मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फुंकर… भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ फुंकर… भाग-1 डॉ. ज्योती गोडबोले 

(जाई सासरी रमून गेली आणि अरुण  माईंचं तर पान हलेना जाई शिवाय. ) इथून पुढे —

अरुण पुढची परीक्षा पास झाला आणि त्याला घसघशीत पगारवाढ मिळाली. माईंच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं.  ‘ जाई, हे श्रेय तुला जाते ग बाई ! तू किती समजूतदारपणे बदल घडवलास अरुणमध्ये ग ! मी खूप प्रयत्न केले ग पण माझं काही चालेना बघ आबांसमोर ! सतत त्याचा पाणउताराच केला नंदिनी आणि त्यांनी ‘.

‘जाऊ दे हो माई, आता झालंय ना सगळं चांगलं? गुणी आहे हो अरुण ! मला हे आलं होतं लक्षात पहिल्यांदाच.म्हटलं मी एक शिक्षक आहे ना, तर हा विद्यार्थी बघू सुधारतो का ! त्याच्या आत्मविश्वासावर बसलेल्या राखेवर मी फुंकर घालायचं काम केलं इतकंच हो !’ माईंचे डोळे भरून आले. गुणांची पोर ग बाई माझी म्हणून डोळे पुसले त्यांनी.   

पुढच्या वर्षी नंदिनी भारतात आली. अरूणच्या लग्नाला ती येऊ शकली नव्हती. यावेळी नंदिनी एकटीच आली होती. तिच्या नवऱ्याला  रजा नव्हती इतकी ! आल्याआल्या नंदिनीने घरात झालेले बदल एका क्षणात ओळखले. 

“आबा माई, काय म्हणतात नवीन सूनबाई? “ नंदिनी म्हणाली.

“ तूच आता प्रत्यक्ष बघ ना “  

जाई सकाळी  नाश्ता घेऊन नंदिनीच्या खोलीत गेली. नंदिनीताई, इथेच घेता का येता डायनिंग टेबलावर?सगळे वाट बघत आहेत तुमची ! जाई हसतमुखाने म्हणाली. नंदिनी बाहेर आली.आबा माई अरुण तिची वाट बघत होते. “ ये ग नंदिनी ! तुला आवडतात तसे दडपे पोहे केलेत जाई ने !” अरुण म्हणाला. नंदिनीने बघितलं, केवढा बदलला होता अरुण. आनंदी, अभिमानाने उंच झालेली मान आणि पूर्वीचा चाचरत, डोळ्याला डोळा न देता बोलणारा अरुण जणू गायबच झाला होता.  नंदिनीला समजले या घरातले पूर्वीचे स्थान डळमळीत झाले आपले. जाईला पाहून ती म्हणाली, “ जाई, छान हुशार आहेस ग तू. आमच्या अरुणला कसं काय पसंत केलंस? “ जाई हसून म्हणाली,” का हो ताई? किती चांगला आहे तुमचा भाऊ ! आता सगळेच कसे डॉक्टर आणि वकील आणि मोठ्या पोस्टवर असणार? आमच्यासारख्या शिक्षकांचीही गरज आहेच की समाजाला, आणि अरुणसारख्या लोकांची फॅक्टऱ्याना ! त्याशिवाय यंत्र आणि माणसांचं कसं चालेल? “  अरुण कौतुकाने जाईकडे बघत होता. असा त्याचा ‘स्व’ कोणीच नव्हता जपला. . त्याची अशी बाजूही नव्हती कोणी घेतली इतकी वर्षं. आणि हसत हसत नंदिनीसमोर धीटपणे बोलायची हिम्मतही नव्हती कोणी दाखवली आजपर्यंत !

चार दिवसात  नंदिनीच्या लक्षात आले, आबा माई सगळे जाई जाई करत असतात. त्या दिवशी जाई शाळेत गेली तेव्हा नंदिनी आणि माई बाल्कनीत चहा पीत गप्पा मारत होत्या. नंदिनी म्हणाली, “ माई, जाईने चांगलीच छाप पाडलीय ग तुमच्यावर ! आबा सुद्धा जाई जाई करत असतात.” 

“ नंदिनी हो ग. फार गुणी आणि कर्तृत्वाची आहेच बघ जाई ! अरुणची काळजी होती ग बाई मला फार. कसा हा मुलगा, वडील  सतत हेटाळणी करत असायचे आणि मी तरी किती संभाळून घेऊ?  माझी फार ओढाताण व्हायची ग ! पण बघ ना, जाईला पसंत करताना आम्हाला माहीत होतं, ही गरीब घरातून आलीय. तिला ऍडजस्टमेंटची सवय असणार. ती आणि अरुण लग्नाआधी चारवेळा भेटले होते त्यामुळे अरुण कसा आहे ते तिला समजले होतेच. आमचा निर्णय योग्य ठरला अगदी. बघ ना,आता लग्नाला तीन वर्षे झाली की. किती बदल घडून आला घरात. अरुण इतका सुखी आणि आत्मविश्वासाने वावरलेला मी कधीही बघितला नव्हता.” 

“ हो माई, छानच आहे ग जाई.  आवडली मला.” 

नंदिनीचे परत जायचे दिवस जवळ आले. अरुण नंदिनीला म्हणाला,  “उद्या दुपारी आपण बाहेर जेवायला जाऊया .आमच्याकडून तुला ट्रीट.! “  हा अरुण कोणी वेगळाच होता. एका छानशा हॉटेलमध्ये अरुणने सगळ्यांना जेवायला नेलं. कॉन्फिडन्सने ऑर्डर देणारा, विनोद करणारा अरुण बघून नंदिनीला खूप आनंद झाला.

कौतुकाने नंदिनी म्हणाली. “  किती छान वाटतंय रे अरुण, तुला असं आनंदात बघून. जाई, हे सगळं श्रेय मी तुला देईन. माझ्या भावात आमूलाग्र बदल घडवून आणायचं !. किती छान फुलवलंस ग तू त्याला. हे खरं तर मी करायला हवं होतं.  पण मी माझ्या यशाच्या धुंदीत असायची आणि अरुण कोमेजतच गेला. माझी चूक झाली. आणि मीही लहानच होते ग जाई त्यावेळी. माझ्या हे लक्षातच आलं नाही कधी. आबा,तुमचीही खूप चूक होती तेव्हा. किती उपमर्द करत होतात या बिचाऱ्याचा तेव्हा तुम्ही ! एकटी माई तेवढी उभी असायची अरुणसाठी .अरुण, मला माफ कर हं.” नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं. आबाही म्हणाले  “अरुण, माझं चुकलं. दोन मुलात इतका जमीनअस्मानाचा असलेला फरक मला सहनच व्हायचा नाही रे. मला तुझं अपयश हा माझा  पराभव वाटायचा. मी तुला समजू शकलो नाही. माई,अरुण मला माफ करा रे तुम्ही !” 

जाई म्हणाली, “ काय चाललंय हे ! अरुण हे केव्हाच विसरून गेलाय.  हो ना अरुण? ही सगळी तुम्ही आपली, आमची माणसं आहात. आमचं तुम्ही कायम भलंच चिंतणार.  होतात चुका हो आपल्या हातून. आमचंही चुकत असणार. अरुणही चुकला असेल त्यावेळी !” अरुण हसला आणि म्हणाला,” हो !वाईटच होते ते दिवस. पण तेव्हा  मला जाईसारखी मैत्रीण मिळाली असती तर मी असा डिप्रेशन मध्ये नसतो गेलो. माझंही खूप चुकलं. आता वाटतं, आबांच्या वरच्या रागामुळं मी  मुद्दाम पुढं शिकलो नाही. किती चुकलं माझं.  पण जाई माझ्या आयुष्यात आली आणि तिने माझ्या स्वाभिमानावरची धूळ झटकली. माझ्यातला स्फुल्लिंग जागा केला आणि मी  माझ्या नोकरीत किती तरी वर जाऊ शकलो. थँक्स जाई. पण एक सांगतो, मी चांगला पिता होईन आणि माझ्या मुलावर कधीही अन्याय  होऊ देणार नाही, की त्याची हेटाळणी करणार नाही.”   

माई हसून म्हणाल्या, “ हो का? जाई, पिता होण्याची तयारी झालेली आम्हाला  नाही का सांगायची?” 

जाई लाजून लाल झाली आणि म्हणाली,” माई अरुण तरी ना !अहो, कालच तर आला रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह.”  माईंनी उठून जाईला मिठीच मारली आणि ते कुटुंब आनंदात  बुडून गेलं.

… हे सगळं आत्ता माईंना आठवत होतं.

आबा कालवश झाले आणि नंदिनी  महिनाभर राहून कालच अमेरिकेला गेली. माई एकट्या बाल्कनीत बसून हा भूतकाळ आठवत होत्या. आबांच्या आठवणीनं पाणी येत होतं त्यांच्या डोळ्यात ! शेवटी शेवटी किती बदलले आबा. छोट्या अद्वैतचा जन्म झाल्यावर तर ते पूर्ण बदलून गेले. आबा असे मृदू, प्रेमळ आजोबा असतील हे  माईंना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.  आबांच्या आठवणींनी डोळे भरून आले 

त्यांचे ! अद्वैत माईंना शोधत बाल्कनीत आला, आणि  म्हणाला, “ रडू नको ना माईआजी ! आपले आबा देवबाप्पाकडे गेले ना?  तू रडलीस तर त्यांना वाईट वाटेल.” आपल्या छोट्याशा हातानी अद्वैतने त्यांचे डोळे पुसले आणि तो त्यांना घरात घेऊन गेला.

— समाप्त — 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फुंकर… भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ फुंकर… भाग-1 डॉ. ज्योती गोडबोले 

वर्षभर आजारी आणि अंथरुणाला खिळलेले  आबा अखेर देवाघरी गेले. रीतीप्रमाणे चार लोक येऊन सांत्वन करून,  चार गोष्टी सांगून गेले आणि घरात माई अगदी   एकट्या पडल्या. त्यांना सगळं मागचं आठवलं. नंदिनी तिकडे  दूर परदेशात ! आणि अरुणला तेव्हा आबांचं प्रेम कधीच नव्हतं. त्यांचा अतिशय शीघ्रकोपी स्वभाव, आणि दुसऱ्याला सतत मूर्खात काढायची वृत्ती. त्यामुळे माणसे कधीच जोडली गेली नाहीत. नोकरीत खपून गेलं, पण एकदा रिटायर झाल्यावर कोण ऐकून घेणार ! आबांची हुशारीही दुर्दैवाने अरुणकडे आली नाही. तो वारसा मात्र नंदिनीला मिळाला आणि अतिशय तल्लख बुद्धी घेऊन आलेली नंदिनी डॉक्टर झाली आणि आपल्याच वर्गमित्राशी लग्न करून परदेशात गेली ती कायमचीच. माई आबा अगदी कौतुकाने दोनचार वेळा तिच्याकडे जाऊनही आले.  पण मग पुढेपुढे त्यांना तो प्रवास, ती थंडी झेपेना. जमेल तशी नंदिनी येत राहिली पण तिचंही येणं हळूहळू कमीच होत गेलं. आबांनी हरप्रयत्न करूनही अरुण जेमतेम बी.कॉम. झाला आणि पुढे मला शिकायचं नाही यावर ठाम राहिला. खूप वशिले आणि ओळखी काढून आबांनी अरुणला खाजगी नोकरीत चिकटवून दिला. निर्विकारपणे अरुण ती नोकरी करू लागला. ना कसली जिद्द,ना कसली पुढे जाण्याची इच्छा! माईना अरुणचं काही वेळा वाईट वाटे. लहानपणी अरुण चांगला हुशार होता शाळेत. बोलका, खेळात भाग घेणारा,अभ्यासातसुद्धा  चांगले असत मार्क्स त्याला. पण नंदिनी शाळेत गेली आणि त्याच्यापेक्षा  तीन वर्षानी लहान असूनही अभ्यास, खेळ , वक्तृत्व सर्व गोष्टीत चमकू लागली तेव्हा शाळेत आपोआप अरूणची तुलना तिच्याशी होऊ लागली आणि घरीही आबा सतत त्याला तुच्छ वागवू लागले. अरुण अबोल झाला  मनाने खचूनच गेला आणि पहिल्या दहा नंबरात असणारा अरुण पार शेवटच्या नंबरात जायला लागला. माईंनी खूप प्रयत्न केले, त्याला शिकवणी लावली, पण त्याची घसरण थांबलीच नाही. हसरा आनंदी अरुण अबोल घुमा झाला आणि  त्याला जबर  इन्फीरिऑरिटी कॉम्प्लेक्स आला.  दिवसदिवस त्याचा आबांशी संवाद होत नसे आणि  माईंशी मात्र तो जरा तरी खुलेपणाने बोलत असे. नंदिनीनेही कधीही अरुणला विश्वासात घेतले नाही, की त्याच्यावर प्रेम केले नाही. त्या दोघा भावंडात अजिबात ओढ प्रेम काहीही नव्हते कधीही.  नंदिनी भावाच्या सदैव वरचढच राहिली. माईना हे समजत होते पण त्या काही करू शकायच्या नाहीत. उलट काही सांगायला गेलं तर नंदिनी म्हणायची, “दादा अगदी मंद आहे माई ! शाळेत सुद्धा नुसता शेवटच्या  बाकावर बसलेला असतो. बाई मलाच म्हणतात,जरा शिकव तुझ्या दादाला.लाज वाटतेअगदी ! असा कसा ग हा.” माई हताश व्हायच्या पण दोन्ही मुलं आपलीच ! शिकवणी लावली म्हणून तो निदान बरे मार्क्स मिळवू लागला. नंदिनी लग्न करून गेल्यावर अरुणला उलट हायसेच वाटले. जरातरी तो घरात माईंशी बोलायला मन मोकळं करायला लागला. माई आता त्याच्या लग्नाचा विचार करायला लागल्या. आबा कुत्सितपणे म्हणाले, “ कोण देणार याला मुलगी ? एवढ्याश्या पगारात भागणार आहे का दोघांचे तरी? मग मात्र माई संतापल्या.“ तुम्ही कधी त्याला आपले म्हणालात? सतत त्या नंदिनीचा उदोउदो ! अहो, स्वभाव बघा की त्याचा. किती चांगला आहे अरुण आपला. त्याचे गुण, मदत करायची वृत्ती, गरीब, समंजसपणा दिसत नाही का तुम्हाला? आहे ना त्याला घरदार ! भरेल हो पोट आपलं आणि बायकोचं. तुम्ही  नका करु बरं काळजी..असेल त्याच्या नशिबात ती नक्की येईल समोर. इतकाही कमी पगार नाही त्याला. तो सांगत नाही तुम्हाला कधी ,पण मागच्या महिन्यातच पगारवाढ झाली आणि सुपरवायझर झाला माझा अरुण.” ‘माईंच्या डोळ्यात पाणी आलं. ……त्या दिवशी सहज म्हणून जुन्या वाड्यातल्या कुसुमताई माईंकडे भेटायला आल्या. “ छान आहे हो फ्लॅट माई ! मी प्रथमच येतेय ना इतक्या वर्षांनी.”  मग नंदिनीची, तिच्या मुलांची चौकशी करून झाली आणि म्हणाल्या, “ अरुणचं कसं चाललंय? किती पगार आहे त्याला? “ माईंनी सांगितल्यावर म्हणाल्या

“चांगला आहे की मग ! लग्न करताय का? आहे एक मुलगी. पण आईबाप गरीब आहेत हो ! मुलगी खरोखर चांगली आहे बघा, पण पैसा नाही म्हणून लग्न रखडलंय. मुलगी लाख आहे, पण लग्नात काही मिळणार नाही. घेता का करून? बघा बाई.हवी तर घेऊन येते उद्या. अरुण, आबा, तुम्ही बघा भेटा तिला “   माई हरखून गेल्या. “ कुसुमताई,आणा तिला उद्याच.बघू या. काय योग असतील तसं होईल बघा. “ 

दुसऱ्या दिवशी कुसुमताई जाईला घेऊन आल्या. काळीसावळी पण तरतरीत जाई त्यांना बघता क्षणीच आवडली. किती चटपटीत होती मुलगी. साधीसुधी साडी होती अंगावर पण नीट नेसलेली आणि छान गजरा  मोठ्या लांब डौलदार शेपट्यावर. म्हणाली, “ मला खूप शिकायचं होतं हो, पण ऐपत नाही माझ्या आईवडिलांची ! मग मी डी.एड. केलं आणि मला शाळेत नोकरी आहे. इतका इतका पगार आहे मला.मी नोकरी केलेली चालणार आहे ना तुम्हाला? “ अरुणला जाई आवडलीच. माईंनाही जाई पसंत पडली. आबा म्हणाले, “ छान आहे मुलगी. ती हो म्हणू दे आपल्या  चिरंजीवांना म्हणजे झालं ! “ 

जाईचा होकार आला आणि  तिच्या आईवडिलांनी साधंसुधं लग्न करून दिलं. जाई माप ओलांडून घरात आली. जाई घरात आली आणि माईंचं घर चैतन्याने भरून गेलं. कधी नव्हे ते आबा स्वयंपाकघरात बसून चहा घेत अरुण माईंशी बोलू लागले.माई माई करत जाई सतत त्यांच्या मागे असायची. शाळेत जायच्या आधी ती सगळा स्वयंपाक उरकून जायची. ‘तुम्ही फक्त कुकर लावा माई, मी डबे भरलेत आमचे दोघांचे !’   माईंचा हात हलका झाला जाईमुळे. रोज शाळेतून आली की शाळेतल्या गमती ऐकताना आबासुद्धा  त्यात भाग घेऊ लागले. अरुणमध्ये आमूलाग्र बदल झाला जाईमुळे. मुळात तो हुशार होताच पण जी काजळी त्याच्या व्यक्तिमत्वावर बसली होती ती जाईने झटकून टाकली.

गोड बोलून तिनं त्याला त्याच्या फॅक्टरीत पुढच्या परीक्षा द्यायला लावल्या. माईना हा बदल अतिशय आवडला. हसतमुख जाई कधी दोन दिवस माहेरी गेली तर करमायचे नाही माईंना. तिच्या गरीब, साध्यासुध्या माहेरघरी किती अदबीने स्वागत होई माई अरुण आणि आबांचे ! तिची सुगरण आई छान पदार्थ आवर्जून पाठवी अरुणरावांनाआवडतात म्हणून. आपली गुणी मुलगी या श्रीमंत घरात पडली म्हणून कौतुकच वाटायचे तिच्या आईवडिलांना माईंचे. जरी अरुण आबांच्या दृष्टीने कमी होता तरी जाईच्या माहेरी त्याची पत चांगलीच होती. त्यांना त्याचा पगार खूपच वाटायचा. जाई सासरी रमून गेली आणि अरुण  माईंचं तर पान हलेना जाई शिवाय. 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रूनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला.) इथून पुढे —-

सगळेच मोठे होत होते.  रिया, तान्यांचेही ग्रॅज्युएशन झाले. त्यांची राहण्याची गावं बदलली.  हर्षल ,अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही  वाढत होता.  पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा  ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा ,एक कन्सर्नड् साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅक वरचं, मागे दाट जंगल असलेल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रूनोचं  भुंकण आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे नि:शंकपणे होतच.

सगळं छान चाललं होतं. मग अचानक काय झालं?

आजकाल ब्रुनोच्या बाबतीत काहीतरी बिनसलं होतं का? त्याच्या वागण्यात काहीतरी नकारार्थी फरक जाणवत होता. त्याला समुपदेशनाची गरज आहे का हाही एक विचार मनात येऊन गेला. अमिता, हर्षल ने त्याच्यासाठी कधीही साखळी वापरली नाही.  त्याला कधीही बांधून ठेवले नाही.  तो मोकळाच असायचा आणि उत्तम प्रकारे त्याला शिक्षित केलेलेही होते. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो क्षणात मित्रत्वाच्या नात्याने वागायचा.  येणाऱ्या पाहुण्यांमधले सुरुवातीला बिचकणारे काही थोड्या वेळातच ब्रूनोशी गट्टी करायचे.  त्याचं भय कधीच कुणाला वाटलं नाही.

पण काही दिवसापूर्वी तो अचानक घरातून निघून गेला. खूप शोधाशोध करावी लागली.अमेरिकेत पाळीव प्राण्यांसाठीचे कायदे खूप कडक आहेत. सारं वातावरण चिंतातुर झालं.

संध्याकाळी त्याच्या गळ्यातल्या कॉलर वरच्या पत्त्यावरुन काॅपने त्याला घरी आणले.  पण काॅपने त्यांना चांगलंच बजावलं. अमेरिकन पेट लाॅ बद्दल खणखणीत सुनावलं.दंडाची रक्कम वसूल करुन तो निघून गेला. 

थोडं चिंतातूर, भयावह  वातावरण मात्र नक्कीच झालं. हर्षलने ब्रूनोला चांगलाच दम भरला.  पण तो फक्त हर्षलच्या पायाभोवती गुंडाळून राहिला. आणि त्याच्या डोळ्यातून टपकणार्‍या  अश्रूंचा स्पर्श हर्षलच्या पायाला जाणवला.

“काय झालं असेल याला?”

अमिता म्हणाली,” अरे ! प्राण्यांमध्येही  हार्मोनल बदल घडत असतात.  तेही अस्वस्थ बेचैन होतात.  त्यांना कळतही असेल पण व्यक्त होता येत नाही ना?”

” म्हणजे आपण कमी पडतो का?”

” कदाचित हो.”

अमिताने एकच शंका काढली, ” मला वाटतं तो आजकाल जरा आपल्या बाबतीत पझेसिव्ह  झालाय. आपल्या आसपास असलेलं हे इतरांचं कोंडाळं  त्याला आवडत नसेल. आपणही सतत कामात. रिया तान्याचे दूर राहणे.  या साऱ्यांचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतोय.  तो थोडा इंट्रोवर्ट होत चाललाय.  आतल्या आत घुसमटतोय तो “

” मग याला आपण काय करायचं?  त्याला कसं नॉर्मल करायचं?”

” बघूया.  वाट पाहूया.”

पण त्या दिवशी मात्र  ब्रूनोने कमाल केली.

दरवर्षीप्रमाणे अमिता— हर्षलने थँक्स गिव्हिंगची पार्टी घरी आयोजित केली होती.  मस्त तयारी चालू होती.  एकीकडे ब्रूनोशी गप्पा आणि एकीकडे पार्टीची सजावट, रचना, खाद्यपदार्थ बनवणे असं चालू होतं.

संध्याकाळी सारे जमले.  सगळे मस्त नटूनथटून आले होते.  प्रफुल्लीतही  आणि एकदम झक्क मूडमध्ये. शिजणार्‍या टर्कीचा मस्त सुगंध घरात घमघमत होता.  गप्पा, गाणी, खाणे,पिणे चालूच होते.

इतक्यात ब्रूनोने  संकर्षणच्या आठ वर्षाच्या मुलीवर झडपच घातली.  तिला फरफटत  त्याने हॉल बाहेर नेलं. ती मुलगी नुसती घाबरून किंचाळत होती.  सगळ्यांची धावपळ झाली.  अमिता, हर्षलही  ब्रूनोला आवरू शकत नव्हते.  पण त्या ग्रुप मध्ये एक डॉग ट्रेनर होता. त्याने परिस्थिती झटकन हातात घेतली.  आणि अत्यंत कुशलतेने ब्रूनोला ताब्यात घेतलं. सुदैवाने त्या मुलीला काही जखमा झाल्या नाहीत पण तिला प्रचंड मानसिक  धक्का बसला होता. ती जोरजोरात रडत होती. “आय हेट ब्रूनो. आय डोन्ट लाईक हिम !”

आणि अर्थातच त्यानंतर पार्टी रंगलीच नाही.  आवरतीच घ्यावी लागली. हळूहळू सगळेच परतले.  हर्षल, अमिता प्रत्येकाला अजीजीने  “सॉरी” म्हणत होते.  तसे सारे  जवळचेच होते. मित्रमंडळीच होती. 

” इट्स ओके रे यार ! टेक केअर.”  म्हणून सगळे अगदी सभ्यपणे निघूनही गेले.  फक्त डॉग ट्रेनर मणी मागे राहून हर्षलला म्हणाला, ” नो मोअर रिस्क नाऊ.  वेळ आली आहे.  तुम्हाला आता कठोर व्हावंच लागेल. तुला अमेरिकन लाॅ माहित आहेत ना?”

नाईलाजाने अमिता, हर्षलला तो निर्णय घ्यावा लागला खूप कठीण,  अत्यंत, सहनशीलतेच्या पलीकडचा, भावना गोठवणारा  पण टाळता न येण्यासारखा तो निर्णय आणि तो क्षण होता.  क्षणभर अमिताला वाटलं,” आपण भारतात असतो तर काय केलं असतं?”

पण या प्रश्नाला तसा आता काहीच अर्थ नव्हता.

पेट कम्युनिटी सेंटरवर तिने कळवलं होतं. सर्व कायदेशीर कागदपत्रे भरून झाली होती.   व्हेटशी —पशुवैद्याशी तिचं बोलणं  झालं होतं. अशा प्रकरणात उशीर चालत नाही. तात्काळ करण्याची ही एक कृती असते. लगेच  वेळही ठरली.आजचीच.

सकाळीच हर्षल निघून गेला होता. जाताना अमिताच्या खांद्यावर हात ठेवून तिला फक्त,” बी ब्रेव्ह” एवढंच म्हणाला होता. 

सकाळपासून ब्रूनो अमिताच्या पायात घुटमळत होता. अमिताने गराज उघडलं.  गाडीत बसायलाही तो तयार नव्हता.  अमिताच्या काळजाचे ठोके थाड थाड उडत होते. कसेबसे तिने ब्रूनोला उचलले आणि मागे कार सीटमध्ये त्याला बांधून टाकले.  अमिताला एकच आश्चर्य वाटले तो अजिबात भुंकला नाही. खिडकीच्या काचेवर नेहमीप्रमाणे चाटले नाही.  संपूर्ण ड्राईव्ह मध्ये अमिताच्या डोक्यात एकच विचार होता.” मी चूक आहे की बरोबर?”  तिला इतकंही वाटलं,” मी माणूस कां झाले?  अखेर मी माणसांचा कायदा पाळत आहे.  माणूस जातीची सुरक्षा मला महत्त्वाची आहे.  या देशातलं माझं वास्तव्य मला महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी एका निष्ठावान, प्रामाणिक, निर्मळ, निरागस, निरपेक्ष खर्‍या  प्रेम भावनेला अशा रितीने तिलांजली देत आहे का?”

व्हेटच्या केबिनमध्ये अमिताही ब्रूनोबरोबर आत गेली. व्हेटने  इंजेक्शन तयार केले.  पण ब्रूनो  त्याला अजिबात सहकार्य देतच नव्हता. त्याला आवरणं जमतच नव्हतं. शेवटी अमिताला पहावे ना.  तीच म्हणाली,” डॉक्टर ! माझ्याकडेच द्या.  मीच देते त्याला इंजेक्शन.  मीही एक डॉक्टरच आहे.”

वास्तविक हे प्रोटोकॉलच्या बाहेर होते.

पण अमिताने  ब्रूनोला कुरवाळलं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून  गोंजारलं, मांडीवर घेतलं.  ब्रुनोने  तिच्याकडे इतक्या विश्वास पूर्ण नजरेने पाहिलं की  क्षणभर अमिताचे हात थरथरले.  पण मनात ती एवढेच म्हणाली,

” आय एम व्हेरी सॉरी ब्रूनो.  परमेश्वरा ! मला क्षमा कर.” हळूहळू ब्रूनोच्या  शरीरात ते औषध पसरत गेलं आणि तो शांत होत गेला.  भयाण  शांत,  नि:शब्द, निश्चेष्ट.

एक पर्व संपलं. नव्हे संपवलं.  एक अध्याय पूर्ण केला आणि एक अनामिक  नातं अनंतात विलीन झालं. 

घरभर ब्रूनो सोबतचे अनंत क्षण विखुरले होते. कितीतरी, त्याच्या सोबत काढलेली  छायाचित्रे.  त्याचं ब्लॅंकेट, त्याची गादी,  भिंतीवर त्याने फेकलेल्या चेंडूचे डाग.  घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्याचं अस्तित्व होतं.  ते कसं निपटायचं?

जंगलातल्या झाडावरची ती रंगीत पानगळ बघता बघता अमिताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळल्या.  एक अलौकिक संवेदनांचं, भाव भावनांचं, दिव्य,  वर्णनातीत भावविश्व संपून गेलं.  आणि पाप पुण्याच्या साऱ्या कल्पना भेदून एक भयाण  पोकळी तिच्या जीवनात तयार झाली. 

 येईल का ती कधी भरून? 

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

गराजचं शटर रिमोटने  अलगद उघडलं.  आणि अमिताने तिची पिवळी पोरशे कार गराज मध्ये आणली. शटर बंद झाले आणि अमिता घरात आली. घरात कोणीच नव्हतं.  आयलँडवर बराच पसारा पडला होता.  सिंकमध्ये भांडी साचली होती.  काही क्षण अमिताला वाटलं तिला खूप भूक लागली आहे.  सिरॅमिक बोलमध्ये ब्रुनोचे चिकन ड्रुल्स  पडले होते.  ते तिने पाहिले आणि  क्षणात तिच्या काळजात खड्डा पडला.  तिने घटाघटा पाणी प्यायले आणि काऊचवर जाऊन ती बसली.  एसीचं  तापमान ॲडजस्ट केलं आणि डोळे मिटून शांत बसली. छाती जड झाली होती.  खरं म्हणजे मोठमोठ्याने तिला रडावंसही वाटत होतं.  एकाच वेळी आतून खूप रिकामं, पोकळ वाटत होतं.  काहीतरी आपल्यापासून तुटून गेलेलं आहे हे जाणवत होतं.

मोबाईल व्हायब्रेटरवर होता.  तिने पाहिलं तर जॉर्जचा फोन होता.

” हॅलो ! जॉर्ज मी आज येत नाही.  ऑन कॉल आहे. काही इमर्जन्सी आली तर कॉल कर.”

” ओके. टेक केअर ”  इतकंच जॉर्ज म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

अमिता डेक वर आली.  कल्डीसॅक वरचा त्यांचा कोपऱ्यातला बंगला आणि मागचं दाट जंगल. पिट्सबर्ग मध्ये नुकताच फॉल सीजन सुरू झाला होता.  मेपल वृक्षावरच्या पानांचे रंग बदलू लागले  होते.  पिवळ्या, ऑरेंज रंगाच्या अनंत छटा पांघरून साऱ्या वृक्षावरची पाने जणू काही रंगपंचमीचा खेळच खेळत होती.  पण अजून काही दिवसच.  नंतर सगळी पानं गळून जातील. वातावरणात हा रंगीत पाचोळा उडत राहील कुठे कुठे.  कोपऱ्यात साचून राहील.  वृक्ष मात्र निष्पर्ण, बोडके होतील.  आणि संपूर्ण विंटरमध्ये फक्त या झाडांचे असे खराटेच पाहायला मिळतील.  सारी सृष्टी जणू काही कुठल्याशा अज्ञात पोकळीचाच अनुभव घेत राहील.  अमिताला सहज वाटलं, ” निसर्गाच्या या पोकळीशी आपल्याही भावनांचं साध्यर्म आहे.

या क्षणी खूप काही हरवल्यासारखं, कधीही न भरून येण्यासारखी एक अत्यंत खोल उदास पोकळी आपल्या शरीराच्या  प्रवाहात जाणवते आहे.” 

हर्षलला फोन करावा का? नको.  तो मीटिंगमध्ये असेल. सकाळी निघताना म्हणाला होता, ” बी ब्रेव्ह अमिता  खरं म्हणजे मी तुझ्याबरोबर यायला हवं.  पण आज शक्य नाही.  आमचा लंडनचा बॉस येणार आहे.”

पण अमिता  जाणून होती हर्षलची भावनिक गुंतवणूक आणि दुर्बलताही.  त्याला अशा अवघड क्षणांचं साक्षी व्हायचंच नव्हतं खरं म्हणजे. 

अमिता त्याला इतकंच म्हणाली होती,” इट्स ओके. मी मॅनेज करेन.” आणि तिने छातीवर दगड ठेऊन  सारं काही पार पडलं होतं.

विभाला फोन करावा का असाही विचार तिच्या मनात येऊन गेला.  पण तो विचार तिने झटकला.  विभा इकडेच येऊन बसेल आणि ते तिला नको होतं.  तिला एकटीलाच राहायचं होतं.  निर्माण झालेल्या अज्ञात पोकळीतच राहणं तिला मान्य होतं. तो कठिण,दु:खद अनुभव तिला एकटीलाच घ्यायचा होता.  निदान आता तरी. 

संध्याकाळी येतीलच सगळ्यांचे फोन.  तान्या, रिया.

 “ब्रूनो आता नाही” हे त्यांना सांगण्याचं बळ ती जणू गोळा करत होती.  सगळ्यांचाच भयंकर जीव होता त्याच्यावर आणि तितकाच त्याचाही सगळ्यांवर. 

अशी उदास शांत बसलेली अमिता तर ब्रूनोला चालायचीच नाही. अशावेळी  तिच्या मांडीवर पाय ठेवून डोक्यानेच तो हळूहळू तिला थोपटायचा.  एक अबोल, मुका जीव पण त्याच्या स्पर्शात, नजरेत, देहबोलीत प्रचंड माया आणि एक प्रकारची चिंता असायची. घरातल्या प्रत्येकाच्या भावनांशी तो सहज मिसळून जायचा.  त्यांची सुखे, त्यांचे आनंद, त्यांची दुखणी, वेदना हे सगळं काही तो सहज स्वतःमध्ये सामावून घ्यायचा.  इतकच नव्हे तर साऱ्या ताण-तणावावरती त्याचं बागडणं, इकडे तिकडे धावणं, खांद्यावर चढणं, कुरवाळणं ही एक प्रकारची तणावमुक्तीची थेरेपीच असायची. 

ब्रुनोची  आयुष्यातली वजाबाकी सहन होणं शक्य नव्हतं.  क्षणभर तिला वाटलं की आयुष्यात वजाबाक्या  काय कमी झाल्या का?  झाल्याच की.  कितीतरी आवडती माणसं पडद्याआड गेली.  काही दूर गेली.  काही तुटली.  त्या त्या वेळी खूप दुःख झाले..  पण या संवेदनांची त्या संवेदनांशी तुलनाच  होऊ शकत नाही.

घरात तसा कुठे कुठे ब्रूनोचा पसारा पडलेला होता. टीव्हीच्या मागे, काऊचच्या खाली, डेकवर,पॅटीओत त्याच्यासाठी आणलेली खेळणी, अनेक वस्तू असं बरंच काही अमिताला बसल्या जागेवरून आत्ता दिसत होतं. मागच्या विंटरमध्ये अमिताने त्याच्यासाठी एक छान जांभळ्या रंगाचा स्वेटर विणला होता. काय रुबाबदार दिसायचा तो स्वेटर  घालून आणि असा काही चालायचा जणू काही राणी एलिझाबेथच्याच परिवारातला !  या क्षणीही अमिताला त्या आठवणीने हसू आलं.

कधी कधी खूप रागवायचा, रुसायचा, कोपऱ्यात जाऊन बसायचा, खायचा प्यायचा नाही.  मग खूप वेळ लक्षच दिलं नाही की हळूच जवळ यायचा.  नाकानेच फुसफुस करून, गळ्यातून कू कू आवाज काढायचा. लाडीगोडी लावायचा. टी— काकाच्या डेक्स्टरचे एकदा हर्षल खूप लाड करत होता.  तेव्हा ते बघून तर त्याने घर डोक्यावर घेतलं होतं. इतकं  की नेबरने फोन केला,” नाईन इलेव्हन ला बोलावू  का?”

नाईन इलेव्हन म्हणजे अमेरिकेतील तात्काळ सेवा.  त्यावेळी क्षणभर अमिताला वाटले की भारतीयच बरे.  उठसुट असे कायद्याच्या बंधनात स्वतःला गुरफटून ठेवत नाहीत. इथे  जवळजवळ प्रत्येक घरात पेट असतो. प्रचंड माया ही करतात, काळजीपूर्वक सांभाळतातही.  पण प्रेमाचे रंग आणि जात मायदेशीचे वेगळे आणि परदेशातले वेगळेच.

तसे  ब्रूनोचे  आणि अमिताच्या परिवाराचे नाते किती काळाचे होते?  अवघे दहा वर्षाचे असेल.  असा सहजच तो त्यांच्या परिवाराचा झाला होता. 

शेजारच्या कम्युनिटीमध्ये एक चिनी बाई राहायची.  एकटीच असायची.  तिचा हा ब्रुनो. तेव्हा लहान होता.  पण अचानक एक दिवस तिने मायदेशी परतायचं ठरवलं. सोबत तिला ब्रूनोला न्यायचं नव्हतं कारण तिथलं  हवामान त्याला मानवणार नाही असं तिला वाटलं.  गंमत म्हणजे रिया,तान्या  येता जाता त्या चिनी बाई बरोबर फिरणाऱ्या ब्रुनोचे  फारच लाड करायच्या.  परिणामी त्यांच्याशी त्याची अगदी दाट मैत्री झाली होती.  हाच धागा पकडून तिने अमिताला,” ब्रूनोला ऍडॉप्ट कराल का?” असा प्रश्न टाकला.

रिया, तान्या तर एकदम खुश झाल्या. तसे हे सगळेच डॉग लवर्स.  त्यांची तर मज्जाच झाली.  आणि मग हा डोक्यावरचा भस्म लावल्यासारखा पांढरा डाग असलेला, काळाभोर, मखमली कातडीचा, छोट्या शेपटीचा, सडपातळ, पण उंच ब्रुनो  घरी आला आणि घरचाच झाला.आणि सारे जीवन रंगच बदलले. 

चिनी बाईने मेलवर सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून पाठवले.  त्याच्या वंशावळीची माहिती, त्याचं वय, लसीकरणाचे रिपोर्ट्स, बूस्टर डोसच्या तारखा, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा , त्याचे ग्रुमिंग  या सर्वांविषयी तिने इत्थंभूत माहिती कळवली.  शिवाय त्याच्यासाठी ती वापरत असलेले शाम्पू ,साबण ,नखं, केस कापायच्या वस्तूंविषयी तिने माहिती  दिली 

अमिता, हर्षल, रिया, तान्या खूपच प्रभावित, आनंदित झाले होते. ब्रुनोसाठी  जे जे हवं ते सारं त्यांनी त्वरित वॉलमार्ट मध्ये जाऊन आणलंही.  पॅटीओमध्ये चेरीच्या झाडाखाली त्याचं केनेलही बांधलं. 

सुरुवातीला तो थोडा बिचकला.  गोल गोल फिरत राहायचा.  कदाचित होमसिक  झाला असेल. पण नंतर हळूहळू रुळत गेला.  परिवाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला.  त्याच्या आणि परिवाराच्या भावभावनांसकट एक निराळंच भावविश्व सर्वांचच तयार झालं.

“ब्रूनो जेवला का?”

“ब्रुनोला फिरवून आणलं का?”

“आज त्याला आंघोळ घालायची का?”

“आज का बरं हा खात पीत नाही? काही दुखत असेल का याचं?”

असे अनेक प्रश्न त्याच्याबद्दलचे.   हाच त्यांचा दिनक्रम बनला. 

सुरुवातीला चिनी बाईच्या  विचारणा करणाऱ्या मेल्स यायच्या.  तिलाही ब्रुनोची आठवण यायची.  करमायचं नाही. रिया,तान्याला  तर एकदा असंही वाटलं की ही बाई ब्रूनोला परत तर नाही ना मागणार ?

पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रूनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेवानिवृत्ती … शाप की वरदान – लेखक – अज्ञात ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ सेवानिवृत्ती … शाप की वरदान – लेखक – अज्ञात ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे 58 व्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं.

नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा. भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्या बरोबर त्याचे डोळे मिटायला लागत. 

ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्या वर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या सभारंभाला खूप हळहळले, पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.

एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की ,सुटीच्या दिवशी घरांत त्याचा जीव घाबरायला लागायचा. दुपार खायला उठायची आणि करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वैंपाकघराकडे वळायचे. मग ही बरणी उघड, तो डबा उचक, असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे. वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वैंपाकघर दिसे. आणि तिचा संताप होई. सुटीचा एक दिवसही हा माणूस घरांत नको, असं तिला वाटायला लागे. 

त्यालाही अपराध्यासारखं होत असे, जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो., तेवढं घरी रहाणं जमत नाही ,ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई.

रिटायर्ड झाल्यापासून तो कायम घरांतच असायचा. तिला मात्र याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते आणि जेंव्हा हौस करायची वेळ होती ,तेंव्हा हा सतत ऑफिसचं तुणतुणं वाजवायचा, हे ती विसरली नव्हती, किंबहुना तिच्या मनांत याचा सुप्तसा रागही असावा.

रजेपुरता पैसा घरांत येत असला की माणसांचं ओझं व्हायला लागतं. वर्षानुवर्षाच्या त्याच्या संवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या, त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या. त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला संवय होती, तो ऑफिसात जायचा तेंव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे ,पण आता त्याला ‘ भरपूर वेळ असल्यानं असली कामं त्यानेच आपणहून करायला हवीत  ’ असा तिचा आग्रह होता.

हा आग्रह त्याला मान्यही होता, मात्र तिने सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या, असा त्याचा सूर होता. तिच्या स्वभावामुळे कदाचित, तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं.

तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड होता येणार नाही ,ही जाणीव तिला बोचत असावी. 

खरं तर तिचंही वय उताराला लागलं होतं आणि व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती. मुलांची लग्न, सुनेशी जमवून घेतांना होत असलेली तारांबळ, तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं, आणि हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला, पण घरकामाला  काडीचा हातभार न लावणारा तीचा हा स्थितप्रज्ञ नवरा. 

तो समोर नसला की, त्याच्याबद्दलच्या असूयेनं आणि समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं. तो पाणी प्यायला जरी स्वैंपाकघरात शिरला तरी ‘ तू मुद्दाम माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करतोस ’ म्हणत ती त्याला झिडकारायची. 

हळूहळू तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला. आणि त्या दिवशी ती प्रचंड चिडली. कारण काय होतं कुणालाच कळलं नाही, तिलाही. पण इतक्या दिवसांचा मनांत साचलेल्या रागाचा स्फोट झाला आणि तिने त्याच्यावर खूप आरडा ओरडा केला. त्याला अद्वा तद्वा बोलली, थेट त्याच्या आई वडिलांचा, बहीण भावांचा उद्धार केला. तो हादरला, पण रिअॅक्ट करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला. आणि ती प्रत्येक वेळी सांगत राहिली, ‘तू मला आता डोळ्यासमोर नकोस, बस्!

त्याने ऐकलं आणि निराश होत विचारलं! ‘आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ?’ तिला वाटलं हा चिडवतोय, ती मग आणखीनच चिडली. हातवारे करत किंचाळली! ‘कुठेही जा. मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका तरी होईल.’ हे ऐकून हा एकदमच शांत झाला. तश्याही परिस्थितीत म्हणाला, ‘ते माझ्या हातात नाही, पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे. शतायुषी हो ! 

हे असं वारंवार होऊ लागलं. अगदी चिमुटभर कारणासाठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची आणि मोबदल्यात तो तिला शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा. तिच्या मनात तसं काही नसायचं. त्याने खरंच त्यांच्या संसारातून, या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं. शेवटी तिनेही त्याचबरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता, त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं, वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पूजले होते, हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते, त्याचा मृत्यू मागण्याइतकी ती खचितच दुष्ट नव्हती. 

पण तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की तिची विचारशक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची, मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे आणि एक दिवस अचानकच तो गेला. सकाळी उठून त्याने चहा घेतला, लांब फिरून आला आणि ‘ थकवा वाटतोय ’ म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही.

घरात धावपळ झाली, डॉक्टर आले, त्यांनी तपासलं आणि त्यांच्या प्रथेनुसार इंग्रजीत ‘सॉरी, ही इज नो मोअर’ सांगितलं. एकच हलकल्लोळ झाला.

तो मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणेच एकदम शांत पहुडला होता. प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते. ‘Before Time असं मरण नको होतं ‘ ,असा प्रत्येकाचाच सूर होता.

तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले. ‘ आता कुठे सुखाचे दिवस आले होते, नवऱ्याचा पूर्णकाळ सहवास लाभला होता ,तर ही वेळ आली ’ असे लोक म्हणत होते . आकाशाकडे बोट दाखवून, ‘त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतयं का ?वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या निघून गेले. 

आता ती एकटी राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कुणी उरलं नाही. तसं मुलं, सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे, पण त्यांना त्यांचाही संसार होता.

तिनं देवळं धुंडाळली, मित्र मैत्रिणी झाले, काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं, मग मात्र सारेच आपोआप दूर झाले.

असेच दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्षे सरली. मुलांनी थाटात तिचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा केला. पण ‘सतत तुझंच कौतुक कसं  करायचं ?’ म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली.

नातू, नात लहान होते तोवर तिचे होते, मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं, आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच ‘काय आहे आजी?’ असं चिडक्या स्वरात विचारू लागले. 

तिला हे त्रासदायक व्हायचं, नेमका तेव्हाच, नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा, पण ‘काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही’ हे ठाऊक असल्याने, तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून रहायची. 

तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला, कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली. आता मात्र ती प्रचंड थकली, हातपाय चालणं कठीण झालं, वेळ काढणं जड जाऊ लागलं. ‘ तुझी  उपयोगिता संपायला आलीय ‘ याची जाणीव लोक आडून पाडून  तिला करून देऊ लागले आणि नकळत ती मरणाची वाट बघायला लागली.

एव्हाना पन्नाशी ओलांडलेले मुलगा आणि सूनही थकायला लागले होते. त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या आणि नवी सून तिच्याच सासूचं काही करेना, तिच्याकडून आजेसासूसाठी काही अपेक्षा करणं तर फारच कठीण होतं. 

ती रोज आतल्या आत रडायची. ‘ देवा, उचल मला ’ म्हणून प्रार्थना करायची. ‘ भोग भोगायला मला एकटीला अश्या परिस्थितीत सोडून तो सुखासुखी निघून गेला ’ म्हणत मनातल्या मनात त्याला दुषणे देत पडून रहायची. 

फारसं आठवायचं नाही तिला काही आज काल. मात्र तिने दिलेले शाप आणि त्याने दिलेले आशीर्वाद, प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते….!

‘मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका होईल.’ हा तिनं त्याला दिलेला शाप होता की आशीर्वाद होता ! ‘ तू मात्र खूप जग, शतायुषी हो,’ हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता का शाप होता? हे मात्र तिला तिचंच कळत नव्हतं….

मित्रांनो !

आपलेही बरेच मित्र सेवेतून निवृत्त झाले आहेत व काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा. हे असे प्रसंग कुणाच्या तरी आयुष्यात घडून गेलेले असावेत, असे जरी गृहीत धरले तरी देखील, सदरची घटना सहजासहजी  मान्य करावयास कुणाचेही मन तयार होणार नाही हे निश्चित. मात्र अशाही घटना कुणाच्या आयुष्यात सेवानिवृत्तीनंतर जर घडत असतील, तर हे फारच भयानक व हृदयद्रावक चित्र आहे.

  * “ जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस ” *— 

लेखक : अज्ञात . 

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काय हरवले सांग शोधिसी…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ काय हरवले सांग शोधिसी…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(दोन महिने लेकीला हवं नको ते पाहिलं. नोकरी सांभाळत हे सगळं करत होते, मला कधी त्याचा त्रास वाटला नाही.” ती बोलतच राहिली. ) – इथून पुढे —- 

“मीनल, तुला खोटं वाटेल, पण मला पहिल्यांदा मुलगीच हवी होती. त्यानं माझी इच्छा पूर्ण केली. नंतर त्याच देवानं न मागता माझ्या पदरात मुलगाही टाकला. आणखी काय हवं?

इतकी वर्षे मी केवळ एका आशेवर तग धरून होते की माझा मुलगा माझं भविष्य बदलेल. माझे कष्ट आणि माझ्या भावना समजून घेईल. काठीला लटकवलेले गाजर पाहून त्या गाजराच्या आशेने मूर्ख गाढव जशी गाडी हाकत असते, अगदी तशा गाढवासारखी माझी स्थिती झालीय. एखाद्याच्या कष्टाचं चीज होणं नियतीलाच मंजूर नसावे. 

अलीकडे सोनू पैश्यासाठी सारखा तगादा लावत असतो, नाही म्हटलं की अंगावर धावून येतो. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यात मी आवडती प्राध्यापिका असेन, पण घरांत मी अप्रिय कशी होत गेले हेच मला कळले नाही. माझ्याविषयी त्यांच्या मनांत हे नावडतीचं बीज कधी रोवलं गेलं हे माझ्या लक्षातच आलं नाही.       त्यांच्या सुखासाठी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी म्हणून मी माझ्या स्वत:साठी कमी आणि त्यांच्यासाठी जास्त जगत असते. माझी ऐपत नसताना देखील मुलांनी मागितलेली प्रत्येक वस्तू आणून दिली. मी जगावेगळं काही केलं असा माझा भ्रम नाही. खूप वर्षापूर्वी लिहिलेल्या माझ्याच कवितेच्या ओळी ओठावर येतात. ‘ओंजळीत निखारे धरून ठेवले/ आपल्यांना उब मिळावी म्हणून/ निखाऱ्यांचं मला दु:ख नाही/पण असं का व्हावं?/ हात भाजत असताना देखील/ आपल्यांनीच त्यात तेल ओतावं !’ तू मानसशास्त्राची प्राध्यापिका आहेस ना? मग सांग मी आता माझ्या मुलाशी कसं वागावं?” 

सुसि हवालदिल झाल्यासारखी दिसत होती. अखेर आता तिच्या हाती काय उरलं होतं? एवढे कष्ट सोसून देखील जर त्याची कुणालाच जाणीव नसेल तर अशी विफलता येणं साहजिकच आहे. जीवनातल्या कित्येक अडचणीना तोंड देत तिने स्वत:ची अशी एक ओळख निर्माण केली होती.

“सुसि, वाढत्या मुलांशी कसे वागावे हा आजकालच्या सर्वच पालकांसमोरचा कळीचा प्रश्न आहे.  जगभरातील माता या प्रश्नाने धास्तावलेल्या आहेत. आपल्याला जे काही मिळाले नाही ते आपल्या मुलांना कसे मिळेल यासाठी पालक आपले आयुष्य पणाला लावतात. स्वतः वाटेल तो त्रास सहन करून, स्वतःच्या आवडी-निवडीला मुरड घालून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन करीत असतात.

माझ्या मते पालकांनी घरात होणाऱ्या आर्थिक व्यवहारामध्ये मुलांना स्थान द्यावे. त्यासंबंधी जी चर्चा होईल ती त्यांच्या कानांवर पडण्याने सुद्धा त्यांच्यात खूप फरक पडतो. घरासाठी किंवा शिक्षणासाठी घेतलेली कर्जे याची जाणीव मुलांना करून द्यायला हवी. त्या कर्जाचे हफ्ते किती, त्यावरील व्याज किती हे त्यांना कळायला हवे. वर्षाकाठी त्यांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च हेही त्यांना कळायला हवे. घरातील छोटे-मोठे होणारे खर्च त्यांना लिहायला सांगावे.

खूप वेळा मुलांचे मित्र मैत्रिणी उच्चभ्रू परिवारातून आलेले असतात त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुविधा किरकोळ वाटायला लागतात. या जगात आपल्यापेक्षा देखील बिकट परिस्थितीत राहणारे परिवार आहेत हे त्यांना पटवून द्यायला हवे. समाजात एक प्रतिष्ठित पंच म्हणून जो लोकांच्या समस्या सोडवत असतो त्या तुझ्या नवऱ्याला तर ही समस्या चुटकीसरशी सोडवता यायला हवी. यात कसलं आलंय मानसशास्त्र? त्यांच्यावर ही जबाबदारी टाक. बरं ते जाऊ दे. काय म्हणते, तुमची सुकन्या आणि छकुली नात? लेकीकडे मज्जा करून आलीस वाटतं.”   

तिच्या तोंडून “ठीक आहे.” एवढेच शब्द बाहेर पडले. माझ्या लक्षात आलं. तिच्या ओठांतून जे बाहेर पडलं होतं आणि तिच्या डोळ्यांतून दिसणारे भाव या दोन्हीत काही ताळमेळ दिसत नव्हता. 

ती हळूच म्हणाली, “अगं काय सांगू, माझ्या हातचं खाल्ल्याशिवाय जिचं पोटच भरायचं नाही, त्या कन्येला आताशा माझा स्वयंपाक आवडेनासा झाला होता. इथे आली तेव्हा रोज बाहेरून काहीतरी मागवण्याची फर्माईश असायची. मी प्रेमाने सगळं निमूटपणे करीत होते. तरी देखील जाताना लेक म्हणालीच, ‘आई, हे काय सगळ्याच आया करतात, तू काही वेगळं केलं नाहीस.’ लेकीचे ते शब्द मला कापत गेले. 

तिचं लग्न झाल्यापासून तिच्याकडे एकदाही गेले नव्हते आणि तूच आग्रह केलास म्हणून मी गेले. दुसऱ्या दिवशीच कन्येनं सांगितलं, ‘आई, तुला जायचं असेल तर जा, बाबा आणि सोनूचे हाल होतील.’ ते माझ्या जिव्हारी लागलं. मी कशी राहणार? माझं घर कन्येसाठी हक्काचं होतं, तिचं घर माझ्यासाठी थोडेच हक्काचे असणार आहे? 

मोठ्या बाता मारून गेलेल्या मला परत यायला तोंड नव्हतं. मी माझी वर्गमैत्रिण सुलभाने आग्रह केला म्हणून तिच्याकडे चार दिवस राहिले आणि परत आले. मीनल, आताशा मला असं काय होतंय, हे कळेनासे झाले आहे. सतत काहीतरी हरवल्याची जाणीव होते आहे, नेमके काय हरवले आहे ते मात्र कळत नाही अशी अवस्था झाली आहे.” ती हतबल दिसत होती.  

मी म्हटलं, “ सुसि, तू काहीही हरवलं नाहीस. तुझे आहे तुझ्यापाशी. निर्व्यसनी प्रेमळ पती, स्वावलंबी कन्या आणि वंशोद्धारक मुलगा सगळं तुझ्याकडे आहे. आम्हाला हक्क दाखवणारी अशी एक मुलगी हवी होती. सोनूसारखा एक मुलगा हवा होता. पण काय करणार?” तिनं सुस्कारा टाकत असं म्हटल्यावर, मीच एखाद्या हरलेल्या योद्ध्यासारखी तिच्यासमोर शस्त्रे टाकली. सुसिच मला कितीतरी वेळ धीर देत बसली.  

दूरवर कुठेतरी हळुवार आवाजात गाणं वाजत होतं. “गर्द सभोंती रानसाजणी तू तर चाफेकळी,  काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी?” 

 – समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काय हरवले सांग शोधिसी…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ काय हरवले सांग शोधिसी…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

दारावरची बेल वाजली. दार उघडलं, पाहते तो काय? सुहासिनी, नावाप्रमाणेच अतिशय मोहक हसू ल्यालेली मैत्रिण समोर उभी होती. 

सुहासिनी दिसायला अगदी सुरेख होती. लांबसडक रेशमी केस, सावळीच पण नाकीडोळी नीटस, नाजुक ओठ आणि पाहताक्षणी भुरळ पडावी असे विलक्षण बोलके डोळे आणि अत्यंत चौकस नजर. फिक्कट रंगांच्या साड्या, त्यावर शोभेलसा मॅचिंग ब्लाउज घातलेला. तोंडात खडीसाखर. अगदी कायम मनमोकळे हसणे. गेली अनेक वर्ष सुहासिनी ही अशीच आहे.

तिची गळाभेट घेत मी आनंदमिश्रित आश्चर्याने विचारलं, “आज अचानक अशी तू इकडे कशी?” ती सोफ्यावर रिलॅक्स होत म्हणाली, “तू काल म्हणत होतीस ना की गिरीशदादा सकाळीच बाहेरगांवी जाणार आहेत म्हणून. आज मीही एकटीच होते, म्हटलं तुझ्याकडे चक्कर टाकावी. चालेल ना?”

“अग, चालेल काय, धावेल सुद्धा.” आम्ही खळखळून हसलो. सखूबाई लगेच आमच्यासाठी चहा टाकायला आत गेल्या. मी म्हटलं, “उद्याच्या लेक्चरची तयारी झालीय का?” 

“आम्हा मराठी प्राध्यापकांना कसली आलीय तयारी? तुला माहीतच आहे, माझ्या सर्व आवडत्या कवींच्या कविता मला कशा तोंडपाठ आहेत त्या. अर्थात त्यात माझी हुशारी कमी, अगदी मनामनांत ठसले जाणारे त्या कवींचे योगदान जबरदस्त आहे. माझं त्यावर चिंतन, मनन सारखं चालू असतं. पण तुझं तसं नाही, कारण तू मानसशास्त्राची प्राध्यापिका आहेस. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्रशुद्ध शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मला त्यात इंडस्ट्रिअल, क्लिनीकल, चाईल्ड, स्कुल सायकोलॉजी वगैरे असतं एवढीच जुजबी माहिती आहे. ते ऐकूनच टेन्शन येतं.” सुहासिनी म्हणाली.

“हो, या प्राध्यापकीत कितीही मुरलेलो असलो तरी उद्या काय शिकवायचे आहे हे समजावून घेऊन त्याच्या नोट्स काढाव्याच लागतात. तयारीशिवाय जाणं निदान मला तरी आवडत नाही.” 

….तितक्यात चहा आला.   

प्रतिकूल परिस्थितीत जे घट्ट पाय रोवून उभे असतात, अशा लोकांशी माझी मैत्री चटकन जमते. पंचवीस वर्षापूर्वी आम्ही दोघी एकाच वर्षी प्राध्यापकीला सुरूवात केली होती. सुहासिनी प्रथम श्रेणीत बी.ए. पास झाली. सुहासिनीसारख्या सुंदर मुलीचं स्थळ जमायला अवघड गेलं नाही. शेखर कुठल्याशा कंपनीत क्लार्क होता. सुहासिनीने एम.ए. ला अ‍ॅडमिशन घेतलेली होतीच. लग्नानंतर तिने मराठीत एम.ए. करताना गोल्ड मेडल मिळवलं. एम. फिलसाठी अ‍ॅडमिशन घेतली. त्याच दरम्यान घरी पाळणा हलला. घरी लक्ष्मी आली पण खर्चाची तोंडमिळवणी करणे अवघड जात होते. 

नशिबाने महाविद्यालयात तिची नेमणूक झाली. आता स्थिरता येईल असे वाटत असतानाच शेखरची कंपनी बुडाल्याने त्याची नोकरी गेली. परत कुठे नोकरी शोधायचा त्याने प्रयत्न केला नाही. त्याला समाजकार्याची आवड होतीच. निरपेक्ष वृत्तीने अडल्या नडलेल्या लोकांची कामं करून देणं हे आता त्याचं व्यसन होऊन बसलं होतं. 

सुहासिनीने चकार शब्द काढला नाही. कुणी काही बोललं की ती म्हणायची ‘नवऱ्यानं कमवायचं अन बायकांनी घरी बसून राहायचं, आता ते दिवस गेले. मी कमवते अन माझा नवरा बसून खातो याचं माझ्या मनांत किल्मिष नाही की माझ्या नवऱ्याच्या मनांत अढी. तुम्हाला काय त्याचं? दुसरं, माझा नवरा समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने जगावेगळे काम करतो आहे.’ असं सांगायची.

आपल्या हिमतीवर तिने आपल्या दोन्ही मुलांना नीट वाढवलं. कन्येला उच्चविद्याविभूषित केलं. कन्येला कुठेतरी नोकरी लागून तिला आपल्या पायावर उभी केल्याशिवाय तिच्यासाठी स्थळंही पाहायला तयार नव्हती. नोकरी मिळताच तिच्या मनासारखं तिचं लग्नही जमलं. मुलगी सुस्थळी पडली पण एकुलती एक कन्या आपल्यापासून कित्येक मैल दूर होणार म्हणून सुहासिनीच्या जीवाची घालमेल होत होती. त्यावेळी मीच तिला समजावून सांगितलं होतं. ‘सुसि, एवढी हुरहुर लावू नकोस ग, तिच्या जीवाला. आपल्या स्वत:च्या विश्वात ती नव्या नवलाईने जाते आहे, तिची पावले जड होऊ देऊ नकोस. या काळजाच्या तुकड्याच्या पंखांत तूच बळ दिले आहेस म्हणूनच तर नव्या दिशेला भरारी मारण्याचे स्वप्न तिला पाहता आले. तू दिलेल्या संस्काराच्या बळावर ती घट्ट पाय रोवून उभी राहील. लक्षात ठेव, तिला तुझी गरज देखील भासणार नाही.’ झालंही तसंच, ती कन्या सुहासिनीला पार विसरून गेली. 

पहिलटकरणीचं हक्काचं घर म्हणून कन्या आईकडेच आली होती. कॉलेज सांभाळत सुहासिनीने लेकीचं सगळं केलं. दोन महिन्यानंतर लेकीला, नातीला सोडायला म्हणून पहिल्यांदा दिवाळीच्या सुटीत मुलीच्या सासरी गेली होती. आपल्या लेकीनं घर छान सजवलं आहे म्हणून तिला खूप आनंद झाला. तिने मला खास फोन करून सांगितलं होतं. 

त्यानंतर आज ती पहिल्यांदाच अशी वेळ काढून माझ्याकडे आली होती. चहा संपला. सुहासिनी गप्पच होती. 

काही वेळाने सुसि म्हणाली, “मीनल, तू त्या दिवशी बरोबर बोलली होतीस. मला आता ते प्रकर्षानं जाणवतं आहे. मी आता केवळ गरजेपुरती राहिली आहे. का कोण जाणे, आताशा सारखं वाटतं आहे की आपले म्हणवणारे लोक फक्त स्वार्थासाठी माझा वापर करताहेत. माझी मुलं आणि त्यांच्या भविष्याचा ध्यास एवढंच माझं लक्ष्य होतं.   

शेखरला घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही हे स्वीकारूनच मी मुलांच्या शिक्षणाकडे जातीनं लक्ष दिलं. त्यांची प्रत्येक मागणी मी पूर्ण करीत राहिले. हे सगळं मी एकटीच्या जीवावर करत होते. शेखरच्या वडिलार्जित इस्टेटीतला एक तुकडा आपल्या हाती लागेल तेव्हा लागेल, आपलं स्वत:च एक घर असावं म्हणून छोटंसं कां होईना, घर बांधून घेतले. त्याचे हप्ते भरतेच आहे. मुलीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी पेलली. दोन महिने लेकीला हवं नको ते पाहिलं. नोकरी सांभाळत हे सगळं करत होते, मला कधी त्याचा त्रास वाटला नाही.” ती बोलतच राहिली. 

— क्रमशः भाग पहिला.

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक हास्य कथा -> मो-“बाइल वेडी” – लेखक : डॉ. आनंद काळे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

☆ एक हास्य कथा -> मो-“बाइल वेडी” – लेखक : डॉ. आनंद काळे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर

गेली २० वर्षे  मानसोपचारतज्ञ म्हणून काम करत असताना माझ्या लक्षात आले की  काही रुग्ण चांगलेच लक्षात रहातात अन त्याहीपेक्षा अधिक लक्षात रहातात ते त्यांचे नातेवाईक.

आता पर्वाचाच एक किस्सा सांगतो .

सकाळीच एका २५ ते ३० वर्षे वयाच्या पुरुष रुग्नाला घेउन एका ४५- ५०च्या स्त्रीने ओपीडीत  प्रवेश केला . त्यांच्या सोबत होता त्यांच्या गावातला एक सज्जन .

मानसिक आजारची लक्षणे त्या तरुणात साफ दिसत होती . शून्यात असलेली नजर , अस्ताव्यस्त कपडे , वाढलेली दाढी अन चेहऱ्यावरचे अस्वस्थ भाव .

शेजारी बसलेल्या त्याच्या आईकडे माझे लक्ष गेले. नेटनेटकी नववार साडी ,कपाळावर टेबल टेनिसच्या चेंडू एव्हढे मोठे कुंकू, डोक्यावर भला मोठा अंबाडा अन नुकतच पान खाल्यामुळे लाल झालेले ओठ .

त्या स्त्रीने सुरुवात केली .

” दागदर, हे बगा हे माझ पोरग , गेल्या आठ दिसापासून ……..”

 एव्हढ्यात ” माळ्याच्या माळ्यामंदी पाटाच पाणी जात …..” मोबाईलची रिंग टोन ऐकू आली .

आवाज कुठून येतोय याचा काही मला अंदाज लागत नव्हता . या बाईने आंबाड्यात तर नाही ना ठेवला मोबाईल . डोक्यात एक विचार चमकून गेला .😳🧐

त्यानंतर  त्या स्त्रीने केलेल्या ज्या प्रक्रियेने ज्या जागेवरून मोबाईल दृष्टीक्षेपात आणला  ते बघून मी डोळे मिटले .

डोळे उघडल्यावर ती स्त्री मोबाईलवर संवाद करताना दिसली  . ” हॅलू , ….हा सखूच बोलतेय  … काय झाल ग कमळे …..आज नाही  भीसी ..   उद्या हाय … व्हय …या बारीस लागली ना मला भीसी तर श्यामसंग चा नवा मोबाईल घेनार हाय ..

मी मारला व्हता तुले मोबाईल सकाळी  पण तीकडून ती बाइ विंग्रजीत कायबाय बोलत व्हती… … बर म्या काय  म्हणते …”

आजूबाजूचे  वातावरण अन आम्हा पामरांबद्द्ल अनभिज्ञ होवून सखूबाई तल्लीन होवून मोबाईलवर  बोलत होत्या .

शेवटी त्यांना माझी दया आली . ” इकड   विठूला आणलय दाग्दरकड. त्याच झाल दोन मिंटात की लगेच लावते बघ .” त्यांनी कमळीला सांगत मोबाईल कट केला .

इतकावेळ धोरोदत्तपणे मी मोबाईलचे संभाषण संपण्याची वाट पहात होतो .  ” काय त्रास होतोय विठूला “

स्वत:च्या मनावर ताबा ठेवत मी विचारले .

“२ हप्त्यामाग एकदम नादर व्हता बघा. . जुन्या नोकीयाच्या जाड ठोकळ्यासारख्या मोबाईल वानी. एकदम ठणठणीत!.  बायकू गेली कवरेजच्या बाहेर! “

“ म्हणजे ?”😳 मी विचारले

“सोडून  गेली हो…. तव्हापासून बिघडलय बगा .”

“  काय बदल वाटतोय त्याच्यात?”

“मधीच बोलता बोलता “रेंज” सोडतय बघा”

“ काय ?” मी  उडालोच.😳🙃

“ म्हणजे बोलता बोलता लाइन सोडून बोलतो.” तीचं उत्तर.

“बर ! अजून काय त्रास होतोय?” माझा चिवटपणा.

सखूबाई उत्तर देणार इतक्यात पुन्हा ” माळ्याच्या मळ्यामंदी  ही मोबाईल ट्यून वाजली . या वेळी मी डोळे बंद करण्याच्या आत मोबाईल सखूबाईने उचलला होता .

” काय ग रखमे?”

माझा धीर आता सुटू लागला होता .

“ हे बघ . रातच्याला पीठल भाकर कर . चार मुठी बेसनात २ गीलास पाणी टाक अन चांगल रटरट शीजू दे . किती बार्या  सांगितल तुला तेच .  जरा डोक लाव की . अस काय करायलीस शीम कार्ड नसलेल्या मोबाईल वनी”

सखूबाईने मोबाईल कट केला अन त्याला अदृश्य करत माझ्याकडे वळल्या.

” तर म्या सांगत व्हते दागदर , मधून मधून कधी कधी “ह्यांग” बी होतो ? “

“काय होतो?”🧐

“मोबाईल जसा ह्यांग व्हतो ना तसा गच्च व्हतो बघा”

आता माझच डोक ह्यंग व्हायची वेळ आली होती .

” लघवी संडासला काही त्रास ? ” माझा हिस्टरी घेण्याचा प्रयत्न चालू होता .

“चार दिस झाले बघा संडासला झाल नाही”. खातच नाही काइ त्यो.. .आता मला सांगा डागदर  इनकमिंगच नाही तर आवुट गोइंग कस राहिल ?”

सखूबाईच्या मोबाईल क्षेत्रातल्या प्रगाढ पांडित्याने मी आता चांगलाच प्रभावित झालो होतो .😇😱

” डिसचार्च झालेल्या मोबाईल वानी वागतोय बघा . आता बायको नाही म्हणजे चार्जर् नाही . कितीदा सांगीतल त्याला मिसेसला एक मिस्ड काल तरी  दे म्हून. पण ह्यो ऐकतच नाही.”.

” एव्हढ्यात अजून एक मोबाइल ची ट्यून वाजली . ” निसर्ग राजा ऐक सांगतो “

आता हा कोणाचा मोबाइल ? मी प्रश्नार्थक मुद्रेने वर पाहिले . हा सखूबाईचा तर नक्कीच नसणार . सोबतच्या गावाकडच्या कार्यर्कत्याने आपल्या खिशातून मोबाईल काढला

“काय रामराव , कुठ हाइत तुम्ही.. . या येळीस झेड पी च्या विलेक्षणच तुमच तिकीट  फिक्स दिसतय . बाकी सगळ्याले डिलीट मारणार तुम्ही यंदा .  फेश्बुकावर लै चमकू लागले तुम्ही !!”

मी हताशपणे संभाषण संपण्याची वाट बघू लागलो .

इतक्यात सखूबाई त्या सद्गृहस्ताला बोलल्या .” ए बारकू . मूट करण मोबाइल . डॉक्टरकड आल्यावर मोबाईल शायलंट ठिवायच माहीत नाय का तुला.”

पुढे मी काही बोलण्याच्या आत सखुबाई सुरू झाल्या .

“हे बगा दागदर , तुम्हाला काय करायच ते करा.सगळ बील प्री पेड करते. पोस्ट पेडची भानगडच नाही . पण एकदाच फार्मेट का काय म्हणते ते मारा अन चक करून टाका सगळ.”

“ मव्हा भाउ हाय वडाफून च्या सेंटरात . त्यो म्हणला कशाला जाती डागदरकड . मी गूगळ करतो अन सांगतो तुला ट्रिटमेंट .ते त्याच गुग्गुळ काय माझ्या डोक्यात डाउनलोड झाल नाही बघा  म्हून आणल तुमच्याकड.”

सखूबाईच हे मोबाईल रुपक मी आणि विठू ( पेशंट )अगदी शांतपणे ऐकत होतो. फरक एव्हढाच की विठूच्या डोक्याच्या मोबाईलला नेटवर्कच  नव्हते अन  सखूबाईच्या अखंड बडबडीने माझ्या डोक्याचे नेटवर्क कधीच कंजेस्टेड झाले होते.

” हे बघा सखूबाई, या प्रकारच्या मनोविकाराची उपाययोजना ……”

मला मध्येच तोडत सखूबाई म्हणाल्या

” जरा एक मिनिट डागदर , हे तेव्हढ वाटस अप वर आंगठे , फुग अन फुल टाकते . शेजारच्या मंदीच्या लेकराचा ह्य्यापी बर्थ डे हाय”

सखूबाईनी मोबाईल मध्ये एखाद्या १०० ची स्पीड असलेल्या टाइपिस्टलाही लाजवेल अशा वेगाने टाइप केले .

माझ्याकडे वळत त्या म्हणल्या . “तुम्हाला काय करायच ते करा पण मव्ह पोरग चांगल नीट करून द्या ” एखाद्या नव्या टच स्क्रिन च्या मोबाईलवानी”

मी हवालदील .

“  ते औशीध गोळ्या धाडा मला वाटस अप वर”

सखूबाई उठल्या अन माझ्याकडे सरसावल्या .

“ ईकड बघा डॉक्टर . लांबवलेल्या हातातल्या मोबाएलकडे माझ्याशेजारी उभ राहून पहात त्यानी मला सांगितल.

“ए विठ्या , मेल्या बघ की त्या मोबाईलकडे. आपल्याला दागदर बरूबर शेल्फी काढायचीय.”

शेल्फी काढून सखूबाई, विठू अन त्यांच्याबरोबरचा तो इसम बाहेर पडले .

माझ्या डोक्याच्या मोबाईलच्या हार्डवेअर , सीम कार्ड अन बॅटरी यांच्या एकत्रित ताळ्मेळाची  पार वाट लागली होती .

दुसऱ्या दिवशी सकाळी मी वाट्स ॲप उघडले .एका अननोन नंबरवरून आलेला एक मॅसेज बघीतला “. गूड मार्निग दागदर “. बरोबर एक फोटो पाठवला होता. आदल्यादिवशीचाच  सखूबाई अन विठु बरोबरचा सेल्फी होता . .

फोटोत आपले लाल ओठ दाख्वत सुहास्य वदनाने  सखूबाई दिसत होत्या. शेजारी मी अन विठू .  माझ्या चेहऱ्यावरचे भाव मात्र  विठुच्या चेहर्यावरील भावापेक्षा फार काही वेगळे नव्हते .😃

इतक्यात माझ  मोबाईल खणाणला . “डागदर , पलीकडे सखूबाई होत्या . तुम्हाला पाठवलेला फोटू डीपी म्हून ठिवला तर बर राहीन का?

बिगीनी सांगा . मोबाईलची बॅटरी संपायली”.

माझी बोलती बंद झाली . माझा मोबाइल चार्ज्ड होता पण माझीच बॅटरी खलास झाली होती.😇🙃

लेखक : डॉक्टर आनंद काळे

औरंगाबाद.

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एखाद्याचं नशीब — भाग-२ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ एखाद्याचं नशीब — भाग-२ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(मोहिनी लेकीच्या काळजीनं सतत तिच्या सोबत राहू लागली आहे. एकीकडे तिचे उपास-तपास, देवधर्म चालूच आहेत. ती यांत्रिकपणे घरातली कामं कशीबशी उरकते. रात्री देखील ती वरदाच्याच खोलीत झोपते. मुकुंदरावांकडे लक्ष द्यायला तिला सवडच नाही. मुकुंदराव हतबल होऊन आपलं पोरकेपण भोगत आहेत.)  इथून पुढे —

वरदाच्या बाबतीत झालेली फसवणूक, नंतर घटस्फोट यामुळे त्या घरावर अवकळा आल्यासारखं झालं होतं. जवळच्या मित्र-मंडळींनाही समजत नव्हतं, ही कोंडी फोडावी तरी  कशी? पण  काळ कोणासाठी थांबत नाही असं म्हणतात. मुकुंदरावांच्या कुटुंबालाही ते लागू होतंच.

मुकुंदराव परत बांधकामाच्या साईटवर जाऊ लागले होते. पण एरवी काम करताना सगळ्यांबरोबर चालणारे हास्य – विनोद  बंद झाले होते. संभाषणही कामापुरतंच.

मोहिनीच्या तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्या होत्या. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठी नियमित औषधं घ्यावी लागत होती. 

वरदा घरातल्या कामात आईला मदत करत होती. पण अगदी मिटल्यासारखी. जेवढ्यास तेवढं बोलणं आणि बाकी वेळ काहीतरी वाचत नाहीतर शून्यात नजर लावून बसणं, हाच तिचा दिनक्रम होता आता!      

दरवर्षीप्रमाणे दोन्ही वर्षी गणपती उत्सवही साजरा झाला. फक्त आधीचा उत्साह मात्र नव्हता त्यात. यावर्षीचा गणेशोत्सव आठवड्यावर आला होता. सकाळी मुकुंदराव हाॅलमध्ये पेपर वाचत बसले होते. ते घरात असले म्हणजे समोरचा दरवाजा उघडाच असायचा. ‘नमस्कार, काका येऊ का?’, आवाजासरशी मुकुंदरावांनी दाराकडे नजर टाकली तर भोसल्यांचा रमाकांत सपत्नीक दारात उभा होता.

“अरे, रमाकांत ये ना. या घरात यायला तुला परवानगी का हवी? शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हापासून इथे येतोस की ! .”

“खरंय काका, मी आपलं सहज काही तरी बोलावं म्हणून बोललो हो!” असं म्हणत तो आत आला. दोघांनी वाकून मुकुंदरावांना नमस्कार केला आणि रमाकांतची बायको वरदा आणि काकूंना भेटायला आतल्या खोलीत गेली.

रमाकांत गावातला हुशार पोरगा. त्याला डाॅक्टर व्हायचं होतं पण त्याच्या बाबाला या शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता. अशावेळी मुकुंदरावांनी त्याला सर्व मदत केली होती आणि तीही निरपेक्ष वृत्तीने.

डाॅक्टर झाल्यावर पाच वर्षे रमाकांत मुंबईतल्या मोठ्या हाॅस्पिटलमध्ये नोकरी करत होता. अनुभवासाठी ते आवश्यकच होतं. त्याला आपल्या गावातच मोठं हाॅस्पिटल काढायचं होतं, कारण दहिवलीच्या आसपासच्या परिसरात एकही मोठं हाॅस्पिटल नव्हतं. 

सरकारी दवाखान्यात नेहमीच स्टाफ आणि सुविधांचा दुष्काळ! गंभीर स्थितीतला रूग्ण कल्याण-अंबरनाथच्या दवाखान्यात पोचण्याआधीच राम म्हणायचा. हे त्यानं लहानपणापासून पाहिलं, अनुभवलं होतं. आता त्याच्या काही डाॅक्टर मित्रांच्या सहकार्याने त्याला ही कामगिरी पार पाडायची होती. त्याची बायको रोहिणी स्त्रीरोगतज्ज्ञ होती, तिचा सहभाग तर मोठाच होता. मुकुंदरावांचाही याबाबत सल्ला घ्यावा यासाठी तो आज आला होता.

मुकुंदरावांनी दहिवली आणि कर्जतच्या दरम्यान एक मोठा भूखंड विकाऊ असल्याचं रमाकांतला सांगितलं. जमीनीचा मालक परिचयाचा असल्याने व्यवहार वाजवी किमतीत होईल याची त्यांनी खात्री दिली. बँकेचे कर्ज मिळायलाही काही आडकाठी होणार नव्हती, कारण जमिनीची सगळी कागदपत्रं व्यवस्थित होती. 

मुकुंदरावांनी लगेच त्या माणसाला फोन लावून, दुपारी जागा बघायला येत असल्याचं कळवलं.  रमाकांत आणि त्याच्या बायकोला जागा पटली तर दोन दिवसांनी बाकीच्या मित्रांनाही बोलवणार होते जागा पहायला. आणि बघता बघता जागेची पसंती होऊन, कर्जाची सोयही झाली. गणपती उत्सवही यथासांग पार पडला. 

रमाकांत आणि रोहिणी आठवडाभर मुकुंदरावांकडे मुक्काम ठोकून होते. कारण तो आणि त्याचे आई-वडील तीन वर्षांपूर्वी ठाण्यात राहायला गेले होते, मुंबईत रोज ये-जा करणं रमाकांत आणि रोहिणीला सोयीचं होतं म्हणून! 

मुकुंदरावांनी स्वतःच्या देखरेखीखाली हाॅस्पिटलचं बांधकाम करून घेणार असल्याचं सांगितलं. रमाकांत आणि रोहिणीनं, वरदानं या बांधकामाच्या हिशोबाची बाजू सांभाळावी यासाठी तिला मनवलं. तिच्या रिकाम्या मनाला काहीतरी गुंतवणूक मिळावी, हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. रमाकांत सख्ख्या भावासारखा असल्याने वरदाला त्याला नाही म्हणताच आलं नाही.

हाॅस्पिटलच्या निमित्ताने रमाकांत, रोहिणी आणि त्याच्या इतर मित्रांची उठबस मुकुंदरावांकडे अनेकदा होऊ लागली. नवीन कामाच्या जबाबदारीत मन गुंतवल्यामुळे मुकुंदराव आणि वरदा दोघेही आपापल्या दुःखातून थोडे बाहेर पडले. या साऱ्याचा चांगला परिणाम मोहिनीच्या तब्येतीवरही झाला.

जागतिक मंदीचा परिणाम म्हणून विनयला अमेरिकेतील नोकरी गमवावी लागली. तिथे नवीन नोकरी मिळणंही दुरापास्त झालं. त्यामुळे त्यानं भारतात परतण्याचा निर्णय घेतला. सोफियाला अमेरिका सोडून भारतात येणं मान्य नव्हतं आणि मुलाची जबाबदारी घेण्याचीही तिची तयारी नव्हती. याची परिणिती त्यांच्या घटस्फोटात झाली. 

विनय आपल्या चार वर्षाच्या लेकाला, जाॅयला घेऊन दहिवलीला परतला. इतक्या वर्षातला दुरावा, मुलाच्या आणि नातवाच्या प्रेमापोटी, मुकुंदराव आणि मोहिनीनं मोठ्या मनाने मिटवून टाकला. मिळेल ते काम, नोकरी स्वीकारून पुनश्च श्रीगणेशा करायचं विनयनी ठरवलं. मुकुंदरावांच्या कामातही जमेल तशी मदत तो करू लागला.

भागीदार म्हणून हाॅस्पिटलच्या कामासाठी फेऱ्या घालता घालता कल्याणच्या आर्थोपेडिक सर्जन असलेल्या डाॅक्टर सर्वेश कुलकर्णीनी वरदाच्या मनातही जागा पटकावली. त्याचा मोठा भाऊ डेंटिस्ट आणि आई-बाबा आयुर्वेदिक डॉक्टर होते. रमाकांतचा मित्रच असल्याने वरदाविषयी सगळी माहिती त्याला आपोआपच मिळाली. वरदाच्या बाबतीत जे काही घडलं, त्याची माहिती कुलकर्णी कुटुंबाला मिळाली होती आणि त्यात वरदाकडे काहीच उणेपणा नाही, हे त्यांनाही पटलेलं होतं. लवकरच वरदा आणि सर्वेशचं शुभमंगल अगदी साधेपणाने, पण समस्त दहिवलीकरांच्या उपस्थितीत पार पडलं. 

देवधर कुटुंबावरचं नैराश्याचं सावट दूर झालं. जाॅयच्या सहवासानं आजी-आजोबांमध्ये एक नवीन चैतन्य आलंय, घराला घरपण आलंय. रमाकांत आणि त्याच्या मित्रांनी या कुटुंबाचा परीघ विस्तारला आहे. त्यामुळे काहीना काही कारणांनी या कुटुंबाची एकमेकांच्या घरी हजेरी लागत आहे. आता विनयसाठीही वधू संशोधन चालू आहे. त्यामुळे उगाच काहीतरी विचार करत एकटं बसायला, कोणाला सवडच नाहिये.

वाईट परिस्थितीतही आपलं मनोबल टिकवून ठेवलं पाहिजे, कारण बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हेच खरंय! तुम्हालाही पटलं ना?

– समाप्त – 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एखाद्याचं नशीब — भाग-१ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ एखाद्याचं नशीब — भाग-१ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

मुकुंदराव देवधर म्हणजे दहिवली गावातली प्रतिष्ठित आणि दिलदार असामी! वय ५२ वर्षे, उंची पावणेसहा फूट, लख्ख गोरा रंग आणि किंचित तपकिरी झाक असलेले भेदक डोळे, असं एकूण रूबाबदार व्यक्तिमत्त्व !

मुकुंदराव सिव्हिल इंजिनिअर, बांधकाम व्यवसायात त्यांनी चांगलंच नाव कमावलं होतं. त्यांचा प्रशस्त बंगला त्यांच्या वैभवाची साक्ष द्यायला पुरेसा होता. त्या शिवाय चार गुंठे जमीनीवर आंबा, नारळ, सुपारी, पेरू, चिकू अशा वेगवेगळ्या फळझाडांची लागवड केली होती. त्यातूनही बरंच उत्पन्न मिळत होतं.

शिवाय गावातील दोन पतपेढ्या, ज्युनियर काॅलेजच्या कमिटीवर ते होते आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसंबधी संस्थेचेही सन्माननीय सदस्य होते. अडल्या पडल्याला मदतीचा हात द्यायला नेहमीच ते पुढे व्हायचे. त्यामुळे गावात त्यांना आदराचं स्थान होतं.

बांधकाम व्यावसायिक असले तरी मुकुंदराव साहित्य – कला यांचे शौकीन होते. गणपतीला त्यांच्या बंगल्यासमोर मोठा मांडव घातला जायचा. तबला-पेटीच्या साथीनं दणक्यात आरती व्हायची. गावातली मंडळी आरतीला आवर्जून हजेरी लावायची. रोज किमान २०-२५ माणसं पंगतीला असायची. 

गौरी-विसर्जनापर्यंत रोज वेगवेगळ्या कार्यक्रमांचीही मेजवानी असायची. काव्य वाचन, कथाकथन, कीर्तन, भजन, हिंदी-मराठी वाद्यवृंदांचे गाण्याचे कार्यक्रम अशी धमाल असायची. पण सगळे कार्यक्रम अगदी शिस्तबद्ध आणि वेळेत पार पडायचे. या कलाकारांचा पाहुणचार देवधर कुटुंब अगदी अगत्याने करायचं. 

आत्ता सगळं आलबेल दिसत असलं तरी मुकुंदरावांचं आधीचं आयुष्य इतकं सुखाचं नव्हतं. 

त्यांची आई त्यांना जन्म देऊन लगेच देवाघरी गेली होती. वडिलांची  फिरतीची नोकरी. ते सरकारी नोकरीत, मृद्संधारण विभागात होते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे मातीचे नमुने गोळा करण्यासाठी त्यांना कायम खेडोपाडी जावं लागायचं, तिथे मुक्काम करावा लागायचा. त्यामुळे वडिलांच्या आईनं, आजीनेच मुकंदरावांना सांभाळलं. पण ते आठवीत असताना तीही वारली. मग दहावीपर्यंत ते मामाकडे राहात होते. मामाकडे राहायची-खायची सोय असली तरी मामीनं त्यांच्याकडे ‘विकतचं दुखणं’ या भावनेनंच पाहिलं.  पुढच्या शिक्षणासाठी मग त्यांनी वसतीगृहात राहणं पसंत केलं आणि नेटानं अभ्यास करून सिव्हिल इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तमरित्या पास झाले. पण पोरकेपणाची जाणीव त्यांच्या मनात कायम घर करून राहिली होती. 

इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर काही वर्ष त्यांनी सरकारी नोकरी केली. यथावकाश लग्न झालं. मुलं झाली. नंतर नोकरी सोडून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यात जम बसवून पैसा कमावला. जमीन विकत घेतली, मोठ्ठा बंगला बांधला. मधल्या काळात वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.

मुकुंदरावांची पत्नी मोहिनी, मुलगा विनय आणि मुलगी वरदा असं छान चौकोनी कुटुंब होतं. विनय टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर, नोकरीनिमित्त अमेरिकेत गेला आणि तिकडच्याच सोफियाशी लग्न करून तिकडेच स्थायिक झाला. मुकुंदराव या प्रसंगाने पार उध्वस्त झाले. आपलं कुटुंब म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं.  मुलगी तर लग्न करून सासरी जाणारच! एक मोहिनीच काय ती त्यांच्याजवळ राहणार होती. लग्न झाल्यापासून ते मोहिनीला सोडून कधीच राहिले नव्हते. व्यवसायानिमित्तही कुठे बाहेरगावी राहावं लागणार असेल तर ते मोहिनीला सोबत घेऊन हाॅटेलमध्ये राहायचे. 

वरदानं एम. काॅम., एम. बी. ए. केलं होतं. तिचं लग्न मागच्याच आठवड्यात पार पडलं. जावई निखिल पण उच्च शिक्षित आणि ऑस्ट्रेलियात नोकरीला होता. लग्नासाठी म्हणून भारतात आला होता. त्याचे आई-वडील मुंबईत, मालाडला राहात होते. निखिल त्यांचा एकुलता एक मुलगा. ओळखीतल्या एकानी स्थळ सुचवलं आणि पंधरा दिवसांत लग्न झालं सुद्धा.

नवपरिणित दांपत्य कुटुंबियांसमवेत चार दिवस कुलदैवताच्या दर्शनासाठी कोकणात गेलं होतं. त्यानंतर दोनच दिवसांत जावई ऑस्ट्रेलियाला जाणार होता. वरदाचा व्हिसा आला की ती पण तिकडे जाणार होती. दोन आठवडे तरी त्यासाठी लागणार होते.

लेक तिकडे रवाना झाली की आपण दोघं मस्त लाईफ एंजॉय करायचं, असं मुकुंदरावांनी ठरवून टाकलं होतं. त्याला कारण होतं त्यांचं आजपर्यंतचं आयुष्य! आतापर्यंत भरपूर धावपळ केली, कष्ट उपसले. आता कामाचा व्याप कमी करायचा, मोहिनीला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा, असा ते  विचार करत होते. 

लेक आणि सासरची मंडळी कोकणातून परतली. दोनच दिवसांनी निखिलही ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. त्याआधी वरदा आणि निखिल दहिवलीला धावती भेट देऊन गेले. नंतर वरदा आपल्या सासरी मालाडला होती. तिचीही जायची तयारी एकीकडे चालू होती. 

असंच कपाटात काही तरी शोधताना तिला निखिलची काही कागदपत्रं हाती लागली. त्यात ऑस्ट्रेलियातल्या त्याच्या नेमणुकीच्या पत्राची काॅपी देखील होती. तो तिथल्या एका हाॅटेलमध्ये वेटरचं काम करत होता. त्यामुळे त्याचा पगारही अगदीच थोडा होता. वरदाला फार मोठा मानसिक धक्का बसला. कारण निखिल एम. बी. ए. फायनान्स असल्याचं, लग्न जुळवताना सांगितलं होतं. आता लग्न ठरवताना पुरावे थोडेच मागतो आपण? परस्पर विश्वासावरच अवलंबून असतं सगळं! आणि परदेशातल्या स्थळाचं आकर्षणही भुरळ घालतंच की आई-वडिलांना आणि मुलींनाही! 

मग तिनं इतरही कागदपत्रं बारकाईने बघितली. निखिल  बारावीच्या परीक्षेत जेमतेम ३६% मिळवून पास झाला होता. तिनं मग त्याचं बी. काॅम आणि एम. बी. ए. चं सर्टिफिकेट गुगलवर पडताळून बघितलं. पण गुगलवर नोंद आढळत नाही, असा शेरा येत होता. ही फार मोठी फसवणूक होती.

वरदाला काय करावं हेच कळेना. तिनं मुंबई विद्यापीठात काम करणाऱ्या एका मैत्रिणीकरवी पुन्हा तपास केला. पण या विद्यार्थ्याची नोंदच तिथे नव्हती. 

आपली काही महत्त्वाची कागदपत्रं आणायला आपण माहेरी जात आहोत, असं सांगून ती घराबाहेर पडली आणि दहिवलीला आली.

तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते आणि तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. ती आपल्या खोलीत गेली आणि पलंगावर स्वतःला झोकून देऊन ओक्साबोक्शी रडू लागली.

तिला अशा अवस्थेत घरी आलेली पाहून मोहिनी भांबावून गेली. तिनं मुकुंदरावांना फोन करून ‘लगेच घरी या, वरदा आलीय’, एवढंच सांगितलं.  मोहिनी फक्त तिच्या डोक्यावर हात फिरवत, काय झालं म्हणून विचारत राहिली. तासाभरात मुकुंदरावही घरी पोचले. तोवर वरदा थोडी शांत झाली होती. रडत-रडतच तिनं आई-बाबांना सर्व हकीकत सांगितली. 

मोहिनीला दुःख आणि संतापानं अश्रू आवरेनासे झाले. मुकुंदराव या धक्क्याने आधी एकदम निःशब्द झाले आणि नंतर संतापाने तोंडाला येईल ते बडबडू लागले. असा बराच वेळ गेला. 

मग मुकुंदरावांनी आपटेंना, त्यांच्या वकील मित्राला फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाला त्यांनी फोन केला. ते देशमुखकाकाही हे सर्व ऐकून चकित आणि दुःखी झाले. ‘मुलाच्या आई-वडिलांनी दिलेली माहितीच आपण सांगितली’, असं ते म्हणाले. त्यांनी तिरीमिरीत निखिलच्या वडिलांना फोन लावला आणि अशी फसवणूक केल्याबद्दल त्यांची हजेरी घेतली. पण त्यांच्या बोलण्यातून, निखिलने या सर्व गोष्टींचा त्यांना पत्ताच लागू दिला नव्हता, हे कळत होतं. निखिलनं आपल्या आई-वडिलांचीही फसवणूक केली होती. 

कालांतराने वरदाला घटस्फोट मिळाला. पण या धक्क्यातून ती स्वतःला सावरू शकली नाही. लग्न या प्रकाराचा तिनं धसकाच घेतला आणि आपण आता लग्नच करणार नाही असं तिनं आई-वडिलांना निक्षून सांगितलं.

मोहिनी लेकीच्या काळजीनं सतत तिच्या सोबत राहू लागली आहे. एकीकडे तिचे उपास-तपास, देवधर्म चालूच आहेत. ती यांत्रिकपणे घरातली कामं कशीबशी उरकते. रात्री देखील ती वरदाच्याच खोलीत झोपते. मुकुंदरावांकडे लक्ष द्यायला तिला सवडच नाही. 

मुकुंदराव हतबल होऊन आपलं पोरकेपण भोगत आहेत. 

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares