक एक करत तारे आले. तारकां आल्या सारं आकाश त्यांच्या चमचमाटानं भरून भारून गेलं. वारा ही मग इकडून तिकडे, तिकडून इकडे पळापळा करू लागला. खिन्न असलेलं वातावरण क्षणात आल्हाददायक झालं. आकाशाला कळेना, अरे! कुणी कमान कां उभी केली नाही म्हणून विचारलं नाही, कुणी गालीचा कां अंथरला नाही म्हणून थांबलं नाही. कुणाला या ही म्हणावं लागलं नाही. म्हणजे कुणाला तरी यावं असं वाटणं महत्त्वाचं असतं. मग त्याच्या मागून उल्हास आपोआप येतो. स्वागत करणाऱ्यांकडे उल्हास आला कि येणारे आनंद घेऊनच येतात. अशावेळी स्वागताची सजावट हा फक्त उपचार असतो.
विश्वाच्या निर्मितीत जगन्नियंत्याने एक सर्वांगसुंदर निर्मिती केली ती म्हणजे स्त्रीची. शिवाय तिला सृजनत्वाचे वरदान देऊन श्रेष्ठत्वही बहाल केले. स्त्री पुरुष हे समाजाचे दोन आधारस्तंभ. पण स्त्रीला कायमच दुय्यम स्थान दिले गेले आहे. तिला सतत अत्याचार, अन्याय सहन करावे लागतात. त्यात तिची चूक काहीच नसते. अशाच एका पीडितेने अख्ख्या जगाला आपल्या सन्मानासाठी अतिशय कळवळून केलेला प्रश्न आणि शेवटी पेटून उठत दिलेले आव्हान म्हणजे डॉ. निशिकांत श्रोत्री यांची कविता ‘अब्रू’. या अतिशय गाजलेल्या कवितेचा आपण आज रसास्वाद घेणार आहोत.
जगाचं हे मोठंच्या मोठं डिपार्टमेंटल स्टोअर आहे. ते झगमगत्या ट्यूबलाइट्सनी उजळलेलं आणि रंगीबेरंगी चित्रांनी सजवलेलं आहे. इथे छोट्याशा टोकदार टाचणी पासून अजस्त्र मोठ्या विमानापर्यंत अगदी कोणतीही गोष्ट सहजपणे मिळते. मग या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मला माझी अब्रू , माझा सन्मान मिळेल का हो ? असे एक पीडित स्त्री विचारते.
कवीने इथे अख्ख्या जगालाच एका डिपार्टमेंटल स्टोअरचे रूपक योजले आहे. ते स्टोअर अतिशय समृद्ध आहे. इथे काही नाही असे नाहीच. ते अतिशय आकर्षक आहे जणू काही एखादं भुलभुलैय्या नंदनवनच.पण इथे सर्व काही मिळत असतानाही स्त्रीला मात्र काही गोष्टींपासून वंचित ठेवले जाते. आजूबाजूच्या एवढ्या विशाल जगात तिला मात्र कोणी वाली मिळत नाही ही गोष्ट तिला हतबल करून सोडणारी आहे .
ही मुक्तछंदातली कविता आहे. प्रथम पुरुषी एकवचनातली ही कविता एका अत्याचार पीडितेची कहाणी,आर्त तळमळ कथन करते. पण ती फक्त एका स्त्रीची कहाणी एवढीच मर्यादित न रहाता अवघ्या स्त्री जातीची व्यथा वेदना इथे मांडते आहे.
तिचं मोल द्यायला
ना माझ्यापाशी धनाच्या राशी
ना कीर्तीचे डोंगर
जवळ तसं काहीच नाही
मी तर फुटक्या नशिबाची
एक दरिद्री अभागिन
लंकेची पार्वती !
तरीही फुकट कोण देणार
म्हणून बरोबर घेतले होते
माझे लाख मोलाचे शील
तेवढीच माझी पुंजी !
पण या स्त्रीची अवस्था दयनीय झालेली आहे. तिच्यापाशी धनदौलत नाही. तिचं असं काहीच ऐश्वर्य नाही. जे खरेदीसाठी उपयोगी पडेल असं हाती काहीच नाही. इथे ‘लंकेची पार्वती’ हे रूपक तिची अवस्था स्पष्ट करते. ती पूर्ण परावलंबी आहे. तिला कसलेही निर्णय स्वातंत्र्य नाही. हाती धन नाही. सर्वच गोष्टींपासून ती वंचित आहे. फक्त तिची पुंजी म्हणून तिच्याकडे तिचं शील तेवढंच आहे. त्यामुळे ती हतबल झालेली आहे.
ठाऊक नव्हते मला
या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये
कोहळ्याच्या मोलाने मिळतो
छोटासाच, पण
दात आंबवणारा आंबटढाण आवळा !
किती गच्च आवळून सशासारखी
उराशी धरावी लागत होती मला
माझी एकुलती एक पुंजी !
या जगाच्या व्यवहारात फसवणूक करणारेच जास्त असतात. आवळा देऊन कोहळा काढणे हा त्यांचा स्वभावधर्म असतो. ज्याच्यामुळे दात आंबतात असा अगदी छोटासा आंबटढाण आवळा देऊन त्या बदली मोठा पौष्टिक कोहळा ते चतुराईने मिळवतात. या मतलबी लोकांचे कारस्थान ती ओळखू शकत नाही. त्यांच्यात अगदी घाबरून वावरत रहाते. पैशाच्या जोरावर गैरकृत्य करणाऱ्यांचे वर्तन वरून कधीच लक्षात येत नाही म्हणूनच खोटी प्रलोभनं दाखवून या ना त्या कारणाने तिची फसवणूक करत तिचे शील लुटले जाते आणि पुन्हा तिलाच बदनाम करून घरातून बेदखल केले जाते. अन्याय करणारे अंधारात रहातात आणि शिक्षा मात्र तिच्याच माथी येते हे खरे दुर्दैव आहे.
त्या पुंजीवरच माझ्या
डोळा फार सगळ्यांचा
डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये
विक्रीसाठी बसलेल्या व्यापाऱ्यांचा,
खरेदीसाठी आलेल्या गिऱ्हाईकांचा
अन् विकायला ठेवलेल्या मालाचा सुद्धा;
मग दलालांचे तर काही विचारूच नका….
सगळीच गिधाड !
झाडावरचे कावळे देखील भेदरून
उगीचच आपले काणे डोळे
इकडून तिकडे टोलवत बसलेले !
तिच्या त्या पुंजीवरच त्या स्टोअरमधील सर्वांचा डोळा होता. तिथे विक्री करणारे व्यापारी, खरेदी करणारे ग्राहक, अगदी विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंचा सुद्धा मग दलालांचे तर काही विचारूच नका. ते टपलेलेच होते. एकजात सगळी बुभुक्षित गिधाडं. झाडावरचे कावळे सुध्दा मदतीला तर येत नव्हते, पण नजर इकडे तिकडे फिरवत त्रयस्थपणे फक्त मजा मात्र बघत होते.
इथे व्यापारी, गिऱ्हाईक, विक्रीचा माल, कावळे ही माणसांचीच रूपके आहेत. आजकालचे वास्तवही हेच सांगते आहे. तिची बोली लावणारे, तिच्यावर अत्याचार करणारे, हे सर्व तटस्थपणे त्रयस्थांसारखे पाहणारे तिच्या जवळचे, नात्यातले सुद्धा असू शकतात. मग परक्यांची गोष्ट तर विचारायलाच नको. माणसंच माणसांना कशा प्रकारे वागवू शकतात हे कुणालाच सांगता येणार नाही
ही गोष्ट तर फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. द्रौपदी वस्त्रहरण हे तर याचे ज्वलंत उदाहरण आहे. तिच्यावर अत्याचार करवणारे, करणारे आणि हतबलपणे ते बघत निष्क्रिय रहाणारे तर रथी-महारथी असूनही होणारा अनर्थ ते टाळू शकले नाहीत. खरे तर अशावेळी माणुसकी म्हणून सुध्दा कोणीही मदतीला येत नाही. सगळेच नुसती बघ्याची भूमिका घेतात हेच दुर्दैव आहे. धाडस करून कुणी मदतीला आलेच तर होणारा अनर्थ निश्चित टळू शकतो अशीही उदाहरणे आहेत. या वास्तवावर कवी इथे उत्तम भाष्य करतो.
उमगलंच नाही मला
केव्हा लुटली गेली
माझी जिवाभावाची पुंजी
मनानं नाही तरी
देहानं मात्र
करायला मला शीलभ्रष्ट…
फासायला माझ्या अवघ्या अस्तित्वालाच
अन् रुपालाही
अंवसेचा काजळ काळिमा…
तरीहि माझ्या पदरात
अब्रू नाही ती नाहीच !
तिची फसवणूक करत तिचं शील केव्हा लुटलं गेलं हे तिला सुध्दा समजल नाही. मनाने ती पवित्र होती पण देहाने त्यांनी तिला शीलभ्रष्ट केले. तिच्या अवघ्या अस्तित्वाला काळिमा फासला आणि तिला बेरूप केले गेले. एवढं सगळं अघटीत घडूनही त्या बदल्यात तिच्या पदरात अब्रू नाहीच पडली हे तिचे मोठे दुर्दैव .
तिचा काहीच दोष नसताना झालेल्या इतक्या लुबाडणूकीने तिला जगणे अशक्य झाले. तिचे मन शुद्ध असूनही समाज तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागला. त्यामुळे तिला उजळ माथ्याने जगणे अशक्य झाले.
दया करा हो, दया करा
पोटाची भूक मारेन
पण अस्तित्वाचीच होणारी
फरपटवणारी ही उपासमार
कुठवर सोसावी आता
अशा अगतिक अवस्थेत ?
उसनी म्हणून तरी
अब्रू मिळेल का हो, मला अब्रू मिळेल का ?
या होणाऱ्या दयनीय अवस्थेने ती स्त्री अगदीच लाचार झालेली आहे. ती एक वेळ भूक सहन करेल. कारण देहाच्या या गरजेकडे दुर्लक्ष करता येईल. पण तिच्या मनाचे काय? तिच्यावर ओढवलेल्या दुरावस्थेमुळे तिच्या पूर्ण अस्तित्वालाच काळीमा फासलेला आहे. समाजात तिला आता मानाचे स्थान राहिलेले नाही. सगळे जग तिच्याकडे कुत्सित नजरेने बघत आहे आणि ही मनाची कुचंबणा तिला अतिशय असह्य होते आहे.
त्यामुळे तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी तिला समाजाकडून सन्मानाची अपेक्षा आहे. तिची कुणी हेटाळणी करू नये. जी चूक तिने केलीच नाही त्याची शिक्षा तिच्या माथी मारू नये आणि तिचे जगणे शांतपणे तिला जगू द्यावे हीच तिची रास्त अपेक्षा आहे.
इथे सगळं विकतच मिळतं
ठाऊक आहे मला
पण माझी पुंजीच
लुटली गेली आहे हो !
अब्रूच्या बोलीवर चक्क फसवणूक !
तरी पण मला हवी आहे
एखादी फाटकी तुटकी तरी
कसलीही अब्रू
उसनी द्या, खात्यावर द्या
नाहीतर भीक म्हणून द्या
पण अब्रू द्या हो, मला अब्रू द्या !
वेगवेगळी प्रलोभने दाखवून तिची फसवणूक केली गेली. तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले गेले आणि यासाठी तिलाच जबाबदार धरण्यात आले. तिलाच बदनाम ठरवून समाजातून उठवले गेले. त्यामुळे घायाळ होऊन ती पुन्हा पुन्हा सर्वांकडे मिनतवारी करते आहे. यात ती पूर्ण निर्दोष आहे म्हणूनच तिला लोकांकडून माणुसकीची अपेक्षा आहे.
नाही देत ?
का हो ?
काय चुकलं माझं ?
तुमच्याच भल्यासाठी ना
उदात्तपणे उधळली मी माझी अब्रू
हुंड्यात आणि पेटत्या ज्वालेत
राखायला तुमची उज्ज्वल प्रतिमा ?
मग आता मात्र
तोंड का वळवता ?
अखेरचेच मागते आहे
तुमच्यापुढे पदर पसरून
मला अब्रू हवी आहे
मला अब्रू द्या.
कधी घराण्याच्या वारसासाठी, कधी हुंड्यासाठी, कधी आणखी काही मागण्यांसाठी स्त्रीलाच वेठीला धरले जाते. अगदी प्रगतीच्या मार्गात तिचा शिडीसारखा वापरही काहीवेळा होतो. त्यासाठी सतत मानहानी, छळ, मारहाण, जोरजबरदस्ती केली जाते.
पण या सगळ्याला तिलाच जबाबदार धरले जाते. तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते .शेवट तिला जाळून मारले जाते, नाही तर तिला आत्महत्या करायला भाग पाडले जाते. ती घरासाठीच हे सर्व करत असूनही तिलाच कुलटा ठरवत घराबाहेर काढले जाते. तिला पूर्ण बदनाम करीत परावलंबी बनवले जाते. यातून बाहेर पडण्यासाठीच तिची ही सन्मानासाठी मागणी आहे.
मुकाट्यानं द्या,
बऱ्या बोलानं द्या…
नाहीतर बलात्कारान चोरावी लागेल मला
तुमच्या अब्रूची लक्तरं
उघड्यावर टांगून
याच डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये
कारण ….
मला अब्रू हवी आहे हो, मला अब्रू हवी आहे !
तिने सर्व पद्धतीने त्यांच्या विनवण्या केल्या. आपल्याला असे बदनाम करू नये. आपले निरपराधीत्व मान्य करून पुन्हा मान द्यावा अशी मागणी केली आहे. सरळपणे हे जर मान्य नाही न केले तर त्यांच्या कुकर्माचा पाढा सर्व समाजापुढे वाचून त्यांच्याच गुन्ह्याची, अब्रूची लक्तरे सर्वांसमोर उघड करायची धमकी दिली आहे. आपल्यावरील अन्यायाने ती आता परती पेटून उठली आहे.त्यामुळे ती आता गप्प रहाणार नाही. नारी शक्ती जर चवताळून उठली तर काय करू शकते हे समाजाने वेळीच लक्षात घेतले पाहिजे. एकवटलेली स्त्री शक्ती समाजात उलथापालथ घडवू शकते. कारण स्त्री शिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही. पुरुषाला भावनिक मानसिक आधारासाठी स्त्रीची गरज असते. त्यामुळे तिला योग्य सन्मान देणे हे अगत्याचेच आहे. एकीकडे पूजा करायची आणि दुसरीकडे लाथाडायचे हे पूर्ण थांबवले पाहिजे.
अतिशय भावपूर्ण अशा या कवितेत डिपार्टमेंटल स्टोअर हे प्रचंड विश्वाचे रूपक, तर त्यातले विक्रेते, खरेदीदार, विक्रीचा माल, कावळे ही माणसांचीच रूपके, आवळा, लंकेची पार्वती ही रूपके आहेत. यातून माणसेच माणसांना किती अन्याय्य पद्धतीने वागवतात, कसे अत्याचार करतात हे अचूकपणे सांगितलेले आहे. असे अत्याचार करणारे अगदी जवळचे किंवा दूरचे कोणीही असू शकतात. अशावेळी बाहेरचे त्रयस्थपणे फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे तिला वाचवायला कोणीच नसते. वास्तवात घडणाऱ्या अशा घटनांनी मन सुन्न होते. अशा घटनांचे वास्तव कवीने या कवितेत नेमक्या शब्दात मांडलेले आहे.
कवीने तिची भावनिक, मानसिक स्पंदने अचूक शब्दांत टिपलेली आहेत. त्यातली आर्तता, तिची कासाविशी आपल्या मनाला जाऊन भिडते. आज काळ बदलला आहे. स्त्रीने आपले कर्तृत्व प्रत्येक आघाडीवर सिद्ध केलेले आहे. तरीही तिचे भोग पूर्णपणे संपलेत असे झालेले नाही. फक्त त्याची रूपे बदलली आहेत.
स्त्रीच्या एका दाहक, जीवघेण्या अनुभवाची ही करूण कहाणी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या ‘अब्रू’ या भावस्पर्शी कवितेतून सांगितली आहे. तिची अनुभूती आपल्याला बेचैन करून जाते. शेवटी ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ हे दुर्दैवी वास्तव आहे.
☆ “प्रश्न अनेक, पण उत्तरांचा पत्ताच नाही !” – भाग-१ … लेखक : डॉ. मयुरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देताना सामाजिक प्रवर्तकांना हेच अपेक्षित होतं का? समाजातल्या व्यावसायिकांना अशाप्रकारे लुटणं अपेक्षित होतं का? याची उत्तरं कुणी मागायची आणि या प्रकारांवर अंकुश कोण आणणार? याचं ठोस उत्तर समाजाला हवं आहे.
सार्वजनिक उत्सव हे अशा गोष्टी राजरोसपणे करण्यासाठीचं हक्काचं निमित्त आहे का? माणसांना जे एकट्याला किंवा स्वतंत्रपणे करता येणार नाही, नेमक्या त्याच गोष्टी अशा मोठ्या गर्दीचा फायदा घेऊन केल्या जातात का? यातलं तथ्य शोधण्याकरिता सामाजिक संशोधनाची आवश्यकता आहे.
सार्वजनिक मिरवणुकीचं गणितच फार निराळं आहे. दहा दिवसांकरिता प्रतिष्ठापित केलेला देव नवव्या दिवशी दुपारीच मांडवाबाहेर काढायचा, आदल्या दिवशी रात्रीच त्या पूजेतल्या देवालाच थेट रस्त्यावर नंबरासाठी रांगेत उभं करायचं, पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर नंबर लागत नाहीच. मग या रांगेत उभ्या असलेल्या गणपतींचा अनंत चतुर्दशीची सकाळ ची पूजा, आरती, नैवेद्य आणि संध्याकाळची पूजा-आरती-नैवेद्य होतो का? शोडषोपचार होतात का? रांगेत गणपती उभा केला की, त्याची पूजाअर्चा माणसं पार विसरूनच जातात. त्यांना मिरवणुकीचे वेध लागलेले असतात. (त्यातही “वाट पाहे सजणा, संकष्टी पावावे” अशांचीच संख्या जास्त. अनेकांना तर तेवढंही येत नसतं. मग आरती आणि मंत्रपुष्पांजली सुद्धा स्पीकर वरच लावली की काम ओके !)
कार्यकर्त्यांची मिरवणुकीची हौसच मोठी दांडगी.
ते गणपतीच्या रथासमोरच रस्त्यावरच जेवतात, तिथंच झोपतात. डीश, द्रोण, पत्रावळी, चमचे, पाण्याच्या (आणि अन्य सर्व प्रकारच्या द्रव पदार्थांच्या) बाटल्या वगैरे तिथंच रस्त्याच्या बाजूला टाकून देतात. गणपती बाप्पा सकाळ होण्याच्या प्रतिक्षेत रथावरच बसून असतात.
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पारोश्या अवस्थेतच मिरवणूक सुरू होते, आंघोळही न केलेले सो काॅल्ड भक्त मोठ्या भक्तिभावानं शीला की जवानी, बोल मैं हलगी बजावू क्या, पोरी जरा जपून दांडा धर अशा गाण्यांवर नाचत राहतात. हे कुठल्याच शुचितेत किंवा पावित्र्याच्या व्याख्येत बसत नाही.
राष्ट्रीय सणांच्या दिवशी शोभायात्रा निघतात, त्यात केवळ देशभक्तीपर गाणीच वाजवली जातात. पण मग देवाच्या मिरवणुकीत आयटम साॅंग्ज कशी काय लावली जातात? अशा सर्व कार्यकर्त्याकरिता एखाद्या वेगळ्या दिवशी डीजे नाईट आयोजित केली तरी काम होऊन जाईल, त्याकरिता गणेशोत्सवाचंच निमित्त कशाला हवं?
कित्येक ठिकाणी तर निवडलेल्या दुर्वांच्या जुड्या नसतातच. त्याऐवजी उपटून आणलेलं गवतच वाहिलेलं असतं. म्हणजे तेही महत्वाचं वाटत नाही. मग याकडे धार्मिक उत्सव म्हणून कसं पहावं? आणि का पहावं?
दहाच्या दहा दिवस अंडी किंवा मांसाहारी पदार्थ खुशाल खायचे, व्यसनं करायची, मनसोक्त अपेयपान,धूम्रपान करायचं आणि ‘हा बघा आमचा हिंदूंचा प्रिय उत्सव’ असं वरून पुन्हा आपणच म्हणायचं, हा कुठला अजब प्रकार? एकूणच सवंगपणा, आचरटपणा, छचोरपणा, स्वत:च्या मनातल्या असामाजिक कृती करण्यासाठी गणेशोत्सव आणि मिरवणुका यांचा व्यवस्थित वापर केला जातोय, यामागची सामाजिक मानसिकता जाणली पाहिजे.
लोकमान्य टिळक, न.चिं.केळकर अशा मान्यवरांनी पुढाकार घेऊन हा उत्सव उभा केला आहे. मिरवणुकीची सांगता मान्यवरांच्या भाषणांनी होत असे. यांची शिस्त तर इतकी करडी होती आणि सामाजिक जरब अशी होती की, त्यांचा शब्द मोडण्याची कुणी प्राज्ञा करू शकत नसे. आज तशीच शिस्त पुन्हा लावण्याची आवश्यकता नाही का? की उत्सवातला आनंद आम्ही लुटणार आणि गैरप्रकार किंवा तत्सम गोष्टी घडल्या की त्याची जबाबदारी प्रशासन-पोलिस यांच्यावर ढकलणार? याचा विचार आपल्या मनात आहे की नाही?
सार्वजनिक गणेशोत्सवासाठीची कोणती विशेष आचारसंहिता किंवा चौकट आहे का? आजवर ती नसेल तर, ती असायला नको का? उत्सवाचं नियोजन, आखणी, खर्चाची सोय, मूर्तीचा आकार किंवा तपशील, देखाव्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे, मिरवणुकीसंबंधी चे मार्गदर्शक नियम, उत्सव संपल्यानंतर रथ किती दिवस रस्त्यात तसाच ठेवायचा, मांडव किती दिवस ठेवायचा, आॅडीट कुणाकडून करून घ्यायचं, उत्सवासाठी शिस्तपालन समिती कशी नियुक्त करायची याविषयी आजवर कुणीही पुस्तिका काढलेली नाही. १२५ वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेल्या उत्सवाविषयीचं असं मार्गदर्शनच असू नये, ही केवढी मोठी तृटी आहे?
प्रत्येक कार्यकर्ता सूज्ञ असतोच, असा आपला समज आहे का? असा सरकारचा समज आहे का?असा धर्मादाय आयुक्तांचा समज आहे का? आपण सर्वांनाच जन्मत:च सूज्ञ, समंजस, समजूतदार, विवेकी असं समजण्याची चूक करतो आहोत का? उत्सव हा उत्सवासारखाच झाला पाहिजे याविषयी सर्वांचं एकमत असेलच, पण मर्यादांचं भान सुटणाऱ्यांविषयीचं कारवाईचं पाऊलही तितक्याच कठोरपणे टाकलं पाहिजे. समाजाला प्रबोधनाची आवश्यकता नेहमीच असते, ही गोष्ट नाकारण्यात अर्थच नाही. पण जेव्हा समाजच आम्हाला कुणीही अक्कल शिकवण्याची गरज नाही असं एकमुखानं म्हणायला लागतो तेव्हा काय समजावं?
उत्सवाला परिवर्तनाची गरज नाही, उत्सव पुन्हा त्याच्या मूळ सात्विक रूपाकडे नेण्याची खरी गरज आहे.
– समाप्त –
लेखक : डॉ. मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈