मराठी साहित्य – विविधा ☆ बलिप्रतिपदा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

?  विविधा ?

☆ बलिप्रतिपदा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

बलिप्रतिपदा! दीपावलीच्या उत्सवातील हा तिसरा  दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. बलिराजाच्या स्मरणार्थ साजरा होणारा दिवस. कोण हा बलिराजा? पौराणिक कथेनुसार हा अत्यंत सत्वशील,दानशूर असा हा राजा. पण गर्वाने धुंद झालेला.तो दानशूर असल्याने दिलेला शब्द पाळत असे.त्याच्या या गुणाचा फायदा घेऊन भगवान विष्णूंनी त्याचे गर्वहरण केले.त्यांनी बटू वामनाचा अवतार   धारण केला व भिक्षा मागण्यासाठी बलिराजाकडे गेले.त्यांनी त्याच्याकडे फक्त तीन पाऊले जमीन मागितली.बलिराजाने ती देण्याचे वचन देताच विष्णूने भव्य रूप धारण केले.एक पाऊल स्वर्गात,दुसरे पृथ्वीवर ठेवले व तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारले.तेव्हा आपला शब्द पाळण्यासाठी बलिराजाने आपले मस्तक पुढे केले.या संधीचा फायदा घेऊन विष्णूंनी आपले पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाडले व आपले अवतार कार्य पूर्ण केले.मात्र त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणांची कदर करून त्याला पाताळाचे राज्य देऊ केले व आपण स्वतः या राज्याचे द्वारपाल बनले.त्याच्या सद्गुणांची पुढील पिढ्यांना जाणीव असावी म्हणून हा दिवस त्याच्या नावाने साजरा केला जाईल असे वरदानही दिले.तो हा दिवस.त्याच्या प्रजा हित कारक वृत्तीमुळे आजही ‘इडा पीडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते.कितीही सद्गुण अंगी असले तरी एखादा दुर्गुण सुद्धा त्या गुणांवर मात करतो व विनाशाला कारणीभूत होतो याचे   हे उदाहरण म्हणावे लागेल.

हा दिवस वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या नावाने व पद्धतीने साजरा केला जातो. खरे तर हा शेतक-याचा सण. शेतकरी झेंडूच्या माळांनी जनावरांचा गोठा सुशोभित करतात. काही ठिकाणी शेणाचा गुराखी, गवळणी, कृष्ण, पाच पांडव केले जातात.आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांचा बळीराजा केला जातो.तांदूळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात. धनगर समाज आपल्या मेंढरांचे कौतुक करतो तर आदिवासीही आपल्या पशूधनाकडे विशेष लक्ष देतात. संपन्नतेच्या या दिवसांत ज्यांच्यामुळे संपन्नता आली त्या पशूधनालाही आनंदात सहभागी करून घेतले जाते. हीच आपली कृषी संस्कृती आहे.आपले सगळे सण उत्सव हे निसर्गाशी निगडीत असे आहेत आणि ते तसेच ठेवण्याचे आपले प्रयत्न असले पाहिजेत.

उत्तर भारतात हा दिवस नवीन विक्रम संवत म्हणून साजरा होतो. तसेच काही ठिकाणी गोवर्धन पूजाही केली जाते. पक्वान्न व मिठाई  मोठ्या प्रमाणात अर्पण केले जातात. त्यामुळे याला अन्नकूट असेही म्हणतात. काही ठिकाणी बलिराजा व त्याची पत्नी विंधावली यांचे चित्र काढून पूजा केली जाते.

याच  दिवशी पार्वतीने महादेवाना द्यूतात हरवले.म्हणून ही द्यूतप्रतिपदा.

कृषी संस्कृतीतील नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात होण्याचा हा दिवस.व्यापारी मंडळीही आदले दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यावर प्रतिपदेला हिशेबाच्या नव्या वह्यांचे पूजन करतात व नवे आर्थिक व्यवहार सुरू करतात.नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने गुढी पाडव्याप्रमाणेच या दिवसाचे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात.  आपल्या संस्कृतीत शुभ मानल्या गेलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त. या मुहूर्तावर सोने तसेच नव्या वस्तुंची खरेदी, गुंतवणूक केली जाते. या शुभदिनी पत्नी आपल्या पतिला ओवाळते व ओवाळणीच्या रूपात पती पत्नीला भेटवस्तू घेऊन देतो. नव विवाहीत मुलीच्या माहेरी विवाहानंतरच्या पहिल्या दिवाळीला जावयाला व त्याचे आप्तेष्टांना बोलेवले जाते. त्यांचा विशेष आदर सत्कार केला जातो. भेटवस्तू दिल्या जातात. पहिली दिवाळी दिवाळसण म्हणून दणक्यात साजरी होते. बदलत्या काळानुसार भेटवस्तूचे स्वरूप बदलत गेले तरी त्यामागील भावना मात्र टिकून आहेत हेच आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

हा दिवाळी पाडवा आणि नूतन वर्ष सर्वांनाच आनंदाचे ,सुखसमृद्धीचे जावो. निसर्गावर मात करण्यापेक्षा निसर्ग मित्र बनून आपल्या मूळ संस्कृतीचे जतन करण्याचा संकल्प करू! शुभ दीपावली !

? ? ?

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोव्यातील नरकचतुर्दशी…. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ गोव्यातील नरकचतुर्दशी.. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

आपण जशी आतुरतेने दिवाळीची वाट पहात असतो तशी गोवेकर मंडळी दिवाळीची वाट पहात असतात.

गोवा म्हटले की आपल्याला तिथला ख्रिसमसची आठवण होते तसे इथल्या दिवाळीचे वेगळेपण आहे गोव्यात गणेशोत्सव प्रमाणे दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते उत्तर प्रदेशात दसऱ्या दिवशी रावणाचे दहनकेलं जातं तसं नरक चतुर्दशी दिवशी नरकासुराच्या प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा गोव्यात आहे.एक वर्ष गोव्यात असताना हा सोहळा पहाण्याचा योग आला.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या प्रतिमा उभारल्या जातात. ह्या प्रतिमा अगदी ऐंशी फुटापर्यंत आणि अक्राळविक्राळ बनविल्या जातात अशी माहिती मिळाली. पुण्यातील गणेश उत्सवाप्रमाणे ढोल,ताशा झांजे गजरात मिरवणूक काढली जाते., त्यांची स्पर्धा ठेवली जाते. या प्रतिमा तयार करण्यासाठी घराघरातून वर्तमानपत्र रद्दी व कागद गोळा केले जातात., तसेच थर्माकोलचा वापरही केला जातो.ही प्रथा शेकडो वर्षापासून .सुरू आहे. गोवा मुक्ती संग्रामानंतर नरकासुराच्या प्रतिमेचे दहन केले गेले आणि पुढे ही पद्धत सुरू झाली अशी माहिती मिळाली.

  पूर्वी दिवाळीच्या सुमारास भाताचे पीक निघाले की शेतातील तण, घराच्या आजूबाजूचे गवत,सुका पालापाचोळा यापासून नरकासुराच्या प्रतिमा तयार करत यातूनच आजचे नरकासुराचे महाकाय रूप तयार झाले.

गोव्यामध्ये पणजी, मडगाव,फोंडा, म्हापसा वास्को याठिकाणी मोठमोठ्या प्रतिमा उभ्या केल्या जातात. हल्ली कारखान्यात मुखवटे बनवले जातात ,  काही कुटुंबे नरकासुराचे मुखवटे तयार करण्याचे काम करतात. नरकचतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून दिवाळीच्या पूर्वसंध्येला उभारलेल्या नरकासुराच्या प्रतिमेचे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे दहन करतात .हा सोहळा पाहण्यासाठी खूप लोक येतात. त्यानंतर अभ्यंगस्नान करून दिवाळीचा फराळ केला जातो.  दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव तसाच खाद्यपदार्थांचा उत्सव आहे. फराळ म्हटले की लाडू करंजी ,चकली, शंकरपाळी आलीच.पणगोव्यात पहिल्या दिवशी मात्र फोवच म्हणजे पोह्यांचे पांच प्रकार करतात.गोडाचे पोहे त्यात गुळ आणि ओला नारळाचा चव घालतात,तिखसे फोव हिरव्या मिरच्या व ओले खोबरे घालून करतात,ताकाचे फोव ताकातभिजवून त्यात मिरची कोथिंबीर घालतात, आगीचे फोव म्हणजे सोलकढीत भिजवलेले आणि फोटो फोव फोडणी करून केलेले पोहे . हा फराळ करून मग एकामेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.  हल्ली बऱ्याच घरात दिवाळीचा फराळ आपल्या सारखा बनवला जातो.

ह्या काळात सुट्टी असल्यामुळे पर्यटक हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी करतात.आणि या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचा आनंद लुटतात.

 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! बंपर दिवाळी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? बंपर दिवाळी ! ?

“नमस्कार पंत, हा तुमचा पेपर. निघतो जरा घाईत आहे.”

“जाशील रे मोऱ्या, जरा घोटभर चहा घे आणि मग निघ, काय ?”

“बरं, आता तुम्ही इतका आग्रह करताच आहात तर…”

“अरे माझं जरा कामं होतं, म्हणून म्हटलं चहा पिता पिता बोलू !”

“पंत, आज गंगा उलटी कशी काय वाहायला लागली ?”

“म्हणजे ?”

“पंत मी नेहमी तुमच्यकडे काहीतरी कामं घेऊन येतो, सल्ला मागायला येतो आणि आज….”

“अरे गाढवा, गंगेला सुद्धा कधीतरी वाटत असेल नां, प्रवाहाच्या उलट वहावं म्हणून ! ते सगळं असू दे, मला सांग तुझी ती चाळीतली दुसरी खोली रिकामीच आहे नां अजून, का कोणी भाडेकरू ठेवला आहेस ?”

“नाही पंत, अहो ती रिकामीच आहे. गावाकडचे पै पाहुणे आले की बरी पडते वापरायला !”

“हे बरीक चांगल झालं!”

“चांगल झालं म्हणजे ?”

“अरे चांगल म्हणजे, मला ती खोली जरा वापरायला देशील का ?”

“पंत, हे काय विचारण झालं ? काही सामान वगैरे ठेवायच होत का ?”

“हो रे मोऱ्या, दोन नवीन मोठे led tv ठेवायचे होते !”

“मग पंत, त्यासाठी आख्खी खोली कशाला ? माझ्या राहत्या घरी मी ठेवतो की !”

“अरे नुसते दोन tv नाहीत, आणखी बरंच सामान आहे रे !”

“बरंच सामान म्हणजे, मी नाही समजलो! आणि मुळात तुमच्याकडे एक tv ऑलरेडी असतांना हे दोन नवीन LED कशाला घेतलेत ?”

“आता तुला सार काही सविस्तर सांगतो. अरे आमच्या पमी आणि सुमीच लग्न आहे दोन महिन्यांनी, हे तुझ्या कानावर आलं असेलच !”

“हो, बायको म्हणाली मला तसं चार पाच दिवसापूर्वी. त्या दोघींचे लग्न एकाच मांडवात लागणार आहे म्हणून.”

“हो रे, माझे दोन्ही जावई मला खरोखरचं भले भेटले बघ, म्हणून तर एकाच मांडवात एकाच दिवशी दोघींची लग्न लागणार आहेत. एका लग्नाच्या खर्चात दोन लग्न !”

“हे चांगलंच आहे पंत आणि म्हणून मला वाटलं तुमचे पाहुणे वगैरे येणार त्यासाठी तुम्हाला खोली वापरायला हवी आहे.”

“नाही रे. अरे सध्या दिवाळी ऑफर चालू होती LED tv ची, एकावर एक फ्री ! म्हणून म्हटलं घेऊन टाकू एक सुमीला आणि एक पमीला !”

“अस्स होय, पण मग tv शिवाय आणखी काय काय सामान ठेवायचं आहे पंत त्या खोलीत ?”

“अरे सध्या दिवाळी मुळे offer चा नुसता सुकाळ आहे बघ ! सोफा कम बेडचा सेट घेतला तर त्यावर मोठ डायनींग टेबलं आणि आठ खुर्च्या मोफत ! बोल आहेस कुठे ? म्हणून म्हटलं…..”

“घेऊन टाकू सोफा कम बेडचा सेट, जो होईल पमीला आणि डायनींग सेट सुमीला, काय बरोबर नां ?”

“अगदी बरोबर बोललास मोऱ्या !”

“पण पंत, हे सगळं सामान जरी माझ्या खोलीत ठेवलं तरी माझी अर्धी खोली रिकामी….”

“रहाणार नाही, याची गॅरंटी देतो मी !”

“म्हणजे ?”

“अरे अजून मला त्या खोलीत एक मोठं गोदरेजच कपाट आणि त्यावर फुकट मिळणारी मोठी लाकडी शो केस ठेवायची आहे नां !”

“अरे बापरे, त्या वस्तूंची पण काही स्कीम चालू आहे का ?”

“हो ना रे मोऱ्या ! अरे गोदरेज कपाटावर एक लाकडी मोठी शोकेस फुकट आहे कळल्यावर म्हटलं घेऊन टाकू लग्नात द्यायला, एक….”

“सुमीला आणि एक पमीला, काय बरोबर नां ?”

“बोरोब्बर ओळखलंस मोऱ्या !”

“पंत तरी पण माझी खोली….”

“अजून सामान आहे म्हटलं !”

“काय ?”

“अरे अजून त्या खोलीत दोन मोठे टिबल डोर फ्रीज, दोन मोठे मायक्रो वेव्ह, दोन डिनर सेट, दोन व्ह्याकूम क्लीनर आणि दोन डिश वॉशर पण ठेवायचे आहेत, एकावर एक फ्री मिळालेले !”

“बापरे, म्हणजे त्या दोघींच्या नवीन संसाराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्ही देताय म्हणा की.”

“अरे मला दोनच मुली आणि दोघींच्या घरच्यांनी काहीच मागितल नसलं, तरी आपण समजून नको का द्यायला  ?”

“ते ही खरचं म्हणा ! पण पंत त्या दोघी लग्न लागल्यावर राहणार कुठे ?”

“अरे तुला सांगतो त्यांच्या रहायच्या जागेची सोय पण मीच करून ठेवली आहे !”

“काय सांगताय काय आणि ती कशी काय बुवा ?”

“अरे त्याच काय झालं विरारच्या एका बिल्डरची ऑफर होती, एका फ्लॅटवर एक फ्लॅट फ्री म्हणून, म्हटलं घेऊन टाकू एक सुमीला होईल आणि एक पमीला होईल !”

“खरंच कमाल झाली तुमची पंत ! पण तुम्हाला एक खाजगी प्रश्न विचारला तर राग नाही नां येणार ?”

“अरे मोऱ्या, राग कसला बोल तू बिनधास्त !”

“तसं नाही पंत, आता तुम्ही एवढा सगळा खर्च करताय तर त्यासाठी भरपूर पैसे पण लागले असतीलच नां ?”

“अर्थातच मोऱ्या ! अरे एकावर एक वस्तू किंवा जागा फुकट असली तरी पहिल्या वस्तूला पैसे हे मोजावेच लागले मला !”

“मी तेच म्हणतोय, तुम्ही तर गेल्या वर्षी म्युनिसिपालिटी मधून रिटायर झालात आणि इतका खर्च एकदम कसा काय झेपला तुम्हाला पंत ?”

“मला वाटलंच, तू हा प्रश्न नक्की विचारणार म्हणून ! अरे माझ्या या सगळ्या खर्चाची तरतूद आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारनेच केली आहे बघ !”

“ती कशी काय पंत ? मी नाही समजलो !”

“मोऱ्या, चाळीत कोणाला बोलू नकोस, तुला म्हणून सांगतोय ! अरे मला आपल्या राज्य सरकारच्या लॉटरीच दिवाळी बंपर सोडतीच दोन कोटी रुपयांचे पाहिलं बक्षीस लागलंय, आहेस कुठे ?”

“धन्य आहे तुमची पंत !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिन दिन दिवाळी – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ दिन दिन दिवाळी – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

दारावरती तोरण, अंगणी 

               ताजी सडा – रांगोळी 

                        अवतीभवती लखलखती 

                                     सांगती पणत्यांच्या ओळी 

                                                  आली, आली दिवाळी आली ——

——– दिवाळी आली आणि घरोघरी जराशी विसावली की मग ती दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते “ नरकचतुर्दशी “ या नावाने. या दिवशी नरकासुर या राक्षसाचा, कृष्ण, सत्यभामा, आणि काली यांनी वध केला, आणि त्याचा आनंद यादिवशी साजरा केला जाऊ लागला, अशी पुराणकथा तर सर्वश्रुतच आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी, म्हणजे चंद्रप्रकाशात , वाटलेले तीळ अंगाला चोळून मग अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे, आणि असे केल्याने, दारिद्र्य, दुर्दैव आणि अनपेक्षित अप्रिय घटना, यापासून संरक्षण होण्यास मदत होते, असेही मानले जाते. नंतर नरकासुराचे प्रतीक म्हणून 

‘करट‘ नावाचे छोटे फळ पायाने चिरडणे, अशासारख्या प्रथाही आहेत. विचारांती असे जाणवते की या प्रथा-पद्धतींमागचा खरा आणि उदात्त हेतू हाच असावा की, ‘ आळस , वाईट विचार आणि त्यामुळे घडणारी वाईट कृत्ये यामुळे आयुष्यात नरकसदृश परिस्थिती निर्माण होते याची जाणीव सर्वच माणसांना व्हावी, आणि सर्वांच्याच आयुष्याला  सज्ञानाचा, सत्प्रवृत्तींचा , आणि सत्कर्मांचा प्रकाश सदैव व्यापून रहावा.’  

या दिवसाला — काळी चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी, भूत चतुर्दशी, काली चौरस, आणि नरक-निवारण चतुर्दशी– अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. 

हा दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो— 

कालीमातेने नरकासुराचा वध केला होता असे मानून काही भागात यादिवशी महाकाली म्हणजे शक्तीचे पूजन केले जाते. 

काही तमीळ कुटुंबांमध्ये या दिवसाला “ नोम्बू “ असे म्हणतात, आणि याच दिवशी लक्ष्मीचीही पूजा केली जाते.

कर्नाटकात तसेच गोवा आणि तामिळनाडूमध्ये दिवाळी वसुबारसेला नाही, तर नरकचतुर्दशीला सुरु होते, असे मानतात. 

राजस्थान-गुजरातमध्ये याला “ काली चौरस “ असे म्हणतात. दुष्ट आत्मे आणि दुष्ट माणसांची काळी- म्हणजे वाईट नजर कोणावर पडू नये म्हणून कुलदेवतेचे पूजन केले जाते. याच सुमारास शेतातले नवे धान्य घरात आलेले असते, त्यासाठी यादिवशी देवाचे आभार मानले जातात. 

गोव्यात कागद-गवत आणि फटाके यापासून नरकासुराचा प्रतीकात्मक पुतळा बनवून, त्याचे दहन केले जाते. तिथेही ‘ करट ‘ हे कडू फळ पायाखाली चिरडून जणू नरकासुराला चिरडून मारतात.  

पश्चिम बंगालमध्ये कालीपूजेचा आदला दिवस “ भूत-चतुर्दशी “ म्हणून पाळला जातो. तिथे असा विश्वास बाळगला जातो की, या दिवशी आधीच्या चौदा पिढयांमधल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या कुटुंबातल्या हयात असलेल्या नातेवाईकांना भेटायला येतात. त्यावेळी त्यांना घराचा रस्ता कळण्यासाठी आणि घराभोवती घुटमळणाऱ्या दुष्ट आत्म्यांना आणि दुष्ट शक्तींना हुसकावून लावण्यासाठी घराभोवती चौदा दिवे लावले जातात. घरातले अंधारे कोपरे-कोनाडे प्रकाशाने उजळून टाकले जातात. 

दक्षिण भारतातील काही भागात या दिवसाला “ दीपावली भोगी “ असे म्हटले जाते. म्हणजे दिवाळीचा आदला दिवस.

“विविधतेत एकता “ हे आपल्या देशाचे अनेक बाबतीत दिसणारे वैशिष्ट्य या दिवशीही प्रकर्षाने दिसून येते, कारण हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या चालीरीतींनुसार साजरा केला जात असला, तरी प्रत्येक ठिकाणी त्यामागील विचारात मात्र “संपूर्ण एकता “ आहे, असे निःशंकपणे म्हणायला हवे — आणि तो विचार म्हणजे– माणसाच्या मनातल्या विनाशकारक दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट विचार-आचार, घातक सवयी, आणि एकूणच आयुष्य दुःखदायक आणि नरकसदृश्य  करणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा संपूर्ण विनाश व्हावा, आणि संपूर्ण मानवजातीलाच आनंदी- शांत- समाधानी, असे साफल्याने उजळलेले संपन्न आयुष्य जगता यावे. हाच विचार नरकासुरासारख्या इतर कितीतरी उदाहरणांचा प्रतीकात्मक उत्तम उपयोग करून, विविध सणांच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ठसवण्याचा विचार ज्या ज्या  कुणी इतका जाणीवपूर्वक आवर्जून केला असेल, त्या सर्व महान माणसांना यानिमित्ताने कृतज्ञतापूर्ण  मनःपूर्वक नमस्कार. 

यानंतरचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. दिवाळीतला हा महत्वाचा दिवस. या दिवशी श्रीविष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या बंदिवासातून मुक्त केले, ही पौराणिक कथा बहुतेकांना माहिती आहे. भारतीय संस्कृतीतील ही वैशिष्ट्यपूर्ण पूजा मानली जाते. कारण अमावस्या, एरवी इतर अकरा महिन्यांमध्ये अशुभ मानली जात असली, तरी अश्विन महिन्यातली ही अमावस्या मात्र अतिशय शुभ मानली जाते. अशी आख्यायिका आहे की, या अमावास्येच्या रात्री स्वतःला राहण्यासाठी योग्य असे स्थान शोधण्यासाठी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. आणि ज्या घरी चारित्र्यसंपन्न, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, आणि क्षमाशील पुरुष, आणि गुणवती, पतिव्रता स्त्रिया राहतात, त्या घरी रहाणे तिला आवडते. आत्ताच्या काळात मात्र लक्ष्मीचे हे योग्य घर शोधण्यासाठीचे जे निकष आहेत, त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव लक्ष्मीने तरी करू नये अशी तिला मनापासून विनंती करावीशी वाटते, कारण पतिव्रता या शब्दात अपेक्षित असलेला एकनिष्ठपणा, आणि गुणसंपन्नता ही दोघांमध्येही असली पाहिजे. तसेच वर उल्लेखलेले गुणही दोघांनी , किंबहुना घरात राहणाऱ्या सर्वांनीच अंगी बाळगले, तरच ते पूर्ण कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी-समाधानी, आनंदी आणि इतरांना — आणि अर्थात लक्ष्मीलाही हवेहवेसे वाटेल —- पण हा विचार, काही अपवाद वगळता, जनमानसात अजून तरी म्हणावा तसा रुजलेला दिसत नाही याचा खेद वाटतो . असो.   

या दिवशी समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची संध्याकाळनंतर पूजा केली जाते. ही पूजा मुख्यतः धनलक्ष्मीची आणि कुबेराची केली जाते. पैसे, दागिने, व्यवसायाच्या वह्या, अशी चल आणि अचल लक्ष्मीची, थोडक्यात स्वतःकडे असणाऱ्या समृद्धीची ही पूजा असते.  तिच्यामुळेच आपण शक्य तितके सुखाचे जीवन जगू शकत आहोत ही कृतज्ञतेची भावनाच यावेळी म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांमधून, प्रार्थनांमधून व्यक्त होतांना दिसते. लक्ष्मीबरोबर कुबेराची पूजा  का ? तर कुबेर हा देवांच्या संपत्तीचा संग्राहक समजला जातो. आणि संपत्ती कशी राखावी याची शिकवण त्यांनी द्यावी अशी प्रार्थना त्यांच्याकडे केली जाते. 

चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती “ अलक्ष्मी “ समजली जाते, जिला अजिबातच पूजनीय म्हणता येत नाही, हे मात्र ही लक्ष्मीपूजा करतांना ध्यानात ठेवलेच पाहिजे.  जिथे सर्वतोपरी पावित्र्य, शुद्धता, सत्यता, आणि भक्ती असते तिथेच लक्ष्मी निवास करते. अशा ठिकाणी धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, आणि मुख्य म्हणजे गृहलक्ष्मीही समाधानी असणे गृहीत असते. घर स्वच्छ ठेवणाऱ्या केरसुणीचीही यादिवशी लक्ष्मी म्हणून पूजा करणारी आपली थोर संस्कृती आहे खरं तर. पण एरवी प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता, कितीतरी घरांमध्ये गृहलक्ष्मीला केरसुणीसमानच  वागणूक दिली जात असल्याचे जाणवते. अशी घरे पाहतांना, “ यांच्याकडे लक्ष्मी म्हणजे केरसुणी “ असे उलटे समीकरण आहे की काय ? ” असा उपरोधिक प्रश्न आपसूकच पडतो. म्हणून लक्ष्मीपूजनाचे बाकीचे सोपस्कार आणि प्रार्थना करतांना, “ आता माझी गृहलक्ष्मीच  या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याइतकी सक्षम आणि पुरेशी खंबीर होऊ दे गं लक्ष्मीमाते–कृपा कर.  माझे आयुष्य- माझे घर तिच्याशिवाय समृद्ध होऊच शकणार नाही — “  ही प्रार्थनाही प्रत्येक विचारी माणसाने फक्त  यादिवशीच नाही तर नेहेमीच  करावी ही माफक अपेक्षा आहे.

ही आणि आयुष्यातली यापुढची प्रत्येकच दिवाळी सर्वांना अतिशय सुख-शांती देवो या हार्दिक शुभेच्छा.   

       

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिन दिन दिवाळी – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ दिन दिन दिवाळी – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

दिन दिन दिवाळी ।

गाई- म्हशी ओवाळी ।। 

असं अगदी आनंदाने म्हणत, दिवाळीचं स्वागत करण्यासाठी अगदी घराबाहेरच्या गोठ्यापर्यंत  जायचं, अशी एक छान “ अगत्यशील “ प्रथा आपल्याकडे आहे. आणि हा स्वागताचा दिवस म्हणजे “ वसुबारस “, ज्याला “ गोवत्सद्वादशी “ असेही म्हटले जाते. आपल्या शेतीप्रधान देशात गाई-गुरे-जनावरे यांना रोजच्या आयुष्यातच अतिशय महत्वाचे स्थान आहे. त्या सर्व गोधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशी “ गोधनपूजा “ ही प्राधान्याने केली जाणारी पूजा. बैलपोळा खास बैलांच्या पूजेसाठी असतो, तशी वसुबारस खास गाईंच्या पूजेसाठी. आता काही ठिकाणी स्वतःला जगतांना उपयोगी पडणाऱ्या इतर काही प्राण्यांचीही पूजा केली जाते. यादिवशी घरोघरी दारात, अंगणात रांगोळी काढून दिवाळीची जणू पूर्वतयारी केली जाते. 

पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून पाच कामधेनू बाहेर आल्या होत्या. त्यापैकी “ नंदा “ नामक कामधेनूसाठी वसुबारसेचे व्रत अंगिकारले जाते. यादिवशी गो -वासराची मनोभावे पूजा केल्याने अनेक जन्मांच्या कामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. आजच्या काळाचा विचार करता, कृषी-उत्पादन भरघोस आणि दर्जेदार व्हावे, उत्तम दूधदुभते उपलब्ध व्हावे आणि त्यायोगे मुलाबाळांना चांगले आरोग्य आणि सुख लाभावे, अवघा देशच धनधान्यसमृद्ध व्हावा, अशी कामना मनी बाळगून सर्वांनीच गाई-वासराची प्रतीकात्मक का होईना, पण कृतज्ञतापूर्वक पूजा करणे संयुक्तिक ठरणारे आहे. आता प्रत्येकाच्या घरी गाय पाळणे दुरापास्तच आहे. त्यामुळे अनेक घरात रांगोळीने किंवा तांदुळाने पाटावर गायीचे चित्र रेखाटून, किंवा मातीच्या बनवलेल्या प्रतिमा आणून ही पूजा करतात. दिवाळीचे स्वागत करण्यासाठी, एरवी सतत बंद असलेली, आणि घराची बेल वाजल्यानंतर ‘ कोण आहे ‘ असं त्रासिकपणे विचारून, किँवा की-होलमधून बघून, आत बोलावण्यास हरकत नाही याची खात्री करून उघडली जाणारी हल्लीच्या घरांची दारे, यादिवशी मात्र सताड उघडी ठेवली जातात, म्हणून ही “ अगत्यशील प्रथा “ आहे असे आवर्जून म्हणावेसे वाटते. आणि अर्थातच सर्वात महत्वाचे म्हणजे, पूजा करण्याची पद्धत, किंवा पूजासामग्रीतला नेमकेपणा , यापेक्षा पूजा किती श्रद्धेने, आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा मूळ उद्देश लक्षात ठेवून केली जाते, हे सर्वात जास्त, किंबहुना हे एवढेच महत्वाचे असते. बरोबर ना  ? 

या अनुषंगाने असा विचार मनात येतो की, अशा सणाच्या निमित्ताने सगळं कुटुंब, आप्तेष्ट प्रत्यक्ष किंवा आजकाल निदान virtually तरी आवर्जून एकत्र येतात, काहीवेळ एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतात, एकमेकांची आस्थेने चौकशी करतात, आणि हा सणांचा मोठाच फायदा सगळ्यांनाच होतो, हे अगदी १००% खरे आहे. पण इतके सारे सण साजरे करण्याची सुरुवात फक्त याच उद्देशाने झाली असावी, असे मात्र नक्कीच वाटत नाही. सण साजरा करण्याचे हे सगळे ancillary किंवा complementary फायदे आहेत, हे सुजाण माणसांनी नक्कीच ध्यानात ठेवायला हवे. याचं कारण असं की, आपल्या प्रत्येक श्वासात, रोजच्याच जगण्यात, अर्थार्जनाच्या आणि इतर प्रत्येकच  कामात, अनेक सजीव तसेच निर्जीव वाटणाऱ्या गोष्टींचा महत्वाचा हातभार अतिशय गरजेचा असतो, हे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. आणि अशा सर्व गोष्टींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपल्या बहुतेक सर्व सणांचे आणि उत्सवांचे प्रयोजन विचारवंत आणि ज्ञानी सत्पुरुषांनी खूप पूर्वीपासूनच केलेले आहे. त्यामुळे नेमकी तेवढीच भावना वगळून, बाकी सगळे आनंदाने साजरे करणे, म्हणजे सण साजरा झाला का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारायला हवा—- प्रत्येक सण साजरा करतांना— आणि आता हाच विचार मनात ठेऊन दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाकडे वळू या. 

“धनत्रयोदशी “ – धनतेरस -. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्वाचा असतो, कारण यादिवशी त्यांच्या हिशोबाच्या नव्या वह्यांची साग्रसंगीत पूजा करून त्यांचा वापर करण्यास ते सुरुवात करतात — हिशोबाच्या वह्या म्हणजे, ते कुठल्या दर्जाचे जीवन जगू शकतील हे दाखवणारे अदृश्य आरसेच–महत्वाचे मार्गदर्शक- त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून वापरण्याआधीच त्यांची पूजा. काही ठिकाणी याच दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पूजाही केली जाते. दागिने -कपडे   -नवीन वस्तू खरेदी करायला हा दिवस म्हणजे एक हुकमी कारण.

हा दिवस आणखी एका कारणाने शेतकरीवर्गातही साजरा केला जातो. त्यांच्यासाठी ‘ धान ‘ म्हणजे स्वतःच्या शेतात पिकलेले धान्य, हे त्यांचे धनच असते. म्हणून यादिवशी घरात आलेल्या धान्याची तर ते मनोभावे पूजा करतातच, पण त्याच्या जोडीने शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांचीही कृतज्ञभावनेने पूजा करतात.    

या दिवसाला “ धन्वंतरी जयंती “ असेही म्हटले जाते, आणि पौराणिक कथांनुसार यामागची प्रचलित कहाणी अशी आहे की—— देव- दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीच्या पाठोपाठ, हातात अमृतकुंभ घेऊन श्री धन्वंतरी प्रकटले. भगवान विष्णूंचा अवतार समजले जाणारे धन्वंतरी सर्ववेदविद्यापारंगत, मंत्र-तंत्रांचे जाणकार तर होतेच , आणि त्यांच्या अलौकिक सामर्थ्यामुळे, त्यांनी अमृतरूपाने देवांना अनेक औषधींचे सार प्राप्त करून दिले होते. म्हणूनच की काय, बऱ्याच दवाखान्यांमध्ये, अगदी मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्येही श्रीगणेशाच्या जोडीने धन्वंतरीची, एका हातात कलश असलेली चतुर्भुज मूर्ती, सहजपणे दिसेल अशी, अगदी मापाची काचेची उभी पेटी तयार करून, त्यात ठेवलेली हमखास पहायला मिळते. या दिवशी ईशान्य दिशेला तोंड करून भगवान धन्वन्तरींची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते, असेही  मानले जाते.

यादिवशीपासून घराभोवती, घरासमोर सगळीकडे भरपूर पणत्या, आकाशकंदील लावून सर्व परिसर लखलखीत प्रकाशाने उजळून टाकला जातो. घर आणि घराचा परिसर जसा प्रकाशमान– अंधःकारहीन होतो, तशी त्या घरातल्या माणसांची मनेही तेवढ्या काळापुरती का होईना, दुःख – चिंता -यातना – वेदना, तसेच राग, मत्सर, हेवेदावे, दुस्वास, तुलना, अशासारख्या सगळ्या नकारात्मक भावनांना विसरून, निखळ आनंदाच्या प्रकाशाने उजळून जावीत, हाच त्या इतक्या सगळ्या पणत्या लावण्यामागचा हेतू असायला हवा. 

पुराणांमध्ये या लखलखाटाचे कारण सांगणारीही  एक गोष्ट आहे — एका राजपुत्राचा सोळाव्या वर्षी अकाली मृत्यू होईल, आणि तोही त्याच्या लग्नानंतरच्या चौथ्या दिवशी, असे भविष्य वर्तवलेले असते. त्यादिवशी त्याची नववधू त्याच्या अवतीभवती आणि महालाच्या प्रवेशद्वारात सोन्याचांदीच्या मोहरांची रास ठेवते, आणि मग महालात मोठमोठे दिवे लावून लखलखीत प्रकाश केला जातो, आणि राजपुत्राला जागे ठेवले जाते. रात्री यमाने सर्परुपात महालात प्रवेश केल्यावर तिथल्या लखलखीत प्रकाशाने डोळे दिपल्यामुळे त्याला काहीच दिसत नाही, आणि तो यमलोकात परत जातो. राजपुत्राचा प्राण वाचतो. 

एकूण लक्षात घेण्यासारखे काय, तर ज्ञानाचे – सारासार विचारांचे – योग्य आणि आवश्यक तितक्या प्रयत्नांचे – सहभावनांचे,  सद्भावनांचे आणि सकारात्मक विचारांचे अनेक दीप प्रत्येकाने नंदादीपासारखे स्वतःच्या मनात सतत आणि श्रद्धेने तेवते ठेऊन, अंध:कारजनक नकारात्मक भावना त्याच वातीने फटाक्यांसारख्या पेटवून संपवून टाकून,  मन निर्मळ निर्व्याज आनंदाने सतत लखलखते ठेवले, तर आयुष्यात फक्त चारच दिवस नाही, तर रोजच दिवाळी साजरी होईल यात शंकाच नाही. 

क्रमशः ….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी पुडाची करंजी ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

?  विविधा ?

☆ माझी पुडाची करंजी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ 

करंजी आवडणारे फार कमी लोक आहेत असं मला वाटतं. माझी आई खूप सुंदर पुडाच्या करंज्या करायची आणि तिची आईही आई आणि आजीच्या हातच्या त्या अलवार करंजा लहानपणापासून खाल्लेल्या दिवाळीत !

एका दिवाळीत बडोद्याहून आत्या सहपरिवार आल्या गावाकडे, माझी आई आणि काकी दोघींना मोठ्ठा पितळेचा डबा भरून पुडाच्या करंज्या केल्या रात्रभर जागून. आणि तो पितळी डबा मी उठायच्या आत पाठवला!

आत्या सहकुटुंब मळ्यातल्या घरी रहिल्या होत्या. तिकडे, ताजी करंजी खायला न मिळाल्याची खंत मला अजूनही आठवतेय मी तेव्हा नववी दहावीत असेन आम्ही तीन चार मुलं गावातल्या घरात असताना सगळ्याच्या सगळ्या करंज्या तिकडे का पाठवल्या होत्या ते आता आठवत नाही, घरात सुबत्ता होती आणि घरातल्या सगळ्या बायका सुगरणी होत्या … नंतर करंजी सह सगळे पदार्थ केले आणि भरपूर खाल्लेही असतील, पण तो भला मोठा करंज्यांनी भरलेला पितळी डबा आणि आम्हाला त्यातली एकही करंजी न देता सकाळी गड्याबरोबर पाठवलेला……अजूनही आठवतो आणि खूप हसू येतं त्या वेळी करंजी न मिळाल्याचं!

माझ्या लग्नानंतर मी ही दिवाळीला त्याच पद्धतीने पुडाच्या करंज्या करू लागले, एकदा दिवाळीत सरोज फडके नावाची केटरिंग व्यवसाय करणारी मैत्रीण आली तिला दिवाळीच्या पदार्थाची ताटली दिली,तर ती म्हणाली “ती करंजी काढ पहिल्यांदा “मी म्हटलं तू खाऊन तर बघ, मग तीने फक्त चार करंज्याच खाल्ल्या!
माझ्या हातची पुडाची करंजी खूप जणांना आवडलेली आहे हे माझं मलाच खूप छान वाटतं,

माझी मैत्रीण स्वाती सामक आणि मी आम्ही दोघींनी एका दिवाळीत काही पदार्थ एकत्र केले होते, तिला पण करंजी अजिबात आवडत नव्हती पण तिने माझ्या करंजीची खूप तारीफ केली होती, आणि ती आजही म्हणते, “प्रभा करंजी मला फक्त तुझीच आवडली होती. ” बरेच वर्ष केली नाही करंजी, यावर्षी कंटाळा न करता पुडाची करंजी करीन, मागच्या दिवाळीत एका सीकेपी मैत्रीणीने दुस-या एका मैत्रीणीकडे कानवले आणले होते तिथे मी एक कानवला खाल्ला खूप प्रशंसा केली, मी आणि इतरांनीही !पण माझी पुडाची करंजी काकणभर सरसच असायची ! फरक इतकाच ती सीकेपी मैत्रीण पंचाहत्तरी पार केली तरी अजून घरी दिवाळीत कानवला (करंजी )करते आणि मी साठीतच माझ्यातल्या सुगरण पणाला तजेला देणं सोडून दिलं . गेली अनेक वर्षे करंजी केली नाही.

माझ्या पुतणीचं लग्न झाल्यानंतर तिला करंज्या पाठवल्या दिवाळीत….तेव्हा ती गावाला गेली होती , एकत्र कुटुंबात रहाणारी माझी पुतणी- प्रीती गावाहून आल्यावर ,मला म्हणाली, “काकी मी तुझी करंजी ओळखली, मी मम्मींना म्हटलं, “ही काकीची करंजी आहे”.

खूपजणी माझ्या पेक्षा सुंदर पुडाच्या करंजा करत असतील, पण अशा पद्धतीची प्रशंसा माझ्या करंजीला मिळाली आहे!

समस्त भारतीय सुगरणींच्या कुळात माझ्या करंजीची ही खसखशी एवढी नोंद!

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ?

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी कालची व आजची ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? विविधा ?

 ☆ दिवाळी कालची व आजची ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

प्रकाश कुलकर्णी सरांनी यंदाच्या ‘नवरत्न’दिवाळी अंकाचा ‘दिवाळी कालची व आजची’हा विषय कळल्यानंतर मला माझं बालपण आठवल.

आम्ही लहान होतो तेव्हाची दिवाळी मला अजूनही आठवते. सहामाही परीक्षा संपली की आम्हाला दिवाळीची सुट्टी लागायची. त्याअगोदरच आम्ही आईबाबांच्या मागे लागायचो.चुलत भावडांना,मामाला भेटण्याची ओढ लागलेली असायची. माझ्या बाबांना तीनही भाऊच.अत्त्या नाही. चौघे चार ठिकाणी असल्याने चारही भाऊ मुलांच्या शाळेच्या सुट्टीत एकत्र जमून कुठेही एकिकडे आम्ही दिवाळी साजरी करायचो.आम्ही सर्व सख्खी चुलत भावंडे एकत्र जमायचो.मोठी धमाल असायची. आम्ही खूप गमतीजमती करायचो.रोज दुपारी पत्ते  खेळायचो. कुठलेच। काकाकाकू आम्हा भावंडामधे भेदभाव करत नव्हते. सर्वांना समान न्याय होता.

दिवाळी म्हटली की अजूनही आठवतं ते गारगार कडक थंडीत दात कडकड वाजत असतानाचं कुडकुडत पहाटे उठणं.घड्याळात रात्री झोपताना पहाटे साडेतीन/चारचा गजर लावलेला असायचा. तो झाला हळूच उठायचं आणि बाबांच्या किंवा मोठ्या बहीणभावाच्या सोबतीने अंधारात अंगणात लावलेल्या व पणत्यांच्या उजेडात घाबरत घाबरत जाऊन पहीला फटका लावायचा. तेव्हा आतासारखे गँसचे किंवा लाईट वरचे गिझर नव्हते. कोकणात तर सगळीकडेच नारळीपोफळीची झाडे खूप असतात. त्यामुळे त्यांच्या वाळलेल्या झावळी पडल्यावर त्या गोळा करून त्याच्याच तटक्या विणून त्यांनी शाकारलेल्या खोपीत उन्हाळ्यात लाकडे व झावळी तोडून लहान लहान तुकडे गोळा करून ठेवलेले असायचे. घराच्या मागच्या अंगणात एका कोपऱ्यात चुल बाराही महीने कायमच असायची. त्याजवळच पाण्याचा हौद व त्यालगतच मोठी न्हाणी असायची. चुलीवरच्या हंड्यात पाणी तापत असायच. प्रत्येक वेळी हंड्यात भर घालायची. चुलीत नीट विस्तव करायचा. तेल उटणं लावयचं आणि कुडकुडत पटापटा अंघोळी करायच्या एकमेकांच्या अंघोळीच्या वेळी प्रत्येकाने फटाके उडवायचे.आम्ही बहीणी पुढच्या अंगणात केलेल्या किल्ल्यावर मावळे मांडायचो. त्यापुढे शेणाने सारवलेल्या अंगणात ठिपक्यांच्या कागदाच्या मदतीने ठिपके काढून रांगोळी काढायचो.त्यात रंग भरायचे. तोपर्यंत उजाडायला लागायचे. मग फराळ करायचा. त्याबरोबरच दहीपोहेही असायचे.

हळूहळू काळ बदलला. मानवाच्या प्रगतीबरोबर जंगले,थंडी कमी झाली. आता पुर्वीसारखी थंडी पडत नाही. पहाटे उठणंही कमी झालं.ठिपक्यांची रांगोळी जाऊन संस्कारभारतीच्या रांगोळ्या आल्या. नोकरीच्या बदलेल्या स्वरुपामुळे रजा मिळणे कठीण झाले. त्यामुळे एकत्र येऊन सण साजरे केले जात नाहीत. पुर्वी एकमेकांना दिवाळीची भेटकार्ड पाठवली जायची. ती.बंद झाली. बायका दिवाळीचा फराळ करायला एकमेकांच्या घरी जमायच्या.एकमेकांना फराळाचे डबे ,ताटं द्यायच्या.फराळ ,भाऊबीजेची एकत्र जेवणं सगळंच कमी झालं माणसातलं प्रेम कमी झालं. बाजारात साचेबद्ध किल्ले मिळतात. अपार्टमेंट झाल्याने प्रत्येकाचा वेगळा आकाशकंदील आणि लाईटच्या माळा त्यामुळे इमारती झगमगतात.सर्व अपार्टमेंटची अंगणं गाड्यांच्या पार्किंगने भरून गेलेली असतात रांगोळीला जागाच नसते. फ्ल्याटच्या दाराशी काळ्या फर्शीवर  छोटीशी रांगोळी काढली जाते. त्यातही तयार रांगोळ्याहि अनेक प्रकारच्या बाजारात मिळतात.

एकुण काय पुर्वीच्या दिवाळीची मजा कमी झाली हेच खरं. आणि या दोन-तीन वर्षात पावसाळी पुर त्याबरोबरच आताचा हा कोरोना या नैसर्गिक संकटांमळे सगळं बदलून गेलं.या कोरोनामुळे तर सगळीकडेच वाहतूक व दुकाने बंद आहेत.घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.

      आठवणी जागतात

       मन मोहून जातात

       बदलत्या जगासवे

       लागते बदलावे

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अस्मादिकांच्या पादुका…… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ अस्मादिकांच्या पादुका…… ☆ सौ  ज्योती विलास जोशी 

पायातलं वहाण म्हटलं की सिंड्रेलाच्या परिकथेतला तिचा तो एक बूट आठवतो. जिच्या भोवती कथा फिरते. मला प्रकर्षानं आठवते ती ‘द आदर पेअर’ही इजिप्शियन अवॉर्ड विनिंग फिल्म ! अवघ्या चार मिनिटाच्या या फिल्म मध्ये रेल्वेत चढताना एकच बूट पायात राहिलेल्या मुलानं सारासार विचार करून तो बूट प्लॅटफॉर्मवरच्या मुलाकडे भिरकावला जेणेकरून त्याला त्याचा वापर होईल. निरागसतेला केवढ्या उंचीवर नेऊन ठेवणारी ही गोष्ट.

चाळीस लाखाच्या चप्पल्स चोरी करून लक्षाधीश झालेला माटुंग्याचा इब्राहिम सर्वश्रुत आहे.कुलभूषण जाधवला त्याची आई पाकिस्तानात भेटायला गेली तेव्हा सुरक्षेच्या नावाखाली तिच्या आभूषणांसह तिचे चप्पल काढून घेतले.तेव्हा ट्विटरवर ‘चप्पल चोर पाकिस्तान’या# खाली दिवसभर ट्विटर ट्रेंड करत होतं.आपल्या कोल्हापूरी चप्पलनं तर जगात चप्पल ची किंमत वधारून ठेवलीय….

जूते लो पैसे दो म्हणत हम आपके है कौन मध्ये माधुरी थिरकते. लग्नातल्या या विशिष्ट प्रसंगाने चप्पलला केवढा भाव मिळतो. नवऱ्या मुलाने देऊ केलेल्या पैशावरून त्या चप्पलची किंमत ठरते…. ते निराळंच….एकेकाळी ‘पायातली वहाण पायातच’ असं म्हणून स्त्रीला हिणवणारया पुरुष प्रधान संस्कृतीच स्मरण झालं. दुसऱ्याच क्षणी चप्पल जोडीवर फुल ठेवून त्याची पूजा करत आर्चीला विनवणारा सैराट सिनेमातला परशा आठवला.

आताशा प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक अस्तित्वाला एक दिवस ठरवायची पद्धत आहे. तो त्याच्या अस्तित्वाचा दिन म्हणून साजरा करतात. पंधरा मार्चला नुकताच चप्पल दिन होता. एरवी ‘चपलीनं मारीन’या इतक्या मोठ्या अपमानाचा मूळ असणारी ही चप्पल आजच्या दिवशी इतकी वलयांकित का झाली ? त्याचं रहस्य मला कळलं होतं……..अर्थातच एक नवीन चप्पल जोड खरेदी करून मीही ‘चप्पल डे’ साजरा केला.

आज व्हाट्सअपचं पान हिरवंशार झालं होतं. उघडून पाहते तो प्रत्येक पानावर चप्पल दर्शन घडत होतं. अनाहूतपणे कर जुळू नयेत याची मी काळजी घेत होते.चप्पलचं असणं किती महत्त्वाचं आहे. तिचं असणं हेच तिचं अस्तित्व! अस्तित्व साजरा करण्याच्या दिवसांमध्ये एक दिवस तिचा ही असणारच ना? माझ्याच प्रश्नांचं निरसन माझ्याच अभ्यासातून झालं. उद्या परत कोणाच्या अस्तित्वाचा दिवस असा विचार करत मी झोपी गेले.

नित्य नेमानं सकाळी उठल्याबरोबर मोबाईलचा डाटा ऑन केला आणि पुन्हा हिरवंगार पान मला खुणावू लागले. बुचूबुचू मेसेजेस येऊन पडले होते. प्रामुख्यानं आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपचं पान अगोदर उघडलं जातं आणि ते आजही उघडलं तर ‘अहो आश्चर्यम’ गुड मॉर्निंग च्या जागी एक चप्पल जोडचा फोटो! ‘टुडे ‘या मथळ्याखाली…..आणि खाली लिहिलेलं…..हे कुणाचं आहे? माझं कुणीतरी घालून गेलं आहे’

सकाळ सकाळी रामाच्या पादुकांच दर्शन व्हावं तसा मी नमस्कार केला. टेक्नॉलॉजीला ही मनोमन दंडवत घातला ते पुढचा मॅसेज वाचून…. अगं तुझं आणि माझं एक्सचेंज झालंय बहुतेक अगदी सेम टू सेम..

चप्पल हा खरंच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ! आमची आजी म्हणायची ‘देह देवळात चित्त खेटरात’.. तिच्या या बोलण्याचा मला पदोपदी अनुभव येतो बापाला आपली मुलगी देखणी असली की जसं कोणीही उचलून नेईल अशी सुप्त भीती मनामध्ये असते ना तसंच प्रत्येकाला आपली चप्पल डोळ्यात भरण्या जोगी आहे; कोणी तरी घालून जाईल असंच वाटतं आणि कधीकधी घडतही तसंच…..

मंदिरात आत जाताना नेहमीच्या पेढेवाल्याकडे पेढे देऊन चप्पल ठेवायची प्रथा त्यामुळेच पडली असावी. तो बिचारा स्वतःचे पेढे खपवण्यात इतका मशगुल असतो की आपल्या चप्पलची त्याला कितपत काळजी असते देव जाणे !आपला तो अंधविश्वासच !!

पैसे देऊन स्टॅन्ड मध्ये चप्पल ठेवण्याची मानसिकता बहुतेकांची नसतेच. खेटरंच ते… त्यासाठी इतकी किंमत द्यायची गरज नाही. जे कोणी त्या स्टॅन्ड मध्ये चप्पल ठेवतात ते टोकन देऊन चप्पल परत घेताना, देणारा माणूस चप्पल अशा पद्धतीने भिरकावत होतो की आपल्या चप्पलची हीच लायकी आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा..आपल्या देशात भाजी रस्त्यावर आणि चप्पल दुकानाच्या शोकेसमध्ये अशी परिस्थिती असताना चप्पल ची अशी किंमत केलेली मनाला लागते. सहाजिकच आहे ना?

चप्पल बूट यांच्या आताच्या जाहिराती पाहून आमचे आजोबा सांगायचे. “आम्हाला वर्षातून एकदा चप्पल मिळे. सततची घालायची सवय नसल्यानं ती घातलेल्या दिवशी आम्ही कुठेतरी विसरून येत असू. त्यानंतर पुन्हा एक वर्षांनंतरच नवीन मिळे.चप्पल घालायची सवयच नसल्याने ती विसरायची सवय जास्ती लागली होती.”

कुटुंबात जितक्या व्यक्ती तितकी वाहनं आणि चौपट वहाणं. चपलांची खानेसुमारीची डोकेदुखी होऊन बसली आहे. माणशी दहा याप्रमाणे चप्पलचा स्टॅन्ड भरलेला असतो. वॉकिंग, जॉगिंग, कॅज्युअल, स्पोर्ट्स, स्लिपर्स ,फॉर्मल बापरे बाप!म्हणून का चप्पल इतक वलयांकित? आणि तिची जागा दुकानातल्या काचेत आणि मेथीची पेंडी रस्त्यावर?…..

एकदा माझ्या मैत्रिणीकडे आम्ही रात्री जेवायला गेलो होतो. जेवणानंतर गप्पा-टप्पात बारा वाजून गेले. फ्लॅट सिस्टिम मधल्या तिच्या घरातून आम्ही चौघेही बाहेर पडलो आणि लिफ्टने खाली निघालो तितक्यात, दोघांच्या पायात घरातलेच स्लीपर आहेत हे त्यांच्या लक्षात आलं पण पुन्हा आत जाऊन चप्पल घेण्याऐवजी तात्पुरतं शेजारच्या फ्लॅटच्या चप्पल स्टैंड मधील आपल्याला बसतील ते चप्पल घालून ते खाली आले.माझ्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पाहून ती हसली. “अगं गाढ झोपलेत ते ! काय समजतं त्यांना? शिवाय आमचे स्लीपर्स आहेतच की त्यांच्या दारात….

रात्री घरी पोचलो आणि कॉरिडोर मधल्या माझ्या चप्पलच्या रॅकला एक कुलूप आणि त्याला दोन किल्ल्या लावलेल्या मला दिसल्या. मी स्टॅन्डला कधीच कुलूप लावलं नव्हतं आत्ता मी लगेच एक किल्ली फिरवली चपला बंदिस्त केल्याआणि आत आले.दर खेपेला कुलूप उघडून चप्पल काढायची आणि बाहेर पडायचं…. चप्पल स्टॅन्ड ला जणू मी लाॅकरचा दर्जा प्राप्त करून दिला होता.प्रत्येक ठिकाणी जायचे चप्पल निरनिराळे… दुपारी मंदिराला घालून जायचे चप्पल घालून मी बाहेर पडले. भजन आटोपलं आणि मंदिरात गेले देव दर्शन करून बाहेर आले तो चप्पल गायब ‘मंदिराला घालून जायचे चप्पल’असलं म्हणून काय झालं आता पुन्हा मंदिरात जायचं तर कोणतं चप्पल वापरायचं? पंचाईत झाली ना माझी??

माझे डोळे सगळ्यांच्या पायांकडं भिरभिरू लागले. काय काय करावं सुचेना. मंदिरात बसलेला राम आठवला. तो असताना मी का उगा चिंता करत बसले होते? पुन्हा एकवार मी राम मंदिरात जाऊन रामाला साकडं घातलं, रामा बाबा रे, तू हि अनवाणीच आहेस पण तुझ्या पादुका सुरक्षित आहेत रे ….भरतानं सिंहासनावर ठेवल्यात. राज्य करताहेत त्या ….रामाचा हसतमुख चेहरा मला काहीतरी सांगतोय असा मला भास झाला . काय ?माझ्या हि चप्पलांचा असाच कोणीतरी सन्मान केला असेल ? इश्श्य काहीतरीच ! कुणाच्या पायातून गेली असेल माझी चप्पल त्याला सद्बुद्धी दे रे देवा..” मी रामाला साकडं घालून बाहेर आले.

मंदिराबाहेर चपलांचा खच पडला होता. गर्दी कमी होऊ लागली तशी चपलांही कमी होऊ लागल्या. चुकून आपल्या पायातील चप्पल आपलं नव्हे म्हणून कोणी परत येतं का असं वाटून मी थोडीशी रेंगाळले.

फुलवाला हे सर्व काही पाहत होता. नेहमीचा तोंड ओळख असणारा तो हसला आणि मला त्याने एक अफलातून सल्ला दिला.”मावशी,अहो चपला कमी व्हायला लागल्यात. तुम्हाला बसणारा साईज आता उरणार नाही. त्यापेक्षा त्यातलं तुम्हाला बसतंय ते घाला आणि जा घरी नाहीतर अनवाणी जायची पाळी येईल.”त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं.मी अनवाणी कशी जाणार? त्यातलं एक चप्पल देवाच्या साक्षीने मी चोरलं आणि घर गाठलं.

घर गाठताच त्या चप्पलचं ‘मंदिराचं चप्पल’असं नामकरण झालं.ते चप्पल घालून मी नियमित मंदिरात जाते. जी कोणी माझं चप्पल घालून गेली आहे ती माझं चप्पल ठेवून स्वतः चप्पल घेऊन जाईल.या आशेवर आहे मी अजून ….अजूनही मला वाटतं रामाच्या कृपेनं माझ्या पादुका मला मिळतील पुनःश्च राम राज्य येईल….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खीर बाई खीर…भाग 2 ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ खीर बाई खीर…भाग 2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

(दिग्दर्शकाना आपल्या नाटकाच्या यशाची खात्री पटे.भाग 2 पुढे चालू)

मग या नायिकेला लाडीगोडी लावण्यासाठी तिच्याच वजनाइतकी चिरलेल्या पिवळ्याधमक गुळाची साडी नेसवली जाई. त्यामुळे ती नायिका आपला पूर्वीचा रंग झटकून हा पिवळा रंग अंगभर लपेटून घेई. त्या पिवळ्या साडीला खोवून घेतलेल्या पांढऱ्याशुभ्र ओल्या नारळाच्या किसाची मध्ये मध्ये नक्षी काढली जात असे. ही कलाकुसर मात्र सढळ हाताने करत असत. असा हा मेकअप पूर्ण झाल्यावर आता या नायिकेला प्रत्यक्ष नाटकाचे वेध लागलेले असत. मग एका गोल, खिरीच्या साजेशा रंगाला मॅच होईल अशा रंगाच्या डिशच्या रंगमंचावर नायिका अवतरत असे.   आता नायकाच्या एंट्रीची वेळ जवळ आलेली असते.  इतका वेळ सर्व दिव्यातून बाहेर पडताना आपल्या या नायिकेला अग्नीसरांनी योग्य वेळी साथ  दिलेली असते. पण ते फक्त पाहुणे कलाकार असल्याने या प्रयोगातून वेळीच exit घेतात. त्यानंतरच नायकाचे रंगमंचावर आगमन अपेक्षित असते. अग्नीसरांच्या उपस्थितीतच जर चुकून या नायकाचे आगमन झालेच तर मोठा अनर्थ ओढवतो. कारण आपल्या तापट स्वभावाने अग्नीसर पाहुणे कलाकार न राहता खलनायकाच्या भूमिकेत शिरुन गुळाच्या मदतीने या दुग्धरुपी नायकाला बदसूरत करण्याची शक्यता असते आणि पूर्ण नाटकाचा प्रयोगसुद्धा फसू शकतो. म्हणून मग थोडा वेळ ही नायिका मंद वाऱ्याच्या सान्निध्यात आपले श्रम विसरुन थंड होत आतुरतेने नायकाची वाट पाहू लागते. हीच वेळ नायकाच्या आगमनाची असते. आपल्या शुभ्रधवल वर्णाने हा दूधनायक सळसळत रंगमंचावर प्रवेश करतो. आपल्या सहजसुंदर  अभिनयाने या नाटकात रंग भरु लागतो. जोडीला याने  नायिकेला भेट म्हणून तुपाची धार पण आणलेली असते. त्याच्या सानिध्याने खिरीचे नाटक अधिकच झळकू लागते. शिवाय साथीला त्याची नेहमीची, नेहमीच छोटीशी पण महत्वाची भूमिका निभावणारी वेलचीताई या नाटकाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. आता हा सर्व  कलाकारांचा एकजीव झालेला संच नाटकाच्या शेवटच्या अंकासाठी सिद्ध होतो. आतुरतेने क्लायमॅक्स ची वाट पाहणारे आम्ही प्रेक्षक ताबडतोब आमच्या रसनारुपी चक्षूनी त्या रंगमंचीय रंगतदार खिरीचा आस्वाद घेत असू. आणि आमच्या चेहऱ्यावरील तृप्तीने आपल्या कलाकृतीला योग्य दाद मिळाल्याचे त्या दोन दिग्दर्शिकाना समजत असे. मग आपल्या या स्त्रीपार्ट करणाऱ्या नायिकेकडे कौतुकाने पाहताना त्या  कृतकृत्य होऊन जात.

तळटीप:-

  • आवडत असल्यास या नाटकात काजूचे तुकडे, बदाम, बेदाणे याना छोट्या भूमिका द्यायला हरकत नाही.
  • खोबऱ्याच्या किस वापरण्याऐवजी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करुन त्याची नक्षी पिवळ्या साडीला काढली तरी चालेल.
  • महत्वाचे म्हणजे खपली गव्हाच्या अनुपस्थितीत घरातले रोजचे गहू किंवा त्याचा बाजारात मिळणारा  तयार दलिया कधीतरी नायिकेची भूमिका उत्तम पार पाडू शकतात.
  • सध्याच्या काळात उखळ सहज उपलब्ध नसल्यामुळे त्याचे काम मिक्सर करु शकतो. फक्त गव्हाला हलकेच पाण्याने ओलसर करुन, मिक्सरमध्ये हलके हलके फिरवावे लागते.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खीर बाई खीर…भाग 1 ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ खीर बाई खीर…भाग 1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

माझ्या माहेरी कराडला चैत्रात कृष्णाबाईचा मोठा उत्सव असतो. देवीची पालखी, जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम याची तीन दिवस रेलचेल असते. पण मला कायम उत्सवाचा शेवटचा दिवस आवडत असे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेवटच्या दिवशी प्रसाद म्हणून ‛गव्हाची खीर’ असायची. आणि घरोघरी गहू गोळा करुन तयार केलेल्या या खिरीला एक प्रकारची अवीट गोडी असायची.  सोहळयातल्या या खिरीला जसा वेगळा स्वाद असायचा तसाच ही खीर आमच्या घरी करायचा पण एक सोहळाच असायचा.

पाचवीत असताना आम्हाला शाळेत एक कविता होती. त्यात एका स्त्रीचे वर्णन करताना म्हटले  होते, “ गोधूम वर्ण तिचा!” आता हा गोधूम वर्ण म्हणजे कसला? असा त्या वयात आम्हाला प्रश्न पडला. पण बाईंनी लगेचच स्पष्टीकरण केले,“मुलींनो, गोधूम म्हणजे गव्हासारखा बरं का!” तेव्हा तो गव्हाळ वर्ण डोक्यात अगदी पक्का बसला. तर अशा या गव्हाची एक गंमत आहे बर का! बिचाऱ्याला पाकशाळेत गेल्यावर  कोणत्याही पाककृतीच्या नाटकात काम करायचे असेल तर अनेकदा ‛स्त्रीपार्ट च’ करायला लागतो. उदा. पुरणपोळी,सांज्याची पोळी, चपाती,गूळपापडी, कुरडई, खीर इ. इ.! क्वचित पुरुषपार्ट पण मिळतो जसे पराठा, लाडू वैगेरे वैगेरे ! पण ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. असो.

तर आमच्या घरी  ‘गव्हाची खीर’ करायची तर जय्यत तयारी असे. नाटकात काम करणारे अनेक कसलेले नट असले तरी कोणत्या भूमिकेसाठी कोणता नट योग्य आहे हे जसे दिग्दर्शकाला माहीत असते. तसे आमच्या घरातील आई आणि जवळच राहणारी मामी, या दोन दिग्गज दिग्दर्शकांना खिरीच्या नाटकासाठी ‛खपली गहूच’ लागत. ते दुकानात मिळाले की मामीला लगेच निरोप जात असे. मग दुपारी घरची जेवणे आटोपली की मामी जय्यत तयारीनिशी आमच्या घरी हजर होत असे. कारण नाटक बसवायचे असे ना! मग या दोन दिग्दर्शकांच्या अंगात खीर चढलेली असे.   स्त्रीपार्ट करायचा म्हणजे या गव्हाला भरपूर पूर्वतयारी करावी लागत असे. नाटकात फिट होण्यासाठी सूप आणि चाळणीच्या मार्गदर्शनानंतर ते उखळबाईंच्या  ताब्यात दिले जात. मामीच्या अनुभवी नजरेतून सूप आणि चाळणी या गव्हाचे ग्रुमिंग करत असतानाच बरेच दिवस दुर्लक्ष झाल्यामुळे रागावून बसलेल्या उखळ आणि मुसळीला लाडाने  अंजारून- गोंजारून, थोडे पाणी पाजून आईने त्यांच्या कृष्णकांतीला लकाकी आणली असे. मग हे थोडेसे तांबूस वर्णाकडे झुकणारे खपली गहू उखळात प्रवेश करत. इथे आपले पुरुषी दिसणे कमी करण्यासाठी आपल्याला दिव्यातून जावे लागणार हे माहीत असूनही ते निमूटपणे मुसळीचे घाव सोसण्यासाठी सज्ज होत. मग आई आणि मामी या दोन दिग्दर्शिका मुसळीला वरखाली नाचवत त्यांना हवा तसा मेकओव्हर तिच्याकडून करवून घेत. यावेळी गव्हाचे वॉक्सिंग होत असे. ते करताना कातडी सोलवटली जात असे. म्हणून मध्ये मध्ये त्यावर थंड पाण्याचा शिडकावा करावा लागे. तरीही एखादा चुकार दाणा पटकन बाहेर पडे. पण दोघी दिग्दर्शिका बारीक लक्ष ठेवून असत. त्या लगेच त्यांचे बखोटे पकडून त्यांना पुन्हा उखळीत घालत. बघता बघता गव्हाचे रुप पालटू लागे. बाह्य आवरण बाजूला पडून हे गहू आता नाटकाच्या रंगात रंगायला लागलेले असत. मग याना पुन्हा सुपात नाच करावा लागे आणि उरले सुरले त्यांचे बाह्य आवरण गळून पडे व गव्हाला अधिक गोरा रंग प्राप्त होत असे. आता मात्र या दोघी दिग्दर्शिका त्यांच्या रुपावर खुश होत त्यांना थंड पाण्याच्या बाथटबमध्ये किमान तासभर तरी डुंबायला सोडत. मग त्याला त्याच पाण्यात चांगले चोळून घेऊन गरम पाण्यात, कुकरमध्ये अग्नी सरांच्या साथीने स्टीम बाथ घ्यायला लावत. मग आपल्यातील पुरुषी ताठा टाकून हे गहूराजे स्त्रीभूमिकेसाठी अगदी मऊ मुलायम बनत. आपल्यात झालेला हा बदल बघून गहूराजे स्वतःवरच खुश होत. त्यामुळे त्यांच्या शरीरावर मूठभर पाणी चढून ते टम्म फुगत. अशी ही नाटकासाठी योग्य, अंगाने भरलेली नायिका बघून दिग्दर्शकाना आपल्या नाटकाच्या यशाची खात्री पटे.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print