प्रत्येक चार चाकी वाहनात सामान ठेवण्यासाठी छोटीशी जागा असते. त्या डिकीत आपण आपले सामान ठेवत असतो. चोखंदळ लोकं त्या डिकीची धारण क्षमता पाहून गाडीची निवड करीत असतात….!
समजा गाडीला डिकी नसती, तर मनुष्याला सामान मांडीवर ठेवून प्रवास करावा लागला असता, आणि तो सुखावह झाला असता…?
पहा कल्पना करून….
जीवनप्रवास आनंदाने करायचा असेल तर आपल्या मनावरील, मनातील, मनाच्या आजूबाजूचे ओझे ठेवायला एखादी डिकी शोधून ठेवायला हवी, नाही का?
गोरेगाव, मुंबई येथे माझी सन्मित्र मंडळाची शाळा. तळमजल्यावर बालवाडी ते चौथीपर्यंतच्या इटुकल्या पिटुकल्यांचा कलकलाट ऐकू येतो, हीच ती ‘बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळा’. याच शाळेत १९७९ साली सौ. गीता वासुदेव नलावडे – आमच्या नलावडे बाई (8655846810) यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि माझ्यासकट शेकडो मुलांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली.
बाई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त ११वी मॅट्रिक व DEd पर्यंतच होतं. लग्नानंतर नोकरीबरोबरीने शिक्षण चालू ठेवण्याचा आग्रह व सक्रिय पाठिंबा नवऱ्याचा हे त्या आग्रहाने नमूद करतात. MA, DEd झालेल्या बाई वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या.
तुमच्या पैकी ज्यांना १ – २ मुलं आहेत, त्यांनी त्या मुलांची लहानपणाची वयं आठवा. त्यांची दंगामस्ती, क्षणाक्षणाला बदलणारे त्यांचे मूड व रंगढंग आठवा. दर वर्गात अशा ४०-५० मुलांना बरोबर घेऊन वर्षानुवर्षं स्वत:चं डोकं शांत ठेवत या मुलांना ठाकून ठोकून तयार करण्याच्या आपल्या कामात बाईंनी स्वत:ला गुंतवून घेतलं. मला वाटतं देव प्राथमिकच्या शिक्षकांना जास्ती पेशन्सचा बोनस देत असावा.
मुलांनी चावटपणा करून ‘बाई तुमचं अक्षर चांगलं नाही, वाचता येत नाहीये’ असं म्हटले किंवा उगाच व्याकरणाच्या चुका काढल्या तरी अशा घटनांचा बाऊ न करता बाईंनी या गोष्टी आपल्याला सुधारणेला वाव आहेत म्हणून स्वीकारल्या – त्या मुलांबद्दल कोणताही राग वा आकस न बाळगता.
सगळ्यांच्यातच काही ना काही चांगले आहे हा बाईंचा ठाम विश्वास. ते शोधून काढणे व त्यांना तशी कामं देणे यात बाईंचा हातखंडा. त्यामुळे आपण इकडचे कामाचे डोंगर तिकडे केलेत याचे भान ना त्या सह-शिक्षिकांना रहातं ना त्या मुलांना. कोणाचं चुकलं की त्याला ‘धपाटे देईन हं’ असे म्हणायचं (बाई मारायच्या नाहीत कधी, नुसतीच शाब्दिक धमकी) आणि बरोबर आले की पैकीच्या पैकी मार्क देऊन टाकायचे असा सगळा रोखठोक कारभार.
कोणतीही अवघड परिस्थिती आल्यावर न डगमगता तिचा सामना करणे ही बाईंची खासियत. मग बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये चाळीस विद्यार्थी सहलीला घेऊन गेल्या असता वाघोबा आमने सामने येणं असो किंवा कोकणात किर्र अंधाऱ्या रात्री सुनसान रस्त्यावर मुलांना सोबत घेऊन बसची वाट पहाणं असो किंवा सिंहगड किल्ल्यावरून वांड मुलांना घेऊन अंधारात खाली येणं असो.
कुठेही गैरप्रकार दिसला किंवा आपल्या मुलांना कोणी त्रास देताना दिसलं की तिथे मात्र दयामाया हा शब्द बाईंच्या शब्दकोशात नसतो. आमच्याच माध्यमिक शाळेतल्या मुलीची एका मवाल्याने – स्थानिक गुंडाने – छेड काढल्यावर, पुरुष सहकारी चाचरताना, रणरागिणीचे रूप घेऊन बाईंनी भर रस्त्यात त्याच्या मुस्कटात भडकावून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
मुलांच्या विकासासाठी, अनेकानेक सामाजिक कामांसाठी बाईंनी विविध उपक्रम शाळेत राबवले. ‘श्वास’ चित्रपटासाठी मुलांनी स्वत: आकाशकंदील बनवून विकले व आलेले पैसे अभिनेता अरुण नलावडे यांना दिले होते.
खुर्चीत असले की मी शिक्षक / मुख्याध्यापिका आहे, शाळा सुटली की मी तुमच्यातलीच आहे – तुमची मैत्रीणच आहे – असं सहशिक्षिकांना आवर्जून सांगणाऱ्या बाई सतत नवीन गोष्टी शिकण्याचा आग्रह धरतात. बाईंचे सर्व सहकाऱ्यांशी इतके घरच्यासारखे संबंध होते की सर्वोत्कृष्ट शिक्षकाच्या महापौर पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज व फाइल सहशिक्षिकांनीच तयार केली व पाठवली. बाईंना १९९७-९८ सालाचा महापौर पुरस्कार मिळाला व पुढे अतिशय बहुमानाचा २००९-१० चा आदर्श शिक्षिकेचा राष्ट्रपती पुरस्कारही. बाईंच्या अथक प्रयत्नांनी व सोमण बाई, बर्वे बाई, पाटील बाई, धारप बाई, सुमन ताई आणि त्यांच्या अगणित सहकाऱ्यांच्या साथीने शाळेला २०००-०१ सालचा ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाला, A ग्रेडसुद्धा मिळाली व मिळत राहिली.
बाईंनी आम्हा दिवट्यांच्याच आयुष्यात प्रकाश पाडला असं नाही तर त्या आम्हा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच होत्या – आहेत. कुटुंबाला उभं करताना बाईंनी विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना मदत केली आहे, आर्थिक मदत तर केलीच पण कित्येकांचे संसारही मोडण्यापासून वाचवले आहेत.
“असंही माझ्या डोळ्यात पटकन पाणी येतं. पण एकदा तर फारच अवघड परिस्थिती झाली होती, ” बाई सांगत होत्या, “एक गरीब मुलगा होता, त्याला आपल्या शाळेत शिशु वर्गात प्रवेश घ्यायचा होता. त्याची आई धुणी भांडी करायची. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी १, ००० रुपये refundable deposit घ्यायचं असायचं. हे म्हटल्यावर तिने रुमालाची पुरचुंडी काढली. त्यात तिने वेळोवेळी साठवलेल्या रुपया, दोन-पाच रुपयाच्या नोटा होत्या. पण ते सगळे पैसे जेमतेम चार – पाचशेच भरत होते.
मी तिला सांगितलं ‘तुमच्या मुलाचं नाव लागलंय, तुम्ही काळजी करू नका. पण शक्य तेवढ्या लवकर उरलेले पैसे भरून टाका म्हणजे प्रवेश पक्का होईल’, तर ती दुसऱ्याच दिवशी हजर. हातात पन्नासच्या नव्या नोटा. ‘क्लार्कला पैसे द्या’ म्हणून सांगणार इतक्यात माझं लक्ष तिच्या ओक्याबोक्या गळ्याकडे गेलं. तिने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले होते. बापरे, तिला ते पैसे तसेच परत केले आणि मंगळसूत्र सोडवून आणायला सांगितले. माणसं चांगली असतात रे, परिस्थिती त्यांना वाईट बनवते. “
बाईंच्या कुंडलीत मुलांशी गट्टी असा एक मोठ्ठा योग आहे. शाळा सोडून वर्षे उलटून गेली तरी जगाच्या कानाकोपऱ्यातून बाईंना फोन येत असतात. कुठल्याही गोष्टीचा मुलांच्या angle ने विचार करणे, त्यांच्या मनात शिरणे ही हातोटी साधलेल्या बाई विद्यार्थीप्रिय झाल्या नसत्या तरच नवल होतं.
आणि ही गट्टी मुलांनी शाळा सोडल्यावर, त्यांची शिक्षणं पूर्ण झाल्यावर, अगदी नोकऱ्या लागल्यानंतर, पार लग्नानंतरसुद्धा तितकीच घट्ट रहाते. फक्त नंतर झुकतं माप मुलांपेक्षा कुटुंबातील नव्या members ना – सुना-जावयांना दिलं अशी जरा एक गोड तक्रार मात्र येते.
देश विदेशी विखुरलेल्या आम्हा नर रत्नांना बाईंना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली गेल्या वर्षीच्या जानेवारीत (२०१९). निमित्त होतं शाळेच्या ६० वर्षं पूर्ण होण्याचं. माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा घाट घातला होता. कार्यक्रम संपल्यावर बाईंनी सांगितलं की राष्ट्रपती पुरस्काराच्या वेळेला खूप बंधनं होती, नियमावली होती. इथं तसं नव्हतं. इथं माझ्यात आणि माझ्या मुलांच्यात कोणताच अडथळा नव्हता, त्यामुळे त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कारच मला जास्त भावतो.
निवृत्तीनंतर बाई आता DSK विश्व, पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. निवृत्तीनंतर म्हणजे शाळेतून निवृत्ती, बरं का! कारण सोसायटीत सगळ्यांनी गळ घालून बाईंना कमिटीवर घेतले. मग गरजेनुसार ‘धपाटे देईन हं’ म्हणून आणि पैकीच्या पैकी मार्क्स देऊन काम करवून घेण्याचा त्यांचा शिरस्ता आता या मुक्कामी चालू आहे.
बाईंची धावपळ व सामाजिक बांधिलकी अजून चालूच आहे. मुंबईत रात्र शाळेच्या त्या सह सचिव (joint secretary) आहेत. पुण्यात त्यांचं भगवद्गीता, सप्तशतीचा पाठ शिकणे, पठण करणे चालू असतं. DSK विश्वमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्य व बाई यांनी एके दिवशी प्रत्येकी एक एक समास हाती लिहून काढून एका दिवसात संपूर्ण दासबोध लिहूनही घेतला, त्या हस्तलिखिताचं binding करून घेतलं आणि ते बाड शिवथरघळीत पादुकांवर ठेवलंही.
समर्थ दासबोधात दहाव्या समासात म्हणतात :
महंते महंत करावे,
युक्तीबुद्धीने भरावे,
जाणते करून विखरावे,
नाना देशी.
समर्थच असेही म्हणतात की
आपणासी जे ठावे,
ते ते दुसऱ्यासी सांगावे,
शहाणे करून सोडावे,
सकळ जन.
हल्लीच्या काळात पु ल आपल्या चितळे मास्तरांच्या मुखाने सांगतात – आयुष्यात व्रत एकच केले. पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसून जगात पाठवून देणं. बाई अख्खं आयुष्य याच तत्वांवर जगत आल्या आणि अजूनही ती वाटचाल चालूच आहे.
जुन्या काळच्या एकत्र कुटुंबांत आजीची ढीगभर नातवंडे असत. सगळ्याच नातवंडांना वाटायचे की आपणच आजीचे लाडके. बाईंच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं तसंच आहे. आणि या प्रेमाचा अभ्यासातील गुण किंवा जीवनातील यशस्वी होण्या न होण्याशी अर्थाअर्थी काही संबंध नसतो बरं का!
आणि हो, बाई शाळेतून कधीच निवृत्त झाल्या पण आजही मुंबईत, सरकार दप्तरी गोरेगावची बैरामजी जीजीभॉय शाळा “नलावडे बाईंची शाळा” म्हणूनच ओळखली जाते, बरे का!
सोलापूर मध्ये अनेक शाळांची मिळून एक विज्ञान दिंडी निघालेली होती. त्यावेळेला एक विज्ञान प्रदर्शन ‘नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल’ मध्ये भरले होते. त्याचे उद्घाटन आदरणीय डॉक्टर जयंतराव नारळीकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शालेय मुलांसाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे नारळीकरांचे व्याख्यान होणार होते. विज्ञान दिंडी निघाली होती. या दिंडीमध्ये अनेक विद्यार्थी, शाळा सहभागी झालेल्या होत्या. सरस्वती मंदिर पासून हि विज्ञान दिंडी निघून, ती नवी पेठ मार्गे मेकॅनिक चौकातून हुतात्मा स्मृती मंदिर जवळ विसर्जित झाली. एका मोठ्या उघड्या टेम्पोमध्ये मी एक रोबोट बनवला होता. त्या रोबोटच्या आत श्रद्धा कुलकर्णी नावाची एक विद्यार्थिनी होती. ती आता अमेरिकेत सी. ए. आहे. उंचीने लहान असल्यामुळे तिला रोबोटचा पूर्ण पोशाख घातला होता. अर्थातच् संपूर्ण रोबोट थर्माकॉलचा बनवलेला होता. हात ताठ होते. मुंडके मात्र हालत होते.
लोक रस्त्यावरून त्या रोबोटला फुलं देत होते, खाऊचे पुडे देत होते. रोबोट सर्वांना हात हालवून अभिवादन करीत होता. अशा पद्धतीने ती विज्ञान दिंडी हुतात्मा स्मृती मंदिर पाशी विसर्जित झाली. त्याचे स्वागत डॉक्टर नारळीकरांसह अनेकांनी केले. रोबोटने नारळीकरांना एक पुष्पगुच्छ दिला. नारळीकरांनी तिला शुभेच्छा दिल्या आणि डोक्यावर हात ठेवला. पण मानवी संस्कारी सवयीप्रमाणे ती खाली वाकली आणि तिचे रोबोटचे तात्पुरते घातलेले मुंडके नकळत खाली पडले. नारळीकर सर पटकन म्हणाले, ‘‘सो द ट्रुथ कम्स आऊट”…
मी त्यांच्या शेजारीच उभी होते. मी त्यांना म्हणाले, ‘‘सत्य शोधणे हेच तर विज्ञानाचे काम आहे ना! ! ” त्या माझ्या अपेक्षित आणि पटकन् आलेल्या उत्तरावर ते खूप खुश झाले. त्या दिवशी त्यांचे व्याख्यान खूप सुंदर झाले. त्यांच्या स्वागतासाठी एक खास ‘स्वागत गीत’ मी लिहिले होते आणि आमच्या विश्वकर्मा बाईंनी ते सादर केले होते. झपतालामध्ये ते गीत होते. मला संगीतातला तो ताल-बिल काही कळत नव्हता. मग त्यांनी मला त्या तालातले एक गाणं दिलं… ‘‘अजी रुठ कर अब कहा जाईयेगा… ” आणि मी त्याच चालीवरती एक स्वागत गीत तयार केले होते. स्वागत गीताला खूप टाळ्या पडल्या. संपूर्ण हुतात्मा स्मृती मंदिर प्रेक्षकांनी भरले होते. त्यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी खूप सुंदर झाले. आमच्या विज्ञान दालनाचेही त्यांनी भरपूर कौतुक केले.
अतिशय विद्वान असा हा माणूस होता. भारतीय संस्काराने परिपूर्ण आणि विज्ञानावर विलक्षण निष्ठा होती. खगोलशास्त्रावरती अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले होते. अशा व्यक्तीच्या सहवासात पाच तरी मिनिटे घालवता आली… हे आमचे भाग्यच!
आजच्या खगोलशास्त्रीय विज्ञान संशोधनात त्यांचा खूप मोठा असा ‘सिंहाचा वाटा’ आहे. अशा या महान खगोलशास्त्रज्ञाला आमचा मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. खूप मोठा ऐवज आज आम्ही हरवला आहे. त्यांच्या जाण्याने एक विज्ञान तपस्वी नाहीसा झाला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
आयुष्य मोठं गमतीशीर आहे, सतत काहीना काही पाहिजे असतं. एक झालं की दूसरं मग तिसरं..
हे चक्र चालूच.
लहानपणी स्वतःपुरता विचार करणारे आपण, जबाबदारी, कर्तव्य पार पाडताना बदलतो. ‘जगणं’ स्वतःपेक्षा इतरांसाठीच होतं. चिंता, टेंशन्स, काळजी, धावपळ, तडजोडी हेचं रुटीन. सगळं चांगलं आहे पण मन शांत नाही. अस्वस्थता सोबत असतेच तेच ते अन तेच ते… काहीतरी हरवलंय.
विचार करताना लक्षात आलं की, इतरांचं करण्याच्या नादात स्वतःलाच विसरलो. आवडी-निवडी, छंद बाजूला टाकून जगतोय… मग ठरवलं की स्वतःला रिचार्ज करायचं, वय्, स्टेटस. आई-वडील, घर, संसार, बायको, मुलं, ऑफिस. जबाबदाऱ्या, चिंता आणि मोबाइल…. सर्वांना दूर ठेवून एक दिवस स्वतःबरोबर घालवायचा.
बायकोला सांगितलं तर कपाळाला हात लावत म्हणाली “ताप नाहीये”
मी तडकलो तेव्हा तिनं हसत हसत विचारलं….
“नक्की काय करणारेस”
“माहिती नाही. काहीतरी डिफरंट”
“ऑल द बेस्ट, ” म्हणत तिनं हातात टिफिन दिला.
“हे कशाला? ”
“अहो कोलंबस, स्वतःच्या शोधात निघालात तेव्हा बाहेरपेक्षा घरचं खाणं केव्हाही चांगलं”
मोबाईल स्वीच ऑफ करून बाहेर पडलो.
बसस्टॉप पाहून रिक्षानं जाण्याचा विचार बदलला. तसंही खूप वर्षात बसनं प्रवास केला नव्हता. रविवार असूनही बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. शेवटच्या स्टॉपचं तिकीट काढलं. खिडकीतून रस्त्यावरचं ट्राफिक पाहत बसलो. अचानक ओळखीचा परिसर दिसायला लागल्यावर कुठं आलोय ते लक्षात आलं. पुढच्याच स्टॉपला उतरलो. दहावीपर्यंत याच भागात राहिलेलो. नंतर शिक्षण, नोकरीमुळे वेगवेगळ्या शहरात गेलो आणि आता इथंच सेटल झालो…. या सगळ्यात, कधी बालपणीच्या ठिकाणी यायला जमलंच नाही.
आणि आज अचानक ध्यानीमनी नसताना योग आला.
…. प्रचंड आनंद झाला. एक भन्नाट फिलिंग. चालत निघालो. एक्साइटमेंट वाढलेली. खूप वर्षानी जुना परिसर पाहताना अंगावर शहारा आला. भिरभिरत्या नजरेनं सगळं मनात साठवताना आठवणींचे एकेक धागे जोडले जात होते…..
…. खूप काही बदललेलं.. एकदोन जुने वाडे सोडले तर सगळ्या नवीन बिल्डिंग आणि नवीन माणसं.
काही जुने थकलेले चेहरे दिसले. आवर्जून भेटलो. ओळख पटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप सुखावणारा होता.
गप्पांच्या ओघात जुन्या काळात गेलो…..
…. त्या काळातली मजा, मस्ती, खेळ, सण, गणपती मंडळ सगळं डोळ्यासमोर आलं. आमच्या वाड्याच्या जागी झालेल्या बिल्डिंगकडे पाहताना वाड्यातल्या असंख्य कडू-गोड आठवणी नजरेसमोर आल्या. खूप भरून आलं… ‘आठवणी’ आपल्याला मिळालेलं फार मोठं वरदान. त्या नसत्या तर माणसं दगड झाली असती. आठवणींचा घोळका सोबत घेऊन बराच वेळ गल्लीबोळातून भटकलो. अजूनही जुन्या काळाची जाणीव करून देणारे अवशेष काही ठिकाणी शिल्लक होते.
…. फिरताना आपसूकच पाय जवळच्या प्राचीन मंदिराकडं वळले. लहानपणी दररोज यायचो आणि आता तब्बल 22 वर्षांनी पाऊल ठेवत होतो. बरीच पडझड झालेली तरी काही ठिकाणी नवीन बांधकाम आणि दुरुस्ती केलेली. दर्शन घेऊन सभामंडपात डोळे बंद करून ध्यान लावलं… एकेक क्रिया यंत्रवत घडत होत्या. रोजच्या धावपळीत एक क्षणही फुरसत नसते पण आज….
…. सारखी चिडचिड करणारा मी आज खूप शांत होतो. खूप छान वाटलं. बराच वेळ बसलो. आपण एकजागी इतका वेळ शांत बसू शकतो याचं आश्चर्य वाटलं. मन तृप्त झालं पण पोटानं भुकेची जाणीव करून दिली. मंदिरातल्या बाकावर बसून उदरभरण केलं. डबा खाताना ‘तिची’ खूप आठवण आली. तडक निघालो आणि पंधरा मिनिटांत तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो…..
…. अजूनही ती तशीच होती… ‘ माझी शाळा ’.. मनातला अजून एक हळवा कोपरा. जुन्या आठवणी पुन्हा फेर धरून नाचायला लागल्या. आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस पण त्यावेळी कळलंच नाही.
आयुष्यात अनेक गोष्टी या नंतरच कळतात बऱ्याचदा वेळ गेल्यानंतर.. असो..
शाळेचा निरोप घेऊन भरपूर सिनेमे पाहिले तिथं पोचलो. बंद पडलेले, रंग उडालेलं, कचरा आणि झाडा-झुडपांनी वेढलेलं थिएटर पाहून मनात कालवाकालव झाली. लवकर ही वास्तू देखील इतिहासजमा होणार याविषयी खात्री पटली. मल्टिप्लेक्स कितीही उत्तम असली तरी सिंगल स्क्रीनची मजा काही औरच.
शेजारच्या थिएटर इतक्याच जुन्या असलेल्या टपरीवर चहा घेतला. अजूनही तीच चव. अहाहा! ! फार भारी वाटलं.
स्वतः बरोबर फिरताना चार-पाच तास कसे गेले कळलंच नाही. मस्त, फ्रेश वाटत होतं. खूप आनंदी होतो.
मन शांत होतं. जे शोधत होतो ते सापडलं. महिन्यातून एकदा स्वतःबरोबर फिरायला जायचच असा निश्चय करून घरी जाण्यासाठी बस पकडली…..
☆ माझा जयंतदादा… – लेखिका : सुश्री सुधा हुजूरबाजार तुंबे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
नुकतेच ५ एप्रिलला पुण्याहून मुंबईला परतताना वासुदेव (माझे पती) सहज बोलून गेले की ‘जयंतदादां सारखी माणसं ह्यापूढे दुर्मिळ असतील’… मी देखील मानेनं दुजोरा दिला होता…
त्यादिवशी सकाळी आम्ही उभयता केवळ जयंतदादाला भेटायला म्हणून पुण्याला गेलो होतो. खूप गप्पागोष्टी झाल्या. अर्थातच मंगला वहिनीची अनुपस्थिती जाणवत होती पण तसं न दाखवता आम्ही अगदी क्रिकेटसकट विविध विषयांवर बोलत होतो.
जयंतदादानं नवीन लेखनाचे तो तपासत असलेले प्रिंटाऊट वाचायला दिले. माझ्या बाबांबद्दल ‘मोरू परतून आला… ‘ ह्या शीर्षकाखाली प्रेमपूर्वक आदरानं भरभरून लिहिलं होतं.
एका भाच्यानं आपल्या लाडक्या मोरू मामाला दिलेली ती प्रेमाची पावती होती. वाचून मन भरून आलं होतं.
माझे वडिल हे जयंतहून ८वर्षांनी मोठे होते त्यामुळे मामापेक्षा एका मोठ्या भावासारखं त्यांचं सख्यं होतं…
नंतर चहापाणी झाल्यावर आरामात निघालो. पण मन जयंतदादाच्या ‘साधी रहाणी उच्च विचारसरणी ‘ अश्या स्वभावात गुंतलं होतं. वासुदेवांनी योग्य शब्दात विचार मांडले आणि मग परतीच्या प्रवासातल्या आमच्या गप्पा दिवसभराच्या घडामोडींची उजळणी करतं झाल्या…
नंतर आम्ही गेला महिना आमच्या व्यावसायिक कामात व्यस्त होतो.
नवीन प्रकाशित इंग्रजी पुस्तकं पुण्यात प्रत्यक्ष भेटून जयंतदादाला द्यायचं चाललं होतं तोच आज सकाळी माझ्या भाचीचा सईचा फोन आला आणि जयंतदादा आता कधीच भेटणार नाही ह्या कल्पनेनं मन सुन्न झालं…
बातमी पसरली होती. परिचितांचे मेसेजेस, फोन येत होते पण आम्ही उभयतां जयंतदादाच्या सुखद आठवणीत स्वतःला सावरुन घेण्याचा फोल प्रयत्न करत होतो.
डॉ. जयंत नारळीकर हा जगप्रसिद्ध वैज्ञानिक -खगोलशास्त्रज्ञ… माझा जयंतदादा म्हणजे सख्खा आते भाऊ…
महाराष्ट्राचं तसचं भारताचं भूषण असला तरी माझ्या बाबांना ‘माझे मोरूमामा’ असं प्रेमानं संबोधणारा, नंदिनीमामी म्हणून कौतुकानं माझ्या आईच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या वाढदिवसाच्या दिवशी हक्कानं बोलणारा, कोविडमुळं अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाही माझ्या पहिल्या पुस्तकासाठी मंगलावहिनीबरोबर कौतुकानं प्रस्तावना लिहिणारा, वासुदेवांबरोबर आवडीनं क्रिकेटच्या गप्पा मारणारा आणि प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्या चिन्मयचं मनापासून कौतुक करणारा प्रेमळ, मनमिळाऊ असा माझा जयंतदादा!!
लहानपणापासून जयंत जात्याच अतिशय हुशार आणि त्यात आई-वडिल-मामा असं तिहेरी मार्गदर्शन मिळाल्यामुळं संस्कृत, गणित, विज्ञानचं नव्हे तर काव्य-शास्त्र-विनोद-साहित्य असे नानाविध संस्कार नकळत घडत गेले होते.
माझ्या वडिलांनी (सुप्रसिद्ध गणिती प्रा. मो. शं हुजूरबाजार) रोज रात्री घरच्या फळ्यावर एक आव्हानात्मक गणित लिहून सकाळपर्यंत जयंतनं ते सोडवून दाखवायचं असा उपक्रम सुरू केला होता. परीणामी जयंतला गणिताची अतिशय गोडी लागली ती कायमची! ! ही गोष्ट सर्वश्रृत आहे…
मोरू मामांनी त्यांच्या डॉ. जयंत नारळीकरसारख्या तोपर्यंत जगप्रसिद्ध झालेल्या खगोलशास्त्रज्ञ भाच्यासाठी सुयोग्य पत्नी म्हणून आपली आवडती सुशिल, अतिशय हुशार पण साधी रहाणी असलेली गणिती विद्यार्थीनी मंगला राजवाडे निवडली होती. मामांची निवड सुयोग्य होती.
जयंतदादा आणि मंगलावहिनी एक परीपूर्ण जोडी होती.
आयुष्यातल्या सहजीवनाचा मनमुराद आस्वाद घेत, एकमेकांचा आदर करत पुढं केंब्रिजहून भारतात परत येऊन दोघेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहिले होते. गीता, गिरीजा आणि लिलावती ह्या कन्या आज आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वानं नावाजल्या जात आहेत.
माझी आत्या, म्हणजे माझ्या वडिलांची मोठी बहिण, संस्कृत विदुषि सौ. सुमती नारळीकर आणि आतोबा रॅंग्लर विष्णू नारळीकर ह्यांचे सुसंस्कार आज नारळीकरांच्या पुढंच्या चार पिढ्यांत नकळत जाणवताहेत.
१९ जुलै, १९३८ ह्या दिवशी कोल्हापूरात जन्मलेले जयंत विष्णू नारळीकर… वाराणशीत शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपल्या वडिलांचा वारसा चालवतं इंग्लंडमधल्या केंब्रिजला उच्च शिक्षणासाठी गेले आणि रॅंग्लर जयंत नारळीकर म्हणून प्रसिद्ध झाले.
पुढं खगोलशास्त्रज्ञ म्हणून जगप्रसिद्ध झाले. अगदी लहान वयात त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण म्हणून सन्मानित केलं होतं.
नंतरही अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळत गेले. विविध विषयावर लेखन करत गेले. त्यांच्या साध्यासोप्या मराठी भाषेतल्या रंजक मराठी विज्ञान कथा वाचत एक पिढी मोठी झाली.
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ असले तरी मराठी भाषेत केलेलं लेखन आजही सगळे आवर्जून वाचतात. सर्वसामान्यांना कळेल अश्या मराठी भाषेतून विज्ञान कथा लिहून त्या महाराष्ट्रातल्या गावांगावांत पोहोचवल्या. इंग्रजी भाषेच्या कुबड्या न घेता शुद्ध मराठीत विज्ञानाच्या विविध विषयांवरील त्यांची भाषणं प्रसिद्ध आहेत. गणित आणि विज्ञान सुलभ करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नारळीकर दांपत्यानं घेतलेले विशेष परीश्रम हे आजही चर्चेचा विषय आहेत…
दोन वर्षांपूर्वी मंगलावहिनी गेली. आपली सहचारिणी बरोबर नाही हे दु:ख त्यांना मनात जाणवतं असलं तरी त्यावर मात करून कालपरत्वे आता ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. आम्हाला त्यांच्या मनोरंजक खुसखुशीत नेमक्या शब्दात असलेल्या केंब्रिजच्या आठवणी, भारतात येऊन आधी टी. आय. एफ. आर. मधिल आणि नंतर आयुकाची म्हणजेच पुणे येथील सुप्रसिध्द इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्सची
उभारणी, त्या काळात आलेले विविध अनुभव वगैरे वाचताना पुढंच्या ब्लॉगची आतुरतेनं वाट पहात असूं…
गेल्या महिन्यात भेटून ह्या सगळ्या गप्पा मारत वेळ छान गेला होता. माझ्या वडिलांनी रचलेली संस्कृत काव्य आणि विडंबनांची पुन्हा एकदा उजळणी झाली होती. आता पुढच्या महिन्यात आमचं नवीन इंग्रजी पुस्तक घेऊन येऊ तेव्हा ही संस्कृत काव्य आणि विडंबनं मी उतरवून घेईन असं म्हणून निरोप घेतला होता. तेव्हा असं वाटलंही नाही की ही शेवटची भेट असेल…
जयंतदादा हा आमच्या पिढीसमोर असलेला आदर्श होता. कितीही यश मिळालं तरी जमिनीत पाय घट्ट रूतवून ‘आकाशाशी जडले नाते’ ही शिकवण देणारा माझा जयंतदादा… तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके डॉ. जयंत नारळीकर आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या खगोलशास्त्र प्रेमाचा वारसा आपल्याजवळ कायम राहील…
भावपूर्ण श्रद्धांजली जयंतदादा.
☆
लेखिका : सुश्री सुधा हुजूरबाजार तुंबे
मुंबई
प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पण, कोलाहलातूनही कार्यसिद्धीची किमया करणारा हा देश आहे, हे त्यांच्या पचनीच पडत नाही.
आणि कार्यसिद्धीसाठी या १४० कोटी लोकांना, कुठल्यातरी एकाच, नेमून दिलेल्या संहितेप्रमाणे बोलावं-वागावं लागत नाही, ते कसं काय? .. हेच त्यांना जाम कळत नाही!
आपल्या यशामुळे ते धास्तावतात. कारण ते यश त्यांच्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे न वागता, त्यांच्या अनुमतीविना, आणि मदतीशिवाय आपण मिळवलेलं असतं!
आजवर अनेकांनी आपल्यावर राज्य केलं, पण आपल्याला कुणीच जिंकून घेऊ शकलं नाही.
आपण त्यांच्याशी जुळवून घेतलं, त्यांच्याकडून घेण्यासारखं सगळं आत्मसातही केलं.
आपण त्यापैकी कुणाचंही अनुकरण केलं नाही, आणि जुनं सगळं विसरलोही नाही.
आपण बदललो, पण आपलं अस्तित्व अबाधित ठेवलं.
आपल्यातल्या सर्व विरोधाभासांना झुगारून नव्हे, तर योग्यप्रकारे वापरून, आपण आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर, संकटांना टक्कर देत उभे राहिलो.
– – आणि नेमकं तेच त्यांना अस्वस्थ करतं!
आपलं यश साजरं करणं त्यांना जमत नाही, जमणारही नाही. कारण त्यांच्या दृष्टीने ते अघटित आहे!
असो.
मूळ इंग्रजी लेखिका : सौ. प्रियांका जोशी
स्वैर मराठी अनुवाद – कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
मो 9422870294
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
श्रीजोगेश्वरी ते मुलींचे भावेस्कूल प्रवास..
1ते 4 थी नूतन मराठी शाळेतलं बालपण संपलं खरं, पण आता पुढचा प्रवास म्हणजे वनवास वाटायला लागला. कारण हायस्कूलची पदवी घेण्याकरिता नव्या मोठ्या हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. प्रायमरीचा विरह जाणवायला लागला आणि हायस्कूलचा दाह वाटायला लागला. पण निर्णय शेवटी आईनानांच्याचं हातात होता. काही मैत्रिणी अहिल्यादेवीत पळाल्या तर कुणी हुजूरपागा गांठली. मला मात्र ति. नानांचा हात धरून मुलींचं भावेस्कूल अगदी रडत खडत पकडावं लागलं. रडकुंडीला येऊन शाळेचा रस्ता ओलांडताना मी वडिलांना म्हणाले, “नाना माझ्या मैत्रिणीच्या शाळेत जाऊ द्या ना मला! बुधवार पेठ कुठे, आणि ही सदाशिव पेठ कुठे चालत जायचा कंटाळा येतोय हो मला,! कां घातलतं तुम्हीं मला या शाळेतं? सांगा ना! कां नेताय तुम्ही मला या लांबच्या हायस्कूलला? ” माझं दप्तर सांवरत माझे डोळे पुसतं भावेस्कुलला शिक्षक असलेले माझे वडील, मला परिस्थितीची चालता चालता जाणीव करून देत होते, आहे ती परिस्थिती स्विकारून इतरांशी तुलना न करता परिस्थितीशी हात मिळवणी करण्याचा पहिला धडा लहान वयातच नानांनी मला दिला. घरी वडील आणि शाळेत गुरु झालेल्या माझ्या वडिलांनी शिक्षणाची दिक्षा मला दिली, आणि मी, पाचवीच्या वर्गाची पायरी चढले नाना म्हणाले होते, “अगं इतर शाळांची फी खूप आहे, ही शाळा मी येथे शिक्षक असल्याने खूप लांब असली तरी तुला फ्रीशिप मध्ये आहे. मलाही तुला कॅम्प मधल्या मोठ्या शाळेत घालावसं वाटतय पण –परिस्थिती! माझ्या तुटपुंज्या पगारात, दहा तोंड खाणाऱ्या संसारात माझी मजबुरी आहे ग बाळा! वडिलांचे हे बोलणं ऐकून माझे डोळे भरून आले. नानांना इतकं अगतिक झालेलं मी कधीच पाह्यलं नव्हतं आणि मग माझ्या लक्षात आलं, नाना शाळेत रोज पायी चालत जायचे ह्याच कारण, बसला पुरेसे पैसेच नसायचे. आणि मग त्यानंतर मात्र आमचा दिनक्रम ठरला. लांबलेला रस्ता जवळचा वाटावा म्हणून माझे वडील मला पुण्याच्या परिसरांतील माहिती सांगायचे. शाळेत पुस्तकातलेज्ञानाचे धडे आणि चालतांना चालण्याच्या व्यायामाचे संस्कार नानांनी माझ्यावर वयाच्या 10 व्या वर्षीच बिंबवले. बुधवारातून सदाशिव पेठेपर्यंतची आमची पदयात्रा, जुन्या नव्या पुण्याचा इतिहास ऐकण्यात केव्हां संपायची ते मला कळायचंच नाही. नानांनी सुरुवात केली ती सदाशिव पेठेपासून. ते म्हणाले, “आपण पर्वतीला जातांना भिकार दास मारुतीला गेलो होतो ना, आठवतय कां तुला? ” अय्या! खरंच कीहो नाना, किती छान मंदिर आहे ते! तिथे गणपती आहे मारुती आहे आणि नाना ती साधू बुवांची मूर्ती कसली आहे हो? आणि नाना, एक सांगा ना मला, असं काय नांव आहे हो त्या देवळाचं? काय तर म्हणे भिकारदास मारुती” माझा धबधबा थांबवत नाना म्हणाले, “सांगतो सांगतो! सगळं काही सांगतो पण आधी तू रस्त्याच्या कडे कडेनी चाल बरं! कान माझ्याकडे आणि डोळे रस्त्याकडे ठेव. ती बघ समोरून गाडी येतीय. रहदारी वाढलीय. अगं! पूर्वी हा रस्ता इतका वाहता नव्हता ईथे बाग होती. ” “अय्या ईथे बाग? नाना सांगा ना मग ती बागेची गोष्ट” नानांची आणि माझी पावलं शाळेच्या वाटेवरून भराभर पळत होती वडिलांच्या रसाळ वाणीने सांगितलेल्या आठवणी मी कान देऊन ऐकतं होते. भिकारदास मारुतीचा इतिहास नानांनी पुढे चालू ठेवला, ” प्रथम तुला पडलेलं नावाचं कोडं आपण आधी सोडवूया भिकारदास सावकाराने ह्या मारुतीची स्थापना केली म्हणून, त्यांचं नांव या मंदिराला दिले गेले. पुण्यात खूप बागा बखळी आणि ‘आळ्या’ होत्या, तांबट आळी, बोहरी आळी अशी नांवे असलेल्या गल्ल्या होत्या. बागांची रेलचेल असलेलं पुणे हिरवाईने नटलेलं होतं. आणि हो! याचं श्रेय नानासाहेब पेशवे व नाना फडणीसांना आहे बरंका बाळा! प्रदूषण मुक्त, स्वच्छ मोकळी हवा, वाहनांचा तेव्हा इतका सुळसुळाट नव्हता. पक्षांच्या मंजूळ आवाजानी, भूपाळीने, काकड आरतीने, वासुदेवाच्या आगमनानी पुणं जागं व्हायचं. पुणेकरांची मंगल प्रभात शुभ प्रभात व्हायची. त्यांचा सकाळचा प्रत्येक क्षण मांगल्यानी उत्साहाने भारलेला असायचा. भरपूर फळा फुलांनी लगडलेल्या भागांमुळे त्यांचा उपास पौष्टिक, सात्विक, मधुर फळांनी सुटायचा. जोडीला दुधातूपाची रेलचेल होतीच. त्यामुळे तालमीत, लाल मातीत, तरुणाई मदमस्तीत कुस्त्यांचा सराव करायची. मध्येच माझी शंका डोकावली, ” नाना म्हणजे! तालीम म्हणजे गुरुजी तालीमच काहो? मानाच्या तिसऱ्या गणपतीत मान पटकावणारी गुरुजी तालीम म्हणजे हीच होती ना? “हो गं बाळे तीच ती गुरुजी तालीम. त्यावेळी जिम हा प्रकारच नव्हता. तेव्हां आरोग्याचं वरदान मिळून, कामचुकार तरुण रांगडे पैलवान गडी झाले होते. आरोग्याचा मंत्र साध्य केल्यामुळे त्यांना आयुष्याचा प्रत्येक क्षण, कुठलंही आव्हान न घेता आनंदाने जगता आलं” “पण नाना अहो तो भिकारदास नावाचा मारुती मागे पडला की हो! ” शाळा जवळ आली होती म्हणून मी गाडी रुळावर आणली. हो! नाहीतर कथा अर्धवटच राह्यली असती. ” नाना खळखळून हंसले, “अरेच्चा खरंच की! मध्येच आपण तालमीकडे वळलो नाही का? नाना सांगायला लागले, “तेव्हां भिकारदास बाग होती. सिंहगड रोडला तर बाग बंगलाच होता, तर नारायण पेठेत गोड खोबऱ्यासारख्या भरपूर गराच्या पेरूंनी बाग डंवरली होती. सदाशिवपेठेचं पहिलं खरं नांव होतं, नृसिंह बाग, तिथून शुक्रवारपेठेला सांधणारी नातू बाग होती. आणि कमळांचं मोठ्ठ तळ असलेली सारस बाग, आणि ती तर तू पाह्यली आहेसच ना? या दोन्ही बागांच्या मधोमध फळांनी लगडलेली छोटीशी बाग होती, तिचं नाव होतं भिकारदास बाग गप्पांचाओघआंवरता घ्यावालागला. कारण आम्ही भावेस्कूलच्या पटांगणात आलो होतो. बापरे! गणू शिंदे घंटे कडे चाललाय तो घंटा बडवायच्या आंत 5 वी तुकडी अ च्या वर्गात मला पळायला हवं. कारण नाना वेळेचे, शिस्तीचे भोक्ते होते दप्तर, डबा, शाळेची बाटली सांवरत मी धूम ठोकली. आणि माझे शिक्षक पडील टीचर्स रूम कडे वळले. आता मी नानांची लेक नव्हते तर शिस्तप्रिय शिक्षक वडिलांची विद्यार्थिनी होते. मंडळी असं होतं माझं ते बालपणातलं शालेय जीवन, आणि असं होतं, त्यावेळेचं हिरवाईने नटलेलं, फळा फुलांनी डंवरलेलं, सुंदर पुणं. पुण्याला प्रदूषण मुक्त करणाऱ्या त्या कर्तुत्ववान पेशवाईला माझा मानाचा मुजरा.
☆ सर्वशक्तिमान ? – अर्थात व्हाट्स अप – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
बळवंतराव दवाखान्यात आले तेच मुळी कण्हत, कुंथत, कमरेत वाकून आणि मान वाकडी करून.
कालपर्यंत एकदम ताठ कण्याने वावरणारे हे सत्तरीचे गृहस्थ, आज काय झालं ? कुठे धडपडले ?
मोठ्या कष्टाने, पाय ओढत, आत येऊन, बळवंतराव अलगदपणे खुर्चीवर बसले.
“काय झालं काका ?”
“Whats app झालं”
“म्हणजे ?”
“अहो, त्या व्हाट्स अपवर एक पोस्ट आली होती, ‘सर्वांगविमुक्तासनाची’… ते रोज दहा मिनिटे केले की पोट साफ राहते, कंबर, पोटदुखी थांबते म्हणे. वाचलं आणि आमच्या हिने काल सकाळी जबरदस्तीने मला करायला लावले. कसंबसं पद्मासन घातलं पण ते सोडवताच येईना. शेजारच्या मधूने आणि आमच्या चिरंजीवाने अर्धा तास खेचाखेची करून कशीबशी सुटका केली. पण आता कंबर, मान, गुडघे मांड्या भयंकर दुखतायत. एक पाऊल ही टाकणे अवघड झालय हो.”
– – काका अगदीच दीनवाणे झाले होते…
“सर्वांगविमुक्तासन म्हणे !सर्वांगाचा एक एक पार्ट विमुक्त झाल्यासारखे वाटतंय. “
.. मी सहानुभूतीने मान डोलावली.
*
“या व्हाट्सअपने उच्छाद मांडलाय नुसता. आजकाल कुणीही काहीही पोस्ट फॉरवर्ड करतो आणि आम्हीही विचार न करता एकमेकांवर त्याचे प्रयोग करीत बसतो. “
.+. पुन्हा दीर्घ निःश्वास !
मागे एक पोस्ट आली होती, “तीन पिंपळाची पाने आणि सहा कडूलिंबाची पाने यांचा एकत्र रस काढून रोज सकाळ संध्याकाळ घ्या. एक महिन्यात तुमचा मधुमेह पूर्ण बरा होईल…. “
.. सुनबाईने चिरंजीवांच्या डायबेटीसच्या सगळ्या गोळ्या बंद केल्या आणि महिनाभर तो रस त्याला पाजला. महिनाभर रोज बिचारा ओका-या काढत फिरत होता. महिन्यानंतर त्याची फास्टिंग शुगर आली पाचशे !!!!”
“अहो पण असलं काही करण्याआधी मला विचारायचं तरी…. “
“छे हो…. या व्हाट्स अप डॉक्टरपुढे सारे तुच्छ ! त्यात पुन्हा तिथे आयुर्वेदाचा दाखला असतो. “
*
“परवा आमच्या नातवाने पोस्ट वाचली.. कोकाकोला वापरून बाथरूम संडास स्वच्छ होतात.
फ्रीजमधून दोन लिटरची कोकची बाटली काढून लगेच प्रयोग करून हा मोकळा. “
.. यावर मी काय बोलणार ?
*
“साहेब हे तर काहीच नाही, सौ. ला कुणीतरी व्हाट्स अप केले. गुलाबजामसाठी मैदा आणि खवा मळताना त्यात पन्नास ग्रँम कोलगेट पेस्ट मिसळावी, जामुन खुमासदार होतात…. !
“आम्ही गुलाबजाम तोंडात घातला की ब्रश करीत असल्यासारखा तोंडाला फेस यायचा…. !”
“त्या गोडबोल्यांनी त्यांचा मोबाईल फेकून दिला म्हणे. ”
.. विषय बदलावा म्हणून मी म्हणालो.
“फेकून देतील नाहीतर काय करतील ?”
“म्हणजे ?
“गेल्या महिन्यात त्यांचा वाढदिवस होता. दुर्दैवाने त्याच पहाटे त्यांच्या पत्नीचं निधन झालं, वयही झालं होतं म्हणा…!”
“मग ?”
“त्यांना एका ग्रुप वरून मेसेज आला…
RIP and Happy birthday …!” – – कळपातील एका मेंढराने खड्ड्यात उडी मारली. बाकीच्यांनी काही विचार न करता पाठोपाठ उड्या मारल्या. RIP and HBD चा चाळीसाव्वा मेसेज आला तेव्हा वैतागून गोडबोल्यांनी फोनच फेकून दिला. “
* बळवंतरावांनी परत एक दीर्घ निःश्वास सोडला.
“गेल्या आठवड्यात मीही एक मेसेज आमच्या ग्रुपवर पाठवला, अगदी sarcastically! तोंडाचा चंबू करून ओssss असा दीर्घ आवाज काढा आणि डाव्या हातची पालथी मूठ दहा वेळा ओठांवर आपटा. मग दहावेळा उजव्या हाताची पालथी मूठ वापरा. डाव्या हाताचा उपयोग केल्यास सर्व शारीरिक व्याधींपासून एक महिन्यात सुटका होते आणि उजव्या हाताचा उपयोग केला तर घरात सुख समृद्धी येते.”
“वा, मस्त! छान टर उडवलीत…!”
“टर ????? अहो हा मेसेज व्हायरल झालाय. एका आठवड्यात दहा वेगवेगळ्या ग्रुप वरून मलाच परत आलाय. “
= सर्वशक्तिमान व्हाट्स अप की जय हो…. !!!! =
वरील संभाषण करमणूक करणारे वाटतं असले तरी सध्या घरोघरी हीच व्यथा आहे…!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
असह्य प्रसववेदनातून बाहेर पडल्यानंतर पहिला टाहो जेव्हा आईच्या कानावर पडतो ते त्रिभुवनाचे सौख्य जेव्हा आईच्या चेहऱ्यावर पसरते व ती त्या बाळाला पोटाशी धरते हे जगातील सर्वात सुंदर व प्रथम प्रेम आहे. मुळात प्रेमाची सुरुवातच इथून होते. ते बाळ म्हणजे तिचे सर्वस्व! त्याच्या बदल्यात त्याक्षणी तिला कोणी सप्तस्वर्ग जरी बहाल केले तरी ती ते लाथाडेल इतके दिव्य व जगातील सुंदर प्रेम हे आहे.
या प्रेम भावनेला आम्ही फार संकुचित करून टाकले आहे. प्रेम हे जमिनीत उगवून आकाशात पोहोचतं हे कुसुमाग्रजांनी आम्हाला सांगितलं म्हणजेच ते विश्वव्यापी आहे हे समजावलं. आणि ते व्यक्त करतांना कुणाचीही भीती बाळगायचं कारण नाही हे ही ठणकावून सांगितलं.
प्रेम हा शब्दच मुळी जगाचा व जगण्याचा पाया आहे. जीवनातून प्रेम हा शब्द वजा करताच खाली काहीच शिल्लक रहात नाही. सारेच निष्प्रभ होऊन जाते. केवळ एका या प्रेमभावनेवरच विश्व तरले आहे. जन्मत:च आई, वडील, भाऊ, बहिण, काका, काकू, मामा, मामी, आजी, आजोबा, शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणी व या साऱ्यांनी मिळून बनलेला समाज व नंतर राष्ट्र इतक्या नात्यांशी आपण जोडले जातो व ही सारी नाती पायाभूत बनून त्या अनुषंगानेच आपण जगतो. यातील जी जी नाती दगा देतात तेव्हा तेव्हा आपण नाराज व प्रसंगी निराश होऊन त्याचा आपल्या जीवनावर प्रचंड परिणाम होतो.
एरव्ही तुम्ही देशावर किती प्रेम करता हा प्रश्न कुणी विचारला तर…पण, आता न बोलता साऱ्या भारतीयांनी एकमुखाने या पाच दिवसात त्याचे उत्तर दिले आहे की, आम्ही सारे एक आहोत व आम्ही आमच्या देशावर प्रचंड प्रेम करतो. या वेळी, एरव्ही कशा कशावरून भांडणाऱ्या आम्हाला देशापुढे कशाचीही आठवण येत नाही इतके आम्ही देशप्रेमाने भारावलेले असतो. ही प्रेमाची एक वेगळीच जातकुळी असते. माणूस समाजप्रिय प्राणी आहे. समाजाशिवाय त्याला अस्तित्वच नसते.
या दोन उदात्त व महान प्रेमानंतर येते ते, शृंगारातील प्रेम. ती भावनाच मुळी इतकी लाजवाब इतकी सुंदर आहे की त्याला तोड नाही. प्रियकर प्रेयसी व पती पत्नी यांच्यात शृंगारच निर्माण झाला नाही, आकर्षणच निर्माण झाले नाही तर… ? अहो हा शृंगारच तर( परस्परांविषयी आकर्षण) नवनिर्माण, सृजन, माणसाची माणसापासून निर्माण होणारी साखळी निर्माण होण्याचे कारण आहे. या आकर्षणातून म्हणजेच बघा, प्रेमातूनच माणसाची निर्मिती, जन्म होतो. म्हणून मी म्हटले की ही प्रेमभावना हाच जगाचा पाया आहे.
पण, जन्माला घातलं नि प्रेम संपलं असं होत नाही. हे एकच प्रेम एवढे मजबूत असते की, त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व नात्यांना ते घट्ट बांधून ठेवते त्यानेच नाती बनतात, टिकतात व समाज निर्माण होऊन पर्यायाने राष्ट्र निर्माण होते. आणि अशा नात्यांबरोबरच दररोज आपल्या मनात राष्ट्रप्रेमही नकळत वाढीस लागते व वेळ येताच ते प्रकट होते.
प्रेम ही चघळण्याची थिल्लर भावना नाही तर ते फार सुंदर व पवित्र असे बंधन आहे न दिसणारे पण मनात कायम वास्तव्यात असणाऱ्या मायलेकरांच्या, पतीपत्नीच्या मनात वसणारे, ज्याला कुठल्याही पुराव्यांची गरज नाही व ते पुरावे दाखवताही येत नाहीत कारण ते मनाच्या खोल तळाशी सुप्त असतात. म्हणून रोज कुणीही म्हणत नाही माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण ते वाणीतून, कृतीतून, नजरेतून, देहबोलीतून सतत पाझरत असते व पाहणाऱ्याला ते न सांगता कळते.
प्रेम म्हणजे आकर्षणाबरोबर आत्म्याचे मिलन असते म्हणून त्यातून माणसासारखी अजोड कलाकृती निर्माण होते. प्रेम ही एक अद्वितीय भावना आहे जिचा आपण सर्व प्रकारच्या नात्यात फक्त आदर आणि आदरच केला पाहिजे कारण प्रेमाशिवाय जीवनच व्यर्थ आहे. म्हणून जिथे जिथे जीवन संपवण्याच्या घटना घडतात त्याच्या कारणांच्या मुळाशी तुम्ही गेलात तर माणसाच्या दु:ख्खाचे एकमेव कारण असते ते म्हणजे…. “ प्रेमाचा अभाव” बस्स…