मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भय…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भय…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी  

“ अगं, तो म्हणतोय ना? मग आणू दे की त्याला हवं ते गिफ्ट… तू का नाही म्हणतेयस ? “

बाबा सूनबाईंच्या साधेपणावर, विचारीपणावर खुश होऊन म्हणाले.

“ बाबा, तुम्हीपण ऐकत नाही माझे .. मग आईतरी ऐकणार आहेत थोड्याच ? त्या तुमच्याच सुरात सूर मिसळणार…”

ती आत जाता जाता म्हणाली , त्यावर बाबा फक्त हसले. तो दिगमूढ होऊन हे सारे पाहत होता.

‘ किती नाटकी आणि पाताळयंत्री बाई आहे ही… आई बाबांना कसे  सांगू ? कसे समजावू ?’ तो मनात म्हणाला खरं..पण ‘ हिच्यापुढे आपला काय निभाव लागणार?’ या विचाराने आणि तिचे वागणं पाहून खरेतर तो मनातून गर्भगळीत झाला होता. ‘ तिचे हे असले वागणे आता कुठंल्या टोकापर्यंत जाणार आहे ? किती काळ चालणार आहे ? आणि या साऱ्याचा शेवट नेमका काय होणार आहे? ’  या विचाराने तो खूप अस्वस्थ झाला होता. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती.. या साऱ्यात आपले काहीही झालं तरी चालेल पण आपले सरळसाधे आईबाबा भरडून निघता कामा नयेत..असे त्याला वाटत होतं पण ती कधी कशी वागेल याचा त्याला काहीच अंदाज येत नव्हता..

मध्यमवर्गीय मानसिकतेने मनात असणारी बदनामीची भीती.. लोक काय म्हणतील ? याची प्रत्येकक्षणी मनात  दाटणारी भीती. अशा भीतीची सावली आयुष्यभर पाठलाग करीत राहत असते. त्याच्याबाबतीतही तेच घडत होतं. त्याला ऑफिसातले, बाहेर असतानाचे क्षण  हे त्याच्या मनावरती तिच्या या असल्या वागण्याचा कितीही ताण असला तरी ,काहीसे बरे, काहीसे मुक्त झाल्यासारखे, काहीसे सुटकेचे आणि हवेहवेसे वाटू लागले होते..  लवकरात लवकर काम आटोपून ऑफिसमधून घरी परतायची, तिला भेटायची ओढ उरली नव्हती. त्याचं मन  ऑफिसमध्ये जास्तच वेळ रेंगाळू  पाहत होते. घरी आले की मनावरचा ताण अधिकच वाढत होता. दिवसेंदिवस तो मनानं अधिकाधिक खचत होता. तो तिच्यापासून, त्या भयापासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत होता पण भय त्याची पाठ सोडत नव्हते. तिच्या वागण्या- बोलण्याने मनात रुजलेलं भय त्याला गिळंकृत करू लागले होते..

तो स्वतःच्याच विचारात राहू लागला.. मित्रांसोबत राहण्याचं टाळू लागला. मित्रांच्यात असला तरी गप्पागोष्टीत त्याचे फारसे लक्ष नसते हे त्याच्या जवळच्या मित्रांनाही जाणवू लागलं होतं.

“ काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे काय?”

त्याच्यातील बदल जाणवून मित्रानं त्याला एके दिवशी एकट्याला गाठून विचारले. तो आपल्याच विचारात होता. मित्राने पुन्हा तोच प्रश्न विचारला तेव्हा तो भानावर आला.

“ नाही.. काहीच प्रॉब्लेम नाही.”

“ हे बघ .. गेले काही दिवस पाहतोय, तू खूप विचारात असतोस..एकतर सर्वांना टाळत असतोस.. आणि भेटलास तरी कुठल्यातरी दुसऱ्या जगात असल्यासारखा स्वतःतच गुरफटलेला असतोस, आमच्यामध्ये, गप्पांमध्ये सामील नसतोसच. एकतर तू नसतोस आणि असलास तरी नसल्यासारखाच असतोस. आपल्याचं विचारात असतोस.. कशातच सहभागी होत नाहीस.. मलाच नव्हे तर आपल्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला जाणवतंय ते.. बोललास तर बरं होईल.. काही अडचण असेल सांग. त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल..”

“ नाही रे खरंच काही नाही. “

“ काहीच अडचण , समस्या नसेल तर चांगलंच आहे.. पण मग पूर्वीसारखा मिसळत का नाहीस सर्वांत ? लग्न झालंय तुझे.. पू्र्वीसारखं नियमित भेटणं तुला जमणार नाही हे जाणून आहोत आम्ही… पण भेटल्यावर ही वेगळाच राहतोस.. असं वेगळं राहणं, अलिप्त असणं हा तुझा स्वभावच नाही हे आम्हांला ठाऊक आहे .. त्यामुळे मग आम्हाला प्रश्न पडतो.. तू काहीतरी अडचणीत, समस्येत  आहेस असं वाटू लागलंय.. मला एकट्याला नाही तर आम्हां सगळ्यांनाच तसं वाटू लागलंय.. अगदी काहीही अडचण असेल, समस्या असेल तरी बोल. “

“ नाही रे तुम्हाला वाटतंय तसे काहीच नाही… आणि असते तसं काही तर तुमच्याशी नाही का बोलणार मी ? बराच वेळ झालाय.. भेटू पुन्हा.. चल, निघतो मी आता..”

तो घड्याळात पहात म्हणाला आणि झटकन उठून निरोप घेऊन निघून गेला.

तो बोलणे टाळण्यासाठी निघालाय हे मित्राच्या लक्षात आलं होतं. तो निघून गेला तरी ‘ काय झालं असेल? हा प्रश्न मित्राच्या मनात बराच वेळ रेंगाळत राहिला होता.

तो घरी आला दारावरची बेल वाजवली.. तिने हसतमुखाने दार उघडलं.. तिला समोर पाहताच , ‘आता ती काय बोलेल ? कशी वागेल ? ‘ हा विचार मनात आला आणि  इतका वेळ त्याच्या मनात झोपलेल्या भयाच्या अजगराने, जागं होऊन त्याच्या तन-मनाला विळखा घालायला सुरुवात केली.

 – समाप्त –

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भय…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भय…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी  

“ ऐक ना .. मी काय म्हणते.. आपण असला डायमंड नेकलेस घेऊया मला ? ओरिजनल डायमंड आहेत हे..”

एका मासिकात आलेली डायमंड ज्वेलरीची  जाहिरात दाखवत तिने विचारले.

“ अगं पण खूपच किंमत असेल त्याची.. आपल्याकडे तेवढा बॅलन्स नाहीय.. प्लिज.. दुसरे काहीतरी घेऊया.. एक लाखापर्यंत .. माझ्याकडे तेवढेच आहेत.. “

“ माझ्या वाढदिवसासाठी पण नाहीत ? बाबांकडून घे ना तुझ्याकडे नसतील तर..”

“ बाबांकडून कसे घेणार ?  आपण या वाढदिवसाला आपल्या बजेटमध्ये बसेल असे दुसरे काहीतरी घेऊया ना..”

“ नाही मला तेच डायमंड नेकलेस हवंय..”

“ अगं पण पैसे नाहीत तेवढे.. आणि बाबांकडून पैसे घेणं बरं नाही दिसणार..”

तो तिला अजिजीने  म्हणाला. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली,

“अगदी बरोबर आहे तुझे.. बाबांकडून पैसे घेणं बरं नाही दिसणार ते..   आई, बाबा, तू .. तुम्ही तिघेही तुरुंगात खडी फोडायला गेलात तर ते मात्र बरे दिसेल ..  पेपरात मोठ्या टाईपमध्ये तुमची तशी बातमी आली तर ते बरे दिसेल.. हो ना ?”

“ अगं, काय बोलतेस तू हे ? त्यांचा काय संबंध इथे.. अगं, ते तुझ्याशी किती मायेनं वागतात अन् तू त्यांच्याबद्दल असा विचार करतेस ? “

तिच्या त्या वाक्याने तो क्षणभर दचकला होता. एका क्षणात तिच्या ते वाक्य चलचित्र होऊन त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेले होते. मनात भयाची लाट पसरली पण दुसऱ्याच क्षणी त्याला स्वतःच्या हताशपणाचा राग आला होता. आईबाबांचे नाव तिच्या तोंडी अशा पद्धतींने आल्यानं न राहवून रागातच तो म्हणाला. बोलताना त्याच्याही नकळत त्याचा आवाज चढला होता.

“  चुकलंच माझे..  त्यांच्याबाबतीत मी काहीच कृती न करता नुसताच असा विचार करतेय हे खरंच चुकलं माझे…आणि एक तुला सांगायचे राहिलेच बघ. तुझे प्रत्येक वाक्य पुरावा म्हणून माझ्याजवळ असते.. अगदी जपून ठेवलेले असते,  तू आवाज चढवून बोललास माझ्याशी तर तो तुझ्याविरुद्धचा कौटुंबीक छळाचा पुरावाच ठरेल हे मात्र तू विसरू नकोस हं ! “

ती खूप शांतपणे बोलत होती.. तो मनातून खूप चिडला होता पण काहीच बोलला नाही.. तिच्या वागण्या- बोलण्यानं मनावर भयाने सावली धरली होती. तिच्या तोंडून ‘कौटुंबिक छळ ‘ शब्द ऐकताच तो गलितगात्र झाला होता. ती म्हणेल तसे वागण्यावाचून आपल्याला दुसरा काही पर्यायच नाही असे त्याला वाटू लागलं होतं.

आपली स्थिती दगडाखाली हात सापडलेल्या  माणसासारखी झालीय असे त्याला वाटू लागले होते. त्याला स्वतःपेक्षा जास्त आई- बाबांची काळजी वाटत होती. आयुष्यभर कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय न देणारी सरळ स्वभावाची पापभिरू माणसे ती… त्यांना हे सारे समजले तर त्यांना कसे सहन होईल ? ती दोघेही उन्मळून पडतील, कोसळून पडतील ही भीती वाटत होती आणि म्हणूनच तो  त्यांना काहीही न सांगता एकटाच सारं सोसत होता.

कधीतरी तिला आपल्या चुकीची जाणीव होईल, तिच्यात बदल होईल आणि सारे सुरळीत होईल हा वेडा आशावादही कधीकधी त्याच्या मनात  निर्माण होत होता.. हे ही दिवस जातील असे त्याचे वाटणे त्याला सोसण्याचं बळ देत होतं .

“ बाबा, मला थोडे पैसे हवे होते..”

त्याच्या मनात नसतानाही पहाटे हॉलमध्ये बसून चहा घेताना, काहीसा चाचरतच तो बाबांना म्हणाला. खरेतर बाबांजवळ पैसे मागायला त्याचं  मन धजावत नव्हते. त्याची त्याला शरम वाटत होती पण कसंबसं  खाली मान घालून जमिनीकडे पहात तो बाबांना म्हणाला होता. बाबांनी क्षणभर त्याच्याकडे पाहिले. त्याची मनस्थिती त्यांच्या ध्यानात आली. त्यांनी त्याच्या खांद्यावर मायेनं हात ठेवला.

“ किती पाहिजेत ? अरे ,बाबा आहे मी तुझा.. काही बोलताना, सांगताना, मागताना असे अवघडून कशाला जायचं बाळा..? सांग ,किती पाहिजेत?”

त्याचे डोळे पाणावले होते.

“ बाबा, वाढदिवस आहे ना तिचा… आपल्या घरातला पहिला वाढदिवस.. ,तिला काहीतरी चांगलं गिफ्ट द्यावं म्हणत होतो. डायमंडचा नेकलेस घ्यावा म्हणत होतो.. माझ्याकडे एक लाख आहेत..”

बाबांनी त्याच्याकडे  पाहिले. आपल्याकडे पैसे मागताना त्याला अवघडल्यासारखे झालंय.. तो त्याच्या मनात नसताना नाईलाज म्हणून पैसे मागतोय हे त्यांच्या ध्यानांत आलं होतं. त्याचे अवघडलेपण कमी व्हावं म्हणून बाबा त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले,

“ अरे व्वा ss!  खूप चांगलं ठरवलंस . सुनबाईच्या पसंतीने हवे ते घे. पैसे किती लागतील ते तेवढं सांग. “

“ बाबा, सांगा ना यांना काहीतरी, अहो, वाढदिवसाला डायमंड नेकलेस आणायचा असं हे म्हणतायत.. उगाच कशाला इतका खर्च.. आपण वाढदिवस साधेपणाने, नुसता केक आणून घरच्याघरी करूया.. हवंतर आपण चौघे बाहेर कुठंतरी जेवायला जाऊया.. असे म्हणत होते मी ..  पण हे ऐकायलाच तयार नाहीत. तुम्हींतरी समजावा यांना..”

ती बाबांचं आणि त्याचं बोलणे ऐकत किचनमध्ये उभी होती . तिथून हॉल मध्ये येत तक्रारीच्या सुरांत बाबांना म्हणाली. तिचे बोलणे ऐकून त्याने दचकून तिच्याकडे पाहिले.

               क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भय…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भय…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी  

का कुणास ठाऊक पण  तिचे ते बोलणं ‘ रात गई, बात गई ‘ अशात मोडणारं नाही असा विचार त्याच्या मनात सारखा येत होता. सारखा तोच विचार त्याच्या मनात घोळत होता. त्याने तो मनोमन अस्वस्थ ही झाला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे गजर न लावताही त्याला जाग आली. बाबा उठलेले होतेच. ती जागीच आहे असे त्याला वाटलं पण तिच्याशी काहीही न बोलता तो किचनमध्ये गेला आणि चहाचं पातेलं घेऊ लागला.

“ काय चिरंजीव, आज लवकर उठलाय ? … आणि हे काय चिरंजीव ?  तुम्ही चक्क चहा ठेवताय ? अरे कशाला? मी करतो माझा चहा. तू जा झोप जा हवंतर. की चहा घेणार आहेस ? माझ्या हातचा फक्कड चहा घेऊन तर बघ.”

बाबांच्या या वाक्यावर तो हसून काहीतरी बोलून चहाचे आदण गॅसवर ठेवायला वळणार इतक्यात ती आत येत म्हणाली,,

“ हे हो काय? मला नाही का उठवायचं ? जाग आली पण पुन्हा जरा डोळा लागला माझा. सरका बाजूला.. मी असताना तुम्ही कुणी नाही हं काही काम करायचं ..“

“ नको. आज मी करतो…आणि माझ्या हातचा चहा तू पिऊन तर बघ…   तुझ्याइतका चांगला नाही पण तसा बरा करतो हं मी चहा..”

“ खरंच, आज करू दे त्याला चहा. त्याच्या हातचा चहा पिऊन तर बघू ? “

तिने  ‘ नाही हं बाबा..’ म्हणत त्याला बाजूला करून स्वतः चहा केला. बाबा ‘आपल्याला किती चांगली सून मिळालीय.. ‘ अशा विचारानं समाधानानं आणि अभिमानानं तिच्याकडे पहातच राहिले होते.

तो मात्र मनातून अस्वस्थ झाला होता. त्याला तिच्या वागण्याचं कोडे काही सुटेनासे झालं होतं .

बाबा चहा घेऊन फिरायला बाहेर पडले. ती बेडरूममध्ये गेली तरी तो बराच वेळ तिच्या वागण्या-बोलण्याचा विचार करीत तिथंच हॉल मध्ये बसून राहिला होता. तिने बेडरूममधूनच त्याला हाक मारली तसा तो दचकला आणि झटकन आत गेला.

“ कसला विचार करतोयस ?”

“ कसला नाही ..असाच बसलो होतो.”

“ असाच म्हणजे..?  तुला सांगितलं होतं ना मी ..  की मी नाही म्हणले तरी चहा तूच करायचास म्हणून.. मग..? “

“ पण तू कुठे करून दिलास ?… आणि अशी का वागतेस ? माझे काही चुकलंय काय? “

“ लक्षात ठेव..मला गृहीत धरण्याचा, माझ्यावर नवरेपणा गाजवण्याचा विचारही मनात आणू नकोस..”

“ अगं पण मी कधी नवरेपणा गाजवलाय ? मी तसा कधी वागलोय  का तुझ्याशी..?”

“  कधी वागलोय का म्हणजे ? तसे वागायचा विचार आहे की काय ? तसा विचार मनात असेल तर तो काढून टाक मनातून. माझ्याजवळ चालणार नाही ते कधीच. आधीच सांगून ठेवतेय.. “

ती म्हणाली तसे तो काहीच न सुचून तिच्याकडे पहातच राहिला.

” काय रे तुला चारशे अठठ्यांणव कलम माहीत आहे ना ? नसेल तर माहीत करून घे लगेच. “

तो काहीसा दचकला. काहीच प्रत्युत्तर न देता, काहीही न बोलता तिच्याकडे फक्त पहातच राहिला होता. मनात विचारांचे वादळ उठले होते.. त्याला  चारशे आठठयांण्णव कलमच काय इत्तर अनेक गोष्टी या फक्त वाचून, ऐकूनच ठाऊक होत्या. तिच्या वाक्क्याने भयाची एक थंडगार  लाट त्याच्या पूर्ण मनाला गिळून गेली. क्षणभर वाटले,सारं काही बाबांना सांगावं ..पण त्यांचा विश्वास बसेल आपल्या बोलण्यावर..? तिचे बेडरूम बाहेरचं वागणे, बोलणे असे होते की बाबाच काय जगातलं कुणीच त्याच्यावर विश्वास ठेवण्याची सुतराम शक्यताच नव्हती.

बऱ्याचदा ती त्यांच्याशीही चांगली वागायची पण मधूनच कधीतरी  कायदा स्त्रीच्या बाजूने असल्याची जाणीव ती त्याला करून द्यायची. ती कधी कसे वागेल याचा काहीच अंदाज त्याला यायचा नाही. ती अधूनमधून अशी का वागते ? का धमकावते ? याचं कोडं खूप विचार करूनही त्याला सुटत नव्हतं. आपण तिचा विश्वास संपादन करायला कमी पडलो काय?  हा प्रश्न  त्याच्या मनात रुंजी घालत होता. त्याला तिचे ते वागणं सहन होत नव्हते आणि त्याला त्याबद्दल कुणाला सांगताही येत नव्हतं.. त्याचा आत्मविश्वासही दिवसेंदिवस कमी होत चालला होता.. तो मनोमन खचत चालला होता.

               क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भय…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भय…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी  

त्याला जाग आली तर ती शेजारी नव्हती. तो झटकन उठला. त्याने घड्याळात पाहिले. साडेचार वाजून गेले होते. ‘बाबा उठले असतील ..’ मनात विचार येऊन त्याने.बाबांची चाहूल घेण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या आणि तिच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता.  तो बाहेर आला.

“ आता मी आलेय ना बाबा ? मग आता पहाटेचा चहा मी करून देणार हं तुम्हाला.. तुम्ही नाही स्वतः करून घ्यायचा. ”

“ अगं, पण मला सवय आहे त्याची.. उगाच तुझी झोपमोड कशाला ? जा. झोप जा तू.. घेईन मी करून चहा. “

“ ते काही नाही हं …बाबा, मी असताना तुम्ही चहा करून घेतलात तर मला ते नाही हं आवडणार. आजवर तुम्ही खूप केलेत…पण आता नाही. आता तुम्ही फक्त आराम करायचा, तुमच्या आवडी-निवडी जपायच्या, छंद जोपासत राहायचे. आता कुठल्याच कामाला मी नाही हं हात लावू देणार तुम्हांला. चला, तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा बघू,  मी आणते लगेच चहा करून.. अगदी तुमच्या आवडीचा.. आलं घालून .”

‘ बरं. तू आण चहा करून..’ असं म्हणून बाबा किचन मधून बाहेर येऊन हॉलमध्ये बसले..’ किती चांगली सून मिळालीय आपल्याला.. आपण खूप नशीबवान आहोत..’ बाबांच्या मनात आले. तो हे सारे  ऐकत होता.. तो हॉल मध्ये आला.

“ अरे, तू ही उठलास? ये. “

तो हॉल मध्ये आला. बाबांच्याशेजारी बसला. ती चहा घेऊन आली तेव्हा तिने त्याच्यासाठीही चहा आणला होता.

“ तुमचा आवाज आला म्हणून तुमच्यासाठीही आणलाय चहा.. घ्या. “

ती ओठातल्या ओठात हसत त्याच्या हातात त्याचा चहाचा कप देत म्हणाली.

चहा पिऊन झाल्यावर बाबा फिरायला बाहेर पडले. 

बाबा रोज पहाटे साडेचारला उठून, सारे आवरून स्वतःचा चहा स्वतः करून घेऊन पाचला फिरायला जात असत. गेल्या कित्येक वर्षाचा त्यांचा तो नेमच होता.  आधी आईही लवकर उठायची, बाबांना तीच चहा करून द्यायची पण तिची झोप पूर्ण होत नाही हे लक्षात येताच बाबांनीच तिला लवकर उठायला मनाई केली होती..

बाबा फिरायला निघून गेले आणि ती आणि तो,  दोघेही  त्यांच्या बेडरूम मध्ये आले. त्यांच्या लग्नाला काही दिवसच झाले होते पण तिने आपल्या वागण्याने घरच्यांचीच नव्हे तर शेजार-पाजाऱ्यांचीही मनं जिंकली होती.. तोही खुश होता.

“ उद्यापासून तूही उठायचंस लवकर.. मी उठवेन तूला ..”

बेडरूममध्ये शिरताच बेडरूमचे दार लोटून आतून कडी लावत ती त्याला म्हणाली. आईबाबांसमोर, इत्तरांसमोर ती त्याला अहो s जाहो म्हणत असली तरी दोघंच असताना मात्र ती त्याला अरेतूरे करत होती आणि त्यालाही ते खूप आवडत होते.

“ अरे वा ss! पहाटे पहाटे? नेकीं और पुछ पुछ ? “

तो मिश्कीलपणे डोळा बारीक करत म्हणाला. त्यावेळी तिच्या आवाजातला कोरडा आणि हुकमी स्वर त्याच्या ध्यानातच आला नाही.

“ उगाच लाडात येऊ नकोस.. उठून तू बाबांसाठी चहा करायचा आहेस.. मी कितीही तुला ‘नको,नाही म्हणले तरीही.. ‘ तू कशाला चहा करतोयस?  आता मी आहे ना..मी करते चहा ‘ असं  म्हणलं तरीही… चहा तूच करायचा आहेस हे लक्षात ठेव. “

“ए, मी नाही हं करणार चहा..”

ती आपली मस्करी करत आहे असे वाटून तो काहीसा लाडात येऊन, काहीसा चेष्टेने म्हणाला.

“ म्हणजे ? एकच लक्षात ठेव.. तू  करणार आहेस म्हणजे करणार आहेस.. “

ती काहीशा कठोरपणे म्हणाली .तिच्यातल्या या बदलाने तो आवाक होऊन तिच्याकडे पहात असतानाच ती हसत हसत म्हणाली,

“ कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे ठाऊक आहे ना..?  आत जायचं नाही ना तुला ?”

त्याने दचकून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले.  ती नेहमी जशी दिसते त्याहून वेगळीच भासली त्याला. तो अंतर्बाह्य थरारला. ‘ ही अशी काय वागतेय ? हिच्याशी एवढे प्रेमाने, समजुतीने वागूनही अगदी शांतपणे धमकी काय देतेय ?.. काही वाद, भांडण झाले असते आणि रागाच्या भरात बोलली असती तरी एकवेळ ते समजून घेण्यासारखं होते पण तसे काहीच नसताना, हे काय म्हणायचं ?…’ त्याच्या मनात विचार आला. त्याला तिच्या अशा वागण्याचं काहीच कारण कळेना पण तिच्या त्या वाक्याने त्याच्या मनात भीतीने घर केलं. तो मनोमन काहीसा घाबरलाय हे तिला जाणवले.. ती स्वतःशीच हसल्यासारखं हसून त्याला म्हणाली,

“ अरे, गंमत केली तुझी..”

ती ‘गंमत’ म्हणाली असली तरी ती गंमत नाही हे त्याच्या ध्यानात आलं होतं.

” आणि आपली ही गंमत कुणाला सांगायची नाही हं ! कुणाला म्हणजे कुणालाच. तुझ्या आई-बाबांनाही नाही. राहील ना हे तुझ्या लक्षात ? “

तो तिच्या बोलण्याने, तिच्यातील बदलाने अवाक होऊन तिच्याकडे पहातच राहिला होता.

               क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाठवणी… – लेखिका- सुश्री अनघा किल्लेदार ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ पाठवणी… – लेखिका- सुश्री अनघा किल्लेदार ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

फाल्गुनीचे लग्न ठरल्याची बातमी नातेवाईकात पसरली. तसे लपवण्यासारखे काही नव्हतेच. चारचौघासारखे पत्रिका बघून , दोघांच्या पसंतीने ठरलेल लग्न होते. शीतलच्या डोक्यावरचे ओझे उतरले अशी एक सर्वसाधारण प्रतिक्रिया नातेवाईक, शेजारीपाजारी होती.

फाल्गुनीला मोठं करताना, तिचे शिक्षण,  संस्कार याची जबाबदारी एकट्या शीतलनेच पार पाडली होती. प्रसाद बाबा म्हणून घरात होता. तसे तर चारचौघात दाखवण्यापुरता एक बिझनेस होता. जेमतेम उत्पन्न ही होते. पण तरी संसारात शीतल एकटीच होती.

फाल्गुनीचा नवरा ओजस एका साॅफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे. सहा आकडी गलेलठ्ठ पगार, घर गाडी कशालाच कमी नाही. मोठ्या बहीणीचे लग्न होऊन ती तिच्या संसारात रमली आहे. त्याचे आईवडील रत्नागिरीत नोकरी करत असल्याने घरात कायम दोघेच राजाराणी.. हे समजल्यावर शीतलचा प्रवास बघणारे म्हणाले, “पोरीने नशीब काढले.. आईच्या कष्टाचे चीज झाले.”

शीतलला फाल्गुनीचे लग्न वेळेत ठरल्याचा फार आनंद झाला होता. फाल्गुनीचे सासर माहेर यात फारसे अंतर नव्हते ही अजून एक जमेची बाजू होती. शीतलला वाटले आपले माहेर पण जवळ असते तर परिस्थितीत खूप बदल झाला असता.

प्रसादशी लग्न होऊन शीतल पुण्यात आली. तिचे माहेर कोकणातले कुडाळचे. शीतलला लहानपणापासून शहराचे आकर्षण. तिचे शिक्षण झाले. तिच्या आईबाबांनी तिच्याकरता स्थळे बघायला सुरुवात केली.

मध्यम उंचीची, चारचौघींसारखी, सावळा रंग नि तरतरीत नाकाची शीतल स्वभावाने नावासारखीच शीतल होती. तिला वाटायचे, शहरातला नोकरदार मिळाला तर टुकीने संसार करता येईल. छोट्या गावात मोठ्या गावाची काय मजा असणार?

एका मध्यस्थाने पुण्यात रहाणाऱ्या प्रसादचे स्थळ आणले. स्वतःचा रहाता वाडा, सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले वडील, दोन विवाहीत भाऊ, लग्न झालेली एक बहिण ही माहिती घरच्यांना पुरेशी वाटली. पुढे चारेक महिन्यात चांगल्या मुहूर्तावर लग्न करून ती पुण्यात आली.

लग्नाआधी प्रसादचा स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे एवढच तिला माहिती होते. ती एका शाळेत ज्युनियर शिक्षक म्हणून कामास होती. लग्नाआधी दोघे फारसे भेटलेच नाहीत त्यामुळे मनात रंगवलेले चित्र गृहीत धरून शीतलने प्रसादच्या घराचे माप ओलांडले.

हातावरच्या मेंदीचा रंग उतरण्यापूर्वीच तिला जाणीव झाली प्रसादच्या बेफिकीर स्वभावाची. त्याचा व्यवसाय होता पण तो मनापासून काम करत नसे. पोटापुरते मिळेल एवढ्यावर तो मात्र तो नक्कीच कमवत होता.

घरातली कोणतीच जबाबदारी घ्यायला प्रसाद तयार नसे. चार मित्र गोळा करावेत, गप्पा माराव्यात, बाहेर खावे प्यावे हेच त्याचे शौक होते. त्याच्या या बेफिकीर, लहरी वागण्यामुळे त्याला घरीदारी फारशी किंमत नव्हती.

शीतलच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरले. तिने प्रसादला समजवायचा हरप्रकारे प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.

तिने आधीच्या नोकरीच्या अनुभवाच्या जोरावर एका शाळेत नोकरी करायला सुरुवात केली. तिचे नियमीत पैसे येऊ लागल्यावर प्रसाद अधिक बेजबाबदार झाला. दोन वर्षांनी फाल्गुनीचे आगमन त्यांच्या संसारात झाले. जबाबदारी वाढली ती शीतलची! प्रसादच्या वागणूकीत फारसा फरक पडला नाही.

फाल्गुनीच्या तिसऱ्या वाढदिवसाला शीतलच्या मनात फाल्गुनीला सोन्याचे डूल करावे असे होते. तिने हौसेने पगारातून पैसे साठवले होते. बँकेत पैसे काढायला गेली तेव्हा प्रसादने खात्यातून काही पैसे काढले होते. उरलेल्या पैशात फाल्गुनीचे कानातले झाले नसते. शीतलचा पारा चढला. तिने घरी येऊन खूप आदळआपट केली. फाल्गुनीचे कानातले होणार नाही याचे प्रसादला वाईट वाटले पण हे वाईट वाटणे फोल असणार हे तिला समजून चुकले होते.

तिच्या सासूबाई तर हरल्या होत्या मुलासमोर. सासऱ्यांच्या सांगण्यावरून तिने प्रसादच्या नकळत दुसरे खाते काढले. त्याचे चेकबुक,  पासबुक सासूबाईंकडे ठेवले. दर महिन्यात त्या खात्यात ती पैसे साठवू लागली.

प्रसादने चौकशी केली. “एवढे पैसे कशाला लागतात काढायला?” त्याने पासबुक बघत विचारले.

“सलग दोन महिने घर चालवून बघा. किती नि कुठे पैसे लागतात हे समजेल.” तिने पोळी लाटता लाटता त्याला ठणकावून सांगितले.

“जास्त ऐट करू नको पैशाची..”

“पैशाची ऐट म्हणता? माझ्या पैशावर चाललय घर. ना गाठीशी पैसा ना अंगावर दागिना. नवऱ्याच्या जीवावर बायकोला आवडते ऐट करायला, ज्यादिवशी तुम्ही माझी हौस पुरवाल तेव्हा करेन ऐट! समजले? ” तिने हल्ला परतवला.

प्रसाद समजून चुकला होता. बायको बदलू लागली आहे. प्रसंगी उलट उत्तर देऊ लागली आहे. याकरता तोच जबाबदार होता.

मे महिन्याच्या सुट्टीत प्रसादच्या फॅब्रिकेशन युनिटचा एक माणूस प्रसादला शोधत घरी आला. तो घरी नव्हताच. शीतलने फाल्गुनीला घेतले नि गाडीवर काढून ती तिकडे पोचली. यापूर्वी ती तिकडे आली होती. तिला आलेले बघून कामगार चपापले. तिने तिथेच शेडमध्ये बसून काय प्राॅब्लेम झाला आहे हे समजून घेतले. अर्ध्या तासात तिने प्रश्न सोडवला. युनिटचे लाईट बिल भरायचे होते. एकदोघांचे पगार राहिले होते. तिने येणी किती आहेत ते तपासले नि कपाळावर हात मारून घेतला. पुढल्था दोन दिवसात तिने तिथली व्यवस्था लावून दिली. प्रसादला समजले तेव्हा तो खजील झाला. पुढचे दोनचार महिने चांगले गेले. शीतलला वाटले सुधारली परिस्थिती पण अशी इतक्यात तिची सुटका नव्हती.

फाल्गुनी आईची तारांबळ बघत मोठी झाली. ती हुशार होती, मेहनती होती. भरभर शिकत गेली. आईला त्रास होऊ नये याचा फाल्गुनीचा प्रयत्न बघितला की शीतलला रडू यायचे. ‘इतके समंजस बाळ दिलंय देवाने पोटी.. मी कमी पडले आई म्हणून!’ ती सर्वांना डोळ्यात पाणी आणून सांगायची.

फाल्गुनी शिकत असताना शीतलने तिचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मायलेकींच्या जगात प्रसाद आता कुठेच नसायचा. त्याचेही वय होऊ लागले होते पण सवयी, बेफिकीरीत फारसा फरक नव्हता. घरात दोन तट पडल्यासारखे झाले होते. प्रसाद एकाकी झाला होता.

फाल्गुनीचे घरचे केळवण म्हणून घरचे सगळे जमले होते. पंचपक्वान्नाचा बेत होता. लाल रंगाचा सोनेरी जरतारी काम असलेला अनारकली घातलेली फाल्गुनी खरच सुंदर दिसत होती. तिच्या थट्टेला उत आला होता. तिचे हसणे, लाजणे बघून शीतलला भरून येत होते. ही सासरी गेली की मी एकटी पडणार या विचाराने तिचे डोळे पाण्याने भरून येत. तिच्या जावेने तिच्या पाठीवर थोपटताच शीतल तिच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडू लागली. हसरे वातावरण एकदम तंग झाले.

“बाई गं, लेकीची पाठवणी सोपी नसते आईला. जगरहाटी आहे ती. पोटात किती तुटते ते लग्न झालेल्या मुलीची आईच फक्त जाणे.” सासूबाईनी तिची समजूत घालायचा प्रयत्न केला. शीतलने समजून पदराने डोळे पुसले. कोणीतरी पाण्याचा ग्लास आणून दिला त्यातले पाणी प्यायली.

एवढ्यात फाल्गुनी पुढे आली म्हणाली, “आई, आजी, काहीतरी बोलायचंय मला. पाठवणी माझी एकटीची नाही आईची पण होणार आहे..पण ती तयार झाली तर..” सगळे फाल्गुनीकडे आश्चर्याने बघू लागले.

“म्हणजे ग काय? ” शीतलने विचारले.

“आई, पंधरा दिवसांपूर्वी आपण कुडाळला गेलो होतो. तेव्हा तु शिकवायचीस ती शाळा दाखवलीस. मी संध्याकाळी देवीचे दर्शन घेऊन येताना सहजच शाळेत गेले. तिथे योगायोगाने माझी भेट तिथल्या मुख्याध्यापिकांशी झाली. त्यांना वाटले मी शाळेची माजी विद्यार्थीनी आहे. त्यांना तुझ्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांना तुझी प्रगती ऐकून खूप छान वाटले.

त्यांनी रस दाखवला तेव्हा तुझा बायोडेटा माझ्या मोबाईलमधे होता तो दाखवला. तुझ्या इतका अनुभव असणारे शिक्षक शाळेला हवे आहेत असे त्या म्हणाल्या. तु तयार झालीस तर शाळेची दुसरी शाखा या जूनपासून सुरू होते आहे तिकडे तुला पर्यवेक्षिका म्हणून रूजू होता येणार आहे. पगार, महागाई भत्त्यात वाढ आहेच, पण मानही वाढेल.” फाल्गुनी सांगत होती आणि ऐकणारे चकित होत होते.

“आई, खूप केलस घराकरता नि माझ्याकरता. आता स्वतःकरता जगून घे, नवे अनुभव घे. नाही आवडले तिकडे तर मोकळ्या मनाने इकडे परत ये.. पण आलेली संधी घालवू नकोस. तुझ्या माहेरच्या माणसात, तुझ्या लाल मातीत मनमुराद आनंद लुट. तुझा हक्क आहे त्यावर.” फाल्गुनी मनातले बोलत होती.

“कुडाळला? मी अजिबात जाणार नाही. किती छोटे गाव आहे ते.” प्रसाद म्हणाला.

“बाबा, या सीनमध्ये तुम्ही तुमच्या कारखान्यासकट पुण्यातच रहा. आईला एकटीलाच जाऊ दे.” हे ऐकताच प्रसादला खूप राग आला.

फाल्गुनी आणि शीतल वगळून त्याला फारसे कोणी कधी मोजलेच नव्हते. त्याला अजून एकटेपणाच्या झळांची जाणीव नव्हती. शीतल थक्क झाली. जे घडत होते ते अविश्वसनीय  होते. शीतलचे सासूबाई नि सासरे यावेळीही तिच्या पाठीशी होते. ते दोघे फार थकले होते. सूनेने आनंदी रहावे असे मात्र त्यांना वाटत होते.

फाल्गुनीच्या लग्नाबरोबरीने शीतलच्या पाठवणीची पण तयारी सुरू झाली. नव्या जोमाने शीतलने जमवाजमव केली.

फाल्गुनी आणि ओजस पुण्यात परत आल्यावर मे महिन्याच्या  शेवटच्या आठवड्यात शीतलने पुणे सोडले नि डोळ्यात स्वप्न घेऊन कुडाळच्या गाडीत पाऊल ठेवले.

लेखिका- सुश्री अनघा किल्लेदार

 पुणे, २४/०२/२०२३

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आयुष्य हे… – लेखिका- सुश्री सायली साठे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ आयुष्य हे… – लेखिका- सुश्री सायली साठे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

“आता फार काही करु नका डॉक्टर, आता 87 वर्षांची झाले मी, किती त्रास द्यायचा सगळ्यांना.” राजे आजी म्हणाल्या..

“अहो आजी, पण तुमच्याकडची माणसं सगळी चांगली आहेत, किती काळजी घेतात तुमची.. नाहीतर बरेच लोक एवढ्या म्हाताऱ्या लोकांची काळजीचं घेणं बंद करतात.. त्यांच्यासाठी तरी असं म्हणू नका ” डॉक्टरांनी आजींना समजावलं.

“ते बाकी खरंय, पण करायचं काय एवढ्या आयुष्याचं.” आजी निश्वास टाकत म्हणाल्या.

संध्याकाळी शेजारच्या बेड वर एक नविन पेशंट आला.. पोरगेलासा.. अगदी 22 23 वर्षाचा असेल.. आजींचे लक्ष जाताच त्यांच्याकडे बघुन हसला.. आजी नुसत्या बघत राहिल्या..

सकाळी काहीतरी गुणगुणत होता तो.. आजींचे लक्ष गेले तशी तो थांबला.. “किती दिवस झाले? नविन दिसत्ये आजे ” त्याने विचारले.

“हो, कालच ऐडमिट झाल्ये..” आजी उत्तरल्या..”

“मी परमनंट मेंबर बरं का, काही लागलं तर आपल्याला सांगायचं, इकडे सगळे ओळखतात आपल्याला.” तो हसत म्हणाला.. त्याची धीटाई बघुन आजींना पण हसू आले..

दुपारी आजींना एकदम आठवले तसे त्यानी विचारले, “सकाळी काय गुणगुणत होतास रे?” त्यांनी त्या मुलाला विचारलं.

मुलगा हसला, म्हणाला “त्याला रॅप म्हणतात आजे.. एक नंबर बनवतो आपण.. कोणत्या पण सब्जेक्ट वर.. तू तुझा आवडता सब्जेक्ट सांग.. मी तुला रॅप बनवून दाखवतो.”

आजी हसल्या. म्हणल्या, “माझा आवडता सब्जेक्ट म्हणजे माझा कृष्ण, त्याच्यावर करशील तुझा रॅप?”

“थोडा difficult सब्जेक्ट आहे पण जमेल.. थांब जरा” असं म्हणत त्याने थोड्या वेळात खरचं कृष्णावर रॅप म्हणून दाखवला.. थोड्या वेगळ्या ठेक्याचा गाण्याचा प्रकार ऐकुन आजींना मजा वाटली..

रोज त्याच्याशी बोलण्यात वेळ जाऊ लागला.. सतत काही ना काही बोलत असायचा.. बुधवार आला तसं आजींचा मुलगा आणी सुन हॉस्पिटल मधेच केक घेउन आले छोटासा.. त्यालाही दिला, तसं तो म्हणाला “एवढी म्हातारी वाटत नाही गं तू आजे..”

“झाले खरी एवढी म्हातारी, काय करु सांग.. आता काय येईल तो दिवस आपला.” आजी थोड्या नाराजीनेच  म्हणाल्या.

त्यांना निरखत तो म्हणाला “आजे, तुला देऊ का एक काम मग?”

हसू आवरत आजींनी विचारलं “कसलं काम रे, झेपणारं दे बाबा ह्या वयात.”

तसं तो म्हणाला, “काळजी करु नको आजे, तुला जमेल मस्त..  फक्त तू मनावर घ्यायला पाहिजे” तो म्हणाला..

“बघ आजे, मी काही दिवस आहे फक्त.. तुझ्यासारखं म्हातारं व्हायचं होतं मला पण तो तुझा कृष्ण तिकडेच बोलावतोय.. माझ्यासारखे किती असतील.. एवढं मोठं आणि छान आयुष्य मिळालंय तुला..

असं जेव्हा तुला वाटेल ना ,की फार आयुष्य आहे, तेव्हा आम्हाला आठव आणी आमच्यासारख्यांच आयुष्य पण तुच जग.. एकदम रापचिक स्टाइल ने.. आपल्या रॅप सारखं…” आजी त्याच्याकडे बघतच राहिल्या.

दूसऱ्या दिवशी आजीना डिस्चार्ज मिळाला.. तेव्हा शेजारचा बेड मोकळा होता.. आजी काय समजायचं ते समजल्या..

घरी आल्यावर आजींमधे खुप बदल झाला.. घरी एका खोलीत असणाऱ्या आजी आता सगळ्यांमधे मिसळत होत्या.. काहीबाही पदार्थ करत होत्या.. त्यांची आवडती पेटी माळ्यावरुन खाली आली होती.. घरातल्या सर्वांना फार फार बरे वाटत होते..

आजी आता भरभरुन जगण्याचा आनंद घेत होत्या.. ज्यांना मिळाला नाही त्यांच्यासाठी.. आणी.. त्याच्यासाठीही…

लेखिका- सुश्री सायली साठे

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वृध्दाश्रमातील आजी – लेखक – श्री चंद्रकांत घाटाळ ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆  वृध्दाश्रमातील आजी – लेखक – श्री चंद्रकांत घाटाळ ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

“आजी! काय करताय?”

“काही नाही, थोडी सफाई करतेय पोरा!”

सामजिक सेवा संस्थेत हजर झाल्यापासुन या वृध्दाश्रमात माझी पाचवी फेरी. आमच्या संस्थे मार्फत काही खाण्या पिण्याची पाकिटे या वृध्दाश्रमात घेवुन यायचो. मी जेंव्हा कधी यायचो तेंव्हा या वृद्ध आजी खराटा घेवुन साफ सफाई करतांना दिसत. त्यांचे वय आणि कुबड निघालेल्या त्या शरीरला असं काम करून पाहताना मला मनातल्या मनांत खुपच दुःख होई. त्याच बरोबर त्यांना या परिस्थीतीत सोडणाऱ्या घराच्या सदस्यांबद्दल देखिल प्रचंड चीड येई. खरंच माणुसकी संपलीय असे वाटे.

माझं काम महिन्यातुन एकदा त्या वृध्दाश्रमात खाण्याची पाकिटे देणं. म्हणजे फक्त दहा- पंधरा मिनिटांचं काम, मात्र त्या दहा-पंधरा मिनिटांत मला जे अनुभवायला मिळायचे ते इतके दुःखद आणि वेदनादायी असायचे की, दोन-तीन दिवस मला नीट झोप देखिल लागत नसे. नेहमी  वृध्दाश्रमातील त्या वृद्ध आजी आजोबांचे दुःखी चेहरे दिसत.

आज नेहमी प्रमाणे मी आमच्या संस्थेमार्फत या महिन्यात दान म्हणून दिली जाणारी खाण्याची पाकिटे घेवुन त्या वृध्दाश्रमात माझ्या नेहमीच्या वेळेत गेलो. साधारणतः सकाळचे आठ वाजले असतील.आज देखिल त्या कुबड निघालेल्या आजी झाडु मारताना दिसल्या आणि काळजात चर्रर्रर्र झालं. मी सामान देवून त्या आजीकडे गेलो. “आजी! तुम्ही इतक्या म्हाताऱ्या असुन रोज झाडु का मारता?”

“काय करु पोरा, आता सवय झालीय!”

“आजी तुमच्या घरी कोण कोण आहेत?”

“पोरा! मला दोन मुलं आहेत. एक बाहेर देशात नोकरी करतो आणि दुसरा आपली पालिका आहे ना! त्यांत सगळ्यात मोठा साहेब आहे.”

“आजी! म्हणजे आयुक्त?”

“हो पोरा!”

“म्हणजे आपले समीर गायकवाड साहेब?”

“हो पोरा! तोच तो.”

आजीच्या त्या बोलण्याने मला धक्काच बसला. कारण गायकवाड साहेबांविषयी आजपर्यंत चांगले ऐकून होतो की, त्यांनी फार गरीबीतुन शिक्षण पुर्ण केले. ते खुप संस्कारी, इमानदार वगैरे वगैरे. शेवटी काय, तेही माणूसच.. भले ते चांगले असतील पण त्यांची पत्नी, ती खडूस असेल तर? पण तरिही आयुक्त असुन आपल्या आईला वृध्दाश्रमात ठेवणे हे कितपत योग्य आहे?

ते काही नाही! माझं पालिकेत संस्थेच्या कामानिमित्त जाणं होतेच, तेंव्हा साहेबांना विचारूच! असं मी मनोमन ठरवले. कारण त्या आजीची मला फार काळजी वाटायची.

येथील वृध्द आपल्याच मुलांविषयी काय-काय विचार करत असतील? किती स्वप्न, इच्छा, अपेक्षा ठेवल्या असतील त्यांनी त्यांच्या मुलांकडुन. आणि आज काय वाटत असेल त्यांना? मी विचार करता करता आश्रमाच्या गेट बाहेर पडलो. तोपर्यंत त्या आजी झाडु मारतच होत्या. माझ्या भावनिक काळजावर तो एक आणखी प्रहार होता.

आता तर मी मनाशीच ठाण मांडले की, या बाबत गायकवाड साहेबांना विचारायचेच!

दोन दिवसांनी मला संस्थेच्या कामानिमित्त पालिकेत जायची संधी मिळाली. मी आयुक्तांची भेट मागितली आणि मला ती लगेचच मिळाली, कारण आमची संस्था खुपच नावाजलेली संस्था होती.

“साहेब आत येवू?”

“हो! या बसा!!”

“सर! मी मोहन माळी, आधार सेवा संस्थे मार्फत आलोय!!”

“हा बोला! तुमची संस्था तर समाजात अतिशय चांगले काम करतेय!!  माळी साहेब काय करु शकतो मी आपल्यासाठी?”

“आयुक्त साहेबांचे हे इतके आदरयुक्त बोलणे ऐकून मी अगदी भारावून गेलो. इतके संस्कारी साहेब आपल्या स्वतः च्या आईच्या बाबतीत असं वागू शकतात? काय आणि कसं बोलावं काही सुचत नव्हतं.

“बोला माळी साहेब! काय करु शकतो मी आपल्या संस्थेसाठी?”

साहेबांच्या प्रश्नाने मी भानावर आलो. “काही नाही साहेब जरा पर्सनल होतं !”

“पर्सनल?”

“हो साहेब! कसं सांगु तेच समजत नाही?”

“काय असेल ते स्पष्ट बोला माळी साहेब!”

“साहेब! मी आमच्या संस्थेमार्फत महिन्याच्या चार- पाच तारखेला सदानंद वृध्दाश्रमात जातो. तेथे एक आजी आहेत. त्या झाडु मारत असतात. एक दिवस मी त्यांची विचारपूस केली असता त्या आपल्या आई आहेत असं समजलं!”

माझ्या या बोलण्याने साहेब खुपच गंभीर झालेले दिसले. तश्याच गंभीर आवाजात ते म्हणाले. “काय सांगु माळी साहेब? खरंतर मलाही हे पटत नाही! पण माझा नाईलाज आहे हो!!”

“नाईलाज! कसला नाईलाज?”

“माळी साहेब प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात हो!”

“हो साहेब ! प्रत्येकाच्या अडचणी असतात हे खरं आहे, पण तुम्ही आयुक्त पदावर आहात. तुमच्या आईला एखाद्या नातेवाईकाकडे ठेऊ शकता. सरळ वृध्दाश्रमात?”

माझ्या या प्रश्नावर साहेब बराच विचार करून म्हणाले, “माळी साहेब, तुम्ही आश्रमात किती वेळ थांबता?”

“साधारणतः पंधरा- वीस मिनिटे फार तर अर्धा तास!”

“माळी साहेब, आता पुढच्या वेळेस अजुन एखाद दोन तास थांबा!”

“चालेल गायकवाड साहेब!”

मी साहेबांच्या केबिन बाहेर पडतांना विचार करत होतो की, साहेबांचा नक्की काय नाईलाज असेल? असो! पुढच्या वेळेस मी आश्रमात दुपार पर्यंत थांबतो. कदचित साहेबांचा नाईलाज समजेल!

जून महिन्याच्या पाच तारखेला मी समान घेवुन आश्रमात पोहोचलो. आजही नेहमीचं दृश्य. त्या आजी झाडु मारत होत्या. मी माझं काम आटोपून आजी जवळ गेलो. “कश्या आहात आजी?”

“मला कसली धाड भरलीय, मी बरी आहे पोरा! तु कसा आहेस?”

“मी पण बरा आहे आजी! काही दिवसांपूर्वी मी आपल्या मुलाला, म्हणजे गायकवाड साहेबांना भेटलो आणि तुमच्या विषयी बोललो!”

“असं! मग काय बोलला तो ?”

“काही विशेष नाही. ‘नाईलाज आहे’ असं म्हणाले!”

“वाटलंच मला, तो तसंच बोलणार! आणखी काही बोलला नाही ना?”

“नाही आजी!” मी साहेबांच्या सांगण्याप्रमाणे आज थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला.

दहा- साडे दहा झाले असतील. आजी झाडु मारून थकलेल्या अवस्थेत झाडाखाली एका बाकड्यावर बसल्या होत्या. मी देखिल त्यांच्या बाजुला जावून बसलो. इतक्यात एक आलिशान गाडी वृध्दाश्रमात येतांना दिसली.

तसं ते नेहमीचं दृश्य होतं, कारण बहुतेक श्रीमंत घरची वृध्द मंडळी आश्रमात जास्त असतात. ज्यांची मुलं परदेशात नोकरीला वगैरे असतात. त्यांच्या अश्या गाड्या असतात.

आता मात्र त्या नेहमीच्या दृश्यात काहीसा बदल झालेला दिसला. ती आलिशान गाडी मी आजी सोबत बसलेल्या बाकड्याजवळ येवुन थांबली व गाडीचा मागचा दरवाजा उघडला तश्या आजी खराटा घेवूनच त्या आलिशान गाडीत बसल्या. ती गाडी तेथेच यु टर्न मारून निघुन गेली. ते पाहुन मी थक्क झालो. हा नक्की काय प्रकार आहे तो मात्र समजला नाही.

शेवटी न रहावून मी अधीक्षकांना भेटलो आणि हा काय प्रकार आहे ते विचारले.

“माळी साहेब! ह्या शांता आजी. आपल्या आयुक्त साहेबांच्या आई आहेत हे अगदी खरं आहे. मात्र त्या आपल्या सदानंद वृध्दाश्रमात राहत नाही तर आयुक्त साहेबांच्या, म्हणजे त्यांच्याच घरी अगदी सुखात आपल्या नातवंडां सोबत राहतात. आधी तर त्या नातवंडांना देखिल आणायच्या. मग त्यांना जाणीव झाली की, त्यामुळे येथील वृद्धांना त्यांच्या नातवंडांची आठवण येते म्हणुन आता आणत नाहीत.”

अधीक्षकांच्या या बोलण्याने मला धक्काच बसला, पण आता मात्र हा सुखद धक्का होता.

“म्हणजे मी समजलो नाही अधिक्षक साहेब?”

“माळी सर, त्याचं कसं आहे नां! शांताबाई आपल्या याच पालिकेत सफाई कामगार होत्या. त्या त्यांचे काम अतिशय इमाने इतबारे करीत. त्यांचे पती गिरणी कामगार होते. तेंव्हा गिरणी कामगारांच्या संपामुळे पतीची नोकरी अध्यात ना मध्यात होती. मात्र अश्या परिस्थीतीत शांताआजीने कुठूंबाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेवून आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण पुर्ण केले. त्यांत लहानग्याला विदेशात चांगली नोकरी मिळाली. तर मोठा म्हणजे आपले आयुक्त समीर गायकवाड साहेब.

शांताआजींनी सफाई कामगाराची नोकरी फक्त नोकरी म्हणून नाही तर सेवा म्हणून केली. आणि आज सुद्दा त्यांनी ती सेवा सोडलेली नाही. म्हणून त्या रोज आठ ते दहा या वेळेत येवून साफ सफाई करतात फक्त सेवा म्हणून. खरंतर या वयात शांताआजीने काम करणे गायकवाड साहेबांना अजिबात पटत नाही. मात्र शांताआजींच्या हट्टापुढे त्यांचा देखिल नाईलाज होतो. पण त्यांना घ्यायला व सोडायला ते रोज गाडी मात्र पाठवतात.

त्यामुळे आयुक्त साहेब तर ग्रेट आहेतच पण शांताआजी त्या पेक्षाही  म्हणजे एकदम.. एकदम ग्रेट आहेत़.”

ओ! मला आणखीन एक सुखद धक्का. आता तर माझा देखिल हात आजीला सेल्यूट करण्यासाठी आपोआप कपाळा जवळ आला.

वृध्दाश्रमात आजी दिसल्या म्हणजे त्या येथेच राहत असतील असा गैरसमज झाल्यामुळे मी स्वतःशीच हसलो..

लेखक – श्री चंद्रकांत घाटाळ,

मो 7350131480

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संस्कार – लेखिका : सुश्री श्वेता कुलकर्णी ☆ श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆  संस्कार – लेखिका : सुश्री श्वेता कुलकर्णी (अलका) ☆ प्रस्तुती श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

गेल्या वर्षीची गोष्ट…

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अगदी तसंच महत्त्वाचं काम निघालं म्हणून अगदी टळटळीत उन्हातून दुपारी रविवार पेठ भागात गेले होते ….एरवी या गजबजलेल्या व्यापारी पेठेत जाणं नको वाटतं…

कोविडची भीती बरीच कमी झालेली. त्यामुळे नेहमीसारखंच वातावरण होतं. अरुंद रस्ता.. दुतर्फा लहानमोठी दुकानं.. टेम्पोमधून माल उतरवून घेण्याची घाई.. वाट काढत नागमोडी जाणाऱ्या दुचाकी आणि रिक्षा.. वाहनांना चुकवत चालणारे पादचारी.. कर्कश हॉर्न…

एरवी अशा गदारोळात चालताना इकडे तिकडे न बघता मी वाहनाचा धक्का लागणार नाही ना या काळजीने स्वतःला सांभाळत चालते…. पण त्या दिवशी त्या गर्दीत सुद्धा डावीकडे असलेल्या एका साड्यांच्या दुकानाकडे लक्ष गेलं…

लहानसं दुकान. शोकेसमध्ये पाच सहा साड्यांचा सुरेख display. दाराजवळ हिरवीकंच साडी परिधान केलेली मॉडेल. तो रंग दुरून सुद्धा मनात भरला. साडी खरेदीचा विचार त्या क्षणापर्यंत मनात आला सुद्धा नव्हता, पण आपसूकच पावलं दुकानाकडे वळली.

पुतळ्याचा सुबक चेहरा, ओठांवर छानसं स्मितहास्य कोरलेलं. डौलदार हातावर जरीचा पदर लहरत होता. त्या हिरव्यागार रंगाच्या, बारीक जरी बॉर्डर आणि नाजूक बुट्टे असलेल्या आकर्षक साडीमुळे पुतळ्याला सोज्वळ सौंदर्य प्राप्त झालेलं…!

साडी हातात धरून पोत पाहिला. सिल्क बरं वाटलं. लहान बॉर्डर तर माझी आवडती. किंमत सुद्धा परवडण्यासारखी. आणि झाडाची पालवी तरुण होताना जो हिरवा रंग धारण करते त्या रंगाची सुरेख हिरवीगार छटा. म्हटलं मंगळागौर येईल तेव्हा सुनेच्या हातात हीच साडी ठेवावी. परत अशी सुरेख साडी मिळेलच असं नाही. आणि दूर रहायला गेल्यामुळे लक्ष्मी रोडवर सारखं येणं सुद्धा आताशा होत नाही… अशाच विचारांमध्ये दुकानात शिरले.

दुकानदार तरुण मुलगा होता. 27/28 वर्षांचा असेल. “अगदी सेम अशीच साडी दाखवा…” पुतळ्याकडे निर्देश करून त्याला म्हटलं…

“Sorry मॅडम… हरएक पीस अलग है.. लेकिन और साडी तो देखो….”

मी थोडी नाराजीने दुकानात गेले. त्याच्या व्यापारी कौशल्यानुसार त्याने  ‘सकाळपासून एकही साडी विकली गेली नाही.. तुमच्या हातून भोवनी होऊ दे.. नवीनच स्टॉक आहे… discount पण मिळेल…’ अशी सर्व बडबड करत माझ्यापुढे साड्यांचा एक लहान ढीग टाकला. मला एकही साडी आवडली नाही. “नको” म्हणत मी दुकानातून बाहेर पडण्याची तयारी केली…

मघापर्यंत टळटळीत वाटणारी उन्हं अचानक खूप मंदावली होती. थोडा वाराही होता. अवेळी पावसाची शक्यता वाटत होती…

“आपको वही साडी पसंद आई है ना मॅडम? कल मै आपको वह साडी दे सकता हुं… कल आके लेके जाना प्लीज… क्षमा करे लेकिन आज नहीं दे सकते…”

दुसर्‍या दिवशी केवळ साडी साठी दूरवरून परत त्या भागात मी येणं शक्य नव्हतं. मुलगा नम्र होता म्हणून म्हटलं, “ठीक है, कोई बात नही, फिर कभी दुसरी एखाद साडी लेके जाऊन्गी।” म्हणत मी बाहेर पडले आणि पावसाचे टपोरे थेंब पडायला लागलेच. तो मुलगा धावतच बाहेर आला आणि सांभाळून त्याने पुतळा दुकानात नेला.

पावसात भिजत जाणं शक्य नव्हतं म्हणून मीही परत दुकानात दाराजवळ थांबले. आता परत थोडा वेळ त्याची बडबड ऐकावी लागणार म्हणून माझा चेहरा थोडा त्रासिक झाला…

“कल चाहिये तो कुरिअर कर सकते है.. वह चार्जेस आप देना.. आज भागीदार कामकी वजहसे बाहर गया है.. कल उसको कुरिअर के लिये बोलता हूॅं।”

“मॉडेलची साडी नको. तुम्ही किती दिवस ती बाहेर ठेवत असाल. धूळ बसत असणारच. तसाच दुसरा पीस असला तरच मला हवा होता…”

“क्या है ना मॅडम, बिझिनेस छोटा है.. नया भी है.. तो बहुत ज्यादा stock नही रखते। Model की साडी दुकान बंद होनेके बादही रोज चेंज करते है… ताकी साडी खराब ना हो….” आणि मग पुतळ्याकडे निर्देश करून म्हणाला, “इनका भी सन्मान रखते है.. इनमे जान नही है तो क्या… नारी है… किसीकी नजर बुरी होती है इसलिये दुकान बंद होनेके बादही चेंज करते है।”

त्या शब्दांनी एकदम मनात काहीतरी चमकलं….असेच किंवा या अर्थाचे शब्द मी फार पूर्वी याच संदर्भात ऐकले आहेत…. स्मृतींचे दरवाजे उघडले… सर्व लख्ख आठवलं….

मी तेव्हा कॉलेजमध्ये अगदी पहिल्या दुसर्‍या वर्षात होते. माझी मामेबहीण माणिक मुंबईहून आमच्याकडे आली होती. लग्नाच्या वयाची, सुरेख, पदवीधर मुलगी…. योगायोगाने त्याच वेळी माझ्या आई वडिलांच्या घनिष्ठ ओळखीच्या एका डॉक्टरांचा मुलगा सुद्धा रत्नागिरीत आला होता. आईला माणिकसाठी ते स्थळ फार योग्य वाटलं होतं. त्यामुळे तेव्हाच्या प्रथेप्रमाणे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरला…

माणिक तयार झाली आणि आमचे डोळे विस्फारले! मुळात माणिकला अनुपम सौंदर्याची देणगी होतीच…आणि त्यात तिने नेसलेल्या सुरेख साडीमुळे ते सौंदर्य आणखी खुललं होतं… त्या वेळी मैसूर जॉर्जेट साड्यांची फार फॅशन होती. केशरी रंग, लहान बॉर्डर आणि अंगभर नाजूक सोनेरी बुट्टे… माणिकचा केतकी वर्ण त्या केशरी साडीमध्ये तेजस्वी वाटत होता…

नंतर माणिकने सांगितलं की पदवीधर झाल्याचं बक्षीस म्हणून वडिलांनी… म्हणजे माझ्या मामाने तिला साडी घेण्यासाठी पैसे दिले…. माणिक दुकानात गेली तर आतमध्ये मॉडेल च्या अंगावर ही सुरेख केशरी साडी होती. माणिकला तीच साडी पसंत पडली. दुकान मोठं होतं. त्यांनी ढीगभर साड्या दाखवल्या. पण तिला दुसरी कुठलीच साडी आवडेना.

दुकानातल्या लोकांनी तिला सांगितलं की ती साडी आज मिळू शकत नाही. त्यासाठी परत दुसर्‍या दिवशी यावं लागेल. मुंबईतल्या अंतराचा आणि लोकल ट्रेन, बस यांच्या गर्दीचा विचार करता ते शक्य नव्हतं… तरुण वय…. डोळ्यांना पडलेली साडीची भूल यामुळे तिथून तिचा पायही निघत नव्हता…

दुकानाचे मालक प्रौढ गृहस्थ होते… ते तिला म्हणाले, “बेटा, ही साडी बदलण्याचा एक रिवाज आम्ही सांभाळतो. रोज दुकान बंद केल्यावर या मूर्तीच्या चारही बाजूनी पडदे लावून मग आम्ही मूर्तीची साडी बदलतो. दुकानातला बाकी स्टाफ तेव्हा काम आवरत असतो. साडी बदलणारे लोकही ठराविक दोघे आहेत. इतर कोणाच्या नजरेसमोर हे काम केलं जात नाही. ही दगडी मूर्ती आहे. पण देह तर स्त्री चा आहे ना… तिला योग्य मान देणं… तिचं लज्जारक्षण करणं आमचं कर्तव्य आहे !”

माणिक प्रभावित झाली… लगेच म्हणाली की “मी उद्या परत येऊन ही साडी घेऊन जाईन…”

आम्हाला तेव्हा त्यांचे विचार ऐकून फार भारी वाटलं होतं….

ते दुकान मुंबईत होतं… हे पुण्यात… ते गृहस्थ या मुलाचे आजोबा.. पणजोबा असण्याची शक्यता पण कमीच… पण तरीही जवळपास तशाच प्रसंगात आज इतक्या वर्षांनी मी त्याच अर्थाचे शब्द या तरुण मुलाच्या तोंडून ऐकत होते…. कदाचित साड्या विकण्याचा बिझिनेस करताना समस्त स्त्री वर्गाबद्दल आदर वाटावा यासाठी सुद्धा असे संस्कार करत असतील… ते प्रत्येक पिढीत झिरपत येत असतील… असं मला वाटून गेलं!

इतक्यात त्याचा बाहेर गेलेला भागीदार परत आला. पाऊस कमी झाला होता म्हणून मी निघण्याची तयारी केली. त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं.

भागीदार म्हणाला, “ऐसा एक अलग कलर का पीस है… वह दिखाया क्या?” त्याने कोणत्या कपाटात ती साडी आहे ते सांगितलं. दोघांनी मला आणखी दोन मिनिटं थांबून ती एक साडी बघण्याची कळकळीची विनंती केली. खरंच दुसर्‍या मिनिटाला तो मुलगा साडी घेऊन आला. तशीच सेम लहान बॉर्डर, तसेच नाजूक बुट्टे, तसाच पदर…. रंग मात्र जांभळा होता….

ही पण साडी चांगली होतीच…पण त्याहून चांगले होते ते त्या तरुण दुकानदाराचे विचार… त्याचे संस्कार.. त्याची स्त्री कडे पाहण्याची दृष्टी…

मी लगेच ती जांभळी साडी खरेदी केली… पैसे दिले.. आनंदाने दुकानातून बाहेर पडले… न ठरवता केलेली ही साडी खरेदी मला अविस्मरणीय वाटते!

एकीकडे रोज खून, बलात्कार, चारित्र्यहनन, कौटुंबिक हिंसा, याबद्दल च्या बातम्या वाचून निराशेने मनाचं शुष्क वाळवंट होत असताना हे असे तुरळक ओअसिस मनाला उभारी देतात!

लेखिका – सुश्री श्वेता कुळकर्णी (अलका)

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऐसे हळूवारपण – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ 🔸 ऐसे हळूवारपण 🔸 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझी एक लग्न झालेली मैत्रीण सुमती, तिच्या घरी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो. नागपूरचे उन्हाळ्याचे दिवस. कडक उन्हाळा पण कुलरमध्ये आम्हाला दोघीनाही घुस्मटल्यासारखं व्हायचं, म्हणून चक्क खिडक्या उघड्या ठेऊन आम्ही पंखे लावून बसायचो.

ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अध्यायात  सांगतात,’ अध्यात्म शिकायला पाहिजे ते ‘चकोर तलग्यासारखं’ – चकोराच्या पिल्लासारखं!  त्याप्रमाणे हळूवार मन करून ही कथा ऐका.

चांदणं पिऊन जगणारा हळूवार चाकोर, त्याची पिल्लं– म्हणजे किती नाजूक कल्पना.  हळूवारपणाच्या या व्याखेनेच वाचतावाचत्ता आम्ही मुग्ध झालो. क्षणभर स्तब्ध होऊन बाहेर पहात होतो.

रस्यावर शुकशुकाट होता. काम्पौडच्या बाहेर एक बाई होती. नऊवारी पातळाचा पदर डोक्यावरून घेतलेला. डोक्यावर पाटयाचा दगड, हातात अवजारांची पिशवी, पायात टायरच्या रबराच्या केलेल्या चपला. उन्हाने दमली होती. घामाघूम झाली होती. बाहेरच्या झाडाशी ती थांबली.

डोक्यावरचा पाटा खाली ठेवला. पदराने घाम पुसत व त्यानेच वारा घेत ती उभी होती. रस्त्यावरच्या त्या झाडाजवळ बसायला जागा नव्हती. ती तशीच उभी राहिली.

सुमती पटकन उठली, बाहेर जाऊन त्या बाईला घरात बोलावून आणलं. बाई व्हरांड्यात आली. उन्हातून आल्यावर नुसतं पाणी पिऊ नये, म्हणून सुमतीने तिला गुळ आणि पाणी दिलं. बाई खुश झाली. ‘बाई, केव्हढं उन्ह आहे बाहेर…’

बाईच्या रापलेल्या चेहऱ्याकडे आणि घट्टे पडलेल्या हातांकडे पहात सुमती म्हणाली. बाईचं जळून गेलेले नाजूकपण ती न्याहळत होती. छिन्नी हतोडा घेऊन दिवसभर काम करणारी ही बाई वयाने फार नसावी, पण उन्हाने का परीस्थीतीने वाळली होती. पाटा फार घासला की त्याला पुन्हा ठोके पाडून घेतात ते  ‘पाटे टाकवण्याच’ काम ती करीत होती.

‘किती घेता पाटयाचे?’

‘दोन रुपये.’

‘अशी किती कामं मिळतात दिवसाची तुम्हाला?‘

‘दहा मिळाले तर डोक्याहून पानी’ ती

‘नवरा आहे?’

‘नाही, सोडचिट्ठी दिली त्याने, दुसरा पाट बी मांडला.’

किती सहज ती ‘डिव्होर्स’ बद्दल बोलत होती? उन्हात रापता रापता हिच्या संवेदनाही रापल्या असतील का?

‘मुलं आहेत?’ सुमती.

‘दोन हायेत.’ ती

‘शाळेत जातात?’

कधी मधी! पाऊस झाला, अन् शेण गोळा कराया न्हाई गेले, तर सालेत जातात कारप-रेशनच्या’

२० रुपये रोजात दोन मुलं आणि ही बाई रहातात. त्यासाठी ही बाई दिवसभर उन्हात हिंडते. मुलं जमलं तर जातात शाळेत. नवरा नाही. किती अवघड आयुष्य!

सुमतीच्या डोळ्यात पाणी आलं. ‘ऐसे हळूवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल…’ चा मला साक्षात्कार होत होता.

सुमतीची सहृदयता मला माहीत होती. घरची मोलकरीण, पोळयावाली, धोबी हे सगळे जणूकाय तिचे ‘कुटुंबिय’च होते. पण ही कोण कुठली बाई, तिच्या कष्टांचाही सुमतीला ताप होत होता. ‘केळीचे सुकले बाग असुनिया पाणी’ तशी इतरांच्या दु:खात ही कोमेजते.

‘पन्ह घ्याल?’ सुमतीने तिला विचारलं.

‘नाही बाई, काम शोधाया पाहिजे. ‘येर’(वेळ) घालवून कसं व्हईल?’

‘एक मिनिट थांबा, माझा पाटा टाकवून द्या’ सुमतीने आतून पाटा आणला. तिच्यासाठी काम काढलं. त्याचे २ रुपये झाले. सुमतीने तिला पाच रुपये दिले.

‘नको बाई, कामाचे पैशे द्या फक्त.’ ती म्हणाली. बाईच्या स्वाभिमानाचं कौतुक वाटलं.

‘बर, थांबा एक मिनिट’ आणखी काम द्यायचं, म्हणून सुमतीने आतून वरवंटा आणला.

‘याला टाकवा.’ तिने वरवंटा पुढे केला.

बाईने तो वरवंटा चटकन जवळ घेतला. छातिशी घट्ट धरला. आणि म्हणाली,

‘लेकरू आहे ते! त्याला टाकवत नाही’

जणू काय एखाद्या बाळाला गोंजारावं तशी ती त्याला गोंजारत होती.

बारशाच्या वेळी गोप्या म्हणून वरवंटा ठेवतात, तो संदर्भ! अशा ‘लेकराला’ छिन्नी हातोड्याचे घाव घालायचे, या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारे आले होते.

अक्षरशः दगड फोडण्याचे काम करणारी ही बाई- हळूवारपणे गोप्याला गोंजारत होती. त्या दगडाकडे मायेनं पहात होती. जसं काही झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागत होती. नमस्कार करावा तसा तो वरवंटा तिने डोक्याला लावला व नंतर परत दिला.

‘ऐसे हळूवारपण जरी येईल’ … चकोरतलग्याचं हळूवारपण त्या दोघींच्या रुपाने माझ्यापुढे जिवंत उभं होतं.

लेखक – अज्ञात 

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

मो. ९३७१८९८७५९

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शंभरावा दगड… अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? जीवनरंग ❤️

☆ शंभरावा दगड… अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

कथा

एक युवक साधूकडे गेला आणि म्हणाला, मी खूप प्रयत्न करतोय पण मला यश हुलकावणी देते, काय चूक होत आहे, मला कळू शकेल का?

साधू म्हणाले एक काम कर, बाजूला नदी आहे त्या नदीतून समान आकाराचे शंभर गोटे घेऊन ये, मग मी पुढे काय करायचं ते सांगतो. आज्ञेप्रमाणे युवक नदीकाठी जाऊन साधारण समान आकाराचे शंभर गोटे घेवून साधूकडे घेऊन आला. साधूनी पूढ़े सांगितले, हे पहा,  आपल्या आश्रमासमोर जे पटांगण आहे तिथे एक खांब रोवलेला आहे, त्या खांबापासून शंभर फुटावर एक चबुतरा आहे, तुला तिथे उभे राहायचे आहे आणि एक एक गोटा त्या खांबाला फेकून मारायचा आहे. तुझा जो गोटा खांबाला लागला, तिथे थांब आणि माझ्याकडे परत ये. तूझा फेकलेला गोटा खांबाला लागला तर जीवनात यशस्वी होशील आणि जर तुझा कोणताच गोटा लागला नाही तर तू आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाहीस.

ठरल्याप्रमाणे युवक सर्व गोटे घेऊन खांबापासून शंभर फुटावर असलेल्या चबुतऱ्याजवळ उभा राहिला आणि एक एक गोटा त्या खांबाला मारत राहिला. पहिले पंचवीस तीस दगड त्या खांबापर्यंत पोहोचलेच नाहीत. या टप्यावर त्याने थोडीशी विश्रांती घेतली आणि पुन्हा बळ एकवटून एक एक गोटा फेकण्यास सुरुवात केली. आता त्याने मारलेले गोटे खांबाच्या आसपास पोहोचू लागले पण खांबाला मात्र एकही गोटा लागला नाही.

अर्थात तो थोडासा निराश झाला, पाहता पाहता त्याच्याकडे केवळ पाचच गोटे उरले जे त्याला अगदी मन लावून ते फेकणे आवश्यक होते. संपूर्ण एकाग्र चित्त  करून शेवटचे पाच गोटे पुन्हा जोर लावून फेकण्यास त्याने सुरुवात केली आणि काय आश्चर्य शंभरावा गोटा खांबाला अचूक लागला.

अत्यंत आनंदाने ओरडत, युवक पळत आश्रमात येऊन  साधू ना घडलेला वृत्तांत सांगू लागला. साधू म्हणाले, तुला यातून काय बोध घ्यायचा आहे ते मी आता समजावून सांगतो.

प्रथम माझ्याकडे भरपूर गोटे आहेत, आणि काम खूपच सोपे आहे, म्हणून मी ते सहज करू शकतो या विचाराने  पहिले काही गोटे तू बेफिकिरीने फेकलेस, म्हणून लागले नाहीत.

इथे तुझा दृष्टिकोन उथळ होता.

मात्र जेव्हा पहिल्या तीस पैकी एकही गोटा खांबाला लागला नाही, तेव्हा तुझ्या मनात कुठेतरी भिती निर्माण होऊ लागली, आणि तू किंचित चिंताग्रस्त झालास.

त्यानंतर तू एक छोटीशी विश्रांती घेतलीस, नियोजन केले, योजना आखलीस आणि पुन्हा नव्या दमाने उरलेले दगड फेकू लागलास. या काळात बेफिकिरी जावून हळू हळू तू एकाग्र होऊ लागलास, म्हणून तुझे दगड खांबाच्या आसपास पोहोचू लागले, यातून तुला दगड फेकण्याची विशिष्ठ लय सापडली.

लय सापडली खरी, पण अजुन तुझे चित्त म्हणावे तितके एकाग्र झाले नाही.

आता जेव्हा शेवटचे पाच गोटे उरले, तेव्हा तू गंभीर झालास. जर आता माझा कोणताच गोटा लागला नाही तर, मी आयुष्यात पूर्णतः अपयशी होणार ही भिती तुला सतावू लागली. इथे तू तुझ्या इष्ट दैवताचे नाव घेवून, चित्त एकाग्र करून, लय साधून गोटे फेकू लागलास, आणि तुझा शंभरावा दगड खांबाला अचूक लागला.

मला अंतर्ज्ञानाने माहित झाले होते की तुझा शेवटचा गोटा खांबाला लागणार आहे. पण मी जर तुला ते आधीच सांगितले असते तर, तू पूर्णपणे बेफिकीर राहिला असतास, त्याचा शेवट असा झाला असता की तुझा कोणताच गोटा खांबाला लागला नसता. याचा परिणाम म्हणजे, माझ्यावरचा तुझा विश्वास उडाला असता, आणि मी भोंदू आहे असा तू निष्कर्ष काढला असतास.

बोध

लक्षात ठेव, उथळ वृत्तीने केलेल्या कामात कधीच यश मिळत नाही. नोकरी, व्यवसायात सुद्धा आपले सातत्य, एकाग्रता, व चित्त केंद्रित असेल तरच यश मिळते. आता तूला लक्ष कसे साध्य करायचे याचे आकलन झाले आहे असे मी मानतो.

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print