मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२१ – आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२१ – आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम….

जुन्या काळातल्या पुण्यात भरारी घेताना मन आधुनिक पुण्यातही झेपावतं. नुकतीच कोथरूड येथे, मयूर कॉलनीत, जोग शाळे समोर असलेल्या ‘श्री वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान, ‘ येथिल ‘जैन स्थानक भवन ‘ येथे ‘भुकेलेल्यांना पोटभर जेवण ‘ ह्या एकाच तत्वावर चालविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती मिळाली. येथे गरीब श्रीमंत एकाच पंक्तीला बसून भोजनाचा आस्वाद घेतात. ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी, फक्त 100 रुपयांत भाज्या वरणभात, पोळ्या नमकीन, रविवारी मिष्ठान्न अशा गरमागरम ताज्या सात्विक भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतात. समस्त लहान थोर मंडळींची ‘पोटोबा’ शांती करणारे हे पुण्यपुरुष नव्हे संतच म्हणावं लागेल त्यांना, भोजन तयार करणाऱ्यांचाही यात सिंहाचा वाटा आहे, त्यांनाही ” अन्नदाता सुखी भव ” हा आशीर्वाद द्यावा लागेल कारण अनेकांच्या मुखात त्यांच्यामुळे घरगुती जेवण जाते. विद्यार्थ्यांच्या आया त्यांच्यामुळेच निर्धास्त असतात. असे हे महात्मा, समाजसेवक आहेत तरी कोण ? असा प्रश्न मला पडला. आणि त्यांची नांवे कळली. आनंद देणारे, घेणारे आणि वाटणारे हे समाजसेवक आहेत, श्री. ईश्वर भटेवरा आणि श्री. प्रितेश कर्नावट. त्यांच्या नांवातच ‘ईश्वर’ आहे आणि प्रितेश म्हणजे प्रित यांच्या नावातही ‘प्रेम’ आहे. या सदगृहस्थांशी संवाद साधताना जाणीव झाली, ‘ मानव सेवा हीच देशसेवा. ‘आणि ‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान ‘ही त्यांची ब्रीदवाक्ये आहेत. भोजनोत्तर तृप्त झालेल्या रुग्णांचे, वयोवृद्धांचे त्यांना भरभरून आशिर्वाद मिळतात. संस्थेतर्फे महिन्यातून सहा वेळा वारजे व किनारा हॉटेल नजिकच्या मजुरांना मोफत नाश्ता देऊन ते संतुष्ट करतात. धार्मिक कार्यात तर त्यांचं पुढचं पाऊल असतंच पण भूतदयेतही ही संस्था अग्रेसर आहे. ‘जीवदया ‘ गोशाळेला नियमितपणे चारापाणी देऊन मुक्या जनावरांचा, गोमातेचाही ते आशिर्वाद घेतात. इतर मदत करून आणि देणगी देऊन काही सज्जन त्यांना हातभार लावतात आपणही या सात्विक थाळीचा उपभोग घेण्यासाठी भोजनालयाला भेट देऊया. उत्तम आणि स्तुत्य अशा ह्या उपक्रमेला खूप खूप धन्यवाद.  

त्यांचा पत्ता– श्रीवर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान, जैन स्थानक भवन, योग शाळेसमोर, मयूर कॉ. पुणे संपर्क– ईश्वर भटेवरा — 83 78 88 34 45 आभार..

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘Minimalism ते Downsizing —-…’ – लेखिका : सुश्री संध्या घोलप ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘Minimalism ते Downsizing —-’ – लेखिका : सुश्री संध्या घोलप ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

साधारण २००० च्या दशकात अमेरिका वारीदरम्यान minimalism आणि downsizing या दोन नवीन संकल्पना कानावर पडल्या. कॉलेजसाठी घरातून बाहेर पडल्यावर, लहान घरात राहणारी मुलं, त्यांचं कुटुंब वाढत जाईल त्याप्रमाणे, लहान घरातून मोठ्या मोठ्या घरात जात असतात. (जे सर्वसाधारणपणे बरेच अमेरिकावासी करतात) तर माझी एक मैत्रीण, मुलं मोठी होऊन घराबाहेर पडल्यामुळे मोठ्या घरातून छोट्या अपार्टमेंट मध्ये शिफ्ट झाली होती. तिच्या मोठ्या घरातलं सामान छोट्या घरात हलवणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तिला एकटीला लागेल तेवढं आवश्यक सामान ठेऊन बाकी सगळं तिने काढून टाकलं होतं आणि सुटसुटीत संसार मांडला होता. तेव्हा मला या दोन संकल्पना समजल्या. अर्थात downsizing ची सुरुवात उद्योग धंद्यांपासून झाली. कामगार कपात, जागा कपात, उत्पादन कपात होता होता, घर आधी छोट्यापासून मोठ्यापर्यंत आणि मग मोठ्यापासून छोट्यापर्यंत असा प्रवास सुरू झाला.

दोन्ही गोष्टींबद्दल वाचन केलं, व्हिडिओज पाहिले आणि मग याचं महत्व मलाही जाणवायला लागलं. ही संकल्पना अजून आपल्याकडे का आली नाही? निदान उच्च मध्य वर्गीय घरातूनही हे दिसत नाही. मी काही मुकेश अंबानीला नाही म्हणू शकत की इन मीन दहा माणसांना Antilia ची गरज काय?? पण उतारवयात आपली इमारत redevelopment ला जाणार असेल तरी आपण म्हणतो, आम्हाला एक बेडरूम जास्तीची पाहिजे! 

आपल्याकडे संसार वाढतील, ऐपत वाढेल तशी घरं वाढतात, गाड्या वाढतात, मग second home, third home केलं जातं. पण अजूनतरी downsizing केलेलं दिसत नाही. मोठ्या, वाढलेल्या संसारातून माणसे कमी होत होत, कधी एकटे दुकटे ही, मोठमोठ्या घरातून राहताना दिसतात. वयोमानाप्रमाणे घर आवरणं, सामान आवरणं कठीण होऊन बसतं. वाढत्या संसारात घेतलेली भांडी नंतर वापरलीच जात नाहीत. पण “टाकवत नसल्यामुळे” तीन चार कुकर, चार पाच कढया, मोठमोठी पातेली निवांत धूळ पांघरून पडलेली असतात.

Minimalism बद्दल मी आधीही लिहिलं आहे आणि जमेल तिथे, जमेल तेव्हा आग्रहपूर्वक सगळ्यांना सांगत असते की अंगात जोर आहे तोपर्यंत सामान कमी करा.

आम्ही मैत्रिणी ( सगळ्या ‘साठी’ ओलांडलेल्या) एकदा जेवायला बाहेर गेलो होतो. तिथून बाहेर पडल्यावर एक मैत्रीण डायरेक्ट भांड्यांच्या दुकानात शिरली आणि तिने तीन छोटी छोटी पातेली घेतली. मग सुरू झाला एक संवाद – 

मी – आता ही कशाला नवीन?

मैत्रीण – आता छोटी छोटी भांडी लागतात गं !

मग आधीची मोठी काय केली?

“पडली आहेत तशीच”

ती काढून टाक ना! पसारा का वाढवतेस? 

“जागा आहे, पैसे आहेत. काय फरक पडतो?” 

म्हणून मुलासुनेचं काम का वाढवतेस? तुझ्या पश्चात त्याला एवढ्या लांब येऊन तुझी भांडी कुंडी आवरायला वेळ तरी मिळणार आहे का?

“त्याच्याशी मला काय करायचंय? मला आत्ता हौस आहे ना, मी भागवून घेते. तो बघेल काय करायचं ते!” 

अशी कित्येक घरं सध्या वर्षानुवर्ष बंद आहेत, अगदी खुंटीवर टांगलेल्या कपड्यांसकट. (आमच्या समोर बंगल्यात राहणाऱ्या एक आजी करोना काळात गेल्या. त्यांच्या दाराबाहेर लावलेल्या दिव्याच्या माळा, मुलगा कोविड संपल्यावर आला तोपर्यंत दिवसरात्र चालू होत्या) 

एक मोठ्या फ्लॅट मध्ये राहणारे advocate. नव्वदीच्या घरातले. एकटेच आहेत. घरभर Law ची पुस्तकं आणि त्यावर धूळ. माळ्यावर पुस्तकं, कपाटात पुस्तकं, टेबल – साईड टेबल दिसेल तिथे पुस्तकं.

तुम्ही अजून प्रॅक्टीस करता?

“छे छे ! कधीच सोडली. “

मग एवढी पुस्तकं? 

“टाकून देववत नाही गं! ” 

त्यांना तर मूल बाळ पण नाही. पण स्वतः लॉयर आहेत, काहीतरी सोय केलीच असेल असा विचार करून मी गप्प! 

मी माझ्या साठी नंतर, गरज नसलेल्या वस्तू काढून टाकायला सुरुवात केली. आता तर कमीतकमी वस्तूंमध्ये घर चालवायला शिकले आहे. (तरीही मुलगा म्हणतो, आई, अजून बरंच काढायचं राहिलंय!) 

कपडे कमी केले, मुख्य म्हणजे बायकांचा जीव ज्यात अडकतो, ते सोनं सगळ्यात आधी काढलं. मग बाकी गोष्टी काढायला त्रास होत नाही.

त्याच बरोबर downsizing पण आवश्यक आहे हे लक्षात आल्यावर, पुण्याला अथश्री मध्ये शिफ्ट झाले. आवश्यक ते जुनंच सामान आणि अगदी गरजेपुरतं ठेवायचं हे आधीच ठरवलं होतं.

खूप मोठ्ठ्या घरातून ४५० चौ फुटाच्या घरात शिफ्ट होणं सोपं नव्हतं. (आता पाहुण्यांना राहायला जागा होणार नाही हे मात्र जाणवत होतं) आवश्यक तेवढीच भांडी कुंडी, कपडे, मोजून चार खुर्च्या, असा “भातुकलीचा खेळ” मांडला आहे. उद्देश हाच की आपल्या पश्चात मुलांना आवराआवरीचा त्रास नको. आता बेडरूम मधे माझी आई असल्याने, बाहेर हॉल म्हणजे माझी बेडरूम, फॅमिली रूम, डायनिंग, किचन सगळं एकाच ठिकाणी! 

हळूहळू सवय होते आहे. आणि छान वाटतंय. एखादे दिवशी बाई आली नाही तरी झाडू पोचा करायचं दडपण येत नाही. आधी मोठ्या घरात, “बापरे, आपल्याला झेपणार नाही एवढा झाडू पोचा” या विचारानेच केला जायचा नाही.

प्रत्येकाला downsizing जमेल असं नाही. आपल्याकडे घर विकणं आणि परत हवं तसं नवीन घर घेणं प्रत्येकाला शक्य असतं असं नाही. मोठ्या घराचा मेंटेनन्स, सिक्युरिटी/सेफ्टी याचा विचार केला तर छोटं घर, निदान एकेकटे राहणाऱ्यांना उतारवयात आवश्यक ठरतं. बरेच लोक मुंबईचं घर भाड्याने देऊन, इथे अथश्री मध्ये भाड्याने घर घेऊन राहत आहेत. त्यात अर्थातच सेव्हिंग होतं.

अमेरिकेत तर हल्ली minimalism खूप लहान वयापासून करतात. अगदी bagpack मध्ये मावेल एवढाच संसार घेऊन नोकरी आणि पर्यटन करत असतात. पण ते एकटे जीव…

Downsizing चा विचार मात्र मोठ्या प्रमाणावर तिथे केला जातो. रिटायर्ड लाईफ छोट्या घरात, छोट्या गावात, शांत वातावरणात घालवण्यासाठी आधीच घरं, गावं हेरून ठेवली जातात. त्यात पहिला विचार मोठ्या घराचा मेंटेनन्स वाचवणं, असेल तर कर्ज फेडून टाकणं आणि savings मध्ये चांगलं आयुष्य जगणं हा असतो.

आपणही असा विचार करायला सुरुवात करायला हवी ना? निदान या विषयावर चर्चा व्हावी, आपल्या बरोबरच पुढच्या पिढीच्या त्रासाचा विचार केला जावा असं वाटतं. इथे मी मुख्यत्वे करून मुलं परदेशात आणि आईवडील इथे, अशा कुटुंबांचा विचार केला आहे. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या लोकांना minimalism आणि downsizing दोन्हीचा विचार करता येणार नाही याची मला निश्चितच कल्पना आहे.

लेखिका : सुश्री संध्या घोलप 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बॅंकर्स ब्रॉडकास्ट:लेजर्स… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

बॅंकर्स ब्रॉडकास्ट:लेजर्स… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

बँकेतल्या जुन्या आठवणी

झोपेत वेचत होतो

आज मी स्वप्नामध्ये

लेजर खेचत होतो…..

*

तेव्हाही करायचो आम्ही

भरपूर मरमर काम

काऊंटरसमोर असायचे

तेव्हाही कस्टमर जाम….

*

हातात असायचं तेव्हा

व्हाऊचर नाहीतर चेक

पोस्टिंग करुन फोलिओमध्ये

टॅग ठेवायचो एक….

*

डेबिट किंवा क्रेडिट

करू बेरीज वजाबाकी

गुंतलेलं डोकं वेळेत

काम संपवून टाकी….

*

वर्किंग अवर्स संपताना

काॅलिंग चेकिंग पटापट

टॅग उडवण्यासाठी

फोलिओंशी असे झटापट….

*

महिन्याच्या शेवटी नियमित

वाट्याला यायची लेजर

बॅलंसिंगमध्ये डिफरंस कधी

मायनर अथवा मेजर….

*

टॅली करायला मात्र

राहावं लागे व्यस्त

डिफरंस मिळाला की

त्याहून आनंद वाटे मस्त….

*

लेजरमध्ये असायची

रिकाम्या काॅलमची जोड

काढून प्रॉडक्ट्स सहामाही

त्यात इंटरेस्टची आकडेमोड….

*

अशा या लेजरने

दिलाय आनंद खरा

रिटायरीजनी पहावं

हळूच आठवुन जरा….

*

जुने दिवस आठवायला

मी बदाम ठेचत होतो

आज मी स्वप्नामध्ये

लेजर खेचत होतो….

क्षणभर बँकेत बसून काम करून आल्यासारखे वाटलं ! अगदी मस्त…

कवी : अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्या आयुष्यांत त्या त्या क्षणी मला अतीव दुःख देऊन गेलेल्या, माझे बाबा आणि समीर यांच्या अतिशय क्लेशकारक मृत्यूंशीच निगडित असणाऱ्या या सगळ्याच पुढील काळांत घडलेल्या घटना माझं उर्वरित जगणं शांत, समाधानी आणि अर्थपूर्ण करणारे ठरलेल्या आहेत. ‘त्या’चा कृपालोभ यापेक्षा वेगळा तो काय असणार?

हे सगळं त्या त्या क्षणी पूर्ण समाधान देणारं वाटलं तरी तो पूर्णविराम नव्हता. पुढील आयुष्यांत असे अनेक कसोटी पहाणारे क्षण माझी वाट पहात आहेत याची मला कल्पना नव्हती एवढंच!)

तीस वर्षांपूर्वीची ही एक घटना त्यापैकीच एक. आजही ती नुकतीच घडून गेलीय असंच वाटतंय मला. कारण ती घटना अतिशय खोलवर ठसे उमटवणारीच होती!

ही घटना आहे माझ्या दोन नंबरच्या बहिणीच्या संदर्भातली. जशी तिची कसोटी पहाणारी तशीच सासर आणि माहेर अशा दोन्हीकडच्या तिच्या कुटुंबियांचीही!

दोन मोठ्या बहिणींच्या पाठचे आम्ही तिघे भाऊ. या दोघींपैकी दोन नंबरच्या बहिणीची ही गोष्ट. ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी. पण मला ती तशी कधी वाटायचीच नाही. ताईपणाचा, मोठेपणाचा आब आणि धाक तसाही माझ्या या दोन्ही बहिणींच्या स्वभावात नव्हताच. तरीही या बहिणीचा विशेष हा कीं आमच्याबरोबर खेळताना ती आमच्याच वयाची होऊन जात असे. त्यामुळे ती मला माझी ‘ताई’ कधी वाटायचीच नाही. माझ्या बरोबरीची मैत्रिणच वाटायची. तिने आम्हा तिघा भावांचे खूप लाड केले. माझ्यावर तर तिचा विशेष लोभ असे. म्हणूनच कदाचित माझ्या त्या अजाण, अल्लड वयात मी केलेल्या सगळ्या खोड्याही ती न चिडता, संतापता सहन करायची. जेव्हा अती व्हायचं, तेव्हा आईच मधे पडायची. मला रागवायची. पण तेव्हा आईने माझ्यावर हात उगारला की ही ताईच मला पाठीशी घालत आईच्या तावडीतून माझी सुटका करायची. “राहू दे.. मारु नकोस गं त्याला.. ” म्हणत मला आईपासून दूर खेचायची न् ‘जाs.. पळ.. ‘ म्हणत बाहेर पिटाळायची.

मोठ्या बहिणीच्या पाठोपाठ हिचंही लग्न झालं, तेव्हा मी नुकतंच काॅलेज जॉईन केलं होतं. ती सासरी गेली तेव्हा आपलं हक्काचं, जीवाभावाचं, हवंहवंसं कांहीतरी आपण हरवून बसलोय असंच मला वाटायचं आणि मन उदास व्हायचं!

तुटपुंज्या उत्पन्नातलं काटकसर आणि ओढाताण यात मुरलेलं आमचं बालपण. ओढाताण आणि काटकसर ताईच्या सासरीही थोड्या प्रमाणात कां होईना होतीच. पण तिला ते नवीन नव्हतं. मुख्य म्हणजे तिने ते मनापासून स्वीकारलेलं होतं. ती मुळातच अतिशय शांत स्वभावाची आणि सोशिक होती. केशवराव, माझे मेव्हणे, हे सुद्धा मनानं उमदे आणि समजूतदार होते. अजित आणि सुजितसारखी दोन गोड मुलं. कधीही पहावं, ते घर आनंदानं भरलेलंच असायचं. असं असूनही तिच्या बाबतीत मी खूप पझेसिव्ह असल्यामुळेच असेल तिच्यातली मैत्रीण तिच्या लग्नानंतर मला त्या रूपात पुन्हा आता कधीच भेटणार नाही असं आपलं उगीचच वाटत राहिलेलं. ती अनेक वाटेकर्‍यांत वाटली गेली आहे असंच मला वाटायचं. केशवराव, अजित, सुजित हे तिघेही खरंतर प्राधान्य क्रमानुसार हक्काचेच वाटेकरी. त्याबद्दल तक्रार कसली? पण माझ्या मनाला मात्र ते पटत नसे. तिचा सर्वात जास्त वाटा त्यांनाच मिळतोय अशा चमत्कारिक भावनेने मन उदास असायचं आणि मग व्यक्त न करता येणारी अस्वस्थता मनात भरून रहायची.

ताईचं मॅट्रिकनंतर लगेच लग्न झालं न् तिचं शिक्षण तिथंच थांबलं. लग्नानंतर तिनेही त्या दिशेने पुढे कांही केल्याचं माझ्या ऐकिवात तरी नव्हतंच. केशवराव आर. एम. एस. मधे साॅर्टर होते. आठवड्यातले किमान चार दिवस तरी ते बेळगाव-पुणे रेल्वेच्या पोस्टाच्या टपाल डब्यांतल्या साॅर्टींगसाठी फिरतीवर असायचे. बिऱ्हाड अर्थातच बेळगावला.

मी मोठा झालो. स्वतःच्या पायावर उभा राहिलो. माझं लग्न होऊन माझा संसार सुरू झाला. ती जबाबदारी पेलताना मनात मात्र सतत विचार असायचा तो ताईचाच. केशवरावांच्या एकट्याच्या पगारांत चार माणसांचा संसार वाढत्या महागाईत ताई कसा निभावत असेल या विचाराने घरातला गोड घासही माझ्या घशात उतरत नसे. आम्ही इतर भावंडं परिस्थितीशी झुंजत यश आणि ऐश्वर्याच्या एक एक पायऱ्या वर चढून जात असताना ताई मात्र अजून पहिल्याच पायरीवर ताटकळत उभी आहे अशी एक विचित्र भावना मनात येऊन मला वाईट वाटायचं.

मनातली ती नाराजी मग घरी कधी विषय निघाला की नकळत का होईना बाहेर पडायचीच. पण ती कुणीच समजून घ्यायचं नाही.

“हे बघ, प्रत्येकजण आपापला संसार आपापल्या पद्धतीनेच करणार ना? त्याबद्दल ती कधी बोलते कां कांही? कुणाकडे काही मागते कां? नाही ना? छान आनंदात आहे ती. तू उगीच खंतावतोयस ” आई म्हणायची.

“ताई सतत हे नाही ते नाही असं रडगाणं गात बसणाऱ्या नाहीत” असं म्हणत आरतीही तिचं कौतुकच करायची. “त्या समाधानानंच नाही तर स्वाभिमानानंही जगतायत ” असं ती म्हणायची.

मला मनोमन ते पटायचं पण त्याचाच मला त्रासही व्हायचा. कारण ताईचा ‘स्वाभिमान’ मला कधी कधी अगदी टोकाचा वाटायचा. ती स्वतःहून कुणाकडेच कधीच कांही मागायची नाही. व्यवस्थित नियोजन करून जमेल तशी एक एक वस्तू घेऊन ती तिचा संसार मनासारखा सजवत राहिली. हौसमौजही केली पण जाणीवपूर्वक स्वत:ची चौकट आखून घेऊन त्या मर्यादेतच! इतर सगळ्यांना हे कौतुकास्पद वाटायचं, पण मला मात्र व्यक्त करता न येणारं असं कांहीतरी खटकत रहायचंच. कारण स्वतःहून कधीच कुणाकडे कांही मागितलं नाही तरीही कुणी कारणपरत्वे प्रेमानं कांही दिलं तर ते नाकारायची नाही तसंच स्वीकारायचीही नाही. दिलेलं सगळं हसतमुखाने घ्यायची, कौतुक करायची आणि त्यांत कणभर कां होईना भर घालून अशा पद्धतीने परत करायची की तिने ते परत केलंय हे देणाऱ्याच्या खूप उशीरा लक्षात यायचं. अगदी आम्ही भाऊ दरवर्षी तिला घालत असलेली भाऊबीजही याला अपवाद नसायची!

‘दुसऱ्याला ओझं वाटावं असं देणाऱ्यानं द्यावं कशाला?’ असं म्हणत आरती तिचीच बाजू घ्यायची, आणि ‘हा स्वभाव असतो ज्याचा त्याचा. आपण तो समजून घ्यावा आणि त्याचा मान राखावा’ असं म्हणून आई ताईचंच समर्थन करायची.

त्या दोघींनी माझ्या ताईला छान समजून घेतलेलं होतं. मला मात्र हे जेव्हा हळूहळू समजत गेलं, तसं माझ्या गरीब वाटणाऱ्या ताईच्या घरच्या श्रीमंतीचं मला खरंच खूप अप्रूप वाटू लागलं. माझ्याकडे अमुक एक गोष्ट नाही असं माझ्या ताईच्या तोंडून कधीच ऐकायला मिळायचं नाही. सगळं कांही असूनसुद्धा कांहीतरी नसल्याची खंत अगदी भरलेल्या घरांमधेही अस्तित्वात असलेली अनेक घरं जेव्हा आजूबाजूला माझ्या पहाण्यात येत गेली तसं माझ्या ताईचं घर मला खूप वेगळं वाटू लागलं. लौकिकदृष्ट्या कुणाच्या नजरेत भरावं असं तिथं कांही नसूनसुद्धा सगळं कांही उदंड असल्याचा भाव ताईच्याच नव्हे तर त्या घरातल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर मला नव्याने लख्ख जाणवू लागला आणि माझ्या ताईचं ते घर मला घर नव्हे तर ‘आनंदाचं झाड’ च वाटू लागलं! त्या झाडाच्या सावलीत क्षणभर कां होईना विसावण्यासाठी माझं मन तिकडं ओढ घेऊ लागलं. पण मुद्दाम सवड काढून तिकडं जावं अशी इच्छा मनात असूनही तेवढी उसंत मात्र मला मिळत नव्हतीच.

पण म्हणूनच दरवर्षी भाऊबीजेला मात्र मी आवर्जून बेळगावला जायचोच. कोल्हापूरला मोठ्या बहिणीकडे आदल्या दिवशी रात्री मुक्कामाला. तिथे पहाटेची अंघोळ आणि फराळ करुन, दुपारचं जेवण बेळगावला ताईकडं, हे ठरूनच गेलं होतं. जेवणानंतर ओवाळून झालं की मला लगेच परतावं लागायचं. पण मनात रूखरूख नसायची. कारण माझ्या धावत्या भेटीतल्या त्या आनंदाच्या झाडाच्या सावलीतली क्षणभर विश्रांतीही मला पुढे खूप दिवस पुरून उरेल एवढी ऊर्जा देत असे.

बेंगलोरजवळच्या बनारगट्टाला आमच्या बँकेचं स्टाफ ट्रेनिंग सेंटर आहे. एक दोन वर्षातून एकदा तरी मला दोन-तीन आठवड्यांच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्रॅम्ससाठी तिथे जायची संधी मिळायची. एकदा असंच सोमवारपासून माझा दहा दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू होणार होता. कोल्हापूरहून रविवारी रात्री निघूनही मी सोमवारी सकाळी बेंगलोरला सहज पोचू शकलो असतो, पण ताईला सरप्राईज द्यावं असा विचार मनात आला आणि रविवारी पहाटेच मी बेळगावला जाण्यासाठी कोल्हापूर सोडलं. तिथून रात्री बसने पुढं जायचं असं ठरवलं. सकाळी दहाच्या सुमारास बेळगावला गेलो. ताईच्या घराच्या दारांत उभा राहिलो. दार उघडंच होतं. पण मी हाक मारली तरी कुणाचीच चाहूल लागली नाही. केशवराव ड्युटीवर आणि मुलं बहुतेक खेळायला गेलेली असणार असं वाटलं पण मग ताई? तिचं काय?.. मी आत जाऊन बॅग ठेवली. शूज काढले. स्वैपाकघरांत डोकावून पाहिलं तर तिथे छोट्याशा देवघरासमोर ताई पोथी वाचत बसली होती. खुणेनेच मला ‘बैस’ म्हणाली. मी तिच्या घरी असा अनपेक्षित

आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पुसटसा दिसला खरा, पण मी हातपाय धुवून आलो तरी ती आपली अजून तिथंच पोथी वाचत बसलेलीच. मला तिचा थोडा रागच आला.

“किती वेळ चालणार आहे गं तुझं पोथीवाचन अजून?” मी त्याच तिरीमिरीत तिला विचारलं आणि बाहेर येऊन धुमसत बसून राहिलो. पाच एक मिनिटांत अतिशय प्रसन्नपणे हसत ताई हातात तांब्याभांडं घेऊन बाहेर आली.

“अचानक कसा रे एकदम? आधी कळवायचंस तरी.. ” पाण्याचं भांडं माझ्यापुढे धरत ती म्हणाली.

“तुला सरप्राईज द्यावं म्हणून न कळवता आलोय. पण तुला काय त्याचं? तुझं आपलं पोथीपुराण सुरूच. “

“ते थोडाच वेळ, पण रोज असतंच. आणि तसंही, मला कुठं माहित होतं तू येणारायस ते? कळवलं असतंस तर आधीच सगळं आवरून तुझी वाट पहात बसले असते. चल आता आत. चहा करते आधी तोवर खाऊन घे थोडं. “

माझा राग कुठल्या कुठे निघून गेला. मी तिच्यापाठोपाठ आत गेलो. भिंतीलगत पाट ठेवून ती ‘बैस’ म्हणाली आणि तिने स्टोव्ह पेटवायला घेतला.

“कुठली पोथी वाचतेय गं?” मी आपलं विचारायचं म्हणून विचारलं. कारण दत्तसेवेचं वातावरण असलेल्या माहेरी लहानाची मोठी झालेली ताई दत्त महाराजांचं महात्म्य सांगणारंच कांहीतरी वाचत असणार हे गृहीत असूनही मी उत्सुकतेपोटी विचारलं.

“आई बोलली असेलच की़ कधीतरी. माहित नसल्यासारखं काय विचारतोस रे? ” ती हसून म्हणाली.

“खरंच माहित नाही. सांग ना, कसली पोथी?”

“गजानन महाराजांची. “

मला आश्चर्यच वाटलं. कारण तेव्हा गजानन महाराजांचं नाव मला फक्त ओझरतं ऐकूनच माहिती होतं. ‘दत्तसेवा सोडून हिचं हे कांहीतरी भलतंच काय.. ?’ हाच विचार तेव्हा मनात आला.

“कोण गं हे गजानन महाराज?” मी तीक्ष्ण स्वरांत विचारलं. माझ्या आवाजाची धार तिलाही जाणवली असावी.

“कोण काय रे?” ती नाराजीने म्हणाली.

“कोण म्हणजे कुठले?कुणाचे अवतार आहेत ते?”

माझ्याही नकळत मला तिचं ते सगळं विचित्रच वाटलं होतं. तिला मात्र मी अधिकारवाणीने तिची उलट तपासणी घेतोय असंच वाटलं असणार. पण चिडणं, तोडून बोलणं तिच्या स्वभावातच नव्हतं. तिने कांहीशा नाराजीने माझ्याकडे रोखून पाहिलं, आणि शक्य तितक्या सौम्य स्वरांत म्हणाली, ” तू स्वतःच एकदा मुद्दाम वेळ काढून ही पोथी वाच. तरच तुला सगळं छान समजेल. ” आणि मग तिनं तो विषयच बदलला.

ही घटना म्हणजे दत्तसेवेबद्दलची नकळत माझ्या मनावर चढू पहाणारी सूक्ष्मशा अहंकाराची पुटं खरवडून काढण्याची सुरुवात होती हे त्याक्षणी मला जाणवलं नव्हतंच. पण आम्हा सगळ्यांचंच भावविश्व उध्वस्त करणाऱ्या पुढच्या सगळ्या घटनाक्रमांची पाळंमुळं माझ्या ताईच्या श्रद्धेची कसोटी पहाणारं ठरणार होतं एवढं खरं! त्या कसोटीला ताई अखेर खरी उतरली, पण त्यासाठीही तिने पणाला लावला होता तो स्वतःचा प्राणपणाने जपलेला स्वाभिमानच!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दर्शन रामरायाचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दर्शन रामरायाचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मैत्रिणीचा फोन..

” कशी आहेस नीता? खूप दिवसांनी फोन करते आहे.”

” अगं ठीक आहे. रामरायाचं दर्शन करून आले.”

यावर अगदी आश्चर्याने ती म्हणाली

” काय सांगतेस काय? कमाल आहे तुझी. मला बोलली पण नाहीस..”

त्यात काय सांगायचं मला काही समजलचं नाही…

” कधी ठरवलंस? मला विचारायचं तरी  …मी पण आले असते “

ती रागवलीच ….

“अग  रामनवमीला फार गर्दी असणार म्हणून सकाळी मनात आलं आणि जाऊन आले .”

“म्हणजे इथेच होय.. मग ठीक आहे. मला वाटलं अयोध्येला गेलीस का काय?”

सध्या सगळ्यांना राम म्हटलं की अयोध्याच का आठवत आहे कळतं नाही..

तीला म्हटल

” कधीतरी इथल्याही रामाला जायचं. देवळात रामनवमीची तयारी चाललेली आहे . कार्यक्रम पण सुरू आहेत.”

यावर ती म्हणाली

 ” एक सांगु मी किती दिवसात रामाच्या देवळात गेलेच नाहीये. जाईन एकदा”

” तुळशीबागेत जातेस ना ? मग जाऊन यायचं की”

” अगं  तिथे गेल की खरेदीच्या नादात विसरून जाते.”

“असू दे … पुढच्या वेळेस गेलीस की जा … अजूनही कुठे कुठे रामाची देऊळं आहेत की तिथेही जाऊन ये..”

“खरचं ग.. लक्षातच येत नाही संध्याकाळी  जाऊन येईन”

मी बघीतल आहे..खूप जणी अयोध्येला जायला मिळालं नाही म्हणून दुःखीकष्टी आहेत.

खरतरं ईथल्या देवळातल्या रामातही रामच आहे… कधीतरी जावं त्याच्या दर्शनाला.

त्या मूर्तीतही तेच प्राणदत्त्व आहे. पण आपण मूर्तीच्या सौंदर्याकडे मंदिराच्या शिल्पातच दंग होत आहोत का? असे वाटते आहे.

 आपण टीव्हीवर मोबाईलवर अयोध्येच मंदिर बघितलेलं आहे. जेव्हा जमेल तेव्हा जाऊ नाही जमलं तर जाणारही नाही.

आपण जाऊ शकलो नाही अशी कित्येक ठिकाणं आहेतच की ….

त्यासाठी वाईट कशाला वाटून घ्यायचं…

आपला रामराया फक्त अयोध्येत नाहीये. तो इथल्या देवळातल्या मूर्तीतही आपण पाहूया…

त्यासाठी आधी शांतपणे बसुया…

डोळे बंद केले आणि मनोभावे त्याची आठवण केली की अंतर्यामी त्याची जाणीव होते.

जमेल तेव्हा अयोध्येला  जरूर जा.

एक लक्षात ठेवा.. अमुक एक देवळात जाणं हेच आपलं साध्यं आहे का ?  तिथे गेल तरच देव भेटणार आहे का? याचाही विचार करा.

रामराया कुठे आणि कशाकशात पाहायचा याचा शोध घ्या.

अंतरंगात डोकावून  मनोभावे विचार करा .

रामराया कुठे ना कुठे भेटेलच…

रामनवमी पाच दिवसांवर आलेली आहे. रोज रामरक्षा, अभंग, रामाची गाणी, आरत्या म्हणा… तुमचा तुम्हाला आनंद मिळेल.

विष्णुदास नामा यांनी रामाची फार सुंदर आरती लिहीलेली आहे. ती तुमच्यासाठी पाठवत आहे.

आरती

श्रीराम जय राम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

टणत्काराचे ठाण  करी धनुष्यबाण

हनुमंत पुढे उभे हात जोडून ॥१॥ 

*

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळीती

सिंहासनी आरुढले जानकीपती ॥२॥

*

रत्नजडित माणिक  वर्णु काय मुगुटी

स्वर्गातून देव पुष्पवृष्टी करिती ॥३॥

*

लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्रांची

चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥४॥

*

विष्णुदास नामा म्हणे मागणे हेचि

अखंडित सेवा घडो रामचंद्रांची…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तसंच ! – लेखिका : डॉ. अपर्णा बेडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

सुश्री सुनिता जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ तसंच ! – लेखिका : डॉ. अपर्णा बेडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी

 तसंच !…

घरी आलेल्या कुणालाही ‘तसंच’ पाठवायचं नाही आणि आपण कुणाकडे जाताना ‘तसंच’ जायचं नाही हा आमच्या घरचा शिरस्ता! 

या ‘तसंच’ मधे जगभरचा पाहुणचार सामावलेला होता.

माझे कुणी मित्रमैत्रीण ठरवून आले की बटाटेवडे कर, अचानक आले तर त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा नाहीतर सांजा कर.. अगदीच वेळ नसेल तरी धडपडत उठून किमान “सफरचंदाची एक फोड तरी खा” म्हणत ती हातावर दे..

आई-बाबांचे ऑफिसमधले कुणी पाहुणे आले तर किमान चहा तरी कर..

नातेवाईकांपैकी कुणी येणार असेल तर खास आवडी-निवडी जप हे सारं अध्याहृत होतं.

हे सगळं करताना आई-आजीच्या चेहऱ्यावर कधी आठी यायची नाही, श्रम दिसायचे नाहीत, त्यांचं स्मितहास्य लोपायचं नाही… इतकं ते सारं सहज होतं! सहज होतं म्हणून सुंदर होतं!

पाहुण्यांसाठी असलेल्या ह्या नियमाला एक पोटनियमही होता. आपल्याच घरातून निघतानाही ‘तसंच’ निघायचं नाही घरातल्या सर्व माणसांसाठी उपनियम!

सकाळचा चहा पिऊन झालेला असला तरी, “‘तशीच’ जाऊ नको कॉलेजला!” असं म्हणत आजी तूपसाखर लावलेली एक पोळी घेऊन माझ्या मागे उभी असायची.

मनसुखानी नावाचा प्रोफेसर त्यावेळी आम्हां मुलींमध्ये भारीच फेमस होता. आमच्या गप्पातून आजीला हे कळलं असावं. आणि मग..

“आजी, उशीर होतोय ग.. नकोय मला.. मी जाते तशीच” असं म्हणण्याचा अवकाश… 

ती त्या मनसुखानीच्या नावाने बोटं मोडायची.

“त्या मनसुखानीला म्हणावं एवढी पोळी खाल्ल्याशिवाय माझी आजी काही मला ‘तशीच’ सोडत नसते. बाकी तू तुझं बघ” असा तिचा राग उफाळून यायचा पण घरातून निघताना ‘तसंच’ जायचं नाही हा तिचा नियम आम्हाला पाळायलाच लागायचा.

आपण कुणाकडे जातानाही ‘तसंच’ जायचं नाही हा या सगळ्याचा व्यत्यास.. तो ती तितकाच खरा होता. आत्याकडे जाताना खास ठेवणीतल्या लोणच्याची बाटली भरली जायची. मावशीला आवडतात म्हणून घारगे व्हायचे.. एक ना दोन! यातलं काहीच नाही जमलं आणि अचानक कुणाकडे जावं लागलं तर जाता जाता द्राक्ष घे.. चिकू घे, असलं काही न काही त्या करायच्या.

हे सगळे सोपस्कार आई-आजी पाळायच्या इथपर्यंत ठीक! पण मी माझ्या शाळा-कॉलेजच्या वयात काही कामासाठी कोणाकडे एकटीच जातेय तरी या ‘तशीच’ जाऊ नको गं म्हणायच्या आणि मग मात्र माझी चिडचिड व्हायची. मी कधी ऐकायचे पण अनेकदा त्या-त्या वयातल्या न ऐकण्याच्या नादात ‘तशीच’ निघून जायचे. लहान आहे.. मोठी होईल तेव्हा कळेल असं म्हणून सोडूनही द्यायच्या! 

एकदाच आजीने या चिडचिडीवरचा उतारा केला.

मला म्हणाली, “कपभर चहाही न देता कुणाला ‘तसंच’ पाठवशील किंवा रिकाम्या हाताने कोणाकडे जाशील.. तर आपल्या घरातलं काही जाणार नाही.. पण ‘पत’ मात्र जाईल. ज्याला ऐपत आहे, त्याने पत सांभाळावी”

आजही माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक घरातून ‘तसंच’ कुणी जात नाही आणि आपणही ‘तसंच’ कुणाकडे जात नाही.

काय करणार.. ? 

आजी नावाची मौल्यवान विद्यापीठं शब्द पेरून आसपासच वावरत असतात.

लेखिका : डॉ. अपर्णा बेडेकर.

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपले ‘बायो-क्लॉक’ आपणच सेट करा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ आपले ‘बायो-क्लॉक’ आपणच सेट करा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

जेव्हा आपल्याला पहाटे लवकर प्रवास करायचा असेल, तेव्हा आपण सकाळी ४ वाजता गजर लावतो आणि झोपतो. पण बऱ्याच वेळा, गजर न लावता देखील आपण ठरलेल्या वेळेला जागे होतो.

यालाच बायो-क्लॉक (जैविक घडयाळ) असे म्हणतात.

बऱ्याच लोकांचा विश्वास असतो की माणसाचे आयुष्य सरासरी ८०-९० वर्षांपर्यंत असते.

तसेच ५०-६० वर्षांनंतर आजार सुरू होतात असेही त्यांना ठामपणे वाटते.

ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली असते की, नकळत ते स्वतःच आपले बायो-क्लॉक तसेच सेट करतात. म्हणूनच, अनेकांना ५०-६० वयानंतर तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात.

खरं म्हणजे, आपणच मनाने आपले बायो-क्लॉक चुकीच्या पद्धतीने प्रोग्राम करतो.

चिनी लोकांचे दृष्टिकोन वेगळे आहेत !

चीनमध्ये, अनेक लोक ठामपणे विश्वास ठेवतात की १२० वर्षांपर्यंत ते निरोगी आयुष्य जगू शकतात.

या सकारात्मक मानसिकतेमुळे त्यांचे बायो-क्लॉक तशा प्रकारे सेट झाले आहे.

म्हणूनच…!

तुमच्या बायो-क्लॉकला पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्याचा आनंद घ्या !

हे करा आणि १०० वर्षांपर्यंत आरोग्यदायी जगा ! – – – – 

  1. मनाने बायो-क्लॉक सकारात्मक रीतीने सेट करा.

नियमित ध्यानधारणा (मेडिटेशन) केल्यास, आपण किमान १०० वर्षे निरोगी जगू शकतो.

  1. ४० ते ९० या वयोगटात कोणताही आजार होणार नाही यावर ठाम विश्वास ठेवा.

वृद्धत्व हे १२० वर्षांनंतरच सुरू होते, असे स्वतःला पटवा.

  1. केस पांढरे झाले तरी त्यांना नैसर्गिकरित्या रंगवा.

नेहमी तरुण दिसण्याचा प्रयत्न करा.

कपडेही युवक-युवतींसारखे परिधान करा.

हे तुमचा आत्मविश्वास वाढवेल.

कोणत्याही परिस्थितीत स्वतःला वृद्ध समजू नका.

  1. खाण्याच्या वेळी नकारात्मक विचार करू नका.

उदा. “हे अन्न भेसळयुक्त आहे, अपायकारक आहे” असे विचार टाळा.

त्याऐवजी ठामपणे विश्वास ठेवा की –

“ध्यानधारणेच्या सामर्थ्याने मी घेतलेले अन्न शुद्ध होत आहे आणि माझ्यासाठी अमृतसमान आहे.

हे अन्न मला १२० वर्षांपर्यंत निरोगी आणि दीर्घायुष्य देईल. “

अन्यथा, नकारात्मक विचारांमुळे शरीरात घातक एन्झाईम्स तयार होतात, जे पचन आणि आरोग्यास हानीकारक ठरतात.

  1. सदैव सक्रिय राहा.

चालण्याऐवजी शक्य असल्यास हलके धावण्याचा (जॉगिंग) प्रयत्न करा.

  1. वाढत्या वयानुसार आरोग्य अधिक चांगले होत जाते यावर विश्वास ठेवा.

(हे शास्त्रीयदृष्ट्या खरे आहे!)

  1. आनंद आणि आजारपण एकत्र राहू शकत नाहीत.

जिथे आनंद असेल, तिथे आजार टिकू शकत नाही.

म्हणूनच, आनंदी राहा, निरोगी राहा!

रोज विनोदी चित्रपट पाहा आणि मनमोकळं हसा!

  1. “मी आता म्हातारा/म्हातारी होत आहे” असे कधीही बोलू नका, अगदी गंमतीतही नाही!

तुमच्या विचारांतून आणि शब्दांतूनच तुमचे आयुष्य घडते.

बायो-क्लॉक पुन्हा सेट करा आणि दीर्घायुष्य अनुभवा…!

दृष्टीकोन बदला, आयुष्य बदलेल ! जगण्याचा आनंद घ्या…

लेखक : अज्ञात 

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

 

आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं?

लुसलुशीत, खुसखुशीत,

भुसभुशीत, घसघशीत,

रसरशीत, ठसठशीत,

कुरकुरीत, चुरचुरीत,

झणझणीत, सणसणीत,

ढणढणीत, ठणठणीत,

दणदणीत, चुणचुणीत,

टुणटुणीत, चमचमीत,

दमदमीत, खमखमीत,

झगझगीत, झगमगीत,

खणखणीत, रखरखीत,

चटमटीत, चटपटीत,

खुटखुटीत, चरचरीत,

गरगरीत, चकचकीत,

गुटगुटीत, सुटसुटीत,

तुकतुकीत, बटबटीत,

पचपचीत, खरखरीत,

खरमरीत, तरतरीत,

सरसरीत, सरबरीत,

करकरीत, झिरझिरीत,

फडफडीत, शिडशिडीत,

मिळमिळीत, गिळगिळीत,

बुळबुळीत, झुळझुळीत,

कुळकुळीत, तुळतुळीत,

जळजळीत, टळटळीत,

ढळढळीत, डळमळीत,

गुळगुळीत, गुळमुळीत.

 

ह्या शब्दांना इंग्रजी, हिंदी अथवा कुठल्याही भाषेत प्रतिशब्द शोधून दाखवावा.

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक विचार: मनःस्थिती बदला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ एक विचार: मनःस्थिती बदला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

निलूच्या सूनबाई. मृणाल तिचं नाव. वय वर्षे चाळीस पार – साधारण पंचेचाळीस शेहेचाळीस. स्वतंत्र राहणारी. ” नवराबायको दोघं – चुलीस धरून तिघं ” या म्हणीप्रमाणे संसार सुरू असलेली. तिला एक मुलगा वय वर्षे वीस. एक मुलगी वय वर्षे सतरा.

नवरा खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरीत असलेला. ती स्वतः एका बऱ्या कंपनीत नोकरीला आहे. सासू सासऱ्यांचा “जाच ” नाही. लग्न झाल्याझाल्याच तसं तिनं सांगितलेलं. त्यामुळे निवृत्त शिक्षिका सासूबाई आणि निवृत्त बँक ऑफिसर सासरे साधारण मोठ्या अशा आपल्या “गावी ” राहतात. खेड्यात नव्हे.

मुलं लहान असताना, कधी पाळणाघर, कधी बाई, कधी घरून काम असं तिनं ॲडजस्ट केलं. मुलांची शाळा, संगोपन सांभाळलं. दोन्ही मुलं १० ते ५ शाळेची झाली आणि मृणाल बरीच सुटवंग झाली. त्यांच्याच वेळात ही पण नोकरी करू लागली. सुख सुख ते काय म्हणतात, ते खूपच होतं.

दरवर्षी देश विदेशात कुठेतरी फिरणं होतं. गाडी, मोठासा फ्लॅट, आर्थिक बाजू उत्तम. पण हेच सुख कुठेतरी बोचू लागलं मृणालला. तिची सततची चिडचिड वाढली. उगाचच मुलांवर, नवऱ्यावर ओरडणं वाढलं. कारण कळेचना. समाजमाध्यमे आणि मैत्रिणी यावेळी कामी आल्या. “मेनॉपॉज ” नावाचं एक सत्र तिच्या आयुष्यात सुरू झालं होतं म्हणे. हार्मोन्स कमी जास्त झालेत की, असं होतं म्हणे. यावर उपाय एकच की, घरच्यांनी तिचे मुड्स, सांभाळायचे ! (आता इथे एवढा वेळ कुणाला आहे ?) शिवाय आजवर मी सर्वांसाठी केलं, आता तुम्ही माझ्यासाठी करा.

हे लिहिण्यामागचा हेतू एवढाच आहे की, खरंच मेनॉपॉज आणि मानसिक अवस्था यांचा म्हणावा इतका ” मोठ्ठा ” संबंध आहे का? हे कबूल आहे, की त्यावेळी जरा शारीरिक बदल होतात. पाळी येतानाही आणि जातानाही. मात्र गेल्या काही वर्षात हे ” त्रासाचं ” प्रमाण जरा जास्तच वाढलंय असं वाटतं.

मृणालचीच गोष्ट घेऊन बघू या ! नवरा आता मोठ्या पदावर आहे. त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्यात. स्त्री – पुरुष असा बराच स्टॉफ त्याच्या हाताखाली आहे. जबाबदाऱ्या आहेत. घरी यायला कधी कधी उशीर होतो. शिवाय “तो अजूनही बरा दिसतो. “

मुलगा इंजिनिअरिंग थर्ड इअरला आहे. त्याचा अभ्यास वाढलाय. मित्रमंडळ वाढलंय. त्यात काही मैत्रिणीही आहेत. कॉलेज ॲक्टिव्हिटीज असल्याने घरात तो कमीच टिकतो. त्यात कॅम्पसची तयारी करतोय. मग त्याला वेळ कुठाय ?

मुलगी वयात आलेली. नुकतीच कॉलेजला जाऊ लागलीय. टीनएजर आहे. तिचं एक भावविश्व तयार झालेलं आहे. काहीही झालं तरी ती कॉलेज ” बुडवत ” नाही. घरी असली की, मैत्रिणींचे फोन असतात. सुटीच्या दिवशी त्यांचा एखादा कार्यक्रम असतो. फोनवर, प्रत्यक्ष हसणं खिदळणं, गप्पा होत असतात. तरीही ती आईला मदत करते. वॉशिंग मशीन लावणे, घरी आल्यावर भांडी आवरणे, अधेमधे चहा करणे. आताशा कूकर लावते, पानं घेते. जमेल तसं काही तरी ती करून बघते. जमेल तशी आईला मदत करते.

मृणाल मात्र आजकाल या प्रत्येकात काहीतरी खुसपट काढते. नवऱ्यावर पहिला आरोप, म्हणजे “त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही. घरी मुद्दाम उशिरा येतात. ऑफिसमधे सुंदर बायका असतात, तिथेच ते जास्त रमतात. मी आता जुनी झाले, माझ्यातला इंटरेस्ट संपलाय वगैरे वगैरे. शिवाय आगीत तेल टाकायला आजुबाजुच्या सख्या असतातच. मग हा स्ट्रेस अधिक वाढत जातो.

बाळ आधीच्या सारखं आईच्या भोवती भोवती नसतं. त्यांच्यातला संवाद थोडासा कमी झालाय. कारण विषय बदललेत. ” आता माझी त्याला गरजच नाही ” या वाक्यावर नेहमीच तिची गाडी थांबते. त्याचं स्वतंत्र विश्व काही आकार घेतंय, ही गोष्टच तिच्या लक्षात येत नाही. ते बाळ आता हाफचड्डीतलं नाहीय. मोठं झालंय.

मुलीचंही तेच. तिच्या जागी स्वतः ला ती ठेवून बघतच नाही. सतत “आमच्यावेळी ” ची टकळी सुरू असते.

याचा दृश्य परिणाम एकच होत जातो की, ते तिघंही हळूहळू हिला टाळताना दिसतात. ” रोज मरे त्याला कोण रडे ” ही परिथिती येते. कारण कसंही वागलं तरी परिणाम एकच. कितीही समजून घेतलं तरी आई फक्त चिडचिड करते. मग त्याला एक गोंडस नाव मिळतं ” हार्मोन्स इम्बॅलन्स. मेनॉपॉज. “

डॉक्टरी ज्ञानाला हे चॅलेंज नव्हे, हे आधी लक्षात घ्या. पाळी येताना आणि जाताना बाईमधे अनेक बदल होतातच. पण ते ती कशा त-हेने घेते यावर अवलंबून आहे. जसं दुःख, वेदना कोण किती सहन करतं यावर अवलंबून असतं अगदी तसंच !

एक गोष्ट इथे शेअर करते. माझ्या बाळंतपणाच्या वेळी, माझ्या बाजूलाच माझ्या नवऱ्याच्या मित्राची बायको होती. मित्र संबंध म्हणून एकाच खोलीत आम्ही दोघी होतो. तिला पहाटे मुलगा झाला. ती आदली रात्र तिने पूर्ण हॉस्पिटलमधे रडून / ओरडून गोंधळ घालून घालवली. माझीही वेळ येतच होती. पण माझ्या तोंडून क्वचित ” आई गं ” वगैरे शिवाय शब्दच नव्हते. कळा मीही सोसतच होते. माझा लेबर रूममधून माझा ओरडण्याचा काहीच आवाज येत नाही हे बघून, माझी आई घाबरली. खूप घाबरली.. कारण आदली रात्र तिने बघितली होती.

रात्री बारा चाळीसला मला मुलगा झाला. माझं बाळ जास्त वजनाचं हेल्दी होतं. काही अडचणीही होत्या. पण सर्व पार पाडून नॉर्मल बाळंतपण झालं. तेव्हाच लक्षात आलं की, सुख दुःख हे व्यक्तीसापेक्षच असतं.

चाळीस ते पन्नास किंवा पंचावन्न हा वयोगट प्रत्येकच स्त्रीच्या वाट्याला येतो. एखादी विधवा बाई, संयुक्त कुटुंबातील बाई, परित्यक्ता, प्रौढ कुमारिका ते सगळं सहज सहन करून जाते. कारण ” रडण्यासाठी तिला कुणाचा खांदा उपलब्ध नसतो. ” तिला वेदना नसतील का? अडचणी नसतील का? पण ती जर रडत चिडत बसली तर, कसं होणार ? जिथे तुमचं दुःख गोंजारलं जातं, तिथेच दुःखाला वाचा फुटते. अन्यथा बाकिच्यांची दुःखे ही मूक होतात. असो !

हे सर्वच बाबतीत घडत असतं. कारण, परदुःख शीतल असतं. हे वाचून अनेकांचं मत हेच होईल की, ” यांना बोलायला काय जातं ? आम्ही हे अनुभवतोय. ” याला काही अंशी मी सहमत आहे. पण पूर्णपणे नाही. प्रत्येकच नवरा खरंच सुख बाहेर शोधतो का? घरातल्या पुरुषाला सुख बाहेर शोधावे लागू नये, इतकं घरातलं वातावरण नॉर्मल असलं तर तो बाहेर का जाईल ? आपल्या म्हणजे स्त्रियांच्या जशा अनेक अडचणी असतात, तशाच पुरुषांच्याही असतात, हे जर समजून घेतलं तर, वादाच्या ठिणग्या पडणार नाहीत. क्वचित पडल्याच तर तिचा भडका होणार नाही.

पंख फुटल्यावर पाखरंही घरट्याच्या बाहेर जातात, मग मुलांनी याच वयात आपलं करिअर करण्याचा प्रयत्न केला, तर सर्वतोपरी त्यांना मदत करायलाच हवी ना?

मुलींना वेळेतच जागं केलं, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर मुलगीच तुमची मैत्रिण बनते. जरासं आपणही तिच्या वयात डोकावून बघावं. तिच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघावं.

आपली चिडचिड होणं स्वाभाविक आहेच. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, रडून चिडून जर परिस्थिती बदलत असेल, तर खुशाल रडा. पण आहे त्या परिस्थितीशी आपली मनस्थिती जुळवून घेतली तर, आणि तरच घरात संघर्षाची परिस्थिती निर्माण होणार नाही. कारण कपड्याची एखाद्या ठिकाणची शिवण उसवली तर, जसं ज्याला शिवता येईल तसं शिवून टाकावं. अन्यथा तो कपडा कामातून जाईल हे लक्षात असू द्यावं.

यासाठी खूप काही करायला हवंय का? नाही ! आपला भूतकाळ आठवून वर्तमानाशी जुळवून घ्यावं. ” मी तरूण असताना मला माझी आईच तेवढी ग्रेट वाटायची. सासू नव्हे. ” हे आठवावं. बहीण भावाला आणि दीर नणंदांना दिलेले गिफ्ट आठवावे. आपल्या घरात सासर आणि माहेरपैकी कुठली वर्दळ अधिक होती/आहे हे बघावं. त्यानुसार आपल्या नवऱ्याचं वागणं, याचा विचार करावा.

विषय जरा वेगळ्या बाजूला कलतोय, हे कळतंय ! यावर पुढे सविस्तर बोलूच.

पण सध्या एवढंच लक्षात ठेवूया मैत्रिणींनो की, मेनॉपॉज किंवा तत्सम अडचणींवर सहज मात करता येते, त्याचा बाऊ न करता. त्यासाठी फक्त आपली मनस्थिती बदलूया!

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३५ – रेडिओ – भाग दुसरा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३५ – रेडिओ – भाग दुसरा  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

रेडिओ – भाग दुसरा 

(हे “गीत रामायण” वर्षभर श्रोत्यांनी प्रचंड भावनात्मकतेने, श्रद्धेने आणि अपार आनंदाने ऐकले.) 

इथून पुढे — 

आज काय रामजन्म होणार…

सीता स्वयंवर ऐकायचे आहे…

राम, सीता, लक्ष्मण वनवासात चालले आहेत..

“माता न तू वैरिणी” म्हणत भरत कैकयीचा तिरस्कार करतोय…

भरत भेटीच्या वेळेस,

।पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।

या गाण्याने तर कमाल केली होती.

सेतू बांधा रे” या गाण्याबरोबर श्रोतृवर्ग वानरसेने बरोबर जणू काही लंकेलाच निघाला. घरोघर “सियावर रामचंद्रकी जय” चा गजर व्हायचा.

शेवटचं,

।गा बाळांनो श्री रामायण। या गाण्याने कार्यक्रमाचा जेव्हा समारोप झाला तेव्हा एक अनामिक हुरहूर दाटून आली. खरोखरच या श्रोतृगणात आमची पिढी होती हे आमचं किती भाग्य! या अमर महाकाव्याची जादू आम्ही या रेडिओमुळे प्रत्यक्ष अनुभवली. त्यानंतरच्या काळात गीतरामायणाचे अनेक प्रत्यक्ष कार्यक्रम झाले.. आजही होतात पण रेडियोवर ऐकलेल्या त्या पहिल्या कार्यक्रमाची मजाच और होती! आजही आठवताना, लिहिताना, माझ्या अंगावर काटा फुलतो. कसे आम्ही कुटुंबीय, शेजारी, आजूबाजूचे सारेच हातातली कामे टाकून गीत रामायणातल्या समृद्ध रचना गाणाऱ्या रेडिओ जवळ मग्न होऊन, भान हरपून बसून राहायचे आणि पुढच्या आठवड्याची प्रतीक्षा करायचे.

आज ओठातून सहज उद्गार निघतात, “रेडिओ थोर तुझे उपकार.”

शालेय जीवनातला आणखी एक- रेडिओ सिलोन वरून प्रसारित होणारा अतीव आनंददायी, औत्स्युक्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे “बिनाका गीतमाला

अमीन सयानी”चं बहाररदार निवेदन आणि तत्कालीन हिंदी चित्रपटातील एकाहून एक आवडती गाणी ऐकताना मन फार रमून जायचं. दर बुधवारी रात्री आठ वाजता, रेडिओ सिलोन वरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकायचो. त्यासाठी दुसऱ्या दिवशीचा गृहपाठ पटापट संपवून “बिनाका गीतमाला” ऐकण्यासाठी सज्ज व्हायचे हे ठरलेलेच. आज कुठले गाणे पहिल्या पादानवर येणार यासाठी मैत्रिणींमध्ये पैज लागलेली असायची. तसेच नव्याने पदार्पण करणार्‍या शेवटच्या पादानवरच्या गाण्याचे ही अंदाज घेतले जायचे. आम्ही अक्षरश: “बिनाका गीतमालाची” डायरी बनवलेली असायची. शेवटच्या पादानपासून पहिल्या पादानपर्यंतची दर बुधवारची गाण्यांची यादी त्यात टिपलेली असायची. मुकेश, रफी, तलत, आशा, लताची ती अप्रतीम गाणी ऐकताना आमचं बालपण, तारुण्य, फुलत गेलं.

जाये तो जाये कहा..

जरा सामने तो आओ छलिया..

है अपना दिल तो आवारा..

जिंदगी भर नही भूलेंगे..

जो वादा किया वो..

बहारो फुल बरसाओ..

बोल राधा बोल..

बिंदिया चमकेगी, कंगना खनकेगी..

वगैरे विविध सुंदर गाण्यांनी मनावर नकळत आनंदाची झूल या कार्यक्रमातून पांघरली होती.

दुसऱ्या दिवशी शाळेतही मधल्या सुट्टीत पटांगणातल्या आंब्याच्या पारावर बसून आम्ही मैत्रिणी ही सारी गाणी सुर पकडून (?) मुक्तपणे गायचो. अमीन सयानीचे विशिष्ट पद्धतीने केलेले सूत्रसंचालन, त्याचा आवाज आम्ही कसे विसरणार? अजूनही हे काही कार्यक्रम चालू आहेत की बंद झालेत हे मला माहीत नाही. असतीलही नव्या संचासहित पण या कार्यक्रमाचा तो काळ आमच्यासाठी मात्र अविस्मरणीय होता हे नक्की.

फौजीभाईंसाठी लागणार्‍या विविधभारतीनेही आमचा ताबा त्याकाळी घेतला होता.

वनिता मंडळ नावाचा एक महिलांसाठी खास कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित व्हायचा. तो दुपारी बारा वाजता असायचा. त्यावेळी आम्ही शाळेत असायचो पण आई आणि जिजी मात्र हा कार्यक्रम न चुकता ऐकायच्या. खरं म्हणजे त्या काळातल्या सर्वच गृहिणींसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आणि मनोरंजनाचा ठरला होता. माझा या कार्यक्रमांशी प्रत्यक्ष संबंध आयुष्याच्या थोड्या पुढच्या टप्प्यावर आला. त्यावेळच्या आठवणी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अकरावीत असताना

माझे अत्यंत आवडते, इंग्लिश शिकवणारे, खाजगी क्लासमधले “काळे सर” हे जग सोडून गेले तेव्हा मी खूप उदास झाले होते. त्यांच्या स्मृतीसाठी मी एक लेख लिहिला आणि “वनिता मंडळ” या आकाशवाणीच्या कार्यक्रमात तो सादर करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी मा. लीलावती भागवत, विमल जोशी संयोजक होत्या. त्यांना लेख आणि माझे सादरीकरण दोन्ही आवडले आणि तिथूनच आकाशवाणी मुंबई केंद्रावर माझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमाची नांदी झाली. तेवढेच नव्हे तर मी लेखिका होण्याची बीजे या आकाशवाणीच्या माध्यमातूनच रोवली गेली. माननीय लीलावती भागवत या माझ्या पहिल्या लेखन गुरू ठरल्या. रेडिओचे हे अनंत उपकार मी कसे आणि का विसरू?

अगदी अलीकडे “उमा दीक्षित” संयोजक असलेल्या एका महिला कार्यक्रमात कथाकथन करण्यासाठी मी आकाशवाणी मुंबई केंद्रावर गेले होते. पन्नास वर्षात केवढा फरक झाला होता! दूरदर्शनच्या निर्मितीमुळे आकाशवाणीला ही अवकळा आली असेल का असेही वाटले. नभोवाणी केंद्राचे एकेकाळचे वैभव मी अनुभवलेले असल्यामुळे त्या क्षणी मी थोडीशी नाराज, व्यथित झाले होते. फक्त एकच फरक पडला होता. त्या दिवशीच्या माझ्या कार्यक्रमाचा अडीच हजाराचा चेक मला घरपोच मिळाला होता पण त्याकाळचा १५१ रुपयाचा चेक खात्यात जमा करताना मला जो आनंद व्हायचा तो मात्र आता नाही झाला. आनंदाचे क्षण असे पैशात नाही मोजता येत हेच खरं! माझ्या कथाकथनाला अॉडीअन्स मिळेल का हीच शंका त्यावेळी वरचढ होती.

आता अनेक खाजगी रेडिओ केंद्रेही अस्तित्वात आहेत. गाडीतून प्रवास करताना अनेक RJ न्शी ओळख होते. कुठल्याही माध्यमांची तुलना मला करायची नाही पण एक नक्की माझ्या मनातलं नभोवाणी केंद्र… ऑल इंडिया रेडिओ… त्याचे स्थान अढळ आहे आज मी रेडिओ ऐकत नाही हे वास्तव स्वीकारून सुद्धा… 

“ताई उठता का आता? चहा ठेवू का तुमचा? साखर नाही घालत.. ”

सरोज माझ्या डोक्यावर हात ठेवून मला उठवत होती…

“अगबाई! इतकं उजाडलं का? उठतेच..

आणि हे बघ तो रेडियो चालूच ठेव. बरं वाटतं गं!ऐकायला”

गरमगरम वाफाळलेला आयता चहा पिताना रेडियोवर लागलेलं कुंदा बोकीलचं,

।शाळा सुटली पाटी फुटली

आई मला भूक लागली।

हे गाणं ऐकत पुन्हा मी त्या आनंददायी ध्वनीलहरीत बुडून गेले.

– क्रमश: भाग ३५ – समाप्त.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares