मराठी साहित्य – विविधा ☆ शारदीय नवरात्रोत्सव.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ शारदीय नवरात्रोत्सव.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव असतो. नऊ ही संख्या ब्रह्म संख्या समजली जाते. निर्मिती शक्ती आणि नऊ हा अंक यामध्ये एक नाते आहे. जमिनीत गेल्यावर बीज नऊ दिवसांनी अंकुरते. आईच्या पोटात बाळ नऊ महिने राहते आणि जन्म घेते. 9 हा अंक सर्व अंकात मोठा आहे. आदिशक्तीचा उत्सव हा निर्मितीचा उत्सव असल्याने तो नऊ दिवस असतो.

सनातन वैदिक धर्म हा माणसाने निसर्गाशी नाते जोडावे  हे शिकवतो.  भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे सण-उत्सवांची रचना ही शेतीच्या वेळापत्रका नुसार करण्यात आली आहे.

पावसाची नक्षत्रे संपता संपता भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणपती पूजन केले जाते. भाद्रपद कृष्णपक्षात आपण पूर्वजांचे स्मरण करतो, तर आश्विन महिन्याच्या सुरुवातीला शेतात धान्य तयार  होते म्हणून निसर्गातील निर्मिती शक्ती विषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. निर्मिती शक्ती नवीन पिढीला जन्म देते ती या आदिशक्ती मुळेच! म्हणून नवरात्र उत्सव किंवा आदिशक्तीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो.

आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपले सण हे त्या त्या काळातील हवामान, शेती, प्राणी या गोष्टींशी संबंधित असतात. निसर्ग आणि मानव मूलतः एकमेकाशी जोडलेले असतात.भौतिक प्रगती च्या नादात माणूस आपले मातीशी असलेले नाते विसरत चालला आहे. आप,तेज,माती, हवा आणि अग्नी या पंचमहाभूतांचे स्मरण आपण ठेवले पाहिजे.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राचा उत्सव सुरू होतो. आदिशक्तीची श्री महालक्ष्मी , श्री महासरस्वती आणि श्री महांकाली ही देवीची तीन रूपे आहेत. श्री महालक्ष्मी ही संपन्नतेची देवता आहे, तर श्री महासरस्वती ही माणसाला ज्ञान देणारी आहे. महांकाली रूपात देवी अन्यायाला वाचा फोडणे आणि गुंड प्रवृत्तीचा नाश करणे यासाठी महत्त्वाची आहे.

पारंपारिक पद्धतीनुसार पाहिले तर सृजनाची निर्मिती करणाऱ्या मातीची व धान्याची पूजा नवरात्र प्रारंभी सुरू होते. एका घटात माती घालून त्यावर कलश ठेवला जातो.त्यांवर आंब्याची पाने घालून कलशावर नारळ ठेवला जातो. घटाच्या बाजूने घातलेल्या मातीत सप्त धान्याचे बी टाकले जाते. रोज नऊ दिवस पाण्याचे सिंचन होऊन तेथील बी रुजून रोपे तयार होतात यालाच आपण घट बसवणे असे म्हणतो मातीच्या घटातून येणारी ही छोटी रूपे माणसाला सृजनाची ताकद दाखवतात! ही आदीशक्ती असते.

याचकाळात सरस्वतीची पूजा केली जाते. लहान मुलांच्या अभ्यासाचा श्री गणेशा पाटी पूजनाने केला जातो. सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिचे पूजन करणे हा संस्कार लहान मुलांना दिला जातो. तिची पूजा म्हणजे आपल्या बुद्धीचे तेज वाढवण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. तू शक्ती दे.. तू बुद्धि दे…असे म्हणून सरस्वती पूजन होते.

तिसरे रूप म्हणजे महांकाली! अन्यायाचे पारिपत्य करण्यासाठी देवीने घेतलेले हे दुर्गा रूप! यात देवी सिंहावर बसून, हातात आयुधे घेऊन आक्रमक स्वरूपात येते! आत्ताच्या काळात अन्यायी वृत्तीला प्रतिकार करण्यासाठी स्त्रीने सबल होणे गरजेचे आहे. त्यासाठी ही महाकाली ची पूजा आहे..

या सर्व देवी रुपांना नमन करण्याचा काळ म्हणजे नवरात्र! या नवरात्राला शारदीय नवरात्र हे सांस्कृतिक नाव  साहित्य उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. लेखक, कवी यांच्याकडून जे लिहिले जाते, तीही एक सृजन शक्तीच आहे. तिचा आदर करणे, वंदन करणे यासाठी शारदीय नवरात्रात साहित्यिकांकडून, संस्थांकडून वेगवेगळे उपक्रम जाहीर होतात. चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकायची संधी या नऊ दिवसात मिळते. नवीन विचारांची मनात पेरणी होऊन नवीन लिखाणाला स्फूर्ती देणारा हा काळ! त्यामुळे आपल्याला बुद्धिवैभव देणाऱ्या सरस्वतीचे पूजन या काळातच होते. ज्याप्रमाणे पावसाची नक्षत्रे सृजनाची निर्मिती करतात, स्त्रीमध्ये बालकाची गर्भातील वाढ नऊ महिने, नऊ दिवस असते, तो हा नऊ अंक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आदिशक्तीच्या कृपेमुळेच ही नवनिर्मिती होते. भारतात विविध प्रांतात नवरात्र पूजा वेगवेगळ्या नावांनी केली जाते. जसे गुजरातेत देवीसमोर गरबा खेळला जातो, बंगालमध्ये काली माता उत्सव होतो, उत्तर भारतात दुर्गापूजन होते, तर महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे तसेच इतरही सर्व ठिकाणी महालक्ष्मी पूजन होते.

सांस्कृतिक, पारंपारिक आणि ऋतुमानानुसार देवीचा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो. आपल्या माता, भगिनी आणि कन्या या देवी स्वरूप मानून त्यांचा आदर करावा ही शिकवण या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना मिळावी हीच या शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी मी देवीची प्रार्थना करते!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हदगा भोंडला ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ विविधा ☆  ? हदगा भोंडला ? ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

गेल्या सोमवारी दि. २७ सप्टेंबर रोजी हस्त नक्षत्र सुरू झाले आहे.  मुलींचा भोंडला या नक्षत्रात साजरा केला जातो. काही ठिकाणी हदगा, हादगा , भुलाबाई या नावाने मुली खेळ खेळतात. गाणी म्हणतात ,फेर धरतात.हे हस्त नक्षत्र पावसाच्या नऊ नक्षत्रामध्ये सर्वात महत्त्वाचे नक्षत्र आहे. हस्त नक्षत्र लागण्याच्या वेळी महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे कोकणात म्हणजे समुद्र किनारी, सह्याद्रीच्या पायथ्याशी पाऊस पडून गेलेला असतो. नारळी पौर्णिमेनंतर पूर्वा, उत्तरा नक्षत्रात ढग सह्याद्री ओलांडून घाटावर येतात.नंतर महाराष्ट्र पठारावर पाऊस पडतो. हल्ली जागतिक हवामान बदलामुळे या सर्व ऋतुमानावर नक्कीच बदल झाला आहे.पण अलिकडील काही वर्षे सोडली तर असेच पर्जन्यमान महाराष्ट्रात असायचे.

आपल्याकडे गोकुळाष्टमीनंतर रब्बी हंगाम सुरू होतो. रब्बीच्या (ज्वारी,बाजरी )पेरण्या झाल्या की साधारण महिन्यात हस्त नक्षत्र लागते. पूर्वा उत्तरा चा पाऊस भाताला योग्य मानला जातो तसा हस्ताचा पाऊस रब्बी च्या पिकांना योग्य असतो. भरपूर पाणी हस्त देतो. मुसळधार, हत्तीच्या सोंडेतून   पडावे तशा वरून धारा कोसळतात. पिके छान उगवतात नंतर स्वातीच्या नक्षत्रात त्यात दाणे भरतात. म्हणून “पडेल हस्त तर पिकेल मस्त” आणि “पडतील स्वाती तर पिकतील माणिकमोती ” अशा म्हणी खेडेगावात रूढ आहेत.

हस्तातले पहिले चार दिवसांत पाऊस पडला तर त्याला सुवर्ण चरण म्हणतात नंतरचे चार दिवस रजतचरण, नंतरचे चार दिवस ताम्रचरण, तर शेवटचे चार दिवस हे लोहचरण मानले जाते.असे हे १६ दिवसांचे हस्त नक्षत्र असते. सुवर्ण चरण कोसळले तर ते पिकांना अति उपयुक्त ठरते. नुसतेच लोहचरण पडले तर जमिनी घट्ट होतात. म्हणून हस्ताची पहिली दोन चरणे पिकांसाठी फार महत्त्वाची मानली गेली आहेत.

हस्त लागला की मला तरी लहानपणच्या हादग्याची आठवण येते.

ऐलमा पैलमा गणेशदेवा

अक्कणमाती चिक्कणमाती जातं ते रोवावं

हस्त हा दुनियेचा राजा

अशी अनेक गाणी म्हणत पाटावर रांगोळीने रेखलेल्या हत्तीची पूजा करायची. सर्व मुली  भोवती गोल फेर धरून हादग्याची, भुलाबाई ची गाणी म्हणत असू. संध्याकाळी शाळेतून आलं की लगेचच प्रत्येकीच्या घरी जाऊन आम्ही हादगा खेळायचो. खूप मजा असायची. ही मजा आपल्या ग्रूपमधील खूप जणींनी अनुभवली असेल.

मग दिवसानुसार चढत्या क्रमाने हादग्याची गाणी वाढवत न्यायची. तशाच खिरापतींची संख्याही वाढवायची. त्या खिरापती ओळखायच्या. त्यातही एक कला होती. पूर्वीच्या काळी मुलींना एकत्र यायला, जमायला, खेळायला हादगा हे चांगले निमित्त होते. एकत्र येण्यासाठीच  आपल्या संस्कृतीत असे सण , समारंभ निर्माण झाले असावेत. त्यानिमित्ताने मुली घराबाहेर पडत.

आपल्या संस्कृतीत गाय, बैल, नाग ,एवढेच काय पण देवीचे वाहन म्हणून सिंह, वाघ, मोर इ. प्राणी, पक्षी पूजिले जातात. मग आपल्याला जीवन देणाऱ्या हत्तीला आपण कसे विसरू? म्हणून हस्त नक्षत्रात आपण हत्तीची पूजा करतो.

महाभारतातील एक कथा सांगितली जाते ती म्हणजे गांधारी ने सर्व सुवासिनींना सौभाग्यवायन दिले .ते हत्तीवरून मिरवणूक काढून थाटात दिले. कुंतीला ही तसेच वायन द्यावे असे वाटले. पण तिला हत्ती मिळाला नाही. मग तिने ही गोष्ट पुत्र भीमाला सांगितली. तर भीमाने स्वर्गातून इंद्राचा ऐरावत हत्ती आईला आणून दिला. आणि आईची इच्छा पूर्ण केली.

हादग्याची भरपूर गाणी मला तोंडपाठ आहेत. आपल्या पैकी बहुतेकींना ती येत असतीलच. अजूनही खूप ठिकाणी महिला, मुली हौसेने हादगा एक दिवस का होईना खेळतात. हादग्याची गाणी म्हणतात. एकत्र येतात. त्यातूनच आपल्या या छान परंपरांचे जतन आणि संवर्धन होते.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 4 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

 

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 4 ☆ 

(©️doctor for beggars )

( मी काय बोलणार यावर—-) इथून पुढे 

मी स्तब्ध झालो…!

स्वतःच्या जगण्याची भ्रांत असतांना, कटु अनुभव गाठीशी असतांना, पुन्हा ती कुणाचीतरी आई होण्याचा प्रयत्न करते…! 

हे वेडेपण आहे कि आई व्हायला आसुसलेल्या मातेची गाथा… ?

‘चला निघु मी डाॕक्टर ? 

केळी घ्यायचीत मला…’ आजीच्या वाक्यानं मी भानावर आलो.’आता केळी कशाला…? नाही म्हणजे कुणाला… ?’ ——मी अजुनही धक्क्यांतुन सावरलो नव्हतो.  

‘अहो, तो काल मला म्हणाला, केळ्याचं शिकरण खाऊशी वाटतंय. मग मी सकाळी पैसे घेवुन निघाले केळी आणायला… पण लाॕकडाउन मुळे सगळंच बंद, केळी कुठंच मिळेनात. आता घरी जावुन त्याला कुठल्या तोंडानं सांगु, केळी मिळाली नाहीत म्हणुन…! 

मग आठवलं… मंदिरात येतांना लोकं केळी सफरचंद वैगेरे फळं घेवुन येतात देवाला वाहण्यासाठी… जातांना यातलंच एखादं फळ भिका-यांना देवुन जातात… ! 

म्हटलं बघू, पैशानं नाही तर भीक मागुन तरी मिळेल एखादं केळ…! शिकरण करुन देईन हो, पोराचं मन तरी मोडणार नाही…!’ 

भरलेल्या डोळ्यांनी मला आता मंदिर दिसेना, देव दिसेना… दिसत होती फक्त एक आई… ! 

रस्त्यावरल्या अपंग पोरामध्ये आपलं पोर पाहणारी ही बाई…!

निराधाराला पदराखाली घेणारी ही बाई…!

हातात पैसे असुनही कुणाच्यातरी आनंदासाठी भीक मागायलाही तयार झालेली ही बाई…!

याच बाईत मला दिसली आई !!!

भरल्या डोळ्यांनी मी तीचे पाय धरायला वाकलो, तीने पाया पडु दिलं नाही… ! 

‘आज्जी, मी तुमची एखाद्या वृद्धाश्रमात सोय करु…? दाटल्या गळ्यानं मी विचारलं. 

यावर डोळे बारीक करत तीनं विचारलं होतं,’पण वृद्धाश्रमात दोघांची एकत्र सोय होईल आमची… ?’ 

‘नाही आज्जी, वृद्धाश्रमात तुमची सोय होईल, मुलाचं मग बघु काहीतरी… !’ 

माझं बोलणं उडवुन लावत, माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाली… ,’काय डाॕक्टर, मग काय फायदा…? माझ्यावाचुन तो कसा राहील ? बरं निघते मी… अजुन केळ्याची सोय करायचीय मला…’ 

असं म्हणत, ती निघाली केळी शोधायला…! —–

मी इकडं तिकडं आसपास पाहिलं… सर्व बंद. 

आज कुणाच्या हातात मला केळी दिसली असती तर मीच जावुन मागुन आणली असती…

मला दोघांचं भविष्य दिसत होतं… आजी कुठवर त्या मुलाचं करेल किंवा तो अपंग मुलगा तरी आजीला किती आणि कशी साथ देणार…या विचारानं आज्जीला शेवटचं विचारलं, ‘आज्जी वृद्धाश्रमाचं काय करु…?’

यावर ती हसत म्हणाली होती, ‘अहो या वयात मोठ्या मुश्किलीने पुन्हा आई झाल्येय मी … आता कशाला मायलेकरांची ताटातुट करता… ? 

या आधी दोन ल्येकरं गमावलीत मी…. आता तिसऱ्याला तरी माझ्याबरोबर राहू  दे…त्याच्या अंतापर्यंत किंवा माझ्या अंतापर्यंत …!

ती झराझरा चालत माझ्यासमोरुन निघुन गेली…!

नव्यानंच पुन्हा आई झालेल्या, म्हातारपणानं वाकलेल्या त्या माऊलीच्या पायात इतकं बळ आलं कुठुन … ? 

आईला वय कुठं असतं…?

ती कधीच म्हातारी होत नाही, हेच  खरं ! 

गरीब असण्याचा श्रीमंत असण्याचा, तरुण असण्याचा, वृद्ध असण्याचा, पैसे असण्याचा, पैसे नसण्याचा कशाचाही संबंध नसतो आई होण्याशी… ! 

ती फक्त आई असते !

पोराची एक इच्छा भागवण्यासाठी ती भीकही मागू  शकते… ! 

पोरासाठी मागितलेली एक भीक एका पारड्यात आणि सढळ हातानं केलेली हजारो दानं दुस-या पारड्यात ! 

दोन्हीचं वजन सारखंच…!!! 

यानंतर मी त्या जागेवर, केळी घेऊन ब-याचदा गेलो… पण ती दिसत नाही !

हातात केळी घेऊन माझी नजर तिला शोधत असते…

का कोण जाणे…तिला शोधतांना मंदिराचा कळस झुकलाय असा मला भास होतो…! 

का कोण जाणे…तिला शोधतांना दारातली ती तुळस मोहरली आहे असा मला भास होतो…!

का कोण जाणे…तिला शोधतांना तिने उच्चारलेला शब्द न् शब्द आज अभंग झाला आहे असा मला भास होतो…!

का कोण जाणे…तिला शोधतांना मी पुन्हा बाळ झालो आहे असा मला भास होतो…!

का कोण जाणे…!!!

समाप्त 

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मा. द. मा. मिरासदार यांस… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ मा. द. मा. मिरासदार यांस… ☆ सौ राधिका भांडारकर  

माननीय प्रिय द.मा.मिरासदार यांस,

स.न.वि.वि…

आदरणीय लेखकमहाशय,या क्षणी तुम्हाला संबोधताना,कै. द.मा. मिरासदार असे लिहीताना हात थरथरला म्हणून कै.  हे संबोधनात्मक अक्षर मी टाळले.

कालच तुमच्या निधनाची बातमी ऐकली आणि एक दु:खाची लहर सळसळून गेली.मृत्यु अटळ.मृत्यु सत्य.

तुम्ही चौर्‍याण्णव वर्षाचं परिपूर्ण आयुष्य जगून, लोकांना हसवत, हसत जगाचा निरोप घेतलात. मात्र आमच्यासाठी ,प्रचंड हास्य तुमच्या लेखन प्रपंचातून  ठेवून गेलात….. तुमच्या निखळ हास्यकथा वाचतच खरं म्हणजे आम्ही वाढलो. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. तुम्ही १९६२ सालापासून, महाराष्ट्रात आणि परदेशातही ठिकठिकाणी, कथाकथनाचे कार्यक्रम केलेत आणि आम्हा श्रोत्यांची अपार करमणूक केलीत. ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून, हातवारे करुन तुम्ही बोलू लागलात की एक अद्भुत नाट्यच अनुभवायला मिळायचे.

मराठीतील, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं वि जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांची विनोदी लेखन परंपरा आपण चालू ठेवलीत. व्यंकुची शिकवणी,  माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, माझी पहिली चोरी,भूताचा जन्म अशा अनेक हास्यकथांचे उत्कृष्ट लेखन आणि तितकंच प्रभावी सादरीकरण हे श्रोत्यांना ,चिंता समस्यांपासून दूर नेउन मनमोकळं हंसणं

देत…या सर्वच कथा मनावर कोरलेल्या आहेत.

विसंगतीतून निर्माण होणारा विनोद नेहमीच ऐकणार्‍याला ,जीवनाचा एक सकारात्मक दृष्टीकोन देतो.

एखाद्या घटनेकडे कधी तटस्थपणे,कधी हसत खेळत. विनोदी अंगाने बघायला शिकवतो.यश ,अपयश पचवायची ताकद देतो. द.मा.,तुमच्या लेखनाने हे केले.

आम्हाला समृद्ध केलंत तुम्ही…खूप ऋणी आहोत आम्ही तुमचे…

गप्पागोष्टी, मिरासदारी,गुदगुल्या ,गप्पांगण ,ताजवा असे २४कथासंग्रह तुम्ही आम्हाला दिलेत.एक डाव भूताचा

ह्या  गाजलेल्या चित्रपटाची कथा तुमचीच.त्यातली तुमची हेडमास्तरांची भूमिकाही मनावर ठसली.

तुमच्या बहुतेक कथा ,ग्रामीण जीवनावरच बेतलेल्या आहेत.गणा मास्तर,नाना चेंगट,राम खरात,बाबु पेहलवान,

चहाटळ अनशी,ज्ञानु वाघमोडे अशा एकाहून एक ,गावरान,इब्लीस,बेरकी,वाह्यात ,टारगट क्वचित भोळसटही  पात्रांनी आम्हाला पोट धरुन हसायला लावले आहे.या सर्व पात्रांना आमच्यासाठी एक निश्चित चेहरा दिला.हे सारे चेहरे आमच्या आयुष्याच्या वाटचालीत

हसत हसत सामील झाले.आमचे सोबती बनले.मनुष्य स्वभावाचे,इच्छा आकांक्षाचे, छोट्या छोट्या स्वप्नांचे ,

मनोर्‍यांचे, इमल्यांचे आरसे बनले.भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे ,कावेबाजपणाचे, लबाडीचे

धूर्त राजकारणाचे ,धडे दिले.सर्वार्थाने अचंबीत झालेल्या सर्वसाधारण सामान्य माणसाकडे पहायलाही शिकवलं.

काही गंभीर कथाही तुम्ही लिहील्यात.जसं की ,विरंगुळा

कोणे एके काळी , स्पर्श वगैरे.त्यांतून जीवनातले कारुण्यही तुम्ही  अचूक टिपलेत.पण तरीही तुमचा स्वाभाविक कल हा मिस्कील ,विनोदी लेखनाकडेच राहिला.तिथेच बहरला.

पुण्याच्या साहित्य संमेलनात तुम्ही तुमची ‘भुताची गोष्ट’

ऐकवली होती.सतत दीड तास श्रोतृवर्ग हास्यकल्लोळात डुबला होता.एकेक पात्र रंगतदारपणे डोळ्यासमोर ऊभे केले.तुमच्या आवाजातले चढउतार,कथा फुलवण्याची जबरदस्त क्षमता,नाट्यमयता, अभिनय सारेच सर्वांग सुंदर होते..त्यावेळीही तुमचे वय ऐंशी अधिकच होते…

सलाम तुमच्या कलेला. सलाम तुमच्या लेखनाला…

वि. रा. भाटकर हे विनोदी गद्यप्रकार लिहीणारे… तुमचेच टोपण नाव  होते.

द.मा. भरभरुन दिलंत तुम्ही आम्हा साहित्यप्रेमींना…

खूप  हसवलंत. बोधप्रद करमणुक केलीत .ज्ञानातून मनोरंजन केले.एक मोठ्ठा साहित्य ऐवज आमच्यासाठी ठेवून गेलात….आम्ही खूप कृतज्ञ आहोत!!खूप ऋणात आहोत.

आज तुमच्या अचेतन देहावर भावपूर्ण श्रद्धांजलीचे फुल वाहते!!!

 

तुमची एक

लेखनवेडी,..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 3 ☆ 

(©️doctor for beggars )

(“म्हणजे तुम्ही त्याला माफ केलंत ! “ ) इथून पुढे —-

 “ माफ करणारी मी कोण ? कुणाचा तरी सांभाळ कर अशी माझ्यावर कुणीतरी जबाबदारी टाकली होती, आई म्हणुन मी ते कर्तव्य केलं… आता त्याने माझा सांभाळ करावा असा हट्ट मी का धरु ? मुलानं माझी परतफेड करावी असं वाटणं…तिथंच आईपण संपतं… ! “

“ हो ना पण, मुलाला त्याचं कर्तव्य कळू नये ? “ 

“ डाॕक्टर, रस्त्यांत खडे टोचतात म्हणुन रस्त्यांवर कुणी गालिचा अंथरत नाही, आपण आपल्या पायात चप्पल घालावी– त्याला त्याचं कर्तव्य कळेल न कळेल… आपण कशाला कुणाला शिकवायला जायचं ? आपलं  काम करत रहायचं, फळाची अपेक्षा न धरता… !” 

गीतेच्या ग्रंथाला हातही न लावता, गीतेतला एक अध्याय मला आज्जीकडुन समजला होता. 

“ चला डाॕक्टर, निघते मी… माझं पोरगं घरी एकटंच असेल… मला जायला हवं आता…! “ 

“ क्काय…??? “  मी जवळपास किंचाळलो असेन… कारण या वाक्यावर ती दचकली होती. 

“ अहो आज्जी, आत्ताच तर म्हणालात ना… एक मूल लहानपणीच  वारलं– बहिणीचा सांभाळलेला मुलगा सोडून गेला… आता हे काय… ? ”

ती मंद हसली. म्हणाली, “ सांगेन पुन्हा कधी भेट झाली तर… आधी मला केळी घ्यायला पाहिजेत कुठुनतरी…” 

“ नाही आज्जी, आत्ताच सांगा… प्लीज… माझ्या मनातनं हे जाणार नाही… “ 

ती शांतपणे म्हणाली,  “ अहो डाॕक्टर, कोरोनाच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते, तेव्हा ठरवलं होतं, चाचणी पाॕझिटीव्ह असेल तर उत्तमच.  नाहीतर येतांना सरळ एखाद्या गाडीखाली झोकुन द्यायचं. “  

“ मग…? “  आवंढा गिळत मी म्हटलं. 

“ मग काय ? जगायचं कसं आणि मरायचं कुठं हा विचार करत पडले असतांना माझं लक्ष शेजारच्या खाटेवर गेलं…साधारण चाळीशीचा एक मुलगा त्या खाटेवर होता—- कमरेखाली अधु ! 

मी त्याच्याकडे पाहिलं… !  डोळे मिचकावत मला म्हणाला… ” काय होनार नाय मावशी तुला, काळजी करु नको… अगं आजुन लय आयुष्यं हाय तुला..!” 

“ हा कोण कुठला ? स्वतःच्या जगण्याची खात्री नाही आणि मला जगण्याचं बळ देतो… ? 

मावशी म्हणतो… ?—- हा निराधार अपंग… रस्त्यांवर राहतो… माझ्यासारखाच तपासणीसाठी आणलेला…!— मरण्याचे विचार घेवुन वावरत असतांना वाटलं… आज माझं मूल जिवंत असतं तर याच्याच एव्हढं नक्की असतं.– ज्या काळात तो गेला… त्याचकाळात त्याच्याऐवजी समजा मीच गेले असते तर त्याचीही अवस्था आज अशीच अपंग आणि निराधार झाली असती… तो ही आज रस्त्यावरच असता…!–डाॕक्टर , त्या अपंग मुलात, मला माझं मुल दिसलं. आमच्या दोघांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यावर मी त्याला माझ्याकडे घेवुन आले—त्या दिवशी मी परत आई झाले हो… मरायचं म्हणुन ठरवुन गेलेली मी… येताना आई होवुन, लेकरु घेवुन आले. “ 

—मला काय बोलावं सुचेना. डोळ्यांतुन माझ्या झरझर पाणी वाहु लागलं. 

“ आज्जी, आधीच तुमची कमाई काही नाही, पेन्शन पुरत नाही… त्यात अजून एका व्यक्तीला घेवुन आलात सांभाळायला…?”   मी आश्चर्याने विचारलं. 

“ डाॕक्टर, आईला आपलं मुल सांभाळायला पैसे लागत नाहीत. आईला व्यवहार कधीच कळत नाही… !  शिवाय पैसा जगायला लागतो…जगवायला नाही…! “ 

“ म्हणजे … ? “  मी आ वासून विचारलं. 

“ म्हणजे, जो स्वतःचा विचार करत  स्वतःपुरता जगतो त्याला पैसे लागतात… पण आपण जेव्हा “स्व” सोडुन दुस-याला जगवायचा विचार करायला लागतो… त्यावेळी त्या दोघांची काळजी कुणी तिसराच करत असतो…आपण फक्त त्या तिस-यावर विश्वास ठेवायचा ! “

मी हे तत्वज्ञान ऐकत मूकपणे उभा होतो. 

“ मोठी झालेली मुलं, आपल्या आईला त्यांच्या घरात  राहण्याचं भाडं मागतीलही कदाचित् … पण नऊ महिने गर्भाशयात राहण्याचं भाडं आईनं कधी मागितल्याचं माहित आहे का ?–आईला व्यवहार कधीच कळत नाही डाॕक्टर  ! “

मी शहारलो हे ऐकून… ! 

‘आज्जी, आधीचे दोन वाईट अनुभव बघता, हा पण गेला सोडुन तर ? पुढं तुमचं काय ?’ मी चाचरत बोललो. 

‘डाॕक्टर, हा सोडुन गेला तरी, तो माझं आईपण घेवुन जावु शकणार नाही ना ?

एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देतो… त्यावेळी नुसतं बाळच जन्माला आलेलं नसतं… एक आई पण जन्म घेते त्याचवेळी… !

दोन जीव जन्मतात त्यावेळी… एक मुल आणि एक आई ! 

जन्माला आलेल्या त्या बाळाने आईला, आईपण हे त्याच्या जन्मावेळीच बहाल केलेलं असतं… हे लाभलेलं आईपण कोण कसं काढुन घेईल ?

मी काय बोलणार यावर—–

क्रमशः —-

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक गूढ निरोप. . . भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ एक गूढ निरोप. . . भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆

पूर्वसूत्र- “या वर्षी तरी दिवाळी पाडव्याची आपली नामसाधना आपल्याच वास्तूत व्हावी असं आपलं मला वाटतं. त्यानंतरच्या दिवाळीपासून जावई म्हणालेत तसं करू.” त्यांनी आजोबांना सुचवलं. ते विचारात पडले. त्यांना काय बोलावं ते सुचेचना.

“पण थोडक्यासाठी त्यांना दुखावले असं नको व्हायला. ठरलंय तसंच होऊदे” ते म्हणाले. आजी हिरमुसल्या.

“ठरलंय तसं करू पण नाईलाज झाला तरच. मी बोलेन जावयांशी.समजावेन त्यांना. सांगून बघू तरी काय म्हणतात ते.” आजी म्हणाल्या.

जे जे होईल ते ते पहावे असा विचार करून आजोबा नाईलाजाने गप्प बसले.)

जावई आढ्यतेखोर नव्हतेच.त्यामुळे त्यांनी आजींच्या विनंतीला मान दिला. मग पूर्वीप्रमाणे त्या वर्षीही  सर्वजण दिवाळीसाठी सोलापूरच्या बंगल्यातच एकत्र आले. दिवाळीच्या फराळाचे सर्व जिन्नस सुनेच्या मदतीने पुढाकार घेऊन आजीनीच बनवले होते. त्यांनी मुलं, सुना, मुलगी, जावई, नातवंडं सर्वांसाठी आपले आशीर्वाद म्हणून त्यांच्या त्यांच्या आवडीच्या भेटवस्तूही आवर्जून खरेदी केलेल्या होत्या. या वर्षीच्या दिवाळीची रंगत काही औरच होती. पाडव्याच्या आदल्या रात्री स्थानिक साधकांना नामसाधनेसाठी आमंत्रित केलेले होते. रात्री उशीरपर्यंत नामसाधना, मग अल्पोपहार, भक्तिगीतांचा कार्यक्रम,असा भरगच्च कार्यक्रम होऊन त्या आनंदसोहळ्याची सांगता झाली. त्या रात्री आजी- आजोबांनी  अतिशय प्रसन्नचित्ताने अंथरुणाला पाठ टेकली. रात्री झोपायला खूप उशीर होऊनसुद्धा ठरल्याप्रमाणे पहाटे चार वाजता रोजच्यासारखी दोघांनाही जाग आली.

रोज असे पहाटे उठून मुख-संमार्जन करून दोघेही गुरुदेवांसमोर निरांजन लावून त्यांना मनोभावे नमस्कार करून नामसाधनेला बसत.नेमक्या ठराविक वेळी अंत:प्रेरणेनेच आजोबा प्रसन्नचित्ताने नेमातून बाहेर येत. मग उठून फुलांची परडी आणि दुधाचे पातेले घेऊन बागेत जात. दूधवाला येईपर्यंत त्यांची फुलांची परडी बागेतल्या फुलांनी अर्धी भरलेली असे. तो येताच पातेल्यात दूध घेऊन ते खिडकीत ठेवीत. बाकी फुले काढून आत येईपर्यंत दूध गॅसवर चढवून आजीनी चहाची तयारी सुरू केलेली असे. हा त्यांचा गेल्या कित्येक वर्षांचा न चुकणारा दिनक्रम. आजही असेच झाले. नेहमीप्रमाणे फुले काढत असताना दूधवाला येताच आजोबांनी दूध घेऊन पातेले खिडकीत ठेवले.फुले काढून झाल्यावर ते आत आले तरीही आजी अजून साधनेतच. खिडकीत दुधाचे पातेले तसेच होते. आजी नामसाधनेत तल्लीन. त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून आजोबांनी खिडकीतले

पातेले हळूच घेऊन ते आत नेऊन गॅसवर चढवले. चहाची सगळी तयारी करून ठेवली. आणि देवघराच्या दाराशी येऊन त्यांनी हलक्या आवाजात आजीना हाक मारली. प्रतिसाद आला नाही तसे पुढे होऊन त्यांनी आजींच्या खांद्यावर हलक्या हाताने थोपटले तशी त्या स्पर्शाने आजींची मान कांहीशी कलली. आजोबांना वेगळीच शंका आली. क्षणार्धात ती खरीही ठरली. नामसाधनेतल्या तल्लीनावस्थेतच आजी  परतत्त्वात  विलीन झाल्या होत्या!

दुसऱ्या दिवशीच्या पेपरमधे आजी गेल्याची बातमी वाचून मला धक्काच बसला. पण त्यांच्या या अलौकिक जिवा-शिवा च्या भेटीचा वृत्तान्त मी कुंटे आजोबांच्या सांत्वनासाठी गेलो तेव्हा मला समजला. सांगताना आजोबा स्थिरचित्तच होते.

“मृत्यूसुद्धा कृपावंत ठरला तिच्यासाठी.” ते म्हणाले होते.

“आला तेही तिला कणभरही वेदना न देता. नामस्मरणात दंग असताना मोठ्या सन्मानपूर्वक पालखीतून मिरवत न्यावं तसं घेऊन गेला तिला. माझ्यासकट सगळ्या सग्यासोयऱ्यांना या उत्सवासाठी जणू काही तिने आवर्जून बोलावून घेतले होते. स्वतःसह सगळीच छान आनंदात असताना अशी अलगद निघून गेली….!! “

आजोबा म्हणाले होते. त्यांच्या आवाजात थरथर जाणवत होती.पण चेहऱ्यावर मात्र त्यांच्या आनंदाश्रूनी ओलावलेल्या नजरेतून अलगद विलसलेलं अस्फुटसं स्मित..!

ऐकतानासुध्दा अंगावर शहारा आला होता माझ्या..!

कांही कांहीं अनुभव अविस्मरणीय असतात ते असे.

खूप विचार करुनही या अशा प्रस्थानाचं गूढ मला आज तागायत उलगडलेलं नाहीय. कुणालाही निरोप न देता न् कुणाचाही निरोप न घेता आलेला असा कृतार्थ मृत्यू विरळाच.त्या अर्थाने कुंटे आजी भाग्यवान हेही खरेच.पण तरीही एक निरुत्तर प्रश्न आजही माझ्या मनात डोकावून जातोच.’ठरल्याप्रमाणे दिवाळीला लेक जावयाकडे जाण्याचा बेत बदलायची व सर्वांना दिवाळीला इकडेच बोलावून घेण्याची आजीना झालेली प्रेरणा ही एक निव्वळ योगायोग की त्यांना आधीच लागलेली स्वतःच्या प्रस्थानाची चाहूल?

या प्रश्नाचं उत्तरही आजींसोबतच निघून गेलंय.म्हणूनच तो प्रश्न माझ्यासाठी तरी आजींच्या मृत्यू सारखाच एक गूढ बनून राहिलेला आहे..!

समाप्त 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 2 ☆ 

(©️doctor for beggars )

(नीट सांगाल, तर मी नक्की काहीतरी मदत करेन…! ”) इथून पुढे —

हो- ना करता, कळलं ते असं—-

—-ही आजी आपल्या यजमानांसह रहात होती. यजमान नोकरीला…ही गृहिणी ! 

मूलबाळ होत नव्हतं— खुप वर्षांनंतर तिच्या वयाच्या चाळिसाव्या वर्षी मूल झालं…! 

या वयात झालेल्या मुलाला जन्मजात व्यंग होतं… कमरेखाली त्या बाळाला संवेदनाच नव्हत्या… हा धक्का तिनं पचवला. 

पुढे कळलं बाळाच्या हृदयाला छिद्र आहे… तो ही धक्का तिने पचवला… आणखी काही काळानं कळलं… मूल मतिमंद आहे… ! 

——-आता मात्र ती ढासळली !

गाडी कशीबशी सुरु होती. पुढे हार्ट अॕटेकने यजमान गेले… एक मोठा आधार गेला. 

मतिमंद मुलाचं करता करता दिवस सरत होते, पेन्शन पुरत नव्हती. मुलाचं दुःखं पहावत नव्हतं… तरीही मनोभावे त्याचं सर्व ती करत होती. …अशातच अचानक मुलगाही गेला तिला सोडून …!

—सगळीकडेच अंधार… ! ती एकटी …!—

आजीची बहीण टी बी ने आजारी होती, तिच्या शेवटच्या काळात ती आजीला म्हणाली…

” बिनबापाचं माझं पोरगं पदरात घे… मी जास्त दिवस राहणार नाही…”—–

तो शब्दही खरा झाला. बहीण गेली…बाप नसलेल्या तिच्या एकुलत्या एक मुलाची जबाबदारी आता आजीने घेतली त्यावेळी… ! 

बहीण गेल्याचं दुःखं होतंच… पण तिच्या मुलाच्या रुपानं पुन्हा आजीला मातृत्व मिळालं… 

बहिणीमाघारी तिनं त्या मुलाचं सर्व काही केलं. त्याच्या शिक्षणासाठी दागदागिने मोडले, राहतं घर विकलं, स्वतः भाड्याच्या घरात राहून मुलाला बाहेरगावी होस्टेलला ठेवलं. त्या वयातही चार घरची कामं करुन मुलाचं संपूर्ण शिक्षण  पूर्ण केलं. 

शिक्षण झाल्यावर मुलानं परस्पर तिकडेच नोकरी पाहिली, घरोबाही केला. तो हिच्याकडे परत आलाच नाही. म्हणायचा, ‘ तू  काय खरी आई आहेस का माझी… ? ‘

आजीनं इतके मृत्यु पाहिले होते, इतकं दुःखं पचवलं होतं… या सा-या धक्क्यांतुनही ती सावरली … 

पण या वाक्याचा आघात सहन झाला नाही—-” तू  काय खरी आई आहेस का माझी… ?”

“ मी खरी आई नव्हते तर कोण होते रे बाळा तुझी ? “—-ती प्रश्न विचारायची… पण उत्तर द्यायला कुणीच नसायचं…!

आई होण्याचं भाग्य दोन्ही वेळा लाभलंच नाही… !

दिवस सरत होते, मृत्यु नेत नव्हता आणि आयुष्यं जगु देत नव्हतं… ! बहिणीच्या मुलाला स्वतःचाच समजून, त्याच्यासाठी होतं नव्हतं ते सर्व आजीनं घालवलं होतं… नंतर मुलानं नातं नाकारलं—– 

आजी आता राहते कुठल्याशा चाळीतल्या एका खोलीत—-

पंधरा दिवसांपुर्वी हिला खोकतांना चाळीत कुणीतरी पाहिलं, यंत्रणेला कळवलं… सरकारी कर्मचाऱ्यांनी आजीला दवाखान्यात नेलं, कोरोनाची तपासणी केली, दोन दिवस दवाखान्यात ठेवलं… हिला घरी सोडलं… !

हिला खूप आशा होती– आपल्याला कोरोनाचा आजार व्हावा, त्यातच आपला अंत व्हावा… पण इथंही निराशाच पदरी आली… टेस्ट निगेटिव्ह ! —हिला घरी सोडलं… ! 

जगण्याने छळलं होतं… !!! 

ती परत चाळीत आली होती… ! 

“ आजी, वाईट वाटलं ऐकून…. “ पाणावलेल्या डोळ्यांनी मी तिला म्हणालो. 

“ वाईट काय वाटायचं डाॕक्टर ? भोग असतात, ते भोगावेच लागतात.”

“ पण तुम्ही सांभाळलेल्या मुलानं योग्य नाही केलं हे…”

“ असू  द्या हो, आपण आपलं कर्तव्य करायचं… गीतेत सांगितलं आहे… मोह नको… कर्म करत रहा… फळाची अपेक्षा नको…” 

“ म्हणजे तुम्ही त्याला माफ केलंत ! “ 

क्रमशः —-

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक गूढ निरोप. . . भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ एक गूढ निरोप. . . भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆

कांही कांही अनुभव अविस्मरणीय असतात.  कुंटे कुटुंबियांच्या बाबतीतला हा अनुभवही असाच. त आमच्या बँकेच्या सोलापूर (कॅंप) ब्रँचमधे मी मॅनेजर होतो त्यानिमित्ताने माझ्या संपर्कात आलेले कुंटे आजोबा. आमच्या बँकेचे ग्राहक.  एक हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्व.

मी नवीनच रुजू झालो होतो त्या ब्रॅंचला, त्यानंतरच्या पहिल्याच एक तारखेची गोष्ट.  नेहमीप्रमाणे पेन्शनर्सची खूप गर्दी.  केबिनमधून बाहेर लक्ष गेलं तेव्हा जाणवलं की त्या गर्दीत बसायला जागा नसल्यामुळे एक वृद्ध गृहस्थ माझ्या केबिनलगत अवघडून पाठमोरे उभे आहेत. मी शिपायाला सांगून त्यांना आत बोलावलं. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. ती खरं तर माझ्या दृष्टीने मीच करायला हवी होती अशी एक साधी गोष्ट होती. पण हीच माणूसकी मला पुढे अनेक पटीने बरंच कांही देऊन गेली. कारण त्यानंतर ते केबीनमधून बाहेर गेले ते माझ्याबद्दलचा एक सद् भाव मनात घेऊनच.  

कुंटे आजी-आजोबा, त्यांची दोन्ही मुलं-सुना, मुलगी-जावई सर्वचजण निंबाळ संप्रदायातले.  गुरुदेव रानडे यांचे उपासक.  त्यांनीच मला आवर्जून आग्रहाने एकदा निंबाळला नेले  होते.  कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडांचं अवडंबर नसलेलं, तिथलं वातावरण मला खूप भावलं होतं.  भक्तीमार्गाचे अनुसरण करून मानवजन्माचे सार्थक करण्याची शिकवण हे निंबाळ-संप्रदायाचे वैशिष्ट्य. त्यामुळे नित्यनेमाने नामसाधना हे कुंटे आजी-आजोबांचे अढळ श्रध्देने स्विकारलेले व्रतच होते. त्यांचे सोलापूर येथील कॉलेजमधे प्राध्यापक असणारे चिरंजीव    श्री. नरेंद्र कुंटे हे या संप्रदायातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते.  भक्तीमार्गावरील अनेक थोर विभूतींच्या ग्रंथरचनांचे विश्लेषण करणारे त्यांचे अतिशय सुबोध लेखन आणि त्यावरील त्यांची निरूपणं सर्वसामान्यांच्या अनेक शंकांचे निरसन करीत त्यांना मार्ग दाखवीत असत.  या कुंटे कुटुंबीयांबद्दल तिथे आलेल्या सर्वच उपासकांना वाटत असलेलं प्रेम आणि निष्ठा पाहून माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला होता.

कुंटे आजीही अतिशय शांत,हसतमुख,अगत्यशील. त्यांचा एक मुलगा (श्री. नरेंद्र कुंटे), सून, नातू सोलापूरला त्यांच्याचजवळ.  दुसऱ्या मुलाचं बि-हाड नोकरी निमित्ताने मुंबईला. मुलगी-जावई पुण्यात.

त्या घरची दिवाळी त्या सर्वांसाठीच एक हवाहवासा आनंदसोहळा असे. कारण  आजी-आजोबाची इच्छा म्हणून सर्व कुटुंबियांची दिवाळी दरवर्षी सोलापूरच्या बंगल्यातच उत्साहात साजरी व्हायची.  त्यामुळेच दिवाळी म्हणजे कुंटे कुटुंबियांसाठी एक सत्संग आणि आनंदोत्सवच असायचा. परगावचे मुलगा,सून लेक-जावई, नातवंडे सर्वचजण दिवाळीचे चार दिवस आवर्जून सोलापूरला येत.

एका दिवाळीला असेच सर्वजण जमलेले असताना जावई आग्रहाने म्हणाले, “आता यापुढे दरवर्षी दिवाळीला आपण आलटून पालटून प्रत्येकाच्या घरी एकत्र जमू या कां? त्याशिवाय आमच्या बि-हाडी सगळ्यांचं येणं कसं होणार?”

मुंबईच्या मुलासूनेनं ही कल्पना उचलून धरली. एरवीही त्यात नाकारण्यासारखं कांही नव्हतंच. आजोबांनी आजींकडे पाहिलं. आजीनी हसून संमतीदर्शक मान हलवली. मग सर्वानुमते पुढच्या वर्षाची दिवाळी लेकीच्या घरी पुण्यात करायची असं ठरलं.

पावसाळा संपत आला तशी आजींच्या मनात चलबिचल सुरू झाली.

“आपल्या नामसाधनेला पुढच्या वर्षी एकवीस वर्षं पूर्ण होतायत.  त्यानिमित्ताने आपण निंबाळला सत्संग आयोजित करणार आहोत.  त्यानंतर पुढे लगेचच दिवाळी येईल.  या वर्षी तरी दिवाळी पाडव्याची आपली नामसाधना आपल्याच वास्तूत व्हावी असं आपलं मला वाटतं.  मग त्यानंतरच्या दिवाळीपासून हवंतर जावई म्हणताहेत तसं करू. ” त्यांनी आजोबांना सुचवलं.

ते विचारात पडले. त्याना  काय बोलावं ते सुचेचना. “पण थोडक्यासाठी त्यांना दुखवल्यासारखं होईल. नकोच ते. ठरलंय तसं होऊ दे. “ते म्हणाले.

आजी हिरमुसल्या.

“ठरलंय तसं करु,पण नाईलाज झाला तरच. मी बोलेन जावयांशी.  समजावेन त्यांना.  सांगून बघू तरी काय म्हणतात ते” आजी म्हणाल्या. जे जे होईल ते ते पहावे असा विचार करुन आजोबा नाईलाजाने गप्प बसले.

क्रमशः —- 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 1 ☆ 

(©️doctor for beggars )

एप्रिल चा पहिला आठवडा ! 

रस्त्यांवर लाॕकडाउन मुळे भयाण शांतता. नाही म्हणायला पोलीस जागोजागी… ! 

मी भिक्षेक-यांचा डाॕक्टर … माझं काम रस्त्यावरच !

लाॕकडाउन च्या काळात ज्यांना घरं होती, मग भले ती झोपडपट्टीत का असेनात, त्यांना घरी रहायला बजावुन सांगितलं…!  ज्यांना घरं नाहीत अशांना काॕर्पोरेशनने निर्माण केलेल्या निवारा केंद्रात पाठवुन दिलं. आता माझ्या भिक्षेकरी वर्गापैकी रस्त्यांवर कुणी नव्हतं. तरीही चुकुन कुणी सापडतंय का हे बघत मी रस्त्यांवरुन फिरत होतो. 

फिरता फिरता एका मंदिरापाशी आलो. मंदिराबाहेर शुकशुकाट. मंदिराची दारं बंद… ना भिक्षेकरी… ना भक्त !

—मी तिथुन निघणार तेव्हढ्यात भिक्षेकरी बसतात त्या ठिकाणी एक आजी बसलेली मला दुरुन दिसली. ही माझ्या ओळखीची नव्हती. कपडे ब-यापैकी नीटनेटके… ! 

भिक्षेकरी वाटत नव्हती…!  मग ही इथं का बसली असेल ? माझी उत्सुकता वाढली. मी जवळ गेलो… 

हा आता आपल्याला काहीतरी देणार या आशेनं तीनं आपसुक हात पुढे केला. 

मला आश्चर्य वाटलं… भिक्षेकरी तर वाटत नाही…मग हात का पुढे करावा हिने ? 

वय असेल साधारण 70-75 वर्षे. डोईवरचे सर्व केस पांढरे, डोळे खोल गेलेले, चेह-यावर सुरकुत्यांचं जाळं… हाताच्या बोटापर्यंत पसरलेलं… !  या जाळ्यात मध्येच लुकलुकणारे दोन डोळे, चेह-यावर अजीजी, करुण भाव … !

‘आजी इथं का बसलाय ?’ मी विचारलं. 

‘काही नाही, बसल्येय हो देवळाच्या दारात, आपण पोलीस आहात का?  बोलणं मृदु आणि स्वच्छ !

माझी खात्री झाली, आजी भिक्षेकरी नाही. 

तरीही तिला म्हटलं, “ देवळाच्या दारात बसलाय म्हणता, आणि इथं बसुन मागता. बरोबर ना ? मघाशी हात पुढं केलात, बघितलं ना मी…”

तिनं चमकुन माझ्याकडं पाहिलं, डोळ्यात पाणी तरारलं… पण बोलली काहीच नाही. 

“ उठा आजी असं उघड्यावर बसू नका, सध्या काय चालु आहे माहित आहे ना ? जा घरी…कुणी येणार नाही काही द्यायला “. मी पुन्हा बोललो. 

ती ओशाळली, म्हणाली, “ तसं नव्हे हो ! जाते मी इथुन …. कुणी येणार नाही काही द्यायला…काय करणार नशीबच फुटकं…! “—-मला या वाक्याचा अर्थ कळला नाही. 

ती उठली… जायला निघाली.— मनात नसतांनाही ती जायला उठली, पण तिला थांबायचं होतं अजून— माझ्याकडं तिनं ज्या केविलवाण्या नजरेनं पाहिलं त्यात मला ते स्पष्ट जाणवलं. 

मलाच वाईट वाटलं. म्हटलं, “आजी, मी डाॕक्टर आहे, काही औषधं लागत असतील तर सांगा, दुसरी काही मदत हवी असेल तर सांगा…!  पण कुणाला भीक मागायला लागू  नये यासाठी मी काम करतोय, शिवाय तुम्ही चांगल्या घरातल्या वाटताहात…आणि …”

ती चालता चालता थबकली, वळून हसत म्हणाली…” चांगलं घर , वाईट घर असं पण असतं का ?”

“ नाही तसं नव्हतं म्हणायचं मला…” मी काहीतरी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

ती हसली; काहीतरी विचार करुन म्हणाली, “ केळी आहेत का तुमच्याकडे ? “

मला काही कळेचना, ब-यापैकी परिस्थिती वाटते, भिक्षेकरी तर वाटत नाही, तरी इथं मंदिरात काही मिळेल या आशेनं ती इथं बसली होती, हटकल्यावर निघाली, आता जातांना केळी मागते…! 

मानसिक रुग्ण असावी का ?—– उलगडा होईना. उत्सुकता अजुन चाळवली. 

मी तिच्या मागं गेलो, म्हणालो “ आजी… काय झालं… इकडे कुणाची वाट पहात होता का ? काही हवं होतं का… ? “ 

“ मला केळी द्याल…? ” पुन्हा तिनं भाबडेपणानं विचारलं.

मी डायरेक्ट मुद्द्यावर आलो, “ आजी झालंय काय ? नीट सांगाल, तर मी नक्की काहीतरी मदत करेन…! ” 

क्रमशः —-

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महात्मा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ महात्मा ☆ सौ राधिका भांडारकर  

राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे.आणि घरातील मातापिता हे शिक्षक आहेत.

 

ही पृथ्वी ,हवा, भूमी, पाणी,हे सर्व म्हणजे आपल्या बापजाद्यांनी वारसाहक्काने दिलेली मालमत्ता नव्हे,तर ते पुढील पिढ्यांसाठीची जोखीम आहे.ती किमान जशीच्या तशी त्यांच्या हाती सोपवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

तलवार ही शूराची निशाणी नाही तर ती भीतीची निशाणी आहे बलहीन व्यक्ती कुणाला ही क्षमा करु शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करु शकतो.

 

जे लोक म्हणतात,धर्माचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना धर्म काय हेच माहीत नाही.

 

असे आणि अशा तर्‍हेचे अनमोल विचार देणारे गांधीजी त्यांची आज जयंती.त्यानिमीत्ताने त्यांच्या बहुमोल विचारांचे चिंतन व्हावे ही अपेक्षा…

नेता याचा अर्थ मी असा समजते की जो समाजाला,सत्याच्या,न्यायाच्या ,नीतीच्या मार्गावर नेतो तो नेता.तो जाणता असला पाहिजे.निस्वार्थी असला पाहिजे.

समाजाची दु:ख,होरपळ या बाबतीत कृतीशील कनवाळु असला पाहिजे.त्याच्या कार्यावर त्याचा स्वत:चा विश्वास ,श्रद्धा,भक्ती आणि त्या प्रवाहात इतरांना आत्मविश्वासाने घेउन जाणारा हवा…

।।वैश्णव जन तो तेने कहिये जो पीड पराई जाणे रे।।

स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीजींची हीच प्रतिमा होती..

म्हणून ते लोकनेता ठरले.ते देशाचे बापू झाले. राष्ट्रपिता ठरले.

गांधीजींना महात्मा हे संबोधन दिलं गेलं कारण ,एक स्वतंत्र सेनानी, अहिंसेचा पुरस्कर्ता म्हणून त्यांचे संपूर्ण कार्य महान होते.त्यांनी त्यांचं आयुष्य देशाला समर्पित केलं होतं.ते खर्‍या अर्थाने लोकांप्रती,लोकांसाठी आणि लोकांतर्फेच होते.!

सत्य अहिंसा परमोधर्म…

ही त्यांची निष्ठा होती.जीवन सूत्री होती.न्यायासाठी त्यांनी अंदोलने केली. चंपारण्य अंदोलनाद्वारे,शेतकर्‍यांवर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडली.. ब्रिटीश जमीनदारांच्या विरोधात हडताळ केले. आणि त्यांना झुकण्यास भाग पाडले. “भारत छोडो” अंदोलनात,

‘करो या मरो’ असा घणाघाती नारा दिला. लोकांच्या जाणीवा पेटवल्या. गुलामगिरीचे जोखड फेकून देण्यासाठी प्रवृत्त केले.

जातीभेद,अस्पृष्यता वर्णद्वेष,यांच्या उच्चाटनासाठी ,त्यांनी त्यांचं जीवन समर्पीत केलं.

गोल चष्मा ,काठी ,चरखा आणि पंचा म्हणजे गांधींची प्रतिकात्मक छबी!

या उघड्या भारतीय नेत्यांने जगाला नमवलं..थक्क केलं..

मातृभूमीसाठी त्यांनी बलीदान केलं. भारतीयांच्या मनात ते राष्ट्रपती आणि बापू  म्हणूनच सदैव जागृतच असतील.

प्रख्यात शास्त्रज्ञ, आईनस्टाईनने, गांधीजींच्या बाबतीत असं म्हटलं आहे, की “असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता ,हेच एक महान आश्चर्य आहे,.”

गांधीवाद, गांधीजींची तत्व, त्यांचे जीवन, त्यांच्या निष्ठा, म्हणजे एक मोठा अभ्यासक्रम आहे. एक संस्कृती प्रणाली आहे.

बदलत्या काळानुसार उलटसुलट वैचारिक प्रवाह  वाहताना दिसतात.

आज गांधीजी असते तर…? पासून ते गांधीजींने हे करायला नको होतं… पर्यंत विचारधारा आहेत..

आजही जनयात्रा, रथयात्रा, आशिर्वाद यात्रा निघतात.

उपोषणं केली जातात.. अंदोलने होतात. धरणे धरली जातात. संप होतात.. केंद्रस्थानी गांधीजींचे उपोषण, गांधींची दांडीयात्रा ही शिकवण असेलही पण ती तळमळ ,ती तात्विकता ,समर्पण आहे का?….

गांधी हत्येचं समर्थनही केलं जातं

GREAT MEN COMMIT GREAT MISTAKE

असं कंसात म्हटलंही जातं.

पण माझ्या मते गांधी एक इतिहासाचं पान आहे…

एक संस्था आहे.

एक ग्रंथ आहे.

वेळोवेळी उघडावा, वाचावा, अभ्यासावा…

गांधीजींचे जीवन म्हणजे मूर्तीमंत गीता आहे!

झाले बहुत।होतील बहुत।

परी या सम हाच।।

या दिव्यत्वासमोर कर माझे आदरे जुळती….!!

दोन आॅक्टोबर. आज त्यांची जयंती .म्हणून

या तत्वाला भावपूर्ण आदरांजली!!

धन्यवाद!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print