मराठी साहित्य – जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग १ ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

☆ जीवन रंग ☆ खेळायची खोली भाग १  ☆ सुश्री सुमती जोशी ☆

काल दिवसभर उन्हाच्या तापाने कोलकाता शहर जळत होतं. चंद्रोदय सकाळी बाजारात जाऊन आला तेव्हा सकाळचे नऊ–साडेनऊ वाजले होते. या कडक उन्हामुळे शरीराची कातडी जळून जाईल, असं त्याला वाटू लागलं. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी चंद्रोदय सबंध आठवडयाचा बाजारहाट करत असे. उरलेल्या शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असल्यामुळे त्याची बायको शुकतारा बाजारात जात असे. दोघं नोकरी करत. त्यांना एकच मुलगी – ‘रिद्धी’. तिचं डाकनाम ‘पाखी’. वय वर्षे पाच. ती आहे के.जी.च्या दुसऱ्या वर्षात. कधीकधी चंद्रोदय पण बहुतेक वेळा शुकतारा तिला सकाळी शाळेत सोडून येत असे. त्यानंतर तिला शाळेतून आणणं, आंघोळ घालणं, दुपारी जेवू घालणं, झोपवणं, संध्याकाळी बागेत घेऊन जाणं अशी सगळी कामं शुकताराची आई नंदिता करत असे. वडील वारल्यावर शुकतारा रिद्धीच्या या लाडक्या आजीला आपल्या घरी घेऊन आली. पाखीला स्वत:च्या आईपाशी सोपवून शुकतारा निर्धास्तपणे साडेचौदा हजार मिळवून देणाऱ्या नोकरीवर जाऊ शकत असे. धुणंभांडयांची बाई सोडली तर बाकी दिवसभर कोणी नोकर ठेवायची तिला गरज वाटत नसे. नंदिता तिच्या मुलीपेक्षा बावीस वर्षांनी मोठी होती. निसर्गदत्त सौंदर्याचा नजराणा तिच्यापाशी होता. प्रकृती स्वास्थ्याचंही तिला वरदान होतं.

बाजारहाट करून झाल्यावर चंद्रोदय ए.सी.लावून बेडरूममध्ये आडवारला. आला तेव्हा तो घामाने निथळत होता. बाजारातल्या धुळीने पाय माखले होते. लेंग्याच्या काठाला चिकटलेला भोपळ्याचा मऊ भाग आता वाळला होता. पाच मिनिटांनी शुकतारा खोलीत डोकावली आणि खोलीतलं दृश्य पाहून जवळ जवळ ओरडली, “काय हो, किती वेळा बजावलं तरी हातपाय न धुता, घामट कपडे न बदलता कॉटवर झोपलात ना?”

चंदोदय डोळे न उघडता नाखुशीने म्हणाला, “मी आणखी काही करू शकत नाही. हुश्श! किती उकडतंय! एकदा बाहेर जाऊन बघ म्हणजे समजेल काय भयंकर अवस्था आहे ते!”

त्याचं बोलणं फारसं मनावर न घेता शुकतारा म्हणाली, “तुम्ही अतिशयोक्ती करताय. रोजच उकडत असतं. याच उकाडयात रोज आपण ऑफिसला जायला बाहेर पडतो.”

रिमोटच्या मदतीने साऱ्या घराचं तापमान वीस अंश सेंटीग्रेड करून चंद्रोदयनं विचारलं, “आज मुलींच्या नाचाची रंगीत तालीम आहे का?”

“आज नाही. उद्या आहे.” यजमानांकडे तिरकस कटाक्ष टाकत शुकतारानं विचारलं, “का बरं एवढी चौकशी करताय?”

एका सेकंदाचा अवधी जाऊ न देता आवाज चढवत चंद्रोदय उत्तरला, “उद्या जर असाच उकाडा असला तर मी पाखीला बाहेर पडू देणार नाही. पोरीला काय कळतंय?”

“सगळं तुमच्या आदेशानुसार होणार नाही मिस्टर भट्टाचार्य.” शिरा ताणत शुकातारानं बजावलं, “उद्या त्यांची रंगीत तालीम आहे. उद्या जायलाच हवं. शाश्वतीदींनी पुन:पुन्हा बजावलंय. सुरुवातीपासूनच…”

त्याचा एक मुद्दा बरोबर होता, स्टेजवरच्या इतक्या लहानशा कार्यक्रमासाठी पाखीने एवढी मेहनत घ्यावी असं चंद्रोदयला वाटत नव्हतं. दर शनिवारी आणि रविवारी भर दुपारी साडेतीन वाजता शुकतारा बळजबरी करत लेकीला घेऊन जाई, हे योग्य नाही असं चंद्रोदयचं मत होतं.

गेल्या वर्षी सुकिया रोडवरच्या एका नाचाच्या क्लासमध्ये पाखीचं नाव घातलं होतं.  शाश्वतीदी त्या क्लासच्या सर्वेसर्वा. शुकतारा लहानपणी नाच शिकली होती. त्या शिक्षणाचा जीवनात काहीही उपयोग झाला नाही, हे समजत असूनही तिनं लेकीला नाचाच्या क्लासमध्ये घातलं होतं. मुलांना नाच, गाणं, पोहणं, विविध खेळ या सगळ्यात प्राविण्य मिळवून ऑल राउंड करायचं असतं. अशा आया सगळीकडे प्रवेश घेत पळापळ करत असतात. शुकतारा अशांपैकीच एक, याविषयी चंद्रोदयच्या मनात संदेह नव्हता. सुरुवातीपासून चंद्रोदय तिला रोखायचा प्रयत्न करत होता. पाखी मुळातच अशक्त होती. अधूनमधून दुखणी चालूच असायची. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाखीला काय किंमत मोजावी लागणार होती कोणास ठाऊक! आपलं स्वप्न साकारण्यासाठी आईवडील मुलांचं बालपण लुटून नेतात. तो शुकताराला वाईट म्हणत नव्हता, पण तिला जागं करायचा प्रयत्न करत होता. अर्थात या कामात तो रेषभरही पुढे सरकला नव्हता. तरीही त्यानं प्रयत्न सोडले नाहीत.

श्री हर्ष दत्त यांनी लिहिलेल्या ‘पाखिदेर खेलाघर’ या बंगाली कथेचा भावानुवाद

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अश्रूंची फुले ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

 ? जीवनरंग ?

☆ अश्रूंची फुले ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

बरेच दिवसांनी पुजा करायला ती बसली. परडीतुन दुर्वा-लाल फुल गणपतीला, बेल-पांढरे फुल महादेवाला, तुळस -पिवळे फुल विष्णुला वाहिले.

“ओम् विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभु:”

शब्द कानात घुमायला लागले.

रोज पुजा करतांना विष्णुसहस्त्रनाम म्हणायची सवय होती त्याची. तिच्या डोळ्यातुन टचकन पाणी आले.

ही..ही अश्रूंची फुले कोणाला?

नकळत परडी खाली ठेवली.

हुंदका बाहेर पडु नये म्हणुन एक हात तोंडाकडे, अन् दुसरा हात गेला — अलिकडेच मोकळ्या झालेल्या गळ्याकडे—नसलेले मंगळसुत्र चाचपडायला.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सगुणा…. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

?  जीवनरंग  ?

☆ सगुणा …. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

         बे s sबे s s….

       “आले sआले….”

सगुणाने खुट्याला ओढ घेणाऱ्या शेळीला आवाज दिला.आज सगुणाला मजुरीचं  काम नव्हतं. शेंगाच्या मोकळ्या वावरात चार शेंगा चाळून मिळत्यात का? बघायला तिला जायचं होतं म्हणून लगबगीनं तिचं आवरण सुरु होतं.लुडबुड करणाऱ्या आपल्या तीन वर्षांच्या पोराला बाजूला सारत तिची कामाची लगबग सुरु होती. कधी शेळीशी तर कधी बाळाशी बोलत तीनं लोखंडी बारडी उचलली त्यावर धुण्याचं बोचकं ठेवलं.एक बाजू आत एक बाजू बाहेर अश्या दोन दरवजाना खुडुक दिशी ओढून नीट बसवलं, कडी लावून गळ्यातल्या काळ्या दोऱ्याला अडकवलेल्या किलीने कुलूप लावलं ;टॉवेलची चुंबळ करून डोक्यावर ठेवली,चुंबळीवर बारडी नीट बसली ना? चाचपून पाहिले मग  शेळीचं दावं सोडून हातात धरलं.एका काखेत मुलाला घेऊन ती शेताच्या वाटेला लागली.

आज ऐतवार, तिच्या कुलस्वामीचा उपवास ! घरात धान्याचा कण नव्हता.हातावरचं पोट तीचं ! रोजगार केला तरच पोट भरुन खायला मिळे.गेल्याच वर्षी शेतात काम करताना तिच्या नवऱ्याला पान लागलं अन मिळवता हात कमी झाला.या अगोदर पण ती रोजगार करतच होती पण एखाद दिवशी नाही मिळाला तर उपवास नव्हता घडत ! रोजगार मिळाला की ती,शेळी अन तिचं तीन वर्षांचं तान्हुलं एकदम खुशीत असायचे ! शेळीला पोट फुगेपर्यंत चारा मिळायचा.तिचं पोट भरलं तर ती भरपूर दूध द्यायची अन मग मुलाचं पोट भरायचं.रोजगार मिळेना म्हणजे शेळी ल्याप व्हायची मग धार काढायची तिची इच्छाच व्हायची नाही. तिला वाटायचं,’ का उगाच तिची आतडी पिळावीत? ‘   आताही दोन दिवस तिला काही काम नव्हतं  कसं असेल काम? ऊन पेटलं होतं,जिकडे तिकडे उन्हाच्या झळा सैरावैरा धावत होत्या.चहुबाजूनी माळरान आग ओकत होतं.झाडाचा पाला सुकला होता,रस्त्यावरचा फुपुटा उन्हात तापला होता, विहिरी खरडल्या होत्या,प्यायला कसं बस पाणी मिळत होतं तेच भाग्य होतं ! बसून थोडेच पोट भरणार? तिला एक कल्पना सुचली,’पाऊस पडायच्या आत शेंगा चाळाव्यात !’ आणि तिनं गणपा आप्पाला विचारलं,’ आप्पा शेंगा चाळून दिऊ का? ‘

आप्पा दिलदार माणूस ! ” मला काय नको दिऊ पोरी,तूच काय चार निघत्याल त्या घिऊन जा.”आप्पानी रात्रीच सांगितलं होतं अन सगुणा तिकडेच हरकून निघाली होती.

डोक्यावर बादली, काखेत मूल अन एका हातात शेळी ! आज शेळी जास्त ओढत नव्हती कारण इकडं तिकडं एक पण हिरवा अंकुर तिला मोहात टाकत नव्हता.एखाद दुसरी बाभळीची  रस्त्यावर पडलेली शेंग टिपत टिपत ती गळ्यातल्या घुंगराच्या तालावर झपझप चालत होती. इतक्यात रस्त्यावर पडलेल्या एका ज्वारीच्या कणसाला तिनं गट्टम केलं.चार पावलं चालली असेल तोपर्यन्त दुसरं कणीस !पांढऱ्या शुभ्र मोत्यांसारख्या दाण्यांनी गच्च भरलेलं कणीस पाहून तिनं हातातलं दाव सोडलं अन चपळतेनं ते कणीस  ओच्यात टाकलं.

शेळी आता मुक्त झाली.ती इकडं तिकडं तुरुतुरु पळू लागली तोपर्यन्त सगुणाला अजून एक कणीस सापडलं.तिनं तेही कणीस ओच्यात ठेवलं.तिची नजर सहजच पुढं गेली. ठराविक -ठराविक अंतरावर तिला कणसं दिसली,”अरारा ! कुणाची तर साटी गळत्या जणू !” ती स्वतःशीच पुटपुटली. शेळीचं दावं तिनं कमरेला बांधल अन एक एक कणीस वेचित ती पुढं निघाली.

शेतात पोहचताच तिनं मुलाला खाली उतरलं ;ओच्यातली कणसं भुईवर ओतली.कम्बरेचं दावं सोडून शेळी शेवरीच्या खोडाला बांधली. शेवरीची  फांदी मोडून पाला शेळीपुढं टाकला,चार शेवरीची झुडपं एकत्र करून त्याला साडीचा धडपा बांधून त्या सावलीत तिनं मुलाला बसवले.” कुटं जायाचं न्हाई,हितच बसायचं… आपल्याला शेंगा पायजेत ना? मग आपल्या शेळीवर ध्यान ठेव बरं का?” तीनं तान्हुल्याला तिनं प्रेमळ ताकीद दिली.तोही समंजस बाप्यासारखा थोडा वेळ सावलीत बसला अन थोड्या वेळाने दगड धोंडे गोळा करत आईच्या मागोमाग खेळू लागला.

बादलीतलं छोटंसं हात खोरं घेऊन ती भुईमुगाच्या सरी धरून डबरी पाडत शेंगा  चाळू लागली.एक….दोन…तीन…सगळी डबरी रिकामीच ! एकपण शेंग दिसेना ! खोलवर काढलं तर एखाद दुसरी शेंगेची आरी दिसायची.आरी ओढली की एखाद दुसरं फोलपटच हाती लागायचं ! तिची घोर निराशा झाली,’चार शेंगा मिळत्याल तर उपासाला हुत्याल ‘म्हणून ती आशेनं डबरी पाडत निघाली,पण अख्खी सरी सम्पली तरी एकपण शेंग हाती लागली नाही. उन्हाचा ताव चांगलाच वाढला होता. तान्हुल्याचं पाय भाजू लागलं म्हणून तिनं त्याला मघाच्या सावलीत बसवले.सोबत आणलेल्या किटलीतलं पाणी तिनं घटाघटा ओंजळीत धरून प्यायली.बाळाला एक ओंजळ पाजली,अन हातात दोन बिस्कीट देऊन ती पुन्हा दुसऱ्या सरीत डबरी पाडू लागली. आता मात्र दोन..चार..दोन चार शेंगा सापडू लागल्या.तिनं हाताचा वेग वाढवला मिळतील तेवढ्या शेंगा ती ओच्यात साठवू लागली मधूनच बाळाकडे एकदा,शेळीकडं एकदा नजर देऊ लागली.उन्हाने जमीन वाळली होती. तिचं हातखोरं खर- खर वाजू लागलं,हात भरुन येऊ लागलं,पोटात भूक नाचू लागली.शेळी झुडुपाच्या सावलीत निवांत बसली होती,बाळ पण खेळत -खेळत बसल्या जागेवर निजले. एक पातळसा धडपा  तिनं त्याच्या अंगावर -तोंडावर हलकेच पांघरला,जराशी चुळबुळ करून तो शांत झोपी गेला. तिनं चार शेंगा फोडून तोंडात टाकल्या,किटलीतल्या पाण्यापुढं पुन्हा एकदा ओंजळ धरली,उन्हानं तापलेलं पाणी तहान शमवत नव्हतं पण तिनं ती शमवून घेतली.

आता एक -दोन तास तरी तिला बाळाची काळजी नव्हती,ती वेगानं डबरी पाडू लागली.आता मात्र जास्त खोलवर जायची गरज नव्हती वरच्यावरच दोन तीन खोरी मारली की चार -दोन,चार दोन शेंगा सापडू लागल्या,ती हरकून गेली.बऱ्याच शेंगा तिच्या पदरात पडल्या.

ऊन्ह चांगलंच तापलं, तिला सोसेना,तीनं खोरं पाटी ठेऊन दिली.शेळीला परत चार फांद्या मोडून टाकल्या. पाटात राहिलेल्या चूळ भर पाण्यात तिनं शेळीची तहान भागवली,अन हौदाच्या तळात उतरून  मिळालेल्या बादलीभर  पाण्यात चार कपडे धुऊन टाकली ; बाळाजवळ कलंडत  उरल्या सुरल्या पान्ह्याच्या दोन  धारानी त्याला तृप्त करू लागली.

ऊन्ह आता कलतिला लागली होती, तिनं चाळलेल्या शेंगा एका धडप्यात ओतल्या.सकाळी सापडलेली  ज्वारीची कणसे त्यावर  ठेऊन धडपा नीट बांधला. सुकलेली कपडे नीट घडी घालून बादलीत ठेवली. बादलीवर पुन्हा ते शेंगाचं बोचकं,काखेत मूल  अन हातात शेळीचं दावं धरून  घराच्या दिशेने चालू लागली.

अंगणात तिची चाहूल लागताच क्वार ss-क्वारss  करत चार कोंबड्या तिच्या भवताली नाचू लागल्या. डोक्यावरचं बोचकं खाली ठेवताच टोच मारत त्यानी साडीच्या धडप्यातन एक एक ज्वारीचा दाणा टिपायला सुरुवात केली.

छपराच्या मेडक्याला तिनं शेळीचं दावं बांधलं,कडेवरून उतरताच तान्हुले कोंबड्यामागे पळू लागले.शेळीला पाणी पाजून जरास भुस्कट तिच्यापुढं ठेवलं.धडप्यातली कणसं बाजूला करून शेंगाचं बोचकं नीट ठेऊन दिलं.सारवलेल्या अंगणात कोंबड्या हुसकत बडावण्यानं सगळी कणसं बडवून टाकली. पिश्या बाजूला टाकताच भुर्रकन येऊन चिमण्या उरलं सुरलं दाणे टिपू लागल्या,काही पिश्या कोंबड्यानी पळवल्या.बडवलेले दाणे तिनं वाऱ्यावर उफणून घेतले.पांढरेशुभ्र टपोरे दाणे टपटप डालग्यात पडू लागले,सगुणाची भूक हरपली. तिने मापट्याने दाणे मोजले तीन मापटी भरले.

जात्यावरच्या साळूत्याने तिने जाते साफ केले,हलक्या मुठीने दाणे जात्यात टाकत तिनं दळायला सुरुवात केली.

“दळण दळण्यासाठी

मदतीला धावे हरी

जाते टाकुनी पदरात

जनाई चाले पंढरी…”

ओवीचा आवाज ऐकताच बाळ धावतच येऊन मांडीवर बसला. पांढऱ्या शुभ्र पिठाचा ढीग जात्याभोवती जमा झाला. सगळं पीठ साळूत्याने एकत्र करून तिनं पाटीत भरलं.भुईवरच्या पिठात बाळ खुशाल खेळू लागला.

अंगणातल्या  साऱ्या पिश्या एकत्र करून तिनं चूल पेटवली,पत्र्याच्या डब्यात हात घालून मूठभर तांदूळ भगुण्यात घेतलं स्वच्छ खळबाळून चुलीवर ठेवलं.वैलावर डीचकीत पाणी तापायला ठेऊन बारीक बारीक काटक्या,चिपाडं अलगद त्यावर ठेवली,चूल चांगलीच ढणाणली.मग एक चम्बू घेऊन तिनं शेळीची धार काढली फेसाळत्या दुधाचा चम्बू तिनं तसाच वैलावर ठेवला,वैलावरच्या  कढत पाण्याने तिनं बाळाचे हात पाय धुतले,तोंडावर पाण्याचा सपकारा मारून स्वच्छ कपड्यांनं पुसले.चुलीच्या उजेडात तिनं चिमणी पेटवून चुलीवरच्या उंचवट्यावर ठेवली.तिन्ही सांज झाली,अंधुक होऊ लागलं.मेडक्याला धडपडणाऱ्या शेळीला तिनं अजून थोडं पाणी – भुस्कट ठेवलं. भातातलं पाणी आटत आलं होतं. तिनं वैलावर भात ठेवला,चुलीत अजून चार काटक्या,चार चिपाडं घालून तवा ठेवला.काटवटीत पीठ घेऊन एक भाकरी थापली अन तव्यावर टाकली.खरपूस भाकरीचा दरवळ तिच्या छपरात पसरला.चुलीपुढच्या आरावर भाकरी कशी फुलावानी टम्म फुगली ;एक छोटा तुकडा अन पाण्याचे चार थेंब टाकून तिनं अग्नी शांत केला.एका पसरट दगडावर बत्याने दोन लसूण पाकळ्या,दोन मिरच्या ठेचून तव्यातल्या टाकभर गरम तेलात टाकल्या.चर्र ss खमंग वास छपरात पसरला, चवीपुरते मीठ -चटणी टाकून त्यात मूठभर शेंगदाणे तिने  चेचून टाकले पाण्याचा शिंतोडा देऊन आच कमी केली. वैलावरचा भात तिनं ताटलीत उपसला,चिमटभर साखर अन दूध घालून तिनं बाळाला भरवला.दुसऱ्या एका ताटलीत भाकरी अन शेंगदाण्याची चटणी घेऊन त्याभोवती पाणी शिंपडून एक घास बाजूला ठेवला,भुकेने  कासावीस झालेल्या जीवास एक घास मुखात जाताच गोड गोड लागला .

जेवणाची ताटली खंगाळून ते पाणी तिनं अंगणात टाकले,दारातली शेळी छपरात एका कोपऱ्यात बांधली. एक तरट पसरून त्यावर मऊ दुपटे टाकून तिनं बाळाला त्यावर झोपवले हलकेसे पांघरून त्याच्या अंगावर टाकून मायेने थोपटले.दिवसभराच्या थकव्याने बाळ पेंगुळले. हलकेच उठून तिनं दरवजा बंद केला,’खुडुक’ आवाजाने पुन्हा एकदा दोन्ही दारे गच्च बसली.दाराला पाटा लावून तिनं तरटावर अंग टाकलं.बाळाला कुशीत घेऊन ती  शांत समाधानाने झोपी गेली.

तिच्या घराबाहेरचे जग अजून  जागे होते,व्यवहार चालू होते पण सगुणा तिच्या छोट्याश्या विश्वात शांतपणे झोपली होती…

 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ सापळा…भाग 5 ☆ श्री आनंदहरी

? जीवनरंग ?

☆ सापळा…भाग 5 ☆ श्री आनंदहरी

आत शिरताच डाव्या बाजूला बाकड्यावर बसलेल्या त्याला आणि त्याच्यासोबतच्या दोघांना पाहून वाडेकर कुणालाही दिसू नयेसं गालातल्या गालात हसले आणि त्यांच्या जवळ जात कृतक कोपाने म्हणाले,

“लाज नाही वाटत… ज्यांनी अन्नाला लावलं त्यांच्याशी बेईमानी करायला ? अरे, किती विश्वासाने तुमच्यावर जबाबदारी सोपवली आणि तुम्हीच चोरी केलीत“

ते बोलत बोलत त्याच्यासमोर आले आणि त्याला म्हणाले,

“तुला तर आम्ही सज्जन, प्रामाणिक समजत होतो.. आणि तूच..?“

तेवढ्यात मॅनेजर साहेबांनी वाडेकरांना हाक मारली तसे ते तिकडे गेले.

“इन्स्पेक्टर साहेब, आमचे हे तिन्ही कामगार प्रामाणिक आहेत. त्यांना सोडून द्या.”

“पण साहेब, त्यांनी तर चोरी केलीय..”

“नाही वाडेकर, त्यांनी चोरीही केलेली नाही आणि ते चोराला सामीलही नाहीत.. आणि खऱ्या चोराचा शोध घेऊन इन्स्पेक्टरसाहेब त्याला पकडतीलच.. काय इन्स्पेक्टरसाहेब ?“

“शोधायला कशाला हवा.. मुद्देमाल सापडलाय आणि चोर ही इथंच आहे..”

“क्कायs ? मुद्देमाल सापडला ? आणि चोर इथंच आहे ? साहेब मी म्हणलं नाही का तुम्हांला.. ते तिघंच असणार… मग इन्स्पेक्टरसाहेब मोकळं कशाला ठेवलंय त्यांना.. ठोका बेड्या.. नाहीतर जातील पळून..”

वाडेकर असे म्हणताच इन्स्पेक्टर हसले आणि म्हणाले,

“अरे खरंच की.. पळून जातील हे माझ्या ध्यानातच आलं नाही, हवालदार,  बेड्या ठोका या वाडेकरला लगेच.. आणि टाका आत.”

इन्स्पेक्टर साहेबांचं हे वाक्य ऐकून वाडेकरांनी काही क्षण आकांडतांडव करत, नंतर आर्जवं करत ‘मी त्यातला नाही..’ असे सांगायचा, भासवायचा प्रयत्न केलाही पण नंतर मात्र सारा खेळ संपल्याची जाणीव त्यांना झाली तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला.. आपला खेळ संपलाय याची जाणीव होऊन ते मटकन खालीच बसले. त्याच्या बरोबरच्या दोघा सहकाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

“धन्यवाद इन्स्पेक्टरसाहेब, तुमच्या मुळे आमचा माल चोरी होण्यापासून वाचला आणि खूप मोठं नुकसान टळलं.“

“अहो, आभार तर तुमचे मानायला हवेत, तुमच्यामुळे खरा चोर स्वतःच्या पावलांनी चालत आला पोलीस स्टेशनमध्ये. फरार झाला असता तर खूप त्रास झाला असता शोधायला.. माल ही चटकन सापडला.  काही तासांचा जरी अवधी गेला असता तरी माल गुजरातमध्ये गेला असता आणि मग तिथून कुठं गेला असता हे सांगणेही आणि शोधणंही कठीण झालं असतं. “

“इन्स्पेक्टर साहेब, ते सारे क्रेडिट मात्र त्याचं आहे.. त्याने रात्री फोन करून त्याला आलेला संशय माझ्याजवळ व्यक्त केला नसता तर यातलं काहीच हाती लागलं नसतं. “

मॅनेजर साहेब त्याच्याकडे अंगुलीनिर्देश करीत म्हणाले.

“अरे हो, हवालदार, चहा बिस्किटं सांगा.. सकाळपासून त्यांनी साधा चहा सुदधा घेतलेला नाही.“

इन्स्पेक्टर साहेब हवालदाराला म्हणाले. चहा बिस्कीट मिळणार यापेक्षा आपली सुटका झाली या जाणिवेनं सकाळपासून सुकलेले त्यांचे चेहरे खुलले.

पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर मॅनेजरसाहेबांनी त्याच्या दोन्ही जोडीदारांना पैसे दिले आणि जेऊनखावून नंतर बसने परत यायला सांगितलं. मॅनेजर साहेब आणि मालकांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून शाबासकी देत गाडीत पुढं बसायला सांगितलं.

दुसऱ्याच दिवशी मिलमध्ये मालकांनी त्याचा खूप मोठा सत्कार करून त्याला पाच हजार रुपयांचं बक्षीसही दिले. तेंव्हा त्याच्याबद्दल तर्क-वितर्क करून चर्चा करणाऱ्यांची बोटं तोंडात गेली होती.

तो खुश झाला असला तरी मनात अस्वस्थही होता.  आपल्याला संशय आला म्हणून आणि मॅनेजर साहेबांनी विश्वास ठेवला म्हणून…नाहीतर आज आपण तुरुंगात  असतो… आणि चुकून मॅनेजर साहेबही त्यात सामील असते तर ?..  प्रत्येकवेळी नशीब, चांगुलपणा साथ देईल असे नाही त्यापेक्षा नकोच हे.. घरी जाऊ, रानात राबू..सुखाची, सन्मानाची मीठ-भाकरी खाऊ…

त्याने मनाशी निर्णय घेतला.. मॅनेजरसाहेबांना सांगितला. त्यांनी खूप सांगायचा, समजवायचा प्रयत्न केला पण त्याचा निर्णय झाला होता.

एसटी मधून फाट्यावर उतरुन,पेटी डोक्यावर घेऊन तो गावाच्या, घराच्या दिशेनं निघाला असताना त्यांच्या मनात आलं..’ वाडेकरांना आपण खुपतोय हे आपल्या आधीपासूनच लक्षात आलं होतं.. त्यात त्यांनी माल घेऊन जायला त्यांच्या नेहमीच्या माणसांना सोडून आपल्याला पाठवलं तेव्हापासूनच त्यात त्यांचा काहीतरी डाव असणार असे वाटत होतंच आपल्याला.. वाडेकरांनी स्वतः चोरी करून त्यात आपल्याला अडकवायचा आणि आपला पत्ता कायमचा कट करायचा डाव केला होता पण आपल्याला आधीच आलेला संशय आपण मॅनेजर साहेबांना आणि नंतर इन्स्पेक्टर साहेबांना सांगितला होता म्हणून बरं.. नाहीतर आपण खडी फोडत राहिलो असतो..’

वाडेकरांनी त्याला अडकवण्यासाठी  सापळा लावून ठेवला होता पण त्या सापळ्यात ते स्वतःच ट्रॅप झाले होते, अडकले होते… कदाचित हातात बेड्या पडल्यावर वाडेकरांना ते सारे आठवलं असेल.. कदाचित त्यांनी आपल्यासाठी लावलेल्या सापळ्यात आपण त्यांनाच ट्रॅप केलंय हे ही कदाचित त्यांच्या ध्यानात आलं असेल.. पण हे सारं घडलं कसं ? याचं कोडं  अजूनही त्यांना उलगडलं नसणार…ज्यावेळी त्यांच्या हातात बेड्या पडल्या त्यावेळचा त्यांचा चेहरा त्याला  आठवला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. हसतच तो झपाझप पावलं टाकत घराकडे निघाला.

   – समाप्त –

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ सापळा…भाग 4 ☆ श्री आनंदहरी

 ? जीवनरंग ?

☆ सापळा…भाग 4 ☆ श्री आनंदहरी

मिलला रशियाची अठ्ठेचाळीस लाख मीटर कापडाची ऑर्डर मिळाल्याने कंपनीत आनंदाचे वातावरण होते.. ऑर्डर वेळेत पूर्ण करायची असल्याने कामाचा झपाटा वाढविला होता.. कामगारही खुशीने ज्यादा काम करत होते..

अठठाविस लाख मीटर कापडाचा पहिला लॉट पोहोचवायचा होता. असिस्टंट मॅनेजरनी त्याला बोलावले आणि मालाच्या ट्रकसोबत जाऊन मुंबईच्या बंदरात माल जहाजावर चढवण्यासाठी पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. सोबत दोन सहाय्यकही दिले. वरिष्ठांनी विश्वासाने जबाबदारीचे काम सोपवल्यामुळे तो मनोमम खुश झाला होता.

माल बंदरात पोहोचेपर्यंत वाटेत वाहतुकीचा खोळंबा झाल्याने खूपच उशीर झाला होता. पोहोचायला उशीर झाल्यानं तिथली कार्यालयीन वेळ संपली होती. माल दुसऱ्यादिवशी जहाजावर चढवण्यात येणार होता त्यामुळे थांबणे भागच होते. तिथे पोहोचल्यावर तिथल्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला आपला माल येणार आहे हे माहिती असावं आणि तो त्यांची वाटच पाहत असावा असे का कुणास ठाऊक पण राहून राहून त्याला वाटू लागलं होतं आणि त्यामुळे तो आश्चर्यचकीत झाला होता.  तो त्याबद्दल  अगदी आपल्या सहकाऱ्यांना काहीच बोलला नसला तरी मनात मात्र काहीसा चिंताक्रांत झाला होता.

एखादा जुना, जवळचा आप्त किंवा मित्र भेटावा आणि त्याने आपुलकीने स्वागत करावं, चौकशी करावी, पाहुणचार करावा तसा तिथला कर्मचारी त्यांच्याशी वागत होता.. बोलता बोलता त्याने सहजतेनं बोलण्याच्या ओघात असिस्टंट मॅनेजर साहेबांचं नावही घेतलं होतं. आपल्या साहेबांनी त्याला आपली व्यवस्था करायला सांगितली असावी असं त्याला आधी वाटलं पण नंतर मात्र त्याला वाटू लागलं की साहेबांनी आपली व्यवस्था केली असती तर तसे साहेबांनी आपल्याला निघतावेळी स्वतःहून सांगितलं असते. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली होती.

“आता उद्याशिवाय माल काही जहाजावर चढत नाही.. मुंबईला आलाय तर या जावा जीवाची मुंबई करून… मराठा मंदिरला एखादा पिक्चर टाकून, मस्तपैकी चिकन-बिकन खाऊन.. झोपायला इकडंच या बरं का… ऑफिसात रेस्टरूम आहे तिथं केलीय तुमची झोपायची सोय..”

त्या कर्मचाऱ्याने ‘जीवाची मुंबई ‘चं वर्णन आणि आग्रह असा काही केला की त्याचे जोडीदार एका पायावर जायला तयार झाले होते.. त्याला जावं असं वाटत नव्हतं पण तो नाईलाजाने गेला.

रात्री उशिरा परत आले तेंव्हा त्यांच्या डोळ्यांत झोप मावत नव्हती. रेस्टरुम मध्ये जाऊन गुडूप झोपले. त्यांना सकाळी जाग आली ती पोलिसांनी जागं केल्यावरंच. डोळे चोळत ते उठले. समोर पोलीस पाहून त्यांना काहीच समजेना. ते मनातून खूप घाबरले होते. पोलिसांनी त्यांना गाडीत टाकलं आणि पोलिस स्टेशनला घेऊन गेले होते.

पोलिसांनी प्रश्न विचारायला सुरवात केली तेंव्हा त्यांना कळलं होते की रशियाला पाठवण्यासाठी त्यांनी आणलेलं अठठावीस लाख मीटर कापड जहाजावर चढवायच्या आधीच लंपास झालं होतं, चोरीला गेलं होतं. ते ऐकूनच त्याला आणि त्याच्या सोबत्यांना प्रचंड धक्काच बसला होता. थोडावेळ प्रश्न विचारून त्यांना बाकड्यावर बसवले होते. ते तिघंही स्वतःच्याच विचारात गर्क होते. ते रात्री पिक्चर बघायला गेले होते तेव्हा तर कापड ट्रकमध्येच होते.. ’ सकाळी माल जहाजावर चढवण्यात आल्यावर पोहोच मिळेल ‘ असेही त्याला सांगण्यात आलं होतं. ‘ ते कापड म्हणजे कुणाला दिसू न देता लपवून लंपास करायची, खिशातून न्यायची छोटीशी वस्तू किंवा गोष्ट नव्हे, मग ते गेलं कसे ? आणि नेलं कुणी ? ‘ त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ घोंघावू लागलं होतं.

तो विचारात गर्क असतानाच पोलीस स्टेशन मध्ये कापडमिलचे मालक, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर आले. खरंतर तातडीने  मुंबईला जायचं आहे असे मॅनेजरसाहेबांनी म्हणल्यावरच  असिस्टंट मॅनेजर वाडेकरांना काहीसा धक्काच बसला होता.. पण चेहऱ्यावर काहीच दिसू न देता ते शांत बसले होते. गाडीत मॅनेजरसाहेब मागे मालकांशेजारी बसले होते त्यामुळे काहीही न बोलता, न विचारता असिस्टंट मॅनेजर गप्प बसले होते. .मुंबईत आल्यानंतर गाडी थांबली ती थेट पोलीस स्टेशनच्या आवारात. पोलीस स्टेशन समोर उतरताना त्यांच्या मनात खळबळ माजली होती पण त्यांनी प्रयत्नपूर्वक चेहरा नेहमीसारखा ठेवत विचारलं,

“साहेब, इथं ?”

“हो, काल रात्री रशियाला पाठवायचा सगळा माल चोरीला गेलाय..”

“क्काsय ?”

स्वतःच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत धक्का बसल्यासारखे असिस्टंट मॅनेजर वाडेकर म्हणाले आणि मालकांच्या पाठोपाठ पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढू लागले.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ सापळा…भाग 3 ☆ श्री आनंदहरी

 ? जीवनरंग ?

☆ सापळा…भाग 3 ☆ श्री आनंदहरी

एकीकडे त्याला मामाचं म्हणणं पटतही होतं.. बाबांना आताशा निभत नव्हतं हेही खरंच होते..दुसरीकडे किमान डी.एड. होणं हे त्याचं स्वप्न होते.. मार्क चांगले असल्यानं प्रवेशही सहज मिळत होता. तरीही तो फारसं काहीच न बोलता, थोडंसं नाराजीनंच मामाबरोबर गेला आणि त्याला मनातून आत्ता नोकरी करायला, लागायला नको असे वाटत असतानाही कापड गिरणीत नोकरी लागली.

ऑईल स्टेन रिमूव्हर म्हणून त्याला नोकरीवर हजर करून घेतलं होतं. तयार झालेल्या कापडावर पडलेले तेलाचे डाग काढायचं काम त्याला करायला लागायचं.. पगार होता साडेतीनशे रुपये.. तसा नाराजीनेच तो कामावर रुजू झाला होता पण पगाराचा आकडा ऐकून त्याची नाराजी थोडीशी कमी झाली होती. साडेतीनशे तेही एकरकमी. त्याच्यासाठी ती रक्कम तशी खूपच मोठी होती.

कापडवरचे तेलाचे डाग झटक्यात पुसून काढण्यासाठी जसे स्टेन रिमूव्हर असते  तसे परिस्थितीवरचे गरिबीचे, दारिद्र्याचे डाग पुसून काढण्यासाठी एखादं स्टेन रिमूव्हर असतं तर आपल्याला मनाजोगतं शिकता आलं असतं. असा विचार कधीतरी त्याच्या मनात तो एकटा असताना हमखास यायचा आणि तो विचार आला की तो उदास व्हायचा..

काळ हेच साऱ्यावरचं रामबाण औषध असते.. कालौघात कसलेही घाव, मनातली ठसठस कमी होत, भरले जातात.. काही दिवस गेले आणि तो आपल्या कामात रुळून गेला. कामातली सचोटी आणि प्राविण्य आणि कामाचा उरक पाहून काही महिन्यातच साहेबांनी त्याला बढती देऊन मोल्डर ची पोस्ट दिली.. कापड तपासणं, स्वीकारणं आणि दर्जा नसेल तर ते कापड नाकारणं..रिजेक्ट करणं हे काम त्याच्यावर सोपवलं. पगार ही वाढवला. तो खुश होता. नोकरीत रमला होता. मॅनेजर साहेब ही त्याच्या कामावर खुश होते पण असिस्टंट मॅनेजर वाडेकर मात्र त्याच्या कामावरून म्हणा किंवा उगाचच काही कारण नसताना त्याच्यावर खट्टू होते.. ते काही ना काही कारण काढून त्याला बोलायचेच.

काही दिवसांपूर्वी त्याच्या लक्षात आले होते की मिल मधून बाहेर पडताना गेटवरचे वॉचमन कामगारांना बाहेर सोडताना प्रत्येकाचे जेवणाचे डबे, पिशव्या तपासून पहायचे पण काही ठराविक कामगारांना नुसते तपासणी केल्याचं नाटक करुन बाहेर सोडत होते. त्याने काही दिवस जाणीवपूर्वक लक्ष ठेवले तेव्हा त्याला आपली शंका खरी असल्याचं जाणवलं आणि तो मनोमन अस्वस्थ झाला. काय करावं ? कुणाला सांगावं ? त्याला काहीच सुचेना आणि त्याला चैन ही पडेना. कुणाला बोललो आणि त्यात काही वावगं आढळलं नाही तर मोठी पंचाईत व्हायची आणि आपण नाहक अडचणीत सापडायचो हे ही त्याच्या ध्यानात आलं होतं.

एकेदिवशी काहीतरी निमत्तानं त्याला त्यातल्या एका कामगारांची डब्याची पिशवी पहायची संधी मिळाली. त्याने डबा उघडला आणि तो चक्क उडालाच. त्यात मिलच्या चांगल्या प्रतीच्या कापडाचे दोन दोन मीटरचे पाच सहा पीस लपवून ठेवले होते. त्याने ती गोष्ट वाडेकर साहेबांच्या कानावर घातली.

वाडेकर साहेबांनी त्या कामगार आणि वॉचमनवर काही कारवाई करायची सोडून त्यालाच समजावले होते. ‘ती लोकं खतरनाक आहेत उगाच त्यांच्या भानगडीत पडू नकोस नाहीतर ते तुलाच सापळ्यात अडकवतील ‘ असे समजवणीच्या सुरात सांगून अप्रत्यक्षरित्या त्याला धमकावले होते, घाबरवले होते. त्याला वाडेकर साहेबांच्या या बोलण्याचं, वागण्याचं आश्चर्य वाटले होते. वर ते त्याला म्हणाले होते.. ‘ तुला हवं तर तू घेऊन जा एखादा पीस तुझ्यासाठी.. पण मला बोललास तसे दुसऱ्या कुणाजवळ बोलू नकोस. काय माहीत, ज्या कुणाला बोलशील तो कदाचित त्यांना सामील असायचा आणि मग तूच अडचणीत यायचास.. गरीब आहेस, प्रामाणिक आहेस, आपण बरं की आपलं काम बरं..असाच रहा तरच इथं टिकशील.’

का कुणास ठाऊक पण वाडेकर साहेबांचं हे बोलणं त्याला खटकलं होतं. त्यांनी त्या लोकांना शिक्षा करायला हवी होती असे त्याला राहून राहून वाटत होते.. एक मात्र त्यानं केलं होतं तो ती गोष्ट दुसऱ्या कुणाजवळच बोलला नाही.

काही दिवसताच त्याला समजले होते की ती सगळी वाडेकर साहेबांचीच खास माणसं होती. त्यांना न तपासण्याबद्दल वॉचमनला पैसे मिळत होते तर तो माल बाहेर ठराविक ठिकाणी पोहोचवल्यावर त्या कामगारांनाही ठराविक पैसे मिळत होते. महिन्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा महिन्यात मिळणारी ती रक्कम जास्त होती. ते सारं समजताच त्याला तर धक्काच बसला होता.

वाडेकर साहेबांना बोलल्यापासून तो कुणालाही काही बोलला नसला तरी वाडेकर साहेबांचं मात्र त्याच्यावर लक्ष होतं. शेपटीवर पाय दिलेल्या सापासारखा त्यांनी त्याच्यावर डूख धरला होता. त्याला ते जाणवतही होतं पण तो बिचारा काय करणार?  अस्वस्थ मनानं पण आपण बरं आणि आपलं काम बरं असा तो वागत होता, तरीही त्याला सगळे माहीत झालंय असे वाटल्याने वाडेकर साहेबांना तो धोकादायक वाटू लागला होता आणि म्हणूनच तो कुठं चुकतोय काय, कुठं सापडतोय काय हे पहात त्याला पकडण्यासाठी वाडेकर साहेब सापळा लावून बसले होते. वाडेकर साहेबांच्या वागण्यातील बदल जाणवत असूनही तो मात्र या साऱ्यां बाबतीत अनभिज्ञ होता.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ सापळा…भाग 2 ☆ श्री आनंदहरी

 ? जीवनरंग ?

☆ सापळा…भाग 2 ☆ श्री आनंदहरी

तानाजी म्याट्रिक पास झाल्याचा सगळ्यांना आनंद झाला होता.. मार्कशीट देतांना सर म्हणाले होते,

“तानाजी, एवढे चांगले मार्क्स पडलेत आता सायन्सला प्रवेश घे. हुशार आहेस, मेहनती आहेस.. चांगला शिक. मोठा हो.”

सरांचं ते वाक्य त्याच्या मनात घोळत होतं. त्यालाही आपण खूप शिकावं असे वाटत होतं.. पण घरची परिस्थिती त्याला ठाऊक होती. सायन्स साईड, कॉलेज ही सारी स्वप्नंचं ठरणार हे तो जाणून होता पण तरीही काहीतरी करून पुढं शिकावं.. किमान डी. एड. व्हावं असं त्याला खूप वाटत होतं. ‘ बाबांशी बोलायला हवं.. पण आपण बोलण्यापेक्षा कुणीतरी जाणकार मोठ्या व्यक्तीनं बोललेलं बरं.. निदान बाबा पहिल्या झटक्यात नकार न देता ऐकून तरी घेतील.. कदाचित होकारही देतील ‘ त्याच्या मनात विचार चक्र चालू झालं होतं.

“शेटजीचा माल आणायचा हाय इस्लामपूरास्नं..”

बाबा खुंटीवरची पैरण आणि चाबूक घेत म्हणाले आणि बाहेर पडले. त्यांनी बैलगाडी जुपली. चाबूक नुसता खांद्यावर टाकला आणि ते गाडीत चढले.

बैलगाडीतून सामानाची ने-आण करुन त्यांनी आजवर प्रपंचाचा गाडा ओढला होता. शेती होती पण चुलत्यांत वाटण्या झाल्यावर पोटापूरतीसुदधा उरली नव्हती. शेती कमी असली तरी बैलं म्हणजे बाबाचे जीवलगच होते त्यामुळे त्यांनी गोठयातली बैलजोडीची जागा कधीच रिकामी ठेवली नव्हती.. दावणीला जो बैल यायचा तो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत दावणीला असायचा.

त्याचे बाबा बैलांची जोपासनाही खूप चांगली करायचे, त्यांची निगा राखायचे, घरात झालेली पहिली भाकरी आधी बैलांच्या मुखात घातल्याशिवाय बाबा कधी भाकरीचा तुकडा मोडायचे नाहीत. बाबांच्या खांद्यावर चाबूक असायचा पण त्या चाबकाची वादी कधी बैलांच्या पाठीवर पडली नव्हती. बाबा चाबकाचा हवेतच असा बार काढायचे की त्याचा आवाज भवतालात घुमायचा. बैलांना बाबांच्या, चाबकाच्या आवाजाचा इशारा पुरेसा असायचा.. आणि त्यांना तो कळायचादेखील.

सचोटीने काम करणाऱ्याला कामाची कमतरता कधीच नसते. त्याच्या बाबाचंही तसंच होतं. घरी वाटण्या झाल्यावर शेतातल्या उत्पन्नावर भागणार नाही हे जाणवल्यावर त्यांनी बैलगाडीने मालवाहतूक करायला सुरुवात केली. काही दिवसातच त्यांचा चांगला जम बसला होता. पंचक्रोशीतील व्यापारी तालुक्याहून माल आणायचा असला की हमखास त्यांनाच सांगायचे. आठवडी बाजारादिवशी तर जाता-येता भाडं मिळायचं. मशागतीच्या दिवसात मशागतीची कामे मिळायची तर सुगीच्या दिवसात सुगीतली, सुगीच्या माल वाहतुकीची कामे मिळायची. बाबांना कामाची इतकी सवय जडली होती की काम नसेल तर ते बेचैन व्हायचे.. बैलगाडीने माल वाहतूक करताना माल भरण्या-उतरण्याचं कामही ते स्वतःच करायचे त्यामुळे चार पैसे जास्त मिळायचे. कदाचित त्यामुळेच असेल पण अलिकडे त्यांना पाठदुखीचा भयंकर त्रास होऊ लागला होता. डॉक्टरनी विश्रांती घेण्याचा, आराम करण्याचा सल्ला दिला होता.. पण विश्रांतीच्या मंद ज्योतीवर गरिबांची भाकरी पचत नाही तिला कष्टाची ज्वाळाच लागते.. बाबा तशाही स्थितीत माल वाहतुकीची भाडी करतच होते..

‘पुढं काय ? ‘ हा प्रश्न गरिबाला तर श्वासागणिक पडत असतो.. एस.एस.सी. झाल्याचा आनंद हा त्याच्यासाठी आळवावरचं पाणीच ठरला. त्यापाठोपाठ ‘ पुढं काय ?’ हा प्रश्न एकाद्या वावटळासारखा त्याच्या मनात आणि घरात भिरभिरु लागला आणि त्यात ‘म्याट्रिक’ झाल्याचा आनंद पालापाचोळ्यासारखा उडून गेला. त्याला किमान डी.एड. तरी करायचं होतं..मग कुठंतरी शिक्षकाची नोकरी लागली असती. शिकणं-शिकवणं आपल्याला आवडतं हे त्याला ठाऊक होतं. त्याला खूप शिकायचं होतं पण परिस्थितीचं भान त्याला असल्यामुळे सध्यातरी शिकता येणार नाही हे ही तो जाणत होता..निदान डी.एड.होता आले तर नोकरी करत पुढे शिकता येईल असे त्याला वाटायचं..

त्याचा निकाल कळला तसं  दुसऱ्याच दिवशी तो भाच्याचं यश साजरे करायला पेढे घेऊनच आला. मामा आल्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. मामाजवळ डी. एड चा विषय काढून ‘पुढे काय ?’ ते निश्चित करता येईल असे त्याला वाटत होतं. दुपारची जेवणं झाली. सगळे सोप्यात निवांत बसले होते. तो डी. एड. चा विषय मामा आणि बाबांसमोर काढणार तेवढयात मामाच बाबांना म्हणाला,

“दाजी, माझा एक दोस्त हाय कापड गिरणीत कामाला.. त्येला तानाच्या नोकरीचं बोलून ठेवल्यालं हाय.. त्येनं म्याट्रिक झाल्याव  याला सांगितलं हूतं.. तवा उद्याच्याला जाऊन येतो आमी. जाऊ न्हवं ? “

“आरं, आमी आडानी.. आमास्नी काय कळतंय त्येच्यातलं.. तूच बग काय ती…”

“दाजी, तुमी काय बी  काळजी करू नगासा… काम हुईल असं दोस्त म्हणलाय.. येकडाव का नोकरी लागली का तुमी भाड्याचं काम वाईच कमी करा आन ईसावा घ्या. त्याबिगर दुकनं काय कमी हूयाचं न्हाय..”

“त्ये बगू म्होरचं म्होरं.. आदी नोकरी तरी मिळूनदेल..”

 “पण मामा, मला शिकायचंय अजून.. डी.एड. तरी करतो.”

 “आरं.. नोकऱ्या काय वाटंवं पडल्याती व्हय रं? मिळत्यालीला नगं म्हणू नी..आन दाजीस्नी निभंना झालंय.. त्येंनी तरी किस्तं वडायचं ?. नोकरी करीत करीत शिक की म्होरं,काय शिकायचं हाय ती.. नगं कोण म्हंतया तुला ? “

मामानं एका झटक्यात विषयाचा कंडकाच पाडला होता.

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ सापळा…भाग 1 ☆ श्री आनंदहरी

 ? जीवनरंग ?

☆ सापळा…भाग 1 ☆ श्री आनंदहरी

त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं.. ही बातमी साऱ्या मिलमध्ये वाऱ्यासारखी पसरली.. ‘ त्यानं कोणता गुन्हा केला ? पोलिसांनी कशासाठी ताब्यात घेतलंय ? याची कुणालाच काही माहिती नव्हती..

“तरी मी म्हणतच होतो.. तो काही वाटतो तितका सरळ नाही.. खाल मुंडी आणि पाताळ धुंडी आहे?”

“आस्सं ss ?  कवा म्हणलावता तुमी आसं ? अवो, जवा बगंल तवा त्येच्या मागं-म्होरं असायचासा की..आरतीची थाळी घिऊन..”

“अरे, माणूस ओळखायचा असेल तर त्याच्या मागं- पुढं राहावं लागतं.. जाऊ दे तुला नाही कळायचं ते..”

“व्हय, आमास्नी काय कळतंया.. पर येक सांगा.. त्यो आला असता मुंबैस्नं तरीबी तुमी आसंच म्हणला आस्तासा का ?”

“मग भितो का काय कुणाला ? तोंडावर म्हणायला कमी नाही करणार.. खरं ते खरंच.”

“काय पण म्हणा राव.. पोरगं हुशार आणि कामसू.. असं काय करंल आसं वाटलं न्हवतं..”

“अहो, चेहऱ्यावर का लिहिलेलं असतं असे करील आणि असे नाही म्हणून ? अहो, ‘ हर चेहरे पे नकाब हैं !’ म्हणतात ते काही खोटं नाही बघा.”

“पण नेमकं झालंय तरी काय ? एवढं पोलिसांनी पकडण्यासारखं ?”

“…आणि ते ही मुंबईत ? पण पोलिसांना मात्र मानलं पाहिजे.. गुन्हेगार अगदी पाताळात लपून राहिला तरी सोडत नाहीत त्याला.’

“अवो, पर त्यो लपलावता कवा ? त्यो तर मिलचं काम घिऊन गेलाय न्हवं ? “

“व्हय.. काम घिऊन गेलाया.. ततं गेल्याव भुलला आसंल मुंबैला.. गेला आसंल जीवाची मुंबै कराय.. आन घावला आसंल पोलिसांस्नी..”

“आरं पर त्ये पोरगं तसलं न्हाय वाटत.. उगा काय बी बोलू नगासा..”

अशा नाना प्रकारच्या चर्चा, कुजबुज. कुठं दबक्या आवाजात तर कुठं खुलेपणाने. मिलमधील साऱ्या कामगारांच्यात चालली होती. नेमकं काय झालंय आणि काय नाही हे खरंतर कुणालाच माहीत नव्हतं … पोलिसांनी त्याला पकडलंय एवढीच बातमी कर्णोपकर्णी होऊन जवळजवळ प्रत्येकापर्यंत पोहोचली होती.. आणि ती पोहोचताना प्रत्येकाने नेहमीच्या सवयीने आपापल्या अंदाजाची, आखाड्याची भर त्यात घातली होतीच.. पण नेमकं काय घडलंय ते मात्र कुणालाच ठाऊक नव्हतं.

पोलिसांनी त्याला आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये नुसतंच बसवून ठेवलं होतं.. ते तिघंही काहीसे घाबरलेले होते.. आपण काय केलंय ? का म्हणून आपल्याला असे इथं आणून बसवून ठेवलंय ? हे त्यांना काही कळत नव्हतं. ’ एकमेकांशी अजिबात बोलायचं नाही..’ असे पोलिसाने दरडवल्याने  ते तिघंही मुक्या, हलत्या बाहुल्यांसारखे एकमेकांशी काहीही न बोलता खाली मान घालून बसले होते. सकाळपासून त्यांच्या पोटात चहाचा  घोटसुद्धा गेला नव्हता पण मनावरच्या प्रचंड ताणामुळे आणि भीतीमुळे त्यांना अजूनतरी त्याची जाणीव झाली नव्हती. त्याचे दोन्ही सहकारी घाबरून रडवेल्या चेहऱ्याने बसले होते पण तो मात्र खाली मान घालून कसल्यातरी विचारात गढून गेला होता.

खरंतर, त्याला पुढं खूप शिकायचं होतं. एस.एस.सी.ला म्हणजे त्यावेळच्या अकरावीला त्याला चांगले साठ टक्के मार्क पडले होते.. आताच्या काळात साठ टक्के मार्क्स म्हणजे काहीच वाटत नसले तरी त्याकाळी साठ टक्के मिळवणारे दोन-चार विद्यार्थीच असायचे शाळेत.. आणि केंद्रात तर ती संख्या दोन आकड्यातली असायची. तो त्यात होता. त्याकाळी साठ टक्के मार्क मिळणे हे अभिमानास्पद असायचे. ‘ मुलगा खूप हुशार आहे.. फर्स्ट क्लासचा आहे ‘ असे मानलं आणि म्हणलं जायचं.

एस.एस.सी.ला चांगले मार्क्स पडले याचा त्याला खूप आनंद झाला होता. तो आनंदानं घरी आला. वडील गोठयात बैलांना पाणी दाखवत होते.. आई घरात चुलीवर चहाचं आदण ठेवत होती.. ‘ पोरगं शाळेत गेलंय, आज त्याचं पास-नापास आहे ’ हे त्या दोघांनाही माहीत होतं. पोरगं हायस्कुलात शिकतंय याचा त्याच्या आई-बापाला कोण अभिमान. तसं म्हणलं तर त्या दोघांनीही शाळेचं तोंडसुदधा बघितलेलं नव्हतं पण पोरगं शिकतंय आणि दरसाल पास होतंय म्हणल्यावर त्यांनी त्याला फारसं काम न लावता शिकू दिलेलं होतं.

पोराला ‘पास- नापास’ घेऊन घरात आलेलं पाहिलं तसं दोन्ही बैलांना पाणी दावून बाबा लगोलग घरात आले होते तर आईनं पोरगं उन्हातनं आलंय म्हणल्यावर चुलीपुढनं उठून पाण्याचा तांब्या दिला होता.

हातपाय धुवून आत आल्यावर त्यानं दिवळीत ठेवलेलं निकालपत्र बाबांच्या हातात दिलं.बाबांनी ते उलटं पालटं करून पाहिलं आणि त्याला विचाऱलं,

“पास झालास न्हवं ?”

“हो.”

“लई ब्येस झालं..  बरं का गं, रातच्याला  कायतरी ग्वाडध्वाड कर.. आपला तान्या म्याट्रिक पास झालाया.”

त्याच्या वडिलांनी तिथूनच आईला जेवणात काहीतरी गोडधोड करायला सांगितलं.  आई आतून चहा घेऊन बाहेर आली. तिनं त्याला आणि बाबांना चहा दिला..

 क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चिटींग ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

 ? जीवनरंग ?

☆ चिटींग  ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

टेरेसमध्ये उभा होता तो उदासवाणा.

खाली बागेत रंगात आलेल्या मुलांच्या खेळाकडे पहात.

“Fire in the mountain” एकाचे सांगणे. “Run, run , म्हणत बाकीच्यांचे गोलगोल फिरणे,.

“Two” पहिल्याने सांगीतले. जोडी जमवण्यासाठी इतरांचे कोणालातरी ओढणे, कोणालातरी जाऊन भिडणे.

आपणही, तिला असच ओढुन जोडी जमली होती.त्याच्या चेहर्‍यावर मंद हसु.

“Fire in the mountain”.

“Run, run, run”

आता आवाज आला, “Four”

लवकरच, २, गोड, गोंडस, गोजिरवाण्या चिमण्या येऊन बिलगल्या होत्या आपल्या दोघांना. त्याचे जरा सुखावून, खुलेपणाने हसणे.

परत, “Fire in the mountain”

“Run, run, run,”

पहिल्याची सुचना, “Again Two”.

दोघादोघांची जोडी जमवण्यासाठी परत इतरांची धावपळ, जरा दमछाक.

आपल्याही दोन्ही चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या, बघता, बघता मोठ्या होऊन, उडून गेल्या. अगदी दूर, दूर–परदेशी. परत आपली दोघांची जोडी,. त्याच्या चेहर्‍यावर–कृतार्थतेचे स्मित.

फिरुन सुरु केले, “Fire in the mountain”.

“Run, run, run”.

आदेश आला- “One”

सवयीप्रमाणे कोणालातरी धरायला लागली,.गोंधळली. आणि, “One” चा अर्थ पटकन आपल्या लक्षात आला नाही ,म्हणुन आरडाओरड सुरु केली,  “Cheating, Cheating, it’s Cheating”.

अन्, त्याच्या मनात आले, आपणही एकटेच. अजुन पटत नाही.

कोरोना दोघांनाही झाला होता, आणि, अचानकच ती गेली.

दैवाने,आपल्या बरोबर केलेले हे-चिटींग च ना?

Yes, it’s Cheating.

 

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मातृदिन …. ☆ परवीन कौसर

?जीवनरंग ?

☆ मातृदिन …. ☆ परवीन कौसर

सकाळी उठल्यावर अचानकच तिला आपल्या प्रकृतीत काही तरी बिघाड होत आहे असे जाणवू लागले. काहीशी कमजोरी आणि डोळ्यासमोर अंधारी आली.लगेचच तिला तिच्या नवऱ्याने दवाखान्यात नेले. तिथे तिच्या तपासण्या करण्यात आल्या.आणि तातडीने उपचार सुरू झाले. काही तपासण्याचे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होते. तोपर्यंत आलेल्या रिपोर्ट प्रमाणे उपचार डॉक्टरांनी सुरू केले होते. सलाईन, इंजेक्शन दिले होते. औषधांमुळे तिला झोप लागली.

“आई …ये आई उठ न. हे बघं मी तुला  जेवण करून आणले आहे.” तिच्या अंगावर लहान लहान हाताने कोणीतरी स्पर्श करून हलवत उठविण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे ती एकदम खडबडून जागी झाली. बघते तर समोर लहान म्हणजे अगदी १० वय वर्षाचा मुलगा आपल्या एका हातात डबा घेऊन उभा होता. त्याला बघून तिने आपले डोळे पुन्हा बंद केले.  पुन्हा त्या मुलाने ” ये आई उठ न. बघं किती वेळ झाला. तुला भूक लागली असेल‌. ही तुझी रोजची जेवणाची वेळ आहे. डॉक्टरांनी पण जेवण द्या लवकर म्हणून सांगितले आहे.आणि ही बघ राणी पण भुकेली झाली आहे.तिला पण चारायचे आहे मला. आता तू नाही चारू शकणार तिला.”

हे ऐकताच  तिने तिचे भरलेले डोळे हळूहळू उघडले आणि त्या मुलांचा हात हातात घेऊन रडू लागली. आणि म्हणाली “बाळा माफ कर मला. मी खरंच खुप वाईट आहे. मी तुला कधीच प्रेम केले नाही. सवतीचा मुलगा म्हणून फक्त आणि फक्त घृणा केली. तुला कधी वेळेवर जेवण दिले नाही. ताजे तर अन्न तुला मिळालेच नाही. याउलट राणीचे उष्टे अन्न दिले मी. आणि तुझ्या बाबांना पण तुझ्या विरूद्ध काही तरी खोटे सांगून कित्येक रात्री उपाशी झोपवले. आणि एकदा तर तू भुकेने व्याकूळ होऊन खाण्यासाठी बिस्कीट डब्यातून काढून घेतला तर त्या हातावर मी चटका दिला. आणि आज त्याच हाताने तू जेवण बनवून आणलास माझ्या साठी. मला माफ कर बाळा.मी तुझी गुन्हेगार आहे. याचीच शिक्षा म्हणून मी इथे आहे बघं आज. ” म्हणत ती रडू लागली.

हे ऐकून त्या मुलाने तिचे डोळे पुसले आणि डब्यातील दुधभात तिला चारु लागला. आज हे त्याच्या आईने त्याला गर्भात असताना केलेले संस्कार आणि तिची ममता त्याच्या मनात भरलेली होती.

आज तिला तो दुधभात पंचपक्वांन भासू लागला होता.आईचे जेवण झाल्यावर त्याने आपल्या छोट्या बहीणीला भात चारला. हे दृश्य पाहून आई वडील दोघेही आपल्या अश्रूंना थांबवू शकले नाही.

त्या दोघांना त्या बाळाच्या चेहऱ्यावर एका निरागस ममता माई आईचे तेज ओसंडून वाहत आहे हे दिसू लागले.

खऱ्या अर्थाने हाच मातृदिन साजरा झाला.

©® परवीन कौसर 

बेंगलोर

९७४०१९७६५७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares