मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रसन्न वदने… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ प्रसन्न वदने… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

“सुनीता, चहा आणतेस का जरा ? आणि येताना पाणी पण घेऊन ये, ” रमेशरावांनी बाहेरच्या पोर्चमधून आवाज दिला. दुपारी थोडा वेळ झोपायचं आणि उठल्यावर बाहेर पोर्चमध्ये येऊन बसायचं. बाहेर खुर्च्या टाकलेल्याच असायच्या. रमेशराव आपलं एखादं आवडतं पुस्तक किंवा वर्तमानपत्र घेऊन बाहेर बसायचे. हा त्यांचा रोजचा आवडता उद्योग होता.

त्यांच्या घराच्या बाहेर छोटासा पोर्च होता. आजूबाजूला छोटीशी बाग होती. बागेतील फुलझाडे सुनीताबाईंनी मोठ्या आवडीने लावली होती. बाहेरची मोकळी हवा त्यांना फार आवडायची. सुनीताबाईंनी चहा आणि सोबतच रमेशरावांना आवडणारी बिस्किटे पण आणली.

सुनीताबाई आणि रमेशरावांची मुलं पुण्याला होती. ते अधूनमधून पुण्यात जात असत. जाताना किंवा येताना ते वाटेतील सुपा गावात थांबून तेथील बेकरीत चांगल्या तुपापासून बनवलेली खास कणकेची बिस्किटे घेत. ही बिस्किटे रमेशरावांची फार आवडती.

चहा बिस्किटांचा आस्वाद घेता घेता रमेशराव म्हणाले, “मग काय प्लॅन आता ? नवरात्र जवळ आलंय. लगेच दसरा आणि दिवाळी. ” 

“अहो, खूप कामं आहेत. एवढं मोठं घर आपण घेतलं. त्यावेळी छान वाटलं. पण आता नाही आवरणं होत हो माझ्या एकटीनं. इतके दिवस केलं सगळं, ” सुनीताबाई म्हणाल्या.

“अगं, खरंय तुझं. पण तू एकटी कशाला करतेस सगळी कामं ? आपल्या त्या धुणीभांडे करणाऱ्या रमाबाई आहेत ना, त्यांना किंवा त्यांच्या मुलीला घे की मदतीला, ” रमेशराव.

“बघू या. मी विचारीन त्यांना. पण आता रमाबाईंकडून जास्त काम होत नाही. त्यांची मुलगी पण या वर्षी बारावीला गेलीय. ती तिचा अभ्यास सांभाळून त्यांना कामात मदत करते. मुलगा कोणाकडे तरी कामाला नुकताच लागलाय. पण त्याला फार काही पैसे मिळत नाहीत. नवऱ्याचेही फारसे उत्पन्न नाही. एवढ्या महागाईत चार जणांचा संसार कशीतरी करते बिचारी, ” सुनीताबाई म्हणाल्या.

“हो ना, सुनीता. अगं कमाल आहे या लोकांची. एवढ्याशा मिळकतीत कुरकुर न करता आनंदानं राहतात. आणि काही लोकांना बघ, कितीही पैसा मिळाला तरी त्यांची हाव संपत नाही, ” रमेशराव म्हणाले.

बोलता बोलता सुनीताबाईंचं मन भूतकाळात गेलं. त्या लग्न होऊन सासरी आल्या होत्या, तेव्हा अगदी छोटंसं घर होतं त्यांचं. सरळ एका रेषेत असलेल्या तीन खोल्या. घर छोटं असली तरी त्यात चैतन्य नांदत होतं. काही लोक तर त्याला आगगाडीचा डबा म्हणायचे. पण त्या घरातही त्या खुश होत्या. त्या छोट्याशाच घरात सात माणसे एकत्र राहत होती. सासू सासरे, दोन लहान दीर, एक नणंद.

परिस्थिती जेमतेमच होती. सासरे निवृत्त झाले होते. त्यांची पेन्शन तुटपुंजी होती. रमेशराव तर त्यावेळी एक साधे कारकून म्हणून काम करीत. पण सुनीताबाई कष्टाळू होत्या. त्यांनी शिक्षिकेची नोकरी करून घराची परिस्थिती सावरली. यथावकाश त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. शाळेतील मुलांना घडवताना या फुलांकडे देखील त्यांनी लक्ष दिले. मुलं पण हुशार आणि हरहुन्नरी होती.

काही वर्षांनी नणंदेचे लग्न होऊन ती सासरी गेली. दोन्ही लहान दिरांचे शिक्षण पूर्ण होऊन ते नोकरीसाठी दुसऱ्या गावी निघून गेले होते. आता सासू सासरेही आता कधी या मुलाकडे तर कधी त्या मुलाकडे असायचे. घरात आता चौघेच होते. थोडी आर्थिक सुबत्ता आली होती. रमेशरावांनी आता बँकेकडून कर्ज घेऊन एक छानसे बंगलीवजा घर घेतले होते.

दिवस भराभर जात होते. या नवीन घरात सुनीताबाईंनी सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या करून घेतल्या होत्या. आता चार पाहुणे आले तरी सगळ्यांची छान व्यवस्था होत होती. पण लवकरच मुले शिकून मोठी झाली. यथावकाश लग्नं होऊन आपापल्या संसारात ती रमली. रमेशराव आणि सुनीताबाई दोघंही आपापल्या जबाबदारीतून निवृत्त झाली होती. आता पुन्हा एवढ्या मोठ्या घरात रमेशराव आणि सुनीताबाई असेच दोघे उरले.

रमेशराव मोठ्या अधिकारपदावरून निवृत्त झाले होते. त्यांनी पासष्टी ओलांडली होती आणि सुनीताबाईंची एकषष्ठी. मुलांनी दोघांचीही पासष्टी आणि एकषष्टी नुकतीच थाटामाटात साजरी केली होती. वयाच्या मानाने दोघांचेही आरोग्य उत्तम होते. रमेशराव सकाळी योगासने, प्राणायाम करीत. संध्याकाळी नियमितपणे फिरायला जात असत. त्यांचे मित्रमंडळ मोठे होते. महिन्यातून एकदा तरी सगळे मित्र मिळून कुठेतरी सहलीसाठी जात असत. सुनीताबाई देखील जवळच असलेल्या एका ठिकाणी योगवर्गासाठी जात असत.

 

“सुनीता, अगं कुठे हरवलीस ? चहा गार होतोय, ” रमेशरावांच्या शब्दांनी त्या भानावर आल्या. त्या कपबशा घेऊन घरात गेल्या आणि रमेशरावांनी पुन्हा आपल्या आवडत्या पुस्तकात लक्ष घातलं.

घरात गेल्यावर सुनीताबाईंना आपलं साड्यांचं कपाट दिसलं. दरवर्षी त्या आपल्या वापरलेल्या साड्या कुणाकुणाला काही निमित्ताने देत असत. तरी त्यांच्याकडील नवीन साड्यांमध्ये या ना त्या निमित्ताने भरच पडत असायची. गौरीच्या वेळी गौरीसाठी म्हणून साड्या घेतल्या जायच्या किंवा कोणीतरी गौरींसाठी भेट म्हणून द्यायचे. शिवाय वेळोवेळी कुठल्या तरी निमित्तानं साडी खरेदी व्हायचीच.

आता नवरात्रीचा सण चार दिवसांवर आला होता. नवरात्रीच्या नऊ दिवसात वेगवेगळ्या रंगांच्या साड्या हव्यातच नेसायला. तशी त्यांच्याकडे साड्यांची कमी नव्हती. पण प्रत्येक वेळी त्यांना नवीन साडी हवी असायची. आता सणासुदीनिमित्ताने दुकानांमध्ये सेलचे बोर्ड लागले होते. सुनीताबाईना नवीन साडी खरेदीची उत्सुकता होतीच. उद्या काही झालं तरी आपण साडी खरेदीसाठी जायचंच असं त्यांनी ठरवलं.

रमेशरावांना मात्र कपडेलत्ते, सोने आदी गोष्टीत फारसा रस नव्हता. पण त्यांनी सुनीताबाईंना कधी अडवलं मात्र नाही. आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतील पंधरा ते वीस टक्के रक्कम ते सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी खर्च करत.

सकाळी कामासाठी म्हणून रमाबाई आल्या. त्यांच्या अंगावर एक जुनी जीर्ण झालेली साडी होती. बहुधा त्यांना मोजक्याच दोन तीन साड्या असाव्यात. त्याच त्या आलटून पालटून वापरत. सुनीताबाईंनी मनाशी काहीतरी ठरवले. रमेशरावांना तर साडीखरेदीसाठी बरोबर जाणे फारसे आवडत नसे. त्यामुळे त्यांनी यावेळी रमाबाईंना बरोबर घेऊन जायचं ठरवलं.

“रमाबाई, आज दुपारी मी साडी खरेदीसाठी दुकानात जाईन म्हणते. यांना बहुतेक माझ्यासोबत यायला काही जमणार नाही. आपण दोघी जाऊ. याल का ?” सुनीताबाईंनी विचारले.

“तशी मला कामं हायती पण येईन म्यां तुमच्याबरोबर, ” रमाबाई म्हणाल्या.

बरोबर चार वाजता रमाबाई आल्या. ऑटो करून दोघीही एका साड्यांच्या भव्य दालनात गेल्या. साड्यांचा नवीन स्टॉक आला होता. दुकानात साड्या खरेदीसाठी गर्दी होती. कामाला असलेली मुले, माणसे साड्या दाखवत होती. साड्यांचा ढीग सुनीताबाई आणि रमाबाईंसमोर होता. त्यातून आपल्या पसंतीच्या साड्या त्या पाहत होत्या.

सुनीताबाई रमाबाईंना म्हणाल्या, “रमाबाई, यावेळी तुमच्या पसंतीच्या साड्या घ्याव्या म्हणते. त्यामुळे तुमच्या पसंतीच्या दोन तीन साड्या काढा. रोज वापरता येतील अशाच हव्यात. “

सुनीताबाई आपल्या पसंतीच्या साड्या घेणार याचा आनंद रमाबाईंना झाला. त्यांनी मोठ्या आनंदानं तीन साड्या निवडल्या. साड्यांचा रंग, पोत, किनार आदी गोष्टी सुनीताबाईंना शोभून दिसतील अशा विचाराने त्यांनी त्या निवडल्या. दुकानदाराला बिल देऊन सुनीताबाई ऑटोने पुन्हा घरी आल्या. वाटेत रमाबाईंना सोडलं. यावेळी त्यांच्या मनात काही वेगळेच विचार होते.

घरी आल्यावर त्यांनी पाहिले तर घराला कुलूप होते. रमेशराव कुठेतरी बाहेर गेले असावेत. त्यांनी आपल्या जवळच्या चावीने दार उघडलं. थोड्याच वेळात बेल वाजली. रमेशराव आले होते. त्यांच्या हातात सुनीताबाईंची जुनी सायकल होती. सुनीताबाईंनी विचारलं, “अहो, ही सायकल कुठे घेऊन गेला होतात ?” 

“सुनीता, अगं ही सायकल आता तू वापरत नाहीस ना ? तशीही कधीची पडूनच आहे. मग आपल्या रमाबाईंची मुलगी वापरेल असे वाटले. तिला कॉलेजला जायला तरी उपयोगी पडेल म्हणून रिपेअर करून आणली. तुझी काही हरकत नाही ना ?” 

“अहो, माझी कसली आलीय हरकत ? त्या सायकलीचा वापर तरी होईल. आपल्या वस्तूंचा लोभ तरी किती धरायचा! आणि ती वस्तू जर कोणाच्या तरी उपयोगी पडणार असेल तर त्यापरीस आनंद तो कोणता ?” सुनीताबाई म्हणाल्या.

“उद्या नवरात्र बसतंय. रमाबाईंबरोबर त्यांच्या मुलीला, पूजालाही सकाळी बोलावून घे. म्हणजे तिला ही सायकल देता येईल. ” रमेशराव म्हणाले.

सुनीताबाईंनी लगेच रमाबाईंना फोन करून सकाळी पूजाला घेऊन या म्हणून सांगितलं.

नवरात्रीचा आज पहिला दिवस होता. रमेशरावांनी यथासांग पूजा करून घटस्थापना केली. तेवढ्यात रमाबाई आणि त्यांची मुलगी अशा दोघीही आल्या. रमेशरावांनी त्यांच्या मुलीजवळ सायकलची चावी दिली. “पूजा बेटा, आजपासून ही सायकल तुझी. कॉलेजला जायला यायला उपयोगी पडेल. चांगला अभ्यास कर. खूप मोठी हो. ” 

पूजा घरच्या परिस्थितीमुळे आजपर्यंत सायकलही घेऊ शकली नव्हती. कॉलेजला पायी जावे लागे. आज अचानक ही भेट पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

सुनीताबाई म्हणाल्या, “रमाबाई, थोडं थांबा. ” त्या घरातून साड्यांची पिशवी घेऊन आल्या. रमाबाईंच्या हातात ती पिशवी देत म्हणाल्या, “रमाबाई, तुमच्या साड्या जुन्या झाल्या आहेत. आता या नवीन साड्या वापरा. “

रमाबाईंचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. त्या म्हणाल्या, “ताई, आपण या साड्या तुमच्यासाठी घेतल्या होत्या. त्या मला कशापायी देताय ? मला हायती साड्या रोजच्या वापरासाठी. ” 

“नाही रमाबाई, काल मी तुम्हाला सांगितलं नाही. पण तुमच्या पसंतीच्या या साड्या तुमच्यासाठीच घेतल्या. आजपासून नवरात्र सुरु होत आहे. तुम्ही या साड्या वापरा. नाही म्हणू नका. ” सुनीताबाई म्हणाल्या.

रमेशराव थक्क होऊन सुनीताबाईंकडे पाहत होते. आजपर्यंत सुनीताबाईंनी असे कधी केले नव्हते. दर वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने त्यांची नवीन साड्यांची खरेदी असायचीच. ते सुनीताबाईंना म्हणाले, “अगं, रमाबाईंना साड्या दिल्यास, छानच केलंस. पण तुझ्यासाठी काही आणल्यात की नाही ?” 

सुनीताबाई म्हणाल्या, “मला भरपूर साड्या आहेत. त्यामुळे यावर्षी नवीन नको असे ठरवलं. साड्यांची खरी गरज रमाबाईंना आहे. त्यांना साडी नेसवून यावर्षी नवरात्र साजरं करावं असं मला वाटलं. ” 

“अति उत्तम विचार! रमेशराव म्हणाले. त्यासाठी तुझं अभिनंदन! “

रमाबाई आणि पूजा भारावलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. काय बोलावं हे त्यांना कळेना. रमेशराव आणि सुनीताबाईंचं हे अनोखं रूप त्यांना नवीन होतं. अशीही माणसं या जगात आहेत ही परमेश्वराची केवढी कृपा! त्या विचार करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सुनीताबाईंच्या चेहऱ्यावर सुद्धा आपण काहीतरी चांगलं केल्याचं समाधान झळकत होतं.

बाहेर कुठेतरी देवीची आरती सुरु होती. आरतीचे सूर निनादत होते. “प्रसन्न वदने प्रसन्न होसी…. “

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अस्तित्व…☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

❤️ जीवनरंग ❤️

☆ अस्तित्व… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

तो जेव्हा माझ्या क्लिनीकमधून बाहेर पडला तेव्हा मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतिकडे एकटक बघत राहिलो. चाळीस वर्षांपूर्वी तो जसा होता तसा आजही तसाच होता. केवळ मधे दिवस, महिने वर्षं गेलीत म्हणून वय वाढलं म्हणावं इतकंच. तो यत्किंचितही बदलला नव्हता. तोच ताठ कणा, तीच दमदार चाल, तेच शरीरसौष्ठव. केवळ अधूनमधून मला भेटायची हुक्की येते, तर तेव्हा तो उगवतो. भेटल्यावर वीसेक मिनिटं ऐसपैस गप्पा मारून निघून जातो. याचं त्याला कोण समाधान. म्हणतो, “डाक्टरसाब, आप से बात करने में जो मजा आता है वो और कहीं नहीं। ” त्याची वैचारिक भूक भागवण्याची जबाबदारी जणू माझीच. तो येतो तेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये दंगल ठरलेलीच. इतर पेशंट बाहेर ताटकळत असलेले, याचं भान दोघांनाही उरत नाही. बाहेर मात्र, आत फार मोठ्या गंभीर गोष्टीवर चर्चा चालू असल्याची हवा. तो बाहेर पडतो तेव्हा तो हसतमुख. मग सगळेच चाट पडतात. मीही तसा दिलखुलास. इतकी कडाक्याची चर्चा होऊनही काहीच घडलं नाही असं दिसल्यावर आश्चर्यच आश्चर्य क्लिनिकभर. स्वतःच्या कारचा दरवाजा उघडून तो आत बसला तोपर्यंत माझी नजर त्याच्यावर खिळलेली. तो गेल्यावर, मी म्हणायचो, “नेक्स्ट, ” आजही तसंच म्हटलं.

चाळीसेक वर्षांपूर्वी मध्यमवयीन आजारी आईला घेऊन तो आला होता तेव्हापासूनचा आमचा दोस्ताना. आई सतत आजारी असायची. तेव्हा एकतर तो आईला घेऊन क्लिनीकला यायचा वा मी त्याच्या आलिशान घरी व्हिजिटला. आईचा आजार हा दुर्धर असून ती फार काळ जगणार नाही हे कितीदा तरी सांगून झालं होतं. आम्ही आमच्यापरीने प्रयत्न करतोय पण सर्व देवावरच हवाला, हेही कितीदा तरी सांगून झालं होतं, पण त्याचं उत्तर ठरलेलं व ठाम, “मी देवाला मानत नाही! तिचं आयुष्य असेल तितकं ती जगेल. निरोप घ्यावासा वाटला तर ती घेईल! ” इतकं साधं सरळ उत्तर ऐकून मी चाट पडलो होतो. देवाला मानत नाही असं त्याने म्हटल्यावर धक्काच बसला होता. म्हणजे तू नास्तिक आहेस! ! असं मी म्हटल्यावर, “असं तू म्हणतोस, मी स्वतःला नास्तिकही म्हणणार नाही. ” नंतर मी काहीसा वाद घातला पण एकूण तो मला भावला. आजारी आईच्या निमित्ताने तो सारखा भेटायचा. त्याच्या आईने व देवाने माझं भाकित खोटं ठरवण्याचा चंगच बांधला होता. ती चक्क तीस वर्षं जगली आजारासकट. मात्र आमचे संबंध सुदृढ करत गेली.

इंडस्ट्रीयल झोनमधे त्याने स्वतःचं एक छोटं युनिट टाकलं होतं स्वतःच्या हिंमतीवर. एक युनिक प्रॉडक्ट तो काढायचा. देशभर त्याची मागणी असायची, कारण ते प्रॉडक्ट त्याने पहिल्यांदा भारतात आणलं होतं. त्याची मशिनरीही विदेशातून आणली होती. चाळीस वर्षांपूर्वी तशी मशिनरी आणायची हिम्मत इतरांकडे नव्हती. याने जम बसवलाच पण बक्कळ पैसाही कमवला. मालाचा दर्जा सांभाळत नावही कमावले. सतत नवनवीन टेक्नोलॉजीच्या पाठीशी धावणारा. त्यानिमित्ताने देशविदेशाचे दौरे ठरलेलेच. निम्मं जग पालथं घातलं म्हणा ना. प्रत्येक दौऱ्यानंतर तेथल्या घडामोडी क्लिनीकमधे येऊन सांगणारच. जगात कुठे काय चाललंय याचं वेगळंच आकलन त्यामुळे व्हायचं. तो कधीही यशामागे धावला नाही. यश मात्र त्याच्यामागे धावत राहिलं.

कितीही यश मिळाले तरी ते कधीही त्याच्या डोक्यात गेलं नाही. तो आपल्या मुलुखावेगळ्या विचारांवर कायम राहिला. मूळचा तो पंजाबी. ना कधी तो मंदिरात गेला ना गुरूद्वारात. बायको, मुलांना मात्र स्वातंत्र्य दिलेलं. आपलं मत कधीही त्यांच्यावर थोपलं नाही. मुलं मोठी होऊन कॅनडात गेली. त्यांची मर्जी म्हणून याने तेही स्वीकारलं. इंडस्ट्रीच्या संस्थांमधे, त्यांचे कार्यक्रम, मिटींगांमधे हा कधीही गेला नाही. बकवास है सब! ! म्हणायचा. एकटं राहणं, पुस्तकं वाचणं, जगजीतसिंह, गुलजार जीव की प्राण. रात्री दहा वाजले की मोबाईल स्विच ऑफ. नवरा बायको दोघांच्या हाती ग्लास! एका वेगळ्या ब्रँडची व्हिस्की त्यांच्या हाती वर्षानुवर्षे. महिन्यातून एकदा मोजक्याच मित्रमंडळींना पाजायचा स्वखर्चे. मग त्या बैठकीत ही वाद ठरलेलेच. एकदा गणपतीचे सुरेख पेंटिंग त्याच्या घरी हॉलमधे लावले गेले तेव्हा मोजक्याच मित्रमंडळींमधे खळबळ उडाली होती. ते सुरेख पेटिंग आहे.. त्यापलिकडे काही नाही ही त्याची मखलाशी. त्याचं कलासक्त असणं तर खरंच बेमिसाल. एखादी कलाकृती आवडली की त्यासाठी वारेमाप उधळपट्टी करणार हे ठरलेलेच.

देवावरचा विश्वासच काय, त्याचे अस्तित्व नाकारणे यावरून मी त्याला कितीतरी वेळा छेडलंय. मी पक्का आस्तिक तर तो इहवादी. तो म्हणायचा, “ तू तुझ्या मतांवर ठाम रहा, मी माझ्या! ” त्याचं म्हणणं खोडणं माझ्या जीवावर यायचं. एकदोनदा मात्र मी बोलून गेलो होतो की “टाईम विल टीच यू अ लेसन! ” यावर तो मोकळेपणाने हसला होता.

आजही तो माझ्याशी बराच वेळ बोलत बसला होता. सत्तरीच्या जवळपास आम्ही दोघं आलेलो. आयुष्य मनमुक्त जगलेलो. कसलीही खंत वा किल्मिष नसलेले. हा नास्तिक असला तरी त्याची बायको दुप्पट आस्तिक होती हे मला ठाऊक असलेलं. त्याच्या बायकोच्या पुण्याईवरच याने आयुष्य निभावून नेलंय हे माझं ठाम मत. मात्र तसं मी सांगितल्यावर तो खळखळून हसायचा. आज त्याने रिपोर्ट दाखवायला मोबाईल उघडला तर मोबाईलच्या स्क्रीनवर शंख, चक्र, गदा, पद्मधारी विष्णू! हे चित्र तसं होतं सुरेखच! ! पण ते नेहेमी त्याच्या बायकोच्या मोबाईल स्क्रीनवर असते. आज याच्या मोबाईलमधे कसे? मी विचारात पडलो. नेहेमी तावातावाने वाद घालणारे आम्ही, पण आज तसं विचारायची माझी हिंमत झाली नाही. न विचारलेलंच बरं मनाशी ठरवलं. पाठमोरा होत तो निघून गेला तेव्हा त्याचा ताठ कणा आज ही मला खुणावत होता. तो तसाच रहावा असं आतून आतून वाटत राहिलं.

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मी मंगलाष्टकं करते… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ मी मंगलाष्टकं करते… ☆  सौ. उज्ज्वला केळकर

सकाळचे साडेदहा वाजले होते. इतक्या दाराची बेल वाजली आणि पाठोपाठ आवाज आला “मास्तरीन बाय हैत का घरात? म्या म्हटलं आज भेटता का नाय?” मी घाईघाईने दार उघडलं. दारात सिदू उभा होता. सिदू आमचा गावाकडचा वाटेकरी. आल्या आल्या म्हणाला “ते तांदूळ टाकायचे टायमाला म्हणतात ते गाणं लिवा” वहिनी साहेबांनी मी  किरकोळ कविता करते हे लक्षात ठेवून मला  मंगलाष्टक करायचा सांगावा धाडला हे समजल्यावर मला अगदी भरून आलं. त्यानंतर सिदूला जेवून जाण्याचा आग्रह केला. अण्णासाहेब पाटील म्हणजे आमच्या गावची बडी आसामी. आता त्यांच्या मुलाच्या लग्नात खूप माणसे येणार. बडी बडी माणसं मी केलेली मंगलाष्टक ऐकणार. मग मला आणखीन ऑफर्स येतील, कुणाच्या ओळखीचा उपयोग होईल, भावगीताची कँसेट रेकॉर्ड, सिनेमात गाणी लिहिण्याची संधी….. माझ्या मनाच्या पाखराने भरारी घेतली. पुढचं राहू द्या निदान चालू घडीला मंगलाष्टकाची कॅसेट करून देऊन चार पाचशे खिशात घालायला साँरी साँरी पदरात बांधायला हरकत नव्हती. या आनंदातच जेवण न करता शाळेत गेले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी आले तर दूरवरूनच अण्णासाहेबांची चकचकीत काळी अँबेसिडर दारात उभी. ” या मास्तरीन बाई या, माझ्या घरात त्यांनीच माझे स्वागत केलं. सिदबानं काल निरोप दिला न्हवं? हो सांगितला की. तुम्ही काय काळजी करू नका. अहो, तुमची पुष्पी मला माझ्या गौरी सारखीच! “नाही तुमच्यावर काय काम सोपवल्यावर आम्हाला काय घोर बी न्हाई. खरं पर म्हटलं एकदा सोताच तुमच्याकडे जाऊन सांगावं” मास्तरीन बाय, तेवढी गान्यात घ्यायची नाव लिवून घ्या” “मला माहित आहेत अण्णासाहेब तुमची नावं, ” “आमची नव्ह ती माहित हैत तुम्हास्नी. ही येगळी.. असं बघा, मास्तरीण बाय म्या म्होरल्या साली झेड. पी. च्या कृषी विभागाचा सभापती व्हायचं म्हणतूया. तेव्हा झेड. पी. चे अध्यक्ष मुरारराव जाधव, आमच्या भागाचे आमदार नाझरे-पाटील आणि खासदार सखाराम जगताप यांची नावं बी येऊ देत. ते लग्नाला येणार आहेत. अशी सगळ्यांची नाव कशी बसणार मंगलाष्टकात? सगळ्यांची नग, फकस्त त्या तिघांची येऊ देत. ते लग्नाला आलेली आणि आशीर्वाद देतात असं म्हणा. “आनि मास्तरीण बाय माझ्या आई-बा चा बी येऊ दे ” वहिनी साहेबांनी हुकूम सोडला. तुझी आई बा जीते हायती का? म्हनं त्यांची बी नाव लिवा. अण्णासाहेब खवळले. ” सर्गातून बघत्याती आनि आशीर्वाद देत्याती असं लिवा” वहिनी साहेबांनी त्यांच्यावर आवाज चढवला. माझी मुकिट्याने माझी डायरी काढली आणि त्यांनी सांगितलेली नावे लिहून घेतली. “अण्णासाहेब मंगलाष्टक लिहीते पण लग्नाच्या वेळी ती म्हणणार कोण? मी थोड्याशा मुत्सदी पणे प्रश्न टाकला. “माझ्या भैनीची ल्येक हाय कांची! कांचन लई ग्वाड गळा हाय तिचा! हादग्याची, पंचमीची, झोपाळ्याची, झिम्म्याची गानी झक्कास म्हंती. माझ्या डोळ्यापुढे 12-13 वर्षाची कांची काप-या काप-या आवाजात, हुंदके देत मंगलाष्टकं म्हणत असल्यास दृश्य उभ राहिलं. मी अण्णासाहेबांना म्हटलं, “अण्णासाहेब, आपल्या पुष्पाच्या लग्नात बडी बडी माणसे येणार” “व्हय की! आपले श्रीपतराव, नाझरे-पाटील, सकाराम जगताप, त्येंच्या संगट आनि बी कोण येतील साकर कारखान्याचे चेअरमन….. “तेच ते! तेव्हा एखाद्या परक-या प्रकारा पोरींनी मंगलाष्टकं म्हटलेली बरी नाही दिसायची. त्याची जिला चांगलं गाता येतं अशा कोणाकडून तरी तबला पेटीच्या साथीवर मंगलाष्टक म्हणून घ्यावेत आणि लग्नाच्या वेळी ती कॅसेट लावावी म्हणजे काही घोळ होणार नाही मी कॅसेट ची कल्पना त्यांच्याकडे उतरवली त्यांनाही ती पटली मुख्य म्हणजे वहिनी साहेबांना सुद्धा. मग मी सावधपणे म्हटले आता हे करायचं म्हटलं म्हणजे थोडा खर्च येणार म्हणजे मला काही नको गाणारी पेटी वाजवणारे कॅसेट खर्चाची चिंता सोडा मास्तरीन बाय तुम्ही त्या दिवशी ती कॅसेट घेऊन या आणि हा ते छापायचं काम ते तुम्हीच बघा मी मान डोलावली करून घ्यायला ते तयार झाले तर फार नाही सहाशे रुपये त्यांच्याकडून मागायचं मी ठरवलं खर्च वजा जाता पाचशे रुपये तरी मला उरले पाहिजे. मंगलाष्टकं चांगली आठ कडव्यांची करायची असे मी ठरवलं. एकदा तर मराठीच्या तासाला वर्गामध्ये मुलींनो खालील ओळीचा अन्वार्थ लिहा असे म्हणून प्रसन्न वदना प्राची येऊन, कुंकुम भाळी गेली रेखूनी…. या ओळी सांगितल्या. मुली एकदम ओरडल्या, बाई! बाई! ही कविता कुठे आहे आम्हाला? मग लक्षात आलं मंगलाष्टकातल्या ओळी चुकून बाहेर पडल्या होत्या.

असे तीन-चार दिवस गेले एके दिवशी पुष्पा आपल्या सगळ्या मैत्रिणी मैत्रिणीचा तांडा घेऊन माझ्याकडे आली आणि सगळ्या मैत्रिणींची नावे मंगलाष्टकात आली पाहिजे असे लडिवाळपणे सांगून गेली. दुसऱ्या दिवशी वसंता – पुष्पीचा भाऊ आला आणि आपल्या सगळ्या गॅंगची नावे मंगलाष्टकात आलीच पाहिजे असे धमकावून गेला. त्यानंतर पुढच्या चार दिवसात तर पुष्पाचे काका, काकू, मामा, मामी, आत्या, आजोबा, मावशी- मावसा, जवळचे- दूरचे बहीण-भाऊ माझ्याशी पायधूळ झाडून गेले. त्या साऱ्यांना त्यांची नावे मंगलाष्टकात यायला हवी होती. त्या साऱ्यांचा आतिथ्य करता करता माझा चहा साखर आणि पोह्याचा महिन्याचा स्टाॉक चार दिवसातच संपून गेला. मी आपली सगळ्यांची नावं हाताश पणे लिहून घेत होते. शेवटी मंगलाष्टकं तयार झाली. त्याची एक चुणूक….

आली मंगलवेळ आज नटली ही नोवरी सुंदरी 

प्रेमा कमा निर्मला तशी आणिक ती कस्तुरी 

शामा निमा शुभांगीनी नि यमुना ती नर्मदा गोदावरी 

उषा कुसुम सुशील जमल्या लेवूनी वसने भरजरी 

नाझरे पाटील पहा आले मल्हार राया घेवोनिया 

जगतापांचे सखारामही असतीच मंडपी आशीर्वाद ते द्यावया

अनिल सुनील कुणाल कमाल ऋषीही आजची दैवते

वसंत अशोक प्रभा गणा निनुरूपे मंडपी या नांदते…

तर अशाच प्रकारच्या मंगलाष्टकातल्या साऱ्या ओळी जमल्या. समोरची संगीता नक्की मंगलाष्टक म्हणेल. तिचे मास्तर पेटी वाजतील तिला साथीला तब्बलजी असतातच. संगीताच्या चालीवर शेवटी मंगलाष्टक रेकॉर्ड झाली. लग्नाच्या दिवशी सकाळी कॅसेट वसंताच्या ताब्यात दिली. ऐनवेळी गडबड नको म्हणून मंडपाच्या उजव्या हाताला असलेल्या खोलीत आम्ही ती लावून पाहिले.

आली मंगलवेळ आज नटलीही नोवरी सुंदरी….. हे सूर ऐकू आल्याबरोबर मंडपातलं पब्लिक लग्न उजव्या बाजूला खोलीत लागले काय असं वाटून उभे राहून मी मान उंचवून खोलीकडे पाहू लागलं. कुणी कुणी त्या दिशेने अक्षताही फेकल्या. नवरदेव मंडपाच्या टोकाला असलेल्या बोहल्या वरच्या मखमली खुर्चीत बसून होता. तोही गडबडीने त्या दिशेने बघत भराभरा पाटावर येऊन उभा राहिला. पब्लिकची गडबड बघून मी वसंताला खूण केली व वसंताने टेप बंद केला. त्याने कॅसेट काढून घेतली आणि टेप रेकॉर्डर मंडपात आणला. शुभमंगल सावधान… असे ओरडून कोण मंगलाष्टक म्हणणार आहे? भठजींनी विचारलं. त्याबरोबर प्रभ्याने टेप चालू केला. टेपच्या गळ्यातून शब्द उमटले *मै क्या करू मुझे बुड्ढा मिल गया*तशाही स्थितीत किन्या वगैरे वसंताच्या गॅंगचे मेंबर्स बोटाने किंवा पायाने ताल देऊ लागले. वसंताने टेप बंद केला. खोलीतून बाहेर येताना मंगलाष्टकाची कॅसेट प्रभ्याच्या खिशात राहिली व गडबडीत हातातली कॅसेट लावली गेली. ती काढून मंगलाष्टकाची कॅसेट रेकॉर्डरमध्ये घातली. त्या गडबडीत पाॉझचं बटन दाबलं गेलं. टेप केला पण कॅसेट पुढे सरकेचना. ऐन वक्ताला याच्या नरड्याला काय झालं कुणास ठाऊक! रोग पडला मेल्याला! असा टेप रेकॉर्डरचा उद्धार करीत कमळाबाईंनी आपल्या लेकीला फर्मावलं “म्हण ग कांचे तूच आता… मंगलाष्टकाचे छापील कागद वाटण्याचे काम वसंतांच्या गॅंगने चोख बजावलं होतं. कांचीन आपल्या कापऱ्या आवाजात मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. सर्वांना आपापली नावं ऐकून धन्य झालं. श्रीपतराव बोंद्रे, नाझरे पाटील, सखाराम जगताप यांच्यापैकी कोणी आलंच नव्हतं. पण ते आशीर्वाद देण्यासाठी हजर आहेत असं कांचीने म्हणून टाकलं.

मुहूर्ताची वेळ झाली भटजींनी आंतर पाट दूर केला. ” वाजवा रे वाजवा” म्हटल्यावर ताशे तडतडू लागले. बँड वाजला, पण “हाती घ्याल ते तडीस न्या”या न्यायाने कांचन आपली मंगलाष्टकं म्हणतच होती. इकडे वधू-वरांनी एकमेकांना हार घालून पेढे भरवले. कांचन मंगलाष्टकं म्हणतच आहे. पुरी आठ कडवी म्हणून झाल्यावरच ती थांबली.

आता वसंताच्या मित्रमंडळींना टेप रेकॉर्डर कडे बघायला फुरसत मिळाली. पॉझचं बटन दाबलेलं आहे हे पाहताच त्यांची हसता हसता पुरेवाट झाली. त्यांनी टेप रेकॉर्डर पुन्हा चालू केला आत मंगलाष्टकाची कॅसेट असल्याने पुन्हा सर्वांनी ऐकलं. ” आली मंगलवेळ आज नटली ही नोवरी….

 मंडपात आता पंगत बसली होती. इतक्यात प्रवेशद्वारापाशी गडबड झाली. ठेवण्यातलं रुंद हास्य करत अण्णासाहेब पुढे गेले. आमदार, खासदार, जिल्ह्याचे अध्यक्ष कामामुळे थोडे उशीरा आले होते. खाशा लोकांची पंगत वर होती. त्यांना हवं नको बघायला वहिनी साहेबाबरोबर मीही वरच होते. अण्णासाहेब म्हणाले “आपण तांदूळ टाकायचे टायमाला आला नव्हता मंगलाष्टकं लई बेश्ट झालीत. “वशा लाव रं तुझे टेप रेकॉर्डर… ” आणि मंडपातल्या लोकांनी पुन्हा तिसऱ्यांदा मंगलाष्टकं ऐकली. आता दुसऱ्या कडव्यातच श्रीपतराव मल्हारराव सखाराम आशीर्वाद घेऊन जातात ते बरं झालं ते बंद झाल्यावर अण्णासाहेबांनी ती लई बेस्ट मंगलाष्टके बंद करण्याचा हुकूम सोडला. वर खाशा पंक्तीत बसलेली श्रीपतराव, मल्हारराव ही बडी मंडळी मंगलाष्टका बद्दल काही बोलतात का? याची मला नकळत उत्सुकता लागून राहिलेली होती‌. मी दाराआडच होते. त्याचवेळी मला पुढील संवाद ऐकू आला “काय हो अण्णासाहेब मंगलाष्टका कुणी केल्या “? हा आवाज बहुतेक खासदार सखाराम बापूंचा असावा. “आहेत आमच्या वर्गातल्या मास्तरीणबाई! राजू, जारे इजुताईस्नी बोलावून आण.

” नको नको राहू दे.. आमच्यासाठी पण मंगलाष्टका करून देतील काय? “

” आता कुणाच लग्न काढलं? तुमच्या सगळ्या मुला मुलींची झाली ना लग्न? ” “आमच्यातली झाली हो, आमची धाकटे बंधू अनंतराव… त्यांच्या थोरल्या लेकाचं लगीन काढलंय. ” 

“अरे वा वा वा! ब्येस. ते मंगलाष्टकाचं माज्याकडं लागलं. मी सांगतो इज्युताईस्नी “

 “त्या पैशे किती मागतील?

 “पैशाचं काय? आपल्यासारख्यानं मंगलाष्टकं करायला सांगितली हाच त्यांचा सन्मान हाय. त्ये समदं म्या बघतो. ” अण्णा साहेबांनी अशी माझ्या वतीने त्यांना खात्री देऊन टाकली. त्यावर सखाराम बापू म्हणाले “मंगलाष्टकात तेवढं आपल्या बाबुरावांचं झालं तर आपल्या पक्षाध्यक्षांचं आणि आपल्या शी. एम. चं नाव तेवढं त्या घालायला सांगा. लग्नाच्या टायमाला शी. एम. त्या भागात दौऱ्यावर हाईत. हे ऐकल्यावर कितीतरी वेळ अण्णा साहेबांचा आ मिटला नाही. आणि त्या दुसऱ्या मंगलाष्टकाच्या कल्पनेने माझ्या डोक्याला लागलेल्या मुंग्या हटल्या नाहीत.

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दादाचे पहिले पुस्तक – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ दादाचे पहिले पुस्तक – भाग – २ ☆ श्री प्रदीप केळूसकर

 (आणि एक दिवस पोस्टमनने रजिस्टर पत्र आणून दिले. बाबांनी पत्र फोडले, त्यात ST ने पाठविलेल्या पार्सलची पावती होती.) – इथून पुढे —

मी हवेत होतो. दादाच्या कादंबरी साठी एवढा मोठा मोबदला मिळणार, हे माझ्या स्वप्नातही नव्हते. मी अंदाज केला, त्यानी या पार्सलात भेटवस्तू आणि पैसे पाठविले असणार.

दादाने पाहिले पार्सल ST ने वेंगुर्ल्याला पाठवले होते, म्हणजे दादाला पार्सल घेण्यासाठी वेगुर्ल्याला जावे लागणार होते. मी दादाकडे हट्ट करत होतो की मी पण वेगुर्ल्याला येणार कारण मला सर्वप्रथम पार्सल फोडायचे होते आणि आतील नोटा मोजायच्या होत्या. दादा म्हणाला 

“अरे दोघांनी जायचे म्हणजे जाताना दोन रुपये आणि येताना दोन रुपये म्हणजे चार रुपये लागतील आणि माझ्याजवळ काहीही पैसे नाहीत. मी चालत जाणारं त्यामुळे तू येऊ नकोस”.

मी रडू लागलो आणि तसाच झोपलो. पहाटे दादा वेंगुर्ल्याला जाण्यासाठी उठला तेव्हा मी जागाच होतो. दादा विहिरीवर आंघोळ करायला गेला तेंव्हा मी पण छोटी कळशी घेऊन विहिरीवर गेलो. शेवटी मी ऐकत नाही हे पाहून दादा गप्प बसला आणि म्हणाला “चालत जावे लागेल, पाय दुखतील हे लक्षात ठेव “.

मी चड्डी शर्ट घालून तयार झालो. आम्ही दोघानीं दूधभाकरी खाल्ली आणि बाहेर पडणार एवढ्यात बाबा आतून आले आणि त्यानी दोन रुपये दादाच्या हातावर ठेवले ” येताना संध्याकाळी ST ने या “ असे म्हणाले. दादाला आणि मला आश्यर्य वाटले, बाबांनी हे दोन रुपये कुठून आणले?

आम्ही दोघे चालत चालत म्हापणच्या घाटीपर्यत आलो तोपर्यत पूर्वेला उजाडत होते. घाटी चढताना मी दादाला म्हणालो 

“दादा आता पार्सल उघडून पैसे मिळाले की तुला आणि बाबांना चप्पल घ्यायचे, रोज दगडधोंड्यातून चालून चालून तुझे पाय फाटून गेले आहेत ‘.

“माझ्या पायांना काही होतं नाही रे,पहिल्यांदा घरावरची कौले फुटली आहेत, ती बदलायला हवीत नाहीतर आपले मातीच्या भिंतीवर पावसाचे पाणी पडून घर कोसळायला वेळ लागायचा नाही. शिवाय आईला मुंबईला किंवा पुण्याला नेऊन तिच्या डोळ्याचे ऑपरेशन करायला हवे, धूर डोळ्यात जाऊन जाऊन तिला काचबिंदू झाला आहे “.

बोलत बोलत आम्ही चालत होतो. नऊ वाजले तसे ऊन लागू लागलं पण थांबत थांबत आम्ही पुढे जात होतो. दाभोलीची घाटी चढतांना माझ्या पायात पेटके यायला लागले मग दादाने मला खांदयावर घेतले आणि तो घाटी चढू लागला. ऊन अगदी डोक्यावर आले तसे आम्ही दोघे वेगुर्ल्याच्या ST स्टॅण्डवर पोहोचलो.

स्टॅण्डवर आम्ही पार्सल ऑफिस शोधून काढले. त्या टेबलावरच्या क्लार्कला दादाने पोस्टाने आलेली पावती दाखवली. त्या क्लार्कने पावती हातात घेतली आणि आपले रजिस्टर चेक केले. तो दादाला म्हणाला 

“अहो, ह्या पार्सल येऊन दहा दिवस झाले, तुमी होतास खय,? आज नाय इल्लास तर उद्या मी परत पाठवतलंय असतंय’.

“पण आम्हाला ही पावती कालच मिळाली आणि आज आम्ही आलो ‘. दादा म्हणाला.

“पोस्टचो कारभार.. बरा पण तुमका उशिरा इल्याबद्दल दंड लागतलो, तसो ST चो नियमचं आसा. ‘

“, पण आमच्याकडे पैसे नाहीत हो ‘.

“, मग मी पार्सल देऊ शकत नाय, शेवटी माजी नोकरी आसा ‘.

“किती रुपये दंड होणार?

त्या क्लार्कने हिशेब केला आणि एक रुपया वीस पैसे म्हणून सांगितले.

 दादाने मोठया कष्टाने सकाळी बाबांनी येताना ST ने येण्यासाठी दोन रुपये दिले होते, ते त्या क्लार्ककडे दिले. क्लार्कने पावती केली आणि बाकी ऐशी पैसे परत दिले आणि पार्सल शोधून काढून ते ताब्यात दिले आणि दादाची सही घेतली.

आता माझ्या अंगात उत्साह आला. पायातील पेटके कुठल्याकुठे गेले, पार्सलमध्ये पैसे असणार होते किंवा चेक तरी असेल अशी आशा होती. मोठया लेखकांना प्रकाशक पाचशे रुपये किंवा सातशे रुपये पण देतात असे दादा म्हणाला होता आणि आपल्याला निम्मे तरी देतील असे पण म्हणाला होता.

मला पार्सल उघडण्याची उत्सुकता लागली होती, दादा म्हणत होता, घरी जाऊन उघडूया पण मला घाई झाली होती.

माझ्या हट्टामुळे दादाने तेथलीच सुरी घेतली आणि पार्सल उघडले. आत दादाची दहा पुस्तके होती आणि एक पाकीट होते. मी पुस्तक हातात घेतलं, मस्त कव्हर होते, कव्हरवर दादाचे नाव होते, मी पुस्तकाचा वास घेतला. नवीन पुस्तकाला जो वास असतो तो त्या पुस्तकांना होता. दादाने पाकीट फोडले, त्यात एक पत्र होते. दादाचा चेहरा पडला. तो घाम पुसू लागला. मी विचारले काय झाले? चेक पाठवला काय? रोख पैसे नाहीत?

दादा म्हणाला ” लेखकाचे मानधन म्हणून ही दहा पुस्तके पाठवली आहेत, बाकी काही नाही…. “

मी रडायला लागलो. मी म्हणालो “दादा, तू पहाटे उठून पाठीत दुखेपर्यत आणि हात मोडेपर्यत किती दिवस लिहीत होतास त्याचा हाच मोबदला?”

“होय बाबा, नवीन लेखकाची हीच किंमत असते. चला, बाबांनी दिलेल्या दोन रुपयातील एक रुपया वीस पैसे दंडाचे ST ने घेतले आता राहिले ऐशी पैसे खिशात. त्यात आपल्या दोघांचे तिकीट येणार नाही, तेंव्हा.. ”

“तेंव्हा काय?”

“ पांडुरंग सर्व्हिस.. बस माझ्या खांदयावर. ” दादा डोळे पुसत म्हणाला.

मी दादाच्या खांदयावर बसलो आणि पुन्हा पंधरा किलोमीटर चालायला सुरवात केली.

— समाप्त —

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दादाचे पहिले पुस्तक – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ दादाचे पहिले पुस्तक – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

पहाटे पहाटे मला जाग आली. मी गोधडीमधून मान बाहेर काढली, दादा कांदिलाच्या प्रकाशात पाट मांडीवर घेऊन लिहीत होता. दादाची ही वेळ आवडीची, सर्वजण झोपेत असताना तो पहाटे चार वाजता उठतो, कंदिलाची काच पुसतो आणि पाट मांडीवर घेऊन लिहायला बसतो. मग तो उठून तोंड धुईल आणि गोठ्यात जाऊन गाईचे दूध काढेल. मग आंघोळ, पूजा करून घरचं दूध पिऊन बाहेर पडेल. रोज अंदाजे दहा पंधरा किमी चालून कुणाकडे एकादशीणि, कुणाकडे ब्राम्हण जेवण नाहीतर नुसतीच पूजा करून भर दुपारी डोकयावर उपरणे घेऊन परत येईल. मग दुपारी जेवण करून थोडी वामकुक्षी करून परत लिहायला बसेल. तोपर्यत बाबा पण गावात भिक्षुकी करून आलेले असत. त्यांचे पण जेवण होई.

मी उठून दूध घेत होतो तोपर्यत दादा पंचा आणि बंडी घालून तयारीत होता. बाबा खाली बसुन चहा पित होते, त्यानी दादाला विचारले 

“आज कोठे आहे कामगिरी?

“तेंडोलीत जायचे आहे, खानोलकरांची पूजा आहे आणि रवळनाथ मंदिरात अभिषेक.

“बरं, खानोलकरांचा मोठा सुभाष आला आहे की काय, पूर्वी मी जायचो तेंव्हा त्याला देवाचे फार होते, म्हणून विचारले.

“नाही, एकनाथने बोलावले आहे, बरं मी जातो.

मी दादा आणि बाबा यांचेकडे पहात होतो. एव्हड्यात आई घरातून बाहेर आली, पदराला हात पुसत दादाला म्हणाली 

“म्हापणची घाटी चढतांना सांभाळून हो.. कसली घाटी ती… मला तर श्वास लागतो चढतांना.. काटेकुटे किती.. बरे पायात चप्पल नाही.. यांना म्हणते, वासूला चप्पल घेउन द्या ‘.

“माझ्या पायात तरी कुठे आहे चप्पल? चप्पलला पैसे लागतात किती? आपल्या कोकणात कितीशा लोकांच्या पायात चप्पल आहे? एक आपामास्तर आणि सोन्या वाणी सोडुन कोण चप्पल घालतो काय पायात? पायात चप्पल घालायची चैन केली तर पोटात काय ढकलायचे?”

हे आणि असे नेहेमीचे आईबाबांचे संवाद ऐकू यायचे, आज पण तसेच. मग बाबा पंचा, बंडी आणि खांदयावर उपरणे घेऊन बाहेर पडले, त्यांच्याही पायात चप्पल नसे. आईने आटवल आणि लोणच्याची फोड दिली, ती खाऊन मी शाळेत गेलो.

मी संध्याकाळी शाळेतून आलो तेंव्हा दादा लिहीत बसला होता. दुपारी पोस्टमनने पत्रे आणून दिली होती. दादाने ती फोडून वाचली होती. मी सहज ती पाहिली, दोन अंक होते, एक रत्नागिरीचा आणि एक पुण्याचा. दोन्ही अंकात दादाच्या कथा छापून आल्या होत्या “वासुदेव अनंत जोशी ‘.

मी कौतुकाने दादाकडे पाहिले, दादा लिहिण्यात मग्न होता. मी दादाला विचारले 

“दादा, तुझे नाव छापून येते, मग पैसे किती मिळतात याचे?”

दादाने मान वरुन माझ्याकडे पाहिले आणि तो हसला.

“मोठया लेखकांना पैसे मिळत असतील.. माझे नाव कुठे झाले आहे? आणि खेड्यातल्या लेखकांला कोण विचारतो? “

“मग दादा तू पहाटे उठून मान मोडेपर्यत आणि हात दुखेपर्यत का लिहितोस?

“मला दुसरे काही येत नाही, आज ना उद्या आपले पण नाव होईल आणि दोन पैसे मिळतील, या आशेने लिहितो. ”

मी घरात गेलो आणि मेहेनतीचे पैसे न देणाऱ्या या अंकवाल्यांच्या अंकात कधी लिहायचे नाही हे मनोमन ठरवून टाकले.

रात्री बाबा आणि दादा बोलत असताना मी ऐकले की दादा सध्या कादंबरी लिहितो आहे. कादंबरी म्हणजे काय, हे मला कोठे माहित होते?

मी दादाला विचारले, “, दादा कादंबरी म्हणजे काय?

“कादंबरी म्हणजे मोठी गोष्ट, ही गोष्ट किंवा कथा मी सात आठ पानांची लिहितो, तीच कथा दीडशे दोनशे पानांची लिहायची.

“मग तू कादंबरी का लिहिणार आहेस?

“कारण आपल्याकडे ते मुंबईचे लेखक येतात ना नानासाहेब, त्यांनी पत्र लिहिले आहे की तू कादंबरी लिही, त्यांचे पुण्याचे प्रकाशक ओळखीचे आहेत. नानासाहेब त्या प्रकाशकांना सांगून माझे पुस्तक प्रकाशित करणार आहेत. म्हणूंन मी आता कादंबरी लिहिणार आहे. ”

“मग या कादंबरीचे किती पैसे मिळतील आपल्याला?”

“पैसे किती मिळतात हे मला पण माहित नाही. पण मी ऐकतो ना. सी. फडके म्हणून पुण्याचे लेखक आहेत, त्यांच्या कादंबऱ्या खुप खपतात, म्हणून त्याना पाचशे रुपये मानधन मिळते म्हणे.. तसेच शिरोड्याचे खांडेकर, मुंबईचे पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांना खुप मागणी आहे, म्हणून त्याना पाचशे सातशे मिळत असतील.

“मग दादा तुला पाचशे रुपये मिळतील?”

“मी कथा लिहितो, तसे शहरात पण माझे वाचक झाले आहेत. कादंबरी प्रथमच लिहितो आहे, बघू किती देतात ते, फडक्याच्या निम्मे दिले तरी खुप झाले.” 

मी मनातल्या मनात खूष झालो. दादाला कादंबरीचे अडीचशे मिळाले तर? काय काय करायचे, हे मनात ठरविले. पहिल्यांदा बाबांना आणि दादाला चप्पल घयायचे.. आईला दोन लुगडी आणि काय.. काय..

मी पाहिले दादा जोराने लिहू लागला. रात्री तीन वाजता उठू लागला. मी संध्याकाळी घरी आलो तेंव्हा पण दादा लिहीत असायचा. लिहिलेले बाबांना वाचून दाखवायचा. बाबा त्याला सूचना करायचे.. मग ते रद्द करून पुन्हा लिहायचा.

मुंबईच्या नानासाहेबांचे कार्ड येत असे. लिखाण कितपत आले याची ते चौकशी करत होते. शेवटी दादाची कादंबरी लिहून झाली. दादाने पुन्हा एकदा चांगल्या अक्षरात ती लिहून काढली आणि पोस्टाने प्रकाशकाला पाठवून दिली. पंधरा दिवसांनी प्रकाशकांचे कादंबरी मिळाल्याचे कार्ड आले. आता आम्ही सर्व प्रकाशक काय निर्णय घेतात, पुस्तक छापतात की परत पाठवतात याची वाट पहात होतो.

एक महिन्याने पुण्याहून प्रकाशकाचे पत्र आले, “पुस्तक छापायला घेतले आहे”.

आमच्या घरात आनंदीआनंद झाला. आईने केळ्याची शिकरण आणि चपाती केली आणि आम्ही सर्वजण खुप जेवलो. मी मनातल्या मनात प्रकाशकाने पैसे पाठविले तर काय काय करायचे याची यादी बनवत होतो.

आणि एक दिवस पोस्टमनने रजिस्टर पत्र आणून दिले. बाबांनी पत्र फोडले, त्यात ST ने पाठविलेल्या पार्सलची पावती होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाबा – भाग-२ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाबा – भाग-२ ☆ श्री सुनील शिरवाडकर

(लोनचे सगळे सोपस्कार पार पडुन आज रिक्षा बाबाच्या वाड्या बाहेर उभी होती.पेढ्याचा बॉक्स..हार..फुलं सगळं आणलं होतं.हेमा वहीनींनी.. म्हणजे बाबाच्या बायकोनं रिक्षाचं औक्षण केलं.. पेढे वाटले.) – इथून पुढे —- 

“अण्णा.. मला काय वाटतं..रिक्षाला मागे नाव द्यायचं ना..तर ते तुमचं देऊ.”

बाबानी सांगितलं..पण अण्णांनी विरोध केला.खरंतर मलाही बाबाचं म्हणणं पटलं होतं..कारण आज ही जी दाराशी रिक्षा उभी होती..ती अण्णांनी एकरकमी मोठी रक्कम दिल्यामुळेच ना!

मी बाबाला म्हटलं..

“दे..रे.. अण्णांचंच नाव रिक्षाला.. मस्त मागे रंगवुन घे..

‘अण्णांची कृपा’ असं.”

पण अण्णांनी त्याला विरोधच केला.

“तुम्हाला काही तरी नाव द्यायचं ना..मग लिहा..

दत्तगुरुंची कृपा”

ते आम्हालाही पटलं.दोन दिवसातच तसं स्टिकर रिक्षांवर लागलं.दत्तगुरुंच्या कृपेमुळे बाबाचं आयुष्य बदलून गेलं.

आता बाबा सकाळी लवकरच रिक्षा घेऊन जायला लागला.सगळ्यात पहीले त्याने एक गोष्ट केली..ती म्हणजे शालीमार नाशिकरोड पट्ट्यावर रिक्षा चालवणे सोडुन दिलं.त्याच्या घराजवळच सागरमल मोदी शाळा होती.त्या शाळेतल्या मुलांना शाळेत नेऊन पोचवणं आणि शाळा सुटल्यावर घरी आणुन सोडणं हे काम सुरु केलं.

आता सकाळी लवकर त्याचा दिवस सुरु व्हायचा.आंघोळ करुन जरा वेळ देवापुढे बसायचा.तसं तर त्याला अलीकडे वाटायला लागलं होतं.. अजुन थोडंसं लवकर उठावं आणि पुजा करावी.पण रोजची पुजा अण्णाच  करायचे.. पुर्वीपासुन..त्यांचा पुजा करण्यात छान वेळ जायचा.. आणि मुख्य म्हणजे त्यांना त्याची आवड होती.मग बाबा काय करायचा? देवापुढे दिवा लावायचा.. उदबत्ती लावायचा..एक माळ ओढायचा ‌‌ते झालं की दत्तबावन्नी वाचायचा.

शुचिर्भूत होऊन..कपाळावर गंधाचा टिळा लावून बाबा बाहेर पडायचा.सकाळी शाळेत मुलांना नेऊन सोडलं की मग तिवंधा चौकातील स्टॅण्ड वर रिक्षा लावुन बसायचा..दोन चार भाडे झाले की पुन्हा मुलांना आणायला शाळेत जायचा.

दुपारी घरी यायचं..जेवण करून तासभर आराम करायचा ‌.आणि पुन्हा रिक्षा घेऊन स्टॅण्ड वर जाऊन उभा रहायचा.संध्याकाळपर्यंत भाडे करायचा.सहा वाजले की रिक्षा घेऊन घरी यायचा.एक चांगलं जाड ताडपत्रीचं कव्हर त्यानं आणलं होतं.ते कव्हर रिक्षावर टाकायचा..साखळीने रिक्षा बांधायचा.. आणि मग फ्रेश होऊन चौकातल्या ओट्यावर जाऊन बसायचा.. तिथं सगळी त्याची मित्रमंडळी जमत.

तीन चार वर्षांत बाबानी रिक्षाचे बरचसं लोन फेडलं.आता जरा पैसाही बरा मिळायला लागला.मग अधुनमधून शौक पाणी सुरु झाले.पुर्वी फक्त अंडी खायचा..आता चिकन मटणाची सवय लागली.पण हे सगळं घराबाहेर.घरात अजुन तरी अण्णांचा धाक होता.घरी काही असं करायची हिंमत होत नव्हती.

पण एक दिवस त्याने तेही केलं.योगायोगाने मीही तेव्हा कशासाठी म्हणून बाबाकडे गेलो होतो.बाहेरच्या खोलीत कुणी दिसलं नाही.. म्हणून स्वयंपाकघरात डोकावलं तर तिथं बाबांचा मुलगा अंडी फोडताना दिसला.. मला धक्काच बसला.

“अरे बाबा.. हे काय? तुझ्या घरात चक्क अंडी?”

“शू….हळु बोल”.

“अरे पण हे काय?, आणि अण्णा कुठे गेले?त्यांना हे माहीत आहे का?”

“तु गप्प बस बरं.. अण्णा यायच्या आत मला हे आटोपायचं आहे..ही टरफलं बाहेर नेऊन टाकली की झालं “

पण तेवढ्यात अण्णा आले.त्यांनी बघितलं..त्यांना सगळं समजलं.मला वाटलं आता अण्णा चिडणार..घरात खुप राडा होणार.

पण अण्णांनी ते प्रकरण खुप शांततेत घेतलं.आता आपलं काही चालणार नाहीये.. आपण काही सांगायला गेलो..तर काही तरी कारण सांगून आपल्याला गप्प बसवतील.यापेक्षा जे आहे ते ठिक आहे म्हणायचं आणि शांत बसायचं.

त्यांचं देवघर स्वयंपाकघराच्या जवळच होतं.वर्षोनुवर्षे दत्ताची भक्ती केलेलं त्यांचं मन जरा उदासच झालं.आपल्या या घरात हे असं काही बघायला मिळेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं.पण आता विरोध करायचा नाही.. पोराला.. नातवाला करु दे त्यांच्या मनासारखं.

अण्णा बाहेर अंगणात आले.झाडाला बांधलेल्या दोरीवर त्यांचा पंचा होता..तो त्यांनीं ओढला..आंत गेले..तो पंचा दत्ताच्या तसबीरीवर टाकला.

“चला..दृष्टीआड सृष्टी..दत्त महाराज.. क्षमा करा.. नाही पटत हे..पण शांत बसायचं ठरवलंय मी..”

मग बाबाच्या घरात हे वरचेवर होऊ लागलं..आणि अण्णांची जगण्याची उमेदही कमी होऊ लागली.तसं बाबा काही खुप जगावेगळं करत नव्हता..पण अण्णांचं जग वेगळं होतं.. त्यांना हा सगळा अनर्थ वाटत होता.आपल्याला हे सगळं बघायला मिळेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं.रोजची पूजा करत होते..गुरुवारची आरतीही करत होते.. पेढ्याचा प्रसाद पण वाटत होते..पण ते कशातच नव्हते.कधी घरात असं काही शिजवलं जायचं तेव्हा अण्णा दत्ताच्या तसबीरीवर पंचा टाकुन फोटो झाकायचे.

एकदा काय झालं ..बाबानी धाडस केलं..चक्क घरात चिकन आणलं..त्याची बायको धास्तावली..

“अहो हे काय? अण्णांनी बघितलं तर काय म्हणतील?”

पण बाबापुढे तिचं काही चाललं नाही.बायकोच्या मदतीने त्यानी ती चिकन बनवली.डिशमध्ये घेऊन तो बाहेरच्या खोलीत आला.

समोर दत्ताची तसबीर होती..पंचा न टाकलेली.अण्णा कुठे तरी बाहेर गेल्यामुळे आज पंचा टाकलेला नव्हता..बाबा सहजच गमतीने म्हणाला..

“या दत्त महाराज..गरम गरम चिकन मसाला बनवलाय….बघा तर खरं एकदा टेस्ट “

आणि त्याच वेळी अण्णा बाहेरुन आत आले..त्यांनी हे ऐकलं.. आणि त्यांना राहवलं नाही..

“काय बोलतोयस तु? तुझं तुला तरी समजतंय का? आणि हे काय आता नवीनच?घर बाटवलंय या पोरानी”.

बाबा चपापला.. कुठुन हे असं बोलून बसलो असं त्याला झालं.

“अण्णा..अहो सहज आपली गंमत.. आणि काही नाही हो.. हल्ली सगळेच जण हे खातात”

“तुझी फारशी श्रध्दा नाही माहीतेय मला..पण बापाच्या भावना .. घराच्या परंपरा काही आहे की नाही?”

“अण्णा..अहो..”

अण्णा तिथे थांबलेच नाही.. आतल्या खोलीत निघून गेले.. त्या रात्री त्यांनी जेवणही केलं नाही.

पुढचा गुरुवार आला..

अण्णांच्या हातचा फुलांचा हार आज फोटोवर चढला नाही..

वर्षोनुवर्षे होणारी संध्याकाळची दत्ताची आरती पण त्या गुरुवारी झाली नाही..

आणि नेहमीप्रमाणे

“बाबा.. प्रसाद घे..”अशी हाकही आली नाही.

— समाप्त — 

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाबा – भाग-१ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाबा – भाग-१ ☆ श्री सुनील शिरवाडकर

मागे चार सिट बसले यांची बाबानं खात्री केली.. रिक्षात पुढच्या सीटवर तो बसला.. उजव्या बाजूला एकाला बसवलं.. डाव्या हाताने किकचा दांडा जोरात उचलला.. रिक्षाचं मशीन सुरू झालं.. थोडं सरकुन त्यानं जागा केली..

‌‌.. चल बस.. हा हात टाक मागुन.. म्हणत त्यानं डाव्या बाजूला अजुन एक सीट बसवलं.. आणि पहिला गीअर टाकुन एकदम धुराट निघाला.

बाबाच्या शालीमार ते नाशिकरोड स्टेशन अश्या रोज चार पाच चकरा व्हायच्या.. सकाळी सात वाजताच तो शालीमारला यायचा..

.. चले रोड ए का.. रोड ए का.. म्हणत सीट भरायचा. त्याच्या भाषेत शीटा. मी त्याला कॉलेजला असताना पासून ओळखतो. तो आमच्याच गल्लीत रहायचा. माझ्या पेक्षा चार पाच वर्षांनी मोठा.. पण त्याला ‘ए बाबा’ असंच म्हणायचो. आणि बाबाच्या मागे त्याचा उल्लेख बाबा रोड असं करायचो.. म्हणजे सगळेच जण तसं म्हणायचे. तो रोडच्या शीटा भरतो म्हणून हे नाव…. ‘ बाबा रोड. ’

रिक्षा बाबाची नव्हती.. मालक कुणी वेगळाच होता.. आणि हा मालक नेहमी बदलत जायचा.. कधी याची रिक्षा.. कधी त्याची. मालकाशी पटलं नाही की बाबा ती रिक्षा सोडुन द्यायचा.. आश्चर्य म्हणजे त्याला लगेचच दुसरी रिक्षा मिळायचीही.

स्वतःची रिक्षा घेण्याएवढी बाबाची परीस्थिती नव्हती. पण आहे त्यात बाबा सुखी होता. जेवढं‌ मिळायचं त्यात तो भागवायचा. त्याला बायको होती.. एक पोरगाही होता.. म्हातारे वडील होते. त्याच्या संसाराला लागेल तेवढं त्याला मिळायचं.. बाकी छानछौकी.. नशा पाणी करायला त्याच्या कडे पैसा नव्हताच…

त्याची चैन म्हणजे कधीतरी बाहेर गाडीवर अंडा भुर्जी पाव खाणं.. एवढंच.

बाबाच्या खिशात नेहमी चॉकलेट असायचे.. रिक्षात एखादं लहान मुलं बसलं की तो त्याला चॉकलेट द्यायचा.. एकदा त्यानं मलाही चॉकलेट दिलं.. मी काही लहान नव्हतो.. बाबाला म्हटलं..

‘अरे मला कशाला?’

‘घे रे.. तोंड गोड कर..’ 

तर असा हा बाबा रोड.. एकदा नेहमीप्रमाणे त्याचं रिक्षा मालकाशी भांडण झालं.. ते काम सुटलं.. पण महीना दोन महिने झाले.. दुसरी रीक्षा मिळेनाच.. जसे जसे दिवस जाऊ लागले.. तसा बाबा अस्वस्थ होऊ लागला.. पैसा तर लागतोच ना! आणि बाबाचं असं कितीसं सेव्हिंग असणार?दोन चार महिने पास केले.. मग पुढे?

मला हे समजलं.. आणि त्याच्या घरी जायचं ठरवलं. तसं मी जाऊन काहीच होणार नव्हतं, मी काही त्याला पैसे काढून देणार नव्हतो. पण तरी गेलो.

शालीमारवर ‘शिटा’ भरणारा बाबा आणि घरातला बाबा.. दोन्ही वेगळी रुपे होती. शालीमारवरचं वातावरणच वेगळं.. सगळे रिक्षावाले.. आजुबाजुला फेरीवाले.. त्यांची टपोरी भाषा.. बाबा जेव्हा त्यांच्यात असायचा तेव्हा त्यांच्यासारखाच असायचा.

बाबाच्या घरचं वातावरण एकदम वेगळं.. सोवळं ओवळं.. कर्मकांड.. सगळंच होतं. भद्रकाली मंदिराजवळ असणारं बाबाचं घर म्हणजे वाडाच होता.. वडिलोपार्जित. बाहेर छोटंसं अंगण.. आणि एक औदुंबराचं झाड. बाबाचे वडील दत्तभक्त.. आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो.

त्याच्या घरचं देवघर पण खुप मोठ्ठं होतं.

अण्णा रिटायर्ड होते.. एका दवाखान्यात औषधांच्या पुड्या बांधायचं काम करायचे ते.. आयुष्यभर त्यांनी तेच काम केलं. आता ते सत्तरीत होते.. त्यांनी पेन्शन बिन्शन नव्हती. त्यांना वाटायचं बाबानं शिकुन नोकरी करावी.. पण बाबाचं डोकं नव्हतं..

असाच कधीतरी वयाच्या विशीत मित्राच्या ओळखीने रीक्षा चालवायला लागला.. आणि मग तोच त्याचा व्यवसाय झाला.. पण दुसर्याची रिक्षा चालवण्यातच त्याचं आयुष्य चाललं होतं.. अजुन स्वत:ची रिक्षा त्यानं घेतली नव्हती.

मी बाबाच्या घरी गेलो तेव्हा अण्णांची आरती चालू होती.. माझ्या लक्षात आले.. आज गुरुवार.. दर गुरूवारी अण्णा संध्याकाळी दत्ताची आरती करायचे.. आणि आरती झाल्यावर हाक मारुन पेढ्याचा तुकडा सर्वांना द्यायचे.. सर्वांना म्हणजे जे काय दोन चार जण असतील त्यांना.. एका वाटीत मोजुन चार पेढे असत नैवेद्याचे. दत्ताचा चांगला मोठा फोटो होता त्यांच्या देवघरात. गुरुवारी त्याला चांगला मोठा हार घातलेला असायचा. अण्णा आपल्या हातांनी तो हार बनवायचे. बुधवारी संध्याकाळी फुल बाजारातुन ते फुलं आणत. कधी झेंडु, कधी शेवंती, उन्हाळ्यात मोगरा.. तुळशीचा वाटा.. रात्री जेवण व्हायच्या आधी ते हार करायला बसत. अख्खा पेपर पसरुन त्यावर फुलं ओतत.. बाजुला तुळशीचा वाटा. दोर्यात सुई ओवुन एक एक फुल ओवत. मध्ये वेगळ्या रंगाची फुले.. कधी तुळशीची डगळी.. हार झाल्यावर मग गोंडा.. तोही कधी तुळस गुंफलेला.. तो हार सकाळी पुजेच्या वेळीच घातला जायचा.. मोगर्याचा हार असला की दिवसभर घरात मंद दरवळ जाणवायचा. आत्ताही मी गेलो तर तोच परिचीत दरवळ जाणवला. आत गेलो.. ‘घालीन लोटांगण ‘ सुरु होतं.. थोड्या वेळात तेही झालं.. देवापुढे कापुरार्ती ठेवून अण्णा हात जोडून देवापुढे उभे राहिले.

“महाराज बघा.. तीन महिने झाले पोरगा काम शोधतोय.. काहीतरी करा.. त्याच्याकडे लक्ष असु द्या”.

ही त्यांची एक नेहमीची सवय.. देवाशी.. खासकरून दत्ताशी गप्पा मारायच्या.. तो समोर उभा आहे.. आपलं ऐकतो आहे हीच भावना असायची त्यांची..

अण्णांनी प्रसादाची वाटी उचलली.. पेढ्याचा अर्धा तुकडा करून माझ्या हातावर टेकवला..

“कुठे गेला बाबा?” मी विचारलं.

“असाच कुठेतरी गेलाय.. तिकडे कोणाची तरी रिक्षा आहे म्हणे. “

“खरंतर बाबानी आता स्वतः ची रिक्षा घ्यायला हवी.. “

मी असाच सहजच बोलून गेलो.. पण अण्णा त्याचीच वाट पहात होते जणु.. ते बोलतच सुटले. त्यांचंही हेच म्हणणं होतं.. आता बाबा चाळीशीत आला.. पोरगंही दोन वर्षांनी कॉलेजमध्ये जायला लागेल.. तो खर्च वाढेल. आत्ताच स्वतःची रिक्षा घेतली तरच होईल.

मलाही ते पटत होतं. दोन दिवसांनी मी बाबाला भेटलो.. त्याला समजावलं.. अण्णांनी त्यांचे साठवलेले थोडे पैसे दिले.. बाकी लोन केलं.. आणि एक दिवस बाबा स्वतःच्या रिक्षाचा मालक बनला.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बाबानी रिक्षा घरी आणली‌. रिक्षा घ्यायची ठरलं.. आणि मग अण्णांनी मला सांगितलं..

“बाबासोबत रहा.. ते लोन वगैरे करायचं.. कुठल्या बॅंकेचं करायचं.. सुरुवातीला किती पैसे भरायचे ते सगळं तु बघ. मी फक्त पैसे देतो.. बाकी गोष्टीत लक्ष घाल. मला तर त्यातलं काही समजत नाही.. बाबावर पण अशी लोनबीन घेण्याची वेळ कधीच आली नाही. “

लोनचे सगळे सोपस्कार पार पडून आज रिक्षा बाबाच्या वाड्या बाहेर उभी होती. पेढ्याचा बॉक्स.. हार.. फुलं सगळं आणलं होतं. हेमा वहीनींनी.. म्हणजे बाबाच्या बायकोनं रिक्षाचं औक्षण केलं.. पेढे वाटले.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – ३ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – २  ☆ डॉ. शैलजा करोडे

अभिनंदन ! अभिनंदन !!

कलावंत विचार मंचकमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात आपल्या समूहातील जेष्ठ साहित्यिका डॉ. शैलजा करोडे यांना “ कलावंत पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. शैलजाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

शैलजा करोडे यांची कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबर्‍या, चारोळीसंग्रह, भक्तीगीत संग्रह, ललितलेखन, संदर्भग्रंथ अशी 22 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.

आजच्या अंकात वाचूया “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ ही त्यांची कथा. (भाग तिसरा).

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा… भाग – ३ ☆

(“मी नीताला माहेरपणासाठी घेऊन जाते. तिथे करीन मी तिची ट्रीटमेंट” नीताची आई मीनाक्षी बोलत होती. नीताच्या सासूला तर ते हवंच होतं. आजारी सुनेची सेवा करणं तिला त्रासदायक वाटत होतं. “घेऊन जा तिला आणि चांगली बरी झाल्यावरच पाठवा“.– इथून पुढे – 

नीता आईबाबांकडे आली सगळी स्वप्ने, सगळी आकांक्षा गमावून. ती शून्यात दृष्टी लावून बसायची. ” नीता, चहा घेतला नाहीस तू अजून+. बघ गार झालाय. नवीन चहा करून आणू तुझ्यासाठी ” नीताकडून प्रतिसाद मिळाला नाही तशी आईने तिला हलविले. ” हं, काय, काय झालं आई ” ” बेटा तू चहा प्यायली नाहीस ” ” कशी पिणार ? मला काही आवडतच नाही “. ” असं म्हणून कसं चालेल बेटा. जीवन का कोणासाठी थांबलंय, आणि होय, खेळातला पहिला डावही आपण देवाला अर्पण करतो. मग आयुष्यातला का नाही ? झाडावर अनेक फळे येतात, पण ती सगळी काय खाण्यासाठीच उपयोगी येतात ? काहींचं वार्‍या वादळात, ऊन पावसात नुकसान होतंच ना ? परमेश्वर इतका निष्ठुर नाही, पुन्हा तुझी ओटी भरली जाईल. पुन्हा आनंदाची पावले घरात उमटतील. पण त्यासाठी तू हिंमत धरली पाहिजेस बेटा. असं रडत बसू नकोस, तर तनाने व मनानेही खंबीर हो. मग यश तुझंच आहे “आईच्या शब्दांनी नीतावर जणू जादूच केली. तापल्याने सुवर्ण उजळते तशी नीता या दुःखातून तावून सुलाखून निघाली ती नव्या उमेदीने, नव्या आशेने “

नीता घरी परतली. आता तिचा आत्मविश्वास बराच वाढला होता. अशोकशी तिचे खटके उडत होते, पण ती ही धैर्याने सामोरी जात होती. नीताच्या संसारवेलीवर पुन्हा फुलं उमलण्याची चिन्हे दिसू लागली. नीता स्वतः सुविद्य होती. स्वतःची काळजी घेण्याइतपत आत्मनिर्भर होती. ती स्वतःच सुरूवातीपारून डाॅक्टरांच्या देखरेखीखाली इलाज करवून घेऊ लागली. सातव्या महिन्यात नीता रीतिप्रमाणे माहेरी बाळंतपणासाठी आली. एका सुंदर गोंडस कन्येला तिने जन्म दिला. आई बाबांच्या चेहर्‍यावर हास्य उमललं. नीताच्या सासरी ही बातमी कळविण्यात आली. ती सगळी मंडळी येऊन गेली. मुलगीच असल्याने फारसं कोडकौतुक कोणी केलं नाही.

दोन महिन्यांनी सोनालीला घेऊन नीता घरी परतली. सासूनं तेवढ्यापुरतं स्वागत केलं. नीताला सगळीच घरकामं लगेच सोपविण्यात आली. नीता काम करीत असतांना सासूबाई तेवढा वेळ सोनालीला सांभाळायच्या. आपल्या सोनुलीच्या हास्यात बाललीलांमध्ये नीता रमायची, नव्हे तिच्यासाठी तर ते स्वर्गसुखचं होतं पण अशोक मात्र या स्वर्ग सुखात फारसा सामील कधी झालाच नाही. दिवसेंदिवस त्याची नवरेशाही, हक्क गाजवणं, त्याची क्रूरता वाढतच होती. भरीतभर त्याच्याच आँफिसातील शीतलशी त्याचे सूत हळूहळू जुळू लागले. नीताच्या कानावरही ही बातमी पोहोचलीच. ” कोण आहे ही शीतल ? काय संबंध तिचा तुमच्याशी ? माझ्या संसाराला आग लावणारी ही बया कोण ? ” ” मैत्रीण आहे ती माझी. मी तिच्याशी बोलतो. आम्ही एकत्र काम करतो. एकमेकांची सुखदुःख वाटून घेतो. कधी कधी मी तिला काही भेटवस्तूही देतो. एवढंच. “

” एवढंच ? ही गोष्ट एवढीशी आहे ?तोंड वर करून सांगतात पुन्हा ” ” तूच तर विचारलं म्हणून सांगितलं. मी कुठे तुला सांगणार होतो. आणि कां म्हणून सांगाव ? माझी मर्जी. “

” माझी मर्जी ? देवा ब्राम्हणांच्या साक्षीनं लग्न झालंय आमचं. पत्नी आहे मी, अर्धांगिनी तुमची. सुखदुःखात सोबत करण्याची वचने दिलीत आम्ही एकमेकांना. माझ्या अधिकारावर हक्क सांगणार्‍या, माझ्या जीवनात वादळ उठविणार्‍या या घटनेचा मी विचारही करू नये ?

” मग करीत बस ना विचार. तुला रोखलंय कोणी ? “

” ही गुर्मी ? ही मस्ती ? आतापर्यंत मी मुकाट्याने सगळं सहन केलं. आता नाही सहन करणार. तुम्हांला धडा शिकविल्याशिवाय मी गप्प राहणार नाही 

” तुझ्या पापाचा भरलाय घडा

तुला शिकवीन मी चांगलाच धडा “

जा. जा. तुला कोणी रोखणार नाही. जे. जे. करता येईल ते कर. गो नाऊ. गुडबाय. ” अशोकचे शब्द उकळत्या तेलाप्रमाणे नीताच्या कानात शिरत होते.

नीता माहेरी परतली एखाद्या जखमी हरिणीप्रमाणे. आईवडिलही एकुलत्या एक मुलीची वेदना पाहून तळमळत होते.

नीताच्या बाबांनी शहरातील नामांकित वकीलाचा सल्ला घेतला. मानसिक व शारीरिक छळासाठी अशोकवर भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 498A खाली गुन्हा नोंदविण्यात आला. त्याचे आईवडिलही त्यात सामील होते. तसेच कौटुंबिक हिंसाचार अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांची वरात पोलीस स्टेशनात पोहोचली. नाही म्हटलं तरी अशोकची बदनामी बरीच झाली. वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यानं स्वतःची सुटका करवून घेतली.

कोर्टात केस उभी राहिली, पण नीताकडे पुरेसे पुरावे नव्हते. आईवडिलांना तिने सगळ्या गोष्टी फोनवरूनच सांगितल्या होत्या. लेखी पुरावा कोणता नव्हता. शेजारी साक्ष देण्यास तयार नव्हते. अशोक निर्दोष सुटला. युद्धाला आता तोंड फुटले होते. नीताने पोटगीसाठी कोर्टात दावा दाखल केला. आणि अशोकने सहा महिने विभक्त राहिल्याने घटस्फोटासाठीचा दावा दाखल केला.

नीता अशोकची क्रूरता सिद्ध करू शकली नाही. त्याने तिचा भरपूर मानसिक व शारीरिक छळ केला होता, पण पुराव्याअभावी नीता काहीही सिद्ध करू शकली नाही. ” मला मारहाण होत होती. दरवाजे उघडे ठेवून किंवा शेजार्‍यांना बोलावून तर कोणी मारणार नाही ना ?”

“ठीक आहे मॅडम, ग्राह्य धरु तुमचं म्हणणं. घरात नोकर/चाकर तर होते. त्यांनी तर काही तुमच्या बाजूने साक्ष दिली नाही. ” ” ती माणसे अशोकची आहेत सर. त्यांच्या विरोधात ते साक्ष देतीलच कसे ?” ” साॅरी मॅडम, न्यायदेवता आंधळी आहे. पुरावे हवेत. आणि स्वतःचं म्हणणं केवळ तुम्हीच पटवून देणं कितपत योग्य ? वास्तविकतेसाठी, डोळसपणे विचार करण्यासाठी कायद्याला हवेत पुरावे. तुम्ही तुमची कैफियत मांडलीत पण सिद्ध करू शकल्या नाहीत म्हणून हे कोर्ट अशोकचा डिव्होर्सचा अर्ज मान्य करीत आहे. सोनालीवर हक्क नीताचाच राहिल. अशोकला मात्र पिता म्हणून भेटण्याची परवानगी हे कोर्ट देत आहे.

नीतावर तर हा वज्राघातच होता. पण यातूनही तिला सावरायचे होते ते सोनालीसाठी. कोर्ट कचेरी, भांडणतंटा यातच बारा वर्षाचा कालावधी निघून गेला होता. नीताने आता नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. डिव्होर्सी असल्याकारणाने तिला वयोमर्यादेत जवळजवळ नऊ वर्षाची सूट मिळणार होती. नीताला याचा फायदा झाला व तिचे इंडियन ओवरसीज बँकेत सिलेक्शन झाले. नीता स्वतःच्या घट्ट पोलादी पायांवर भक्कमपणे उभी राहिली.

सोनालीचे हे दहावीचे वर्ष होते. आता ती सोळा वर्षाची होती. पित्याला भेटण्यास ती अनुत्सुक असायची. ” मम्मी मी अठरा वर्षांची पूर्ण झाल्यावर मी स्वतःच माझ्या जीवाची मालकीण होणार ना ? कसा काय सांगणार माझा बाप माझ्यावर हक्क् ? मी नाकारेन त्याला. ” नीताने सोनालीला ह्रदयाशी घट्ट कवटाळले. ” खूप मोठी झालीय माझी सोनू “.

लग्नाघरची वर्दळ वाढली होती. वरातीचा घोडा, सुगंधी द्रव्ये, अक्षता, नवीन कपड्यांची सळसळ वाढली होती. आज सोनाली लग्नाच्या बोहल्यावर चढली होती. लग्नघटिका भरली तशी वाजंत्रीने जोरदार दणक्यात वादन सुरू केले. फटाक्यांची आतिषबाजी सूरू झाली. देवा ब्राम्हणांच्या साक्षीनं सोनालीनं प्रकाशला वरमाला घातली. कन्यादानासाठी मुलीच्या आईवडिलांनी यावे. ” थांबा गुरूजी, कन्यादान करीन माझी माता. आयुष्यभर तिनंच तर केलं सगळं माझं. मला वाढविलं, संस्कार दिले आणि आज लग्नही. माझी आईच माझा पिता आणि माता आहे. माझ्या पित्याचा काय यात सहभाग ? काय अधिकार त्यांना माझ्या कन्यादानाचा. नकोय मला त्यांचा सहभाग. ” पुढे सरसावलेला अशोक आपोआपच माघारी वळला. जीवनात काय गमावलं याची जाणीव आता त्याला झाली होती पण उशीर झाला होता. वेळ निघून गेली होती. प्रायश्चिप्त करायलाही वेळ नव्हता. आज सोनालीने त्याला चांगलाच धडा शिकविला होता. डोळ्यातील आसवे पापण्यांच्या गजाआड रोखत अशोक लग्नमंडपातून बाहेर पडला होता.

– समाप्त –

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – २  ☆ डॉ. शैलजा करोडे

अभिनंदन ! अभिनंदन !!

कलावंत विचार मंचकमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात आपल्या समूहातील जेष्ठ साहित्यिका डॉ. शैलजा करोडे यांना “ कलावंत पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. शैलजाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

शैलजा करोडे यांची कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबर्‍या, चारोळीसंग्रह, भक्तीगीत संग्रह, ललितलेखन, संदर्भग्रंथ अशी 22 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.

आजच्या अंकात वाचूया “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ ही त्यांची कथा. (भाग दुसरा).

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा… भाग – २  ☆

(नीताचे फायनल इयर होते. परीक्षा होती म्हणून ती माहेरपणाला आलेली ” काय गं नीता, अशी मलूल का दिसतेस ? तुझ्या सासरी सगळं व्यवस्थित आहे ना ?” आईच्या प्रेमळ शब्दांनी नीताच्या संयमाचा बांध फुटला होता.) – इथून

” उगी उगी बाळ, रडू नकोस. काय झालंय ते मला व्यवस्थित सांग ” नीताने सगळी हकीकत सांगितली.

” बेटा, जीवन हे असेच असते. घर, कुटुंब आम्हां स्त्रियांनाचं सांभाळावं लागतं प्रसंगी नवर्‍याची नवरेशाही ही खपवून घ्यावी लागते. आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी, माहेरच्या घराण्याचंही नाव उज्वल करण्यासाठी स्त्रियांना हे हलाहल प्राशन करावंच लागतं बाई. पण तू घाबरू नकोस. एखादं मूलबाळ होऊ दे. तुझा त्रास बराच कमी होईल कारण मूल हे आईवडिलांना जोडणारा एक भक्कम दुवा असतो. पोरी सर्व ठीक होईल. अशोक तर चांगला वागतो ना तुझ्याशी “

” नाही आई, खरं दुखणं तिथेच आहे. अशोकला दारूचं व्यसन आहे आई. कामानिमित्त मित्रांसोबत घ्यावं लागत हे त्याचं सांगणं, ” इट इज अ सोशल ड्रिंक, मी जर मित्रांसोबत प्यायलो नाही तर माझा त्यांच्याशी संपर्क तुटेल व पर्यायाने माझ्या कामावर, माझ्या बिझनेसवर परिणाम होईल. आपल्या कंपनीच्या भरभराटीसाठी मला हे करावंच लागणार हे तो ठासून सांगतो “. ” असेलही बाई तसं. पण तुला तर तो त्रास देत नाही ना ? ” आई कसं सांगू तुला. रात्री अपरात्री त्याचं येणं. दारूचा तो उग्र दर्प आणि अशा अवस्थेत त्याची पत्नीसुखाची अपेक्षा. किळस येते मला या सर्व गोष्टींची.

नीताची आईसुद्धा मुळापासून हादरली. नीताच्या वडिलांच्या कानावर तिने ही गोष्ट घातली. ” अहो फसवणूक झालीय आपली. आपण चौकशीही नीट केली नाही. मुलाचं शिक्षण, नोकरी, कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली आपण, पण ही चौकशी नाही केली. फुलासारखी कोमल माझी नीता. कसं होणार हो तिचं ? ” शांत हो मीनाक्षी. जे घडतंय ते विपरीतच आहे. पण हा प्रसंग संयमानं हाताळायला हवा आम्हांला. नीताला मजबूत बनवा तुम्ही. सबुरीनं घेण्याचा सल्लाही द्या, आणि होय एखादं मूल झालं कि कमी होईल निश्चितपणे तिचा त्रास. “

नीताच्या बि. काॅम फायनल इयरचा निकाल लागला. नीता विद्यापीठात प्रथम आली होती. तिला सुवर्णपदक ही मिळाले आणि या आनंदात आणखी एक आनंदाची बातमीही तिच्या जीवनात आली. नीताला कडक डोहाळे लागले. पाणीही पचेनासे झाले.

” मीनाक्षी मी सांगितलं होतं ना सगळं चांगलं होईल. नीता अशोकमधला दुरावा आता नक्कीच कमी होईल. कुटुंबाची जवाबदारी वाढल्यानं त्याचंही व्यसन कमी होईल. घराची ओढ वाढेल. येणारं हे मूल त्यांच्यातील हा सेतुबंध नक्कीच घट्ट करील. आता तुम्ही आजीबाई होणार. सगळी तयारी आतापासून करायला हवी. ” ” होय आजोबा, मी तर करीनच सगळी तयारी, तुम्हीही हातभार लावा ” ” नक्कीच लावणार. प्रमोशन होणार आहे माझं. मी आजोबा होणार. इवलं इवलं नातवंडं घरात येणार. त्याच्या बोबड्या बोलांनी घरात मधुर वातावरण निर्माण होणार, त्यासाठी मी मदत केलीच पाहिजे. काय पाहिजे तुला, सगळी यादीच करून दे मला. आणून देतो सगळं.

” आतापासून नको काही आणायला. अपशकून असतो तो. बाळ जन्मल्यावरच करा तुम्ही सगळी धावपळ ” म्हणत मीनाक्षी खळखळून हसली.

नव्या जीवाच्या चाहुलीनं नीता मनोमन खूष झाली होती. अंगोपांगी बहरली होती. आपल्या शरीरात एक अंश जोपासत होती. ” खरंच सगळं चांगलं होईल, माझे दिवस बदलतील ” नीताचा आत्मविश्वास वाढला होता. पण स्वप्नरंजन आणि वास्तवस्थितीत फरक असतोच. अशोकची सुधारण्याची चिन्हे दिसेनात. आता तर तो नीताचा मानसिक छळ तर करीत होताच पण शारीरिक हिंसाचारावरही तो उतरला होता. ” काय चुकलं हो माझं ? कां म्हणून तुम्ही असे वागता माझ्याशी ? तुमची सेवा करते. तुमच्या आईवडिलांची सेवा करते ” ” मग उपकार करतेस कि काय आमच्यावर. सुनेचं कर्तव्यच असतं ते. ” ” मी तर माझं कर्तव्य करतेच हो. पण तुम्ही मात्र तुमचं कर्तव्य विसरत आहात. घरात नवीन पाहुणा येणार आहे. मला खूप शारीरिक थकवा वाटतो. काही खावसं वाटत नाही. अन्न पचत नाही. पण तुम्ही डाॅक्टरांकडे नेणं तर सोडाच साधी माझी मनधरणीही करीत नाहीत ” ” आम्ही तुझी काळजी घेत नाही हे कसं काय म्हणू शकते तू ?” ” कसं काय म्हणजे ? खरं तेच तर सांगितलंय. ” ” थोबाडं फोडून टाकीन पुन्हा वर तोंड करून बोलशील तर ” म्हणत अशोकने एक सणसणीत तिच्या गालावर ठेवूनच दिली. नीता कोलमडली. बाजूच्या सोफासेटचा तिनं आधार घेतला म्हणून बचावली, नाहीतर खालीच कोसळली असती. अशोक तडक खोलीतून निघून गेला. नीता मुसमुसत राहिली.

अशोकचं नीताचा छळ करणं चालूच होतं. त्याचे आईवडिलही त्याचीच री ओढायचे. अशा स्थितीत नीतानं करावं तरी काय ? आईवडिलांना किती टेन्शन देणार. याचा व्हायचा तोच परिणाम झालाच. शारीरिक आणि मानसिक छळापायी एक दिवस नीताच्या पोटात तीव्र वेदना उठल्या. नीता धाय मोकलून रडू लागली तेव्हा तिच्या सासूबाईनं तिला दवाखान्यात नेलं. नीताचा रक्तस्त्राव सुरू झाला होता आणि रक्ताच्या या प्रवाहात तो मांसल गोळाही केव्हाच निसटला होता.

” किती उशीर केलात तुम्ही ? आणि मुलगी गरोदर असतांना डाॅक्टरांचा सल्ला घेणं, नियमित गर्भाची तपासणी करणं, त्याची वाढ योग्य दिशेनं होतेय कि नाही हे पाहाणं, आईच्या शरीरात काही कमतरता असेल तर त्याची भरपाई करणं आणि जोडीला औषधांची मदत घेणं, हे तुम्हांला माहित नाही काय ?तुम्ही तर मोठ्या आहात ना घरातील, दोन मुलांच्या आई. मग सुनेकडे लक्ष देऊ नये ? आता नुकसान कोणाचं झालं ? तुमच्याच वंशाचा अंश होता ना तिच्या पोटात. जन्माला येणारा जीव जन्माआधीच गेला की निघून “.

नर्स पेशंटला आँपरेशन थिएटरमध्ये घ्या. अँनेस्थेशियासाठी डाॅ. विमलला फोन करा. गर्भाचं सॅक काढावं लागेल. पोटातील सफाई व्यवस्थित करावी लागेल. जा लवकर कर सगळं “. म्हणत डाॅ. शुभाने नर्स मीराला पाठविले.

नीताच्या दुःखाला पारावार नव्हता. जन्माआधीच तिच्या पोटातील नवांकुर निघून गेला होता. रिते पोट, रिते शरीर, रिते मन घेऊन नीता घरी परतली ती जणू दुखणं घेऊनच. तिला जेवण आवडत नव्हते. पोटात अन्न नसल्याने सारखे चक्कर येत असत.

” मी नीताला माहेरपणासाठी घेऊन जाते. तिथे करीन मी तिची ट्रीटमेंट ” नीताची आई मीनाक्षी बोलत होती. नीताच्या सासूला तर ते हवंच होतं. आजारी सुनेची सेवा करणं तिला त्रासदायक वाटत होतं. ” घेऊन जा तिला आणि चांगली बरी झाल्यावरच पाठवा “.

— क्रमशः भाग दुसरा

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे

अभिनंदन ! अभिनंदन !!

कलावंत विचार मंचकमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात आपल्या समूहातील जेष्ठ साहित्यिका डॉ. शैलजा करोडे यांना “ कलावंत पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. शैलजाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

शैलजा करोडे यांची कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबर्‍या, चारोळीसंग्रह, भक्तीगीत संग्रह, ललितलेखन, संदर्भग्रंथ अशी 22 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.

आजच्या अंकात वाचूया “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ ही त्यांची कथा. (भाग पहिला).

☆ तुला शिकवीन चांगलाच धडा… भाग – १  ☆

“काय करताय तुम्ही. पेपर काय वाचनासाठी घेतला. मी बसलेय इथे एकटी. सोडा तो पेपर आधी. चला गप्पा करूयात आपण ” ” घे बाई नीता, ठेवला पेपर. या क्लिअरींग हाऊसमध्ये विशेषतः दुपारच्या वेळी फार कंटाळा येतो. पेनड्राइव्ह आणि शीट मिळेपर्यंतचा वेटिंग पीरेड फारच कंटाळवाणा होतो. टाईमपास म्हणून वर्तमान पेपर आणलं होतं. सकाळी कामाच्या घाईगर्दीत संपादकीय किंवा इतर महत्वाच्या बातम्या बारकाईने वाचल्या जात नाहीत. म्हटलं चला तेवढा वेळ सत्कारणी लागेल. बोल काय म्हणतेस ” ” काही नाही ” इतक्यात नीताच्या Face book वर मेसेज आला. ” बघा मॅडम फेसबुक वर किती छान चित्र अपलोड केलंय. एक गाय तोंडाने बोअरवेलचा दांडा उंच करीत होती. , त्यातून जी पाण्याची धार मिळत होती, लगेच ग्रहण करीत होती.. पुन्हा दांडा वर करणे, नळातून पाणी येणे आणि तिने ते प्राशन करणे, हा तिचा संघर्ष व्यवस्थित चित्रीत केलेला होता. ” होय गं बाई, मुक्या जनावरांनाही पाण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो आणि ते ही कसे यातून मार्ग काढतात. सिंपली मार्व्हलस ” मी प्रतिक्रिया दिली. आणखी बघा किती नवीन नवीन, सामान्य ज्ञानावर आधारीत माहिती ही मिळते. या माध्यमातून अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंतची माहिती तर मिळतेच पण या तंत्र ज्ञानाने जग जवळ करण्याची किमया ही साधलीय. आमच्या व्हाॅटस् अँप अँप्लिकेशनवर आम्हां मैत्रीणींचा बराच मोठा ग्रुप आहे. माझ्या वहिनी, मामे वहिनी, इतर नातेवाईक, फुरसतीच्या वेळी आमच्या मग गप्पा रंगतात या माध्यमातून. भाच्यांचे फोटो पाहाणे, लहान मुलांच्याही गप्पा सुरू होतात आणि एकमेकांना भेटल्याचा आनंद होतो. ” ” होय नीता, मोबाईल, फेसबुक, व्हाॅटस् अप मुळे जग खरंच जवळ आलंय. एकमेकांशी संपर्क वाढलाय. जनजागृती, विचारजागृती वाढलीय. आता बघ ना 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकांचंच उदाहरण घेऊ या. पाचही चरणातील मतदानात प्रत्येक राज्याची टक्केवारी वाढलेली दिसतेय. लोकांना मतदानाचं महत्व पटू लागलेलं दिसतंय. मतदान केल्यास आपल्याला पाहिजे ते सरकार निवडून देऊ शकतो याची जाणीव लोकांमध्ये झाली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या या माध्यमांनी हे काम चोखपणे केलं आहे. ” ” होय मॅडम, बरोबर बोलताय तुम्ही ” इतक्यात नीताच्या मोबाईलचा रिंगटोन वाजला. “होय आई, तू चहा ठेवून दे. मी येतेय दहा मिनिटात. चहा घेतला कि लगेच आँफिसात जाईन ” एव्हढ्यात प्रकाशने पेनड्राइव्ह व शीटचे वाटप केले. नीता व मी बोलत बोलत क्लिअरींग हाऊसच्या बाहेर पडलो ” चला ना तुम्हीही माझ्या घरी. चहा घेऊ आणि लगेच या तुम्ही ” ” अगं नीता मला स्टेट बँकेत टी. टी. घेऊन जायचीय. वेळ थोडासाच शिल्लक आहे. अगदी डाॅट साडेचार वाजता RTGS स्विकारणं बंद करतात ती माणसे. ओ के. बाय, भेटू पुन्हा ” मी माझ्या आँफीसकडे वळले.

नीता गौरवर्णी, मध्यम बांधा, भावपूर्ण बोलके डोळे, काळ्याभोर केसांचा पोनीटेल वळलेला, मॅचिंग ड्रेसवर तशीच टिकली, बांगडी, केसांचा बो सुद्धा त्याच कलरचा, परफेक्ट मॅचिंग सांभाळणारी, हसरी, बोलकी, कोणालाही आपलंस करून घेणारी, वयाची पस्तीशी ओलांडून चाळिशीकडे झुकलेली एक मध्यमवयीन यौवना होती. तिने समाशोधन गृहात ( क्लिअरींग हाऊस ) पाऊल ठेवलं कि चैतन्याला उधाण यायचं. क्लिअरींग हाऊसमध्ये इतर बँकांचे प्रतिनिधीही गप्पांमध्ये सामील होतं. त्यांच्या छेडछाडीला नीताही तेवढ्याच खेळकरपणे उत्तरे द्यायची. हास्याचे फवारे उडायचे. आणि बेरीज वजाबाकीच्या, आकडेमोडीच्या आमच्या कामातही एक चैतन्य, एक उभारी जाणवायची. “

” काय गं नीता, आज थकल्यासारखी दिसतेस. बरं नाही का तुला ?” ” नाही मॅडम, बरं आहे मला. प्रियंकाची परीक्षा सुरू आहे. रात्री थोडावेळ तिचा अभ्यास घेते. माझ्या मोलकरणीचा हात मोडलाय म्हणून सुटी घेतली आहे तिने. घरातील सगळी कामे करतांना दमछाक होते माझी त्यामुळे शारीरिक थकवा जाणवतोय. आई नासिकला भावाकडे गेली आहे, वहिनीचा पाय मोडलाय म्हणून. घरी मी आणि प्रियंकाच आहोत. परवा बाबा येतील आमच्या मदतीला. तोपर्यंत ओढाताण आहे ” ” अगं मग रजा टाकायची ना दोन दिवस. कशाला ताण करून घेतेस. ” मॅडम, वर्षभरात लग्न, सण, समारंभ, दुखणी खुपणी यातही बर्‍याच रजा जातात म्हणून या कामासाठी मी काही रजा घेतली नाही ” ” ओ. के. काळजी घे स्वतःची. नेहमी हसरी बोलकी तू आज एकदम गप्प वाटलीस म्हणून बोलले मी. खरच जीवनातील एवढे कटु अनुभव, कठीण समरप्रसंग झेलून तू हसत खेळत राहातेस ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. आपले दुःख कुरवाळत न बसता त्याला सामोरं जाणं हे तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे. खरंच सर्व महिलांसाठी तू एक उत्तम उदाहरण आहेस. अभिमान वाटतो तुझा मला.

” काय करता मॅडम, जीवन मोठं क्षणभंगूर असतं आला क्षण आपला म्हणायचा आणि साजरा करायचा, हे तत्वज्ञान शिकवलंय आईने मला तिची सोबत नसती तर केव्हाच कोलमडून पडले असते मी ” ” खरंय, खरंय तुझं म्हणणं ” बोलत बोलत मी ही माझ्या आँफीसकडे वळले.

नीता इंडियन ओव्हरसीज बँकेची कर्मचारी तर मी पंजाब नॅशनल बंकेची कर्मचारी. शहरातील समाशोधन गृहात कामाच्या निमित्ताने आमच्या भेटी होत. या भेटीतूनच मैत्रीचे दृढ नाते निर्माण होत गेले.

नीताच्या घरी आई आणि तिची मुलगी प्रियंका. ः भाऊ व वहिनी नासिकला. त्यांना दोन मुले,. मुले सांभाळण्यासाठी तिचे बाबा नासिकला राहात. बाबा भावाकडे तर आई नीताकडे अशी वाटणी झालेली.

वयाच्या अठरा/एकोणीसाव्या वर्षीचं नीताचं लग्न झालेलं. मुलगा चांगला शिकलेला उच्चपदस्थ अधिकारी. सांगून स्थळ आलेलं. नीताचंही बि. काँम च शिक्षण चालू होतं. मुलाच्या घरी आईवडिल एक लहान बहीण. कुठे कमतरता भासावी असे स्थळ नव्हतेच मुळी. लग्नाची बोलणी झाली आणि एका शुभमुहूर्तावर नीताने अशोकच्या जीवनात प्रवेश केला. एकुलती एक कन्या असल्याने नीताच्या वडिलांनीही सढळ हस्ते खर्च केला होता.

नव्या नवलाईचे नऊ दिवस. नवीन सुनेचे कोडकौतुक धार्मिक सण, समारंभ, देवी देवतांना नवपरिणीत जोडप्याची हजेरी, यात महिना केव्हा गेला कळलेही नाही. नव जीवनाची सोनेरी स्वप्ने सजविण्यात रममाण नीतावर मात्र कुटुंबातून बरीच बंधने येऊ लागली. सुनेने घरातील सर्व कामे लवकर उठून करावीत, नवर्‍याला हवं नको ते पहावं, सासू सासर्‍यांची सेवा, जेवणासाठी नवर्‍याची वाट पाहात थांबणं, याबरोबरच तिने शेजारी पाजारी कोणाशी बोलू नये. घरी कोणी नवीन सुनेसाठी आले तर तेवढ्यापुरते बोलून तिने तेथून निघून जावे. असे दंडक तिला घालून देण्यात आले.

नवीन घर, नवीन माणसे, आता आपण माहेरी नव्हे तर सासरी आहोत. माहेरपणाचे स्वातंत्र्य इथे कसे मिळणार ?अशी मनाची समजूत घालून नीता जीवन व्यतित करीत राहिली.

नीताचे फायनल इयर होते. परीक्षा होती म्हणून ती माहेरपणाला आलेली ” काय गं नीता, अशी मलूल का दिसतेस ? तुझ्या सासरी सगळं व्यवस्थित आहे ना ?” आईच्या प्रेमळ शब्दांनी नीताच्या संयमाचा बांध फुटला होता.

क्रमशः भाग पहिला

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares