मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘नमस्कार मित्रांनो —- TMT’ – डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘नमस्कार मित्रांनो —- TMT’ – डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

नवरात्रात माझ्या  वहिनीकडे गेले होते. तिच्याकडे   घटस्थापना झाली होती. दरवर्षी  देवीचं नवरात्र निगुतीने करणार्‍या माझ्या वहिनीला एका आठवड्यापूर्वी  रिक्षाचा अपघात होऊन तिचा पाय दुखावला होता. तिच्या सचिनचं सहा महिन्यांपूर्वीच  लग्न झालं होतं. नव्या सुनेचं हे पहिलं नवरात्र होतं. दरवर्षी नवरात्रीत सवाष्णपूजन , कन्यापूजन करणारी , साग्रसंगीत स्वयंपाक– हो अगदी ‘स्वयं’ पाकसिद्धी करणारी वहिनी  .. आता या वर्षी काय करेल ,याची मला काळजी वाटली. काळजीपेक्षा परंपरांच्या बाबतीत आग्रही मतं असणार्‍या वहिनीच्या नव्या सुनेची मला जास्त  काळजी वाटली. जरा धास्तावूनच जरीच्या साडीचा घोळ सावरत मी वहिनीच्या घरी पोचले.  वहिनीच्या  सुनेनं हसून माझं स्वागत केलं. रंगवलेल्या सोनेरी ब्लॉन्ड केसांचा सैलसर बुचडा, आधुनिक फॅशनच्या स्लीव्हलेस ब्लाऊज, वर चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि साडीच्या सोग्याजवळ खणाच्या पर्समध्ये अडकवलेला मोबाईल फोन—-स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आधुनिक तरुणीचं रुप. ती अध्येमध्ये फोनवरून तिच्या स्टाफला सूचना देत होती. तिने नुकतीच एक स्टार्टअप कंपनी सुरु केली होती. जुन्या नव्याची सांगड जणू तिने पेहरावातच घातली होती. तिने जमलेल्या आम्हा नातेवाईक बायकांची चौकशी केली. ‘आईंना बोलवते हं .’. असं सांगून ती तिच्या सासूबाईंना बोलवायला आत गेली.

वहिनी चार पायांची स्टीलची  काठी टेकत  बाहेर आली. सगळ्या बायकांच्या नजरा गरकन वहिनीच्या दिशेनं वळल्या. वहिनीने चक्क गुडघ्याखाली येईल असा खणाच्या कापडाचा  फ्रॉक घातला होता. तिच्या पायाला अजून बॅंडेज होतं. वहिनी अवघडलेली मुळीच दिसत नव्हती. उलट कौतुकाने सगळ्यांना सांगत  होती, अपघात झाला तरी सुनेनं कार्यक्रम करुया म्हटलं. तिच्या  सुनेनं हौसेनं दोन पदार्थ रांधले होते. वहिनीनं बसल्या बसल्या कोशिंबीर केली होती. बाकीचे पदार्थ बाहेरून मागवले होते. वहिनी उत्साहानं सांगत होती. प्रधानांच्या घरात क्रांतीच झाली म्हणायची, माझ्या मनात आलंच.  देवीची आरती झाली. सवाष्णींच्या ओट्या  सूनबाईनं छान पॅक केलेल्या होत्या. देणारीला आणि घेणारीलाही सुटसुटीत . सांडलवंड नाही की काही राहिलं- विसरलं नाही. छान गप्पा चालू होत्या. मध्येच अर्धा तास वहिनीची सून  लॅपटॉपवरुन  एक ऑनलाईन मीटिंग करायला आतल्या खोलीत  गेली. 

सूनबाई आत गेलीये, हे पाहून न राहवून बायकांनी विषय काढलाच. “ सुमनताई ,रूढीपरंपरांच्या बाबतीत तुम्ही एवढ्या आग्रही असता.  तुम्ही एवढ्या कश्या बदललात ?”

वहिनी हसून म्हणाली , “ मला  एक मंत्र मिळालाय. मला  या मंत्राचे खूप फायदे जाणवले.  लेकाचं लग्न झाल्यापासून मी या  मंत्राचा जप करते.”

“ कुठला मंत्र ?”  बायका उत्सुक होत्या. 

वहिनी म्हणाली , “ मन:शांतीचा  मंत्र.”                      

“ कुठल्या आध्यात्मिक गुरूकडे जायला लागलात की काय ? “ शेजारच्या काकींनी विचारलं . 

“ नाही हो .. स्वत:च स्वत:चा गुरु झाले आणि  जवळच्यांना  गुरु मानलं.” वहिनी अजूनही सस्पेन्स राखून होत्या.

“— कसंय नं .. आपल्यासाठी  घर खूप महत्वाचं असतं.  मुलं आणि आपण सोयीसाठी  वेगवेगळ्या घरात राहिलो तरी मनानं  सगळ्यांनी एकत्र येणं, एकमेकांना सोबत देणं गरजेचं असतं. मात्र नवीन सून आली की  सासूचा मानसिक गोंधळ सुरु होतो. घराची सत्ता, मुलावरचा अधिकार  आणि माझ्यावाचून अडलं पाहिजे.. हा अहंकार—  यामुळे आपल्या जवळच्या प्रिय  माणसांशीच वाद सुरु होतात. मीसुद्धा यातून जायला लागले होते. पण थोड्याच वेळात भानावर आले. घर आणि घरपण अबाधित ठेवायचं असेल तर बदलायला हवं होतं.  अनेक वर्ष साचलेलं पाणी स्वच्छ होण्यासाठी त्याखालचे नैसर्गिक झरे पुन्हा वाहते करावे लागतात, हा तर निसर्गनियम आहे . घरातल्या कर्त्या बाईने आणि पुरुषाने देखील सत्तेचं सिंहासन वेळीच मोकळं केलं तर पुढच्या पिढीला जबाबदारी लवकर कळते. म्हणून माझा मीच मंत्र ठरवला … TMT  .. ‘ तू म्हणशील तसं ‘

“TMT? तू म्हणशील तसं … किती छान आहे हा मंत्र  . “  पस्तीशीची  कनका  उत्साहाने म्हणाली. 

“ छान काय ?  मला नाही पटत .. सुनेनं आधी तिचा वकूब सिद्ध करायला नको का ? उगीच आधीच डोक्यावर घेऊन नाचलं तर उद्या या आपल्याच डोक्यावर मिरी वाटायच्या. त्यातून या आजकालच्या मुली .. “ वहिनींची जाऊ करवादली . 

“ जाऊबाई , नात्यांना आधीच चुकीची  लेबलं का लावायची . आणि वकूब सिद्ध करायला, सुनेला संधी तर दिली पाहिजे ना . उलट ‘ तू म्हणशील तसं  ‘ म्हटलं की  नवी पिढी आपल्याशी चर्चा करायला येते, असा माझा अनुभव आहे. आता आधुनिकता म्हटलं, तर प्रत्येक बाबतीत त्यांचं चुकतं असंही नसतं हो . या पिढीला परंपरांमधलं  विज्ञान समजावून सांगितलं तर त्यांना ते नक्की पटतं. आपणही काही चुकीच्या गोष्टी आंधळेपणी  पुढे चालवत असू तर आपल्यालाही त्यातल्या  चुका उमगतात.  माझी सूनबाई देव देव करणारी नाही. पण तिला माणसं आवडतात, नवीन नाती जोडायला आणि जपायला आवडतात. माणसातच देव शोधावा, असं म्हणते ती. आता हेच बघा ना, माझा पाय जायबंदी झालाय, साडी पायात येऊन मी पडू नये, म्हणून सूनबाईनेच हा खणाचा ड्रेस माझ्यासाठी  शिवून घेतला. माझा संकोच दूर केला . आजचा कार्यक्रम आणि  मेन्यू ठरवताना ही मी हाच मंत्र ओठांवर ठेवला होता  तू म्हणशील तसं— पण त्यामुळे आमच्यात छान चर्चा झाली. अनावश्यक गोष्टींना मी ही फाटा दिला . थोडा तुम  चलो, थोडा हम चले .. “

“ वहिनी , खरच छान आहे हे.. TMT.. “  मी भलतीच इम्प्रेस झाले होते. 

“ आणि बरं का ..सूनबाई  आता येऊन कानात सांगून गेली, की तिला देवीची आरती करायला खूप आवडलं . मेडिटेशन झालं म्हणाली. तुम्ही सगळे आलात, सगळ्यांशी ओळख झाली म्हणून देखील खूश आहे स्वारी. कुणास ठाऊक, आपल्या पूर्वजांनी नाती दृढ करण्यासाठी आणि  मानसिक शांतीसाठीच या आरत्या , श्लोक म्हणायला आणि सण साजरे करायला सांगितलं  असेल . “ 

वहिनी काठी टेकत स्वयंपाकघरात गेली. तिच्या सूनबाईंची मीटिंग संपली होती.  “ आई , पानं आधी घेऊया की आधी फन गेम्स घेऊ,” असं सूनबाई  वहिनीला विचारत होती. 

वहिनी म्हणाली , “ बायका भुकेजल्या असतील तर आधी वाढूया , मग खेळ घे. तरी तू म्हणशील तसं करूया.”

“ ओके . मी आधी वाढायलाच घेते. सचिन आज वर्क फ्रॉम होम आहे, त्याला हाक मारते. तो करेल मदत . तुम्ही बसा बरं .. पायावर प्रेशर येईल. “

त्यांच्या मदतीला आत आलेल्या माझ्या कानावर  पुन्हा एकदा  TMT  मंत्र  पडला आणि मला खुद्कन हसू आलं.  लेकाच्या लग्नाचं घोडामैदान जवळंच आलय. त्याआधीच एक छान मंत्र मला सापडला होता. TMT—

लेखिका :  डॉ. स्मिता दातार

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बा बा ब्लॅक शिप नको — लेखक अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ बा बा ब्लॅक शिप नको — लेखक अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले  

बा बा ब्लॅक शीप शिकवू नका. शिकवा:  वक्रतुंड महाकाय…. वाचा—–

पाश्चिमात्य संशोधकांनी उलगडले की संस्कृत मंत्र लक्षात ठेवणारी मुले मोठी झाल्यावर अति हुशार का होतात ?

कठोरपणे लक्षात ठेवणे मेंदूला किती मदत करू शकते हे न्यूरोसायन्स दाखवते. ‘संस्कृत इफेक्ट’ ही संज्ञा न्यूरोसायंटिस्ट जेम्स हार्टझेल यांनी तयार केली होती, ज्यांनी व्यावसायिक पात्रता असलेल्या २१ संस्कृत पंडितांचा अभ्यास केला होता. त्यांनी शोधून काढले की वैदिक मंत्रांचे स्मरण केल्याने अल्प आणि दीर्घकालीन स्मृतीसह संज्ञानात्मक कार्याशी संबंधित मेंदूच्या क्षेत्रांचा आकार वाढतो. हा शोध भारतीय परंपरेच्या श्रद्धेला पुष्टी देतो, ज्यामध्ये असे मानले जाते की मंत्रांचे स्मरण करणे आणि पाठ करणे स्मरणशक्ती आणि विचार वाढवते.

डॉ. हार्टझेलच्या अलिकडील अभ्यासात असा प्रश्न निर्माण झाला आहे की अशाप्रकारच्या प्राचीन ग्रंथांचे स्मरण अल्झायमर आणि इतर स्मरणशक्तीवर परिणाम करणाऱ्या रोगांचे विनाशकारी आजार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते का? वरवर पाहता, भारतातील आयुर्वेदिक डॉक्टर असे सुचवतात, आणि संस्कृतमध्ये अधिक संशोधनासह भविष्यातील अभ्यास नक्कीच केले जातील.

आपल्या सर्वांना सजगता आणि ध्यान पद्धतींचे फायदे माहित असताना, डॉ हार्टझेलचे निष्कर्ष खरोखरच नाट्यमय आहेत. कमी होत चाललेल्या लक्षांच्या जगात, जिथे आपल्याला दररोज माहितीचा पूर येतो आणि मुले लक्ष वेधून घेणारे अनेक विकार दाखवतात, तिथे प्राचीन भारतीय शहाणपणामध्ये पश्चिमेला (आणि पूर्वेकडील त्यांच्या ‘आधुनिक’ बौद्धिक सेवकांना) शिकवण्यासारखे बरेच काही आहे.

गायत्री मंत्रासारख्या सामान्य संस्कृत मंत्रांचे थोडय़ा प्रमाणात जप आणि पठण करूनही आपल्या सर्व मेंदूवर आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतो.

https://upliftconnect.com/neuroscience-and-the-sanskrit-effect/

हा संदेश वाचणाऱ्या सर्वांना एक छोटी सूचना आणि विनंती…

*कृपया हा MSG वैयक्तिकरित्या तुमच्या सर्व शाळा आणि प्ले स्कूल चालवणाऱ्या मित्रांना पाठवा…

Better late than never!

लेखक  :  अज्ञात 

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जपूया संस्कृती… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ जपूया संस्कृती… 🤔 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

आपण उत्सवप्रिय आहोत. श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक या महिन्यात विविध व्रतवैकल्ये, धार्मिक सण, उत्सव यांची रेलचेल असते. या काळात संपूर्ण निसर्ग बहरलेला असतो. वर्षाऋतुनं अवघ्या अवनीवरती जलाभिषेक केलेला असतो. सृष्टी सौंदर्यानं नटलेली असते. प्राणी पक्षी आनंदी असतात. झाडं,वेली पानाफुलांनी नटलेली असतात. आपले सण उत्सव   आपल्या संस्कृतीची ओळख सांगतात. तसेच ते निसर्गाशी नातं सांगतात, निसर्गाशी जवळीक साधतात. निसर्गातल्या बदलांचं निरिक्षण करून त्यांचं आपल्या जीवनाशी असलेलं नातं शोधणं म्हणजे सण, उत्सव साजरे करणं , हो ना? सणांच्या निमित्तानं माणसं एकत्र येतात, सुसंवाद घडतात. वैयक्तिक, सामाजिक ताणतणाव कमी होतात. याबरोबरच सण, नैसर्गिक बांधिलकीची जाणीव देखील करून देतात. सृष्टीतील प्रत्येक सजीवांप्रती प्रेम, आदर, व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून या सणांच्याकडं, बघायला हवं.

आपल्या चालीरीती, परंपरा आपल्याला निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतात. आपल्या परिसरातील झाडं, वेली, शेती, प्राणी, पक्षी या सर्वांना मानाचं स्थान देण्यासाठी सण निर्माण केले आहेत. असा विचार केला तर परंपरा जपल्या जातीलच, पण त्याशिवाय निसर्गाचं जतन करायला, संवर्धन करायला, परिसंस्था टिकवायला हातभार लागेल.

वटपौर्णिमा, नागपंचमी, ऋषीपंचमी साजरी करायची असेल तर घरातून बाहेर जावं लागतं. निसर्गाशी संवाद साधावा लागतो.गणेशाला लाल फुले, दुर्वा, आघाडा प्रिय. अर्जुन, रुई, पिंपळ, कण्हेर, शमी, डाळिंब,शंखपुष्पी अशी एकवीस प्रकारची पत्री पूजेसाठी लागते. बाप्पासाठी हे सर्व लागते म्हणून या वनस्पतींची लागवड केली जाते. त्यांची काळजी घेतली जाते, संवर्धन केले जाते. पर्यायानं आपण आपल्या सभोवती असलेल्या निसर्गाचं  संवर्धन करतो, जतन करतो. त्यामुळंच तर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. शहरात पूजेसाठी लागणारी फुलं, फळं,पत्री विकत मिळते. परंतु खरेतर या वनस्पती आपल्या परिसरात आपण स्वतः लावणं अपेक्षित आहे. देवपूजेचं निमित्त करून, पूजेसाठी लागणारी सामग्री गोळा करण्यासाठी आपण त्यांच्या जवळ, त्यांच्या सान्निध्यात काही काळ व्यतीत केला पाहिजे. मोकळी हवा, भरपूर ऑक्सिजन मिळवण्यासाठी परिसरात फिरलं पाहिजे. सृजनातला आनंद मिळवला पाहिजे.सर्जनशीलता वाढली पाहिजे. या वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांची माहिती करून घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्या त्या ऋतूत मिळणाऱ्या भाज्या,फळं यांचं सेवन केलं पाहिजे.

आपली संस्कृती रोजच दारात रांगोळी काढायला सांगते. यामुळे घरासमोरील अंगण, घराचा बाह्य भाग, यांची स्वच्छता होते. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश मिळतो. ताजा प्राणवायू उत्साह द्विगुणित करतो. थोडासा व्यायाम होतो. शेजाऱ्यांची खुशाली समजते. कलागुणांना वाव मिळतो. मन प्रसन्न होतं. अनेक आजार दाराबाहेर रोखले जातात.

सणासुदीच्या काळात म्हंटल्या जाणाऱ्या आरत्या, स्तोत्र पठण, यांनी सात्विक वातावरण निर्माण होतं. आरती गाताना आपण टाळ्या वाजवतो. यामुळं जशी गेयता येते, तालाचं, चालीचं भान राहतं तसंच रक्ताभिसरण सुधारतं. ओवी, श्लोक, ऋचा, आरत्या जिभेला वळण लावतात, स्मरणशक्ती वाढवतात. विचार करावा तेवढे फायदे आहेत. आपल्या पूर्वजांनी अभ्यास करून रितीरिवाज, परंपरा, सणसमारंभ यांची आखणी केली आहे. आधुनिक काळात पाश्चिमात्य देशांमधील विचार, पद्धती, खाद्यसंस्कृती, वेषभूषा आपण स्वीकारतो. ती वाईट नाही. पण आपल्या हवामानाला पूरक नाही हे मात्र नक्की. निसर्गाचा समतोल राखत, मानवी जीवन आरोग्यपूर्ण, आनंदी आणि समाधानी करण्यासाठी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्न,वस्त्र, निवारा देणारी अवनी जपली पाहिजे.

‘सहनाववतु, सहनोभुनोक्तु सहवीर्यं करवावहै’ ची अनुभूती घेतली पाहिजे.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आमची दिवाळी… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आमची दिवाळी… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

तरुणपणात कुणाची तरी येते ती आठवण…. म्हातारपणात होतं ते स्मरण…. यानंतरही जिवाभावात उरतात त्या मात्र स्मृती…. ! 

ऑक्टोबर महिन्यामध्ये घडलेल्या प्रत्येक घटना, स्मृती म्हणून माझ्या मनामध्ये कागदावर शिक्का मारावा त्याप्रमाणे उमटल्या आहेत…! 

काल घडलेल्या सुखद घटना, शिक्का मारलेल्या या स्मृती, आज घरी येऊन घरातल्या आपल्या लोकांना चौखूर बसवून पुन्हा रंगवून सांगण्यात मजा असते… मी त्यालाच लेखा जोखा म्हणतो !!! 

आमच्या खेडेगावात पूर्वी बुधवारी बाजार भरत असे (आताही तो बुधवारीच भरतो)…. लहानपणी आजीच्या बोटाला धरून मी तिच्या मागे मागे फिरून बाजार करत असे…सगळ्यात शेवटी ती माझ्यासाठी चार आण्याची भजी विकत घेत असे…. कळकट्ट पेपराच्या पुरचुंडीत बांधलेले हे सहा भजी मी जपून घरी आणत असे … बाजारातून घरी चालत जायला किमान एक तास लागे… तोवर मी साठ वेळा आजीच्या पिशवीतून भज्यांचा पुडा नीट आहे की नाही हे तपासात असे…. त्याचा वास घेत असे…. ! —- भजी खाण्यात जो आनंद आहे…. त्यापेक्षा त्याचा सुगंध नाकात भरून घेण्यात जास्त मजा असते…. ! 

एखादं ध्येय प्राप्त करण्यापेक्षा त्या ध्येयप्राप्तीपर्यंतचा प्रवास कधीकधी आनंददायी असतो….!!! 

तर…. घरी जाईपर्यंत त्या कळकट पेपरला भज्यांचं तेल लागलेलं असे…. खून दरोडे बलात्कार आणि राजकारण याच बातम्या त्याही वेळी होत्या… आजही त्याच आहेत…. या बातम्यांची शाई माझ्या भजाला आपसूक चिटकत असे…. पण मला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं ! 

आज वयाने मोठा झाल्यानंतर “भजी” म्हणतो…. लहानपणी “भजं” म्हणत होतो…!

वर्तमानपत्राचा कागद आज जरी बदलला असला तरी बातम्या मात्र त्याच आहेत…. 

वयाने कितीही मोठा झालो असलो, तरीसुद्धा सामाजिक परिस्थिती विशेष बदललेली नाही……. असो…

फरक फक्त इतकाच पडला आहे….. भजी विकणारे, पटका बांधणारे…. आजोबा जाऊन, त्यांच्या जागी त्यांचा मुलगा आला आहे…

आजोबा भजी विक्री करून “व्यवसाय” करायचे, घराचा उदरनिर्वाह भागवयाचे, मुलगा आता “धंदा” करतो….!

मातीची घरं जाऊन सिमेंट ची पक्की घरं झाली आहेत….

घरं पक्की झाली पण नाती भुसभूशीत झाली….!

घरा समोरचं अंगण जाऊन, तिथे पार्किंग ची जागा झाली आहे….

पूर्वी पाऊस पडल्यानंतर अंगणातल्या मातीला “सुगंध” यायचा… हल्ली नुसताच चिखल होतो…. या चिखलात घरापासून दूर गेलेल्या कारच्या खुणा फक्त ठळक दिसतात…….. 

गेलेली मुलं, नातवंडे परत घरी येतील या आशेवर दोन म्हातारे डोळे लुकलुकत असतात…. विझत चाललेल्या दिव्यासारखे ! 

माझी आजी गेली त्याला कित्येक वर्ष झाली… परंतु पडक्या त्या वाड्याला तिच्या स्मृतीचा सुगंध आहे… ! 

चार आण्याला हल्ली भजी मिळत नाहीत…. ते चार आणे भूतकाळात मी हरवून आलो आहे… तेलाचा डाग पडलेला तो वितभर पेपर…. पटका घालणारे ते बाबा… अन् वर दोन भजी जास्त घाल म्हणून वाद घालणारी ती माझी 

आजी… ! —– आज जरी मी हे सगळं हरवलं आहे, तरीसुद्धा….तेलाचा डाग पडलेल्या, त्या कळकट पेपरमधल्या भज्यांच्या सुगंधासारख्या…. या सर्व स्मृती अजूनही मनात दरवळत आहेत… खमंग… खमंग !!! 

या महिन्यात दिवाळी होती….! 

मोठ्या हौसेने आम्हीसुद्धा पणत्या घेतल्या. पण आमच्या घरात त्या लावल्या नाहीत…. आम्ही त्या चार जणांना विकायला लावल्या…. ! …. विकलेल्या पणत्यांनी एका बाजूचं घर उजळेल…. तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या घराची भूक शमेल…! 

आम्ही घरीच उटणं केलं …. रस्त्यावरील याचकाकडून त्याचं पॅकिंग करून घेतलं…. त्या बदल्यात त्यांना पगार दिला… या उटण्यात आम्ही चंदनाचे चूर्ण घातले होते…….. या उटण्याला चंदनाचा सुगंध येतोय की नाही माहित नाही, पण कष्टाचा सुगंध नक्कीच आहे ! 

आमच्या खेडेगावात पूर्वी प्रथा होती…  घरामध्ये फराळ तयार झाला की, ताटंच्या ताटं भरून ती गल्लीतल्या शेजार पाजारच्या लोकांना द्यायची…… जणू शेजारच्यासाठीच घरी फराळ तयार करत आहोत….. आम्ही पोरं सोरं ही ताटं लोकांच्या घरी पोहोचते करत असू….  त्यावर एक फडकं झाकलेलं असे…. वाटेत जाताना हे फडकं हळूच बाजूला करून चिवड्यातल्या खमंग तळलेल्या खोबऱ्याच्या चकत्या आणि शेंगदाणे खायला मिळत, म्हणून हे ताट पोहोचवण्याचं काम अंगावर घ्यायला आम्ही प्रत्येक जण उत्सुक असत असू … घरातून भरलेलं ताट दुसरीकडे घेऊन जाईपर्यंत निम्मं व्हायचं… यात खूप “मज्जा” यायची….!  सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की खेड्यातली ही प्रथा आताच्या आपल्या समाजातल्या अनेकांनी आजही जपली आहे……. 

…. ताटंच्या ताटं भरून यावेळी समाजातल्या अनेक दानशूरांनी आमच्याकडे फराळ पाठवला… किमान ३० हजार लोकांना पुरेल इतका हा फराळ होता…

गावाकडल्या स्मृतीचा गंध पुन्हा मनात दरवळला…. लहानपणीप्रमाणेच याहीवेळी आम्ही फडकं झाकून फराळाचं ताट घेऊन रस्त्यावर गेलो…….  

…. पण यावेळी तळलेल्या खोबऱ्याच्या खमंग चकत्या आणि शेंगदाणे आम्ही खाण्याऐवजी पोराबाळांची वाट बघणाऱ्या…. लुकलूकणारे डोळे आणि थरथरते हात घेऊन जगणाऱ्या जीवांना भरवल्या …….  

…. आपण घेण्यापेक्षा, दुसऱ्याला देण्यामध्ये जास्त “मज्जा” येते हे आता कळलं…! 

वैद्यकीय उपक्रमांतर्गत या महिन्यात जवळपास ९०० रुग्णांवर रस्त्यावरच उपचार केले. आणि १६ गंभीर रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपचार करून घेतले आहेत. गरजूंना वैद्यकीय साधने (व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या,  मास्क, sanitizer, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे,) दिले आहेत. 

वृद्ध लोक ज्यांना बिलकुल ऐकायला येत नाही, वृद्धापकाळाने डोळ्यांना दिसत नाही आणि त्यामुळे रस्ता ओलांडताना एक्सीडेंट होऊन मृत्यू होतात, अशा सर्वांना कानाची मशीन दिले आहेत, डोळ्यांची ऑपरेशन्स केली आहेत….. या सर्व वृद्धांच्या, आवश्यक त्या सर्व तपासण्या आपण  रस्त्यावरच केल्या आहेत. 

शैक्षणिक उपक्रमांतर्गत ज्या मुलांनी शिक्षणाची वाट धरली आहे अशा सर्वांना काय हवं नको ते पाहून गरजेच्या शैक्षणिक बाबी पुरवल्या आहेत. 

या महिन्यात अनेक गोरगरिबांना शिधाही दिला…

आमच्या परीनं आम्ही दिवाळी साजरी केली….

या अल्लाह…. दर्गाह मे हमने कोई चादर नही चढाई…. मगर रस्ते पे जो बुजुर्ग थंड मे मुरझाये पडे थे…. उनके शरीर पे चादर चढाई है …. 

Dear Jejus, we have not offered a single candle to you in this Diwali …. But we have enlightened the houses of many poor people….! 

वाहेगुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतह…

इस बार हमने गुरुद्वारेपे नही….रस्तेपेही लंगर आयोजित किया था…… पंजाबी या गुरुमुखी भाषा तो आती नही मुझे… लेकिन बिना शब्दोंकी बोली जो हमने बोली ….क्या वो आपकी भाषा से अलग है ? 

देवी माते … नवरात्रात तुला साडी चोळी अर्पण करण्यापेक्षा, फुटपाथवरच्या मातेला आम्ही साडी चोळी अर्पण केली गं … ! त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले…. ते तुझेच तर  होते…..

हे शंकर भगवान…. भोलेनाथा…. लोक तुम्हाला दुधाचा अभिषेक करतात…. तुम्हाला अभिषेक करण्याऐवजी उपाशी आणि नागड्या पोरांना मांडीवर घेऊन, आम्ही त्यांना दूध पाजले आहे… यानंतर तुमच्या मुद्रेवर जे प्रसन्न हास्य उमटलं…. ते मी दिवाळीचा दिवा म्हणून मनात साठवून ठेवलंय…..

हे गजानना…. चतुर्थीला तुला मोदकाचा “नैवेद्य” दाखवण्याऐवजी रस्त्यावर भुकेचा महोत्सव मांडून…. भुकेल्यांना मोदक भरवून त्यांचा आनंद  “प्रसाद” म्हणून  आम्ही मिळवला आहे… ! 

आणि हो… हे सारं करण्याबद्दल मी तुमची मुळीच माफी मागणार नाही…. ! 

कारण…….. 

कारण हे सर्व माझ्या हातांनी करणारे…… 

करवणारे……. 

करवून घेणारे……. 

….. तुम्हीच आहात… तुम्हीच आहात… तुम्हीच आहात… !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुलसी विवाह !… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ तुलसी विवाह !… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नुकतीच दिवाळी संपली आहे, पण तरी परवापासून सुरु झालेल्या तुळशीच्या लग्नामुळे अजूनही मस्त सणाचे  वातावरण आहे, नुसते आजुबाजुला नाही तर फेसबुक वर पण…. 

आज असंच दिरांशी बोलता बोलता, तुळशीच्या लग्नाचा विषय  झाला … आम्ही सांगलीत असताना दिरांकडे धडाक्यात लग्न साजरे करायचो.. तेव्हा माझ्या मनात लहानपणापासून पाहिलेली तुळशीची लग्नं आठवायला 

लागली !—–  खरंच आपण का करतो तुळशी चे लग्न ?–हे आताच्या पिढीला समजेल अशा पध्दतीने सांगायला पाहिजे,  म्हणून हा लेखनप्रपंच !

आम्ही ही लहानपणापासून तुळशीचे लग्न पाहिलंय,पण आता मुलींना त्याची कारणमीमांसा पण लागते. त्यामुळे मी लगेच त्याबद्दलची माहिती शोधायला सुरुवात केली !

— या मागची पौराणिक कथा आहे ती अशी — जालंदर नावाचा असुर देवांना अजिंक्य झाला होता. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. विष्णूने जालंदरचे रूप घेऊन वृंदेचे सत्वहरण केले. तेव्हा जालंदराने तिला शाप देऊन

दगड केले. तेव्हा ती सती वृंदावनात प्रकट झाली. हीच ती तुळस ! विष्णूने याचे प्रायश्चित्त म्हणून तिच्याशी विवाह केला. विष्णूच्या कृष्णावतारात हे लग्न झाले. त्यामुळे आपण विष्णू आणि कृष्णाला तुळस वहातो.—-

या सर्व पुराणकथा झाल्या ! पण आताही आपण तुलसी विवाह का करतो? आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्ट निसर्गाशी निगडीत केलेली आहे. निसर्गातील प्राणी,पशूपक्षी, वनस्पती ,वृक्षवेली हे आपले सगेसोयरे आहेत. त्यामुळे माणूस या सर्वांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सव करतो. जसे वटपौर्णिमा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा….. पंचमहाभूतांचे त्या निमित्ताने स्मरण केले जाते.

तुलसी विवाहाची प्रथाही अशीच आली असावी. तुळस ह्या वनस्पतीचे शास्त्रीय महत्व आहे. तुळशीचे झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे आहे. तिच्या मंजि-यांपासून असंख्य रोपे तयार होतात. सर्वांना ऑक्सिजन मिळावा म्हणून पूर्वी घराभोवती तुळशीची झाडे वाढवली जात. तुळशीमुळे कीटक येत नाहीत, इतकंच काय डासही कमी होतात. तुळशीचा रस अंगाला लावला की डास चावत नाहीत. तुळशीची पाने औषधी आहेत. तुळशीच्या पानांचा रस खोकल्यासाठी उपयुक्त आहे. तसेच त्वचेच्या रोगांवरही तुळशीचा रस उपयोगी असतो. अशी ही बहुगुणी तुळस पूजेसाठी योग्य ठरली !

पूर्वीच्या काळी स्त्रियांचे घराबाहेर पडणे समाजात मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना घराबाहेरची मोकळी हवा मिळत नसे. अशा विचाराने बहुतेक तुळशीला रोज स्त्रियांनी पाणी घालण्याची पध्दत आली असावी. पूर्वी वाडा संस्कृती होती, तेव्हा वाड्यात शिरले की मधोमध तुळशी वृंदावन असे. ती एक पवित्र जागा असे, जिथे संध्याकाळी घरातील स्त्रिया, मुलेबाळे बसून शुभंकरोती,परवचा म्हणत असत. तुळशीसमोरच्या पणतीच्या शांत उजेडात मनही शांत होऊन जाई !

या दिवसात चिंचा,बोरे,आवळे यायला सुरुवात होते. ही फळे म्हणजे व्हिटॅमिन ‘सी’ चा साठाच जणू ! त्यामुळे तुळशी विवाहाच्या वेळी ही सर्व फळे पूजेसाठी असत. आपोआपच घरातील मुलांना ती  खायला मिळत. उसाची मोठी झाडे आणून ती तुळशीला मांडव म्हणून वापरली जात. दिवाळी झाल्यानंतर मुलांसाठी तुळशीचे लग्न हा एक आनंददायी कार्यक्रम असे. दिवाळीत राहिलेले फटाके तुळशीच्या लग्नात उडवून संपवायचे. दिवाळी फराळ संपत आला असला तरी नवीन लाडू,करंजी लग्नासाठी बनवली जात असे. तुळशीचे लग्न झाले की विवाह मुहूर्त सुरू होत असत. आणि वातावरण सणांकडून लग्न समारंभाकडे वळत असे.

तुळशीचे लग्न ही गोष्ट आता जरी कालबाह्य वाटत असली तरी तुळशीचे गुणधर्म काही नाहीसे होत नाहीत ! निसर्ग आणि ईश्वर यांची सांगड आपल्या संस्कृतीत अशा पध्दतीने घातली गेली आहे. शिक्षणामुळे ज्ञान वाढले, सुबत्ता आली पण अशांतता ही वाढली. एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. प्रत्येक कुटुंब म्हणजे एक बेट बनले आहे !  हे असे प्रसंग लोकांना जोडून ठेवायला मदत करतात.. हल्ली लोकांना एकटेपणा मुळे बऱ्याच मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते……  नुसती  भौतिक प्रगतीच नाही तर मन:स्वास्थ्य  जपणे हे तितकेच महत्वाचे आहे. —आणि आपल्या संस्कृतीतून हे आपसूकच घडून येत असे. 

दुसऱ्याच दिवशी, तुळशीचे लग्न करून मुलीने पण तुळशी लग्नाचे फोटो पाठवले. स्वत: छान साडी नेसलेला,नातीने परकर पोलके घातलेला, आणि नातवाने तुळशीसाठी अंतरपाट धरलेला आणि हे सर्व कौतुकाने जावई बघत आहेत…..असे फोटो मोबाइलवरून आले. आणि क्षणार्धात माझे मन विमानाच्या वेगाने दुबईला पोचले…तुलसी विवाह कसा साजरा झाला हे बघण्यासाठी !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रशियन कलाकारांची रामलीला… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ रशियन कलाकारांची रामलीला… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

1960 मध्ये रशियन कलाकार गेनाडी मिखाईलोविच पेचिन्कोव याने पहिल्यांदा प्रभू रामचंद्र साकारला आणि पुढे चाळीस वर्षं त्याने श्रीराम म्हणून रशिया व युरोपातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रशियात आणि जवळपासच्या देशांत रामायण पोचवण्याचं काम त्यांनी चोख बजावलं. भारत सरकारकडून २००६ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं गेलं. २०१८ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

गेली काही वर्षं योगींचं भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अयोध्येतील दीपोत्सव आपल्या डोळ्यांचं पारणं फेडत आहे.  २०१८ मध्ये अयोध्येत पहिल्यांदाच रशियन कलाकारांनी रामलीला सादर केलेली आणि नंतर २०१९ च्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यात.

यंदाच्या दिवाळीत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी २३ ऑक्टोबरला अयोध्येतील दीपोत्सवात भाग घेतला आणि रशियन कलाकारांनी साकारलेली रामलीला पाहिली.

मर्यादा पुरुषोत्तम राम साकारला आहे इल्दार खुस्नुलिस याने, तर सुकुमार सीतामाई आहे मिलाना बायचोनेक. अलेक्सेई फ्लेयिन्कव बंधुप्रेमामुळे रामचंद्राबरोबर गेलेला लक्ष्मण झाला आहे, ज्यांचा फोटो आपण येथे पहात आहोत. 

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ आरसा… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

आरसा ज्याला दर्पण’असेही म्हणतात,तो आरसा सर्वांचाच एक आपुलकीचा-जिव्हाळ्याचा विषय आहे.’

सांग दर्पणा दिसे मी कशी?असं गुणगुणत दर्पणात पाहणार्या या फक्त युवतीच असतात असं नाही बरं का!

तर अगदी दुडुदुडु चालायला शिकलेली बालके, जगातील अनेक किंवा अगदी सर्व ठिकाणच्या सर्व वयोगटातील लोकांसाठी अर्थातच आबालवृद्धांसाठी आरसा ही एक आवश्यक बाब ठरते.

तयार होऊन शाळेला जाण्यापूर्वी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी आपली केशभूषा, पआपली वेशभूषा ठीकठाक आहे कि नाही हे आरसाच सांगतो.कांही शाळात अगदी दर्शनी भागात आरसा टांगलेला असतो कारण विद्यार्थ्यांने गणवेश, केस वर्गात प्रवेश करण्यापूर्वी व्यवस्थित आहेत कि नाहीत हे पाहिल्यानंतरच पुढे व्हावे,नसेल तर व्यवस्थित हो असे आरसा सांगतो.सण-समारंभ,लग्नकार्य अशावेळी तरी या आरशाची खूपच मदत होते.

पण मित्र हो,आपले बाह्यांग,आपले बाह्यव्यक्तिमत्व जसे आरशात पाहून कळते तसा आणखीहीएक आरसा आपल्या जवळ सतत असतो .तो आरसा म्हणजे मनाचा आरसा.ज्या मनाचा तळ लागत नाही असे म्हणतात त्या मनातील भाव-भावनांचे प्रगटीकरण चेहरारुपी आरशाद्वारे प्रगट होते. मनातील आनंदी, दुःखी, प्रसन्न, काळजीपूर्ण ,रागीट,भयभीत असे सर्व भाव चेहरारुपी आरसा स्पष्ट करतो.म्हणूनच म्हंटले जाते. चित्तं प्रसन्नं भुवनं प्रसन्नं चित्तं विषण्णं भुवनं विषण्णं.

आपलं आपल्या मनावर नियंत्रण असणं गरजेचं असतं कारण त्यामुळेच आपण व्यक्तिगत भावना लपवून बाहेर ील व्यवहार सुरळीतपणे पार पाडू शकतो.पण याउलट काही वेळा मनाचा आरसा जर चेहर्यावर प्रगट झाला तर त्याचा फायदाही होतो.म्हणजे चेहर्यावर दुःख दिसल्यानंतर जवळच्या व्यक्तीने आपली विचारपूस केली तर दुःख निम्मे  हलके होते.

ब्युटीपार्लर, केशकर्तनालय या ठिकाणी तरी आरसा पाहिजेच.याखेरीज सपाट आरसे आणि गोलीय आरसे प्रकाशाच्या अभ्यासात ,प्रतिमा मिळविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात.गोलीय आरशांचा उपयोग काही ठिकाणी प्रदर्शनात अशा प्रकारे केला जातो कि आपली छबी कधी जाड व बुटकी दाखविली जाते तर कधी उभट व लांब दिसते. त्यामुळे आपली करमणुक होते.

म्हणूनच आरसा हा आपला एक जवळचा मित्र आहे असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. उभा, आडवा, चौकोनी, गोल, षटकोनी असे सर्व प्रकारचे आरसे आपण पाहतो. पर्समध्ये किंवा अगदी पावडरच्या डबीत मावणार्या छोट्या आरशापासून मोठ्यात मोठे,प्रचंड आरसे असतात.मोठे आरसे आपण राजवाड्यात, आरसेमहालात किंवावस्तुसंग्रहालयात आपण पाहू शकतो.

गावाकडील आमच्या जुन्या घरात मी भिंतीत बसविलेले आरसे पाहिले। आहेत.चित्रपट स्रुष्टीतही आरशांचा उपयोग अगदी लाजवाब पणे केलेला दिसतो.

चला तर, आपणही आरसा बाळगुया नि व्यवस्थित, नीटनेटके राहू या.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गॉडविट…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ गॉडविट…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

काल हा फोटो बघितला आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या पुढे आपण काहीच नाही याची जाणीव झाली. 

गॉडविट (Godwit) जातीच्या पक्षाने नुकताच एक जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. ५ महिन्यांच्या या पक्षाने १३ ऑक्टोबर २०२२ ला अलास्का इकडून उड्डाण भरलं. तब्बल ११ दिवस १ तासात त्याने १३५६० किलोमीटर अंतर कापून ऑस्ट्रेलियातील टास्मानिया इथे तो उतरला. या ११ दिवसात त्याचा सरासरी वेग होता ५१ किलोमीटर / तास. 

या संपूर्ण प्रवासात तो एकदाही झोपला नाही, त्याने काही खाल्लं नाही, त्याने पाणी प्यायलं नाही. तो फक्त उडत होता आपल्या लक्ष्याकडे. अलास्कामध्ये त्याच्या पाठीवर बसवण्यात आलेल्या ५ ग्रॅमच्या सॅटलाईट चिपने त्याच्या या संपूर्ण प्रवासाची नोंद केली आहे. त्याच्या नावावर हा जागतिक विक्रम नोंदला गेला आहे. 

गॉडविट नावाचे पक्षी स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे हवेतून तब्बल ८० किलोमीटर / तास वेगाने उडू शकतात. (उड्डाण करतात ग्लाइड न करता). तळ्याकाठी, मॅन्ग्रूव्हच्या जंगलात यांचं अस्तित्व दिसून येते. 

निसर्गाच्या या अदाकारीपुढे पुन्हा एकदा नतमस्तक झालो. सलग ११ दिवस असा पृथ्वीच्या दोन टोकांचा प्रवास महासागरावरून करणं ही नक्कीच अविश्वसनीय अशी घटना आहे. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अश्या घटना उजेडात येत असल्या तरी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी केलेला हा हजारो किलोमीटरचा प्रवास मला स्वतःला खूप शिकवून गेला.

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनुष्य इंगळी, अति दारूण…लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ मनुष्य इंगळी, अति दारूण…लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

“ पणत्या कशा दिल्या काकू? ”

“ नक्षीच्या ६० रूपये डझन आणि साध्या ४० रूपये डझन ”

“ मला ६ हव्यात.”

“ ६ नं कुठं दिवाळी होत असती का दादा? दोन्ही घ्या की एकेक डझन.. नव्वद ला देते मी..”

हो-नाही, हो-नाही करत करत शेवटी एक डझन पणत्या घ्याव्यात असा निर्णय झाला. ‘वैशाली’त उत्तप्पा मागवताना एवढा विचार नाही करत कुणी. पण पणत्या सहा घ्याव्या की बारा? याचा निर्णय घेण्यासाठी पाच मिनिटं घेतो आपण. माणसाची तऱ्हाच निराळी.

लग्न ठरवण्यासाठी भेटताना बरिस्ता किंवा सीसीडी मध्ये भेटून बिलासाठी पाचशे रूपयांच्या दोन नोटा देणाऱ्या तरूणाचं रूपांतर, लग्नानंतर एक किलोच्या भावात घासाघीस करून पाव किलो भाजी घेणाऱ्यात कसं होतं, ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. याला दुटप्पीपणा म्हणता येणार नाही, ही स्वाभाविक वृत्ती आहे. कोणत्या गोष्टी गृहीत धराव्यात, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, याच्या धोरणांमध्ये गडबड झाली की जगण्या-वागण्याची पुढची सगळी समीकरणं चुकतच जातात आणि आपल्याच चुकांमुळं हे घडतंय, हे बहुतांश लोकांच्या लक्षातही येत नाही.

“ हव्यात कशाला ढीगभर पणत्या? दारात लावायला दोन पणत्या पुरे झाल्या.” असं म्हणणाऱ्या गृहलक्ष्मीनं स्वत:चा चारखणी वाॅर्डरोब उघडून त्याचं ऑडीट करावं आणि मग पुढची प्रत्येक साडी खरेदी करताना “ हवेत कशाला ढीगभर कपडे? ” असं म्हणावं. जमेल का?

एका ग्राहकरूपातल्या गृहलक्ष्मीला समोरच्या विक्रेतीमधली गृहलक्ष्मी दिसू नये, हे स्वत:च्याच कोषात गुरफटून गेलेल्या कमालीच्या असंवेदनशील व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे.

मंडई- तुळशीबागेपासून खरेदी सुरू होते, तेव्हा पाकीट लहान असतं, तिथल्या वस्तू महागड्या वाटतात. पुढं बेलबाग चौकातून डावीकडे वळलं की, तेच पाकीट प्रत्येक पावलागणिक आकारानं मोठं-मोठं व्हायला लागतं आणि खरोखरच्या महागड्या गोष्टीसुद्धा स्वस्त वाटायला लागतात. हा केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीतला खेळ नाही, हा माणसांच्या जगण्याविषयीच्या अस्पष्ट आणि अंधुक कल्पनांचा खेळ आहे.

एक जुना प्रसंग सांगतो. जोगेश्वरीच्या बोळात एक विक्रेता मेणाच्या उष्णतेवर चालणाऱ्या पत्र्याच्या बोटी विकत होता. मला त्या बोटी हव्या होत्याच. मी त्या निवडून घेत होतो. एक तरूण वडील आपल्या मुलाला घेऊन आले. त्यांना एक बोट हवी होती.

“ केवढ्याला दिली रे? ”

“ साठ रूपये साहेब.”

“ साठ? अरे, खेळणं विकतोस की खरी बोट विकतोस? ”

“ खेळणंच आहे.”

“ साधी पत्र्याची तर आहे. माझ्या लहानपणी पाच रूपयांना मिळायची. आता साठ रूपये? वीसला दे.”

“ साहेब, माझी खरेदीच चाळीस रूपयाची आहे. वीसला कशी देऊ?”

तेवढ्यात त्यांच्या लहान मुलानं सूर लावला. “ पप्पा, मला प्ले स्टेशन देणार होतात तुम्ही. मला हे नकोय. हे एकदम थर्ड क्लास आहे.”

“ चल. देतो तुला प्ले स्टेशन.”

बाप-लेक निघून गेले. तीस हजार रूपयांचं प्ले स्टेशन घेताना त्यानं पाचशे रूपयांत मागितलं असेल का? “आमच्या वेळी तर असलं काहीच नव्हतं. म्हणून दे आता फुकट.” असं म्हटलं असेल का त्यानं? नक्कीच नाही. तो काय, कुणीच असं म्हणणार नाही.

“ दादा, हे गिऱ्हाईक दुसऱ्यांदा येऊन गेलं बघा. नुसतंच बघून भाव करून जातो. खरेदी तर करत नाही.” मी निरूत्तर होऊन त्याचा निरोप घेतला. पण तो मुद्दा मनात राहिला तो राहिलाच.

डाॅ. कलामांनी एकदा प्रश्न विचारला होता, “ जगातली सगळ्यात मोठी समस्या कोणती? ” त्यावर एका लहान मुलीनं उत्तर दिलं होतं, “ गरिबी.” त्या मुलीचं उत्तर किती खरं होतं, याचा प्रत्यय दरवर्षी दिवाळी आली की येतो. सणासुदीच्या वस्तू, ज्याला आजकाल ‘सिझनल्स’ म्हणायची पद्धत आहे, ती बाजारपेठ ही खरं तर आपल्या देशातली एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. पण अन्य व्यवसायांच्या चकचकाटात तिची गर्भश्रीमंती आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. या बाजारपेठेचे विक्रेते शालेय शिक्षणाच्या दृष्टीनं अडाणी असतीलही पण भारतीय मनांचं आणि सश्रद्धतेचं मर्म त्यांना अचूक उमगलेलं आहे. त्यांना या गोष्टींना ब्रॅन्डचं रूप देता आलेलं नाही, ही गोष्ट खरी आहे, पण त्याचं कारण कदाचित या बाजारपेठेचं असंघटित असणं हेही असू शकेल. त्यामुळे तो दोष माणसांचा नाही, असलाच तर तो चुकीच्या धोरणांचा आहे आणि कोरोनाच्या सावटाखालच्या या दिवाळीत तर त्याचा रंग अधिकच ठळकपणे दिसतो आहे.

वडापाव विकणारा, चहा विकणारा आणि झेंडूची फुलं विकणारा असे तीन विक्रेते एकाच रस्त्यावर शेजारी शेजारी उभे राहून व्यवसाय करतायत. त्यात वडापावच्या भावाची घासाघीस होत नाही आणि चहाचीही होत नाही. पण झेंडूची फुलं विकणाऱ्याशी मात्र जवळपास प्रत्येकजण घासाघीस करतो, हुज्जत घालतो. गजरे विकणाऱ्यानं दहा रूपये असं म्हटलं की, ‘ पन्नासला सहा देतोस का? ’ असं दहापैकी नऊ जण विचारतातच. पण वीस-पंचवीस वडापाव खरेदी करूनही ते वडापाव विक्रेत्याला हा प्रश्न अजिबात विचारत नाहीत, पैसे देतात. तसं पाहिलं तर, दोघेही रस्त्यावरचेच विक्रेते. मग हा फरक का?

फरक विक्रेत्यात नाही, फरक आपल्या दृष्टिकोनात आहे. आपल्याला स्वत:ला बदलावंच लागेल..!

लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला तुमचा चेहरा आठवायचा आहे ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 मला तुमचा चेहरा आठवायचा आहे  🌼 सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

“ मला तुमचा चेहरा आठवायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”

जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: ” सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला, ती आठवण सांगाल का?”

रतनजी टाटा म्हणाले: ” मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला.—

पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.

मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.

त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील ९५%डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.

चौथा टप्पा होता, जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हीलचेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे २०० मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हीलचेअर घेतल्या.—

—पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हीलचेअर स्वहस्ते द्याव्या . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणू काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “ तुला आणखी काही हवे आहे का?”

—- तेव्हा त्या मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला—-

—मुलाने म्हटले: ” मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”—- “ 

वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?

कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares