मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? ?

☆ मराठी-फारसी भाषेची गंमत… भाग -1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

खालील वाक्य वाचा :

“मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालतखान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीने गरिबांचा जमीन-जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता.

बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिले. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाक खाण्यात गेलो. तिथून मी परत आरामखोलीत आलो. खिडकी उघडली आणि खुर्चीवर कट्यार ठेवुन बाहेरच्या बुरुजाकडे पहात पलंगावर झोपी गेलो.”

(वरील वाक्याचे मराठी भाषांतर लेखाच्या शेवटी दिले आहे.)

ह्या वरील वाक्यात जवळपास सगळेच फारसी शब्द आहेत.

नाही खरे वाटत?

बघा मग : दरबार, बाजार, घर, फौज, अदालतखाना, सावकार, सक्ती, गरीब, जमीन, जुमला,जप्त, दिल्ली दरवाजा, किल्ली, घर, दालन, कारंजे, फवारा, हौद, रंगमहाल, नाच, संदूकखाना, नर्तकी, बक्षीस, भूक, खाना, मुदपाक खाना, आराम, खिडकी, खुर्ची, बाहेर, बुरुज आणि पलंग.

इतके शब्द ह्या वरील वाक्यात फारसी आहेत.

आहे ना गंमत!!

पण मग हे सगळे झाले तरी कधी?

इसवी सन १२९६ म्हणजे बरोबर आजपासून ७२२ वर्षांपूर्वी फारसी भाषा महाराष्ट्रात आली.

फारसी हि आजच्या इराण आणि पूर्वीच्या पर्शियन साम्राज्याची भाषा.

हि भाषा इकडे येण्याचे एक कारण होते आणि ते म्हणजे इसवीसन १२९६ ला दिल्लीचा शासक अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर केलेला हल्ला.

इसवीसन १३१८ पासून १३४७ पर्यंतचा महाराष्ट्राचा कारभार खिलजी सल्तनत दिल्लीत बसून करत होती.

अलाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर पुढे १३४७ साली त्याचा सुभेदार हसन गंगू ह्याने दिल्लीशी संबंध तोडून दक्षिणेत बहमनी सल्तनतीची स्थापना केली.

इसवीसन १४९२ पर्यंत बिदर, १४८४ पर्यंत वऱ्हाड, १४८९ पर्यंत अहमदनगर, १४८९ पर्यंत विजापूर आणि १५१२ पर्यंत गोवळकोंडा भागात हि बहमनी सल्तनत अस्तित्वात होती.

ह्या वरील बहमनी सल्तनतीच्या वेळेसच मराठ्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्व महाराष्ट्र आक्रमिण्याचा उद्योग सुरु केला. इसवीसन १४५० च्या सुमारास खानदेशातील स्वाऱ्यांत निकम, ठाण्यास बिंबदेव राणे, कोळवनात कोळी, रामनगरास

राणे, सोनगड आणि रायरीच्या प्रांतात तेथील राजे, शिरकाणात शिरके, खेळण्यास शंकरदेव, वाडीस सावंत, बेळगावास कर्णराज, मोरगिरीस मोरे, असे अनेक मराठे आपले राज्य स्वतंत्रपणे करीत असत. ह्या वरील प्रांतांमध्ये १४५० पर्यंत अस्सल मराठीचाच प्रचार होत असे. मात्र हे प्रांत सोडून बाकीच्या प्रदेशांत फारसी शब्दांचा सुळसुळाट झाला होता. १४५० नंतर हि लहान लहान राज्ये नष्ट होऊन बहमनी

सल्तनतीच्या अंकित बनली.

ह्या बहमनी सल्तनतीचे पुढे जाऊन बरिदशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही, आणि कुतुबशाही असे पाच तुकडे पडले.

बरिदशाही-१६५६, इमादशाही-१५७२, निजामशाही-१६३७, आदिलशाही-१६८६, आणि कुतुबशाही-१६८७ पर्यंत अस्तित्वात होत्या.

म्हणजे ह्या राजसत्ता जिवंत असूपर्यंत फारसी भाषेने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.

हे सगळे मुस्लिम शासक मूळचे पर्शियन असल्यामुळे त्यांची दरबारी भाषा हि फारसी होती.

त्यामुळे फारसी आणि मराठीची टक्कर होऊ लागली. सुलतानांनी राज्य चालविताना आपली भाषा वापरण्यावर भर दिला. त्यामुळे जमीन महसूल असो कि अजून काही. सगळीकडे फारसी शब्द वापरू जावु लागले.

जेथे जेथे म्हणून मुस्लिम शासकांचे राज्य कायम झाले तेथे तेथे दरबारातील सर्व मराठी लिहिण्यात फारसी संबंधांचा भरणा विशेष असे. दरबारापासून दूर अश्या गावी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा जेथे संबंध नाही अश्या गावकीच्या किंवा धर्माच्या किंवा गोतकीच्या खटल्यात जे कागदपत्र बनत त्यात फारसी शब्दांची संख्या फारच कमी असे.

मात्र त्यात फारसी शब्द बिलकुल नसत असे नाही.

इसवीसन १२९६ ला अलाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आल्यापासून १६८७ च्या कुतुबशाहीच्या अस्तापर्यंत ३९१ वर्ष फारसी भाषेला महाराष्ट्रात झाली होती. ह्या ३९१ वर्षात ह्या फारसी भाषेच्या राक्षसाने रूप धारण केले होते.

देशात फारसी भाषेचा इतका प्रचंड संचार झाला होता कि दरबारापासून अलिप्त राहणाऱ्या व्यक्तीच्याही बोलण्यात किंवा लिहिण्यात फारसी शब्द नकळत येत असे.

फारसीतून मराठीत जी विशेषनामे रूढ झाली ती धक्कादायक अशी आहेत. उदाहरणार्थ:

बाबा, मामा, मामी, नाना, नानी, काका, काकी, अबू, अम्मा, अम्मी वगैरे मराठीतील टोपण नावे हि फारसी आहेत.

ह्याशिवाय सुल्तानराव, जानराव, बाजीराव, रुस्तुमराव, शहाजीराव, शाहू, फिरंगोजीराव, सर्जेराव, हैबतराव, सर्फरोजीराव, वगैरे नावेही फारशीच आहेत. ह्या शिवाय अजून सौदागर, मुश्रीफ, सराफ, चिटणीस, फडणीस, पोतनीस, हेजिबराव, दिवाण, पेशवे, वाकनीस, दफ्तरदार अशी आडनांवेही फारसी आहेत.

अश्या स्वरूपाच्या शेकडो फारसी शब्दांनी मराठीत कायमचे ठाण मांडले.

जसे जसे यावनी भाषेचे मराठीवर आक्रमण होऊ लागले तसे तसे संतांनी तातडीने समाजप्रबोधनातून मराठी भाषा वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु केले.

संत ज्ञानेश्वर म्हणतात,

“माझा मराठाची बोलू कौतुके।

परी अमृतातेही पैजा जिंके।

ऐसी अक्षरे। रसिके मेळवीन”

संत तुकाराम तर अजुन ओजस्वी म्हणतात कि

“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।

शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ।।

शब्द ची आमुच्या जीवाचे जीवन।

शब्दे वाटू धन जन लोका ।।

तुका म्हणे पहा शब्द चि हा देव।

शब्दे चि गौरव पूजा करू ।।

संत जनाबाई, संत बहिणाबाईं, संत एकनाथांनी जशी मराठी भाषा समृद्ध केली तशीच संत नामदेवांनीही मराठी भाषेचा वारू यथार्थ दौडवला.

संग्राहक – सुश्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना…… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

(श्री. पु. ल. देशपांडे आणि श्री. आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा स्मृतिदिन नुकताच अगदी पाठोपाठ होऊन गेला. या दोघांच्या स्मृती एकत्रपणे जागवणारा हा सुरेख लेख)

काल पुलं स्मृतिदिन आणि आज आचार्य अत्रे स्मृतिदिन. ही नावंच मुळी मराठी मनांच्या सुगंधी कप्प्यात आदरानं विसावली आहेत. शांता शेळकेंनी श्री. म. माटेंना एकदा विचारलं होतं की, ‘माणसाचं आयुष्य किती?’ माटेंचं उत्तर होतं…. “माणूस मेल्यावर जितका काळ लोक त्याची आठवण काढतात तितकं…!”  या अर्थानं‌ अत्रे-पुलं ही जोडगोळी अमरच म्हणायला हवी!!!!!

दोघांनीही साहित्याच्या सर्वच क्षेत्रात मुशाफिरी केली आणि दर्जा ही काय चीज असते त्याची अवघ्या रसिकजनास ओळख तर करविलीच, पण न्हाऊनच काढलं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये…..!

असो. तर त्या मानवंदनेचा इतिहास असा…..

नांदेडच्या नाट्यसंमेलनाचे पु.ल. अध्यक्ष आणि आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे संमेलनात एकाच व्यासपीठावर!!!   मराठवाड्यातल्या रस्त्यांची तत्कालीन अवस्था फारच दारूण अशी होती. रस्त्यावरचे खड्डे, प्रचंड धूळ यांमुळे अत्रे वैतागलेले होते. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्यांवर यथेच्छ टीका केली. कोडग्या राजकारण्यांची चर्म सोलणं काय असतं, तेच श्रोत्यांनी अत्र्यांच्या वाग्बाण आणि वाक्ताडनातून जाणलं. अत्रेंचं तोंडसुख घेऊन झालं आणि तत्पश्चात पु.ल. भाषणासाठी उभे राहिले. महाराष्ट्र साहित्य परीषदेच्या प्रा. मिलिंद जोशींनी हा प्रसंग फार छान वर्णन केला आहे….

अत्र्यांच्या खड्डे आणि धूळ यावरील भाषणाचा धागा पु.ल.नी अचूक पकडला आणि म्हणाले,

‘‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्या आचार्यांना या धुळीची इतकी भीति का वाटावी? ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास, जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज अशी मोठी माणसं गेली आहेत. ही धूळ अंगावर घेत असताना त्यांच्यातील माणसांचे दर्शन आम्हाला घडते आहे, असेच वाटते. ज्याला पैठण आवडत नाही असा पुरुष शोधून सापडणार नाही आणि जिला पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही, अशा मराठवाड्यात, अत्रेसाहेब आपण आहात.’’

टाळ्यांचा कडकडाट तर झालाच पण नियमावली किंवा आचारसंहित किंवा सभाशास्त्राचे सर्व नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले,

“मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राला हसवण्याचे काम आता यापुढे पुलंनी करावे. मी मरायला मोकळा झालो आहे.”

आचार्य अत्र्यांचा शब्द पु.ल.नी खोटा ठरू दिला नाही.  अत्र्यांच्यानंतर अवघा महाराष्ट्र निरंतर हसवण्याचे काम पु.ल.नी चोख केले….!!!

गुणि गुणं वेत्ति, न निर्गुणा:…. याचंच मनोहारी दर्शन वरील प्रसंगातून सतेज दृग्गोचर झालं…!!!

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्हिंटेज – सौरभ साठे ☆ प्रस्तुती..सौ.स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

☆ व्हिंटेज – सौरभ साठे ☆ प्रस्तुती..सौ.स्मिता पंडित ☆ 

माझ्या एकटेपणाच्या दुःखाने आता बाळस धरायला सुरुवात केली आहे. 5 वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावर खर तर खूप काही प्लॅनिंग केलं होतं, पण आमची ही सहा महिन्यापूर्वी पुढच्या प्रवासाला निघून गेली.. एकटीच….

आता मी माझं रुटीन सेट करून घेतलंय.. सकाळी जरा लवकरच उठतो, त्याच काय आहे मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात यायला जरा उशीरच होतो त्यांना म्हणुन सकाळी चहा बरोबर जरा गप्पा पण होतील असं मला वाटायचं.. हो वाटायच.. कारण त्यांना माझ्याशी बोलायला वेळच नाही मिळत.. नाही नाही गैरसमज करून घेऊ नका सिनेमा किंवा सिरियल मध्ये दाखवतात तसे काही माझे मुलगा किंवा सुन नाहियेत… वडिलांची आणि सासर्‍यांची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी नक्कीच घेतात.. माझी तक्रार काही नाही.. पण एकदा सकाळी इतरांपेक्षा लवकर जाग आली म्हणुन चहा करायला घेतला पण नेमकं दूध उतू गेलं  सगळा ओटा खराब झाला..सुन नाराज झाली.. मला काही बोलली नाही पण तीच्या हालचाली मधून ते स्पष्ट जाणवत होत.. त्या दिवशी मुलानी लगेच फर्मान काढले..”बाबा उद्यापासून आमच आवरल्यावर मी तुम्हाला चहा आणून देईन रूम मधे” असाच एकदा नातवाला एकदा म्हणालो चल तुला स्कूल बस पर्यंत येतो सोडायला.. तर म्हणतो कसा “आबा मी मोठा झालोय आता मी एकटा जाऊ शकतो तू आलास तर बाकीच्या मुलांना वाटेल मी घाबरतो एकटा यायला..हसतील मला सगळे..”

म्हणुन सध्या उठल्यावर मी माझ्या खोलीतच असतो.. बाहेरचा अंदाज घेऊनच हॉल मधे येतो.. मला कळून चुकलय की त्यांच्या आयुष्यातला फक्त एक भाग आहे कदाचीत थोडासा दुर्लक्षित…

आता मी संध्याकाळी फिरायला जातो.. तेवढाच माझाही वेळ जातो.. रोजचा मार्ग ठरलाय माझा agricultural college च्या चौकातून सरळ जाऊन विद्यापीठाच्या चौकातून परत घरी.. त्या मार्गावर एक दोन शोरूम आहेत चार-चाकी गाड्यांच्या.. पहिल्यापासूनच गाड्यांचे आकर्षण होते.. म्हणुन मग येता जाता त्या शोरूम मधल्या गाड्या बघत बघत जायचो अर्थात बाहेरूनच..

पण एक दिवस त्या शोरूम मधे एक वेगळीच गाडी दिसली काहीशी जुनी होती पण त्या गाडीला वेगळी जागा होती, तीला वेगळ्या पद्धतीने सजवल होत. कुतुहल वाटल म्हणून आत गेलो.. एक चकचकीत कपड्यातला सेल्समन आला.”yes sir कुठली गाडी बघताय” नाही….म्हणजे हो बघतोय पण विकत नाही घ्यायची मला.. ही एव्हढी जुनी तुमच्या शोरूममधे कशी काय हा विचार करतोय. “सर ही vintage car आहे 1965 साली बडोद्याच्या महाराजांनी घेतली होती.”

का हो सगळ्या गाड्यांवर किमतीचा कागद लावला आहे या गाडीवर मात्र तो नाही.”सर ही विंटेज कार आहे हिची किंमत ठरवता येत नाही..ज्याला या गाडीच मोल कळेल तो कस्टमर ही गाडी घेईल. थोडक्यात ही गाडी महाग नाही तर मौल्यवान आहे.”

मी शोरूम मधून बाहेर पडलो..कसला तरी विचार येत होता मनामधे पण नक्की कळतं नव्हत काय ते..

असेच मध्ये काही दिवस गेले रोज मी येता जाता ती गाडी कौतुकाने बघायचो.

गुढी पाडव्याच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळे घरीच होते.. ही गेल्या नंतरचा पाहिलाच गुढी पाडवा..जरा  उदासच होतो मी पण नातवाशी खेळण्यात वेळ जात होता.. “आबा तुला माहितीये का आमच्या शाळेच्या समोर ना 100 पेक्षा जास्त वर्षे जुने पिंपळाचे झाड होते रोड वायडिंग मधे ते पाडणार होते.. मग कुठले तरी लोक आले मोर्चा घेऊन आणि ते झाड दुसरीकडे नेऊन पुन्हा लावलं.. आमच्या टीचरनी सांगितलं ते झाड जुनं असलं तरी 24 तास ऑक्सिजन देत म्हणुन ते महत्वाचं आहे.”

त्या गाड्यांच्या शोरूम मधून बाहेर पडल्यावर जस वाटलं होतं तसच काहीसं वाटून गेलं.

सुनबाई म्हणाली “बाबा तुम्ही पूजा कराल का गुढीची..इतकी वर्षे आई करायच्या म्हणुन वाटत आज तुम्ही करावी..” मी पण तयार झालो..

आम्ही सगळे जेवायला बसलो सूनबाईने छान तयारी केली होती.. जेवायला तांब्याची ताट काढली.. मुलगा म्हणाला ” अगं आज तो काचेचा सेट काढायचा ना”

“अरे असू दे आईने पाहिल्या दिवाळसणाला दिला होता हा तांब्याच्या सेट… त्या सेट मधली आता फक्त ताटचं उरली आहेत म्हणुन मुद्दाम जपून ठेवली आहेत सणासुदीसाठी आईची आठवण म्हणून.”आणि सूनबाईने नकळत हातातले फडके खाली ठेवले आणि ती ताटं स्वतःच्या पदराने पुसली.

अचानक मला त्या शोरूम मधून बाहेर पडल्यावर मनात जो विचार आला होता त्याचा अर्थ कळायला लागला..मौल्यवान या शब्दाचा.. ती विंटेज गाडी, ते पिंपळाचे झाड काही तरी इशारा करत होते..

आता माझे मला समजले होते मी म्हातारा असलो तरी टाकाऊ नव्हतो..

आता मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या आयुष्याचा भाग होण्याचा अट्टाहास मी सोडून दिलाय स्वखुशीने.. कारण मला माहितीये त्यांच्या आयुष्यातील माझं स्थान त्या विंटेज कार सारखं आहे… एकदम स्पेशल..

✍ सौरभ साठे 

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पु.ल… विवाह  सोहळा. ☆ स्व सुनीता देशपांडे 

?इंद्रधनुष्य? 

(स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे))

☆ पु.ल… विवाह  सोहळा ☆ स्व सुनीता देशपांडे  ☆

(महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला १२ जून रोजी एकवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या लग्नाची ही कथा)

साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात ‘ओरिएंट हायस्कूल’ नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधत असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता. असाच भाईने (पु.ल. देशपांडे) त्या शाळॆत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही काळाने मीही! भाई वरच्या वर्गाना शिकवत असे आणि मी खालच्या वर्गाना. (तिथेच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता.)

शिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग ‘आपण लग्न करूया’ असा भाईचा आग्रह सुरू झाला… वाढतच राहिला.

लग्न हे मला कृत्रिम बंधन वाटे. समजा, उद्या आपलं पटेनासं झालं, तर लग्नात ‘शुभ मंगल सावधान’ म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करणारा तो कायदेतज्ज्ञ हे आपली भांडणं मिटवायला येणार आहेत का? मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय? माझं ताठ मन वाकायला तयार नव्हतं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी `माझ्यासाठी तू इतकंच कर. लग्नविधीला फक्त ‘हो’ म्हण. मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे,’  या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी! खरं तर तत्पूर्वी एकदा भाईचं लग्न झालेलं होतं. या गुणी मुलाला आपली लाडकी लेक देऊन मोठ्या थाटामाटात कर्जतच्या दिवाडकर लोकांनी त्याला जावई करून घेतला होता. पण लग्नानंतर १५-२० दिवसांतच ती मुलगी तापाने आजारी पडली आणि डॉक्टरी उपचारांचाही उपयोग न होऊन बिचारी मृत्यू पावली.

माझ्या आईने लेकीसाठी काही स्थळं हेरून ठेवली होती. एक तर तिला या बिजवराशी मी लग्न करणं मुळीच पसंत नव्हतं. शिवाय परजातीतला जावई हेही खटकत होतं. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मी आमच्या गावी रत्नागिरीला आले. ‘भाईने टपाल घेऊन येणाऱ्या बसने यावे, ती गाडी आधी पोस्टात येते, तिथे टपालाच्या थैल्या टाकून मग गावात गाडीतळावर जाते. पोस्टाच्या कंपाऊंडला लागूनच आमचा वाडा आहे, मी त्याला उतरून घेऊन आमच्या घरी आणीन,’ असे मी भाईला सांगितले होते. प्रत्यक्षात भाई एकटाच न येता त्याचा भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा हरकाम्या बाळू तेंडुलकर यांच्यासह आला. मी आप्पा-आईशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी उभयतांना वाकून नमस्कार केले आणि पुढल्या १०-१५ मिनिटांतच भाईने सर्वांना हसवून आपलेसे करून घेतले. ‘हसवण्याचा माझा धंदा’ या नावे पुढच्या काळात भाई रंगभूमीवर एक कार्यक्रम करत असे. माझा अनुभव मात्र सांगतो- हसवणं हा त्याचा धंदा नव्हता, त्याचा तो धर्मच होता.

पुढल्या ४-५ दिवसांत लग्न रजिस्टर करायचं होतं. त्यावेळी भरायचा छापिल फॉर्म आठ आण्याला मिळे, तेवढाही खर्च इतर कुणावर पडू नये म्हणून मी तो फॉर्मही विकत आणून ठेवला होता आणि आप्पांनाही दाखवला होता.

आमचे आप्पा – म्हणजे माझे वडील हे स्वत: रत्नागिरीतले नामवंत वकिल तर होतेच, पण संत प्रवृत्तीचा माणूस म्हणूनही त्यांचा लौकिक होता. भाई रत्नागिरीला आल्यावर दोन-तीन दिवसांतच लग्न रजिस्टर करून टाकावे, असे आई-आप्पांना मनातून वाटत होते. त्याप्रमाणे आप्पांनी कोर्टातून परतताना आपल्या वकील स्नेह्यांना “मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल?” असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे, वगैरे सांगितले. त्यावर, “मग आत्ताच जाऊ या की!” म्हणून ते आप्पांबरोबरच निघाले.

रत्नागिरीचे मुख्य ऑफिस आमच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये होते. तसेच घरासमोरच जिल्हा न्यायालय होते. दुपारी आप्पा घरी परतत तेव्हा दुपारचा चहा होत असे. त्या सुमाराला आमच्या वाड्याला फाटकाची खिटी वाजली की आप्पा आले, असे आम्ही खूशाल मानत असू. आईने चहाला आधण ठेवले होते. खिटी वाजली म्हणून मी सहज तिकडे पाहिले, तर आप्पांच्या सोबत आणखी तीन-चारजण येताना दिसले. मी आईला ते सांगतच तिने आधणात आणखी चार-पाच कप पाणी वाढवले.

हे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आले आहेत आणि पुढच्या दहा-पंधरा मिनीटांत आमचे लग्न होणार आहे, याची घरच्या आम्हाला कुणालाच पूर्वकल्पना नव्हती. उन्हाळयाचे दिवस. वधू घरच्याच साध्या, खादीच्या सुती साडीतच होती आणि नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर साधा, बिनबाह्यांचा बनियन घालून, चहाची वाट पाहत, गप्पा मारत ऊर्फ सर्वांना हसवत बसलेले. आप्पांनी आल्या आल्या मला हाक मारली. जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली आणि त्या फॉर्मवर आम्हा उभयतांना त्या साक्षीदारांसमोर सह्या करायला सांगितले. आमच्या आणि साक्षीदारांच्याही सह्या झाल्या आणि लग्न ‘समारंभ’ संपला. नेहमीच्या दुपारच्या चहाबरोबरच लग्नही झाले आणि माझ्या लक्षात आले की, आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून ‘कु. सुनीता ठाकूर’ हिचे नाव ‘सौ. सुनीता देशपांडे’ करण्याचे काम फक्त आठ आण्यात आणि दोन-चार मिनीटांत उरकले.

एका योगायोगाचे मात्र मला नवल वाटते. आमच्या या लग्नाच्या दिवसाची तारीख होती १२ जून, आणि त्यानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी १२ जूनलाच भाईचा मृत्यू झाला. आठ आण्यात आणि दोन-तीन मिनिटांत जोडलेलं ते लग्नबंधन तुटलं. पण त्या चोपन्न वर्षाचं एकत्र जीवन खूप रंगीबेरंगी आणि एकूण विचार करता खूप संपन्नही जगलो खरं!

 – स्व. सुनीता देशपांडे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्नेहवन – एका प्रेमाच्या भेटीची गोष्ट ☆ स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य? 

☆ स्नेहवन – एका प्रेमाच्या भेटीची गोष्ट ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित ☆

(Please visit->> www.snehwan.in)

आळंदीपासून साधारण १० किलोमीटर वर कोयाळी फाटा इथे स्नेहवन नावाची एक संस्था… श्री. अशोक आणि सौ. अर्चना देशमाने यांचा २३० जणांचा संसार ….

२५ व्या वर्षी संगणक क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दुसऱ्यांच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी अंगावर घेणे आणि ती व्यवस्थित पार पाडणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही. अशोकजींच्या समर्पणाला आणि त्यांना  तन आणि मनाने साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ला माझा सलाम !

२०२० मध्ये आलेली मरगळ झटकून देऊन २०२१ मध्ये काहीतरी खूप छान करायचे. मी, माझे कुटुंब आणि माझे घर यापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करायचे असा संकल्प मनी धरूनच या वर्षीची सुरुवात केली होती. त्यामुळे  जेव्हा या संस्थेविषयी कळले त्यावेळी इथे नक्की भेट द्यायची आणि आपल्याकडून जी होईल ती मदत करायची हे मनात पक्क केलं होतं. ती संधी चालून आली आमच्या ब्राह्मण संघामुळे. यावर्षीचा व्हॅलेंटाईन डे थोडा वेगळा साजरा करूयात ही कल्पना मंदारजी रेडे आणि केतकीताई कुलकर्णी यांनी मांडली आणि आम्ही सर्वानी ती उचलून धरली. याचा अर्थ असा नाही की या आधीचे सर्व व्हॅलेंटाईन डे आम्ही साजरे केलेच आहेत :).  पण काहीतरी वेगळं , ज्या समाजात आपण राहतो , ज्यांच्यामुळे आपल्याला ४ सुखाचे  घास मिळतायत अश्या शेतकऱ्यांना, त्यांच्या मुलांना जर स्नेहवनमार्फत आपणही छोटीशी मदत करू शकत असू तर करावी या हेतूने आम्ही २५ जणांनी स्नेहवनला भेट दिली.

तिथे गेल्या गेल्या अशोकजींनी हसतमुखाने आमचे स्वागत केले आणि एका क्षणात आम्हाला आपलेसे करून घेतले. थोडा औपचारिक गप्पा तोंडओळख झाली आणि मग अशोकजीनी सांगितलेला त्याचा इथपर्यंतचा प्रवास ऐकून आम्ही सर्वजण स्तिमित झालो.

अशोकजींचे बालपण परभणीजवळील एका छोट्याश्या खेड्यात अत्यंत हलाखीच्या परिस्थिती झाले. जिथे रोजच्या जेवणाची भ्रांत होती तिथे शिक्षणाची आस धरणे हे एक स्वप्नच होते. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने त्यांनी ते इंजिनिअर झाले आणि एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत नोकरीला लागले. नोकरी करत असताना ते विविध विषयांवरील पुस्तके, स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करत होते. स्वतः एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांचे प्रश्न खूप जवळून पाहिल्यामुळे त्यांना सतत यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटत होते. नुसत्या गप्पा मारून अन चार कविता लिहून, पैसे देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत तर यासाठी वेळ दिला पाहिजे.

या विचारात असतानाच एका क्षणी त्यांनी ठरवले की आता मी यात उडी मारणार आणि स्वतःच्या आई वडिलांचा विरोध पत्करून त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ या कार्याकरिता वाहून घेतले. सुरुवातीला विरोधात असलेले आई वडील नंतर मुलाचा निर्धार बघून गावाकडील शेतीवाडी विकून पुण्यात मुलाच्या संसाराचा गाडा ओढू लागले.  सुरवातीला भोसरी येथे ४ खोल्यांमध्ये ते तिघे आणि १८ मुले असे २१ जण जवळ जवळ ३-४ वर्षे राहत होते. थोड्याच दिवसात अशोकजींचा लग्नाचा विषय त्यांच्या आई वडिलांच्या डोक्यात घोळायला लागला. पण लग्नाआधीच १८ ते २० मुलांचे पालकत्व स्वीकारलेल्या मुलाबरोबर लग्न करायला तयार होणारी मुलगी मिळणे म्हणजे कर्मकठीण काम. पण म्हणतात ना तुम्ही जर मनापासून समर्पित होऊन जर एखादे काम करत असेल तर देवसुद्धा तुम्हाला त्याच्या परीने सर्व मदत करतो.  अनेक वधुपरीक्षा झाल्यांनतर अर्चनाताई अशोकजींच्या आयुष्यात आल्या आणि ते ही रीतसर पद्धतीने दाखविण्याचा कार्यक्रम करूनच. अर्चना ताई आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या धाडसाचे ही कौतुक करावे तितके थोडे आहे. कुठल्याही आई वडिलांचे आणि मुलीचे स्वतःच्या लग्नाचे संसाराचे एक सुरेख चित्र असते. पण त्या चौकटीच्या बाहेर येऊन चित्र पूर्ण काढणे आणि ते रंगवणे ह्यासाठी पण एक वेगळी दृष्टी लागते. ती दृष्टी अर्चनाताई आणि त्यांच्या पालकांकडे होती म्हणून एवढा मोठा निर्णय ते घेऊ शकले.

१८ मुलांपासून सुरु केलेला त्यांचा संसार आज २३० मुलांबरोबर गुण्या गोविंदाने सुरु आहे. स्नेहवनात असलेले अनोखे उपक्रमही जाणून घेण्यासारखे आहेत.

१.  वन बुक वन मूवी : स्नेहवनात भारतातील पहिली कंटेनर लायब्ररी आहे ज्यात १०००० पुस्तके आहेत. इथल्या प्रत्येक मुलाने दर आठवड्याला एक पुस्तक वाचायचे आणि त्यावर विवेचन करायचे. जो पुस्तक वाचून पूर्ण करेल त्याला एक चित्रपट पाहायला मिळेल. जो पुस्तक वाचणार नाही त्याला त्या आठवड्यात चित्रपट पाहायला मिळणार नाही. मग त्याला स्वतः अशोकजी आणि अर्चनाताईही अपवाद नाहीत.

२.  रिंगण: इथली मुळे TV अजिबात पाहत नाहीत तर रोज संध्याकाळी सगळे मुळे एकत्र रिंगणात बसतात आणि वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारतात, आपली मते मांडतात.  कधी कधी एखादा विषय दिला जातो आणि त्यावर प्रत्येकानी आपले मत , विचार व्यक्त करायचे. मग तो विषय माझी आई, माझे गाव, आपले पंतप्रधान असा काहीही असू शकतो पण ह्यामुळे ह्या मुलांच्यात लहानपणासूनच वक्तृत्व कला जोपासली जाते आणि विचारांना दिशा देऊन ते व्यक्त करण्याचे धाडस येते. त्यामुळे ही मुळे ५०० लोकांसमोर सहज बोलू शकतात.

३.  सोलर प्लांट : स्नेहवनचा संपूर्ण परिसर हा सोलर पॉवरवर चालतो.  इथली मुलेच हा प्लांट पण सांभाळतात.

४.  बायो गॅस : इथे प्रत्येक जण स्वतःला लागणार गॅस स्वतः तयार करतो. हा पूर्ण प्रकल्प पण मुलेच सांभाळतात.

५.  कॉम्पुटर लॅब आणि अकाउंटिंग : लॅब चे व्यवस्थान आणि हिशोबाचे काम ही मुलेच पाहतात. कुणालाही काहीही लागले तरी तो तो विभाग पाहणाऱ्या मुलांना विचारूनच सगळे कामे केली जातात. अगदी अशोकजीसुद्धा या मुलांच्या सल्ल्यानेच काम करतात

६.  संगीत, चित्रकला, योगाभ्यास : दर शनिवारी आणि रविवारी इथे बाहेरील शिक्षक येऊन मुलांना गाणे , चित्रकला आणि योगाचे धडे देतात आणि त्यांची चौफेर प्रगती होईल याकडे लक्ष देतात

७.  गौ-शाळा : स्नेहवनची  स्वतःची गौशाला आहे त्यात २ गीर गायी आहेत. त्यामुळे त्यांना लागणारे दूध दुभतेही त्यांना इथेच उपलब्ध होते.

८.  जैविक शेती : स्नेहवनला लागणार रोजचा भाजीपाला ते त्यांच्याच आवारात पिकवतात ते ही जैविक पद्धतीने. कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता.

अश्या एक ना अनेक गोष्टी इथे पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या. एक अतिशय स्तुत्य उपक्रम बघून , एकमेवाद्वितीय असा अनुभव घेऊन भारलेले आम्ही सर्वजण पुढील अनेक दिवसांसाठी अनोखी ऊर्जा घेऊन तिथून बाहेर पडलो.

प्रत्यकाने जाऊन जरूर पाहावे आणि अनुभवावे असे हे स्नेहवन , नक्की भेट द्या !!!

स्नेहवन संपर्क- 87964 00484

www.snehwan.in

सौ. शिल्पा महाजनी

संग्राहक – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अहमदनगर जिल्ह्यातील माॅरिशस… ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ अहमदनगर जिल्ह्यातील माॅरिशस… ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆

अहमदनगर जिल्ह्यातील मॉरिशस  म्हणजे अकोल्यातील “फोपसंडी” गांव जेथे आजही सुर्योदय 9 वाजता आणि सूर्यास्त 4.30 ला होतो

अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणजे निसर्ग सौदर्याचे माहेरघर. भंडारदरा धरण, रंधा फॉल, रतनगड, कळसुबाई शिखर, हरीचंद्र गड, सांदण दरी  हे पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटनाचे माहेरघर म्हणून जनतेला माहीत आहे.पावसाळ्यात हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे भेट देतात. अगदी तासनतास ट्रॅफिक जॅमचा इकडे येतांना अकोला सोडल्यानंतर  अनुभव घ्यावा लागतो.

मात्र  पर्यटकांच्या नजरेतून सुटलेलं व निसर्ग सोंदर्याने भरलेलं प्रति “मॉरिशस” असलेलं हे 1200 लोकवस्तीचे ” फोपसंडी” गांव अकोलेपासून अवघे अंदाजे 40 कि. मी. अंतरावरील अनेक मोठमोठे डोंगर पार करून दरीच्या तळाशी वाड्या, पाड्यावर वसलेलं अतिदुर्गम गांव आहे.

या गांवचा इतिहास ही रंजक आहे. साधारणतः 1925 च्या सुमारास संगमनेर प्रांताचे इंग्रज अधिकारी “फोप” हे  घोड्यावरून जंगलात फिरत फिरत या दरीत उतरले. तेथे त्यांना आदिवासींची वस्ती आढळली. या “पोफला” येथील निसर्ग खूप आवडला.व येथे तो दर रविवारी येऊ लागला. येथे राहण्यासाठी त्यांनी “मांडवी नदीच्या” तिरावरील टेकडीवर त्याचे रेस्ट हाऊस बांधले. तेथून तो वरील चार ही जिल्ह्याच्या सिमेवरील डोंगर,  कोंबड किल्ला (कुंजीर गड),  चोहोबाजूंनी धबधबे  पाहण्याचा आनंद घेत असे. पोफच्या या राहण्याने नंतर या गावाला “पोफसंडी” म्हणू लागले. नंतर त्याचा अपभ्रंश होऊन “फोपसंडी” हे नांव रूढ झाले. ते आजतागायत तसेच आहे.

स्वातंत्र्यानंतर ही 50 वर्षे हे गांव शासनाच्या सर्व सोई सुविधांपासून वंचित होते. अगदी निवडणुकीच्या वेळी ही गाढवावरून 10 कि.मी. मतदान पेट्या नेल्या जात होत्या. 1997 मधील गावातीलच दत्तात्रय मुठे ही व्यक्ती पुणे येथून परत गावांकडे आली. व गांवात  रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, एस टी इत्यादी सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांपासून ते तालुका स्तरापर्यंत सतत पत्रव्यवहार केले,पायपीट केली. सर्वात प्रथम गावांत बस येण्यासाठी त्यांनी सरकारदरबारी प्रयत्न केले.शेवटचे हत्यार गावकऱ्यांनी गावातच  सांघिक आमरण उपोषणाबाबतचे हत्यार उपसले. नाईलाजाने अधिकारी वर्गांना गावात  पायी यावे लागले. शेवटी गावांत रस्ते आले, बस आली. 2005 ला गावांत रस्ते, वीज यासाठी स्थानिकांनी श्रमदानाचा मोठा सहभाग उचलल्याचे या योजना इथपर्यंत पोहचू शकल्या. आज गांव 100 टक्के हागणदारी मुक्त दिसून आले. गावांत 10 वी पर्यंत शाळा, आहे. वाड्या वस्त्यांवर सिमेंट रस्ते आहेत. नळयोजना आहेत.अकोले येथून रोज एक मुक्कामी बस येते. गावांत अंगणवाड्या आल्या आहेत. नदीवर, ओढ्यावर बंधारे आहेत.

? अजूनही काय सुधारणा आवश्यक आहे ?

१) गावांत पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. म्हणजे स्थानिकांना पर्यटनातून रोजगार मिळेल.

२) दळणवळणासाठी रस्ते अजून मोठे व चांगले होणे गरजेचे आहे.

३) येथून माळशेज घाट अवघा 10 कि. मी. अंतरावर आहे. किमान 3 कि. मी. डोंगर फोडून रस्ता केला तर माळशेज अगदी जवळ येईल. व दळणवळण, पर्यटन वाढेल.

४) गावांत बँक येणे आवश्यक आहे.

५) सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलीही दूरध्वनी सेवा, मोबाईल सेवा, इंटरनेट सुविधा गावात नाही.ते होणे गरजेचे आहे.

६) गावातील दूध दररोज 5 कि.मी घेऊन जावे लागते. त्यासाठी गावातच डेअरी होणे आवश्यक आहे.

या गांवचे अनेक  वैशिष्टये सांगता येतील त्यातील काही प्रामुख्याने खाली देत आहे.

१) अहमदनगर, नाशिक, पुणे, ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेवटचे गांव)

२) पावसाळ्यात तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याने अजूनही गावातील बहुतांश आदिवासी गुराढोरांसह पावसाळ्याचे चार महिने गुहेचा आसरा घेतात..

३)) या गावात  सकाळी नऊ वाजता सूर्योदय व संध्याकाळी साडेचार वाजता सूर्यास्त होतो. हा दोन्ही देखावा पर्यटकांनी पाहणे म्हणजे पर्यटकांना  कपिलाषष्टीचा योग होय.

४) पर्यटनाच्या दृष्टीने फोपसंडी परिसरात ” कोंबड किल्ला, भदभद्याचा धबधबा, धुळगडीचा धबधबा, धारीचा धबधबा, कावड्याचा धबधबा, चोहडीचा धबधबा, काजवा महोत्सव, आदिवासी नृत्य, निसर्गसॊदर्याने भरलेला  मानखांदा गायदरा, सानदरी, निखळीचा डोंगर, बाळूबाईचा डोंगर, रांजण्याचा डोंगर, टकोरीची खिंड, वारल्याचा कडा, चारण गडद, दोंड्याची गडद, घोडगडद, केमसावण्याचे पाणी, उंबारले,  अनेक गुहा, तसेच कळमजाई मंदिर, बर्डीनाथ मंदिर, दर्याबाई मंदिर, राणूबाई मंदिर इतके प्रचंड निसर्ग सॊदर्याने भरलेले पॉईंट  येथे पहावयास मिळतात. मात्र त्यासाठी किमान तीन दिवस  पायी भटकण्याची तयारी हवी.

५) या गावचे पाणी पिण्यासाठी अतिशय गोड आहे. तसेच धबधब्याखाली आंघोळ केल्यावर शांपू न लावता ही केस कुरळे होतात.

६) पर्यटकांना राहण्याची, जेवण्याची व पर्यटन घडवून आणण्याची व्यवस्था या गावातीलच फोपसंडीचा कायापालट धडवून आणणारे तथा गाईड श्री.दत्तात्रय हनुमंता मुठे यांचे सह्याद्री दर्शन पथिकालय आहे. मात्र त्यासाठी पर्यटकांना 7218327435, 8669754121, 9850989183 या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. वरील मोबाईलला फोपसंडीत रेंज नसल्याने दुसऱ्या गावात आल्यावरच फोन लागतो.त्यामुळे वारंवार फोन लावावा लागेल.

मॉरिशससारखा छोटा देश आज केवळ तिथल्या सरकारने पर्यटन सुविधेवर भर दिल्याने तिथला निसर्ग पाहण्यासाठी जगभरातील लोक तिथे जातात. भारतात ही फोफसंडी सारखे अनेक निसर्ग सॊदर्य असलेली ठिकाणे आज पर्यटकांपासून वंचित असल्याने तेथील जनतेचा विकास खुंटला आहे.तसेच पर्यटक निसर्ग सॊदर्याला मुकले आहे.चला आपण ही पर्यटनासाठी  या निसर्गरम्य व शांतताप्रिय दरीखोऱ्यातील “फोपसंडी” पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्या.  पर्यटन करून आल्यावर  तेथील सुवासिक तांदूळ, मध, व चुलीवरच्या तांदळाच्या भाकरी, मासवडी, लज्जतदार शेवंती तसेच  गावरान कोंबडीचाही आस्वाद घ्या.

चला तर मग कधी निघताय पर्यटनाला”फोपसंडी”येथे.

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका मोटरमनचं आयुष्य ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एका मोटरमनचं आयुष्य ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर☆

एक मोटरमन ( लोकल ट्रेनचा ड्रायव्हर) याने हे लिहिले आहे

शेवटची लोकल निघते सीएसटीवरून 12. 37 ला. आणि शेवटची पोहोचणारी लोकल असते 1. 38 ची. 12 वाजून 37 मिनीटांनी निघालेली लोकल तीन च्या दरम्यान पोहोचते कर्जत ला. तिथून ती रिटर्न निघते साधारण साडे चारला. मधल्या काळात मोटरमन आणि गार्ड आराम करतात ते त्यांच्यासाठी खास बनवलेल्या रेस्ट रुम मध्ये. तसं प्रत्येक मोटरमन आणि लोकल गार्ड यांच्यासाठी ड्युटी अवर्स असतात अधिक तम 6ते8तास. हे तास ट्रेनच्या रनिंग टाईमनुसार मोजले जातात. त्यात ट्रेन कुठे किती वेळ थांबली वगैरे ग्राह्य धरलं जात नाही. पण त्या  तासात पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून एकटक एका नजरेनं एका दिशेत पाहत राहणं, योग्य अंतरावर प्रॉपर नोटिफिकेशन देणं, दर चारशे मीटरवर येणाऱ्या सिग्नलला तपासणं शिवाय प्रत्येक स्पीड इंडिकेटरवर लक्ष ठेऊन स्पीड मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. रात्रीच्या वेळेस हे काम फार जिकीरीचं असतं. जर स्पीड 40 ऐवजी 42 वर जरी गेला तरी मोटरमन आणि गार्ड यांना कंट्रोल रुमकडून ताकीद जाते. ड्युटी संपल्यावर त्याचं लेखी कारण द्यावं लागतं. एखाद्या वेळेस मोटरमन कडून सिग्नल असताना जरी ट्रेन क्रॉस केली गेली तर अवघ्या पाचशे मीटर अंतर पुढे गेल्यावर ट्रेन आपोआप बंद होते. नवीन मोटरमन बोलावला जातो. चूक झालेल्या मोटरमनला आणि गार्डला आधी सस्पेंड केलं जातं मग चौकशी आयोगाला सामोरं जावं लागतं. चौकशी आयोगाच्या फेऱ्यात रेल्वे कर्मचारी अडकला की त्याचं त्यातून सुटणं मुश्किल असतं. तर ह्या अशा वाहनचालकांच्या बाबतीतलं थोडंसं.

मी अनेकदा यांच्या रेस्ट रुम मध्ये शिरून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. स्वभावाने बरे असतात. पण अबोल असतात. रोज रोज एकच रस्ता. तेच रुटीन, तेच सिग्नल, तेच काम त्यांच्या स्वभावाच्या एकसुरीपणाला कारणीभूत असेल असं वाटलं होतं. पण खरं कारण वेगळंच होतं. त्यातील काहींनी सांगितलेलं कारण फार भयानक होतं. प्रवाशी फुटओव्हर ब्रीजचा वापर करत नाहीत. अपघात होतात. वारंवार हाय डेसीबलचा हॉर्न वाजवून आमच्या कानांचे पडदे फाटतात पण बेजबाबदार प्रवाशांना स्वतःची काळजी करावीशी वाटत नाही. काही लोक आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर निर्धास्त होऊन उभे राहतात. काही मान रुळावर ठेऊन झोपून जातात. काही संडास करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर बसतात ते ही कानाला हेडफोन लावून. रेल्वे क्रॉसींग करताना कानात हेडफोन लावतात. त्यांचं चिरडलं जाणं, कापलं जाणं, तुकडे तुकडे पडलेले शरिर आम्हाला दर दोन तीन दिवसाआड एकदा तरी पहावंच लागतं. जेव्हा जेव्हा कुणी आत्महत्या करतं, ट्रेनमधून पडून मरतं, क्रॉसिंगच्या वेळेस मृत्यूमुखी पडतं तेव्हा आमचं हृदय काही काळासाठी स्टॉप झालेलं असतं. पण ट्रेन चालू असते. लगेच भानावर यावं लागतं. डोळे सुद्धा मिटता येत नाहीत. सिग्नल चुकवायचा नसतो. नाहीतर मोठ्या अनर्थाला सामोरं जावं लागू शकतं. पाहीलेला आघात कडु घोटासारखा गिळून घ्यावा लागतो. थोडा वेळ ही मिळत नाही सावरायला.

एकदा मोटरमनच्या कोचमधून प्रवास करत असताना एका मुलाने अगदी ऐन वेळेला ट्रॅक क्रॉस केला. थोडक्यात बचावला. ट्रेन साधारण ऐंशीच्या स्पीडला होती. मोटरमन भलताच वैतागला. खिडकीच्या बाहेर डोकं काढून त्या पोराला मजबूत शिव्या हासडल्या. म्हणाला, मादरचोद मेरी ही ट्रेन मिली थी क्या तुझे मरने के लिए? त्याचं हे बोलून होईपर्यंत गाडी बरीच पुढे निघून गेली होती. त्याचं बोलणं काय त्या मुलाला ऐकू जाणार नव्हतं. पण तरी मनातला राग व्यक्त करण्याचा त्याचा हा प्रकार होता. (शुभ अप झालेला BP नाॅमल करण्याचा प्रकार समजा हव तर)असो..

लास्ट लोकल च्या प्रवासात रुटीन अपघात होत असतात. कुणी दारातून पडतं तर कुणी ट्रेन पकडण्याच्या नादात तरी पडतं. तर कुणी लोकल सायडींगला लावल्यावर झोपायला मिळावं म्हणून अपोझिट साईडनं चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तरी चाकांमध्ये अडकतं. काही पोलिसांचा अटकाव नको म्हणून टपावर लपून बसतात. काही कपलिंगच्या स्पेस मध्ये लपतात. लपणारे, चढणारे तीनेक तासांसाठी आसरा शोधत असतात. काहींना गर्द घ्यायची असते,…

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे भारतातच घडू शकतं… भाग-2☆ सुश्री मृदुला बेळे

?इंद्रधनुष्य? 

☆ हे भारतातच घडू शकतं… भाग-2 ☆ सुश्री मृदुला बेळे☆

एकदाची  शेवटच्या मजल्यावरच्या त्यांच्या भव्य कार्यालयात जाऊन पोचले. त्यांच्या कार्यालयात होते ते स्वत: आणि एमके हमीद- त्यांचे बंधू. लालसर गोरापान रंग, पूर्ण चंदेरी झालेले केस, तीक्ष्ण नजर पण बोलण्यात अत्यंत मार्दव असलेले माझ्या आजोबांच्या वयाचे डॉ. युसुफ हमीद. त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक वलय होतं…आणि त्यांच्यासमोर बसल्या बसल्या ते मला जाणवू लागलं. त्यानी मजेशीर बोलून माझी चिंता एकदम दूर पळवून लावली आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मला हे का लिहावसं वाटतंय असं त्यानी आधी समजून घेतलं. मग मी किती पाण्यात आहे हे जोखण्यासाठी त्यानी मला माझं या विषयातलं ज्ञान तपासून पाहणारे काही प्रश्न विचारले. आणि मी बरोबर उत्तरं दिल्यावर मग मला म्हणाले, ” हं…आता विचार”. आणि मी त्यांची मुलाखत घेऊ लागले.

उत्तरं देताना प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी लख्ख आठवत होती. किती तरी औषधांच्या रासायनिक संरचना ते समोरच्या वहीत झरझर  काढत होते. मधनंच ” रोझी sssरोझीssss” अश्या मोठमोठ्याने हाका मारत आपल्या सेक्रेटरीला कुठला तरी शोधनिबंध,  वृत्तपत्रातला एखादा लेख, एखादं पुस्तक आणायला लावत होते. जेवायची वेळ झाली. त्या दिवशी प्रत्यक्ष डॉ.  युसुफ हमीद याच्या पंगतीला बसून जेवण्याचा मान माझ्या नशिबात होता. जेवणं आटपून कॉफी पीत पीत आमची मुलाखत परत सुरू झाली. त्या दिवशी संपली नाही म्हणून दुसऱ्या दिवशीही  चालू राह्यली. बोलण्याच्या ओघात मी ज्या लोकांशी बोलायला हवं अश्या किती तरी लोकांची नावं ते मला सांगत होते आणि मी लिहून घेत होते. मुलाखत संपवून  मी नाशिकला परत आले तेंव्हा मी खरोखर थक्क झाले होते. डॉ.  हमीद यांच्या ज्ञानी, मृदू हुशार व्यक्तीमत्वाने दीपून गेले होते.

दोनच दिवसात त्यांच्याकडून एक खोकं भरून पुस्तकं, सीडीज, वृत्तपत्रीय लेख माझ्या घरी येऊन पोचले. त्यानंतर त्यानी सांगितलेल्या या लढ्यातल्या शिलेदारांना शोधून काढून त्यांच्याशी संपर्क करण्याचा माझा उद्योग सुरू झाला. ही मंडळी जगभर पसरलेली होती.

मी राजहंसच्या दि. ग. माजगावकरांना पुस्तकाची कल्पना कानावर घातली आणि त्यांनीही पुस्तक करायला आनंदाने होकार दिला. देशोदेशी पसरलेल्या माझ्या कहाणीच्या नायकांचा शोध घेण्यात गुंतून गेले.

विशेष उल्लेख करीन तो न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रात आरोग्य विषयक लिखाण करणारे पत्रकार डोनाल्ड मॅकनील यांचा. डोनाल्डने मला आतोनात मदत  केली.  डॉ. हमीद यांचं काम सगळ्यात आधी जगाच्या नकाशावर जाहीरपणे आणलं ते डोनाल्डने- न्यू यॉर्क टाईम्समधे याबाबत लेख लिहून. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला डोनाल्डने मला  मोठमोठे ईमेल्स लिहिले, दुसऱ्याना  फोनवर दिलेल्या मुलाखती मला पाठवल्या, स्वत: लिहिलेलं काही लिखाण पाठवलं…आणि इतर किमान पन्नास लोकांशी माझ्या ओळखी करून दिल्या. या सगळ्यांची मी आजन्म  ऋणी राहीन.

तुरीनला असताना जी कहाणी ऐकून मी प्रचंड अस्वस्थ झाले होते, हलले होते, ती कहाणी या सगळ्या मंडळींबरोबर जणू पुन्हा एकदा जगले. त्या कहाणीचा एक भाग झाले. या सगळ्यांशी बोलताना, या बद्दल लिहिताना अनेकदा फार  भावनिक व्हायला झालं. ही कहाणी लिहिताना औषधनिर्माणशास्त्राची एक प्राध्यापक आणि आजन्म विद्यार्थिनी म्हणून माझी सामाजिक बांधिलकी काय आहे याची लख्ख जाणीव मला झाली. ती जाणीव माझ्या विद्यार्थ्यांमधे यावी म्हणून मी फार विचारपूर्वक प्रयत्न करू लागले.

या विषयातली सगळी तांत्रिक माहिती लिहायची,  पण ती सामान्य माणसाला समजली पाहिजे, त्यासाठी ती कादंबरीसारख्या फॉर्ममधे कशी लिहिता येईल, हे एक मोठंच आव्हान होतं.

सामान्य माणूस महाग औषधं घेत राहतो आणि पिळवटला जातो. हे थांबवण्यासाठी भारतीय पेटंट कायद्यात फार उत्तम सुविधा आहेत. त्यावर जगभरातून, विशेषतः अमेरिका आणि युरोपातून प्रचंड टिका होते, भारतावर प्रचंड दबाव आणला जातो. पण आपलं सरकार बधत नाही. आमच्या जनतेचं आरोग्य तुमच्या पेटंटसपेक्षा जास्त महत्वाचं आहे हे ठणकावून सांगत राहते. रेडक्रॉस,  डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स सारख्या सेवाभावी संस्थांना गरीब देशात काम करण्यासाठी morning स्वस्त पण उत्तम दर्जाची औषधं भारत पुरवत राहतो. पण त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपसारख्या दर्जाबाबत अत्यंत जागरूक असणाऱ्या देशांचाही सगळ्यात मोठा निर्यातदार बनतो. भारत  हे कसं करू धजावतो हे जाणून घेण्यात इतर देशातल्या लोकांना प्रचंड रस असतो. आर्जेन्टिना, इंडोनेशियातले लोक जेंव्हा येऊन सांगतात की “सामान्य नागरिकांना औषधं स्वस्तात मिळावी म्हणून काय करायचं हे भारताने आम्हाला शिकवलंय आणि तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावर आम्ही चालतोय”,  तेंव्हा ऊर अभिमानाने भरून येतो.

सगळ्या जगाची फार्मसी  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या औषधनिर्माण उद्योगाचा आपण एक लहान बिंदू इतका छोटा भाग आहोत या विचाराने फार कृतार्थ  वाटतं! आणि म्हणूनच हे ऋण फेडण्यासाठी माझ्यासारख्या या बिंदूने केलेला एक छोटासा प्रयत्न, उचललेला एक खारीचा वाटा,  म्हणजे हे पुस्तक आहे. भारताबद्दल अभिमान वाटण्याचे आणखी एक कारण हे पुस्तक वाचकांना नक्की देईल याची मला नुसती आशा नव्हे तर खात्री वाटते!

समाप्त 

© सुश्री मृदुला बेळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे भारतातच घडू शकतं… भाग-1☆ सुश्री मृदुला बेळे

?इंद्रधनुष्य? 

☆ हे भारतातच घडू शकतं… ☆ संग्राहक – मृदुला बेळे☆

मी इटलीमधल्या तुरीन इथे  बौद्धिक संपदा  कायद्यात एलएलएम करत होते, तेंव्हाची गोष्ट आहे,  2013 सालामधली. दिवसवसभराच्या लेक्चर्सने डोकं आंबून  गेलं होतं, तेंव्हा एलिझा- आमची प्रोग्राम डिरेक्टर -वर्गात आली. ” माझ्याकडे इथं  होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे काही फ्री पासेस आहेत, कुणाकुणाला यायचंय बोला पटकन”, ती म्हणाली. मी अज्जिबात वेळ न दवडता हात वर केला, आणि दुसऱ्या  दिवशी संध्याकाळी एलिझा आणि आम्ही चार पाच जण या चित्रपट महोत्सवाला निघालो. जाऊन पोचलो तर समजलं की तिथं आज जे चित्रपट दाखवले जाणार होते त्यात एक भारतीय चित्रपट होता. डायलन मोहन ग्रे या दिग्दर्शकाचा ‘फायर इन द ब्लड’ या नावाचा.

हा चित्रपट पाहून बाहेर पडले तेंव्हा मी आंतरबाह्य हादरलेले होते. या हादरण्याच्या आड दडलेलं होतं एक कौतुक आणि एक शरम. जगात केवळ औषधं परवडत नसल्याने झालेल्या करोडो गरीब आफ्रिकी लोकांच्या मृत्यूने मी हादरून गेले होते. त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या सिप्ला या भारतीय कंपनीच्या डोंगराएवढ्या कामाबद्दल एक भारतीय असूनही,  आणि औषधनिर्माणशास्त्राची प्राध्यापिका असूनही मला काडीचीही माहिती नव्हती, याची मला प्रचंड लाज वाटली होती. पण त्याचवेळी कौतुक आणि आदराने मन भरून आलं होतं.  हा आदर होता गरीब लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत म्हणून सतत धडपडत आलेल्या, त्यासाठी योग्य धोरण, कायदे ठरवत आलेल्या भारत सरकारच्या दूरदर्शी धोरणाबद्दल, त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राह्यलेल्या भारतीय जनरिक औषध उद्योगाबद्दल, आणि  त्यातल्या सिप्ला, डॉ. रेड्डीज, रॅनबॅक्सी या सारख्या औषध कंपन्यांबाबत.

त्या दिवशी महोत्सवाहून  परत आले ती या विषायाचं भूत मानगुटीवर बसवून घेऊन. याबद्दल खोलात जाऊन वाचल्याशिवाय आणि माहिती करून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला आता चैन पडणार नव्हती. सुदैवाने वाचण्यासारखं भरपूर काही उपलब्ध होतं. मुळात औषधनिर्माण आणि पेटंट हे दोन्ही माझ्या अभ्यासाचे विषय असल्याने वाचलेलं सगळं विनासायास समजत देखिल होतं. एक दिवस अचानक असं वाटायला लागलं की, ” अरे आपल्या देशातल्या वाईट गोष्टींना नावं ठेवण्यात आपण सगळे किती हिरिरीने पुढाकार घेतो. आपल्या देशातला भ्रष्टाचार, इथली रहदारी, अस्वच्छता, गरिबी याबद्दल आपण किती सतत तक्रार करतो, टीका करतो. मग आपल्या देशाने जगासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचा धिंडोराही आपण त्याच उत्साहाने पिटायला हवा,  नाही का? त्यात आपण मागे का? कुणी तरी करायलाच हवं हे काम”. हा विचार डोक्याच्या एका कप्प्यात सतत सतत फेर धरून नाचत होता.

दरम्यान मी तुरीनहून भारतात परत आले, माझ्या दिनक्रमात अडकले, तरी हा विषय पिच्छा सोडत नव्हता.  ” कथा अकलेच्या कायद्याची” या बौद्धीक संपदेवरील माझ्या स्तंभाचं लोकसत्तेत लिखाण सुरू झालं.  या स्तंभाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत सुखावणारा तर होताच. एक दिवस ‘ फायर इन द ब्लड’ पाहून बसलेला धक्का, वाटलेली शरम आणि जाणवलेला अभिमान, सगळे जणू कट करून गोळा झाले, आणि माझ्याभोवती फेर धरून नाचत सांगू लागले, “तूच सांग की ही कहाणी जगाला- तूच लिही” आणि माझ्याही नकळत मी आफ्रिकेत ” औषध औषध” म्हणत प्राण सोडणाऱ्या लाखो करोडो आफ्रिकन माणसांना वचन देऊन बसले – ” हो मी लिहीन”.आणि मग सुरू झाला एक वेडं करणारा प्रवास. मिळेल तिथून, मिळेल त्या स्वरूपात, मिळेल ते वाचायला सुरुवात झाली. एक दिवस सिप्लाचे सर्वेसर्वा युसुफ हमीद यांचा ईमेल अ‍ॅड्रेस कुठून तरी मिळाला. तो बरोबर आहे की नाही हे सुद्धा मला माहित नव्हतं. आणि ते मुळीच उत्तर देणार नाहीत हे माहित असूनही ” मला तुमच्या कामावर असं असं पुस्तक लिहायचंय” असं कळवणारा ईमेल  मी त्यांना धाडून मोकळी झाले. दुसऱ्याच  दिवशी त्यांचं उत्तर आलं. पुढच्याच महिन्यात ते लंडनहून भारतात येणार होते आणि तेंव्हा मला भेटायला ये असं त्यांनी मला कळवलं होतं. मी हे वाचून प्रचंड खूश झाले आणि जोमाने कामाला लागले. आणखीन झपाट्याने वाचू लागले.

दरम्यानच्या काळात ते मुंबईत आले. माझं दोन तीनदा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं.  दिलेल्या वेळेला त्याना फोन करूनही ते जर उचलू शकले नाहीत तर ते आठवणीने परत फोन करत आणि ” येस्स माय डिअर गर्ल…टेल मी व्हॉट आय कॅन डू फॉर यू” असं प्रेमाने बोलायला लागून मला आश्चर्यचकीत करत असत.

शेवटी त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या वेळेच्या बरीच आधी पोचून मी मुंबई सेंट्रल स्टेशन वरून सिप्लाच्या जुन्या कार्यालयाकडे चालत निघाले तेंव्हा मनात प्रचंड उत्कंठा तर होतीच. पण मी प्रचंड बेचैन होते. डॉ युसुफ हमीद यांच्या सारखा केम्ब्रीज मधे शिकलेला ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध  माणूस… अब्जाधीश….सिप्ला या भल्या मोठ्ठ्या औषध कंपनीचा सर्वेसर्वा!  तो माझ्यासारख्या एका किरकोळ प्राध्यापिकेला भेटायला तयार झाला होता. आणि मी त्यांच्याशी नीट बोलू शकेन का या विचाराने माझ्या तळहाताला घाम फुटला होता…पाय लटपटत होते…छाती धडधडत होती.

क्रमशः….

© सुश्री मृदुला बेळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वक्रतुंड महाकाय – श्री हेमंत कुलकर्णी ☆ संग्राहक – सुश्री भावना दांडेकर

?इंद्रधनुष्य?

☆ वक्रतुंड महाकाय – श्री हेमंत कुलकर्णी ☆ संग्राहक – सुश्री भावना दांडेकर ☆

वैशाली प्रसाद पराड़कर जोग यांनी त्यांच्या एका टिपणीमध्ये या सुप्रसिद्ध श्लोकाचा अर्थ दिला होता. श्रीनिवास चितळे यांनी नेमका वक्रतुंड या शब्दाचाअर्थ विचारला. वैशाली प्रसाद पराड़कर जोग  यांनी आपल्या मूळ टिपणीप्रमाणेच “वाकड्या तोंडाचा” असा अर्थ सांगून वर “सोपा आहे” अशी पुष्टी जोडली. यावर श्रीनिवास चितळे यांनी या शब्दाचा खरा अर्थ “वक्रान् तुण्डयति”(वाकड्या माणसांना शासन करणारा)असा आहे असे स्पष्ट केले.यावर वैशाली प्रसाद पराड़कर जोग यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

यावरून माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा आठवला.

जन्मापासून सत्तावीस वर्षं मी बेळगावातच होतो.त्यावेळी केवळ आमच्या घरातच नव्हे तर आजूबाजूलाही धार्मिकच वातावरण होतं.भजन-कीर्तन-प्रवचन-पूजा यात दिवस कसा गेला हे कळतही नसे.पण सर्वत्र वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा असंच सांगितलं जायचं.संस्कृतचं थोडंफार ज्ञान असूनही हा अर्थ कधीही चुकीचा वाटला नाही. किंबहुना त्यामुळेच या शब्दाचा हा अर्थ योग्य आहे हे समजलं होतं.

देवाला त्याचा भक्त असं कसं म्हणेल हा प्रश्नच मला कधी पडला नाही.कारण संत तुकाराम महाराजांची बायको आवली हि विठ्ठलाला काळतोंड्या म्हणत असे हे सर्वश्रुत होतं. तसेच विठ्ठलाच्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ गणले गेलेले संत नामदेव महाराज यांचा पुढील अभंग प्रसिद्धच आहे.

“पतितपावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा

पतितपावन न होसि म्हणुनी जातो माघारा

घेसी तेंव्हा देसी ऐसा अससी उदार

काय देवा रोधू तुमचे कृपणाचे द्वार

सोडि ब्रीद देवा आता न होसी अभिमानी

पतितपावन नाम तुजला ठेवियले कोणी ”

याशिवाय नवविधा भक्तीमध्ये विरोधी भक्ती हीसुद्धा समाविष्ट आहे हेही मला माहीत होतंच.त्यामुळे या अर्थाचा मी पूर्णपणे स्वीकार केला होता.

१९७२ साली मला पोटासाठी बेळगाव सोडून मुंबईत स्थायिक होणं भाग पडलं.

त्याच वर्षी दादरच्या शिवाजी उद्यानात दिलेल्या प्रवचनात पं.सातवळेकर यांनी वक्रतुंड या शब्दाचा खरा अर्थ “वक्रान् तुण्डयति”(वाकड्या माणसांना शासन करणारा)असा आहे असे सांगितले.यामुळे माझ्या मनात (भावनिक नव्हे पण बौद्धिक) हलकल्लोळ माजला.जोपर्यंत एकच अर्थ माहित होता तोपर्यंत तोच स्वीकारार्ह वाटत होता.पण दुसरा अर्थ समजल्यावर कोणता अर्थ बरोबर आहे हे निश्चित केल्याशिवाय माझ्या जन्मजात कन्याराशीजन्य चिकित्सकपणाला चैन पडणे शक्य नव्हते.एका बाजूला आयुष्यभर ऐकलेले अनेक प्रवचन-कीर्तनकार व दुसऱ्या बाजूला एकटेच पं.सातवळेकर असले तरी कॊणाच्याही प्रभावाखाली निर्णय घेणे हे माझ्या स्वभावाविरुद्ध होते.तसेच या बाबतीत पुरेसे पुरावे गोळा करणे हे माझ्या जन्मजात आळशीपणाला परवडणारे नव्हते.त्यामुळे हा प्रश्न तर्काने सोडवणे याला पर्याय नव्हता.त्यामुळे मी पुढीलप्रमाणे तर्क केला.

गणपतीचे शीर हत्तीचे आहे हे सर्वज्ञातच आहे.यामुळेच त्याची गजानन,गजवदन,गजमुख,गजवक्त्र,गजास्य,गजतुंड अशी अनेक नावे प्रचलित आहेत.जर वक्रतुंड या शब्दातील तुंड या पदाचा अर्थ तोंड असा असेल तर वरीलप्रमाणे गणपतीचीवक्रानन,वक्रवदन,वक्रमुख,वक्रवक्त्र,वक्रास्य ही नावेदेखील प्रचलित झाली असती.पण ही नावे प्रचलित तर सोडाच,पण निदान माझ्यातरी ऐकिवातही नाहीत.शब्दांचे खेळ मांडण्यात धन्यता मानणाऱ्या संस्कृतभाषेत हे स्वाभाविकही नाही.त्यामुळे तुंड हे पद तोंड या अर्थी नाही हा एकच निष्कर्ष निघू शकतो.म्हणजेच वक्रतुंड या शब्दाचा खरा अर्थ “वक्रान् तुण्डयति”(वाकड्या माणसांना शासन करणारा)असा आहे हे निस्संशय.

वाईट इतकंच वाटतं कीं,इतका काळ लोटल्यावरही लोकांच्या मनात चुकीचाच अर्थ रुजलेला आहे.आशा आहे कीं,लवकरच सर्वांना खरा अर्थ समजेल.

– श्री हेमंत कुलकर्णी

संग्राहक:  सुश्री भावना कांडेकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print