मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवकळा – भाग-1☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ शिवकळा – भाग-1☆ श्री आनंदहरी 

नेहमीप्रमाणे कोंबड्याच्या पहिल्या आरवण्याला तिला जाग आली. नवरा ढाराढूर घोरत पडला होता. तिने काही त्याला उठवलं नाही. पटापट स्वतःचं सारं आवरलं आणि चुलीवर चहा ठेवून भाकरीचं पीठ मळायला घेतलं आणि त्याला हाक मारली. दोन तीन हाका मारल्या तेव्हा तो उठला. दारातल्या रांजणातून डिचकीभर पाणी घेऊन तोंड धुतलं आणि चुलीपाशी येवून बसला.तिने वैलावरचा चहा उतरून पुढयातली कपबशी भरली आणि त्याच्यापुढे ठेवत त्याला म्हणाली,

“ येरवाळीच पाळकातल्या सदानानाकडं कोळपाय जायाचं हाय… ध्येनात हाय न्हवं ?”

“ व्हय. हाय की ध्येनात. “

“ आवरा बिगीबिगी. तंवर भाकरी बांदून द्येत्ये.” तो आवरुन भाकरी घेऊन सदानानाकडे कोळपायला निघुन गेला. तिने स्वतःचे सारं आवरलं. आपली भाकरी बांधून घेतली आणि घराचे दार लावलं. बाहेरच्या बाजूला दिवळीत ठेवलेले खुरपं घेवून, भांगलायला उशीर होऊ नये म्हणून ती लगबगीनं निघून गेली.

घरी येईपर्यन्त दिवेलागण झाली होती. तो परत आल्याचं काहीच चिन्ह दिसेना. तिला आश्चर्य वाटलं. ‘ कोणीतरी भेटलं असेल, बसलं असतील बाण्या हाणत ..’ असा विचार करून तिने हातपाय धुवून चूल पेटवली. चहाचं भुगूनं चुलीवर ठेवलं आणि ती घरातली इकडची-तिकडची आवराआवर करायला लागली. चहाला चांगली उकळी आल्यावर चुलीजवळ बसून चांगला कपभर चहा प्याल्यावर तिला जरा बरं वाटलं. चांगली तरतरी आल्यासारखी वाटली. ‘आता ईतीलच ही..कुटंसं ऱ्हायल्यात कुणास ठावं ? आतापातूर याला पायजेल हुतं .’ असे मनोमन म्हणत ती रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

भाकरी झाल्या, कालवण झालं तरी त्याचा पत्ताच नव्हता. तो अजून आला कसा नाही ? या विचाराने ती मनोमन अस्वस्थ झाली. काय करावं ते तिला सुचेना. एकदा वाटलं सदानानाकडं जावून चौकशी करून यावं… पण एवढ्या रात्रीचं एवढ्या लांब पाळकात जाणे शक्य नव्हते. ती त्याची वाट पहात बसून राहिली.

मनात नाना विचार येत होते. काळजी वाटत होती. दिवसभरच्या कामानं अंग आंबून गेलेलं होते. दोन घास खाऊन केव्हा एकदा पाठ भुईला टेकतोय असे तिला झालेलं होते पण तिला काही खावंसं वाटेना. सारा स्वयंपाक तसाच होता. ती दाराकडे नजर लावून विचार करत, काळजी करत भिंतीला टेकून बसून राहिली होती.

तिला बसल्या जागीच बऱ्याच वेळाने कधीतरी डोळा लागला होता. जाग आली तेंव्हा चांगलेच फटफटलं होते. तो परत आलेलाच नव्हता. ‘ मागल्यावानी कूटंतरी ग्येलं नसतीली न्हवं ? ‘ तिच्या मनात आलं आणि तिला रडूच आलं .

मनाला कसंबसं सावरत तिने पटकन स्वतःचं आवरलं. कुणाकडे जावून अशी चौकशी करणे तिला बरे वाटत नव्हतं पण दूसरा पर्याय नव्हता. ती झपाझप चालत पाळकात सदानानाकडं गेली. सदानानांनी जे सांगितले ते ऐकून तिने डोक्यावर हातंच मारून घेतला. तिचा नवरा सदानानांनी बोलावूनही आणि तिने सांगूनही सदानानाकडं कोळपायला गेलाच नव्हता.

तिच्या मनातली भीती खरी ठरली होती. तिचा नवरा पुन्हा एकदा तिला एकटीला सोडून कुठेतरी गेला होता, परागंदा झाला होता. तिला ते जाणवले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तिच्या कुवतीनुसार शोध घ्यायचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे तिलाही चांगलंच ठावूक होते.

पहिल्यापासून तसा तो चंचलच होता. एके ठिकाणी फार काळ रमायचाच नाही. आपण कुठं जातोय? कशासाठी जातोय? हे घरात कुणालातरी सांगावं, आपल्यामागे कुणीतरी आपली काळजी करत बसतील हे कधीच त्याच्या गावीही नव्हतं. कापलेल्या पतंगासारखा तो कुठंतरी भरकटायचा. निदान लग्न झाल्यावर तरी त्याच्या वागण्यात सुधारणा व्हायला हवी होती, जबाबदारीची जाणिव यायला हवी होती पण तसं काहीच घडलं नव्हतं.

तो कितीतरी वेळा असाच अचानक, न सांगता-सवरता कुठंतरी गेला होता आणि कधी दोन-चार दिवसांनी, कधी आठ-दहा दिवसांनी आला होता. एकदा तर चक्क महिन्याभराने आपला आपण परत आला होता. तिने प्रत्येकवेळी त्याला सांगायचा, समजवायचा प्रयत्न केला होता. तो ही समजून घ्यायचा, ‘चूक झाली..’ असे म्हणायचा. ‘ पुन्हा कधी असे जाणार नाही..’ असे आश्वासन द्यायचा.. पण ते तेवढ्यापुरतंच असायचं.

 क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महत्वाकांक्षा….. भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

? जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षा….. भाग 2 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

(आता आईही जरा विचारात पडली. संध्याकाळी सुषमानं विचित्र पद्धतीनं लग्न ठरल्याची बातमी सांगितली होती तिला.) इथून पुढे —- 

सीमा बाहेर जाण्यासाठी तयार व्हायला गेली आहे हे बघून सुषमानं विचारलं,

” काकू, तुम्ही सीमाचं लग्न करणार नाही वाटतं?”

या अनपेक्षीत प्रश्नानं  आई  गोंधळून गेली. 

“का ग, तुझं ठरलंय वाटतं.” 

“हो तर. . . 

मग ती किल्ली दिल्यासारखी बोलायला लागली. . . .  स्वतः चं लग्न ठरलं हे सांगण्याची ही कुठली अनोखी पद्धत!! कदाचित संकोच वाटला असेल. . . . पण हे काहीतरी भलतंच. . . आपल्या जीवश्चकंठश्च मैत्रिणीला तिनं ही गोड बातमी सांगू नये याचं आईला राहून राहून आश्चर्य वाटत राहिलं. एक विषाद दोघींच्या मनात भरून राहिला.

दिवस थांबत नाहीत. सीमाचं ही लग्न झालं. पाठची  भावंडं, आई-वडील, मध्यम वर्गीय परिस्थिती हा सगळा विचार करून सीमा नोकरी, मुलं, सासू सासरे, यात  गुरफटत गेली. नोकरीत वरिष्ठ पदावर गेली. लाघवी स्वभावामुळं माईंची; सासुबाईंची, मदत मिळवली. सासऱ्यांची कौतुकाची थाप होतीच. सुधीरचं प्रेम साथीला होतंच. पण . . एक सल रुतत होता, सतत टोचत होता.अशातच एक दिवस आईचा फोन आला. तिला रमाकाकूंकडून समजलं होतं. सुषमा कोल्हापुरात परत आली होती. विजयची सरकारी नोकरी. तो चांगला एवन ऑफिसर होता. त्याची तीन चार वर्षांनी बदली होत असे. सुषमाला वाटे एकाच गावात राहिलो तर आपली चांगली करिअर होईल. तिनं विजय बरोबर बदलीच्या गावी जाण्यास नकार दिला. पियूला, लेकीला घेऊन ती परत आली. एका खाजगी शाळेत काम करु लागली.

सीमा धावतच गेली सुषमाला भेटायला. रमाकाकू काळजीत होत्या.

 “सीमा, बाई, तू समजाव ग तिला. बघ तुझं तरी ऐकते का. सोन्यासारखा संसार करायचा सोडून कसलं हे करिअरचं खुळ डोक्यात धरलंय.”

 छे ! ऐकेल तर सुषमा कसली ! तिच्या उत्तरानं उलट सीमा मोडून गेली. 

“तुला मुळी महत्त्वाकांक्षाच नाही.” या वाक्यानं आपली मैत्रीण हरवल्याची खंत घेऊन सीमा तिथून बाहेर पडली होती. पुढं सीमा कधीच विजय सोबत राहिली नाही. तोच बिचारा अधेमधे येत असे रजा काढून. दोन दिवस राहून पियूला भेटून जात असे. नंतर नंतर पियू आजीकडं म्हणजे रमाकाकूंकडंच राहू लागली. आपल्या मामीत आईला शोधू लागली. सुषमाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न मात्र पियूनं पूर्ण केलं. चांगले मार्क्स मिळवून तिनं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.

रमाकाकूंच्या घरी पोहचेपर्यंत सीमाच्या डोळ्यासमोरून हा सगळा जीवनपट तरंगत गेला. 

काकू तिची वाटच बघत असाव्यात. सीमाला बघताच त्यांनी डोळ्याला पदर लावला.

“काय झालं काकू? असा त्रास कशाला करुन घेताय?”

“मग काय करु? तूच सांग. ही मूर्ख मुलगी, स्वतः च्या हातानंच धोंडा पाडून घेतला बघ या बयेनं.”

“काकू, सुषा कुठंय?”

“जाऊ दे, जाऊ दे तिला कुठंतरी.” 

“मला समजलं नाही काकू. असं झालंय तरी काय?”

“अगं विजयराव येऊन गेले परवा. राहिले होते आठवडाभर. हिला म्हणत होते, चल आता, सगळे मिळून राहू. काही दिवसांनी पियूचं लग्न होईल. चल ग माझ्याबरोबर.”

“मग? काय म्हणाली सुषमा?”, उत्तर माहिती असूनही सीमानं विचारलं.

“कुठलं काय. ही काही ऐकत नाही जावईबापूंचं.”

“पियूनं नाही का समजावलं?”

“नाही कसं. तिलाही वाटतच ना गं ,आपण आपल्या आईबाबांबरोबर आपल्या घरात राहावं.”

“पियूसाठीसुध्दा तयार नाही झाली ती?”

“कसलं काय. शेवटी कडाक्याचं भांडण झालं दोघांत.”

“भांडण? बापरे!”

पियूनं तर निक्षून सांगितलं तिला, ‘आई तू नाही आलीस तरी मी आपल्या घरीच जाणार.’

” आता तरी ऐकेल म्हणावं तर ते ही नाही.”

पियूच्या अल्टिमेटमला बधली नाही ही. सीमा विचार करत होती.

” काकू आहे कुठय ती? बाहेर गेलीय का?”

“कायमची बाहेर गेली म्हण.”

“काय?”

“अग मी मध्ये पडून समजावण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी सुध्दा भांडली बघ. मला म्हणाली,

‘एवढी जड झाले असेन तुम्हाला तर वेगळं घर करून राहीन मी एकटीच.’

मी गप्पच बसले मग.

दोन दिवसांनी खरंच सगळं सामान घेऊन गेली. कुठंतरी गगनगंगा अपार्टमेंट आहे बाराव्या गल्लीत, तिथं फ्लॅट घेतलाय म्हणे. . . ”  थोडं थांबून त्या म्हणाल्या, ” पियू गळ्यात पडून रड रड रडली आणि गेली तिच्या बाबांच्या बरोबर.”

सुन्न होऊन सीमा काकूंकडं बघत बसली. 

‘ तुला मुळी कसली महत्त्वाकांक्षाच नाही ‘,असं म्हणणारी सुषमा ! हुषारी, जिद्द याबरोबरच थोडासा विवेक किती गरजेचा आहे. स्वातंत्र्य मिळवून सुखी झाली– की आनंद गमावून दु:खी झाली? आपल्याला सापडलेलं समाधान तिच्यावर एवढं का बरं रुसलं?–

फुलेवाडीच्या बसमध्ये बसून घरी परतताना सीमा अस्वस्थ होती—– 

समाप्त.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महत्वाकांक्षा….. भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

? जीवनरंग ?

☆ महत्वाकांक्षा….. भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सीमा लगबगीनं बसस्टॉपवर आली. आज नेहमीची  फुलेवाडीची बस सोडून ती  शिवाजी विद्यापीठाच्या बसमध्ये चढली. सीमाला आज रमाकाकूंना भेटायला जायचं होतं. गेले काही दिवस त्या फोन करून तिला ‘येऊन जा ग’, म्हणून बोलवत होत्या. आज शनिवार असल्यानं तिला हाफ डे होता. सकाळी घरातून निघतानाच तिनं सुधीरला आणि माईंना तसं सांगितलं होतं. घरी जायला थोडा उशीर झाला तरी चालणार होता आज. चिनू , तिची मुलगी, माईंना दत्ताच्या देवळात सोडेल संध्याकाळी आणि ती जीमला जाईल. सुधीर ऑफीस झाल्यावर घरी जाता जाता त्यांना पिकअप करेल, असं सगळं ठरवूनच सीमा सकाळी  घरातून बाहेर पडली होती. अर्थातच ती रमाकाकूंना निवांत वेळ देऊ शकणार होती. आजची संध्याकाळ रमाकाकूंसाठी !! 

रमाकाकूंच्या सोबत राहण्याची सीमाची ही काही पहिलीच वेळ नव्हती. रमाकाकूंचं काय काम असावं बरं? खिडकीतून बाहेर बघत ती विचार करत होती. रमाकाकूंची सुषमा तिची शाळेपासूनची मैत्रीण. रमाकाकू आणि सीमाची आई दोघीही पद्माराजे हायस्कूलला शिक्षिका. सुषमा आणि ती त्याच शाळेत,  एकाच वर्गात, एकाच बाकावर बसत. त्यांच्या मैत्रीचं सगळ्यांना खूप नवल वाटे. अभ्यासाची आवड सोडली तर बाकी काहीच साम्य नव्हतं दोघीत. सीमा उंच, काळी सावळी, सुषमा गिड्डी, गोरीगोबरी. सुषमाचा बॉयकट,सीमा जाडजूड केसांच्या दोन लांब शेपट्या घाले. सुषमा वक्तृत्व, निबंध स्पर्धेत माहीर, तर सीमा चित्रकला, पेंटिंग, क्राफ्ट यात रमणारी. पण मैत्रीला कुठले नियम नसतात. त्या दोघींचे मेतकूट चांगलेच जमत असे. अगदी सुट्टीच्या दिवशीही त्या एकत्र असत. दहावी नंतर दोघींनी सायन्स साईड घेतली. न्यू कॉलेजचे ते अभ्यासाचे दिवस सीमाच्या डोळ्यासमोर आले. खूप अभ्यास करूनही मेडिकलला ऍडमिशन मिळण्यासारखे मार्क दोघींनाही मिळाले नव्हते. 

सीमानं आपली सीमा ओळखून न्यू कॉलेज मध्येच एफ्.वाय.बी.एस्सीला ऍडमिशन घेतली. सुषमा शेवटपर्यंत कोणत्यातरी मेडिकल कॉलेजमध्ये मिळेल प्रवेश, निदान बी. ए. एम्. एस.तरी,  अशा आशेत वाट बघत राहिली. तेव्हाही रमाकाकू सीमाला सुषमाची समजूत काढायला सांगत. ती मात्र ऐकत नसे कोणाचंच. नाईलाजानं सुषमानं ऑगस्ट एन्ड ला एफ्. वाय. जॉईन केलं. जून ते ऑगस्ट, तीन महिन्यांत झालेला सगळा अभ्यास सीमानं आनंदानं समजावून सांगितला. गेले तीन महिने सुषमाशिवाय वर्गात बसणं तिला फारच कंटाळवाणं वाटत होतं. आता पुन्हा एकदा मैत्रीचं फुलपाखरू हसू लागलं होतं. अभ्यास, स्पर्धा, प्रॅक्टिकल्स, स्टडीटूर्स यात पाच वर्षे हातात हात घालून पळाली. एम्. एस्सीच्या कॉन्व्होकेशन नंतर दोघींच्या घरच्यांनी त्यांची डिग्री आणि मैत्री दोन्ही सेलिब्रेट केलं. किती आनंदात होती सीमा ! पण हा आनंद काही काळच टिकला.

सीमाला गावातील एका इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नोकरी मिळाली. तशी ती बॅंकेच्या परीक्षा देत होती. रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षाही द्यायच्या होत्या. तोपर्यंत रिकामं राहण्यापेक्षा काहीतरी करावं म्हणून ही नोकरी धरली तिनं. मनातील ही दोलायमान स्थिती सुषमाला सांगायची होती. कॉलेज नसल्याने दोघींची भेट होत नव्हती. सुषमा मोबाईल ही उचलत नव्हती. बरेच दिवस तिचा पत्ताच नव्हता. तो मैत्री संपवणारा दिवस सीमा कधीच विसरू शकत नाही. आजच्या  सारखीच  शनिवारची संध्याकाळ होती. सीमा तिच्या आईबरोबर गप्पा मारत बसली होती. अचानक सुषमा आली. सीमाची कळी खुलली. 

“सीमा, चल ना गं,  रंकाळ्यावर  जाऊ. किती दिवस झाले भेळ खाल्ली नाही आपण.”

सीमानं आईकडं पाहिलं. ” या गं जाऊन. मनसोक्त भेळ खा. गप्पाही मारा पोटभर.” आई म्हणाली.

सीमा पटकन आवरायला पळाली. घरी परत यायला थोडा उशीर झाला. पण आज छान वाटत होतं. सुषमा भेटली एवढ्यावरच ती खूष होती.

रात्री झोपताना आईनं तिला विचारलं,” काय गं? सुषमाचा नवरा काय करतो? तारीख ठरली का लग्नाची?”

“लग्न? आणि सुषमाचं? नाही. मला काही बोलली नाही ती? तुला फोन आला होता का तिच्या आईचा?”

“नाही गं. फोन कुठं? सुषमाच म्हणाली तू आवरायला गेली होतीस तेव्हा.”

आता आईही जरा विचारात पडली. संध्याकाळी सुषमानं विचित्र पद्धतीनं लग्न ठरल्याची बातमी सांगितली होती तिला. 

क्रमशः….

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट चुकलेलं माकड… भाग-3 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ वाट चुकलेलं माकड… भाग-3 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र- मोठ्या वृक्षांचे मारेकरी जास्त मजुरीसाठी हटून बसले होते. त्यांच्याशी तडजोड झाली तेव्हा आंबा-नारळाची झाडेही भुईसपाट झाली. आता उभी होती घरचंच कुणीतरी मेल्या सारखी उदास होऊन गेलेली लेकुरवाळी केळ..! तिची पिल्लं मोठी झाली तशी तीही मरणाला सामोरी गेली..!)

हे जे काही घडलं त्यात बेकायदेशीर काहीच नव्हतं.तरीही स्वतःचं हक्काचं काहीतरी कुणी  हिसकावून घ्यावं तसं माझं मन उदास,अधू होऊन गेलं. त्या अधू मनाचा ‘कार्पेट एरिया’ या उदास मनस्थितीत थोडा आक्रसत चाललाय हे जाणवत होतं!

अर्थात याला इलाज नव्हता.काळ हेच याच्यावरचं औषध होतं..!

त्या औषधानेच आक्रसून गेलेलं मन पुन्हा प्रसरण पावलं. आपली स्वतःची सदनिकासुद्धा अशाच भुईसपाट केलेल्या फळा- फुलांच्या झाडांवरच उभी आहे याची जाणीव होताच ते प्रसरण पावलेलं मन उदासवाणं का होईना थोडसं हसलंसुद्धा..!

त्या परसदारी मग सिमेंटची झाडं रोवली गेली. कामं आपापल्या वेगाने सुरू झाली आणि आपला वेग वाढवत राहिली. निसर्गाशी नातं तोडणाऱ्या भिंती उंची वाढवत उभ्या राहू लागल्या.अगदी डेरेदार वृक्षांपेक्षाही उंच वाढू लागल्या.

एक दिवस देवाची पूजा झाल्यानंतर जाणवलं की एरवी पूर्वेकडच्या खिडकीतून आत येऊन थेट माझ्या देवघरातल्या देवांचे पाय धुणारा कोवळा सूर्यकिरण आज आलाच नव्हता.पलिकडे उभ्या राहिलेल्या भिंतीवर धडकून तो जायबंदी होऊन तिथेच पडलेला होता !

त्यादिवशी साग्रसंगीत पूजा होऊनही मनातले देव मात्र असे पारोसेच राहिले होते. अस्वस्थ मनातली ही मरगळ मग स्वतःच कंटाळून कधीतरी खालमानेने निघून गेली..!

माझ्या सदनिकेतला अवकाश अंधारला तरी मन कुठेतरी उजेड,हुरुप,उत्साह शोधत राहिलं.जमेल तसं हळूहळू फुलत राहिलं. मागचं सगळं विसरून गेलं.

पण ते हिरमुसणं जसं तात्कालिक होतं तसं ते विसरूणंही क्षणभंगुरच ठरलं. गंमत म्हणजे ते विसरणं क्षणभंगुर ठरवायला निमित्त झालं एका माकडाचंच..!

त्या सकाळी आमच्या पूर्वेकडच्या कंपाऊंडच्या रुंद भिंतीवर ते माकड बसलेलं होतं. सैरभैर होऊन इकडे तिकडे पहात होतं.वाट चुकल्यासारखं केविलवाणं दिसत होतं. त्याच्या अस्वस्थ येरझारा माझ्यावर गारूड करीत होत्या. ट्रॅक्टरखाली पिल्लू चिरडून मेल्याने वेडीपिशी झालेली माकडीण आणि नुकताच सर्वांचे चावे घेऊन हैदोस घालत अखेर जेरबंद झालेलं ते माकड या सर्वांच्यातलाच एक समान धागा माझ्या नजरेसमोर अधिक ठळक केला तो लहानपणी बिरबलाच्या गोष्टीत भेटलेल्या, आपल्या पिलाला पाण्याने भरलेल्या पिंपात पायाखाली घेऊन ठार मारून स्वतःचा जीव वाचवणाऱ्या माकडीणीने ! तिच्या त्या कृतीतून हुशार बिरबलाने भला स्वतःच्या सोयीचा अर्थ काढून त्यातच धन्यता मानली असेल, पण क्रूर आप्पलपोट्या माणसांच्या जंगलात एकट्या पिल्लाला मागे ठेवण्यापेक्षा काळजावर दगड ठेवून त्याचाच बळी घेणार्‍या त्या माकडीणीचं अपत्यप्रेम निश्चितच निर्विवाद होतं हे या माकडाच्या अस्वस्थ येरझारा मला आग्रहाने सांगत होत्या.

मला त्या माकडाची मनापासून कींव वाटली. पण त्याच्यात गुंतून पडायला मला वेळ नव्हता. ब्रश करून मी आत आलो. तोंड धुवून चहा घेतला. पेपर वाचला. आंघोळीला जाण्यापूर्वी पूजेला कुंड्यातल्या झाडांची फुलं आणायला मी टेरेसवर गेलो. फुलं काढली.परत फिरताना सहज माझी नजर खाली गेली. वाट चुकलेलं ते माकड अद्यापही खाली तिथेच  होतं. रस्त्यापलीकडे एकटक रोखून पहात केविलवाण्या नजरेने ते काहीतरी सांगू पहात होतं. रस्त्यालगतच्या घराच्या उंच छपरावर माकडांचा एक कळप बसलेला होता. कळपातल्या सर्व माकडांच्या आशाळभूत नजरा या माकडावरच खिळलेल्या होत्या!

कित्येक दिवसांपूर्वी मनात ठाण मांडून धुमाकूळ घालणाऱ्या माकडामुळे आधीच हळवं झालेलं माझं मन अंतर्बाह्य शहारलं..!

माकडांच्या नि:शब्द अशा त्या हालचालींमध्ये एक आर्त दडून बसलेलं माझ्या लक्षात आलं..!

आंब्याचा मोहोर यायच्या या दिवसात माकडांचा एक कळप दरवर्षी परसातल्या त्या आम्रवृक्षावर मुक्कामाला यायचा. आंब्याचा मोहोर खुडून मेजवानी झोडायचा. तृप्त होऊन त्या आम्रवृक्षाचा कृतज्ञतेने निरोप घेऊन जायचा.

आज.. तोच कळप नेहमीच्याच वाटेने इथवर आला होता. त्याच कळपातलं ते माकड वाट शोधत नेमकं इथं आलं होतं. म्हणजे त्यांची वाट चुकलेलीच नव्हती. सुगंधी मोहराने फुललेलं ते शोधत होते ते आंब्याचं झाड मात्र माझ्या सोनचाफ्याच्या झाडासारखंच हरवलेलं होतं !

ही माकडं वाट चुकलेली नव्हती तर स्वतःच्या तथाकथित सुखासाठी सगळ्यांच्याच सुखाचा आंबेमोहोर आतयायीपणाने ओरबाडून घेणारा आणि निसर्गाने मोठ्या विश्वासाने दिलेलं तेजोमय बुद्धिमत्तेचं कोलीत हातात येताच  उन्मत्तपणाने थैमान घालंत सारा निसर्गच जाळत सुटलेला माणूसच  खरंतर वाट चुकला होता..!

माणसाच्या रूपातलं हे ‘वाट चुकलेलं माकड’ अंशरूपाने कां होईना माझ्यातही अस्तित्वात आहे याची जाणीव मला सैरभैर करतेय. स्वतःच्या उत्कर्षाच्या सगळ्याच वाटांना पारखा होत चाललेला प्रत्येक माणूसही आज त्यामुळेच  अस्वस्थ आहे !

माणसाच्या रूपातल्या या वाट चुकलेल्या माकडाला जेरबंद कसं करायचं या विवंचनेत माझ्या मनातला निसर्ग मात्र दिवसेंदिवस सुकत चालला आहे..!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट चुकलेलं माकड… भाग-2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ वाट चुकलेलं माकड… भाग-2 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र-या सगळ्या गोंगाटाचा एकजीव होऊन कानावर येणारा आवाज एखाद्या जीवघेण्या ‘चित्कारा’सारखा काळीज कापणारा होता. कासावीस होत मी जागा झालो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती..!)

ते एक स्वप्नच होतं. त्याला तसा नेमका अर्थ कुठून असायला? मनी वसत होतं तेच अशी सलग साखळी बनून स्वप्नी दिसलं होतं एवढंच. पण हे एवढंच होतं तर मग पहाट झाली, पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला नेहमीसारखी जाग आली तेव्हा पक्ष्यांचा तो किलबिलाट मला पूर्ण जाग येण्यापूर्वीच्या क्षणभर स्वप्नातल्या त्या चित्कारासारखा कां वाटला होता ते मला तेव्हा तरी नीट उमगलं नव्हतं. पण काहीही असो पूर्ण जागा झाल्यावर याच किलबिलाटाने मी माणसात आलो. अर्धवट,अस्वस्थ झोपेमुळे आलेला थकवा पक्ष्यांचा तो आवाज ऐकून कुठल्याकुठे विरून गेला. एखाद्या गोड आवाजातल्या आर्जवी भूपाळीच्या शांत सुरांसारखी ती किलबिल माझ्या मनाला हळूवार पणानं कुरवाळत होती.

खूsप बरं वाटलं.

मनातलं माकड (बहुधा) निघून गेलं. दुसऱ्या रात्री त्यामुळेच मला शांत झोप लागली. मग रोज रात्री लागू लागली. ठरल्यासारखी पक्ष्यांची किलबिल ऐकून त्या झोपेतून पहाटेची जागसुद्धा तशीच नेमानं येत राहिली.

पण खूप दिवस उलटले आणि हा नित्यनेम चुकला. पुन्हा एक ओरखडा उठला.

विस्मरणात गेलेलं ते ‘पक्ष्यांचं’ झाड अचानक स्वप्नात जसंच्या तसं पुन्हा जसं लख्ख दिसलं होतं तसंच मनातून निघून गेलंय असं वाटणारं ते वाट चुकलेलं माकड पुन्हा आपलं डोकं वर काढणार याची मात्र तेव्हा मला कल्पना आलेली नव्हती.

आमच्या अपार्टमेंटच्या पूर्वेकडील कंपाऊंडच्या पलीकडे एका जुन्या वाड्याचं प्रशस्त परसदार होतं. त्या परसातल्या हिरव्या सोयऱ्यांबरोबर गुजगोष्टी करणाऱ्या पक्ष्यांची किलबिल आम्हाला रोज पहाटे हळुवार आग्रहानं जागवत होती..! पहाटे उठून स्वयंपाकघरातली पूर्वेकडची खिडकी उघडली की अलगद आत येणार्‍या वार्‍याच्या झुळूका त्याच परसातल्या सोनचाफ्याच्या सुगंधाने माखलेल्या असायच्या.ते साधं खिडकी उघडणंही इतकं सुगंधी आणि सुखकारक असायचं की कांही क्षणानंतर तो सुगंध विरून गेला तरीही ताज्या टवटवीत झालेल्या आमच्या मनात तो सोनचाफ्याच्या अत्तराचा फाया दिवसभर खोचलेला असायचा.

श्वासांइतकीच त्या सुखाचीही गरज निर्माण झालेल्या आम्हाला एका सकाळी खूप उशिरा जाग आली. अगदी उन्हं वर आल्यानंतर.पक्ष्यांची किलबिल ऐकूच न येण्याइतकी गाढ झोप लागलीच कशी याचं आश्‍चर्य करीत अंथरूण सोडलं. सवयीप्रमाणे स्वयंपाकघराची खिडकी उघडली आणि कांहीतरी चुकल्यासारखं मन सैरभैर झालं. काय चुकलं ते समजलंच नाही क्षणभर. मग लक्षात आलं, खिडकीतून आत येणारी गार वाऱ्याची झुळुक आज रोजच्यासारखी नाचत बागडत आलेली नव्हती. सोनचाफ्याचा सुगंध नसल्याने ती हिरमुसली होती !

झरकन् वळून दार उघडून पाहिलं तर परस ओकंबोकं दिसत होतं. परसातली सदाफुली, मोगरा, शेवंती, अबोली, कोरांटी, पारिजातक, लिंब सगळेच सगळेच निघून गेलेले. दुर्वांचा तजेलदार हिरवाकंच कोपराही हरवला होता.जाईजुईचे वेल निराधार अवस्थेत अदृश्य झाले होते. तिथं ही अशी बारीकसारीक झाडंझुडपं तर नव्हतीच पण आमचा सहृदय होऊन राहिलेला सोनचाफाही कुठे दिसत नव्हता.

नाही म्हणायला तोडायला अवघड असलेली दोन ताडमाड वाढलेली नारळाची झाडं, आंब्याचा एक डेरेदार वृक्ष आणि घरच्या कुणी म्हाताऱ्या बाईने हट्टच केल्यामुळे अद्याप जमीन घट्ट धरून थरथरणारी नुकतीच व्यालेली लेकुरवाळी केळ एवढं मात्र अजून सुरक्षित होतं.

मोठ्या वृक्षांचे मारेकरी जास्त मजुरीसाठी हटून बसले होते. त्यांच्याशी तडजोड झाली तेव्हा आंबा-नारळाची झाडंही भुईसपाट झाली.

आता उभी होती घरचंच कुणीतरी मेल्यासारखी उदास होऊन गेलेली ती लेकुरवाळी केळ. तिची पिल्लं मोठी झाली तशी तीही मरणाला सामोरी गेली..!

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट चुकलेलं माकड… भाग-1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ वाट चुकलेलं माकड… भाग-1 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

गेल्या कांही दिवसांपासून अनेकांचे चावे घेऊन शहरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘त्या’ माकडाला जेरबंद करण्यात आज प्रशासनाला अखेर यश आलं. आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

वाट चुकलेल्या या माकडाने गेले आठ दिवस अक्षरशः हैदोस घातलेला होता. झाडांशी फटकून वागत ते माणसांत घुसलं होतं.

प्रथम मुलींच्या शाळेच्या एका खिडकीत बसून ते बिचारं कुतूहलाने आत बघत होतं. आतल्या पोरीबाळीना वाटलं ते आपलेच चेहरे टुकूटुकू निरखतंय. मुली किंचाळू लागल्या तसं ते बिथरलं. काय करावं ते न सुचून त्याने खिडकीतून वर्गाच्या आत उडी मारली. धावपळ पळापळ सुरु झाली आणि एकच गोंधळ उडाला.इथे तिथे पळत शेवटी शाळेच्या गेटवरून त्याने बाहेर उडी मारली, ती नेमकी पाच-सहा पोरांच्या एका घोळक्यावर पडली. मुलींची शाळा सुटायची वाट पहात कोपर्‍यावर उभ्या असलेल्या, टिंगल-टवाळी करणाऱ्या टोळभैरवांचा तो घोळका होता.त्या पोरांइतकंच ते माकडही भांबावलं. त्यातल्या दोघा-तिघांचे चावे घेऊन ते जीव वाचवायला समोरच्या धान्य-आळीत  घुसलं. तिथे अनपेक्षितपणे आडव्या आलेल्या एका गलेलठ्ठ व्यापाऱ्याला चावलं. मग वाट फुटेल तिकडं बिचारं धावत सुटलं. समोरच्या रस्त्यावरचं पोलीस मुख्यालय, मध्यवर्ती चौकातल्या सरकारी कचेऱ्या सारं पालथं घालून, प्रत्येक ठिकाणी वाटेत येईल त्याचे जावे घेत अखेर त्याने आपला मोर्चा जवळच असलेल्या महापालिकेच्या मुख्य कार्यालयाकडे वळवला तेव्हा मात्र ‘प्रशासन’ खडबडून जागं झालं.

त्या माकडाने जर युद्ध पातळीवरचे प्रशासनाचे प्रयत्न हाणून पाडले असते तर मात्र त्याची खैर नव्हती.

ते मेलेच असते.

गेल्याच वर्षी एका माकडीणीने असाच सर्वांचा थरकाप उडवलेला होता.ती रस्त्याकडेच्या झाडावर एरवी शांत बसून असायची. पण ट्रक-ट्रॅक्टर सारखी अवजड वाहनं त्या रस्त्यावरून निघाली की झाडावरून ती झेप घ्यायची ते थेट त्या वाहनाच्या चालकावरच. त्याचं नरडं आवळत ती त्याचे चावे घेत सुटायची. वाहनावरचा आपला ताबा सावरत स्वतःची कशीबशी सुटका करून घेईपर्यंत असे कित्येक वाहनचालक घायाळ झालेले होते.या सगळ्या घटनाक्रमाची मालिका ज्यात ओवली गेलेली होती तो धागा अतिशय नाजूक,हळवा होता..! त्या माकडीणीचं पिल्लू रस्ता ओलांडताना एका ट्रॅक्टरखाली चिरडून मेलेलं होतं. अवजड वाहन खडखडाट करीत झाडाखालून निघालं की आपल्या पिल्लाचा चित्कार आणि छिन्नविछिन्न देह आठवून ती माकडीण पिसाळत होती..!

तिच्यासाठी पिंजरा लावून त्यात मुकाट्याने जाऊन बसण्याचं माणसाचं प्रेमळ आवाहन तिने बाणेदारपणाने साफ नाकारलं तेव्हा तिला गोळी घालून ठार करण्यात आलं होतं.

या माकडानेही जर जेरबंद व्हायचं नाकारलं असतं तर मात्र त्या माकडीणीसारखं हे सुद्धा हकनाक मेलंच असतं.’त्या’ माकडीणीचे न् यांचे कांही लागेबांधे असतील कदाचित. निदान ओळख तरी. त्यामुळेच वेळीच समजला असेल त्याला मानवशरण न होण्यातला धोका किंवा समजली असेल बाणेदार अट्टाहासाची परिणती..!

हे सार समजण्याइतकं ते नक्कीच शहाणं होतं.किंबहुना आपला हा शहाणपण त्याने आपल्या कृतीने सिद्धच केलेला होतं.म्हणूनच मी न पाहिलेलं ते

वाट चुकलेलं माकड माझ्या मनात ठाण मांडूनच बसलं होतं. त्याची कृती नक्कीच माणसाच्या बुद्धिमत्तेचीही कींव करावी एवढी शहाणपणाची होती नक्कीच. कारण सहज जाता जाता वाटेत येणाऱ्या असंख्य माणसांपैकी जावे कुणाचे घ्यायचे हे आधी न ठरवताही त्याने ती निवड किती अचूक केलेली होती..!

मुलींच्या शाळेबाहेर घिरट्या गाळणारे रिकामटेकडे टोळभैरव, धान्य-बाजारातला भेसळसम्राट व्यापारी, एक पोलिस इन्स्पेक्टर, दोन कॉन्स्टेबल्स, एक नगरसेवक आणि काही सरकारी कर्मचारी इत्यादी..!

त्यामुळेच पिंजऱ्यात जेरबंद झालेलं ते माकड त्याच्या पिंजऱ्यासकट माझ्या मनात ठाण मांडून बसलेलं होतं. त्या रात्री पिंजरा सोडून ते थेट माझ्या स्वप्नात आलं. चीं चीं करीत कांहीबाही सांगू लागलं. मला नीटसं काही समजेना तसं दात विचकून वेडावत राहिलं.

पूर्वी कधीतरी रात्रीच्या एका प्रवासात मी पाहिलेलं, कालांतराने विस्मरणात गेलेलं एक पक्षांचं झाडही त्या स्वप्नात मला पुन्हा दिसलं..! त्या रात्री पाहिलं होतं तेव्हा स्वच्छ चांदण्यारात्रीच्या नीरव शांततेत ते झाड अगदी शांतपणे निश्चल उभं होतं. त्याच्या पारंब्या पाहिल्या तेव्हा ते वडाचे झाड म्हणून ओळखता तरी आलं.कारण पानं पाहून ओळखायला ती रात्र असल्यामुळे त्यांची पानं स्पष्ट दिसतच नव्हती.त्या प्रत्येक पानाला एक एक पक्षी चिकटून बसलेला होता. झाडाचे पान न् पान असं पक्षांनी लगडलंय असं वाटत होतं..! अतिशय सुंदर दृश्य होतं ते..! वाऱ्याचा मागमूसही नव्हता.पानं हलली तर त्या पक्षांची झोप मोडेल म्हणून वारासुद्धा श्वास रोखून गप्प होता..!

स्वप्नात ते माकड आलं.चीं चीं करून आकांत करीत कांहीबाही सांगू लागलं. ते सांगणं माझ्यापर्यंत पोचेना तसं चिडलं. संतापलं.दात विचकून निघून गेलं. गेलं ते नेमकं त्याच झाडावर.

पानांवर विसावलेले,शांत झोपी गेलेले ते पक्षी झापड बसावी तसे धडपडत जागे झाले. डोळे चोळल्यासारखे पंख फडफडवू लागले… पंखांच्या फडफडीत त्यांचा कलकलाट मि.सळून गेला.. झाडालाही तो साहवेना..फांद्या

हलवून ते त्यांना समजावू लागलं.. या सगळ्या गोंगाटाचा एकजीव होऊन कानावर येणारा आवाज एखाद्या जीवघेण्या ‘चित्कारा’सारखा काळीज कापणारा होता..!! कासावीस होत मी जागा झालो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती..!!

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मज आवडते…. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ मज आवडते…⛱ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

धुक्याची दाट दुलई सावरत फिकुटल्या चांदण्याचा पदर आवरत …..भालावरील चांदव्याची टिकली एकसारखी करत…. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाला साद देत …. मंदिरातील घंटा मंजुळ वाजवत ऊबदार पहाट व्हायला आवडेल मला! सकाळच्या त्या तेजपुंज अरुणोदयाचे मंगल दर्शन घेऊन मग हळूहळू उतरत .. त्या डोंगरमाथ्यावरून खाली …खाली खोल दरीत विसावताना लाडीक झटका देईन ओलेत्या काळ्याभोर केशसंभाराला अन…पाणीदार मोत्यांच्या लडी विस्कटेन झुलत्या तृणाग्रावर …पर्ण संभारावर …फुलांच्या स्मित गालावर.

कधी मंद मंद वाऱ्याची झुळूक बनून झोके घेत उडवत राहीन गन्ध ताज्या फुलांचा…अन मस्त शीळ घुमवेन वेळूच्या बेटी ….उडवेन कुणा अल्लड तरुणीच्या अवखळ बटाना ..भुरुभुरू ..हाय !….. बघत राहीन तिची  खट्याळ लगबग!

काळाकुट्ट मेघ होऊन बरसावे मनसोक्त …निथळत रहावे प्रेयसीच्या बटामधून ..मोती होऊन …शुष्क धरणीला तृप्त करत …निथळत राहावे तिच्या सर्वांगावरून नद्या ,झरे होऊन .द्यावी नवी नव्हाळी अन न्याहाळत राहावे अनिमिष नेत्रांनी …तिचे नवे कोवळे हिरव्या पाचूच्या शालूतील हिरवकंच सौंदर्य! जावे .-कुण्या तृषार्त चातकाच्या चोचीत सामावून.

डोलत रहावे अवखळ वाऱ्यासोबत शेतात भरलेले कणीस होऊन ….भागवावी भूक कुण्या भुकेल्या पाखराची अन कुणा लेकराची !

गात राहावे …भटकत रहावे मनमौजी छोटेसे पाखरू बनून …रानमेवा खात ….आपल्याच मस्तीत गुंग …या फांदीवरून त्या फांदीवर झोके घेत …इवल्या पानाआड लपाछपी खेळत !

प्यावे ते पौर्णिमेचं चांदणं ..व्याकूळ चकोर होऊन …काजव्याचे  बांधून पैंजण धरावा ताल …करावे बेभान नृत्य ….

चांदणं भरल्या नभातील व्हावे एक प्रकाशतारा …दाखवावी वाट प्रकाशाची कुणा वाट चुकलेल्या पांथस्थास .

होऊन शूर सैनिक करावे भारत भूचे रक्षण… उसळून रुधिराचे तुषार करावे सिंचन त्या पवित्र मातीवर !

व्हावे आई त्या सर्व अनाथांची अन पांघरावी त्यांच्यावर मायेची ऊबदार सावली !…हसवावे ..रिझवावे बालमन गाऊन अंगाई…हरवून जावे बोबड्या बोलात …

नाहीच जमले तर व्हावे तो पायरीचा एक दगड त्या ज्ञानमंदिराचा …ज्या पायरीवर उभा राहील उद्याचा तरुण, उज्वल भारत !!

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संकट (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ संकट (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

कुसुमताई आता म्हातार्या- होत चालल्या होत्या. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी. आता त्यांना आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी मुलाकडे राहणे गरजेचे होते, पण त्यांना ठेवून घ्यायला कुणीच तयार नव्हते. प्रत्येकाची स्वत:ची काही कारणे-बहाणे होते. आपल्याला स्वत:च्या घरी ठेवून घ्यावं, म्हणून ती मुलांपुढे सतत गयावया करायची. पण कुणाच्याच मनाला पाझर फुटत नव्हता. शेवटी आपल्या जावयाने तरी मुलांची समजूत घालावी, म्हणून त्यांनी आपल्या मुलीला आणि जावायला बोलावून घेतले. मुलगी आली, ती रडत रडतच. जावई या सगळ्याचे मूक दर्शक होते. ते गप्प बसलेले पाहून कुसुमताई म्हणाल्या, ‘जावईबापू तुम्ही तरी यांना समजावा ना! आता या वयात मी कुठे जाऊ?’

यावर जावईबापू म्हणाले, ‘आई, आपल्याला कुठेही जायची जरूर नाही. आपण माझ्याबरोबर चला. तीन वर्षापूर्वी माझे वडील गेले पण माझी आई तर मी जन्मल्यावर लगेच गेली. मी तिचा चेहराही पाहिलेला नाही. तुमच्या मुलीशी लग्न झाल्यापासून मी तुमच्या चेहर्यावतच माझ्या आईचा चेहरा पहातोय. चला माझ्या घरी. मी समजेन, माझी आईच पुन्हा मला मिळाली.’

कुसुमताईंना कळेना, या प्रस्तावावर काय बोलावं? हे ऐकल्याबरोबर मुलीचं रडणं थांबलं होतं आणि मुले गदगद झाली होती, जशी काही कुठल्या तरी प्रचंड संकटातून त्यांची सुटका झालीय.

मूळ हिंदी  कथा – संकट  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडोंगी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ पेडोंगी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

★★★ पेडोंगी (१९६२ – ९८) ★★★

पेडोंगी नाव वाचून आपण बुचकळ्यात पडू. पेडोंगी हे नाव एका खेचराचं आहे. खरे तर माणसांची किंमत नसणाऱ्यांना ह्या खेचराच्या नावाचा गंधही नसेलच. पण ही कोणी साधीसुधी खेचर नाही, तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलेलं आहे. भारतीय सेनेचा एक अविभाज्य भाग म्हणजेच खेचरं. सद्यस्थितीला भारतीय सेनेत ६००० पेक्षा जास्ती खेचरं काम करत आहेत. भारताची सरहद्द उत्तरेत हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेली आहे. समुद्रसपाटीपासून १७,००० फुटापर्यंत जाणाऱ्या शिखरांवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीचं संरक्षण करतो. भारतीय सेनेच्या अनेक पोस्ट ह्या अश्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी कोणतंच वाहन आजही जाऊ शकत नाही.  जिकडे स्वतःचा जीव वाचवणं कसरत असते, तिकडे दारुगोळा, रसद आणि इंधन अश्या गोष्टी वाहून नेणं किती कठीण असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. ह्याच कठीण काळात भारतीय सेनेच्या मदतीला आजतागायत धावून आली आहेत ती खेचरं. अतिउंचावरील अतिशय थंड आणि विरळ हवेत ही खेचरं काम करू शकतात. अतिशय खडकाळ आणि निसरड्या वाटेवरून मार्गक्रमण करू शकतात.  ह्या पलीकडे खेचरं अतिशय प्रामाणिक असतात. त्यामुळेच आजही भारतीय सेनेचा कणा बनून भारताच्या रक्षणात आपला सहभाग देत आहेत.

पेडोंगीचं खरं सैनिकी नाव होतं Hoof Number 15328. १९६२ साली पेडोंगी भारतीय सैन्यात दाखल झाली. त्या काळात आधुनिक संपर्कप्रणाली आणि प्रगत वाहनं  नसताना भारतीय सैन्याची सगळी दारोमदार खेचरांवर अवलंबून होती. बॉम्बच्या स्फोटात, गोळ्यांच्या वर्षावात, निसर्गाच्या प्रकोपाला न जुमानता पेडोंगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं आपलं काम इमाने इतबारे पार पाडलं. १९७१ साल उजाडलं. भारत- पाकिस्तान युद्ध सुरु झालं. भारतीय सेनेला रसद पुरवताना पेडोंगीला पाकिस्तानी सैन्यानी पकडलं आणि आपल्या पोस्टवर बंदी बनवून, तिला पाकिस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी जुंपलं. कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? भारताच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणारी पेडोंगी संधी मिळताच पाकिस्तानी सैन्याला गुंगारा देऊन आपल्या पाठीवर असणाऱ्या मिडीयम मशीन गन आणि दोन बॉक्स गोळ्यांसकट निसटली. आपल्या जिवाची पर्वा न करता गोळ्यांच्या वर्षावात जवळपास २५ किलोमीटरचं अंतर कापून (२५ किलोमीटर अंतर १७,००० फुटांवर — पाठीवर एक मशिनगन आणि दोन बॉक्स गोळ्यांचं वजन घेऊन धावणं, ते ही शत्रूच्या प्रदेशात– काय असेल ह्याचा आपण विचारही करू शकत नाही.) भारतीय हद्दीत प्रवेश करून तिने भारतीय पोस्टवर आपली हजेरी नोंदवली.

तिचे आपल्या देशाप्रत असलेले प्रामाणिक  प्रेम बघून भारताच्या त्या पोस्टवरील बटालीयन कमांडरने आपल्या वरिष्ठ ऑफिसरना पेडोंगीच्या पराक्रमाची दखल घेण्याची शिफारस केली. १९८७ ला पेडोंगी भारतीय सेनेच्या 853 AT Company ASC मध्ये काम करत होती. २९ वर्षाची असणारी पेडोंगी सर्वात वयोवृद्ध खेचर होती.  पण त्या वयातही आपल्या पाठीवरचं सामान जवळपास १७,००० फूट उंचीवर वाहून नेत होती. ह्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा ह्यांनी पेडोंगीच्या पराक्रमाची नोंद घेताना तिला सामान वाहण्यापासून मुक्त केलं. तिची ऑफिशियल नियुक्ती 53 AT Company ASC कंपनीची (देवदूत) ताईत म्हणून केली. ह्या युनिट च्या १९८९-९० च्या ग्रीटिंग कार्डवरही पेडोंगीला तिच्या सेवेसाठी स्थान दिलं गेलं. ह्याच युनिटसोबत तिची नियुक्ती बरेली, उत्तर प्रदेश इकडे नंतर झाली. इथल्या खूप मोठ्या परिसरात पेडोंगीने आपला काळ आरामात व्यतीत केला.

१९९२ ला पेडोंगीला एका खास कार्यक्रमासाठी दिल्लीला नेण्यात आलं. तिकडे २२३ व्या कॉर्प्स दिवसाच्या कार्यक्रमात पेडोंगीला तिच्या पराक्रमासाठी, देश सेवेसाठी, कर्नल गिरधारी सिंग ह्यांच्या हस्ते मखमली निळ्या घोंगडीने सन्मानित करण्यात आलं. त्याच वेळेस तिला तिचं नावं ‘पेडोंगी’ हे देण्यात आलं. उत्तर सिक्कीममध्ये असलेल्या पेडोंग ह्या युद्धभूमीच्या नावावरून तिचं नामकरण करण्यात आलं. भारतीय सेनेत अतुलनीय शौर्य, सेवा देणाऱ्या घोडयांना आजवर नाव देण्याचा सन्मान मिळालेला होता.  पण पेडोंगी ही पहिली खेचर होती, जिला हा सन्मान देण्यात आला.

 ह्यानंतरचा काळ पेडोंगीने बरेलीतच व्यतीत केला. १९९७ ला पेडोंगीच्या सेवेची नोंद ‘ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ‘ने घेताना “ जगातील कोणत्याही सेनेसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारी खेचर “ असं तिचं नाव सुवर्णअक्षरांनी कायमच नोंदवलं. २५ मार्च १९९८ ला पेडोंगीने अतिशय समाधानाने अखेरचा श्वास घेतला आणि एका युगाचा अंत झाला.

असं म्हणतात की खेचराला एकदा रस्ता दाखवला की पुढल्या आख्या आयुष्यात, तो तुम्हाला रस्ता दाखवेल. पण पेडोंगीचा पराक्रम अभूतपूर्व असा होता. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखताना संपूर्ण आयुष्य तिने १७,००० फुटांवर भारतीय सरहद्दीचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी वेचलं. ही पण एक प्रकारची देशभक्तीच आहे. कोणी म्हणेल की पेडोंगीला रस्ता माहीत होता म्हणून ती परत आली. पण मग एकटी तीच का? तिच्यासोबत पकडलेली इतर खेचरं  आली नाहीत.  पण ती जिवावर उदार होऊन परत आली. पेडोंगीला आज जाऊन २२ वर्षाचा कालावधी झाला.  पण आपलं जीवन भारतासाठी समर्पित करणारी पेडोंगी भारतीयांच्या मनात आजही उपेक्षित आहे ही एक खंत आहे. तिचा भीमपराक्रम, देशभक्ती, आणि कार्य हे शब्दांपलीकडचं आहे. 

देशासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पेडोंगीला माझा कडक सॅल्यूट, आणि तिच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार.

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अचानक एक दिवस…भाग –2… श्री सुशांत सुप्रिय ☆ अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  जीवनरंग ?

☆ अचानक एक दिवस…भाग –2 … श्री सुशांत सुप्रिय ☆ अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अचानक एक दिवस (अनुवादित कथा)

(आपल्या गावातल्या नदीतले मासे पकडायला कोण शिकवेल मला ? आणि जलतरंग तरी कोण वाजवून दाखवेल ?” ) इथून पुढे —–

त्या धुक्याच्या आणखी थोडं पलीकडे सुमी हसत उभी आहे. तिच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण ऐकू येते आहे. “ ये–ये की – पकड मला “ फुलपाखराच्या मागे धावता धावता पुलक खिदळून हसतोय.— पण हे धुकं वितळत का नाहीये ? —

“ सुमी , मला असं सोडून जाऊ नकोस गं — माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर–” 

—-मधेच नकळत त्याला डुलकी लागली आहे.—– वडील हातात डिक्शनरी देऊन त्याला इंग्लिश शब्दांचं स्पेलिंग पाठ करायला लावताहेत— B A T bat ! bat म्हणजे वटवाघूळ–हा सस्तन प्राणी आहे. N I G H T M A R E- म्हणजे नको वाटणारी वाईट स्वप्नं —

आजोबा, आजी, आई, बाबा—- त्याला आवडणारी सगळी माणसं त्याला सोडून गेली आहेत–खूप खूप लांब. तो रडायला लागला आहे. पण डोळ्यात दाटलेला अश्रूंचा सागर कधीचाच पार सुकून गेलाय. एक रितेपण, एक पोकळी आतल्या आत धुमसते आहे—–

—–सगळा दोष त्याचाच आहे असं आता त्याला जाणवतं आहे. सुमीला तो कधीच पुरेसा वेळ देऊ शकलेला नव्हता. अगदी लहानसहान गोष्टींवरूनही खूप नावं ठेवायचा तो तिला, जिव्हारी लागेल असं बोलायचा. त्याच्या संतापाच्या लाव्हारसाने जणू तिला गिळून टाकलं होतं—-

“ सुमी–परत ये सुमी. आजपासून, आत्तापासून मी तुला सन्मानाने वागवेन –खूप जपेन तुला. पुलक–ये ना बाळा. तुम्हा दोघांशिवाय मी अधुरा आहे रे.”– पश्चातापाने होरपळल्यासारखा झाला आहे आता तो. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलंय . आठवणींचे मोठमोठे शिलाखंड आता काळाच्या पोटात हळूहळू गडप व्हायला लागले आहेत—

त्याच्या अंगात खूप ताप भरलाय. सुमी त्याच्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवते आहे. अर्धवट झोपेत असल्यासारखा तो काहीतरी पुटपुटतो आहे. पुलक घाबरून जाऊन रडायला लागला आहे. कुणीतरी त्या दोघांना ओढत ओढत त्याच्यापासून लांब घेऊन चाललंय. तो त्या माणसाला अडवायचा प्रयत्न करतोय. पण त्याचे हात लुळे पडले आहेत. मोठ्याने ओरडून त्यांना हाका माराव्याशा वाटताहेत त्याला– पण त्याचा आवाज पूर्ण बंद झालाय. आता अंगातला ताप खूपच वाढलाय. तो थंडीने कुडकुडायला लागलाय. सुमी त्याच्या अंगावर जाड ब्लॅंकेट टाकते आहे. डोक्यात इतक्या प्रचंड वेदना होताहेत की डोकं फुटेल असं वाटतंय. सुमी त्याचं डोकं दाबत बसली आहे. “ पप्पा, उठा ना आता, “ त्याच्या गालावर हलकेच ओठ टेकवत पुलक त्याला म्हणतोय. 

अजून सूर्य अस्ताला गेला नाहीये. पण त्याआधीच रात्र झाली आहे. अंधारातच त्या भकास, भीतीदायक रस्त्यांवरून तो एकटाच चालला आहे. त्याच्या घरापर्यंत कोणतीच बस जात नाही. थोडं पुढे एक निःशब्द, भयाण जंगल आहे. स्वतःच्याच पावलांचा आवाज ऐकून त्याला भीती वाटते आहे, आणि आता त्याने धावायला सुरुवात केली आहे, आणि आता धापाही टाकायला लागला आहे. कुजलेल्या पालापाचोळ्याची दुर्गंधी हवेत भरून राहिली आहे. थोड्या अंतरावर विखरून पडलेल्या कशाच्या तरी अवशेषांच्या फटींमधून पिवळट प्रकाश डोकावताना दिसतोय. खूप पूर्वीच विस्मरणात गेलेलं एक गाणं कुणीतरी स्त्री गाते आहे, आणि तो आवाज त्याला ओळखीचा वाटतो आहे— सुमी–? सुमीsss.– आणि ही गूढ आकृती कुणाची आहे ? तो त्या दिशेने जायला लागलाय – आणि–आणि त्याच क्षणी तो प्रकाश एकदम अदृश्य झालाय. गाणं थांबलंय. एखादा पोहणारा माणूस थकून गेल्याने पाण्यात बुडायला लागावा, तसा तो त्या गडद अंधाराच्या समुद्रात जणू खोल खोल बुडत चाललाय. ‘ सुमी ssss– सुमी sssss— ‘ अतिशय भरून आलेल्या आवाजातल्या त्याच्या हाका त्या मिट्ट काळोखात घुमत राहिल्यात. 

——- दारावरची बेल न थांबता कितीतरी वेळ वाजत राहिली आहे. तो खडबडून उठतो, आणि हेलपाटतच दाराजवळ जाऊन थरथरत्या हातांनी दार उघडतो. मोहोरलेल्या झाडांचा आल्हाददायक सुगंध सोबत घेऊन आलेली प्रसन्न हवा त्या दारातून आत येते. —

“ सुमी– तू !!! “ त्याचे शब्द घशातच अडकतात. तिचा हात धरून पुलक तिच्या शेजारी उभा आहे. सुमीच्या दुसऱ्या हातात सामानाची पिशवी आहे. 

नाही नाही— म्हणजे अजून रात्र झाली नाहीये. बाहेर अजूनही लख्ख सूर्यप्रकाश आहे. 

सुमीने घरात पाऊल टाकल्या टाकल्या तो तिला गच्च मिठी मारतो— “ कुठे गेली होतीस तू ?” 

“ अरे राजा, आज एक एप्रिल आहे ना–” सुमीला हसू आवरत नाहीये. पण आत्ता, या क्षणी त्याला काहीही ऐकू येत नाहीये. त्या दोघांना घट्ट मिठी मारून, न थांबता अतिशय आवेशाने त्यांचे मुके घेत रहाणं, एवढंच फक्त करू शकतोय तो. 

— बाहेरच्या झाडावर बसलेला बुलबुल गातोय–जणू त्याला सांगतोय– ‘ यावेळी वाचला आहेस तू. पण लक्षात ठेव– प्रत्येक दिवस काही ‘ एप्रिल फूल ‘ करण्याचा दिवस नसतो. जर तू कोणावर खरंच प्रेम करत असशील, तर त्याची– त्याच्या मनाचीही काळजी घेतलीस तरच बरं ‘ — त्याच्याही नकळत तो मान डोलावतो. 

समाप्त

मूळ इंग्लिश कथा : ‘ One day, suddenly—’ 

लेखक : श्री. सुशांत सुप्रिय 

अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares