मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग – ९ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग – ९ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(षोडशी शिलॉन्ग)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही लवून कुमनो! (मेघालयच्या खास खासी भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मंडळी, मागील वेळेस आपण शिलॉन्गची सफर करायला सुरुवात केली. आता शिलॉन्गमधील अजून कांही नयनरम्य स्थळांना भेट देऊ या. चला तर मग भरपूर चालायची तयारी करून! 

एलिफेंट धबधबा (Elephant falls)

शिलॉन्गच्या उत्तर भागातील एक अन्य सर्वांगसुंदर असे ठिकाण म्हणजे पर्यटकांनी बघितलेच पाहिजे असे एलिफेंट धबधबा (एलिफेंट फॉल्स)! या जलप्रपाताला खेटून हत्तीच्या आकारासारखा एक विस्तीर्ण खडक होता, म्हणून ब्रिटिशांनी याचे नांव एलिफेंट फॉल्स असे ठेवले. मात्र आता या निर्झराजवळील तो कुंजरासम भलामोठा खडक नाही, कारण तो १८९७ मधील भूकंपात नष्ट झाला. मात्र या निर्झराचे बारसे ज्या नांवाने झालय तेच नांव आजही प्रचलित आहे! शहराच्या मध्यापासून ११ किलोमीटर अंतरावर असलेला हा त्रिस्तरीय धबधबा (हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये पडतो) बघायला वर्षाऋतूत जावे, फेसाळणाऱ्या शत शत दुग्ध धारांच्या लयबद्ध सप्तसुरांनी अवघा परिसर निनादून टाकणाऱ्या या निर्झराचे प्राकृतिक रमणीय दर्शन अतिशय मोहून टाकणारे. एकदा बघितल्यावर दृष्टी खिळवून टाकणारे. पावसाळ्यात जात असाल तर पायऱ्यांची उतरण काळजीपूर्वक सांभाळून एक स्तर बघा, डोळ्यात साठवा, खाली उतरा, दुसरा स्तर बघा, परत खाली पायऱ्यांची उतरंड अन सर्वात खोल असा तिसरा स्तर पाण्याच्या प्रवाहात प्रवाहित होतांना बघा. सर्वात खाली या मनोहरी अन रमणीय नीलजलप्रपाताचे एकत्रित जल एका छोट्याशा तलावात साठते. तलावाभोवती हिरवी वनराई सतत सोबत असतेच! मित्रांनो, पुढचे कार्य त्रासदायक, कारण आता पायऱ्या चढायच्या आहेत! केवळ निर्झराचं दर्शन नव्हे तर त्याला अनायास कवेत घेणाऱ्या सदाहरित हिरवाईचे बाहुपाश आहेतच! खळाळणारा हा जलप्रपात अन त्याला लगटून सोबतीला हिरवेगार डोंगर! हे नेत्रदीपक अन ‘पिक्चर परफेक्ट’ दृश्य नेत्रात अन कॅमेऱ्यात कैद करून ठेवा! असे हे अभूतपूर्व दृश्य बघण्यासाठी शिलॉन्गमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात यात नवल ते काय!

डॉन बॉस्को संग्रहालय (Don Bosco Museum)

हे संग्रहालय शिलॉन्ग शहराच्या मध्यबिंदू पासून ५ किलोमीटर अंतरावर सेक्रेड हार्ट चर्चच्या आवारात आहे. कलासक्त, इतिहास प्रेमी, नाविन्याची वाट चोखाळणाऱ्या, मेघालयच्या संस्कृतीविषयी जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या आबालवृद्ध पर्यटकांचे या वास्तूत प्रेमाने स्वागत होते. आरंभीच एक पथदर्शक आपल्याला या संग्रहालयाच्या ७ मजल्यात स्थित विविध दालनांची थोडक्यात माहिती देतो. मात्र बाहेर उभे राहून या भव्य-दिव्य संग्रहालयाची पुसटशी कल्पना देखील येत नाही. या विशाल ७ मजली इमारतीत सतरा वेगवेगळ्या नयनरम्य गॅलरी आहेत! त्यांत काय नाही ते विचारा! कलाभवन (आर्ट गॅलरी), हस्तकला, कलावस्तू, पोशाख, दागिने आणि ईशान्य भारतातील विविध जमातींनी वापरलेली शस्त्रे यांचा विस्तृत संग्रह इथे खच्चून भरलेला आहे. संपूर्ण ईशान्य भारताच्या विहंगम दृश्यांची पर्वणी एकाच ठिकाणी साधून देणारे दर्शनीय असे हे संग्रहालय!

इथे इतके काही बघण्यासारखे असल्याने पर्यटकांचे संपूर्ण समाधान होणे जरा कठीणच! हे सर्व बघण्याकरता एक दिवस देखील कमी पडणार! किती म्हणून नजरेत साठवावे अन फोटो तरी किती काढावेत! “काही बघायचे राहून गेले”, अशी प्रत्येक मजल्यावर आपली अवस्था होते. म्हणूनच आपल्याकडे वेळ कमी असल्यास, पत्रकात बघून आपल्याला आवडतील ते मजले चोखंदळपणे निवडावेत अन ते समाधान होईपर्यंत शांतपणे बघावेत. मी माझ्या आवडीनुसार आर्ट गॅलरीत मनसोक्त रमले! या इमारतीचा सर्वात उत्कंठावर्धक बिंदू अर्थात सर्वात वरचा मजला, “स्काय वॉक”. आम्ही गेलो तेव्हा नुकताच पाऊस पडल्याने मार्ग जरा निसरडा होता, गोल घुमटाभोवती फिरत शिलॉन्गचे मनमोहक दर्शन घ्यायचे, इथे हा चरम मनोज्ञ अनुभव घ्यायलाच हवा, काय बघायचे ते त्या त्या पॉईंट वर लिहिले आहेच, शिवाय फोटो काढणे आलेच, पण सेल्फी काढतांना जपून बरं का मंडळी! चौथ्या मजल्यावर एक छानसे कॅफे आहे! याच्याच बाजूला ईशान्य भारताचं बहारदार दर्शन घडवणारी चित्रफीत एका छोट्या चित्रपट थिएटर मध्ये दाखवल्या जाते, ती आवर्जून बघावी अशीच आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, हे भव्य दिव्य संग्रहालय ईशान्य भारताची सांस्कृतिक संपन्नता सांगणारे रेखीव चित्र-दालनच समजा ना!              

कॅथेड्रल ऑफ मेरी हेल्प ऑफ ख्रिश्चनस

शिलॉन्ग येथील हे चर्च कॅथोलिक आर्कडिओसीसचे कॅथेड्रल चर्च आणि शिलॉन्गच्या मेट्रोपॉलिटन आर्चबिशपचे आसन म्हणून प्रसिद्ध आहे. शहराच्या मध्यबिंदू पासून केवळ २ किलोमीटर दूर असलेलं हे चर्च पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी हे बांधलेले कॅथेड्रल शिलॉन्ग आर्कडिओसेसच्या साडेतीन लाखांहून अधिक कॅथलिक लोकांचे मुख्य प्रार्थनास्थळ आहे. त्यात पूर्व खासी हिल्स आणि री-भोई जिल्ह्यांचा समावेश आहे (एकंदर ३५ चर्च). हे चर्च Laitumkhrah या भागात आहे. या चर्चचे नांव येशूच्या Mary the mother यांच्यावरून दिलेले आहे, मदर मेरीच्या पुतळ्यासह ही पांढरी शुभ्र संगमरवरी इमारत अति भव्य आणि शोभिवंत दिसते. या चर्चची खासियत म्हणजे उंच कमानी आणि सुंदर रंगांनी सुशोभित काचेच्या खिडक्या! कॅथेड्रलच्या आत, क्रॉसची काही सुंदर टेराकोटा स्टेशन्स आहेत, जी येशूच्या जीवनातील घटना दर्शवतात. या भागात प्रामुख्याने येशू ख्रिस्ताच्या यातना व मृत्यूविषयक चित्रांचे दर्शन होते, ही चित्रे जर्मनी येथील एका कला संस्थेने तयार केली आहेत. या सोबतच येथे पवित्र शास्त्र आणि संतांच्या जीवनातील दृश्ये चित्रित केली आहेत. फ्रान्स येथे १९४७ ला तयार केलेली अप्रतिम रंगीत तावदाने हे या चर्चचे आणखी एक वैशिष्ट्य! मुख्य वेदीसमोर डावीकडे शिलॉन्गचे पहिले मुख्य बिशप ह्युबर्ट डी’रोसारियो, यांची कबर आहे. कबरीच्या पुढे अन मेरी आणि बाल येशूच्या पुतळ्यासमोर आणखी एक वेदी आहे. येथील पवित्र वातावरणात कांही वेळ शांतपणे बसावेसे वाटते! इथे दर महिन्याला नऊ दिवस विशेष भक्ती केली जाते. एका टेकडीवर उंचावर असलेल्या, त्याच टेकडीवर कोरलेल्या आणि कॅथेड्रलच्या अगदी खाली स्थित असलेल्या ग्रोटो चर्चला देखील आपण भेट देऊ शकतो.

वॉर्ड्’स लेक (Ward’s Lake)

हा सुंदर मानवनिर्मित तलाव शहराच्या मध्यभागी राजभवनजवळच स्थित आहे. “अवती भवती रम्य उपवने” असल्याने या तलावाचा परिसर सदैव लहान मोठ्या माणसांनी फुललेला असतो. इथले एक आकर्षण म्हणजे स्वचलित वल्हवणाऱ्या विविध आकाराच्या नौका. पायांनी आरामात नियंत्रित करणाऱ्या या बोटीतून तलावात विहार करावा, सोबतच हिरव्यागार वृक्षवेली अन पुष्पवाटिकांचे दर्शन घेत घेत नौकानयन करावे. तलावाच्यावर  पार्क आणि बोटॅनिकल गार्डन यांना जोडणारा पूल आहे, त्याखालून नौका पुढे घ्यावी. या तलावात बगळ्यांची माळफुले तरंगत असतात, नौका जवळ आली की ती विखुरतात. सांजवेळी नौकानयन बंद झाल्यावरच संपूर्ण तलावात त्यांचा स्वच्छंद विहार सुरु होतो! एकंदरीत, माणसांवर कुणीही प्राणी अथवा पक्षी विश्वास ठेवत नाहीत हेच खरे! नौकानयनाचा आनंद लुटल्यावर येथील तलावाभोवती असलेल्या उपवनातील पायवाटांवर मस्त फेरफटका मारा किंवा नुसतेच रिलॅक्स करायला देखील मजा येईल. निसर्गरम्य वातावरण आणि कमालीची स्वच्छता, याकरता हा पार्क आवर्जून बघावा असाच आहे!

थंगराज गार्डन

हे विशाल उपवन पण फार नयनरम्य आहे. विविध वृक्षराजींनी अन फुलांच्या ताटव्यांनी बहरलेले हे निसर्ग शोभेने सजलेले ठिकाण खरोखरी बघण्यासारखे आहे. आत शिरताच काय बघावे याचे मार्गदर्शन करणारा फलक दिसतो. गार्डनमध्ये फिरतांना त्या त्या ठिकाणच्या वृक्षवेलींची माहिती देणारे फलक जागोजागी दिसतात. उपवनाला वेढा घालणाऱ्या पायवाटा अन त्यांचे कुंपण, खाली नजर टाकली की शिलॉन्गचे विहंगम रूप दिसते. पायऱ्या चढल्या की विविध रंगांची वृक्षराजी दृष्टीस पडते. इथे फोटो काढण्याकरता बरीच सिनेमास्कोप ठिकाणे आहेत, आत काचेच्या घरात एक सुंदर नर्सरी (ग्रीनहाऊस) आहे!

Shillong city |Capital of Meghalaya | Informative Video

 

PYNNEH LA RITI || by kheinkor composed by apkyrmenskhem

प्रिय मैत्रांनो, आपण शिलॉन्गची अद्भुत सफर अगदी रमतगमत केली. अजून कांही सांगायचे शिल्लक राहिले आहेच. ते आपण पुढील अर्थात अंतिम भागात जाणून घेऊ! आत्तापुरता विराम देते!

खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप-

*लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (कांही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर 

बाली म्हणजे वेगवेगळे समुद्रकिनारे.

प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य वेगळे. एकच हिंदी महासागर पण त्याची अनंत रूपे.  बाली मधल्या वास्तव्यात या उदात्त सागरदर्शनाने आम्ही खरोखरच प्रसन्न तर झालोच पण एका अज्ञात गूढ शक्तीने अंतर्मनात कुठेतरी पार शुद्धी मिळाल्यासारखे वाटले. निसर्गाशी तद्रूप होणे म्हणजे काय हे अंशत: अनुभवले.

दक्षिण कुटा येथील बारुंग मधला पांडव बीच हा असाच एक दूरस्थ समुद्रकिनारा.  दोन उंच टेकड्यांनी वेढलेला. यापैकी एका टेकडीवर वरपासून खालपर्यंत कुंती, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे पुतळे कोरलेले आहेत. खाली पसरलेल्या अथांग समुद्राचे  आणि संथ किनाऱ्यावर फेसाळत येणाऱ्या लाटांचे निसर्ग चित्र केवळ अप्रतिम! हे थोडे अवघड पर्यटन स्थळ होते. निदान आमच्या वयाचा विचार करता.  त्यामुळे आपण येथे तरुण असताना का आलो नाही हा प्रश्न घेऊनच आम्ही परतलो. 

बाली म्हणजे सागर तसेच बाली म्हणजे मंदिरे.  हिंदू देवदेवतांची अनेक मंदिरे येथे आहेत. बालीनीज तसे धार्मिक, श्रद्धाळु.

रस्त्यातून जाताना लाल कौलांची सुरेख बैठी घरं पाह्यला मिळायची.  प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन सदृश बांधकाम दिसायचं आणि खजुराच्या पानांच्या टोपलीत  ठेवलेल्या तृणपात्या, चाफ्याची, जास्वंदीची फुले, पाने वाहिलेली असत.  अगदी प्रत्येक टॅक्सी मध्ये सुद्धा डॅशबोर्डवर अशा प्रकारचं पूजन केलेलं असायचं. त्याला ते अर्पण म्हणजेच त्यांच्या भाषेत कनांगसाडी असे म्हणतात.  शिवाय अनेक ठिकाणी झाडांवर इतरत्र कृष्णधवल  चौकडे असलेले कापडही गुंडाळलेले दिसले. तोही एक  भक्तीचाच प्रकार आहे.  अशा प्रकारच्या पताका, रुमाल अथवा वस्त्रं  ईशान्य भारताच्या भागातही आढळतात. एकप्रकारे,”देवा! तुझ्या कृपेची उब मला सदैव मिळो“ अशी विनवणी त्याद्वारे केली जात असावी. एकंदरच  इंडोनेशियन आणि भारतीय संस्कृतीतले साम्य बऱ्याच बाबतीत दिसून येते.

एका मंदिराला भेट देण्याचे आम्ही ठरवले.  तसे ते उंच पर्वतावरच होते.  मात्र आमचा टॅक्सीवाला आणि तेथील काउंटर वरचे लोक म्हणाले,” फारसे कठीण नाही. थोड्या पायऱ्या आहेत आणि दहा-पंधरा मिनिटांची चाल आहे.” म्हणून आम्ही या स्थळाला भेट देण्याचे ठरवले. प्रत्येकी २५ हजार आयडीर भरून तिकीटेही काढली आणि मंदिराच्या दिशेने कूच केले.  बरेचसे चढ-उतार, पायऱ्या चढत, उतरत चालत राहिलो.  वाटलं तितकं सोपं नव्हतं पण आता इतके आलोच आहोत तर अजून थोडे पुढे जाऊया करत चालत राहिलो, चढत राहिलो.  सभोवताली गर्द झाडी आणि वरून दिसणारा  सागर मनभावन, लुभावणारा होता. पण झाडांवरच्या माकडांनी मात्र उच्छाद मांडला होता. कुणाचा चष्मा पळव, कुणाची पर्स, मोबाईल, चप्पल, टोपी. माकडचेष्टा या शब्दाचा खरा अर्थ अनुभवत होतो. आम्ही अगदी सावधानतेने आपापल्या वस्तू घट्ट सांभाळत चाललो होतो तरी सतीश ची कॅप आणि साधनाची चप्पल माकडांनी पळवलीच. 

मंदिरापर्यंत पोहोचलो. कमरेवर बाली पद्धतीप्रमाणे निळ्या, भगव्या सिल्कचे काही लुंगी टाईप वस्र गुंडाळावे लागले होते.  मात्र इतके चढून आल्यानंतर कळले की मंदिराचे द्वार बंद आहे. बाहेरून मंदिराच्या आतला भाग दिसत होता.  उंच खांबावर एक राजदंड होता आणि त्याचे बाहेरूनच दर्शन घ्यायचे होते.  ते प्रतिकात्मक हनुमान मंदिर होते आणि सभोवतालची माकडे मंदिराचं खोडकर प्रतिनिधित्व करत होते!

निसर्गाचा नजारा मात्र अवर्णनीय होता आणि देव आम्हाला त्या दूर क्षितिजावर, विस्तीर्ण जलाशयात हलकेच मावळणाऱ्या सूर्याच्या रूपातच भेटला हे मात्र अगदी खरं.आम्ही मनोभावे त्या मावळणार्‍या भास्कराला वंदन केले.

प्रचंड थकलो होतो. कसेबसे पाय ओढत उतरलो आणि टॅक्सीत बसून बंगल्यावर  परतलो.

दरम्यान एका वाईट प्रसंगाचे  साक्षी व्हावे  लागले होते. मंदिरावरून खाली सेंटरवर परतलेल्या एका माणसाला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तो तिथेच  कोसळला. लोकांची धावपळ झाली. गर्दी जमली. मदतीचे अनेक हात पुढे आले. स्थानिक लोकांपैकी कुणी  ॲम्बुलन्स मागवली, डॉक्टर्सना फोन केले. घोळक्यात कुणी डाॅक्टर आहे म्हणून विचारले.त्या गृहस्थाच्या समवेत असलेल्यांची बावरलेली स्थिती केवीलवाणी होती. आम्ही मनातल्या मनात त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि परतलो. मानवतेचं झालेलं ते दर्शन हृदयस्पर्शी नक्कीच होतं. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असा माणूस हा माणसासाठी धावतोच  हे चित्र मात्र दिलासा देणार होतं. आम्ही मात्र ऐंशी च्या उंबरठ्यावर ही घटना पाहून एकच ठरवलं” इथून पुढे फारशी धाडसं करायची नाहीत.  झेपेल तेवढं आणि पचनी पडेल तेवढंच करायचं. “ बालीचा अनुभव घ्यायचा, फक्त निसर्गातच रमायचं.

टॅक्सी सुरु झाली.  मन बेचैन होतं.

साधना सुरेख आवाजात गात होती,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा….”

– क्रमश: भाग तिसरा 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग – ८ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग – ८ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(षोडशी शिलॉन्ग)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही लवून कुमनो! (मेघालयच्या खास खासी भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

आपल्या प्रतिसादाने मला खरंच खूप काही दिलंय! मित्रांनो, आम्ही जे थोडके मेघालय बघितले त्याची महती मागील सात भागात गायली, मात्र आमचा प्रवास ११ दिवसांचा होता, त्यामुळे आम्ही परत मेघालय बघणार हे निश्चित आहेच! हा मेघालायच्या नयनरम्य आठवणी जपत लिहिलेला आठवा आणि पुढील भाग मी खास करून षोडश वर्षीय, नवयौवनेसम तारुण्याने सळसळत्या अशा शिलॉन्ग या मेघालयच्या राजधानी करता राखून ठेवले होते. आम्ही मुंबई ते आसामची राजधानी गुवाहाटी येथील प्रवास विमानाने केला. उज्ज्वलने (माझा जावई) मेघालयच्या संपूर्ण प्रवासासाठी कॅब बुक केली होती. विमानतळावर आसामचा एका ड्रायव्हर अजय आमच्या स्वागताला हजर होता. त्याच्या सोबत आम्ही नंतरचे १० दिवस अतिशय आनंदाने प्रवास केला. कधी धो धो पावसाचे आक्रमण, कधी धुक्याची रजई, कधी अरुंद गल्ल्या, कधी वेडीवाकडी घाटाची वळणे, तर कधी आमची दिरंगाई, हे सर्व अत्यंत धीराने सहन करत अजय अविरत गाडी चालवत होता, वाहतुकीचे सर्व नियम कडकपणे पाळीत! आमच्याशी प्रेमाने संवाद साधत कुठे काय बघण्यासाखे आहे, या बाबत तो सूचना आणि मार्गदर्शन देखील करीत होता. मला तर तो कुठलेही प्रेक्षणीय स्थळ आले की “नानी आप ये कर सकता है/ नहीं कर सकता” अशी प्रेमळ ताकीदच द्यायचा. संपूर्ण प्रवासात आम्ही नादमधुर अशी गाणी (बंगाली आणि आसामी) ऐकत गेलो. त्यातीलच एक गाणे होते भूपेन हजारिका यांचे अत्यंत गोड आणि श्रवणीय असे “ओ गंगा”! आम्हा सर्वांना आवडलेल्या या गाण्याची ध्वनिफीत शेवटी दिलेली आहे. आम्ही गुवाहाटी ते शिलॉन्गला जाता जाता भूपेन हजारिका यांचे सुंदर स्मारक बघितले. 

 शिलॉन्ग ही भारताच्या मेघालय राज्याची राजधानी आणि तेथील सर्वात मोठे शहर आहे. याशिवाय शिलॉन्ग पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. १९६९ पर्यंत हे शहर संयुक्त आसाम प्रांताची राजधानी होते. १९७२ साली मेघालय हे स्वतंत्र राज्य म्हणून प्रस्थापित झाल्यावर हेच शहर मेघालयच्या राजधानीचे शहर बनले व आसामची राजधानी गुवाहाटीमधील एक उपनगर दिसपूर येथे हलवण्यात आली. आज शिलॉन्ग मेघालयची आर्थिक, सांस्कृतिक व वाणिज्य राजधानी आहे. २०२४ मध्ये या शहराची लोकसंख्या आहे सुमारे ५०८०००. हीच लोकसंख्या २०११ साली सुमारे १४३००० इतकी होती. येथील सुमारे ४७ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय तर ४२ टक्के लोक हिंदू आहेत. इंग्लिश ही येथील अधिकृत भाषा असून खासी, जैंतिया व गारो ह्या स्थानिक भाषांना राजकीय दर्जा देण्यात आला आहे. खासी व जैंतिया हिल्स हा भूभाग पारंपारिक काळापासून चेरापुंजी येथे राजधानी असलेल्या खासी जमातीच्या अखत्यारीखाली होता, परंतु सिल्हेट ते आसाम दरम्यान रस्ता बांधण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला येथील जमिनीची आवश्यकता भासू लागली. ह्यावरून झालेल्या युद्धात ब्रिटिशांची सरशी झाली व १८३३ साली हा भूभाग ब्रिटिशांनी जिंकला. परंतु चेरापुंजी हे ठिकाण सोयीचे नसल्यामुळे ब्रिटिशांनी १८६० च्या दशकात शिलॉन्ग शहराची स्थापना केली. १८७४ मध्ये ब्रिटिश राजवटीने नवनिर्वाचित आसाम प्रांताची स्थापना केली व शिलॉन्ग आसामची राजधानीचे शहर बनले.

या भागाला निसर्गाचा बहुमोल वारसा लाभलेला आहे. येथील डोंगराळ भाग व सौम्य हवामानामुळे ब्रिटीशांना हे शहर पूर्वेकडील स्कॉटलँडसारखे निसर्गसंपन्न आणि सुंदर वाटायचे. मात्र एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून देखील येथे रस्ते व रेल्वेमार्गांचा विकास होऊ शकला नाही, म्हणून शिलॉन्गची प्रगती संथ गतीने होत राहिली. १८ व्या शतकामध्ये येथे आलेल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला व मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या. ब्रिटीश वसाहतवादाचा वारसा सांगणारी घरांची रचना, हॉटेल व कॅफे मध्ये वाजवले जाणारे संगीत ही या शहराची वेगळी वैशिष्टये आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ठायी ठायी निसर्गाची लयलूट असलेला अत्यंत संपन्न असा हा प्रदूषणमुक्त प्रदेश आहे. शिलॉन्ग हे डोंगर उतारावर वसलेले आहे. येथील शिलॉन्ग व्यू पॉइंट वरून आपण संपूर्ण शिलॉन्ग शहर पाहू शकतो. आकाशात पसरलेले प्रचंड धुके आणि त्या धुक्यात हरवलेले शिलॉन्ग हे शहर वेगळीच अनुभूती देऊन जाते. (आम्ही हा पॉईंट बघू शकलो नाही कारण तेव्हां तो बंद करण्यात आला होता) 

शिलॉन्ग विमानतळ शहराच्या ३० किलोमीटर उत्तरेस स्थित आहे. येथून दिल्ली, कोलकाता तसेच ईशान्येकडील दिमापूर, गुवाहाटी, सिलचर, इम्फाल, आगरताळा इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ शिलॉन्गला गुवाहाटी तसेच इतर महत्वाच्या शहरांसोबत जोडतो. दुर्दैवाने आजही शिलॉन्ग भारतीय रेल्वेच्या नकाशावर नाही. मात्र भविष्यात गुवाहाटी ते मेघालय रेल्वेमार्ग बांधला जाईल अशी आशा आहे. आजच्या घडीला गुवाहाटी रेल्वे स्टेशन शिलॉन्ग पासून १०५ किलोमीटर दूर आहे. 

मित्रांनो, आता आपण शिल्लोन्ग येथील (अर्थातच आम्ही बघितलेली) प्रेक्षणीय स्थळे बघू या!

उमियम सरोवर (Umiam lake)

आम्ही शिलॉन्गच्या वाटेवर असतांना एक अतीव लावण्यमय, जणू काही चित्रप्रतिमेप्रमाणे निगुतीने घडवलेले असे उमियम सरोवर बघितले. मानवनिर्मित असूनही त्याचे नैसर्गिक सरोवरासारखेच भासमान होणारे सौंदर्य अगदी विनासायास सिनेमास्कोपिक अन फोटोजेनिक असे! कुठंही कॅमेरा फिक्स करा अन क्लिक करा, त्या चित्राची मोहिनी मन मोहणारच! या वेड लावणाऱ्या सरोवराला वेढलंय हिरव्यागार वनश्री अन विशाल पूर्व खासी पर्वतशृंखलांनी! शिलॉन्गच्या मध्यबिंदू पासून हे स्थळ १६ किलोमीटर अंतरावर आहे. उमियम नदीला बांध घालून हे विशाल आणि विलक्षण मानवनिर्मित आरस्पानी सरोवर बघताच आम्ही त्यावर लुब्ध झालो. स्थानिक लोक याला “बडापानी” म्हणतात. सहलीसाठी गावाबाहेर जायचंय ना, मग त्यासाठी हे ठिकाण एकदम सही! म्हणूनच इथे पर्यटकांची धो धो गर्दी असते, खास करून सुट्टीच्या दिवशी! इथला सूर्यास्त नयनाभिराम नारिंगी, गुलाबी अन लाल रंगांची उधळण करीत रंगावली रेखितच रात्रीच्या कुशीत विराम पावतो! पावसानंतरचे विहंगम इंद्रधनुषी रंग बघावे ते इथेच, कारण हे सर्व रंग या सरोवरात स्वतःचे राजस रुपडे न्याहाळत असतात!

 

आम्ही जेव्हा इथे पोचलो तेव्हा बघितले की, हिरव्याकंच पाचूंच्या माळेत नीलम गुंफला जावा तसे हिरव्यागार वनश्रीत हे सरोवर चमकत होते. आकाशाचे बदलते रंग या जलाशयाच्या जलाचे रंग देखील बदलत होते. कधी धवल, कधी नीलकांती, तर कधी मेघवर्णम शुभांगम! हरखून गेले मी या परिसरात. मित्रांनो, तुम्ही सुद्धा असेच हरवून जाल इथे! इथले नौकानयन म्हणजे या जलाच्या निळाईचे सौंदर्य जवळून पाहण्याची सुवर्णसंधी, अर्थातच हे अपरिहार्य! नौकानयन करतांना आमची नौका(मोटरबोट) इवलाल्या शंकूच्या आकाराच्या पाचूंच्या बेटांना वेढा घालीत विहार करीत होती. आमचे नशीब जोरावर होते, कारण आम्हाला नेणाऱ्या नौकेचे इंधन मधेच संपले आणि ते येईपर्यंत बोनस मिळावा तसे आम्ही भोवतालचे सृष्टी सौंदर्य न्याहाळीत बसलो. ते येऊ नये असे वाटत असतांनाच आले! या सरोवरात वॉटर स्पोर्ट्सची सुविधा देखील आहे (kayaking, boating, water cycling, scooting, canoeing इत्यादी). अर्थात यासाठी आभाळ व सरोवर शांत अन सौम्य असणे आवश्यक! आपल्याला यापैकी काहीच करायचे नसेल तर मजेत फेरफटका मारत या रम्य परिसराचं नुसतंच आनंददायी निरीक्षण करीत राहा! आपणास शक्य असल्यास या सरोवराजवळील हॉटेलमध्येच मुक्काम करा, अन निसर्ग शोभेचा मनसोक्त अनुभव घ्या.

पुढील भागात शिलॉन्गमध्ये आणि त्याच्या आसपास फेरफटका मारू या!

तोवर जरा दम धरा मंडळी! आत्तापुरते आवरते!

खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – *लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो व्यक्तिगत आहेत

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर 

२९/११/२३

तसं पाहिलं तर आम्ही सारेच ८० च्या उंबरठ्यावरचे. आयुष्यात या आधीही आम्ही अनेक प्रवास केले होते, अनेक पर्यटन स्थळांना धावून धावून, अत्यंत उत्सुकतेने, जग पाहण्याच्या दृष्टीने भेटी दिल्या होत्या.  पण कालचा सूर्यास्त पाहताना जाणवत होती ती आमच्या आयुष्यातील संध्याकाळ. 

या सहलीला येण्याचा एकच हेतू होता निवांतपणा  अनुभवावा. पृथ्वीवरच्या एका वेगळ्याच परिसराचा, तिथल्या निसर्गाचा, मानवी जीवनाचा, आनंददायी, निराळा अनुभव घ्यायचा होता आम्हाला.  मनातली हिरवळ जपत, वयाला न नाकारता निसर्ग आणि निराळ्या संस्कृतीत वावरण्याचा एक मजेदार अनुभव घेत स्वतःला रिफ्रेश्ड, तजेलदार करायचे होते. आज भी हम जवान है असे निदान एकमेकांना बजावायचं होतं.  आलेल्या अनेक पर्यटकांमध्ये ९०% माणसं तरुण वर्गातली असली तरी दहा टक्के आमच्यासारखेच तरुण तुर्क म्हातारे अर्क होतेच की! आणि ही सारी तरुण माणसं आमच्याबरोबर कौतुकाने सेल्फी काढत होते, म्हणत होते,” आमचंही म्हातारपण असच तुमच्यासारखं टवटवीत असावं”

तेव्हा या टवटवीत सहा जणांचा आजचा  पहिला स्थलदर्शनाचा दिवस.

सकाळीच मस्त complimentary नाश्ता घेतला. बालिअन पद्धतीचा नाश्ता होता.  वेगळ्या चवीची पुडिंग्ज, खीर, काही भाज्या, सॅलड्स, ब्रेड, भात, फळे,, फळांचा रस वगैरे भरपूर होते. नाश्ता छान आरोग्यदायी आणि चविष्ट होतात आम्हाला फिरायला घेऊन जाण्यासाठी दारातच टॅक्सी उभी होती.  जवळजवळ दिवसभराची आठ तासांची दूर होती.  खर्च रुपये तेरा लाख  इंडोनेशियन रुपीज.  प्रत्येक वेळी या लाखांची गोष्ट अनुभवत होतो आम्ही.  पण हे इंडियन नसून इंडोनेशियन रुपीज आहेत या विचाराने भानावरही येत होतो.

आमचा पहिला थांबा होता नुसा डुआ  बीच. अतिशय विस्तीर्ण असा रम्य सभोवताल.   तशी फारशी गर्दी जाणवत नव्हती.   आम्ही एका शटलने किनाऱ्यापर्यंत आलो.  लांबलचक पांढऱ्या वाळूचा किनारा, त्याला लागूनच नारळाची, तसेच नारळ जातीतल्या वृक्षांची रांग, काही पपनसाचे वृक्ष ही तिथे आम्ही पाहिले.  किनाऱ्याचे जणू काही ही वृक्षवल्ली संरक्षणाच करत होती.  समुद्राचे पाणी निळसर होते. पर्यटकांसाठी हे एक बाली इंडोनेशिया येथील अत्यंत आकर्षक स्थळ आहे. देशोदेशीचे पर्यटक येथे विखुरले होते आणि समोर पसरलेल्या महासागराच्या दर्शनाने थक्क होत होते.  माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की जगातला कुठलाही सागर हा त्या त्या वेळी अथवा प्रत्येक वेळी सौंदर्यातली विविधता घेऊनच आपल्यासमोर का येतो?  प्रत्येक किनारा आपण तितक्याच नवलाईने का पाहतो?  कदाचित याचं एकच उत्तर असेल हीच त्या किमयागाराची किमया!

इथे आसपास अनेक रेस्टॉरंट्सही  होती. अनेक साहसी सागरी क्रीडा होत्या. सांगितिक कार्यक्रमही होते. दरवर्षी मार्च महिन्यात येथे जाॅयलँड फेस्टिवल साजरा केला जातो. जी20 ची परिषद इथे भरली होती.  अनेक सांगितिक क्षेत्रातल्या कलाकारांसाठी नुसा डुवा हे एक उत्तम व्यासपीठ आहे. 

जितकं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवता येईल तितकं साठवण्याचा आम्ही अक्षरशः प्रयत्न करत होतो. त्या विस्तीर्ण परिसरात असलेली राम, सीता, लक्ष्मण यांची सुरेख शिल्पं आमच्या कॅमेराला आकर्षित करीत होती. उन्हाचा तडका जसा जाणवत होता तसाच समुद्रावरून वाहत येणारा वाराही मनाला सुखावत होता.

बाली येथे दरवर्षी जवळजवळ देशोदेशीचे पाच मिलियन पर्यटक भेट देतात.  इथल्या अनेक आकर्षणांपैकी एक प्रमुख आकर्षण म्हणजे गरुड विष्णू कल्चरल पार्क.(GWK).

या येथे गरुडावर बसलेल्या विष्णूचा ७५ मीटर उंच असा अत्यंत कलात्मक वास्तुकलेच्या आणि शिल्पकलेच्या दृष्टीने ही थक्क करणारा असा पुतळा आहे. तो एका सिमेंटच्या उंच पायावर बसवलेला आहे आणि हे सगळं बांधकाम पुन्हा एका तीन मजली इमारतीवर लॉन्च केलेलं आहे. त्यामुळे या पुतळ्याची संपूर्ण उंची जवळजवळ 121 मीटर होते. जगातले हे तिसऱ्या क्रमांकाचे उंच असे शिल्प गणले जाते. बालीमध्ये फिरत असताना ते अनेक ठिकाणाहून दिसते. आमचं विमान डेन्सपार विमानतळावर उतरत असतानाही आम्हाला सर्वप्रथम मोकळ्या आकाशात या गरुड विष्णूचे दर्शन झाले आणि आम्ही मनोमन आनंदलो.

बालीमध्ये हिंदू धर्माचे अधिक वर्चस्व आहे. विष्णू ही संरक्षक देवता मानली जाते.  या पुतळ्यातील विष्णूच्या हातातही कमलपुष्प, शंख आणि राजदंड आहे. बाली येथील उंगासान  बारुंग येथे एका उंच डोंगरावर या संपूर्ण शिल्पाची उभारणी केलेली आहे. जणू काही गरुडावरचा हा विष्णू उंचावरून बाली या बेटावर आपली संरक्षक नजर ठेवून आहे.

न्याओमन नुआरर्ता या वास्तुशास्त्रज्ञाने याची रचना केलेली आहे आणि या वास्तूचे उद्घाटन सप्टेंबर २०१८साली झाले आहे.  म्हणजे बाली येथील हे पर्यटन स्थळ तसे नवीन, अलीकडचेच आहे. प्रवेशासाठी येथे प्रत्येकी ५० हजार इंडोनेशियन रुपीज ची दोन तिकिटे काढावी लागतात .म्हणजे आम्हाला सहा जणांसाठी सहा लाख IDR लागले. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी येथे विनामूल्य शटल सर्विस आहे. हे मात्र आमच्यासाठी दिलासा देणारे होते. परिसर खूपच भव्य आणि विस्तीर्ण आहे आणि जागोजागी रामायणातील, पुराणातील कथा सांगणारी विशेष व्यक्तींची अतिशय दिलखेचक आणि उंच मोठी शिल्पे उभारलेली आहेत.  त्यात अगदी रावण, शूर्पणखा पण आहेत. ऋषि कश्यप, विनिता यांचे पुतळे आहेत. गरुडाची आई विनिता म्हणूनच गरुडाला वैनतेय असेही म्हणतात.

गरुडावर आरुढ झालेल्या विष्णूची एक कथा येथे सांगतात.  गरुडाला त्याच्या आईला गुलामगिरीतून मुक्त करायचे होते आणि त्यासाठी त्याला समुद्रमंथनातून निर्माण झालेले अमृत हवे होते.

“मी तुला माझ्या पंखावर घेतो आणि तू मला ते अमृत दे” असा गरुड आणि विष्णु मध्ये करार होतो.  विष्णूचे वाहन गरुड असल्या मागची ही  एक दंतकथा आहे.

पक्षी श्रेष्ठ गरुडाचे पसरलेले पंख आणि त्यावरचा रुबाबदार सुंदर विष्णू पाहताना अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटते.  हे शिल्प कॉपर, ब्रास आणि सिमेंटच्या मिश्रणातूनच बनवलेले आहे. पण पाहताना मात्र ते दगडी असल्याचा भास होतो. १९९३ ला या बांधकामाची सुरुवात झाली आणि २०१८ साली त्याचे उद्घाटन झाले. २१७ फूट रुंद आणि चारशे फूट उंच असलेलं हे भव्य सौंदर्य पहायला बालीत आलेले देशोदेशीचे पर्यटक गर्दी करतात. थक्क होतात, तृप्त होतात.

शिवाय इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जसे की संगीत, नृत्य, बालीअन सादर करतात. लोक परंपरा जपण्याच्या भावनेतून  झालेले हे कार्यक्रम मनोरंजक वाटतात. असा आनंददायी  अनुभव घेत, तीस हजाराचं(IDR) आईस्क्रीम खाऊन आणि बालीनीज कन्ये बरोबर छायाचित्र खेचून आम्ही तेथून तृप्त मनाने परतलो.  घेता किती घेशील आणि सांगू किती सांगशील अशीच आमची अवस्था झाली होती.

क्रमश: भाग दुसरा  

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग -७ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -७ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डेव्हिड स्कॉट ट्रेल (David Scott Trail)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही लवून कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

एक शंका (मागची अन पुढची देखील )

हे असे मावफ्लांगचे घनदाट जंगल, तिथेच माझी शिकार होणार कां? (तिथल्या जनावरांनी कुठले वाचलेत हे नियम!) मित्रांनो, म्हणूनच आपली सोबत करणारा, इथल्या पावलापावलाचे ठसे ओळखणारा स्थानिक वाटाड्या हवा, त्याचे अनुसरण करत चला. सरळ (असो का नसो) पायवाट सोडायची नाही, घनघोर जंगलात घुसायची ज्यादा अवलक्षणी हिंमत करायची नाय!तुम्ही वाघाला शोधू नका, तो पण तुम्हाला मुद्दाम शोधत येणार नाही!!! प्रामाणिकपणे सांगते, ईश्वराच्या या अनाहत निर्मितीने आम्ही इतके भारावलो होतो की, या रमणीय जंगलात आमच्या मनात एकदाही असे भलते सलते विचार यायला धजावले देखील नाहीत. मित्रांनो हे जंगल अवश्य बघा, चार एक तासांची बेगमी असू द्या! गाईडच्या भरवश्यावर निश्चिन्त असा, त्याच्याजवळ बंदूक वगैरे नसते, मात्र असते ती अपार श्रद्धा! तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर ही वनराई नव्हे तर, साक्षात देवराई आपले विशाल हरित बाहू पसरून तुम्हाला कवेत घ्यायला सिद्ध आहे! 

डेव्हिड स्कॉट ट्रेल (David Scott Trail):

मंडळी, मागील भागात मी वायदा केला होता, त्याला अनुसरून आज या दुर्गम प्रदेशाच्या एका अत्यंत दुष्कर आणि दुष्प्राप्य ट्रेलची! ही वाट दूर जाते…….. संपण्याचे नाव नको, अशी ही ताज्यातवान्या विशेषज्ञ ट्रेकर्सला भारी पडणारी अन भूल पाडणारी ट्रेल (पायवाट), चला तर मग!     

मेघालयातील ही सर्वात जुनी पायवाट. डेविड स्कॉट या ब्रिटिश प्रशासकाने भारताच्या उत्तर पूर्व भागात जवळपास ३० वर्षे (१८०२-१८३२) कार्य केलं. त्याने संपूर्ण खासी पर्वतरांगा आपल्या पायाखालून घातल्या. या काळात आसाम ते सिल्हट(आत्ताचे बांगलादेश), हे अंतर जवळपास १०० किलोमीटर होते! या मार्गावर घोडागाड्या नेता येतील अशा योग्य वाटांचा शोध घेण्यात आला! मालवाहतुकीसाठी याचा उपयोग होणार होता! हाच तो पूर्व खासी पर्वत रांगांतून जाणारा ट्रेल, त्याला डेविड स्कॉट यांचंच नाव दिल्या गेलंय! मूळ १०० किलोमीटरचा अति दुर्गम आणि खडतर मार्ग, आता मात्र पर्यटकांच्या सोयीसाठी लहान लहान भागात विभागला गेलेला! समुद्रसपाटी पासून ४८९२ फुटांवरील या निसर्गरम्य पायवाटेवरून मार्गक्रमण करतांना दिसतील लहान लहान शांत खेडी, प्राचीन पवित्र वनराई, विविध औषधी वनस्पती, ऑर्किड, मॅग्नोलिया सारख्या फुलांचा बहर, रबराची झाडे, ब्लॅकबेरी तथा गूसबेरी सारखी ताजी फळे, विस्तीर्ण हिरवीगार कुरणे, लहान मोठे ओढे, जलप्रपात, लहान मोठे तलाव, एकाश्म, दगडी पूल इत्यादी इत्यादी. कृत्रिमतेचा जराही स्पर्श नाही हेच या मार्गाचं खरंखुरं प्राकृतिक लावण्य! याचे मुख्य कारण काय तर माणसांची तुरळक ये जा!

साहसी ट्रेकर्स हा संपूर्ण मार्ग (१०० किलोमीटर) ४-५ दिवसात (रात्री गावात मुक्काम करून) चालत जाऊन पुरा करतात. मात्र यापेक्षा जास्त व्यावहारिक आणि लोकप्रिय असा एक दिवसाचा (साधारण ४ ते ६ तासात पूर्ण करता येईल असा) १६ किलोमीटरचा मार्ग  उपलब्ध आहे. मावफ्लांग (Mawphlang) ते लाड मावफ्लांग (Lad Mawphlang) असा हा मार्ग आहे.

या ट्रेलची सुरवात करायला आधी शिलाँग पासून २५ किलोमीटर दूर मावफ्लांग गावात पोचावे लागते, मग या गावापासून प्रवास सुरु करीत मार्गक्रमण करीत राहा, लाड मावफ्लांग ला पोचेस्तोवर! या दीर्घ मार्गिकेत काय नाही ते विचारा! निसर्गाची मुक्त उधळण, हिरवेगार पर्वत, दऱ्या वगैरे आहेतच पण आपल्याला ज्याचे दर्शन देखील दुर्मिळ असलेले संपूर्ण तळ स्वच्छपणे दिसेल असे नितळ पाणी, सारे काही सिनेमास्कोपिक चलचित्रासमान! एक छोटी सरिता तरंगिणी आपल्या चंदेरी जलाच्या उसळत्या लहरींचा नादस्वर घेऊन सतत आपली सोबत करीत असते. या वाटेवर मधून मधून उमियम नदी आपल्याला दर्शन देते. मित्रांनो, उमियम म्हणजे “अश्रूंचा महापूर”. या नावाच्या उगमाची हृदयद्रावक कथा सांगते! दोन बहिणी स्वर्गातून पृथ्वीवर येत असता, वाटेत एक बहीण हरवली अन तिला शोधणाऱ्या दुसऱ्या बहिणीच्या अश्रूपाताने ही उमियम नदी तयार झाली!

माझी मुलगी आरती, जावई  उज्ज्वल अन नात अनुभूती यांनी हा ट्रेक पूर्ण केला. आरतीचा अनुभव तिच्याच शब्दात खाली दिलाय! 

मेघालय ट्रिपच्या शेवटच्या दिवशी आम्ही केलेला हा ट्रेक फार इंटरेस्टिंग होता. आमच्या गाईड (दालम) बरोबर आम्ही सकाळी ९ वाजता या १६ किलोमीटर लांब प्रवासाची सुरवात केली. नैसर्गिक वातावरणात रमण्याचा अनन्यसाधारण अनुभव घेण्यास आम्ही फार उत्सुक होतो.आमचा गाईड मध्ये मध्ये ताजी रसदार बेरी तोडून देत होता. तेथील ओहळांचे आणि सुंदर निर्झरांचे पाणी अतिशय स्वच्छ आणि शीतल होते. थेट ओढ्यांमधून आणि निर्झरांमधून हे पाणी पिणे हा आम्हा शहरवासियांसाठी एक अनोखाच अनुभव होता. चालण्याच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी आम्ही प्रत्येक निर्झरात तोंड आणि हात पाय धूत होतो, त्यामुळे श्रमपरिहार होतच होता, पण आमचे मन देखील प्रसन्न राहत होते. ट्रेकच्या सुरवातीलाच एक कुत्रा आमच्या सोबत आला आणि पहिल्या ८ किलोमीटरपर्यंत तो आमच्या सतत सहवासात होता!  त्याला आमच्यापेक्षा आमच्याजवळ असलेल्या चिप्स आणि तत्सम जंक फूड मध्ये जास्त रस असावा! चिप्सचे पॅकेट उघडण्याच्या निव्वळ आवाजानेच तो सजग व्हायचा अन आम्ही त्यातील थोडा भाग त्याला देईपर्यंत आमची सुटका नसायची! (आमच्या एका फोटोत तो बी हाये!) दालमने आम्हाला एक मनोरंजक कथा सांगितली. प्राचीन काळी मानव खूप मजबूत बांध्याचा होता. एकच माणूस एक मोठा (पाषाण) एकाश्म आरामात उचलत असे, मात्र त्याला उचलण्याधी तो या एकाश्मशी छान संवाद साधत असे  व त्याची परवानगी देखील घेत असे. पाषाण जरी याच्याशी बोलत नसला तरी याला मात्र पाषाणची स्पंदने ऐकू यायची म्हणे! माणसाकडून अशी प्रेमाची गुजगोष्ट ऐकली की तो पाषाण नरमाईने वागत असे! मित्रांनो, गोष्टीत का होईना, निसर्गाशी संवाद साधणारे हे वन्य जीव!  त्यांच्या भावनांचा आपण आदर करायलाच हवा, खरे पाहिले तर निसर्गाचे रक्षण करायला अशा या निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या माणसांचीच आता नितांत आवश्यकता आहे!  

आम्ही एका गावात दुपारचं जेवण मॅगी आणि लिंबू यावर आटोपले. काही शाळेत जाणाऱ्या मुलांना भेटल्यावर कळले की ते शाळेत पोचायला रोज याच कठीण मार्गावर ये  जा करतात, हवामान कितीही वाईट असो! काही स्थानिक स्त्रिया त्यांच्या छकुल्यांना पाठीशी घेऊन याच रस्त्याने जातांना भेटल्या! (या बहाद्दर  मुलांना आणि स्त्रियांना आमचा अर्थातच साष्टांग कुमनो!) इथे कुठलीही वाहने नाहीत, कुठलेही नेटवर्क नाही. एकदा का तुम्ही ट्रेक सुरु केली की ती संपवण्यावाचून अन्य पर्याय नसतो! आमचा हा निसर्गाच्या संगतीत केलेला सुंदर प्रवास संध्याकाळी ४ वाजता संपला. हा ट्रेक आमच्या आयुष्यभर लक्षात राहील! आमच्या गाईड दालमने (DalamLynti Dympep,  वय केवळ २२ वर्षे, मु. पो. मावफलांग,  फोन क्र ८८३७०४०९५८) आम्हाला अतिशय चांगले मार्गदर्शन केले आणि संपूर्ण प्रवासात आम्हाला सर्वतोपरी मदत केली. त्याचे  मनापासून खूप खूप आभार! आमचा सल्ला आहे की या प्रवासात सोबतीला गाईड घ्यायलाच हवा. दालमसारखा वाटाड्या असेल तर कितीही संकटे का येईनात, त्यांच्यावर मात करणे सुकर होईल यात कुठलीच शंका नाही! एका फोटोत तीन एकाश्म (मोनोलिथ्स) अन त्यांच्यासोबत दिसतोय तो दालम!

प्रिय वाचकहो हा प्रवास आता शिलाँगपर्यंत आलाय! पुढच्या मेघालय दर्शनच्या भागात तुम्हाला मी नेणार आहे शिलाँग या मेघालयाच्या राजधानीत आणि तिच्या जवळच्या एका अद्भुत प्रवासासाठी!

तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – 

*लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो व्यक्तिगत आहेत!

डेविड स्कॉट ट्रेलचे काही व्हिडिओ यू ट्यूब वर उपलब्ध आहेत.

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ “चला बालीला…” – भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर 

२७/११/२३

बाली इंडोनेशियातील एक बेट.  जावा बेटाच्या पूर्वेकडचे हे बेट.  वास्तविक जावा, सुमित्रा, या हिंदी महासागरातल्या बेटांबद्दल शालेय जीवनात भूगोलातून अभ्यास केला होताच. बाली हेही याच बेटांपैकी असलेलं एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ.  कला, संगीत,  नृत्य,समुद्र किनारे आणि मंदिरे यासाठी प्रसिद्ध असलेलं एक नितांत सुंदर बेट आणि मित्र परिवारांच्या समवेत या बेटास प्रत्यक्ष भेट देण्याचे माझे एक बकेट लिस्ट मधले स्वप्न पूर्ण होण्याची संधी मला मिळाली.  जीवनातल्या अनेक भाग्य क्षणांच्या संग्रहात याही अनमोल क्षणाची भर पडली.

दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी आम्ही चक्क सिंगापूर एअरलाइन्सच्या एस क्यू 423 या फ्लाईटने *मुंबई ते सिंगापूर (चांगी विमानतळ) ते डेन पसार (न्गुराह राय विमानतळ) असा प्रवास करून बाली या बेटावर येऊन पोहोचलो. आम्ही बुक केलेले रिसाॉर्ट कर्मा चांडीसार हे विमानतळापासून जवळजवळ दोन तासाच्या अंतरावर होते. पण ड्राईव्ह अतिशय रमणीय होता.  सुंदर रस्ते,सभोवती अथांग सागर, झाडी, डोंगर आणि चौकाचौकातले उंच, कलात्मक, रामायणातली कॅरेक्टर्स शिल्पे! भव्य बांधकाम असलेली प्रवेशद्वारे. कोणती कोणती छायाचित्रे टिपावीत हेच कळेनासं झालं होतं.  मग ठरवलं आजचा तर पहिलाच दिवस आहे. छायाचित्रे टिपायला आपल्याजवळ अजून पुढचे सहा दिवस आहेतच की.

पण डेनपसार शहरात प्रवेश करता क्षणीच जाणवले होते ते इथली हिंदू धर्मीय जीवन पद्धती.  रामायण या पवित्र ग्रंथांशी त्यांचं असलेलं जन्मजात खोल नातं.  कसं असतं ना माणसाचं ? धर्म, संस्कृती, कला यांचं एकात्म्य हे क्षणात आपल्याला आपुलकीच्या नाते बंधनात जोडतं. मग वातावरणातल्या बदलाशी आपण नकळत तुलनात्मक रित्या बांधले जातो.

मी पटकन म्हणाले,” मला तर इथे आल्यापासून गोव्यात आल्यासारखंच वाटतंय!  इथल्या बोगन वेली, जास्वंदी, चाफा, कर्दळ, शिवाय नारळ, केळी, बांबू हे तर सारं कोकण —केरळ यांचीच आठवण करून देत होतं.  भारत आणि इंडोनेशियाचं हे मनातल्या मनात केलेलं एकत्रीकरण अर्थातच खूप गंमतीदार होतं.

आमचा सहा जणांचा ग्रुप.  मी, विलास, सतीश, साधना, सुमन आणि प्रमोद.  सतीश चे कर्मा ग्रुपचे सदस्यत्व असल्यामुळे आम्हाला कर्मा चांडीसार या प्राॅपर्टी मध्ये एक सुंदर ऐसपैस बंगला मिळाला होता.  तोही अगदी समुद्रकिनाऱ्याला लागूनच.  हिंदी महासागराचं जवळून  झालेलं ते नयनरम्य दर्शन केवळ अप्रतिम! आमचा सहा जणांचा ग्रुप एकदम आनंदला.

आम्ही सारे पंच्याहत्तरी  पार केलेले, खूप वर्षांपासून मैत्रीच्या घट्ट बंधनात बांधलेले. क्षणात अक्षरशः केवढे तरी तरुण झालो आणि या सहलीत आपण काय काय साहसे करू शकतो याविषयीचे बेत आखू लागलो. चालू ,चढू, पोहू करू की सारं…!! अंतर्मन म्हणायचं,” वय विसरू नका.” पण निसर्गाच्या सानिध्यात माणूस वय विसरतो हे मात्र खरं.

२८/११/२३ 

बालीत (इंडोनेशिया) प्रवेश केल्यावर हवाई अड्ड्यावरच आपण एकदम मिलियाॅनिअर झाल्याचा भास का असेना पण सुखद अनुभव आला. 

पोहोचल्याबरोबरच आम्ही प्रथम व्हिसाची प्रक्रिया पूर्ण केली. इथे व्हिसा ऑन अरायव्हल असतो. व्हिसासाठी आम्हाला प्रत्येकी ३३ डॉलर भरावे लागले. नंतर मनी चेंजरकडून इंडोनेशियन रुपयाची (आयडीआर) करन्सी घेतली आणि काय सांगू अक्षरशः पैशांचा पाऊसच पडला. केवळ ५० हजारा.चे जवळजवळ ८८ लाख इंडोनेशियन रुपये हातात आले. एकेक लाखाच्या, पन्नास हजारांच्या, वीस हजारांच्या च्या भरपूर नोटा.  पर्समध्ये मावेनात. क्षणात खूप श्रीमंत झाल्याचा एक मजेशीर अनुभव मात्र घेतला.

पहिल्या दिवशी टॅक्सीने आम्ही आमच्या आरक्षित बंगल्यावर जेव्हा आलो तेव्हा टॅक्सीचे बिल साडेनऊ लाख इंडोनेशीयन  रुपये झाले होते, त्याचीही गंमत वाटली.

तसे आम्ही दुपारीच पोहोचलो होतो.  विमानात खाणे झालेच होते तरीही थोडे ताजेतवाने होत बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचा आम्ही समाचार घेतला.  सोबत सॉफ्ट ड्रिंक्स, रेड वाइन वगैरे होतंच. 

आमचा बंगला अगदी वेल फर्निश्ड आणि सर्व सुविधायुक्त होता. सुरेख सजवलेले अद्ययावत किचनही  होते.

पहिल्या दिवशी थोडा आरामच करायचे ठरवले. बंगल्याजवळच स्विमिंग पूल होता व तेथे असणार्‍या रेस्टॉरंट पलीकडे अथांग पसरलेला शांत. गूढ, हिंदी महासागर. या सागरात ठिकठिकाणी मोठ मोठी  जहाजे दिसत होती.   काही व्यापारीही असतील कारण बाली हे सुप्रसिद्ध व्यापारी बेट आहे. काही पर्यटन बोटीही असतील तर काही मच्छीमारांच्या बोटी होत्या.  मच्छीमारी हा इथला महत्त्वाचा व्यवसाय आहे.बालीचं हे प्राथमिक दर्शन मनभावन होतं.

हळूहळू सूर्य क्षितिजा पलीकडे गेला. सोनेरी किरणांनी आकाश रंगले आणि मग त्यातूनच अंधाराची वाट पसरत गेली. मात्र मानवनिर्मित रोषणाईने संपूर्ण सागर किनारा चमकू लागला. परिसरातील संमीश्र शांतता, गुढता अनुभवत आम्ही परतलो.  सतीशने दुसऱ्या दिवशीचा साईट सीईंगचा कार्यक्रम आखलेला होताच.

– क्रमश: भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग -६ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -६ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मावफ्लांगचे पवित्र जंगल)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मागील भागात मी वायदा केला होता की, आपल्याला मावफ्लांग (Mawphlang) च्या सेक्रेड ग्रोव्हज/ सेक्रेड वूड्स/ सेक्रेड फॉरेस्ट्स मध्ये जायचंय! चला तर मग तयार व्हा एका रोमांचक आणि अद्भुत प्रवासाकरता! सेक्रेड ग्रोव्हज/ सेक्रेड वूड्स/ सेक्रेड फॉरेस्ट्स अर्थात पवित्र जंगले किंवा उपवने यांना कांही विशिष्ट संस्कृतीत विशेष धार्मिक महत्व आहे. जगभरातील विविध संस्कृतींमध्ये ही पवित्र उपवने त्यांच्या वैशिष्ट्यांसह अस्तित्वात आहेत. ती जरी आपल्याला सुंदर लॅण्डस्केप्स (नुसती बघण्यापुरती किंवा चित्रे किंवा फोटो काढण्यापुरती प्रेक्षणीय स्थळे) म्हणून दिसत असलीत तरी कांही पंथी किंवा धर्मियांसाठीं ती त्यापलीकडे जाऊन अत्यंत महत्वाची पवित्र स्थळे आहेत. त्यातल्या त्यात काही विशिष्ट वृक्ष तर अत्यंत पवित्र मानले जातात. या समुदायाचे लोक ही वनराजी प्राणापलीकडे जपतात. याच जपणुकीमुळे येथील वृक्षवल्ली हजारो वर्षे जुनी असूनही सुरक्षित आहेत.

या पर्वतीय राज्याच्या वनराजीतच काही महत्वाच्या सांस्कृतिक परंपरांचा उगम आहे. खासी समाजाला अतिप्रिय अश्या या मावफ्लांगच्या पवित्र जंगलाने प्राचीन गुह्य इतिहास, गूढरम्य दंतकथा आणि विद्या आपल्या विस्तीर्ण हिरवाईत दडवून ठेवल्या आहेत. इथल्या उंचनिंच नैसर्गिक पायऱ्या अन पायवाटा, लहान थोर वृक्षसमूह, त्यांना लगडलेल्या लता, चित्रविचित्र पुष्पभार, झाडांवर आणि त्याखाली पसरलेली फळे, विस्तीर्ण पर्णराशी, जागोजागी विखुरलेले पाषाण (एकाश्म/ मोनोलिथ), मध्येच विविध सप्तकातील कूजनाने वनाची शांतता भंग करणारे पक्षी, बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे,  यत्र तत्र अन सर्वत्र  प्रवाही जलाचे ओहोळ, सारे कसे गूढ रम्य कादंबरीतील पात्रांसारखे, जणू प्रत्येकाला “मला काही सांगायचंय!” हेच वाटत असावं! येथील जमातींचे सकळ आयुष्यच मुळी या वनराजींशी जुळलेले, त्यांचे रक्षणकर्ते आणि त्यांना भयभीत करणारे जंगल एकच! 

शिलॉंग शहरापासून केवळ २६ किलोमीटर दूर असलेले हे मावफ्लांगचं सॅक्रेड ग्रूव्ह! आपली उपवनाची/जंगलाची कल्पना म्हणजे चांगल्या दगडी, काँक्रीट, संगमरवरी पायऱ्या, रस्ते, बसायला बेंच, कृत्रिम कारंजी, तरणतलाव, उपहारगृह, इत्यादी इत्यादी! मंडळी, इथं यातलं कांही कांही नाही. जंगल जसंच्या तसं! खालचा पालापाचोळा सुद्धा अस्पर्श, इथल्या कुठल्याही गोष्टीला माणसाचा स्पर्श वर्जित! अर्थात आपण रान तुडवतांना नाइलाजाने होतो तितकाच! मैत्रांनो, हेच ते अनामिक, अभूतपूर्व, अप्रतिम, अलौकिक, अनुपम, अनाहत, अनवट अन अस्पर्शित सौंदर्य! आम्हाला आमच्या गाईडने (वय वर्षे २१) या जंगलाचा हृदयाला भिडणारा विलक्षण असा संदेश सांगितला, “इथे या, डोळे भरून इथली निसर्गाची लयलूट बघा (कांहीही लुटून मात्र नेऊ नका), इथून नेणार असाल तर इथल्या सौंदर्याच्या स्मृती न्या अन जतन करा, हृदयात किंवा फार तर फार कॅमेऱ्यात! इथून एक वाळलेले पान तर सोडाच, काडी देखील उचलून नेऊ नका! मित्रांनो, ही अशी सक्ती असल्यावर जंगलतोड हा शब्द आपण स्वप्नांत देखील आठवणार नाही! अशी झाडांची जपणूक आपण करतो का? जमेल तिथे अन जमेल तशी पाने-फुले ओरबाडून घेणे आणि झाडांना इजा पोचवणे, हा उद्योग इतका कॉमन आहे की काय बोलावे! (आपल्याकरता प्रत्येक महिना श्रावणच असतो, पूजेकरिता पाने अन फुले नकोत का!!!)

सेक्रेड ग्रोव्हस मध्ये याला वाव नाही, उलट “असे कराल तर मृत्यू होतो, पासून तर कांही बाही होते”, हीच शिकवण या जमातीच्या दर पिढीला दिली गेलीय. इथं स्थानिक एक साधा नियम पाळतात (आपणही पाळायचा) “या जंगलातून कांहीही बाहेर जात नाही.” जर तुम्ही मृत लाकूड किंवा मृत पान चोरले तर काय होईल असा तुम्हाला प्रश्न पडेल. दंतकथा सांगतात “जो कोणी या जंगलातून काहीही घेऊन जाण्याचे धाडस करतो, तो गूढपणे आजारी पडतो. कधी कधी तर हे प्राणांवर देखील बेतते”. म्हणूनच तर इथे काही झाडे १००० वर्षांच्यावर जगताहेत, नैसर्गिक ऊर्जा, पाणी, खत, सर्व काही आहे त्यांच्याजवळ, सुदैवाने एकच गोष्ट नाही, माणसाची बुभुक्षित अन क्रूर नजर!!! ही वनसंपदा धार्मिक कारणांनी का होईना, राखली आहे इथल्या तिन्ही जमातींनी! इथे जैवविविधता उत्तमरित्या जतन केलेली आहे. वनस्पती आणि झाडांच्या प्रजातींच्या विस्तृत श्रेणी (यात दुर्मिळ प्रजाती सुद्धा आल्या बरं का!) फोफावल्या आहेत, निर्भय होऊन जगताहेत. मंत्रमुग्ध करणारी ही हिरवीकंच पर्जन्यवनराई इतकी कशी बहरते? याला कारण हिचे उष्णकटिबंधीय उगमस्थान! इथे वारा अन पाऊस फोफावतो, आनंदाचं उधाण येऊन! सोसाट्याचा वारा अन “घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा!” हे होणारच. (गाणं टाकलय शेवटी!)

प्रिय मैत्रांनो, इथला टाइम पाळणे अत्यावश्यक (सकाळी ९ ते संध्याकाळी ४.३०). उशीरा जंगलात जाणाऱ्यास आणि जंगलातून उशीरा बाहेर येणाऱ्यास माफी नाही! आपण या जंगलाला सरावलेलो नाही, त्यामुळे भटकणे टाळा. बघण्यासारखे बरेच काही असूनही तुमच्या डोळ्यांना ते दिसणारच नाही याची खात्री बाळगा. इथल्याच प्रशिक्षित स्थानिक वाटाड्या/ गाईडला पर्याय नाही. तुमचा हा गाईड इथली समृद्ध वनसंपदाच दाखवणार नाही तर तो इथला वनरक्षक आणि सांस्कृतिक वारसदार आहे, हे लक्ष्यात असू द्या! हा पथप्रदर्शक रोमहर्षक तऱ्हेनं या जंगलातले गूढ उलगडून दाखवेल, तसेच खासी जमातींच्या धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचा अन या जंगलाचा संबंध तपशीलासह सांगेल! मंडळी, तो इथले पानंपान बघता बघताच मोठा झालाय! इथल्या दंतकथा त्याच्याच प्रभावी निवेदनातून ऐकाव्या मित्रांनो. गंमत म्हणजे सर्व गाईड्सची जबानी सारखीच (समान प्रशिक्षण!), आमचा तरुण गाईड तर अस्खलित इंग्रजी बोलत होता. त्यानंच आम्हाला खासी भाषेची जुजबी माहिती दिली.    

आता या वनसंपदेतील नेत्रदीपक व विस्मयकारक गोष्टी बघू या:

नयनरम्य जंगलातील पायवाट (फॉरेस्ट ट्रेल)

इथल्या या वेड्यावाकड्या वाटा पर्यटकांना अगम्य वाटाव्यात अशाच आहेत! इथे फिरतांना वृक्ष वल्लींच्या आपसूक सजलेल्या मंडपातून किंवा छताखालून जातच जावं. हे सदाहरित घनतिमिर बन आपल्यावर मायेची पाखर घालत सूर्यकिरणांचा स्पर्श सुद्धा घडू देत नाही! इथली पानगळीची विलक्षण नक्षी हिरव्या अन हळदी रंगांनी सजलेली! हे निबिड वनवैभव कायम वाऱ्याच्या संगीतावर दोलायमान होऊन सळसळत असतं! या पायवाटा आपल्याला घेऊन जातात इथल्या सांस्कृतिक परंपरेच्या जगात!  

वर्षा ऋतूतील मुसळधार पाऊस असेल तर हा प्रवास कैकपटीने दुस्तर! याच सुगम्य वाटा आता निसरड्या अन शेवाळल्या होतात! (आमचे अनुभवाचे बोल!) आम्ही निम्म्याहून अधिक वन पाहिले, पण नंतर पायवाट सुद्धा चालणे कठीण झाले. एक नदी ओलांडून मगच पुढे जावे लागेल, शिवाय परतीची वाट नाही, अशी माहिती गाईडने दिली अन आम्ही माघारी फिरलो. प्रिय वाचकांनो, सप्टेंबर-ऑक्टोबर हे महिने या परिसराला भेट द्यायला उत्तम!

एकाश्म/ मोनोलिथ्स

या वनाचे गूढ वर्धित करणाऱ्या अनाकलनीय स्थानांवर एकाश्म/मोनोलिथ्स (monoliths) आहेत. मोनोलिथ म्हणजे एक उभा विशाल पाषाण किंवा एकाश्म/ एकल शिळा! गाईडने सांगितले की, एकाश्म ही खासी लोकांच्या पूजेची ठिकाणे आहेत. यांचा वापर प्राण्यांचा बळी देण्यासाठी करतात. आपण ज्या सहजतेने मंदिरात जाऊन घंटा वाजवतो, त्याच प्रकारे हे लोक प्राण्यांचा बळी देतात. इथे एक मोनोलिथ फेस्टिव्हल (उत्सव) देखील असते, आदिवासींचा सांस्कृतिक वारसा आणि वैभव बघायची ही उत्तम संधी! या वेळी हे संपूर्ण जंगल जिवंत होऊन स्वतःची कथाच जणू विशद करत असावे!

खासी हेरिटेज गाव

गावकऱ्यांच्या हस्तकलेचे दर्शन आणि आदिवासी झोपड्या असलेले हे गाव प्रदर्शनासाठी तयार केले जात आहे! याचे काम विविध स्तरावर सुरु आहे असे स्थानिकांनी सांगितले.

लबासा, जंगलाची देवता

लबासा, ही आहे शक्तिशाली देवता, याच जंगलात संचार करणारी, या प्रदेशातील सर्व लोकांची तारणहार अन श्रद्धास्थान! म्हणूनच बघा ना, तिच्या कृपेने गावकऱ्यांची संपूर्ण उपजीविका जंगलाभोवतीच फिरत आहे. रोग असो, नशिबाचे फेरे असो किंवा दैनंदिन समस्या असोत, ही देवता त्यांच्या विश्वासाचा प्रमुख आधारवड आहे. आदिवासी लोकांचे रक्षण करण्यासाठी ही देवता वाघ किंवा बिबट्याचे रूप धारण करू शकते अशी आख्यायिका आहे. देवतेला प्रसन्न करण्यासाठी कोंबडा किंवा बकऱ्यांचा बळी दिल्या जातो. गावकरी त्यांच्या मृतांना या वनातच जाळतात.

पुढील भागात सफर करू या एका अत्यंत दुष्कर ट्रेलची!

तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ धीर समीरे सरयू तीरे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

धीर समीरे सरयू तीरे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

राम राम वाचकहो!

२०२२ च्या रामनवमीचा पावन दिन, ठाण्यातील ‘राम गणेश गडकरी सभागृहात’ गीत रामायणाचे आवर्तन सुरु होते.  श्रीधर फडके यांचे स्वर! गाणे होते आपले सर्वांचे कंठस्थ अन हृदयस्थ, ‘सरयू तीरा वरी अयोध्या, मनू निर्मित नगरी’! देहभान हरपून गाणे हृदयात सामावून घेण्याची माझी ही पहिली वेळ नव्हे!

‘सामवेदसे बाळ बोलती, सर्गामागुन सर्ग चालती,

सचीव, मुनिजन, स्त्रिया डोलती, आंसवे गाली ओघळती

कुश लव रामायण गाती’

अशी अवस्था प्रत्येक वेळी प्रेक्षकांची होते, तशीच त्या दिनी होती. मात्र तशातच (होऊ नये असे वाटत असतांना नेमके) मध्यांतर झाले. या मध्यंतरात अचानक एखादी ‘देववाणी’ कानी पडावी तसे श्रीधरजींचे भावपूर्ण शब्द कानी पडले. “मी अयोध्येत गीत रामायण सादर करणार आहे जुलै २०२२ ला! शरयू किनारी, तेव्हाही कोरस मध्ये अशीच साथ द्यायला या मला!” तेव्हां मी अंतर्बाह्य मोहरून गेले! स्वप्नात, गाण्यात अन पुस्तकात कल्पिलेली अयोध्या, रामाच्या वास्तव्याने जिचा कण कण पुनीत झाला आहे, ज्या सरयू नामक सरितेच्या किनारी प्रत्यक्ष मनू (प्रथम मानव) ने निर्माण केलेली ती भव्य दिव्य नगरी, जिथे रामाचे आदर्श ‘रामराज्य’ प्रत्यक्ष साकारले ती अयोध्या! याची देही, याची डोळा अन याची हृदया बघायला मिळेल. डोळ्यात प्राण आणून ही नगरी बघावी, अन कानात जीव ओतून श्रीधरजींच्या मुखातून गीत रामायण ऐकावे, यालाच मणी कांचन योग म्हणावे! या अमृतमय योगायोगात अजूनच माधुर्य यायचे होते. त्याच अवधीत जेष्ठ गायक आणि कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे रामकीर्तनरंगाने अयोध्येचे आसमंत उजळून टाकणार होते. आणखी काय हवे! सर्व कांही मनासारखे घडत असतांना मी अचानक आजारी पडले, माझी कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह होती! मात्र डॉक्टरांचा उचित सल्ला घेतल्यावर लक्षात आले की, गाडी सुटण्याच्या आदल्या दिवशी माझ्या कोरोनाचा ‘एकांतवास’ संपणार होता. मनातल्या मनात रामनामाचा गजर सुरु होता. सोबत असलेल्या अशक्तपणावर हेच ‘रामबाण’ औषध होते.

मंडळी, यात्रेच्या निर्धारित कार्यक्रमानुसार  मध्यरात्री जवळपास १२ च्या सुमारास आम्ही अयोध्येत पाऊल ठेवले. तीर्थक्षेत्राला अनुरूप अशा ‘जानकी महल’ या बऱ्यापैकी मोठ्या वास्तूतील आम्ही आरक्षित केलेल्या खोल्यांमध्ये प्रवेश मिळाला. सक्काळी सक्काळी तेथील भित्त्तिचित्रांतील रामाच्या जीवनातील विविध प्रसंग दर्शवणारे सुंदर रंगकाम, राम सीता, लक्ष्मण, तसेच हनुमान यांची प्रेक्षणीय देवालये बघून रात्रीचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. सकाळी सात्विक अल्पाहार, नंतर लगेच चारुदत्तजींचे कीर्तन अन संध्याकाळी श्रीधरजींचे गीत रामायण याप्रमाणे बहुपेडी रामसंकीर्तन, भजन, नामस्मरण अन गायन असा भरगच्च सत्संग कार्यक्रम होता.

‘अशनि राम पाणि राम, वदनि राम, नयनी राम

ध्यानी मनी एक राम, वृत्ती राम जाणिल काय

रामचंद्र मन मोहन नेत्र भरून पाहिन काय!’

हे माणिक बाईंचे भक्तिरसाने ओथंबलेले शब्द मनात गुंजायमान होत होते.! सकाळ संध्याकाळचे राम नाम संकीर्तनाचे तास वगळून, मी आणि माझ्या मैत्रिणीने अयोध्या दर्शनाचा जमेल तसा अन जमेल तितका लाभ घेण्याचे ठरवले.    

सर्वप्रथम श्रीराम जन्मभूमी बघण्याची ओढ होती, मात्र मी गेले तेव्हा भाविकांसाठी त्या स्थळी एक तात्पुरते छोटेसे राम मंदिर बघायला मिळाले. त्याच मंदिराचे मनोभावे दर्शन घेता घेता रामजन्म भूमीचा विस्तीर्ण परिसर बघितला. मजबूत लोखंडी जाळ्यांच्या आडून मंदिराचे निर्माणकार्य वेगात सुरु असलेले दृष्टिपथास पडत होते.  शेकडो कारागिरांकडून अहोरात्र हस्त शिल्पे साकारण्यात येत होती. मंडळी, आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपणासाठी अयोध्येत कोणते सामान कुठून आले, रामाची मूर्ती कुणी बनवली या आणि इतर गोष्टी लहान मोठ्या पडद्यांवर उपलब्ध आहेत. मात्र ‘स्थानमाहात्म्य’ लक्षात घेतले तर, ज्या रजकणांना रामाच्या चरणांचा स्पर्श झाला आहे, तेच कण आपल्यासाठी श्रद्धासुमने आहेत. होय ना!   

हनुमानगढी, दशरथ महल, कौशल्या महल, इत्यादी मंदिरे बघण्याचे आम्हाला अहोभाग्य लाभले. ‘हनुमान गढी’ नावाच्या टेकाडावर हनुमानाचे दहाव्या शतकातील प्राचीन मंदिर आहे. व्यवस्थित बांधलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर हनुमानाचे मंदिर नजरेस पडते. 

आमच्यापैकी बरीच मंडळी रोज पहाटे उठून सरयू किनाऱ्यावर पायीच जात स्नानाचा लाभ घेत असत. तिथे ‘राम की पौडी’ नावाने प्रसिद्ध असलेले घाट आणि कपडे बदलण्यासाठी (महिला आणि पुरुष यांचे वेगळे) आडोसे आहेत.  आम्ही जुलै २०२२ च्या पहिल्या आठवड्यात गेलो तेव्हा उन्हाळा सुरूच होता. क्वचित दोन वेळी पाऊस झाला. अशा तप्त वातावरणात प्रभातकाळीं सरयूच्या तीरावर चालत जातांना हलकेच स्पर्श करणाऱ्या आनंदी वायुलहरी अति सुखद आणि शीतल प्रतीत होत होत्या. हा सरयू किनारीचा संपूर्ण परिसर श्री रामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेला असल्याने अधिकच भक्तिमय झाला होता. सरयू किनारी लक्ष्मण मंदिर (तिथेच स्थित लक्ष्मण घाट आहे. रामाच्या त्यागाने दुःखसागरात बुडालेल्या लक्ष्मणाने आपला पार्थिव देह इथेच सरयू नदीत अर्पण केला) आणि जवळच रामचंद्र घाट आहे. इथे रामाने आपला देह सरयूत विसर्जित केला. त्यापाठोपाठ त्याचे बंधू बांधव आणि प्रजाजन या सर्वांनी देखील जलसमाधी घेतली! मित्रांनो, सरयू नदीत नौकानयन उपलब्ध आहे, त्या दरम्यान हे दोन घाट बघितले! 

सरयू नदीच्या पावन जलात नौकानयन करतांना तीराच्या लगत असलेली मंदिरे अत्यंत रमणीय दिसतात. नौकेत बसल्यावर ‘ धीर समीरे सरयू तीरे ‘ चा अनुभव अमृतसम होता. मन गुंतले होते श्रीराम प्रभूच्या चिंतनात! त्या तरंगिणीची प्रत्येक लहर जणू रामनामाचा गजर करीत नौकेवर आदळत होती. त्या प्रभात समयी सरयूच्या पावन स्पर्शाने धन्य झाले. मंडळी, नदीकिनारी आढळले एक अतिशय सुबक, सुंदर मंदिर, काळारामाचे! हुबेहूब नाशिकच्या काळाराम मंदिरासारखेच, एका अखंड काळ्याभोर शिळेत कोरलेल्या राम, सीता आणि रामबंधूंचे! तिथे नाशिकहून (स्वप्नात श्रीरामप्रभूंनी दिलेल्या आज्ञेनुसार) इथे सरयू तीरी राममंदिर निर्माण करणाऱ्या मराठी पुजाऱ्यांचे वंशज, भिंतींवर मराठी भाषेत लिहिलेली माहिती, इत्यादी बघून मन अभिमानाने भरून आले.

या प्राचीन मंदिरांच्या मांदियाळीत एक आगळेवेगळे मंदिर खूपच भावले. ते म्हणजे मनात संचित करून ठेवलेले अयोध्येतील लक्षवेधी वाल्मिकी मंदिर! तेथे आद्यकवी वाल्मिकी आणि त्यांचे शिष्य कुश लव यांच्या कोरीव, सुरेख देखण्या शुभ्र धवल मूर्ती तर आहेतच, पण विस्तीर्ण मंदिराच्या संगमरवरी भिंतींवर कोरलेले संपूर्ण वाल्मिकी रामायण आणि त्या त्या प्रसंगांना अनुरूप चितारलेली भित्तिचित्रे. बघता क्षणी भान हरपावे अशी कलाकुसर! मंडळी हे मंदिर बघून अतीव समाधान लाभले. अयोध्येतील गुरु-शिष्यांचे हे अलौकिक स्मारक प्रेक्षणीय आणि अविस्मरणीय, पुरातन मंदिर नसूनही!

आणखी किती देवालये, अन किती आठवणी स्मराव्यात परमपवित्र तीर्थक्षेत्र अयोध्येच्या! सप्तपुरीतील एक पुरी अयोध्येतील ते मंतरलेले दिवस, तिथला एक एक क्षण आयुष्याला समृद्ध करून गेला.  

जानकी महालाच्याच परिसरात असलेल्या शामियान्यात रामसंकीर्तन आयोजित केले गेले होते. सकाळी चारुदत्त आफळेजींच्या कीर्तनादरम्यान रामकथेतील मुख्य कथाबीज ऐकतांना आणि त्यांच्या मुखातून भक्तिरसात न्ह्यायलेली गाणी आणि अभंग ऐकतांना किती म्हणून समरस झालोत. त्यांच्या आवाजाला शास्त्रीय संगीताची बैठक असल्याने ही गाणी उत्कृष्ट संगीताची मेजवानीच असायची. कीर्तनात भक्तिरंगासोबतच हास्यरंग भरीत चारुदत्तजी यांनी आपल्या आख्यानात कित्येक सुंदर कथा सांगितल्या आणि त्यांचे निरूपण केले. तसेच त्यांच्या सोबत संपूर्ण भक्त समूहाने समर्पित होऊन साथ देत

गायलेले ‘नादातुनी या नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम’ हे मधुरतम राम संकीर्तन आणि ताल मृदूंगासमवेत गायलेल्या समूह आरत्या, भक्तीच्या पराकाष्ठेची अनुभूती देत असत. 

संध्या समयी श्रीधरजींचे गीत रामायण सादर होत असे! कांही दिवशी श्रीधरजींनी रामचंद्रांची भक्तिगीते देखील सादर केली.  अयोध्येच्या रम्य परिसरात ‘सरयू तीरावरी अयोध्या’ हे अयोध्येचे चित्रवत वर्णन करणारे गाणे आणि ‘राम जन्मला ग सखी’ हे राम जन्माचे अजरामर गाणे अक्षरशः कृतकृत्य करून गेले! (आयोजकांनी कल्पकता दाखवीत या गाण्याच्या जोडीला प्रशिक्षित कथक नृत्यांगनांचे समर्पक नृत्य ही सादर केले) श्रीधरजींसोबत कोरसमध्ये गातांना एक अनवट ऊर्जा अंगात संचारली होती. मनाला भिडणारी सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे दोघांचा सुरस समन्वय, त्यामुळे आम्हा भक्तगणांना रामकथेचे कीर्तनरंग आणि गीतरंग या दोहोंचा उत्कृष्टरित्या आस्वाद घेता आला. एकंदरीत या कार्यक्रमात मला आलेला असा भावानुभव विरळा. त्याकरता आफळे गुरुजी आणि श्रीधरजी या द्वयीला सादर वंदन आणि त्यांचे अमाप आभार!    

हे रघुकुलभूषण श्रीराघवेंद्रा! या शब्दांकुरांच्या अंती आता तुलाच साकडे घालायचे राहिले! हे कृपासिंधू रामराया, परत एकवार अयोध्येत तुझ्या चरण सेवेशी रुजू व्हायचे आहे. पूर्णत्वास गेलेले राममंदिर अन तिथे अधिष्ठित झालेली तुझी साजिरी गोजिरी मूर्ती नजरेत भरून घ्यायची आहे! संपूर्ण मंदिर क्रमाक्रमाने नयनांच्या ज्योतीत आणि हृदयाच्या गर्भगृहात दाखल करून घ्यायचे आहे. तवरीक परत एकदा ज. के. उपाध्ये यांचे अमृताहुनी गोड असे माणिकबाईंच्या भक्तिमय स्वरांतील शब्द फिरफिरुनि स्मरते!

‘रामचंद्र मनमोहन नेत्र भरून पाहिन काय!

सतत रमवि जे मनास, ज्यात सकल सुखनिवास

सुधाधवल विमल हास, अनुभवास येईल काय?

जाऊ तरी कुणास शरण, करील कोण दुःख हरण

मजवरि होऊन करूण, प्रभुचं चरण दावील काय?’

अयोध्यापती श्रीरामाच्या दर्शनाच्या अनिवार इच्छेसमवेत ही शब्दकुसुमांजली त्याच्याच चरणकमली रुजू करते! जय श्रीराम!

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग -५ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -५ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(चेरापुंजीच्या गुहा आणखीन बरंच कांही बाही!)

प्रिय वाचकांनो,

परत परत कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मेघालय आणि इतर स्थानांची सफर वेगळ्याच विश्वात, अगदी आकाशातील मेघात घेऊन जाणारी आहे! मी तिथे आपल्या सोबत परत एकदा पर्यटन करते आहे याचा “आनंद पोटात माज्या माईना” असं होतंय! मी भरून पावले! येथील अगदी खासम-खास वैशिष्ठे म्हणजे जिवंत मूळ पूल, जिथे आपण फिरलोय आणि अजून एक (हाये की), जिथे आपण आज आश्चर्यजनक प्रवास करणार आहोत! मैत्रांनो, आता चेरापुंजीला आलोच आहोत तर, आधी इथल्या गुह्य ठिकाणांचे अन्वेषण करायला निघू या! इथे आहेत कित्येक रहस्यमयी गुंफा! चला आत, बघू या अन शोधू या काय दडलंय या अंधारात!

मावसमई गुहा (Mawsmai Cave)

मेघालयची एक खासियत म्हणजे भूमिगत गुहांचे विस्तीर्ण मायाजाल, काही तर अजून गवसलेल्या नाहीत, तर काहींमध्ये चक्रव्यूहाची रचना, आत जा, बाहेर यायचं काय खरं नाय! काहींच्या वाटा खास, फक्त खासींना ठाव्या! आत्ता म्हणे एक ३५ किलोमीटर लांब गुहा सापडलीय इथे! ऐकावे ते नवल नाहीच मैत्रांनो! मावसमाई गुहा सोहरा (चेरापुंजी) पासून दगडफेकीच्या अंतरावर (स्टोन्स थ्रो) आणि याच नांवाच्या लहान गावात आहे (शिलाँगपासून ५७ किलोमीटर). ही गुहा कधी सुंदर, आश्चर्यचकित करणारी, कधी भयंकर, कधी भयचकित करणारी, असं काही, जे मी एकदाच पाहिलं, रोमांचकारी अन रोमहर्षक! इथे आम्ही गेलो तेव्हा (माझ्या नशिबाने) प्रवास्यांचे जत्थेच होते, फायदा हा की परत जाणे कठीण, त्यातच गुहेची सफर केवळ २० मिनिटांची, आतापर्यंत साथ देणारे ट्रेकर्स शूज बाहेरच ठेवलेत. अनवाणी पायांनी अन रिकाम्या डोक्याने जायचे ठरवले. मोबाइलचा उपयोग शून्य, कारण इथे स्वतःलाच सांभाळणे जिकिरीचे! लहान मोठे पाषाण, कुठे पाणी, शेवाळे, चिखल, अत्यंत वेडीवाकडी वाट, कधी अरुंद कधी निमुळती, कधी खूप वाकून जा, नाही तर कपाळमोक्ष ठरलेला! काही ठिकाणी आतल्या दिव्यांचा उजेड, तर काही ठिकाणं आपण (विजेरीचा) थोडा तरी उजेड पाडावा म्हणून अंधारलेली! मी ट्रेकर नव्हे, पण गुहेचं हे सगळं अंतर कसं पार केलं हे ‘कळेना अजुनी माझे मला!!!’ (मंडळी या लेखाच्या शेवटी गुहेच्या सौंदर्याचा (!) कुणीतरी यू ट्यूब वर टाकलेला विडिओ जरूर बघा! कुणाला काय अन कोण सुंदर वाटेल याचा नेम नाय!)

मात्र तिथे आठवतील त्या देवांचे नाव घेत असतांनाच माझ्या मदतीला धावून आल्या दोन मुली (हैद्राबाद इथल्या). ना ओळख ना पाळख! माझी फॅमिली मागे होती. या मुली अन त्यांच्या आयांनी माझा जणू ताबाच घेतला! एखाद्या लहान मुलीला जसे हात धरून चालायला शिकवावे त्याहीपेक्षा मायेनं त्यांनी मला अक्षरशः चालवलं, उतरवलं अन चढवलं. जणू काही मीच एकटी तिथे होते! अन या अगदी राम लक्ष्मणासारख्या एक पुढती अन एक मागुती, अशा दोघी माझ्या बरोबर होत्या! मित्रांनो, बाहेर आल्यावर तर “माझे डोळे पाण्याने भरले” अशी अवस्था होती, माझ्या फॅमिलीने त्यांचे आभार मानले.  आपले नेहमीचे सेलेब्रेशन खाण्याभोवती फिरते, म्हणून मी त्यांना गुहेतून बाहेर आल्याबरोबर म्हटलं “चला काही खाऊ या!” त्यांनी इतकं भारी उत्तर दिलं, “नानी, आप बस हमें blessings दीजिये!” १४-१५ वर्षांच्या त्या मुली, हे त्यांचे संस्कार बोलत होते! (ग्रुप फोटोत बसलेल्या उजवीकडील दोघी)! त्यांना कुठं माहित होतं की गुहेच्या संपूर्ण गहन, गहिऱ्या अन गर्भार कुशीत मी त्यांनाच देव समजत होते, आशीर्वाद देण्याची पत कुठून आणू? मंडळी, तुम्ही प्रवासात कधी अश्या देवांना भेटलात का? आत्ता हे लिहितांना देखील त्या दोन गोड साजऱ्या अन गोजिऱ्या अनोळखी मुलींना मी गहिवरून खूप खूप blessings देतेय!!! जियो!!! 

आरवाह गुहा (Arwah Cave)

चेरापुंजी बस स्थानकापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे आरवाह गुहा, ही मोठी गुहा Khliehshnong या परिसरात आहे. यात खास बघण्यासारखे काय तर चुनखडीच्या रचना आणि जीवाश्म! अत्यंत घनदाट जंगलाने वेढलेली, साहसी ट्रेकर्स अन पुरातत्व तत्वांच्या प्रेमात असलेल्यांसाठी पर्वणीच जणू! ही गुहा मावसमई गुहेपेक्षा मोठी, पण हिचा थोडाच भाग पर्यटकांना बघायला मिळतो. ३०० मीटर बघायला २०-३० मिनिटे लागतात. मात्र यात गाईड हवाच, गुहेत गडद अंधाराचे साम्राज्य, तर कुठे कुठे अत्यंत अरुंद बोगद्यातून, कधी निसरड्या दगडांच्या वाटेतून, तर कधी पाण्याच्या प्रवाहातून सरपटत पुढे जातांना त्रेधा उडणार! भितीदायक वातावरणात अन विजेरीचा प्रकाश पाडल्यावर अनेक कक्ष दिसतात, त्यांत गुहेच्या भिंतींवर, छतावर आणि पाषाणांवर जीवाश्म (मासे, कुत्र्याची कवटी इत्यादी) आढळतात. यातील चुनखडीच्या रचना व जीवाश्म लाखों वर्षांपूर्वीचे असू शकतात. मंडळी, ही माझ्या घरच्या लोकांनी पुरवलेली माहिती बरं कां! गुहेपर्यंत ३ किलोमीटर पायऱ्यांचा रस्ता, आजूबाजूला घनदाट हिरवे वनवैभव, मी गुहेच्या द्वाराच्या अवघ्या ५० मीटर अंतरावरच थांबले. मला गुहेचे दर्शन अप्राप्यच होते. या बाबत तिथला गाईड आणि आमचा आसामी (असा तसा नसलेला हा असामी!) ड्रायव्हर अजय, यांचे मत फार महत्वाचे! घरची मंडळी गुहेत जाऊन दर्शन घेऊन आली, तवरीक मी एका व्ह्यू पॉईंट वरून नयनाभिराम स्फटिकासम शुभ्र जलप्रपात, मलमली तलम ओढणीसम धुके, गुलाबदाणीतून शिंपडल्या जाणाऱ्या गुलाबजलाच्या नाजूक शिड्काव्यासारखी पावसाची हलकी रिमझिम अन मंद गुलबक्षी मावळत अनुभवत होते. मित्रांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनी या अगम्य गुहेचे रहस्य जाणण्याचा जरूर प्रयत्न करावा! 

रामकृष्ण मिशन, सोहरा

येथील टेकडीच्या माथ्यावर रामकृष्ण मिशनचे कार्यालय, मंदिर, संस्थेची शाळा आणि वसतिगृह फार देखणे आहेत. तसेच इथे उत्तरपूर्व भागातील विविध जमातींची माहिती, त्यांचे विशिष्ट पेहराव, त्यांच्या कलाकृती आणि बांबूंच्या वस्तू असलेले एक संग्रहालय अतिशय सुंदर आहे. त्याचप्रमाणे मेघालयातील गारो, जैंतिया आणि खासी जमातींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कलाकृती, मॉडेल्स आणि त्यांची सखोल माहिती असलेली खोली देखील फार प्रेक्षणीय आहे. रामकृष्ण मिशनच्या कार्यालयात इथल्या खास वस्तूंचे तसेच रामकृष्ण परमहंस, शारदा माता व स्वामी विवेकानंद यांचे फोटो अणि अन्य वस्तू, तथा परंपरागत वस्तूंची विक्री देखील होते. आम्ही येथे बऱ्याच सुंदर वस्तू खरेदी केल्या.

सायंकाळी रामकृष्ण परमहंस मंदिरात झालेली आरती सर्वांना एका वेगळ्याच भक्तिपूर्ण वातावरणात घेऊन गेली. आरतीची परमपावन वेळ जणू कांही आमच्यासाठीच दैवयोगाने जुळून आली व अत्यंत आनंदाची गोष्ट ही की, आम्हाला या पवित्र वास्तूचे दर्शन झाले! एकंदरीत हे अतिशय रम्य, भावस्पर्शी आणि भक्तिरसाने परिपूर्ण स्थान पर्यटकांनी नक्की बघावे असे मला वाटते. (संग्रहालयाच्या वेळांची माहिती काढणे गरजेचे आहे.)

मेघालय दर्शनच्या पुढच्या भागात, मी तुम्हाला मावफ्लांग, पवित्र ग्रोव्ह्स/ सेक्रेड वूड्स/ पवित्र जंगलात आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या अद्भुत स्थळांकडे घेऊन जाईन. मंडळी, आहात ना तयार? 

सध्यातरी खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप- लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

 

मेघालय, मेघों की मातृभूमि! “सुवर्ण जयंती उत्सव गीत”

(Meghalaya Homeland of the Clouds, “Golden Jubilee Celebration Song”)

मावसमई गुफा (Mawsmai Caves) 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मनोवेधक मेघालय…भाग -४ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग -४ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(डॉकी, चेरापुंजी आणि बरंच कांही!)

प्रिय वाचकांनो,

कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

आज आपण डॉकी आणि चेरापुंजी येथे अद्भुत प्रवास करणार आहोत. झाली नव्ह तयारी! सोप्पंय! बॅग भरो और निकल पडो! 

डॉकी /उम्न्गोट (Dawki/Umngot) नदीवरील नयनरम्य नौकानयन

आम्ही सैलीच्या सुंदर “साफी होम कॉटेज” (Safi home cottage) चा निरोप घेतला अन पुढील प्रवासाला लागलो. मॉलीन्नोन्गपासून साधारण ३० किलोमीटर दूर डौकी (Dawki) कडे आम्ही निघालो. मुंबई ते गुवाहाटी हा प्रवास विमानातून केल्यानंतरचा मेघालयचा सर्व प्रवास आम्ही कारनेच केला, इथे रेल्वे नाही बरं का मंडळी! हे गाव मेघालयच्या पश्चिम जयन्तिया हिल्स जिल्ह्यात आहे. डॉकी(उम्न्गोट) नदीवर एक कर्षण सेतु (traction bridge) बनलेला आहे. १९३२ मध्ये इंग्रजांनी हा पूल बांधला. या नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की कधी कधी आपली नाव हवेत तरंगल्याचाच भास होऊ शकतो. इथले नयनाभिराम दृश्य अन नौकाविहार हेच प्रमुख आकर्षण! हे गाव भारत अन बांगला देशच्या सीमेवर आहे! नदी देखील अशीच विभागली गेली आहे. एकाच नदीवर विहार करणाऱ्या बांगला देशाच्या मोटर बोटी अन भारत देशाच्या नाविकांच्या वल्हवत्या साध्या बोटी! हा दोन्ही देशांना जोडणारा एक सडक मार्गी रस्ता! जातांना दोन्ही देशांच्या चेक पोस्ट दिसतात. डॉकी ही भारताची चेकपोस्ट तर तमाबील ही बांगला देशाची चेकपोस्ट!

मित्रांनो, या नौकाविहाराचे स्वर्गीय सुख काही आगळेच, हृदयात अन नेत्रात सकल संपूर्णरित्या साठवावे असेच,  नाविकाने हळू हळू चालवत नेलेली विलंबित तालासारखी डुलत डुलत सरकणारी नौका, आजूबाजूला नौकेला भिडून नितळाहून नितळ असे संगीतमय झालेले जलतरंग, दोन्ही काठांवर नदीला जणू घट्ट कवेत घेणारे वृक्षवल्लींचे हिरवे बाहुपाश! निर्मल नीर असल्याने त्यांची सावली हिरवीगार तर तिला लगटून निळ्याशार  किंवा मेघाच्छादित गहिऱ्या रंगाची सावली, मध्येच नदीच्या तळाचे वेगवेगळे पाषाण देखील आपली छटा उमटवत होते! थोडक्यात काय तर सिनेमास्कोपिक पॅनोरमा! कुठेही कॅमेरा लावा अन निसर्गाच्या रंगांची क्रीडा टिपून घ्या! मध्येच या सिनेमास्कोप सिनेमाचा इंटर्वल समजा हवं तर, छोटासा रेतीचा किनारा, तिथे देखील मॅगी, चिप्स अन तत्सम पदार्थांची सर्विस द्यायला एक मेघालय सुंदरी हजर होतीच! कोल्ड ड्रिंक कोल्ड ठेवण्याकरता नदीच्या किनारी छोटयाश्या फ्रिज सारखं जुगाड करणारा तिचा नवरा खासच! नदीकिनारी लहान मोठे पर्यटक सुंदर धोंडे (नाही तर काय!) किंवा दगड गोळा करीत सुटले. परतीचा प्रवास नकोसा होत होता. पण “नाविका रे” ला नाही म्हणता म्हणता त्याने नाव किनारी लावलीच.

टाइम प्लीज!!!      

प्रिय वाचकांनो समजा तुम्ही एक घड्याळ मनगटाला लावलय अन एक बघायला सोप्पं घड्याळ तुमच्या स्मार्ट फोनवर असणारच. तुम्ही जे सोपे असेल ते बघणार नाही का! मात्र तुम्ही बांगला देशच्या सीमेच्या आसपास फिरत असाल तर गम्मतच येते, आम्हाला स्थानिकांनी सांगितलं म्हणून, नाही तर वाद तर होणारच. बांगला देशचे (फक्त) घड्याळ आपल्या देशापेक्षा ३० मिनिटे पुढे आहे, अन आपल्या स्मार्ट फोनला (नको तेव्हा) जास्त स्मार्टनेस दाखवायची सवय आहेच! त्यानं त्या देशाचं नेटवर्क पकडलं की स्मार्टफोनचं घड्याळ पुढं, अन मनगटी घड्याळ आपलं इथलं टाइम सांगणार! तेव्हा अशा ठिकाणी (बांगला देशच्या सीमेच्या आसपास) भारताचे सुजाण अन देशभक्त नागरिक या नात्याने आपण मनगटी घड्याळाची मर्जी सांभाळा, अन स्मार्ट फोनला आवरा! आम्ही हा अनुभव बऱ्याच ठिकाणी घेतला. आणखीन गम्मतच (हायेच की) येते, बांगला देशच्या सीमेच्या अन आपल्या अंतराप्रमाणे स्मार्ट घड्याळ किती पुढे जायचे ते ठरवत असते!        

मेघजलसुंदरी चेरापुंजी! (इथल्या जनजातींमध्ये सोहरा हेच नांव प्रसिद्ध!) 

मेघालयाला भेट देतांना नयनरम्य चेरापुंजी हे पर्यटकांचे आकर्षण असणारच अशी याची ख्याती! शिलाँगपासून ५६ किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणजे अमोप धबधबे, कधी धुक्यात हरवलेले तर कधी ते विरळ झाल्यावर आपल्याला दर्शन देणारे! इथे वर्षभर जलधरांच्या मर्जीप्रमाणे अन त्यांच्या लयीप्रमाणे बरसणाऱ्या जलधारांचे नृत्य सुरूच असते! वृक्षवल्लींच्या हिरवाईच्या रंगात फुलांची बुट्टी, अशा श्रीमंत शाली पांघरलेले पर्वत असे निसर्गरम्य चेरापुंजी (सोहरा)! हे ठिकाण समुद्र सपाटीपासून १४८४ मीटर उंचावर आहे. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेरापुंजीने सर्वाधिक पाऊस झेलण्याचे विक्रम वेळोवेळी नोंदवले आहेत, गुगल गुरुजी वेळोवेळी याची माहिती देतच असतात!

आता या गावाच्या नावाबद्दल! १८३० सालच्या दशकात इंग्रजांनी सोहराला त्यांचे प्रादेशिक मुख्यालय बनवले होते, त्यांना यात स्कॉटलंडसारखे चित्र दिसत होते. वर्षा अन धुके यांनी हे छोटे गाव व्यापले होते, म्हणून त्यांनी या गावाला “पूर्वेकडील स्कॉटलंड” अशी उपाधी दिली. मात्र त्यांना याचे नाव उच्चारतांना भारीच त्रास व्हायचा! मग काय सोहराचे चेहरा/चेरा झाले, कोण्या बंगाली नोकरशहांनी त्यात पुंजो (म्हणजे पुंजका) अशी पुस्ती जोडली अन गावाचे नामकरण “चेरापुंजी” असे झाले. चेरापुंजीचा दुसरा अर्थ आहे संत्र्यांचे गाव. खासी लोकांना मात्र अर्थातच हे बदल मंजूर नव्हते, या नावाकरता बरीच आंदोलने झालीत. स्थानिक मंडळी या गावाला सोहराच म्हणतात. आश्चर्य म्हणजे इथे इतका धो धो पाऊस असूनही स्थानिकांना मात्र पेयजलाची ददात जाणवते. मित्रांनो, इथे सुद्धा मातृसत्ताक पद्धत आहे, स्त्रियांना स्वातंत्र्य आहे व त्यांनी विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य हेच खासी स्त्रियांचे सक्षमीकरण होण्याचे मूळ आहे!

आम्ही चेरापुंजी येथे क्लीफ साइड होम स्टे (cliffside home stay) येथे दोन दिवस वास्तव्य केले. या घराच्या मालकीणबाई अंजना! त्यांचे यजमान गेल्यावर त्यांनी स्वबळावर मुलांना मोठे केले. अत्यंत कर्तृत्ववान, तडफदार व आत्मविश्वासाने भरपूर अश्या या अंजनाचे मला फार कौतुक वाटले. त्यांचे घर काँक्रीटचे, घराच्या ग्यालरीतून अन खिडकीतून चेरापुंजीच्या मेघाच्छादित अन धुक्याने कवटाळलेल्या परिसराचे अद्भुत दर्शन बघून डोळे तृप्त झालेत! याशिवाय त्यांनी एका रात्री स्वतः कष्टाने रांधून आणलेले गरम जेवण म्हणजे आमच्यासाठी “खासमखास” पाहुणचारच म्हणा ना! प्रिय अंजना, किती धन्यवाद देऊ तुला! फक्त दोन दिवसांकरता आलेल्या आमच्यासारख्या पर्यटकांसाठी तू दाखवलेला जिव्हाळा न विसरण्याजोगाच!               

मित्रांनो,चेरापुंजीच्या पावसाचा आनंद न्याराच! नेम नसणं हाच त्याचा स्थायी भाव. आम्ही मारे जरासे पावसाचे थेंब झेलून रेनकोट घातला की हा अदृश्य, अन ऊन आहे म्हणून छत्री किंवा रेनकोट न घेता बाहेर पडलो की हा बिनदिक्कत बरसणार| पाव्हण्यांची कशी खासी जिरली असा याचा आविर्भाव! मंडळी, मला वाटते, आपल्या पुणे येथील वेधशाळेतून याने स्पेशल कोर्स केला असावा! आम्ही इथे दोनच दिवस होतो, त्यात आम्ही सेव्हन सिस्टर्स फॉल्स Nohsngithiang Falls/Mawsmai Falls बघितले. सप्तसुरांसम दुग्धधवल धारा पर्वतराजींमधून कोसळत असतांना बघणे म्हणजे दिव्यानुभव! १०३३ फुटांवरून पूर्व खासी पर्वतरांगांतून धो धो वाहणारे हे जलप्रपात भारतातील सर्वाधिक उंचीवरून पडणाऱ्या धबधब्यांपैकी एक! मौसमयी गावापासून १ किलोमीटर दूर असून यांची खळाळणारी मस्ती बघावी पावसाळ्यातच, इतर वेळी हे जरा कोमेजलेले असतात, बरं का! आमचे नशीब थोर म्हणून ही निसर्गशोभा बघायला मिळाली. नाहीतर ऐन यौवनातली सौंदर्यवती “घूंघट की आड़ में” जसा मुखचंद्र लपवते तसे हे जलौघ (निर्झर) घनदाट धुक्याच्या आत लपतात, अन पर्यटक बिचारे निराश होतात. हा धुक्याच्या ओढणीचा लपंडाव आम्ही देखील काही काळ अनुभवला! (यू ट्यूब वरील विडिओ शेअर केलाय)

कॅनरेम धबधबा (The Kynrem Falls) पूर्व खासी पर्वत या जिल्ह्यात, चेरापुंजीहून १२ किलोमीटर अंतरावर आहे. थान्गखरांग पार्कच्या आत असलेला हा धबधबा उंचीत भारतातल्या धबधब्यातल्या ७ व्या क्रमांकावर आहे. हा त्रिस्तरीय जलप्रपात आहे, त्याचं पाणी 305 मीटर (१००१ फूट) उंचीवरून कोसळतं!  

प्रिय वाचकहो पुढील प्रवासात आपण चेरापुंजी आणि मेघालयातील इतर ठिकाणी अद्भुत प्रवास करणार आहोत. चालतंय ना मंडळी!!! 

तर आतापुरते परत एकदा खुबलेई! (Khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेटवर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares