मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निश्चयाचे बळ— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ निश्चयाचे बळ— ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

“जाड्या,किती वाजता येतो आहेस रे?”  रोहनचा सेल  खणखणला. शेजारी रिद्धी उभी होती. 

“आई बघ बघ. याला नाही तुम्ही कोणी बोलणार. मुलगा आहे ना. मला मात्र कधीही रात्री मैत्रिणीकडेही रहायला जाऊ देऊ नका.” 

“रिद्धी,जलो मत . मॉम, पाचसो रुपये दे तो.आज बाहर खाना खाएंगे… “

आईने कौतुकाने 500 रु रोहन ला दिले.

“आई, अग किती डोक्यावर बसवशील ग. केवढा झालाय लठ्ठया बघ की. अग ११०  किलो क्रॉस केले या गाढवाने.” 

रोहन कॅन्टीनमध्ये मित्रांबरोबर होता… “  जाड्या, आयआयटी entrance दिलीय ना “ काय निघणार score? 

करणार का crack ?” सुहासने चेष्टेने विचारले.

रोहन हुशारच होता. आत्ताही पेपर्स मस्त गेले होतेच. पण काय सांगावे– “ रोहन काहीच बोलला नाही.

शेजारी केतकी बसली होती. केतकीनेही आयआयटी  entrance दिली होती. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत केतकी रोहनची प्रतिस्पर्धी होती. जी जी परीक्षा रोहनने दिली, त्यात त्याच्यापेक्षाही  जास्त यश मिळवून केतकी  पुढे जात असे.

कुचेष्टेने रोहन म्हणाला, “ काय बाबा, आपल्या कॉलेजमध्ये आहेत की अतिरथी महारथी.” 

केतकी काहीच बोलली नाही. तिला मजा वाटायची. वाटायचं ‘ हा मुलगा शाळेपासूनच आपला हेवा का करतो,

कधीही निखळ मनाने कौतुक तर सोडाच, पण याने कधी अभिनंदनही केले नाही आपले.’ .. 

आयआयटी  entrance  चा result लागला. केतकीची ४००, तर रोहनची ८०० वी रँक आली. 

केतकीचे पवईच्या आयआयटी मध्ये  पहिल्याच लिस्टमध्ये नाव आले आणि तुला तिथे सहज प्रवेश मिळाला. रोहनला मिळाले खरगपूर आयआयटी . 

कुत्सितपणे रोहन म्हणाला, “ आता काय… पवई म्हणजे आकाशाला हात लागले.” 

केतकी म्हणाली,” तुझे मनापासून अभिनंदन रोहन.. खरगपूर iit सुरेखच झालं. “ 

ती आपल्याला खिजवते आहे असेच रोहनला वाटले.

नंतर कितीतरी महिने केतकीला पुण्याला यायला जमलेच नाही. मग एकदा तिला रोहन भेटला.

“ केतकी कॉफी  प्यायला जाऊ या ?” 

“ चल की जाऊ ” –केतकीने आमंत्रण स्वीकारले.

“ कसं काय चाललंय तुझे रोहन ?” तिने विचारलं. 

“ कॉलेज चांगले आहे ग. पण मला फार  ragging होतेय. मला  लठ्ठया,जाड्या,गवा हिप्पो अशी नावे ठेवलीत सगळ्यांनी. मला तर हे सोडूनच द्यावे असे वाटू लागलेय. माझे नाही लक्ष लागत अभ्यासात. मला जबरी इनफीरिओरिटी कॉम्प्लेक्स आलाय. “ आयुष्यात प्रथमच रोहन तिच्याशी इतका  उदास होऊन बोलत होता.

– “ ही सगळी माझीच चूक आहे केतकी. आजी आई आजोबांनी  मुलगा मुलगा म्हणून माझे फाजील लाड केले.कधी पोहायला जाऊ दिले नाही. कधी ग्राउंडवर गेलो नाही. तू बघ ना कशी सडसडीत आहेस. मला आठवतंय तू रोज पोहायला जायचीस. आणखी काय करतेस ग तू ?” 

“ रोहन, मी रोज निदान १ तास जिममध्ये घाम गाळते. मला लठ्ठपणा आवडत नाही. अरे रुप आपल्या हातात नसतं ,

पण  शरीर प्रमाणबद्ध ठेवणं तर असतं नं आपल्या हातात. हे बघ. एवढा निराश नको होऊस. तिकडे एखादी जिम शोध.  इथे आणखी किती दिवस आहेस? “ 

“ आहे की अजून एक महिना.” 

“ अरे वा. मग हे बघ, माझी एक dietician मैत्रीण आहे. घेतोस का तिचा  सल्ला ? बघ हं, म्हणजे माझी तुझ्यावर अजिबात बळजबरी नाही. “ 

रोहन लगेच म्हणाला, “ केतकी, घे तिची अपॉइंटमेंट. मला या दुष्ट चक्रातून बाहेर यायचंय. लाज वाटते ग माझ्या मापाचे टी शर्टस मिळत नाहीत हे सांगायची. “

“ चिल रोहन. मनापासून ठरवले आहेस ना, मग जमेल तुला. करशील तू. आपण एकत्र वाढलोय रोहन. आठवतंय, मी खूप वेळा तुला सांगायचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी तू माझी हेटाळणीच केलीस. अरे, खरे बोलणारे मित्र कमी असतात रोहन. पण असं विचार तू कधी केलाच नाहीस. “ 

“ केतकी खरंच सॉरी. खूपदा मी वाईटच वागलो तुझ्याशी. पण तू ते  मनात नाही ठेवलंस. त्याबद्दल मनापासून थॅंक्स . 

“ चला मग – आता नक्की  मिशन ‘ weight loss ‘ सुरू ?” 

रोहन केतकीच्या मैत्रिणीला भेटला.

“ हे बघ रोहन,मी सांगते तसेच follow करणार असलास तरच मी तुला guide करीन. मी cheat day देणार नाही.

किमान पूर्ण एक वर्ष तुला स्वतःसाठी द्यावे लागेल. मला दर वीकला तुझे वजन, आणि फोटो मिळाला पाहिजे. आणि इथे आलास की न चुकता भेटणार आहेस तू मला. ठीक आहे ?”

रोहनने सगळे मान्य केले, आणि वजन कमी करण्याचे अगदी मनापासून ठरवले. 

हॉस्टेलवर अपेक्षेप्रमाणेच स्वागत झाले— “ आलात का जाडोबा ? आणखीच जाड होऊन आलात की काय ?” 

रोहन काहीच बोलला नाही. नहमीसारख चिडलाही नाही. 

त्याचा रूम पार्टनर सचिन त्याचा सच्चा मित्र होता. “ सचिन,मला एखादी चांगली जिम सांग ना. 

मी खरंच आता मनावर घेतलंय. माझं हे अस्ताव्यस्त वजन आता माझ्याच डोळ्यांना खुपायला लागले रे.. “ 

“ शाब्बास रे दोस्ता. आता सगळं तुझ्या मनासारखंच  होईल बघ. उद्याच जाऊ या आपण जीमला. ‘ 

“ सचिन,पण प्लीज हे कोणालाही सांगू नकोस हं.” 

“ अरे नाही रे दोस्ता. नाही सांगणार. आता तू  करूनच दाखव मेरे यार.” 

रोहनने जिममध्ये वेगळी फी भरून पर्सनल ट्रेनर लावला.

ते ट्रेनर त्याला म्हणाले, “ हे बघ, मी अतिशय वाईट टीचर आहे. माझे ऐकले नाही तर मी चक्क तुला झोडून काढेन.” 

“ चालेल सर. पण मी आता मागे नाही हटणार.”

रोहनची जिम सुरू झाली… 

डायटीशीयन ऋचाने  सांगितलेले क्रॅश डाएटही सुरू झाले. पहिल्याच महिन्यात रोहनचे ५ किलो वजन कमी झाले.

“ हुरळून जाऊ नका. नंतर ते मुळीच  कमी होत नाही बरं “ सर जरा कडक शब्दातच म्हणाले.

ऋचा सतत संपर्कात होतीच.

“ रोहन, तू आता सकाळी किंवा रात्री– जेव्हा वेळ होईल तेव्हा walk करायचा आहे. रोज निदान ६ मैल. कसंही करून हे जमवायचंच.” 

रोहनने रात्री  brisk walk घ्यायला सुरुवात केली. कारण त्याला त्याच्या अतिशय व्यग्र दिनक्रमात सकाळी त्यासाठी वेळ देणे अशक्य होते.  रोहनचे टार्गेट ७५ किलो होते. ६ महिन्यात रोहन ८८ किलो वर आला. 

आता हॉस्टेलची मुले म्हणू लागली–“ आगे बढो ,जाड्या. मस्त चाललंय की. अरे हो, आज रात्री feast आहे बरं का. गुलाबजाम आणि दहिवडे करणार आहे अण्णा. येतो आहेस ना ? “.

रोहन काहीच बोलला नाही. “ नको येऊ रे बाबा.”– टवाळ शब्द त्याला ऐकू आल्याशिवाय राहिले नाहीत. 

एकदा ग्राफिक्सच्या  सरांनी विचारलं, “ रोहन, कसा आहेस. झेपतंय ना सगळं तुला? नाही, जरा अशक्त दिसतो आहेस म्हणून विचारतो आहे.” 

“ हो सर, झेपतंय ना.. मी मस्त आहे.” 

रोहनला खरोखरच व्यायामाची गोडी लागली होती. सुट्टीत घरी गेला तेव्हा तर आजी आजोबा बघतच राहिले–

“अरे काय रे हे? किती  वाळला आहेस…. आता इथे आहेस तर छान भरपूर खा पी. काय हे तुझे शरीर… “ 

“आजी, प्लीज मला भरीला पाडू नकोस. मी अजिबात  काहीही खाणार नाही.” त्याने बजावूनच टाकलं. 

तो लगेच ऋचाला भेटायला गेला. 

“व्वा रे पठ्ठे. मस्त दिसतोय की अगदी. पण तरी अजून १३ किलो कमी व्ह्यायला हवेत. सोडू नको हं  जिम, आणि डाएट प्लॅन.” 

“नाही ग बाई, अजिबात सोडणार नाही. आता मलाच आवडत नाही असंतसं काही खायला. कसा होतो ना गं मी  पूर्वी….. शी….. पण आता मी XL size पर्यंत आलो आहे. पूर्वी मला प्लस size च शोधावा लागायचा. माझी मलाच लाज वाटायची बघ. तुला मनापासून थँक्स ऋचा आणि केतकीलाही.” 

आता बघताबघता रोहनचे वजन २२ किलो कमी झाले. तो खूपच हँडसम आणि फिट दिसायला लागला होता .

– ५`१०” इंच उंची आणि  ७२  किलो वजन… म्हणजे एकदम परफेक्ट शरीरयष्टी….. 

बरोबर एक वर्षानंतर केतकीने  त्याला बघितले, आणि …..”  Oh My my!!! मी नक्की रोहनलाच बघतेय ना !

काय हा सुंदर बदल रे! वावा!! so proud of you यार… “ 

 रोहन छानसं हसला…. “ केतकी,अगं या वजनाने स्वतःबरोबर माझा माज पण उतरवला बघ. मी पूर्वीचा रोहन नाही राहिलोय आता. आणि याचे सगळे श्रेय तुला, ऋचाला, आणि जीमला बरं का… I must accept … चल, कॅफेत  जाऊ या ? आणि आता मला पूर्वीसारखी गोड कॉफी अजिबात नको. मीही तू कायम घेतेस तो ग्रीन टीच घेईन. केतकी…my guide..  गुरू.. आणि फिलॉसॉफर सुद्धा ….खरंच थँक्स ग. “ 

आणि दोघेही हसत हसत कॅफे कडे वळले.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूक….भाग ५ ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ भूक….भाग ५ ☆ मेहबूब जमादार ☆

(त्यानीं गांवच्या शिपायांमार्फत पिकलेली भाजी प्रत्येक घरांत पोहचविली.कांही कुटूंबाकडे भाकड म्हशी होत्या.त्यांच्या लहान मुलानां त्यामूळे दुध मिळत नव्हतं. त्यानां लहान मुलांसाठी दुध पोहोच केलं.) इथून पुढे वाचा….

आज गावक-यांत विश्वास निर्माण झाला होता. दोनवेळचं पोटभर मिळू लागलं होतं. ही सारी दुशाआजीची करामत होती.

दुशाआजीच्या कामाची दखल वरपर्यंत जावू लागली.नर्स दोन-तीनदा हे पाहून गेली.तिनं तिथल्या प्रमुख डॅाक्टर नां सांगितलं.डॅाक्टर हे ऐकून अचंबित झाले.

दुस-या च आठवड्यात ते गावांत आले.त्यानीं सारं गांव फिरून पाहीलं.त्यानां आश्चर्याचा धक्का बसला.त्यानीं गावच्या प्रमुखानां व दुशाआजीला बोलावलं.पुढच्या आठवड्यात गावांत कॅम्प घेवूया असं त्यानीं सांगितलं.

पुढच्या आठवड्यातच गावातील शाळेत कॅम्प घेतला.लहान मुलानां डॅाक्टरानीं टॅानिकच्या गोळ्या,दुधपावडरचं वाटप केलं.फार मोठा साठा नव्हता,परंतू त्यानीं बाजूच्या केंद्राकडीलही थोडाफार साठा जमा करून आणला होता.गावक-यानां त्यानीं तपासलं.गरजेपुरती औषध दिली.त्यानीं बायकांत बसलेल्या दुशाआजीला जवळ बोलवाय सांगितलं.

दुशाआजी आली.त्यानीं डॅाक्टरनां नमस्कार केला.

“आजी कशी आहे तब्ब्येत?”

“मला रं बाबा काय होतयं? मला नकोत तुझी औषध.या माझ्या बायानां पोरानां दे”

डॅाक्टर हसतच ऊटले. त्यानीं दुशा आजीचा हात धरला.एका खुर्चीवर बसवलं.

सूर्य डोंगराकडे चालला होता.आख्खा गांव शाळेत जमा झाला होता.डॅाक्टरनीं आणलेला हार दुशाआजीच्या गळ्यात घातला.सर्व गावक-यानीं टाळ्यांचा गजर केला.डॅाक्टर खुर्चीवरून ऊटले.गावक-यानां उद्देशून ते म्हणाले,

“माझ्या सर्व बांधवानो व भगिनीनों,या आजीनं जी गावाला जगण्याची उमेद दिली,दिशा दिली ती एक प्रकारची करामतच आहे असे मला वाटते.खरं तर यातलं कांहीच मला माहित नव्हतं.पण तूमच्या गावांत काम करणा-या नर्सनं मला हे सारं सांगितलं.त्यामूळे मला तुमचं गांव पहाण्याची इच्छा झाली.दुशाआजीच्या कामानं खरंच मला ओढत आणलं,असं म्हंटलं तरी काय वावगं होणार नाही.त्याचबरोबर दुशाआजीनं सांगितलेल्या स्वावलंबनाची कामे प्रामाणिकपणे व कष्ट करून तुंम्ही सर्वानीं ऊभी केलीत.ज्यामूळे तुंम्हाला दोन वेळची भाकर खायला मिळाली.त्यामूळे तुंम्हा सर्वानां धन्यवाद दिले पाहिजेत.अशी काम करणारी दुशाआजी जर प्रत्येक गावाला मिळाली तर निश्चितच त्या त्या गांवचा दोनवेळचा भूकेचा प्रश्न मिटेल.तुंम्ही सर्व लोकानीं दुशाआजीनं सांगितलेल्या बाबी आचरणांत आणून सलोख्यानं रहाव.तसेच वैयक्तिक माझ्याकडून जे काय सहकार्य करता येईल ते मी करेन.खरं तर गावाला दुशाआजीच्या रूपानं एक देवच मदत करतो आहे.त्यामूळे दूशाआजीला उदंड आयुष्य लाभो,त्यानां या कामात भरपूर यश मिळो अशी ईश्वराजवळ प्रार्थनां करून मी थांबतो.”

त्यानीं वाकून दुशाआजीच्या पायानां स्पर्श केला व खुर्चीवर बसले.

बराचवेळ टाळ्यांचा गजर चालू होता.सारं गांव आनंदात व ऊत्साहात टाळ्या पिटत होतं.

हे सारं पाहून दुशाआजीच्या डोळ्यांत पाणी तरळलं.तिचं काळीज भरून आलं.

देशात काय चाललय याची जराशीही कल्पनां गावाला नव्हती. ती करण्याची त्यानां गरजच ऊरलेली नव्हती.

मात्र गावातल्या लोकांच्या भूकेला समर्थ पर्याय दुशाआजीनं शोधला होता हे ही तेव्हढंच खरं होतं….!!!

– समाप्त –

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूक….भाग ४ ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ भूक….भाग ४ ☆ मेहबूब जमादार ☆

(यावर कुठलाच उपाय वा पर्याय शिल्लक राहिला नव्हता.माणूसकी जपण्याला पैसा लागत नाही पण पोट भरायला पैशाशिवाय कांही चालत नाही हे त्रिकाल सत्य होतं.) इथून पुढे वाचा…

आज गावांत बैठक बोलाविली होती. गांवचे प्रमुख बोलणार होते. पण बोलणं ऐकून काय पोट भरणार नव्हतं.तरीही गावक-यानां एखादा आशेचा किरण कदाचित दिसेल या आशेनं सारे गांवकरी देवळासमोर गोळा झाले होते. प्रमुख बोलले.त्याचा आशय असा होता कि आपल्या भोवती असणा-या निसर्गाकडून कांहीही मिळवून आपण जगायला शिकलं पाहिजे.गावांत रेशनच्या दुकानांत धान्य येवून वर्ष झालं होतं. गोरगरीब,आंधळे-पांगळे कसंबसं रेशनवर जगत होते. पण सरकारला हे ही जमत नव्हतं.सर्व योजनां बंद पडल्या होत्या.त्या केंव्हा उभारी घेतील याची सूतराम शक्यता नव्हती. वटलेल्या झाडाला पालवी फुटणार नव्हती.

टेकडीवर पाण्याचे झरे होते. झाडं होती. झाडानां फळ लागत होती. हाच एक मानसिक गारवा तिथल्या राहणाऱ्या तीस एक कुटूंबाकडे होता.यावर्षी ब-यापैकी भात पिकला होता. परंतू त्याला लागणा-या किराणा मालाचा दुष्काळ कांहीकेल्या हटत नव्हता.

दुशाआजीनं गावांत फेरफटका मारला.वास्तविक तिच्या वयांच गावांत कोणीच हयात नव्हतं. तिनं घरोघरी जावून गावांतल्या बायकानां अडगळीत पडलेली चूल पेटवून स्वयंपाक करायला सांगितलं. रानांतली भाजी आणा, भात शिजवा अन मिरच्याचा ठेचा करून खावा.मुलानां भाताची पेज द्या. गावातल्या सगळ्यांना हे पटलं.भूकेपुढं गांववाले सर्व भांडण तंटा विसरून गेले.

कांही बायका तर न सांगता दूशाआजी च्या घरी येवू लागल्या.आपल्याकडे काय असलं ते देवू लागल्या.स्वतःकडे काय नसेल ते मागू लागल्या.गावानं टेकडी सोडली नाय. बाहेरून काय आणायचं नाय उलट कुणाला लागली तर मदत करायची हे सगळ्यानीं जणू ठरवून टाकलं होतं.

दुशाआजीनं रानांत ओहोळ अडवून भाजीपाला केला. तसंच गावांतलं सांडपाणी आडवून बायकानां घराशेजारी खाण्यापूरत्या भाज्या लावायला सांगितल्या.

महिन्यांभरात लावलेल्या बियानां रोपटी उगवून आली. कुठं भाजी तर कुठे मिरची, दोडका, कारलं यानां फुलं येवू लागली. कांही दिसांनी त्यानां फळ लागणार होती. कांही खर्च न करता टेकडीवरल्या लोकांच जीवन चालणार होतं.

तिथल्या वस्तीनं बाहेरची कुठलीही खबरबात येवू दिली नाही. त्याचबरोबर येणा-या कुठल्याच भल्या-बू-या बातमीवर विश्वास ठेवला नाही. ते ऐकून होते की सिलेंडरला आज नंबर लावला तर तो सहा महिन्यानीं मिळणार होता. पेट्रोल पंपावर तर तेल मिळण्याची कुठलीच शाश्वती राहीली नव्हती. मूळांत त्यानां हे काहीच नको होतं.

टेकडीवरील वस्तीतील सर्वानां दुशाआजीचं स्वावलंबनांच गणित पटलं होतं. या सर्व बाबी तरूणांपासून ते म्हाता-यानींही उचलून धरल्या. बायकानींही आपला हातभार यथाशक्ती लावला होता. गावांत पाण्याची कमतरता नसलेने कुठल्या गोष्टीची उणीव भासली नाही. पाणी हेच जीवन आहे हे त्यांना पटलं होतं. प्रसंगीं पाण्यावर तहान भागवून गांवकरी जमेल ती कामे आनंदाने करत होते. गावप्रमुखानीं आजीला साथ दिली. त्यानीं गांवच्या शिपायांमार्फत पिकलेली भाजी प्रत्येक घरांत पोहचविली. कांही कुटूंबाकडे भाकड म्हशी होत्या. त्यांच्या लहान मुलानां त्यामूळे दुध मिळत नव्हतं. त्यानां लहान मुलांसाठी दुध पोहोच केलं.

क्रमशः…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूक….भाग ३ ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ भूक….भाग ३ ☆ मेहबूब जमादार ☆

(प्रत्येकाच्या डूईवर न फिटावं असं कर्ज करून ठेवलं होतं. एरव्ही मंत्री होण्याकरिता हपापणारे राजकारणी मंत्री व्हायला तयार नव्हती.एवढा मोठा रोष जनतेचा त्यांच्यावर होता.) इथून पुढे वाचा…

सरकारनं अंमलात आणलेल्या सर्व योजना फसव्या होत्या हे जनतेला कळून चूकलं होतं.आता कळून कांहीही उपयोग नव्हता.

तेल, गॅस मागवावा तर तेवढं परकिय चलन देशाकडं नव्हतं.जे काय थोडं फार होतं त्यानं पांच टक्के जनतेच्या गरजा भागत नव्हत्या.साहजिकच मागणी जादा अन पुरवठा कमी असला तर हवी ती किंमत देवून जनतेला ती गोष्ट खरेदी करणं भाग होतं.

गोरगरीब, सामान्य माणसांच्या हातापलीकडच्या नव्हे तर बुध्दी पलीकडच्या गोष्टी आता घडत होत्या.

पण दुशाआजीनं काढलेल्या साध्या उपायामूळे सनखंबे कुटूंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालू होता.चहा पिणं ही चैनीची बाब होवून बसली होती. ते रहातेल्या गावापलीकडंच्या टेकडीवर चहाचे मळे होते.चहा होता, दुध होतं पण साखर नव्हती.गूळ नव्हता.त्यामूळेच चहा पिणं शक्य नव्हतं.मूळात चहानं भूक शमत नव्हती.

आज आरोग्य केंद्राकडील एक नर्स दुशा आजीकडं आलीवती.

“कसं काय आजी बरं वाटतय नां?”

” ये बाय तुला विचारतानां तरी काय वाटतंय का गं?”

“आज, असं का बोलता वो आजी!”

“अगं!तूला काय सरकारी पगार मिळतोय.सारं मिळतय ….तुझं काय?…..”

”आजी खरं सांगू…गेले सहा महिने पगार मिळाला नाय.आरोग्य केंद्रात नांवाला एक गोळी नाय.तिथं जावून तरी काय करायचं म्हणून मी फिरत फिरत तुमच्याकडे आले.”

“खरं म्हणतेस का?”

“काय करू आजी!”

बोलतानां तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं.

आजीच्या लुकलुकणा-या डोळ्यांत ढग दाटून आले.

“अगं गेल्या नव्वद वर्षात असं कधी घडलं नव्हतं.माणसं अन्नाला महाग झालेली मी कवा पाहिली नव्हती.”

नर्सच्या तोंडातून शब्द फूटनां. शेवटी रडत रडत ती बोलली,

“काय करू आजी! एकतर पोरं लहान आहेत.त्यानां दुधही मला देता येईनां”

एवढं बोलून ती हमसून रडू लागली.आजीनं काप-या हातानं तिचं डोळं पुसलं.

“आजी काय करू! जगनं अगदी नकोस झालंय.दोन लेक हायत.एक तीन वर्षाचा अन एक पांच वर्षाचा”

“नको गं बाई,असलं मनांत आणूस.” परत ती आभाळाकडे डोळं करून म्हणाली,

“बघ देवानं दोन सोन्यासारखी लेकरं दिलीत.तोच सगळ्यांचं रक्षण करील.बघ होईल कायतरी.”

तिनं सुनेला हाक मारली.

“अगं अने,या नर्सबाईनां एक बाटलीभरून दुध दे गं.तिचीपण लेकरं लहान हायती”

नर्स नको म्हणत असतानां दूशा आजीनं प्लॅस्टिक च्या बाटलीतून आणलेलं दूध तिच्या पिशवीत कोंबलं.

नर्सनं दुशाआजीला नमस्कार केला.तिनं भरल्या डोळ्यानी दुशाआजीचा निरोप घेतला.

तीन चार वर्षामागं पर्यटनांसाठी बाहेर पडणारी माणसं खूडूक होवून खुराड्यात बसली होती. ना हाती पैका होता ना गाडीत भरायला तेल.माणसानं आकाशाकडं पहाण्याशिवाय त्याच्याकडं कांहीच शिल्लक नव्हतं.

सगळाच रोजगार गेला होता. दुकानं बंद होती. त्यात आलेल्या कोरोनानं मूळात जनतेची वाट लावली होती. आता जरा कुठं उभारी आली होती. तर कर्जाच्या खाईत ऊभा देश उध्वस्त झाला होता. यावर कुठलाच उपाय वा पर्याय शिल्लक राहिला नव्हता.माणूसकी जपण्याला पैसा लागत नाही पण पोट भरायला पैशाशिवाय कांही चालत नाही हे त्रिकाल सत्य होतं.

क्रमशः…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूक….भाग २ ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ भूक….भाग २ ☆ मेहबूब जमादार ☆

(“हे बघा पप्पां,रात्री तुमच्या दोन्ही भावानां बोलवा.बसू सगळी.बिनपैशानं कसं जगता येईल असा कांहीतरी मार्ग शोधला पाहिजे”). इथून पुढे……            

पप्पां कांहीच बोललं नाहीत.मूळात बोलण्यासारखं काय राहिलंच नव्हतं.पुढं कसं जगायचं हा प्रश्न आ वासून पुढं होता.तो सोडविण्याची हिंम्मत कुणाकडंही नव्हती.ना सरकारकडे ना जनतेकडे.

मात्र जसं अंधारलं तशी सगळी गोळा झाली.घरांत अजून वीज होती.ती केंव्हा गायब होईल याचा नेम नव्हता.

त्याचे दोन भाऊ दुसंता व सुमंता गुडघ्यात मान घालून बसलेवते.असं वाटावं कि दोघं आठवडाभर जेवली नसावी.दोघांचे चेहरे पडलेले.चेह-यावरची रया गेलेली.जणू काय जागतिक बॅंकेच कर्ज या दोघानांच भागवायचं होतं.दोघं कांही बोलत नव्हते तसा अर्जुनाही कांही बोलत नव्हता.हे सगळं बघून शेवटी दूशाआजी पुढं आली.

“कारं?कोण गेल्यावानी बसलायसा!”

“आज भात अन मिरच्या ठेचून केलेली चटणी खाल्ली.अजून कसबस दोन दिस जातील.पण पुढं काय करायचं आई!काय सूचनां झालय बघ?”

आजीनं बरंच पावसाळं पाहिल्यालं.तिच्या चेह-यावरच्या रेषा तिचं वय सांगत होत्या.ती जरूर खंगली होती पण मनांन तरूण होती. तिन्ह तिन्हीं सूनानां बोलावलं.ती त्यानां म्हणाली,

“हे बघा काळ फारच वाईट आलाय त्यो समोर दिसतूय.घरांत तुमच्याकडं खाण्यासारखं काय काय हाय ते सांगा”

“माझ्या कडं आर्धी कणगी भात हायत” थोरली सून बोलली.

“माझ्या कडं दोन पाट्या मिरच्या हायत” मधली म्हणाली.

“माझ्या कडं चहा हाय पण त्येला साकार नाय”

“ये बाय तुझा चहा जावूंदे चूलीत.पहिल्यांदा जेवणांच बघूया.”

“पण आत्या गॅसचा हंडा कूठाय जेवान शिजवायला”

“कशाला गं हंडा पाहिजे.अंगणात मांडा चूल.जळाण सगळीकडे पसरलय ते पहिलं गोळा करा”

ती धाकट्या अनसांकडं बघून म्हणाली,

“ये आनसा तुझ्या म्हशीचं दुध काढं.गरम करून देवू सगळ्यानां.”

“आवं आत्या पोरांस्नी पाजायला असूं दे की!”

“अगं तांब्याभर ठेव घरांत.बाय दिस फिरतील तसं आपण भी फिरलं पाहिजे”

“बरं”

ती ऊटली.कासांडी घेवून गोट्यात धारंला गेली.

तिनं त्याच राती मुलानां, सूनांना तसेच नातवंडाना सांगितलं,

“आता एक लक्षात ठेवायचं.बाहेरून ईकतचं काय आणायचं नाय.  उद्या रानांत जावून जळाण आणा.आपल्या रानांत काय भाजीपाला असंल ते तोडून आणा.दुसरं बघा आपल्या वरच्या रानांशेजारुन एक ओहोळ वाहत्या. त्यांत मासं मिळत्यात. ते भी धरून आणा.भाजून खाऊ.पण असं रडत बसू नका.”

दुशा आजीनं बरीच वर्ष घासलेटचा दिवा लावून काढलीवती.वीज नसली तरी तिला त्याचं कांहीच वाटत नव्हत.त्यामूळे निसर्गात कसं जगायचं तिला माहित होतं.तिची अक्कल याकामी उपयोगात आली होती.

दिवस नेहमीसारखाच उगवत होता.पण ब-याच दु:खद घटनानां,आठवणीनां व प्रसंगांनां मागे ठेवून मावळत होता.

जनतेची कांहीच चूक नसतानां ती महागाईने त्रस्त झाली होती.चूक एकच होती की ती या देशांत जन्माला आली होती. प्राणापलीकडं प्रेम करणा-या देशावर राजकर्त्यानीं राबविलेल्या चूकीच्या धोरणांमूळे ही वेळ आली होती. प्रत्येकाच्या डूईवर न फिटावं असं कर्ज करून ठेवलं होतं. एरव्ही मंत्री होण्याकरिता हपापणारी राजकारणी मंत्री व्हायला तयार नव्हती.एवढा मोठा रोष जनतेचा त्यांच्यावर होता.

क्रमशः…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूक….भाग १ ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ भूक….भाग १ ☆ मेहबूब जमादार ☆

माणसांच पोट रिकामं राहिलं कि ते त्याला स्वस्थ बसू देत नाही.भले ती भूक राजाची असो वा सामान्य जनतेची. भूक ही भूकच असते.पण घरात अन्न नाही.घर आहे पण रिकामे.कुठल्याही डब्यात खायला काहींच शिल्लक नाही. डोक्यानं काम करून नको त्या कल्पनांचा विस्तार करून काय पोट भरत नाही. गेले दोन महिने ‘मुदूल’ टेकडीवरील ब-याच कुटूंबांच असच चाललं होतं. या टेकडीवर राहणा-या सनखंबे कुटूंबाची हीच हालत होती.मूळात देशच कर्जात वाकला होता, बुडाला होता. कर्ज भागवायचं सोडा,मूळात व्याज द्यायला ही पैसे नव्हतें. तिथं या सा-या कुटूंबांच तरी काय होणार?.

सकाळीच अर्जुना सनखंबेचा मुलगा दिशान मोटर सायकल घेवून जवळच्या शहरातील पेट्रोल पंपावर तेल भरण्यासाठी गेला होता. दुपार टळून गेली तरी त्याचा पत्ता नव्हता.न खाता गेलेला पोर केंव्हा येणार याची चिंता अवघ्या कुटूंबाला लागून राहीली होती.आज घरात फक्त भात केलेला होता. आमटीसाठी कांहीच नव्हतं.

त्या टेकडीवर जेमतेम तीसभर घरं होती.किराणा मालाची दोन दुकानं होती. तीपण ओस पडली होती.दुकानांत मालच नव्हता. माल आणायला पैसे नव्हतें. शहरात जावूनही माल मिळत नव्हता. किरकोळ माल आणून त्यानीं कांही दिवस चालवले.आतां त्यानां शटर ओढून दुकान बंद ठेवणेची वेळ आली होती. प्राप्त परिस्थिती पुढे कांही ही पर्याय शिल्लक राहिला नव्हता.

गाववाल्यांची चिंता दुकान बंद असलेने वाढली होती. दुकानात माल नव्हता हे जरी खरं असलं तरी माल घ्यायला कोणाकडे पैसेही नव्हतें. अख्ख्या देशाला महागाईनं व मालाच्या टंचाईनं ग्रासलं होतं.त्यात तो तरी बिचारा काय करणार?

ब-याचदा शहरातील लोक रस्त्यावर उतरत.सरकार विरोधी घोषणा देत.रणरणत्या ऊन्हात रस्त्यावर गर्दी व्हायची.खुद्द सरकार यावर कांही करू शकत नव्हतं.त्याचबरोबर आंदोलने,मोर्चे काढून काय भूक भागत नव्हती.

दुपार टळली होती.कांही वेळात दुशांत टेकडीवर चढतानां दिसला.सोबत मोटर सायकल नसलेचे पाहून त्याच्या पप्पाचं डोकचं फिरलं.गेले पंधरा दिवसात हा आठवा फेरा होता तरीही त्याला तेल मिळालेलं‌ दिसत नव्हतं.उलट शिल्लक असलेलं तेल मोटर सायकलनं खाल्लं होतं.त्यामुळें दुशाननं गाडी टेकडीखाली लावलेली होती. तो जवळ आला तसं पप्पांनी विचारल,

” आरं गाडी कुठं हाय?”

“दादा खाली लावल्या तुमच्या दोस्तांच्या सपरांत.तेल तिथंच संपल.गाडी लॅाक करून आलोय”

“आरं आज भी तेल मिळालं नाय?”

“नाय मिळालं.पंपात होतं तेवढं तेल मिल्ट्रीवाल्यांच्या गाडीत टाकून मालक मोकळा झाला.”

“मगं कसं करायच रं!कुठं तातडीनं जायचं म्हणजे……!”

“आता कुठं जायाच दादा!खिसं मोकळं झाल्यात.दुकानं ओस पडल्यात..रस्त निवांत पडल्यात.”

“ते भी तूझं खरं हाय.पण कुणाला दवा पाणी लागलं तर?”

“कशाचं औषध आणताय दादा!.बाहेर परिस्थिति वाईट हाय.गॅसचा हंडा चार हजार रुपये तर साखर दोनशे रु.किलो.काय घेताय अन काय खाताय…..”

“आरं अशानं कसं व्हायचं? डोकं चालायचं बंद झालंय बघ.”

दुशान थोडावेळ थांबला.कांहीवेळानं तो म्हणाला,

“हे बघा पप्पां,रात्री तुमच्या दोन्ही भावानां बोलवा.बसू सगळी.बिनपैशानं कसं जगता येईल असा कांहीतरी मार्ग शोधला पाहिजे”

क्रमशः…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अ ल क … ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? जीवनरंग ?

☆ अ.ल.क. … ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) 

०६.  

अलक

     “तू नाही निघालास का?

      कार्यक्रम तर संपला की.”

      त्याने गाडी चालू करता करता

      मित्राला विचारले.

 

     “मागचे आवरायला

      कोणीतरी थांबले पाहिजे की.”

 

०७.

अलक

     गेले कित्येक दिवस

     ‘आझादी का अमृत महोत्सव’

     साजरा करण्यात व्यग्र असलेला

     तिची पंच्च्याहत्तरी

     साजरी करायचीच विसरला.

 

     एके दिवशी उपक्रम म्हणून

     पंच्च्याहत्तरच्या वरील

     ज्येष्ठ नागरीकांचा

     सत्कार करायचे ठरवले

     आणि तिची आठवण आली.

 

०८.

अलक

 

   आयुष्याच्या उत्तरार्धात

   एकदा सहज म्हणून

   तिने ज्योतिषाला हात दाखवला.

 

   ज्योतिषी तिला तिचाच

   संघर्ष सांगत होता

   आणि तिचे लक्ष मात्र

   हातावर पडलेल्या

   सुरकुत्यांकडे होते.

 

०९.

 अलक

     “अहो, येताय ना घरला?

      किती उशीर झालाय.”

 

     “अगं येवढ्या वर्षांनी

      सणासुदीला दुकानात

      येवढी गर्दी झालीया.”

 

      एवढयात गडगडाटासह

      जोरदार पाऊस सुरू झाला.

 

१०.

अलक

      त्याने आडोसा पाहून

      ट्रक रस्त्याच्याकडेला उभा केला.

 

      तिने दगडांची चूल बांधत

      त्यावर भांडे चढवले.

 

     “माय, आपण असे

      रस्त्यात का थांबले आहोत?”

 

     “तुझाच हट्ट होताना,

      एकदा बापाचा प्रवास

      पाहायचा म्हणून.”

                 ☆

लेखक : म. ना. दे.

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूकंप – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ भूकंप – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

अखेर मोठ्या मेहनतीने मी एमबीबीएस झाले . आई बाबांची सीमा डॉक्टर झाली .यावेळी मात्र मी दादाकडे जायचं ठरवलं. त्या एका घटनेनं आमचं सगळ्यांचं आयुष्य उध्वस्त झालं होतं. तो निघून गेला होता. पण आयुष्यात भली मोठी पोकळी निर्माण करून गेला होता .

दादाकडे आल्यावर मला माहेरी आल्यासारखं वाटलं, पण क्षणभरच! सासरी कुठे गेले होते मी? कधी जाणार पण नव्हते. त्यामुळे तो विचारच झटकून टाकला. दादा चे घर, आई-बाबांनी नेटकेपणाने मांडले होते. आईचे स्वयंपाक घर म्हणजे चकाचक. पण यावेळी मात्र आई सगळे काम नाईलाजाने करते असं मला जाणवलं. सगळी कामं करणं तिला झोपत नव्हतं. खरंच तिला मदतीची गरज आहे हे मला जाणवलं .

खरं तर एव्हानाना दादाचं लग्न व्हायला हवं होतं. आम्ही आमच्या दुःखात इतके बुडालो होतो, की त्याचा विचारच केला नाही. त्याची काय चूक आहे या सगळ्यात? त्यानं का शिक्षा भोगायची ? या विषयावर त्याच्याशी बोलायचं मी ठरवलं, आणि क्षणात मला माझ्या त्या मैत्रिणीची अर्थात त्याच्या बहिणीची, माझ्या न झालेल्या नवऱ्याच्या बहिणीची आठवण झाली. ती लोकं कशी असतील ? त्यांनी हा आघात कसा सहन केला असेल ? त्या सगळ्यांचा तर एकुलता एक आधार मंगल क्षणी अमंगल करून गळून पडला. त्याच्या बहिणीचे लग्न झाले असेल का ? दादालाच काही माहिती आहे का विचारावं. त्याच्यापुढे हा प्रस्ताव आपणच मांडूया .

“अगं, काय बोलते आहेस सीमा? तू इतकी दुःखामध्ये पिचत असताना मी लग्नाचा विचार तरी करू शकेन का ? आणि तिची चौकशी का करतेस तू ? तुझं तुला कमी का दुःख आहे ?” दादा माझ्यावर जरा रागावला.

“अरे दादा, रागावू नको . थोडं शांतपणे घे . मी आता कुठे दुःखात आहे सांग बरं? अरे, आता मी डॉक्टर झालीय . पोस्ट ग्रॅज्युएशनही करणार आहे . माझी ही नवी वाट मला मिळाली की नाही ? तशीच आता तुमच्या आयुष्यातही नवीन वाट शोधूया . तुझ्या मित्रांकडून तिची माहिती काढ बर ! की आता तेही मीच करू? मी पण थोडं दरडावूनच विचारलं .

“सॉरी सॉरी . रागावू नको आपण तिची नक्की चौकशी करू . मी मित्रांना सांगतो . मला तुझं हे म्हणणं पटतय हं थोडं थोडं!”

कधी नाही तो माझा नेम बरोबर लागला होता . त्याच्या बहिणीचे लग्न अजून झालं नव्हतं . कारण त्यांचं घर या दुःखाच्या डोंगरामध्ये पार चेपलं गेलं होतं . ती एम. कॉम. झाली होती, पण दुःखी आई-वडिलांची सेवा करतच दिवस ढकलत होती.

मी आणि दादांनी आई-बाबांना आमच्या विचार पटवून दिला. सुरुवातीला ते अजिबात तयार होत नव्हते . पण अखेर त्यांना पटवण्यात आम्हाला यश आलं .

आता त्याच्या आई-वडिलांना आणि तिला समजावायचं मोठं काम आम्ही करणार आहोत . त्याच्यासाठी सगळ्यांना मुंबईला आणणार आहे . अर्थात हे काम दादाचा दुसराच एक मित्र करणार आहे . मी त्या सगळ्यांची खूप खूप वाट पाहतीय .

मला माहिती आहे की पुन्हा एकदा फार मोठा भूकंप होणार आहे . वादळ उठणार आहे . धुव्वाधार पाऊस कोसळणार आहे . पण … पण कालांतराने ते वादळ शमणार आहे. तो पाऊस कोसळल्यानंतर भूमी शांत होणार आहे . आशेचं बी रुजणार आहे . आनंदाचे कोंब पुन्हा फुटणार आहेत . त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे आणि दादाच्या घरी नंदनवन फुलणार आहे . माझेही कासावीस मन तृप्त होणार आहे . शांत शांत होणार आहे .

 – समाप्त – 

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 9272496385/8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूकंप – भाग 3 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ भूकंप – भाग 3 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

मनाशी निर्धार करून घर सोडायचे ठरवले. पण आई बाबांना सोडून जाताना पुन्हा आकाश कोसळले. आईच्या डोळ्यातले अश्रू थांबायलाच तयार नव्हते. बाबाही सैरभैर झाले होते. आपल्या लाडक्या लेकीची अशी पाठवणी करायची म्हणजे मोठे संकट होते. मी निर्धाराने माझी बॅग भरली. त्या जरीच्या साड्या, चमचमते ड्रेस, दागिने, सगळे बाजूला सारले आणि फक्त साधे ड्रेस बॅगेत भरले. मला आता कुठल्याही गोष्टीचा मोह नको होता. आयुष्याचा मार्ग मी बदलणार होते. मग कशाला ती झगमग? तो मोह आणि त्या आठवणी.

आत्याकडे जातानाच्या प्रवासात माझ्या मनात अनेक विचार उंचबळत होते. एक मात्र ठाम निर्णय मन देत होतं की पुन्हा स्टॅट नको, मॅथ्स नको त्याची आठवण नको. त्यापेक्षा पुन्हा बारावी सायन्सला ऍडमिशन घ्यायची. बायोलॉजी घेऊन. अगदी मेडिकलला नाही तर निदान नर्सिंग कोर्सला ऍडमिशन मिळवायची आणि लोकांच्या व्याधी दूर करण्यासाठी धडपडायचं. माझ्या दुःखामध्ये मला जसा इतरांनी आधार दिला, तसाच आधार आपण आता इतरांना द्यायचा.

माझा हा विचार आत्याला आणि तिच्या मिस्टरांना एकदम पटला. त्यांच्या मते तसे करणे अवघड होते पण अशक्य नव्हते. त्या नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला जड जात होते. हातात एक डिग्री असून पुन्हा माघारी मी फिरत होते. पण आता तसे करायलाच हवे होते. ही निवड आवडीने नाही तर परिस्थितीशी जुळण्यासाठी केली होती.

जीव ओतून मी आता अभ्यासाला लागले. दिवस आणि रात्र एकच. बारावीचा आणि एंट्रन्स परीक्षेचा अभ्यास. पुस्तक एके पुस्तक. नो टीव्ही, नो पिक्चर,  नो गाणी एवढेच काय आई-बाबांनाही भेटायला मी गेले नाही. दादाच मधून मधून येऊन जायचा. माझ्या अभ्यासाचा ध्यास बघून निश्चिंतपणे जायचा. माझी प्रगती ऐकून आई-बाबा ही निश्चिंत झाले.

जीव आणि प्राण ओतून, रात्रीचा दिवस करून मी बारावीचा पुन्हा एकदा अभ्यास केला आणि मला योग्य तेच  फळ मिळाले. एंट्रन्स एक्झॅमलाही माझे छानच स्कोरिंग झाले. त्यामुळे नर्सिंगलाच काय, मला एमबीबीएसलाच ऍडमिशन मिळाली. तिही मुंबईतल्या प्रख्यात कॉलेजमध्ये. तिथून माझ्या आयुष्याला नवीनच वळण लागले. आयुष्यातला अंधार नाहीसा झाला, मला प्रकाशाच्या नवीन मार्ग सापडला.

यावेळी आई-बाबा मला मुंबईला सोडायला आले. त्यांच्या चेहऱ्यावरही मला बऱ्याच वर्षांनी आशेचा किरण दिसून येत होता. त्यांच्या डोळ्यांमध्ये माझे कौतुक ओसंडून वहात होते. पण दादाकडे परत जाताना आईचा बांध पुन्हा फुटला, पुन्हा एकदा गंगा यमुनांनी  मला न्हाऊ घातले. मात्र यावेळी मी माझं रडू आवरलं. तिला धीर दिला, सुट्टी मिळाली की मी दादाकडे नक्की येते अशी तिची समजूत घातली.

पण एमबीबीएस पूर्ण होईपर्यंत मी काही दादाकडे गेले नाही. कारण वर वर किती जरी मी सावरल्यासारखं दाखवत असले तरी आतून माझे मन पार कोलमडून गेले होते. आयुष्यातला तो प्रसंग मी विसरू शकत नव्हते. आई-बाबांच्या सहवासात जखमेवरची खपली आपोआप निघत होती. अजून माझे मन दगड काही बनत नव्हते.

क्रमशः – 3

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 9272496385/8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भूकंप – भाग 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ भूकंप – भाग 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

तो दिवस उजाडला. घरीच सगळं आवरून आम्ही कार्यालयात जाणार होतो. मामा मामींनी घेतलेली पिवळी जरीची हिरव्या काठाची साडी नेसून मी तयार होते. माझ्याच केसातल्या मोगऱ्याचा सुगंध मला धुंद करत होता. दाग-दागिने घालून नटून थटून बसले होते. दादा, मामा मामी, आत्या काका, त्या घरच्या लोकांना बोलावणं करायला गेले होते. फुलांनी सजवलेल्या गाडीतून ती लोकं कार्यालयात गेली की आम्ही निघणार होतो .

सगळेजण तयारीनिशी सज्ज होते. मी माझ्या मैत्रिणीच्या घोळक्यात बसले होते. दर दोन मिनिटांनी आई-बाबा आत येऊन मला बघून जात होते. माझं रुपडं डोळ्यात साठवून ठेवत होते. न बोलता, न सांगताही मला ते समजत होतं.

अन अचानक बाहेर चार-पाच मोटरसायकली, दोन-तीन गाड्या येऊन थडकल्या. बाहेर काहीतरी गडबड माजली आणि घराचा नूरच पालटून गेला. बाहेरचा गलका वाढायला लागला. हा आत्ताचा आवाज सुखद नव्हता आनंदाचा नव्हता. त्याचे रूपांतर एकदम जोरजोरात रडण्यात झाले. मला काहीच समजेना. मैत्रिणी ही घाबरून गेल्या. काय झालं? कोणालाच काही समजेना.

माझ्या मावशीचा, काकूंचा, आत्याचा जोर जोरात रडण्याचा आवाज यायला लागला. मी सासरी जाणार, त्यासाठी अशा का रडताहेत त्या सगळ्या? मला काहीच समजेना. कुणाला काय झालं? एवढ्यात माझ्या दादाला धरून दोन तीन मित्र आत आले. दादाचा काळवंडलेला रडवेला चेहरा मला पहावे ना …” दादा s काय ?? ..” माझ्या तोंडातून शब्द फुटेना. दादांनी भिंतीवर लटकणाऱ्या फुलांच्या माळा जोरात ओढल्या आणि सि s मे s म्हणून टाहो फोडला. तेवढ्यात आई बाबा, काका सगळे सगळे माझ्या भोवती गोळा झाले. माझ्या मैत्रिणींना काय करावे समजेना, घाबरून सगळ्या दुसऱ्या खोलीत पळाल्या.

अजूनही मला नक्की कोणाला काय झालय, तेच समजत नव्हतं. माझ्या भोवती आई बाबा दादा हमसून हमसून रडत होते. काय झाले? का रडत आहेत  सगळे? माझ्या पोटात गोळा आला, छाती मध्ये जोराची कळ यायला लागली. ” सिमा s s” म्हणून त्यांनी मला मिठीत घेतलं, तेवढ्यात कुणीतरी माझ्या कपाळावरची चमचमती टिकलीच काढून टाकली. कोणीतरी एकीनं माझे हात हातात घेऊन माझा चुडा बुक्यानी फोडायला सुरुवात केली.

कार्यालयात जायचं सोडून असं का करताय त्या? मला समजेना. तेवढ्यात मला पोटाशी घेत आई जोरात रडत म्हणाली, “सीमे s कसलं ग नशीब घेऊन आलीस? अक्षता पडायच्या आधी त्याला हार्ट अटॅक आला. सीमे ग संपले सारे ss काय झालं ग माझ्या पोरीचं ! काय करू गं ?..” म्हणून आईने हंबरडा फोडला.

आईच्या त्या तशा बोलण्याचा, रडण्याचा संदर्भ मला समजला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला काही समजेनासे झाले आणि मी धाडदिशी भोवळ येऊन खाली कोसळले.

तब्बल चार दिवस मी बेशुद्ध होते. थोडी शुद्ध आली तर आजूबाजूला फक्त सन्नाटा आणि हुंदके …. हुंदके आणि सन्नाटा. चार दिवसांनी डोळे उघडले तर आत्या आणि तिची डॉक्टर मैत्रीण माझ्याजवळ होत्या. आत्या माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. त्या डॉक्टर बाईनी मला तपासले आणि कुणाला तरी माझ्यासाठी कॉफी आणायला सांगितली. मी मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले, समोरचे अंधुक अंधुक दिसत होते. समोर बाबा डोक्याला दोन्ही हात लावून बसले होते. आई गुडघ्यात डोकं खुपसून स्फुंदत होती. तिला धरून मावशी बसली होती. मी माझ्या कोरड्या ठणठणीत पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली. तोंड कडू झाड झाले होते. तोंडातून शब्दच फुटत नव्हता. ” दादा s s” कशी बशी मी हाक मारली.

आता आत्याचे डोळेही वहायला लागले. दादाला त्याच्या प्रिय मित्राच्या दिवसांसाठी जावे लागले होते. त्याचा मित्र आणि माझे सर्वस्व ….चार दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवून मला पुन्हा गरगरायला लागले. माझे पांढरे डोळे बघून त्या डॉक्टरीण बाईंनी माझ्या दंडात सुई खूपसली. सलग दोन महिने तसा प्रकार सुरू होता. मी आजारी, दुखणेकरी, आई अखंड रडत आणि बाबा डोकं गच्च धरून. दादाची नोकरी ही नवीन असल्यामुळे त्याला फार दिवस घरी राहता येईना. आत्या, मावशी, काका काकू आलटून पालटून येऊन आमच्या जवळ रहात होत्या.

धो धो पाऊस पडून, पूर यावा, तसं आमचं घर अखंड रडत होतं. कुणाचं रडणं थांबत नव्हतं. सगळ्यांना इतका जबरदस्त शॉक बसला होता की कोणीच कोणाला सावरू शकत नव्हतं. इतर नातेवाईक, मैत्रिणींच्या आया सगळे सारखे येत होते. माझ्याशी कोणी डायरेक्ट बोलत नसले, तरी काही ना काही माझ्या कानावर येत होते.

अक्षता पडून जरी माझे लग्न झाले नसले, तरी लग्नाची हळद लागली होती. त्यामुळे माझे पुन्हा लग्न होणे अशक्य होते. झालंच तर एखाद्या विधुराशी … म्हणजे ज्याची पहिली बायको मेली आहे, ज्याला एखाद दुसरं मूल आहे. ते तसलं बोलणं, ती कुजबुज, सगळ्यांचे निश्वास अन रडणे ऐकून मी फार भेदरून गेले होते. मलाही त्याच्यासारखा हार्ट अटॅक का येत नाही असेच वाटत होते.

अक्षरशः सहा महिने असे दुःखात गेले. सहा महिन्यांनी आत्या, तिचे डॉक्टर मिस्टर आणि माझा दादा ठरवून आमच्याकडे आले. आत्याच्या मिस्टरांनी आई-बाबांना आणि मला खूप समजावलं. या दुर्दैवाच्या फेऱ्यातून  मी बाहेर पडायलाच पाहिजे असं त्यांनी जरा ठणकवलच.

माझं बीएससी झालं होतं. आता घरी नुसतं रडत न बसता, पुढच्या वर्षीच्या एम एस सी च्या परीक्षेसाठी मी तयारी करावी असं त्यांचं मत होतं. त्या अभ्यासासाठी ते मला त्यांच्याकडे घेऊन यायला तयार होते. आई-बाबांनीही गाव सोडून दादा जिथे नोकरी करतोय, तिकडे थोडे महिने तरी जावं असं त्यांनी पटवलं. सगळ्यांनाच मोठा बदल हवा होता.

मला त्यांचं एक म्हणणं पटलं आणि आवडलं. ते म्हणजे मी शिकण्यामध्ये माझं मन गुंतवलं पाहिजे. त्यांनी लग्नाबद्दल काही उच्चार केला नाही. त्यामुळेच खरं तर मला त्यांच्याबरोबर जावसं वाटलं. मलाही थोडा मोकळा श्वास घ्यावा असा वाटायला लागलं होतं. आमच्या या गावामध्ये मी घराच्या बाहेरही पडू शकत नव्हते. लोकांच्या त्या नजरा, ती कुजबुज मला नकोशी झाली होती. आई-बाबांना सोडून राहायचं जीवावर आलं होतं. पण त्यांच्यासाठी सुद्धा तेच आवश्यक होतं.. मी समोर दिसले की त्यांना परत परत ते दारूण दुःख समोर येणार होतं. त्यापेक्षा काही दिवस लांब राहूनच दुःखाची तीव्रता कमी होऊ शकणार होती.

त्या दिवसापासून पुढच्या शिक्षणाबद्दल मी विचार करायला लागले होते. एम एस सी च्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करायचा, म्हणजे परत स्टॅट आले. मॅथ्स आले . . . . पुनः त्याची आठवण .. छे .. छे .. छे . .. ते तर आता मला नको होते. तो कप्पा, तो मार्ग पूर्णपणे मला बंद करायचा होता. आत्याच्या घरी राहायला जायचे म्हणजे सुद्धा सोपे नव्हते. त्यांच्या घराला लागूनच त्यांचे हॉस्पिटल होते. सतत माणसांचा राबता होता. अशा ठिकाणी जुळवून घेणे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण आता पक्के ठरवले होते, जुने पाश तोडून टाकायचे होते.

क्रमशः – 2

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 9272496385/8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares