मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 3 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

चहा घ्यावा असे वाटू लागले पण सूनबाईची चाहूल लागत नव्हती. कदाचित तिला झोप लागली असावी. सुखी आहे. आवाजाच्या एवढया गदारोळातही झोप लागली म्हणजे खरंच सुखी आहे.

खरेच झोप लागलीय की….?

काही वेळाने सूनबाईचा तिच्या खोलीतूनच चिडका आवाज आला तसा टेप खटकन बंद झाला. टेपचा आवाज बंद झाल्यावर सारे कसे एकदम शांत शांत वाटू लागले.

कितीतरी वेळ दुखऱ्या गुडघ्यांना प्रेमाने कुरवाळत बसून राहिलो. निदान त्यांचा तरी काही असहकार नको. तो काही आता परवडण्यासारखा नाही.

” मम्मी, मला चहा…”

नातवाचा आवाज ऐकला. सूनबाईच्या स्वयंपाकघरातील वावरण्याची चाहूल लागली.

आतातरी चहा येईल म्हणून वाट पहात बसलो.

चहाचा कप जवळच्या तिपायीवर आढळून सुनबाई निमूटपणे आत गेली होती.

कपबशीतूचा चहा आणताना बशीमध्ये चहाचा थेंबही सांडलेला मला आवडत नाही. तसे झाले तर पूर्वी

‘ साधा चहाचा कपही आणता येत नाही नीट ? ‘ 

असा मी चिडायचो पण आता काहीच बोललो नाही. अलीकडे चहा असाच मिळतो, निम्मा-अर्धा बशीत सांडलेला.चहाची कपबशी उचलून मुकाट चहा प्यायला सुरवात केली. चहा पिऊन संपायचा होता तितक्यात आतून सूनबाईचा आवाज ऐकू आला. ती नातवाला ओरडून सांगत होती,

” पसारा आवरून ठेव सारा. आमच्या मंडळाची टी पार्टी आहे आपल्याकडे. आत्ता अर्ध्या – पाऊण तासात येतील साऱ्यांजणी..”

हा इशारा आपल्यालाच आहे हे कळलं. तिच्याकडे कुणी येणार असले की तिला आपण घरात नको असतो. आपली अडचण होते.

गुडघे ‘ चदरिया झिनी रे झिनी ‘ आळवत असतात. कुठेही जायची इच्छा नसते पण जायला तर हवंच…  टी पार्टी आहे ना घरात.. सूनबाईची !

‘ बाबा, थांबा ना थोडावेळ. माझ्या मैत्रिणी येणार आहेत तुमची ओळख करून घ्यायला. ‘

सूनबाईचा पूर्वीचा आग्रह आठवला. उगाचंच. मनाला अलीकडे भूतकाळात, जुन्या आठवणीत रमायचा चाळाच लागून राहिलाय.

उठायला हवे. ‘बाहेर पडेस्तोवर चांगला अर्धा तास जाईल.

आता काठी घेण्यासाठी कुणी आठवण करण्याची आवश्यकताच उरलेली नाही, पण आठवणीने घड्याळ मात्र घ्यावे लागते. अलीकडे त्याचे आणि आपले सख्य तरी फारसे कुठे उरलंय ? बऱ्याचदा त्याची आठवणच होत नाही. पूर्वी तसे नव्हते.. मिनिटामिनिटाला त्याची आठवण व्हायची, त्याच्याकडे लक्ष जायचे. त्याच्या गतीबरोबर आपली गती मिळवणे तेंव्हा जमायचं.   ते तसेच चालते.. आपली चाल मात्र मंदावलीय. आता ते कितीही धावत असले तरी आपल्याला फारसा फरक पडत नाही. फक्त फिरायला जाताना आपण आठवणीने हातात बांधतो. आठवण झाली नाही तर ते ही नाही.

” चला, राजे हो !”

मी कुरकुरणाऱ्या, कटकटणाऱ्या गुडघ्यांना म्हणालो. हो. त्यांनी सोबत द्यायलाच हवी ना ?

” सुनबाई, फिरून येतो गं ! “

चपला पायात सरकवता सरकवता जरा मोठ्याने म्हणालो.

क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 2 ☆  श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 2 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

” समजेल, तुलाही समजेल ते.. खरे तर तशी वेळ येऊ नये तुझ्यावर.. पण काय नेम, उद्याचा काहीच भरवसा देता येत नाही. बहुतेकांवर ती वेळ येते. स्वतःलाच स्वतःची अडचण वाटू लागते.. आणि मग कबीर आठवतो. मग तो जागा शोधू लागतो. कुणी उठ म्हणणार नाही, उठवणार नाही अशी जागा. आधी स्वतः बांधलेल्या स्वतःच्या घरात तशी जागा शोधू लागतो. स्वतःच्या घरात जागा मिळत नाही, दारात जागा मिळत नाही. कुणाच्या मनात जागा उरत नाही.. सगळीकडूनच उठवतात रे ! मग वावटळीत पाचोळा भरकटावा तसे भरकटत रहावे लागते. हं ! एक जागा असते, तिथे सारेच घेऊन जातात. स्वतःच्या हातांनी. आपले ओझे खांद्यावर वाहवत. आपली प्रतिष्ठापना केल्यासारखे त्या जागेवर बसवतात, झोपवतात. तिथून मात्र ‘उठ’ म्हणत नाहीत कोणी. पण तो भाग्याचा क्षण प्रत्येकाला वेळेवर लाभतोच असे नाही. ज्यांना नाही लाभत ते भरकटत राहतात .., इथे .. तिथे. पण इथे या ठिकाणी तसे नाही, इथे कसे, यावे वाटले तर यावे.  बसावे. उठावे वाटले तर उठावे नाहीतर बसून राहावे. कोणाची काहीच हरकत नसते. “

” बाबा, घरी वाट पहात नाहीत का ? “

” पाहतात ना ! सूर्य ढळल्यावर सूर्य केंव्हा बुडतोय याचीच सर्वजण वाट पहात असतात. एकदा का सूर्य बुडाला की त्यांचीही अडचण सरते.. पण क्षितिजावर सूर्य किती काळ रेंगाळेल हे काही सांगता येत नाही कुणाला. आपल्या हातात थोडेच असते ते ? “

गड नदीच्या पाण्यात अंधाराच्या सावल्या न्हाऊ लागल्या तसा मी उठलो आणि त्यांना म्हणालो,

” बाबा, अंधारून आले. चला निघुया आता. उशीर झाला आणखी तर वाट दिसायची नाही. “

तो हसला.

” तू जा. तुला अजून परतीच्या वाटा दिसतायत. “

” आणि तुम्ही ? “

” येणार तर.. यायलाच हवे. “

त्याच्या स्वरांत हतबलता विसावलेली होती. नकळत त्या बोलण्याला कारुण्याची झालर चिकटली होती. त्याचे ते अगम्य बोलणे माझ्या मनाच्या कप्प्यात कुठेतरी दडून राहिले होते.

मी कधीमधी फिरायला तिथेच जायचो.  गड नदीतील त्याच विशाल कातळावर विसावायचो.  मावळतीची शोभा न्याहाळायचो आणि अंधारून यायला लागले की परतायचो.  मला पुन्हा कधी ते बाबा दिसले नाहीत पण तिथे गेले की मला त्या बाबांची , त्या कबीरबाबांची आठवण यायचीच. हो. कबीरबाबाच. त्यांचे नावही मला ठाऊक नव्हते पण माझ्या मनाने, माझ्याही नकळत त्यांचे कबीरबाबा असे नामकरण केलेले होते.

दुपारी जरा कुठे डोळा लागतोय न लागतोय तोच नातवाने मोठ्या आवाजात टेप सुरू केला.

” अरे ss अरे, आवाज जरा कमी करा..”

मी जागेवरूनच ओरडलो पण माझा आवाज काही त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. पोहोचला नाही म्हणजे तसा त्याच्या कानापर्यंत पोहोचला असणार पण मनापर्यंत पोहोचला नाही. तयार काही टेपचा आवाज कमी केला नाही.

त्या रॉक-पॉपच्या आवाजात दुपारची झोप, वामकुक्षी झालीच नाही. नुसते पडून राहावे असेही वाटेना म्हणून उठायचा प्रयत्न करू लागलो तर गुडघे कुरकुरायला लागले. अलिकडे गुडघ्यांनाही आपला भार पेलवेना झालाय वाटते.. उगाच मनात विचार आला.

पावसाची काहीही चिन्हे नसताना अचानक वळीव बरसावा तशी अचानक ओळ मनात बरसली.

‘ चदरिया झिनी रे झिनी..’

पुन्हा कबीरच.

क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 1 ☆  श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सूर्य ढळलेला माणूस…’ – भाग – 1 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

‘सूर्य ढळलेला माणूस..’

वाक्य विचित्र वाटलं ना ? मलाही ते तसंच वाटलं होते. ते वाक्य ऐकताच मी त्यांच्याकडे पाहिले होते ते अगदी चमत्कारिक नजरेने.

‘हा माणूस वेडा तर नाही ना ? ‘

माझ्या मनात त्यांचे ते वाक्य ऐकून पहिला प्रश्न निर्माण झाला होता तो हाच.

पण तो तर वेडा असल्यासारखा दिसत नव्हता. आता वेडेपण दिसता क्षणी ओळखता येते असे थोडंच आहे. दिसण्यात वेडेपणा न दिसणारे कितीतरी भेटतातच. तसाच तो असावा असें मला क्षणभर वाटून गेले, अगदी क्षणभरच. मी त्याच्या डोळ्यांत रोखून पाहिले. डोळ्यांत कुठेही वेडेपणाची किंचितशी झाकही दिसून येत नव्हती. उलट त्याचे डोळे डोहासारखे दिसले शांत, निस्तब्ध, कोणतेही तरंग नसणारे! एखाद्या शांत, संयमी, विचारी माणसाचे डोळे असेच असतात काय ? मला ठाऊक नाही पण वेडेपणा पाहण्यासाठी मी त्याच्या डोळ्यांत रोखून पाहिले तेंव्हा त्याच्या डोळ्यांत पाहताना का कुणास ठाऊक पण मला तो शांत, संयमी, विचारी असावा असे वाटू लागले आणि मग त्याचे  ‘ सूर्य ढळलेला माणूस ‘ या शब्दांचे मात्र गूढ वाटू लागले.

” काय म्हणालात बाबा ? ‘सूर्य ढळलेला माणूस ‘? म्हणजे ? मी काही समजलो नाही. “

तो गृहस्थ हसला. हसण्यातही गूढ असावे असे वाटावे तसा.

मी तिथे बसू नये म्हणून तर त्यांनी मला तसे उत्तर दिले नसावे ? हा विचार मनात येताच मी तिथून उठू लागलो. मी उठतोय हे पाहून तो म्हणाला,

” बस. इथून उठ असे तुला कुणीही म्हणणार नाही. “

” म्हणजे बाबा ? “

” अरे, कबिरानेच सांगितले आहे ना,

” ऐसी जगह बैठीये, कोई न कहे उठ ।’  ही तशीच जागा आहे बघ. इथून उठ असे कोणीही म्हणत नाही. “

” म्हणजे ? कोणीतरी ,कधीतरी इथून उठ असे म्हणेलच ना ? “

” नाही. कुणीच म्हणत नाही. इतकी वर्षे बसतोय मी इथे पण आजवर कुणीसुद्धा म्हणले नाही मला तसे…”

तो बोलायला लागला होता पण त्याच्या पहिल्या गूढ वाक्याबद्दलचे कुतूहल अजूनही माझ्या मनात होते. ‘ सूर्य ढळलेला माणूस.’ त्याचे नंतरचे बोलणे मात्र एखाद्या विचारवंतासारखेच वाटत होते.

” तुला इथून उठवण्यात कुणाचा काही फायदा असेल तरच ते तुला उठ म्हणतील ना ? “

तो पुढे म्हणाला. मनात विचार आला, खरेच जर एखाद्या ठिकाणी आपली अडचण होत असेल तरच आपल्याला तिथून उठवतात. इथे कुणाला आपली अडचण होणार आहे?  झालीच अडचण तर ती त्यालाच होईल.

” तुम्हांला पण माझी अडचण होणार नाही ? “

” मला ? “

तो हसला. स्वतःशीच हसल्यासारखा.

” मला आता माझीच अडचण वाटू लागलीय..  आणि स्वतःला स्वतःची अडचण वाटू लागते ना, तेंव्हा दुसऱ्या कुणाचीच अडचण वाटत नाही. “

” स्वतःला स्वतःचीच कधी अडचण वाटते का बाबा ? “

क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कायमस्वरूपी… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ कायमस्वरूपी… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन

टेबलावर बदलीसाठी ठेवलेला मनोजचा अर्ज बघून मी. रतन गुप्ता आश्चर्यचकित झाले. कारण अलिकडेच त्याने नवीन बंगला बांधला होता आणि तो अतिशय खूश होता. आपली बदली होऊ नये, असं त्याला अगदी आतून आतून वाटायचं. जर कधी झालीच, तर तो एकटाच जाईल. त्याचं कुटुंब मुलांच्या शाळेच्या दृष्टीने कायम स्वरूपी इथेच राहील.

पण आज अचानक त्याचा बदलीसाठी अर्ज? गुप्तांनी त्याला आपल्या चेंबरमध्ये बोलावले.तो आत आल्या आल्या त्यांनी विचारलं, `कालपर्यंत तर तू बदली होऊ नये म्हणून विनवण्या करत होतास. बदली न झाली तर बरं, असं म्हणत होतास. नशिबाने जर झाली,  तर कुटुंब इथेच ठेवीन, असंही म्हणाला होतास. मग आज असं काय संकट आलं की तुला बदली हवीशी झाली. खरं खरं सांग!’

प्रथम मनोजला संकोच वाटला,  मग धैर्यपूर्वक त्याने आपली व्यथा सांगितली, `गावाकडे राहणार्या  आई-वडलांना जेव्हा कळलं की आता मी माझं घर बांधलय आणि मी आता कायमस्वरूपी इथेच राहणार आहे, तेव्हा तेही आपली गाठोडी-पासोडी,  बॅगा – वळकटी  घेऊन कायमचं राहण्यासाठी इथे येत आहेत.

मूळ हिन्दी कथा – स्थायी – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिधि… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ परिधि… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन

यवेळी गगनने आपली मैत्रिण श्रुती हिच्याबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा ठरवला. व्हॉट्स् अॅ पवर त्याने श्रुतीला मेसेज केला, `तुझी इच्छा असेल, तर आपण आज लाँग ड्रईव्हला जाऊ.’

श्रुतीने सहर्ष मान्यता दिली. थोड्याच वेळात दोघे लाँग ड्रईव्हवर निघाले. झाडा-झुडपांमधून गेलेला शांत, निवांत रस्ता, रस्त्यावरून सरपटणारी लक्झरी कार,  रोमँटिक गाणी,  मनातही रोमान्स चरम सीमेवर… अशात श्रुती अचानक म्हणाली, `गगन चल, परत जाऊ या.’

आश्चर्याने गगनने विचारले, `का ग? अद्याप आपण अर्धा प्रवाससुद्धा केलेला नाही.’

श्रुती हळुवारपणे म्हणाली, `मला वाटत नाही,  हा प्रवास पूर्ण व्हावा.’

तिच्या कानात आईचं बोलणं गुंजत होतं. जेव्हा ती नटून-थटून घरातून बाहेर पडताना आईला म्हणाली होती,  `आई मी जातेय.’  तेव्हा आईने तिला हे विचारलं नाही की कुठे चाललीयस?  तिचे एकंदर हाव-भाव बघून एवढंच म्हणाली, `इतकीही दूर जाऊ नकोस  की जिथून परतणं मुश्कील होईल.’

मूळ हिन्दी कथा – परिधि – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विसर्जन… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ विसर्जन… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी

चहाचा कप हातात दिल्यानंतर तो सांगत होता… “अरे त्या वर्षी अप्पांच्या पायाला दुखापत झाली होती आणि मीही लहान होतो ऐनवेळी गाडीही मिळेना म्हणून अगदी चुकचुकतच पहिल्या माळ्यावरच्या हमीदभाईंना ‘विसर्जन तलावापर्यंत येता का ?’ असं अप्पांनी विचारलं होतं …

माईने ‘त्याला’ कशाला विचारलंत म्हणून प्रचंड चिडचिडही केली होती… पण सुट्टीचा दिवस म्हणून घरी असलेले हमीदभाई ‘अरे बाप्पाला माझ्या गाडीतून काय तुम्ही हुकूम केलात तर माझ्या खांद्यावरूनही नेईन’  म्हणत तडक टेम्पोची चावी घेऊन आले होते… 

परत आल्यावर अप्पांनी बिदागी म्हणून दिलेलं भाडंही त्यांनी नाकारलं…

अप्पांना अवघडल्यासारखं झालं. मग माईने आग्रहाने हमीदभाईंना पुरणपोळी आणि मोदक खाऊ घातले… पुढल्या प्रत्येक वर्षी विसर्जन करून आल्यावरच्या पंगतीला हमीदभाईंचं हक्काचं ताट राहिलं…

आम्ही चाळ सोडली .. वस्ती बदलली… आमची घरं बदलली… हमीदभाईंच्या गाड्या बदलल्या, पण त्यांनी विसर्जनाचा मान सोडला नाही.. आम्हीही तो दुसऱ्या कुणाला दिला नाही… कुठेही असले तरी नेमके विसर्जनादिवशी तासभर आधी आरतीला हजर असायचे…

“अगं मोदकांसाठी येतो तो” असं अप्पा हमीदभाईंना चिडवत माईला म्हणायचे… “

तुझा बाप्पा बरकत देतो रे मला… त्याच्या निरोपाला मी नसेन, असं होणारच नाही ” …

२६ वर्षं हे अखंड चालत राहिलं … तीन वर्षांपूर्वी अप्पा गेले, तेव्हापासून ते न जेवता फक्त मोदक घेऊन जाऊ लागले… पण त्यांना भाडं विचारण्याची माझी हिंमत आणि तेवढी ऐपत अजून झाली नाही…

या मे महिन्यात हमीदभाई आजाराने गेल्याचं कळालं होतं … आज विसर्जन आहे… काय करावं सुचत नाहीय… आज माझी स्वतःची गाडी आहे रे… पण त्यांच्या निरोपाशिवाय आमचा बाप्पा कधी गेलाच नाहीय रे… विसर्जनच करूच नये असं वाटतंय…

“आरती करून घ्या रे…” या माईंनी दिलेल्या आवाजाने नंतरची मधली कितीतरी वेळ शांतता मोडली…

आरती संपल्यावर ती सुरू असताना मघाशी जिन्यात अवघडून उभा असलेला माणूस दाराशी आला… सगळ्यांच्या हातात प्रसादाचा मोदक दिल्यावर माईंनी त्याच्याही हातावर मोदक ठेवला… त्यांने तो अदबीने घेत माईंना सांगितलं …  “बाप्पा विसर्जनाला न्यायचाय ना… गाडी लेके आया हूं… हमीद खान चा मी मोठा मुलगा.. अब्बानी सांगून ठेवलं होतं… ते नसले, तरी अप्पांचा गणपती आपल्याच गाडीतून न्यायचा… परंपरा आणि आपला मान आहे… म्हणून आलो होतो…”

माईंनी भरल्या डोळ्यांनी आणखी एक मोदक त्याच्या हाती दिला… जो कदाचित हमीदभाईंसाठी होता….

कसंय… शेवटी देव धर्माचा असला तरी उत्सव हा नात्यांचा असतो… त्यातल्या “माणसां”चा असतो.. इतकंच…!!

लेखक : अज्ञात…🙏 

संकलन : सुश्री नेहा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ झाडाची व्यथा… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ झाडाची व्यथा… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन

आपल्या वृक्षमित्राला उदास बसलेलं पाहून चिमणी चिवचिवू लागली, `काय झालं दोस्ता? तू इतका उदास का?

झाडानं व्यथित स्वरात उत्तर दिलं, `चिमणुताई मला या ठिकाणी खूप असहज आणि असहाय्य असल्यासारखं वाटतं.’ चिमणी हसत हसत पुन्हा चिवचिवली. `काय चेष्टा करतोयस दादा! तू तर किती नशीबवान आहेस. तुझ्या आस-पास रोज सफाई केली जाते. खत-पाणी सगळं कसं नियमितपणे आणि वेळेवर मिळतं. एकदम हिरवागार आणि स्वस्थ दिसतोस तू. तुझं एक पान तरी तोडायची कुणाची हिम्मत आहे का? चोवीस तास या बागेचा पहारेकरी लक्ष ठेवून असतो. मग तुला दु:ख कुठल्या गोष्टीचं? ‘

वृक्षाच्या डोळ्यातून अश्रू टपकले. भरल्या डोळ्याने तो म्हणाला, `पण माझे बहुतेक सगळे नातेवाईक या बागेच्या बाहेर राहतात ना? इथे मी एकटा…’

मूळ हिन्दी कथा – पेड़ की व्यथा – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुझ्यासारखा तूच… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तुझ्यासारखा तूच… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन 

समीता आणि सुमीरच्या प्रेमाला ळूहळू रंग चढू लागला होता. आपली प्रेमभावना त्यांनी एकमेकांना बोलून दाखवली होती,  असं काही नाही, पण त्या दोघांनाही आतून ते जाणवलं होतं. येत्या व्हॅलेंटाईनच्या दिवसाची खूप स्वप्ने रंगवली होती समीताने. या दिवशी तो आपल्या प्रेमाचा उच्चार करेल, आपल्याला मागणी घालेल, याबद्दल खात्रीच होती तिला. ती सारखी व्हॉट्स् अॅरप हातात घेऊन बसली होती. सुमीरच्या आमंत्रणाची वाट बघत होती. पण संध्याकाळ सरत आली, तरी कुठलाही मेसेज नव्हता. इच्छा असूनही ती स्वत: पुढाकार घेऊ शकत नव्हती. यापूर्वी ते एकटे असे कधीच कुठे भेटले नव्हते.

व्हॅलेंटाईनचा दिवस सरला. व्हॉट्स् अॅीपवर हाय-हॅलो वगैरे काही झालं नाही. समीता साशंक होऊन बसली होती. `आपल्याला उगीचच वाटतय, त्याचं आपल्यावर प्रेम असावं. पण तसं नसणार, नाही तर काल त्याने मला भेटायला बोलावलंच असतं. पण नाही… नक्कीच त्याचं दुसर्यात कुणावर तरी प्रेम असणार. आजपासून त्याचं आणि आपलं नातं संपलं.’ तिला वाटत राहीलं.

रात्री काहीसा उशिराच सुमीरचा व्हॉट्स् अॅ्पवर मेसेज आला. काहीशा उदासपणेच तिने तो वाचला. मेसेज वाचताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मेसेज होता, `खूप इच्छा होती तुला भेटायची. मी माझ्या मनाला कसे काबूत ठेवले, ते माझे मला माहीत. जाणून-बुजूनच भेटलो नाही. तुझ्या- माझ्या विवाहात येणार्यात आडचणी आ वासून समोर उभ्या राहिल्या. वेगळे धर्म, आर्थिक स्थितील केवढी तरी तफावत या सगळ्यामुळे आपला विवाह नाही होऊ शकला तर?  मला वाटलं, निंदा-नालस्तीचा एकही डाग तुझं चारित्र्य कलंकित करू नये.’

सुमीताने, धर्म, आर्थिक स्तर भिन्न असतानाही सुमीरलाच जीवनसाथी म्हणून निवडले. कारण इतका पवित्र विचार दुसर्याआ कुणी क्वचितच केला असता.

मूळ हिन्दी कथा – ऩजरिया प्रेम का – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘मूर्ती’ काका… – लेखक- कौस्तुभ केळकर नगरवाला ☆ प्रस्तुती – पार्वती नागमोथी ☆

?जीवनरंग ?

 ☆ कथा – ‘मूर्ती’ काका… – लेखक- कौस्तुभ केळकर नगरवाला ☆ प्रस्तुती – पार्वती नागमोथी

हा सिलसिला  कधी सुरू झाला ? काही आठवत नाही. बहुतेक अनादी अनंत काळापासून…

अगदी मी लहान असल्यापासून. गणपती जवळ आले की, मूर्तीकाकांची आठवण यायची. मूर्तीकाकांचं खरं नाव ? बाप्पालाच माहिती. खरंच माहिती नाही. आम्हाला आपले दोघेही प्राणप्रिय. एक मूर्तीकाका आणि दुसरे गणपतीबाप्पा.

मूर्तीकाका, कसबा पेठेतल्या कुठल्यातरी वाड्यात रहायचे. म्युन्सीपाल्टीत कुठल्यातरी खात्यात कारकून. बालपण पेणला गेलेलं. मूर्तीकाकांचे वडील, गणपतीच्या कारखान्यात काम करायचे. हातात जादू. तीच जादू पुढच्या पिढीत झिरपत आलेली. गणपती जवळ आले की, मूर्तीकाकांची पंधरा दिवस रजा. सहज मिळाली तर ठीक…. नाहीतर विदाऊट पे.

कुंभारवाड्यातून शाडूची माती आणायची. बोहरी आळीतून रंगाचे डबे. वेगवेगळ्या साईजचे ब्रश. दोन खोल्यांचं त्यांचं घर. बाहेरच्या खोलीत रंगशाळा अवतरायची.

गणपती यायच्या आठवडाभर आधी. बाबांचं बोट धरून, मी मूर्तीकाकांकडे.” नानू , या वेळी  विठ्ठलू गणपती हवाय रे बाबा. आण्णांची फार इच्छा  आहे. ” बाबांची फर्माईश.

” तुम्ही सांगतलोत तसो करतो बाबानू.”

मी आपला मूर्तीकाकांकडे बघत बसायचो. चट्टेरीपट्टेरी पायजमा. बाह्यांचा गंजीफ्राॅक. त्यातून डोकवणारं जानवं. गंजीफ्राॅकवर रंगपंचमी. नाकावरनं ओघळणारा चष्मा. आणि घड्याळ विसरलेला हा विश्वकर्मा. मूर्तीकाका मान वर न करताच ऊत्तर द्यायचे. त्यांचे हात , डोळे , मेंदू सगळे त्या मातीच्या गोळ्यावर फोकस करणारे. बघता बघता त्यातून गणेशु प्रगटायचा. तल्लीन होणं म्हणजे काय ? खरंच मूर्तीकाकांकडनं शिकावं. कामातून खरा आनंद. आनंद सृजनाचा. निर्मितीचा. अफलातून असावा. आत्ता पटतंय. ज्यातून आनंद मिळतो, भान हरपायला होतं, ते काम करावं.

आम्ही आपले आयुष्यभर  पाट्या टाकणार आॅफीसात. गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी  आम्ही  मूर्तीकाकांकडे. आत पंचवीस गणपती अवतरलेले. स्वर्गसुख. काय एकेक मूर्ती असायची, डोळे भरून पहायची. आखीव, रेखीव, सुबक. अप्रतिम  रंगसंगती. सगळ्यात आवडायचे ते मूर्तीचे डोळे. कुठूनही बघा. असं वाटायचं, बाप्पा आपल्याचकडे बघतायेत. बाप्पांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आहे. बाप्पा गालातल्या गालात हसतायेत सुद्धा. ‘काळजी नको, मी आहे पाठीशी…’

बाप्पांची ती आश्वासक नजर. बाप्पा दिसले की ऊत्साहाला ऊधाण. मनाच्या कानात, आनंदाचे ढोलताशे वाजायला लागायचे. ही सगळी मूर्तीकाकांची जादू. प्रत्येक मूर्ती घडवताना जीव ओतलेला. प्रत्येक मूर्ती म्हणूनच जिवंत. एकाही मूर्तीसाठी मूर्तीकाकांनी, कधी साचा वापरला नाही. प्रत्येक मूर्ती हाताने घडवायचे. जरा मोठा झालो. सायकल चालवता यायला लागली. गणपतीच्या आधी आठ दहा दिवस. रोज संध्याकाळी  मूर्तीकाकांकडे जाऊन बसायचो. त्यांचं ते मूर्ती घडवणं. रंगवणं… डोळ्यांची आखणी. तीच खरी प्राणप्रतिष्ठा. तो खरा जिवंत देखावा. मी तल्लीन होवून ते बघत बसायचो.

मला फार आवडायचं. मूर्तीकाका ठरवून पंचवीस मूर्ती घडवायचे. ठरलेली घरे. वर्षानुवर्षे. कुणाला एखादवर्षी वेगळी मूर्ती  हवी असेल, तर तसं. गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी नावाची चिठ्ठी लावून, बाप्पा तयार असायचे. येणारा वाजतगाजत मूर्ती घेवून जायचा. जाताना काकूंकडे पैसे देवून जायचे. किंमत ? “देवाची किंमत कधीच करायची नसते…” मूर्तीकाका असंच म्हणणार.

मूर्तीकाकांकडच्या बाप्पापाशी, किमतीचं लेबल कधीच नसायचं. लोक अंदाजाने पैसे द्यायचे. मूर्ती  घेवून जाताना बघितलं, की मूर्तीकाकांचे डोळे  डबडबायचे. ‘लेक चालली सासरला’सारखा फील येत असावा.

अनंचतुर्दशीच्या दिवशी डोळ्यातला धबधबा, कधी गाली ओघळू  लागायचा कळायचं नाही. याचं सगळं क्रेडीट मूर्तीकाकांनाच. मूर्तीकाकांचा रवि. माझ्याच वयाचा. या सगळ्यापासून अलिप्त असायचा. बाहेरच्या खोलीत पुस्तकात डोकं खुपसून बसायचा. हुशार होताच. तुसडा वाटायचा. ठरवून आर्किटेक्ट  झाला. छान चाललंय त्याचं. कॅम्पात आॅफीस आहे स्वतःचं. मोठ्ठा फ्लॅट घेतलाय कर्वे रोडला. सगळे तिकडे शिफ्ट झालेत. कसब्यातली ती भाड्याची जागा आहेच. मूर्तीकाका आता पुढच्या वर्षी  रिटायर्ड होतील. अजूनही सायकल हाणत कसब्यात जातात. गणपतीशाळा चालूयं. मधे एकदा रवि भेटला होता. ” तुमचा बाप्पा आवडता असेल, मला मात्र बिलकूल आवडायचा नाही. वेड्यासारखे वागायचे बाबा. पंधरा पंधरा दिवस बिनपगारी रजा. त्यापायी प्रोमोशन नाही. आईची खूप ओढाताण व्हायची. लोक पैसे द्यायचे, त्यातनं मटेरियलचा खर्चही भागायचा नाही. यांच्या मूर्ती बघून बर्याच लोकांनी साचे बनवले. गणपतीचे कारखाने काढले. गब्बर झाले . आम्ही आपले तसेच…”

खरंय.

रविचं बरोबर आहे.

” आता ठीक चाललंय ना तुझं..? बाप्पाची कृपा.” मी म्हणलं.

” कौ, माझाही बाप आहे तो. मलाही वाटतं, त्यानं आरामात रहावं. धावपळ कमी करावी. पण काय करू ? आमचा गणेशयाग काही थांबत नाही अजून..” एवढं बोलून  रवि निघून गेला.

दोन दिवसापूर्वी. कुहूला घेऊन मूर्तीकाकांकडे. आत रवि बसलेला. मूर्तीवर शेवटचा हात फिरवीत होता.

रविच्या हातात ब्रश….? मी पहिल्यांदा  बघितला. ” कौ बाप्पा वाट बघतायेत.” दुसर्या रांगेत, माझ्या नावाची चिठ्ठी असलेला बाप्पा. माझी वाट पाहणारा. मनप्रसन्न. बाप्पा मोरया. एकदम रवि गळ्यात पडून रडायला लागला.

” तीन आठवड्यापूर्वी  बाबा गेले रे. एकदम अॅटॅक आला. मी शेजारीच होतो. माझा हात हातात घेवून म्हणाले. ‘वर्षातले पंधरा दिवस देशील मला ? हे देवाघरचं काम थांबता कामा नये.’ आयुष्यात कधीही मातीला हात लावला नव्हता. तरीही…, पटलं.तो बाप्पा खरंच आहे रे, त्यानंच या मूर्ती माझ्याकडनं घडवून घेतल्या. खूप समाधान मिळालं या पंधरा दिवसात. माझा बाप, आयुष्यभर कळलाच नाही कधी. या पंधरा दिवसात समजला. तू मात्र लक्षात ठेव. बाबा नसले म्हणून काय झालं ?  तुझ्या घरचा बाप्पा इथूनच जाणार.”

माझ्या डोळ्यांना हाताचा वायपर पुरेना. थोड्या वेळाने  सावरलो. बाप्पांकडे डोळे  भरून बघितलं. डिट्टो तशीच मूर्ती. मूर्तीकाकांनी घडवल्यासारखी. बाप्पा तुस्सी ग्रेट हो… शेजारी कुहू जरा अवघडलेली. ” बाबू ते मूर्तीकाका कुठे आहेत ? त्यांना बघायला तर मी आलेय इथे. ” रविनं कुहूचा पापा घेत, तिला कडेवर घेतलं.

” आजपासून मीच तुझा मूर्तीकाका…..! “

बाप्पा  मोरया  !

लेखक- कौस्तुभ केळकर नगरवाला

प्रस्तुती- सुश्री पार्वती नागमोथी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांताक्लॉज… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सौ. उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ सांताक्लॉज… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन 

सांताक्लॉजला बघताच गरीब वस्तीतल्या त्या सगळ्या मुलांमध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या. काही क्षणात तिथल्या सगळ्या मुलांच्या हातात सुंदर सुंदर भेटी होत्या. बिल्लूने मात्र या भेटी घेण्यास नकार दिला. सांताक्लॉजने अतिशय प्रेमाने विचारले, `बेटा तुला या भेटी का नकोत? काय कारण? तुला हवय तरी काय?’

बिल्लू अतिशय भोळेपणाने म्हणाला, `मला भेटवस्तू नकोत. त्यापेक्षा तुम्ही मला सांताक्लॉजच करा ना!’

सांताक्लॉज बनलेल्या पीटरने विचारले, `बेटा, इतक्या चांगल्या भेटी सोडून तुला सांताक्लॉज का व्हावसं वाटतय?’

बिल्लू प्रथम गप्प बसला, पण पीटरने पुन्हा पुन्हा विचारले, तेव्हा तो म्हणाला, `अंकल मला खूप थंडी वाजते. मी डोक्यापासून पायापर्यंत लोकरीचे कपडे कधी घातलेच नाहीत. फक्त त्यासाठीच… ‘

मूळ हिन्दी कथा – सांता क्लॉज – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares