मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नाचकीन ! एक सहज कानकोरणं ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ नाचकीन ! एक सहज कानकोरणं ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

इअर बड अस्तित्वात येण्याआधी आणि ते सुधारीत आवृत्तींच्या कानाशी लागण्यापूर्वी नाचकीन किंवा नाचकिंड नावाचं शस्त्र प्रत्येक घरी असायचंच. बाजारात,एस.टी.स्टॅन्ड्सवर,रेल्वे स्टेशन्सवर एका गोल तारेत गुंफून ठेवलेली ‘नाचकिंड’ विकणार-या (बहुदा) महिला दिसायच्या. या बाबीला विविध नावे असतीलच गावां-गावांनुसार हे निश्चित.  

हे स्वस्तातलं आणि बहुपयोगी अवजार म्हणून जनतेत,त्यातल्या त्यात ग्रामीण भागात प्रसिद्ध होतं. यात प्रामुख्याने तीन पाती असायची. एक दांडपट्ट्यासारखं…टोकाला तिरकं…धार आणि एक टोक असणारं. ग्रामीण भागात बाभळी आणि त्यांचे काटे टाळता न येणा-या बाबी असतात. पायांत चामडी जाड वहाणा नसतील, तर कंटक हे समाजाच्या तळपायांत घुसखोरी करायला सदैव वाटेवर पसरलेले असायचेच. त्याकाळी चप्पल म्हणजे चैनीची बाब असायची. नंतर आलेल्या एकोणीस रुपये नव्य्याण्णव पैसे फक्त स्लीपर्सचा काट्यांना धाक नसायचा. मग पायांत काटा घुसणं सहज व्हायचंच. शिवाय हे बेटे काटे बाहेर काढताना त्यांची टोकं टाचेतच रुतून बसून रहायची…एखादी अप्रिय गोष्ट मनात रुतून बसते तशी. मग हा उर्वरीत काटा बाहेर काढण्याची मोठी कसरत करावी लागत असे…त्यासाठी नाचकीन मधलं हे हत्यार उपयोगात यायचं. तळपायातला हा काटा एक्तर दिसणं दुरापास्त असे. अंदाजाने शस्त्र वापरावं लागे. आधी त्या काट्याभोवतीचा मांसल भाग कोरून तिथे जागा करून घ्यावी लागे. काट्याचा किंचित जरी भाग वर दिसू लागला की लगेच नाचकीन मधील चिमटा हाती घेतला जाई. हे ऑपरेशन तसं बराच वेळ चाले. कधी कधी काटा निघाला आहे, असं समाधान वाटे…पण चालायला गेलं तर ‘काही तरी राहून गेल्यासारखं’ फिलींग येत राही…आणि मग ही हत्यारं पुन्हा परजली जात. 

पण यातलं एक अस्त्र मात्र अगदी उपयोगाचं असे…कानकोरणं. दुधारी शस्त्र. उपयोग चुकला की जग आपल्यासाठी मुकं होण्याची शक्यता खूप जास्त. याच्या टोकाला खोलगट वाटीसारखा एक भाग असतो. कानात ही वाटी अलगद सरकवावी लागे आणि अंदाजाने कान ‘कोरला’ जाई. पाषाणातून मूर्ती कोरणा-या कलावंतासारखंच पूर्ण एकरूप होऊन हे काम करावं लागे. यात जवळपास कुणीही असता कामा नये…धक्का लागी बुक्का ! 

कानकोरण्याच्या या वाटीमध्ये जमा होऊन आलेला मळ वाटीतून कोरून काढावा लागे आणि त्याचं नेमकं करायचं काय याचा विचार आधीच न करून ठेवल्यामुळे मग त्याची विल्हेवाट लावणं मुश्किल व्हायचं.

काही लोक या कानकोरण्याला कापसाचा बोळा लावून कानकोरणं कानात घालत. हेच पाहून कंपनी वाल्यांना प्लास्टीकच्या काडीला मेडिकेटेड कापूस बोंड लावून बड (म्हणजे कळी) लावण्याची कल्पना सुचली असावी. पण ही बड नीट नाही वापरली तर इतरांची बडबड ऐकू येण्याचा प्रसंगही उदभवत येऊ शकतो. कानकोरण्याची एकच बाजू वापरता येते…बड मात्र दोन्ही बाजूंनी कान टवकारून उभी. मात्र या कळीवरचा मळ काढून टाकण्याची सोय मुद्दामच केली नसावी. वापरून झालं की सरळ फेकून द्यायचं. नाचकिन मात्र वापरलं आणि ठेवून दिलं की पुरे. मात्र ही वस्तू शेजारी पाजारी हक्काने मागून घ्यायची वस्तू म्हणून घेऊन जात आणि मागितल्याशिवाय परत करण्याची परंपरा नसते! कुणी मागितलीच तर उद्या आमचं आमचं  विकत घेऊन येऊ…त्यात काय एवढं, असं ऐकून कानातला मळ आणखीन घट्ट होत असे. असो. 

नाचकिन फेकून देण्याची गरज नसे…पण जॉन नावाच्या कुणा इसमाच्या मुलाने तयार करून दिलेले हे काडीपैलवान फेकून दिल्याशिवाय पर्याय नसतो. समुद्रात जो कचरा बाहेर काढला जातो..त्यात सर्वांत जास्त कचरा ह्या कापूसधारी काड्यांचा असतो युरोपात…असं म्हणतात.

कान कोरताना एक अनुभव निश्चित येतो…तो म्हणजे खोकला ! काय असेल ते असो…मात्र मानेवरील जे अवयव असतात ते एकमेकांशी अत्यंत जवळचे संबंध ठेवून असतात. कानांच्या आत कुणी खाजवलं की घशाला त्याची संवेदना जाणवते आणि मग थोडं थांबून कान कोरण्याचा खो खो पुन्हा खेळायला सुरूवात करावी लागते. कान कोरताना जास्त जोर लागला की तिथली खेळपट्टी खरवडून निघते आणि मग शब्दांचे चेंडू स्पिन व्हायला लागतात या खेळपट्टीवर पडलेले. म्हणून खूप हळूवार फलंदाजी करावी लागते…राहूल द्र्विड सारखी. पण आधुनिक वैद्यकशास्त्र हा द्राविडी प्राणयाम करू नका असं सुचवते…अगदी बरोबर! पण बडने कान कोरण्यात तसे कमी थ्रील असते म्हणून बरेच दिवस ऐकतच नव्हते डॉक्टरांचे. आणि शिवाय या बडचा कापूस कानातच राहून गेल्याच्या केसेस सापडतात खूप…म्हणून लोकांना कान कोरणं बरं वाटायचं. कान कोरणं ते शेवटी कान कोरणं. कोणतीही किल्ली चालते लोकांना कानात घालायला. काही बहाद्दर तर काडेपेटीतली गुलाची काडीही आत घालायला कमी करीत नाही. कानात मळाचा खडा झालेला असेल आणि त्या खड्यावर हा गुल घासला गेला तर केवढा जाळ निघेल ना? आणि नंतर घरचे कानाखाली काढतील तो जाळ असेल तो वेगळाच. 

(हाताच्या) बोटांचा वापर कानात घालण्यासाठीही होतो. फक्त अंगठा,मधले बोट याला अपवाद. करंगळीला प्राधान्य कारण ती बिचारी काहीशी सडपातळ असते बहुतेकांची. पण बोटांनी कानात गेलेलं आणि तिथंच रेंगाळत राहणारं पाणी बाहेर निघू शकतो…पण त्यासाठी कानाची फार कानधरणी करावी लागते. हे पाहणं मात्र नयनरम्य असते….ज्या वेगाने बोटाची हालचाल करावी लागते, मान एका बाजूला खाली घालावी लागते…सर्वच प्रेक्षणीय! पण ते पाणी बाहेर पडताना कानांना मिळणारं सुख दैवी. हल्ली यासाठी अनेक स्वयंचलित यंत्रे मिळतात म्हणे. पण अजून या गोष्टी ब-याच लोकांच्या कानावर आलेल्या दिसत नाहीत. 

हलक्या कानाचे लोक या इशा-याकडे डोळेझाक (की कान झाक?) करू शकतील…पण कानातील मळ हा जबरदस्तीने काढण्याचा पदार्थ नव्हे…तो आपल्या मनाने हळूहळू बाहेर येतोच. तो गोडीगुलाबीने काढून घ्यायचा पदार्थ आहे…एखाद्याकडून आपण त्याची सिक्रेटस काढून घेतो तशी. तशीही मळ ही ‘सीक्रीट’ होणारी गोष्ट आहे..म्हणजे स्रवणारी! .कानांना निसर्गाने दिलेलं संरक्षण आहे मळ म्हणजे! (यह) मैल अच्छा होता है! आपल्याकडे कानांत तूप किंवा तेल त्यात लसणाची एखादी पाकळी घालून,थोडंसं गरम करून आणि थंड करून,कापसाच्या बोळ्यानं घालण्याची पद्धत आहे. त्यानं नेमकं काय होतं हे डॉक्टरांना विचारायला पाहिजे….पण फारसं नुकसान झाल्याचं कानावर नाही आलेलं अजून. काही लोक आपल्या हाताच्या बोटांची नखे कानात घालतात…खूप वाईट्ट आहे हे…पण त्याने बरे वाटत असेल तर आपण कशाल कुणाचे कान भरा? भिंतीला असलेलं कान कशाने बरं कोरत असतील असाही प्रश्नच आहे. या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही असं कसं बरं शक्य आहे. पण निसर्गाने दोन्ही कानांचा एकमेकांशी काहीहे संबंध ठेवला नाही ते एक बरे आहे. एक खराब झाला तरी दुसरा सगळ्यांचं ऐकून घ्यायला तयार. दोन कान शेजारी पण भेट नाही संसारी हेही खरेच. 

कानकोरणं आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एखादं घरात किल्यांच्या जुडग्यात असेल तर काढून हुकला अडकवून ठेवा….पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी. फक्त ते कानांत घालायचं नाही (आणि इतरही काही…पेंसिल,पेन इत्यादी) एवढी गोष्ट मात्र या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ नका !

सहज वाटलं म्हणून तुमच्या कानावर घातले झालं ! वाटल्यास कर्णोपकर्णी होऊन जाऊ द्या ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पोच पावती… लेखक : श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ पोच पावती… लेखक : श्री विकास शहा  ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

मागे एकदा पोस्टात गेलो असताना एक आजोबा स्टाफला विचारत होते, ” ह्याची पोचपावती मिळेल ना ?”

बरेचदा मी ही हिला सांगतो acknowledgment म्हणून जपून ठेव!

नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं लिहू लागली… 

पोचपावती ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही का असू नये ?? 

ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा.

कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना appreciation असू शकतं.

ह्या पोचपावतीचे माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई- अप्पा. 

घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला, कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसं आवर्जून सांगतात “छान झाला बर का आजचा कार्यक्रम” आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो!

पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते 

एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींच appreciation देऊन बघा अगदी मनापासून त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलतं. 

आमची घर कामवालीला गजरे , फुल घालून यायची फार आवड, कधी त्या मोठा गजरा घालून कामाला आल्या की हिच्या तोंडून उस्फूर्तपणे येतं –  “प्रमिला काय मस्त दिसतेय, चल एक फोटो काढते तुझा !” ह्यानेसुद्धा त्या खूप खुश होतात.

लहानांपासून मोठ्यांपर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते.

एखादं मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो की वर्गात “छान निबंध लिहिलंस हो” अस म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो. 

ह्या पोचपावती साठी माणूस फक्त जवळचाच हवा असं नाही  कधीतरी दुकानदाराला ही म्हणावं “काका तांदूळ चांगले होते हं तुमच्याकडून घेतलेले “

सामान्य माणसांपासून अगदी कलाकारांपर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, ही दखल घायला आणि द्यायलाही वयाच बंधन नसावं.. कधीच.

काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात ,

पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो ..! 

बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही.

तसं करूही नये कारण पोचपावती जितकी उस्फुर्त, तितकीच जास्त खरी !

पोच पावती फक्त शब्दातूनच नाही तर डोळ्यातून तर कधी कृतीतून, स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं तशी तशी ती पोचवावी.

कधी योग्य आदर ठेवून, कधी गळा मिठी मारून, अगदी कधी “च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या” अशी वेगळ्या भाषेतून ही यावी. 

माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उस्फुर्त,

महत्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच आजकालच्या मुलांच्या भाषेत cool dude हवा. 

ह्या पोच पावतीने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो.

आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी काही लागत नाही 

…… फक्त मोकळं व स्वच्छ मन !

लेखक : श्री विकास शहा

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मार्क’ म्हणजेच गुणवत्ता नाही ! ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ‘मार्क’ म्हणजेच गुणवत्ता नाही ! ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

नुकतीच एक बातमी वाचली…. 

नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली. मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती.

माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.

एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, “सर्वजण त्यांना काय म्हणतात?” 

मुले म्हणाली, की ‘स्कॉलर’.

मी विचारले ‘का?’,

मुले म्हणाली, “कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात.”

मी समीकरण मांडले. 

‘अ = ब’ 

व 

‘ब = क’ 

त्याअर्थी ‘अ = क’.

म्हणजेच,

‘मी = स्कॉलर’ 

व 

‘स्कॉलर = मार्क’. 

याचा 

अर्थ ‘मी = मार्क’. 

जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो, तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की, आपली किंमत कमी झाली असे वाटते.

सर्व परीक्षा बोर्डांनी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे.    हे धोकादायक आहे….

माझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी ‘वा’ म्हटले. 

ती लगेच म्हणाली-मार्क दे.

मी चित्राच्या बाजूला लिहिले ‘छान’. 

ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.

अडूनच बसली.

शाळेत जायच्या आधीपासूनच हे डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. या विषारी वातावरणाने वरील बळी घेतले आहेत.

जेव्हा कधी पालकांना विचारले की, तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते? तेव्हा 

हमखास उत्तर येते की, ‘तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.’

जरा विरोधाभास पाहूया…

मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.

मी विचारले “चांगला डॉक्टर कोणाला म्हणता?”

तर मुले म्हणाली की, “जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार देऊन बरा करतो तो.”

सिल्वर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल ना?

पण बनला का?

त्याच्या आधीच गेला.

चांगला नागरिक,

चांगला माणूस,

चांगला डॉक्टर,

चांगला व्यावसायिक…

आपण जेव्हा काहीतरी चांगले “करतो” तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.

एका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात वीसापैकी १४ मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की, ‘आय एम युझलेस’.

या मुलीला दहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कलाशाखेला जाणार आहे. 

मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?

ती म्हणाली ‘नाही’. 

मी म्हटले की याचा अर्थ तू दहावी नंतर गणिताला टाटा करणार, मग तू गणितासाठी जीव का देत होतीस?

हे ऐकल्यावर तिलाही हसू आले. 

काय आहे की,

‘गुणी मुलगी’,

 ‘भावंडात हुशार मुलगी’, 

‘सर्वाची आवडती’, 

‘९०% मिळायला हवेत हं’. या इतरांच्या मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते. ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस….!

मुलांमध्ये खूप क्षमता असते,

परंतु मार्कांवर लक्ष केंद्रित 

केल्यामुळे त्या क्षमतांना 

‘किंमत’ दिली जात नाही. 

आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. 

पालकांनी लक्षात घ्या की, हे “आपल्या” लक्षात न आल्यामुळे जेव्हा मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा “आपण” नकळत हिंसक होतो. मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो.

मार्कांवरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. आता जगताना काय करायचे याचा विचार करूया. 

‘थ्री इडियट’ सिनेमातील मुलाखतीच्या प्रसंगात आजवर मार्कांवरून आपली किंमत ठरवणारा, घाबरणारा मुलगा म्हणतो… ‘जिंदगी में कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा’..

हा आत्मविश्वास मुलांना द्या !

आवडले तर नक्की शेयर करा…!

तुमचा हा संदेश कित्येक पालक आणि विद्यार्थ्याचे मनपरिवर्तन करु शकतो…

लेखक : डॉ. अरुण नाईक. (मानसोपचारतज्ञ)

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

पर्यावरणपूरक गणेशोत्सव व सामाजिक जबाबदारी ह्या नूतन संगमातून ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प चिंचवड येथील श्री शंकर महाराज सेवा मंडळ राबवत असून त्यातून मिळणारी आर्थिक मदत वृद्धाश्रमासाठी व विविध सामाजिक कार्यासाठी वापरली जाते.

श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था असून रक्तदान शिबिरांपासून संस्थेची सुरुवात झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम संस्थेद्वारे राबविले जातात व त्यापैकीच एक महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे संस्थेकडून किवळे येथे ‘स्नेहसवली – आपलं घर’ हा निशुल्क वृद्धाश्रम चालविला जातो. आज रोजी संस्था २५ निराधार आजी – आजोबांचा सांभाळ करत असून त्यांचा निवास, भोजन, कपडे, इतर संबंधी गरजा तसेच महत्वाचे म्हणजे आवश्यक मोफत वैद्यकीय सेवेची जबाबदारी संस्था घेत आहे. सांभाळ करत असणाऱ्या वृद्धांचे वयोमानानुसार अंगी लागणारे आजार, वैद्यकीय तपास व गरजेप्रमाणे बायपास सर्जरी, कॅटरॅक्ट ऑपरेशन, हिप रिपलेसमेंट सारखे अवघड व खर्चीक शस्त्रक्रियेची जबाबदारी देखील निशुल्क उचलली जाते. हा सर्व डोलारा चलविण्यासाठी येणारा खर्च हा साधारण दोन लाख रुपये प्रति महिना असून तो उभा करण्यासाठी संस्था अनेक उपक्रम राबवते व त्यातून मिळणारे दान व होणारी आर्थिक मदतीतून वृद्धाश्रमाचा सर्व खर्च भागविला जातो. ह्या मध्ये दैनंदिन स्तरावर  संस्थेकडून रद्दीदान व भंगारदान उपक्रम राबविला जातो ज्याअंतर्गत संस्थेद्वारे घरोघरची रद्दी व भंगार गोळा करून निधी निर्माण केला जातो व ह्याकरिता साधारण सतरा हजार कुटुंब दानस्वरूपी मदत संस्थेला वर्षभर करतात. ह्याबरोबरीने संस्थेकडून अभिनव संकल्पनेने दरवर्षी नियमितपणे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा उपयुक्त प्रकल्प राबविला जातो.

मूर्ती आमची किंमत तुमची’ ह्या प्रकल्पांतर्गत केवळ नैसर्गिक रंगात रंगवलेल्या (हळद, कुंकू, बुक्का व गुलाल हयातून निर्मित) पर्यावरण स्नेही शुद्ध शाडू मातीच्या मूर्तींचे दालन भरवले जाते. अभिनव संकल्पना अशी की ह्या दालनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही केवळ प्रदर्शनाला ठेवली जाते व त्याची कोणतीही विक्री किंमत मांडली जात नाही. उलट येणाऱ्या भक्ताने आपल्या मनाला पसंत पडेल ती मूर्ती निवडायची असते व भक्ताला जी किंमत वाटेल ती गुप्तदान पद्धतीने दानपेटीत टाकून मूर्ती घेऊन जायची एवढी सोपी पद्धत आहे. लोकांना चांगल्या गुणवत्तेच्या मूर्ती उपलब्ध करून देणे, मनुष्याची भाविकता जपणे व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणे हा त्यामागचा उद्देश असून अधिकाधिक लोकांशी संस्थेला जोडता यावे व अधिकाधिक दान पदरात पडावे, जेणेकरून समाजाची अधिकतर सेवा करता यावी हा या उपक्रमामागचा सुप्त हेतू आहे. वेगवेगळ्या आकारातील व विविध प्रकारामध्ये श्रींच्या मूर्ती ह्या दालनात प्रदर्शनाला ठेवल्या जातात. तसेच प्रदर्शन कालावधीमध्ये अखंड नामजप, दत्त याग, गणेश याग, संत पादुका दर्शन, रक्तदान शिबिर,मोफत आरोग्य तपासणी शिबिर, पुस्तक प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम संस्थेकडून आयोजित केले जातात. गणेशमूर्तीविषयी प्रत्येकाला एक ओढ असल्यामुळे हा प्रकल्प काय आहे हे समजावून घेण्याच्या मनस्थितीत कोणी नसतो. परंतु पर्यावरण, सेवा, अध्यात्म, धर्म, राष्ट्रप्रेम, माणुसकी, दान, समाज संघटन या अष्टसुत्रीवर हा प्रकल्प आधारित असून हा समाजाने समाजासाठी चालविलेला समाजाचा सामाजिक प्रकल्प आहे. जगात असे कोठेही उदाहरण नाही जेथे एक उत्पादक आपल्या वस्तूंची किंमत ग्राहकाला ठरविण्यास सांगतो आहे. अगदी भाजी, दूध, वर्तमान पत्र या पासून सोनं नाणं, जमीन जुमला या पर्यन्त कोठेही आपल्या मर्जी प्रमाणे पैसे देण्याची किंवा अजिबात पैसे न देता सेवा/वस्तू घेण्याची मुभा नसते पण येथे आपणास ही मुभा आहे कारण नात्यानात्यामधील विश्वास स्थापित करण्यावर संस्थेचा भर आहे. संस्थेचे कार्य सर्वदूर पोहोचावे व लोकांनी ह्या सामाजिक कार्याला हातभार लावावा यासाठी ही प्रयत्नांची पराकाष्टा केली जाते. यंदा ह्या प्रकल्पाचे १० वे वर्ष असून सुमारे २२०० मूर्ती दलनामध्ये प्रदर्शनास उपलब्ध आहेत. गेली ९ वर्षे मोजके भाविक परदेशात गणेश मूर्ती घेऊन जातात तसेच भारताच्या जवळजवळ प्रत्येक प्रांतात व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाविक मूर्ती घेऊन गेल्याचा संस्थेचा अनुभव आहे. आगळ्यावेगळ्या ‘ स्नेहसावली – आपलं घर ’ या नि:शुल्क वृध्दाश्रमास भेट द्या व गणेश मूर्ती घेऊनच जा, मूर्ती मिळो, घेवो अथवा न घेवो. प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने तेथे ठेवलेले एक पाकिट घेऊन दानधर्म या स्तुत्य सामाजिक कारणासाठी करावा ही अपेक्षा व आवाहन संस्थेकडून लोकांना केले जाते. यंदा हे प्रदर्शन दि. ०८/०९/२०२३ रोजी सं. ४ पासून मूर्ती संपेपर्यंत चिंचवडे लॉंन्स, हॉटेल रिव्हर व्यू समोर, चिंचवडगाव येथे खुले असणार आहे.

ह्या बरोबरीनेच संस्था गेली 30 वर्षे रक्तदान क्षेत्रात कार्यरत आहे व आजपर्यंत सुमारे १५०० हून अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन सामाजिक बांधिलकी ह्या नात्याने केले आहे. संस्थेद्वारे समाजातील गोर-गरीब, गरजू लोकांना रुग्णसेवा दिली जाते, ज्यात प्रामुख्याने गरजू रुग्णांचे विविध शस्त्रक्रिया करून संबंधित औषधोपचार व उपयुक्त वैद्यकीय वस्तू, जसे वॉकर, व्हील चेअर, डायपर्स, ई. निःशुल्क पुरविले जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत देखील संस्था आजवर करत आली आहे. तसेच कापडी पिशवी चे वितरण व इतर संबंधित पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवण्यात देखील संस्थेचा अधिक जोर आहे. 

संस्था संपर्क –

संस्थेचे संचालक : डॉ. अविनाश वैद्य – ९५७९२२५२९८ / डॉ. मनाली वैद्य – ९४२०८६३९२०

संस्थेचे व्यवस्थापक : सौ. आशाताई पात्रुडकर – ९४०४८३०१६०

माहिती संकलन : सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाच्या गहनतळी… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाच्या गहनतळी… ☆ श्री सुनील देशपांडे

आजकाल सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी आपल्या संस्कृतीचे गोडवे गात असताना किंवा धर्म संकल्पनेचे गोडवे गात असताना, जे जे आधुनिक विज्ञानामधले शोध लागलेले आहेत, ते सगळे पूर्वीच आमच्या संस्कृतीमध्ये किंवा धर्मात अस्तित्वात होते असे सांगितले जाते.  त्यासाठी तार्किक समीकरणे जोडून पुरावे सुद्धा दिले जातात. या सर्व गोष्टींची गंमत वाटते. 

एक प्रश्न असा पडतो की जे  जे आपल्याकडे होते, ते सर्व परदेशी शास्त्रज्ञांनी शोध लागल्यानंतरच आपल्याला कसं समजलं ? त्याआधी कसं माहित नव्हतं ?  जर हे आपल्याकडे आधीच होतं तर परदेशी शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांच्या आधीच आपण हे शोध इंग्लिश भाषेमध्ये भाषांतरित करून का सादर केले नाहीत ?  त्यांनी शोध लावल्यानंतरच मग आपण कित्येक वर्षानंतर आमच्याकडे हेच कित्येक वर्षांपूर्वी होतं असं सांगण्याची सर्कस का करतो ? ते सुद्धा सुरुवातीला त्या शोधांना विरोध करून, नंतर त्यांची सिद्धता आणि उपयोगिता या बळावर जेव्हा जगभर पसरते त्यानंतर मग हे आमच्याकडे होते असं सांगण्याची अहमहमिका सुरू होते. असं का ? .. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी माझ्याच मनाच्या गहनतळात खोल बुडी मारून विचार करू लागलो.

गहनताळात जाऊन विचार करता  मला दोन शक्यता आढळून आल्या.

पहिली शक्यता ही की हे सर्व शोध एका वेगळ्या स्वरूपात आपल्याकडे होते असे गृहीत धरू. मग ते मध्येच लुप्त होण्याचे कारण काय ?  हे संशोधन थांबण्याचे कारण काय आहे ?  या शास्त्रज्ञांच्या शोधाची पुढे काहीच प्रगती का नाही झाली ?  या सर्वांचा विचार करता असे झाले असण्याची शक्यता आहे की, काही स्वार्थी प्रवृत्तींनी या सर्व शास्त्रज्ञांना बाजूला सारून, सत्ताधारी राज्यकर्त्यांना हाताशी धरून स्वतःची राज्यसत्ता आणि धर्मसत्ता अबाधित राखण्यासाठी काहीतरी षडयंत्र करून या संशोधनामागील तत्त्व सोडून दिले . त्या संशोधनाला विकृत स्वरूप देऊन काही रुढी निर्माण केल्या.  त्यालाच शास्त्र म्हणून पुढे करून पुढील पिढ्यांची दिशाभूल केली.  मुख्य तत्व न अंगिकारता फक्त रुढींनाच शास्त्र समजून त्या रूढींचं अवडंबर माजवलं गेलं. त्यामुळे धर्माचं किंवा संस्कृतीचं मूळ तत्व हे बासनात गुंडाळून त्या तत्त्वाच्या अनुषंगाने त्यावेळच्या कालमान परिस्थितीनुसार ज्या काही रूढी पडल्या होत्या त्याच अपरिवर्तनीय मानून त्याला धर्माचे स्वरूप दिलं गेलं.  ज्या ठिकाणी परिवर्तनीयता संपते त्या ठिकाणी धर्माचं भ्रष्ट स्वरूप अंगिकारलं जातं. 

दुसरी शक्यता अशी की परकीय  आक्रमकांनी संशोधक आणि त्यांचे संशोधन या गोष्टी नष्ट केल्या. त्यामुळे पुढील संशोधन होऊ शकले नाही.  काही सत्ता लोलुप धर्मपिठाधिशांना हाताशी धरून परकीय आक्रमकांनी त्यांचे वर दवाव आणून विकृत रूढींनाच धर्मस्वरूप म्हणून लोकांमध्ये प्रस्तुत केले. ज्यायोगे राज्यसत्तेविरुद्ध लोकांनी बंड करून उठू नये.  कारण काही संशोधनांती काही काही गोष्टी खऱ्या असतील याचे पुरावे सापडतात. उदाहरणार्थ कै. शिवकर बापूजी तळपदे या गृहस्थाने विमानविद्या या संस्कृत ग्रंथाच्या आधारे राइट बंधूंच्या सुमारे दहा वर्षे आधी विमानाची निर्मिती केली होती. याचा उल्लेख ब्रिटिशांच्या त्या काळातील गॅझेटमध्ये सापडतो. तसेच केसरीच्या त्याकाळच्या लेखांमध्येही सापडतो.  ते विमान दहा ते पंधरा मिनिटे मुंबईच्या चौपाटीवर आकाशात उडाले होते याचाही उल्लेख ब्रिटिश गॅझेट मध्ये आहे. त्याला त्याकाळी अनेक साक्षीदार ही होते. तळपदे यांना लोकमान्य टिळकांनी असे सुचितही केले होते की, इंग्लंडमध्ये विमानाचे संशोधन चालू आहे.  तेथील संशोधकांची मदत घेऊन यामध्ये आणखी काही प्रगती करता येईल का ? यासंबंधी विचार करावा.  परंतु तळपदे यांचा म्लेंच्छांची मदत घ्यायला विरोध होता. त्यांनी ते मानले नाही.  तसेच त्यांनी त्यांच्या पुढील पिढीला अथवा दुसऱ्या कुणालाही त्या संशोधनाची विस्तृत माहिती दिली नाही किंवा शिष्य म्हणून हाताशी धरले नाही. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या त्या डायऱ्या, नोंदी आणि ते सर्व साहित्य त्यांच्या मुलाबाळांनी अडगळीत ठेवून दिले होते.  ब्रिटिश गॅझेट मधील उल्लेख वाचून लंडन मधून रॅली ब्रदर्स नावाच्या एका कंपनीने त्यांच्या अधिकाऱ्यांना पाठवून चांगला आर्थिक मोबदला देऊन त्या सर्व नोंदी डायऱ्या आणि सर्व इक्विपमेंट खरेदी करून लंडनला नेले. त्यामुळे तळपदेंच्या नंतर त्याचे पुढे काहीही आपल्या देशात होऊ शकले नाही. तळपदेंच्या चरित्रासंबंधाने संशोधन करून हिंदीमध्ये  ‘हवाईजादा’ या नावाचा एक चित्रपट निर्माण केला गेला होता. खूप चांगला चित्रपट.  तो अजूनही युट्युब वर उपलब्ध आहे. अर्थात त्या चरित्राच्या अनुषंगाने थोडीफार फिल्मी लिबर्टी घेतली असणारच. पण तरीही तो चित्रपट बघण्यासारखा आहे. 

शेवटी संशोधन ही एकट्याने करायची गोष्ट नाही. ती सामूहिक पद्धतीने केल्यास ती पुढे सरकते आणि अधिकाधिक संशोधन होऊन प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगात आणता येते. त्यामुळे संकुचित वृत्ती न ठेवता सामूहिक रीतीनेच  पुढे जाणे या गोष्टींचा मधल्या काळात अभाव झालेला आढळतो.  त्यामुळेही संशोधन पुढे जाऊ शकले नसावे.

‘दीर्घतमस् आणि सूर्य ‘ या नावाचे पुस्तक मी फार पूर्वी कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या लायब्ररीमध्ये वाचले होते.  त्यामध्ये दीर्घतमस ऋषींनी खगोलशास्त्राच्या अभ्यासातून मांडलेल्या सिद्धांताचे श्लोक रूपाने कशा पद्धतीने वर्णन केले होते ते सविस्तर सांगितले आहे.  त्यावरून सूर्य आणि पृथ्वी याचे अंतर,  पृथ्वी आणि चंद्र यांचे अंतर पृथ्वी आणि मंगळ यांचे अंतर अशा बऱ्याचशा गोष्टींचे अचूक आडाखे आजच्या संशोधनानुसार सिद्ध होतात असे सांगितले होते. अर्थात ते पुस्तक नंतर मला कधीही उपलब्ध झाले नाही. अनेक ठिकाणी शोध घेतला परंतु ते मिळाले नाही. कुठेतरी असेलच, अर्थात मी ते पुस्तक शोधायला जास्त झोकून देऊन प्रयत्न केले नाहीत हेही खरेच.

एकंदरच सध्या आपल्याकडे अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी. कष्ट घेण्याची प्रवृत्ती कमी.  ‘सांगे वडिलांची कीर्ती’ यावरच समाधान मानण्याची प्रवृत्ती जास्त…. कष्ट, कष्ट आणि कष्ट; अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. अशा सर्व त्रासदायक गोष्टींच्यामध्ये निरपेक्ष वृत्तीने स्वतःला झोकून घेण्याची प्रवृत्ती जेव्हा असते, त्याच वेळेला संशोधन कार्य उभे राहते.  सध्या तरी आपल्या समाजामध्ये या गोष्टी फारच अभावाने आढळतात. 

… बघू पुढच्या पिढीच्या हातून काही आशादायक घडते का? आता लक्ष फक्त त्या शुक्राच्या चांदणीवर !

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तिसरं ‘क्षितीज’ विस्तारताना…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ तिसरं ‘क्षितीज’ विस्तारताना…! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सृष्टीच्या निर्मात्याने स्त्री आणि पुरूष अशी दोन आभाळं निर्माण केली आणि त्यांना आपापली क्षितीजं नेमून दिली…पण या दोन्ही क्षितीजांच्या जाड, ठसठशीत सीमारेषांच्या मध्ये एक निराळंच आभाळ उगवलं आहे, याचं त्यालाही भान राहिलं नसावं कदाचित! या आगंतुक आभाळाला क्षितीज दिलं जाण्याचा प्रश्नच उदभवला नसावा त्याच्या मनात ! 

पौरूषत्वाचं रूपडं घेऊन उगवलेली असंख्य नक्षत्रं मात्र स्त्रीत्वाच्या क्षितीजाकडे धाव घेत होती. आणि स्त्रीत्त्वाचं क्षितीज काही तेवढं विस्तारलेलं नव्हतं यांना कवेत घेण्याइतपत. एका बाजूला देह पुरूषांच्या आभाळात अ‍डकून आणि मन त्या दुस-या नाजूक आभाळाकडे डोळे लावून बसलेलं ! यातून संघर्ष, निराशा, अवहेलना, प्रताडना, उद्विग्नता, असहाय्यपणा असा उल्कापात होणं निसर्ग नियमाला धरूनच होतं. अवकाशातून पृथ्वीकडे झेप घेणारे ख-याखु-या खगोलीय पदार्थांपैकी निदान काहींना जमीनीच्या कुशीत आसरा मिळतो…पण या तिस-या आभाळातील तारका पृथ्वीकडे वेगाने निघालेल्या असताना वातावरण त्यांना मधल्यामध्येच जाळून भस्म करून टाकते….राख मग फिरत राहते अंतराळात…अनंत काळाचा अंत होण्याची वेडी आशा मनात मिरवत ! 

विषयच एवढा लपवून ठेवलेला की शब्दांतून व्यक्त नाही होत सहजी…फक्त आवाजातून ऐकू येत राहतो…दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर जोरात आदळले आणि दोन्ही तळव्यांच्या मध्ये चेपली गेलेली हवा तिथून निसटायचा प्रयत्न करते तेंव्हा एक ध्वनी निर्माण करत जाते. जे ‘त्यातले’ नाहीत,ते आपण त्यातले नाही आहोत या समाधानाचा सुस्कारा सोडत पुढे निघून जातात. पण जे त्यातच आहेत…त्यांना देह जगवण्यापुरता तरी हात पसरावा लागतोच ! पुरुषी देह स्त्रीत्वात नटवण्यासारखं अवघड काम जगात दुसरं नसावं बहुदा. कारण वाढत्या वयासोबत पौरूषत्वाच्या खुणा अधिकाधिक गडद होत गेलेल्या असतात,त्या मिटवणं जिकीरीचं होत जातं. स्वरयंत्राने आपल्या तारा आधीच जुळवून ठेवलेल्या असतात, त्यातून कोमल स्वर निघणं केवळ अशक्य…खर्ज मात्र लागतोच लागतो ! राऊळाच्या दारातील घंटेचा लोलक घंटेच्या तनूकडे ढकलावा आणि त्यातून मंजुळ ध्वनीऐवजी वीजेचा कडकडाट कानी पडावा…असं झालं तर कोण ऐकत थांबणार…तेथून आवाजाच्या कक्षेच्या बाहेर पळण्यातच भले ! 

पण हा कर्कश आवाज मनापासून ऐकून तो इतरांच्या कानांवर सहन होईल अशा रितीने पोहोचवण्याचा अत्यंत प्रामाणिक आणि तितकाच परिणामकारक प्रयत्न करणारा एक लेखक, कवी मराठीत निर्माण झाला याचं मराठी माणूस म्हणून कौतुक वाटणं साहजिकच आणि माणूसकीला धरूनच आहे, असं म्हणावं लागेल. 

क्षितीज पटवर्धन त्याचं नाव. लेखक म्हणून आघात, सतरंगी रे, टाईमपास, लग्न पहावं करून, डबल सीट, क्लासमेटस,वायझेड,फास्टर फेणे, माऊली, धुरळा इथपर्यंत चित्रपट. मोहिनी, मन धागा धागा जोडते नवा, अरे कृष्णा…अरे कान्हा, मन शेवंतीचे फूल, रोज रोज नव्याने, तुला जपणार आहे, जल्माची वारी, इथपासून ते.. फिसल जा पर्यंत गीतकार, आधी नाटक-दिग्दर्शक,लेखक आणि असंच बरंच काही नावावर असणारा क्षितीज तृतीय पंथी बांधवांच्या ‘ताली’ मध्ये आपला तळहात मिळवतो तेंव्हा त्याच्याबद्दलचा आदर प्रचंड दुणावत जातो ! 

या आधीही या तिस-या जगातल्या विषयाला अनेकांनी स्पर्श केलाय…पण क्षितीजने विषय प्रवेशच केला नाहीये केवळ, तर विषयाचा काही विषयच ठेवलेला नाही. कोरोनाचं संकट, वाटेत आलेले नकार,आपला विषय पटवून देताना करावे लागणारे दिव्य, चंदेरी दुनियेत मराठी स्वप्नांना मुळातच असलेली पडेल किंमत, या आणि अशा अनेक लाटांना तोंड देत क्षितीजने ‘ताली’ वाजवून तर दाखवलीच आहे, पण जो कोणी ही ‘ताली’ ऐकेल, पाहील त्याला एकच टाळी नव्हे तर टाळ्यांचा कडकडाट करायला भाग पाडलं आहे..आणि या टाळ्यांना आसवांची ओलही त्याच्याच शब्दांनी प्रदान केलेली आहे. आजकाल माणसांना रडवणं अत्यंत अवघड झालेलं असताना किमान सहृदय माणसांच्या काळजातील खोलवरच्या पाण्याला पृष्ठभागावर आणण्याचं भगीरथी काम क्षितीजने केले आहे…हे ताली पाहताना, ऐकताना, समजून घेताना पदोपदी जाणवत राहतं. ताली एक एक भाग करून पहावा लागतो…जशी भरलेल्या सभागृहात कुणी प्रेक्षक एका टाळीने सुरूवात करून देतो तसं आहे हे काहीसं. मग पाहणा-याची विषयाच्या ब्रम्हानंदी टाळी लागते…शेवटच्या भागाच्या अंतापर्यंत पाहणा-याचा जीव टांगणीला लागून राहतो…आणि सकारात्मकतेचा ध्वनिकल्लोळ उमटवून टाळी थांबते….मात्र तिचा आवाज मनात खोलवर रूजत जातो. 

‘ ताली ‘  चित्रपट असता तर किती बरे झाले असते…सलग एक परिणाम विषयाला एक वेगळे परिमाण देऊन गेला असता. आणि आणखी लोकांपर्यंत पोहोचला असता. सर्व भाग एकत्र करून नवे प्लॅटफॉर्म न परवडणा-या किंवा सहज उपलब्ध नसलेल्या लोकांपर्यंत ताली पोहोचला तर छानच होईल. तालीमधले हिंदीतले संवाद थेट मनावर कोरले जातात. हे संवाद छापील स्वरूपात वाचायला मिळाले तरी एक आख्खी कादंबरी, एक समग्र आत्मचरित्र वाचल्याचे समाधान निश्चित लाभेल. अर्थात हे माझ्यासारख्या सामान्य वाचकाचे, प्रेक्षकाचे स्वप्नरंजन आहे म्हणा. प्रत्यक्षात लेखकाला किती अडचणी आल्या असतील हे आपल्याला नाही समजणार. 

दिग्दर्शक रवी जाधव…मानलं ! स्वच्छतागृहात एका बाजूला पुरूष आणि दुस-या बाजूला स्त्री अशी खूणचित्रे दिसताहेत…आणि भिंतीवर मधोमध असणा-या आरशात नायिकेचे प्रतिबिंब अधिकाधिक स्पष्ट होत जातं आहे….तिच्या चेह-यावरची शाई तिने वॉशबेसिन मध्ये धुण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती शाई हळूहळू तिथून वॉशबेसीनच्यामध्ये असलेल्य छिद्रातून ओघळून जाते आहे….ही कमाल रवी जाधवांचीच खास ! निर्माते अर्जुनसिंग बरन, कार्तिक डी.निशानदार यांची निर्मिती प्रशंसनीय.  गाणी,संगीत,अभिनय,चित्रीकरण,प्रतिमांचा वापर, कसलेल्या कलाकारांचा अभिनय, नवख्या कलाकारांचा वावर आणि करून घेतलेला वापर…यावर स्वतंत्र लिहावे लागेल. 

लढवय्या गौरी सावंत सुश्मिता सेन यांच्या आवाजातून आणि चेह-यावरून जिंकत जाताना दिसतात ….त्या विजयात क्षितीज पटवर्धन नावाच्या शब्दांच्या, भावनांच्या, विचारांच्या शिलेदाराचे मोठे योगदान असते…..गौरी सावंत यांना समाजाने वीजेचे लोळ दिले,वादळं दिली…क्षितीजने श्री गौरी सावंत यांच्या संघर्षाच्या आभाळाला इंद्रधनुष्य दिले असेच म्हणावे लागेल ! 

‘त्या’ सर्वांना ‘ताली’ पाहता यावा. किंबहुना तशी सोय कार्यकर्त्यांनी करावी. ‘त्यातले’ नसलेल्या सुदैवी लोकांनी ‘ताली’ पहावीच…किंबहुना ते आपले कर्तव्यच आहे. वेदनेला अंत नसला तरी किमान काहीजणांना खंत वाटू लागली तरी क्षितीजच्या शब्दांचे चीज होईल. त्यातून काही चांगले निर्माण होईलच कधी न कधी तरी. लेखक,कवी,संवाद लेखक क्षितीज पटवर्धन यांचे हे वर्तमानातील काम भविष्यकाळात ऐतिहासिक ठरेल,हे निश्चित ! 

(‘ताली’ या वेब सिरीजबद्दल हा माझा View लिहिलाय ! अधिक-उणे असेलच.)   

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(मग ऑपरेशन, त्यानंरच्या असह्य वेदना, महिनोन्महिने अंथरूणालाच खिळून राहाणे, आपल्याला हे सगळं काही भोगावं लागलं असतं…) – इथून पुढे —

हे ऐकल्यावर आईने माझ्या डोक्यावरून हात फिरविला. मी तिची काळजी करतो यापेक्षा मी माझ्या बहिनींच्या आरोग्याची अशी काळजी करतोय याचा तिला जास्त आनंद झाला होता. 

माझ्या सर्व बहिणी उच्चशिक्षित आहेत. सर्व जनी सरकारी नोकरीत आहे. त्या स्वावलंबी आणि मनाने कणखर आहेत. त्यांचे रक्षण करण्याची फारसी संधी मला आजवर कधी मिळाली नव्हती. बहिणीकडून राखी बांधून घेवून बहिणीच्या रक्षणाचे कर्तव्य भाऊ स्विकारतो. आजवर अनेक रक्षाबंधने झाली. पण भावाच्या कर्तव्याची पुर्ती केल्याचा खरा आनंद मला प्रथमच मिळाला होता. बहिणींच्या सर्व छोट्या मोठ्या आजारांचे वेळीच निदान झाल्याने पुढील धोके टळले होते. माझ्या या रक्षाबंधनच्या आगळ्या वेगळ्या गिप्टच्या कल्पनेवर मीच खुप खुष झालो होतो. 

तात्पर्य

मित्रांनो, आज प्रत्येकाच्या घरांत, भले कमीजास्त प्रमाणांत असेल, मात्र अनेक वस्तू, गॅजेटस्, पैसाअडका, सर्वकाही सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला आणखी एखादी वस्तू भेट देऊन त्यांच्याकडे आहे त्यात आणखी भर घालण्यात काहीच अर्थ नाही. या भेटींचा तेवढ्या पुरता हसून स्वीकार होतो आणि ती वस्तू कायमची त्या घरात धूळ खात पडून राहाते.

लोकसंख्येचा विस्फोट तसेच वाढत्या शहरीकरणामुळे ताणतणाव आणि प्रदुषणासारख्या समस्यांनी आज गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. त्यामुळे जीवनशैलीशी निगडीत असलेल्या अनेक “सायलेंट किलर” आजारांचे प्रमाण आज प्रचंड वाढलेले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल, जीवनसत्वांची कमतरता, हाडे ठिसूळ होणे तसेच वेगवेगळ्या कॕन्सरचे प्रमाण पटींमध्ये वाढले आहे. पण या आजारांबाबत आणि त्यांच्या प्रतिबंधाबाबत आपल्या देशात पाश्चात्त्य देशांइतकी जागरूकता नाही. पाश्चात्त्य देशात वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य असते. पाश्चात्त्य देशांना आरोग्य तपासण्यांचे महत्व पटलेले आहे. पाश्चात्त्य देशात माणसाच्या जिवाला जशी किंमत आहे तशी आपल्याकडे का नाही? उदाहरणार्थ, पाश्चात्त्य देशांनी नियमीत पॕप स्मिअर या तपासणीद्वारे गर्भाशय मुखाचा कॕन्सरच्या ८०% केसेस थांबवल्या आहेत. आपल्याकडे मात्र हा कॕन्सर ८०% वेळा तिसऱ्या वा चौथ्या स्टेज मध्ये लक्षणे आल्यावर सापडतो. आपल्याकडे मात्र आजही वर्षाला ६० ते ७० हजार स्रिया या आजाराने दगावतात. पाश्चात्त्य देशात आठ स्तनाच्या कॕन्सरपैकी केवळ एक स्री दगावते. पाश्चात्त्य देशात स्तनाचा कॕन्सर लक्षणे यायच्या आधीच्या स्टेजेस मध्येच वार्षिक मॕमोग्राफीवर पकडला जातो. आपल्याकडे मात्र स्तनातील गाठ हाताला लागू लागल्या स्री घाबरून डॉक्टरांना दाखवायला जाते. तोपर्यंत उशीर झालेला असतो. आपल्याकडे आठ स्तनाच्या कॕन्सरपैकी चार स्रिया वर्षाच्या आत दगावतात. भारतात दर वर्षी ७० ते ८० हजार स्रिया स्तनाच्या कॕन्सरने दगावतात. भारतात प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे दर वर्षी २६ नवीन स्तनाच्या कॕन्सरच्या केसेस आणि २२ नवीन गर्भाशय मुखाच्या केसेस सापडतात. दुर्दैवाने बहुतेक वेळी आजार तिसऱ्या वा चौथ्या स्टेज मध्ये असतो. हाडांच्या ठिसूळपणामुळे खुब्याचे हाड मोडल्यास २०% लोक वेगवेगळ्या गुंतागुंती होऊन वर्षाच्या आत मरतात. भारतात प्रत्येक एक लाख लोकसंख्येच्या मागे दर वर्षी २०० ते २४० खुब्याची हाडे मोडतात. वयाच्या पन्नाशी नंतर एखाद्या स्रिची स्तनाच्या कॕन्सरने मरण्याची जितकी शक्यता असते तितकीच खुब्याचे हाड मोडून मरण्याची शक्यता असते. ही आकडेवारी भयंकर आहे. भारतात आज डायबेटीसची कॕपिटल झाला आहे. भारतातील एकुण शहरी लोकसंख्येच्या ३३% लोक तर ग्रामीण लोकसंख्येच्या २५% लोक रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतातील एकुण शहरी लोकसंख्येच्या २७% लोकांच्या आणि ग्रामीण लोकसंख्येच्या १७% लोकांच्या रकातील कोलेस्टेरॉलने धोकादायक पातळी ओलांडलेली आहे.  हे तिन्ही आजार कसलेही लक्षणे न दाखवता शरीराला वाळवी लागल्यासारखे आतून पोखरून टाकतात. अनेक वर्षांनंतर जेव्हा हे आजार सापडतात तेव्हा हृदय, किडनी, मेंदू सारख्या शरीरातील अनेक महत्वपुर्ण अवयवांना कायमस्वरूपीची इजा होऊन गेलेली असते. बहुतेक सगळ्या सायलेंट किलर आजारांची भारतात हीच स्थिती आहे. 

रक्षाबंधन, भाऊबीज यांसारख्या सणांमधून आपल्या आया-बहिणींचं रक्षण करण्याची जबाबदारी आपण घेत असतो. जीवाचे रक्षण हे सर्वात मोठे रक्षण असते. त्यामुळे रक्षाबंधनाची जबाबदारी खऱ्या अर्थाने पेलायची असेल तर त्यांचे आरोग्य अधिक सुदृढ राखण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.  स्री ही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. भारतीय स्रियांनी प्राधान्यक्रमात त्यांच्या स्वतःच्या आरोग्याला सर्वात शेवटी प्राधान्य दिलेले असते. ती कुटुंबासाठी दिवसरात्र झटत असते. तिला सुट्टी नाही. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तिला वेळ नाही. तिला आजारी पडायचीही सोय नाही. स्वतःच्या कुटुंबासाठी तिने केलेला हा एक त्यागच असतो. पण या त्यागाची किंमत तिला गंभीर स्वरूपाचे आजार स्विकारून चुकवावी लागते. हे होऊ नये म्हणून त्यांच्या रक्षकाने (कुटुंबप्रमुखाने वा भावाने) प्रोॲक्टीव्हली चार पावलं पुढे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक रक्षाबंधनला आपल्या घरातील स्रियांना “वार्षिक आरोग्य तपासणी पॕकेज” भेट दिले तर खऱ्या अर्थाने त्यांचं रक्षण करण्याकामी ते आपले योगदान ठरेल. ती करत असलेल्य त्यागाची परतफेड करणे शक्य नाही. किमान तिचे आरोग्य जपले तर ज्या कुटुंबासाठी ती त्याग करते आहे त्या कुटुंबाचा भाग म्हणवून घ्यायला आपण लायक ठरू.

कसा वाटतो हा विचार? पटल्यास आम्हांला जरूर कळवा..

..आणि हो, आम्हांला कळवण्याहून अधिक महत्वाचं म्हणजे या विचारावर कृती करून तो नक्की अंमलात आणा. 

यापुढे आपणही असे ‘खरेखुरे रक्षाबंधन’ नक्की साजरे करा.

– समाप्त –  

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(‘मेडिकल टेस्ट रिपोर्ट करणे टाळायचे’ ही ९९.९९ टक्के लोकांची मूलभूत प्रवृत्ती असते हे मला जाणवले.) इथून पुढे —

वास्तविक, ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर…’ हा फक्त वैद्यकीय नव्हे तर आपल्या रोजच्या जगण्यातील प्रत्येक गोष्टीला लागू पडणारा मंत्र आहे. कँसर, उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडांचा ठिसूळपणा इत्यादी अनेक सायलेंट किलर आजार आज समाजात सर्रास आढळतात. या आजारांना सुरवातीच्या अवस्थांमध्ये काहीही लक्षणे नसतात. आजार वाढून लक्षणे आल्यावर मात्र डॉक्टरांना फार काही करण्यासाठी शिल्लक राहिलेले नसते. अशा सायलेंट किलर आजारांना सुरवातीच्या अवस्थामध्ये पकडण्यासाठी ठराविक अंतराळाने नियमित तपासण्या करून घेणे गरजेचे असते. 

पण ‘रिपोर्टमधून आपल्या शरीरात चाललेली काही गडबड जर सापडली तर आपल्याला ट्रीटमेन्टच्या चक्रात अडकावे लागेल. कशाला नसत्या फंदात पडायचं? सध्या थोडासाच त्रास होतोय. जेव्हा तो असह्य होईल तेव्हाचं तेव्हा पाहू..’ अशा विचारांचा अधिक प्रभाव असतो.

…आणि इथेच आपण फसतो. 

अनेक वेळा, वेगवेगळ्या प्रसंगी, घरातल्या घरातच बोलताना मी एखाद्या विषयाच्या अनुषंगाने सर्वांनाच ‘सावध व्हा अन्‌ वेळीच टेस्ट करून घ्या,’ असे सांगत असे. सर्व सायलेंट किलर आजारांची माहिती देत असे. नियमित तपासण्याचे महत्त्व सांगत असे.  मात्र खुद्द माझ्या घरात देखील प्रत्येकाचा प्रतिसाद अगदी थंड असायचा. परिस्थिती बदलण्यासाठी वेगळे काय करावे हे मात्र मला कळत नव्हते. 

ही बाब मला सतत सलत होती. अखेर मला एक कल्पना सुचली. बहुधा जून महिना चालू होता. चातुर्मासाची सुरुवात जवळ आली होती. एका रविवारी दुपारी माझ्या सहाही बहिणींना फोन केले आणि दृढनिश्चयी आवाजात निक्षून सांगितले, ‘‘यंदा रक्षाबंधनानंतर ओवाळणी म्हणून मी तुम्हाला साडी वा इतर कुठलीही भेटवस्तू घेणार नाही. या वर्षापासून ‘वार्षिक आरोग्य तपासणी’ हिच तुमची रक्षाबंधनची भेट असेल. जी बहीण या तपासण्या करून त्याचे रिपोर्टस्‌ मला दाखवेल, फक्त तिच्याकडूनच मी रक्षाबंधनला राखी बांधून घेईल. अन्यथा मी  रक्षाबंधनला राखी तर बांधून घेणार नाहीच पण भाऊबीजेलाही ओवाळून घेणार नाही.’’ आईलाही सांगितले, ‘‘या ठराविक टेस्टस्‌ केल्या नाहीस तर यंदा नरकचतुर्दशीला पाटावर बसून अंगाला तुझ्याकडून मी सुगंधी तेलाने अभ्यंग करून घेणार नाही अन्‌ पाडव्याला ओवाळूनही घेणार नाही.”

सर्वांना निक्षून सांगितले, ” गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी पॕप स्मिअर, स्तनाच्या कॅन्सरसाठी मॕमोग्राफी, हाडांचा ठिसुळपणा तपासण्यासाठी बोन डेंसिटी, जनन इंद्रियांची आणि पोटातील इतर अवयवांची सोनोग्राफीने तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तक्षयासाठी हिमोग्लोबीनची तपासणी, डायबेटीससाठी शुगरची तपासणी, कोलेस्टेरॉलची तपासणी, व्हिटामीन B13 आणि D3 ची तपासणी, थायरॉईडची तपासणी या सर्व १० तपासण्यांचे रिपोर्ट दरवर्षी समोर असतील तरच यापुढे रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरे होतील.’’

ही मात्रा मात्र लगोलग लागू पडली. चक्क सहाही बहिणींनी तसंच आईने सुद्धा, भले निरिच्छेने असेल, पण सांगितलेल्या सर्व टेस्टस्‌ केल्या. सर्व जणी रिपोर्टस्‌ घेऊन आल्या. मी आणि जान्हवीने सगळे रिपोर्टस्‌ अभ्यासले. प्रत्येकीला समोर बसवून त्यांचे रिपोर्ट समजावून सांगितले. आम्हाला त्यात भन्नाट गोष्टी सापडल्या.

सर्वात मोठ्या बहिणीच्या म्हणजे निर्मलाच्या गर्भाशयाला फायब्रॉईडची गाठ असल्याचे लक्षात आले. पाळीच्या वेळी तिला जो काही त्रास होत होता तो तिने इतर कुणालाही न सांगता स्वत:च्या मनात (आणि शरीरात) कडेकोट बंदिस्त करून ठेवला होता. मात्र तिचा रिपोर्ट पाहून तिला स्पष्ट विचारल्यानंतर तिने पाळीत खूप वेदना तसेच अती-रक्तस्राव नेहेमीच होत असल्याचे कबूल केले. त्यामुळे तिचे हिमोग्लोबीन सुद्धा खूपच कमी झाले होते. त्यावरही लगेचच यथायोग्य औषधोपचार सुरू झाले. ती आता कोणतीही पीडा-वेदनेमध्ये कुढत न रहाता सुखाने आपल्या दैनंदिन कामाला लागली आहे. 

माझ्या दोन नंबरच्या बहिणीच्या म्हणजे उषाताईच्या ओव्हरीमध्ये छोटासा ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याही पुढील एक-दोन चाचण्या करून लगेच यथायोग्य उपचार केले. जो ट्यूमर पुढे वाढून धोकादायक ठरण्याची शक्यता होती. ऑपरेशन करून तो ट्यूमर काढून टाकला. पुढचा धोका टळला. आज तीही सुखाने आपल्या रोजच्या कामाला लागलेली आहे. 

तीन नंबरच्या बहिणीला, आशाताईला, बीपीचा त्रास असल्याचे उघडकीस आले. तिच्यावर आम्ही अगदी त्याच दिवसापासून उपचार सुरू केले आणि आता रोज रात्री झोपताना एक गोळी घेतली की बाकी त्रास थांबला आहे.

माझ्या चार नंबरच्या बहिणीच्या, सरलाताईच्या, हृदयाच्या तपासणीत ‘मरमर’ हा वेगळा आवाज ऐकू येत होता. आम्ही तिचा 2 D Echo करून घेतला होता. तिच्या हृदयाच्या वरील दोन कप्प्यांमधील पडद्याला जन्मापासून छिद्र होते. आजपर्यंत तिला त्याचा फारसा त्रास होत नव्हता. पण आता तिला थोडा दम लागू लागला होता. पण हा प्रॉब्लेम आजवर कधीच डिटेक्ट झाला नव्हता. रिपोर्ट ऐकून ती देखील हादरली. माझ्या हार्ट स्पेशालिस्ट मित्राकडे, डॉ हेमंत कोकणेकडे, मी तिला कन्सल्टेशन साठी पाठवले. त्यांनी एएस्‌डीसी (म्हणजे ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट डिव्हाईस क्लोजर) ही छोटी शस्रक्रिया करून ते छिद्र बंद केले. त्यानंतर तिला आजवर कधीच त्रास झाला नाही.

तिन बहिणींना B12 डेफिशियन्सी असल्याचे आढळले. त्यासाठी इंजेक्शनचा कोर्स प्रिस्क्राईब केला आणि त्याचे चांगले परिणाम त्यांनाच अनुभवास येत आहेत.

दोन बहिणींना D3 डेफिशियन्सी असल्याचे आढळले. त्याला योग्य ते उपचार दिले. त्यांचीही तब्येत आता आणखी सुदृढ होते आहे.

आईच्या रिपोर्टमध्ये तिच्या हाडांचा टी-स्कोअर रेड झोनमध्ये असल्याचे दिसले. ही खुपच गंभीर बाब होती. तिच्या वयाला स्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याची आणि हाडे ठिसूळ झाल्याने खुब्याचे हाड मोडून मृत्यू होण्याची शक्यता सारखीच असते. तिची हाडे कमालीची ठिसूळ झालेली होती. याला आम्ही ‘severe osteoporosis’ म्हणतो. तिच्यावर त्याच दिवसापासून उपचार सुरू केले. सलग काही महिन्यांच्या ट्रिटमेन्ट नंतर तिचा टी-स्कोअर ‘रेड’मधून आधी ‘यलो’ व नंतर ‘ग्रीन’ झोनमध्ये आला आहे. आजमितिला तिला काहीही त्रास नाही. 

‘‘सगळं काही आलबेल आहे असं आपण सगळे कायमच समजून चालतो. पण आई, कल्पना कर… तू ही टेस्ट केली नसती तर तुझी हाडे ठिसूळ झाली आहेत याचा आपल्याला थांगपत्ताही लागला नसता. अशात तू पाय घसरून थोडीशी जरी पडली असतीस ना; तर त्याची परिणती थेट तुझ्या खुब्याचे हाड मोडण्यातच झाली असती. मग ऑपरेशन, त्यानंरच्या असह्य वेदना, महिनोन्महिने अंथरूणालाच खिळून राहाणे, आपल्याला हे सगळं काही भोगावं लागलं असतं…’’

— क्रमशः भाग दुसरा… 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये श्री आणि सौ गावडे हे दाम्पत्य राहात होते. दोघेही हाडाचे शिक्षक. श्रीगोंदा तालुक्यातील विविध खेडयांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थी घडवण्यात दोघांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आयुष्य घडविण्यातच त्या दोघांनाही अपार आनंद मिळायचा. 

ते १९७० चे दशक. ‘वंशाला दिवा हवाच’ असा जनू अलिखित नियमच त्या काळी खेड्यांमध्ये होता. श्री. व सौ. गावडे यांना मात्र एका पाठोपाठ एक मुली होत गेल्या. त्यात एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या या दांपत्याच्या घरातील बहुतेक थोरले लोक अशिक्षित होते. ते मुलासाठी आग्रही होते. त्यामुळे कुटुंबनियोजन शक्य नव्हते. एका पाठोपाठ एक चार मुली झाल्या. त्या काळी मुंबईत नव्याने सोनोग्राफी मशीन आल्या होत्या. कायद्या अभावी गर्भलिंगनिदान आणि स्रीभ्रुण हत्या सर्रास चालू झाली होती. मुंबईला राहणाऱ्या एका नातेवाईकाने सगळी ‘व्यवस्था’ करण्याची तयारी दोघांना दाखवली. दोघे नोकरीला असल्याने पैशांचाही प्रश्न नव्हता. पण गावडे दांपत्याने गर्भलिंग निदान आणि स्री भ्रुण हत्येला स्पष्ट नकार दिला. “अजून कितीही मुली झाल्या तरी चालतील. पण आम्ही गर्भातील मुलगी मारणार नाही.” असा ठाम निर्णय दोघांनी त्याला कळवला. त्यांना पुढे अजून दोन मुली झाल्या. अनेक नवस, उपवास, जपजाप्य, इत्यादी चालूच होते. शेवटी सहा मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला. त्याचा जन्म नेमका गोकुळ अष्टमीला झाला. म्हणून दोघांनी मोठ्या आनंदाने आपल्या या शेंडेफळाचं नांव ‘गोपालकृष्ण’ असं ठेवलं. 

शिक्षक आई-बापाच्या पोटी जन्मलेल्या मुलाला अभ्यासांत रूची घेण्यावाचून पर्याय नसतोच. शिक्षक आई वडिलांच्या संस्कारामुळे गोपालकृष्णला अभ्यासातच रूची निर्माण झाली. पुढे बारावी बोर्डाच्या वेळी त्याने इतका कसून अभ्यास केला की त्याला पुण्याच्या प्रसिद्ध बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये ओपन गटामध्ये मेरिटवर प्रवेश मिळाला. पंचक्रोशीमधून एम् बी बी एस् च्या अभ्यासक्रमासाठी निवड झालेला तो पहिलाच विद्यार्थी होता.

एम्‌बीबीएस्‌ चांगल्या गुणांनी पूर्ण केल्यानंतर पुढे गोपालने पोस्ट ग्रॕज्युएशनसाठी स्रिरोग आणि प्रसुतीशास्र हा विषय निवडला. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये त्याचे हे शिक्षण चालू झाले. डॉ संजीव डांगरे गोपालचे पी जी गाईड आणि हेड आॕफ डिपार्टमेंट होते. त्यांची मुलगी, जान्हवी त्याच अभ्यासक्रमासाठी गोपालची ज्युनिअर म्हणून नंतर तेथे रूजू झाली. जान्हवीचे आई-बाबा दोघे मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमधून पास झालेले एम् डी गायनिक. जान्हवीचे बाबा तर एकदम कडक शिस्तीचे होते. सिस्टरची आॕपरेशन दरम्यान काही चुक झाली आणि ते ओरडले तर सिस्टरांच्या हातातील आॕपरेशनची हत्यारे गळून पडत. पण त्यांच्या कडक शिस्तीमुळे डिपार्टमेंट अतिशय चांगले चालले होते. जान्हवीच्या आई-वडिलांचे सिंहगड रोडवर स्वत:चे मोठे मॅटर्निटी हॉस्पिटल होते. तरी केवळ सेवाभावाने डॉ डांगरे कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट हेडची कायदेशीर जबाबदारी घेवून सेवा देत होते. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये स्रिरोग आणि प्रसुतीशास्र विभागात प्रचंड काम होते. गोपाल आणि जान्हवीला हॉस्पिटलमध्ये सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत एकत्र काम करावे लागे. त्यात जान्हवी खुपच सुस्वभावी होती. हळूहळू दोघांना एकमेकांचे स्वभाव आवडू लागले. दोघांमधील जवळीक वाढू लागली. जान्हवीला विचारावे की विचारू नये या द्विधेत गोपालचे सहा महिने गेले. जान्हवीने तिने नकार दिला असता आणि शांत राहिली असती तर गोपालला फार नुकसान झाले नसते. पण तिने नकार देवून ही गोष्ट तिच्या बाबांना सांगितली असती तर मात्र गोपालची काही खैर नव्हती. शेवटी हिंमत करून गोपालने घाबरत घाबरत जान्हवीला विचारलेच. जान्हवीने त्याला चक्क “हो” म्हटले. गोपालला आभाळ ठेंगणे झाले. पण जान्हवीची एक अट होती. “माझ्या आई वडिलांना आम्ही दोघी मुलीच आहोत. मला त्यांची शेवटपर्यंत काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मी पुणे सोडणार नाही.” गोपालला कुठे तरी सेटल व्हायचेच होते. पुणे उत्तमच होते. त्यामुळे शेवटी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही घरातील थोरांच्या संमतीने लग्न पार पडले.

पुढील शिक्षण घेताना दोघांनाही डॉ लाला तेलंगासारख्या हाडाच्या शिक्षकाचे मार्गदर्शन मिळाले. गोपालसाठी डॉ लाला तेलंग शिक्षक तर होतेच, पण त्यापेक्षा जास्त ते त्याचे श्रद्धास्थान होते. डॉ लाला तेलंगाचा गोपालवर खास जीव होता. डॉ लाला तेलंगांनी गोपाल नावाच्या दगडाला ख-या अर्थाने घडवले. डॉ लाला तेलंगांमधील हाडाचा शिक्षक, गोपालची त्या शिक्षकावरील निस्सीम श्रद्धा, दोघांच्या एकमेकांबद्दलचा स्नेह या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या. त्यामुळे डॉ लाला तेलंगांनी दोन वर्षात सांगितलेला एक एक शब्द गोपालच्या मेंदूत अक्षरशः कोरला गेला. डॉ लाला तेलंगांनी गोपाळच्या मेंदूवर “Prevention is better than cure” या नियमाचे संस्कार वारंवार केले. 

यथावकाश गोपाळचे हे पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण झाले. त्याने सिंहगड रोड वर ” गुरूदत्त वेल वुमन क्लिनिक” नावाने ‘प्रिव्हेंटिव्ह हेल्थ  चेकअप सेंटर’ चालू केले. वेगवेगळ्या कँसरच्या तसेच इतर ‘सायलेंट किलर’ आजाराच्या तपासण्या करण्यासाठी वेगवेगळ्या मशिन त्याने विकत घेतल्या. अतिशय कमी दरामध्ये सर्व ‘रिकमेंडेड टेस्ट’ एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात हा  त्याचा प्रयत्न होता. पण या सर्व प्रकाराला लोकांकडून अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. त्याने पदर पैसे खर्च करून वेगवेगळ्या माध्यमामधून लोकांशी संवाद सुरू केला. त्याला अनेक विचित्र प्रतिक्रिया मिळाल्या. 

“ मी फिट आहे. मला तपासण्यांची काय गरज?”

“ मला कसलाही त्रास नाही. मग उगाच तपासणी कशाला?”

“ आजार झाल्यावर पाहू की ! आत्ता उगाच खर्च कशाला?”

“ काही निघाले मग? उगाच गोळ्या औषधांचा मारा चालू होईल !”

“ उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला? “

“ आजकालचे डॉक्टर कॅन्सरसारख्या आजारांची भीती घालून लोकांना उगाच तपासण्या करायला लावतात.”

अगदी गोपालच्या स्वतःच्या घरातील लोकही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक अप करून घ्यायला तयार होत नव्हते. या सर्व प्रकारांनी तो थोडा निराश झाला…….

होय, ही माझीच सत्यकथा आहे.

डॉ लाला तेलंग यांच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकताना “डॉक्टरने ‘रिॲक्टिव्ह’ नव्हे, तर ‘प्रोॲक्टिव्ह’ राहायलाच हवे” हे बाळकडू सरांकडूनच मिळाले होते. पण प्रत्यक्षात आपला समाज मात्र  आरोग्याच्या बाबत कमालीचा उदासीन अन्‌ ‘रिॲक्टिव्ह’ आहे. कुठलेही दुखणे भरपूर काळ अंगावर काढल्यानंतर अगदी असह्य झाले आणि इतर काहीच उपाय चालेनासा झाला की त्यानंतर नाईलाजास्तव लोक डॉक्टरकडे जातात. अशा वातावरणात काही त्रास होत नसताना डॉक्टरांना भेटने आणि तपासण्या करून घेणे लोकांच्या पचनी पडले नाही. या परिस्थितीत डॉक्टरने तरी ‘प्रो-ॲक्टिव्ह’ असावे. तेच समाजाला प्रेव्हेंटिव्ह हेल्थ बाबत ज्ञान देवून शहाणे करू शकतात. याच प्रेरणेने मी स्वत:चे पहिले ‘वेल वूमन क्लिनिक’ सुरू केले होते. पण घरातूनही टेस्टसाठी विरोध होत होता. ‘ मेडिकल टेस्ट रिपोर्ट करणे टाळायचे ’ ही ९९.९९ टक्के लोकांची मूलभूत प्रवृत्ती असते हे मला जाणवले.

— क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जे. पी. नाईक यांना आम्ही विसरलो…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जे. पी. नाईक यांना आम्ही विसरलो…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

५ सप्टेंबर हा जे .पी. नाईक यांचा जन्मदिवस असतो. पण राधाकृष्णन यांचे स्मरण होताना जे पी नाईक यांची कोणीसुद्धा आठवण काढत नाही. युनेस्को’ने गेल्या २५०० वर्षांतील जगातल्या शंभर शिक्षणतज्ज्ञांची यादी प्रसिद्ध केली, त्या यादीत भारतातील केवळ तीन शिक्षणतज्ज्ञांची नावे आहेत. त्यांपैकी एक महात्मा गांधी, दुसरे रवींद्रनाथ टागोर आणि तिसरे नाव जे. पी. नाईक यांचे आहे! या कीर्तीचीदेखील फारशी माहिती महाराष्ट्रला नसते.

युनेस्कोने त्यांना आशिया खंडातील प्राथमिक शिक्षण-प्रसाराची योजना तयार करण्याची विनंती केली, कराची येथे आशियायी राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी सार्वत्रिकीकरणाची विविधांगी योजना मांडली, ‘कोठारी आयोगा’सारखा गाजलेला अहवाल नाईकांनी लिहिला हे फार थोडय़ांना माहीत आहे? आजची ‘अंगणवाडी योजना’ ही नाईकांच्या अहवालामुळे सार्वत्रिक झाली.

भारतात प्राथमिक शिक्षणाच्या सांख्यिकी नियोजनाचा आणि त्याच्याशी जुळणाऱ्या प्रशासकीय व अर्थसाहाय्याच्या योजना तयार करण्याचा पाया नाईकांनी घातला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयात त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. समाजविज्ञान संशोधन परिषदेला गती देऊन त्यांनी शिक्षण, आरोग्य व शेती या भारतीय पुनर्निर्माणासाठी कळीच्या कार्यक्षेत्रांना प्राधान्य दिले.

असे अकांचन आणि साधेपणाने काम करणे ही काय नाईकांची चूक होती की काय म्हणून या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मराठी माणसाला महाराष्ट्र आज विसरला? 

किमान या वर्षीच्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाला तरी त्यांचा जन्मदिवस असतो हे लक्षात घेऊन प्रत्येक शाळा व शासकीय स्तरावर तरी नाईकांनाही अभिवादन केले जावे. 

आज मोठय़ा प्रमाणात झालेले शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या माणसाच्या खांद्यावर उभे आहे हे आपण विसरता कामा नये..

लेखक : हेरंब कुलकर्णी 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print