डिसेंबर २०२४ मध्ये मेढे सर्वस्व माझी प्रिय पत्नी अपर्णा हिचे दुःखद निधन झाले आणि मी अंतर्बाह्य पूर्णतः कोलमडून गेलो. आता यातून काही मी परत उभा राहू शकेन असे मला वाटत नव्हते. काही जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींच्या आग्रहाने पुन्हा लिहायला सुरुवात केली. त्यातल्या बर्याचश्या कविता या माझ्या वियोग दुःखाच्या होत्या. अन् अचानक मनात विचार आला, या सगळ्या माझ्या भावना मी व्यक्त केल्या; पण माझ्या अपर्णाच्या काय भावना असतील, तिला काय वाटत असेल?
आणि माझ्याकडून प्रसविली गेली ‘अखेर’ ही कविता!
☆ अखेर ☆
*
अखेर झाली सहवासाची जाते सोडून तुला
दुःखाश्रुंच्या पाशाने ना बांधून ठेवी मला ||ध्रु||
*
आनंदाचा काळ जगलो अधिक अर्ध्या शतकाचा
उपवन फुलविले संसाराचे घेउनी वसा नंदनवनाचा
पुष्करिणीने तृप्त जाहलो स्पर्श नव्हता यातनेचा
जपून ठेवी क्षणा-कणांना आमोदाने आनंदाच्या ||१||
*
तुझ्या नि माझ्या एकत्वाची जाणिव जोपासली
दुजेपणाचा भाव त्यागुनी प्रीतबाग फुलविली
विश्व अपुले सारे होते आपण ही होतो विश्वाचे
हात घेउनी हातामध्ये जपले पावित्र्य नात्याचे ||२||
*
पुढे कधी ना गेले होते मी सोडून तुजला मागे
बद्ध करुनीया रश्मीने प्रेमाच्या नेले मज संगे
आत्मा अपुला एकची होता जीवन दोन देहाचे
मोहक किती होते अद्वैत दोघांच्या त्या जगण्याचे ||३||
☆ क्षण सृजनाचे : माझा नवरा माझी पाहुणी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
साधारण ३४ वर्षांपूर्वीची गोष्ट. १९९० साल असेल. एके दिवशी सकाळी ११ च्या सुमाराला, माझ्याकडे एक तरुणी आली. असेल पंचविशीची. म्हणाली, ‘मी गोव्याहून आले. मला बा. द. सातोस्करांनी तुम्हाला भेटायला सांगितलं, म्हणून इथे आले. आता बा. द. सातोस्करांनी पाठवले म्हंटल्यावर तिची विचारपूस करणं, आदरातिथ्य करणं, माझ्या दृष्टीने ‘मस्ट’च होतं, कारण ते मला आपली मुलगीच मानत. मी म्हंटलं,’तुम्ही गोव्याला राहाता का?’
नाही. मी शहापूरला रहाते. गोव्याला कामाला गेले होते.’
‘कोणतं काम?’
‘मी पीएच. डी. करतेय. त्या संदर्भात काही जुनी वर्तमानपत्रे, , नियतकालिके, पुस्तके मिळतात का, हे बघायला गेले होते.’
‘कुणाकडे राहिलीस तू?’ मी आता ‘आहो’वरून एकेरीवर आले होते.
तिथे मी गोवा विद्यापीठाच्या अतिथीगृहात दहा दिवस राहिले होते. आत्ता इथेही याच कारणासाठी आले आहे.’
‘इथे तुझ्या कुणी ओळखीचे, नात्यातले आहे?’
‘नाही.’
‘मग कुठे रहाणार तू?’ हे विचारायला माझी जीभ काही रेटली नाही.
‘तुझ्या पीएच. डी.चा विषय काय आहे?
‘१९व्या शतकातील निबंध वाङ्मायातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन’
‘अरे बाप रे!’
‘का हो?’
अगदी जडजंबाळ विषय आहे.’ माझी प्रतिक्रिया.
तिने स्मितहास्य केले. बोलली काहीच नाही. त्यासाठी तिला इथली वर्तमानपत्रे, नियतकालिके बघायची, अभ्यासायची होती. मी तिला सांगली नगरवाचनालयाविषयी सांगितले. त्याचप्रमाणे डॉ. तारा भावाळकर, प्रा. हातकणंगलेकरसर, प्रा. व्ही. एन. कुलकर्णी इ.ची नावे सांगितली. तिच्याकडेही काही व्यक्ती, संस्थांची नावे, संदर्भ होते. या कामासाठी तिला तीन-चार दिवस तरी लागतील, असे तिच्या बोलण्यात आले. माझ्या मनात आलं, ही तरुण मुलगी, एकटी कुठे रहाणार? मग मी ठरवले, तिला आपल्याकडेच ठेवून घ्यायचं.
मी त्यावेळी डी.एड. कॉलेजमध्ये अध्यापन करत होते. मुलगा नववीला. यांचा पॉवरलूमचा व्यवसाय. मी स्वैपाक-पाणी, घर आवरून जेवणं करून बाहेर पडायची. हे यांच्या सवडीप्रमाणे येऊन जेवायचे. उषा कधी माझ्याबरोबर, तर कधी आधी, बाहेर पडायची. घरात असली, तर मला मदत करायची. एकदा तिने विचारलं, ’आमच्या सिंधी पद्धतीचा स्वैपाक करू का? पण ते काही जमलं नाही. तिने विचारलं, याचीच मला अपूर्वाई वाटली. बाहेर पडताना मात्र मी तिला बजावलं, ‘सातच्या आत घरात ये. उगीच आम्हाला काळजी नको.’ त्याप्रमाणे ती खरंच सातच्या आत घरी येऊ लागली. एक दिवस तिला रात्रीचे आठ वाजले, तर ती दोघांना पोचवायला घेऊन आली. ‘तू रागावशील, म्हणून यांना पोचवायला सोबत घेऊन आले.’ ती म्हणाली.
उषा मला काहीशी गंभीर, थंड प्रकृतीची आणि अबोल वाटली. जेवढं विचारावं, तेवढंच बोलायची. मी तरी इतक्या अपरिचित व्यक्तीला जास्त काय विचारणार? इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण –
हा पण मोठा चमत्कारिक होता. उषा घरात नसली, की हे मला म्हणायचे, ‘कशावरून घरातून पळून आली नसेल?’ किंवा ‘कुणाशी तरी लफडं …..’ किंवा मग ‘कुठल्या तरी टोळीतली…. चोर-दरोडेखोरांच्या ….’ मी म्हणायची, मी माझ्याकडून प्रश्न विचारून खात्री करून घेतलीय. ती मुलगी काही तशी नाही. पण तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही विचारा. हे म्हणाले, ‘मी काही विचारणार नाही. तुझं तू बघ. पेपरला आपण अशा बातम्या वाचतो. कुणी पोलीस कंप्लेंट केली, पोलीस चौकशीला आले, तर तुझं तू निस्तर. मी काही मदत करणार नाही.’
‘ती मुलगी तशी वाटत नाही’, हे मी पुन्हा पुन्हा म्हणत राहीले, तरीही यांचं बोलणं मला अस्वस्थ करून गेलं. डोक्यात शक्यतेचा एक किडा वळवळत राहिला.
चार दिवसांनी तिचं काम संपलं आणि ती निघून गेली. मी ‘हुश्श्य’ केलं. आमच्याकडून पुढे ती सातारला गेली.
मी यांना म्हंटलं, ‘बघा. चांगली होती ना मुलगी ! तुम्ही काय मुकताफळं उधळलीत तिच्याबद्दल.’ त्यावर हे म्हणाले, मला पण वाटलंच होतं, ही मुलगी चांगली आहे, त्याशिवाय का मी तिला माझ्या घरात राहू दिलं? पण म्हंटलं, तुझी जरा गम्मत करू या.’ म्हंटलं, ‘अच्छा . हे असं होतं का?’ खरं तर घर माझ्या नावावर होतं. कर्जाचे हप्ते माझ्या पगारातून जात होते. पण हे म्हणाले, ‘माझ्या घरात मी राहू दिलं.’ शेवटी आपण पुरुषसत्ताक संस्कृतीचाच भाग बनलेलो असतो ना!
पण या सगळ्या प्रसंगातून गेल्यावर मला एक छान कथा सुचली आणि मी आठ दिवसात ती लिहूनही काढली. ‘माझा नवरा, माझी पाहुणी.’ नंतर ती मासिकात छ्पून आली. अनेकांना आवडली. मी ही कथा काही ठिकाणी सांगितली. मैत्रिणींच्यातही कथेची आणि कथेमागच्या कथेची चर्चा झाली. पुढे पुस्तकातही ती आली. कथा लिहिताना आणि त्याबद्दल बोलताना मला पदोपदी उषाची आठवण येई. ती आली. तिने मला एक चांगली कथा दिली आणि ती निघून गेली. कथेमागची कथा किंवा हकिकत म्हणू आपण, ती तुम्हाला सांगितली. आता मी कथा म्हणून काय बदल केले, हेही तुम्हाला सांगावसं वाटतय, लेख विस्तारणार आहे तरी…..
मी माझ्या पाहुणीचं नाव बादललं. मीनाक्षी नटराजन ठेवलं. तिच्या प्रबंधाचा विषय बदलला. तो ’मंदिराच्या माध्यमातून झालेला नृत्यकलेचा विकास ‘ असा ठेवला. ती चेन्नईची. माझी मावसबहीण रेखाताईची शेजारीण. रेखाताईच्या मुलीच्या श्रेयाच्या बरोबरीची. दोन्ही कुटुंबात जवळीक. महाराष्ट्रातील मंदिरांबरोबरच, इथल्या वाघ्या-मुरळी, गोंधळी, देवदासी, जोगतिणी यांच्या, परंपरेत टिकून राहिलेल्या नृत्यशैलीचा, गीतांचा अभ्यास तिला करायचा होता. काही लोककलाकारांच्या मुलाखतीही ती घेणार होती. तिला पाच-सात दिवस तरी हे काम करायला लागणार होते. तिने कुठे राहायचं हे ठरवलं नव्हतं. मग मी तिला माझ्याकडेच रहा म्हंटलं.
संध्याकाळी प्रभाकरला तिच्याबद्दल सांगितल्यावर तो म्हणाला, ‘तिला राहायला कशाला ठेवून घेतलंस?’
‘श्रेयाला नसतं का ठेवून घेतलं?’
‘तिची गोष्ट वेगळी.’
तो मिनूशी व्यवस्थित बोले. ती नसताना मात्र नाही नाही त्या शंका उपस्थित करी. अलकडे ऑफिस सुटल्यावर तो थेट घरी येई. म्हणायचा, ‘काही भानगड उपस्थित झाली तर…. तुला एकटीला कशी निस्तरता येणार?’
‘पण मी तिला तिच्या कामाबद्दल विचारलं. रोज विचारते. माझं समाधान होतं.’
‘दुसर्याचा विश्वास संपादन करायचा, म्हणजे, एवढं फिल्ड वर्क हवंच!’ तो म्हणे.
तो रोज नाना शंका बोलून दाखवी. घरातून पळून आली असली तर? दागिने, पैसे घेऊन आली असली तर? कुणाशी लफडं करून एक दुजे के लिए म्हणत, किंवा दोघांनी आत्महत्या करण्याचा विचार केला असला तर… कुणा चोर, दरोडेखोरांच्या टोळीतली असली तर… किंवा नक्षलवादी संघटनेतील असली तर… रोज नवीन शंका. मी अस्वस्थ. विचारांचं जाळं त्याभोवती विणत राह्यची.
आमच्या दोघातील संवाद आणि त्यानंतरच्या विचारांची आवर्तनं लिहिताना मी कल्पनेची उंचच उंच नि स्वैर भरारी मारली होती.
एक दिवस तिला यायला रात्रीचे नऊ वाजून गेले. मी अस्वस्थ. कीचन टू बाल्कनी येरझारा मारतेय. शेवटी एकदाची बाल्कनीतून ती दूरवरून येताना दिसली. तिच्याबरोबर दोघेजण. हे पोलीस किंवा सी. आय. डी. ऑफिसर तर नसतील? साध्या वेषातले. तिची बॅग तपासतील का? फायलींखाली काय काय असेल? पिस्तूल, पैसे-दगदागिने, गुप्त कागदपत्रे, सायनाईडची बाटली…. आम्ही पण त्यांना सामील असू असं वाटेल का त्या दोघांना? माझी कल्पनाशक्ती भन्नाट वेगाने धावत नव्हे उडत होती.
तिने त्या दोघांना आत बोलावले. माझी ओळख करून दिली. ‘उजूआंटी तू रागावशील उशीर झाला म्हणून, म्हणून यांना पोचवायला घेऊन आले.’
त्यानंतर दोन दिवसात तिचं काम संपलं. ती निघून गेली. आणि मी ‘हुश्श्य….’ करत सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर तिची अधून मधून पत्रे, फोन येऊ लागले. आपल्या कामाची प्रगती त्यातून ती सांगे. पुढे तिला पीएच.डी. मिळाली हे सांगणारे, तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाविषयी तिचे फोन येत. प्रत्येक फोनमध्ये आमचे आभार व आम्ही तिच्याकडे कधी येणार, याविषयी विचारणा. आता तिचा प्रबंध पुस्तक रूपात येणार होता. त्या कार्यक्रमाचे निमंत्रण व त्याचबरोबर रेल्वेची दोन तिकिटेही तिने पाठवली होती. मी डिक्लेअर केलं, ‘तू आलास तर तुझ्याबरोबर, नाही तर तुझ्याशिवाय मी जाणारच! ती दर वेळी बोलावते. तू नुसताच ‘हो… हो…’ म्हणतोस.’ मग एकदाचा तो तयार झाला.
आम्ही कार्यक्रमाला गेलो. तो छानच झाला. नंतर आसपासची प्रेक्षणीय स्थळे, छोट्या छोट्या सहली, नृत्याचे दोन-तीन कार्यक्रम…. आठवडा कसा गेला, ते कळलच नाही. तिने चांगलच आदरातिथ्य केलं. माझ्या नवर्यानेही आपल्या बोलण्याने, तिच्या आणि रेखाताईच्या घरातील सर्वांना चांगलंच प्रभावित केलं.
घरी परतल्यावर त्याला म्हंटलं, ‘किती चांगली मुलगी….’
‘मला माहीतच होतं ते.’
‘कसं?’
‘आतला आवाज…’
आणि तू काय काय तारे तोडलेस…… ‘
‘तुझी जरा गंमत केली. पण मजा आली, तुला असं घाबरताना पाहून!’
‘तुझी मजा झाली, पण माझा इकडे जीव जात होता, तुझ्या शंका-कुशंकांनी…’
‘अग, ती मुलगी चांगलीच आहे, याबद्दल माझी खात्रीच होती. नाही तर माझ्या घरात मी राहू दिलं असतं का तिला?’
म्हणे माझ्या घरात… घर माझ्या नावावर . कर्जाचे हप्ते माझ्या पगारातून जातात आणि हा म्हणतोय, ‘माझ्या घरात राहू दिलं असतं का?’ पुरुषी अधिकार आणि अहंकार कसा पेशीपेशीत भिनलेला असतो या पुरुषांच्या.’ इथे मी कथा संपवली.
मी डी.एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा आशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले.
तिथे असलेल्या मदतनीस बाई आम्हाला क्रेशची माहिती सांगत होत्या. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्यांची मुले तिथे येत. त्या बोलत असतानाच तिथे एक दीड – पावणे दोन वर्षाची, नुकतीचा चालायला लागलेली मुलगी लडखडत आली आणि खाली बसून त्या मदतनीस बाईंच्या पायाला तिने मिठी मारली. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतले. मग म्हणाल्या, ‘क्रेशने अॅडॉप्ट केलेली ही पहिली मुलगी. एका लेप्रसी झालेल्या भिकारी दांपत्याची ही मुलगी. नन मारियाच्या मनात ही मुलगी भरली. त्यांनी त्या भिकारी दांपत्याला संगितले, की आम्ही तुमच्या मुलीला सांभाळू. तिला खूप शिकवू. तिला चांगलं जीवन जगायला मिळेल. पण आमची एक अट आहे. तुम्ही तिला आपली ओळख आजिबात द्यायची नाही. बघा. तिचं कल्याण होईल. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. थोडं एकमेकांशी बोलले. त्यांना वाटलं असणार, निदान मुलीला तरी आपल्यासारखी भीक मागत जगायला नको. त्यांनी नन मारियाची अट मान्य केली. आम्ही हिला खूप शिकवणार आहोत. डॉक्टर करणार आहोत आणि पुढे उच्च शिक्षणासाठी जर्मनीला पाठवणार आहोत.’ एव्हाना त्यांनी त्या मुलीला आपल्या दुसर्या मैत्रिणीकडे सोपवले होते आणि त्या पुढे माहिती सांगू लागल्या. पण माझं तिकडे लक्षच नव्हतं.
माझं मन त्यावेळी ती लहान मुलगी, तिचे लेप्रसी झालेले आई-वडील, त्या मुलीला डॉक्टर करून जर्मनीला पाठवायचे क्रेशच्या लोक बघत असलेले स्वप्न यातच गुंतून गेले होते.
त्यांची माहिती सांगून झाली होती. आम्ही कॉलेजमधे परत आलो. घटना घडली, ती एवढीच. पण माझ्या डोक्यातून ती मुलगी काही जाईना. बघता बघता डोक्यात एक कथा आकार घेऊ लागली. रात्री सगळं आवरलं, पण मला काही झोप लागली नाही. मग मे उठले. कागद पुढे ओढले आणि लिहायला बसले.
मी त्या मुलीचं नाव ठेवलं जस्मिन. आणि क्रेशचं नाव ठेवलं ‘करुणा निकेतन क्रेश’. हे क्रेश म्हणजे, शहरातील दरिद्री, मागास वस्ती असलेल्या भागातील ‘ग्रीन टेंपल चर्च’ची सिस्टर इंस्टिट्यूट. चर्चचे बिशप फादर फिलिप जर्मनीहून आले होते. त्यांच्या सोबत आल्या होत्या सिस्टर नॅन्सी, सिस्टर ज्युथिका, सिस्टर मारीया. हे सारेच जण ‘दीन-दुबळ्यांची सेवा ही प्रभू येशूची सेवा’, या श्रद्धेने काम करत होती. थोड्याच काळात क्रेशचा नावलौकिक वाढला. आता इथे ३५० च्या वर मुली आहेत. त्या वेगवेगळ्या वयाचा वेगवेगळ्या इयत्तेतल्या आहेत. कुणी तिथेच रहाणार्या आहेत. कुणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबून संध्याकाळी घरी जाणार्या आहेत. स्थानिक लोकांनीही मदत केलीय, अशी पार्श्वभूमी मी तयार केली.
कथेची सुरुवात मी जस्मिन डॉक्टर झालीय आणि जर्मनीला उच्च शिक्षणासाठी निघालीय. क्रेशच्या रिक्रिएशन हॉलमध्ये तिचा निरोप समारंभ झालाय. सर्वांनी तिला तिच्या कार्यात यश लाभावे, म्हणून प्रभू येशूची प्रार्थना केलीय आणि तिला शुभेच्छा दिल्यात.
ती जर्मनीला लेप्रसीवर विशेष संशोधन करणार आहे आणि आल्यावर लेप्रसी झालेल्यांसाठी क्रेश सुरू करणार आहे. आता ती पायर्या उतरतेय. तिच्या मागे क्रेशचे लोक, मुली तिला निरोप देण्यासाठी गेटपर्यंत आल्या आहेत. गेटशी आल्यावर तिचे लक्ष नेहमीप्रमाणे महारोगी असलेल्या भिकार्यांकडे जाते आणि ती मनातल्या मनात म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, मला आशीर्वाद द्या. मला माझे स्वप्न पुरे करता येऊ दे. माझे ध्येय साध्य करता येऊ दे, अशी प्रभूपाशी प्रार्थना करा.’
मी पुढे लिहिलं, क्रेशमध्ये अगदी लहानपणी आलेली जस्मिन हळू हळू मोठी होऊ लागली. तशी इतरांच्या बोलण्यातून तिला आपली जीवन कहाणी तुकड्या तुकड्याने कळली. आपण लेप्रसी झालेल्या भिकार्याची मुलगी आहोत, हे तिला कळलं. मग त्यांच्याकडे बघायचा तिला नादच लागला. कोण बरं असतील यातले आपले आई-वडील. तिला कुणाचा नाक आपल्यासारखं वाटे, कुणाची हनुवटी, तर कुणाचे कपाळ. कोण असतील यातले आपले आई-वडील? ती पुन्हा पुन्हा विचार करी. ती आपल्याकडे बघते आहे, हे पाहून भिकारी आपली थाळी, वाडगा वाजवत भीक मागत. म्हणत, ‘एक रुपया दे. देव तुला श्रीमंत करेल.’ तिला हसू येई, आपण त्यांना पैस दिल्यावर, जर देव तिला श्रीमंत करणार असेल, तर तो डायरेक्ट त्यांनाच का पैसे देणार नाही? अर्थात तिला कितीही द्यावेसे वाटले, तरी तिच्याकडे पैसे नसत. तिच्या सगळ्या गरजा क्रेश भागवत असल्यामुळे तिच्याकडे पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता.
जस्मिन कथेची नायिका. तिचं व्यक्तिमत्व उठावदार, आकर्षक असायला हवं. मी दाखवलं, की ती प्रेमळ, मनमिळाऊ आहे. इतरांना मदत करायाला ती नेहमीच तत्पर असते. प्रभू येशूवर तिची अपार श्रद्धा आहे. त्याच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते. नाताळ आणि इस्टरच्या वेळी चर्चच्या समोर बसलेल्या भिकार्यांना मिठाई, केक वगैरे वाटले जायचे. जस्मिन या कामात नेहमीच पुढाकार घेई.
अनेकदा जस्मिनच्या मनात विचार येई, आपण सिस्टर मारीयाच्या नजरेस पडलो नसतो आणि आपल्याला अॅडॉप्ट करण्याचा त्यांच्या मनात आलं नसतं किंवा आपल्या आई-वडलांनी त्यांची अट मान्य केली नसती, तर आपलं आयुष्य कसं घडलं असतं? या समोरच्या भिकार्यांमध्ये आणखी एकाची भर पडली असती. मग तिच्या अंगाचा थरकाप होई.
आज मात्र येशूच्या, चर्चच्या आणि क्रेशच्या कृपेमुळे ती डॉक्टर झालीय आणि उच्च शिक्षणासाठी आणि लेप्रसीवरील संशोधनासाठी जर्मनीला चाललीय. तिचा निरोप समारंभ झाला, तिथे तिच्या समोरच्या भिंतीवर एक भलं मोठा पोस्टर लावलेलं आहे. त्यात एक मध्यमवयीन स्त्री रेखाटली आहे. तिने हाताची ओंजळ केली आहे. आणि येशू त्यात वरून पाणी घालत आहे. खाली लिहिलं आहे, ‘त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला पुन्हा तहान लागत नाही.’
हे पोस्टर मी मिरज मिशन हॉस्पिटलच्या दारातून आत गेल्याबरोबर दिसेल असं दर्शनी भिंतीवर लावलेलं पाहिलं होतं. ते तिथून आणून, मी या कथेत रिक्रिएशन हॉलच्या भिंतीवर लावलं. जस्मिनचं लक्ष वारंवार त्या पोस्टरकडे जातय. तिला फादर फिलीपचं सर्मन आठवतं. कुणा शरमोणी स्त्रीची कथा त्यांनी सांगितली होती. त्या पापी स्त्रीला प्रभू येशूंनी दर्शन दिलं. तिला क्षमा केली. तिला जीवंत पाणी प्यायला दिलं. आध्यात्मिक पाणी. त्या प्रसंगावर ते पोस्टर आहे. तिची तहान कायमची भागली, असं पुढे कथा सांगते.
स्मिनला वाटतं, आपण तर प्रभू येशूने दिलेल्या पाण्यातच आकंठ डुंबत असतो. फादरनी आपल्याला या पाण्याजवळ आणलं. पण तरीही आपल्याला तहान लागलीय. आपल्या न पाहिलेल्या आई- वडलांना पाहण्याची तहान. खूप तहान…. घसा कोरडा पडलाय. जीव घाबरलाय, एवढी तहान . ..
क्रेशच्या बाहेर पडताना जस्मिनच्या मनावर या सार्या विचारांची गडद छाया आहे. टॅक्सीजवळ उभी राहून सुनीता तिला लवकर येण्यासाठी खुणावते आहे. ती जस्मिनला विमानताळावर पोचवायला निघलीय. जस्मिन टॅक्सीत बसते. मग तिला पुन्हा काय वाटतं, कुणास ठाऊक? ती दरवाजा उघडून बाहेर येते. आज तिच्या पर्समध्ये पैसे आहेत. ती भिकार्यांच्या थाळ्यात, वाडग्यात पैसे टाकते. मनात म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, मला माझ्या कार्यात यशयावे, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. मला आशीर्वाद द्या.’
जस्मिन टॅक्सीत बसते. टॅक्सी सुरू होते. चार विझू विझू झालेले क्षीण डोळे टॅक्सी गेलेल्या दिशेकडे असहाय्यपणे पहात रहातात.
इथे मी कथेचा शेवट केलाय.
कधी कधी मनात येतं, या दिवशी आम्ही त्या क्रेशला भेट दिली नसती, तर ही अशी कथा माझ्याकडून लिहून झालीच नसती
साधारणपणे १९८६ च्या दरम्यानची घटना असावी. दूरदर्शनवर शब्दांच्या पलीकडले या कार्यक्रमात विनय देवरुखकर यांनी संगीतबद्ध केलेल्या काही गीतांचा कार्यक्रम होता. पुढे काही दिवसांनी त्यातील एका गीताच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाल्यामुळे ते गीत विनय वापरू शकत नव्हता; तथापि त्याला त्या गीताला दिलेली संगीत रचना अतिशय आवडली होती. म्हणून त्याने मला त्याच चालीवर एक नवीन गीत लिहून द्यायचे आवाहन केले. त्या चालीतून प्रेमवेड्या प्रेयसीची आर्तता जाणवत होती. नकळतच क्षणार्धात माझ्याकडून पुढील ‘धुंद वाऱ्या’ हे गीत प्रसवले गेले.
☆ धुंद वाऱ्या ☆
धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको
गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||
*
गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको
लाजरीचा रंग गाली तू नभ देऊ नको
दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको
गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||
*
भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी
शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी
भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको
गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||
*
अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा
विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा
आण माझ्या प्रीतिची रे अंतरी मोडू नको
गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||
☆
हे गीत माझ्या मनाची पिल्ले या काव्यसंग्रहात समाविष्ट होते. अत्यंत गुणी गायक आणि संगीतकार चंद्रशेखर गाडगीळ याच्या वाचण्यात हे गीत आले. त्याला ते इतके आवडले की त्याने ते सूरबद्ध केले आणि मला घरी बोलावून ते ऐकविले. ती स्वररचना माझ्या अगदी हृदयात जाऊन पोहोचली.
पुढे आकाशवाणीवर हेच गीत जानेवारी महिन्याच्या स्वरचित्रे साठी निवडले गेले आणि त्याला स्वरबद्ध करण्यासाठी विलास आडकर यांच्याकडे ते सोपविले गेले. अतिशय सुरेल आणि भावपूर्ण अशा चालीत त्यांनी ते माधुरी सुतवणे यांच्याकडून गाऊन घेतले. खूप गाजले हे गीत.
तरीही या गीताची चंद्रशेखर गाडगीळ याने दिलेली चाल माझ्या मनातून जात नव्हती. एवढी उत्कृष्ट स्वररचना अशीच वाया जावी हे मनाला पटत नव्हते. अशा घालमेलीतच पुलाखालून बरेच पाणी गेले. अखेरीस, साधारण पंधरा वर्षांनंतर चंद्रशेखर गाडगीळ याच्या स्वररचनेवर मी आणखी एक गीत लिहायचे ठरवले.
गीत लिहून झाले आणि आकाशवाणीवर माझ्या काही गीतांना स्वरबद्ध केल्यानंतर माझ्या खूप जवळ आलेले आकाशवाणीचे आणि एकेकाळी ‘प्रभात’ फिल्म कंपनीत असलेले ज्येष्ठ संगीतकार सुरेश देवळे घरी आले. आल्या आल्या त्यांनी विचारले, ‘डॉक्टर, एखादे नवीन गीत?’
नुकतीच प्रसविलेले गीत मी त्यांना वाचून दाखविले:
☆ चांदण्याच्या राजसा रे ☆
*
चांदण्याच्या राजसा रे वाकुल्या दावू नको
प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||ध्रु||
*
मन्मथाने धुंद केले कुच मनी मी बावरी
स्पर्श ओठांनाच होता हरवले मी अंतरी
भान जाता हरपुनीया जग तू आणू नको
प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||१||
*
रोम रोमा जागवी तो स्पर्श मी विसरू कशी
चिंब झालेल्या मनाची प्रीत मी लपवू कशी
प्रेमवेडी आर्त होता संयमा शिकवू नको
प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||२||
*
रात्र सजवीता अनंगे लाजुनी राहू कशी
धुंद झाला देह माझा अंतरी वेडीपिशी
आज माझ्या राजसाची पापणी लववू नको
प्रीत सजता आज माझी दृष्ट तू लावू नको ||३||
☆
‘छान आहे डॉक्टर, द्या मला; मी याला चाल देणार आहे, ’ त्यांनी माझ्या हातातून गीताचा कागद ओढूनच घेतला.
मी त्यांना ते गीत रचण्यामागील माझी भूमिका सांगितली, ‘चंद्रशेखरच्या चालीसाठी रचले आहे मी हे गीत. ’
‘त्याकरता तुम्ही आणखी एक गीत बनवा हो, ’ देवळे काही मागे हटायला तयार नव्हते.
अखेरीस चाल देण्यासाठी ते गीत ते घेऊन गेलेच. पुढे त्यांनी ते गीत आकाशवाणीवर गाऊन देखील घेतले.
मला मात्र स्वस्थ वाटेना. चंद्रशेखरची चाल काही मला स्वस्थ बसू देईना. दुसऱ्याच दिवशी मी पुन्हा हातात लेखणी घेतली नी त्या स्वररचनेच्या मीटरमध्ये नव्याने गीत रचले:
☆ रात्र तू विझवू नको☆
*
पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रा क्षितिजावरी उतरू नको
अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||ध्रु||
*
चांदण्याने आज तुझिया रंग मी भरले इथे
उर्मीच्या मम कुंचल्याने प्रेम हे साकारले
धुंदिचा बेरंग माझ्या करुनिया जाऊ नको
अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||१||
*
आर्त झालेल्या मनातुन सूर हे धुंदावले
छेदुनीया मुग्धतेला अंबरी झेपावले
प्रेम भरलेल्या सुरांना बेसुरी गाऊ नको
अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||२||
*
फुलविली मी मुग्ध कलिका रात्र सजवीली नभी
भान हरुनी रातराणी गंध दरवळते जगी
फुलून येता मन्मनी तिज निर्दळी बनवू नको
अंतरी बेभान मी रे रात्र तू विझवू नको ||३||
☆
आणि आता जगदीश कुलकर्णी यांनी या गीतावर उत्कृष्ट स्वरसाज चढविला आहे.
मी आता मात्र विचार करतोय, माझ्या ज्येष्ठ स्नेही आणि मार्गदर्शिका कै. संजीवनी मराठे यांच्या ‘नकळता निघून जा’ या गीताला जर चार संगीत दिग्दर्शकांनी स्वरसाज चढवला आहे तर माझ्या गीतांना देखील तसे झाले तर बिघडले कोठे? उलट हा तर माझा मानच आहे.
तरीही मला चंद्रशेखर गाडगीळची स्वररचना वाया नाही जाऊ द्यायची. बघू कोणच्या स्वररचनेचा कोणत्या गीतासाठी कसा योग येतो आहे ते!
माझी प्रिय, पत्नी कै. अपर्णा हिच्या पोटातील कर्करोगाचे निदान झाले आणि माझ्या पायाखालील वाळूच सरकली. तरीही भावनांच्या आहारी खचून न जाता तिची सर्वतोपरी काळजी घ्यायचा निश्चय मी केला. वास्तविक आमचे दोन देह होते तरी आमच्या आत्म्यांनी केव्हाच अद्वैत साधले होते. आता तिला पुढे कधीतरी खूप वेदना होणार हे मी स्वतः डॉक्टर असल्याने समजून मी खूप विचलित होत असे. अशाच मानसिक अवस्थेतील एका क्षणी माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले:
‘ ज्ञानसविता ‘ म्हणावी अशी विलक्षण बुद्धिमान, कर्तबगार आणि कार्यसमर्पित असणारी माझी पत्नी डॉ. सौ. अपर्णा श्रोत्री हिचे १० डिसेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले. आता केवळ तिच्या असंख्य आठवणी मनात अविरत रुंजी घालत राहिल्या आहेत. अपर्णाने आपले सारे आयुष्य मातृत्वाच्या सेवेच्या संवर्धनात आणि आपल्या शिष्यांना तरबेज आणि निपुण करण्यात वेचले. तिच्या त्या अविरत कार्यापुढे आज पुन्हा एकदा नतमस्तक होतांना मला अगदी माझ्याही नकळत सुचलेली ही कविता — जणू मी मनःपूर्वक तिला वाहिलेली श्रद्धांजलीच – –
☆ ज्ञानसविता…… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली
उजळूनी साऱ्या विश्वाला कर्मप्रभा शाश्वत झाली ||धृ||
कोयनानगर – ज्या भूमीवर माझं बालपण, शालेय शिक्षण झालं ती स्वप्ननगरी १९६७ मध्ये ११ डिसेंबर या दिवशी भूमिगत (!) झाली. त्याच्या आठवणी अजूनही मधून मधून डोके वर काढतात आणि कधी कधी काव्यरूपातही उमटतात.
☆ क्षण सृजनाचा – एक नवा अंकुर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆कविता — एक नवा अंकूर ☆
☆
उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर
*
नसेल तेथे हिरवी भूमी
नसेल जिरले कधीही पाणी
घाम गाळिता पिकतील मोती
ध्यास हाच मनी, लाभ यशाचा असो कितीही दूर
उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर १
*
रखरखणा-या उन्हात न्हाऊ
श्रमदेवीची गीते गाऊ
भाग्य आपुले आपण उजळू
भीति कशाला मग कष्टाची घामाचा वाहो पूर २
*
भगीरथाचे वंशज आपण
गगनालाही घालू गवसण
अशक्य ते ही करुया आपण
चैतन्याने उजळून जाता, अंधाराचा फाटे ऊर ३
*
स्फुरोत आता बाहू तुमचे
तुम्हीच त्राते नव्या जगाचे
भविष्य भीषण पहा हासते
वेध घेऊया त्याचा आपण गतकालाला सारून दूर
उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर ४
☆
एका बॅन्केच्या ग्रामीण शाखेत नुकतीच नोकरी लागलेली. नामांकित बॅन्केत नोकरी मिळाल्यामुळे मनापासून आनंद झालेला. त्यामुळे नवीन शिकावे, यश मिळवावे ही इच्छा आपोआपच मनात जागृत झालेली. अशातच त्या ग्रामीण शाखेतून दुस-या एका ग्रामीण शाखेत काही महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती झालेली. तिथे जाणे येणे सुरु झाले. या संपूर्ण प्रवासात शहरी भाग फारच थोडा होता. बराचसा भाग हा कोरडवाहू किंवा दुष्काळी म्हणावा असाच होता. जाताना खूप लहान लहान खेडी लागत होती. अशा खेड्यातही आमच्या बॅन्केची शाखा दिसत होती. हा सगळा अनुभव नवीन होता. प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाशी सामना करुन उभा असणारा शेतकरी, शेतमजूर आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असणारी आपली बॅन्क पाहून उर अभिमानाने भरुन यायचा. स्वतःचे भविष्य स्वतःच घडवायचे असते या विचाराचे स्मरण व्हायचे. कष्टातून नंदनवन उभे राहते. घाम गाळणा-याला यश मिळणारच. अशा सकारात्मक विचारांनी मन भरुन गेले आणि शब्द सुचत गेले… ‘ उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर ‘….
लंडन येथील नदीचे नाव- थेम्स, त्या नदीवर एक मोठा ऐतिहासिक पूल आहे- टाॅवर ब्रिज. या पुलाच्या बाजूंना दोन मोठे टाॅवर असून राजघराण्यातील व्यक्ति बोटीने जाताना मध्यभागातून तो उघडला जातो.त्या नदीवर एक मोठा दुसरा पूल असून त्याला लंडन ब्रिज म्हणतात. मी त्यावर मुक्त पध्दतीत एक कविता लिहीली आहे. 👇🏻
समुद्राचे माझ्या लिखाणाशी विलक्षण घनिष्ठ नाते आहे. मला स्वतःला याची जाणीव गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘भेकड निसर्ग’ ही कविता प्रसवल्यावर झाली. मी भेट दिलेला एकही समुद्र किनारा असा नाही जेथे माझ्याकडून काही साहित्य निर्मिती झाली नाही. महाबलीपुरम् ला तर समुद्रात कमरेएवढ्या पाण्यात उभा असतांना उन्मनी अवस्थेत माझ्याकडून एकापाठोपाठ एक चार कवितांची निर्मिती झाली; त्या समुद्रातच पाठ करून नंतर मी चौघांच्या बसच्या तिकिटांच्या मागे लिहून काढल्या.
काही वर्षांपूर्वी जुहू येथे माझा मुलगा सुश्रुत याच्या घराच्या खिडकीतून समुद्राचे रौद्र स्वरूप पाहून माझ्याकडून ही कविता रचली गेलीः