मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… वासंती – भाग – ३७/२  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… वासंती  – भाग – ३७/२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

वासंती

(भाऊने पसंत केलेली शंभरावी, सुंदर वासंती आज पर्यंत ज्या कुटुंबात फक्त प्रेमाचीच कारंजी उसळली, एकमेकांसाठी कठीण परिस्थितीतही सारी भक्कमपणे उभी राहिली त्या कुटुंबात वासंतीचे अस्तित्व एका उसवू पाहणाऱ्या ठिगळासारखे जाणवायला लागलं.) – इथून पुढे 

सुरुवातीला तिची दबक्या आवाजातली भाऊशी कुरबूर सुरू झाली. भाऊ दुर्लक्ष करायचा म्हणून मग मोठ्या आवाजात खोलीच्या बाहेर भांडणं आली. सारं घर हादरलं.

वासंतीला वेगळं व्हायचं होतं. तिच्या मनासारखं घर तिला थाटायचं होतं. इथे राहणं तिला अजिबात आवडत नव्हतं पण भाऊ असहाय्य होता. एक तर कुटुंबावर त्याचं अतिशय प्रेम होतं आणि दुसरा व्यावहारिक मुद्दा म्हणजे स्वतंत्र घर घेण्यापासून ते चालवण्यापर्यंत लागणारं आर्थिक सामर्थ्य त्याच्यात नव्हतं. इथे कमावणाऱ्या पाठच्या भावांच्या साथीने एकत्र राहणं नक्कीच अवघड नव्हतं. शिवाय एकमेकात जिव्हाळा होता. नाना तर्‍हेने त्याने वासंतीला हे पटवण्याचा प्रयत्न केला पण तिचं म्हणणं एकच, ” तुमच्याच जीवावर तुमचे भाऊ मोठे झाले ना मग आता त्यांनी तुम्ही त्यांच्यावर खर्च केलेले धन द्यावं की परत तुम्हाला! या निमित्ताने त्यांनी त्याची परतफेड करायला हवी. ” भाऊच काय वासंतीच्या या बोलण्याने सारं घर कळवळलं. वासंतीने नात्यातला सारा गोडवाच शोषून घेतला. त्यानंतर सगळंच हळूहळू तुटत गेलं. वासंतीने कुठल्याच नात्याचा, कुणाच्या वयाचा आदर बाळगलाच नाही. तिच्यासाठी ते घर, घरातली माणसं म्हणजे जणू काही एक उकिरडा होता, नरक होता. ती केव्हाही कुणालाही मनाला येईल ते जिभेला बांध न घालता, वारेमाप बोलत सुटायची. भाऊ तर तिच्यासाठी एकदम फोडणीतून बाजूला काढलेल्या कढीपत्यासारखा होता. येता जाता ती त्याला म्हणायची, ” मुलांना जन्म देताना तरी विचार करायचा? त्यांचं भविष्य घडवण्याची क्षमता नाही तुमच्यात तर कशाला संसार मांडलात? भावांचेच संसार ओढायचे होते ना आयुष्यभर! उपयोग काय हो तुमच्या हुशारीचा? पुढे येण्यासाठी काही मेहनत केलीत का? यापुढे तरी कराल का? माझ्या आई बापाने काय पाहिलं तुमच्यात कोण जाणे! अशा अडाणी, स्वार्थी कुटुंबात त्यांनी मला ढकलून दिलं! ”

मग दिवस असो, करकरीत संध्याकाळ असो, तिथे फक्त भांडण, रडणं, अबोला आणि भयाण मौनातील अमंगल, अशुभ शांतता!

एकंदरच दिघे कुटुंबाची स्वस्थता हरपली. चार भिंतीतली प्रतिष्ठा पणाला लागली. घर म्हणजे असतं एक विसाव्याचं स्थान. थकूनभागून आल्यानंतर सुखसंवाद घडवणारं ठिकाण असतं पण ते सारं उध्वस्त होत होतं. कुणालाच घरी परतावंसं वाटत नव्हतं. जिथे एकेकाळी सुखद वारे वाहत होते तिथे तप्त लाव्हा रसाचीच धग जाणवायला लागली होती. केवळ एका व्यक्तीमुळे. भाऊने पसंत केलेली ही शंभरावी सुंदर मुलगी वासंती हिच्यामुळे. वासंती आमच्या घराची खलनायिका ठरली. माणसं, नाती पर्यायाने कुटुंब पार दुभंगलं. जिजीचं दुसरं भाष्यही खरं ठरलं. “चापू चापू दगड लापू. ”अतिचिकित्सेचं कडू फळ!

भाऊचं वासंती वर फार प्रेम होतं ते जाणवायचं पण तो तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, महत्त्वाकांक्षापूर्तीसाठी अपुरा ठरला. एक हुशार, देखणा, कुटुंब बांधून ठेवण्यासाठी धडपडणारा भाऊ अखेर व्यसनाधीन झाला. नैराश्याच्या गर्तेत लोटला गेला. वासंतीचे माहेरी जाणं, तिथेच मुलांना घेऊन महिनो नि महिने राहणं आताशा वाढलं होतं. ती माहेरच्या आधाराने भाऊला धमक्याही द्यायची म्हणे!

एकदा भाऊ माझ्या आईजवळ म्हणाला होता, ” मालू वहिनी तू आमच्या घरातली आदर्श व्यक्ती! तू तर एका श्रीमंत बापाची मुलगी पण आमच्या “जनाचा” संसार कसा छान सांभाळलास! आज “जना” जो काही आहे तो केवळ तुझ्यामुळे. जिजी आमची मावशी असूनही तू आम्हाला जवळची वाटतेस.

माझंच नशीब असं फुटकं का ग? ” तेव्हा आई त्याला म्हणाली होती, ” असं बोलू नकोस. आपल्याही काही चुका असतील. वासंतीला समजावून घेण्यात आपणच कमी पडत असू. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि वासंतीतही अनेक गुण आहेत रे! कला आहेत. दिवाळीत ती रांगोळ्या किती सुंदर काढते! तुमचे “जना” तर तिच्या हातच्या पोळ्या आणि वालाच्या बिरड्याचं इतकं कौतुक करत असतात! नीटनेटकं कसं राहावं ते तिच्याकडूनच शिकावं. संसाराच्या तिच्या काही वेगळ्या कल्पना असतील. तुमच्यातल्या मतभेदामुळे आणि भिन्न वृत्तीमुळे नात्यांमध्ये या दर्‍या निर्माण झाल्यात. त्या बुजण्यापेक्षा अधिक खोल होत आहेत पण अजूनही वेळ गेलेली नाही भाऊ. खरं म्हणजे तुझी जबाबदारी आहे हे सारं नीट करण्याची. सगळ्याच काही मराठी चित्रपटातल्या सुलोचना नसतात हे लक्षात ठेव. “ त्या दिवशी भाऊने आईला अक्षरश: साष्टांग नमस्कार घातला आणि तो मुकाटपणे निघून गेला.

आज मी जेव्हा या घटनांचा दुसऱ्या बाजूने विचार करते तेव्हा मला आईचे हे शब्द आठवतात. बालमनावर असे मी म्हणणार नाही कारण त्यावेळी आम्ही अर्धवट वयात होतो.. आमच्यावर हेच रुजले होते की वासंती म्हणजे भांडकुदळ, बेलाभांड, शिवराळ, घरभेदी स्त्री. प्रथम दर्शनी तिच्या सौंदर्याने प्रभावित झालेल्या आम्हाला नंतरच्या भागात मात्र ती परीकथेतील कुरूप, दुष्ट, चेटकीण भासायला लागली होती. आमच्या घरातला “वासंती” हा एक अत्यंत नकारात्मक घटक ठरला होता. जिने भाऊचं जीवन उध्वस्त केलं होतं.

पुष्कळ दिवस, महिने, वर्ष सरली. खूप बदल झाले. पपी, बाळू चतुर्भुज झाले. त्यांचे संसार मार्गाला लागले. आमच्या लाडक्या कुमुदआत्याचं निधन झालं. वासंतीचं अस्तित्व जरी ठिगळ लावल्यासारखं विसंगत होतं तरी तेही कायमस्वरूपी राहिलं. स्टेशन रोडवरचं त्यांचं घर रीडेव्हलपमेंटला गेलं आणि कालांतराने प्रत्येक भावाला स्वतंत्र दोन-तीन खोल्यांचे असे मोठे फ्लॅट्स मिळाले. वेगळं होण्याचं वासंतीचे एकेकाळचं स्वप्न अशा रीतीने पूर्ण झालं म्हणायला हरकत नाही. या व्यवहारात कुमुदआत्याच्या परिवाराची मात्र होरपळ झाली. ज्या जावयाने आप्पांवर शेकलेल्या गंभीर प्रकरणातून त्यांची सहीसलामत सुटका केली आणि आयुष्यभर पत्र्याचे छत असलेल्या माळ्यावर आनंदाने राहण्याचे पत्करले त्यांची मात्र घराच्या या व्यवहारात दखल घेतली गेली नाही हे गैर झाले. गुलाबमावशी आणि आप्पांचीही वाटणी झाली. बाळूने आणि बाळूच्या बायकोने मात्र डीमेन्शिया झालेल्या गुलाबमावशीला मरेपर्यंत सांभाळले.

वासंती बदलली की नाही माहीत नाही पण निवळली असं वाटायचं पण तरीही वासंतीची “घरभेदी” प्रतिमा कुटुंबीयांच्या मनावरून पुसली जाणं जरा अशक्यच होतं. कुटुंबाचे तुकडे तिच्यामुळेच झाले हा दगडावरचा ठसा ठरला.

माझ्या लग्नानंतर मी माहेरी आले असताना वासंतीला भेटायला गेले होते. भाऊ घरात नव्हताच पण ती होती. वयानं थकलेली जाणवत होती. तिच्या देहावरच्या लावण्य खुणा विझलेल्या दिसत होत्या. डोळ्याखालची काळी वर्तुळं त्यात भर घालत होती. तिला भेटायला जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे किरण, संजय, अमिता. आम्हा सर्वांनाच त्यांच्याविषयी उपजत ओढा होता. अखेर ती आमची भावंडच होती ना!

माझं पहिलं लक्ष गेलं ते वासंतीच्या दारात रेखलेल्या सुरेख रांगोळीवर. रांगोळी.. छोटीशीच पण कलात्मक. दारावर तोरण होतं. वसंतीने माझं अगदी प्रेमाने स्वागत केलं. तिने स्वतःच्या हाताने उत्कृष्ट स्वयंपाक माझ्यासाठी रांधला होता. तिच्या हातच्या साध्या वरण-भातालाही काय स्वाद होता! मी तिला तसं म्हटल्यावर तिचे डोळे पाणावले. म्हणाली, ” तुझ्या पप्पांना मी केलेला प्रत्येक पदार्थ आवडायचा आणि ते तोंडभरून कौतुक करायचे. ”

मी काही बोलले नाही पण मला एक सहज आठवलं. त्यावेळी पप्पा वासंतीचे कौतुक करत असताना गुलाब मावशी एकदा म्हणाली होती, ” चांगलं न व्हायला काय झालय? तेल बघा केवढं घातलंंय! ” असो!

ता तो साराच भूतकाळ होता.

वासंतीकडून परतताना तिने माझी ओटी भरली. तिने स्वतः गुंफलेला मोगर्‍याचा गजरा माझ्या केसात माळला आणि म्हणाली, ” अशीच येत जा बरं का! पुढच्यावेळेस जावईबापूंना घेऊन ये. ”आज हे सारं तुम्हाला सांगताना, लिहिताना माझे डोळे भरून आलेत. अनेक घटनांची प्रतिबिंबे त्या पाण्यात तरळत आहेत. आयुष्याचे इतके टप्पे ओलांडल्यानंतर, नानाविध अनुभव घेतल्यानंतर, अनेक व्यक्तींचे स्वभाव, जीवनं जवळून, लांबून पाहिल्यानंतर मनाच्या पातळीवर परिपक्व झाल्यानंतर एकच वाटतं आपण कुणाही बद्दल पटकन इतके निर्णयात्मक का होतो…?

का नाही थांबत? का नाही वाट पहात?

अलिप्तपणे का विचार करू शकत नाही…?

– समाप्त –

– क्रमश: भाग ३७

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिल ढूंढता है… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ दिल ढूंढता है… ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर

“मौसम” चित्रपटातील संजीवकुमारवर चित्रीत झालेलं हे गुलजार लिखित गाणं, मला फार भावलं…. चित्रपटातील नायक तीस वर्षांपूर्वी जिथं जिथं नायिकेसोबत फिरलेला असतो, तिथं तिथं उतारवयात जातो तेव्हा त्याला नायिकेसोबत, तारुण्यातील तो स्वतः देखील दिसू लागतो… वर्तमानात तो भूतकाळातील एकेक गोष्टी अनुभवतो…

आज मी वयाची पासष्टी पूर्ण करुन सहासष्टीमध्ये पाऊल टाकलंय.. माझीही अवस्था, पडद्यावरील संजीव कुमारसारखीच झालेली आहे… वयाच्या पाचव्या वर्षापासूनच्या घडून गेलेल्या गोष्टी, प्रसंग व घटना मला आजही स्वच्छ आठवताहेत…

मी चालू लागतो.. भरत नाट्य मंदिराजवळचं पावन मारुतीचं छोटं मंदिर दिसतं.. इथंच माझं बालपण गेलं. एक वर्षाचा असल्यापासून ते माझं लग्न होईपर्यंतची आयुष्यातील माझी सत्तावीस वर्षं याच परिसरात गेली..

मी चार वर्षाचा असताना आई बाहेर गेली होती म्हणून ती कुठे दिसते आहे का? हे पाहण्यासाठी फिरत फिरत मी महाराष्ट्र मंडळापर्यंत पोहोचलो.. माझा रस्ता चुकलेला पाहून, एका हवालदाराने मला पेरुगेट पोलीस चौकीत नेऊन बसविले… काळजीपोटी माझी आई शोधत शोधत त्या चौकीत पोहोचली.. तेव्हा मी निवांत स्टुलावर बसलेलो होतो.. मी आत्ता चौकीत डोकावलं तर, कंठ दाटून आलेल्या आईने मला उचलून कडेवर घेतलेलं दिसत होतं…

भावे प्राथमिक शाळेत मी पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत होतो.. परवा सकाळी तिथून जाताना मला तिसरीच्या वर्गातील मुलं व मुली रांगेनं रस्त्याच्या कडेने, विजय टाॅकीजकडे ‘देवबाप्पा’ चित्रपट पहाण्यासाठी जाताना दिसली.. त्यात मी देखील होतो… मोठा झाल्यावर मी चित्रपटांच्याच जाहिराती करणार असल्याची ती ‘नांदी’ होती…

मी चालत चालत टिळक रोडवरील माझ्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये पोहोचलो.. सहावीत असताना मी आजारी पडलो होतो.. बरा झाल्यानंतर मी शाळेत गेलो तरी आई मला घरुन डबा घेऊन येत असे.. वर्गात तास चालू असताना मित्रांनी माझ्या आईला पाहिलं की, सरांना ते सांगायचे.. मग मी बाहेर येऊन ग्राऊंडच्या बाजूला फरशीवर बसून डबा खात असे.. येताना तिने गरम पाणी भरुन तांब्या व फुलपात्रही आणलेलं असे… आज ती माउली या जगात नाही.. मात्र आता, तिच्यासमोर मला जेवताना पाहून, माझे डोळे भरुन आलेले आहेत…

शाळा झाल्यानंतर बीएमसीसी मध्ये प्रवेश घेतला.. मित्रासोबत परवाच्या रविवारी काॅलेज जवळून जाताना त्याला मी थांबवलं.. तो गाडी स्टॅण्डला लावून मोबाईलमध्ये हरवून गेला.. मी काॅलेजच्या दरवाजासमोर जाऊन उभा राहिलो… समोर पाहतो तर ‘मंथन’ या हस्तलिखित मासिकाचे संपादक मंडळातील सर्वजण, माझ्यासह फोटोसाठी उभे राहिलेले दिसत होते.. त्या फोटोनंतर मी मित्रांचे फोटो काढू लागलो.. माझ्या ‘पाॅंचवा मौसम’ या कथेतील नायिका, ‘रेवती’ इथेच मला भेटली होती…

काॅलेजनंतर नाटक, चित्रपटांच्या जाहिराती करण्याचा व्यवसाय, मी खालकर तालीम जवळील ‘गुणगौरव’ या इमारतीत सुरु केल्यावर अनेक ज्येष्ठ कलाकार व निर्मात्यांशी जवळून संपर्क आला.. काही दिवसांपूर्वी मी तिथून जाताना, माझ्या टीव्हीएस फिफ्टीवरुन शरद तळवलकरांना चिमणबागेतील त्यांच्या घरी सोडताना स्वतःलाच पाहिले…

अरविंद सामंत यांनी ‘थरथराट’ चित्रपटाचे काम करुन घेतल्यानंतर त्यांनी, त्यांच्या लक्ष्मी रोडवरील ऑफिसमध्ये बसून इथेही काम करत जा असे मला सांगितले होते.. गेल्या आठवड्यात मी त्या ऑफिसवर गेलो… तेव्हा अरविंद सामंत खुर्चीवर बसलेले दिसले.. त्यांच्या समोर मी बिल घेऊन उभा होतो.. त्यांनी त्यांची व्हीआयपीची सूटकेस बंद केली व मला पुढच्या शुक्रवारी आल्यावर मी बिलाचा चेक देईन असे सांगितले… मला मनातून त्यांचा खूपच राग आला होता, ते ओळखून अरविंद हसले व म्हणाले.. ‘चिडका दोस्त’…

माझा मुलगा भावे स्कूल शाळेत शिकला.. काही दिवसांपूर्वी मला घरी जाण्यास उशीर झाला होता.. रात्रीचे साडेदहा वाजले होते.. सहलीला गेलेल्या मुलांची बस अजूनही आलेली नव्हती.. पावसाची रिपरिप चालू होती व शाळेच्या फाटकापाशी मी छत्री घेऊन मुलाची वाट पाहताना दिसलो….

काही दिवसांपूर्वी अप्पा बळवंत चौकात गेलो होतो तेव्हा संस्कृती प्रकाशनाची इमारत दिसली… इथे मी काही वर्षे अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे साकारली… मी पहात होतो, मानपत्रांच्या दोन फ्रेम्स घेऊन मी संस्कृतीचा जिना चढत होतो…

गेल्या महिन्यात मी टिळक रोडवरील साहित्य परिषदेच्या बसस्टाॅपवर उभा होतो.. मागे वळून पाहिलं तर मसापच्या सभागृहात माझ्याच विवाहाचा स्वागत समारंभ चालू होता… गावाहून आलेले नातेवाईक, सदाशिव पेठेतील शेजारी व बरीच मित्रमंडळी दिसत होती…

पंधरा दिवसांपूर्वी केके मार्केट समोरील ‘वाशिष्ठी’ बिल्डींग जवळून जाताना माझे लक्ष गॅलरीकडे गेले.. कोरोनाच्या काळात ‘फेसबुक लेखक’ म्हणून घडणारा, एकाग्र चित्ताने मोबाईलवर टाईपिंग करीत असलेला मी दिसलो….

गेल्याच महिन्यात माझ्या उजव्या डोळ्याचं मोतिबिंदूचं ऑपरेशन झालं.. एक महिनाभर नारायण पेठेतील ऑफिस बंद होतं… नेहमीच्या ग्राहकांना महिन्यानंतर काम करु शकेन, असं व्हाॅट्सअपवर कळवलं होतं… कालच मी नवीन चष्मा करुन घेतला व ऑफिसमध्ये येऊन बसू लागलो… दिवसभरात कुणी आलं नाही की, नैराश्य यायचं… अशावेळी आतापर्यंत मला दिसणारा ‘तो’ समोर आला व म्हणाला, ‘सुरेश, हा महिनाभराचा काळ खरं तर स्वल्पविराम होता.. पूर्णविराम नक्कीच नव्हता, पुन्हा तुझी कामं चालू होतील…. All the best!!!

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… वासंती  – भाग – ३७/१  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… वासंती  – भाग – ३७/१  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

वासंती – भाग -१  

गुलाब मावशीचा ज्येष्ठ सुपुत्र, पप्पांचा मावसभाऊ आणि माझा काका ज्याला आम्ही “भाऊ” अशी हाक मारत असू. आमचा आणि गुलाबमावशीचा परिवार हा संयुक्त परिवारासारखाच होता. एकमेकांच्या कुटुंबामध्ये घडणाऱ्या सर्वच चांगल्या- वाईट, सुख- दुःखांच्या घटनांमध्ये आमची खोलवर गुंतवणूक असायची. “भाऊचं लग्न” ही एक अशीच घटना होती की ज्यामुळे औत्स्युक्य आणि चिंता आमच्या घरात पसरली होती. औत्स्युक्य अशासाठी की आता भाऊचे लग्न होणार घरात सून येणार, काकी मामी येणार, काहीतरी कौटुंबिक बदल घडणार म्हणून आणि चिंता अशासाठी की भाऊ कोणतीच मुलगी पसंत करत नव्हता. त्याला सुंदरच मुलगी हवी होती बायको म्हणून. तसा भाऊसुद्धा गोरा, देखणा होताच. हसरा, मिस्कील होता. त्याचे शिक्षण मात्र तुलनेने कमी होते. खरं म्हणजे तो हुशारही होता, त्याचं गणित फार चांगलं होतं शिवाय आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय घटनांचे त्याला ज्ञान होते. त्यावर तो सफाईदारपणे बोलू शकायचा. आपली मते मांडू शकायचा पण तो शिकू शकला नाही कारण त्याच्यावर अचानक कुटुंबाचा आर्थिक भार पेलण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यावर पाठच्या दोन भावांचे शिक्षण आणि भविष्य घडवण्याची जबाबदारी होती. भाऊ तसा कर्तव्यदक्ष होताच आणि त्याचे त्याच्या भावांवर अपार प्रेम होते. , ज्या संधी आपल्याला मिळाल्या नाहीत त्या भावांना मिळाव्यात ही त्याची मनापासून इच्छा होती आणि तशी त्याची धडपड होती आणि खरोखरच त्याने त्यासाठी त्याची स्वतःची घडण बाजूला ठेवून आई-वडिलांच्या संसाराची जबाबदारी कर्तव्यपरायणतेने खांद्यावर पेलली.. त्यात तो यशस्वी झाला. सत्यरंजन ज्याला आम्ही “पपी” म्हणत असू आणि सुभाष ज्याला आम्ही “बाळू” म्हणत असू, त्या दोघांची शिक्षणं विनाअडथळा पार पडली. दोघांनाही उत्तम पगाराच्या नोकऱ्याही मिळाल्या. “पपी” तर शिक्षण आणि नोकरीत अधिक सरस ठरला. भविष्यात त्याला अनेक संधी उपलब्ध झाल्या. हे फक्त “भाऊ” मुळे शक्य झाले याची जाणीव मात्र दोघांनाही होती. भाऊ जरी जिथे होता तिथेच राहिला पण त्याची कारणे या दोघांनी कधीही स्मृतीआड केली नाहीत. त्यांनी भाऊविषयी सदैव आदरच बाळगला.

मग लग्न ठरवताना आज पर्यंत स्वतःसाठी कुठलंही स्वप्न न पाहणाऱ्या भाऊने सुंदर मुलीशी विवाह करायचा निर्धार केला तर गैर काय होते? म्हणूनच सारे जण याबाबतीत.. जरी ही बाब फारशी कुणाला रुचत नसली तरी भाऊसोबत राहिले.

भाऊने अक्षरश: नव्व्याणव मुलींना नकार दिले. कोण सावळी, कोण बुटकी, कुणी अधिक उंच, कुणाचे दात किंचित पुढे, कोणाचे केस पातळ, कुणी जाडी कुणी लुकडी अशा विविध कारणांनी भाऊने धडाधड विवाहयोग्य वधूंवर फुल्या मारल्या. माझे पप्पा आणि आप्पा (भाऊ चे वडील) कधी कधी त्याला समजावण्याचा प्रयत्नही करायचे.

“अरे या मुलीला नाकारतोस? काय खोड दिसते तिच्यात तुला? शरीरयष्टी थोडी किरकोळ आहे पण लग्नानंतर होईल की ती भरदार आणि शिवाय तिचे वडील सचिवालयात मोठ्या पदावर आहेत. नाही म्हटलं तरी तुझ्यासाठी ते फायद्याचे ठरू शकते. तुलाही ते पुढे आणतील.”

 पण या कशाचाही होकारार्थी परिणाम भाऊवर व्हायचा नाही. झालाही नाही.

भाऊची स्त्रीसौंदर्यविषयीची नक्की काय कल्पना होती तेच कुणाला कळत नव्हते. सारेच हैराण होते. जिजी मात्र म्हणायची, ” योग यावा लागतो. वेळ आल्याशिवाय काही घडत नाही. आता भाऊ साठी मुली बघूच नका, ”

कधी कधी ती असेही म्हणायची, ” बघ हं भाऊ! “चापू चापू दगड लापू” असं व्हायचं तुझ्या बाबतीत,”

पण जिजीचे पहिले म्हणणे खरे ठरले. अखेर भाऊचे लग्न जुळण्याचा योग आला. वासंतीला भाऊने बिनतक्रार, कसलीही खोड न काढता क्षणात पसंत केले. वासंती ही शंभरावी मुलगी होती आणि भाऊच्या स्त्रीसौंदर्य कल्पनेत ती १००% उतरली. दोघांनीही एकमेकांना पसंत केले आणि भाऊचे लग्न जमले. गंगेत घोडं नहालं!

मोरेश्वर ढगे (मला नक्की नाव नीट आठवत नाही) यांची वासंती ही ज्येष्ठ कन्या. तिला अनिल नावाचा एकच भाऊ होता. वासंतीची आई जाडजूड, लठ्ठ, चष्मेवाली, थोडं अंगाशी सैल झोळ असलेलं नऊवारी लुगडं नेसणारी पण बोलण्यात स्पष्ट, ठणठणीत आणि काहीशी चतुर, चौकस होती. त्या मनाने वासंतीचे वडील मात्र शांत, गरीब, सरळ स्वभावाचे वाटले. अनिल उंच, मिस्कील आकर्षक असला तरी थोडासा कलंदर, बढायाखोर, उनाड असावा असा आपला एक अंदाज. अर्थात पहिल्याच भेटीत जजमेंटल कशाला व्हावे?

पण वासंती मात्र खरोखरच सुंदर होती. नाकी डोळी नीटस, रंग जरी सावळा असला तरी कांती सतेज होती. तिचे डोळे तर फारच सुंदर होते. मोठे पिंगट रंगाचे आणि पाणीदार, बोलके. केसही सरळ आणि लांब सडक. बांधा थोडा बसका आणि स्थूल असला तरी तिच्या एकूण व्यक्तीमत्वाला तो शोभून दिसत होता आणि बोलताना तिच्या पातळ ओठांची सुरेख हालचाल व्हायची. थोडक्यात काय वासंती सगळ्यांनाच आवडली. भाऊला हवी तशी मनासारखी जोडीदार मिळाली म्हणून सारेच खुश झाले. थोडं दडपण होतं ते म्हणजे गुलाबमावशीच्या स्टेशन रोडवरच्या राहत्या घराचं. घराला काहीच रेखीवपणा, सुविधाबद्ध आराखडा नव्हता. मुळात शयनगृह हा प्रकारच तिथे नव्हता. कशाही एकमेकांना जोडलेल्या, अर्थहीन, हेतूशून्य खोल्या. पाठीमागच्या बाजूने जिना उतरून खाली गेल्यावर कॉमन पद्धतीचे संडास तेही त्यावेळच्या टोपली पद्धतीचे. कॉमन अशासाठी की खालच्या मजल्यावर एक दोन भाडोत्री राहत होते आणि त्यांच्यासाठी वेगळी सोय नव्हती.

वासंती ही मुंबईत ग्रँटरोड सारख्या भागात राहणारी. त्यांचंही घर मोठं नसलं तरी मुंबईच्या वेगळ्याच शहरी वातावरणात वाढल्यामुळे त्यांच्या जीवन पद्धतीत फरक नक्कीच होता पण लग्न जमण्याच्या आनंदात काही बाबी किरकोळ ठरतात किंवा “पुढचं पुढे बघू” अशा सदरात जाऊन बसतात हेही तितकंच खरं.

वासंती आणि भाऊचे लग्न झाले. “लक्ष्मी नारायणाचा जोडा जणूं” म्हणून सारे नावाजले. दोन्ही कुटुंबात आनंदी आनंद होता. गृहप्रवेशाच्या वेळी वासंतीने लाजत मुरकत सुरेख शब्दांची गुंफण करून नावही घेतले. भाऊ तर काय हवेतच होता.

जिना चढून वर आल्यानंतर झोपाळा असलेल्या बाहेरच्या जागेच्या उजव्या बाजूच्या काहीशा काळोख्या खोलीचे रूपांतर भाऊ आणि वासंतीच्या शयनगृहात झाले. पूर्वी त्या खोलीतून पापड लोणच्याचे वास यायचे पण आता पावडर, परफ्युमचे सुगंध यायला लागले. काही आधुनिक, छान छान वस्तू तिथे दिसू लागल्या, सुंदर चादरी, पडदे झळकले. एक वेगळाच साज त्या खोलीला चढला आणि हे सारं केवळ वासंतीमुळे.

शक्यतो तिच्या आवडीनिवडी जपण्याचा भाऊ बऱ्याच वेळा रिकाम्या खिशाचा विचार न करता प्रयत्न करायचा. घरात वापरायची एक खोली नकळतपणे कमी झाली तरी बाकीच्या सर्व सदस्यांनी सांभाळून घेतले. याच घराच्या माळ्यावरच्या दोन खोल्यात कुमुदआत्या आणि तिचे कुटुंब राहत होते. गुण्यागोविंदाने सारे नांदत होते. सारी प्रेमाची, अत्यंत घट्ट जुळलेली नाती. याच नात्यात वासंती नावाचा एक नवा धागा सुंदर रित्या विणला जावा हीच साऱ्यांची अपेक्षा असणार ना? पण तसे झाले नाही. का? कुठे बिनसले? नक्की काय चुकले? कलहाची सुरुवात कशी कधी झाली हे कळलंच नाही. भाऊने पसंत केलेली शंभरावी, सुंदर वासंती आज पर्यंत ज्या कुटुंबात फक्त प्रेमाचीच कारंजी उसळली, एकमेकांसाठी कठीण परिस्थितीतही सारी भक्कमपणे उभी राहिली त्या कुटुंबात वासंतीचे अस्तित्व एका उसवू पाहणाऱ्या ठिगळासारखे जाणवायला लागलं.

 क्रमशः भाग ३७ / १

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “खुश है जमाना आज पहिली तारीख है…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “खुश है जमाना आज पहिली तारीख है” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

फार पूर्वी महिन्याची एक तारीख म्हणजे सगळ्यात आनंदाचा दिवस असायचा, कारण त्या दिवशी पगार मिळायचा आणि तो पण चक्क कॅश.

१ तारीख आणि पगार हा विचार मनात आला, आणि मी चक्क १९७१ सालामध्ये नाशिकला पोहोचलो.

उत्तम मार्काने इंजिनिअरिंग पास केले होते, पण कुठेही नोकरी लागत नव्हती. जवळजवळ पन्नास एक ठिकाणी तरी अर्ज केले असतील, कुठूनही उत्तर नाही. अचानकपणे नशिबाने साथ दिली आणि चक्क नाशिकला हिंदुस्थान एरोनॉटिक्स, मिग विमान तयार करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी लागली. पगार होता २२५ प्लस महागाई भत्ता ४०.

दर एक तारखेला दुपारी पगाराचे पैसे २६५ रुपये हातामध्ये मिळायचे. पैसे नंतर बँकेत भरायचे. आणि लागतील तसे २० रुपये, कधी ४० रुपये बँकेतून काढायचे. मजा असायची.

कंपनी मधला मित्र सिद्धांति याच्याबरोबर एका खोलीत भाड्याने राहत होतो.

खोलीचे भाडे होते प्रत्येकी १५ रुपये, बाहेर चहा प्यायला गेलो तर भोसले टी हाऊस चा चहा होता १२ पैसे, संध्याकाळी बाहेर जेवायला जायचो, तिथे साधे जेवण १ रुपया आणि स्वीट डिश आणि दह्याची वाटी घेतली तर जेवण दीड रुपया. सकाळचे जेवण कंपनीमध्येच व्हायचं, आणि चार्जेस अगदीच किरकोळ असायचे.

रात्रीचे जेवण झाल्यावर मित्राबरोबर फिरायला जायचो. एका छोट्या हॉटेलच्या समोर मोठी शेगडी ठेवलेली असायची आणि त्यावर कढईमध्ये दूध उकळत असायचे. आणि एकीकडे गरम गरम जिलब्या तळणे चालू असायचे. जिलबी मिळायची ३ रुपये किलो. गरम दुधाचा ग्लास वरती साय टाकून किंमत ३० पैसे (या किमतींवर आता विश्वास बसणार नाही). तिथे मस्त बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसायचं, इकडे तिकडे बघत बघत गप्पा मारायच्या, ५० ग्रॅम जिलबी आणि मस्त ग्लासभर दूध प्यायचो. नंतर फिरत फिरत खोलीवर परतून मस्त झोपायचो.

अशा रीतीने पगाराचे पैसे कॅश मिळणे, आणि कॅश खर्च करणे यात एक वेगळीच मजा असायची.

साधारण ११ महिन्यानंतर नाशिकची नोकरी सोडून पुण्याला टाटा इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये आलो, आणि एक तारखेला पगाराचे पैसे हातात मिळणे हा प्रकार संपला.

पण अजूनही महिना संपल्यानंतर कॅलेंडरचं पान उलटलं आणि एक तारीख बघितली की नाशिकची आठवण हमखास येतेच येते. आणि एक छान गाणं पण आठवतं किशोर कुमारचं – खुश है जमाना आज पहिली तारीख है…

तुमच्या पण अशाच आठवणी कळवा, मजा येईल.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अमेरिकेस जाताना… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ अमेरिकेस जाताना… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

काल मला भारतातून एका मैत्रिणीचा फोन आला होता. “अगं, माझा मुलगा MS करायला अमेरिकेला येत आहे. न्यू जर्सीमधील एका कॉलेजमधे ॲडमिशन मिळाली आहे. तर कुठे रहावं हे जरा तू चौकशी करून सांगशील का?”

मी अमेरिकेत गेली पस्तीस वर्षे रहात आहे. पण मी न्यू जर्सीपासून तीन तासांच्या अंतरावर रहाते. त्यामुळे त्या भागातील माहिती मलाही गोळा करावी लागली. त्याच्या कॉलेजजवळील काही अपार्टमेंट कॅाम्प्लेक्सची लिस्ट केली. spotcrime या वेबसाईटवर जाऊन त्या भागात चोऱ्यामाऱ्या कितपत होत आहेत बघितले व एक चांगली जागा निवडून त्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या मॅनेजरबाईंना फोन केला..

“Are you looking for an apartment for a master’s student?” तिने विचारले. मी ‘हो’ म्हणून सांगितले.

“कुठल्या देशातून हा स्टुडंट इथे येत आहे?” तिने विचारताच मी ‘इंडिया’ असे उत्तर दिले..

“Boy का Girl?” हे तिने विचारलेले मला विचित्र वाटले.

“ओह! माझ्याकडे उत्तम जागा आहे. पण मी भारतातून येणाऱ्या बॉय स्टुंडटला माझी जागा देऊ शकत नाही. ” तिने शांतपणे सांगितले.

“का बरं? असा भेदभाव का? अतिशय चांगल्या कुटुंबातील व माझ्या माहितीतील मुलगा आहे हा!“ मला तिचं वाक्य अजिबात आवडलं नव्हतं.

“मॅम, प्लीज ऐकून घे.. भारतातून आलेल्या मुलांना कामाची अजिबात सवय नसते. ते खूप हुशार असतात. अगदी व्यवस्थित वागतात, polite असतात. पण जागा अजिबात स्वच्छ ठेवत नाहीत हा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे! भेदभाव करायला मलाही आवडत नाही. पण मुख्यत्वे भारतातील मुलगे बाथरूम साफ करणे, भांडी घासणे वगैरेमध्ये फार कमी पडतात. ” तिने शांतपणे सांगितले..

मला धक्का बसला. जसजसे मी इतर दोन-तीन अपार्टमेंट मॅनेजरांशी बोलले, तेव्हा त्यांनीही भारतीय मुलगे अभ्यासाव्यतिरिक्त घर साफ ठेवणे वगैरे कामे करत नाहीत, असे कळले. भारतीय मुली कामे करतात. त्यांना जागा द्यायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही असेही त्यांनी सांगितले.

मी एक दोन भारतीय स्टुडंटबरोबर याबद्दल बोलले.

“मी कधीच घरी असताना बाथरूम साफ केली नाही. कारण कामाला बाई होती.. माझी आई कायम म्हणे की, तू फक्त अभ्यास कर. बाकी काही करायची जरूर नाही. त्यामुळे मला सवय नाही. ” अशा प्रकारची उत्तरे मिळाली.

भारतातील अनेक घरात आई, हाताखालच्या बायका, नोकर माणसं ही कामं करतात. मुलींचा सासरी उध्दार व्हायला नको म्हणून मुलींना घरकाम कदाचित आजही शिकवले जात असेल, पण मुलांना साफसफाई, स्वयंपाक करायची वेळ भारतात असताना येत नाही असे मला वाटते. पण मी तिथे बरीच वर्षे राहत नसल्याने मला नक्की माहित नाही.

हा मुद्दा एवढा मोठा आहे का?, असे वाचकांना वाटेल. पण भारतातील प्रत्येकजण जेव्हा भारताबाहेर राहतो, तेव्हा तो भारताचे प्रतिनिधित्व करत असतो. ‘तुमच्या मुलांना जागा स्वच्छ ठेवता येत नाही’, हे वाक्य अमेरिकन माणसाने सांगितलेले, हा भारतीयांचा अपमान आहे असे मला वाटते.

बरेचदा पैसे वाचवण्यासाठी दोन-तीन स्टुडण्टस एक अपार्टमेंट शेअर करतात, तेव्हा आतील सर्व साफसफाई प्रत्येकाला करावी लागते. हे विद्यार्थी वेगवेगळ्या देशांचे असू शकतात.. दुर्दैवाने भारतीय मुलांना अशा कामाची सवय नसते. त्यामुळे त्यांच्यात भांडणं होऊ लागतात.

अभ्यासात उत्तम असणारा भारतीय विद्यार्थी जेव्हा बाथरूम साफ करू शकत नाही, तेव्हा भारताच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो. आमच्या देशातील मुलांना बाकी सगळं जमतं, पण स्वच्छतेसारखी मूलभूत गोष्ट न यावी याचे काय कारण आहे? बाथरूम साफ ठेवणे, किचनमधील भांडी वेळच्या वेळी घासणे, प्लास्टिक, पेपरसारखा कोरडा कचरा आणि ओला कचरा सुटा करून गार्बेज पिक-अपच्या दिवशी घराबाहेर नेऊन ठेवणे ही कामे स्वतः करणे आणि व्यवस्थित करणे अत्यंत महत्वाचे आहे..

जी मुले बाहेरच्या देशात शिकायला जाणार आहेत, त्यांना त्यापूर्वी किमान सहा-आठ महिने वरील गोष्टींची सवय करावी. कारण they represent India when they live in another country.

लेखिका :  सुश्री ज्योती रानडे

संग्राहिका : सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘Busy’ असलेला आईवर्ग… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘Busy’ असलेला आईवर्ग… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

आजच्या ६५, ७०, ते ७५ वयोगटाचा जो आईवर्ग आहे तो प्रचंड व्यस्त आहे. खरतर हा आनंदाचा भाग आहे तरी चिडचिड होते.

आईचा योगवर्ग, भिशी, मदत सप्ताह, सत्संग, पूजा, महत्वाच्या भेटी गाठी, बँकेच्या फेऱ्या, वाढदिवस, नाटक अशी एक ना अनेक कामं यामध्ये हा आइवर्ग खूप व्यस्त असतो. आईला फोन केला तरीही वेळ बघा, तिला वेळ आहे का विचारा… आईला आपल्या घरी राहायला बोलवलं तरी तिला Time table बघून मगच एखाद दिवस वेळ असतो. इकडे आल्यावर पण मैत्रिणीचा फोन येणार, ” लेकिकडे गेलात का, उद्या येता ना पण, आपलं हळदीकुंकू ठरलं आहे. ग्रुप वर टाकलंय “

झालं.. आईची लगबग सुरू… शेवटी मला म्हणणार, तूच ये गं निवांत तिकडे रहायला..

आईला आता वेळच नाही आपल्यासाठी? हे मनात येऊन जातं. पण दुसऱ्या क्षणी वाटतं. या किती आनंदी राहतात! यांच्या ग्रुपला एकदा भेटायला गेले होते, मस्त धमाल असते. Gossip वैगेरे काही नाही, सूना बिना सगळं विसरून एक एक उपक्रम चालू असतात. हसणं, चिडवणं, गाणी म्हणणं, वाचन चालू असतं. त्यांचे ते काही तास मस्त जातात. आर्थिक स्वातंत्र्य आणि तब्येतीची काळजी घेतल्याने त्यांची सेकंड इनिंग मनासारखी चालू आहे. उगाच कुठल्याही गोष्टीत अडकत नाहीत. समविचारी, समदुःखी आणि सम वयस्कर लोकांमध्ये राहणे जास्त आनंद मिळतो.

मला आठवतं माझ्या आजीला असा ग्रुप नव्हता. मंदिरात वैगेरे थोडा वेळ जायचा. त्यामुळे सूना नणंद नातवंडं मुलं इतकंच जग. घरात तेच तेच विषय.. आर्थिक स्वातंत्र्य ही नव्हतं. पण आता काळ बदलतोय. नवे विचार येत आहेत. मोकळीक मिळत आहे हे पाहून आनंद वाटतो.

आनंदी आणि समाधानी आई पाहणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. त्यामुळे ही बिझी आई स्वीकारायला हवी. तिची वेळ पाळून तिच्या सोबत मिळतील ते आनंदाचे क्षण रहायला हवं. चला आई आता दुपारी फ्री असेल फोन करून घेते पटकन……

लेखक : अज्ञात 

प्रस्तुति : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

गुंडीचं उडुपी हॉटेल –

श्रीवर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या या अन्नदान उपक्रम मुळे माझे मन मागे मागे अगदी जुन्या पुण्यात पोहोचलो आणि डोळ्यासमोर आलं ते गुंडीचं उडुपी हॉटेल सकाळ ऑफिस कडे जाणारा श्री जोगेश्वरी च्या जवळचा बोळ म्हणजे चालू करांचा बोळ. ‘बोळ’ हा त्यावेळचा परवलीचा शब्द होता. कारण तिथून पुढे वेश्यावस्ती लागत होती पानाचा तोबरा काजळ, केसांचे फुगे, रंगीबेरंगी साड्या, लाल भडक ओठ अशा त्या नेहमी नटून खिडकीत बसून असायच्या. आम्हाला तिथे जायला बंदी होती. पण का?हे काही कळायचं नाही, आणि विचारायची प्राज्ञा पण नव्हती शनिवार वाड्यावर किंवा जिजामाता बागे कडे जायला त्या बोळा चा शॉर्टकट होता. एकदा हिम्मत करून आम्ही मैत्रिणी तिथून गेलो आमचे भेदरलेले चेहरे बघून त्या हंसायला लागल्या हातवारे करून डोळे मिचकावून आम्हाला जेव्हा त्या बोलवायला लागल्या नां तेव्हा अहो!आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली एका दमात आम्ही तो बोळ ओलांडला. शालू करांच्या बोळ्याच्या तोंडाशी असलेल्या गुंडीच्या हॉटेलमध्ये त्या बायका राजरोस पणे शिरायच्या. जोगेश्वरीच्या खिडकीतून आम्ही चोरून बघायचो. चहा पिऊन बनपाव खाऊन पैसे न देता बेधडक त्या बाहेर पडायच्या. नवलच वाटायचं बाई आम्हांला! पै न पै वसूल करणारे हॉटेल मालक हात चोळत बसायचे. आणि तो तांडा गेल्यावर त्यांचा उद्धार करून डोळे गरागरा फिरवायचे. आमच्याकडून मात्र एका गोळीचे पाच पैसे पण सोडायचे नाहीत असं वाटायचं वाचले तर ते पाच पैसे उद्या उपयोगी पडतील. कधी कधी तर गोळी घेऊन पाच पैशाचं गाणं मुठीत आवळून पैसे न देता पळायचा आमचा विचार असायचा, हे लक्षात आल्यावर मालक ओरडायचे, “ए चाललात कुठे? गोळीचे पैसे टाका. पैसे कुणी द्यायचे तुमच्या काकांनी की मामांनी?त्या बायकांना सूट देणारे मालक आपल्याला गोळ्या फुकट का देत नाही या विचारांनी नाक फुगवून पाय आपटत आम्ही हॉटेलच्या पायऱ्या उतरायचो. गुंडी बारा महिने बंडी (जाकिट) घालायचे. अस्सा राग यायचा त्यांचा. सुरेश माझा भाऊ जरा बंडं होता. तो म्हणाला एक दिवस मी या गुंडी मालकांच्या बंडीचं बटणचं तोडणार आहे त्यावेळच्या पोरकटपणाचे आता हसू येतयं. ज्येष्ठ नागरिकात जमा झालेले आम्ही म्हणजे मी आणि सुरेशपरवा ह्या आठवणीने पोट धरून धरून हसलो. पण बरं का मंडळी! आमच्याकडून पैन पै वसूल करणारे गुंडी तसे सत्पात्री दान देणारेही होते. दुकान उघडल्यावर पहिला चहाचा कप दाराशी आलेल्या भिकाऱ्याला ते द्यायचे आणि नंतर भटक्या कुत्र्यांसाठी पावाची लादी मोकळी करायचे. ते पुढे आणि कुत्री त्यांच्या मागे हा सीन बघितल्यावर आम्ही म् ओरडायचो, ” अरे ते बघ दत्त महाराज चाललेत. त्यांचा हा नेम कधी चुकला नाही. आम्हाला कंजूष वाटणारे श्री गुंडी कुत्र्यांना देवासारखे वाटायचे. जोगेश्वरी च्या परिसरात प्रत्येकाच्या अंगात काही ना काही देण्याची दानत होती. सुवासिनी सणावारी आवर्जून मंदिरात येणाऱ्या गरीब ब्राह्मणांना पोटभर जेवायला घालून वस्त्रदान दक्षिणा देऊन संतुष्ट करायच्या. नवरात्रात माझ्या आईकडे तर नऊ दिवस सवाष्ण असायची. गरिबी असली तरी घासातला घास मुंजा, ब्राह्मणांसाठी गाईसाठी पण बाजूला काढला जायचा. श्रावण, भाद्रपद, अश्विन महिन्यात तर दानशूरतेचा कळस गाठला जायचा, कुमारीका सवाष्णी श्रीजोगेश्वरीच रूप समजून पुजल्या जायच्या आणि मायेची सावली ती जोगेश्वरी माता अनेक रूपातून अनेकांना दर्शन देऊन तृप्त करायची. अगदी खरं आहे हे! जोगेश्वरीची लीला तिचा महिमाच अघाध आहे. जय अंबे जय जोगेश्वरी माता की जय

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उणिवांची जाणीव … लेखिका : सौ. साधना डोंगरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ उणिवांची जाणीव … लेखिका : सौ. साधना डोंगरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

ऐक ना…

परवा बोलता बोलता मी तिला म्हणाले….

तू नक्की भाग घे या स्पर्धेत…

तशी ती म्हणाली….

ती म्हणजे ती मुक्ता ग… आपण तिला allrounder म्हणतो…

ती म्हणाली मला…. म्हणजे बघ विचार करावास असे वाक्य होते म्हणजे आहे तिचे.

माझ्यातल्या उणीवांची जाणीव आहे मला. त्यामुळे नको ग सध्या तुला सांगते मी खरचच पुन्हा नव्याने आकर्षित झाले तिच्याकडे…

उणीवांची जाणीव…. या दोन शब्दांचे एकत्र येणे म्हणजे सुधारणेचा प्रगतीचा श्रीगणेशाच नाही का…

उणीवा जाणवणे हाच एक गुण दुर्मिळ झालाय आजकालच्या जगात…. जो तो स्वतः सिध्द असल्यासारखा वागतोय त्यावेळी ही मात्र… जिला खूप काही येतय ती म्हणते…. उणीवांची जाणीव आहे म्हणून… थांबूया सध्या…. आवडलेच मला तिचे असे म्हणणे…

बघ ना…

उणीवांची जाणीव झालीय तर त्या उणीवा कमी करण्यासाठी वेळ हवाय तिला….

उणीवा नेमक्या कशा दूर करता येतील यावर विचार करण्यासाठी वेळ हवाय….

स्वाभाविक शारीरिक मानसिक अशा कुठल्या पातळीवर जाऊन आपण उणीवा दूर करु शकतो हे शोधण्यासाठी ती कामाला लागलीय…

आणि त्या दृष्टीने आत्मचिंतन ही चालू केलय तिने…

खरच उणीवांची जाणीव आपल्याला किती सामृध्दिक मोकळेपण देतेय हे विचारांती कळलय मला…

म्हणजे बघ ना….

उणीवांची जाणीव मला प्रतिक्रियेवर विचार कर सांगते.

एखाद्याच्या असाधारण व्यक्ततेवर किंवा होणाऱ्या टीकांवर भाष्य करताना खिलाडूवृत्तीने स्विकारल्यास तर माणासांना गमावणार नाहीस तू हे सांगते.

आणि मग आचरणातून आपोआप नम्रता डोकावायला लागते. आणि संवादास आवश्यक असे वातावरण ही तयार होते चुकांची जबाबदारी न टाळता उलट ती स्विकारून आत्म भान येतं ही आत्मजागरुकता आनंद देवून जाते….

आणि उणीवांची जाणीव खऱ्या अर्थाने वर्तुळ पुर्ण करते.

उणीवांची जाणीवेवर विचार मंथन करताना मधेच उलटे झालेल्या शब्दानी मी अंतर्बाह्य ढवळून निघाले….

ते शब्द होते…

“जाणीवेची उणीव“…

जाणीवेच्या उणीवेवर ही ऐक ना म्हणणार आहे तुला…

लेखिका : सौ. साधना डोंगरे 

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “साडी पुराण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “साडी पुराण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

साडी हा माझा जरा वीक पॉईंट आहे. तसा तो प्रत्येक बाईचा असतोच…पण माझा जरा वेगळा म्हणजे..इंग्रजीच्या अर्थाने weak आहे. इतकी वर्ष साड्या नेसूनही साडी या विषयावरच माझं ज्ञान अजूनही कच्चचं आहे.

साडीचा पोत बघून तिची किंमत मला कधीच सांगता येत नाही. मैत्रिणी मात्र अगदी परीक्षा घेतल्यासारखे अवघड प्रश्न विचारत असतात.

“नीता सेलमध्ये अगदी स्वस्तात ही निळी साडी घेतली..काय किंमत असेल?”

स्वस्तात म्हणजे दोनशेला घेतली असावी असं समजून मी दोनशे म्हटलं तर ती रागाने नुसती लाल झाली.

“सेल झाला तरी इतक्या कमी किमतीत मिळणार आहे का ?तू आणून दाखव बघू..तुला विचारलं हेच चुकलं..तुला साडीतलं काही म्हणजे काही कळतं नाही. तीनशेला घेतली. बाहेर हीची किंमत पाचशे आहे. ” रागाने ती बोलत होती.

आता या अनुभवावरून मी शहाणी झाले आहे. नंतर एका मैत्रिणीने साडीची किंमत विचारली.

मी लगेच विचारले,

” सातशेला घेतलीस का ग” 

विचारणारीची कळी खुलली. 

ती म्हणाली,

“अग फक्त चारशेला घेतली. तू ही सातशेला घेशील. तुला कोणीही हातोहात फसवेल. तुला साडीतलं ओ का ठो कळत नाही. “

“हो ग काय करू ग..खरचं मला अजूनही लक्षात येत नाही…” मी म्हणाले..

साडीतले लाल, पिवळा, निळा जांभळा, हिरवा हे ठळक रंग मला कळतात. त्या रंगाचे जे उपरंग असतात ते आले की माझा घोटाळा सुरू होतो….

एके दिवशी काॅटनची पिवळी साडी आवडली म्हणून मी ती दुकानातून घेऊन आले. जरा वेळाने सुधाचा फोन आला म्हणून तिला सहज.. साडी घेतली…असे सांगितले.

तिने विचारले,

“पिवळा म्हणजे कुठला पिवळा रंग?”

मला काही अर्थबोध होईना. म्हणून म्हटले,

“अग पिवळा आहे एवढं खरं”

” अग पण..म्हणजे गोल्डन येलो, हळदी का सनफ्लॉवर यलो ?”

समोर साडी असुनही मला काही सांगता येईना…

तोपर्यंत तिचा पुढचा प्रश्न तयार होता….

” मग ब्राऊनिश येलो आहे का?”

साडीकडे निरखून पाहिल्यावर लक्षात आले तो तसाही नव्हता….म्हणून तिला म्हटलं,

” तू प्रत्यक्ष येऊन पहा ग..मला काही समजत नाहीये. “

असं म्हणून मी फोन ठेवून दिला. आणि हुश्श केलं…

दोन दिवसांनी सुधा घरी आली होती. तिनी साडी पाहिली आणि म्हणाली,

“अगं एवढं कसं कळत नाही तुला हा ब्राईट यलो आहे..”

झालं म्हणजे तिसराच रंग होता साडीचा….

मला आवडलेली पटोला मी अठराशेला घेऊन आले. किंमत सांगितल्यावर माझी मैत्रीण किंचाळलीच…

” अगं तुला पटोला घ्यायची होती तर मला सांगायचं नाहीस का ? सेल होता तेव्हा घेतली असतीस..ईतकी घाई का केलीस? बघ आता किती महाग पडली…”

बापरे सुमारे दहा मिनिटें ती मला बोलत होती.

बर एकदा बोलून बाईनी गप्प बसावं की नाही ? 

परत एकदा एका कार्यक्रमात मी ती साडी नेसलेली दिसली की तिचं सुरू झालं….तिनी सगळ्यांना मी किती महागात साडी घेतली याच साग्रसंगीत वर्णन करून सांगितलं.

बाकीच्या बायका अगदी आश्चर्यचकित होऊन तिचं बोलणं ऐकत होत्या. तीला साथ देत होत्या…त्यातील एकीने पटोला चौदाशेला दुसरीनी बाराशेला आणि तिसरीने तर हजारलाच घेतलेली होती…

मला तर वाटतं बायका जास्ती असत्या तर पाचशेलाही पटोला घेणारी कदाचित त्या दिवशी मला भेटली असती….

हिरवी साडी घेऊन आले तेव्हा तर फारच गंमत झाली….

मैत्रिणीला कौतुकांनी ती दाखवली ती म्हणाली,

“अग नीता हा हिरवा रंग नाहीये..हा तर रामा कलर आहे. ” 

खरं सांगते तेव्हा रामा हा रंग आहे हे मला कळले. नंतर तिने मला बराच वेळ समजवून सांगितले तरी हिरवा रंग “रामा ” कधी होतो हे मला कळलेच नाही. शेवटी बिचारीने…हरे रामा…

म्हणून कपाळाला हात लावला.

नंतर घरी आलेल्या मैत्रिणीला कौतुकानी मी सांगितले,

” बघ मी नवीन रामा कलरची साडी घेतली. ” तर तिने विचारलं,

” तू यातला मजिंठा कलर का नाही घेतलास? तो खूप छान दिसतो. “

मला अजिंठ्याची लेणी माहीत होती. हे मजिंठा मी प्रथमच ऐकत होते….तरी अज्ञान ऊघडं पडू नये म्हणून मी म्हटलं,

” अगं त्यांच्याकडे मजिंठा कलरच नव्हता..”

” लाजरीकडून घेतलीस ना ?त्यांनी यातल्या मजिंठा कलरच्या साड्या शोकेस ला लावल्या आहेत “

यावर मात्र मी गप्प बसले.

असे फजितीच प्रसंग माझ्यावर वरचे वर येत असतात…

दुकानातली जी साडी आवडेल ती मी घेऊन येते. देताना दुकानदार त्या साडीचं नाव सांगतो. पण घरी येईपर्यंत मी ते विसरून जाते. मग मैत्रिणींनी विचारले, कुठली साडी आणलीस ?की उत्तर देता येत नाही. त्या दिवशी मात्र मी नांव पक्के लक्षात ठेवले होते. मैत्रिणीला उत्साहाने सांगितले,

” मणिपूर सिल्क घेतली”

तिने साडी हातात घेतली आणि म्हणाली,

“अग ही मणिपूर नाही काही….ही तर ढाका सिल्क आहे. “

” पण दुकानदारांनी ही मणिपूर म्हणून सांगितलं “

” अग त्याला काय कळतंय मी सांगते ना..ही ढाका सिल्कच….”ती ठामपणे म्हणाली.

बघा…म्हणजे दुकानदारांपेक्षा माझ्या मैत्रिणीचं ज्ञान जास्ती आहे.

साड्या बघताक्षणीच फटाफट त्यांची नांवे सांगणाऱ्या माझ्या मैत्रिणींच्या अफाट ज्ञानाचे मला फार कौतुक वाटते.

मी बेळगाव सिल्क घेतली तेव्हा फार गंमत झाली. शेजारच्या काकूंकडे त्याच वेळेस त्यांच्या कानडी वहिनी आल्या होत्या. काकूंना बेळगाव सिल्क दाखवायला गेले. त्यांच्या वहिनी जवळच बसल्या होत्या. साडी हातात घेऊन त्या म्हणाल्या,

“अहो हे बेळगाव सिल्क नव्हे हो..आमचं बेळगाव सिल्क कसं घट्ट असतंय..हे कसले हो पातळं..हे बेळगाव नाहीच बघा “

“वहिनी इथे हेच बेळगाव सिल्क म्हणून विकतात. “

यावर काकू म्हणाल्या,

” तुमच्या पुण्यातले लोक लबाडं बघा..कशालाही काहीही म्हणतात..आणि तुमच्या गळी मारतात फसवतात..”

” वहिनी पुण्यात यालाच बेळगाव सिल्क म्हणतात…” काकूंनी बोलायचं प्रयत्न केला… पण वहिनी ऐकून घेईनात…

” लोक काही म्हणत हो..हे बेळगाव सिल्क नव्हे बघा…माझं आणलं नाही..नाहीतर इथेच फरक दाखवला असता…”

काकू त्यांना परत पटवायला लागल्या पण वहिनी पण ठाम होत्या…

आता हा ” बेळगाव “प्रश्न असल्याने हा लवकर सुटायचे चिन्ह दिसेना तेव्हा मी माझी बेळगाव सिल्क घेऊन तिथून हळूच निघून आले.

साड्यांची नावे लक्षात राहावीत म्हणून मी त्या साडीच्या नावाशी खूणंगाठ बांधून ठेवते.

एका साडीचे नाव आहे वल्कलम्.

हे नांव पूर्वी ऋषी घालायचे त्या वल्कल या शब्दाशी मी जोडलेले आहे. म्हणजे ऋषी..साडी…वल्कलं असं मी मनात ठेवलेल आहे.

खरं म्हणजे साडी आणि ऋषी ही जोडी जरा विजोडच वाटते..पण मला लक्षात ठेवायला सोपे आहे.

मला हलकी भारी कुठलीही साडी आवडते. नवीन साडी मिळाली याचाच आनंद वाटतो. त्या दिवशी ची साडी बघून मैत्रीण म्हणाली,

” नीता साडी दिसायला छान आहे…पण टिकेल असं वाटत नाही. “

इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आता एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. मग तीच तिला सांगितली म्हटलं….

” अगं संत सज्जनांनी सांगून ठेवलेले आहे हा देह नश्वर आहे…मग तिथे त्यावरच्या साडीची काय कथा? टिकेलं तेवढे दिवसं आनंदानी वापरायची..

हा देह आहे तोपर्यंत आला दिवस मजेत घालवायचा मग पुढचे पुढे बघू….”

काय खरं की नाही?..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

निवडुंग.

निवडुंग या काटेरी, झुडुप प्रकारच्या वनस्पतीशी माझ्या काही बालपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत. धारदार बोथट मणके असलेल्या निवडुंगाच्या चांगल्या गलेलठ्ठ फांदीचे एक सारखे उभे तुकडे करून, त्याचे सुरेख दिवे आई बनवायची. त्यात तेल वात रुजवायची. आणि चांदीच्या ताटात ते पेटवलेले दिवे लावून दिवाळीच्या धनतेरसच्या दिवशी धनाची पूजा करायची. इतका देखणा देखावा असायचा तो!

आजी म्हणायची प्रत्येक वनस्पतीचा सन्मान ठेवणे ही आपली संस्कृती आहे.

याच निवडुंगाशी माझी एक कडवट आठवणही आहे. आमच्या बागेत सदाफुली, मोगरा, जास्वंदी, जाई आणि जुई सोबत एका कुंडीत कोरफड लावलेलं होतं. काटेरी धारदार गुळगुळीत, मऊ, हिरवागार कोरफडीचा वाढलेला गुच्छ छानच दिसायचा. पण मला खोकला झाला की आजी, या कोरफडीची फणी कापून त्यातला गुळगुळीत गराचा रस करून प्यायला लावायची. खोकला पळायचा पण मनात रुतलेला त्याचा कडवटपणा मात्र नकोसा वाटायचा.

कधी कधी आजी तो गर केसांनाही चोपडायची. माझे कुरळे दाट केस पाहून मैत्रिणी म्हणायच्या,

“इतके कसे ग दाट तुझे केस?” मी त्यांना सांगायची, “कोरफडाचा चीक लावा”. तेव्हां त्या नाकं मुरडायच्या.

ठाण्याला शहराचे स्वरूप गेल्या काही वीस पंचवीस वर्षापासून आलं असेल. पण त्याआधी ठाण्याच्या आसपास खूप जंगलं होती. काटेरी, वेडी वाकडी, मोकाट वाढलेली. प्रामुख्याने तिथे निवडुंगाची झाडे आढळायची. आणि त्या वयात निवडुंग या वनस्पतीविषयी कधी आकर्षण वाटलंच नाही. नजर खिळवून ठेवावी असं कधी झालं नाही.

नंतर कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्राचा अभ्यास करताना या निवडुंगाची पुन्हा वेगळी शास्त्रीय ओळख झाली. कॅक्टेसी, फॅमिली झीरोफाइट्स(xerophytes) अंतर्गत येणाऱ्या या निवडुंगाचे अनेक प्रकार हाताळले. पाहिले. कितीतरी वेगवेगळे प्रकार, वेगवेगळी नावे. वई निवडुंग, त्रिधारी निवडुंग, फड्या निवडुंग, बिनकाट्याचा निवडुंग, पंचकोनी निवडुंग, वेली निवडुंग, लाल चुटूक फळं येणारी काही गोंडस निवडुंगं, काही काटेरी चेंडू सारखे दिसणारे..असे कितीतरी प्रकार अभ्यासले. वाळवंटातही हिरवगार राहण्याची क्षमता असलेलं हे काटेरी झाड, फांद्यांमधे कसं पाणी साचवून ठेवतं आणि स्वतःला टिकवतं, याचा वनस्पतीशास्त्राच्या पुस्तकातून भरपूर अभ्यास केला. त्याचे पर्यावरणीय आणि वैद्यकीय फायदे जाणून घेतले. पुढील आयुष्यात तर या निवडुंगाच्या छोट्या कुंड्यांनी घरही सुशोभित केलं. एक काळ असा होता की घरात विशिष्ट प्रकारचं कॅक्टस असणं हे स्टेटस झालं होतं! आजकाल तर एलोवेरा जेल, एलोवेरा क्रीम, ऑइल यांनी तर घराघरात ठाण मांडलेआहे. एलोवेरा म्हणजे तेच ना आजीचं कोरफड?

आता माझ्या अंगणात एका कोपऱ्यात, आई ज्याचे दिवे बनवायची ते चौधारी निवडुंग खूप वाढले आहे. कधी कधी ते उपटून टाकावं का असेही माझ्या मनात येतं. पण उन्हाळ्यात जेव्हा काही झाडं सुकून मरगळतात तेव्हा हे हिरवंगार निवडुंगाचं झुडुप मला काहीतरी सांगतं. शिकवण देतं. माझा गुरू बनतं. मला ते काटेरी झाड स्वयंपूर्ण वाटतं. स्वतःची शस्त्रं सांभाळत स्वतःचं रक्षण करणारं सक्षम जैविक वाटतं. वाळवंटातही हिरवेपण जपणारं एक कणखर व्यक्तिमत्त्वाच्या रूपात ते माझ्यासमोर येतं. आणि मनात सहज येतं, आपणही असेच निवडुंग होऊन जावे. जीवनाच्या वाळवंटी, विराण वाटेवरही हिरवेगार राहावे. काटे सुद्धा दिमाखाने मिरवावेत…

आणि जमलं तर आईच्या पूजेच्या ताटातला दिवाच होऊन जावे..

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares