मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रूप्या…भाग 1 ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ रूप्या…भाग 1 ☆ मेहबूब जमादार ☆

शामूतात्यानं सकाळी अकरा वाजता जसा गवताचा भारा गोट्याम्होरं टाकला तसा सारा गोटा जागा झाला. दोन म्हसरं टूणदिशी उभी राहीली. सोन्या रूप्यातला एक बैल चटदिशी उभा राहीला. पण रूप्याला काय लवकर ऊटता आलं नाय. त्यांचं वय झालवतं. बरीच वर्ष त्यानं तात्याबरोबर काढलीवती. शेतात घालीवलीवती. पेरायला तर ही जोडी एका लायनीत पेरायची. जाणारा येणारा नुस्ता बघतच रहायचा. एखादा तात्याला सजागती म्हणायचा,

“आरं तात्या पेरतानां रानांत दोरी- बीरी मारलीवती का रं?”

“का बरं आबा?”

“एका लायनीत कुरी दिसत्या.कुठं इकडं नाय की तिकडं नाय”

“खरं सांगू ही सारी सोन्या रूप्याची किरामत,मी काय नुस्ती दावं धरतो अन बापू आमचा पेरतो.”

रूप्याचं वय झालंवतं. तात्यानं त्याच्या तोंडावरून हात फिरवला तसा तो चटदिशी ऊटला.

तात्यानं जनांवरामागचं शेणाचं पू उचलून उकिरड्यात टाकलं.खराट्यानं गोटा झाडला.गोटा साफ झाल्यावर त्यानं आडावरनं दोन चार घागरी पाणी आणलं.पहिल्यांदा बैलानां पाजलं. पुन्हा म्हसरानां पाजलं. बैलानां कोवळं लुसलुशीत गवत टाकलं. म्हसरानां गवत टाकलं. तात्याचं एक गणित होतं ‘मला काय कमी पडलं तर चालंल पण माझ्या बैलानां काय कमी पडू नये’.

बैलं औत ओढायची. गाडी ओढायची. प्रसंगी मोटपण ओढायची. तात्याला बैलाला चाबकाने मारलेलं खपायचं नाय. तो निस्ता बैलाच्या अंगावर मायेने हात फिरवायचा, बैलं आपोआप चालू लागायची़. एवढी माया‌ तात्याची‌ बैलावर होती.बैलांचीपण माया तात्या वर होती. अगदी मुलांसारख़ं त्यानं बैलानां सांभाळ होतं. एकवेळ तो म्हसरानां हिडीसफिडीस करायचा, बैलापुढची शिल्लक वैरण म्हसरानां टाकायचा.

तात्या चा दिवस जेवणापुरताच घरी जायचा. नायतर सारा वेळ तो एकतर सका़ळी वैरण का़ढायचा. उरलेल्या वेळांत तो गोटा साफ करायचा,पाणी पाजायचा. जनांवर खातील तशी वैरण‌ टाकायचा. कवा काम असलं तरच बैलं शेतात असायची.तात्या ची मशागत बैलानां हात न लावता चालू असायची. एवढं बैलानांही तात्या ला काय हवं, काय नको ते कळत होतं.तात्याच्या शेतात औत चालू हाय का नाही ते शेजारच्या शेतमालकाला ही कळून येत नसे.

शेजारचा राघूआबा तर तात्याला नेहमी म्हणायचा,

“आर!तात्या घरात कवा जातूस का नाय,पाहील तवा गोट्यातच‌ दिसतूस?”

“आर!घरांत बसून काय करायचं,जनावरांची सेवा केली तर तेवढंच पुण्य लागलं”

“तूझं  बेस हाय बाबा,तूझी बैलं तू जाशील तिथं मागणं येत्यात.तू दावं नाही धरलस तरी चालतंय.आमचा चित्र्या बघितलास का?घरातल्या सगळ्यांच्या अंगावर येतोय.काय करावं ते कळतच नाही बघ.”

“हे बघ त्येला मारू तेवढा नगस.बघ आपोआप त्येचा राग थंड होतोय का नाय ते”

“तात्या तुझ्याकडं काय तरी जादू हाय बघ.तुला कुठलंही जनावर लई लबूद”

असं बरचं बोलण व्हायचं.पण तात्या नं कुठल्याच जनांवरावर केंव्हा चाबूक उगारला नाय.उलट एखादा बैलाला मारत असेल तर तो सोडवायला जायचा.

त्यामूळं गोटा अन तात्यातं एक प्रेमाचा धागा तयार झालावता.हे सारं पाहून त्याचा मोठा भाऊ बापू म्हणायचा,

“तूला भूक तरी लागते का नाय?का रोज घरातनं माणूस पाटवून द्यायचा तुला जेवायला बोलवायला?”

तात्याची गोट्याशी मैत्रीच होती तशी. तात्या भूक लागली तरच जेवायला घरी जायचा नायतर त्या मचाणावर पडून असायचा.

सकाळी वैरण आणायची. विहीरीवर आंघोळ करायची की परत गोट्यात. भूक लागली की तात्या घरांकडं जायचा. एखादवेळी तेभी विसरायचा. मग तात्याची बायकू धडप्यातनं जेवाण घेवून याची. तात्याचं घर अन गोटा फार लांब नव्हता. सारं काम झालं तरी तात्या उगाच गोट्यात बसून असायचा हे बायकोला ठावं होतं.

आज नेहमीप्रमाणेच तात्याची बायको जेवाण घेवून आली.

“न्हवं!”

“काय गं?”

“आता तूमाला काय बोलायची सोय राहीली नाय.लगीन माझ्याबरं लावलयं का त्या गोट्याबरं?”

ह्या प्रश्नानं तात्या खरंच हसला.

“अगं!मी आलो नाय म्हणून रूसलीस व्हय! बरं झालं आल्यास ते.ये दोघं भी जेवू”

“जेवा तुमी,पण एक सांगाया आलेवते?”

तात्यानं कान टवकारले.

“बोल की?”

“आवं बापूसाब म्हणत्यात त्यो रूप्या आता म्हातारा झालाय.त्येला विकून टाकूया.”

हे ऐकल्यावर तात्याच्या डोळ्यांत पाणी आलं.त्यानं पुढली भाकरी बाजूला सारली.

क्रमश: …..

  – मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेवेची गोष्ट ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ सेवेची गोष्ट ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

आमचे वडीलोपार्जित घर भोपाळ मध्ये होते आणि मी कामासाठी चेन्नई  येथे राहत होतो. अचानक एक दिवस घरून वडीलांचा फोन आला ताबडतोब निघून ये, महत्त्वाचे काम आहे. मी घाईघाईने रेल्वे स्टेशनवर पोहोचलो व रिझर्वेशनचा प्रयत्न केला, पण उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे एकही जागा शिल्लक नव्हती.

समोरच्या प्लॅटफॉर्मवर ग्रँड ट्रंक एक्सप्रेस गाडी उभी होती, पण त्यातही बसायला जागा नव्हती. कोणत्याही परिस्थितीत घरी जायचे होते, त्यामुळे मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, समोरच्या साधारण श्रेणीच्या डब्यात घुसलो. मला असे वाटले की एवढ्या गर्दीत रेल्वेचा  टि.सी. काही बोलणार नाही.

डब्यात कुठे जागा मिळते का, हे बघण्यासाठी मी इकडे तिकडे बघितले. तर एक सज्जन गृहस्थ बर्थवर झोपले होते. मी त्यांना, “मला बसायला जागा द्या” म्हणून विनंती केली. ते सज्जन उठले, माझ्याकडे पाहुन हसले व म्हणाले, “काही हरकत नाही आपण येथे बसू शकता.”

मी त्यांना धन्यवाद दिले व तिथेच कोपऱ्यात बसलो. थोड्याच वेळात गाडीने स्टेशन सोडले व गाडी वेगाने धावू लागली. डब्यामध्ये प्रत्येकाला व्यवस्थित जागा मिळाली होती. प्रत्येकाने आपापले जेवणाचे डबे आणले होते, ते उघडून सर्वांनी जेवायला सुरुवात केली. डब्यामध्ये सर्वत्र जेवणाचा वास दरवळला होता. डब्यातील माझ्या सहप्रवाशाशी संवाद साधण्याची चांगली वेळ आहे असा विचार करून मी माझा परिचय करून दिला,  “माझ नाव आलोक आणि मी इस्रो ( ISRO ) मध्ये शास्‍त्रज्ञ आहे. आज अचानक मला गावी जावे लागत आहे, म्हणून या साधारण श्रेणीच्या डब्यात मी चढलो. अन्यथा मी ए.सी.डब्ब्याशिवाय प्रवास करत नाही.”

ते सज्जन गृहस्थ माझ्याकडे पाहून हसले व म्हणाले, “अरे वा ! म्हणजे माझ्या बरोबर आज एक शास्त्रज्ञ प्रवास करीत आहेत. ते म्हणाले, “माझ नाव जगमोहन राव आहे. मी वारंगळ येथे चाललो आहे. तिथे जवळच्या एका गावामधे मी राहतो. मी बऱ्याच वेळा शनिवारी घरी जातो.”

एवढे बोलून त्यांनी आपली बॅग उघडली व त्यातून आपला जेवणाचा डबा काढला व म्हणाले, “हे माझ्या घरचे जेवण आहे, तुम्ही घेणार का?”

माझ्या संकोची स्वभावामुळे, मी नकार दिला व माझ्या बॅग मधील सँडविच काढून, खाऊ लागलो.

खाताना मी मनाशीच विचार करीत होतो की, ‘जगमोहन राव ‘ हे नाव मी कुठेतरी ऐकल्या सारखे वाटतेय, पण आठवत नाही.

काही वेळातच सर्व लोकांची जेवणे झाली व सगळे झोपण्याची तयारी करू लागले. माझ्या समोरच्या बर्थवर एक कुटुंब होते. आई वडील व दोन मोठी मुले होती. ते पण झोपण्याच्या तयारीला लागले आणि मी एका बाजूला बसून मोबाईल मधील गेम खेळू लागलो.

रेल्वे वेगात धावू लागली होती. अचानक माझे लक्ष समोरच्या बर्थवर झोपलेल्या 55 – 57 वर्षाच्या त्या सज्जन गृहस्थाकडे गेले, तर ते तळमळत होते व त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. त्यांचा परिवार घाबरून जागा झाला व त्यांना पाणी पाजू लागला. पण ते गृहस्थ बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मदतीसाठी मी जोराने ओरडलो, “अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. इमर्जन्सी केस आहे.”

पण रात्रीच्या वेळी स्लीपर श्रेणीच्या डब्यात डॉक्टर कुठला मिळणार? त्यांचा सारा परिवार त्यांची असहाय्य अवस्था पाहून रडायला लागला. तेवढ्यात माझ्या सोबतचे जगमोहन राव जागे झाले व त्यांनी मला विचारले, “काय झाले?”

मी त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. त्यांनी ताबडतोब आपली बॅग उघडली. त्यातून स्टेथोस्कोप काढला व त्या गृहस्थाला तपासू लागले.

काही मिनिटातच त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरले, परंतु ते काही बोलले नाहीत. मात्र त्यांनी आपल्या बॅगेतून इंजेक्शन काढले आणि त्या गृहस्थाला छातीत इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांच्या छातीवर दाब देऊन, तोंडाला रुमाल लावून त्यांनी तोंडावाटे त्याला श्वास देण्यास सुरुवात केली. काही वेळातच, त्या श्वासोच्छ्वासामुळे त्या गृहस्थांचे तडफडणे कमी झाले.

नंतर जगमोहन रावांनी आपल्या बॅगमधील काही गोळ्या त्या गृहस्थांच्या मुलाला दिल्या व सांगितले, “तुम्ही घाबरू नका. तुमच्या वडिलांना गंभीर हार्ट अटॅक आला होता पण मी इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा धोका आता टळला आहे. त्यांना आता या गोळ्या द्या.”

त्या मुलाने आश्चर्याने विचारलं, “पण आपण कोण आहात?”

ते म्हणाले, “मी एक डॉक्टर आहे. मी एका कागदावर त्यांच्या तब्येतीची माहिती व औषध लिहून देतो.  कृपया तुम्ही पुढच्या स्टेशन वर उतरा व त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा.”

त्यांनी आपल्या बॅगमधून एक लेटर पॅड बाहेर काढले व लेटर पॅड वरील माहिती वाचल्यावर मला आठवले.

त्यावर छापले होते – डाॅ.जगमोहन राव, हृदय रोग तज्ञ, अपोलो हॉस्पिटल, चेन्नई.

आता मला आठवले की, काही दिवसांपूर्वी मी माझ्या वडिलांना अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता घेऊन गेलो होतो, तेव्हा डॉक्टर जगमोहन रावांबद्दल ऐकले होते. त्या हॉस्पिटल मधील, ते सर्वात हुशार व वरिष्ठ हृदयरोग तज्ञ होते. त्यांची अपॉइंटमेंट घेण्याकरिता कित्येक महिने लागत असत. मी आश्चर्यचकित नजरेने त्यांच्याकडे पहात होतो. एवढा मोठा डॉक्टर रेल्वेच्या साधारण डब्यातून प्रवास करीत होता. आणि मी एक छोटा शास्त्रज्ञ – मी ए.सी. शिवाय प्रवास करत नाही अशा बढाया मारत होतो. आणि हे एवढे असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व असूनही सामान्य माणसासारखे वागत होते!

एवढ्यात पुढचे स्टेशन आले व ते आजारी गृहस्थ आणि त्यांचा परिवार टि.सी.च्या मदतीने खाली उतरले.

रेल्वे पुन्हा सुरू झाली. मी उत्सुकतेने त्यांना विचारले, “डॉक्टर! आपण तर आरामात ए.सीच्या डब्यातून प्रवास करू शकला असता, मग या सामान्य डब्यातून प्रवास का करता ?”

ते हसून म्हणाले, “मी जेव्हा लहान होतो, गावाकडे राहत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की रेल्वेमध्ये विशेषतः सेकंड क्लासच्या डब्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे मी जेव्हा गावी जातो किंवा प्रवासाला जातो तेव्हा सामान्य डब्यातून प्रवास करतो. कारण कुणाला कधी डॉक्टरची गरज लागेल सांगता येत नाही. आणि मी डॉक्टर झालो ते लोकांची सेवा करण्याकरताच. आम्ही कोणाच्या उपयोगी पडलो नाही तर मग आमच्या शिक्षणाचा काय फायदा?”

नंतरचा प्रवास मी त्यांच्याशी गप्पा मारतच केला. पहाटेचे चार वाजले होते. वारंगल स्टेशन जवळ आले होते. ते उतरून गेले व बाकीचा प्रवास मी त्यांच्या सीटकडून येणाऱ्या सुगंधामध्ये न्हाऊन निघत पूर्ण केला. येथे एक महान माणूस बसलेला होता, जो हसत खेळत लोकांची दुःख वाटून घेत होता, प्रसिद्धीची हाव न बाळगता निरपेक्षपणे जनसेवा करीत होता.

आत्ता माझ्या लक्षात आले की डब्यात इतकी गर्दी असूनही हा सुगंध कसा काय जाणवत होता. तो सुगंध दरवळत होता त्या महान, असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आणि एका पवित्र मनाच्या आत्म्याचा, ज्याने माझे विचार आणि जीवन दोन्ही सुगंधित करून टाकले होते.

म्हणूनच तर, “जसे आम्ही बदलू, तसे जग ही आपोआपच बदलेल.”

__♥️__

संग्राहिका :सुश्री प्रतिमा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चांगले कर्म ☆ संग्राहिका: सुश्री विमल माळी ☆

? जीवनरंग ❤️

☆ चांगले कर्म ☆ संग्राहिका: सुश्री विमल माळी ☆

एक स्त्री दररोज रोजच्या  स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते.एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज तिच्या दारात येऊन तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी  म्हणत असे ..

“तुमचं वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील, आणि तुम्ही केललं चांगलं  कर्म तुमच्याकडे परत येईल.”

तिला वाटायचं,चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायचं सोडून हा भलतंच काही तरी म्हणतोय.

तिने वैतागून ठरवलं… याला धडा शिकवलाच पाहिजे .

तिने एके दिवशी चपातीत विष कालवले आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली.त्याक्षणी तिला वाटले… ‘हे मी काय करतेय?’ असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तिने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली.

नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला, “तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहील आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल”.आणि तो चपाती घेऊन गेला.

*तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची. खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती.त्या दिवशी तो अचानक आला. दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं.त्याचे कपडे फाटलेले होते . त्याला भूक लागली होती. आईला बघताच मुलगा म्हणाला “आई, मी इथं पोहोचलो एका  लंगड्या बाबांच्यामुळे.मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे  बाबा आले , मी त्यांच्याकडे खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली. तो बाबा  म्हणाला “रोज मी हेच खातो, आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे”.हे  ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला. तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर… तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता.

आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.’तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येतं’.

 

संग्राहिका :सुश्री विमल माळी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्हिलचेअर…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ❤️

? व्हिलचेअर…. अनामिक ? प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

विवियाना मॉल मध्ये रविवारी संध्याकाळची वेळ म्हणजे तरुणांची गर्दीची वेळ.. त्यांचा चिवचिवाट, भरलेले कॉफी हाऊसेस, सेल्फी टाईम.

अशा गर्दीच्या वातावरणात चटकन नजर गेली ती एका व्हीलचेअर वर एका आजीबाईंना प्रेमाने नेणारा एक माणूस आणि सोबत 12-13 वर्षाचा एक मुलगा.. मी आणि माझी मैत्रीण तिथे एका बाजूला बाकावर बसलो होतो. आम्ही बघत होतो.. व्हीलचेअर ढकलत तो माणूस त्या आजीबाईंना इकडून तिकडे नेत होता आणि त्याचा मुलगा ही त्याच्या सोबत होता..

 5 मिनिटांतच तो माणूस त्या आजींची व्हीलचेअर आमच्या अगदी बाजूला आणून उभं करून त्या मुलाशी इंग्रजीत बोलत होता. “मी ATM मधून पैसे काढून 1, 2 कामे करून येतो, तू आजी जवळ थांब” असं सांगून निघून गेला.

त्या आजी आमच्याकडे थोडं बघून हसल्या.. दोन – तीन मिनिटं गेली आणि हिंदीत मला सांगू लागल्या.. “हा माझा नातू. मुलाचा मुलगा, आणि तो गेला नां पैसे काढायला तो माझा मुलगा.. आम्ही ठाण्यातच राहतो.. आज ‘सुईधागा’ सिनेमा बघायला आम्ही आलो. सुनेला तिच्या कॉलेज ग्रुप बरोबर बाहेर जायचं होतं, मग माझ्या मुलांनी आमचा हा बेत जुळवून आणला..”

नकळत माझ्या तोंडून “अरे वाह!”  निघून गेलं..

आजी पुढे सांगू लागल्या… माझं वय 73 आहे.. मला चालता येत नाही म्हणून ही खुर्ची आणि ही फोल्डिंग काठी.. सिनेमा, नाटक बघायला जायचं तर थिएटर मध्ये काळोख व्हायच्या आत आम्हाला आत शिरावं लागतं. म्हणून मी कुठे जायचं म्हणजे माझी वरातच असते.. पण मुलगा, सून ऐकत नाहीत..

अजून दोन मुलं आहेत मला.. पण ते मला सांभाळायला तयार नाहीत.. हा मुलगा सायकॉलॉजिचा प्राध्यापक आहे. तो मला आनंदाने सांभाळतो.. दुसरी भावंडे सांभाळत नाहीत, त्या बद्दल त्याचा आकस नाही. मला माझा मुलगा थिएटर मध्ये काळोख व्हायच्या आतच घेऊन येतो.

आज आम्ही बाहेर जेवून सिनेमाला गेलो.. आता मॉल मध्ये या खुर्चीतून मला फिरवतो.. मी नको म्हणत असताना त्याचं म्हणणं.. ‘बघ नं जग किती बदललंय. सुंदर गोष्टीही आहेतच. असं फिरलीस, चार माणसं बघितलीस की तुझं मन व शरीर ही फ्रेश होईल. मी मनाचा अभ्यास केलेला माणूस आहे म्हणूनच सांगतोय.'”

हे सांगत असताना त्यांचा मुलगा काम आटपून परत आला.. आजीबाई माझ्याशी बोलत असलेल्या बघून त्यांनी त्यांना हिंदीत मला निर्देश करून विचारलं, “कौन है? किससे बात कर रही हो मम्मा..?”

आजीबाईंनी लगेच सांगितलं, “यहिपे बैठी थी। ऐसे ही मैने बात की उससे।”

मला वाटलं, हा माणूस वैतागेल. कोण कुठली ही बाई ! पण त्यांनी चक्क हसून मला जे सांगितलं त्यावर मी थक्क झाले.

ते म्हणाले, “आम्ही आईला दर महिन्याला एकदा असं बाहेर फिरवून आणतो.. रोज आम्ही व्यस्त असतो. मग एक दिवस तिला असं बाहेर घेऊन येतो. माझे वडील असतांनाही आम्ही हेच करायचो. ते नाहीत आता.. आज माझी बायको नाही येऊ शकली, नाहीतर आम्ही तिघे येतो. एक दिवस तिला देतो. कधी सिनेमा, नाटक, ते नाही जमलं तर संध्याकाळी तरी काहीतरी प्लॅन करतो आणि तिला फ्रेश व्हायला मदत करतो. त्यामुळे तिची तब्बेत चांगली राहायला मदतच होते ना.”

आम्हाला त्यांनी धन्यवाद म्हटलं, “माझ्या आईला तुमची सोबतच झाली” म्हणून ते तिघेही निघून गेले नि मी आणि माझी मैत्रीण सुन्न झालो. अरे किती नशीबवान या आजी..

कुठे ही परिस्थिती नी कुठे ‘आईवडील नकोत’ ही भावना जोपासणारी काही मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात..  समाजात एकाच परिस्थिती बाबत दोन भिन्न बाजू दिसल्या.

वय झालं आहे.. चालता येत नाही.. गर्दीत कुठे न्यायचं.. असा विचार न करता हा आजींचा मुलगा, सून आणि नातू ही यांच्या लेखी ‘आई म्हातारी झाली पण मी नेईन, तिला आनंद मिळावा’ ही भावना..

अशी ही माणसं समाजात आहेत हे बघून आम्हां दोघींना खरंच खूप बरं वाटलं. आणि किती तरी वेळ आम्ही शांत पणे त्या तिघांच्या पाठमोर्‍या आकृती कडे शांतपणे बघत होतो आणि डोळे कधी पाणावले कळलंच नाही…

@अनामिक.

??️?

सुश्री संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 4 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 4 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

‘मी गेले तीन वर्षे कॉलेजला जात आहे पण माझा एकही मित्र काय एकही मैत्रीण सुद्धा नाही. ‘ चिन्नू सांगत होती. जर मी कोणाशी मैत्री केली असती, तर काही दिवसांनी त्यांना माझी खरी ओळख ‘कचरेवाल्याची मुलगी’ ही  कळली असती. त्या ओळखीची मला लाज वाटत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला नावे असतात आणि आम्हीही माणूस म्हणूनच जन्माला आलो आहोत याचा लोकांना विसर पडलेला असतो. आज मी कितीही चांगले मार्क्स मिळवून कॉलेजमधून पहिली आलेव, तर उद्या न्यूज पेपरला हेडिंग येणार ‘एका कचरेवाल्याची मुलगी पहिली आली’. आमची ओळख तेवढयापुरतीच सिमीत रहाते. पुढे मी तुमचा स्विकार केला काय किंवा दुसऱ्याशी लग्न केले काय तरी सगळ्यांसाठी, तुमच्या घरच्यांसाठी माझी ओळख ही एक कचरेवाल्याची मुलगी म्हणूनच राहणार आणि म्हणूनच मला खूप शिकून अवकाश शास्त्रज्ञ व्हायचे आहे. मलाच माझे नाव मोठे करून माझ्या खऱ्या नावाने जगायचे आहे.” चुन्नीने मनापासून तिच्या मनातली सल रवीला बोलून दाखवली.

चुन्नीने रवीच्या प्रेमाचा स्वीकार नाही केला तरी रवीच्या  डोक्यातून काही चुन्नी जात नव्हती. तिच्या विचाराने रवी अधीकच प्रभावित झाला होता. त्याला ह्यातून काहीतरी मार्ग काढावासा वाटत होता. दोन दिवस सतत त्याच्या डोक्यात चुन्नीचाच विचार चालू होता आणि त्याने एक वेगळाच मार्ग निवडला.

चुन्नीच्या नकाराने अस्वस्थ झालेल्या रवीने दुसऱ्याच दिवशी आपल्या आईवडिलांना सांगितले, मला काही येथे रहायला आवडत नाही. माझे सगळे मित्र मैत्रिणी अमेरिकेत आहेत तर मी परत अमेरिकेत जातो आणि आपले अमेरीकेतील ऑफिस सांभाळून मी आपल्या निर्यात वाढीवर जोर देईन. रवीच्या ह्या निर्णयाचे त्याच्या घरून स्वागतच झाले. पुढच्या आठवड्यात रवी परत अमेरिकेत परतला. अमेरिकेत स्वतःचे बस्तान  बसविल्यानंतर त्याच्या डोक्यात चुन्नीचे विचार चालू झाले. तसे दोन एक दिवसातून तिच्याशी चाट करणे त्याचे चालूच होते आणि त्यातूनच त्याने चुन्नीला अमेरिकेत शिक्षणासाठी येण्याचे सूचित केले. चुन्नीला तिच्या शिक्षणासाठी अमेरिकेचा विचार करणे म्हणजे जरा जोकच वाटला पण रवीने तिला मार्गदर्शन करून स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करायला लावले. रवीही  तिकडून तिला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची माहिती पुरवीत होता. दोघांच्या प्रयत्नाला यश येऊन थोड्याच दिवसात चुन्नीला तिच्या पुढील शिक्षणासाठी चांगल्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली. तिला तिथे स्कॉलरशिप मिळेल ह्याची रवीने सोय केली. आता प्रश्न होता विमानभाड्याचा. तेवढे पैसे काही चुन्नीकडे नव्हते. त्यासाठीही रवीनेच तोडगा काढला. स्वतःच्याच अमेरिकेतल्या कंपनीत तिला अर्धवेळ काम देऊन तिचा व्हिसा आणि तिकीट पाठविले. रवीने चुन्नीच्या मनातील अवकाश शास्त्रज्ञ होण्यासाठीचा मार्ग सुकर केला होता.

आता त्याला खात्री होती अमेरिकेत चुन्नीला कचरेवाल्याची मुलगी असे न ओळखता सगळे चुन्नी या नावानेच ओळखतील आणि ती शास्त्रज्ञ झाल्यावर जर तिला वाटले तर रवीशी नाहीतर कोणाशीही लग्न करून भारतात जाईल तेंव्हा चुन्नीची ओळख ही एक कचरेवाल्याची मुलगी अशी न रहाता शास्त्रज्ञ चुन्नी अशी असेल आणि मुन्ना वाल्मिकी ह्या कचरेवाल्याची ओळख एका शास्त्रज्ञ मुलीचा बाप अशी होईल. 

खरचं मनात असले तर कुठच्याही कठीण प्रसंगात, आहे त्या परिस्थितीत मार्ग  काढता येतो…..फक्त नीट विचार करून समोर आलेल्या प्रश्नाला संयम ठेऊन सामोरे जायला लागते….. अगदी आपल्या रवी सारखे.

समाप्त

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

दुपारी २.३० वाजता दारावरची बेल वाजली. रामूकाकानी दरवाजा उघडला. रवीने तिला आत बोलाविले. सोफ्यावर  बसवले. रामूकाकानी पाण्याचा ग्लास भरून आणून तिच्या हातात न देता पुढे असलेल्या टेबलावर ठेवला. रवीच्या निदर्शनात ते आले तसे रवीने पुढे होऊन तो पाण्याचा ग्लास पुन्हा उचलला आणि तिच्या हातात दिला. तिच्या चेहऱ्यावर जराशी स्मितरेषा झळकली. तिच्या समोरच्या सोफ्यावर रवी बसला. ती आजूबाजूला बघून घर निरखत होती.

“बोला साहेब काय विचारायचे आहे ? ” तिनेच बोलायला सुरवात केली. रवीने तिला पहिले तिचे नाव विचारले. ती काही न बोलता काही वेळ रवीकडे बघत राहिली.

 रवीने परत विचारले, ” काय झाले ? ” तिच्या डोळ्यात पाणी आले होते. तिने एक आवंढा गिळून बोलायला सुरवात केली. ” साहेब मी आता काहीच दिवस माझे वडील आजारी आहेत म्हणून कचरा न्यायला येते पण माझे वडील गेले पंचवीस वर्षे ह्या भागातला  कचरा गोळा करतात पण त्यांनाही आज पर्यंत कोणी त्यांचे नाव विचारले नाही. आम्हा लोकांना जे कचरा गोळा करतात त्यांना कचरेवाला किंवा कचरेवाली हीच नाव असतात. कितीही पाऊस असला  किंवा आणखी काही  असले तरी आम्ही काम करतोच. आम्हाला सुटी नाहीच. कुठलाही सण असला तरी तो  घरी साजरा करायच्या आधी आम्ही दुसऱ्यांच्या घरचा कचरा गोळा करत असतो॰ तरीही कोणीही आम्हांला नावाने ओळखत  नाहीत. तुम्ही पहिले आहात, माझे काम माहिती असूनही माझे नाव विचारले. तर माझे नाव चिन्नू मुन्ना वाल्मिकी. आमची पूर्ण जमात ह्याच कामामध्ये आहे. आमच्या आधीच्या पिढ्यांनीही हेच काम केले आहे. कोणीतरी  हे काम केलेच पाहिजे ते काम आमची जमात करत असते आणि ते ही अविरत पिढ्यान पिढ्या.”  रवीला तिच्या बोलण्यातले तथ्य जानावाले.

पुढचा अर्धा तास रवी आणि तिचे बोलणे चालले होते. तिच्या बोलण्यातून तिचा स्वतः वरचा आत्मविश्वास दिसत होता. लहानपणापासून रात्री झोपतांना मोकळे आकाश बघत आलेल्या चिन्नूला आकाशाचे विलक्षण आकर्षण होते आणि त्यामुळेच कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चिन्नूला अवकाश शास्त्रज्ञ व्हायचे आहे. पुढच्या वर्षीपासून तिला कचरा व्यवस्थापन डिप्लोमा कोर्स ही चालू करायचा आहे. रवी तर सगळे चिन्नूचे विचार आणि तिची बोलायची पद्धत ऐकून खुश झाला होता. त्याने रामुकाकांना सांगून चिन्नूसाठी जेवायला वाढायला सांगितले पण चिन्नूने त्याला नकार देऊन म्हंटले, ” साहेब नका वागू असे. नंतर तुमच्या घरच्यांना कळले की एक कचरेवाली तुमच्या घरात येऊन जेऊन गेली तर खूप अनर्थ होईल. माझ्या वडिलांचे नुसते तुमच्या घरचे नाही तर तुमच्या संपूर्ण सोसायटीचे काम जाईल. तेंव्हा प्लिज असे काही करू नका. आम्ही तुमच्या सगळ्यांपासून खूप लांब आहोत ते बरे आहोत. कृपया आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न करू नका. मला आणि तुम्हांला, आपल्या दोघांनाही त्याचा खूप त्रास होईल.”

चिन्नू जे सांगत होती ते बरोबर होते. रवीच्या मगाशीच निदर्शनात आले होते की चिन्नूला घरात घेतली तेंव्हा रामूकाकांना ते आवडले नव्हते. रवीने काहीतरी वेगळे केले अशा नजरेने त्यांनी बघितले होते. रवीने पुढची काही मिनिट्स तिला स्वतःची ओळख करून देऊन त्याच्या शिक्षणाबद्दल सांगितले आणि तिचा मोबाईल नंबर घेऊन तिला स्वतःचा मोबाइल नंबर दिला.

पुढे एक आठवडा त्यांचे दिवसातून चार ते पाच वेळेला फोनवरून बोलणे होत होते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती  रवीला आवडायला लागली होती. तिच्या ध्येयपूर्ती करण्यासाठी चाललेल्या वाटचालीत रवीला तिला मदत कराविशी वाटत होती आणि खूप विचारांती एकदा रवीने तिला भेटून एका कॉफी रेस्टारंट मध्ये कॉफी प्यायला नेले. प्रथम कॉफीला नकार देणारी चिन्नू रवीच्या अती आग्रहामुळे तयार झाली. हॉटेल मध्ये बसल्यावर चिन्नूनेच सुरवात केली, “साहेब, काय झाले, माझ्या प्रेमात वगैरे पडला नाहीत ना! तसे असेल तर स्वतःला सावरा.” तिच्या ह्या बोलण्याने रवीने डायरेक्ट विषयाला हात घातला, ” चिन्नू, खूप विचार करून मी तुला विचारतोय, तुला प्रपोज करतोय, मला तू पहिल्यावेळी बघितल्या क्षणीच आवडली होतीस आणि गेले काही दिवस तुझ्याशी बोलून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. माझ्याशी लग्न करशील का ? “

रवीचे बोलणे ऐकून चिन्नू जरा जास्तच सिरिअस झाली. एकटक रवीकडे बघून तिने संथ लयीत बोलायला सुरवात केली,  “साहेब जरा स्वतःला सावरा. तुम्ही नुकतेच अमेरिकेत शिकून आला आहात. तुमच्या समोर तुमचा तयार फॅमिली बिझनेस आहे. तुमच्या घरचे तुमची तुम्ही त्यांच्या बिझनेसला सामील होण्याची वाट बघत आहेत आणि तुम्हाला हे विपरीत काय सुचतंय. साहेब आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही जिला आत्ता प्रपोज करत आहात, तीची ओळख सगळ्यांसाठी कचरेवाल्याची मुलगी अशी आहे. त्यामुळे उगाच नको त्या भानगडीत पडू नका. चक्रव्यूह भेदायला शिरायच्या आधीच जरा स्वतःला आवरा. स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नका.  मी काही तुमच्या प्रेमाचा स्विकार करू शकत नाही.

क्रमश:….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

दुसर्याल दिवशी रवी सकाळी लवकर उठून तयार होऊन बसला. नेहमीप्रमाणे सगळे आपापल्या कामाला बाहेर पडले तसे त्याने रामूकाकांना काहीतरी आणायला बाहेर पाठविले आणि ती कचरेवाली यायची वाट बघत बसला. ठराविक वेळेला घरच्या बेलचा आवाज आला. त्याने लगेच दरवाजा उघडला. तीच होती. तिचे निखळ सौंदर्य कालच्यापेक्षा आज जास्तच उठून दिसत होते. पिवळा पंजाबी ड्रेस आणि त्याच कलरची ओढणी तिने तिच्या डोक्यावरून घेतला होता. कपाळावर बारीक  पिवळ्या रंगाची टिकली लावल्यामुळे शालीनता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. कालच्यासारखेच तिने, ” साहेब कचरा” असे म्हंटले. रवीने कचरा आणून दिला आणि तिला विचारले, ” जरा तुझ्याशी बोलायचे होते. तुझे नाव काय आहे?” रवीने बोलायला सुरवात केली.

तिने एकच क्षण रवीकडे बघितले आणि गालातल्या गालात हसत म्हणाली, ” साहेब मला बोलायला वेळ नाही. साडे दहा वाजेपर्यंत मला सगळ्यांचा कचरा जमा करायचा असतो. ती कचऱ्याची मोठी गाडी एकदा येऊन गेली तर माझी पंचाईत होईल.” रवी थोडा हिरमुसला पण लगेच त्याने तिला सांगितले, ” तू मोकळी झाली की येशील का ? तुझ्याविषयी मला खूप जाणून घ्यायचे आहे. तुझ्या बद्दलचे खूप प्रश्न माझ्या मनात आहेत. तू तुझी सगळी कामे आटपून येऊ शकशील का ? ” भराभर बोलत रवीने तिला सांगितले तिनेही लगेच उत्तर दिले, ” आज तरी नाही जमणार साहेब. नंतर मला कॉलेजला जायचे आहे. रविवारी वेळ  काढता येईल. तेंव्हा बघू. ” आणि ती तिचे नावही न सांगता  तशीच गेली.

रामूकाका बाहेरून आल्यानंतर रवीने त्यांच्याकडे कचरेवाल्याचा विषय काढला. तो कुठे राहतो, त्याच्याघरी कोण कोण आहेत ह्याची माहिती काढण्याचा रवीने प्रयत्न  केला पण रामूकाकानाही कचरेवाल्याबद्दल काहीच माहित नव्हते. तो रोज सकाळी येतो आणि काही न बोलता दिलेला कचरा त्याच्या डब्यातून  घेऊन जातो. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीनशे रुपये घेऊन जातो. कधीही खाडा करत नाही.  एवढीच माहिती रवीला मिळाली.

दुसऱ्या दिवशी ती कचरा न्यायला आल्यावर रवीने तिला सांगितले, “आज तुझे कचरा गोळा करण्याचे काम झाल्यानंतर कॉलेजला जाताना मी तुझ्याबरोबर येऊ का ? तू कॉलेजला जातांना आपल्याला बोलता येईल.” तिने आज गालातल्या गालात हसत उत्तर न देता जरा खडसावूनच विचारले,” साहेब, एवढे काय काम काढलेत. अहो मी साधी कचरेवाली आहे. कचरेवाल्याची मुलगी. माझ्याकडे कसले तुमचं काम. साहेब आम्ही लहान जातीतले असलो तरी आम्हालाही इज्जत आहे. तुमच्या बरोबर मला कोणी बघितले तर लोक काहीतरी वेगळेच समजतील. तुमच्याही सोसायटी आणि समाजात तुमची नालस्ती होईल. तुम्हांला खरेच काही बोलायचं असेल तर दुपारी २ वाजता कॉलेज सुटल्यावर मी येथेच येते पण ते तुमच्याकडे काका आहेत त्यांना घरीच असू दे. मग आपण सविस्तर बोलू.”

क्रमश:….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

सहा वर्षांनी रवी मुंबईतच नाही तर भारतात परत येत होता.  रवी सूर्यकांत घरवारे. घरवारे शिपिंग अँड क्लीअरिंग कॉर्पोरेशनचा पुढच्या पिढीचा वारसदार. लहानपणी उष्टावण सोन्याच्या चमच्याने झाले असल्याने पुढचा प्रवासही श्रीमंतीतच झाला. बंगल्यात त्याची वाढ झाली असली तरी त्याच्या डोक्यात श्रीमंती कधीच शिरली नाही. दहावी झाल्यावर पुढील पदवी अभ्यासासाठी त्याला अमेरिकेत पाठविण्यात आले आणि तो आज सहा वर्षांनी बिझनेस मॅनेजमेंटचे यशस्वी शिक्षण घेऊन भारतात परत आला होता. गेल्या सहा वर्षातला मुबईतला फरक त्याला जाणवत होता. स्वच्छतेबद्दल लोकांच्यात झालेली जागरूकता त्याला दिसत होती.

आता दोन आठवडे जरा आराम करून त्याला त्याच्या फॅमिली बिझनेस मध्ये सामील केले जाणार होते . तशी त्यांच्या प्रमुख ऑफिसमध्ये त्याच्यासाठी एक प्रशस्त अशी केबीन तयार करून ठेवली होती आणि ह्याची जाणीव रवीलाही देण्यात आली होती. लहानपणीपासून एक साचेबंद आयुष्य, ते पण भावनिक संबंधाला थारा न देता काढलेल्या रवीला  अमेरिकेत शिकायला गेल्यावर स्वतःच्या विचारांची प्रगल्भता वाढवायला पुरेसा वेळ मिळाला. श्रीमंत गरीब, जात पात ह्याच्या पुढचा विचार करून माणसांना माणूस म्हणून पहिले बघितले पाहिजे ह्याची त्याला जाणीव झाली होती आणि त्यामुळेच मुंबईत आल्यावर दोन दिवसानी असे काही घडले की त्याचे पुढचे सगळे आयुष्यच त्यामुळे बदलले.

विमानाचा लांबचा प्रवास करून आल्याने रवीचे  झोपायचे शेड्युल जरा बिघडले होते. रात्री उशिरा झोप आल्याने आज तो जरा जास्तच वेळ झोपला होता. घरातले सगळे म्हणजेच रवीचे आई वडील आणि मोठा भाऊ सगळे त्यांच्या नेहमीच्या वेळेत त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. रामूकाका जे खूप वर्षांपासून घरवारे फॅमिलीकडे कामाला होते तेच आता घरात होते. त्यांनाही बाहेरून भाजी आणण्यासाठी बाहेर जायचे होते पण रवी झोपला होता म्हणून ते ही खोळंबले होते. खूप वेळ वाट बघून रवी उठत नाही म्हणून ते दरवाजा बाहेरून ओढून घेऊन भाजीपाला आणायला मार्केटला गेले. त्याच वेळेमध्ये दरवाज्याशी कोणीतरी आले आणि दरवाजा उघडण्यासाठी बेल मारली. घरात रवी एकटाच होता पण तो झोपला असल्याने त्यालाही त्याच्या बेडरूममध्ये बेल ऐकू आली नाही. जेंव्हा  तिसऱ्यांदा बेल वाजली तेंव्हा रवीची झोपमोड झाली. डोळे चोळतच रवी बाहेर आला.  तो रामूकाकाना बघू लागला. पण ते न दिसल्याने तो दरवाज्यापाशी गेला. डोळे किलकिले करतच त्याने दरवाजा उघडला आणि समोर बघितल्यावर  त्याची नजर एकदम स्थिर झाली. कोणीतरी त्याच्यावर मोहिनी केल्यासारखा तो समोर एकटक नुसता बघतच राहिला. त्याच्या समोर एक त्याच्यापेक्षा दोन ते तीन वर्षांनी लहान असलेली, पंजाबी ड्रेस घातलेली, सुंदर मुलगी उभी होती. तिने चेहऱ्यावर काहीही लावले नव्हते तरी तिच्या चेहऱ्यावरील तेज ओसंडून वहात होते. समोर रवीला बघून तिच्या चेहऱ्यावरही जरा वेगळ्या छटा  उमटल्या.

“रामूकाका नाहीत का ? कचऱ्याचा डबा देता का ? “

तिने रवीला विचारले.

” कचऱ्याचा डबा ? का ? तुम्हाला का कचऱ्याचा डबा द्यायचा? आमचा कचरेवाला येतो रोज कचरा न्यायला  “

” तसे नाही साहेब. मी तुमचा कचरा न्यायला आले आहे. मी तुमच्याकडे येणाऱ्या कचरेवाल्याची मुलगी. माझ्या वडिलांना काल ब्लड प्रेशरचा त्रास झाल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले आहे. त्यामुळे काही दिवस मीच येत जाईन कचरा न्यायला. ” तिने रवीला सगळे उलगडून सांगितले. रवी परत घरात गेला आणि किचनमध्ये असलेला कचऱ्याचा डबा  घेऊन बाहेर आला. तिने तो डबा तिच्याकडे असलेल्या मोठ्या डब्यात उलटा केला आणि दोनवेळा तो डबा त्या मोठ्या डब्यावर आपटून रवीला परत दिला आणि थँक्स म्हणून ती उलटी फिरली. रवी ती दिशेनासी होईपर्यंत बघतच राहिला. जे काही आत्ता त्याच्यासमोर घडले होते ते त्याच्यासाठी खूप वेगळे होते. कोण एक टापटीप असणारी सुंदर मुलगी येते काय आणि घरचा कचरा घेऊन जाते काय आणि जातांना वर त्यालाच थॅंक्सही म्हणून जातेकाय? तो पूर्ण दिवस रवीच्या डोळ्यांसमोरून तिचा तो सुदंर चेहरा काही जात नव्हता.

क्रमश:….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जुगार…. (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ जुगार…. (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘गावातील सद्दीलाल नावच्या व्यक्तीने आत्महत्या केली.’ वर्तमानपत्रात बातमी छापली होती. अनेक तर्हेलने चौकशी सुरू झाली. पत्रकारांची टीम सद्दीलालच्या घरी पोचली. त्यापाकी एकाने सद्दीलालच्या बायकोला विचारले,

‘सद्दीलाल काय करत होते?’

‘जुगार खेळत होते.’

काय? त्याला जुगार खेळण्याचं व्यसन होतं?’

‘होय! जुगारात हरत होते, तरीही पुन्हा पुन्हा जुगार खेळणं सोडत नव्हते.’

‘जुगारात हरल्यावर पैसे कुठून आणत होते?’

‘प्रथम माझे दागिने विकले. मग माझ्या घरातली भांडी-कुंडी गेली. मग जमीन गहाण ठेवून बॅँकेतून कर्ज घेतलं…. मग कृषी सोसायटीतून … मग सवकाराकडून…. जिथून जिथून कर्ज मिळणं शक्य होतं, तिथून तिथून त्यांनी कर्ज घेऊन त्यांनी ते पैसे डावावर लावले.’

‘जुगारात ते नेहमीच हरत होते की कधीमधी जिंकतही होते?’

दोन-चार वर्षात कधी तरी एखादी छोटीशी रक्कम जिंकतही होते.’

दोन-चार वर्षात?

‘होय. कधी गव्हाचा पीक चांगलं यायचं तर कधी कापसाचं.कधी ज्वारी किंवा डाळ, कधी आणखी काही…’त्यामुळे आशा वाटायची. उमेद वाढायची. वाटायचं, एखादं तरी वर्षं असं येईल की घातलेलं सगळं वसूल होईल. पण असं कधी झालं नाही. याच कारणासाठी ….’

‘म्हणजे सद्दीलाल शेती करत होता?…. शेतकरी होता?

‘शेतकरी… शेती हे शब्द आता जुने झालेत साहेब….आता आम्ही याला जुगार म्हणतो. खूप मोठा जुगार…. प्रत्येक वर्षी हजारो रुपयाचं बियाणं खरेदी करायचं, पिकाच्या उमेदीत हजारो रुपयाचं खत मातीच्या हवाली करायचं। झुडपांवर हजारो रुपयांचं औषध मारायचं., पाणी देण्यासाठी हजारो रुपये खर्च करायचे. ढोर मेहनत करायची. अचानक आलेल्या एखाद्या  विपत्तीमुळे उभं पीक नष्ट होणं … कधी पीक आलंच तर त्याचे भाव आम्ही नाही, दुसर्यावच कुणी तरी निश्चित करणं… त्यांची मर्जीने… हे सगळं जुगार नाही तर काय आहे?’

पत्रकाराची जीभ टाळूला चिकटली.

मूळ हिंदी  कथा – ‘जुआ’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हृदय मिलन – भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ हृदय मिलन – भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

त्याने लग्नाची मागणी घातली खरी. तो सर्व दृष्टीने उत्तम आहे, हेही खरे पण मग ‘मीच का?’ हा मोठा प्रश्न रजनीला झोप लागून देत नव्हता.

ठरल्याप्रमाणे गेला एक आठवडा ते रोज अर्ध्या तासासाठी भेटत होते. तो एकदाही लेट आला नव्हता. रजनी येण्याच्या आधी तो तेथे हजर असायचा. सुरवातीला साधे कपडे आणि तोंडाला हलकासा पावडरचा हात फिरवून कामाला जाणारी  रजनी रोज काहीतरी ठेवणीतले कपडे घालून आणि तोंडाला जरा पॉण्डस क्रीम आणि ओठांवर पुसटशी लिपस्टिक फिरवायला लागली. तिच्यातला तो बदल तिच्या आईच्या लक्षात आला होता तसे आईने तिला त्याबद्दल विचारले. तिच्या आयुष्यात जे काही घडत होते त्याबद्दल तिने जसेच्या तसे सर्व तिच्या आईला सांगितले. प्रथम तिच्या आईलाही धक्का बसला आणि तिने त्या मंगेश पराडकरला घरी घेऊन ये असा सल्ला दिला. रजनीने आईची समजूत काढून, ती हे प्रकरण व्यवस्थित हाताळत आहे ह्याची तिला खात्री दिली आणि लवकरच जर तिच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली तर ती आधी मंगेशला तिला भेटायला घेऊन येईल ह्याची  ग्वाही दिली.

पूर्ण आठवडा ते दोघे रोज भेटत होते. दोघेही आता एकमेकांशी मन मोकळे होऊन बोलत होते. रजनीने त्याच्या बद्दल काढलेल्या माहितीत काही वावगं असे तिला काहीच मिळाले नाही तर त्याच्या ऑफिसमधला त्याचा स्टाफ त्याला देवमाणूस मानत होते. आज तिला मंगेशला त्याने केलेल्या प्रपोजला उत्तर द्यायचे होते.

बरोबर २ वाजता मंगेशला  भेटायला ती स्टारबक्समध्ये आली. मंगेशने आज खूपच आकर्षक सूट परिधान केला होता. तो नेहमी सारखाच हँडसम दिसत होता. ती जाऊन त्याच्या टेबलावर बसली. दोन मिनिट्स दोघेही काही न बोलता एकमेकांकडे बघत होते. आज रजनीनेही तिची केस रचना वेगळी केली होती. तिच्या गालांवर एक वेगळाच ग्लो दिसत होता. आज नेहमीपेक्षा ती खूपच आकर्षक दिसत होती. दोघांमधली शांतता मंगेशनीच मोडली. ” काही बोलणार आहेस का अशीच बसणार आहेस. तुझ्या परीक्षेत मी पास  झालो की नाही. आज तू उत्तर देणार आहेस. मी खरंच तुझ्या उत्तरासाठी आतुर आहे. ” रजनी थोडी गंभीर झाली. जेंव्हा  ती आली त्यावेळच्या आणि आत्ताच्या तिच्या चेहऱ्यात फरक पडला. थोडा दीर्घ पॉज घेऊन रजनीने बोलायला सुरवात केली. ” मंगेश तुझ्याबद्दल जी मी माहिती काढली त्यामध्ये तू खरंच  एक उत्तम माणूस म्हणून पास  झाला आहेस. तुझ्यात असे काहीच वाईट नाही की ज्यामुळे तुला मी नकार द्यावा तरीपण आज तुला होकार द्यायची माझी हिम्मत होत नाही आणि त्याला कारण एकच आहे ते म्हणजे तू केलेली  माझी निवड. मीच का ? ह्या माझ्या प्रश्नाचे उत्तर तू मला आजपर्यँत दिलेले नाहीस आणि जोपर्यंत मला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तिथपर्यंत माझ्या होकाराची अपेक्षा करू नकोस. जे काही असेल ते खरे सांग आज….. ह्या वेळे नंतर परत तुला कधीच तो चान्स मिळणार नाही. तू निवडलेली मुलगी मीच का ? “

मंगेशही गंभीर झाला. ” रजनी ते मी तुला सांगणारच आहे पण ते सांगण्याचे मी थोडे टाळत होतो पण तुझेही बरोबर आहे. तुझी माझी ओळख नसताना, तुला शोधून काढून, तुला तडक लग्नाची मागणी घालतो. का ? तुलाच का ? हा तुला पडलेला प्रश्न रास्त आहे. त्यासाठी तुला माझ्याबरोबर थोडे भूतकाळात यावे लागेल. गेले वर्षभर मी माझ्या हृदयाच्या दुखण्याने आजारी होतो. खूप स्पेशालिष्ट डॉक्टरांची फौज माझ्यावर उपचार करत होती आणि शेवटी माझ्या हृदयाचे प्रत्यारोपण  करणे हा एकच उपाय होता नाहीतर फक्त तीन महिन्यांचे माझे आयुष्य होते. थोड्याच वेळात नवीन हृदय मिळणे तेवढे सोप्पे नव्हते आणि माझ्या आयुष्यात चमत्कार झाला. एका देवीने तो चमत्कार केला. एक अल्पशा आजाराने  देवाघरी गेलेल्या तिच्या वडिलांचे हृदय त्या मुलीच्या निर्णयामुळे हृदयदान केले गेले. त्या दानशूर माणसामुळे माझ्या हृदयाचे प्रत्यारोपण झाले. आज जे काही माझे पुढचे आयुष्य माझ्या वाटेला आहे ते मला त्या मुलीच्या म्हणजेच तू… रजनी… तुझ्यासाठी जगायचे आहे. पहिल्या भेटीत मला तुझे फक्त आभार मानायचे होते पण तुला भेटल्यावर तुझा साधेपणा, तुझा खरेपणा, माझे व्हिजिटिंग कार्ड बघून सुद्धा तुला त्याचे काहीच न वाटणे ह्यामुळे मी तडक तुझ्याशी  लग्न करायचाच विचार केला. त्या निमित्ताने जिच्यामुळे, जिच्या वडिलांमुळे मला माझे नवीन आयुष्य मिळाले ती कायम माझ्याबरोबर असणार आणि जिने आपल्या सर्वात प्रिय असलेल्या तिच्या वडिलांना गमावले तिला तिच्या वडिलांच्याच हृदयाजवळ रहायला मिळेल ह्या साठीच मी फक्त तुझीच निवड केली पण आता गेला आठवडा तुला रोज भेटून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. भले माझे आत्ताचे हृदय माझे असले तरी त्यावर पहिला हक्क तुझा आहे. माझ्या हृदयाचा आता तूच सांभाळ कर. कृपया माझा स्विकार कर.”

मंगेशच्या डोळयांत पाणी होते. रजनीला तर गेल्या सहा महिन्यांपूर्वी घडलेले ते हॉस्पिटलमधले दृश्य डोळ्यासमोर  आले. जेंव्हा डॉक्टरनी तिला तिचे वडील गेल्याचे सांगितले  तेंव्हा त्यांनी तिला त्यांचे ह्रदयदान करण्याविषयी विचारणा केली आणि रजनीने त्याचे महत्व ओळखून त्यांनी दिलेल्या डोनेशन फॉर्मवर सही केली होती. रजनी बसलेल्या जागेवरून उठली आणि तिने मंगेशच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओझरत होते. मंगेशच्या उंचीमुळे तिचे डोके मंगेशच्या छातीवर टेकले गेले आणि तिला तिच्या वडिलांच्या हृदयाची स्पंदने ऐकू आली. तिने मान वर केली. वरून मंगेशच्या डोळ्यांतले अश्रू रजनीच्या गालावर पडून दोघांच्या अश्रुंचे मिलन झाले होते.

स्वतःचा स्वार्थ न बघता केलेले कोणते ही दान हे दान करणाऱ्याला काही ना काही चांगलेच देऊन जाते. हे आज  परत  सिद्ध झाले होते.

समाप्त 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares