मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कूपमंडूक… — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ कूपमंडूक— भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आज किती वर्षांनी साधना भारतात आली होती. तिची नोकरी, अभयचा बिझनेस मुलांची करिअर्स यात तिला भारतात यायला वेळच व्हायचा नाही. आली तरी तीन आठवड्याची सुट्टी घेऊन धावतपळत येणं व्हायचं त्यांचं. आजसुद्धा एका मीटिंग साठी ती आठवडाभर आली होती.

साधना मुंबईच्या लहान चाळीत राहिलेली मुलगी. अतिशय सामान्य परिस्थिति आणि वडिलांची साधीशी नोकरी. सुधीर आणि साधना ही दोन भावंडं. ती मात्र उपजतच हुशारी घेऊन आली होती. वडील म्हणायचे, ‘ माझी ही मुलं म्हणजेच माझी संपत्ती. ती बघा आपलं घर कसं वर आणतील ते. ’ भाऊंनी मुलांना काही कमी केलं नाही. होत्या त्या परिस्थितीत सगळं शक्य ते त्यांना मिळेल असं बघितलं. मुलं मोठी गुणी होती भाऊंची.

चाळीत साधनाच्या खूप मैत्रिणी होत्या. सगळ्याच बेताच्या परिस्थितीतल्या. अंजू माधुरी कला सगळ्या मराठी शाळेत साधनाच्याच वर्गातल्या. त्यातल्या त्यात वेगळी होती ती अय्यर मावशीची रेणुका. साधनाच्या बरोबरीने पहिल्या दोन नंबरात असायची रेणुका. तिच्याशी फार पटायचं साधनाचं. अशीच बेताबाताची परिस्थिति पण जिद्द विलक्षण. साधनाला म्हणायची, “आपण दोघी खूप शिकू, मोठ्या होऊ हं साधना. इथेच असं चाळीत आयुष्य नाही काढायचं आपण. ” 

बघता बघता वर्षे उलटली. चाळ पडायला आली म्हणून बहुतेक लोकांनी दुसरीकडे उपनगरात घरे घेतली. साधना कॉलेजनंतर चाळीतल्या मैत्रिणींच्या फारशी संपर्कात राहिली नाही. तिने आपले जर्मन भाषेचे पीएचडी पूर्ण केले आणि तिला जर्मनीला युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली होती ती पोटापुरती तुटपुंजीच.. पण साधनाने ती घेऊन पुढे शिकायचे ठरवले.

…. सोपी नव्हती ही वाट. पण साधनाने आपलं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. ती जर्मनीला गेली. तिला तिकडचे पीएचडी करावे लागणार होते, त्याशिवाय जॉब मिळणार नव्हता. मिळणाऱ्या तुटपुंज्या स्कॉलरशिपवर भागवायचे होते आता.

तिकडे गेल्यावर मात्र गोष्टी थोड्या सोप्या झाल्या तिला. एजंटने तिला युनिव्हर्सिटी जवळ छानसा फ्लॅट भाड्याने बघून दिला. बघता बघता साधना तिकडे रुळून गेली.

एक दिवस मार्केटमध्ये खरेदी करत असताना अचानक मागून शब्द आले. ”तुम्ही भारतातून आलात का?”

अस्खलित जर्मन भाषेतून आलेले शब्द ऐकून ती मागे वळली. मागे एक भारतीय तरुण हसतमुखाने उभा होता. “हॅलो, मी अभय चितळे. इथे जर्मन कौंसुलेट मध्ये काम करतो. तुम्ही?”

“ मी साधना. युनिव्हर्सिटीत शिकवते. ”

कॉफी पिताना त्यांच्या बऱ्याच गप्पा झाल्या आणि ती भेट संपली ते पुन्हा भेटायचं ठरवूनच.

साधनाला आपल्या शहरातला मुलगा भेटल्याचा फार आनंद झाला. अतिशय एकाकी असलेल्या आणि आपलं कोणी नसलेल्या देशात साधनाला किती जड जात होतं आयुष्य जगणं.

अचानक अभय तिला भेटला आणि जणू सुखाचं दारच उघडलं गेलं तिच्या जीवनात. भेटी गाठी होत राहिल्या आणि मुंबईला येऊन दोघांनी आईवडिलांच्या संमतीने लग्न केलं. दोन्ही घरी आनंदच झाला हा निर्णय ऐकून. लग्न होऊन दोघंही परत जर्मनीला गेले.

बरीच वर्षे झाली आणि त्यांच्या भारताच्या भेटी कमीच होऊ लागल्या. मुलं तर पूर्ण जर्मन. घरी मराठी बोलत पण केवळ नावाला ती भारतीय होती. बाकी पूर्ण जर्मनच. तिथेच जन्मलेली आणि वाढलेली..

…. नेहमीचीच कहाणी.

साधनाचे आईभाऊ, अभयचे आईवडील अनेकवेळा जर्मनीला येऊन लेकीचा मुलाचा सुखी संसार, गोड नातवंडांना भेटून गेले. आता खूप मोठं छान घर घेतलं अभय साधनाने. त्यांनी जर्मन नागरिकत्व स्वीकारलं.

एका महत्त्वाच्या कॉन्फरन्ससाठी अचानकच साधनाला मुंबईला यावं लागलं. चार दिवस कॉन्फरन्स होती. शेवटचा दिवस झाला की साधना आपल्या आईकडे जाणार होती.

खूप थकली होती आई. भाऊ तर जाऊन बरीच वर्षे झाली. पण सुधीर आणि त्याची बायको आईला अगदी छान संभाळत. कधी कधी साधनाला वाईट वाटायचं, मुलगी म्हणून आपला आईभाऊंना काही उपयोग झाला नाही. लांबलांबच राहिलो आपण. पण त्यांना जमेल तितक्या वेळा तिने अपूर्वाईने जर्मनीला नेऊन आणले होते.

आज मध्ये बराच वेळ होता म्हणून ती मॉलमध्ये गेली. सहज चक्कर मारायला. विंडो शॉपिंग करत असताना आवाज आला ”, तुम्ही पूर्वीच्या साधना आगाशे का?”

चमकून मागे बघितलं साधनाने. बराच वेळ निरखून बघितल्यावर तिला ओळख पटली. “अग, माधुरी ना तू?” माधुरी हसत म्हणाली “ हो. नशीब ओळखलंस मला. चल, तिकडे कॉफी पिऊया. ”

साधनाला अतिशय आनंद झाला या भेटीचा. माधुरी म्हणाली “, किती दिवस आहेस ग तू? आम्ही भेटतो जुन्या मैत्रिणी. आठवतात का अंजू कला रेणुका? “

आनंदाने साधना म्हणाली “ हो तर. न आठवायला काय झालं? मग आपण भेटूया ना. मी तीन दिवस आहे इथे अजून. या समोरच्या हॉटेलमध्ये उतरलेय. ”

माधुरीने ते हॉटेल बघितलं. , “ वावा. फाईव्ह स्टार हॉटेल?मजा आहे बाई तुझी. आमच्या कुठलं नशिबात इथे रहाणं?”

साधनाने निरखून माधुरीकडे बघितलं. अंगावर अगदी साधी साडी, केस पिकलेले, गळ्यात साधं मंगळसूत्र. हातात साधी जुनाट पर्स. परिस्थिती बेताची दिसत होती तिची. ते हॉटेल बघून डोळे लकाकलेले दिसले तिचे साधनाला.

“ काय करतेस तू माधुरी?” 

“ अग, मी एका शाळेत नोकरी करते. एसेसीनंतर केलं डीएड. काय करणार?पटकन पायावर उभं रहायला हवं होतं मला. मग लग्न झालं. हेही कॉर्पोरेशन मध्ये जॉब करतात. कला खाजगी नोकरी करते आणि अंजू मात्र कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. तुला भेटायचं आहे का सगळ्याना?”

“ हो तर.. माधुरी अगं कित्ती वर्षांनी भेटणार आहोत आपण. तुमच्या एखादीच्या घरीच भेटूया ना, म्हणजे मस्त गप्पा होतील आणि निवांत भेटता येईल”.

माधुरीचा चेहरा पडला.

“ नको ग. आम्ही या तुझ्या हॉटेलपासून खूप लांब रहातो. आम्हीच येतो उद्या इकडे अकरा वाजता. इथेच मस्त जेवूया भेटूया. रेणुका अय्यर आठवते ना? ती मात्र खूप शिकली आणि मंत्रालयात मोठ्या पोस्टवर आहे म्हणे. ती नसते फारशी आमच्या संपर्कात. पण बघते. बोलावते तिलाही येत असली तर. ”

साधनाकडून तिचा मोबाईल नंबर घेऊन माधुरी उठलीच. साधनाने बघितलं तर बसच्या क्यू मध्ये उभी राहिलेली दिसली तिला माधुरी.

साधना हॉटेलवर आली. रात्री अभय, मुलं यांच्याशी गप्पा मारल्या आणि फक्त ज्यूस घेऊन साधना झोपलीच. अकरा वाजता तिला रिसेप्शनवरून कॉल आला, “ मॅडम, तुमच्याकडे गेस्टस आल्या आहेत. खाली येता का?” 

“ आलेच. त्यांना बसवून ठेवा. “ साधना आवरून पटकन खाली आली.

रिसेप्शनमध्ये तिला दिसल्या अंजू कला, माधुरी. जरा त्यांच्यापासून लांब बसलेली बाई होती रेणुका अय्यर. किती वेगळी आणि छान दिसत होती रेणुका. बगळ्यात राजहंस जसा. सुरेख प्युअर सिल्कची साडी, लेदरची भारी पर्स आणि महागडे घड्याळ. मंद हसत रेणुका पुढे झाली आणि म्हणाली,

“ साधना, कित्ती वर्षांनी ग. ” तिने प्रेमाने मिठी मारली साधनाला. माधुरी कला अंजू हे बघत होत्या.

रेणुकाने साधनाच्या हातात सुंदर स्लिंग बॅग दिली.

” घे ग. बघ आवडते का. राजस्थानला गेले होते ना तिकडची खास आहे बघ कशिदाकारी. ”

अंजू कला म्हणाल्या ”, आम्हाला वेळच नाही झाला काही आणायला. चला आता जेवूया ना? एरवी कोण येणार इतक्या महागड्या हॉटेलात?”

साधना त्यांना डायनिंग हॉलमध्ये घेऊन गेली. तो अतिशय सुंदर भव्य आणि उच्च अभिरुचीने सजवलेला एरिया बघून डोळे विस्फारले या तिघींचे.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेमाचीसुद्धा जबरदस्ती करू नये.… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ प्रेमाचीसुद्धा जबरदस्ती करू नये… लेखक : अज्ञात ☆  प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

आपली मुलं आपली नसतात. एकनाथांचं वचन आहे, ‘पक्षी अंगणात आले, अपुला चारा चरून गेले. ’ हा जगाचा नियम आहे. पैशाचं परावलंबित्व नको, तसं भावनांचं परावलंबित्व असता कामा नये’… स्वातीताईंनी उमाकांतना जगण्याचं तत्त्वज्ञान सांगितलं आणि आयुष्य नव्याने जगायला ते बाहेर पडले..

कॅलेंडरचं पान उलटताना उमाकांत विशेष आनंदात होते, चंद्रनील जर्मनीहून येण्यासाठी आता फक्त पंधरा दिवस राहिले होते. लगबगीनं त्यांनी, संगणकावर त्याचा मेल आहे का पाहिलं आणि त्यांनी खूश होऊन स्वातीताईंना हाक मारली.

‘‘लौकर ये, आपला चंदा चार दिवसांतच येतो आहे. हा मेल पाहा! घरातले पडदे उद्याच बदलून टाक, घरासाठी कार्पेटची देखील ऑर्डर दिली आहे. आज चौकशी करायलाच पाहिजे आणि पुरणपोळीची ऑर्डर देणार आहेस ना… ?’’

आपल्या नवऱ्याचा उत्साह पाहून ताईंना गंमत वाटली. त्यांच्या मनात आलं, ‘‘परदेशातील समृद्धी, मोठी जागा, चैन सोडून चंदा कायम इथे येणं शक्य नाही. यांना मनोराज्य करू दे. आपलं काय जातं? परवा मालूताई सांगत होत्या, समृद्धी आली की मुलांना आई-वडिलांजवळ राहायला आवडत नाही. मुलींनादेखील माहेरची ओढ वाटत नाही.

मुलगा दोन दिवस येणार, त्यासाठी एवढा खर्च कशासाठी?’’

‘‘कार्पेट कशासाठी? उगीच नस्ता खर्च नको. दोन दिवस पाहुण्यासारखा तो बायको-मुलाला आणणार.

माझी कामं वाढवू नका. तो परत गेल्यावर तुम्ही कार्पेट साफ करणार का? ‘‘अगं! तो आता इथेच राहील ना? त्यानं सांगितलं होतं की, हे तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट झालं की तो पुन्हा जाणार नाही. त्यानं पाठवलेले सर्व पैसे मी ठिकठिकाणी गुंतवले. व्याजासकट चांगली रक्कम हातात आली की तो त्याचा व्यवसाय सुरू करील. माझी खात्री आहे, तू नसत्या शंका काढू नको. ’’

ताई हसून म्हणाल्या, ‘‘ती घरावरची कविता ठाऊक आहे ना? 

घरातून उडून गेलेल्या पिलांना, घरच्या उंबरठय़ाची ओढ असावी,

 एवढंच माझं मागणं आहे. ठीक आहे, परदेशात असतानाही आई-वडिलांना पाहावं, एवढं तरी त्याला वाटत आहे, हे काय कमी आहे?’’

ताईंचं हे बोलणं उमाकांत यांना फारसं आवडलं नाही. ‘निळ्याभोर आकाशात जसा चंद्र, तसा आपल्या घरात हा बाळ. म्हणून त्याचं नाव चंद्रनील. मित्रांमध्ये मात्र त्यानं आपलं नाव नील सांगितलं. चंदा नाव काय वाईट आहे? मेलही नील नावानं करतो, जाऊ दे नावात काय आहे म्हणा. ’ उमाकांत स्वत:शीच म्हणाले.

मुलगा येण्याचा दिवस जसा जवळ येऊ लागला, तशी मात्र स्वातीताईंची धांदल सुरू झाली. चकल्यांची भाजणी दळायला दिली होती. भडंग, चुरमुऱ्याचा चिवडा झाला होता, पण शंकरपाळे राहिले होते. ते आज झाले असते. चकल्या गरम चांगल्या लागतील. तेव्हा तो आल्यावर चकल्या करू. शिवाय पुरणपोळीची ऑर्डर देण्यापेक्षा घरीच कराव्यात. बाहेरच्या पोळीत वेलची-जायफळ फार कमी असतं. मैदा जास्त असतो, नकोच ते. काय करू न काय नको असं त्यांना झालं होतं.

ताईंनी चण्याची डाळ भिजत घातली, साजूक तूप कढवलं. आणखी काय करता येईल याचा विचार करू लागल्या. चार खोल्यांचं घर उत्साहानं भरून गेलं. घराच्या भिंतीदेखील सजीव झाल्यासारख्या वाटू लागल्या. भिंतीवर उमाकांत यांनी सुंदर निसर्गचित्रं लावली होती. हिरव्यागार झाडांच्या आडून इवली पांढरी फुलं मन प्रसन्न करीत होती. नुसती निसर्गचित्रंदेखील मनाला प्रसन्नता देतात.

हा अनुभव ताईंना वेगळाच वाटत होता की चंद्या येणार म्हणून ती चित्रं अधिक सुंदर वाटत होती? त्यांचं त्यांना कळत नव्हतं. मन मात्र प्रफुल्लित झालं होतं.

चंद्रनील येण्याच्या आदल्या दिवशी उमाकांत शांत झोपूच शकले नाहीत. पहाटे चार वाजता, खासगी गाडी करून एअरपोर्टवर आले. चंदाला पाहून त्याला घट्ट मिठी मारली. आनंदात सून, मुलगा, नातू घरी आले. दोन दिवस धमाल चालली होती. तिसऱ्या दिवशी सकाळी निवांत चहा घेताना चंदानं आपलं प्रोजेक्ट अजून तीन र्वष चालू राहणार आहे हे जाहीर केलं. त्या वेळी उमाकांत आपल्या चेहऱ्यावरची निराशा लपवू शकले नाहीत. ताई मात्र हे असंच होणार हे जाणून होत्या. त्यामुळे त्यांना फारसं दु:खं झालं नाही.

आल्या आल्या सून आणि नातू सुनेच्या माहेरी गेले. त्यामुळे घरात आता हे तिघेच होते.

‘‘चंदा, आला आहेस तर इथेच चांगली नोकरी पाहा. स्वतंत्र राहायचे असेल तरी आमची हरकत नाही, ’’ उमाकांत म्हणाले.

‘‘बाबा, आपली चार खोल्यांची जागा असताना स्वतंत्र राहण्याचा विचार तरी मनात येईल का? परंतु पुढील तीन वर्षांत तरी नोकरी सोडता येणार नाही, तुम्ही पैशांची चिंता करू नका. मी दर महिन्याला पुरेसे पैसे पाठवीन, ’’ चंदा म्हणाला.

उमाकांत कपाटाजवळ गेले. बँकेचे पासबुक त्याच्या पुढय़ात ठेवून म्हणाले, ‘‘चंदा! तू आत्तापर्यंत पाठवलेले सर्व पैसे मी बँकेत जमा केले

आहेत. मला तुझे पैसे नकोत. मला तू भारतात यायला हवा आहेस. ’’

‘‘बाबा! प्लीज, या ट्रिपमध्ये मला खरंच जास्त राहता येत नाही. आणखी तीन वर्षांनी मी नक्की भारतात येईन. ’’ चंद्रनीलनं विषय संपवला आणि घाईघाईनं तो पत्नीच्या माहेरी गेला.

पाहता पाहता महिना कुठे निघून गेला ते समजलं नाही.

चंद्रनीलचा जाण्याचा दिवस उजाडला. या वेळी स्वातीताईंनी त्याला बरोबर देण्यासाठी कुठलेही जिन्नस तयार केले नाहीत. आपली बॅग भरताना काहीच तयारी नाही हे पाहून चंदाला राहवलं नाही.

‘‘आई! लसणीची, तिळाची चटणी, मेतकूट, भाजणी दे लौकर. सामानात कुठे ठेवायची ते पाहतो. फार जिन्नस देऊ नकोस. ’’

लेकाची हाक ऐकून किचनमधून ताई बाहेर आल्या. ‘‘चंदा! या वेळी तुझ्यासाठी काहीही करता आलं नाही रे. वेळच झाला नाही. असं कर, नाक्यावर आपटे गृहोद्योग दुकान आहे. तिथून तुला काय हवं ते आण.

चंद्रनीलला नवल वाटलं. आईला काय झालं? मागच्या ट्रिपला तिने केवढे पदार्थ दिले होते. आत्ता मी आल्या आल्यादेखील केवढे पदार्थ केले होते. हिला वेळ नसायला काय झालं? जास्त विचार न करता त्यानं बॅग बंद केली.

या वेळी निरोप देण्यासाठी रात्री झोपमोड करून एअरपोर्टवर जायचं नाही, असं ताईंनी आपल्या पतीला- उमाकांत यांना अगदी निक्षून सांगितलं. अगदी गोड बोलून दोघांनी मुलाला आणि सुनेला घरातूनच निरोप दिला.

दुसरा दिवस उजाडला त्या वेळी ताई वृत्तपत्रात काही तरी शोधत असल्याचं उमाकांत यांनी पाहिलं. ताई खुशीत कशा राहू शकतात, याचं उमाकांत यांना नवल वाटत होतं.

‘‘पुढच्या महिन्यात आपण युरोप टूरला जाणार आहोत. आधीच बुकिंगला उशीर झाला आहे. आजच पैसे भरून या. ही जाहिरात!’’ ताईंनी नवऱ्याला जाहिरात दाखवली. उमाकांत काही बोलले नाहीत. उदास चेहरा करून बसून राहिले आणि म्हणाले, ‘‘निदान एअरपोर्टवर तरी निरोप द्यायला गेलो असतो. घर अगदी रिकामं वाटत आहे. ’’

आता मात्र ताई थोडय़ा वैतागल्या. ‘‘तुम्हाला यायचं नसेल तर मी एकटी जाईन. संसाराच्या खस्ता खात जबाबदारी पेलताना थकून गेले. चंदा पहिल्यांदा जर्मनीला गेला त्या वेळी रोज रात्री त्याच्या आठवणीनं डोळ्यातल्या पाण्यानं उशी भिजून जायची. हळूहळू समजलं, प्रेमाचीसुद्धा जबरदस्ती करू नये. आपली मुलं आपली नसतात.

 एकनाथांचं वचन आहे- 

 

“‘पक्षी अंगणात आले, अपुला चारा चरून गेले’.

हा जगाचा नियम आहे. मुलं, त्यांना गरज आहे तोपर्यंत आपल्या जवळ राहणार. नंतर पक्ष्यांप्रमाणे दूर उडून जाणार. हे प्रत्येक व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे.’’

उमाकांत ताईंचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. ताई बोलत होत्या, ‘‘पैशाचं परावलंबित्व नको म्हणून आपण काळजी घेतो. तसंच भावनांचं परावलंबित्व असता कामा नये. किती तरी दिवसांत मुक्त निसर्ग पाहिला नाही, तुम्ही कधी माझ्या कविता ऐकल्या नाहीत, संगीताचा आनंद घेतला नाही. उमाकांत ! प्रयत्नपूर्वक या ‘एम्टी नेस्ट सिन्ड्रोम’ मधून बाहेर या.’’

‘‘कसं बाहेर येऊ ? तूच सांग ना.. ’’ उमाकांत म्हणाले. ‘‘उमाकांत, मागच्या वेळी चंदा राहिला नाही. त्या वेळी मी माझ्या मनाची कशी समजूत घातली, ते मी ‘एकटी’ या कवितेत लिहिलं आहे. ऐकाल?’’

शून्यात पाहत उमाकांत यांनी होकार दिला.

ताई कविता वाचू लागल्या….

कळून चुकलंय तिला,

वयाची येताना साठी

आहे ती एकटी,

अगदीच ती एकटी

 

मुलंबाळं, प्रेमळ नवरा,

संसारही तो कसा साजिरा

प्रेमळ होती सगळी नाती,

तरीही ती एकटी

 

कष्टातही त्यात, होती मजा,

खुशीत होते राणी राजा

लुटुपुटीचा खेळ पसारा,

कळले हो शेवटी, आहे ती एकटी

 

सुंदर तेव्हा होती सृष्टी,

सुंदर जग ते अवती भवती

काळ कुठे तो निघून गेला,

आता वाटते भीती, आहे ती एकटी

 

कुणीतरी मग साद घातली,

तुझ्या आवडी कशा विसरली?

आठव संगीत अक्षर वाङ्मय,

कोण म्हणे तू एकटी?

 

मंजुळ गाणी पक्षी गाती,

आकाशी बघ रंग किती

बहर मनाला तुझ्या येऊ दे,

निसर्ग राणी तुझ्या संगती

 

जगन्नियंता निसर्गातुनी साथ तुला देईल

हाक मारूनी पहा गडे तू,

हात तुला देईल

तोच तुझ्या गे अवती भवती,

कशी मग तू एकटी?

 वेडे, नाहीस तू एकटी..

कविता ऐकल्यावर उमाकांत आवेगाने उठले. ताईंचा हात हातात घेऊन म्हणाले, ‘‘स्वाती,

युरोप टूरचं बुकिंग करायला तूही चल ना. येताना नवीन कपडे घेऊ. बाहेरच जेवण करू, कालच

चंदा गेला, दमली असशील. खूप केलंस महिनाभर त्यांच्यासाठी.’’

‘‘छे! मुळीच दमले नाही. माझं रिकामं घर मला किती ऊर्जा देऊन गेलं म्हणून सांगू? तुम्हाला आनंदात पाहून घराच्या भिंतीदेखील हसू लागल्या. बघा, आता चित्रातला नाही, तर खरा निसर्ग पाहायचा. ’’ आणि उत्साहानं ताई बाहेर जाण्यासाठी तयारी करू लागल्या.

लेखक : अनामिक

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “डेट्स…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ डेट्स… ☆ प्रा. भरत खैरकर 

रात्री साडेबाराच्या सुमारास, एक खोली अंधाराने भरलेली.. टेबलावर चहा आणि काही टिशू पेपर..  त्यावर लिहिलेली स्क्रिप्ट ..पसरलेली होती. दिग्दर्शक शशांक त्या खोलीत एकटा बसलेला होता. त्याला माहित होतं की, त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिप्टला शेवटचा स्पर्श देणारा अभिनेता आर्यन, साडेबाराच्या सुमारास येणार आहे .त्याच्या मनात अनेक विचार होते. शशांकने ती स्क्रिप्ट पुन्हा एकदा वाचली, त्यातील प्रत्येक ओळ व संवाद त्याच्या मनावर ठसलेला.. ठरलेला.. होता.

आर्यन येण्याआधी, शशांकच्या मनात विचारांचं वादळ माजलं होतं. त्याचे बालपण आणि संघर्ष त्याला चांगल्या प्रकारे माहित होता. त्याची शाळा मिल मजुरांच्या वस्तीमध्ये असलेल्या चाळीमध्ये होती. शशांक अजूनही त्या  श्रमिकांच्या जगातच त्याचे जीवन घालायचा .. त्याचा श्रमिकांप्रतीचा जिव्हाळा बालपणापासून तसाच आताही कायम होता.त्याच आठवणी त्याला परत  परत येत होत्या.

तो विचार करत होता, स्क्रिप्ट मधील हाच तो मॉल आहे, जिथे एकेकाळी आपल्या जीवनातील अनमोल क्षण आपण इथे घालवले. पण आता, या मॉलमध्ये  आल्यावर आपल्याला कब्रस्तानात आलोय असं वाटतं. ही जागा आपल्यासाठी आणि आपल्या कलेसाठी  स्मशान आहे.. कारण हा मॉल गिरणी कामगारांच्या चाळींवर बुलडोजर चालवून बांधलेला आहे.. त्याची कहाणी जगासमोर आलीच पाहिजे.. असं त्याला वाटायचं..

मुंबईचा एक प्रसिद्ध अभिनेता, आर्यन, आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला होता. त्याच्या नावावर अनेक हिट चित्रपट होते. त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा अनेक दिग्दर्शकाची होती. परंतु, आर्यनच्या यशाच्या मागे एक मोठा संघर्ष  होता तो म्हणजे त्याच्या डेट्स ! त्याचे वेळापत्रक !!

आर्यनचा मॅनेजर होता समीर ! तो नेहमीच त्याच्याकडून खूप  कष्ट करवून घेत होता.

 “आर्यन सरांकडून .. आपल्याकडून एक हिट चित्रपट मिळवायचा आहे. त्यासाठी आपल्याला डेट्स लागतील,” अशी विचारणा दिग्दर्शक शशांकने समीर कडे केली..

” तुम्हांला तर माहित आहे ना, आर्यनसर खूप  व्यस्त असतात.एक महिन्यापेक्षा जास्त पुढच्या  डेट्स मी देऊ शकत नाही,” समीर उत्तरला.

तरीही आर्यनच्या वेळापत्रकाचा अभ्यास व विचार केला तर, त्याला एखादा दिवस ह्याच महिन्यात  उपलब्ध होता ..तोही दोन आठवड्यांनंतर. शशांक आणि समीर यांच्यात  चर्चा झाली. तरी पण शशांकने आर्यनच्या डेट्स मिळवायला काहीतरी वेगळे करावे,  म्हणजे दुसऱ्या एका अभिनेत्याशी संपर्क करावा.” असे समीरने  शशांकला सुचविले.

शशांकने आपल्या शोधात दुसऱ्या एका अभिनेत्याला आदित्यला संपर्क केला. आदित्य, जो एक उत्तम कलाकार होता, त्याला नुकताच  ‘राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार मिळाला होता.पण आर्यनच्या ‘पंढरी’च्या यशापेक्षा त्याला कमी प्रसिद्धी मिळाली होती. त्याच्याकडे डेट्स होत्या.तो लगेचच शूटिंगसाठीही  तयार होता.

आदित्यला भेटल्यानंतर शशांकने त्याला सांगितले, “तुझ्या माध्यमातून, आम्ही आर्यनला एका दिवसात शूटिंग पूर्ण करायला सांगू.” 

आदित्य ज्याला अधिक प्रसिद्धीची आवश्यकता होती, त्याने त्वरित होकार भरला. एका दिवसात शूटिंग पूर्ण होईल, अशा आशेने आदित्यने दिलेल्या डेट्सवर काम सुरू झाले. आर्यनचा मॅनेजर समीर आणि दिग्दर्शक शशांक यांना मात्र एका गोष्टीचा अंदाज आला नाही की आदित्यला त्या एका दिवसाच्या शूटिंगनंतर डबिंगसाठी वेळ नाही !

“डबिंग कॅन्सल करा,” आदित्यने एक दिवस फोन करून सांगितलं. शशांक आणि समीर दोघेही  आश्चर्यचकित झाले. दिग्दर्शक शशांकला असं वाटायला लागलं होतं की त्याच्या कामामुळे.. नावामुळे.. एक मोठा निर्णय घेतला होता, पण आता त्याच्या कलेला कमी महत्त्व  मिळतं की काय असं वाटून तो नाराज होता..तसा तो आदित्यच्या कामावर समाधानी नव्हता‌.आणि आर्यनच्या कामाचं ..डेट्सच त्याला  सन्मानपूर्वक नियोजन करायचं होतं.  

दरम्यान आर्यन समीरला सांगतो, “आता मी त्या चित्रपटाच्या डेट्सचा विचार करतोय. पण माझ्या इतर कामामुळे मला आणखी काही वेळाची गरज आहे.” तात्काळ निर्णय घेणं शशांक आणि समीरसाठी  आवश्यक होतं.

चित्रपटाला हिट होण्यासाठी .. करण्यासाठी..कधी कधी मेहनत, समजूतदारपणा आणि योग्य निर्णयांची आवश्यकता असते. डेट्स आणि वेळांच्या धकाधकीत, सिनेमा आणि कलाकारांची मेहनत हरवून जाते, पण त्यात कलेचा आदर व सन्मान हाही सांभाळला पाहिजे.. वर्क स्पिरिट नेहमीच टिकून  राहिलं पाहिजे.    

शूटिंगच्या आधी आर्यन मॉलमध्ये फिरून आला. त्याने.. दिग्दर्शकाच्या नजरेतून मॉल खाली दडलेलं स्मशान बघितलं.. त्यातून येणाऱ्या  गोरगरिबांचे आवाज ऐकले.. आणि ते सर्व आपल्या अभिनयातून … मिळालेल्या स्क्रिप्ट मधून कसं उभं करता येईल  याचा विचार करत शशांककडे तो  आपल्या मर्सिडीज मधून निघाला होता.

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वेळीच मन मोकळं करा … ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? जीवनरंग ?

☆ वेळीच मन मोकळं करा…  ☆ सौ. वृंदा गंभीर

दादा वहिनी दोघं आनंदात राहत होते. मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडले होते. त्यांचा संसार आनंदात सुरू होता.

दादा फार शिस्तप्रिय तर वहिनी प्रेमळ मायाळू नाती सांभाळणारी माणुसकी जपणारी……

दादा क्लासवन ऑफिसर म्हणून रिटायर्ड झालेले तर वहिनी एक आदर्श शिक्षिका म्हणून रिटायर्ड झाल्या…….

” नोकरीमुळे सतत बदल्या.. बाहेर राहणं.. मुलांच्या शिक्षणासाठी कधी वेगळं राहणं, असचं आयुष्य गेलेलं…  आता दोघेही रिटायर्ड झाले उर्वरित आयुष्य एकमेकांना द्यायचं एकमेकांच्या सहवासात राहायचं असं ठरवलं… म्हणून मुलांकडे जाणं टाळलं दादांनी…

मस्त मजेत दिवस चालले होते त्यांचे तीर्थ यात्रा, पर्यटन स्थळांना भेट देऊन झाली…

एक दिवस दादांच्या छातीत दुखायला लागले सीमावहिनीला काहीच सुचेना त्यांनी मुलांना कॉल केला. मुलं म्हणाली “ आम्ही कुणाला तरी पाठवतो हॉस्पिटल मध्ये घेऊन जा आम्हाला वेळ नाही. ”

सीमावहिनीला वाईट वाटलं, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्याला कॉल केला. तो लगेच आला आणि दादांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला…

दादांची इंजिओग्राफी केली रिपोर्ट मध्ये ब्लॉकेज निघाले त्यांना ताबडतोब आंजिओप्लास्टी करायला सांगितली… वहिनीने मुलांना सांगितलं व डॉक्टरांना ऑपरेशन करा सांगितलं. ऑपरेशन सक्सेस झालं…

दादांची पुढील ट्रीटमेंट सुरू केली. 8 ते 10 दिवसात दादा पूर्वीप्रमाणे झाले.

दादांना घरी आणलं पाहुणे, मित्र मंडळी, ऑफिस मधील स्टाफ वहिनींचे विद्यार्थी सगळे येऊन गेले 

मुलं काही भेटायला आली नाही.

दादांचं मन उदास झालं होतं. ज्या मुलांसाठी जीवाचा आटापिटा करून त्यांना वाढवलं शिकवलं मोठं केलं त्यांना आज बाबांसाठी वेळ नव्हता. सीमावहिनी बोलायच्या “ आहो, मुलं कामात असतील नाहीतर आले असते… ” मनाची समजूत काढत होत्या.

शेवटी न राहवून वहिनींनी समीरला कॉल केला…

वहिनी ” हॅल्लो समीर, आई बोलतेय “

समीर “. हा, आई बोल काय म्हणतेस ? “

वहिनी ” अरे बाबांना घरी आणलंय. तू भेटून जा.. त्यांना बर वाटेल तू आला तर…”

समीर ” आई यायचं होतं ग पण कामच खूप आहे. सुट्टी मिळत नाही.

वहिनी ” ठीक आहे एकदा वेळ मिळेल तेंव्हा येऊन जा. ”

समीरने ‘हो’ म्हणून फोन ठेवला…..

वहिनी आता कबीरला फोन करतात…

“ हॅल्लो कबीर मी आई बोलतेय…”

कबीर “. हा आई बोल…”

वहिनी, ” बाबांना घरी आणलंय.. तू आला नाही भेटायला…”

कबीर, 

“आई खरचं वेळ नाही ग. खूप वाटतं यावं पण काय करू ? फार आठवण येते बाबांची तरी नाही येऊ शकत मी…”

आई, “ बर कबीर ठेवते मी फोन “

कबीर, “ सॉरी आई…”

दादा वहिनी विचार करत बसतात काय कमी केलं आपण, असं का वागतात ही मुलं?

एक दिवस समिरचा मित्र येतो घरी. दादा वहिनींना फार आनंद होतो.

दादा म्हणतात “ अरे या वयात मुलांचा आधार हवा असतो. पण, एकही मुलगा जवळ नाही.. वाईट वाटतं, , , , , , , मुलांना सगळं सुख मिळावं, त्यांचं चांगलं व्हावं म्हणून आम्ही एकमेकांना सोडून राहिलो आज मुलं आम्हाला सोडून दूर गेली. ”

समीरचा मित्र म्हणतो “ काका त्यांना काम असते. शेवटी सरकारी नोकरी आणि प्रायव्हेट नोकरीमध्ये फरक असतो, जबाबदारी असते मोठी.. ती पार पाडावी लागते, नाहीतर घरचा रस्ता दाखवला जातो.

या धकाधकीच्या जीवनात वेळ उरला कुठे जेमतेम पाच ते सहा तास असतात घरी आराम करायला… सुट्ट्या तर बिलकुल नाही. या कॉर्पोरेट च्या जगात जीवनही कॉर्पोरेट होऊन गेलं…”

दादांना वाईट वाटतं…

तो थोडं शांत बसून बोलायला लागतो… ” काका समीर थोडा रागात आहे त्याने कधी बोलून नाही दाखवलं तुम्हाला पण त्याच्या अपेक्षा वेगळ्या होत्या…… त्याला स्पोर्टस मध्ये करियर करायचं होतं… तुम्ही करू दिलं नाही. तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर हो म्हणाले त्याची इच्छा नसतांना तो इंजिनियर झाला…

कॉलेजमध्ये असताना त्याला एक मुलगी आवडायची खूप प्रेम करायचा तिच्यावर. तुम्ही लग्नाला होकार दिला नाही आणि नात्यातली मुलगी पसंद केली आणि लग्न केलं त्याच्या मनाविरुद्ध.

तो अजूनही मनात राग धरून आहे… तुम्ही चांगलंच केलं त्याचं करियर घडवलं…

वेळेत मन मोकळं करता आलं नाही, , , , , त्याच्यासाठी काय योग्य अयोग्य हे सांगितलं असतं तर कदाचित हा दुरावा नसता तुमच्यात….. ”

“ बर, मग कबीरचं काय ? त्याचं तर सगळं मनासारखं आहे तो का दूर पळतोय…”

“काका, कबीरचा तुमच्यात जीव होता. त्याला तुम्ही जवळ असावे असं वाटतं होतं. बालपण होतं वडील जवळ नव्हते… तो शिकला वडिलांशिवाय रहायला… मान्य आहे तुमचा वेळ देता येत नव्हता, पण तुम्ही त्यावेळी त्याला समजून सांगितलं असतं मनातील गैरसमज वेळीच दूर केले असते तर?”

…….

म्हणून मन मोकळं वेळेतच करता आलं पाहिजे म्हणजे बालमनावर परिणाम होऊन दुरावा निर्माण होतं नाही.

दादा वहिनी शांत होते नोकरीमुळे मुलांना वेळ देता आला नाही हे खरं आहे पण, हे सगळं त्यांच्यासाठीच केलं ना… आज मुलांना दादा वहिनीच्या प्रॉपर्टीची काही गरज नाही आणि त्यांच्यासाठी मुलांकडे वेळ आणि… अपुरा संवाद दुरावा निर्माण करतो हेच खरं…

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुम्ही म्हणाल तसं… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ तुम्ही म्हणाल तसं…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(या उलट ती मला समजून घेत शांत करत आलीय. मुलांच्यावर संस्कार करण्याचं काम आणि त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण धुरा तिनं एकटीने सांभाळली आहे. ती नसती तर..?’) – इथून पुढे —

भावनावश झालेले गंगाधरपंत हलक्या आवाजात म्हणाले, “सुलु, बरं वाटत नाहीये का तुला? डोकं दुखतंय का?”

तिनं हळूच डोळे उघडत विचारलं, “फिरून आलात का? चहा करून देऊ का तुम्हाला?” आणि उठून बसली.

गंगाधरपंत पटकन म्हणाले, “नाही, नको. मानसीने आताच करून दिलाय.” असं म्हटल्यावर सुलोचना तोंडावर पाणी मारून देवघरात निरांजने पेटवून हात जोडून बसली.

संध्याकाळी काहीच न घडल्यासारखं रात्रीची जेवणं उरकली. शतपावली करून आल्यावर टीव्हीवरच्या बातम्या न ऐकताच गंगाधरपंत बेडरूममध्ये शिरले. उशीला पाठ टेकून विचारमग्न स्थितीत बसले. सुलोचना स्वयंपाकघरातील आवराआवर करून आली आणि शेजारी बसत म्हणाली, “काय पंत, आज मूड बिघडलेला दिसतोय. अहो, एवढे विचारमग्न व्हायला काय झालंय?”

त्यावर गंगाधरपंत काय बोलणार? सुनेनं जे सुनावलं, ते सांगायचं का सुलोचनेला? सूनदेखील काय चुकीचं बोलली? तिनं फक्त आरसा दाखवण्याचं काम केलं होतं. गंगाधरपंत पटकन म्हणाले, “अं, कुठं काय? काहीच नाही. असाच बसलो होतो.”

सुलोचना त्यांचं अंतरंग ओळखून होती. ती हसत हसत म्हणाली, “आता जास्त विचार करत बसू नका. लवकरच आपल्या कुटुंबात आणखी एका सदस्याची भर पडणार आहे, आहात कुठे आजोबा? झोपा आता.” ही आनंदाची बातमी ऐकून गंगाधरपंतांना त्या रात्री शांत झोप लागली. 

एक नवी सकाळ. गंगाधरपंतांना अंतर्बाह्य बदलून गेली. ते सकाळच्या प्रहरी फिरायला जायला लागले. लवकरच त्या भागातल्या प्रभात मंडळाचे सदस्य झाले. वेगवेगळ्या मतांचे विचारमंथन त्यांच्या कानावर पडत होते. कित्येक दिग्गज लोकांच्या अनुभवाचा खजिना त्यांच्यासमोर रिता होत होता. आत्ममग्न झालेल्या गंगाधरपंतांना नकळत स्वत:चं खुजेपण जाणवत होतं, त्यामुळे हळूहळू ते विनम्र होत चालले होते. 

एके दिवशी सकाळी मंडळाच्या बैठकीत एक तरुण आला आणि हात जोडत म्हणाला, ‘मी विनय. माधवरावांचा मुलगा. बाबा काल पुण्याला गेले आहेत. येत्या सहा डिसेंबरला आईबाबांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे. आम्ही त्या निमित्ताने हॉटेल ओपलमधे एक सोहळा आयोजित केला आहे. कृतज्ञता सोहळाच म्हणा हवं तर. सर्वांचेच आईबाबा मुलांच्या भवितव्यासाठी झटत असतात. माझे आईबाबा मात्र आजही आमचं जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते दोघे आमच्यासाठी आधारवड बनून ठामपणे उभे आहेत. तुम्हा सर्व ज्येष्ठ मंडळींनी त्या दिवशी अवश्य उपस्थित राहून आईबाबांना सरप्राइज द्यावं, अशी विनम्र प्रार्थना. मंडळाच्या नावे हे निमंत्रण.’ 

निमंत्रण अगत्याचं होतं. वेळ दुपारची होती. मंडळाचे सदस्य एका ठिकाणी जमले. दोन जाडजूड पुष्पहार घेऊन हजर झाले. माधवरावांच्या मुलाने आणि सुनेने त्यांचं अगत्याने स्वागत केलं. माधवरावांना मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती अनपेक्षित होती. ते हरखून गेले. कार्यक्रमात मुलगा-सून, कन्या-जावई, नातवंडं यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रीतीभोजनाचा आस्वाद घेऊन सगळेच जण घरी परतले.

दुसऱ्या दिवशी माधवराव सकाळी मंडळाच्या मीटींगला हजर झाले. सगळ्याच सदस्यांनी त्यांच्या मुलाचं आणि सुनेचं कौतुक केलं. गंगाधरपंत म्हणाले, “माधवराव, तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा मुलगा आणि सून खूपच चांगले आहेत.”

माधवराव काहीसे गंभीर होत म्हणाले, “होय. ते दोघे खूप चांगले आहेत. आपण जन्मदात्या मातापित्यांचा प्रत्येक शब्द झेलत होतो. आता तो जमाना संपला. आजचं एक कटु सत्य सांगू का? आज प्रत्येक नात्यात तुम्हाला ‘युटिलीटी’ म्हणजे तुमची उपयोगिता सिद्ध करावी लागते. आपण त्यांच्याशी चांगले वागलो तरच ते आपल्याशी चांगले वागतात. जुनं फर्निचर जास्त कुरकुर करायला लागलं की आजकाल लगेच मोडकळीत टाकतात. तसंच जास्त कुरकुर करणाऱ्या आणि उपयोगिता नसलेल्या आईवडिलांना देखील नाईलाजाने वृद्धाश्रमात पाठवलं जातं.”

माधवरावांच्या बोलण्याने सगळेच जण गंभीर झाले. माधवराव पुढे म्हणाले, “मित्रांनो, आजकाल मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात. आजच्या जीवघेण्या स्पर्धेत त्यांना तिमाही टार्गेट्सच्या चक्रात अक्षरश: पिळून निघावं लागतं. लठ्ठ पगार मिळतो पण त्यांना तणाव नावाच्या राक्षसाशी दोन हात करावे लागतात. ऑफिसातल्या ताणतणावाने ते पार थकून जातात. घरी आल्यावर तुमच्यामुळे कटकटी होत असतील तर ते कसे सहन करतील? 

त्यांना पोटापाण्यासाठी ऑफिसातले ताणतणाव टाळता येत नाहीत. मग नाईलाजाने तुम्हाला दूर करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. एवढंच सांगतो, सावध व्हा. त्यांच्यावर बोजा बनून न राहता शक्य असेल तेवढी मदत करा. घरी कामवाल्या बायका असतात त्यांच्या कामावर लक्ष ठेवा. सांसारिक कटकटीतून त्यांना मुक्त करा. बाजारहाट करायचं काम आनंदाने करा. नातवंडांना सांभाळा. घरातलं वातावरण शक्य तेवढं आनंदी ठेवा. मग बघा, हे जुनं फर्निचरच ते अ‍ॅंटिक पीस म्हणून अभिमानाने जपतील. कधीच वृद्धाश्रमात जायची वेळ येणार नाही.” त्यावर सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.

हल्ली घरात लागणारं सामान गंगाधरपंत ऑनलाईन ऑर्डर करून घरपोच मागवून घेत होते. संध्याकाळी सुलोचनेसोबत समोरच्या बागेत फिरायला जात होते. माघारी येताना ताज्या भाज्या आणि फळे घेऊन येत होते. ऑफिसातून सून घरी येताच, तिला फळांचा बाऊल देवून दूध पिण्यासाठी आग्रह करत होते. ‘मानसी बेटा, आपल्या तब्येतीची काळजी घे, ’ असं वारंवार सांगत होते.

 गंगाधरपंतांचं हे नवं रूप पाहून सुलोचना हरखून गेली. गंगाधरपंत त्या रात्री भावविवश होत सुलोचनेला म्हणाले, “सुलु, या जगात तुझ्या इतकं मला समजून घेणारं कुणीही नाही. तू मला कधीही सोडून जाणार नाहीस म्हणून वचन दे, अगदी देवानं बोलवलं तरी!”

सुलोचना पंतांच्या हातावर हात ठेवत म्हणाली, “पंत, वचन देते. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मग तर झालं?” 

सुलोचनेचा हातात असलेला हात दाबत गंगाधरपंत हळूच म्हणाले, “सुलु, आजपासून अख्खं राज्य तुझंच ! यापुढे सगळं काही तू म्हणशील तसंच होईल.”

त्यावर सुलोचना खळखळून हसली आणि खट्याळपणे म्हणाली, “पंत, तुम्ही म्हणाल तसं….!”

— समाप्त —

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुम्ही म्हणाल तसं… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ तुम्ही म्हणाल तसं…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

गंगाधर पदवीधर झाले. मूळ गावापासून दूर, जिल्ह्याच्या सरकारी कचेरीत कारकून म्हणून रुजू झाले.

मुळात गंगाधर यांचं बालपण कडक शिस्तीत गेलं होतं. त्यांचे वडील म्हणजे जमदग्नीचा अवतारच होते. नोकरीचं निमित्त झालं आणि एका अर्थाने गंगाधर वडिलांच्या दडपणातून मुक्त झाले. यथावकाश लग्न उरकलं. पत्नी म्हणून सुस्वरूप, संस्कारी सुलोचना लाभली. राजाराणीचा संसार होता. गंगाधर ‘सुलु, सुलु’ करत तिच्या मागे मागे असायचे. तिच्याशिवाय त्यांचं पानही हलायचं नाही. हे जरी खरं असलं तरी पित्याकडून मिळालेला एकमेव वारसा, ‘एकाधिकारशाही’ ते कसे विसरणार? त्यांच्या शब्दाला नाही म्हटलेलं त्यांना अजिबात खपायचं नाही.

 सुलोचना मात्र एकत्र कुटुंबातील आणि चारचौघात वावरलेली व्यवहारी कन्या होती. तिने गंगाधरांच्या कलानेच घ्यायचं असं ठरवलं. गंगाधराच्या प्रत्येक निर्णयाला ‘पंत, तुम्ही म्हणाल तसं.. ’ ह्या नमनानेच ती सुरुवात करायची. ‘पंत’ म्हटलं की गंगाधर खुलून जायचे. त्यानंतर, ‘पण मी काय म्हणते.. ’ असं म्हणत ती त्यावरचे पर्याय सुचवायची. विविध फायदे सांगून झाल्यावर तिचं शेवटचं पालुपद असायचं, ‘पंत, मी फक्त सुचवायचं काम केलं. माझा आग्रह नाही. अर्थात अंतिम निर्णय तुमचाच. ’ ही मात्रा लागू पडली.

 घरातल्या कुकरपासून फ्रीजपर्यंत सगळ्याच वस्तु सुलोचनेच्या मनाप्रमाणेच घेतल्या गेल्या. एवढंच काय, तर मुलांच्या अ‍ॅडमिशन कुठल्या शाळेत घ्यायच्या, इथपर्यंतचे सगळे निर्णय कसलाही वादविवाद न होता सुलोचनेच्या मनाप्रमाणेच घडत गेले. सुलोचनेची ही शिताफी मात्र गंगाधरांच्या कधीच लक्षात आली नाही.

 गंगाधरपंतांना सदासर्वदा साहेबांच्या समोर मान खाली घालून ‘हांजी हांजी’ करत निमूटपणे सगळं ऐकावं लागायचं. त्यामुळे कचेरीत दाबून ठेवलेले मानापमानाचे कढ घरातल्या लोकांच्या समोर उफाळून यायचे.

 मुलं मोठं होत गेली तसं त्यांना गंगाधरपंतांचे वागणं खटकत राहायचं. सुलोचना मात्र वडील आणि मुलांच्यामधे एक सुंदर दुवा बनून राहिली. त्या नात्यांत कुठलीच कटुता येऊ नये म्हणून ती काळजी घेत राहिली. ‘हे बघा, बाबा तुम्हाला रागावत असतील, पण तुमच्याविषयी त्यांना खूप कौतुक आहे. प्रसंगी ते स्वत:कडे दुर्लक्ष करतात, पण सदैव तुमच्या भवितव्याचा विचार करत असतात. तुम्हाला ते कधी काही कमी पडू देत नाहीत ना? मग जास्त विचार करू नका. तुम्ही फक्त अभ्यासात लक्ष घाला. ’ असं ती मुलांना सांगत राहायची.

 अधूनमधून ती गंगाधरपंताना ऐकू जाईल असं पुटपुटायची, ‘माझं नशीबच थोर म्हणायचं बाई. मुलं ह्यांच्या बुद्धिमत्तेवर गेली म्हणून बरं आहे. उत्तम गुणांनी तर उत्तीर्ण होताहेत. माझ्यावर गेली असती तर… ह्यांनी काय केलं असतं, ते देवच जाणे!’ हे ऐकल्यावर, पंतांचा मुलांवरचा राग थंड व्हायचा.

 गंगाधरपंत असंच एकदा मूडमध्ये असताना म्हणाले, ‘बरं का, सुलु. माझे सगळेच मित्र एकजात जोरू के गुलाम आहेत साले. मी त्यांना सांगतो, लेको माझी बायको सुलोचनेकडे बघा. ती माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मी सांगेल त्याला ‘तुम्ही म्हणाल तसं’ म्हणत असते. ’ त्यावेळी सुलोचना गालातल्या गालात हसली. तिला पंतांचा भ्रमाचा भोपळा फोडायचा नव्हता.

 बघता बघता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. लेक सुचेता लग्न होऊन सासरी गेली. दिल्या घरी सुखी होती. कारण सुचेताचे सासू सासरे गाव सोडून शहरात यायला अजिबात तयार नव्हते. तीच त्या घरची राणी होती.

 यथावकाश मुलगा अमेय उत्कृष्ट गुणांनी इंजिनियर झाला. चांगली नोकरी मिळाली. लवकरच कंपनीतल्या एका स्वरूप सुंदर मुलीशी विवाहाचा त्यांने प्रस्ताव मांडला. त्या स्थळात जागा ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. लग्न यथासांग पार पडले.

 त्याच महिन्याभरात गंगाधरपंत हेडक्लार्क म्हणून सेवानिवृत्त झाले.

साहजिकच सुलोचनेचं लक्ष गंगाधरपंतावरून अमेय आणि सून मानसीकडे केंद्रित झालं. ती सकाळी त्यांच्यासाठी न्याहरीच्या तयारीत असायची. अमेय आणि मानसी दुपारचं जेवण कंपनीच्या कॅन्टिनमधेच घेत असत. सदैव केंद्रस्थानी असलेल्या गंगाधरपंताना आपल्याकडे उपेक्षा होत असल्याच जाणवत होतं.

 एके दिवशी गंगाधरपंत कुठल्यातरी कारणावरून अमेयला आणि सुलोचनेला डाफरत होते, तेव्हा मानसीने त्या दोघांची बाजू घेऊन त्यांना तिथंच गप्प केलं. गंगाधरपंत संध्याकाळी नुकतेच फिरून येऊन कोचवर बसले. आजूबाजूला कुणीही नसल्याचं पाहून, मानसी त्यांना चहाचा कप देत म्हणाली, “बाबा, सकाळी मी जे काही बोलले होते त्याबद्दल मला माफ करा. ” हे ऐकताच गंगाधरपंतांचा राग निवळला.

 मानसी लगेच पुढे म्हणाली, “बाबा, खरं तर त्यात तुमची काहीच चूक नाही. खरी चूक सासूबाईंची आहे. मुळात तुमच्या एकाधिकारशाहीला आणि एककल्ली प्रवृत्तीला त्याच जबाबदार आहेत. तुमच्या प्रत्येक गोष्टीला ‘तुम्ही म्हणाल तसं.. ’ असं म्हणत त्या तुमच्या अहंकाराला वारा घालत गेल्या. त्यामुळे कधीकाळी या घरात वादळ उठेल ह्याची त्यांना कल्पनाही नसावी. सासूबाईंनी इतकी वर्ष तुम्हाला खपवून घेतलं असेल. जर काहीही चूक नसताना, तुम्ही कुणाला काही बोललात तर मी ते खपवून घेणार नाही. आताच सांगून ठेवते, तुम्ही सुखात राहा, आम्हालाही सुखाने राहू द्या. “

 सुनेचं असं अनपेक्षित बोलणं ऐकून गंगाधरपंत क्षणभर चक्रावून गेले. त्यांच्या तोंडातून एक ब्र शब्दही फुटला नाही. गार झालेला चहा त्यांनी तसाच घशात ओतला. दाराआडून संभाषण ऐकत उभ्या असलेल्या सुलोचनेला मनस्वी आनंद झाला. गंगाधरपंत खोलीत यायच्या आतच ती कपाळाला बाम चोळून झोपेचं सोंग घेत बेडवर जाऊन पडली.

 गंगाधरपंत बेडरूममधे आले. आजवर दिवेलागणीच्या वेळी कधी सुलोचना झोपल्याचं त्यांना आठवत नव्हतं. त्यांनी हळूवारपणे तिच्या कपाळाला हात लावला आणि बराच वेळ तिथल्या खुर्चीत विचार करत बसून राहिले. ‘माझ्यासारख्या एककल्ली माणसाला सुलोचनेनं इतकी वर्षे कसं सहन केलं असेल? स्वत:चं मन मारून ‘तुम्ही म्हणाल तसं’, असं म्हणत, दुसरं कुणी माझ्याशी संसार केला असता का? कसल्याही गोष्टीचा त्रागा नाही. आदळआपट नाही. या उलट ती मला समजून घेत शांत करत आलीय. मुलांच्यावर संस्कार करण्याचं काम आणि त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण धुरा तिनं एकटीने सांभाळली आहे. ती नसती तर.. ?’

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ब्रेकअप…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “ब्रेकअप…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

“हॅलो… हॅलो… बाबा, मी संजय ! झोपला होतात का?”

लंडनवरून संजयचा आबांना फोन. “नाही, आत्ताच डोळा लागला होता पुस्तक वाचताना. बोल तू. आत्ता कसा काय फोन केलास? तुझ्याकडे रात्र असेल ना?”, आबा मनगटावरील घड्याळात बघत म्हणाले. “आबा, अहो तुम्ही परत विसरलात. मी आता अमेरिकेत नाही, लंडनला आहे. इथे सकाळचे ११. ३० वाजलेत. तुमच्याकडे साधारण चार वाजले असतील बघा”, संजयचं स्पष्टीकरण.

“अरे हो की. बरं बोल, आणि फोन केलास तर जरा थोड्या वेळाने तरी करायचास. तुला माहिती आहे ना की आई रोज तीन ते पाचमध्ये पेटीच्या क्लासला आणि मग भजनाला जाते ते. उगाच डबल डबल फोन कशाला करता? पैसे वाया जातात”…

आबांचा टिपिकल मध्यमवर्गीय कोकणस्थीपणा मध्येमध्ये उचल खायचा. ब्याऐंशी वर्षांच्या आबांना खरंतर पैशाची काही ददात नव्हती. वडिलोपार्जित घराच्या जागी आता एव्हाना मोठी बिल्डिंग झाली होती. त्यात पूर्ण मजलाभर प्रशस्त फ्लॅट त्यांच्याच नावावर होता. त्यातही सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे चांगलं भरभक्कम पेन्शन होतं. पण हे सगळं ज्यांनी उपभोगायचं ती त्यांची मुलं देशाबाहेर. धाकटा कनिष्क कुटुंबासहित ऑस्ट्रेलियात आणि संजय बायको-मुलांसहीत लंडनला. एवढा मोठा फ्लॅट अंगावर यायचा. कधी कधी ते जुनं घरंच बरं वाटायचं. निदान तिथे आजूबाजूला बोलायला भाडेकरू तरी होते. नाही म्हटलं तरी वर्दळ असायची. अगदी कुणाकडेही पाहुणे आले तरी ओटीवर एकत्र बसून गप्पागोष्टी होत. आता त्यातलं काही राहिलं नाही. भाडेकरूंनाही स्वतःचे फ्लॅट मिळाल्यामुळे त्यांच्या घरांची दारं पण आताशा बंद राहू लागली होती…

“आबा, अहो पैशांचं काय घेऊन बसलात? आणि मी तुमचीच चौकशी करायला फोन केलाय. कशी तब्येत आहे?”, संजयने विचारलं.

“मला काय धाड भरली आहे? मी ठणठणीत. रोज सकाळ-संध्याकाळ फिरायला जातो. मालतीच्या प्रकृतीची जरा कुरकुर चालू असते. पण ऐकणार कोण नव-याचं? फिरायला चल म्हंटलं तर येत नाही. जाऊ दे, चालायचंच. बरं तू कधी येतो आहेस?”, आबांचा प्रश्न.

“आबा, अहो आत्ताच सहा महिन्यांपूर्वी नाही का येऊन गेलो? विसरलात? आता लगेच सुट्टी नाही मिळायची”, संजयचं उत्तर.

“बरं, बरं. बघा जमलं तर यायला. कनिष्कलाही दोन वर्षं झाली येऊन. मालती फार आठवण काढते त्याची… “, आबांचा स्वर जडावला होता. “बरं, संजया, बेल वाजते आहे. तू मालती आली की फोन कर रात्री. ठेवतो आत्ता फोन”,

आबांनी घाईघाईत निरोप घेतला आणि दार उघडायला उठले. की-होल मधून त्यांनी पाहिले, मधुकररावांचा नातू अक्षय दार वाजवत होता. मधुकरराव हे पूर्वीच्या भाडेकरूंपैकीच, आता कुटुंबासह वरच्या मजल्यावर रहायला गेले होते. त्यांचा मुलगा, अक्षयचे वडील इन्शुरन्स कंपनीत होते. आबांनी दार उघडलं… “बोला अक्षयकुमार! आज आमची आठवण कशी काय आली?”, आबांनी हसत हसत विचारलं.

“काही नाही, मालती आजींच्या काही एफ. डी. मॅच्युअर होताहेत, तर बाबांनी त्याची आणि इन्शुरन्सच्या कामाची कागदपत्रं.. “, त्याचं वाक्य अर्धवट ऐकतच आबा वळून आत गेले. त्याला घरात जाणं भाग होतं आता. जराश्या नाखुषीनंच तो आत शिरला.

“अरे ये ये. जरा बसून बोल. दारात उभं राहून बोलणं आवडत नाही मला”, आबांनी त्याला जरा बळंच बसायला लावलं होतं. तो परत काही बोलणार इतक्यात आबाच म्हणाले, “बरं अक्षयकुमार तू चहा घेणार का ? मालतीआजी आता येईलच थोड्या वेळात. आमच्यासाठी करणारच आहे, तू घेणार असशील तर तुझ्यासाठी पण टाकतो. थांबच ! माझ्या हातचा चहा पिऊनच जा कसा?”, अक्षयला जराही बोलण्याची संधी न देता आबा चहा करायला उठले.

अक्षयचा नाईलाज झाला. काही न बोलता तो टेबलाजवळ खुर्ची ओढून बसला. अक्षय इंजिनिअरींगच्या तिस-या वर्षाला होता. गेले काही दिवस तो जरा अस्वस्थ होता. त्याचा आणि मयुरीचा तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला होता. अक्षय फार दुखावला होता त्यामुळे. या सेमिस्टरची परिक्षा पण त्याने दिली नव्हती. राहून राहून त्याला मयुरीची आठवण यायची की मग तो असा घुम्यासारखा वागायचा.

“अक्षयकुमार, अहो कसल्या विचारात गढला आहात? होईल सर्व ठीक. प्रेमभंगाचा विचार जितका जास्त कराल तितकं दुःख जास्ती होतं”, आबा बोलून गेले.

‘आयला, म्हातारा बेरकी आहे. एरवी या म्हाता-याला काल काय घडलं आठवत नाही.. माझं प्रेमप्रकरण बरं लक्षात राहिलं’.. अक्षय या विचाराने सटपटला. “नाही आबा, तसं काही नाही. मी ठीक आहे”, अक्षयने मनातले विचार लपवत म्हंटले.

आबा धूर्तपणे हसले. “कसं आहे ना अक्षय की काही काही गोष्टी माझ्या नेमक्या स्मरणात राहतात. आणि मी तिला पाहिलंय तुझ्याबरोबर अनेक वेळा. अरे आमचा पेन्शनर कट्टयाचा मार्ग तुमच्या त्या अड्डयावरूनच तर पुढे जातो. प्रेमात पडलेले सगळेजण मांजरासारखे असतात बघ. डोळे मिटून दूध पिणारे. त्यांना वाटतं त्यांना कुणी बघतच नाही”, आबा बोलत होते. अक्षयला तिथून कधी एकदा सुटतोय असं झालं होतं. “आणि बरं का अक्षयराव, प्रेमात असं हरायचं नसतं. एकदा फेल झालं तर परत परत प्रयत्न करायचा. आणि त्यातून प्रेभभंग झालाच तरी त्यापायी आपलं आयुष्य वाया नसतं घालवायचं”, आबा समजावणीच्या सुरात म्हणाले.

खूप दिवसांनी अक्षयशी बोलताना कुणीतरी थेट विषयाला हात घातला होता. त्याला न ओरडता, आकांडतांडव न करता कुणीतरी मित्रासारखं त्याच्याशी बोलत होतं. आबांनी त्याच्या समोर चहाचा कप ठेवला. “अरे कधी कधी काही वाईट गोष्टी घडतात ना आपल्या आयुष्यात त्या तेव्हा जरी क्लेशकारक वाटल्या तरी पुढे जाऊन अनेकवेळा फायदेशीर ठरल्याचा अनुभव येतो. तुझा बाप एवढा इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटमधला, तुझ्याशी काही बोलत नाही वाटतं?”, आबांनी जरा खोचकपणे विचारलं.

अक्षय गडबडला या प्रश्नाने. “म्हणजे? मला समजलं नाही आबा”, अक्षय.

“अरे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट नेहमी अशा माणसांत आणि नात्यांत करावी जी पुढे जाऊन तुमचा इन्शुरन्स बनतील. अशी माणसं आणि नाती काय उपयोगाची की जी मॅच्युरिटीच्या आधीच भांडवल काढून घेतील? मान्य की माणसांची पारख एकदम नाही करता येत. पण म्हणून सहा महिन्यांचं प्रेम सर्वस्व मानून त्यापायी आपल्या आयुष्याची, जवळच्या लोकांची आणि मुख्य म्हणजे करिअरची फरफट करायची नसते. आयुष्य हे या चहासारखं आहे बघ ! अति गोड कराल तरी बेचव, अगोड तरी बेचवच ! चहावरून आठवलं, रिटायर झाल्यादिवशीच मी सांगितलं मालतीला की आता सकाळ, संध्याकाळचा चहा मी करणार. गेली जवळपास चोवीस वर्षं हा नेम मोडला नाहीये, आहेस कुठे? आता मालती येत असेल. आली की लगेच गरमागरम चाय समोर हजर! बरं ते तू कागदपत्रांचं काय बाबा म्हणत होतास? गप्पा झाल्या, चहा झाला तरी मुख्य काम विसरायला नको”, आबा हसत हसत म्हणाले.

चहाचा कप ठेवत अक्षय उठला. “आबा, खूप दिवसांनी कुणीतरी छान बोललंय माझ्याशी. थँक यू! मी लक्षात ठेवीन तुमचा सल्ला… इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स… माणसं… नाती… आणि हो कागदपत्रांचं बाबा संजय दादाशी बोलतील नंतर. आता येतो”, म्हणून अक्षय उठला आणि दाराबाहेर पडला.

…. मालती आजी सहा महिन्यांपूर्वीच वारली, ती कधीच परत येणार नाही हे फिरून आबांना सांगावं वाटलं त्याला. ज्या आभासी, कल्पित जगाच्या भिंती त्यांनी उभ्या केल्या होत्या, त्या पाडून त्यातून त्यांना बाहेर काढावं असं देखील वाटून गेलं क्षणभर… पण पुढच्याच क्षणी विचार आला की सहा-आठ महिन्यांच्या अफेअरचं ब्रेकअप झालं तर एवढा त्रास होतोय आपल्याला… साठ वर्षांचं सहजीवन जिथे अचानक संपलं तो धक्का पचवायला वेळ लागेलच ना… आपल्या पाठीमागे दरवाजा ओढून अक्षय निघून गेला, एक नवी उमेद घेऊन!

की-होल मधून अक्षयला गेलेलं पाहून आबा मागे वळले…

बेडरूममध्ये जाऊन उशीखालचा मालती आजींचा फोटो समोर ठेवला आणि स्वतःशीच बोलू लागले, “मालती… आपली इन्व्हेस्टमेंट चुकली का गं पोरांमधली ? पैशाचा इन्शुरन्स नको आहे या वयात… माणसांचा हवाय… आपल्याशी बोलणारी माणसं, आपली विचारपूस करणारी माणसं, प्रत्यक्षात भेटून काय हवं नको विचारणारी माणसं… लोकांना वाटतं म्हातारा वेडा झालायं… बायकोच्या जाण्याचा धक्का सहन न होऊन ती आहे असं मानून जगतोय… जाता येता एकटाच बडबड करतोय… पण तसं करतो म्हणून तरी चार लोक चौकशी करतात. बाप विसरभोळा झालायं… न जाणो, उद्या पोरं आहेत हेच विसरला तर इस्टेटीमध्ये वाटा मिळणार नाही या भावनेतून का होईना रोज फोन करून चौकशी करतात. असो, त्यांना काय कळणार म्हणा या वयात एकटं पडण्याचं दुःख? चल, मी चहा ओततो… आज गॅलरीत झोपाळ्यावर बसून सूर्यास्त पाहत चहा पिऊ…

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “रिकामेपण…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “रिकामेपण…” ☆ श्री मंगेश मधुकर

आभाळ भरून आलेलं, संध्याकाळी चार वाजताच प्रचंड अंधार झाला होता. पांघरून घेऊन झोपलेले अप्पा जागे झाले.

रोजच्या सवयीने त्यांनी आवराआवर सुरु केली. तोंड धुतल्यानंतर दुधाचा चहा पिला.

गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर पूजा केली आणि पेपरची वाट पाहत बसले.

दुपारची झोप काढून रमेश हॉलमध्ये आला.

“अप्पा, कसली वाट पाहताय”

“पेपरची, ”

“पेपर, आत्ता???”रमेश अप्पांकडे पाहत विचारले.

“असं का विचारतो आहेस??”

“अप्पा, संध्याकाळचे पाच वाजले आहेत”

“काय!!” अप्पांच्या चेहऱ्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह??त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. रडवेला चेहरा करून म्हणाले “मला वाटलं सकाळ झाली म्हणून नेहमीप्रमाणे…… सॉरी सॉरी”

“अप्पा, आज दोनदा आंघोळ आणि पूजा, भारी” राहीने अप्पांना चिडवले.

“अजून चिडव, चूक माझीच आहे, तुला काय बोलायचे??डोकं काम करत नाही, आता तर वेळ काळ सुद्धा कळत नाही. ”अप्पा

रमेश काही बोलला नाही पण रंजना, राही मोठमोठ्याने हसायला लागल्या. वाद नको म्हणून रमेशने त्यांना गप्प राहण्यास सांगितले.

चिडलेले अप्पा नेहमीप्रमाणे भिंतीकडे तोंड करून पडून राहिले. मनात विचारांचे काहूर उठले. सिगरेट पिण्याची अतिशय इच्छा झाली पण घरात सगळे होते आणि पावसामुळे बाहेर जाता येत नव्हते. तळमळत अप्पा पडून राहिले. टीव्ही चालू होता पण अप्पांना त्यात इंटरेस्ट नव्हता.

रात्री रंजनाने वाढून दिल्यावर जेवण करून, औषधे घेऊन पुन्हा अप्पा पांघरून घेऊन झोपले पण मनातील अस्वस्थता वाढली, झोपही येत नव्हती, काय करावे तेच सुचत नव्हते. सारखी सारखी कूस बदलून सुद्धा कंटाळा आला होता. घरातले सगळे झोपले तरी अप्पा मात्र टक्क जागे होते, मनातील खदखद बाहेर काढायची होती पण सोबत कोणी नव्हते. अचानक त्यांना कल्पना सुचली, अप्पा उठले. कपाटातून कागद काढला आणि लिहायला सुरवात केली…..

“ प्रिय अगं,

पत्रास कारण की,

तुला कधी नावाने हाक मारली नाही, कायम “अगं” म्हणायचा अवकाश की लगेच तू उत्तर द्यायची. म्हणून त्याच नावाने सुरवात केली. चाळीस वर्ष संसार केला आणि आज पहिल्यांदा तुला पत्र लिहितो आहे. सात वर्षापूर्वी तू गेलीस आणि संसार संपला. आधी स्वतःचाच विचार करताना तुला कायम गृहीत धरले आणि तुझ्यानंतर परावलंबी झालो. तडजोडी करताना खूप त्रास झाला पण आता सवय झाली. हे सगळं आजच लिहिण्याचे कारण, आज तुझी खूप खूप आठवण येते आहे. रिटायर होऊन आता पंधरा वर्षे झाली. परमेश्वराचा आशीर्वाद, उत्तम तब्येत, घरच्यांचे प्रेम आहे, सांभाळून घेतात, कसलच टेन्शन नाही, पेन्शनमुळे पैशाचीही काळजी नाही. स्वतःला जपण्याची सवय त्यामुळे वयानुसार झालेले आजार सोडले तर तब्येत उत्तम आहे. लौकिक अर्थाने सगळे व्यवस्थित आहे तरीसुद्धा काही दिवसांपासून फार एकटं एकटं वाटतयं, कसलीतरी हुरहूर वाटते, सारखी भीती वाटते. मन मोकळे करावे असे कोणीच नाही त्याला कारण सुद्धा मीच.

….. रिटायरमेंट नंतर आरामाच्या नावाखाली फक्त झोपाच काढल्या, बाकी काहीच केले नाही. आत्मकेंद्री स्वभाव, मुखदुर्बळ, कसलीच महत्वाकांक्षा नाही, स्वप्ने नाहीत वडिलांच्या ओळखीने मिळालेली सरकारी नोकरी आयुष्यभर केली. भरपूर कष्ट केले, तडजोडी केल्या त्यामुळे रिटायर झाल्यानंतर फक्त आराम करायचा हे मनाशी पक्के केले होते आणि तसेच केले. स्वतःला पाहिजे तसे वागलो, कधी दुसऱ्यांचा विचार केला नाही, प्रसंगी हेकेखोरपणाही केला. सकाळी लवकर उठायचे, आवराआवर करायची, तासभर पेपरवाचन, मग दोन तास बसस्टॉपच्या कट्ट्यावर गप्पा, एक वाजता जेवण, दुपारी झोप, संध्याकाळी चार वाजता दूध मग पुन्हा कट्ट्यावर गप्पा, सात वाजता घरात मग नऊ वाजेपर्यंत सिरियल्स मग पुन्हा झोप. गेली अनेक वर्षे हाच दिनक्रम ठरलेला.

पण………

वर्षानुवर्षे त्याच त्या रुटीनचा आता कंटाळलो आहे. दिवसेंदिवस बेचैनी वाढत आहे. सतत पडून राहणे आता नको वाटते आणि दुसरे काही करण्याची इच्छा नाही तसे कधी प्रयत्न केले नाहीत. खास आवड, छंद वैगरे नाही. दहा मिनिटांची देवपूजा आणि तासभर पेपरवाचन सोडले तर दिवसभरात फक्त आरामच केला. तू नेहमी सांगायचीस कशाततरी मन गुंतवून घ्या, फिरायला जा, मित्र जोडा पण ऐकले नाही. रिटायर झाल्यानंतर काय करायचे याचे नियोजन करायला पाहिजे होते असे आता वाटते पण खूप उशीर झाला आहे. नोकरी असताना घडयाळाकडे बघायला वेळ मिळत नव्हता आणि आता घड्याळाकडे पहायचीच इच्छा होत नाही कारण वेळ पुढे सरकतच नाही. आख्खा दिवस मोठठा आ करून समोर असतो, जसा शुक्रवार, शनिवार तसाच सोमवार, काहीच काम नाही त्यामुळे रविवारच्या सुट्टीचे कौतुक नाही. रोजचा दिवस एकसारखा, नवीन घडत नाही. सणांच्या बाबतीत तेच. घरातले आपापल्या व्यापात, एकमेकांशी संवाद होतो तो कामापुरता. कोणी जाणीवपूर्वक वागत नाही पण मीच कमी बोलतो त्यामुळे आपसूकच संवाद कमी आहे. कट्ट्यावर जावे तर जे सोबत आहेत त्यांची परिस्थितीसुद्धा फार वेगळी नाही. सगळ्यांचीच नजर शून्यात असते. वेळ खायला उठतो. मला खरंच आता नक्की काय करावे हे समजत नाही. सिगरेटचे प्रमाण वाढले आहे. घरातले सारखे सांगतात सिगरेट कमी करा पण माझाच स्वतःवर ताबा नाही. खूप अपराध्यासारखे वाटते पण मी हतबल आहे. खूप सारे प्रश्न पडले आहेत. आलेला दिवस ढकलणे एवढेच करतो आहे. ” डोळ्यातले थेंब कागदावर पडले. अप्पा लिहिण्याचे थांबले नंतर बराच वेळ छताकडे पाहत पडून राहिले. विचारांचे चक्र चालू असताना त्यांना झोप लागली.

पक्षांच्या किलबिलाटाने जाग आल्यावर अप्पांनी खिडकीबाहेर पाहिले तर उजाडायाला सुरवात झाली होती. घड्याळात वेळ पाहून सकाळ झाली आहे याची खात्री अप्पांनी करून घेतली आणि स्वतःवरच हसले. रेडिओ सुरु करून किचनमधून भांडे घेऊन दुधवाल्याची वाट बघत दारात उभे राहिले त्याचवेळी एफ एमवर भूपिंदर गात होते “दिन खाली खाली बर्तन है और रात अंधेरा कुवां, एक अकेला इस शहर में रात में और दोपहर में….. ” गाणे ऐकून अप्पांचे लक्ष सहज हातातल्या रिकाम्या भांड्याकडे पाहत भकासपणे हसले.

..

रोजच्या वेळेत दुधवाला येऊन गेला. अप्पांच्या हातातले रिकामे भांडे दुधाने भरून गेले. सहज लक्ष दारातल्या कुंडीकडे गेले. तिथल्या सुकलेल्या एका रोपट्याला नवीन पालवी फुटत होती. निराश अप्पांना दुधाने भरलेले भांडे आणि फुटत असलेली पालवी पाहून पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. स्वतःला बदलायला हवे, पुन्हा नवीन सुरवात करायची. आता रिटायरमेंट मधूनच रिटायर व्हायचे असे म्हणत अप्पा दिलखुलास हसले. भांड्यामधील थोडे दुध रोपट्यावर ओतले आणि नवीन उमेद घेऊन प्रसन्न, टवटवीत मनाने घरात गेले आणि पहिल्यांदाच सगळ्यांसाठी चहाचे आधण ठेवले त्याचवेळी एफएम वर किशोरदा गात होते..

“थोडा है.. थोडे की जरुरत है.. , जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है…” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुतम कथा… – लेखक :डॉ. रमेश यादव ☆ मराठी भावानुवाद – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुतम कथा… – लेखक :डॉ. रमेश यादव ☆ मराठी भावानुवाद – सौ. गौरी गाडेकर

 

१. आई कधी रिटायर होते का !

मूळ हिंदी कथा : क्या माँ भी कभी रिटायर होती है!

दहा वाजायला काहीच मिनिटं बाकी होती. सगळ्यांच्या नजरा मुख्य दारावर खिळल्या होत्या. आणि मिसेस अनिता जोशींनी ऑफिसात प्रवेश केला. काचेचा दरवाजा उघडून त्यांनी आत पाय ठेवताच सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं. त्यांना कुंकू लावलं, ओवाळलं, हार घातला आणि त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या. सर्वांनी त्यांना सुखी, संपन्न, निरोगी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस विशेष आहे, हे त्यांना जाणवून द्यायचा सगळेच जण प्रयत्न करत होते. अगदी क्षणक्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते.

कितीही प्रयत्न केला, तरी त्या आपल्या भावना अडवू शकल्या नाहीत. डोळ्यांतून झरणाऱ्या अश्रूंना पदराने पुसत त्या पुढे गेल्या. एका कर्मचाऱ्याने खाली वाकून त्यांच्या पुढ्यात मस्टर ठेवलं. मिसेस जोशी सही करू लागल्या. मस्टरवरची ही त्यांची शेवटची सही होती. सहीच कशाला, ऑफिसचा प्रत्येक क्षणच त्यांच्यासाठी शेवटचा होता. भावुक होऊन प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयाच्या कॅमेऱ्यात कैद करत प्रत्येक क्षण जगायचा त्या प्रयत्न करत होत्या.

मिसेस जोशींना माहीत होतं, की उद्यापासून हे ऑफिस त्यांच्यासाठी परकं होणार आहे. नोकरीचा हा शेवटचा दिवस त्यांना उलटसुलट झटके देत होता. रोजच्या धावपळीच्या आयुष्यापासून मुक्तीचा आनंद की खुर्ची जाण्याचं दुःख.. ! द्विधा मनःस्थिती.. !

” मॅडम, आज तुम्ही काम करू नका. सगळ्यांशी बोला आणि फक्त निरोपसमारंभाची तयारी करा. ” असा नियम नाही. पण मॅनेजरसाहेबांनी सहृदयता दाखवली. टार्गेटच्या या काळात ती दुर्मिळच झालीय!

मिसेस जोशींनी मोबाईल उघडताच त्यांच्या डोक्यात भविष्यातल्या योजनांचा प्रवास वेगात सुरू झाला. त्या विचार करू लागल्या – नोकरी करता करता चाळीस वर्षं कशी निघून गेली, कळलंच नाही. मुंबईचं हे वेगवान आयुष्य, रोजची ट्रेनची धावपळ…. दुसऱ्याच क्षणी त्यांच्या डोळ्यांसमोर घर-संसाराचं दृश्य तरळलं. ते तर त्यांना यापुढेही निभवायचं होतंच. मुलीचं डोहाळजेवण, मुलगे, सुना, नवरा, सासूच्या जबाबदाऱ्या, नंतर नातवंडांशी खेळायचं स्वप्न, त्यांना सांभाळणं, त्यांच्या अभ्यासाची काळजी, वयपरत्वे येणारी दुखणी, स्वयंपाकाची जबाबदारी…. हे सगळं तर निभवायचंच आहे. सेवानिवृत्ती म्हणजे ऑफिसातून मिळणाऱ्या पगारातून निवृत्ती! आई कधी रिटायर होते का?

आणि मोबाईल बंद करून त्या पुन्हा वर्तमानात आल्या.

मूळ हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव

मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

♥ ♥ ♥ ♥ ♥

२.  तुझं तुलाच अर्पण

मूळ हिंदी कथा : ‘तेरा तुझको अर्पण ‘

शहरातल्या सुप्रसिद्ध उद्योगपती अगरवालजींचा 75वा वाढदिवस होता. त्यांच्या हवेलीत होम -हवन, पूजा-पाठ आणि मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबातील सर्व लहान -मोठे सदस्य भटजींबरोबर पूजाविधीत सहभागी झाले होते. यावेळी भटजींनी जीवनाचं मर्म सांगणाऱ्या कथेद्वारा जीवनात आनंद व सुखाचा ताळमेळ कसा साधावा, त्याची युक्ती सांगितली. कथा संपताच भटजी होमाकडे वळले.

अगरवालजी आपल्या स्वभावानुसार हात राखून समिधा समर्पित करत होते. त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच समिधा उरल्या होत्या. शेवटी भटजींनी होम -हवनाची सांगता झाल्याचं सांगत अंतिम मंत्र म्हटला आणि म्हटलं, ” आता जी काही उरली असेल ती सर्व सामग्री हवनकुंडात एकदमच समर्पित करा आणि मोठ्याने बोला, ” स्वाहा!”

हवनकुंडात समिधांचं प्रमाण जास्त झाल्याने सगळीकडे धूर पसरला. अगरवालजी डोळे चोळू लागले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांपुढे त्यांचा भूतकाळ तरळू लागला. त्यांच्या डोक्यात विचार आला – ‘ अरे ! हात राखून खर्च करत पैसे वाचवण्याच्या नादात मी माझ्या जीवनातही भरपूर समिधा वाचवल्या आहेत. जीवनाचा आनंद घ्यायचं तर राहूनच गेलं. आता तर एकदमच सर्व समर्पण करायची वेळ आली आहे. इथून फक्त डोळ्यांत पाणी आणि समोर धुरळाच धुरळा दिसत आहे. याचा अर्थ, आपल्या जीवनातही समिधासमर्पणाचं संतुलन चुकलं होतं. ‘

‘तुझं तुलाच अर्पण’ म्हणत त्यांनी डोळे उघडले आणि संकल्प केला की यापुढे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने गरीब, असाहाय्य, विकलांग तसंच गरजवंतांच्या सेवेसाठी ते आपल्याजवळील जास्तीच्या पैशांचा उपयोग करतील. लगेचच निराशेचे ढग विरून गेले आणि नव्या जोशाने ते आनंदाचे क्षण उपभोगू लागले.

 मूळ हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव

मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

♥ ♥ ♥ ♥ ♥

३. ऑक्सिजन लेव्हल

 

मोबाईलची रिंग वाजली. त्याने नाव बघितलं आणि तो चकित झाला. घेऊ की नको, या द्विधेत फोन बंद झाला. ते नाव बघून त्याचं मन विचलित झालं. त्याच्या डोळ्यांसमोर ते दृश्य आलं, ‘ त्या घटनेला मी एकटाच जबाबदार होतो का? आम्हा दोघांमध्ये एवढा चांगला ताळमेळ होता, एवढं चांगलं बॉण्डिंग होतं, तर ऑफिसात सगळ्यांसमोर असा तमाशा करण्याची गरज होती का? ‘

हॉस्पिटलमध्ये बेडवर पडल्यापडल्या, आशा-निराशेच्या गर्तेत गोते खाताखाता तो विचार करत होता. तशी त्याची स्थिती तेवढी गंभीर नव्हती. पण ऑक्सिजन लेव्हल 70-75 मध्येच अडकली होती. सगळीकडून येणाऱ्या बातम्या भीती आणि दहशत निर्माण करत होत्या. महामारीचा काळ होता तो.

संध्याकाळ होताहोता पुन्हा फोनची रिंग वाजली. तेच नाव दिसत होतं. पण यावेळी त्याने फोन घेतला.

“हॅलो प्रकाश, मी नीलिमा बोलतेय. तुझी तब्येत कशी आहे आता?”

” आधीपेक्षा सुधारलीय. पण ऑक्सिजन लेव्हल अजूनही कमी आहे. “

” तुला हॉस्पिटलात ऍडमिट केल्याचं कळलं, तेव्हा मी स्वतःला फोन करण्यापासून थांबवू शकले नाही. दोनदा फोन केला, पण तू उचलला नाहीस. अजूनही नाराज आहेस माझ्यावर? जे घडलं, तो अपघात होता, असं समजून विसरून जा. मीही विसरले आहे. “

सुटकेचा श्वास सोडत तो म्हणाला, ” मॅडमजी, तुमच्याशी बोलायची हिंमतच होत नव्हती. किती मोठं आहे तुमचं मन ! आय ऍम सॉरी, मॅडमजी ! चूक माझीच होती. “

” ए… ! मॅडमजी नाही. नीलू मॅडम म्हण. मला तेच आवडतं. फक्त तुझीच नाही, तर माझीही चूक होतीच की. आपण दोघंही विवाहित आहोत, हे माहीत असूनही आपल्या घरच्या गोष्टीही आरामात एकमेकांना सांगायचो. तुझ्याशी बोलल्यावर माझ्या मनावरचं दडपण कमी व्हायचं. तू ह्याला माझा स्वार्थही म्हणू शकतोस. पण त्या दिवशीच्या घटनेनंतर मला जाणवलं की माझा एका मर्यादेपलीकडचा मोकळेपणा आणि चंचल स्वभाव हेच मुख्य कारण होतं. त्यामुळेच तुझा गैरसमज झाला आणि तू बहकलास. “

” हो, मॅम. खरं आहे हे. मी माझं संतुलन घालवायला नको होतं. “

” प्रकाश, तेव्हा माझ्या मनात हा विचार आला नाही, की पुरुषांच्या मनात स्त्रियांविषयी असणारं आकर्षण जास्त असतं. आणि ही निसर्गदत्त, स्वाभाविक प्रक्रिया आहे. तू माझा फक्त सहकारी नव्हतास, तर माझा जवळचा मित्र झाला होतास. “

“मॅम, माझ्याही नंतर लक्षात आलं की मी माझ्या मर्यादेत राहायला हवं होतं. तुमचा स्वभाव फ्री होता, त्यामुळे मी एकतर्फी… प्रेम… “

“बस, बस… नो मोअर डिस्कशन… ! टॉपिक क्लोज्ड नाऊ. आणि हो, जेव्हा केव्हा तुला गरज पडेल, तेव्हा निःसंकोच मला फोन कर. मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन. उद्या पुन्हा याच वेळी कॉल करीन. ओके. बाय! टेक केअर. “

फोन बंद होताच त्याला वाटलं, की त्याचे हात स्वर्गाला टेकले आहेत. आता तो पूर्णपणे तणावमुक्त झाला होता. आपल्या आत एका नव्याच ऊर्जेचा संचार झाल्यासारखं त्याला वाटत होतं.

मॉनिटरवरचा ऑक्सिजनचा ग्राफ बघत प्रकाशने सावकाश डोळे मिटले.

मूळ हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव

मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

♥ ♥ ♥ ♥ ♥

मूळ तीन हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव

मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “…करूया आपण आत्मपरीक्षण…–” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “…करूया आपण आत्मपरीक्षण…–☆ श्री जगदीश काबरे ☆

(3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त)

अपवाद वगळता आजच्या अनेक शिक्षित-अशिक्षित स्रियांना स्वत:ची अशी ओळख आहे का? स्वत:ची अस्मिता, स्वत:चा स्वाभिमान आहे का? मी नेहमी स्रियांना एक प्रश्न विचारत असतो की, तुम्ही शिकून नवीन काय केलं? सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्ही उपयोग काय केला? तुम्हाला सावित्रीबाईनी शिक्षण दिलं त्यासाठी अंगावर दगड माती झेलून, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवऱ्याची सेवा करायला, संत्संगला जायला, पोथीपुराणे वाचता यावीत, उपासतापास करता यावेत, वैभवलक्ष्मीची पारायणे करता यावीत याच्यासाठी सावित्रीबाईनी तुम्हाला शिक्षणासाठी उद्युक्त केलं का? याच्यासाठी सावित्रीबाईंनी का दगड-माती खाल्ले? याच्यासाठीचं का सावित्रीबाईंनी वाटेल तसा मान-अपमान सहन केला? कशासाठी केला त्यांनी हा उपद्व्याप? तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून? तुम्हाला पार्लरला जाऊन स्वत:ला नटता यावे म्हणून? ह्या शिक्षित स्रियांनी नवीन काय केलं? दोनशे वर्षापुर्वीही स्री हे सर्व न शिकता, आपल्या, मुलाबाळांना, पतीला, सासू-सासऱ्याला न्याय देत होती की. न शिकताच सर्व करीत होती तर मग तुम्ही नवीन काय केलं?

सावित्रीबाई फुले यांच्यामुळे गेल्या काही वर्षात स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन असे टप्पे घेत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारे कसे तिच्या मनासारखे झाले. पण तिचे जळणे, सोसणे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार थंबला का? वर्तमानपत्रातील बलात्काराच्या बातम्या, हुंडाबळी आणि मारहाणीच्या बातम्या ओरडून, किंचाळून सांगताहेत की, स्त्रीचे जळणे अद्याप सुरू आहे. विद्याविभूषित आणि भरमसाठ पगार घेणारी स्त्रीसुध्दा कधीकधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचे पाऊल उचलते. स्वत:ला आधुनिक समजणाऱ्या प्रथितयश अभिनेत्रीनासुध्दा स्त्रीदेहाचे प्रदर्शन आणि कधीकधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही. हे सारे पाहिले की वाटते, आजही स्त्रीचे सती जाणे सुरूच आहे. फक्त त्याचे स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलली आहे. स्त्री खरेच मुक्त झाली आहे का?🤔

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares