मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी अंकांची न्यारी सफर ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ दिवाळी अंकांची न्यारी सफर ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

दिवाळी अंकांची न्यारी सफर

“टाटा टाटांच्या टाटानगरीत

किमया करती हजार हात

लोखंडाची बघा कोंबडी

घालितसे सोन्याची अंडी “

ही चारोळी आहे  एका  बालदिवाळी अंकातली. गळ्याशप्पथ !! अभिनव पध्दतीनं चारोळ्यांचा वापर मुळाक्षरांची ओळख लहान मुलांना करुन देण्यासाठी मराठी दिवाळी अंकात केला गेला. आहे ना मजेशीर माहिती ! आनंद,छावा,छात्रप्रबोधन अशा  अंकांनी बालविश्व समृद्ध केलं दिवाळी आली की माझं मन पुस्तकांच्या दुनियेत जातं. दिवाळी अंकांच्या सफरीवर जातं

माझ्यातला वाचक, चातकपक्षी जसा पावसाची वाट बघतो, तसा दिवाळीआधी पासूनच दिवाळी अंकांची वाट बघत असतो. रंगीबेरंगी मुखपृष्ठांची प्रावरणे ल्यायलेले ते दिवाळी अंक पुस्तकांच्या स्टॉलवर असे काही मांडून ठेवले जातात की कपड्यांच्या भव्य शोरुम्सही लाजतील. पणत्या, आकाशदिवे यांच्याही आधीपासून दिवाळी अंक दिवाळीची चाहूल देत असतात. माझ्या पहिल्या बालवाचनाचा सवंगडी होता चांदोबा….  विक्रम वेताळ मधील वेताळ माझा सल्लागार होता. सावकाराचा लबाडपणा, राजाराणी, इसापनीतीमधील  नायक , गुलामांच्या कथा, यांनी बालवयातच एक मनोधारणा निर्माण केली. अजूनही स्मरणात आहेत  ती त्यातील चित्रं. दाट जंगल, दिमाखदार राजवाडे, पुष्करिणी (या शब्दाचा नेमका अर्थ कळण्यासाठी चांदोबा मासिक वाचायलाच हव.), लांब, जाडजूड शेपटा घातलेल्या मुख्य कथा नायिका, सावकाराच्या चेहर्‍यावरील हावरा भाव, अगतिक, फसलेला मित्र, लांडगे, कोल्हे असे प्राणी अशी कितीतरी चित्रं मन:पटलावर कोरली गेली आहेत.

किशोर मासिकानंही माझं किशोर वय अलगदसं त्याच्या पानापनातून सांभाळलं. कविता, कथा, कोडी, विज्ञानाची अभूतपूर्व दुनिया, शब्दकोडी, घरबसल्या करता येतील असे अनेक उपक्रम…. पानोपानी उलगडत जाणारं हे अक्षरधन म्हणजे हिरे माणकांपेक्षाही अनमोल खजिनाच जणू. त्यातील गोष्टी, त्यांचा आशय, तो वास, कागदाचा  तो गुळगुळीत स्पर्श, आणि त्या मासिकाचं डौलदार रुप मनात कसं घर करुन बसलयं. या अक्षरमोत्यांनी नकळत आम्हांला संस्कारक्षम केलं.

वय वाढत गेलं, शहाणं समजुतदार होत गेलं … खेळातून, उनाडक्या करण्यातून बाहेर  आलं.. पण.. वाचनात मात्र रमलेलच राहिलं.. याचं श्रेयही या नटून  थटून येणाऱ्या दिवाळी अंकानाच द्यायला हवं, हो ना? खमंग चकली खावी तशी या अंकांची चव मनाला खमंग, खुमासदार बनवायची. अलगद जिभेवर विरघळणारा सुग्रास लाडू जसा रसना तृप्त करुन बळ ही देतो तसे हे अंक वाचकांची मनं सुदृढ करत असत. कुरकुरीत पोहे, खरपूस खोबरं, तळलेले दाणे, डाळे, काजू यांनी नटलेल्या चिवड्यासारख मनातील भावना  देखील नटून चुरचुरीत होत असत. शंकरपाळीचा खुसखुशीतपणा जास्त चांगला की तिच्यामुळं तोंडभर पसरलेली  माधुरी जास्त अवीट असा प्रश्न पडतो ना? (ऊत्तरही या प्रश्नातच दडलय ना?) तसाच अगदी तसाच बुध्दीला, मनाला, डोळयांना या दिवाळी अंकांनी पौष्टिक  खुराक दिला आहे.

कधी यातल्या कवितांनी भावनांच्या सतारींची तार छेडली तर कधी व्यंगचित्रांनी गालावर हलकेच स्मितरेषा उमटवली. कधीकधी तर एकमेकांना टाळ्या देऊन अख्खं कुटुंब मोठ्या हास्यलाटेवर स्वार होत असे. (जत्रा, आवाज) वहिनी, गृहलक्ष्मी, स्त्री, मानिनी या अंकांनी अवघ्या स्त्री जातीवर अधिराज्य गाजवलं. त्यांचं हळवं, नाजूक भावविश्व तरल बनवलं. त्यातील काही विचारांनी त्या सजग, प्रगल्भ, कणखर, स्वावलंबी झाल्या. आत्मभान जागृत करण्यांतही हे दिवाळी अंक सहभागी आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

थोडासा प्रौढ, बुध्दीजीवी वाचक वर्ग किर्लोस्कर, अक्षर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, ललीत, यांची वाट बघे. सामना, साधना केसरी, मनोहर सारख्या मासिकांना त्यांचा त्यांचा खास वाचकवर्ग असे. निदान दोन चार दिवाळी अंक घरात आल्याशिवाय सण साजरा होतच नसे.

मराठीतील पहिला दिवाळी अंक कै. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९ साली संपादित केला.अनेक साहित्यिक निर्माण केले. तेंव्हापासून आजपर्यंत अक्षरसाहित्यानं समाजप्रबोधनाचा हाती घेतलेला वसा आजतागायत सुरु आहे.

साहस, महत्त्वाकांक्षा, स्वावलंबन या बरोबरच समाजाच वैचारिक परिवर्तन करुन सांस्कृतिक  जडणघडण  रुंदावून, सामाजिक आणि औद्योगिक सुधारणा घडविण्यात या मासिकांचा महत्त्वपूर्ण  सहभाग आहे. याच अंकांनी वाड्.मय कला विषयीची अभिरुची निर्माण केली आणि तिला एक उंची दिली. अजूनही दर्जेदार दिवाळीअंकात लिहिण्याचं आमंत्रण मिळणं हा लेखकांच्या अभिमानाचा विषय आहे. केवळ याचमुळं साहित्यकृती मार्फत होत असणार्‍या या दिवाळी अंकांच्या गाथेनं महाराष्ट्राचा सांस्कृतिक विकास कसा केला हे सांगणारी ही दोन उदाहरणं देण्याचा मोह मला टाळता येत नाहीय.

१९०९ सालच्या दिवाळी अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी मोदकावर एक कविता लिहिलि होती. ती वाचून एका स्त्रीने त्यांना कवितेतूनच प्रश्न  विचारला होता ….

“मोदक बहु गोड असे, आकारही सुबक साधला असे.

तव भार्त्याचे ह्याला साह्य नसे का, कथी मला ताई?”

या प्रश्नाच्या उत्तरासाठी १९१० च्या अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी पति-पत्नी ही कविता  लिहिली. आईकडून मुलीला मिळणार्‍या शिकवणुकीपासून संसारात रमलेल्या स्त्री पर्यंतचे वर्णन या कवितेत दिसत. तत्कालीन पतिपत्नींच्या संबंधांचं स्वरुपही त्यातून लक्षात येतं.

“लग्न नव्हे ते प्रेम केले, एकीकरण जीवांचे

त्या ऐक्याचे वर्णन करणे शक्य न आपुल्या वाचे

असे न जेथे संसाराचा केवळ तेथे शीण

पत्नी वाचून पती पांगळा, ती ही तशी पतिवीण”

असा समजावणीचा सूरही त्यातून  उमटतो.

संपादक रॉय किणीकर यांनी ‘चिमुकली दिवाळी’ नावाचा दिवाळी अंक लहान मुलांसाठी काढला होता. या अंकाचं मुखपृष्ठ जणू एक स्लेटपाटीच होती! त्यावर पेन्सिलनं लिहिता येऊ शकत होतं!! बालमनाचा विचार करुन त्यांना वाचनसंस्कृतीत सामील करुन घेण्याचं हे एक कौशल्यच आहे ना?

भाषा आणि संस्कृती एकमेकींच्या हातात हात घालून वाटचाल करतात. संस्कृतीच्या खुणा आणि प्रतिक म्हणून जुनं जपणं, वृध्दिंगत करणं हे आपलं कर्तव्य आहे. शतकाहून अधिक काळ दिवाळी अंक हे काम चोखपणानं करत आहेत. चारशेहून अधिक  दिवाळी अंक मराठीची पालखी खांद्यावर मिरवत आहेत. मराठीचा मराठमोळा बाणा, शहरी औपचारिकता, ग्रामीण तोरा, भाषेची नजाकत, यांच्या दिंड्या पताका उभारून मराठी मनाची मशागत करत आहेत.

नवीन अंकांचं कात टाकून समोर आलेलं डिजिटल  आधुनिक रुप तर जगभर पसरलेल्या मराठी मनातील काळ्या मायमातीची ओढ लावायला समर्थ आहे. हे ‘ई’ रुप हळवे मराठी भावबंध साखळदंडासारखे मजबूत  बनवतील आणि मराठीचा डंका सातासमुद्रापार निनादत ठेवतील यात शंका नाही.

असे हे दिवाळी अंक, त्यांच्या नाना कळा (कला), नाना गुण!

हे नसतील तर. . . . .

गत:प्रभ झणी होतील ना मनअंगणे

तेजलुप्त ते होतील ना शब्दचांदणे

असं म्हणावसं वाटतं.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सादर करतो कला गजमुखा ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ सादर करतो कला गजमुखा ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आज ब-याच दिवसांनी लिहायचा योग आलाय. बेलवडीतील तुकोबांच्या पालखीच गोल रिंगण लाईव्ह पाहता पाहता विषय ही जरा वेगळा सुचलाय.

आपल्याकडचे भक्ती संगीताची (मराठी) मोठी परंपरा आहे. यातही ‘विठ्ठलाची भक्ती गीते’ ही  साधारण पणे सर्वाना माहीत असतात, आणि जास्त प्रसिध्दही असतात. आळंदी , देहू वरून पालख्या निघाल्या अन जसजशी आषाढी एकादशी जवळ येऊ लागते तसतसं  वातावरण एकदम भक्तीमय होऊन जाते. आजकालची न्यूज चॅनेलही वारीचा वृतांत दाखवताना मागे एखाद भक्ती गीत लावतात. हे सगळं सांगायचे  कारण म्हणजे   नुकतेच मला   माझे   सगळ्यात  आवडते गाणे / भक्ती गीत ‘इंद्रायणी काठी’ ऐकायला मिळाले. पंडित भीमसेन जोशींनी गायलेले हे गाणे केंव्हाही ऐकले की मला ब्रह्मानंदी टाळी वाजल्याचा आनंद मिळतो. ‘गुळाचा गणपती’ या सिनेमात पु. लं. नी ही हे गाणं अतिशय सुरेख  घेतले आहे.

मंडळी  या गाण्याबद्दल आणखी एक विशेष अशी माझी आठवण आहे.  पूर्वीच्या काळी कलाकार मंडळी उदा गायक, वादक आपली कला हे देवासमोर सादर कारायचे. देवळात जाऊन कुठलीही बिदागी/ मानधन न घेता आपली कला सादर करण्यामागे कृतज्ञताा व्यक्त करणे हा हेतू होता. एखाद्या कलेत प्राविण्य मिळाल्यावर  देवाचा आशिर्वाद घेऊन  पुढे जायचे ही भावना त्यामागे असायची.

पण आजकाल  sms सारख्या माध्यमातून मतांची भीक मागून सेलिब्रीटी बनलेल्या आणि अशाप्रकारे ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या’ कलाकारांना ही माहितीतरी आहे का? असं वाटण्या इतपत परिस्थिती सध्याआहे. गणेशोत्सव मंडळ, महोत्सव, अॅवार्ड कार्यक्रमातील लाखाची बिदागी घेणारे कुठे आणी एकेकाळी देवासमोर कुठलेही मानधन न घेता ‘कला’ सादर करणारे कुठे?

अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असे कलाकार आता शिल्लक असतील असे खेदाने म्हणावेसे वाटते.

एकदा सांगलीत मी  गणपतीच्या मंदिरात गेलो असतानाचा एक प्रसंग यानिमित्ताने सांगावासा वाटतो. १५-२० वर्षे झाली असतील या घटनेला. वेळ साधारण ११ची. मंदिरात काहीच गर्दी नव्हती. दर्शन घेऊन, प्रदक्षिणा मारुन सभामंडपात बसे पर्यत एक गायक आपली पेटी काढून सूर लावण्यात मग्न होते. बरोबर साथीला एक तब्ब्लजी होते. ते ही हातोड्याने तबला, डग्गा सेट करण्यात मग्न. मग मी जरा थांबलो. विचार केला. एखादं गाणं तरी ऐकून जाऊ. थोड्यावेळानी त्यांनी जे गाणं ‘गणपती समोर सादर केलं ते  गाणं होत ‘इंद्रायणी काठी’ शब्द कमी पडतील तो अनुभव सांगण्यासाठी. एखाद गाणं ऐकून अंगावर रोमांच उभे राहणे म्हणजे काय हे त्यावेळी मी अनुभवले. मूळ २-३ मिनीटाचे असलेले हे गाणे बुवांनी  वेगवेगळे आलाप वगैरे घेऊन चागलं १० मिनिट  रंगवल. काही खास जागा घेताना तब्ब्लजी कडे पाहून   आणि त्यानंतर तब्ब्लजीकडून ही योग्य अभिप्राय मिळताच पुढे जात जात हा १० मिनिटाचा सोहळा असा काही रंगला की बस.  गाणं संपलं. आता पुढचं गाणं ऐकून मगच निघायचे अशी मनाची तयारी झाली  होती पण क्षणार्धात पेटी, तबला डग्गा गुंडाळून दोघेही मार्गस्थ झाले. पण ते गाणे मात्र माझ्या मनात कायमचे घर करुन गेले. जेंव्हा जेंव्हा हे गाणं ऐकतो तेंव्हा नकळत मी सांगलीच्या गणपती मंदिरात पोचलेलो असतो.

मंडळी आपण ही असे अनेक कलाकार देवळात आपली कला सादर करताना पाहिले असतीलच छान वाटतं ना असं काही पाहिलं की!

आपल्या पैकी आज अनेकजण वेगवेगळ्या कलेत निपुण आहेत. यानिमित्याने कलाकार मंडळींना अशी विनंती करावीशी वाटते की तुम्ही कलाकार म्हणून खूप मोठे व्हा पण मोठे झाल्यावर या कलेच्या अधिपती जो गणपती आहे (६४ कलांचा अधिपती) त्याचा विसर न करता जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्ह्या विनामोबदला आपली कला शक्यतो गणपतीच्या देवळात, गणेशा चरणी (किंवा इतर कुठल्याही देवळात) अर्पण करा आणि त्याचा आशीर्वाद घेऊन पुढे चला.

पाश्च्यात्य विचार सरणीत यालाच Grattitude व्यक्त करणे असं काही तरी म्हणतात

मंडळी मी तर टुकार लेखक पडलो. लेखनाचे मानधन मिळणे वगैरे या गोष्टी तर केव्हाच इतिहासजमा झाल्यात. तरीपण  जे काही थोडेबहुत लिहायला सुचले ते गणेश कृपेनेच.

‘सादर करतो कला गजमुखा’ या न्यायाने हे लेखन आज त्याच्याच चरणी आणी बुध्दीचा कारक ग्रह ‘बुध’ यालाही अर्पण करुन सध्या इथंच थांबतोय.

सादर करतो कला गजमुखा

रिध्दी सिद्धीच्या वरा

शुभारंभीया करितो तुजला

वंदन हे गजवरा

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिबिंब ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ प्रतिबिंब  ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

चिमण्या घरातल्या आरशावर येऊन टोची मारत बसतात. हा बिलोरी आरसा त्यांना आकर्षित करतो खरा, पण ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’असं काहीसं होऊन जातं. स्वतःच्याच प्रतिबिंबाची त्यांच द्वंद्व सुरू असतं.

त्या दिवशी दुपारी अशीच एक चिमणी पंख फडफडत आली आणि आरशावर बसून टोच्या मारू लागली. तो टकटक आवाज ऐकून माझीही झोप चाळवली गेली.आरशावर टोची मारायचं चिमणीचं प्रयोजन ती थोडीच मला कानात सांगणार होती?….भुरकन गेली देखील उडून ती…..

विचारांचा भुंगा माझ्या भोवती भुण भुण करू लागला. लहानपणी गोष्टीत वाचलेला सिंह आठवला. स्वतःचे प्रतिबिंब विहिरीत पाहून विहिरीत उडी मारणारा..

चिमणीला आरशातले प्रतिबिंब म्हणजे दुसरी चिमणीच आहे असं वाटत असेल का ? म्हणूनच तर ती तिच्याशी भांडत असेल का ?नाही! नाही! गरीब बिचारी… ती कशाला भांडेल ? मग गप्पाच मारत असेल का तिच्याबरोबर?

माझं मन माझ्या प्रश्नांना अनुत्तरीत झालं.

माझं त्या चिमणीशी मूक संभाषण सुरू झालं “अगं वेडाबाई, आभासी आहे गं सगळं !तू जर तिच्याबरोबर भांडत असशील तर ते तुझंभांडण स्वतःशीच आहे आणि जर गप्पा मारत असशील तर स्वतःशीच किती वेळ बोलणार?त्यापेक्षा माझ्याशी बोल ना!! इटुकली धिटुकली तू मला खरच खूप आवडतेस गं! असं म्हणून मी उठले तर ती भुरकन उडून गेली. ती पुन्हा परत यायची मी वाट बघू लागले. मनातलं सगळं बोलणार होते मी तिच्याशी…..

बऱ्याच वेळाने ती परत आली.’आता नाही हं तुझ्या जवळ येत मी !आवडत नाही ना मी तुला ?ठीक आहे.तू आपली तुझ्या मैत्रिणीशी बोल किंवा भांड… मला काय करायचे ?तुला माझी कदरच नाही. माझ्या मनांतल ऐकून घेशील तर शपथ!नुसतं टोच्या मारत बसली आहेस….

अग चिऊ, तू माझ्या बाळाची अगदी जिवाभावाची…..माझं बाळ लहान होतं तेव्हा अंगणात पोत्यावर त्याला बसवलं की लगेच तुम्हा मैत्रिणींचा घोळका चिवचिवाट करत येत असे. फेर धरून तुम्ही सगळ्या माझ्या बाळाच्या भोवती रिंगण करून नाचायचात आणि माझं बाळ बसल्याजागी उड्या मारायचं….. तुम्हाला ते मुठी मुठी भरून जोंधळ्याचे दाणे भिरकवायचं.तासनतास त्याला तुम्ही खेळवायचात तुला मी कशी विसरू?

माझ्या बाळाला तुझीच गोष्ट सांगून मी झोपवत असे. तुझी गोष्ट ऐकता ऐकता माझ्या बाळाच्या डोळ्यात नाजूक पावलांनी झोप यायची आणि माझं बाळ गुढुद झोपायचं. तू तुझं घर माझ्या घराच्या वळचणीला बांधलंस कारण माझ्या बाळाची अन तुझी गट्टी !काऊचं घर मात्र माझ्या बाळानं उन्हात बांधलं हं! माझ्या बाळाला तू घाबरत नव्हतीस पण माझ्यापासून का इतकी दूर पळतेस? एक नाही अन् दोन नाही.तिच्या टोच्या मारणं चालू होतं.

इतक्यात सोनाली आली आणि तिला म्हणाली, “आलीस वाटतं तू ?जरा चुकून पडदा सरकवायचा राहिला की हिचं आपलं टुकटुक टुकटुक सुरुच!आई, इथून हिला हुसकलं की ही शेजारच्या काकूंच्या कपाटाच्या आरशावर जाऊन बसते.

आई,आपल्यालाच फक्त आरशातलं प्रतिबिंब समजतं का गं? या पक्षी आणि प्राण्यांना का समजत नसेल?” तिच्या या प्रश्नावर मी विचार करू लागले.

शेजारच्या घरातल्या आरशावर गेल्यावर या चिमणीच्या मनांत पुन्हा तीच चिमणी इथे कशी आली हा प्रश्‍न येत नसेल का ?आरसा बदलला तरी प्रतिबिंब बदलत नाही हे हिला कसे कळावे ?दिसेल तिच्याशी भांडायचं वृत्ती असलेल्या या चिमणीला आरशातल्या चिमणीचा इतका राग का बरं येत असेल? दुसरी चिमणी म्हणून तर इतका राग राग करत नसेल ना ती?

माझ्या मनांत असाही विचार आला की जर आरशातले प्रतिबिंब म्हणजे आपणच आहोत हे तिला समजलं तर आपण आपलाच किती राग राग केला ह्याच तिला वाईट वाटेल का ?…

आताशा मी आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहते. चेहराच नव्हे तर मनही दिसतं का? हे शोधण्याचा प्रयत्न करते.आरशातील प्रतिबिंबकडे पाहते तेव्हा माझा चेहरा माझ्याशी बोलतो. तो माझ्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे तो माझ्या मनाचा देखील आरसा आहे. त्यामुळे प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर दिसते. माझं मन आरशासारखं चमकदार बनवायचा मी चंग बांधला आहे. एकदा का ते आरशासारखं चकचकीत झालं की माझ्या मनात मी डोकावले की माझं खरंखुरं प्रतिबिंब दिसेल. तेव्हा कदाचित ती स्वतःभोवती एक गिरकी घेऊन म्हणेन……

मी कशाला आरशात पाहू ग….

मीच माझ्या रुपाची राणी ग…..

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आम्ही मध्यम वर्गीय ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ आम्ही मध्यम वर्गीय ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

माझा होशील ना, सिरियल पाहिली आणि नकळत डोळ्या समोरून सारे बालपण गेले. सुखात होतो मध्यम वर्गीयात. श्रीमंतीत असणार्‍या लोकांसारखे जास्त अपेक्षेचे ओझे घेऊन फिरत नव्हतो डोक्यावरून. सुखी समाधानी होतो आम्ही . हव्यास संपतच नाही ह्या लोकांचा, अजून पैसा, अजून एक गाडी, अजून एक जागा खरेदी…..

कपाट भरलेले असते सिल्कच्या साड्यांनी, सुटनी आणि दागदागिन्यांनी. पण ही श्रीमंती मिरवताना स्वतः च कधी गरीब होऊन जातात मनानी, हेच त्यांना कळतं नाही. नात्यांच्या गोधडीला प्रेमाची ऊब लागते पैश्यांची नाही, हे त्यांच्या लक्ष्यातच येत नाही. आणी जेव्हा लक्ष्यात येते तोवर खुप उशीर झालेला असतो. रणरणत्या उन्हात एसी गाडीतून फिरतांना डेरेदार झाडाच्या सावलीचा आनंद कधीच अनुभवता येत नाही त्यांना.

ताजं कढवत ठेवलेल्या लोणकढी तुपाच्या वासाचा घमघमाट आम्हां मध्यमवर्गीयांनाच माहिती, तो खमंग वास रेडी बटर, आणि चिझ ला कुठे ?? जेव्हा घरी बेसनाचे लाडू बनताना खमंग वास दरवळतो ना, सगळीकडे आणि तोंडाला पाणी सुटते तो अनुभव फक्त आम्हालाच. भडंग करतांना लसणीचा खमंग वास घरभर फिरतो आणि वर्दी देऊन जातो ताज्या भडंगावर ताव मारण्याची, तो रेडीमेड भडंगात कुठे?

पॉकेट मनी साठवून आपल्या आई बाबांच्या वाढदिवसाला सरप्राईज गिफ्ट आणण्याचे सुख आमच्याच नशिबात, हां आता सो कॉल्ड ग्रँड पार्टी आमच्या दैवात नसेल, ना तो भपका आणि पैश्यांची उधळपट्टी, कारण आम्ही वर्षभर विचार करून साधारण तेच गिफ्ट घेतो ज्याची खरच गरज आहे आणि जे आमच्या खिशाला परवडणार पण आहे.

सगळीच नाही काही, पण असे बरेच श्रीमंत लोक आहेत जे फक्त आपला स्टेटस जपण्यासाठी पैश्यांची उधळपट्टी करतात. डिनर पार्टीला, एक पंधरा वीस तरी आयटम असतात खायला, ज्यातले निम्मे अधिक फुकट जातात. आम्ही भले दोनच जिन्नस करू पण वाया नाही कुठला घालवणार. आम्हां मध्यमवर्गीयांना गरजेला सारे काही पण उधळपट्टी कधी जमली नाही आणि श्रीमंतांना गरजेपुरते अस काही असते हेच कधी कळले नाही.

मला आठवतय चार लहान खोल्या असल्या तरी अगदी सगळे नातेवाईक मे महिन्यात जमलो की मस्त पंधरा पंधरा दिवस धमाल करायचो कधी अडचण नाही झाली आम्हाला कोणाची आणि तेच श्रीमंतीत राहणार्‍यांचा महाल असला ,तरी चार चे पाच जण झाले तरी त्यांची स्पेस हरवल्या सारखी वाटते त्यांना. आत्ता पटते माणसांच्या मनात स्पेस लागते, जागेत नाही.

श्रीमंतां सारखे गरजेपुरता माणूस, अस नसते आमच्यासाठी. लोकं कामापुरती मनात अस होत नाही. आम्ही नाती पैश्यांसाठी, कामापुरती जपत नाही, एकदा नाते जोडले तर ते मनापासून जोडतो आणि ह्रदयात जपतो कायमकरता. It is not a deal or contract for us or a source to earn money.काम झाले की हात पुसून टीशुपेपर सारखे फेकून देत नाही, कारण मुळात टीशुपेपर हेच आधी आमच्या संस्कृतीत बसत नाही.

मातीत बागडून, खेळून धडपडून मोठे झालो आम्ही. उन्हाचे चटके बसले की सावली कशी शोधायची हे शिकवायला लागले नाही आम्हाला. सुखी आहोत ह्याचे कधी नाटक नाही करावे लागले, कारण खरच होते त्यात सुखी होतो आम्ही. तेच श्रीमंतांना एसीत बसुन घाम फुटतो, आणि किती ही सुखी असला माणूस तरी वर्षाच्या शेवटी त्यांच्या balance sheet मधे समाधानी आहोत हे मांडावे लागते.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

05.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दत्तक विधान ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ विविधा ☆ दत्तक विधान ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

कुणाचं नशीब कसं आणि कधी बदलेल ते सांगता येत नाही.

असाच एक घडलेला प्रसंग. रस्त्यात एका झुडुपात एका कुत्रीला चार पिल्ले झाली होती. भुकेने बिचारी खूप रडत होती. ओरडत होती. रस्त्याने जाणारे येणारे फक्त बघून पुढे जात होते. दुसरे दिवशी ही पिलांची आई आली नव्हती. तिचं काय झालं कोण जाणे? पिल्ल‌ सारखी आईसाठी आक्रोश करत होती. हर्षद ने चित्र पाहिले आणि त्याला रहावले नाही. त्याने चारही पिल्ले घरी आणली. घरात  कुरबूर झाली. त्यांना दूध दिल्यानंतर ती शांत झाली आणि झोपी गेली. त्यांना एका वेगळ्या खोलीत ठेवले. त्यांचं काय करायचं ते बघूया, असं ठरलं. पैकी दोन पिल्ले सांभाळायला चांगल्या घरी दिली. उरलेल्या दोन पिलांनी घरातल्या सगळ्यांना जीव लावला. मोठी झाली की राखण करतील असू देत आपल्याकडे असं ठरलं. त्या दोघांचं भाऊ-बहीणीच नामकरण झालं. गुंड्या आणि बंडी. दोघांच्या कुस्ती लपंडाव आणि अनेक खेळाने सर्वांची खूप छान करमणूक होत होती. आता त्यांनी सगळ्यांनाच लळा लावला होता.

घरातल्या सगळ्यांना अचानक परगावी जायलाच हव असं निमित्त निघाल. आता या दोन्ही पिलांचं काय करायचं? प्रश्नचिन्ह निर्माण झालं. शेवटी असं ठरलं की, “राहत” या प्राणी प्रेमी संस्थेत त्यांना देऊया. जड अंतकरणाने त्यांना त्या संस्थेत दाखल केलं. लवकरच बंड्या आणि गुंडी तेथील प्राणीपक्ष्यांबरोबर छान रुळली. मजेत राहू लागली.

या संस्थेतच मालकांनी दुर्लक्ष केल्याने, अतिश्रमाने, जखमी झालेली काही गाढवे जप्त करून, त्यांच्यावर उपचार करून बरी झाली होती. त्यांना डॉंन्की यार्डमध्ये उटीला पाठवायचे ठरले होते. (मसीनगुडी) उटी याठिकाणी डॉक्टर इलोना ओटर या नार्वेच्या व्हेटर्नरी डॉक्टर व त्यांचे पती नायजेल ओटर यांनी 20 एकर जागेत इंडिया प्रोजेक्ट फॉर नेचर ही संस्था सी स्थापन केली आहे. असे प्राणी मुक्तपणे मोकळे आणि निवृत्त जीवन जगत असतात. तेथे “राहत” मधील गाढवांना व त्यांच्याबरोबर बंड्या आणि गुंडी यांनाही पाठवायचे ठरले. समाजसेवी संस्था किंवा व्यक्ती तेथील प्राण्यांना दत्तक घेतात. म्हणजे त्यांचा खर्च पाठवतात. बंड्या आणि गुंडी उटीला पोहोचले. त्यांचे फोटो पाहून अमेरिकन जोडप्याने त्यांना पसंत केले. कागदपत्रांची पूर्तता झाली .दत्तकविधान झाले. त्यांच्या पालकांनी खर्च पाठवायला सुरुवात केली. नवीन मालकांनी त्यांची दत्तक नावे पा़ँल आणि नन्सी अशी ठेवली. बंड्या आणि गुंडीचे  पाँल आणि नैन्सी झाले.पूर्ण आयुष्य बदलून गेले. मराठी होते ते  अमेरिकन झाले.

रस्त्याच्या कडेला झुडुपात आईविना दिवसरात्र भुकेने कासावीस होऊन ओरडत राहिलेली बंड्या आणि गुंडी पाँल आणि नँन्सी होऊन आनंदी आणि मुक्त जीवन जगायला लागले. काय नशीब असतं ना एकेकाच!

 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनाच्या खोल तळाशी… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ मनाच्या खोल तळाशी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

मनाच्या कुपीत..आठवणींच्या सा‌‌ठवणीत पडून असतं बरंचसं. आठवूच नये असं जसं , तसंच आठवत रहावं असंही बरंच कांही. असं असो वा तसं जुनंच सगळं. भूतकाळातलं. आठवत रहावं असं असलं , तरी सारखं तेच आठवत रहाणं म्हणजे भूतकाळातच जगणं. आठवू नये असं तर दामटून बसवलं नाही, तर डोकं वर काढतच रहातं सारखं सारखं लवचटासारखं. आठवणी हव्या-नकोशा कशाही असोत त्या उपटून फेकून नाहीच देता येत. मग करायचं काय? हव्याहव्याशा, चांगल्या आठवणी जपून ठेवायच्या निगुतीनं. आवडती वस्तू सहज कधी हाताळून पहातो ना , तसं अलगद आठवून पहायच्या क्षणकाळ. तेवढाही श्वास पुरुन उरतो वर्तमानात जगण्यासाठी. नकोशा आठवणींकडे करायचं दुर्लक्ष. मुद्दामच. पाहूनही न  पाहिल्यासारखं. हिरमुसल्या होऊन मग रहातात पडून न् जातात विरुनही कधीतरी हळूच खाली मान घालून निघून गेल्यासारख्या. आठवणी कशाही असोत, त्या हव्यातच. पण भल्याबुऱ्याचं भान जागं ठेवण्यापुरत्या. जगायचं कसं आणि कसं नाही हे सांगण्या-सुचवण्यापुरत्या.

आठवणी हव्यातच सोबतीपुरत्या. अंधारल्या वाटेवरच्या इवल्याशा दिव्यासारख्या. मिणमिणताच पण प्रकाश देणाऱ्या. चुकत असेल वाट तर रस्ता दाखवणाऱ्या.

आठवणी म्हणजे अनुभवच तर असतात भूतकाळात जमा झालेले. हवेसे किंवा नकोसेही. मनाच्या खोल तळाशी पडून असतात वाट पहात, हांक आली की झरकन् झेपावण्यासाठी. आठवणी कशाही असोत सारखं कुरवाळत नाही बसायचं आवडती गोळी चघळल्यासारखं, किंवा झिडकारायच्याही नाहीत कडवट कांहीतरी थुंकून टाकल्यासारख्या. न जाणो, त्या कडवट असल्या, तरी उपयोगीही पडत असतात कधीतरी औषधासारख्या..!

औषधासारख्याच तर असतात आठवणी. (मनाच्या) तब्येतीला भानावर आणणाऱ्या. गोड सिरप गोड असतं म्हणून आवंढा न गिळताच तोंडात नसतंच ना धरून ठेवायचं. किंवा असेल गोळी औषधाची कडवट किंवा गोडसरही, पण तीही चघळत नसतीच रहायची तासनतास. गिळून टाकायची पाण्याच्या एका घोटाबरोबर क्षणार्धात. आठवणी लगडलेल्या असतातच विचारांना , येणाऱ्या.. जाणाऱ्या..! जाऊ द्यायच्या आल्या तशाच जाणाऱ्या विचाराबरोबर तशाच अधांतरी तरंगत. जात नाहीतच त्या कायमच्या. जाऊन बसतात आपल्याच मनाच्या तळाशी वेळ येईल, तेव्हा अलगद.. हळूवार सावरायला आपल्याच मनाला…!!

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी–नव्या जाणिवांची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ दिवाळी–नव्या जाणिवांची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—६ ?

!! दिवाळी–नव्या जाणिवांची !!

यावर्षी करोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपण दिवाळीचा सण साधेपणाने पण मनापासून साजरा केला.आनंद घेतला.

मुळामध्ये या सणात धार्मिक अधिष्ठानाबरोबर आपल्या दैनंदिन व्यवहाराची सांगड घातलेली आहे.त्यामुळे लक्ष्मीची पूजा करायची तशीच गाय-वासराची करायची.निसर्गाचे जतन करायचे तसेच आपल्या नात्यांची जपणूक करायची.विजयाचा उत्सव साजरा करायचा तशीच प्रकाशाची उधळण करायची.

दरवर्षी आपण काही संकल्प करतो.काही गोष्टी परंपरा म्हणून,रूढी म्हणून करतो.पण यातल्या किती गोष्टी आपण मनापासून करतो ? किती संकल्प आपण पूर्ण करतो ? याचा ताळमेळ यानिमित्ताने घेतला पाहिजे.याच बरोबर आपल्या आयुष्याचा आढावा घेतला पाहिजे. मागच्या वर्षात किती नवीन नाती जोडली. याचबरोबर जुनी किती नाती दुरावली हेही समजून घेतले पाहिजे.म्हणजे त्याचा पुन्हा ताळमेळ घालणे सोपे होते.

आज बाजारात सर्व काही उपलब्ध आहे. फक्त प्रेमाचे, जिव्हाळ्याचे माणूस मिळत नाही. तेव्हा रुक्ष व्यवहारापायी, मानापमानाच्या गैरसमजुतींपायी जवळ असलेल्या आपल्या माणसांना का दूर करायचे ? प्रसंगी स्वतः कमीपणा घेऊन सुद्धा माणसे जपली पाहिजेत. मग त्यात नातलग, स्नेही, मित्र, शेजारी, सहकारी, कर्मचारी सगळे सगळे येतात.शेवटी आपण एकटे कधीच राहू शकत नाही.त्यामुळे ह्या माणसांची खरी गरज ही आपल्यालाच असते असा विचार दोन्ही बाजूंनी केला गेला तर, आपोआप सर्वच नाती जपली जातील आणि कुणालाही कधी एकाकीपण  जाणवणार नाही. तेव्हा सर्वांनीच आपली सगळीच नाती जपली पाहिजेत.

निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. पूजा-आरास यासाठी पानाफुलांची लूट करायची नाही.स्वच्छतेसाठी पाण्याची नासाडी करायची नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

या सणात दिवे पणत्या यांना खूप महत्त्व आहे.पूर्वी लाईट नव्हती तेव्हा दिवेच पेटवावे लागत. आज-काल लाईटने  अक्षरशः क्रांती केली आहे. लाईटच्या माळा,वेगवेगळे दिवे आपण लावतो.तरीही पणत्या का लावायच्या ? तर हेच या दीपोत्सवाचे सार आहे.दिवा हा चैतन्याची,मांगल्याची उधळण करतो.तेला-तुपाच्या दिव्यांनी तेज पसरते. विजेच्या दिव्यांनी डोळे दिपवणाऱ्या उजेडाचे प्रदर्शन होते. मुख्य फरक म्हणजे हा दिवा असंख्य दिवे पेटू शकतो.लाईटचा दिवा दुसरा एकही दिवा पेटवू शकत नाही आणि हेच या पेटत्या दिव्याचे वैशिष्ट्य आहे.

दिव्याने दिवा पेटविणे यामागे खूप मोठा अर्थ आहे. हा दिवा स्वतः जळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा देतो. आपण आनंदात जपताना इतरांनाही आनंद देणे, त्यांचे जीवन उजळणे हे खूप महत्त्वाचे असते.या दिपावलीतून हा संदेश घेऊन प्रत्येकाने इतरांना साहाय्य करणे, कटूता सोडून सर्वांशी प्रेमाने वागणे, भ्रष्टाचार, व्यसनं, शत्रुत्व यांना कटाक्षाने दूर ठेवणे, निसर्गाचे स्नेहाने जतन करणे यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

बाहेर तर दिवे पेटवायचेच. पण आपल्या अंत:करणातला दिवा पेटला पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, जाणिवा, संवेदना जागृत होतील आणि आपल्याबरोबर इतरांच्या प्रगतीसाठी आपण पुढे सरसावू. आपल्या जागृत मनाला इतरांच्या व्यथा वेदनांची जाणीव होईल.त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ याचा खरा अर्थ समजून सांगणारा ‘दृष्टीदाना’ चा संकल्प या वेळी करायला पाहिजे. आपल्या आयुष्याचा उत्तम तऱ्हेने उपभोग घेतल्यावर, आपल्या पश्चात दोन दृष्टिहीनांच्या नेत्रज्योती पाजळवणारा  हा संकल्प आहे. अशाच पद्धतीने अवयवदानाची संकल्पना सुद्धा आजकाल रुजायला लागलेली आहे.आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याचे हे सुंदर मार्ग आहेत.

नवीन वर्ष म्हणजे तरी काय ? वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे निश्चय करायचे,नवीन ध्येय स्विकारायची आणि त्यांच्या पूर्ततेसाठी नव्या उत्साहाने जीवनाला नवा वेग द्यायचा. त्यामुळे आपले मन पुन्हा ताजेतवाने होते.

दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना चांगले होण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या त्याच वेळी चांगल्या गोष्टींची सर्वांकडून मनापासुन अपेक्षा करायला काय हरकत आहे ? शेवटी चांगले पेरले तर चांगलेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे.सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 

दीपावली ही उजळून जाते

वाट नव्या वर्षाची

अशीच आपुल्या जीवनी यावी

लाट नव्या हर्षाची !!

शुभ दीपावली.  ?

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ विविधा ☆ मैत्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

फ्रेंडशिप, मैत्री किती छान कल्पना त्यादिवशी फ्रेंडशिप डे होता. सर्वजण एकमेकांना फ्रेंडशिप ब्याण बांधून आपल्या  मैत्रीची एकमेकांना आठवण करून देत होते. मी हे सगळं पहात होते. माझ्या मनात विचार आला. याप्रसंगावर चार ओळी तरी लिहाव्यात. म्हणून मी कागद पेन घेऊन बसले. आणि कविता लिहू लागले. तीच ही कविता.

फ्रेंडशिप

फ्रेंडशिप ही कल्पना आहे किती छान

एकच दिवस असतो मैत्रीचा मान

तीच असते या दिवसाची शान

रोजच्या जीवनात नसतं याच भान

पण आठवण होताच वाटतं किती छान

एकमेकांना होतात फोन

गर्दीने भरतात गावांचे कोन

गप्पांच्या फडात रहात नाही वेळेचं भान

आठवणीचे गोफ विणले जातात छान

एकमेकांना बांधतात फ्रेंडशीपचे बँण

सगळेच असतात एकमेकांचे फँन

जीवनाच्या फेऱ्यात होतात अनेक प्लॉन

केव्हातरी होतात छोटी छोटी भांडण

मनमोकळ बोलण्याचं हेच असतं ठाणं

कारण ह्यात नसतं कोणतच बंधन

आठवणीने मनं होतात म्लान

भेटल्यावर होतात परत भेटण्याचे ल्पॉन

भेट न झाल्यामुळे होतं रुदन

विचारांचे होते मंथन

मनांचं होतं मिलन

अन् भावनांचं होतं प्रज्वलन

शंकाचं होतं शमन

संकटकाळी होतं जीवाचं रान

असच असतं मैत्रीचं अतुट बंधन

मैत्रीचं महत्त्व अन् किर्ती महान

त्यावर होतं कवनांच गान

त्यानं भरतं पेपराचं पान

वातावरण ही होतं खूप छान

खरच फ्रेंडशीप ही कल्पना फारच महान

बघा कशी वाटते.

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बलिप्रतिपदा–भाऊबीज ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—५ ?

!! बलिप्रतिपदा–भाऊबीज !!

शुभ दीपावली ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.नवीन वर्ष कसे ? तर महापराक्रमी राजा विक्रमादित्याच्या नावाने होणारी कालगणना आजपासून सुरू होते. आजपासून हे विक्रम संवत्सर सुरू होते.शालिवाहन शकानुसार चैत्री पाडवा हा वर्षारंभ मानला जातो.तर बलिप्रतिपदेपासून नवे व्यापारी वर्ष सुरू होते.दिवाळी पाडव्याला व्यापारी वही पूजनाची प्रथा महत्त्वाची असते.

या दिवशी सर्व वर्षातील व्यापाराचा आढावा घ्यायचा असतो.याच पद्धतीने आपण प्रत्येकाने आपल्या जीवनाचा ही आढावा घेतला पाहिजे.जुन्या वर्षातल्या राहिलेल्या गोष्टी,नवीन वर्षात करायच्या गोष्टी यासाठीचे नियोजन, जुने राग-द्वेष,  भांडणं विसरून पुन्हा नव्याने स्नेहबंध जुळवणे, श्रद्धा उत्साह वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.

बलिराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात. विरोचन पुत्र बली धर्मप्रिय, लोकप्रिय राजा होता. श्री विष्णूंनी त्याच्यासाठी वामन अवतार घेतल्याची कथा आपल्याला माहीत आहेच. हा बलिराजा उदार होता. त्याच्या गुणांचे स्मरण आपल्याला वाईट माणसातही असणारे चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते.

कनक आणि कांता यामुळे माणूस असूर बनतो.म्हणूनच श्रीविष्णूंनी या दोघांकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आगेमागे जोडून तीन दिवसांचा उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार लक्ष्मीपूजनाला कनक म्हणजे लक्ष्मीला पूजण्याची पूज्य दृष्टी; तर भाऊबीजेला समस्त स्त्री वर्गाकडे आई किंवा बहिणीच्या मायेने पाहण्याची दृष्टी देणारे दोन दिवस येतात.थोडक्यात म्हणजे अज्ञान, मोह, लालसा, सत्ता यांच्या अंधारातून ज्ञान,श्रद्धा,सद्भावना यांच्या प्रकाशात जाण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.

आजचा दिवस हा संकल्पासाठी एकदम शुभ  आहे. हा पाडवा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दिवस आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात आजपासून करावी असे संकेत आहेत. हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य जपणारा आहे.

याच्या दुसऱ्या दिवशी येते भाऊबीज.बहिण भावांच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या या दिवसाला  ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. याची एक कथा अशी सांगतात. यमराजाची बहिण यमुनाने या दिवशी आपल्या घरी त्याची पूजा केली, त्याला ओवाळले. यमराजाने तिला वरदान मागायला सांगितले. ती म्हणाली, “दरवर्षी या दिवशी तू माझ्याकडे जेवायला यायचेस. तसेच या दिवशी जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचे जेवील त्याला तू सुख द्यायचेस.” यमराजाने यमुनेला तसा वर दिला म्हणून दरवर्षी  भाऊबीज साजरी होते

एका घरात हसत खेळत भाऊ बहीण मोठे होतात. त्यांच्यात जिव्हाळ्याचे, मायेचे, विश्वासाचे नाते  निर्माण होते. पुढे लग्न झाल्यावर बहिण सासरी जाते.सतत भेटत नाही. म्हणून मग भाऊबीजेच्या निमित्ताने तिला भेटून तिची खुशाली विचारायची,तिच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे हा यामागचा उद्देश असतो. हे नाते असतेच अगदी हळुवार. कितीही अडचणी आल्या तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे याचा बहिणीच्या मनात दृढ विश्वास असतो आणि सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी भावाला बहिणीची आठवण येते.

या नात्याचा आज उत्सव असतो. आजकाल घरात एकच अपत्य असते. त्यामुळे सख्खी भावंडे कमी झालीत. पण चुलत, आत्ये, मामे,मावस भावंडं कोणतीही असोत हे नाते मनापासून जपावे हेच हा दिवस सांगतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राशी – फटाके – (दिवाळी मनोरंजन) ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ राशी – फटाके – (दिवाळी मनोरंजन) ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत रात्री १० नंतर फटाके उडवण्यास बंदी यावर आम्ही एक सर्वे घेतला ज्यात वेगवेळ्या राशींच्या लोकांची मते जाणून घेतली.  राशी प्रमाणे उत्तरे साधारण अशी मिळाली *)

मेष: काय वाट्टेल ते होऊ दे रात्री  १० नंतरच फोडणार फटाके. ?

वृषभ: व्यवस्थित आवरून तयार व्हायला तसंही दरवर्षी ८ वाजतात च म्हणा ?

मिथुन: रात्री ८ ते १० इथे आणि सकाळी  ८ ते १० अमेरिकेतील वेळेप्रमाणे  इथेच फटाके फोडू ?

कर्क: दिवाळीत चंद्र नसताना आकाश दिवा, पणत्या यांचा प्रकाश हीच दिवाळी. लक्ष्मी पुजनाला मात्र मी फुलबाजी लावणारच. ?

सिंह: खरे बॉम्ब फोडणारे मस्त परदेशात एन्जॉय करतायत आणि शिक्षा कुणाला ?

रात्री १० नंतर फुसके फटाके फोडणारी लोकं….. ?

कन्या : किती ते प्रदूषण सध्या होतंय ना. दिवाळी अंक पण महागलेत. ८ ते १० रोज कुणा कुणा कडे जायचंय. यंदा फटाके खरेदी होईल असं वाटत नाही??‍♀

तुळ:  दिवाळीत रोज पाऊस पडावा. फक्त रात्री ८ ते १० पाऊस न पडावा ☔ म्हणजे फक्त त्याचवेळेत फटाके उडवावे लागतील आणि निर्णयाचा सन्मान होईल ⚖

वृश्चिक : अगरबत्तीला खालच्या बाजूल ला एका बाॅम्बची वात गुंडाळून असे असंख्य टाईम बाॅम्ब  रात्री १० नंतर मोक्याच्या जागी ठेऊन येईन ?

धनू  : नाही त्याच्या गल्लीत रात्री १२ वा बाण सोडला तर नावाचा/ नावाची  धन्नू नाही ?

मकर: रोज रात्री १० नंतर न उडलेले फटाके गोळा करायचे. तेच दुस-या दिवशी ८ ते १० या वेळेत उडवायचे ?

कुंभ : दिवाळीच्या आधी काहीतरी करुन हा निर्णय स्थगित कसा करता येईल हे पहायला पाहिजे.?

मीन: मार्केट एवढे पडले असताना ‘आय मिन’ काही गरज आहे का फटाके उठवण्याची? त्यापेक्षा ‘लक्ष्मी मित्तल’ चे शेअर्स घेऊन आत्तापासून मुंबई -गोवा सागरी प्रवासाची तयारी करु आणि फटाक्यांच्या आवाजाची कॅसेट विकत घेऊ.?

??????✨?

? (राशीतज्ञ) अमोल

* काल्पनिक

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

Please share your Post !

Shares