मराठी साहित्य – विविधा ☆ “रूचिरा आणि खवय्ये…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “रूचिरा आणि खवय्ये…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कुणाच्यही ह्रदयात शिरायचा मार्ग हा त्याच्या पोटातूनच जातो अशी आपल्याकडे एक म्हण आहे. खरचं, आपल्याकडील खवैय्येगिरी बघितली की ही म्हण पटते सुद्धा. खाद्यसंस्कृती म्हंटली की त्यात दोन बाजू असतात. एक बाजू खाण्याची आवड असणाऱ्यांची आणि दुसरी बाजू सुगरणगिरी करीत मनापासून आग्रहाआग्रहाने खिलवणा-यांची.

खाण्याची आवड असणाऱ्यांमध्येही प्रकार असतात काही सरसकट सगळेच पदार्थ आवडीने,खाण्याचा मनमुराद  आनंद लुटणारे तर काही चोखंदळपणे नेमकेच विशिष्ट पदार्थ आवडून त्याचा मनापासून स्वाद घेणारे. मी माझ्याच बाबतीत अभ्यास केल्यावर लक्षात आलं,आधी शिक्षण,मग नोकरी ह्यामुळे स्वयंपाकघरात घुसघुस करणा-यातली मी नक्कीच नव्हे. त्यामुळे मला स्वतः ला शक्यतोवर घरचं,ताजं अन्न इतकीच माझी डिमांड मग बाकी नो आवडनिवड. फक्त एक गोष्ट जे काही पदार्थ करते ते होतात मात्र चवदार, सगळ्यांना आवडतील असे.आता ही कदाचित अन्नपूर्णेची कृपा असावी वा आपल्या जवळच्या माणसांच माझ्यावरील प्रेम, मला बरं वाटावं म्हणून गोड पण मानून घेत असतील बिचारे.

खिलविणा-यांमध्येही प्रकार असतात. काही अगदी ओ येईपर्यंत मनापासून आग्रह करून करून खाऊ घालणार तर काही मला आग्रह अजिबात करता येत नाही तेव्हा हवं तेवढं मनसोक्त पोटभर खा असा सज्जड दम देणारे.              

ह्या सगळ्यांमुळे आज अगदी हटकून घराघरात पोहोचलेल्या अन्नपूर्णेची आठवण प्रकर्षाने झाली. 20  एप्रिल ही तारीख खास सुगरण व्यक्तींच्या आणि त्या सुगरपणाला दाद देणा-या खवैय्ये लोकांच्या तोंडची चवच घालवणारी तारीख. 20 एप्रिल 1999 रोजी साक्षात अन्नपूर्णेची छाप असणा-या प्रतिअन्नपुर्णा म्हणजेच कमलाबाई ओगले ह्यांचा स्मृतिदिन.

कमलाबाईंना “सव्वालाख सुनांची सासू”असं म्हंटल्या जायचं.खरोखरच 1970 साली अगदी अल्पावधीतच मेहता पब्लीकेशन्सने प्रकाशित केलेल्या कमलाबाई ओगले ह्यांनी लिहीलेल्या “रुचिरा”ह्या पुस्तकाच्या सव्वालाख प्रती हातोहात विकल्या जाऊन त्यापासून ब-याच जणींना बरचं काही शिकता आलं ही गोष्टच खूप अलौकिक खरी. नवीनच संसाराला सुरवात करणाऱ्यांसाठी रुचिरा पुस्तक म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेले नवनीत ,बालविद्या डायजेस्टच जणू.

खरतरं कमलाबाई फक्त चार इयत्ता शिकलेल्या. पण दांडेकर घराण्यातून एका लहानशा खेडेगावातून लग्न करून त्या सांगलीच्या ओगले कुटूंबात आल्या आणि त्यांच्या सासूबाईंच्या हाताखाली पाकशास्त्रात एकदम पारंगत झाल्यात.पुढे त्यांचे वास्तव्य काही काळ आँस्ट्रेलियात पण होते.

त्यांच्या “रुचिरा” ह्या पुस्तकात मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे पदार्थांसाठी लागणा-या जिन्नसांची मापं ही चमचा वाटीने मापलेली आहेत.ते ग्रँम,मिलीग्रँम असं आखीवरेखीव मोजमाप माझ्यासारख्या वैदर्भीय खाक्याला झेपणारचं नव्हतं मुळी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकात असलेली साधी,सरळ,सोपी,चटकन डोक्यात शिरणारी भाषा.आणि तिसरी ह्या पुस्तकातील आवडणारी बाब म्हणजे ह्या पुस्तकातील पदार्थ हे आपल्याला नित्य लागणा-या जेवणातील वा आहारातील आहेत.जे पदार्थ आपण वर्षानुवर्षे, सठीसहामाशी कधीतरीच करतो अशा पदार्थांचा भरणा कमी व नित्य स्वयंपाकात लागणा-या अगदी चटण्यांपासून चा समावेश ह्या पुस्तकातं आहे.

मला स्वतःला हे “रुचिरा” पुस्तक बरचं पटल्याने,भावल्याने बहुतेक लग्न ठरल्यावर वा नुकतेच नवविवाहित मुलींना मी हे पुस्तक आवर्जून भेट द्यायचे.आतातर शिक्षणाच्या, नोकरीच्या निमीत्त्याने घरापासून दूर राहणाऱ्या तसेच लग्नाळू मुलांना पण हे पुस्तक भेट म्हणून द्यायला अगदी योग्य आहे.किमान स्वतःच्या उदरभरणाइतके तरी पदार्थ स्वतःचे स्वतः करता यायलाच हवे मग तो मुलगा असो वा मुलगी. कुठल्याही व्यक्तीने स्वतः हाताने आपल्या आवडीनुसार घरच्या घरी रांधणं ह्यासारखी तर उत्तम आणि फायदेशीर गोष्ट नाही. आपल्या घरात आपण जे शिजवू ते आपल्या चवीनुसार असेल,त्यात उत्तम जिन्नस वापरलेले असतील,स्वच्छता सांभाळलेली असेल आणि नक्कीच विकतच्यापेक्षा निम्म्या किमतीत हे पदार्थ घरच्याघरी बनतात.

ज्यांची ह्या रुचिरा वर श्रद्धा वा विश्वास होता त्या आमच्या शेजारच्या काकू कितीही खिळखीळं झालं असलं तरीही त्यांचं जुनं रुचिरा हे पुस्तक वापरायच्या.मला ते बघून कायम भिती वाटायची की खिळंखीळी झालेली ती पुस्तकाची पानं इकडची तिकडं का सरकली तर त्या पदार्थांची काय वाट लागेल कोण जाणे. म्हणून मी त्यांच्या वाढदिवसाला मुद्दाम नवीन रुचीराची प्रत भेट म्हणून दिली. तरीही त्या ग्रेट काकू नवीन पुस्तक छान कव्हर घालून शेल्फ मध्ये ठेवायच्या आणि ते जूनंचं पुस्तक बरोबर असल्यासारख्या वापरायच्या.

काहीही असो आज ह्याच रुचिराकार कमलाबाईंच्या पुस्तकातून वाचून, शिकून कित्येक नवीन सुनांच्या घरची मंडळी “अन्नदाता सुखी भव,अन्नदात्याचे कल्याण होवो”हे आपोआप म्हणायला लागले.

ह्या रुचिरावाल्या आजींच दिनांक 20 एप्रिल 1999 साली निधन झालं. पण आजही त्यांच्या रुचीराच्या रुपांत घरोघरी त्यांच अस्तीत्व जाणवतयं हे खरं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रॅपीड फायर गेम…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “रॅपीड फायर गेम…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा स्वतःच स्वतःशी रँपीड फायर.गेम खेळत बसले होते. खूप मजा येते ह्या खेळात. स्वतःच्या मनाच्या आतल्या कप्प्यात दडलेल्या गोष्टी अलगद बाहेर येतात, एकदम मोकळं वाटतं आणि मुख्य म्हणजे काही वेळी खूप विचार करुनही न मिळणारी उत्तरं अचानक गवसतात.कधीकधी पटकन उत्तरं बाहेर पडण्याच्या नादात सगळ्यात जास्त महत्वाचं उत्तर राहूनच गेलं ह्याची जाणीव पण अनुभवांतून येते.

ह्या गेम मध्ये मी पहिला प्रश्न केला, सुखं म्हणजे नेमकं काय ? त्यावर चटकन उत्तरं आलं आनंदाची परिसीमा. मग दुसरा प्रश्न, हे नेमके कशामुळे मिळतं ? त्यावर माझं उत्स्फूर्तपणे आलेलं उत्तर आर्थिक स्थैर्य,मनासारख्या घडणाऱ्या घटना.

नंतर लगेच आलेल्या अनुभवाने आपल्या उत्तराचा क्रम चुकलायं हे दाखवून दिलं आणि अनुभवांमुळे लक्षात आलं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले आरोग्य. सगळ्या सुखकारक गोष्टींची उपलब्धी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे त्या गोष्टींचा उपभोग आणि हा उपभोग आपण आरोग्यात स्थैर्य असेल तरच घेऊ शकतो. खरंच सगळ्या म्हणी ह्या कमी शब्दांत संपूर्ण आशय देणा-या असतात हे “सर सलामत तो पगडी पचास ” ह्या म्हणीवरुन लक्षात येतच. सहसा कुठलाही आजार हा अकस्मात येत नाही. आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला तसे संकेत देत असतं ,आपण मात्र त्याकडे विशेष गंभीरपणे न बघता तसंच दामटायला वा रेटायला बघतो. सध्या सगळीकडे व्हायरल इंफेक्शनचा सामना जनताजनार्दनाला करावा लागतोयं. सध्याच्या असमतोल हवामानामुळे हे चढउतार आपल्याला अनुभवावे लागतात. खरतरं एकादिवसाच्या मुलाचं देखील कोणावाचून काहीही अडत नाही. जो जन्माला घालतो तोच सोय करतो ही म्हण खरी असली तरी अशा संकटाच्या काळात मानसिक, शारीरिक भक्कम राहतांना  शेवटी माणसाला माणसाचीच गरज लागते.मग ती कोठल्याही रूपात का असेना,कधी ती गरज आपली जवळची घरची माणसं भागवतात तर कधी आपली जोडून ठेवलेली मित्रमंडळी वा स्नेही भागवतात.आता दोन दिवस सक्तीची विश्रांती घेतल्या शिवाय पर्यायच नाही.

सोमवारी तसं सकाळपासूनच फ्रेश वाटत नव्हतं परंतु कामाला लागलं की आजारपण विसरायला होतं हा नित्य अनुभव त्यामुळे सगळं आवरून बँकेला पळाले मात्र दुपारी सणसणून बँकेतच ताप भरला.तशीच सुट्टी मागून साक्षात आम्हा बडनेरवासियांसाठी व आजुबाजूच्या गावांसाठी धन्वंतरीचे रुप असलेल्या डॉ. राठी ह्यांच्या दवाखान्यात गेले त्यांनी औषधे देऊन कमीतकमी दोन तीन दिवस सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली.न ऐकल्यास अँडमिट करुन घेण्याचा सज्जड दम दिल्यावर  आता दोन दिवस सक्तिची विश्रांती घेणे ओघानेच आले.

औषधांबरोबरच सर्वांगीण आराम,शांत स्वस्थ झोप,डोळ्यांना डोक्याला त्रास होणाऱ्या मोबाईल चा अत्यंत कमी वापर ह्याने लौकर बरं वाटायला लागेलचं. असो शेवटी काय तर “जान है तो जहाँ है”.,”सर सलामत तो पगडी पचास” ही मोलाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवी.

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाषा…— ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ भाषा…— ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

!! शब्दजाणीव !!

जगात मनुष्याने अधिकाधिक घातक अशी शस्त्रे निर्माण करून दाखवलीत. एकापेक्षा एक धारदार , हिंसक आणि थरारक अशी शस्त्रे जगाने आजवर पाहिली आहेत. मानवी समुदायाची मोठी कत्तल या घातकी शस्त्रे चालवूनच झाली. कुणी न्यायासाठी शस्त्र उचलले तर कुणी अन्याय करण्यासाठी शस्त्र पारजले. एकाहून एक अशी ही शस्त्रे बाळगणारी मानवी जमातीकडे आणखी एक महत्त्वाचे शस्त्र उपलब्ध आहे याची फारशी दखल घेतली जात नाही . या शस्त्राची एकच बाजू मोठ्या गौरवाने सांगितली गेली आणि त्याची दुसरी धारदार बाजू दुर्लक्षीत होत गेली. भलेभले चांगले लोक या शब्दाला शस्त्र देखील मानतील का ? माझ्यापुढे प्रश्न आहे.

भाषा ….हे मानवी समाजाकडे उपलब्ध असे शस्त्र आहे. भाषा मनुष्याला जोडण्याचे काम करते, योग्यपणे व्यक्त होण्याचे भाषा हे माध्यम आहे , भाषा मनुष्याच्या विकासात सर्वाधिक महत्त्वाची भुमिका बजावते ही सत्ये कुणीही नाकारणार नाहीच. मात्र भाषा शस्त्र म्हणून जेव्हा वार करते तेव्हा त्या जखमा वर्षानुवर्षे फक्त चिघळत राहतात , राज्य व राष्ट्रे यांचे अवयव कुरतडत राहतात , बहुतांशी वेळा दोन माणसांमध्ये , राज्यांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये देखील जोडण्याऐवजी तोडपाणीचे काम करते ती भाषाच. मानवी समाजात अनेक वेगवेगळ्या विविधतेने भरलेल्या भाषा आहेत. प्रत्येक भाषेला एक गोडवा आहे .इतर काही बलस्थाने आहेत. प्रत्येक मानवी जीवाला त्याची मातृभाषा अत्यंत प्रिय असते हे देखील निखालस नैसर्गिक सत्य आहे. तरीही भाषा शस्त्र म्हणूनच नव्हे तर घातक शस्त्र म्हणून काम करते हे देखील कटूपणाने नोंद करावे लागतेच. भाषेचा वापर ( गैर ? ) करून वर्चस्ववादी वृत्ती आपल्या धारणा शोषीतांवर लादतात. आपलीच भाषा ” प्रमाण ” व शोषीतांची भाषा ” तुच्छ ” अशी घातकी भाषीक मांडणी करून शोषीतांची गुलामगिरी कायदेशीर बनवू पाहतात. जगभर ही अवस्था भूतकाळात होती , वर्तमानात आहे आणि भविष्यात देखील दिर्घकाळ जिवंत असेल हे कटू वास्तव आहे. मग भाषेची नेमकी कोणती जाणीव आपल्याला कळली पाहिजे ? मुद्दा हा आहे. कोणत्याही भाषेला दुधारी धार असते .यापैकी एक विधायक असते आणि दुसरी विघातक. विधायक बाजू वाढवत नेणे हे योग्य .याचवेळी विघातक बाजू संपवत नेणे हे अधिक योग्य असते. स्वभाषेचा रास्त अभिमान जितका योग्य असतो त्याचबरोबर इतर भाषांविषयी आणि त्या भाषा बोलणारे समूहांविषयी देखील रास्त आदरभाव असावा.भाषेचे शुद्ध रुप आणि तथाकथित अशुद्ध रुप ही विभागणी टाळली पाहिजे .

भाषा…बोलण्यात सौम्य पण स्पष्ट , वर्तनात स्वच्छ पण आदरभावी , लिहिण्यात नेमकेपणा पण सच्चेपणा जपणारी असावी. खरा दोष भाषेचा नसतोच…तो असतो भाषावाद्यांचा. हे भाषावादी लोक अत्यंत संकुचित मात्रेने भाषा हाताळतात आणि भाषेची विघातक धार तेज करु पाहतात. अशावेळी जबाबदारी असते ती भाषेच्या संवादाकर्त्यांची. जे संवादकर्ते भाषेची विधायक बाजू अधिकाधिक उजळवीत राहतील आणि मानवी समूहात संवादप्रियता वाढवत राहतील. भाषेचे हे सामर्थ्य जपले पाहिजे .

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शाळा सुटता, पुस्तक मिटता, सुट्टी लागता… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌸 विविधा 🌸

☆ शाळा सुटता, पुस्तक मिटता, सुट्टी लागता… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

आपल्यापैकी खास करून आई, बाबा, आजी, आजोबा अन इतर सर्वाना प्रेमळ प्रणिपात, नमन, आणखीन खूप खूप शुभेच्छा, बस आत्ता इतकच! (आणखीन एक नम्र निवेदन, तुमच्या घरातल्या छोट्या मंडळींना साष्टांग नमस्कार, विचारा का? हा लेख शेवटपर्यंत वाचा, म्हणजे आपोआपच कळेल!)

शाळकरी मुलांची कुठलीही सुट्टी, म्हणजे पालक किंवा तत्सम मंडळींचा बहुदा घातवार असा अलिखित नियम असावा! त्यात सर्वात मोट्ठी सुट्टी म्हणजे उन्हाळी सुट्टी, खरे पाहिले तर ही सरकारी योजना असून, ती नेहमीप्रमाणे फेल का होत नाही, हा प्रश्न अत्यंत वाजवी आणि समयोचित आहे! पण त्याची अंमलबजावणी करायला शाळेचे प्रिन्सिपॉल आणि शिक्षक तत्पर असतातच. शाळेतील शिक्षकांना देखील ब्रेक हवा, त्यांना पण घरची कामे असू शकतात, हे लक्ष्यात घ्याल की नाही! ती मंडळी या निमित्याने त्यांच्या मुलांच्या सुट्टीचे व्यवस्थापन करणार की! म्हणून एरवी शाळेत धुमाकूळ घालणाऱ्या मुलांच्या समस्त घराला सुट्टीत मुलांचा ब्रेथलेस परफॉर्मन्स बघणे हे क्रमप्राप्तच!

शाळेत नियोजनबद्ध गोष्टींसाठी नियत अवधी असतो, मात्र शाळा नसेल तर मग आपल्या घरात असे सुसंवाद घडत असतीलच! 

“आई, उद्या सकाळी उठवू नकोस प्लीज़, मी उठेन तेव्हा उठेन (म्हणजे कदाचित दुपार होईल)”

“आई, आज ऑफिसला जाऊ नकोस! घरीच मस्त वेळ घालवू (म्हणजे तू मस्त काही बाही कुकिंग कर अन मी खाईन)” 

“आई, आज जरा घर नीट आवरून ठेव, अन मस्त स्नॅक्स, कोल्ड-ड्रिंकचे प्रिपरेशन कर (माझे फ्रेंड्स येणार आहेत अन आम्ही एन्जॉय करणार आहोत)”

“आई, आत्ता कुठे सुट्टी लागली, अभ्यास करून कंटाळा आलाय, मी आधीच सांगतो/सांगते, मी जरा रिलॅक्स होणार आहे( घरची कुठलीच कामे करणार नाहीये)”

“आई, आज तू दमली असशील ना, आज किचनला सुट्टी! कित्ती करतेस ग आमच्यासाठी, आज तू आराम कर बरं! (आज मस्त बाहेरच लंच, डिनर करायचं)”

दृश्य १९५५ आणि पुढचा उन्हाळी काळ- स्थळ नागपूर, पहाटे ५ वाजता, आमच्या वडिलांची एकच हाक, अन काही मिनिटं जाता जाता आम्ही तयार, घरापासून २.५ मैल अंतर कापायला, अंबाझरी तलावाची सैर करायला! तिथले तलावा काठीचे भटकणे, बागेत फिरणे, अन झुल्यावर झुलणे, तहान लागली तर तिथल्याच नळाचे पाणी पिणे. परत येतांना रस्त्याच्या काठी माठातली नीरा मिळायची. सकाळी ७ पर्यंत परत येणे, हा ठराविक कार्यक्रम असायचा.  

आता पर्याय भरपूर आहेत, मुलांना सकाळी उठवण्याचा कार्यक्रम जमला की पुढचे सगळे सोप्पे असते! फक्त स्वच्छ स्वछंद हवा, हिरवीगार झाडे, मोकळी मैदाने, स्वच्छ पाणी, हे शोधायचा अवकाश की सुट्टीचे प्लानिंग झालेच समजा! 

सुट्टीचे दिवसागणिक, आठवड्यागणिक अन महिन्यागणिक नियोजन करणे, म्हणजे तारेवरची कसरत! यात (किमान) दोन प्रकार असू शकतात. एक, मुलांच्या सोबत बसून प्लानिंग करा किंवा मुलांना वगळून ते (शांतपणे) करा! अर्थात हे सर्व मुलांकरता असल्यामुळे त्यांचा सहभाग असावा, हे मान्य, पण त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीपुढे पालक किती टिकणार हे दोन्ही पक्ष् किती ताकदीचे बाहुबली आहेत त्यावर वैयक्तिकपणे ठरवावे. या व्यतिरिक्त वेळेवर येणाऱ्या अडचणींचा विचार करून प्लॅन बी ते प्लॅन झेड ठरवावा. (कांही काळापूर्वी कोरोना आला आणि आपले कित्येक प्लॅन धुळीला मिळाले!)  

आता आपण मुलांसाठी सुट्टीत बहुसंख्य वेळा कशा-कशाचे नियोजन करतो ते बघू. यात मुलांना हे आवडेल हे गृहीत धरलेलेच आहे, शिवाय गुगल आणि इतर वेबसाइट्स आहेतच मदतीला! पिझ्झा पार्टी, पाजामा पार्टी, थीम पार्टी, उन्हाळी शिबीरे (यांचे विषय अनंत!), मॉलला भेट, मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमे बघणे, वॉटर पार्क, अम्युझमेंट पार्कला भेटी देणे हे सर्वांचे सर्वकालीन सर्वप्रिय कार्यक्रम!

वरील सफरीं व्यतिरिक्त मी इथे काही पर्यायांचा विचार मांडते, बघा तुम्हाला आवडताहेत का?

*आपल्या शहरातील संग्रहालय, तारांगण, ऐतिहासिक वास्तू , गड, किल्ले  आणि जंगले यांना भेटी, तसेच निसर्गाच्या सानिध्यात  पक्षी, प्राणी, झाडे, वृक्ष आणि वेलींचे निरीक्षण करणे: या  जागांना भेट देण्याआधी जर इंटरनेट आणि इतर स्त्रोतातून माहिती गोळा केली तर निरीक्षण आणखी चांगले करता येईल. तिथे गेल्यानंतर माहितीपुस्तिका देखील वाचता येईल. भेट दिल्यानंतर माहितीत भर घालून आपले सामान्य ज्ञान समृद्ध करावे! घरच्या वडीलधाऱ्या मंडळींचे मार्गदर्शन असेल तर अत्युत्तम! याने मुलांची निरीक्षण शक्ती, जिज्ञासा आणि अभ्यासू वृत्ती वाढेल! तसेच हे मुलांनी लिहिले अन तेही मातृभाषेत, तर खूपच मजा येईल

*जवळपासच्या गावात राहून ग्राम्य जीवनाचा आनंद घेणे: नदीकाठी फिरणे आणि गावातील मुलांशी संवाद साधणे, तिथल्या जेवणाचा आस्वाद घेणे, सूर्योदय, सूर्यास्त आणि रात्री निरभ्र आकाशात चंद्र, ताऱ्यांचे निरीक्षण करणे, गावांत प्रदूषण बरेच कमी असल्याने हे जास्त आनंददायी असते. हे गाव मामाचे असेल तर आनंदाला काय तोटा?  

*अनाथाश्रमाला आणि वृद्धाश्रमाला भेटी देणे, जमेल तसे दान करणे आणि तिथे वेळ देणे:  मला वाटते सद्य परिस्थितीची जाणीव होण्याकरता, तसेच आपण किती सुस्थितीत आहोत याची मुलांना जाणीव व्हावी याकरता पालकांनी मुलांबरोबर या भेटी अवश्य द्याव्यात. 

* बालनाट्य बघणे, लहान मुलांसाठी असलेले चित्रपट बघणे (मला असे वाटते की, मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये तयार होणाऱ्या नाटकांना बालप्रेक्षकांनी आणि त्यांच्या पालकांनी भरघोस प्रतिसाद देणे आवश्यक आहे).

याच संदर्भात कांही मोजक्या आठवणी परत जाग्या करते!

साधारण १९५७-१९५८ चा काळ: स्थळ नागपूर मधील एक सिनेमागृह:  बालप्रेक्षक आणि अति बालप्रेक्षकांच्या पालकांनी ते तुडुंब भरलय. सकाळी ९ ची वेळ! सिनेमा आहे “शामची आई”. पुस्तक वाचले होते, पण ती कहाणी रजतपटावर बघतांना कधी नव्हे इतके प्रेक्षक भावविवश झाले होते. मी तर आजवर इतर कुठलाही चित्रपट बघितल्यावर इतके रडल्याचे मला आठवत नाही. घरी आल्यावर देखील त्या सिनेमाचा आफ्टर इफेक्ट जाण्यासाठी खूप दिवस जावे लागले!

साधारण १९९८ चा काळ: तेच दृश्य, नागपूर मधील एक सिनेमागृह बालप्रेक्षक आणि पालकांनी तुडुंब भरलय. सकाळी ९ ची वेळ. सिनेमा आहे छोटा चेतन (३D) व त्याकरता खास रंगीत चष्मा घेण्याकरता लागलेली लांब रांग! सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचलेली! मी पण मुलांसोबत मुद्दाम सिनेमा बघायला आलेय, मित्रांनो अशा वेळेस सिनेमाच्या व्यतिरिक्त बालप्रेक्षकांचा प्रतिसाद बघण्याचा आनंद काही वेगळाच! 

साधारण २०१८ चा मे महिना:  आता मी ठाण्यात नातीबरोबर आलेय, एक सुपर हिट नाटक अर्थातच “अलबत्या गलबत्या” बघायला! चिंची चेटकिणीची वाट बघता-बघता आली एकदाची!!! तिचे मंत्र-तंत्र, तिचे घाबरवणे अन तिचा ऍक्शनने भरगच्च भरलेला अन भारून टाकणारा फेमस डायलॉग “किती ग बाई मी हुश्शार, किती ग बाई मी हुश्शार!” इतकी गोड, लव्हेबल अन गुणाची (?) चेटकीण! मीच काय सर्वच तिच्या प्रेमात पडलेत! आधी वैभव मांगले अन आता निलेश गोपनारायण, तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा!!! हे चेटकिणीचे लोभस आऊटफिट अन अभिनयाचं आव्हान लीलया स्वीकारलेय तुम्ही अन विलक्षण ताकदीने पेलले!  

मित्रांनो! काळ कुठलाही असू द्या, सिनेमा अन नाटकांना बालप्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद जवळपास सारखाच! बडबड, गप्पा आरडाओरडा, धमाल, कधी घाबरणारे अन कधी आनंदाचे चीत्कार, हसणे खिदळणे, वाहवा!

मोहोरून टाकणाऱ्या फुलांचे ताटवे, रंगीबेरंगी फुलपाखरांचे बागडणे, मोराचा मोरपंखी नाच, मनमोहक हास्याची दिलखुलास कारंजी अन मधुर, निरागस व लोभस बालपणाचे नयनरम्य दर्शन एकाच ठिकाणी हवे आहे का?  मग कोणत्याही भाषेत बालनाट्य सुरु असलेल्या एखाद्या रंगमंदिराला जरूर भेट द्या, अँड don’t worry! भावनेला भाषेचा अडसर कधीच भासत नाही!!! 

चला तर मंडळी, सुट्टीत धम्माल मज्जा करू या!!!

तूर्तास तुमची रजा घेते, एका बालनाटकाचे अर्जंट बुकिंग करायचे आहे!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ छावणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

 

🌸 विविधा 🌸

☆ छावणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

दिवे लागणीची वेळ होती. मी गॅलरीत उभे राहून समोर अथांग पसरलेली वनराई पहात होते. बर्‍यापैकी अंधारून आले होते. पानगळ झालेल्या झाडांतून पलिकडे कैगा धरणावरील (कर्नाटक) दिवे लुकलुकताना दिसत होते. डोंगराआडून चंद्राची स्वारी डोकवत येत होती. आकाशात एक एक चांदणी उगवत आपली हजेरी लावत होती.  दोन दिवसातच पौर्णिमा असल्यामुळे चंद्राची,  टपोऱ्या चांदण्यांची रूपेरी चादर हिरव्या झाडांवर पसरली होती.

दिवसभराची किलबिल घरट्यात विसावून शांत झाली होती. नाहीतरी विविध पक्षांचे वेगवेगळे आवाज ऐकून कान तृप्त होतातच. आपल्या गावापासून, माणसांपासून दूर असल्यामुळे मनात निर्माण झालेली हुरहूर, त्यांच्या दूर असण्यामुळे मनाला  जाणवणारी उणीवेची भावना पक्षी, प्राणी, घनदाट पसरलेली ही हिरवीगार वनराई यांच्यामुळे  काहीशी कमी होते  हे ही तितकेच खरे .

कैगा धरणापासून दोन कि.मी. अंतरावर आमची छावणी होती. एका डोंगराच्या पायथ्याला वसलेली. समोर दूरवर पसरलेला निसर्ग म्हणजे ‘देवाने सढळ हाताने रेखाटलेली अतिसुंदर चित्रकृतीच. उंच उंच डोंगर, दऱ्या-खोऱ्यातून पसरलेली हिरवाई पाहून मन सुखावते, तृप्त होऊन जाते.

आजही मी अशीच टपोऱ्या चांदण्यात उजळलेला निसर्ग पहात  उभी होते. गॅलरीतून पहाता पहाता समोरून अनशी घाटातून उतरत असलेल्या वाहनांच्या दिव्यांचे प्रकाश झोत  दिसले  आणि गावाकडे जाणारा रस्ता डोळ्यांसमोर उभा राहिला.  एकदम मन उदास झाले. या घाटातूनच आम्ही आमच्या गावाकडे ये जा करत असतो..

आमचे छावणीतले जीवन आणि गाव यात किती फरक असतो नाही, या विचाराने मन हेलावून गेले. माझे पती पंधरा दिवसांसाठी आऊट ड्युटीवर गेले होते.  मी आणि माझी मुलगी,  आम्ही दोघीच होतो. मनात आले आपल्या गावापासून दूरवर प्रत्येक जवान असे कितीतरी डोंगर ओलांडून जात, येत असतो.  देशासाठी प्रवास करत असतो. छावणीत आपला परिवार आणतो, आपला संसार थाटतो. कधी येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर, परिस्थितीवर मात करत परिवार सांभाळतो.  कधी तर अशी परिस्थिती येते की ,  नोकरी एकीकडे असते तर  परिवार दुसरीकडे असतो. पण तो येणाऱ्या प्रत्येक संकटास धैर्याने तोंड देतोच. ना कधी देशसेवेत कमी पडतो ना कुंटुबाच्या कर्तव्यात कमी पडतो..  प्रत्येक  जवान देश आणि आपला परिवार अशी दोन्ही कर्तव्ये अगदी व्यवस्थित पार पाडत असतो..

कधी आउट ड्युटीवर परिवार सोडून बाहेर जावे लागले तर जवानाच्या अर्धांगिनीला आपल्या मुलांसाठी हिरकणी व्हावेच लागते.

छावणी हा मात्र जवानाचा विसावा असतो. देशाच्या विविध राज्यांतून, कित्येक गावातून येणारे जवान आणि त्यांचे  परिवार मिळून  आमची छावणी होते.  वेगळी भाषा, वेगळे पेहराव , वेगवेगळे खाणे-पिणे, आचार,विचार  अशी कितीतरी गोष्टींत विविधता असते. हीच आमची विविधतेतून एकता दर्शवणारी आमची भावकी. छावणीच्या गेटमधून आत येताच इथे प्रत्येकांत आपलेपणाची भावना असते. घर सरकारीच असते पण ते’ माझे घर ‘ आहे अशी आपलेपणाची भावना छावणीत येताच प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. नाती रक्ताची नसतात, पण अडी-अडचणीत  एकमेकांना साथ देणारी, एकमेकांसाठी धावून जाणारी असतात. सण,  उत्सव सगळे मिळून साजरे करतात. एकमेकांच्या विविध सण उत्सवात सर्वजण एकत्र येतात, मिळून सण साजरे करतात. असे विविधतेतही एकोप्याचे , एकात्मतेचे वातावरण छावणीच निर्माण करू शकते. आपण गावाकडे एका गावात एका भावकीत सुद्धा असे मिळून-मिसळून, एकोप्याने  रहात नाही . मनात इर्षा,  वैरभाव ठेवून रहातो, तसेच वागतो . पण छावणीत येताच छावणी एकीने रहायची शिकवण देते. तीन – चार वर्षांत बदली होते.  जिवाभावाचे नाते निर्माण झालेले लोक दूर जातात. एकमेकांचे निरोप घेता-देताना कुणी आपलेच जवळचे दूर जातेय या भावनेने मने कष्टी होतात, प्रत्येकाचे काळीज पिळवटून जाते. . निरोपाच्या वेळी खोलवर मनात रुतून बसणारे दुःख होते. तीन-  चार वर्षांनी येणाऱ्या बदल्या, पुन्हा नवीन राज्य, नवा प्रदेश, नवा गाव, हवा,  पाणी,  संस्कृती, भाषा सगळे काही नवं, निराळे.  छावणी जाणाऱ्याला जड अंतःकरणाने  निरोप देते. येणाऱ्याचे आनंदाने स्वागत करते. पण प्रत्येक  जवानाला या सगळ्यांशी जुळवून घेत नवी छावणी शोधावीच लागते.

प्रत्येक जवान या छावणीत रूळत असला तरी एक स्पष्ट करावे वाटते. देशासाठी लढणारा जवान हा आपल्यामागे आपले आई-वडील, भाऊ, बहिण,  कितीतरी जिवाभावाची माणसं  सोडून आलेला असतो. पण आपल्या घरापासून ते गल्लोगल्लीतला आख्खा गाव, दूर आलेल्या जवानाच्या डोळ्यांत सदा उभा असतो, दाटून राहिलेला असतो हे ही खरे आहे. मायभूसाठी लढण्याचे बळ, जन्मभूमीकडे परत येण्याच्या सुखद हिंदोळ्यातूनच मिळते. आख्खा गाव नजरेत भरून छावणीत राहणाऱ्या जवानाला, त्याचा गाव किती आठवणीत ठेवत असतो हे गावच जाणत असेल.

किती वेळ मी छावणीच्या विचारचक्रात गॅलरीतच उभी होते. समोरच्या घाटातून गावाकडे जाणारा रस्ता पहात माझाही गाव आठवणीच्या हिंदोळ्यात मनात रुंजी घालत होता. इतक्यात रात्रपाळीला जाणाऱ्या एका जवानाला खिडकीतून “बाय बाय “केलेला आवाज कानावर आला आणि मी विचारातून भानावर आले.

मनाला मात्र एक सत्य स्पर्शून जाते की ही छावणी हेच आपले गाव, इथले सदस्य, इथले परिवार हेच सगे-सोयरे, आणि हीच नातीगोती. या घनगर्द जंगलातील प्राणी, उंच उंच गगनाशी भिडणाऱ्या झाडे- वेली, आनंदाने बागडणारे पक्षी हेच आपले जीवन. कधी इथली छावणी  आपली होऊन गेलेली असते तर कधी दुसर्‍या ठिकाणची छावणी.……

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 63 – मातृभूमी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 63 – मातृभूमी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

सर्व धर्म परिषदेला विवेकानंद येण्यापूर्वी भारतात ते परिव्राजक म्हणून फिरले होते आणि आता अमेरिकेत सगळीकडे परिव्राजक म्हणूनच फिरत होते. पण दोन्ही कडचे परिव्राजकत्व खूप वेगळे होते. दोन्हीकडील लोक, शिक्षण, परंपरा, तत्वज्ञान, धर्म, अध्यात्म ,विचार व मूल्य ,आर्थिक परिस्थिति सगळच वेगळं. इथे वैयक्तिक भेटीतून त्यांनी तळागाळातील भारत समजून घेतला तसा आता दीड वर्षापासून ते अमेरिकेत फिरत होते तेथेही भेटी घेणे,विविध चर्चा, भाषणे, सार्वजनिक ठिकाणची व्याख्याने, तिकडच्या विद्वान लोकांच्या भेटी ,नामवंतांशी झालेल्या चर्चा यामुळे तिकडची संस्कृती, ते लोक याचा जवळून परिचय होत होता. अनेक कुटुंबे विवेकानंद यांच्याशी पर्यायाने हिंदू तत्वज्ञानशी जोडले गेले होते. तिथल्या वृत्तपत्रातून विवेकानंद यांच्या विषयी अनेक वर्णने छापून आल्यामुळे लोकांना परिचय व्हायचा. त्यांच्या भेटीनंतर आणि ओळख पटल्यानंतर पाश्चात्य संस्कृतीतल्या स्त्रिया सुद्धा विवेकानंद यांच्याकडे मातृभावाने बघू लागल्या होत्या. भारतात जसे त्यांचे शिष्यगण तयार झाले होते तसे आता अमेरिकेत सुद्धा लोकांचा यातला रस वाढू लागला होता.त्यातून अनेक शिष्य ही तयार झाले.

सुरूवातीला सर्व धर्म परिषदेपर्यंत त्यांना कोणी ओळखतही नव्हते, नंतर मात्र ते तेंव्हापासून आणि नंतरही विद्वानात सुद्धा चांगलेच परिचित झाले. एक मानाचे स्थान त्यांना प्राप्त झाले होते. सुरूवातीचे विषय सुद्धा हिंदू धर्माचे प्रतींनिधी याच नात्याने असत. खरा हिंदू धर्म समजून सांगणे, गैरसमज दूर करणे, हेच त्यांनी उद्दिष्ट्य ठेवलेले दिसते.

स्वामीजींनी अमेरिकेचा आता निरोप घेऊन पुढच्या कार्याला लागायचे ठरवले होते, अनेक जणांना पत्र लिहून निरोप दिला. पंधरा एप्रिलला न्यूयोर्क हून लिव्हरपुल ला निघाले.  बरेच जण जहाजावर निरोप द्यायला आले होते. आधी भारतात अडीच वर्षे परिव्राजक म्हणून ते फिरले, तसे अमेरिकेत सुधा जवळ जवळ ते अडीच वर्षे फिरले. आता ते इथून इंग्लंड ला निघाले होते. एस.एस. जर्मनीक जहाजणे किनारा सोडून अमेरिकेचा भूप्रदेश दिसेनासा होई पर्यन्त ते बाहेर उभे होते. या अमेरिकेच्या भूमिने आपल्याला काय काय दिले याचा लेखा जोखा मांडत.         

स्वामीजी इंग्लंड ला पोहोचले. इथे एक आनंदाच प्रसंग स्वामीजींनी अनुभवला तो म्हणजे पाच वर्षांनंतर सारदानंद यांची इंग्लंड मध्ये भेट. भारत भ्रमण सुरू होताना ते भेटले त्यानंतर स्वामीजींनिना अमेरिकेतील वास्तव्यात आलेले अनुभव, मिळालेले यश आणि किर्ती हे सारे बघून सारदानंद केव्हढे आनंदी झाले असतील याची कल्पना आपण करू शकतो. स्वामीजींना खूप वर्षानी आपल्या मातृभाषेत बंगालीत बोलायला मिळाले याचाही आनंद होता, पत्रव्यवहार होत असला तरी अनेक गोष्टी आता प्रत्यक्षात एकमेकांशी बोलायला मिळत होत्या त्याचे एक समाधान होते दोघांना. ही भेट झाल्यानंतर स्वामीजींनी आपल्या सर्व गुरु बंधूंना उद्देशून सविस्तर पत्र लिहिले ,त्यात मठातील दैनंदिन व्यवहार कसं असावा, त्याचे नियम काय असावेत, मी भारतात परत आल्यानंतर आपल्याला एक संस्था उभी करायची आहे ती कशी असेल, त्याचे ध्येय काय असेल, ती कशी चालवायची, याचे चिंतन यात होते. ही संस्था म्हणजेच रामकृष्ण मिशन ची तयारी होय.रामकृष्ण मिशन चे काम पुढे कसे वाढले आणि त्याचा प्रसार कसं झाला हे आज आपण रामकृष्ण मठ आणि मिशन चे कार्य बघितले की कळते.

इंग्लंडला जशी सारदा नंदांची भेट झाली तशीच अचानक स्वामीजींचे लहान भाऊ महेंद्रनाथ यांची पण अनपेक्षित भेट झाली, ही बंधुभेट फार फार महत्वाची होती, कारण संन्यास घेतल्यापासून नरेंद्र ने घर सोडले होते ,त्यानंतरची घरातली परिस्थिति, आर्थिक विवंचना, त्यांच्या आईना झालेला अत्यंत क्लेश, आणि आलेले सर्व वाईट अनुभवाचे महेंद्रनाथ दत्त साक्षीदार होते. म्हणून अनेक स्थित्यंतरांनंतर ही दोन भावांची भेट याला महत्व होते.महेंद्र नाथ वकिलीचा अभ्यास करायला इंग्लंडला आले होते. महेंद्र नाथांनी लिहीलेल्या ‘लंडने स्वामी विवेकानंद’या पुस्तकात या बंधुभेटीचा वृत्तान्त लिहिला आहे, महेंद्रनाथ दत्त हे पुढे ग्रंथकार म्हणून ओळखले जाऊ लागले. नरेंद्रचे (स्वामीजींचे) सर्वात धाकटे भाऊ भुपेंद्रनाथ दत्त बंगाल मधील सशत्र क्रांतिकारक चळवळीत सहभागी झाले. युगांतर मासिकाचे ते संपादक होते. अमेरिकेत ते पी एच डी झाले. त्यांनीही अनेक ग्रंथ लिहिले. नंतर ते साम्यवादी विचारांचे खंदे कार्यकर्ते आले, स्वामीजींचे चरित्र पण त्यांनी लिहिले आहे आणि द्रष्टा देशभक्त म्हणून स्वामीजींची प्रतिमा त्यातून त्यांनी उभी केली आहे. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ दत्त यांची तीन मुले एक अन्यासी, एक ग्रंथकार, आणि एक साम्यवादी असे तीन दिशांनी कार्य करणारे कीर्तीवंत पुत्र होऊन गेले.

लंडन मध्ये स्वामीजींनी वर्ग सुरु केला होता. तिथे सीसेम क्लब नुकताच वर्षभरापूर्वी स्थापन झाला होता. बुद्धिजीवी आणि विचारवंत स्त्रिया आणि पुरुष असा दोघांचा हा क्लब होता. शिक्षणाचा सर्वांगीण विचार असा त्याचा उद्देश होता. आठवड्यातून एक दिवस साहित्य विषयक चर्चा होत असे. ठरलेले वक्ते येऊ शकणार नव्हते म्हणून स्वामी विवेकानंद यांना व्याख्यानासाठी अचानक बोलवण्यात आले. तिथे त्यांनी मांडलेले विचार फार महत्वचे होते. ‘शाळेत दिले जाणारे भौतिक विद्येच्या क्षेत्रातील शिक्षण शेवटपर्यंत थेट पोहोचले पाहिजे. कारण स्वामीजींच्या मते समाजातील अज्ञान दूर करण्याची ही पहिली पायरी होती. आणि मानवामध्ये सुप्त असलेले पूर्णत्व प्रकाशात आणणे ही शिक्षणाची फलश्रुति होती. धर्माईतकेच शिक्षणाला महत्व आहे आणि धर्माचा जसा व्यापार होता कामा नये तसाच,  शिक्षणाचा बाजार होता कामा नये,असा स्वामी विवेकानंद यांचा दृष्टीकोण होता. भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धती त्यांना आदर्श वाटत होती.

युरोप मध्ये प्रवास चालू होता, आता टीआर अभेदानंद हे गुरुबंधु पण स्वामिजिना भेटले. मुलर यांच्या कडे विवेकानंद राहत होते तिथे अभेदानंद आलेले पाहताच स्वामीजींना कोण आनंद झाला होता. जूनलाच  स्वामीजींचा भारतात निरोप गेला होता की “कालीला ताबडतोब पाठवून द्या”. एमजी काय स्वामीजी आणि काली पुढचे पंधरा दिवस वेदान्त विचाराच्या प्रसाराचे कार्य आणि फक्त त्याचीच चर्चा, असे आनंदात दिवस गेले. अभेदानंद सर्व वेद ग्रंथ, शतपथ ब्राह्मण, काही सूत्र ग्रंथ, असे अनेक ग्रंथ घेऊन आले होते. ही सर्व पुढच्या कामाची तयारी होती. सार्‍या मानव जातीला एक नवी दिशा द्यायची आहे असे स्वप्न स्वामीजींनी बघितले होते.आता विवेकानंद यांचे परदेशातील वास्तव्य संपत आले होते.इंग्लंड मध्ये अभेदानंद आणि  अमेरिकेत सारदानंद  पुढचे काम बघणार होते. स्वामी विवेकानंद आता आपल्या मातृभूमिकाडे परत येणार होते ते जवळ जवळ साडे तीन वर्षांनंतर, त्यांना निरोप द्यायला सगळे जमले होते. १६ डिसेंबर १८९६ रोजी स्वामीजींनी इंग्लंड चा किनारा सोडला. मातृभूमी त्यांना बोलवत होती. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जसे अन्न तसे मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ जसे अन्न तसे मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

खूप लहानपणी एक म्हण ऐकली होती. माणसाच्या मनातला मार्ग त्याच्या पोटातून जातो याचा अर्थ काहींनी सांगितला होता व तोच अर्थ मनात खोलवर बसला होता.तो असा होता की चांगले खाल्ले की लोक चांगले वागतात, खाणाऱ्याचे मिंधे होतात.आपल्या विषयी त्यांचे मन चांगले होते इत्यादी….

खरे तर हे फारसे पटत नव्हते.कारण ज्या व्यक्तीच्या हातचे छान छान खातात त्यांनाच नावे ठेवताना व त्यांच्या विरुद्ध कारस्थाने करताना बघितले आहे. आणि आपल्या पूर्वजांनी ज्या म्हणी,सुविचार मांडले आहेत त्याचा फार गहन अर्थ असतो.काही वाचन,थोडी समज व अनुभव यातून पुढील निष्कर्ष निघाले.

स्वयंपाक करणाऱ्याचे विचार त्या पदार्थांमध्ये उतरतात.

अन्न, पाणी याला भावना देऊ शकतो.

मग हे प्रयोग घरातच केले. खूप त्रागा, राग राग, चिडचिड करत स्वयंपाक केला. सलग ७ दिवस असे केले. आणि निष्कर्ष समोर आले. घरातील सगळी माणसे उगीचच वाद घालू लागली, भांडू लागली, आरोप प्रत्यारोप करू लागली.मी काहीही न बोलता अन्नाला देण्याच्या भावना बदलल्या व हळूहळू परिस्थिती बदलली.

आपणा सर्वांना काही ना काही चिंता, काळजी, आजार अशा काहीतरी समस्या असतातच. त्याच घेऊन स्वयंपाक केला तर तेच अन्न घरातील खाणार आणि त्या भावनांचे त्यांच्या मनात प्रोग्रॅमिंग होणार व ते शरीर, मन या द्वारे प्रगट होणार. हे आपणच बदलू शकतो.

आपल्याला जसे हवे आहे तसे विचार स्वयंपाक करताना मनात ठेवायचे.उदाहरण म्हणून काही वाक्ये देत आहे.

१) घरात सुख, समाधान, शांतता, समृद्धी, आनंद आहे.

२) सर्वजण एकमेकांशी मैत्री भावनेने वागत आहेत.

३) मी आनंदी आहे. सुखी आहे.

४) घरातील सगळे जण आपापली कर्तव्ये मनापासून व आनंदाने,जबाबदारीने पार पाडत आहेत.

हे जरूर करावे किंवा स्वयंपाक करताना

🪷 कोणताही जप करावा

🪷 एखादे स्तोत्र म्हणावे स्वयंपाक करतांना अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे.

🪷 मन आनंदी ठेवावे.विचार सकारात्मक ठेवावेत.

🪷 उत्तम संगीत किंवा गाणी लावावीत

आपल्याकडे जेवताना श्लोक म्हणण्याची पद्धत सर्वात उत्तम आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाघांची संख्या…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “वाघांची संख्या…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

ते आपल्या आजूबाजूला वर्तमानपत्र, लॅपटॉप, मोबाईल असा सगळा पसारा मांडून बसले होते. स्वतः काढलेली, आपल्यासाठी इतरांकडून (मुद्दाम) काढून घेतलेली, जूनी, नवीन अनेक (फक्त आणि फक्त वाघांची) छायाचित्रे देखील ते परत परत पहात होते. (सारखे सारखे पाहून त्यांच्या मानेला देखील रग लागली होती. म्हणून त्यांनी मानेचा पट्टा परत एकदा नीट केला.) पण त्यांच्या दृष्टीने त्यांच्याकडे (भागात) असलेले वाघ आणि जाहीर झालेली वाघांची संख्या याचा ताळमेळ काही बसत नव्हता. आपल्या मुलाच्या कॅमेऱ्यात काही (आपल्या) वाघांचे फोटो आहेत का? म्हणून त्यांनी मुलाला हाक मारली. पण तो आदि(च) कुठेतरी याच कामासाठी (नेहमीप्रमाणे) गेला होता.

मागच्या काही काळात यांना आकडेवारी गोळा करायची आणि आपणच सांगायची अशी सवय लागली होती. पण आज ते जाहीर झालेली आकडेवारी बघत होते. आकडेवारी नुसार वाघांची संख्या वाढली होती. पण मग हे वाढलेले वाघ नक्की कुठे आहेत? हाच प्रश्न त्यांना पडला होता. हे म्हणजे “बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी” प्रमाणे आपण प्रयत्न करुन देखील वाघांची संख्या आपल्या हद्दीत नाहीच वाघांचे ठाणे (घरोबा) दुसरीकडेच. अशीच परिस्थिती सध्या जाणवत होती.

यासाठी त्यांनी काटेकोरांना देखील कामाला लावले होते. पण कामाला लावण्या अगोदरच एखादे काम अंगावर घेण्याची सध्या त्यांना सवय लागली असल्याने काटेकोर अगोदरच कामाला लागले होते. काहीही करून हे काम वेळेच्या आधी संपवायचे असा त्यांचा विचार होता, त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने ते आपल्या घड्याळात बघत होते. पण काटेकोरांसमोर देखील नाना अडचणी होत्याच. आता मदतीसाठी नक्की कोणाचा हात घ्यावा यावर ते विचार करत होते, पण या समस्येवर  काही प्रकाश पडत नव्हता. त्यांना आकडेवारी लवकर हवी होती, त्यामुळे दूरदृष्टीचे संजय त्यांना सध्यातरी नको होते. काकांना विचारावे असे वाटल्याने त्यांनी काकांना फोन देखील केला. काका म्हणाले अरे वाघांचे काय घेऊन बसला आहेस‌.

दुपारी वाघ गुहेत आराम करत होते तेव्हा यांची (चार) माणसे विनाकारण वणवण फिरत कारण नसतांना वाघ शोधत होते. तेव्हा वाघ सुरक्षित व आपापल्या गुहेतच होते. आणि रात्री दमून भागून यांची माणसे आराम करत होती तेव्हा वाघ गुहेतून बाहेर पडले आणि भक्ष्य शोधण्याच्या नादात ते दुसऱ्या हद्दीत कधी आणि कसे पोहोचले ते लक्षात देखील आले नाही. आणि आता तिथेच त्या वाघांना सुरक्षित वाटत असेल तर ते सुरक्षित असेपर्यंत तिथेच थांबतील, परतणार नाही ना……. वाघ जरी असला तरी तो इतरांसाठी…… त्याला स्वतःला सुरक्षित वाटले पाहिजे की नाही……..

प्रश्न सगळ्या वाघांचा असेल तर एकत्रित दिलेली आकडेवारी जवळपास खरी असेल. पण प्रश्न फक्त आपल्याच भागातील (आपले) वाघ आणि त्यांची संख्या असा प्रश्न असेल तर ते प्रत्येकाने आपले आपणच पाहिलेले जास्त बरे असते. कारण वाघांचे देखील काही प्रश्न असतीलच ना….. नाहीतर तो असा भटकला किंवा भरकटला असता का?

ते उगाचच आपली हद्द सोडून कशाला जातील.‌….. दुसऱ्या हद्दीत जातांना त्यांना देखील भिती असतेच. तु याचा विचार करु नकोस. तुला दुसरे काही काम नसेल तर मी सांगतो काय करायचे ते. असे म्हणत काकांनी फोन ठेवला सुध्दा……..

आता काय? वाघ किती? आणि त्यापैकी आपले किती? यातही लहान वाघ आणि मोठे वाघ यांची खरी संख्या कळण्यासाठी सगळ्यांनाच काही काळ थांबणे भाग आहे. या काळात प्रत्येकजण आपापल्या भागातील वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करेलच…… बाकी वाघ समर्थ आहेच………….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वेळ… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ वेळ… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

“शब्दकळा लावती लळा”

आजचा शब्द आहे = वेळ = 

वेळ एक फ्री हिट

कोणतीही स्पर्धा आपण त्या स्पर्धेसाठी वेळ काढून बघत असतो आणि काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदाच्या फरकाने कोणीतरी विजेता होतो. तेव्हा आपल्यालाही वेळेचे महत्व पटते .पण ती जिंकणार्‍याची जिंकण्याची वेळ असते तीच वेळ हरणार्‍याची हरण्याची वेळ असते. मग लक्षात येते की वेळ एकच असली तरी प्रत्येकाची वेळ वेगळी वेगळी असते.

मग वेळ लावून केलेल्या कामाला वेळ लागला म्हणायचं का वेळेत केले म्हणायचंअसं वेळेच्या बाबतीत वेळोवेळी काहीतरी वेगळेच मनात आले आणि मन वेळे बाबत विचार करू लागले.

वेळ शब्दाचा अर्थ २४ तासातील काही भाग असे म्हणता येईल. पण किती गंमत आहे पहा या वेळेची••••

वेळेच्या आधी क्रियापद लागून त्याची वेळ म्हटले तर अर्थ एक पण तेच क्रियापद नंतर लावले तर अर्थ वेगळा••••

बघा••• भरतीची वेळ,ओहोटीची वेळ,झोपेची वेळ, खायची वेळ, घ्यायची वेळ, द्यायची वेळ पण हेच उलटे केले तर?

वेळ भरली, वेळ ओसरली, वेळ झोपली, वेळ दिली/दिला ,वेळ घेतली/घेतला••••

मग विचार करताना असे लक्षात आले वेळेचा अभ्यास करण्यासाठी वेळ दिला तर डॉक्टरेट तर मिळेलच पण तरी सगळ्या प्रकारचा सगळ्या विषयाचा वेळ , यासाठी वेळच पुरणार नाही.

आपल्या मराठी भाषेत अनेक गमतीशीर शब्द आहेत त्यापैकी सगळ्यात मजेदार शब्द मला वेळ वाटतो.

कारण तुम्ही जसे फिराल तसा वेळ फिरत राहील तुम्हाला फिरवत ठेवील आणि तुम्ही त्याला शेकडो क्रियापदे जोडू शकता असा सर्वव्यापी सर्वसमावेशक असा शब्द आहे वेळ.

या वेळेला कितीही क्रियापदे लावून वाक्प्रचार केले ना तरी सगळे वाक्प्रचार वापरले असे म्हणताच येणार नाही. थोडे शब्द फिरवून त्या वेळेची छटा बदलता येऊ शकते.

वेळ••••• असते,नसते,पळते,पाळते,देते,घेते,येत,जाते,बघते,ओळखते,बदलते,घालवते,टळते,गाजवते,रेंगाळते,झोपते,साधते,बाधते काहीही करू शकते.

वेळ••••

पहाटेची, झुंजुमुंजूची, सकाळची, मध्यान्हाची, दुपारची, संध्याकाळची, रात्रीची, एकांताची, कातरवेळ, झांझरवेळ, साजणवेळा, धुंदवेळ, वाईट वेळ, चांगली वेळ, शिळोप्याची वेळ, अंतिमवेळ किंवा•••

उठायची, बसायची, नाष्त्याची, चहाची, विधी करण्याची, जेवायची, फिरायची, विश्रांतीची ऑफिसला जायची, झोपायची अशी कोणतीही असू शकते.

वेळापूरच्या वृद्धाश्रमात रहायची वेळ आलेले  वेळापुरे आजी आजोबा बोलत होते, आपले लग्न वेळेवर झाले म्हणून लेकरं बाळं वेळेत झाली. तेव्हा वेळेची तमा न बाळगता काम केले. वेळात वेळ काढून मजा केली वेळेवर उठण्यापासून ते वेळेवर झोपण्यापर्यंत वेळेचे वेळापत्रक आखून वेळेचे नियोजन केले. म्हणूनच वेळेचे गणित बसून आपण सगळीकडे वेळेवर हजर होत होतो. वेळेची चालढकल केलेली तुम्हाला चालायचीच नाही.वेळेचे पक्के होतात. तुमच्या हुषारीने कामाने तुम्ही कितीतरी वेळा ऑफिसची वेळ गाजवली होती.

आजोबा पण म्हटले हो ना तू पण  मी रागवायची वेळ येऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करून वेळेचे भान ठेवत माझी एकही वेळ चुकवू द्यायची नाहीस. वेळ महत्वाची असते आणि वेळेचे महत्व तुला होते त्यामुळे सगळे सहज सोपे वाटत होते.

वेळ वाया न घालवता तू सतत कामात वेळ घालवायचीस.खूप कष्टातही हसून तू म्हणायचीस अहो वेळ सांगून येत नसते. ही पण वेळ निघून जाईलच आणि वेळ बदलून चांगली वेळ येईल. या तुझ्या सकारात्मकतेने संसाराचा वेळ कापरासारखा उडून गेला.

खरचं वेळीच मुलांना शिक्षण दिले वेळेची कदर करीत मुलांनाही वेळेचा वेळेवर तुकडा पाडायचे भान दिले. वेळेचा अपव्यय न करता वेळेचा सदुपयोग करायला शिकवले. त्यामुळे आपल्या सुखी संसाराची वेळ जमून आली होती.

तसेच वेळ आल्यावर बघू अशा बेफिकिर वृत्तीत न रहाता वेळेची मर्यादा पाळून वेळकाढूपणा न करता वेळ कोणासाठी थांबत नसते हे जाणून वेळेनुसार दिलेली वेळ पाळत वेळेच्या बंधनात राहून  एकमेकांना सांभाळलं म्हणून या साथीत ५० वर्षाचा वेळ कसा गेला हे कळलच नाही.

वेळ वखत पाहून वागलं म्हणजे वेळ गेल्यावर हळहळावे नाही लागत. पण बाई वैर्‍यावर पण अशी वेळ येऊ नये. पण वेळ सांगून येत नाही.

अगदी खरे आहे हो. आता बघा ना एवढा वेळ मेहेरबान असताना आपल्यावर अशी वृद्धाश्रमात रहायची वेळ येईल असे वाटले तरी होते का?

आपली दोन्ही पोरं मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत म्हणून आपण भारावलो होतो. अचानक थोरल्याच्या मनात फॉरेनला जायचं खूळ आलं. नुकतीच तुमची रिटायरमेंट झाली होती. सुदैवाने मुबलक पैसा हाती होता. पण थोरल्याला लगेच फॉरेनला जायचे होते म्हणून त्याने वेळ साधून पैशाची मागणी केली. वेळ न दवडता त्याला मदत करणे वेळेत जमवायला पाहिजे होते. म्हणून वेळोवेळी केलेली गुंतवणूक , मिळालेले पैसे हे सगळे वेळेचा अभाव असल्याने हातची संधी जाउ नये वेळ गेला असे होउ नये म्हणून मी वेळीच घातलेल्या लगामाकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्याला दिली.

ते बघून धाकट्याला झोंबलं. त्यानेही तोच मार्ग धरला आणि यावेळी थोडी वेळ निराळी आहे कारण वेगळ आहे पण पैशाची नड असल्याने तुम्ही दादाला दिले तर मलाही पाहिजेत म्हणून हट्टच धरला. त्याने वेळ पाहून खेळ मांडलेला मला कळत होतं . मी काही कारणे सांगून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण त्यावेळी तुम्ही वेळ वखत पाहून नाही वागला. थोरल्याला दिले म्हणून राहिलेले धाकल्याला देऊन मोकळे झालात.  तुम्ही वेळ बदलेल या विश्वासाने यावेळी आपण मदत केली तर पुढच्यावेळी ते आपली मदत करतील या भ्रमात होता. 

ते किती चुकीचे होते हे उशीरा कळले पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. आपले होणारे हाल पाहून एका सद्गृहस्थाने आपल्याला या वृद्धाश्रमात आणले आणि आपल्याला डोक्याला हात लावून बसायची वेळ आली.

आजोबा म्हटले खरं आहे तुझं. वेळेमुळे कशाचे काय होईल काही सांगता येत नाही.  पण अजूनही वेळ गेलेली नाही. आता तर आपल्याकडे वेळच वेळ आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून आपण रिटायर्ड होणार्‍यांना सतर्क करण्याचे काम करू. त्यामुळे आपला वेळही सत्कारणी लागेल शिवाय कालची वेळ आज नसते हे शहाणपण आपणही घेऊन याच वृद्धाश्रमातील गरजूंची आपण मदत करूया. आता तर फक्त आपल्या दोघांसाठीच आपण जगणार असल्याने एकमेकांना भरपूर वेळ देऊ या. वेळ न वखत बसली खोकत अशी गत करून तेच तेच दु:ख उगाळत बसू नको. चल दोघांनी मिळून नवी सुरूवात करू. मागच्या वेळेची अनुभूती नकोच . वेळेचे गुलाम होणेही नको. आपण आपल्या वेळेनुसार वेळेला आपल्यापुढे वाकायला शिकवू. शेवटी वेळच आपला गुरू असल्याने त्याची विद्या त्यालाच देऊ. आणि हो , आता परत उदास सूर लावण्याची वेळ नको म्हणून वेळेची एक गंमत सांगतो.

तुला सांगतो हा वेळ आहे ना एक जादूगार आहे. केव्हा काय कोणत्याक्षणी बदलेल हे सांगता येत नाही.

आता हेच बघ ना पूर्वी क्रिकेट ५- ५ दिवस टेस्ट मॅचेस मधे खेळायचे. तेवढा वेळ बघणार्‍याकडे असायचा. मग नंतर ३ दिवसीय मॅचवर आला कारण लोकांचा वेळ कमी झाला. तो वेळ अजून कमी झाला आणि वन डे मॅच आली. आता २०-२० म्हणजे फक्त काही तासच.

पण मजा तेवढीच उत्सुकता तेवढीच आणि कौतूकही तेवढेच. वेळ कमी आहे म्हणून माणसाने आपली करमणूक नाही कमी केली.

अगं आता आपल्या जीवनातील ५० गेली अन ५ राहिली अशी गत असताना चल आपण वेळेशीच २०- २० खेळू.

आमच्यावेळी ५ दिवसाची होती तरी आमच्यावेळीच २०-२० पण आहे. यावेळी आपण जरा वेगळी मजा घेऊ.  वेळेचे चेंडू वेळेवर फ़टकावू, वेळेवर अडवू, वेळेवर झेलू . वेळेवर विकेट जाणारच आहे हे ध्यानात ठेऊन प्रत्येक वेळी मागच्या वेळपेक्षा वेगळ्या खेळाचे प्रदर्शन करू. वेळेला केळ आणि न्याहारीला सिताफळ खात

कोणत्याही वेळी टपकणारा वेळेचा चेंडू अवेळी विकेट न जाऊ देता चौकार षट्कार यांनी टोलवत राहू. वेळ बदलून क्षेत्ररक्षण करायचे तेव्हा दरवेळी चेंडू न आडवता फलंदाजालाच खेळते ठेऊ. वाटले तर तेथे थोडा वेळखाऊपणा पण करू. आपले मस्त वेळ घालवणे पाहून वेळेला रेंगाळायला लावू. आपल्याकडे थोडा वेळ आहे पण मॅच जिंकायचीच आहे म्हणून वेळेचे भान ठेवत ही वेळ पुन्हा येणार नाही म्हणून एक उनाडवेळ पुन्हा जगू या. वेळेचे भान हरपून आपण वेळेला चकवू या. वाढवेळ खेळात नसतो कधीतरी वेळ संपल्याचे वेळ सांगेलच पण त्यावेळी वेळेलाच नो बॉल म्हणून परत बॉल टाकायला लावू आणि मग त्या वेळेच्या चेंडूला फ्री हिट समजून सीमापार करू आणि नॉट आऊट राहून सामना जिंकू.

खरच वेळ एक फ्री हिट आहे त्याचा लाभ घेऊ.

हे पचवायला जरा वेळ लागेल पण वेळ बदलणे वेळेच्या हातात नाही तर तुमच्या हातात आहे हे पटवून देऊ. चल आपण वेळीच हा पायंडा पाडू.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विज्ञान—एक जादूई शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ विज्ञान—एक जादूई शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

!! शब्दजाणीव !!

मानवी जीवनाची कूस बदलवून टाकणारा तो शब्द…अवघ्या चारपाचशे वर्षात पृथ्वीच्या रंगमंचावर दाखल झाला आणि बघता बघता संपूर्ण मानवी आयुष्य व्यापून टाकले. तो शब्द केवळ शब्द नसून मानवी जीवनाची गुरुकिल्ली म्हणावी इतपत तो महत्त्वाचा बनला आहे. त्या शब्दाचे फायदे अगणित आहेत आणि काही तोटे देखील आहेत. हा शब्द मानवी जीवनात तंत्रज्ञान म्हणून सत्ता गाजवतो मात्र या शब्दाला मानवी जीवनात जेव्हा ” मुल्यात्मक ” वजन प्राप्त होईल तेव्हा मानवी जीवनाचा संपूर्ण हितवर्धक कायापालट होईल याची नक्कीच खात्री देता येते. संपूर्ण जगाला खेडे बनवण्याची किमया याच शब्दाच्या प्रभावाने घडवून आणली आणि दुसऱ्या टोकावर संपूर्ण जगाचा विनाश करण्याची ताकद देखील याच शब्दाच्या विकृत वापराने मनुष्याच्या वाट्याला आली आहे.हा शब्द आणि त्याच्या योग्य जाणीवा समजून घेऊन मानवी जीवन फुलवले पाहिजे.

विज्ञान… एक जादुई शब्द आहे. जादुई याकरिता म्हटले की, जादूची कांडी फिरवल्याचा जो परिणाम कल्पनेत दिसून येतो त्याहून अधिक जादुई परिणाम या शब्दाच्या वापराने मानवी सृष्टीत झाला आहे. अवघ्या चारपाचशे वर्षापूर्वी विज्ञान सर्वार्थाने मानवी नजरेत भरले आणि जगाचे स्वरूप आरपार बदलले. मनुष्याच्या प्रगतीच्या वाटा विज्ञानानेच मोकळ्या केल्या आणि आकाशाला गवसणी घालण्याची कल्पना जवळपास प्रत्यक्षात आणून दाखवली. तंत्रज्ञान ही विज्ञानरुपी नाण्याची एक बाजू आहे. या बाजूने आता मानवी जीवनाचा कोपरा न् कोपरा व्यापलेला आहे. मनुष्याने या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाचा अतोनात फायदा उपटला आहे. याचबरोबर या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाची घातक बाजू म्हणून अण्वस्त्ररुपी विनाशकी हत्यारे निर्माण झाली आणि पृथ्वी विनाशाच्या टोकावर उभी राहीली हे देखील काळे सत्य आहे. विज्ञानाची सृष्टी जेवढी मोहक आहे, उपयोगी आहे त्यापेक्षा अधिक सुंदर व बहुपयोगी आहे विज्ञानाची दृष्टी. ही दृष्टी मानवी वर्तनात व्यवहारात आली की… अंधश्रध्दा, कर्मकांडे, धर्मांधता, जातीयता, भयता, प्रांतीयता, वंशवादता, अलैंगिकता अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. विज्ञानाची दृष्टी म्हणजे विज्ञानाला ” मुल्यात्मक जाणीवेने ” मानवी जीवनात प्रतिष्ठीत करणे. विज्ञानाची नेमकी जाणीव म्हणजे विज्ञान तुमच्या मनांत असंख्य प्रश्न उभे करते आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा मार्ग देखील ” वैज्ञानिक दृष्टिकोन ” ठेवून मिळवता येतो ही सकारात्मक विधायक भावना रुजवते. विज्ञानाची नेमकी जाणीव हीच की, मनुष्याचे पृथ्वीवरील क्षुद्रत्व समोर ठेवते आणि पुन्हा मनुष्याच्या बुध्दीला उत्तेजना देऊन त्याचे प्राणी सृष्टीहूनचे अधिकचे महत्त्व ठळकपणे समोर आणते. विज्ञानाची जाणीव म्हणजे जादूची कांडी फिरवायला देखील योग्य ध्यास व ध्येय असावे ही भावना प्रबळ करून मनुष्यच पृथ्वी जगवू शकतो असा ठाम आत्मविश्वास मानवी मनांत निर्माण करते. विज्ञानाची ठळक जाणीव म्हणजे जोवर विज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे तोवरच माणसाला शक्तीशाली बनण्याची संधी आहे, आव्हान आहे आणि त्याचबरोबर समस्त सृष्टीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असल्याचे भानं देखील उपलब्ध आहे. विज्ञान हा शब्द वगळून मानवी जीवनाचा भूतकाळ नाही…वर्तमानकाळ नाही…अन् भविष्यकाळ अजिबात नाही.

विज्ञानाचा नैतिक दबदबा इतका की, धर्म नावाच्या संघटीत क्षेत्राला बाजूला करण्याची हिंमत बाळगून आहे. धर्माला योग्य पर्याय म्हणून विज्ञानवादी असणे ही एक वैचारिक भुमिका मांडली जात आहे. विज्ञानाएवढा ताकदीचा आणि संपूर्ण मानवी समाज व्यापणारा दुसरा शब्दच उपलब्ध नाही. विज्ञानाची ही किमया अफाट आहे, जादूई आहे, प्रगतीशील आहे. फक्त जाणीव हीच राखली पाहिजे की, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच विज्ञानाची दृष्टी मानवी समाजात अधिक फैलावली पाहिजे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares