मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ९) – बिलासखानी तोडी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ९) – बिलासखानी तोडी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

एखाद्या रागाबाबत अनभिज्ञ असताना त्यातली एखादी रचना आपल्याला माहीत असलेल्या दुसऱ्या एखाद्या रागाशी अगदी मिळतीजुळती वाटत असेल तर आपण बिनधास्त ती रचना  माहीत असलेल्या रागातली मानून टाकतो. मी लहान असताना माझ्याबाबतीत हेच झालं होतं. अगदी लहान म्हणजे चवथी-पाचवी इतपतच वय असताना कुठंतरी थोडावेळ गायचं असेल त्यावेळी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं गायली जायची. राग स्वतंत्रपणे गाण्याएवढं शिक्षण, समज काहीच तेव्हां नव्हतं. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी भैरवी गायची हे माहीत असल्यानं भैरवीतल्या काही रचना हमखास शिकून तयार केलेल्या असायच्या. त्यापैकी तेव्हांची एक आवडती रचना म्हणजे ‘रामा रघुनंदना’!

कितीतरी वेळा ही रचना मी भैरवी म्हणून अशा माझ्या छोट्याशा कार्यक्रमाच्या शेवटी म्हटली होती. नंतर मग रचनांचा किंचित विस्तार जमायला लागला तसे दुसरे अभंग भैरवी म्हणुन गात आळवणं आवडायला लागलं आणि ही रचना मागं पडली. परंतू, पुढं कधीतरी कळलं कि, ही रचना भैरवीतली नसून राग बिलासखानी तोडीवर आधारित आहे. मग मला ती भैरवीच का वाटली? तर भैरवी रागातीलच सुरांचा वापर ह्या रागात आहे. फरक इतकाच कि आरोहात सा (रे) (ग) प (ध) सां आणि अवरोह (रें) (नि) (ध) म (ग) (रे) सा. त्यामुळं जोवर बिलासखानी तोडी माहीत नसतो तोवर त्यातल्या रचना ह्या भैरवीवर आधारीत वाटूच शकतात.

बिलासखानी तोडी ह्या रागामागे आणि त्याच्या नावामागे एक कथा आहे. नावांत बिलासखानी येण्याचे कारण म्हणजे हा राग बिलासखॉं ह्यांनी निर्मिला असं मानलं जातं म्हणून ‘बिलासखानी’! हे बिलासखॉं म्हणजे कलासक्त अकबराच्या नवरत्नांपैकी एक, ज्यांच्या सुराला खुद्द निसर्गही प्रतिसाद द्यायचा, ज्यांनी मल्हार गायला कि वरुणराज प्रसन्न होऊन पाऊस कोसळायचा आणि दीपक गायला तर अग्निदेवता प्रसन्न होऊन दीप प्रज्वलित व्हायचे अशा कथा आपण ऐकतो त्या प्रतिभावंत, प्रभावी गायक तानसेन ह्यांचे सुपुत्र!

तानसेन निवर्तले त्यावेळी बिलासखॉं त्यांच्याजवळ नव्हते. ते घरी पोहोचल्यावर आपल्या पित्याचे पार्थिव पाहून त्यांना शोक अनावर झाला आणि काळीज पिळवटलेल्या त्या अवस्थेत ते गाऊ लागले. त्यांचे ते गायन इतके प्रभावी होते कि काही क्षणांसाठी तानसेन जागृतावस्थेत आले आणि पिता-पुत्रांची भेट घडल्यावर त्यांनी परत प्राण सोडले.

ह्या सर्वच कथा आपल्याला ‘फॅंटसी’ किंवा ‘जादूच्या कथा’ वाटू शकतात. पण त्या पूर्णपणे नाकारणार तरी कशा? कारण सूर हाही साधनमार्ग आहेच कि! फक्त देवता प्रसन्न व्हाव्यात अशी साधना करणाऱ्यालाच सुरांचं सामर्थ्य, शक्ती, प्रभावीपणाची प्रत्यक्ष अनुभूती मिळणार! तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे कसं साधावं!?

ह्या रागाच्या आरोह-अवरोहाची तुलना भैरवी रागाच्या आरोह-अवरोहाशी केल्यावर लक्षात येतं कि सगळे सूर तेच असतील तरी भैरवी हा संपूर्ण जातीचा राग आहे आणि बिलासखानी तोडी हा ओडव-षाडव जातीचा राग आहे. जाती म्हणजे काय? तर ही फक्त राग वर्गीकरणाची एक पद्धत आहे. रागाच्या आरोह-अवरोहातील स्वरसंख्येवरून त्या-त्या रागाची जाती ठरते. मागे आपण रागात किमान पाच सूर असावे लागतात हा नियम पाहिला आणि सप्तकातील एकूण सूरसंख्या सात आहे. (सुराचं व्हेरिएशन/विकृत स्वर हा जातीपद्धतीत वेगळा सूर मानला जात नाही) त्यानुसार रागात किंबहुना आरोह-अवरोहात पाच किंवा सहा किंवा सात सूर असणार हे निश्चित!

ज्या रागांमधे म्हणजे आरोह-अवरोह दोन्हींत पाच सूर असतात तो ओडव जातीचा राग असतो, ज्याच्या आरोह-अवरोह दोन्हींत सहा सूर असतात तो षाडव जातीचा राग असतो आणि ज्याच्या आरोह-अवरोह दोन्हींत सात सूर असतात तो संपूर्ण जातीचा राग असतो. परंतू कोणत्याही  रागाच्या आरोह व अवरोहातील स्वरसंख्या सारखीच असते असं नाही आणि तसा नियमही नाही. म्हणून तर बिलासखानी तोडी आणि भैरवी हे दोन वेगळे राग निर्माण झाले!?

ज्या रागांमधे आरोह व अवरोहातील स्वरसंख्या वेगळी आहे त्या रागाची जाती लिहिताना आधी आरोहातील स्वरसंख्येनुसार ओडव, षाडव किंवा संपूर्ण असे लिहून मग त्यापुढं एक छोटी आडवी रेघ काढून अवरोहातील स्वरसंख्येनुसार ओडव, षाडव किंवा संपूर्ण असे लिहायचे. ह्याचप्रकारे ‘सा (रे) (ग) प (ध)  सां’ असे पाच सूर म्हणून ओडव व अवरोहात (रें) (नि) (ध) म (ग) (रे) सा असे सहा सूर म्हणून षाडव, ह्यानुसार बिलासखानी तोडीची जाती ‘ओडव-षाडव’ झाली. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण आरोह लिहिताना सा ते वरचा सा पर्यंतचे रागातील सूर आणि अवरोहात वरच्या सा पासून खाली येतानाचे सूर असं लिहितो. त्यामुळे सा किंवा कोणताच सूर वेगळ्या सप्तकातील असेल तरी ते दोन सूर वेगळे मोजण्याची आवश्यकता नाही. उदा. सुरुवातीचा(मध्य सप्तकातला) सा आणि वरचा(तार सप्तकातला) सां हे सूर वेगळे मोजायचे नाहीत.

ह्या रागाबाबतची गंमत म्हणजे नावात तोडी आहे तरी ह्याचा थाट तोडी नसून भैरवी आहे. म्हणजे रे, ग, ध कोमल असले तरी म आणि नि हे सूर तोडी थाटाप्रमाणे अनुक्रमे तीव्र व शुद्ध नाहीत तर भैरवी थाटाप्रमाणे अनुक्रमे शुद्ध आणि कोमल आहेत.(मागे बिभास रागाच्या दुसऱ्या भागात आपण सर्व थाटांविषयी माहिती घेतली आहे.) मग नावात तोडी कशी आली? तर, तोडीची काही ठळक वैशिष्ट्ये घेऊनच हा राग गायला जातो, मात्र सुरांनुसार थाट आहे भैरवी! शांत व गंभीर प्रकृतीचा हा राग दिवसाच्या दुसऱ्या प्रहरी हा राग गायला जातो. लेकिन ह्या चित्रपटातल्या ‘झूठे नैना बोले सांचि बतियॉं’ ह्या रचनेला पं. हृदयनाथ मंगेशकरांनी बिलासखानीचा साज चढवून फार देखणं केलं आहे!

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन ( भाग २ ) – ख्याल गायकी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  राग गायन ( भाग २ )  – ख्याल  गायकी☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

अठराव्या शतकाच्या सुरवातीला धृपद~धमार गायकी मागे पडून ख्याल गायकी पुढे आली. जौनपूर भागातील नियामत खाॅं या महंदशा राजाच्या दरबारी असलेल्या बीनवादकाने ख्याल गायकी लोकप्रिय केली.

ख्याल या शब्दाचा अर्थ विचार किंवा कल्पना! म्हणजेच ख्याल गायनांत कलावंताला श्रोत्यांपुढे राग सादर करतांना रागाचे सर्व नियम पाळून, आपल्या कल्पनाविलासाने रसिकांना रंजवायचे असते. गाण्यासाठी जी शब्दरचना केली असते तिला रागदारी संगीतात बंदीश अशी संज्ञा आहे.

वर नामोनिर्देश केलेल्या नियामतखाॅंने सदारंग या नावाने अशा अनेक बंदीशी रचल्या आणि त्यांच्या अंतर्‍यांत स्वतःच्या व महंमदशाच्या नावाचा त्याने उल्लेख केलेला आढळतो. ह्या पारंपारिक बंदीशी आजही गायल्या जातात.

बंदीशींचे दोन भाग असतात. एक अस्ताइ व दुसरा अंतरा! अस्ताई मंद्र व मध्य सप्तकांत गायली जाते व अंतरा मध्य आणि तार सप्तकात गायचा असतो असा नियम आहे. ह्रया बंदीशींचे दोन प्रकार. १) बडा ख्याल २) छोटा ख्याल.

बडा ख्याल विलंबीत म्हणजे अतिशय संथ गतीने(शास्त्रीय संगीतात ज्याला लय म्हणतात) गायला जातो. बडा ख्यालाच्या बंदीशी प्रामुख्याने विलंबीत एकताल,तीनताल,तिलवाडा,झुमरा इत्यादी तालात निबद्ध असतात. छोटा ख्याल कधी मध्य लय झपताल,रूपक किंवा द्रुतलयीत गायला जातो. द्रुतलय बंदीशी बहुधा तीनताल आणि एकतालातच गायल्या जातात.

ख्याल गायन सुरू करतांना रसिकांना रागाचे स्वरूप दाखविण्यासाठी रागाच्या वादी संवादी स्वरांवर अधिक आघात देऊन आकारात आलाप घेण्याची पद्धत आहे. (अलिकडचे बरेच गायक रिदनतोम् अशाप्रकारे आलापी करतांना आढळतात.) उदा. बागेश्री राग घेतला तर त्याचे वादीसंवादी स्वर अनुक्रमे मध्यम व षडज आहेत. तेव्हा गायक म~ध~कोमल नी~(मंद्र)~सा~~ अशी सर्व साधारण सुरवात करील. ह्या सुरांवरून शांतपणे आलाप घेत घेत साधारणपणे आपला कलाविष्कार दाखवत मध्य सप्तकांतील मध्यमापर्यंत येऊन पोहोचल्यावर बंदीश गाण्यास सुरवात करील.बरोबर सम मात्रेवर(तालाची पहिली मात्रा) आल्यावर साथीला असलेल्या तबल्याची पहिली थाप पडेल. ह्या समेवर जेव्हा श्रोत्यांची पहिली दाद मिळेल तेव्हा कलावंताने श्रोत्यांवर ताबा मिळविला असे समजावे. प्रत्येकवेळी बंदीशीचा मुखडा घेऊन वेगवेगळ्या ढंगांनी स्वरांशी खेळत खेळत तालाचे एक आवर्तन पूर्ण करून कलाकार जेव्हा श्रोत्यांना सम दाखवितो त्यावेळी मैफीलीत कलावंत व रसिक यांच्यांत सुसंवाद साधून चांगलाच रंग भरतो. पूरिया,दरबारी कानडा, बागेश्री, मालकंस,शुद्धकल्याण वगैरे रागांचा आवाकाच इतका मोठा आहे की एका आवर्तनांतील आलाप गुंडाळल्यासारखे वाटतात.अशा वेळी दोन आवर्तनेही घेतली जातात. आलापांद्वारे हळूहळू राग स्वरविस्तार करत तार षडजापर्यंत पोहोचल्यानंतर अंतर्‍याचे शब्द गाण्याची पद्धत आहे. गायक आपल्या आवाजाच्या क्षमतेनुसार जितके अधिक तार सप्तकापर्यंत जाता येईल तितके जाण्याचा प्रयत्न करतो.हे आलाप घेत असतांना विविध प्रकारे स्वरयोजना करून रागसौंदर्य खुलविणे हे गायकाचे कौशल्य असते. बोल आलापांतील रसास्वाद घेत असतानांच छोटा ख्याल किंवा द्रुतलयीतील गायन सुरू होते.कधी कधी गायक विलंबीत लयीतून मध्यलयीतील छोटा ख्याल गातात आणि द्रुत लयीत तराणा गाऊन गायन संपवितात. द्रुत लयीत आलाप न घेता बोलताना,वक्रताना,खटक्याच्या ताना,अलंकारिक अश्या विविध प्रकारच्या ताना घेऊन आपले गानचातूर्य सिद्ध करतात.

प्राचीन काळी गुरूगही राहून शिष्याने गुरूची सेवा करत संगीत साधना करण्याची प्रथा होती.

गुरू आपली वैशिष्ठ्यपूर्ण गायनशैली शिष्याच्या गळ्यांत जशीच्या तशी उतरविण्याचा प्रयत्न करीत असे. काही प्रतिभावंत कलाकारांनी आपली स्वतंत्र गायनशैली तयार करून शिष्यांकरवी ती जतन केली त्यावरून भिन्न भिन्न शैलीची घराणी तयार झाली. एकूण एकोणीस घराणी आहेत अशी नोंद आहे, परंतु ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, जयपूर,  मेवाती अशी काही घराणी आजही प्रसिद्ध आहेत.(घराण्यांची सविस्तर माहिती या लेखांत देत नाही,त्यावर एक स्वतंत्र लेखच होईल.)

आधुनिक काळांत गुरूकुल पद्धती राहिली नाही परंतु तयार शिष्याला रियाज करून आणि निरनिराळ्या पद्धतीने केलेले गायन ऐकून स्वतःची गायन शैली प्रस्थापित करण्यांत अधिक आनंद मिळतो. सहाजिकच कट्टर घराणेशाही आज अस्तंगत होत चालली आहे.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ८) – पाऊलखुणा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर वाईकर

☆ सूर संगत (भाग – ८) – पाऊलखुणा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत असताना आपलं भान हरपतं, भवताल विसरलं जातं, वाऱ्याच्या लहरीवर तरंगत जात असल्यासारखं मन हलकं होऊन जात अक्षरश: एका भारलेल्या अवस्थेत आपण जातो. निर्गुण-निराकारत्वाची खूण पटवणाऱ्या, ‘त्याच्या’ अस्तित्वाची साक्ष देणाऱ्या, त्या सर्वोच्च शक्तीनं वेढलेल्या अवस्थेतले क्षण हे खरंतर जाणिवेच्या पलीकडले असेच म्हणावे लागतील. मात्र ही अवस्था लोप पावल्यानंतरही तिचा प्रभाव टिकून राहातो, ते क्षण मनात रेंगाळत राहातात. ह्या रेंगाळत्या क्षणांमधेच आपण खरोखरी काही चैतन्यदायी, निखळ आनंद देणारे क्षण अनुभवले हे जाणवतं… मनावर उमटलेल्या त्या अनुभूतीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसतात! अशाच प्रकारच्या एकाच वेळी तेजस्वी आणि हळव्याही पाऊलखुणा भैरवी कायमच मनावर उमटवत राहाते असं मला वाटतं.

मागच्या लेखात भैरवीला शब्दमर्यादेत मुडपून कसंबसं बसवलं असं माझं मलाच वाटत राहिलं. मन भरलं नाही, ते पुरेसं कागदावर उतरलंच नाही असं अधुरेपण जाणवत राहिलं. किंबहुना, भैरवीविषयी लिहिल्यावरही तिच्या पाऊलखुणा अजून मनात रेंगाळत राहिल्या आहेत म्हणायला हरकत नाही. बारा सुरांपैकी सगळे कोमल सूर भैरवीत आहेत म्हणूनच कि काय आपल्या मनालाही तीच कोमल अवस्था प्राप्त होत कुणी एखादा शब्द आपल्याशी बोललं तरी त्या ध्वनिलहरींच्या हलक्याशा धक्क्यानंही जिभेवर पिठीसाखर विरघळावी तितक्या सहजी आपलं अस्तित्वच विरघळून जाईलसं वाटत राहातं. म्हणूनच अशा अनुभवानंतर प्रत्येकच संवेदनशील व्यक्ती नि:शब्द होत मनावरचा भैरवीच्या रुतल्या पाऊलखुणांचा रेंगाळ ओलसर डोळ्यांनी जपत राहाते.

निरीक्षण केलं तर लक्षात येईल कि, कुठल्याही उत्तम रंगलेल्या मैफिलीतील भैरवीनंतर वातावरणात एक आल्हाददायक शांतता भरून राहिलेली असते, प्रत्येक श्रोत्याच्या मनात भैरवी आणखी ठळकपणे पाऊलखुणा उमटवत जात असते. श्रोते त्या परमानंदावस्थेत नुसते एकमेकांकडे पाहताना डोळ्यांतूनच ‘अहाहा… क्या बात है!’ असं गायकाविषयीचं कौतुक एकमेकांपर्यंत पोहोचवत असतात. त्या भारलेल्या अवस्थेला आपल्या शब्दानं धक्का लागू नये ह्याची काळजीच जणू प्रत्येकजण घेत असतो. भैरवीनं श्रोत्याला आनंदात न्हाऊ-माखू घालण्याचं कसब गायक-वादक कलाकाराचं हे वादातीत! त्यानं संगीतसाधनेतून कमावलेली शक्तीच इतक्या सगळ्या श्रोत्यांचं बोट धरून त्यांना वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याची किमया घडवून आणू शकते. मात्र भैरवीच्या बाबतीत थोडंसं झुकतं माप त्या सुरांना जातं असं माझं वैयक्तिक मत!

मागच्या भागात आपण भैरवीवर आधारित काही मराठी रचनांचा उल्लेख केला होता. हिंदी रचनांविषयी बोलायचं झाल्यासही अक्षरश:  लांबलचक यादी तयार होईल. पण पटकन आठवते ती रचना म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशीजी, पं. बालमुरलीकृष्णनजी, लताबाई ह्यांचे सूर आणि दर्शनासोबत भारतातील इतरही प्रांतांमधील अनेक गुणी व्यक्तींचं दर्शन घडवणारी, अनेक भाषांत सजलेली पूर्वी दूरदर्शनवर लागणारी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ ही संपन्न रचना! मागच्या लेखात उल्लेखिल्याप्रमाणे कोणतीही मैफिल ‘भैरवी’ने संपन्न करण्याची प्रथा उत्तर भारतीय संगीत पद्धतीत रूढ आहे. ही रचना मात्र भैरवीमुळे जास्त संपन्न झालीये असं मनात येतं. ह्या संपन्नतेचं लक्षण म्हणजे ही रचना पाहाताना डोळे पाणावतातच, देशभक्ती उरात दाटून येतेच, अनेकविध प्रांतांमधील आपल्या देशबांधवांविषयी आस्था, एकात्मतेची भावना मनात जागतेच, सगळ्याच अर्थांनी दुजाभावाच्या कल्पना लोप पावत एक उदात्त, संपन्न जाणीव मनात जागतेच जागते. कितीही वेळा ही रचना ऐकली तरी प्रत्येकवेळी अशीच अनुभूती येते! पुन्हा म्हणेन, मनात जागणारी ही अनोखी जाणीव ‘भैरवी’नं गडद केली आहे!

हिंदी चित्रपट संगीतातल्याही किती रचना सांगाव्या! लताबाईंचं ‘माता सरस्वती शारदा’ अंगावर रोमांच उभं करतं, ‘बाबूल मोरा नैहर छूटो जाए’ हळवंहळवं करून टाकतं, ‘दिल का खिलौना हाए टूट गया’, ‘मीठे बोल बोले’, ‘फुल गेंदवा ना मारो’, ‘कैसे समझाऊ बडे नासमझ हो’ अशा कितीतरी रचना मनात रुंजी घालू लागतात. ‘कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों, अब तुम्हारे हवालें वतन साथियों’ ह्या ओळी ऐकताना काळजाला घरं पडतात, अंतऱ्यात मात्र वेगळे सूर वेगळा नूर घेऊन येत उरांत अभिमान जागवतात आणि पुन्हा ध्रुवपदाशी आल्यावर भैरवी काळजाचं पाणीपाणी करते. बेगम अख्तर, शोभा गुर्टू  ‘हमरी अटरिया पे आजा रे सावरिया’ गातात तेव्हां त्यातली विरहवेदना जीव जाळत जाते.

खरंतर अशा अजून कितीतरी रचना आहेत ज्या मुख्यत्वे भैरवीची आठवण करून देतात, मात्र इतर स्वरांच्या वापरामुळे वेगळ्या ढंगानं पुढं जातात. मग तिथे भैरवीतल्या सुरांमध्ये एखाद- दुसऱ्या सुराचा फरक केल्यावर जे राग निर्माण होतात त्यांची आठवण जास्त गडद होत जाते. म्हणूनच अशा कित्येक रचनांचा उल्लेख मुद्दाम टाळतेय. सुगम रचनांबाबत हेच महत्त्वाचं आहे. रागनियम हा भागच तिथे लागू नसल्याने एखाद्या रचनेवर धडमकन एखाद्या रागाचं लेबल लावायला मन धजावत नाही, ते संयुक्तिकही नाही. एक मात्र खरं की, कोणताही संगीतप्रकार असो, त्यातली भैरवीची प्रत्येक सुरावट ही काळजावर पाऊलखुणा उमटवत जाते हे नि:संशय!

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत  राग गायन ( भाग १ ) ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  राग गायन ( भाग १ )  ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

मागील पांच सहा भागांत काही रागांविषयी लिहिल्यानंतर मनांत आले की वाचकांना राग गायनाच्या विविध ढंगांविषयी थोडी माहिती प्रस्तूत करावी.

पंधरा/सोळाव्या शतकांत अकबर बादशहाच्या नवरत्न दरबारांत संगीत क्षेत्रांतील मिया तानसेन हे एक रत्न होते, हे बहुतेक सर्वांनाच ज्ञात आहे. ह्या तानसेनाची रागदारी संगीत पेश करण्याची जी पद्धत होती तिचा उल्लेख धृपद गायन असा केलेला आढळतो. तानसेनांनाही धृपदिया या विशेषणाने संबोधिले जात असे.हीच गायकी त्या काळांत प्रचलित होऊन अनेक धृपदिये प्रसिद्ध झाले. तत्पूर्वी मंदिरांतून ईशस्तूति करण्यासाठी ही धृपद गायन पद्धति होती, परंतु तानसेन आणि त्याचबरोबर राजा मानसिंग या दोघांनी हे गायन देवळांतून राजदरबारी नेले.

ह्या गायकीची खास वैशिष्ठ्येः

गीत रचना चार टप्प्यांमध्ये असते.

१) अस्ताई ~ पुर्वार्ध

२) अंतरा ~ उत्तरार्ध

३) संचारी ~ दुसरा अंतरा

४) आभोग ~ तिसरा अंतरा

गायन सादर करतांना प्रथम रागांतील स्वरांचे तालमुक्त आलाप गातात,आलापीच्या शेवटच्या टप्प्यांत गमकयुक्त ताना घेतल्या जातात. विविध प्रकारची लयकारी आणि बोलताना हे धृपद गायकीचे खास वैशिष्ठ्य आहे. अनिबद्ध आलाप गायन हा धृपदाचा मन लुब्ध करणारा भाग आहे. यांतून रागाचे स्पष्ट स्वरूप श्रोत्यांना दिसून येते.

सरगम गाण्याची प्रथा या ठिकाणी अपेक्षित नाही.आलापीनंतर गीत सादर करतांना पखवाज किंवा मृदुंग हे तालवाद्य साथीला असते. धृपद गायन अत्यंत जोरकस व मर्दानी आवाजात असते त्यामुळे धृपद गायकीत स्री कलावंत आढळत नाहीत. गीतांतील काव्य वीर, शृंगार आणि भक्तिरसाला पोषक असे आहे. ईश्वरस्तुती,संगीत शास्रांच्या नियमांचे वर्णन,निसर्ग सौंदर्य,बादशहाच्या दरबाराचे वर्णन हे प्रामुख्याने गीतांचे विषय.धृपदांत चार प्रकार आढळतात.

गौबरहार बानी,खंडारबानी,डागुरबानी आणि नौहारबानी. मिया तानसेनाची गौबरहारबानी, जी अत्यंत प्रासादिक व शांत रसाचा परिपोष करणारी होती.अकबराच्याच कारकिर्दीतील समोखसिंह नामक बीनकाराच्या खंडहार या निवासस्थानावरून त्याच्या धृपदास खंडारबानी हे नाव पडले. गातांना सरळ स्वर न घेता खंडित स्वराविष्कार करणे ही ह्याची खासियत!व्रजचंद नावाचा धृपदिया डागूर या गावचा,त्यावरून त्याची धृपद गायकी डागूरबानी या नावाने ओळखिली जाऊ लागली.वैचित्र्यपूर्ण व रहस्यमय भाव प्रकट करणे हे याचे गायन कौशल्य! धृपद गायक श्रीचंद रजपूत नौहरगांवचा. त्याची वाणी ती नौहरबानी अशी ओळख!एका स्वरावरून पुढल्या स्वरावर जातांना मधले एखाद दोन स्वर वगळणे ही ह्याची शैली!

चौताल,रुद्रताल,ब्रम्हताल,सूलताल,मत्तताल या तालांमध्ये बहुतेक धृपदांच्या गीतरचना केलेल्या आढळतात.

तानसेनाचे गुरू हरीदास यांनी धृपदांत बर्‍याच रचना केल्या. नमून्यादाखल चौतालात निबद्ध असलेली ही रचना पहावी.

” हरी हरी छाॅंडके फिरहु न आवे तोरे

एक एक घरी तोहे करोरन कीजात है ~ अस्ताई

घरी पल दिन सोये फिरहु न आवे तोरे

छिन भंग देहताको मरन जैसी घात है ~अंतरा

प्रभू को संभार प्यारे तजके अमृत बिष

काहेको खात है~ संचारी

कहे हरीदास यह साॅंसको बिश्वास कहाॅं

एक एक छिनमे वो तो निकस निकस जावत है ~

आभोग.

धृपदाच्या बरोबरीनेच धमार गायन प्रचारांत आले. यांतील रचना चौदा मात्रांच्या धमार याच तालांतील असतात आणि बहुतांशी शृंगार रसप्रधान असतात. होळी रंगपंचमी हे या गीतांचे प्रमूख विषय.

आजकाल धृपद गायकी विशेष प्रचारांत नसली तरी डागर बंधू, गुंडेचा बंधू आणि अगदी आजचे धृपद गायक पं.उल्हास कशाळकर ही नावे या क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत.

अठराव्या शतकाच्या सुरवातीला धृपद गायकी मागे पडून ख्याल गायकी पुढे आली.

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ७) – भैरवी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ७) – भैरवी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

मागच्या भागात सांगितलेल्या पौराणिक कथेनुसार जे सहा राग पहिल्यांदा उत्पन्न झाले त्या मुख्य सहा रागांच्या प्रत्येकी सहा किंवा पाच (याबबत प्राचीन ग्रंथकारांच्या मतांमधे भिन्नता आढळते) रागिण्या आणि पुढं प्रत्येक रागिणीचे पुत्रराग व पुत्रवधू राग अशी ‘राग-वर्गीकरण’ पद्धती प्राचीन ग्रंथांत आढळून येते. त्याकाळी ती प्रचलितही होती. मात्र, ह्या कल्पनेला काहीही वैज्ञानिक, शास्त्रीय आधार नसल्याने ती लोप पावत जात पुढे इतर रागवर्गीकरण पद्धती अस्तित्वात आल्या. त्या सहा मुख्य रागांपैकी ज्या भैरव रागाची माहिती आपण मागच्या भागात घेतली त्याची एक रागिणी म्हणजे ‘भैरवी’!

‘भैरवी’ हा दहा थाटांमधील हा एक थाटही असल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे हा राग भैरवी थाटाचा आश्रयराग आहे. भैरवी हे नाव प्रत्येकाच्याच परिचयाचे असते. कारण कुठल्याही मैफिलीची सांगता ही भैरवीमधील रचना गाऊन करायची अशी एक पद्धती आपल्याकडे रूढ झाली आहे. त्यामुळे कधी इतर एखाद्या कंटाळवाण्या व्याख्यान/प्रवचनात किंवा अगदी गंमतीत घरी बोलत असतानाही बोलणं ‘आवरतं’ घ्या हे सूचित करण्यासाठी आता ‘भैरवी घ्या’ असं म्हटलं जातं, कारण भैरवी म्हणजे ‘सांगता’ ही सर्वसामान्य माणसाची कल्पना असते. शास्त्रीय संगीत जाणणाऱ्या किंवा न जाणणाऱ्या सगळ्यांचाच एखाद्या कार्यक्रमाला जाऊन आलेल्याकडे ‘भैरवी कोणती गायली?’ हा उत्सुक प्रश्न असतोच.

खरंतर उत्तर भारतीय हिंदुस्थानी संगीत पद्धतीत कोणताही राग गाण्याची शास्त्राधारित वेळ ठरलेली आहे. त्यानुसार भैरवी हा प्रात:कालीन राग आहे. मग कोणत्याही वेळी होणाऱ्या मैफिलीची सांगता भैरवीने करायची ही प्रथा रूढ होण्यामागे काय कारण असावं? तर काही गुणी अभ्यासू व्यक्तींच्या मते काही प्रथा ह्या ‘समाजमान्यतेतून निर्माण होतात. भैरवी हा राग लोकांना इतका भावला असेल कि प्रत्येक मैफिलीमधे तो ऐकायला मिळावा असे वाटू लागले असेल, गायकालाही भैरवी गायल्यानंतर परिपूर्णतेची अनुभूती येत असेल आणि त्यातूनच मग हा पायंडा पडत गेला असावा.

भैरवी रागाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागात आरामशीर ख्यालगायन आपल्याला ऐकायला मिळत नाही. अगदी संपूर्ण शास्त्रीय गायनाची मैफील असेल तेव्हांही सांगतेला भैरवीतली एखादी उपशास्त्रीय रचना किंवा भैरवीतला छोटा ख्याल व तराणा, बंदिश कि ठुमरी असं काहीतरी गायलं जातं. मात्र ठुमरी, टप्पा, गझल इ. उपशात्रीय प्रकारांमधे, सुगम संगीतामधे ह्या रागाचा भरपूर वापर केलेला दिसून येतो. दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या रागात पूर्ण बारा स्वरांचा वापर केला जातो. खरंतर रागात म्हणण्यापेक्षा ह्या रागाधारित रचना करताना किंवा रचनांना विस्तार करताना असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. अर्थातच उपशास्त्रीय रचनांमधे रागाचे नियम पाळण्याचे बंधन नसतेच. मात्र ह्या रागात इतर सर्वच स्वरांचा वापर खुलूनही दिसतो. परंतू, जेव्हां एखादी रचना भैरवी रागाची ‘बंदिश’ म्हणून प्रस्तुत केली जात असेल तेव्हां मात्र रागनियम पाळावेच लागतात. इतर स्वरांपैकी फक्त शुद्ध रे चा आरोही वापर हा बंदिशींमधेच दिसून येतो तेवढाच!

भैरवी थाटाचे सर्व सूर ह्या रागाच्या आरोह-अवरोहात आहेत. म्हणजे सर्व सात सूर आहेतच मात्र त्यांत रे , ग, ध, नि हे चारही स्वर कोमल आहेत. ह्या रागाच्या वादी-संवादी स्वरांविषयी मतभिन्नता आहे. काहीजण ते अनुक्रमे म व सा तर काहीजण ध व ग असल्याचे मानतात. संपूर्ण सातही स्वरांचा वापर झाल्याने रागाची जाती ही ‘संपूर्ण’ आहे. समाजमान्य प्रथेनुसार हा सर्वकालीन राग मानला गेला असला तरी शास्त्रानुसार तो प्रात:कालीन राग आहे.

मात्र सगळ्या व्याकरणीय गोष्टींच्या पलीकडे जाऊन भैरवी अनुभवताना आपण स्वत:ला विसरून एका वेगळ्याच विश्वात पोहोचतो. ही भैरवी अंत:चक्षूंना ‘पैलतीर’ दाखवते किंवा अंतर्मनाला ती जाणीव करून देते असं मला वाटतं. गुणी गायकाची संपूर्ण सर्वांगसुंदर मैफिल ऐकल्यावरही परमानंदाच्या उच्च शिखरावर नेणारी भैरवी म्हणूनच कदाचित सर्वांनाच हवीहवीशी!

किशोरी ताईंचं ‘अवघा रंग एक झाला’, भीमसेनजींचं ‘जो भजे हरी को सदा’, जसराजजींचं ‘निरंजनी नारायणी’, अभिषेकी बुवांचं ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ ह्या रचनांचं स्मरण झालं तरी श्वासांतलं चैतन्य जाणवून अंगावर रोमांच उभे राहातात…. त्या जणू कैवल्याचं चांदणंच वाटतात! ह्या रागातल्या किती रचना सांगाव्या…!

अगा वैकुंठीच्या राया, प्रभु अजि गमला, बोला अमृत बोला, तम निशेचा स्मरला, सुकतातची जगी या अशी कित्येक नाट्यपदं भवानी दयानी, जे का रंजले गांजले, अच्युता अनंता श्रीधरा माधवा, हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, जातो माघारी पंढरीनाथा, जनी नामयाची रंगली कीर्तनी, अजि सोनियाचा दिनु, गा बाळांनो श्री रामायण, वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा कित्येक भक्तिरचना, असेन मी नसेन मी, एकाच जा जन्मी जणू, रंगरेखा घेऊनी मी, आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे अशी कित्येक भावगीतं, खुलविते मेंदी माझासारखी लावणी, झुकझुकझुकझुक अगीनगाडी सारखं बालगीत अशा सगळ्याच रचनांमधे भैरवी खुलली आहे… अर्थातच राग भैरवीतल्या स्वरांसोबत इतरही स्वरांचा वापर करून!

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत 6 – राग~तिलक कामोद ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  6 – राग~तिलक कामोद ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

मागील भागांत देस रागाचे विवेचन केल्यानंतर, त्याच रागाचे सख्खे भावंड म्हणता येईल अशा तिलककामोद रागाविषयी विवरण करणे क्रमप्राप्तच आहे. एकाच खमाज नामक जनकाची ही दोन अपत्ये! दोन भावंडांच्या जीन्स एकच असल्या तरी हा सुरेश आणि हा रमेश हे दोघे स्वतंत्र अस्तित्व असलेले भाऊ आपण सहज ओळखू शकतो नाही का? त्यांच्या स्वरूपांत साम्य असूनही वेगळेपण असते. स्वभावही वेगळे असतात. देस व तिलककामोद यांच्यांतही असेच वेगळेपण आहे.

दोघांचे स्वर एकच! सा रे ग म प ध नी, अरोहांत नी कोमल! तिलककामोद मात्र जरा अवखळ,खेळकर स्वभावाचा! त्याची चाल सरळ नसून जरा वक्र वळणावळणाची आहे असे म्हणावे लागेल.

सा रे ग सा, रे म प ध म प सां—आरोह

सां—प ध म ग, सा रे ग सा नी(कोमल,मंद्र)~ अवरोह. या आरोह~अवरोहावरून हे लक्षांत येते. टप्प्याटप्प्यावर रांगणारे जणू हे बालकच आहे. तिलककामोदची ही वक्र चाल फारच कर्णमधूर वाटते. त्यामुळे हा राग अतिशय लोकप्रिय आहे. कुशल कलावंत अवरोही रचनेत गंधारावरून षडजावर येतांना रिषभाला हलकेच स्पर्ष करून तो कणस्वरूपाने दाखवितात व गायन/वादनांत रंजकता आणतात. अंतर्‍याचा उठाव ‘ प ध म प सां ‘ या स्वरांनी घेऊन तिलककामोद आपले स्वतंत्र अस्तित्व श्रोत्यांच्या निदर्शनास आणतो.” प(मंद्र)नी(मंद्र) सा रे ग सा, रे म ग, सा रे ग सा नी(कोमल,मंद्र)” हे राग निदर्शक स्वर आहेत. मंद्र सप्तकाचा उत्तरार्ध व मध्य सप्तकाचा पुर्वार्ध हे या रागाचे विस्तारक्षेत्र आहे. या रागाचे वादी व संवादी स्वर अनुक्रमे रिषभ व पंचम आहेत. जरी अवरोहांत देसप्रमाणेच याही रागांत निषाद कोमल असला तरी उत्तरभारतीय कलावंत कोमल निषाद न वापरतां शुद्ध निषाद घेऊनच हा राग पेश करतात.शास्रानुसार हा राग रात्रीच्या दुसर्‍या प्रहरी प्रस्तूत करावयाचा असतो.

तिलककामोद म्हटला की सर्वांच्या पटकन् लक्षांत येणारे गीत म्हणजे उंबरठा या चित्रपटांतील ” गगन सदन तेजोमय ” ही प्रार्थना!

लता दिदींचे सूर, र्‍हुदयनाथ मंगेशकरांची स्वररचना आणि कविवर्य वसंत बापट यांचे शब्द! ह्या तिघांचे रसायन असे काही जमून आलेले आहे की हे गाणे ऐकतांना मन मोहरून येते. स्व.श्री सुधीर फडके यांचेही तिलककामोद रागावर फार प्रेम! रूपास भाळलो मी,विठ्ठला तू वेडा कुंभार,दिसलीस तू फुलले ऋतू, आकाशी झेप घेरे पांखरा, ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर ही बाबूजींनी स्वरबद्ध केलेली आणि गायिलेली गाणी

तिलककामोद रागावरच आधारित आहेत.

ठुमरी, दादरा, कजरी हे उपशास्रीय गायनाचे प्रकार या रागांत आहेतच! अबके सावन घर आजा ही पारंपारिक ठुमरी अनेकांनी गायली नि आजही गायली जाते. सावनकी रितु आयी री सजनिया प्रीतम घर नही आये ही शोभा गुर्टू यांनी गायिलेली ठुमरी ऐकतांना ब्रम्हानंदी टाळी लागते.

उपशास्रीय व सुगम गायनांत या रागाचा दिलखुलास विहार असला तरी हे विसरून चालणार नाही की ख्याल गायनांतही हा राग प्रचलित आहे.चौताल,धमार या विलंबित तालांत

अनेक बंदिशी आढळतात. ” हर हर हर करत फिरत ना डरत गोपियनके साथ “ही चौतालातील बंदीश, ” चलोरी होरी खेलन सजनी दे तारी “हा धमार प्रचलित आहे.

वर नमूद केलेल्या रचनांवरून असे म्हणतां येईल की भक्ति,शृंगार, प्रीति सर्वच भावनाविष्कार करण्यास ह्या रागाचे चलन सक्षम आहे. ह्यांत एकप्रकारचा मांगल्यभाव आहे. इथे उल्हासाची उधळण नाही परंतु निराशाही नाही.चांगल्या गोष्टी तशाच टिकून राहिल्या आहेत असा तिलककामोदाचा भाव आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ६) – भैरव ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ६) – भैरव ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

रागांविषयी एक पौराणिक कथा अशी आहे कि, भगवान शंकरांनी पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण आणि (आकाश)ऊर्ध्वदिशा अशा पाच दिशांकडे मुख केले असताना त्यांच्या मुखातून अनुक्रमे भैरव, हिंडोल, मेघ, दीपक व श्री ह्या पाच रागांची उत्पत्ती झाली आणि ‘कौशिक’ ह्या सहाव्या रागाची उत्पत्ती देवी पार्वतीच्या मुखातून झाली. ह्यापैकी ‘भैरव’ ह्या रागाविषयी आज थोडेसे जाणून घेऊया.

मागच्या भागात दहा थाटांविषयी जाणून घेताना ‘भैरव’ हा एक थाटही असल्याचे आपण पाहिले. ज्यावेळी एखाद्या थाटाचे नावच रागाला दिले जाते तेव्हां त्या रागास जनकराग किंवा आश्रयराग असे म्हणतात आणि त्याच थाटातून निर्माण होणाऱ्या इतर नाव असलेल्या रागांना त्या थाटाचे जन्यराग असे म्हणतात. त्यामुळे भैरव हा भैरव थाटाचा जनकराग म्हणता येईल.

भैरव रागाचे आरोह-अवरोह अनुक्रमे, सा (रे) ग म प (ध) नि सां आणि सां नि (ध) प म ग (रे) सा. अर्थात, थाटातल्याच स्वरांनुसार रे आणि ध कोमल व बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत. रागाचा वादी स्वर ध आणि संवादी स्वर रे असून हा प्रात:कालीन ‘संधिप्रकाश’ राग आहे. ह्या रागाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अवरोहात ग वरून रे वार येताना मधे म ह्या सुराला स्पर्श करून यावं लागतं. म्हणूनच भैरवच्या इतर प्रकारांमधेही हा नियम पाळलेला दिसून येतो. दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ह्या रागातील रे आणि ध हे दोन सूर आंदोलित आहेत, त्यामुळेच ह्या रागाची गंभीर प्रकृती अधोरेखित होते असं मला वाटतं.

मुळात आंदोलन म्हणजे काय? पूर्वीच्या काळचं जितके वाजले तितके ठोके देणारं लंबकाचं घड्याळ सर्वांनाच माहिती असेल. त्यातल्याह दोन ठोक्यांच्या मधे तो लंबक एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत फिरायचा. ती दोन टोकं म्हणजे दोन सूर असं आपण समजूया. तर, जो सूर आंदोलित असेल त्याच्या मागच्या/पुढच्या (रागानुसार मागच्या कि पुढच्या सुराला स्पर्श होतो हे बदलते) स्वराला स्पर्श करून पुन्हा त्या सुरावर यायचं, अशा प्रकारे तो सूर गायला जातो. भैरवात ‘रे’ गाताना ‘ग’ ला स्पर्श करून आणि ‘ध’ गाताना ‘नि’ ला स्पर्श करून तो पुन्हापुन्हा गायला जातो. भैरवच्या चलनानुसार वरती जाताना बहुतेक वेळा गमधनिसां असं ‘प’ ला उल्लंघून गायलं जातं.

‘भैरव’ म्हणून त्या रागाची बारीक-सारीक वैशिष्ट्ये सूक्ष्मपणे मांडायची झाली तर अजूनही बरंच काही लिहिता येईल. परंतू, फक्त श्रवणानंद घेणाऱ्या श्रोत्यांना एकदम खूप बारकावे लिहून गोंधळात टाकायला नको म्हणून तितक्या खोलात शिरणे मी मुद्दाम टाळतेय.

कर्नाटकी संगीतात तर मूळ सप्तक हे आपल्या भैरव रागाचे स्वर आहेत. त्यामुळेच कि काय, त्यांच्या पद्धतीत विद्यार्थ्यांना ह्याच रागापासून शास्त्रीय संगीत शिकवायला सुरु करतात. कर्नाटकी संगीतपद्धतीत ह्या रागाचं नाव ‘मायामालवगौळा’ असं आहे. शास्त्रीय संगीतकारांचा हा आवडता राग असला तरी थोडा गंभीर प्रकृतीचा असल्याने सुगम संगीतात ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर आढळून येत नाही.

संसार चित्रपटातील ‘अम्मा रोटी दे’ हे गीत ऐकताना अंगावर काटा येतो इतका भैरवचा प्रभावी वापर तिथं झाला आहे. ‘जागो मोहन प्यारे’ हे गीत भैरव रागाची आठवण करून देते असं मी म्हणेन कारण इतर काही स्वरांचा वापर काही ठिकाणी रचनेत झाला आहे. संगीत स्वयंवर मधील ‘गवळण होऊनिया फिरता’ आणि ‘धाडिला राम राम तिने का वनी?’ह्या नाटकातील ‘मंद मंद ये समीर’ ह्या रचनांचीही ‘भैरव’निमित्ताने आठवण होते… नुसती आठवण म्हटलं कारण रचनेत सगळंच अगदी भैरवबरहुकूम नाही!

अगदी हेच आरोह-अवरोह असणारा परंतू वादी ‘प’ आणि संवादी स्वर ‘सा’ असणारा आणि अर्थातच इतर रागस्वरूप, रागचलन भैरवहून भिन्न असणारा राग म्हणजे ‘कालिंगडा’! ह्या रागात रे आणि ध ला आंदोलन घ्यायचं नाही, असं हा राग शिकवायला सुरू करण्यापूर्वीच गुरुजन सांगतात आणि इतरही बारकाव्यांसहित कसं गायचं व कसं गायचं नाही, हे गाऊनही दाखवतात. पुस्तकात दोन्ही रागांचे आरोह-अवरोह सारखेच दिसतील मात्र गुरुजन त्यात जाणीवपूर्वक राखायचा फरक सांगत त्या-त्या रागाची तालीम देतात. अशी ‘गुरुमुखी विद्या’ मिळाली तरच आपण रागाची शुद्धता राखू शकतो.

कालिंगडा रागावर आधारित मात्र बऱ्याच रचना आढळून येतात. संगीत स्वयंवर नाटकातील ‘मम मनी कृष्णसखा रमला’ हे सुंदर पद ह्याच रागातले! ‘जाळीमंदी पिकली करवंदं’, ‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘बुगडी माझी सांडली गं’ अशा प्रसिद्ध लावण्यांमधे ह्या रागाचा वापार दिसून येतो. गंभीर भैरवहून अगदी भिन्न अशी ह्या रागाची चंचल प्रकृती अशा रचनांसाठी पोषक ठरली असावी. बैजू बावरा मधील ‘मोहे भूल गए सावरिया’ ही रचनाही ह्या रागावर आधारित म्हणता येईल. त्याच स्वरांच्या विशिष्ट वापरानुसार बदलत जाणारी दोन्ही रागांची प्रकृती ह्या रचनांच्या आधारेही थोडीफार उमजू शकेल.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत 5 – राग~ देस ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  5 – राग~ देस ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

सूर संगत या सदरांत गेले काही दिवस एकेका रागाविषयी लिहितांना माझ्या मनांत आले राग म्हणजे नक्की काय? तर त्याविषयी असे म्हणतां येईल की ज्याप्रमाणे मुलामुलींची विकास, रमेश, सुरेश किंवा पुष्पा, शुभदा, रेवती अशी वैयक्तिक ओळख पटण्यासाठी नावे ठेवण्यांत येतात त्याचप्रमाणे यमन, भूप, पुरिया, मारवा आणि बागेश्री, रागेश्री, कलावती अशी राग~रागिण्यांची नावे आहेत. बाकी प्रत्येकच राग शुद्ध व विकृत अशा एकूण बारा स्वरांतूनच तयार झाला आहे. शास्रानुसार वेगवेगळ्या प्रकारांची पांच ते सात स्वरांची रचना म्हणजे राग. त्याचबरोबर ‘रंजयति इति रागः’ अशी रागाची व्याख्या आहे. याचाच अर्थ असा की तुम्ही कशीही स्वररचना करा त्यांतून श्रोतृवृंदाचे मनोरंजन होणे महत्वाचे आहे.मग राग कोणताही का असेना!

राग देस हा त्याचपैकी एक! शास्रीय विवेचनानुसार सा रे म प नी सां/ सां नी (कोमल) ध प मग, रेग, सा असे आरोहांत ग व ध वर्ज्य आणि शुद्ध स्वर तसेच अवरोहांत कोमल नी व सातही स्वर असलेला ओडव संपूर्ण जातीचा

खमाज थाटोत्पन्न राग!साधारणपणे रात्रीच्या दुसर्‍या प्रहरांत हा राग सादर करायचा असतो, परंतु उपशास्रीय व सुगम संगीतांत ह्याचा जास्त वावर असल्यामुळे वेळेचे बंधन नाही. पंचम व रिषभ यांचा वारंवार प्रयोग होत असल्यामुळे या रागाचे वादी व संवादी स्वर अनुक्रमे पंचम व रिषभच आहेत. त्यांतील रिषभ हे एक अजब रसायन आहे.मध्यमांतून गंधारमार्गे रिषभाकडे येतांना जी मींड आहे त्यांत देसचे सगळे सौंदर्य सामावलेले आहे. उदा. मsगरेगsसा. लहांनापासून मोठ्यांपर्यंत आणि नवशिक्यांपासून ते कसलेल्या गायकांपर्यंत सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे सामर्थ्य ह्या देस रागांत आहे.

एखाद्या युवतीच्या गालावरील पडणार्‍या खळीमुळे जसे तिचे सौंदर्य खुलते तद्वतच सर्व शुद्ध स्वरांच्या विहारांत अवरोही रचनेत येणार्‍या कोमल निषादामुळे देस ऐकायला फार हळुवार आणि गोड वाटतो. पदांतील काव्यरचनेनुसार स्वररचना केली तर एकाचवेळी ईश्वरभक्ति, देशभक्ति, शृंगार अशी विविध भावनिर्मीति करणारा हा राग आहे.

गले भुजंग भस्म अंग यातला देस शंकर पार्वतीच्या प्रेमाचा आविष्कार दाखवितो. मुंबई दूरदर्शनने ‘देस राग’ ही धुन राष्ट्रीय एकात्मता दर्शविण्यासाठी तयार केली होती. वन्दे मातरम् हे राष्ट्रगीत अनेकविध चालीत बांधले असले तरी मूळ देस रागातीलच वन्दे मातरम् सर्वमान्य आहे.

एकच प्याला नाटकांतील ‘प्रभू मजवरी कोपला’ हे सिंधूच्या तोंडचे पद करूण भावना व्यक्त करणारे आहे. किंवा विद्याहरण नाटकांतील ‘मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला’ हे ही पद देसमधीलच ज्यांत आपल्याला शृंगार दिसतो. अगदी अलीकडील उदाहरणे द्यावयाची झाल्यास ‘कोई कहे कहता रहे’~ दिल चाहता है, ‘हर घडी बदल रही है रूप जिन्दगी’~कल हो ना हो ह्या चित्रपट गीतांचा उल्लेख करतां येईल.

शास्रीय संगीताच्या बैठकीत ठुमरी दादरा या स्वरूपांत हा राग अधिक सादर केला जातो.ख्याल किंवा धृपद गायकीत क्वचितच आढळतो.अपवाद म्हणून रोशनआरा बेगम, पं. रातंनजनकरबुवा, उल्हास कशाळकर यांनी बांधलेल्या’होरी खेलनको चले कन्हैया, ‘घन घन घन’ या देसमधील बंदिशी आज यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. शास्रीय अंगाने उपशास्रीय संगीताच्या आविष्काराला अनुकूल अशा मध्य व द्रृतलयीतील बंदिशी गायल्या जातात. माणिक वर्मांच्या एका मैफिलीत’हो श्याम मोरी बैंय्या गहो ना’ ही देसमधील द्रृत एकतालांतील बंदिश म्हणजे शास्रीय व उपशास्रीय शैलीचा बेमालूम मिलाफ होता असे म्हणतात.

शेवटी कलाकाराला हेच लक्षांत ठेवायचे असते की कोणताही राग घ्या, स्वरांशी कसरत करून आपले ज्ञान दाखवायचे नसते तर त्यांच्याशी लीलया खेळून रसिकांचे मन जिंकायचे असते.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – ५) – सप्तक कथा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – ५) – सप्तक कथा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆   

सप्तक हे नावच त्याची ‘सात’ ह्या संख्येशी बांधिलकी सांगते! संगीतातही ‘सात’ स्वर आहेत, त्या सात स्वरांचा समूह म्हणजे ‘सप्तक’! आपल्याला माहीत असलेले ‘सा, रे, ग, म, प, ध, नि’ हे सुरांच्या नावाचे ‘शॉर्ट फॉर्म्स’ म्हणायला हरकत नाही आणि गाताना अर्थाचच तेच सोयीचे पडतात. ह्या सात स्वरांची पूर्ण नावं आहेत, सा – षड्ज, रे – रिषभ, ग – गंधार, म – मध्यम, प – पंचम, ध – धैवत, नि – निषाद!

गंमत अशी कि हे सात स्वर कसे अस्तित्वात आले ह्याविषयी अनेक सुरम्य कहाण्या वेगवेगळ्या जुन्या ग्रंथांमधे सापडतात. ‘संगीत दर्पण’ ह्या प्राचीन ग्रंथाचे लेखक दामोदर पंडित ह्यांच्यामते काही प्राणी व पक्ष्यांचा आवाजातून ह्या स्वरांची निर्मिती झाली आहे. मोराची केका ‘षड्ज’ जननी, चातकाचा आवाज ‘रिषभ’ जनक, बकऱ्याच्या आवाजात ‘गंधार’ सापडला, ज्ञानोबारायांना शकुन सांगणाऱ्या काऊ(कावळा) ची कावकाव ही ‘मध्यम’निर्माती ठरली, कोकिळ पक्ष्याचं मधुर कुहूकुहू ‘पंचमाचं’ उत्पत्तीस्थान ठरलं, बेडकाच्या ‘डरावडराव’मधून ‘धैवत’ जन्मला आणि हत्तीच्या चित्कारातून ‘निषाद’ उत्पन्न झाला.

ह्याचा सोपा अर्थ लावायचा झाला तर असं म्हणता येईल कि, पूर्वी सगळ्याच अर्थाने ‘प्रदूषण’ विरहित अशा निसर्गाच्या सान्निध्यातच जगणाऱ्या माणसाच्या जाणिवा अत्यंत तरल असाव्या. त्यामुळं निसर्गातून ऐकू येणाऱ्या वेगवेगळ्या आवाजांतल्या ‘फ़्रिक्वेन्सी’ मधला सूक्ष्म फरकही त्याच्या कानांना सहजी जाणवत असावा. हळूहळू कोणत्या सुरापेक्षा कोणता सूर चढा आहे हे जाणवलं तसे हे सात सूर अस्तित्वात आले असतील. अर्थातच नंतर शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्या सर्वच गोष्टींवर काळानुसार अनेक प्रयोग, बदल होत राहिले.

एका फारसी संगीतज्ञाच्या नोंदणीनुसार, प्राचीन मुस्लीम संत हजरत मूसा हे पहाडी भागांतून फिरत असताना आकाशवाणी झाली कि, ‘हे मूसा हकीकी, तू तुझ्या हातातल्या दंडाने तुझ्या समोरच्या दगडावर प्रहार कर!’ त्याबरहुकूम हजरत मूसांनी हातातल्या दंडाचा(छोटी काठी) समोरच्या दगडावर जोरात प्रहार केला तेव्हां त्या दगडाचे सात तुकडे झाले आणि त्या प्रत्येक तुकड्यातून पाण्याची धार/झरा/निर्झर वाहू लागली. मात्र पाण्याच्या त्या प्रत्येक धारेचा ‘आवाज’ वेगवेगळा होता, म्हणजे त्यातून ऐकू येणारा ‘सूर’ वेगळा होता. हजरत मूसांच्या तरल जाणिवांना तो ‘आवाजां’ मधला फरक उमजला आणि  कानाला जाणवणाऱ्या त्या प्रत्येक ‘फ्रिक्वेन्सीनुसार’ त्यांनी एकेक सूर निर्माण केला आणि ते सूर चढत्या पट्टीत योजत ‘सप्तक’ निर्मिले असेल.

आणखी एका फारसीच संगीतज्ञांच्या मतानुसार पहाडी भागांत ‘मूसीकार’ नावाचा जो पक्षी सापडतो, त्याची चोच खूप लांब असते. बासरीला जशी सात भोकं असतात तशी त्याच्या चोचीलाही सात भोकं असतात. हा पक्षी आवाज करतो तेव्हां त्या सात भोकांमधून वेगवेगळा ‘आवाज’ येतो. त्या वेगवेगळ्या सात आवाजांतूनच सात सुरांची निर्मिती झाली आहे.

ह्या सगळ्या प्रचलित कथांचा विचार केला असता वाटते कि, तेव्हां भले तंत्रज्ञान अस्तित्वात नसेल, पण तरीही कानांवर पडणाऱ्या आवाजाशी सूर जुळवून पाहाणे वगैरे बाबींमधे नकळत का होईना, प्रयोगात्मक, संशोधनात्मक दृष्टिकोन सामावलेला आहे. मात्र मुळात माणसाचं संगीताशी नातं कसं जोडलं गेलं असावं? तर फ्राईड ह्या एका पाश्चात्य विचारवंताच्या मते, संगीत ही माणसाकडून झालेली सहजनिर्मिती आहे! ते म्हणतात कि, माणूस आधी बोलायला शिकला, मग चालणं-फिरणं शिकला आणि हळूहळू तो जास्त क्रियाशील झाला तशी त्याच्याकडून आपोआप संगीताची निर्मिती झाली.

फ्राईड ह्यांच्या विधानावर विचार करत असताना मनात आलं कि, ‘खरंच आहे, आपण स्वत:कडे आणि आपल्या आजूबाजूलाही जाणीवपूर्वक पाहिलं तरी लक्षात येतं कि एखादवेळी आपसूक ‘गुणगुणावंसं’ वाटणं हीच संगीतनिर्मितीची पहिली पायरी असावी. असं ‘गुणगुणणं’ ही सहजप्रक्रियाच आहे, त्यासाठी संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं असणं हे आवश्यक नाहीच. माणसाच्या मनात कोणताही एखादा भाव प्रचंड प्रमाणात निर्माण झाला कि त्याच्या व्यक्ततेपायी ‘गुणगुणण्यातून’ त्याच्याकडून सूरनिर्मिती, संगीतनिर्मिती होत राहिली असेल आणि हळूहळू त्याला एक छान आकार प्राप्त होत ‘संगीतशास्त्र’ निर्माण होण्याएवढी मानवाने प्रगती केली.

खरंतर संपूर्ण सात सूर एकाचवेळी अस्तित्वात आले असं नाही. आपल्याकडचे मंत्र म्हणून पाहिले कि लक्षात येते कि, ते दोन किंवा तीन स्वरांतच बांधलेले आहेत. काही स्त्रोत्रांमधे मग चार सूर दिसून येतात. ह्याचा अर्थ हळूहळू सूरसंख्या वाढत गेली. सप्तकाची एक जन्मकथा अशी वाचल्याची स्मरते कि, वैदिक काळात जे सामगायन होत असे ते सुरुवातीला तीन अणि नंतर चार सुरांत होऊ लागले. सार्वजनिक ठिकाणी सामुदायिक पद्धतीने हे गायन होत असताना गाणाऱ्यांचे पुरुषगायक व स्त्रीगायक असे दोन गट असायचे. पुरुषगायकांनी गायलेली वेदऋचांची चाल(स्वररचना) पाठोपाठ स्त्रीगायक गात असत. मात्र नैसर्गिकरीत्या सर्वसाधारणपणे स्त्रियांचा आवाज उंच पट्टीचा असतो, त्यामुळे त्यांना पुरुषांच्या पट्टीत गाणे कठीण जायचे. मग तीच स्वरसंगती स्त्रिया त्यांच्या पट्टीत गात असत तेव्हां ते सूर अस्तित्वात असणाऱ्या सुरांपेक्षा भिन्न स्थानांवर असल्याचे लक्षात येत गेले आणि अणखी सूर अस्तित्वात आले. दुसऱ्या भागात आपण गणितीय पद्धतीने स्वरांमधील अंतरे पाहिली आहेत. तर, ‘सा ते म’ आणि ‘प ते वरचा सा’ ह्या स्वरांमधील अंतरे पाहिली तर ती अगदी समान असल्याचे दिसून येते. ती कदाचित ह्या सामगायनाची देणगी असावी, अशी सप्तकाच्या जन्माची ‘वन ऑफ द थिअरी’ म्हणता येईल.

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत 4 – राग मालकंस ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत  4 – राग मालकंस ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

ती मध्यरात्रीची वेळ

सूर आले कानी

होते कोमल ग ध नी

मन माझे गेले मोहुनी…

क्षणांत भावना श्रृंगाराची

तसेच पवित्र भक्तिभावाची

हेच असे स्वरांचे ह्या वैशिष्ठ्य खास

प्रचलित तो राग मालकंस…

 

वरील माझ्या या काव्यपंक्तींवरून वाचकांच्या लक्षांत आले असेलच की आजच्या लेखांत आपण कोमल स्वराधिष्ठित मालकंस या रागाचे विवेचन करणार आहोत.

भैरवी थाटजन्य हा राग! किंबहुना भैरवी रागांतून रिषभ(रे) व पंचम(प) हे स्वर काढून टाकले की झाला मालकंस! म्हणजे सा ग(कोमल)म ध(कोमल)नि(कोमल) या पांचच स्वरांचा हा ओडव जातीचा राग! तरीसुद्धा गायन/वादनासाठी फार विस्तृत बरं का.

नि सा ग म ध नि सां असा याचा आरोह तर सां नि ध म, ग म ग सा असा थोड्या वक्र स्वरूपाचा अवरोह.

कोमल स्वरांमुळे अतिशय कर्ण मधूर पण त्याच बरोबर करूण रसाचा आविष्कार करणाराही.

ह्या रागांतील स्वररचना ही त्यांतील शुद्ध मध्यमाभोवती फिरत असते.त्यामुळे सहाजिकच मध्यम वादी आणि त्याच्याशी सुसंवाद साधणारा षडज हा संवादी स्वर मानला आहे. असे असले तरी गंधार व धैवतही सातत्याने वावरत असतातच. अतिशय भारदस्त असा हा राग सर्वच रसिकांचा आवडता नि लाडका आहे.

स्व. भारतरत्न भीमसेन जोशींनी अतिशय प्रचलित केलेली ‘रंग रलिया करत सौतन के संग’ ही बंदिश ऐकतांना नायिकेचा प्रियकर तिला सोडून सवती सोबत रात्र घालवितोह्या विचाराने श्रृंगारावाचून तळमळणारी आणि विरहाने व्याकूळ झालेली नायिका आपल्या डोळ्यासमोर उभी करण्याचे सामर्थ्य मालकंसच्या ह्या स्वरांत असल्याचे जाणवते. अर्थात पेश करणारा कलावंतही तितक्याच ताकदीचा असला पाहीजे हे निश्चित!

सौ. बकूळ पंडितांनी सहजसुलभतेने गाऊन अजरामर केलेले ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे पाणिग्रहण नाटकांतील पद न ऐकलेला रसिक विरळाच असेल. याच मालकंसांत निबद्ध केलेली कानडा राजा पंढरीचा किंवा बैजू बावरा या चित्रपटांतील ‘मन तरपत हरी दरसनको आज’ ही भक्तीगीते भक्तीरसांत भिजलेली आपण पहातो. श्री.अनूप जलोटा यांचे सर्वश्रृत भजन

‘क्षमा करो तुम मेरे प्रभूजी

अबतकके सारे अपराध

धो डालो तन की चादरको

लगे है उसमे जो भी दाग’ ।। यांत भक्ताची जी तळमळ आहे, जी क्षमायाचना आहे ती केवळ मालकंसच्या स्वरसाजामुळेच प्रभूपर्यंत पोहोचली असे वाटते.

छोटा गंधर्वांचे देवमाणूस नाटकांतील ‘सुखवित या संसारा’ या पदांतून दोन जिवांच्या प्रीतींतून मिळणारे समाधान हेच स्वर व्यक्त करतात तर रणदुंदुभी नाटकांतील’दिव्य स्वातंत्र्य रवी’ हे मातृभूमीचे प्रेम व्यक्त करणारे पद मालकंसातच गुंफलेले आपण ऐकतो.

एकूणच विशाल अंतःकरणाचा हा राग  श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करणारा आहे.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print